पुण्यातला सुप्रसिद्ध बाजीराव रोड … त्या रस्त्यावर असणारा तितकाच प्रसिद्ध शनिपार चौक.. चहूबाजूंनी सदैव गजबजलेला.. जीवनावश्यक सर्व चीजा सहजपणे उपलब्ध करून देणारे, या चौकात एकत्र येणारे चारही रस्ते… या चौकाच्या.. या बाजीराव रस्त्याच्या अगदी लागून असलेल्या ठिकाणी मी जन्मापासून पुढे ४६-४७ वर्षं राहिलेली आहे. आणि म्हणूनच या चौकाच्या चौफेर असणारे चार महत्वाचे गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीची मोठ्या उत्साहात वाजत गाजत जाणारी विसर्जन मिरवणूक म्हणजे माझ्या आयुष्याचा जणू एक अविर्भाज्य भागच…. उत्साह आणि आनंदाची …गणेशाच्या मंगलमय नेत्रसुखद दर्शनाची लयलूट करणाऱ्या या सगळ्या गोष्टी… जाण्याआधीच पुढच्या वर्षीच्या आगमनाची वाट पाहायला भाग पाडणारा हा उत्सव….
….. हो.. आठवतंय तेव्हापासून गेल्या काही वर्षांपर्यंत असंच तर होतं सगळं. फुले मंडईपासून विसर्जन मिरवणूक सुरु व्हायची. आणि त्यासाठी पुण्यातली सगळी सार्वजनिक मंडळे रांग लावून सज्ज असायची.
ढोल ताशे – त्याबरोबर शिस्तीने तालबद्ध.. लयबद्ध नाचत जाणारे त्या त्या मंडळाचे कार्यकर्ते – शांततेने.. स्वयंशिस्त पाळणारे बघे लोक…… आणि वेळेत सुरु होऊन वेळेत संपणारी प्रेक्षणीय मिरवणूक……
….. काही वर्षांनी कालानुरूप हे चित्र हळूहळू बदलत चालल्याचे कुठेतरी जाणवत होते हे नक्की.. शहराची लोकसंख्या सतत वाढत होती.. गणपती पहात हिंडण्याची वेळही वाढत होती. सजावटीचे नवनवे तंत्रज्ञान उपलब्ध होण्याचे प्रमाणही वेगाने वाढत होते.. तरीही त्यावेळचं एकूणच सामाजिक वातावरण सुसह्य होत होतं…….. पण आता गेल्या काही वर्षांपासून मात्र, प्रसन्नता.. मनापासूनचा भक्तिभाव.. आणि मनात साठवून ठेवावा असा आनंद देणाऱ्या या उत्सवाचे.. विशेषतः विसर्जन मिरवणुकीचे स्वरूप पूर्णपणे पालटल्याचे स्पष्टपणे अगदी दरवर्षी जाणवते आहे. डीजे.. त्यावर वाजणारी कानठळ्या बसवणारी कर्कश्श गाणी.. त्यावर बेधुंद होऊन विचित्र अंगविक्षेप करत भान हरपून नाचणारी तरुणाई … पाहतांना चक्कर यावी अशी विद्युत रोषणाई …. सगळे सगळे अगदी असह्य करणारे होत चालले होते.. नव्हे.. झालेच होते.
.. भर रस्त्यावर असणाऱ्या माझ्या घराच्या गॅलरीत एका वर्षी रात्री त्या मिरवणुकीसाठी चाललेला अनागोंदी गोंधळ बघत अगदी सुन्न होऊन उभी होते.. कारण घरात झोप लागणं केवळ अशक्य होतं. जिकडे तिकडे सगळा नुसता धुमाकूळ.. रस्ता दिसतच नव्हता.. दिसत होती फक्त डोकी.. आणि डोकी… आणि फक्त कलकलाट.. हा शब्दही खरं टोकदाच होता त्या डोकं बधीर करणाऱ्या गोंगाटासाठी. रस्त्याच्या कडेने दाटीवाटीने उभे असलेले खाद्यपदार्थांचे अगणित स्टॉल्स आणि त्याच्या कढयांवर मुद्दाम आपटल्या जाणाऱ्या झाऱ्यांचे जणू डोक्यात घाव घातल्यासारखे घणघणाट …. चणे-फुटाणे, कर्कश्श पिपाण्या, फुगे, आणि काय काय विकणाऱ्यांच्या गर्दीला मारलेल्या हाका….. किती आणि काय काय सांगावं …
….. मिरवणुकीसाठी नंबर लावून उभ्या असलेल्या एका ट्रकवर ठेवलेल्या गणपतीकडे मध्येच माझं लक्ष गेलं.. त्याच्याकडे पहात असतांना अचानक त्या विघ्नहर्त्या गणेशाचाच चेहेरा अगदी केविलवाणा.. रडवेला.. वैतागलेला दिसत असल्याचा मला भास व्हायला लागला…….. आणि मनात नकळत शब्द उमटू लागले……
नाद रंग अन उत्साहाचा उत्सव चाले चोहीकडे
परि या जल्लोषात हरवली उत्सवमूर्ती कुणीकडे ….
*
दहा दिवस त्या मांडवात बांधून घातले त्यालागी
आज पहा किती बरे वाटले.. घरी जाण्याची घाई उगी….
*
रात्रीपासून मोटारीवर बसवून त्याला ठेवियले
सहनशील हा गजानन परी, आसन ना त्याचे ढळले ….
*
सकाळपासून जल्लोषाला पूर पहा हो किती आला
वाजतगाजत सगळे जमले उधाण आले उत्साहाला ….
*
मोटारीवर मुकाट बसुनी गणपती सारे पहात होता
जाणवले त्यालाही होते, गर्दीतच तो चुकला होता ….
*
लेझीम ढोल नि टिपरीचा तो तालच गर्दीमध्ये हरवला
धांगडधिंगा किती चालला विसरलेच त्या गजाननाला ….
*
“ छंदच नीत मज सकल जनांना चकवत असतो नशीबरूपे
म्हणे आज मी स्वतःच चुकलो – चकविती ही माझीच रुपे ….
☆ क्षण सृजनाचा ☆ आमुचा गणपती आला ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी☆
||श्री||
सकाळी जाग आली ती या ओळी गुणगुणतच…
दोन ओळी सुचल्या त्या काम करता करता गुणगुणत राहिले. आणि पुढे इतकं काही सुचू लागलं की काम बाजूला ठेवून मला त्या लिहून काढाव्या लागल्या. पूजा करतानासुद्धा इतकी तन्मयता झाली असेल की नाही माहिती नाही पण या ओळी लिहिताना मात्र एक विलक्षण तन्मयता, आनंद, चैतन्य जाणवत होतं. लिहिल्यावर जाणवलं की ही एक साधीसुधी आरती म्हणता येईल अशी रचना आहे. गणपतीची विविध नावं यात गुंफली गेली आहेत.
☆ क्षण सृजनाचा ☆ उंच हंडी ध्येयाची ☆ श्री प्रमोद वामन वर्तक
आजकाल दहीहंडी हा एक इव्हेंट बनला आहे! लाखोंची उंच हंडी फोडायच्या नादात, अनेक तरुण गोविंदा कायमचे जखमी अथवा मृत झाले आहेत. म्हणून मी एक वेगळ्या प्रकारची हंडी फोडायचे आवाहन, आजच्या तरुणांना करतो आहे. ती हंडी फोडायचा त्यांनी जरूर विचार करावा! 🙏
☆ क्षण सृजनाचा ☆ कॉफी, पाऊस आणि कविता…☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
माझ्या आयुष्यात “काॅफी, पाऊस आणि कविता ” या तीन गोष्टी एकत्र आल्या आणि काही क्षण सुखाचे करून गेल्या..! तेच क्षण मी एकत्र करून कवितेच्या रुपात कागदावर मांडले…!
जितकी साधी जीवाला भावणारी कॉफी, जितका जिव्हाळयाचा पाऊस तितक्याच साध्या सरळ, भावणा-या माझ्या कविता…!
कुठल्या तरी वळणावर, कळत- नकळत, काही कारण नसतांना आड वाटेला थांबून एखादा कोवळा क्षण समोर यावा ना तश्या ह्या कविता त्या अनोळखी क्षणासारख्या समोर उभ्या राहिल्या आणि त्या क्षणांनी पहिल्या सरीच्या बेधुंद पावसात मनाला भिजवून टाकल्या…!
एका सेमिनारसाठी आळंदीला गेलो इंद्रायणीचे आकर्षण खूप होतं. संध्याकाळी नदीच्या काठी बसलो पण पाणी काही स्वच्छ नव्हतं… बायका कपडे धुत होत्या… लोक आंघोळ करत होते… कोणी भांडे धुवत होतं… घाटावरची माणसं वेगवेगळ्या कृती त्या पाण्यात करत होते…. कोणीतरी सांगितलं” पुढे जा छान स्वच्छ पाणी आहे “त्या घाटावर गेल्यानंतर तिकडे पाणी चांगलं होतं. अर्थात आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो होतो. आणि त्या ठिकाणी क्रियाकर्म केले जात होते. फारशी गर्दी नव्हती पण एका कुणाचं तरी तरुण मुलाचे क्रिया कर्म होते. आणि बरीच माणसं परगावावरून आलेली होती. ज्या तरुण मुलीचा प्रियकर लग्नापूर्वीच गेलेला होता. त्याचे नुकतेच लग्न ठरवून साखरपुडा झाला होता. ती मुलगी कमालीची रडत होती आणि तिला दोघी तिघी बायका तिला खूप समजून सांगत होत्या…. बायकाही बऱ्याच आल्या होत्या… आमच्या बोलक्या स्वभावामुळे आम्ही थोडीशी माहिती काढली. त्यातील एका बाईने माहिती दिली होती. त्यानंतर त्या मुलीने जिथे त्याची रक्षा विसर्जित केली होती त्या तिथे पाण्यात जाऊन त्यातली एक ओंजळ भरून घेतली त्याच्याकडे क्षणभर तिने पाहिले.. आणि तिने ते पाणी पिऊन टाकले. तोंड धुतले डोळे धुतले आणि ती काठावर आली… हे सगळं पाहताना त्या मुलीच्या मनात काय चाललं असेल याचा सहजच विचार आला…. आणि काही ओळी सुचल्या… पुढे त्याची कविता झाली… पण ते दृश्य मी कमीत कमी दोन-चार दिवस तरी विचारू शकले नाही. खूपच अस्वस्थ करणारे ते दृश्य होते दोन एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जीवांना असं वेगळं करण्यामध्ये देवाला काय मिळत असाव..? असा प्रश्न मला नेहमी सतावतो… आणि शेवटी त्याची करणी कोण जाणतो? …. असे म्हणून आपण थांबतो ती ही कविता….!
☆ वांझोटी प्रीत ☆
*
तिन्ही सांजेच्या वेळी
बसले इंद्रायणीच्या काठी
सूर्य मावळतीला गेला
अन चंद्र पृथ्वीच्या ओठी —
*
तो दुसरा प्रकाश
भेदून तिमिर निघाला
सावल्या स्वतःच्या
हळूच कुठे हरवल्या —
*
त्या जलाशयावर
टेकवले मी तळवे
ते तरंग परिचित
उठले विरले हळवे —
*
त्या तळव्यांना हा
स्पर्श तुझा रे कळला
मी ओळखले रे
तूच त्यात विरघळला —
*
तव देहाची रे
रक्षा येथे पडली
इंद्रायणीच्या त्या
जळात ती विरघळली —
*
मग श्रद्धेने मी
ओंजळ त्याची भरली
ओठास लावता
तृप्ती एक जाणवली —
*
तो घोट तृप्तीचा
पिऊन पिऊन घेतला
अन देहामध्ये
कणकण सामावला —
*
त्या मर्त्यकणातून
उगवण काही नाही
प्रीतीला शाप रे
वांझोटी ती राही —
*
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ क्षण सृजनाचा ☆ अंतिम सत्य ☆ श्री प्रमोद वामन वर्तक
वाळल्यावर गळून पडलेल्या एका पानाने, आपल्या मातेसमान झाडाबद्दल तक्रार करण्यास सुरवात केली. तेंव्हा त्या मातेने त्याला कशा प्रकारचे उत्तर दिले असते, ते या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 🙏
आमच्या काव्यसाधना समूहात प्रत्येक वेळेस मी एक चरण देतो आणि त्यावर पुढच्या खेपेला सर्व कवी कविता करून सादर करतात. तसा चरण लिहायला मी बसलो; पहिल्या दोन शब्दांनंतर ‘हळुच वळू दे’ हे शब्द आले आणि अचानक माझे भान हरपले. मी उन्मनी अवस्थेत गेलो. माझी लेखणी चालत होती. पण मला मी काय लिहितोय याचे भान नव्हते. कोणी तरी माझ्याकडून लिहून घेत आहे हे मला जाणवत होते.
☆ क्षण सृजनाचे : पांघरूण ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मी डी.एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंदमुलांची शाळा आशा अनेक संस्था असत. एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले.
क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्यांची मुले येत. सकाळी ८ वाजता मुले येत. तिथे त्यांना दूध, नाश्ता दिला जाई. शिक्षण, दुपारचे जेवण, पुन्हा शिक्षण, खेळ , गाणी, चित्रे काढणे, सगळं तिथे करायला मिळे. दुपारी बिस्किटे, फळे वगैरे दिली जात. संध्याकाळी ६ वाजता मुले आपआपल्या घरी जात.
तिथल्या मदतनीस क्रेशबद्दलची माहिती सांगत होत्या. ‘ इथल्या मुलांना जर्मनीतील काही लोकांनी दत्तक घेतले आहे. त्यांचा खर्च ते करतात. तिथल्या मुलांना खेळणी पाठवतात. चित्रे पाठवतात. ग्रीटिंग्ज पाठवतात. आम्ही ते सगळं मुलांना देतो पण इथे खेळायला.. बघायला. . त्यांना खेळणी वगैरे घरी नेऊ देत नाही. आपल्या घराचे फोटोही मुलांचे दत्तक पालक पाठवतात. पत्रे पाठवतात. आम्ही या मुलांच्या आयांना नेहमी सांगतो, ‘तुम्ही पण त्यांना पत्र लिहा. काय लिहायचे, ते सांगा. आम्ही इंग्रजीत लिहून त्यांना पाठवू.’ पण आम्हाला फारसा प्रतिसाद मिळत नाही.’ त्यांनी मग आम्हाला अशी काही पत्रे, खेळणी, ग्रीटिंग्ज दाखवली. कुठली कोण माहीत नसलेली मुले.. पण चर्चच्या सांगण्यावरून ते परदेशी, या मुलांचा खर्च करत होते. सामाजिक बांधिलकीचा केवढा व्यापक विचार. चर्चचा आदेश म्हणजे त्यांच्यासाठी जणू प्रभू येशूचा आदेश होता.
त्या दिवशी त्या क्रेशमध्ये आणखी एक कार्यक्रम होता. थंडीचे दिवस होते. त्यामुळे तिथे मुलांसाठी त्या दिवशी चादरी वाटण्यात येणार होत्या. प्रमुख व्यवस्थापिका रेमंड मॅडमनी त्या दिवशी मुलांच्या आयांना बोलावून घेतले होते. हॉलमध्ये सगळे जमले. दोघे शिपाई सोलापुरी चादरींचे गठ्ठे घेऊन आले.
प्रार्थना, सर्व उपस्थितांचे स्वागत झाले. प्रभू येशूची शिकवण, तो सगळ्यांकडे कसा कनवाळू दृष्टीने बघतो, असं सगळं बोलून झालं. मुलांच्या परदेशातील पालकांनी चादरीचे पैसे दिल्याचे सांगितले गेले. त्यांचे आभार मानणारे पत्र आमच्याकडे लिहून द्या. आम्ही तिकडे ते पाठवू, असंही तिथे सांगण्यात आलं. तिथे चादरी वाटप सुरू झाले आणि माझ्या मनात एक कथा साकारू लागली. तिथल्याच शाळेतील एक मुलगा. त्याचं नाव मी ठेवलं सर्जा आणि त्या क्रेशचं बारसं केलं ‘करूणानिकेतन क्रेश.’
हिंडेनबुर्गमधील एका मोठ्या नामांकित चर्चची इथल्या चर्चला आणि क्रेशाला मदत होती, ही तिथे मिळालेली माहिती. त्या चर्चने त्यांच्या देशातील सुखवस्तू सज्जनांना, इथल्या एकेका मुलाला दत्तक घ्यायला सांगितले होते. क्रेशमध्ये सध्या आशी ५० मुले होती. त्यांचे ५० दत्तक पालक, त्यांचा रोजचा खर्च करणारे. क्रेशच्या माध्यमातून त्यांना ती मिळत होती. हे अर्थातच तिथे कळलेले वास्तव.
माझ्या कथेतल्या सर्जालाही तिथल्या एका कुटुंबाने दत्तक घेतलय. ते कुटुंब मात्र माझ्या कल्पनेतलं. ज्यो पप्पा, मेरी मम्मी, अग्नेस, मार्था, डेव्हीड हे त्याचं दत्तक कुटुंब. त्यापैकी डेव्हीड त्याच्या साधारण बरोबरीचा. पप्पांचं, डेव्हीडचं त्याला पत्र येत असे. पण त्याला ते वाचता येत नसे. मॅडम पत्र वाचून दाखवत. मराठी भाषांतर करून सांगत. पत्र वाचता आलं नाही, तरी सर्जा किती तरी वेळ त्या गुळगुळीत कागदावरून हात फिरवत राही. पत्र नाकाजवळ नेऊन त्याचा सुगंध घेत राही. आशा अनेक कल्पित प्रसंगांची मालिका मी कथेत गुंफली आहे. त्यातून सर्जाचं साधं, भोळं, निरागस व्यक्तिमत्व आणि त्याच्या बालमानातले विचार, भावना कल्पना प्रगट करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
डेव्हीड एकदा सर्जाला पत्र पाठवतो. त्याबरोबरच तो आपल्या लाडक्या कुत्र्याचा जिमीचा फोटो पाठवतो. पत्रात तो लिहितो, ‘तुझा म्हणून मी रोज जिमीचा स्वतंत्र कीस घेतो.’ मग सर्जा फोटोतल्या जिमीच्या अंगावरून हात फरवतो आणि फोटोतल्या जिमीची पप्पी घेतो.
डेव्हीड सर्जाला, ‘ तू तुझ्या घराचे फोटो पाठव,’ असं पत्रातून लिहित असे. सर्जाला वाटे, कसलं आपलं घर… घाणेरडं, कळकट. आपली भावंडे, शेंबडी, केस पिंजारलेली. फाटक्या लुगाड्यातली आई, खोकून खोकून बेजार झालेली आजी. यांचे कसले फोटो काढून पाठवायचे आणि काढणार तरी कोण? सर्जाच्या मनात तूलना सुरू व्हायची. फोटोत बघितलेलं ज्यो बाबांचं घर कसं, मॅडम गोष्टी सांगत, त्यातल्या राजाच्या महालासारखं. घरातली सगळी माणसं कशी छान दिसणारी. झकपक कपड्यातली. आणि सर्जाचं घर–
सर्जाचं घर, मी, तळागाळातलं कुठलंही प्रातिनिधीक घर असेल, तसं रंगवलं. त्याची आई विड्या वळून संसार चालवणारी. म्हातारी, दमेकरी सासू, दोन भावंड, दिवसभर उनाडणारी, बाप रिक्षा चालवायचा पण सगळा पैसा बाई-बाटलीत उडवायचा. मनात येईल, तेव्हा बायकोच्या तोंडावर काही नोटा फेकायचा. तेवढंच त्याचं आपल्या सांसाराबाबतचं कर्तव्य. ‘साल्या, भडव्या, रांडलेका’शिवाय बोलणं नाही. आईदेखील सदा कारवादलेली.
सर्जावर झालेले स्वछतेचे संस्कार तो आपल्या भावंडांवर करू शकत नाही, याचे त्याला दु:ख आहे. नुकताच तो शाळेत येऊ लागला होता, त्यावेळचा प्रसंग. एकदा त्याने नाश्त्याच्या वेळी प्लेटमधले पोहे आपल्या भावंडांना देण्यासाठी शर्टाच्या खिशात भरले. खिशाला तेलकट, पिवळट डाग पडले. मॅडमनी चोरी पकडली. सर्जाला वाटले, आता आपल्याला मार बसणार. मॅडमनी त्याला मारलं नाही पण त्या रागावल्या. ‘चोरी करणं पाप आहे’ म्हणाल्या. त्यांनी त्याला येशूच्या फोटोपुढे गुडघे टेकून बसायला सांगितलं. प्रार्थना करायला सांगितली. क्षमा मागायला सांगितली. मग त्या म्हणाल्या, ‘लेकराच्या हातून चूक झाली. तू त्याला माफ कर. तुझं अंत:करण विशाल आहे. तू आमचा वाटाड्या आहेस. आम्हाला क्षमा कर.’
हा प्रसंग लिहिताना, म्हणजे मॅडमबद्दल लिहिताना, कुठे इकडे तिकडे काही पाहिलेलं, ऐकलेलं, मनात रुजून गेलेलं आठवलं. त्याचा उपयोग मी त्या प्रसंगात केला. त्यानंतर सर्जाने असं पाप पुन्हा केलं नाही. त्याच्या धाकट्या भावंडांना उचलेगिरीची सवय होती. सर्जा त्यांना म्हणे, ‘प्रभू येशू म्हणतो, असं करणं पाप आहे.’ त्यावर आई म्हणे, ‘तुला रं मुडदया रोज चांगलं चुंगलं गिळाया मिळतय, तवा हे पाप हाय, सुचतं. कधी भावा-भैणीसाठी येवढं- तेवढं काय-बाय आणलंस का?’ आणावसं वाटे, पण तो आणू शकत नव्हता. त्याची तगमग होई.
त्याला या शाळेत त्याच्या मामानं आणलं होतं. त्याने ठरवलं होतं, खूप अभ्यास करायचा. खूप शिकायचं आणि नंतर पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला ज्यो पप्पांकडे जायचं. ज्यो पप्पा त्याला पत्रातून नेहमी असंच लिहीत.
त्या दिवशी क्रेशमध्ये चादरी वाटपांचा कार्यक्रम झाला. चादरी वाटायला व्यवस्थापिका रेमंड बाई स्वत: आल्या होत्या. चर्चचे प्रमुख फादर फिलीप यांच्या हस्ते चादरींचे वाटप होणार होते. सुरूवातीला डोळे मिटून प्रभू येशूची प्रार्थना झाली.
मी माझ्या कथेत प्रार्थना घेतली-
‘मेंढपाळ हा प्रभू कधी ने हिरव्या कुरणी मला
कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला.’
ही प्रार्थना, मी डी. एड.कॉलेजमध्ये लागल्यानंतर आमच्या विद्यार्थिनींनी म्हणताना ऐकली होती. तिचा उपयोग या कथेसाठी मी केला.
त्यानंतर मॅडम रेमंडनी सर्वांचं स्वागत केलं. येशूच्या उपदेशाबद्दल सांगितलं आणि चादरी वाटप सुरू झालं.
माझ्या कल्पनेने मात्र त्या चादरींची ब्लॅंकेट्स् केली. निळ्या, हिरव्या, लाल, गुलाबी, सोनेरी रंगांची ब्लॅंकेट्स् मोहक. आकर्षक डिझाईन असलेली ब्लॅंकेट्स्. आपल्याला कोणतं ब्लॅंकेट मिळेल, याचा सर्जा विचार करतोय. कधी त्याला वाटतं आपल्याला नीळं, नीळं, आभाळासारखं ब्लॅंकेट मिळावं, कधी सोनेरी, कधी हिरवं. त्याला लाल ब्लॅंकेट मिळतं. मग त्याला आठवतं डेव्हीडच्या खोलीतल्या बेडवर याच रंगाचं ब्लॅंकेट आहे. ज्यो बाबांनी डेव्हीडसारखच ब्लॅंकेट आपल्यालाही पाठवलं, म्हणून तो खूश होऊन जातो.
कार्यक्रम संपला. बायका आपआपल्या चादरी घेऊन आपआपल्या घरी निघाल्या. माझं मन कथेतल्या सर्जाच्या आई पाठोपाठ त्याच्या घरी निघालं. काय घडलं पुढे?
सर्जा भयंकार उत्तेजित झाला होता. त्याला आज जेवण-खाण काही सुचत नव्हतं. तो घरी आल्या आल्या आपल्या भावंडांना बोलावतो आणि सगळे ते ऊबदार ब्लॅंकेट पांघरून झोपून टाकतात.
सर्जाचा बाप दारू पिऊन घरी येतो आज त्याच्या खिशात दमड्या नसल्यामुळे त्याला बाईकडे जाता आलेलं नाहीये. तो अस्वस्थ आहे. घरी येताच त्याचा पाय त्या नव्या ब्लॅंकेटमध्ये अडकतो. तो खाली पडतो. उठता उठता त्याचे लक्ष एकदम त्या आकर्षक ब्लॅंकेटकडे जाते. त्याच्या डोक्यात वीज चमकते. हे ब्लॅंकेटच आज तिला द्यावं. ती एकदम खूश होऊन जाईल. अशी चिकटेल, लई मजा येईल. तो सर्जाच्या अंगावरचे ब्लॅंकेट ओढू लागतो. ब्लॅंकेट दे म्हणतो. सर्जा म्हणतो, ‘माझ्या जर्मनीतल्या बापाने माझ्यासाठी पाठवले आहे. मी देणार नाही.’
‘तुझ्या जर्मनीतल्या बापाकडेच निघून जा, ‘ असं म्हणत सर्जाचा बाप ते ब्लॅंकेट हिसकावून निघून जातो. पाठीमागच्या सीटवर ब्लॅंकेट ठेवून तो रिक्षा सुरू करतो.
सर्जा रडत राहतो. त्याच्या अश्रूभरल्या डोळ्यासमोर येते, ते फोटोतल्या ज्यो बाबांचे उबदार घर. त्याला अधीकच उघड्यावर पडल्यासारखं वाटतं. रडत रडत तो आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतो. आई आपल्या फाटक्या धडुत्याचा पदर त्याच्या अंगावर सरकवते.
‘पांघरूण’ या माझ्या कथेची ही जन्मकथा. साधारण १९८२- ८४ च्या दरम्यान ही कथा मी लिहीली. त्या काळात दर्जेदार समजल्या जाणार्या किर्लोस्करमध्ये ती प्रकाशित झाली. अनेक वाचकांची कथा आवडल्याची खुशी पत्रे मला आली. पुढे या कथेचा हिंदीमध्येही अनुवाद झाला. तो ‘प्राची’सारख्या प्रतिष्ठित मासिकात प्रकाशित झाला.
‘पांघरूण’ ही कथा वास्तवाच्या पायावर उभी राहिलेली आहे. कथेमधले अनेक तुकडेही वास्तव आहेत. त्याच्या विविध प्रसंगांच्या भिंती, त्याला मिळालेलं भावा-भावनांचं, रंगकाम, पात्रांच्या मनातील विचारांचं नक्षीकाम आणि एकंदर घराच्या अंतर्भागातील सजावट कल्पनेने सजवली आहे.
मला नेहमीच वाटतं, त्या दिवशी त्या क्रेशला आम्ही भेट दिली नसती, वा त्याच दिवशी तिथे चादरी वाटपाचा कार्यक्रम झाला नसता, तर इतकी चांगली कथा मला सुचली नसती.
स्कूटर वरून नाशिक गावातून एमआयडीसी मधील फॅक्टरी कडे चाललो होतो. असेच मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यातले दिवस. नुकताच पाऊस पडून गेला होता आणि जाता जाता मातीचा खमंग सुगंध एकदम नाकात भरला. मन एकदम प्रसन्न झालं. प्रफुल्लित झालं. मला काही समजेचना. मी एका वेगळ्याच जगात गेल्यासारखा झालो.
आणि माझ्या डोक्यात काही शब्द घुमायला लागले…
प्रसन्नता अन् सृजनशीलता ठाई ठाई रुजली.
बस तेवढीच ओळ. डोक्यामध्ये गुंजारव करायला लागली.
मी फॅक्टरी वर आलो माझ्या केबिन मध्ये बसून कागद आणि पेन हातात घेतले ती ओळ निघून काढली आणि विचार करत बसलो. पण काही सुचेचना! पुढचा एकही शब्द एकही ओळ सुचेना. असं कधी यापूर्वी झालं नव्हतं. एखादी ओळ सुचते आणि नंतर हळूहळू पुढील ओळी सुचत जातात. फार तर त्या लिहून काढल्यानंतर त्यात थोडे बदल करावेसे वाटतात. काही ओळी पुन्हा लिहाव्या लागतात. काही अधिक चांगल्या ओळी सुचतात. आणि कविता पूर्ण होते.
पण याबाबतीत काहीच होईना. मी अस्वस्थ झालो. मूड गेला. चहा मागवला. तरी सुद्धा काही सुचेना. पुन्हा बाहेर पडलो, टपरीवर जाऊन एक सिगरेट मारली. पण काहीच नाही… अस्वस्थ अस्वस्थ.
पुन्हा फॅक्टरी वर येऊन कामांमध्ये गुंतून घेतलं. तो विषय तिथेच थांबला.
अधून मधून कधीतरी ती ओळ आठवायची आणि असेच अस्वस्थतेत काही तास जायचे. पण पुढे काही सुचायचं नाही अशी तब्बल दोन वर्षे गेली!
त्यानंतरही अनेक कविता सुचल्या लिहिल्या. लेखनही केले. परंतु त्या होळीच्या पुढे काहीच सुचैना.
एक ओळ म्हणजेच कविता?
तसे आमच्या मित्राचे नरेश महाजनचे एक पुस्तक ‘लव्हाळी’ वाचनात आलेच होते. एक ओळीच्या कविता. त्याला त्याने लव्हाळी हे नाव दिले होते. पण त्यामध्ये एक ओळ अशी सुचते की तेवढ्यातच कविता होऊन जाते. एकदा कविता होऊन गेली की अस्वस्थता रहात नाही.
त्याच्या एका लव्हाळीचे उदाहरण देतो
तुझी वेणी, जीवघेणी!
बस्स! यापुढे काही असू शकत नाही.
या दोन-तीन शब्दातच पूर्णत्व आहे.
परंतु माझ्या त्या ओळींमुळे मी कायम अस्वस्थ असे. काहीच सुचत नाही आणि ती एक ओळीची कविता सुद्धा नव्हे. त्या एका ओळीत पूर्णत्व आहे असे वाटत नाही.
बघता बघता दोन वर्ष गेली. संध्याकाळी एका कवी संमेलनानंतर चहा पिताना आमचा एक कवी मित्र आणि डॉक्टर सुद्धा. डॉ सुधीर करमरकर त्याला ती ओळ ऐकवली. त्यालाही ती ओळ आवडली आणि त्यानंतरची अस्वस्थता ती सुद्धा त्याला सांगितली.
तेव्हा तो म्हणाला मला असे वाटते की तू चुकीच्या पद्धतीने विचार करतोयस म्हणून तुला पुढे काही सुचत नाही. कधीही जेव्हा पुढचा मार्ग बंद होतो त्या वेळेला मागे वळून पाहायचे असते. मला असे वाटते की ही ओळ तुझ्या कवितेची शेवटची ओळ आहे आणि शेवटची ओळ असल्यामुळे पुढे काही सुचणे शक्यच नाही. त्या दृष्टीने विचार करून पहा नक्कीच सुचेल. माझ्या डोक्यात वीज चमकल्यासारखे झाले. अरे खरंच आपण या दृष्टिकोनातून विचारच केला नाही कधी. तोही दिवस मे महिन्यातलाच आणि तसाच काहीसा घरी जाता जाता एका ओळीच्या दोन ओळी झाल्या.
मृद्गंधाच्या लहरीवरती स्वार होउनी आली,
प्रसन्नता अन् सृजनशीलता ठाई ठाई रुजली.
त्यानंतर घरी आलो मस्तपैकी चहा करून घेतला आणि टेबलवर बसलो.
आणि मग आठवत बसलो दिवसभराची उन्हाने झालेली काहिली, दुपारची मरगळ, जणू काही सगळं आयुष्य थांबून गेलंय आणि एवढ्यात, …. एकदम वारा आला, छोटासा ढग काही पाण्याचे शिंतोडे उडवून गेला आणि मग तो मातीचा सुगंध आ हा हा…. हे सर्व आठवलं आणि मग माझी लेखणी पाझरू लागली……
नभांगणातुन आग ओकितो ग्रीष्म आज बलशाली.
तगमग तगमग अवनीवरती लाही लाही झाली.
सचेतनाला अचेतनाची मरगळ येथे आली.
चराचरातून सृजनशीलता आज लोप पावली.
मृतवत सारी सृष्टी आणिक प्रसन्नता लोपली.
शुष्क वृक्ष अन् पान न हाले शुष्क जणू सावली.
भूगर्भातून जीवन शोषी दिनकर हा बलशाली.
भूपृष्ठाची तडतड होऊन तृषार्तता रणरणली.
जीवन धारा आज जशी की बाष्प रूप जाहली.
चराचराची जीवनतृष्णा कुंठित स्तंभित झाली.
मेघसावळा दिसे अचानक वरुणाची सावली.
तुषार काही उधळून नंतर लुप्त कुठे जाहली.
आगमनाची वर्षेच्या परि वार्ता सुखवून गेली,
निद्रित साऱ्या सजीवतेला हलवून उठवून गेली.
मृद्गंधाच्या लहरीवरती स्वार होऊनी आली,
प्रसन्नता अन् सृजनशीलता ठाई ठाई रुजली.
बऱ्याच वेळेला अनेक जण विचारतात तुम्हाला कविता सुचते कशी? तर ती ही अशी…
डिसेंबर २०२४ मध्ये मेढे सर्वस्व माझी प्रिय पत्नी अपर्णा हिचे दुःखद निधन झाले आणि मी अंतर्बाह्य पूर्णतः कोलमडून गेलो. आता यातून काही मी परत उभा राहू शकेन असे मला वाटत नव्हते. काही जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींच्या आग्रहाने पुन्हा लिहायला सुरुवात केली. त्यातल्या बर्याचश्या कविता या माझ्या वियोग दुःखाच्या होत्या. अन् अचानक मनात विचार आला, या सगळ्या माझ्या भावना मी व्यक्त केल्या; पण माझ्या अपर्णाच्या काय भावना असतील, तिला काय वाटत असेल?
आणि माझ्याकडून प्रसविली गेली ‘अखेर’ ही कविता!
☆ अखेर ☆
*
अखेर झाली सहवासाची जाते सोडून तुला
दुःखाश्रुंच्या पाशाने ना बांधून ठेवी मला ||ध्रु||
*
आनंदाचा काळ जगलो अधिक अर्ध्या शतकाचा
उपवन फुलविले संसाराचे घेउनी वसा नंदनवनाचा
पुष्करिणीने तृप्त जाहलो स्पर्श नव्हता यातनेचा
जपून ठेवी क्षणा-कणांना आमोदाने आनंदाच्या ||१||
*
तुझ्या नि माझ्या एकत्वाची जाणिव जोपासली
दुजेपणाचा भाव त्यागुनी प्रीतबाग फुलविली
विश्व अपुले सारे होते आपण ही होतो विश्वाचे
हात घेउनी हातामध्ये जपले पावित्र्य नात्याचे ||२||
*
पुढे कधी ना गेले होते मी सोडून तुजला मागे
बद्ध करुनीया रश्मीने प्रेमाच्या नेले मज संगे
आत्मा अपुला एकची होता जीवन दोन देहाचे
मोहक किती होते अद्वैत दोघांच्या त्या जगण्याचे ||३||