मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # चहाच्या कपातले वादळ… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # चहाच्या कपातले वादळ… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

अन चहाच्या कपात वादळ उठले… निमित्त तिचे माझे भांडणाचे झाले… शब्दाने शब्द वाढत गेला.. ना तिने खाली पडू दिला ना मी सोडून दिला… विषय तसा क्षुल्लक होता. नेहमी सारखा वादाला तोंड फोडणारा… तू तू त मैं मैं ने कागाळीला संथ सुरवात झाली… आणि हळूहळू ती तारसप्तका पर्यंत पोहचली… तुमचं हे नेहमीचंच असं असतं आपलं तेच खरं मानायचं… जरा म्हणून कुठे बायकोचं ऐकाल तर शपथ… आम्ही मेलं राब राब राबायचं नि वरती मनं मारायचं… तुम्हाला हवं ते करू द्यायचं आणि आम्ही ब्र सुद्धा काढायचा नाही… बायको म्हणून काही कदर राहिली नाही. मोलकरीण म्हणूनच किंमत दिली गेली… आता अडलयं माझं खेटर… तुम्ही आता खुशाल राहा तुमच्या घरी.. ही मी निघाले माझ्या माहेरी… मग लवकरच कळेल बायको म्हणजे काय चीज असते… तिच्या शिवाय घरी दारी दुसरं कोण झिजते… किती दिवस माझ्या विना इथं तोऱ्यात राहाल… दोन वेळेचे जेवणाचे नि तिनत्रिकाळ चहाचे मिळायचे झाले कि वांधे मग कोण पुसेल तुमचे हाल… फोनवर फोन निरोपावर निरोप धाडाल मला.. सुसरबाई तुझी पाठ बरं मऊ चल ना आता आपल्या घरला… समझोताचा आवाज नरम आला… जावा जावा माफ केले मी तुम्हांला चला आताच येते तुमच्या बरोबर आपल्या घरला… असा तर्हेने वादाचे काटे गळून गेलेल्या प्रीती च्या गुलाबाचा सुंगध पुन्हा दरवळला… अंदर कि बात सांगु का तुम्हाला..

खरं म्हणजे माहेरी जाण्याचा आततायी निर्णयाने माझाही जीव होता चुटपुटला… कसे राहतील घरी धनी माझ्यावाचुनी.. तनाने मी माहेरी नि सासरी मन तगमगुनी… वाट पाहत बसले कधी येतील मला न्यायला… कोणी काही म्हणोत भांड्याला भांड लागतचं कि संसारातल्या खऱ्या प्रेमाला तेव्हा तेव्हा अशी चहाच्या कपातली वादळं उठंत असतात… कुणीच हारत नसतात आणि जिंकत तर त्याहूनही नसतात…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # दिलकी नजरसे.. नजरों के दिलसे… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # दिलकी नजरसे.. नजरों के दिलसे… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

तू बघतेस ना त्या गवाक्षातून माझा शोध घेत असतेस… तू उभी असतेस निश्चल पणे कुठल्याही प्रकारचा आवाज आपल्याकडून होणार नाही याची पूरेपूर काळजी घेऊन… अधिर मनाची उतावीळता डोळ्यात येते उतरून आणि त्याला हट्टी मुलासारखे सांगतात कि डोळ्याची पापणी निमिषभरही न हलवता चक्क डोळे ताणून जितके मोठे करून बघता येतील तितके तू मायक्रो ऍंगलने शोध घेत रहा… ओठांची मिटली गुलाब पाकळ्या विलग करू देऊ नकोस… माझं ओझरतं दर्शन झाल्यावरही ना उत्साहाच्या भरात ना आनंदाच्या उकळी फुटल्या असताना शब्दाचा हुंकार आवरून धर… तो मस्तवाल वारा तुला अशी एकटीला भान हरवलेल्या स्थितीत पाहून अंगचटीला येऊन तुला नकळतपणे गुदगुल्या करणार बघ.. त्यानं तुझ्या अंगोपांगावर रोमरोमाचे काटे फुलून आले कि एक हलकिशी शिरशिरी सगळ्या देहावर पसरून जाईल.. तुझे ते मऊ मुलायम रेशमासारखे कुंतल त्या वाऱ्याच्या लहरीवर स्वच्छंपणाने भुरुभुरू उडू लागणार.. एखादी चुकार बट तुझ्या भालप्रदेशी आणि कपोलावर रूळताना तुझं लक्षं नक्कीच विचलित करतील… आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझं मनातलं फडफणारं ते उत्शृंखुल प्रीतीचं पाखरू आता जास्त वेळ कैद होऊन बसणार नाही असं म्हणू लागेल… त्याला जितकं धरून ठेवता येईल तितके पहा… त्यालाही तुझ्या इतकीच प्रेमाची ओढ आहे काय हे तुला पाहायचं ना… चुपके चुपके…

माझ्या या अवस्थेचं जर इतकं बारीक सारीक गोष्टी तुला नेमकेपणानं कश्या बऱ्या ओळखता येतात.. आणि मी इथे आलीय तुला शोधतेय हे ही तू मला न पाहताच कसं काय ओळखू शकतोस… हाच प्रश्न पडलाय ना तुला…

अगं वेडे तू ज्याला शोधतेस तो मी कधीच तुझ्या हृदय मंदिरी विराजमान झालोय बरं… आणि सततची तुझ्या दिलाची धडकन मला समजतेय बरं… कारण खरं प्रेम हे असचं असतं आणि ते दिलकी नजरसे नजरोंके दिलसे ओळखता येतं…

 

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # ई. एम. आय. च्या नावानं चांगभलं… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # ई. एम. आय. च्या नावानं चांगभलं… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

महिन्याचा पगार जेव्हा खात्यात जमा झाल्याचा मोबाईल वर मेसेज येतोना… तोच एकमेव क्षण असा असतो कि ओठांवर आनंदाच्या हास्याची एक कणी फुलवून जातो… आपल्या महिन्याभर केलेल्या कष्टाचं पैश्यात झालेलं चीज बघून… चला हे ही नसे थोडके.. बचेगें तो और भी लडेंगे चा उत्साह दुणावतो… सारी दुनिया मुठ्ठीमें बांधून घेतल्याचा फिल येतो… नि सारं काही पैश्यात मोजून विकत घेऊ शकतो याचा नाही म्हटला तरी थोडासा गर्वाचा फुगा फुगतोच… तिनशे साठच्या अंशात मान अशी तोऱ्यात फिरते नि डोळे सगळ्यावर निरखून पाहू लागतात. म्हणत असतात आहे कोणी माझ्यासारखा माईचा लाल ज्याच्या कतृत्वाची असेल का अशी कमाल… ऐश्वर्य पायाशी लोळणं घेणाऱ्या राजा सारखं, धनाढ्य गर्भश्रीमंतीचा बाज असण्यासारखं… आणि आणि ब्ला ब्ला… थोडक्यात काय तर मी मी म्हणजे कोण आहे… कोण आहे मी?…

… होय मी म्हणजे कोण आहे?.. समजले काय तुम्हाला?.. काही औटघटकेचा मन का राजा आणि आणि काही क्षणात त्याचा वाजून जातो बॅंडबाजा… बॅंकपासबुकावरची ती पगाराची जमा रक्कम हळूहळू आक्रसायला लागते… एकेक ठरलेले ई. एम. आय. चे हप्ते अजगरासारखे पगारातला आपला हिस्सा गिळंकृत करायला लागतात… होमलोन, कारलोन, मुलाचं एज्युकेशन लोन, टर्म इन्सुंरन्स, सोसायटी मेंटेनन्स… अन हजार वाटांचा खर्च पहिल्याच आठवड्यात पासबुक हलकं करून सोडतो… आणि उरलेले अठ्ठावीस एकोणतीस दिवस पुन्हा मानेवर गुलामीचे जोखड घेऊन जगायला लागतं… इथं जगणं होतं ते पैश्याचं सलाईन लावून आणि मरणं येतं ते सलाईन संपतं तेव्हा… जगण्याचं स्वातंत्र्य हरवलेले आपण आपलं आयुष्यचं ई. एम. आय. च्या नावावर कायमस्वरूपी भाड्याने देत असतो… सुखाची साधनं गोळा करण्याचा आटापिटा करून ती साधनं घरात येऊन तर पडतात त्यासाठी आपण खऱ्या सुखाचा ई. एम. आय. भरला गेला असल्याने त्यात सुख लाभले नाही म्हणून मग पुन्हा दुसऱ्या गोष्टी घरात आणण्यासाठी जीवाची तडफड चालू राहते… फिरून फिरून एकच अनुभव आपल्याला मिळत असतो… पण हट्टी मन थांबायला समजून घ्यायला तयार नसतचं.. आणि एक दिवस तो उगवतोच भाड्याने दिलेल्या आयुष्याचा भाडेकरारच संपुष्टात येतो तेव्हा आहे ते सगळंच जसं आहे तसंच टाकून जाणं भाग पडतं… इ. एम. आय. तटतात, पासबुकात किरकोळ शिल्लक असते गाडी ची चावी नि घराची किल्ली टेबलावर तशीच पडलेली, काही आधीच्या बचतीतले नाहक खर्चाला रबर बॅंड लावलेले पैसे वाऱ्याने फडफडत असतात.. सारं सारं काही सुखाच्या राशी ओतणारे पण सुखाचा आभास दाखवणारे… त्याच वेळेला हिशोबाचा पसाऱ्यात एक कप चहा मात्र अर्धा प्यालेल्या स्थितीत ताटकळत असतो, कधी कप रिकामा होईल याची वाट पाहत… कारण खरं सुख समाधान त्यातच दडलेलं आहे हेच त्याला सांगायच असतं… वेळ निघून गेलेली असते… पण इ. एम. आय. अमर असतो त्याला नित्य नव्याने एकेकाचं आयुष्य भाड्याने मिळणारं असतंच असतं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ पेन्शन हिच आयुष्याची ‘एव्हरग्रीन’ नायिका!… # ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

? प्रतिमेच्या पलिकडले ?

पेन्शन हिच आयुष्याची एव्हरग्रीननायिका!… # ☆ नीलांबरी शिर्के 

जेव्हा केसांत चांदणं उतरू लागतं, गुडघ्यांच्या हालचालीत संगीताची मैफल भरते आणि चष्म्याशिवाय जग ‘धुसर’ भासू लागतं…

नेमक्या त्याच वळणावर एक निष्ठवान नायिका खंबीरपणे हात धरते.

तिचं नाव – पेन्शन‘!

अढळ निष्ठा

पगार ही केवळ तारुण्यातील एक ‘चंचल प्रेयसी’ होती, पण पेन्शन मात्र उत्तरार्धातील खरी ‘हक्काची अर्धांगिनी’ आहे.

विनाअट साथ

ना तिला नखरे ठाऊक आहेत, ना रुसवा-फुगवा. ती कधी तारीख चुकवत नाही की कधी ‘ब्रेकअप’चा विचारही करत नाही.

सुखद सोबत

संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहाच्या सोबतीने ती दर महिन्याला कानात सांगते – “घाबरू नकोस हिरो, चित्रपट संपेपर्यंत मी तुझ्या खांद्याला खांदा लावून उभी आहे!”

आयुष्याचा हा प्रवास ‘हनीमून’सारखा गोड आणि निश्चिंत ठेवणाऱ्या या लाडक्या महबूबेसाठी, दर नोव्हेंबरला आपल्याला फक्त एकाच गोष्टीची साक्ष द्यावी लागते…

“टायगर अभी जिंदा है!”

सर्व पेन्शनधारकांना समर्पित!

© नीलांबरी शिर्के

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # माझं गं ते लेकरू… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # माझं गं ते लेकरू… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आता माझ्यापासून जरा देखील तुला दूर ठेवणार नाही समजलं…

त्या शहराच्या कचऱ्याच्या कोंडाळ्यात तुला पडलेला.. पाहीला…

छे.. छे.. तुला तिथे कुणी टाकून दिला होता…

कदाचित तुझा कंटाळा आला असावा वा तुझ्यापेक्षा अधिक चांगला टेडी त्यांनी घरी आणला असणार. मग तुला अडगळीत ठेवण्यापेक्षा… तुला तिथून काढून तुझ्या रिकाम्या जागेवरच त्या नव्याला बसवले असणार… अशीच असते दुष्ट निर्दयी दुनियेची रीत बरं का माझ्या लेकरा…

मी तुला त्या कचऱ्याच्या कोंडाळ्यात उदासपणे पडलेला पाहून माझं मातेचं मन द्रवलं बघं… मला राहवलं नाही आणि तो कचरा तिथून हलवण्याच्या आधीच मी तुला तिथून उचललं… माझ्यातल्या मातृत्वाचा पान्हा वाहू लागला… तुला बघितलं हातात घेतलं आणि खरं सांगायचं तर तिथंच तुला छातीशी कवटाळून घेतलं… होय तू माझा आहेस आणि मी तुझी माय आहे… तिथं दुसरं कुणी येऊन माझ्यापासून तुला हिसकावून घेऊन नये याची मी खबरदारी घेत राहिले…

किती सुंदर आणि गुबगुबीत लेकरू माझं… हो आता ते माझ्या कुशीत आहे म्हणजे माझचं झालं नाही का..

कसं काय दगडाचं काळीज असतं एकेकाचं.. या निरागस, निष्पाप लेकराला असं उघड्यावर आणि असल्या घाणेरड्या उकिरड्यावर टाकायचं धाडस कसं होतं म्हणते मी… त्या लेकराचा काय दोष आहे बरं त्यातं…

माझ्या दृष्टीला ते पडलं म्हणून बरं झालं अन्यथा जरा जरी उशीर झाला असता तर कुत्र्या मांजरांनी, कावळ्या गिधाडांनी त्याचे लचकेच तोडले असते….

पण नियतीची लिला अजब असतेच हेच खरे… आता हेच बघाना गेली कित्येक वर्षे मला मातृत्वाची इच्छा होती… पण नियतीने माझ्या नशिबी वांझपणाचा शिक्का कायमचा कोरला असल्याने मला ते सुख कधीच मिळणारं नव्हतं… पण म्हणून काही माझ्या मध्ये असलेलं मातृहदयाची अमृतमय भावना अंत:करणात वसलेली होती तिचं काय.. तिला सारखं वाटायचं आपण असं प्रकट कधी होणार, कधी उफाळून येणार याच्या प्रतिक्षेत होती… मी इतरांच्या लेकरांवर खूप खूप माया, प्रेम भरभरून केले अगदी समरसून स्वताचं असल्यासारखे… पण शेवटी ते दुसऱ्याचं आहे उपरं आहे याच्या मर्यादा आल्या नि माझं मनं व्यथित व्हायचं.. आपली कुस उजवली नाही, वांझोटी म्हणून हेटाळणी झाली… एका स्त्रीच्या अंतकरणाच्या नि तिच्या जगण्याच्या चिंध्या चिंध्या केल्या… काही तिची म्हणणाऱ्या घरातल्या माणसांकडून नि त्या ढोंगी, मतलबी समाजाकडून… माझं अपत्यहिनाचं दुख त्यांनी समजून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही… आणि या उदासीन, नैराश्याच्या वेळी मला तू दिसलास… मला माझ्या जीवनाची नवी वाट गवसली..

मी तुला आता चांगलं पालनपोषण करीन… तुझ्यावर माझ्यात इतके दिवस दडलेला मातृत्व नि वात्सल्याचा मायेचा झऱ्यात आकंठ बुडवून ठेवेन… तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालयं बघ माझं…. तुझ्यासाठी आता कितीतरी कष्ट उचलण्याचं बळं आलयं बघ माझ्यात… आता तू आणि मी.. मी आणि तू बस्स मला आता इतर जगाची जरूरी नाही… तू मिळालास आणि माझ्या स्वप्नांची परिपूर्तता झाली….

इतरांना काय म्हणायचं ते खुशाल म्हणोत… या वेडीला खेळण्यातील निर्जीव टेडीला आपलं लेकरू समजून आपल्या मातृत्वाची हौस भागवतेय कशी बघा…

हो हो आहेच मी वेडी… एका वांझ असलेल्या स्त्री ला मातृहदय नसते असं का बरं तुम्हाला वाटत… आणि हे एक निर्जीव खेळणं आहे याची कल्पना मला नसावी इतकी ही मी वेडी नाही… पण म्हणून काही सलणारं सत्य जीवनभर कवटाळून बसण्यापेक्षा जे दिसतयं त्या समोर तरी त्यावर भरभरून आपल्या मातृत्वाचा, मायेचा वात्सल्याचा झरा असा झरझर वाहू दिला तरी या माझ्या वैराण वाळवंटी जिवनात आभासी का होईना पण आनंदाची हिरवळ नाही का फुलणार! …

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # हमारा बजाज… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # हमारा बजाज… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आमच्या लहानपणी.. म्हणजे साठी च्या दशकात… चैत्र संपता संपता आणि वैशाखाची ओपनिंग सुरू झाली की फारतर जेष्ठ अर्धा अधिका पर्यंत… मराठी महिन्याच्यां गोंधळात न पडता सरळ इंग्रजी मंथचा विचार केला तर मार्च एंड पासून ते जून हाफ पर्यंत उन्हाळ्याचा सिझन सुरू असायचा… त्यावेळी सगळे ऋतू आपल्या वेळा काटेकोरपणाने पाळत असत… इतकचं काय माणसं, संस्था आस्थापना, शाळा, महाविद्यालये, रेल्वे, बस, विमानं इ इ. देखिल आपल्या वर्षभराच्या एकदा आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार चालत असतं… वार्षिक परिक्षेचे पीर एप्रिलच्या मध्याला एकदा पाण्यात पडले कि सगळी शाळकरी मुलांचा जथ्था आपापल्या पालकांसह उन्हाळी सुट्टीसाठी म्हणून गावाकडे जायचा… शहरातील उन्हाळ्यापेक्षा गावात सौम्य आणि अधिक गारवा तसेच आंबा, काजू, फणस, जांभूळ चा मनसोक्त पाहुणचाराचा आस्वाद आनंद लुटून झाला कि मृगाची पावसाची पहिली सर पडायचा अवकाश कि सगळे आपल्या शहरात परतायचे… तेव्हा त्या दोन तीन महिन्यात इकडे सिलिंग फॅन हुप्प होऊन बसायचा… ते ए. सी. , कुलर वगैरे श्रीमंती सिंम्बाल चे फॅड अद्याप मध्यमवर्गीय कुटुंबात अवतरलेले नव्हते… आणि सिलिंग फॅन मात्र शहरात घराघरातून वर्षभर तिन त्रिकाळ घुमत असायचा… पर्यावरणाचा समतोल साधला गेल्याने उन्हाळी तापमान देखील आपला ठरलेल्या पाऱ्यापेक्षा कधी जास्त होतच नसे… तर सांगत होतो कि तेव्हा सिलिंग फॅन हि एकमेव घरटी गरज होती आणि टेबल फॅन खिशात खुळखळणाऱ्या जास्तीच्या पैशाची चैन समजली जायची… जिथे हम दो और हमारे दो चा मामला तिथे सिलिंग वरचा एकुलता एक हाॅल मधला नि बेडरूम मधला हमारा बजाज आपलं गारेगार वारं फिरवायचा… पण जिथं टिचभर जागेत मणभर माणसं असायची तेव्हा हा चैन म्हणून नावं ठेवलेला टेबल फॅन उपयोगात आणला जायचा.. प्रत्येकाच्या सोयीनुसार कोपऱ्यात फिरता वा खडा ठेवून वारं फिरवायचा… स्पीड ची बटनं चार असली तरी वारं भन्नाट देत असे… पण या टेबल फॅन चा उपयोग मात्र त्या उन्हाळ्यापुरता मर्यादित असे… त्यानंतर तो अडगळीत फळीवर (लाॅफ्टवर) त्याला गवसणी घालून ठेवला जाई तो परत पुढच्या उन्हाळ्यातच खाली उतरे… असं दोन दशके पुढची गेली आणि पुढे पुढे सगळा माहोलच बदलत गेला… त्याला काय होतयं या विचाराने बुद्धीला मांद चढले आणि माणसांची विचाराची दिशा विकृत झाली… त्याचा विपरीत परिणाम निर्सगावर झाला आणि तो देखील माणसासारखाच रंग बदलू लागला.. त्याच्या दैनंदिन वेळापत्रकाचलाच त्याने न जुमानता आपल्या मनाला स्वैर स्वातंत्र्य दिले… सगळे ऋतूंची मनमौजी सुरू झाली… कुणीही उठावं कधीही यावं आपल्याला हवं तसं वागावं.. राहावं, ओरबाडावं, नासधूस करावं नाहीतर हुलकावणी देत राहून तोंडच दाखवायचं नाही… आणि माणसालाच वेठीला धरून त्यालाच जाब विचारायचा… सर्व काही तुझ्या ताब्यात आहे याचा फुकाचा गर्व आहे ना तुला मग दाखव कि वेळेवर हवा तेव्हढा पाऊस, थंडी आणि उन्हाळा आणून… आहे का तुझा निर्सगावर अंकुश तुझा… लावतोस का शिस्त मला… तुला काय वाटलं हमारा बजाज सारखा बटणाच्या कळीवर चालू बंद करून हुकमत आमच्या वर मिळवता येईल काय… अरे तुमचा तो हमारा बजाज देखील काहीवेळा चालता चालता बंद पडतो.. मान टाकतो आणि कशी तुमची ऐन गरजेच्या वेळी काशी करून जातो… तेव्हा तुमची कशी होते चिडचिड… अगदी त्याच तालावर माझ्या या बेताल वागण्यानं देखील तुमच्याच बेजबाबदार पणाने माझ्याशी वागणूकीचा परिणाम तुम्हाला भोगायला लावण्याची किंमत मोजून घेत असतो… तुम्ही काय रे हमारा बजाज म्हणून त्या टेबल फॅन चेच गोडवे गात बसता… नि आम्हाला विसरता… ये हमने आपको करारा जवाब दिया है… तो बाजारातून जेव्हा हमारा बजाज नवा कोरा घरी घेऊन येता तेव्हा त्याच्या नवलाई पुढे सगळे घरदारनं घेरुन बसते आणि तो एकशे ऐंशीच्या कोनात फिरणारा टेबल फॅन मात्र अरे मला जरा मोकळीक द्याल तर मी हवा पसरवेन… कुणी आगाऊ कारटं त्या पात्यावर पेन्सिल, कागद धरून आवाजाची गंमत लुटत असतं.. नि माझ्या गतीला अवरोध झाल्याने मग माझी मतीच खुंटते नि कुठेतरी खरखर करणारा कानाला सहन न होणारा आवाज माझ्याकडून निघाला कि… अरे याला वापरून दहा वर्षे झाली म्हणजे याची गॅरंटी संपली आता त्याला भंगारात मोडीत घालून दूसरा नवा आणायला हवा… असं म्हणून पुन्हा तुम्ही नवा हमारा बजाजच आणता… आमच्या सारखे कैक बाजारात आले आणि गेले पण आमच्या सारखे आम्हीच कायम टिकून राहिलोय… हे तुमचं नि हमारा बजाज चं जन्मोजन्मीचं नातं असं अबाधित राहिले आहे.. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी… ठंडा ठंडा कुल कुल..

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # अखेरचा हा तुम्हा दंडवत… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # अखेरचा हा तुम्हा दंडवत… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

बघून घे रे एकदा आम्हाला आणि सांगशिल इतरांनाही बघून घ्या म्हणावं आता आजच्या घडीला आम्हाला… उद्याचा काहीही भरवंसा देता येत नाही गड्यानों… कित्येक वर्षांपासून आमची मुळंपाळं या भूमीच्या गर्भात खोल खोल रूतून भक्कमपणे रूजली गेल्यामुळे ही डेरेदार वृक्षराजी आपल्या थंडगार सावलीची शाल या आजूबाजूच्या परिसरावर पसरून बसली होती… पावसाचं पाणी नि जमिनीतली पोषणमुल्ये यावरच कोवळ्या अंकुरापासून जी जीवनाची वाटचाल सुरू केली म्हणतोस ते आजतागायत परिपक्वतेचा वटवृक्षाचा पार होईपर्यंत… सारं काही निमुटपणाने, अबोलपणाने, अचल राहून साक्षीत्वाने वर्तमान जगत नि जागता राहीलो… माझ्या अपेक्षाचं ओझं मी माझ्याच खांद्यावर वावगत राहीलो पण त्याच वेळी तुमच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षांना मात्र भरभरून फळ देत गेलो… हीच काय ती माझी निरपेक्ष नि :स्वार्थ सेवा मी म्हणजे आम्ही तुमची करत आलो… प्रतिकूल उन्हाळ्याच्या संघर्षाचे चटक्यांनी जेव्हा तुमचे तन नि मन भाजून निघायचे तेव्हा त्या तापलेल्या देहाला नि मनाला माझ्या सावलीत थंडावा लाभायचा… गार वाऱ्याची झुळूक ताजतवानं करून जाताना पुन्हा जोष भरायची… आणि पुढे तुमची वाटचाल सुरू व्हायची… तप्त झालेली ती अवतीभवतीची जमिन देखील माझ्या सहवासात असल्याने समाधानी आनंदी राहयची.. मला तेव्हढाच तीचे अल्पांशाने का होईना पण ऋण फेडल्याचा हलकेपणा वाटून जाई… पण ते ऋण कधीही न फिटणारे आहे याची मला पूर्ण कल्पना असायची… कर्तव्यपूर्तीचं समाधान लाभत असे अश्यावेळी… जीवन रहाटचक्रानूसार आमच्यातला कुणी वयोमानानुसार वाळून जरठ होत असे तेव्हा वठलेल्या खोडाला मग वाळीत टाकलेला एकाकीपणा जाणवत जाई… तर कधी निर्सगालाच दया येऊन तो मुळासकट मग उन्मळून टाकी… तेव्हा क्षणाचं वाईट तर वाटायचं पण त्यावेळी असही वाटायचं आपल्याच सावलीच्या पदराखाली वाढीस लागणारी ती लहान मोठी झाडं यांच्या पुढच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आपण जागा करून द्यायची नाही तर मग कुणी… आणि त्या नवोदितांना स्व:ताच्या बळावर कधी फुलावे, बहरावे.. परावलंबित्व असण्यापेक्षा स्वाल़ंबी असणे अधिक गरजेचे नाही का.. असा सर्वहिताचा विचार करून आपली जागा मागच्यांना रिकामी करून देऊ लागलो… पण कर्तव्यात एव्हढी म्हणून कसर सोडली नाही.. ते तहहयात निभावत गेलो… कालानुरूप सगळ्या जगाचा चेहरामोहरा बदलत गेला… तुम्ही निरकुंश सत्ता सगळ्यावर चालवत गेलात तरीही आमच्या शिवाय तुमचं जगणं शक्य नव्हतचं… या गोड भ्रमात आम्ही गाफि़ल राहिलो आणि आणि तिथेच पहिली कुर्हाड आमच्या मुळावर तुम्ही घातलीत… का तर सुखाच्या समृद्धीचा राजमार्ग निर्वेध करण्यासाठी आमची कत्तल करण्याशिवाय तुमच्यापुढे दूसरा पर्याय नव्हता… अगदी निष्ठूरपणे नि असहिष्णुतेने आमचा गळा घोटलात… पण खरं सांगू तुम्ही आम्हाला नव्हे तर तुम्ही स्वतःलाच उध्वस्त करत गेलात… जंगल, रान झाडे झुडपे नाहीशी केलीत आणि उघडा बोडका कातळ वांझ माळरान निर्माण केलात… मैलोगणती अंतर टप्यात आले खरे पण तुमच्या हृदयातील ममतेचे अंतर मात्र दूरावत गेले… उद्या आम्हाला इथून गच्छंती करण्यात येणार आहे.. तेव्हा पुन्हा काही आम्ही असे तुमच्या कुणाच्याही दृष्टीला पडणार नाही… इतकचं काय तुमच्या भावी पिढ्यांच्या स्वप्नातही आम्ही दिसणार नाही… तेव्हा बघून घे रे एकदा आम्हाला आणि सांगशिल इतरांनाही बघून घ्या म्हणावं आता आजच्या घडीला आम्हाला… उद्याचा काहीही भरवंसा देता येत नाही गड्यानों…

अखेरचा हा तुम्हाला दंडवत.. सोडोनि जातो गाव…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # युद्धाची झळ… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # युद्धाची झळ… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… हं हं हं! उगाच चोची आ वासून उघडू नका… मी जे चोचीत धरून आणलयं ते तुमच्यासाठी नाही… ती पुढच्या दिवसांची बेगमी करून ठेवायची आहे… तुम्ही आता काही लहान राहिलात नाही की घरट्यात बसवून तुम्हाला जेवायला नि खायला चोचीने भरवायला पाहिजे… जरा घरट्याबाहेर पडून बघा… स्वत:च्या पंखाच्या ताकदीचा अदमास घ्या… आकाश पंखावर तोलता येतयं का पहा… बाहेरच्या वातावरणात विचरून पहा म्हणजे तुम्हाला कळेल… कि अन्न शोधणं म्हणजे किती दिव्य असते ते… त्यात हे युध्याचे दिवस सुरू झाले आहेत… इंधन तुटवडा निर्माण झाला असल्याने माणसांचा लोंढा आता जंगलातली तशीच रस्यावरची झाडं सरपणासाठी तोडायला लागला… म्हणजे आपल्या घरट्यावरच गदा आली आहे… आधी भक्कम नि सुरक्षित निवाऱ्याची सोय बघायला हवी.. आणि त्यानंतर आपलं अन्न शोधायाला बाहेर पडणं गरजेचं आहे.. जंगलच आता ओकंबोकं झाल्यानं तिथं मिळाणाऱ्या आपल्या अन्नाची पुरी वासलात लागलीय… तिथं इतर भुकेजलेली गिधाडं, डोमकावळे तर दबा धरूनच बसलेत. आपल्यासारख्या दुर्बळ पक्षी इकडे फिरकला तर त्याचाच चट्टामट्टा कधी करतोय याकडे काकदृष्टीने टेहळणी करत बसलेत… शहरात पूर्वी रस्त्यावर राजरोसपणे उघड्यावर अन्न टाकून देत होते ते देखील आता बंद झाले आहे… काही तुरळक हाॅटेल उघडी दिसतात आणि त्यात मुंग्या च्या रांगा लागतात तश्या त्या माणसांच्या रांगा लागून त्यांचे अन्न घेताना दिसतात… एक एक शित आता तिथं फार मोलाचं ठरत असल्याने अन्न वाया घालवत नाहीत.. त्यामुळे तो ही अन्न मिळविण्याचा मार्ग आता जवळपास बंद होत आलाय… आधीच प्रदूषणामुळे हवा दूषित झालीच आहे. त्यात या युद्धाची भर पडल्याने ते दारूगोळा नि रासायनिक धूरांची भर पडल्याने जगायला आवश्यक असा प्राणवायू सुध्दा संपत आला आहे… कडक उन्हाळा तर चांगलेच भाजून काढतोय.. पाण्याचे पाणवठे कोरडे ठाक पडले असल्याने पिण्याचे पाणी पण मिळणे दुर्लभ झाले आहे… पाणी नाही, अन्न नाही, निवारा नाही… अश्या स्थितीत आपलं जगणं मुश्किल होऊन बसलयं… जिथं माणसांनाच त्यांच्या जगण्याची चिंता लागून राहिलीय तिथं ते आपल्या सारख्या छोट्या पक्ष्यांचा विचार तरी कसा बरे करतील… सहानुभूती आता नावालाही सापडत नाही… भूतदयेचं थडगंच बांधले गेलयं… बरं स्थलांतर करून प्रश्न सुटेल असे काही वाटत नाही… कारण हे साधं युद्ध दिसत नसून जागतिक युद्ध सुरू झालयं असचं वाटतयं आणि त्याची व्याप्ती ही हळूहळू दिवसागणिक अधिक विस्तार पावून अधिकाधिक युध्दाची तीव्रता वाढत जाणारी आहे… एक प्रकारे तिसरं महायुद्ध सादृश्य असं त्याचं रूप दिसू लागलयं…

तेव्हा तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी ओळखून सगळ्या जीवनावश्यक गोष्टींची बचत करत चला… जितकं बाहेरून अन्न व इतर गोष्टी आणता येतील त्या आणून त्याचा उद्यासाठी संग्रह करत चला… युध्द कधी थांबेल याची शाश्वती देता येत नाही… आणि आज मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी उद्या बाजारात मिळतीलच याची खात्री नाही… तेव्हा एक से भले दो.. दो भले तीन और तीन से भले चार कार्याला जुंपून घेऊया… तरच उद्याचं जिणं जगता येईल… अन्यथा…

आपल्या स्वार्थासाठी तिकडे माणसांनी माणसांशी युध्द सुरू केलेय… त्याची त्यात आहूती ही पडत आहेच.. पण त्या युद्धाची नाहक झळ मात्र आपल्याला सुध्दा बसल्यामुळे आपलंही जगणं धोक्यात आलं आहे… “

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # आता कोठे धावे मन… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # आता कोठे धावे मन… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

#… आता कोठे धावे मन… तुझे चरण चूकलेची आज… #

मघा पर्यंत आम्ही साथ दिली तू विकत घेतलेल्या त्या दोन वर्षापासून… किती झिजलो दिवसरात्री झाली कातड्याची कि रे चाळण… परी तुझ्या चरणांची झीज नाही होऊ दिली… आजवरी अखंडीत केला कि रे त्यांचा सांभाळ… मग आज अचानक काय झाले तुझे वदन ते हिरमुसले… नाही पटली का आमची तुला ही चरणसेवा… अश्या एकांत जागी तू आम्हाला असा तोडूनी सोडून जावा… का नाही पाहशी मागे वळूनी एकवार प्रेमाने… ती तुझी दृष्टीची आस मनी आमच्या खुळ्या आशेने अंकुरते… कोण येईल नि कधी, कसा येईल या निर्जन ठिकाणी आणि आम्हाला असे बेवारस पडलेले पाहून द्रवेल का त्याच्या अंतकरणी आपुलकीचे पाणी… अहाहा अहाहा किती सुंदर छान मुलायम कातडी जोडे.. हे या आडवाटेला कसे बरे येऊन पडले… का त्या चरणांना यांचा विसरच पडला आणि या जोड्यांना त्याचा कायमचा विरहच घडला… पाहूया येतात का मम चरणांना… बसले ठिकठाक तर नेऊ सोबत नाही तर ठेवू इथेच जसे होते तैसेच…

ते बिचारे जोडे आजही बरेच दिवस झाले आहेत त्यांच्या साईजचा चरणद्वयाच्या प्रतिक्षेत बसले आहेत… ते पाय इकडे येतील नि आपला हा वनवास संपेल… पण हळूहळू ती आशा आता मावळत गेलीय… निरर्थक आशेकडे डोळे लावून बसले खरे त्या जोड्यांना आता काळवंडलेपणाने चांगलेच घेरलेय… धुळ मातीची पुटं चढून कातडं आता निबर झालयं.. सुरकुत्यांच्या रेघाने कातड्याला भेगा पडल्यात… तळव्याला भोकं पडलीत… कसरीने भूगा पाडून देहपतन होत गेलाय… नवलाई तर कधीच उडून गेली..

आठवतात कधी तरी त्या जुन्या मोजक्या आठवणी… मालकाने दुकानातून आपल्याला खरेदी केलेला तो क्षण.. सुंदर नक्षी, मऊ मुलायम कातड्याचा आरामदायी चरणांना होणारा स्पर्श पाहून मालक वेडावून गेला आणि त्या आनंदाच्या भरात त्याने आपल्याला विकत घेऊन घराकडे गेला… एका समारंभाला जाण्यासाठी त्याने हा नवा घेतलेला जोड्यांत पाय सरकवले पण पण तो जोडा त्या पायांच्या नंबराचा नव्हताच मुळी… आंधळ्या प्रेमाची किंमत मात्र त्याला मोजावी लागली… तरीही दाबून त्याने पायात ते जोडे घालण्याचा अट्टाहास केला.. पाय आकसला नि कातड्याने पायाला चावा घेतला… दुकानी बदलून घेण्यासाठी त्याने प्रयत्न केला पण मुळच्या हवा तश्या डिझाइन मध्ये पुढचे नंबरचे जोडे नव्हते… आणि एकदा विकलेला माल कुठल्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही अथवा बदलून दिला जाणार नाही या सुचनेच्या फलकाकडे दुकानदाराने बोट काय दाखवले मालकाचे बोलणेच खुंटले.. करतो काय बिच्चारा घेऊन जावे लागले त्याला ह्या जोड्याला मग ते घरी घेऊन आला… मालकाच्या डोक्यात सुपिक आयडिया निघाली आणि अनायसे नवा जोडा बदलून मिळतात अश्या सार्वजनिक ठिकाणी जिथे जोडे बाहेर काढावे लागतात अश्या ठिकाणी मालकाने मला कैक वेळा सोडून बदल्यात दुसरे जोडे न्यायचा प्रयत्नही करून पाहीला.. पण प्रत्येक खेपेला तो डाव अयशस्वी झाला… मालकाला खूप राग आला स्वता बरोबर माझाही… पण उकिरड्यावर टाकणे त्याला जीवावर येत होते… आणि आज अचानक त्याने या निर्जन ठिकाणी सोडून आपण अनवाणीपणे जाणे पसंत केले… एकवेळ तू चरणसेवा नाही दिलीस तरी चालेल पण तूझा हा चरणचावा मात्र आधी थांबव… असं सारखं सांगून सांगून मालक थकून तो गेला पण माझ्यात काही बदल न झाला… रागाच्या भरात तडकाफडकी निर्णय त्याने घेतला आणि आता तुम्ही पाहतायना हे असं निर्जनस्थळी एकांती आम्हासी सोडून गेला…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # अरे विकास विकास… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # अरे विकास विकास… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“आवं दादा या पुलावरून हे काय धावतया म्हनायचं.. आनि तेबी जमिनीवर पाय न लावता असं अधांतरीचं कसं काय पळतया! … “

“अरे बाबानू असं का येड्यावानी इचारतायं? … ती धावती ना तिला या शहराची मेट्रो म्हनत्यात… ती अशीच तुमच्या आमच्या इतकचं काय मोठ्या इमारतीच्या डोक्यावरूनच पळत असती! … तिचा अन जमिनीचा काहीच संबंध येत नाही.. कायमच ती अशी अधांतरी पळत असती.. आताच्या दिवसात या शहराची हु दुसरी जीवनदायीनी हायं बाबानू.. समजलं! … “

… ” असं हायं का? पर अवं दादा पर सहा महिन्याच्या मागं या जागेवर जी झोपडपट्टी व्हती त्यात आम्ही चाळीस पन्नास वर्षं राहत व्हतो.. ते मराठवाड्यात दुष्काळी कामं सुरू झाली म्हणून आम्हाला संमद्याना तकडं काम मिळालं. तवा इकडं घराला कुलूप घालून आम्ही संमदी तकडं गेलो.. सहा महिनं म्हणता म्हणता एक वरीस ततच ठेवून कामं पूरं झाल्यावरच आम्हाला सोडलं… अन इथं येऊन बघतो तर ह्यो मोठा पूल बांधलेला दिसला.. ती पळणारी चकाचक रेल्वे दिसली पन आमच्या झोपड्या काय कुठं नदरलाच दिसनात… अन आमच्या आजुबाजूला राहणारे ते शेजारपाजारचे लोक बी दिसनात… पाक भुईसपाट करून खालनं दोन चार मोठ्ठं रस्तंच बांधलेलं दिसलं… किती मोटारींचा येजा चा गर्दा माप वाढलेलला दिसतूया.. “

“अरे बाबानू आता शहराचा मोठा विकास होऊन राहिलाय… ते सरकारनं स्मार्ट सिटी योजना अमंलात आणायचं ठरवलंय.. तेव्हा सगळ्यात पहिल्यांझुट गदा ही गलिच्छ झोपडपट्टीच्या जागेवर घालण्यात आलीयं… आता शहराचा विकास करताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो.. सरकारी वटहुकूम निघाला की सगळ्यांना त्याप्रमाणे वागावचं लागतं… त्येला काय इलाज नाही… आता तुमच्या झोपड्या गेल्या आहेत तर तुम्हाला दुसरीकडे जागा शोधायला हवी.. या भागातला समाजसेवका कडं जाऊन भेटा म्हणजे तो तुम्हाला मदत करील… “

“.. नगं नगं आता आम्ही कोणाला भेटाबिट्याच्या भानगडीत पडनार नाही बघा… तो काय शहराचा विकास हुनार आहे म्हनता तो तर हा असा आभाळालाच भिडायला गेल्या सारखाच डोक्याच्यावरनचं जाणारा हाय नव्हं… मगं आम्ही आमच्या झोपड्या पहिल्या होत्या तश्याच या पुलाच्या खाली प्रत्येक खांबाच्या भवतीनं बांधून राहतो.. नाही तरी त्या खांबाच्या बाजुची जमिनीचा काही आता विकास काय होणार नाही… मगं आम्हाला कोणी तिथून उठवणार पण नाही… ते म्युन्सिपालटीवालं साहेब आम्हाला चांगले वळखतात.. आन ते लै दयाळू बी हायती.. झोपडं बांधल्यावर एक डाव त्यांची गाठ घेऊन पानसुपारी केली कि लाईट पानी अन सुलभ शौचालयाची पन सोय लगेच करतात बघा… सरकारला म्हनावं काय तुझा विकासाचा ऊजेड पाडायचा तो वर आकाशापतूर नेऊन पाडनास.. आम्ही इथं भुईवर चटई पसरुन बघत राहतू… “

“अरं बाबानू या विकास करताना तुमच्या सारख्या गोरगरिबांचीच फारच अडचण होत होती… म्हणून तर तुम्हाला सरकारी कामं देतो, चांगला पैका देतो या आमिषावर ओढून च तिकडं मराठवाड्यात लांब नेलं आणि इकडं हा पूल पूर्ण होईपर्यंत तुम्हाला सोडलचं नाही… काय येतयं का लक्षात काही तुमच्या.. साप पण मेला आणि काठी पण वाचली अशी सरकारनं खेळी केली होती… हं आता तुम्हाला राहायला जागा नाही घर नाही तर तुम्ही तरी काय करणार म्हणा… या पुलाच्या खालच्या जागे शिवाय पर्याय आहे कुठे… शिवाय तुमचा तो म्युनिसिपालिटी चा साहेब आहेच कि तुमच्या मदतीला… नाहीतर त्याने त्याच्या नोकरीत न दिसणारा विकास आता नाही तर कधी करून घ्यायचा… “

“बरयं मी निघतो.. ती मेट्रो जशी धडधड करीत वरनं जाताना दिसली कि मलाही माझ्या छातीत धडधड वाढायला लागते… वयाचा परिणाम आहे बाबा… आकाशाला गवसणी घालणारा विकास बघूनच माझे डोळे दिपून गेले… आता या पुढे अधिक पाहण्याआधी ते लवकरच मिटलेले बरे… “

आणि त्या गावाहून आलेल्या गोरगरीबांनी मेट्रो पुलाच्या खाली खांबाच्या आधारे आपल्या झोपड्या उभा केल्या.. आकाशातून खाली पाहताना चकाचक श्रीमंतीचा थाट दिसत होता आणि त्याच्या सावलीत विसावलेली गरीबी मात्र घाबरून पुलाच्या खांबाला पाली सारखी चिकटून बसली होती…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares