श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख २१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

यथा व्रजगोपिकानाम् ॥ २१ ॥

अर्थ: आपल्या भक्तिलक्षणाकरिता नारदमहर्षी उदाहरण देतात – जशी गोकुळातील गोपिकांची (अवस्था होती.)

विवेचन: स्वतःचे भक्तिलक्षण नारद सोदाहरण पटवून देतात. कोणतीही महत्त्वाची भावना किंवा ज्ञान हे अमूर्तच असते. त्याच्या अभिव्यक्तीकरिता एखाद्या व्यक्त उदाहरणाची अपेक्षा असते. मूर्तात प्रविष्ट झाल्यावाचून अमूर्त प्रगट होऊ शकत नाही. नारदांनी ज्या भक्तीचे स्वरूप एकोणिसाव्या सूत्रात सांगितले, ती भक्ती उत्कटतेने पूर्ण रूपाने कोठे प्रगट दिसली असेल तर ती नारदांना गोकुळात दिसली. गोकुळातील पुरुष, स्त्रिया, गोप, बालक सर्वच भगवान श्रीकृष्णावर प्रेम ठेवणारेच होते. पण नारदोक्त भक्तिलक्षणाचा पूर्ण आविष्कार गोपिकांच्याच ठिकाणी दिसला म्हणून त्यानी गोपिकांचेच उदाहरण घेतले आहे. नुसते ‘गोपिकानाम्’ म्हटले असते तर कोणत्याही मोठ्या नगरात गोप गोपिकाची वस्ती असते. पण ते भक्त नसतात. केवळ गोकुळातील व्रज भूमीतील गोपिकाच भक्त होत्या. म्हणून ‘व्रजगोपिकानां’ म्हटले आहे.

गोपिका म्हणतात, “हे दीनबन्धो, तू जन्मल्यापासून हे गोकुळ अधिक उत्कर्षाला प्राप्त झाले आहे, येथे लक्ष्मी अखंड आश्रयाला आली आहे.” मुळात ती व्रजभूमी ही पुण्यभूमीच होती. पण श्रीकृष्णअवतारामुळे तिला फार श्रेष्ठत्व प्राप्त झाले. त्या व्रजवासी ज्या गोपिका होत्या, त्यांचे उदाहरण नारद आपल्या भक्तिलक्षणाच्या पुष्टीकरिता देतात.  आपल्या इंद्रियांच्याद्वारे जी श्रीकृष्णभक्तिरसाचे पान करते ती गोपी.

‘गोपायति’ इति गोपी म्हणजे आपल्या भक्तिभावनेचे जी रक्षण करते ती गोपी.

नाथ भागवतात गोपींचे वर्णन पुढील प्रमाणे आले आहे.

*”गोपिका करूनि माझी भक्ती । मी प्रसन्न केलों श्रीपती ।

रास मागीतला एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावावया ॥६२॥

*

त्या जाण वेदगर्भींच्या श्रुती । श्रुतिरूपें नव्हे मत्प्राप्ती ।

तैं परतल्या म्हणोनि ‘नेति नेति’ । माझी सुखसंगती न पवेचि ॥६३॥

*

विषयबुद्धी तें मुख्य अज्ञान । तें असतां मी न भेटें जाण ।

असतां वेदोक्त जाणपण । तेणेंही संपूर्ण न भेटें मी ॥६४॥

*

जाणीवनेणीव गेलिया निःशेष । माझें पाविजे निजात्मसुख ।

श्रुति जाणोनि हें निष्टंक । गोकुळीं त्या देख सुखार्थ आल्या ॥६५॥

*

त्याचि जाण समस्त श्रुती । गोपिकारूपें गोकुळा येती ।

रासक्रीडामिसें एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावल्या ॥६६॥

दुसरीही एक कथा उपलब्ध होते. त्रेतायुगात श्रीरामचंद्राचा अवतार झाला. सीतास्वयंवराकरता श्रीरामचंद्र मिथिला नगरीला आले, धनुर्भंग झाला, सीतेने रामचंद्राला माळ घातली, विवाहसोहळा समारंभपूर्वक पार पडला, तेथे ज्या मिथिला नगरीतील स्त्रिया जमल्या होत्या त्याही श्रीरामचंद्राचे ते कोटिकंदर्पदर्पहारी लावण्य बघून मोहित झाल्या. त्यांचीही उत्कट इच्छा झाली की आम्हांलाही हेच पती लाभले तर किती चांगले होईल, त्याकरिता आम्ही वाटेल तो त्याग करू. त्यानी आपली उत्कट वासनाही श्रीरामापुढे प्रगट केली, पण राम अवतार हा मर्यादापुरुषोत्तम होता, एकपत्नीत्वाची मर्यादा पाळणे अवश्य होते. त्या मिथिलानिवासी स्त्रियांचा उत्कटभाव पाहून श्रीरामचंद्र त्यांना म्हणाले, ‘तुम्ही शोक करू नका.’ द्वापार युगात तुम्ही गोपी व्हाल, त्यावेळी मी आपली इच्छा पूर्ण करेन.

.गोपिका गायीच्या दुधाचे दोहन करतेवेळी, साळी इत्यादी कुटताना, सडासंमार्जन करताना, बालकाना झोके देताना, दह्याचे विरजण घालताना, बालके रडत असताना गाणी म्हणत असता सर्व व्यवहारात प्रेमपूर्ण चित्ताने, अश्रुपूर्ण नेत्रांनी श्रीकृष्णाचे गुणगान करीत असत. गोपिकांना क्षणभरही श्रीकृष्णाची विस्मृती पडत नव्हती; पण जर क्षणही त्यांना श्रीकृष्णाचा वियोग झाला तर मात्र प्राणांतापेक्षाही त्यांना अधिक दुःख होत होते.

गोपींच्या प्रेमाचे वर्णन माउलींनी आपल्या विहरणी मध्ये केले आढळते. श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अभंग पुष्कळ आहेत. त्यापैकी प्रसिद्ध म्हणजे,

धनु वाजे घुणघुणा वारा वाजे रुणझुणा ।

भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का ॥ १ ॥

चांदवो चांदणे चापे वो चंदनु ।

देवकीनंदनुविण नावडे वो ॥ २ ॥

चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी ।

कान्ही वनमाळी वेगी भेटवा का ॥ ३ ॥

सुमनांची सेज शीतळ वो निकी ।

ओले आगीसारिखी वेगें विझवा कां ॥ ४ ॥

यावर कोणी शंका घेईल की, गोपिका श्रीकृष्णाना परमात्मा समजत होत्या का? त्या तर त्याला एक सुंदर पुरुष म्हणून मानीत होत्या व जार बुद्धीने त्याच्यावर प्रेम करीत होत्या, त्या कामासक्त होत्या, असे असता त्यांच्या त्या वैषयिक प्रेमाला भक्ती कसे म्हटले जाईल? याच शंकेचे उत्तर देण्याकरिता पुढील दोन सूत्राची रचना झाली आहे.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– भक्तीसूत्र – क्र. २१

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments