मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘राग यमन (कल्याण)..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘राग यमन (कल्याण)..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

देवघरात समईच्या शुभ्र कळ्या फुलल्या आहेत. दीप प्रज्वलित होऊन घराघराला सुवर्णकांती लाभली आहे. चंदन, आगरू, कर्पूराच्या धुपाच्या धुंद गंधाने आसमंत भरून गेलाय्, प्रसन्न झालाय्.

*

अशा समयी शांत होतं क्लांत मन.

कारण, याच वेळी…  

स्वराकार घेत असतो “राग यमन!

🌻 राग यमन 🌻

*

संध्या सरली, हुरहुर विरली, कातर मन सावरले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या “यमन” सुमन घमघमले! ।। ध्रु।।

*

काजळ ढाळुन कळ्या दिव्यांच्या पुन्हा प्रफुल्लित झाल्या

नुपूर झंकारीत स्वर्गिच्या स्वप्नसख्या अवतरल्या

तम दवडुनि प्रासाद उजळले, मंगलमय झाले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले ।।१।।

*

अलगद शीतल वात बिलगला रजनीगंधेला

जिवापाड जपलेला शिरिचा परिमल घट डुचमळला

वातावरणी कसे अचानक गंधजाल पसरले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले ।।२।।

*

दर्पणात निजरूप न्याहळित मुक्त केस सावरले

फुले माळली, कुंडल ल्याली, गळा हार घातले

नयनी काजळ, भाळी कुंकुम, कटी मेखला रुळे

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले ।।३।।

*

भुरभुर कुंतल, अधीर अंतर, मंतरलेल्या दिशा

“तुझ्यासवे एकांती सखया कशा रंगतिल निशा? “

अशा चिंतनी असता परिचित पदरव कानी पडले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले! ।।४।।

*

🙏🏽

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ मुक्त.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ मुक्त.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

अगदी सात आठ दिवसांपूर्वीचीच गोष्ट.. सकाळी चहा पीत पीत एकीकडे पेपर वाचत होते. पहिलं पान उपभोगाच्या वस्तूंच्या अत्याकर्षक जाहिरातींनी भरलेलं .. दुसऱ्या पानावर दिवाळीनिमित्त कुठल्या शहरातल्या बाजारपेठेत गर्दीची किती झुंबड उडाली त्याच्या फोटोंची गर्दी — त्या फोटोंच्या आजूबाजूला गर्दीत झालेली चेंगराचेंगरी – कुठे खून – कुठे मारामाऱ्या – कुठे जीवघेणा पूर – मग कुणा कुणाची आत्महत्या

– मधेच राजकारणातल्या निव्वळ स्वार्थापोटी मारल्या जात असलेल्या कोलांटउड्या — थोडक्यात काय तर बहुतेक सगळीकडे चाललेली नकारात्मकतेची कुरघोडी….. पानांची बहुतेक सगळी जागा याच नको वाटणाऱ्या वास्तवाने भरलेली ….. 

… वैतागून पेपर दूर सारला. आणि शेजारी असलेल्या खिडकीतून बाहेर बघत एव्हाना गार झालेला चहा प्यायला लागले….. घराखाली लावलेल्या झाडाच्या फांद्या आता पहिल्या मजल्यावरच्या आमच्या खिडकीजवळ पोहोचल्या होत्या. सहज लक्ष गेलं तर एक अगदी चिमणीपेक्षाही छोटा असणारा पक्षी झोक्यावर बसल्यासारखा एका फांदीवर झुलत होता .. मधेच आपले इवलाले पंख फुलवत स्वतःभोवतीच गिरक्या घेत होता .. मधेच आनंदाने आरोळ्या माराव्या तसा आवाज करत होता – – मस्त वाटत होतं – –

– – –  पण मधेच एकीकडे समोर फडफडणारा पेपर लक्ष विचलित करत होता … आणि नकळत मनात विचार भिरभिरायला लागले ….  इवलीशी चोच .. इवलेसे पंख असूनही मनसोक्त आनंदाने जगत असलेलं ते इवलंसं पाखरू … आणि जवळ खूप काही असूनही कशा ना कशाला जखडून सतत उरस्फोड करणारी असंतुष्ट माणसं. — आणि मग आपोआप मनात झिरपायला लागले शब्द – – –

☆ मुक्त .. ☆

उंच उंच भरारण्यासाठी  ..  पाखरांना नाही लागत दिवाळी दसरा

त्यांच्या मनाचे तेच तर राजे ..  कुवत जाणून खुशाल पंख पसरा .. ..

*

म्हणून आनंद साजरा करायला .. कारण त्यांना लागतच नाही

‘मी सदैव मुक्त आहे ‘ .. त्यांना नेहेमीच असते ग्वाही .. ..

*

मनसोक्त जगायलाही .. लागत नाही कुठलंच कारण

पोटापुरते दाणे मिळता .. तोच वाटतो त्यांना सण .. ..

*

हप्त्यावरती आणत नाहीत .. आनंदाचे फसवे पंख

ज्यावर असतो फासलेला तो .. समाधानाचा नकली वर्ख .. ..

*

मनापासूनचे समाधान असते .. मुद्दाम दाखवण्याची आस नसते

स्पर्धाच नाही कुणाशी कसली .. मग डामडौलाची गरजच नसते .. ..

*

गरजाच त्यांच्या मुळात माफक .. अवास्तव कुठलीच अपेक्षा नसते

म्हणून अंगापेक्षा बोंगा जड .. असे त्यांचे कधी-कुठे दिसते ? .. ..

*

म्हणून तर विहरतात मुक्तपणे .. घालत नाहीत स्वतःच्याच पायात बेड्या

ना कुणाशी स्पर्धा ना हेवेदावे .. ना आवाक्याबाहेरच्या आकांक्षा वेड्या .. ..

*

.. .. .. स्वरचित चक्रव्यूहातून बाहेर पड ..  प्रयत्न तरी कर ना  रे माणसा

 शीक जरा पाखरांकडून .. तो मुक्त आनंद असतो तरी कसा .. ..

*

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ “माझ्या पाऊसराजा…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

☆ क्षण सृजनाचा ☆ “माझ्या पाऊसराजा…” ☆ सुश्री शीला पतकी 

माझ्या पाऊस राजा र किती सांडशी सांडशी

*

तुझे येण्यान दारी र पोरं बाळ रे नाचती

म्हणे माय पाऊस आला येतील जोंधळे शेताला

राजा खाईल कडबा गाई म्हशीला र चारा

सारी नक्षत्र सांडली नाही थांबण्याचं नाव

तुझ्या पाण्याने रे नेला माझा संसार वाहून

उभ पीक झालं आडवं मोडलं घराचं कवाड

लेकर बाळ बखोटीला जीवधावे आसऱ्याला

अन्न पोटाला ते नाही अन कपडा भिजलेला

काय बाप्पारे जाहल आम्हा बखोटीला धरलं

लेकरा बाळा दूध नाही म्हाताऱ्यांना हीव भरलं

साऱ्या जगाचा पोशिंदा मागे भाकर भाकर

चार जूने रे कपडे द्यावा हात्रुन पांघरून

काय वेळ तू आणली पोरं सैरभैर झाली

तुझ्या थोड्याशा पाण्यात धुत होतेमी चिरगुट

त्यासी जोडून शिवून होई चिंध्याच वाकळ

त्या वाकळाची उब देई थंडीला आधार

माझी चूल अन बोळकी तुझ्या पुरात वाहिली

माझ्या माहेराची मस गेली पुरात वाहून

चार बकऱ्या ही वाहिल्या आता काही नाही राहिल्या

ते मुक जनावर मेल चिखलात रुतून

उभ्या जन्मात कधी र नाही आलास धावून

पाणी शोधायला जायचं कोसन कोसन

नाही बरं केलं देवा आम्हा गाठलं गाफील

आता कसा पूजावारे तुझा देव्हारा भक्तिन

माय अंबे ये धावून नाही कोणी तुझ्या वाचून

आता आवरा पावसा वाट घराची तू धर

माय बापांनो व्हा पुढे द्या थोडासा रे हात

हा बळीराजा रे देईल तुम्हा जिंदगीभर साथ

शीला पतकी सोलापूर 8805850279

 

ही कविता म्हणजे काव्य नव्हे यमकाची जोडाजोडी नाही आशय घन ही नाही… फक्त परिस्थिती आणि भावना .. ही लिहिताना काही ओळींवर मला हुंदका आवरत नव्हता.. डोळ्यात पाणी येत होतं.. अक्षर दिसत नव्हती ..काल रात्री एक फोन आला बाई आपली एक विद्यार्थिनी तिचे कुटुंब तिचे गाव वाले पुरात अडकलेत . .जुने कपडे पांघरून अंथरुण काही मदत गोळा करून द्याल का… आणि रात्री कितीतरी वेळ झोपच आली नाही वाटलं ही आपली कित्येक माणस धास्ती न जागीच आहेत अंगावर वाळलेला कपडाही नाही रात्री वाढलेल्या पावसाच्या आवाजाने बेचैन व्हायला होत होतं ही कविता फक्त भावना आहेत त्या समजून घ्या आणि वाटलं तर मदत करा….!

*

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘चंद्रकंस..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘चंद्रकंस..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

अश्विन शुद्ध पौर्णिमेचं ते पूर्णाकार, काहीसं केशरी रंगाचं शशिबिंब नारळीच्या आडून डोकावताना पाहिलं की अंतःकरणात वीणा झंकारू लागते! प्रियेच्या धुंदील सहवासाच्या स्मृती पुन्हा पुन्हा उजळून उठतात, उचंबळून वर येतात. कुंजात, वाटिकेत, ठाई ठाई स्मृतींचे काजवे चमचमतात.

सरोवरात विहार करताना दिसतो एकटाच राजहंस

चंद्रतुषार पिऊन कोण गातोय हा धुंद चंद्रकंस ?

🌻 राग चंद्रकंस 🌻

चंद्रकंस हा कोण गातसे पिउनी चंद्रतुषार

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार! ॥ ध्रु॥

 

अशीन होती रात्र बावरी

नभात होता चंद्र बिलोरी

तू, मी दोघे सागरतीरी

प्रेमा आपुल्या केवळ होता चंद्रच साक्षीदार !

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ १॥

 

चंदेरी या रेतीवरती

कर माझा तव कटीभोवती

मनात अपुल्या फुलली होती –

असंख्य स्वप्ने, ज्यांना आपण केले गे साकार !

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ २॥

 

मंत्रघोष घुमविला सागरे

बिंब इंदुचे जळीं थरारे

विसरून आपण जग हे सारे

काया, वाचा, मने जाहलो एकच – पूर्णाकार!

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ ३॥

 

कातळ हा तो, हीच नारळी

मुग्ध अशी तू, आशिच लाजली

आवेगाने घेता जवळी

मेघामागे अलगद दडला त्याच क्षणी शशि पार !

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ ४॥

🙏🏽

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ “काटेकरांची मुले…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

☆ क्षण सृजनाचा ☆ “काटेकरांची मुले…” ☆ सुश्री शीला पतकी 

मैत्रिणीचा फोन आला,” अगं शीला आपण अगदी चुकीचं शिकवलं बघ आपल्या विद्यार्थ्यांना. आपण सांगितलं सोलापुरात खूप झाडं लावा तरच पाऊस चांगला पडेल अन्यथा आपल्याकडे दुष्काळच… पण काय ग कसला पाऊस आपण चुकीचं सांगितलं बाई…!” या विनोदावर आम्ही खूप हसलो खरंच विनोदच म्हणायचे याला सोलापुरात आम्ही कधीच एवढा पाऊस पाहिला नव्हता पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासून जो पाऊस पडतोय तो मला वाटतं थंडी सुरू झाली तरी पडत राहणार आहे असं दिसते. मग काय घरात निवांत बसणे सोलापुरातल्या माणसाला पावसाची सवय नाही त्यामुळे त्याच्याकडे रेनकोट छत्री इत्यादी साहित्य नसते पाय पाण्यात बुडाले तर त्याला सर्दी होते अशी जडणघडण झालेले आमचे शरीर मग आता या वयात तरी निवांत घरी बसलो. 45 बंगल्यांच्या आमच्या सोसायटीत पूर्ण शुकशुकाट 45 घरात मोजून 50 माणस आहेत त्यातली 25 व्यवसायाला गेलेली… काही घरे कुलूप बंद . .प्रचंड शांतता….! मोबाईल आणि टीव्हीचा कंटाळा आलेला… मी शांत पडून राहिले भिंतीवरच्या घड्याळाकडे मात्र सतत लक्ष होतं…. एकेक काटा गतीने फिरत होता…. सेकंदाचा फिरणं 60 घर… तेव्हा मिनिट काटा एक घरावर हलायचा… मग 60 मिनिटे झाल्यावर तास काटा पाच घर चालायचा… हा खेळ मी तासभर बघत होते आणि लक्षात आले याना कंटाळा कसा येत नाही तेवढ्याच गोलात चालायचा…! हे कधी थांबत नाहीत…. बरोबर आहे त्याच्या मागे त्याचा बाप बसलाय ना.. बॅटरी ….आणि मग असेच काही काही विचार येत राहिले आणि  माझ्या तोंडून सहजच निघाले ,”ओ काटेकर थांबा की तुम्हाला चालताना बघून  कंटाळा आलाय… आम्हाला मात्र चालता येत नाही आणि तुम्ही पळत आहात”. आणि पटकन क्लिक झाल..” काटेकरांची मुलं”…. मग भराभर कल्पना येत राहिल्या बारा वाड्या .  साठ घर …आणि खूप काही जे कवितेत मांडलेल आहे ..!मग काय समोर एक पावतीचा कागद पडला होता अगदी हाताएवढा… पेन घेतला आणि त्यावर लिहायला सुरुवात केली भराभर ओळी उतरत गेल्या सहजच स्फुरलेले  काव्य, ते काही कष्ट काव्य नव्हतं पंधरा मिनिटात कविता झाली. मला चांगल्या कागदावर आणि चांगल्या अक्षरात कविता करता येत नाही कागद पाठ कोरा, पावत्या, रद्दी  इत्यादी मधला असेल तर कवितेला स्फुरण चढते .. !कविता तर झाली पहिला श्रोता हवा ना…? शेजारी पेइंग गेस्ट म्हणून एक एमबीबीएस ची मुलगी राहते… नीरजा तिच्या परीक्षेच्या अभ्यासातून तीला पाच मिनिट ब्रेक दिला…  म्हटलं चल कविता ऐकवते… कविता ऐकून ती खुश झाली आणि फ्रेश सुद्धा झाली म्हणाली,” क्या बात है आत्या मस्त” बास एवढ्या प्रतिक्रियेवर कविता पटापट पाठवली .आता ही कविता वाचून काहींनी विचारले कसं काय सुचत हो तुम्हाला? मनात म्हणलं बाई एकटेपणाचे दुःख तुम्हाला काय माहिती आहे घरात माणसं नसली की कविता सुचतात… ही थोडी गंमत बरं मला खात्री आहे तुम्हाला ही कविता आवडेल . .चला तर मग पाहूया काटेकरांची मुलं काय म्हणतात….!!!

☆ काटेकरांची मुलं

*

बारावाड्यांचा 60 घरांचा एक होता गाव

घड्याळ त्याचे नाव//

*

काटेकरांचे वेडे तीन  भाऊ होते गावभर फिरणारे

मोठा ताशा बळ मधला मिंटो आणि लहान होता पळ पळ

*

तोच मोठा होता चपळ  पळ पळ सतत पळायचा

बारा वाडे फिरल्यावर मिंटू एक घर चालायचा

मिंटो साठीला आला की ताशा भाऊ पाचघर हलायचा

*

पण फिरून नाही हं दमायचे

रात्र असो दिवस असो असो उन्हाळा पावसाळा

बारा घरांचा त्यांना लागला होता लळा

*

यांचं म्हणजे एक असतं वेळ म्हणजे वेळ

आणि शिस्त म्हणजे शिस्त

पाळायलाच  पाहिजे ना

साऱ्या जगाची असते यांच्यावरच भिस्त

*

सगळीकडे यांचेच राज्य घर ऑफिस शाळा

रेल्वे एसटी विमान सुद्धा पाळतात यांच्या वेळा

आई-बाबांना यांचाच धाक

लोकलचतर चालते यांच्यावरच चाक

*

यांचा दर्जा कायम वरचा

भिंतीवर मनगटावर मोबाईलच्याही  स्क्रीनवर

*

ग्रहावरही यांचीच हुकूमत

सूर्य ही उठतो वेळेवर

दिलेल्या कक्षेत मुकाट फिरतात

ग्रह तारे बिनदिक्कत

*

जन्म लग्न मृत्यू मुहूर्त सगळीकडे यांचाच गणित

अपरंपार महिमा यांचा भक्त यांचे अगणित

*

पण ठाऊक आहे का काय यांची गंमत

यांचे बाबा  मागे बसूनपाहतअसतात जम्मत

बॅटरी वाले बाबा त्यांना देतात ऊर्जा

म्हणून वेळेवर हलतोय त्यांचा प्रत्येक पूर्जा

*

धावणाऱ्याच्याही मागे असतो दडलेला एक बाप

तो असला की नाही चिंता, धावायचं पण नसतो डोक्याला उगाच ताप

*

मागे म्हणे आजीनं गाठोड्यात याला बांधलं

एका कवीने शोध शोधलं पण त्यालाही नाही सापडलं

*

आता नको शोधा शोध नको त्याचा मनस्ताप

काटे कुटुंबाला बांधून घ्या आणि सरळ चला बिनधास्त//

*

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ पुन्हा एकदा त्याच वळणावर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? क्षण सृजनाचे ?

☆ पुन्हा एकदा त्याच वळणावर… ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

कवितेतून मनातील भावनांचा विकोपाला गेलेला अहंकार अथवा एकरुपतेच्या मान्यतेत हरवून गेलेल जीवन.

जिथे आत्मघाताने जीवन संपवणारी दोन मने काल्पनिक संवादातून साधू इच्छीतात प्रेमाचा विजय.

खरे तर प्रेम या विषयावर फेलोशिप करणे कठिणच. अगदी शेक्सपिअर व कुसुमाग्रजांसारख्या दिग्गज साहित्यिकांचे चिंतनसुध्दा पूर्णपणे शब्दात अभिव्यक्त झालेले दिसून येत नाही.

अंतरीतील दोन हृदयाची एकत्र येण्याची तगमग म्हणजे प्रेम. प्रेमातील दुरावा यामध्ये समाजातील काही बंधनेही आडवी येतात.त्या प्रेमाच्या मान्यतेत असणा-या विचारधारेला.

विष पिऊन,दरीत उडी टाकून,समूद्रात एकत्रीत बुडून अथवा सर्व प्रेम ऋणानुबध नात्यांना झुगारुन प्रेमी युगलांनी जीवन संपवणे म्हणजे प्रेमातील आतिशोयक्ती म्हणता येईल.

प्रेम केवळ आठवणींवर टिकवता येते.जन्मभर राधा कृष्णासारखे.

भावनिक तृप्ततेच्या जवळ येऊन दुराव्यातील विरहाने जवळ येण्याची आयुष्यभर आठवणींना उराशी कवटाळून एकमेकाविषयी आदर ठेवणे याला प्रेमाची सरळ व्याख्या म्हणता येईल.

प्रत्येक साहित्यिकांना प्रेमावर लिहीणा-या सर्व प्रकारातील कवी,लेखक,कादंबरीकार अथवा प्रत्येक प्रकारातील प्रेमाभिव्याक्ती शब्दात मांडणा-या साहित्यिकांना

त्या त्या विचाराप्रमाणे अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य निश्चीतच आहे.

महाभारतातील सुभद्रा हरण असो अथवा राधेच आठवणीतील प्रेम.प्रेम हे मनातील निर्मळ भावनेच प्रतिक असतं.

माझ्या ‘पुन्हा एकदा त्याच वळणावर’या कवितेसाठी अभिव्यक्त होणे गरजेचे वाटले म्हणून दिली अभिव्यक्ती 🙏

☆ पुन्हा एकदा त्याच वळणावर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

वळणावर त्याच

पुन्हा एकदा येऊन

थांब

मुळीच नकोस मागे जाऊ

जरी पांगल्या सावल्या

लांब.

पहिल्या भेटीचे क्षण

आठव

भिडलेल्या नजरा नयनी

साठव.

जरी दाटून आले ढगही

तिथेच थांब

कारण पावसात भिजताना

दिसतेस छान.

काय म्हणून सांगू,माझ्या

मनाचा हट्ट

सारे जे जे सुंदर ते फक्त

तुझेच रुप.

तुझ्या प्रतिक्षेत अख्ख आयुष्य

निघून गेल

आता अंधार पडतानाही निराशेत

जगून झाल.

मला तुझा होकार कळला नाही

कधीच

म्हणुन तर बदनाम केल तुला मी

आधीच.

असो,हृदय सारख नसत कुणाचं

आणि विचारही

मी एकतर्फी कि तुझ दुनियेला

घाबरण अजाण प्रेम संचारही.

भेटलो असतो,एकांतात कधी

बोललो असतो मनातल

सार राहूनच गेल,नाही का?

पुन्हा एकदा त्याच थांब्यावर

येऊन थांब तशीच

नक्की मी आठवेन तेंव्हा सर्वत्र

काळोखाच साम्राज्य पांघरुन

तुझाही आत्मा हसत असणार

माझ्या आत्म्याशी जन्मात

चुकलेल्या गप्पा रंगताना

चंद्र-चांदण्यात रमलेली

असेल, एक अपूर्ण जीवनाची

प्रेम कहाणी

आत्मलोकाच्या आभाळात.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘दुर्गा..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘दुर्गा..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

🌻 दुर्गा 🌻

अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे देवीच्या नवरात्र उत्सवाचा, घटस्थपनेचा दिवस. पुढील नऊ दिवस विश्वात देवीचा शक्तिरूपाने वावर होणार. तिचा ‘उदो, उदो’ होणार. भुत्ये नाचणार, दिवट्या फुरफुरणार, कवड्याच्या माळा चकाकणार, संबळी कडाडणार! संध्याकाळी अंगणात मुली – लेकी – सुनांच्या भोंडल्यांचे फेर धरले जाणार. आपले दुखरे गुढगे सांभाळत दुडक्या चालीनं आज्या सुद्धा त्यात सहभागी होणार!

आईचे आगमन होणार, ती आमच्या घरी उत्सवाला येणार. भक्तांची केवढी लगबग, धांदल उडालीय पहा.

उठा, सिद्ध व्हा, चला

दुर्गैचे स्वागत करायला!॥

🌻 राग दुर्गा🌻 कवी: दिवाकर बुरसे 🌻 

🌻 

सडे कुंकवाचे दारी, उठा चला घाला

उत्सवास येई “दुर्गा”, चला स्वागताला॥ ध्रु॥

*

हरित वसन ल्याली, माथा शोभतो किरीट

मुक्त कुंतलांची शोभा, मेखला कटीस

हळद-कुंकुमाचे लेपन लाविले कपाळा

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला॥१॥

*

विमल हास्य वदनी विलसे धवल चंद्रिकेचे

विलग अधर, त्यातुन दिसती रदन हीरकाचे

पुष्ट उरोजांवर रुळती कनक, रत्नमाला

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला॥२॥

*

अष्टभुजा धारण करिती विविध आयुधांना

चक्र, खड्ग, अंकुश, पाश,चाप, बाण, भाला

शीघ्र गती चाले माता जणू अग्निज्वाला!

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला॥३॥

*

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ विसर्जन (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ विसर्जन (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

पुण्यातला सुप्रसिद्ध बाजीराव रोड … त्या रस्त्यावर असणारा तितकाच प्रसिद्ध शनिपार चौक.. चहूबाजूंनी सदैव गजबजलेला.. जीवनावश्यक सर्व चीजा सहजपणे उपलब्ध करून देणारे, या चौकात एकत्र येणारे चारही रस्ते… या चौकाच्या.. या बाजीराव रस्त्याच्या अगदी लागून असलेल्या ठिकाणी मी जन्मापासून पुढे ४६-४७ वर्षं राहिलेली आहे. आणि म्हणूनच या चौकाच्या चौफेर असणारे चार महत्वाचे गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीची मोठ्या उत्साहात वाजत गाजत जाणारी विसर्जन मिरवणूक म्हणजे माझ्या आयुष्याचा जणू एक अविर्भाज्य भागच…. उत्साह आणि आनंदाची …गणेशाच्या मंगलमय नेत्रसुखद दर्शनाची लयलूट करणाऱ्या या सगळ्या गोष्टी… जाण्याआधीच पुढच्या वर्षीच्या आगमनाची वाट पाहायला भाग पाडणारा हा उत्सव….

….. हो.. आठवतंय तेव्हापासून गेल्या काही वर्षांपर्यंत असंच तर होतं सगळं. फुले मंडईपासून विसर्जन मिरवणूक सुरु व्हायची. आणि त्यासाठी पुण्यातली सगळी सार्वजनिक मंडळे रांग लावून सज्ज असायची.

ढोल ताशे – त्याबरोबर शिस्तीने तालबद्ध.. लयबद्ध नाचत जाणारे त्या त्या मंडळाचे कार्यकर्ते – शांततेने.. स्वयंशिस्त पाळणारे बघे लोक…… आणि वेळेत सुरु होऊन वेळेत संपणारी प्रेक्षणीय मिरवणूक……

….. काही वर्षांनी कालानुरूप हे चित्र हळूहळू बदलत चालल्याचे कुठेतरी जाणवत होते हे नक्की.. शहराची लोकसंख्या सतत वाढत होती.. गणपती पहात हिंडण्याची वेळही वाढत होती. सजावटीचे नवनवे तंत्रज्ञान उपलब्ध होण्याचे प्रमाणही वेगाने वाढत होते.. तरीही त्यावेळचं एकूणच सामाजिक वातावरण सुसह्य होत होतं…….. पण आता गेल्या काही वर्षांपासून मात्र, प्रसन्नता.. मनापासूनचा भक्तिभाव.. आणि मनात साठवून ठेवावा असा आनंद देणाऱ्या या उत्सवाचे.. विशेषतः विसर्जन मिरवणुकीचे स्वरूप पूर्णपणे पालटल्याचे स्पष्टपणे अगदी दरवर्षी जाणवते आहे. डीजे.. त्यावर वाजणारी कानठळ्या बसवणारी कर्कश्श गाणी.. त्यावर बेधुंद होऊन विचित्र अंगविक्षेप करत भान हरपून नाचणारी तरुणाई … पाहतांना चक्कर यावी अशी विद्युत रोषणाई …. सगळे सगळे अगदी असह्य करणारे होत चालले होते.. नव्हे.. झालेच होते.

.. भर रस्त्यावर असणाऱ्या माझ्या घराच्या गॅलरीत एका वर्षी रात्री त्या मिरवणुकीसाठी चाललेला अनागोंदी गोंधळ बघत अगदी सुन्न होऊन उभी होते.. कारण घरात झोप लागणं केवळ अशक्य होतं. जिकडे तिकडे सगळा नुसता धुमाकूळ.. रस्ता दिसतच नव्हता.. दिसत होती फक्त डोकी.. आणि डोकी… आणि फक्त कलकलाट.. हा शब्दही खरं टोकदाच होता त्या डोकं बधीर करणाऱ्या गोंगाटासाठी. रस्त्याच्या कडेने दाटीवाटीने उभे असलेले खाद्यपदार्थांचे अगणित स्टॉल्स आणि त्याच्या कढयांवर मुद्दाम आपटल्या जाणाऱ्या झाऱ्यांचे जणू डोक्यात घाव घातल्यासारखे घणघणाट …. चणे-फुटाणे, कर्कश्श पिपाण्या, फुगे, आणि काय काय विकणाऱ्यांच्या गर्दीला मारलेल्या हाका….. किती आणि काय काय सांगावं …

….. मिरवणुकीसाठी नंबर लावून उभ्या असलेल्या एका ट्रकवर ठेवलेल्या गणपतीकडे मध्येच माझं लक्ष गेलं.. त्याच्याकडे पहात असतांना अचानक त्या विघ्नहर्त्या गणेशाचाच चेहेरा अगदी केविलवाणा.. रडवेला.. वैतागलेला दिसत असल्याचा मला भास व्हायला लागला…….. आणि मनात नकळत शब्द उमटू लागले……

नाद रंग अन उत्साहाचा उत्सव चाले चोहीकडे

परि या जल्लोषात हरवली उत्सवमूर्ती कुणीकडे ….

*

दहा दिवस त्या मांडवात बांधून घातले त्यालागी

आज पहा किती बरे वाटले.. घरी जाण्याची घाई उगी….

*

रात्रीपासून मोटारीवर बसवून त्याला ठेवियले

सहनशील हा गजानन परी, आसन ना त्याचे ढळले ….

*

सकाळपासून जल्लोषाला पूर पहा हो किती आला

वाजतगाजत सगळे जमले उधाण आले उत्साहाला ….

*

मोटारीवर मुकाट बसुनी गणपती सारे पहात होता

जाणवले त्यालाही होते, गर्दीतच तो चुकला होता ….

*

लेझीम ढोल नि टिपरीचा तो तालच गर्दीमध्ये हरवला

धांगडधिंगा किती चालला विसरलेच त्या गजाननाला ….

*

“ छंदच नीत मज सकल जनांना चकवत असतो नशीबरूपे

म्हणे आज मी स्वतःच चुकलो – चकविती ही माझीच रुपे ….

*

विचार करता करता थकुनी गजाननाचा लगे डोळा

दचके जेव्हा जागे होता.. दिसे तळपता सुवर्णगोळा ….

*

जाण्याचा की दिन पालटला, कसल्या भक्तांशी ही गाठ

जातो जातो म्हणतो तरीही सोडती ना ते त्याची वाट ….

*

आज विनवतो हा भक्तांना.. मायबाप जाऊ दे की मजला

दहा दिवस राहिलो ना गुपचुप.. नका धरू आता वेठीला ….

*

पुढच्या साली नक्की येईन.. म्हणे एक परि शर्त असे

नकोत लैला नकोत मजनू, सनई चौघडा पुरे असे ….

*

बिभत्स वर्तन कुठे नसावे.. मंगल वातावरण हवे

माझ्या नावे सर्वार्थाने जनजाग्रण व्हायाचि हवे ….

*

…. गजाननाचेही मन हाले या भक्तांचा निरोप घेता

जलमार्गे जाताजाता.. त्या पाण्यावर हलती लाटा ….

*

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ आमुचा गणपती आला ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

☆ क्षण सृजनाचा ☆ आमुचा गणपती आला ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

||श्री||

सकाळी जाग आली ती या ओळी गुणगुणतच…

दोन ओळी सुचल्या त्या काम करता करता गुणगुणत राहिले. आणि पुढे इतकं काही सुचू लागलं की काम बाजूला ठेवून मला त्या लिहून काढाव्या लागल्या. पूजा करतानासुद्धा इतकी तन्मयता झाली असेल की नाही माहिती नाही पण या ओळी लिहिताना मात्र एक विलक्षण तन्मयता, आनंद, चैतन्य जाणवत होतं. लिहिल्यावर जाणवलं की ही एक साधीसुधी आरती म्हणता येईल अशी रचना आहे. गणपतीची विविध नावं यात गुंफली गेली आहेत.

🙏 गणेशाने हे काम करून घेतलं असावं. 🙏

अबीर गुलाल उधळीत आमुचा ‘गणराज’ आला|

आमुचा ‘गणपती’ आला||

*

ढोल, ताशे, झांजांचा नाद ‘विनायका’ तव त्रिभुवनी निनादला|

नाद तव त्रिभुवनी निनादला||

*

दारी सडा रांगोळी तोरण सजले ‘गजानना’ तुज स्वागतासाठी|

गजानना तुज स्वागतासाठी||

 *

धूप, दीप, अत्तर, गुलाब ‘हेरंबा’ तुज वाहतो दुर्वांच्या राशी|

वाहतो मस्तकी दुर्वांच्या राशी||

*

मोदक लाडू पेढे ‘लंबोदरा’ पंगत प्रसादाची,

वाढली पंगत प्रसादाची|

*

म्हणू आरती करु प्रार्थना ‘एकदंता’ तव चरणापाशी|

प्रार्थना तव चरणापाशी||

*

बुद्धी, शक्ती अन् कलेचे ‘विनायका’ लाभो वरदान आम्हाला|

देशी वरदान आम्हाला ||

*

‘भालचंद्रा’ तव कृपेने सौख्य- सुख-शांती लाभो भक्तांना|

लाभो आम्हा भक्तांना||

*

जळो भेदभाव नुरो वासना ‘विघ्नेशा’ अहंकाराला दे आमुच्या मुक्ती|

आम्हास दे आता मुक्ती ||

*

चराचरातील तुझ्या रूपाशी ‘गजवक्रा’ राहो सदा प्रीती||

‘गौरीपुत्रा’ राहो सदा प्रीती||

*

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ उंच हंडी ध्येयाची ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

☆ क्षण सृजनाचा ☆ उंच हंडी ध्येयाची श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

आजकाल दहीहंडी हा एक इव्हेंट बनला आहे! लाखोंची उंच हंडी फोडायच्या नादात, अनेक तरुण गोविंदा कायमचे जखमी अथवा मृत झाले आहेत. म्हणून मी एक वेगळ्या प्रकारची हंडी फोडायचे आवाहन, आजच्या तरुणांना करतो आहे. ती हंडी फोडायचा त्यांनी जरूर विचार करावा! 🙏

😅🙏 उंच हंडी ध्येयाची! 😅🙏

उंच बांधा हंडी ध्येयाची

रचा मनोरा मेहनतीचा,

उच्च आदर्श धरूनी मनी

आयुष्य सुखाचे वेचा!

*

फोडतांना हंडी ध्येयाची

जरी कोसळला मनोरा,

प्रयत्न लावून पणाला

नव्या दमाने पुन्हा उभारा!

*

पार करा वाटेवरचे

थर सारे अडचणींचे,

लागता हंडी हाताला

बोल ऐका कौतुकाचे!

*

हाती येता वरचे श्रीफळ

फोडा हंडी तुम्ही ध्येयाची,

मजा लुटाल आयुष्यभर

गोड गोपाल काल्याची!

गोड गोपाल काल्याची!

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares