मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ शेतकऱ्यांच्या मनातील गुंता ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

डॉ. मधुवंती कुलकर्णी

☆ क्षण सृजनाचा ☆ शेतकऱ्यांच्या मनातील गुंता ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी

ही जुनी गोष्ट आहे.माझं लग्न 7 जून 1987ला झालं आणि मी सासरी म्हणजे बहुले, ता.पाटण,जि.सातारा इथं आले.सहा महिन्यांनी 31 डिसेंबर आला.त्यावेळी आम्ही घरातील सह्याद्री दूरदर्शनवरील कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत असायचा तो पहात असू.दोनच राष्ट्रीय चॅनल त्यावेळी होते.

सासरी सतरा एकर शेती घरीच करत असल्यामुळे गडी माणसांचा राबता होता.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही होता.घरात कॅलेंडर कुठेतरी असायचे.पंचांगाचा वापरच सर्रास होत असल्याने सणवार,तिथी सर्व व्यवस्थित कळायचे.साजरे व्हायचे.गाव हे तसं स्वयंपूर्ण होतं.म्हणजे माळी,सुतार,लोहार,न्हावी ,शिंपी इ.यांनी काम केले की त्यांना धान्य, भुईमूग शेंगा असं दिलं जायचं.अशिक्षित लोकांना वेळेला सावकार लोक असायचे.त्यामुळे बॅंक व्यवहार त्यांना क्वचित माहित होते.

ही कविता या पार्श्वभूमीवर सुचली.31 डिसेंबरचा कार्यक्रम पाहून झाला.एक तारीख गेली.दोन तारखेच्या सकाळी गावाला गेलेला एक गडी रघू परत आला.तो धारा काढायला मदत करायला येत असे.त्याला मी “Happy New year रघू “असं म्हणाले.तो क्षणभर बघतच राहिला.त्याला वाटलं वहिनींनी काही तरी काम सांगितले आहे पण कळलं नाही म्हणून म्हणाला”वहिनी,काय म्हनला तुम्ही कळलं न्हाय” मी पुन्हा Happy New year म्हणाले.तो म्हणाला” ते काय असतं ?”मला हसायला आले.सगळे हसायला लागले.मग मी म्हणाले.”अरे, नविन वर्ष सुरू झालं ना काल.ते सुखाचे जावो असं म्हणलं.”मग तो म्हणाला “काकांनी पंचांगात बगून(माझे सासरे)तसं कायबी सांगितलं नाय.”

मग मी त्याला सर्व माहिती सांगितली.त्यावर त्यानं दिलेलं उत्तर”आवं रोजची कामं काल बी हुती,आज बी हायत, उद्या बी असनार.कशाचं नवीन वरीस आन् काय.हां पुरनपोळी करायची हाय काय मंग हिला सांगतो करायला .”उत्तर साधं होतं. पण मी मात्र त्यांवर विचार करायला लागले .आजही ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे.शेतकर्यांना आजही हा जल्लोष वगैरे माहित नाही.त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असते त्यामुळे विचार क्षेत्रही.त्याचा विस्तार व्हायला हवा.हे उत्तर मी कवितेत शब्दबद्ध केले आहे.

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

म्या गेलो गोठ्यात.श्यान भरलं,टाकलं

गुरास्नी चारा टाकला.न्याहरी केली.

शेतात गेलो बैलं घेऊन कोळपलं.

*

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

म्या गेलो गोठ्यात धारा काढल्या ‌

किटल्या भरल्या,वैरन टाकली.

कारभारणीला घेऊन शेत भांगललं.

*

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

म्या दूध घालून परत आलो

कारभारणीनं केलेला च्या पिला

घेतला ईळा काढली वैरन

*

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

दिस मावळायला आला

गुरास्नी चारा पाणी झालं

ढगाआड सुर्व्या लपला

 काल बी असंच,उद्या बी असंच,

आज येगळं काय झालं?

*

तिकडं बी परदेशात अंधार झालाच की

समदी कामावरनं घरला आलीत की

 काल,आज, उद्या त्यास्नी राबायचं हायच की

घरात बाहेर कुटबी काम्पुटर हायच की

*

मंग नवीन वरस सुरू झालं म्हनं मंजी काय झालं?

आज, उद्या आन् परवा धारा हायत्याच की.ईळा बी हाय.भांगलायचं बी हाय.

आन् गुरास्नी वैरन ती कुटं जाती?कापायची हायच की.

भाकर तुकडा हायच की.झाडाखाली सुखानं पडायचं हायच की

*

मंग नवीन वरीस सुरू झालं मंजी काय झालं? काय आलं आनि काय गेलं?

मंजी काय झालं?

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ हृदयस्पर्शी… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ क्षण सृजनाचा ☆

☆ हृदयस्पर्शी… ☆ श्री जगदीश काबरे ☆

आपली प्रिय व्यक्ती सोडून गेल्यावर तिचे स्मरण म्हणजे आठवणींचा गोफ असतो. पण आठवणींचा मामलाही वाटतो तेवढा सरळ नाही. कोणत्या आठवणी मनात जोजवायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे आपल्या हाती कुठे असतं? कारण काही आठवणी कितीही विसरू म्हटलं तरी कायमचा पिच्छा पुरवत राहतात. कधी कधी एखादी छोटी गोष्ट मोठ्यातल्या मोठ्या स्मृतींची शृंखला मनात चालू करते. या आठवणीतलं बरं काय, वाईट काय यांची निवड मेंदूतील न्यूरॉन्सच्या चाळण्याच करत असतात.

हृदयस्पर्शी –जगदीश काबरे

*

एक दिवस येईल, आपल्याला अलग करेल

मग कोणीही कुणावर रागावणार नाही.

*

एके दिवशी आपण वेगळे होऊ,

कुठे हरवून जाऊ कोणास ठाऊक?

*

तू मला लाखो वेळा हाक मारशील

पण मी काही परत येणार नाही.

*

जेव्हा तू रात्री झोपायला जाशील,

माझ्या आठवणीने तळमळशील.

*

कारण मी कधीही डोळे उघडणार नाही

तुझ्याशी गुजगोष्टी करू शकणार नाही.

*

जेव्हा तू तुझा फोन पाहत असशील

तेव्हा तुला माझा मेसेज दिसणार नाही.

*

शेवटी, रडून रडून तुझी आसवे सुकतील

असवाच्या प्रत्येक थेंबात मला शोधशील.

*

आठवाच्या सागरी जेव्हा जेव्हा तू बुडून जाशील

माझ्या प्रिया, माझ्यातच तू सामावलेला असशील.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ चंद्र.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ चंद्र.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे… नुकतंच नवरात्र झालं होतं आणि कोजागरी पौर्णिमा जवळ आली होती. मी बँकेतर्फे एका ट्रेनिंगसाठी नाशिक ट्रेनिंग सेंटरला गेलेली होते. दसऱ्याला सुट्टी होती म्हणून त्या एका दिवसासाठी घाईघाईने घरी जाऊन परतले होते… पण यावर्षी नेहेमीसारखी कोजागरीची रात्र साजरी करता येणार नाही म्हणून जरा हुरहुरल्यासारखं वाटत होतं…

…. रात्री झोप येत नव्हती म्हणून रूमच्या खिडकीतून आकाशाकडे बघत बसले होते… हा माझा जुनाच छंद होता म्हणा… मुक्त विहरणाऱ्या ढगांमुळे आकाशात उमटणारे वेगवगळे आकार, त्यातून मधेच डोकावणाऱ्या चांदण्या, वडलांनी बघायला शिकवलेली नक्षत्रं… हे सगळं बघण्यात मन नेहेमीच खूप रमायचं… तर त्या वर्षी पाऊसही थोडा रेंगाळलेला होता… आकाशात पावसाचे ढग रेंगाळतांना दिसत होते… आणि मधूनच अचानक त्यातून चंद्र डोकावतांना दिसला…मध्येच झाकला जात होता…परत दिसत होता…कधी अर्धा…कधी पुरता… या चंद्राला पाहून आजवर कितीतरी कवींना वेगवेगळे अर्थ ध्वनित करणारी काव्यं सुचली आहेत, आणि ती सुचतच रहातील असा जणू ‘प्रेमाचा साक्षीदार’च करून टाकलाय त्याला कायमचा.

… ’पण या चंद्राला जर बोलता आलं असतं तर काय म्हणाला असता हा?’ …त्याच्याकडे बघता बघता अचानक मनात आलं होतं… मग हाच विचार कितीतरी वेळ डोक्यात घोळत राहिला होता आणि जराशाने काही ओळी आपसूक सुचल्या… ती ही कविता …

☆  चंद्र… ☆

काल सहज फिरता फिरता रस्त्यात एक गंमत झाली

एका वळणावर जरा आडोशाला, मला चंद्राची पालखी दिसली ॥

*

आत चंद्र होताच, पण बसला होता चेहरा पाडून

तो उदास निस्तेज चेहेरा पाहून, मी गेले चक्रावून ॥

*

नेहेमीचे ते सुंदर रुपडे, आठवले मग क्षणात

नकळतच माझ्याही, अन् गलबलले मग मनात ॥

*

घाबरतच गेले जवळ त्याच्या, खांद्यावर थोपटले

स्पर्शातल्या माझ्या विश्वासाने, बोलते त्याला केले ॥

*

खिन्न उद्विग्न मनात त्याच्या वादळ होते घोंघावत

कुठून आलो इथे, म्हणून मन होते पस्तावत ॥

*

म्हणे कशी सांगू तुला, व्यथा माझ्या मनीची

सारेच इथे स्वत:त गर्क, खंत नाही कशाची ॥

*

निवांत रम्य वेळ साधून, आलो सागराला भेटायला

मला पाहून चक्क तो, मागेच लागला हटायला ॥

*

मला पाहून मनात त्याच्या उर्मी उठतात ऐकलं होतं

प्रत्यक्षी पण खरं त्याचं, रूप काही वेगळंच होतं ॥

*

दु:खी कष्टी झालो आणि, नाद त्याचा सोडला

माझ्या साक्षीने प्रेम करणाऱ्या माणसांचा रस्ता धरला ॥

*

इथेही पण घोर निराशाच, आली माझ्या वाट्याला

विचारपूसही करायला, तो वेळच नाही कोणाला ॥

*

दुरूनच पाहून नाक मुरडून कुजबूज काहीतरी

खडबडीत माझा चेहरा त्याची.. किळस म्हणे वाटते भारी ॥

*

नेहेमीच यांना हवी पौर्णिमा, पण अमावस्या नको

सुखात सगळे वाटेकरी, पण दु:खात वाटा नको ॥

*

माहीत नव्हती मला इथली उफराटी ही तऱ्हा

चुकलंच आलो इथे, आपला लांबच होतो बरा ॥

*

एक मात्र पटलं, माणसं हुशार इथली खरोखर

दुरून डोंगर साजरे, हे कळलंय् यांना बरोबर ॥

*

एवढं बोलून हुंदका आवरून, निघाला तो जायला

सोडून गेला मनात माझ्या, भुंगा एक छळायला ॥

सोडून गेला मनात माझ्या, भुंगा एक छळायला ॥

*

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘राग यमन (कल्याण)..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘राग यमन (कल्याण)..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

देवघरात समईच्या शुभ्र कळ्या फुलल्या आहेत. दीप प्रज्वलित होऊन घराघराला सुवर्णकांती लाभली आहे. चंदन, आगरू, कर्पूराच्या धुपाच्या धुंद गंधाने आसमंत भरून गेलाय्, प्रसन्न झालाय्.

*

अशा समयी शांत होतं क्लांत मन.

कारण, याच वेळी…  

स्वराकार घेत असतो “राग यमन!

🌻 राग यमन 🌻

*

संध्या सरली, हुरहुर विरली, कातर मन सावरले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या “यमन” सुमन घमघमले! ।। ध्रु।।

*

काजळ ढाळुन कळ्या दिव्यांच्या पुन्हा प्रफुल्लित झाल्या

नुपूर झंकारीत स्वर्गिच्या स्वप्नसख्या अवतरल्या

तम दवडुनि प्रासाद उजळले, मंगलमय झाले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले ।।१।।

*

अलगद शीतल वात बिलगला रजनीगंधेला

जिवापाड जपलेला शिरिचा परिमल घट डुचमळला

वातावरणी कसे अचानक गंधजाल पसरले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले ।।२।।

*

दर्पणात निजरूप न्याहळित मुक्त केस सावरले

फुले माळली, कुंडल ल्याली, गळा हार घातले

नयनी काजळ, भाळी कुंकुम, कटी मेखला रुळे

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले ।।३।।

*

भुरभुर कुंतल, अधीर अंतर, मंतरलेल्या दिशा

“तुझ्यासवे एकांती सखया कशा रंगतिल निशा? “

अशा चिंतनी असता परिचित पदरव कानी पडले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले! ।।४।।

*

🙏🏽

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ मुक्त.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ मुक्त.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

अगदी सात आठ दिवसांपूर्वीचीच गोष्ट.. सकाळी चहा पीत पीत एकीकडे पेपर वाचत होते. पहिलं पान उपभोगाच्या वस्तूंच्या अत्याकर्षक जाहिरातींनी भरलेलं .. दुसऱ्या पानावर दिवाळीनिमित्त कुठल्या शहरातल्या बाजारपेठेत गर्दीची किती झुंबड उडाली त्याच्या फोटोंची गर्दी — त्या फोटोंच्या आजूबाजूला गर्दीत झालेली चेंगराचेंगरी – कुठे खून – कुठे मारामाऱ्या – कुठे जीवघेणा पूर – मग कुणा कुणाची आत्महत्या

– मधेच राजकारणातल्या निव्वळ स्वार्थापोटी मारल्या जात असलेल्या कोलांटउड्या — थोडक्यात काय तर बहुतेक सगळीकडे चाललेली नकारात्मकतेची कुरघोडी….. पानांची बहुतेक सगळी जागा याच नको वाटणाऱ्या वास्तवाने भरलेली ….. 

… वैतागून पेपर दूर सारला. आणि शेजारी असलेल्या खिडकीतून बाहेर बघत एव्हाना गार झालेला चहा प्यायला लागले….. घराखाली लावलेल्या झाडाच्या फांद्या आता पहिल्या मजल्यावरच्या आमच्या खिडकीजवळ पोहोचल्या होत्या. सहज लक्ष गेलं तर एक अगदी चिमणीपेक्षाही छोटा असणारा पक्षी झोक्यावर बसल्यासारखा एका फांदीवर झुलत होता .. मधेच आपले इवलाले पंख फुलवत स्वतःभोवतीच गिरक्या घेत होता .. मधेच आनंदाने आरोळ्या माराव्या तसा आवाज करत होता – – मस्त वाटत होतं – –

– – –  पण मधेच एकीकडे समोर फडफडणारा पेपर लक्ष विचलित करत होता … आणि नकळत मनात विचार भिरभिरायला लागले ….  इवलीशी चोच .. इवलेसे पंख असूनही मनसोक्त आनंदाने जगत असलेलं ते इवलंसं पाखरू … आणि जवळ खूप काही असूनही कशा ना कशाला जखडून सतत उरस्फोड करणारी असंतुष्ट माणसं. — आणि मग आपोआप मनात झिरपायला लागले शब्द – – –

☆ मुक्त .. ☆

उंच उंच भरारण्यासाठी  ..  पाखरांना नाही लागत दिवाळी दसरा

त्यांच्या मनाचे तेच तर राजे ..  कुवत जाणून खुशाल पंख पसरा .. ..

*

म्हणून आनंद साजरा करायला .. कारण त्यांना लागतच नाही

‘मी सदैव मुक्त आहे ‘ .. त्यांना नेहेमीच असते ग्वाही .. ..

*

मनसोक्त जगायलाही .. लागत नाही कुठलंच कारण

पोटापुरते दाणे मिळता .. तोच वाटतो त्यांना सण .. ..

*

हप्त्यावरती आणत नाहीत .. आनंदाचे फसवे पंख

ज्यावर असतो फासलेला तो .. समाधानाचा नकली वर्ख .. ..

*

मनापासूनचे समाधान असते .. मुद्दाम दाखवण्याची आस नसते

स्पर्धाच नाही कुणाशी कसली .. मग डामडौलाची गरजच नसते .. ..

*

गरजाच त्यांच्या मुळात माफक .. अवास्तव कुठलीच अपेक्षा नसते

म्हणून अंगापेक्षा बोंगा जड .. असे त्यांचे कधी-कुठे दिसते ? .. ..

*

म्हणून तर विहरतात मुक्तपणे .. घालत नाहीत स्वतःच्याच पायात बेड्या

ना कुणाशी स्पर्धा ना हेवेदावे .. ना आवाक्याबाहेरच्या आकांक्षा वेड्या .. ..

*

.. .. .. स्वरचित चक्रव्यूहातून बाहेर पड ..  प्रयत्न तरी कर ना  रे माणसा

 शीक जरा पाखरांकडून .. तो मुक्त आनंद असतो तरी कसा .. ..

*

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ “माझ्या पाऊसराजा…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

☆ क्षण सृजनाचा ☆ “माझ्या पाऊसराजा…” ☆ सुश्री शीला पतकी 

माझ्या पाऊस राजा र किती सांडशी सांडशी

*

तुझे येण्यान दारी र पोरं बाळ रे नाचती

म्हणे माय पाऊस आला येतील जोंधळे शेताला

राजा खाईल कडबा गाई म्हशीला र चारा

सारी नक्षत्र सांडली नाही थांबण्याचं नाव

तुझ्या पाण्याने रे नेला माझा संसार वाहून

उभ पीक झालं आडवं मोडलं घराचं कवाड

लेकर बाळ बखोटीला जीवधावे आसऱ्याला

अन्न पोटाला ते नाही अन कपडा भिजलेला

काय बाप्पारे जाहल आम्हा बखोटीला धरलं

लेकरा बाळा दूध नाही म्हाताऱ्यांना हीव भरलं

साऱ्या जगाचा पोशिंदा मागे भाकर भाकर

चार जूने रे कपडे द्यावा हात्रुन पांघरून

काय वेळ तू आणली पोरं सैरभैर झाली

तुझ्या थोड्याशा पाण्यात धुत होतेमी चिरगुट

त्यासी जोडून शिवून होई चिंध्याच वाकळ

त्या वाकळाची उब देई थंडीला आधार

माझी चूल अन बोळकी तुझ्या पुरात वाहिली

माझ्या माहेराची मस गेली पुरात वाहून

चार बकऱ्या ही वाहिल्या आता काही नाही राहिल्या

ते मुक जनावर मेल चिखलात रुतून

उभ्या जन्मात कधी र नाही आलास धावून

पाणी शोधायला जायचं कोसन कोसन

नाही बरं केलं देवा आम्हा गाठलं गाफील

आता कसा पूजावारे तुझा देव्हारा भक्तिन

माय अंबे ये धावून नाही कोणी तुझ्या वाचून

आता आवरा पावसा वाट घराची तू धर

माय बापांनो व्हा पुढे द्या थोडासा रे हात

हा बळीराजा रे देईल तुम्हा जिंदगीभर साथ

शीला पतकी सोलापूर 8805850279

 

ही कविता म्हणजे काव्य नव्हे यमकाची जोडाजोडी नाही आशय घन ही नाही… फक्त परिस्थिती आणि भावना .. ही लिहिताना काही ओळींवर मला हुंदका आवरत नव्हता.. डोळ्यात पाणी येत होतं.. अक्षर दिसत नव्हती ..काल रात्री एक फोन आला बाई आपली एक विद्यार्थिनी तिचे कुटुंब तिचे गाव वाले पुरात अडकलेत . .जुने कपडे पांघरून अंथरुण काही मदत गोळा करून द्याल का… आणि रात्री कितीतरी वेळ झोपच आली नाही वाटलं ही आपली कित्येक माणस धास्ती न जागीच आहेत अंगावर वाळलेला कपडाही नाही रात्री वाढलेल्या पावसाच्या आवाजाने बेचैन व्हायला होत होतं ही कविता फक्त भावना आहेत त्या समजून घ्या आणि वाटलं तर मदत करा….!

*

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘चंद्रकंस..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘चंद्रकंस..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

अश्विन शुद्ध पौर्णिमेचं ते पूर्णाकार, काहीसं केशरी रंगाचं शशिबिंब नारळीच्या आडून डोकावताना पाहिलं की अंतःकरणात वीणा झंकारू लागते! प्रियेच्या धुंदील सहवासाच्या स्मृती पुन्हा पुन्हा उजळून उठतात, उचंबळून वर येतात. कुंजात, वाटिकेत, ठाई ठाई स्मृतींचे काजवे चमचमतात.

सरोवरात विहार करताना दिसतो एकटाच राजहंस

चंद्रतुषार पिऊन कोण गातोय हा धुंद चंद्रकंस ?

🌻 राग चंद्रकंस 🌻

चंद्रकंस हा कोण गातसे पिउनी चंद्रतुषार

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार! ॥ ध्रु॥

 

अशीन होती रात्र बावरी

नभात होता चंद्र बिलोरी

तू, मी दोघे सागरतीरी

प्रेमा आपुल्या केवळ होता चंद्रच साक्षीदार !

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ १॥

 

चंदेरी या रेतीवरती

कर माझा तव कटीभोवती

मनात अपुल्या फुलली होती –

असंख्य स्वप्ने, ज्यांना आपण केले गे साकार !

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ २॥

 

मंत्रघोष घुमविला सागरे

बिंब इंदुचे जळीं थरारे

विसरून आपण जग हे सारे

काया, वाचा, मने जाहलो एकच – पूर्णाकार!

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ ३॥

 

कातळ हा तो, हीच नारळी

मुग्ध अशी तू, आशिच लाजली

आवेगाने घेता जवळी

मेघामागे अलगद दडला त्याच क्षणी शशि पार !

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ ४॥

🙏🏽

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ “काटेकरांची मुले…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

☆ क्षण सृजनाचा ☆ “काटेकरांची मुले…” ☆ सुश्री शीला पतकी 

मैत्रिणीचा फोन आला,” अगं शीला आपण अगदी चुकीचं शिकवलं बघ आपल्या विद्यार्थ्यांना. आपण सांगितलं सोलापुरात खूप झाडं लावा तरच पाऊस चांगला पडेल अन्यथा आपल्याकडे दुष्काळच… पण काय ग कसला पाऊस आपण चुकीचं सांगितलं बाई…!” या विनोदावर आम्ही खूप हसलो खरंच विनोदच म्हणायचे याला सोलापुरात आम्ही कधीच एवढा पाऊस पाहिला नव्हता पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासून जो पाऊस पडतोय तो मला वाटतं थंडी सुरू झाली तरी पडत राहणार आहे असं दिसते. मग काय घरात निवांत बसणे सोलापुरातल्या माणसाला पावसाची सवय नाही त्यामुळे त्याच्याकडे रेनकोट छत्री इत्यादी साहित्य नसते पाय पाण्यात बुडाले तर त्याला सर्दी होते अशी जडणघडण झालेले आमचे शरीर मग आता या वयात तरी निवांत घरी बसलो. 45 बंगल्यांच्या आमच्या सोसायटीत पूर्ण शुकशुकाट 45 घरात मोजून 50 माणस आहेत त्यातली 25 व्यवसायाला गेलेली… काही घरे कुलूप बंद . .प्रचंड शांतता….! मोबाईल आणि टीव्हीचा कंटाळा आलेला… मी शांत पडून राहिले भिंतीवरच्या घड्याळाकडे मात्र सतत लक्ष होतं…. एकेक काटा गतीने फिरत होता…. सेकंदाचा फिरणं 60 घर… तेव्हा मिनिट काटा एक घरावर हलायचा… मग 60 मिनिटे झाल्यावर तास काटा पाच घर चालायचा… हा खेळ मी तासभर बघत होते आणि लक्षात आले याना कंटाळा कसा येत नाही तेवढ्याच गोलात चालायचा…! हे कधी थांबत नाहीत…. बरोबर आहे त्याच्या मागे त्याचा बाप बसलाय ना.. बॅटरी ….आणि मग असेच काही काही विचार येत राहिले आणि  माझ्या तोंडून सहजच निघाले ,”ओ काटेकर थांबा की तुम्हाला चालताना बघून  कंटाळा आलाय… आम्हाला मात्र चालता येत नाही आणि तुम्ही पळत आहात”. आणि पटकन क्लिक झाल..” काटेकरांची मुलं”…. मग भराभर कल्पना येत राहिल्या बारा वाड्या .  साठ घर …आणि खूप काही जे कवितेत मांडलेल आहे ..!मग काय समोर एक पावतीचा कागद पडला होता अगदी हाताएवढा… पेन घेतला आणि त्यावर लिहायला सुरुवात केली भराभर ओळी उतरत गेल्या सहजच स्फुरलेले  काव्य, ते काही कष्ट काव्य नव्हतं पंधरा मिनिटात कविता झाली. मला चांगल्या कागदावर आणि चांगल्या अक्षरात कविता करता येत नाही कागद पाठ कोरा, पावत्या, रद्दी  इत्यादी मधला असेल तर कवितेला स्फुरण चढते .. !कविता तर झाली पहिला श्रोता हवा ना…? शेजारी पेइंग गेस्ट म्हणून एक एमबीबीएस ची मुलगी राहते… नीरजा तिच्या परीक्षेच्या अभ्यासातून तीला पाच मिनिट ब्रेक दिला…  म्हटलं चल कविता ऐकवते… कविता ऐकून ती खुश झाली आणि फ्रेश सुद्धा झाली म्हणाली,” क्या बात है आत्या मस्त” बास एवढ्या प्रतिक्रियेवर कविता पटापट पाठवली .आता ही कविता वाचून काहींनी विचारले कसं काय सुचत हो तुम्हाला? मनात म्हणलं बाई एकटेपणाचे दुःख तुम्हाला काय माहिती आहे घरात माणसं नसली की कविता सुचतात… ही थोडी गंमत बरं मला खात्री आहे तुम्हाला ही कविता आवडेल . .चला तर मग पाहूया काटेकरांची मुलं काय म्हणतात….!!!

☆ काटेकरांची मुलं

*

बारावाड्यांचा 60 घरांचा एक होता गाव

घड्याळ त्याचे नाव//

*

काटेकरांचे वेडे तीन  भाऊ होते गावभर फिरणारे

मोठा ताशा बळ मधला मिंटो आणि लहान होता पळ पळ

*

तोच मोठा होता चपळ  पळ पळ सतत पळायचा

बारा वाडे फिरल्यावर मिंटू एक घर चालायचा

मिंटो साठीला आला की ताशा भाऊ पाचघर हलायचा

*

पण फिरून नाही हं दमायचे

रात्र असो दिवस असो असो उन्हाळा पावसाळा

बारा घरांचा त्यांना लागला होता लळा

*

यांचं म्हणजे एक असतं वेळ म्हणजे वेळ

आणि शिस्त म्हणजे शिस्त

पाळायलाच  पाहिजे ना

साऱ्या जगाची असते यांच्यावरच भिस्त

*

सगळीकडे यांचेच राज्य घर ऑफिस शाळा

रेल्वे एसटी विमान सुद्धा पाळतात यांच्या वेळा

आई-बाबांना यांचाच धाक

लोकलचतर चालते यांच्यावरच चाक

*

यांचा दर्जा कायम वरचा

भिंतीवर मनगटावर मोबाईलच्याही  स्क्रीनवर

*

ग्रहावरही यांचीच हुकूमत

सूर्य ही उठतो वेळेवर

दिलेल्या कक्षेत मुकाट फिरतात

ग्रह तारे बिनदिक्कत

*

जन्म लग्न मृत्यू मुहूर्त सगळीकडे यांचाच गणित

अपरंपार महिमा यांचा भक्त यांचे अगणित

*

पण ठाऊक आहे का काय यांची गंमत

यांचे बाबा  मागे बसूनपाहतअसतात जम्मत

बॅटरी वाले बाबा त्यांना देतात ऊर्जा

म्हणून वेळेवर हलतोय त्यांचा प्रत्येक पूर्जा

*

धावणाऱ्याच्याही मागे असतो दडलेला एक बाप

तो असला की नाही चिंता, धावायचं पण नसतो डोक्याला उगाच ताप

*

मागे म्हणे आजीनं गाठोड्यात याला बांधलं

एका कवीने शोध शोधलं पण त्यालाही नाही सापडलं

*

आता नको शोधा शोध नको त्याचा मनस्ताप

काटे कुटुंबाला बांधून घ्या आणि सरळ चला बिनधास्त//

*

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ पुन्हा एकदा त्याच वळणावर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? क्षण सृजनाचे ?

☆ पुन्हा एकदा त्याच वळणावर… ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

कवितेतून मनातील भावनांचा विकोपाला गेलेला अहंकार अथवा एकरुपतेच्या मान्यतेत हरवून गेलेल जीवन.

जिथे आत्मघाताने जीवन संपवणारी दोन मने काल्पनिक संवादातून साधू इच्छीतात प्रेमाचा विजय.

खरे तर प्रेम या विषयावर फेलोशिप करणे कठिणच. अगदी शेक्सपिअर व कुसुमाग्रजांसारख्या दिग्गज साहित्यिकांचे चिंतनसुध्दा पूर्णपणे शब्दात अभिव्यक्त झालेले दिसून येत नाही.

अंतरीतील दोन हृदयाची एकत्र येण्याची तगमग म्हणजे प्रेम. प्रेमातील दुरावा यामध्ये समाजातील काही बंधनेही आडवी येतात.त्या प्रेमाच्या मान्यतेत असणा-या विचारधारेला.

विष पिऊन,दरीत उडी टाकून,समूद्रात एकत्रीत बुडून अथवा सर्व प्रेम ऋणानुबध नात्यांना झुगारुन प्रेमी युगलांनी जीवन संपवणे म्हणजे प्रेमातील आतिशोयक्ती म्हणता येईल.

प्रेम केवळ आठवणींवर टिकवता येते.जन्मभर राधा कृष्णासारखे.

भावनिक तृप्ततेच्या जवळ येऊन दुराव्यातील विरहाने जवळ येण्याची आयुष्यभर आठवणींना उराशी कवटाळून एकमेकाविषयी आदर ठेवणे याला प्रेमाची सरळ व्याख्या म्हणता येईल.

प्रत्येक साहित्यिकांना प्रेमावर लिहीणा-या सर्व प्रकारातील कवी,लेखक,कादंबरीकार अथवा प्रत्येक प्रकारातील प्रेमाभिव्याक्ती शब्दात मांडणा-या साहित्यिकांना

त्या त्या विचाराप्रमाणे अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य निश्चीतच आहे.

महाभारतातील सुभद्रा हरण असो अथवा राधेच आठवणीतील प्रेम.प्रेम हे मनातील निर्मळ भावनेच प्रतिक असतं.

माझ्या ‘पुन्हा एकदा त्याच वळणावर’या कवितेसाठी अभिव्यक्त होणे गरजेचे वाटले म्हणून दिली अभिव्यक्ती 🙏

☆ पुन्हा एकदा त्याच वळणावर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

वळणावर त्याच

पुन्हा एकदा येऊन

थांब

मुळीच नकोस मागे जाऊ

जरी पांगल्या सावल्या

लांब.

पहिल्या भेटीचे क्षण

आठव

भिडलेल्या नजरा नयनी

साठव.

जरी दाटून आले ढगही

तिथेच थांब

कारण पावसात भिजताना

दिसतेस छान.

काय म्हणून सांगू,माझ्या

मनाचा हट्ट

सारे जे जे सुंदर ते फक्त

तुझेच रुप.

तुझ्या प्रतिक्षेत अख्ख आयुष्य

निघून गेल

आता अंधार पडतानाही निराशेत

जगून झाल.

मला तुझा होकार कळला नाही

कधीच

म्हणुन तर बदनाम केल तुला मी

आधीच.

असो,हृदय सारख नसत कुणाचं

आणि विचारही

मी एकतर्फी कि तुझ दुनियेला

घाबरण अजाण प्रेम संचारही.

भेटलो असतो,एकांतात कधी

बोललो असतो मनातल

सार राहूनच गेल,नाही का?

पुन्हा एकदा त्याच थांब्यावर

येऊन थांब तशीच

नक्की मी आठवेन तेंव्हा सर्वत्र

काळोखाच साम्राज्य पांघरुन

तुझाही आत्मा हसत असणार

माझ्या आत्म्याशी जन्मात

चुकलेल्या गप्पा रंगताना

चंद्र-चांदण्यात रमलेली

असेल, एक अपूर्ण जीवनाची

प्रेम कहाणी

आत्मलोकाच्या आभाळात.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘दुर्गा..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘दुर्गा..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

🌻 दुर्गा 🌻

अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे देवीच्या नवरात्र उत्सवाचा, घटस्थपनेचा दिवस. पुढील नऊ दिवस विश्वात देवीचा शक्तिरूपाने वावर होणार. तिचा ‘उदो, उदो’ होणार. भुत्ये नाचणार, दिवट्या फुरफुरणार, कवड्याच्या माळा चकाकणार, संबळी कडाडणार! संध्याकाळी अंगणात मुली – लेकी – सुनांच्या भोंडल्यांचे फेर धरले जाणार. आपले दुखरे गुढगे सांभाळत दुडक्या चालीनं आज्या सुद्धा त्यात सहभागी होणार!

आईचे आगमन होणार, ती आमच्या घरी उत्सवाला येणार. भक्तांची केवढी लगबग, धांदल उडालीय पहा.

उठा, सिद्ध व्हा, चला

दुर्गैचे स्वागत करायला!॥

🌻 राग दुर्गा🌻 कवी: दिवाकर बुरसे 🌻 

🌻 

सडे कुंकवाचे दारी, उठा चला घाला

उत्सवास येई “दुर्गा”, चला स्वागताला॥ ध्रु॥

*

हरित वसन ल्याली, माथा शोभतो किरीट

मुक्त कुंतलांची शोभा, मेखला कटीस

हळद-कुंकुमाचे लेपन लाविले कपाळा

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला॥१॥

*

विमल हास्य वदनी विलसे धवल चंद्रिकेचे

विलग अधर, त्यातुन दिसती रदन हीरकाचे

पुष्ट उरोजांवर रुळती कनक, रत्नमाला

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला॥२॥

*

अष्टभुजा धारण करिती विविध आयुधांना

चक्र, खड्ग, अंकुश, पाश,चाप, बाण, भाला

शीघ्र गती चाले माता जणू अग्निज्वाला!

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला॥३॥

*

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares