मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… समुद्र किनाऱ्यावरील अगदी टोकाचा त्याचा बंगला…

माणसांच्या वर्दळीपासून दूर.. त्या बंगल्याचा मालक एकल कोंडा.. माणसांचीच ॲर्लजी असलेला.. अवतीभवती भयाण शांतता चौवीसतास पसरलेली… त्याला याच माहोलाची आवड निर्माण झालेली… बंगल्याच्या व्हरांड्यातून मावळतीच्या सूर्याचे क्षितिजावरून होत असलेले सीमोल्लंघन बघत बसणे… घराकडे परतणाऱ्या पक्षांच्या काळ्या रंगाचा नेकलेस बघणे… आकाशाच्या छताला किरमीजी, लाल, सोनेरी, रंगाच्या उधळपट्टीचा गुलाल सांडलेला बघणे.. भरतीच्या उसळत्या लाटांची गाज ऐकणे… आणि मागेकुठे राहिलेलं एखादं चुकार पाखरू आपल्या जीवाच्या आकांतानं चित्कारत पुढे गेलेल्या आपल्या सोबत्यांचा शोध घेत भिरभिरतं जाताना पाहणं… हा त्याचा नित्याचा कार्यक्रम… संध्याकाळ अंधाराला शरण गेली कि रातकिडेचं संगीत अविरत सुरु होई… दूरवरचे दिवे लुकलुकताना दिसायचे… अंधाराला सुरीने कापून काढल्यासारखे… त्याच्या बंगल्याच्या त्या आवारात व्हरांड्यातला एक पिवळा बल्ब उदासिनपणे प्रकाशायचा… हळूहळू अंधार दाटला जायचा तरीही तो त्या वाळूत ठेवलेल्या खूर्चीतून कधी उठायचा नाही… त्याला तसं उठावसं वाटायचं नाही.. आणि उठून तरी काय करणार होता म्हणा… त्याच्याशिवाय घरात दुसरं असं कोणीच नव्हतं… तो गावात जेव्हा राहात होता तेव्हा तिथे त्याचे सगळे होते… त्याने रिटायर्ड झाल्यावर त्याची आणि त्याच्या बायकोची एकच इच्छा राहीली होती कि रिटायर्ड लाईफ समुद्राच्या काठी बंगला बांधून तिथं राहूनच घालवायचं.. आणि तसं त्यांनी ते साध्य केलं… रिटायर्ड फंडा च्या तला पैसा आपल्याला मिळणार नाही हे पाहतातच त्याच्या मुलाने नि मुलीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला… घरं सोडायला भाग पाडलं… वृद्धाश्रमाची पायरी न चढता त्याने कुणालाही याची कुणकुण न लागता या बंगल्यात ते दोघं राहायला आले… आणि रोज संध्याकाळी दोन खुर्च्या टाकून निवांतपणे निशब्द बसून सभोवताली बघत बसू लागले… त्यांचा संवाद फारच कमी व्हायचा आणि शांततेचा अनुभव घेण्याची त्यांना सवय लागली… फक्त शांततेचा भंग तो समुद्राच्या लाटांच्या आवाजाने होई… कोणी येणं नाही कोणी जाणं नाही.. फक्त दोघचं दोघं..

… बरेच दिवस असं एकांतात निशब्द बसून कंटाळा येऊ लागला.. तसा दोघांनी काही खेळं खेळायचं ठरवलं.. बालपणातले खेळचं खेळायचे या अटीवर… आधी गाण्याच्या भेंड्या झाल्या, मग पत्ते खेळून व्हायचे, व्हाॅलीबाॅल खेळून व्हायचा आणि मग पकडापकडी खेळात थोडी पळापळीचा खेळ व्हायचा… इतकं सगळं खेळून होईपर्यंत खूप दमायला व्हायचं मग थोडावेळ दम खाऊन रात्री उशिरापर्यंत बंगल्यात परतत असत… ते पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच इथं येणं होई…

त्या दिवशी पण हे सगळे खेळ खेळून झाले होते… शेवटचा पळापळीत करताना दोघांना भान राहिलं नाही आणि ते समुद्राच्या खूप खूप आत गेले होते… ओहोटी संपून भरतीला सुरवात झाली आणि एकेक लाट येऊन त्या दोघांना आणखी आणखी आत ओढू लागली… सुरुवातीला त्या दोघांना याची खूपच मजा वाटू लागली… तसे ते दोघेही एकमेकांपासून जरा दूर अंतरावर होते… तिच्यावर राज्य आलं होतं आणि तो तिला सारखा म्हणत होता ये कि आता मला पकडून दाखवं.. ती त्याच्या दिशेने जाऊ लागली तोच ऊंच लाटेचा मोठा तडाखा बसला आणि त्यात ती दिसेनाशी झाली… त्याला वाटलं आपल्याला पकडण्यासाठी तिनं लाटेखाली स्व:ताला लपवून घेतलयं आणि ती आता आपल्याला लवकरच पकडणार… तिला चुकविण्यासाठी तो समुद्राच्या बाहेर पडू लागला… पण त्याला ही ते शक्य होत नव्हतं.. त्यात त्याला तिचा कुठे मागमूस दिसत नव्हता.. ती कुठे आणि किती जवळ आलीय याचा अंदाजही कळत नव्हता… ती दिसत नाही म्हटल्यावर त्याने तिला बऱ्याच हाका मारल्या पण प्रतिसाद काहीच आला नाही… तो सारखा तिला हाकारत होता.. त्याचा आवाज तिथल्या सुसाट वाऱ्यात मिसळून जात होता… शेवटी त्याने आजचा आपला हा खेळ पूरे झाला… आता आपण समुद्राच्या बाहेर पडूया असं म्हटलं.. सारखा तिच्या नावाचा जप करत होता पण तिचा काहीही प्रतिसाद येईना… त्याला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं… तसं त्याने त्या समुद्रात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला… त्याच्या पायाखालची वाळू भुरुभुरू घसरत चालली… उभे राहणं मुश्किल झालं.. एकेक लाट त्याला आता थोडं बाहेर आणि बरंच आत ओढत नेऊ लागली… किनाऱ्यावर अंधार, सुनसान एरिया जवळपास कोणी माणूस नाही… वाचवायला कुणाला बोलवायला तिथं कुणीच नाही… तो तिच्या नावाने सतत हाकारा करत राहिला आणि हळूहळू तो देखील समुद्राच्या पाण्यात लुप्तप्राय झाला…

दोन कलेवर दोनतीन दिवसांनी लांब लांबच्या किनाऱ्यावर आली… ओळख पटण्यासारखे त्यांच्या शरीरावर तसं काही शिल्लकच उरले नव्हते… बेपत्ता झाल्याची तक्रार तरी फुकटची कोण कशाला करणारं होतं त्यांची… विकतचं मढं घ्यायला ती पाषाण हृदयाची त्याची मुलं फिरकलीच नाहीत…

तो बंगला आजही तसाच उभा आहे आपल्या धन्याची वाट पाहत… आणि त्या वाळूत ठेवलेल्या त्या खुर्च्या ही.. त्यांना कोण हलवणार होतं… रोजच्या सारखीच संध्याकाळ तशीच येत असते… आणि.. अंधार पडल्यावर तो येतो आपल्या खुर्चीत बसतो… ती आता येईल मग येईल याची वाट पाहत… तिकडे दूरवर दिवे लुकलुकताना दिसतात… खूप वेळ तसाच बसून तो असतो… अंधार दाटत गडद होत जातो… तो निराश होतो… अजूनही त्याला तिनं पकडून आऊट केलेलं नसल्याने तिच्यावरचं राज्य तसचं असतं.. डाव अर्धा टाकून कुठे गेली ती… आता उद्यातरी तिनं आपल्याला धरावं असं मनाशी म्हणत त्या रिकाम्या खूर्चीकडे पाहत तो पुन्हा शांत झालेल्या समुद्राकडे तिचा शोध घेण्यासाठी आत आत निघून जातो…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ जोहार मायबाप जोहार… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “जोहार मायबाप जोहार…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

जोहार मायबाप जोहार… लाख माणसातले तुम्ही एक दिलदार… सण आनंदाचा दिवाळीचा घरीदारी तुमच्या सजला नटला आणि रंगला बी… तुमच्या सदनी कंदील पणत्या लखलखीत तेजाने प्रकाशल्या… तुम्ही नव्या वसनांची घडी मोडलीत.. विविध पक्वान्नांनांच्या फराळाने ताटं भरलीत.. गोडाधोडाच्या चवीने रसनाची तृप्ती झाली… तुमच्या सहीत इष्टगणगोतांचे तुष्टले तन मन ते आनंदाच्या शिडकाव्याने.. सर्व मांगल्याची लक्ष्मी माता तुमच्या सदनी येता… सारं तुमचं लखलाभ होऊ दे हे माझंही तिजला विनम्र असे विनवणं… आणि ते तुमच्या जवळ सांगायला मन माझं बी संतोषलया… मी आलोय तुमच्या दारी परी तुमच्या कडं काहीच नाही मागायला… एक मागणं आहे त्या आई लक्ष्मी पाशी.. सांगाल का माझ्यावतीनं तिजपाशी… माझ्याही चंद्र मौळी झोपडीतपण क्षणभरासाठी येऊन जाशील आता इथं आलीस तशी…. ठाऊक आहे मजला… नि तूलाही… या लेकराच्या घरला गरीबी आणि दारिद्र्याचाच अंधार भरला ठायी ठायी…. स्वाभिमानाच्या पणती मधे कष्टाच्या तेलवातीचा मंदसा एकच आशेचा प्रकाश पसरलाय… माझ्याही घरी तू यावंस अशी भोळीभाबडी आस धरूनी मनी मालकांच्या दारी मी वाटपाहतोय… जोहार मायबाप जोहार… तुमच्या कडची तिची पूजाअर्चा झाली कि सांगाल ना माझा निरोप तिजला… म्हणावं विसरून जाऊन नकोस बरं अजून एक घर वाट पाहतयं तूझ्या आगमनाची आजच्या सांजच्याला… दोन हस्तक जोडून मस्तक झुकलेय खाली तुझ्या चरणावरती टेकण्यासाठी… आनंदाचे दीप उजळलेत या दोन डोळ्यांत… सुख समाधानाचा दर्या उचंबळून राहे हृदयात… कृपा तुझी अखंड राहो आई लक्ष्मी तूझे लेकरू करतेयं दीनवाणी हीच एक मागणी..

#

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ झेपावे उत्तरेकडे… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “झेपावे उत्तरेकडे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

काळ्या नभांनी दाटून आलेल्या  डोईवरच्या आभाळाने झाकोळलेला सगळा परिसर… नुकतीच मान्सूनची सुरवात झालेली… दोन चार  मृगाच्या मोठ्या सरींनी पाणी पाजून तरतरीत आणि टवटवीत झालेली वृक्षराजी.. वैशाखातल्या वणव्याने भाजून निघालेल्या मातीवर मृगाच्या सरी पडल्या तेंव्हा तो बाहेर पडलेला मृदगंध…आपल्या अबोल प्रफ्फुलीत मनातला  ‘किती सांगु कुणाला आज आनंदी आनंद झाला ‘ ही भावना झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यासोबत गावभर पसरत गेला.. दरवर्षी चातकासारखी वाट पाहणाऱ्या  समुहाने राहणारा माणसांचा समाज चला यंदाचा पावसाळा समाधान कारक दिसतोय बरं.. पिकपाण्याचं अवंदा काही अरिष्ट यायचं नाही…अशी खोल कुठेतरी रूतलेली मरण चिंता या वर्षाला सतवाणार नाही…असे ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर  आशेचे गेंद फुलाचे डवरलेले दिसू लागले होते… बळीराजा सुखावला तर होताच भुईत पेरलेल्या बीजाला कोवळा अंकूर पालवलेला बघून त्याच्य अंगावर देखील आता पुढच्या ढोर मेहनतीकरिता मुठभर मांस चढवून सज्ज झालेलं… अन मालक तुम्ही एकलचं का बरं आम्ही बी हावं की तुमच्याबरूबर रानात खपायला असं माना डोलवत आपल्या शिंगावरील गोंडे एका लयीत डोलवत बैलं..ढोरं निघतात.. विहिरीला,नदीला आणि ओढ्याला मायंदाळ पाणी असल्यावर..सोळा आणे नसलं तरी बारा आणे पिकलेलं धान्याने आता कणगी तट्ट भरणारच… मग खुळखुळणाऱ्या पैशावर बॅंकेचं हप्तं,सावकाराचं कर्जावरचं व्याज, दिवाळसणाला घरच्यांना नवंकोरी धडुती, लुगडी… बरीच वर्षे बायकोच्या मनात रुतून बसलेला ठुशीचा डाग.. आणि आणि जमलं तर पहिल्या पोरीच्या लग्नाचा उडवून द्यावा बार.. म्हणजे  हा डोक्यावरचा भार सगळा एकदम उतरला गेल्यावर थोडसं जीवाला हायसं होईल…दसरा बी गोड अन पाडवा बी…आता यंदा काही माघाची वारी चुकवयायची नाही म्हणजे नाहीच…

हे आशेचं इंद्रधनुष्य मना मनाला भुरळ घालत राहू लागलं….साकार न झालेल्या स्वप्नांची सप्तरंगी चित्र डोळ्यासमोर नाचू लागतात… कल्पनेची उड्डाणं क्षितिजाला भिडताना दिसतात… दंग असतानाच अचानक लहरी निर्सग सुरुंग लावतो आणि आणि सगळी पाहिलेली सगळी स्वप्नं भंग करून जातो… काळे कुट्ट जमलेले ढग आपलं कपाळ पांढरं झालेलं दाखवतात.. तो इंद्रधनुष्याचा पट्टा आक्रसत आक्रसत जाऊन पाहता पाहता लुप्त होतो…. पावसाचा पत्ताच हरवतो… टळटळीत सूर्य तळपळत राहतो आणि काळ्या मातीला भेगाळून टाकतो… पाण्याची ओल  आता  फक्त ज्याच्या त्याच्या डोळ्यात दिसते… तेव्हढचं पाणी शिल्लक राहतं… गावा गावाचा फुफाटा होऊ लागतो हळूहळू मसणवाटा्याची कळा येऊ लागते.. राजकर्त्याचा आश्वासनांचा निवडूंग उजाड नि बोडक्या माळरानावर  दगडांच्या कपारीत तोंड लपवून दडलेला असतो…  गोठ्यातली दावणं बाजारात विकली गेलेली  गुरांची माघारी परत येण्याच्या आशेने डोळे लावून बसतात…. चुलीतला कोरडा जाळ पोटातील भुकेचा वडवानल चेतवत राहतो..घरात खाणारी तोंड भुकेने तडफडतात आणि घरच्या धन्याच्या हृदयाला पीळ पाडत राहतात…घरचा धनी मात्र घराच्या अंगणात उभा राहून वर आभाळाकडे डोळे किलकिले करत अंदाज घेत राहतो.. कुठे एखादे आशेचं इंद्रधनुष्य नजरेला पडतयं का पाहतो… तोच एखादी आभासी सप्तरंगी शलाका त्याला खुणावून सांगते… झेपावे उत्तरेकडे..

#

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ सेल सेल चा व्हायरल फिव्हर… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “सेल सेल चा व्हायरल फिव्हर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… “डॉक्टर काका या वर्षाचा पाऊस थांबला, तसा गेले दहा पंधरा दिवस हिला बरंच वाटत नाहीए! … सारखी या बेडवर झोपूनच असते.. काही खाणं नाही कि पिणं नाही! .. सारखं सारखं अस्वस्थ वाटतयं! कश्यातही मन रमत नाही! उत्साह वाटत नाही! मरगळल्यागत वाटतयं! शून्यात कुठंतरी नजर लावून हेच मला वारंवार सांगत असते… तरी बरं ही कुठं नोकरीबिकरी करत नाही ते! .. पण माझ्या मात्र हिच्या या आजारपणामुळे एक एक करून सगळ्या सिक लिव्ह कधीच संपून गेल्या की… त्यात माझ्या बाॅसने मला तंबी दिलीय पुढचा रजेचा अर्ज न पाठवता राजीनामा पत्र पाठवून द्या.. नाहीतरी कंपनीला अश्या दांडीबहाद्दरांची आवश्यकताच नाही समजलं… मला तर काहीच समजना झालयं! … असं झालंय तरी काय हिला? .. बरं आपल्या पहिल्या व्हिजीटला सांगितल्याप्रमाणे तिच्या आवश्यक त्या सगळ्या चाचण्या वगैरे करून घेतल्या.. त्याचाही एकंदरीत सगळे रिपोर्टपण नाॅर्मल आले… तरीही आजाराचं निदान लागेना म्हणजे कमालच झाली म्हणायची! … डॉक्टर काका आता तुम्हीच सांगा बरं मी काय करू ते? हि अशी आजारी पडल्यामुळे घरभर उदासीनता पसरलीय.. माझंही कशाकशात लक्ष लागेनासं झालयं… आणि कधी कधी मीच आजारी पडलोय काय असंच वाटंतय! … आतातर शारदीय नवरात्र, दसरा- दिवाळी सारखे सणासुदीचे दिवस जवळ येतायेत.. मला माझ्या ऑफीसमधून सुट्टी मिळणं तर आता शक्यच नाही.. म्हणून तर माझे आईबाबा, ताई नि दादा वहिनी गावाहून इकडे येताहेत आणि या गावातलीच इथली तिच्या घरची मंडळीही एक एकदा येऊन भेटायला येणार आहेत आम्हाला.. आणि त्यात हिची ही अशी नरमगरम तब्येत राहीली तर कसं होणार… आईबाबांना आयत्या वेळी तुम्ही येण्याचं रद्द करावं सांगावं तर तिकिट रद्द करण्याचा नाहक भुर्दंड पडेल… बरं हिलाच हवापालट करण्यासाठी तिकडे पाठवून द्यायचं म्हटलं तरी या स्थितीत तिला प्रवासाची दगदग झेपणार नाही आणि आजार अजून जास्त बळावेल याची जास्त शक्यता संभवते असाच सल्ला तुम्ही मला दिलात… डाॅक्टर काका तुम्ही आमचे फक्त जुने फॅमिली डॉक्टर नव्हे तर तुमचा आमचा तितकाच जुना नि जिव्हाळ्याचाही घरोब्याचा संबंध आहे… तेव्हा काका मला नेमकं काय केलं पाहिजे ते सांगा म्हणजे हिचा आजार जाऊन पहिल्या सारखी खडखडीत बरी होऊन घरात वावरू लागली म्हणजे घराचं आनंदवन होईल…. सांगा काका सांगा! .. आता अधिक विलंब लावू नका! … माझा जीव कसा टांगणीला लागलाय तुम्हाला दिसतोय ना? तुमचं असं हे चिंतायुक्त तिच्या कडे मौन होऊन पाहणं मला अधिकच काळजी लागून गेल्यासारखं आहे… तेव्हा बोला काका! बोला काका! … “

“अरे अविनाश! का बरं असा पॅनिक होतोस? … काहीही काळजी करण्यासारखं अलकाला झालेलं नाही… पावसाळा संपता संपता आणि हे सणासुदीचे दिवस ऐन तोंडावर आले की हा व्हायरल जिकडे तिकडे पसरतोच पसरतो आणि मुख्य म्हणजे त्याची लागण हि फक्त घरच्या स्त्रियांना होते… असा हा स्त्री आजार आहे… मी इतकी वर्षे डॉक्टरकी करतोय आणि सुदैवाने माझ्या वैद्यकीय सेवेला चांगली लोकमान्यताही मिळालेली आहे हे तर तू जाणतोसच अरे मीच काय पण आमच्या वैद्यकीय व्यवसायातले भले भले डॉक्टर सुध्दा या सिझनल नि सिलेक्टेड पर्सनलाच लागण करणाऱ्या व्हायरल सिंड्रोमवर औषधोपचार करू शकलो नाही… हे आमचं अपयश आहे असं हवं तर तू म्हणू शकतोस… पण आम्ही त्यावर इतकं संशोधन केलयं आणि त्यावरून हा स्त्रियांना त्या विशिष्ट काळातच का बरं आणि कसा बरं संसर्ग होत असणार हे शोधून काढले आहे… कुठल्याही स्त्रीवर्गाला तिच्या नैसर्गिक स्वभावधर्मानुसार बाजारहाट करण्याचा मुलभूत जन्मजात(वाईट्ट) गुण असतो. त्यानुसार ती जेव्हा जेव्हा म्हणून या बाजारात येनकेन कारणाने जात असते तेव्हा सराफाच्या दुकानावरून, साडी, ड्रेसेच्या शोरूम वरून, मोठ्या माॅलमधून आणि टूकार सेल सेलच्या मेळ्यावरून तर कधी आत फिरून त्यांचे जाणे हे होते आणि मग तिथल्या त्या प्रचंड अवाढव्य गर्दीमुळे हा संसर्ग तिथे त्यांना होतो… त्याची कळत नकळत झालेली बाधा इतकी जालीम असते कि सगळ्यात प्रथम त्यांच्या मनावर तर याचाच पगडा बसतो… ध्यानीमनी त्याचं चित्त तिथं गुंतले गेयलयं हे त्यांच्याही लक्षात येत नाही.. मग त्या अशा विमनस्क होऊन वागत जातात… बरं हि लागण आणि त्याचे पिडीत स्त्री वर्ग हा काही ठराविक असत नाही तो सगळ्या घराघरात पोहचलेला असतो… अगदी मी डॉक्टर असून माझ्याघरी सुद्धा हि लागण झालेली आहे.. माझ्याबायको बरोबर माझी आई, दोन्ही मुलींना देखील हा संसर्ग झालेला आहे बरं… हे तू लक्षात घे… या आजारावर आमचं वैद्यकीय औषधाची मात्रा कुचकामी ठरली आहे… आणि त्यासाठी फक्त त्यांनी बाजारात कुठल्या दुकानावरून वा दुकानातून, सेल मधून, माॅलमधून हा संसर्ग आणला आहे त्याचा शोध घेणे हे महत्त्वाचे आणि त्याप्रमाणे त्यांच्या समाधानाची परिपूर्तता तेथूनच करून घेण्यातच हा झालेल्या संसर्गाची बाधा नाहीशी होते.. तेव्हाच तो ते आजारी माणूस खडखडीत बरा होतं.. आपल्या खिश्याला भला मोठा भसका पडतो त्यावेळी, पण त्यांना मिळालेल्या विजयाचा आनंदापुढे त्याची चिंता आपण करायची नाही… आणि समजा हा उपायच जर अमलात आणायचा नाही असं जरं का वेडंवाकडं तुझ्या मनात येत असेल तर तर… घराचं रणकंदनच झालं म्हणून समजं… तेव्हा अविनाश अलकाला माझ्या औषधाची गरज नाही… तिला झालेला हा सेल सेल चा व्हायरल फिव्हर आहे… तूला मी यावरचा उपाय सांगितला आहेच… मग बघ तुझा दसरा दिवाळीसण कसा जोमात नि आनंदात जाईल तो… तर मी आता निघतो कारण माझ्या घरची मंडळी माझी वाट बघत असतीलच… किती वेळ गेलेत पेशंटला बघायला.. यांना आपल्या स्वताच्या घरचं भानं ही नसतं आपल्या ही घरी आपली बायको मुली नि आई आजारी आहेत त्यांच्या तब्येतीकडेपण पाहायचं असते ते.. असा माझा नामघोष चालला असणार… काय करणार अविनाश आपण बिचारी पुरूष मंडळी पडलोना! .. सगळ्यांना पुरून उरणारे. असलो तरीही.. फक्त या सेल सेल चा व्हायरल फिव्हरला आपल्याला शरण गेल्याशिवाय पर्याय तेव्हढा नाही समजलं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ मा फलेषु कदाचन… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “मा फलेषु कदाचन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

असं कसं म्हणू शकतोस तू मला! ..

ये तूला ना मी ओळखंत नाहीऐ.. जा फूट..

तू कुणाचा तरी राग माझ्यावर का काढतोयेस? ..

अरे मी कोण तू कोण? .. हे जरा आठवून पहाना..

युगा युगांची.. नव्हे नव्हे कल्पांतांची ओळख आहे आपली…

तुझ्यासारखा मी चल नाही रे! ..

उष:कालाला पूर्वेला उगवून येतोस आणि मावळतीला जातोस!

मीच ठेवत असतो दिवसभर तूझ्यावर लक्षं… आणि जसजसा दिवस भरभर सरकत जातो, तेव्हा तुझा विनाकारण रागाचा पारा चढत्या भाजणी प्रमाणे वाढत जातो… मला कळतं तेव्हा तुझ्या मनासारखी एकही गोष्ट इथे घडत नसते, आणि नाही नाही तेच तूला तुझ्या उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं! … तुला सांगायचं असतं त्यांना कि, ‘बाबानू रे नका करू आपल्या क्षणभंगुर जीवनाची अशी अविचाराने माती! .. किती म्हणून कराल स्वार्थासाठी विघातक कृत्यांच्या राशी! .. अरे हा मानव जन्म तुम्हाला मिळायला हे केव्हढं मोठ्ठं भाग्य लाभलयं तुम्हाला… जीवाचा मोक्षाचं दार उघडण्याची हीच शेवटची संधी मिळालीय तुम्हाला. मग त्याचं सोनं करण्या ऐवजी अशी माती का करताहात? … हेच तुला पदोपदी त्यांना सांगायच असतं पण ते सांगण्यासाठी तुझ्याकडे शब्दाचं सामर्थ्य कुठं असतयं? … मग डोळे खदिरांगारासारखे आग आग ओकत राहतात.. त्यांच्या जीवाची लाही लाही करून सोडतोस.. पण खरं सांगू इथल्या मानवाला शब्दानं सांगून देखील जिथं कळतं नाही, किंवा कळलंअसून आपल्या स्वार्थापोटी त्याला वळवून घ्यायचचं नसतं, त्याला तुझ्या या कृतीतला अर्थ कसा कळणार? … पण असतोही बरं त्यात लाखात एक विलक्षण बुद्धिमतेचा एक मेंदू! तो सांगत सुटतो आपल्या जातभाईनां अरे वेड्यांनो वेळीच जागे व्हा हि आहे ग्लोबल वार्मिंगची धोक्याची घंटा… वातावरणाला जपायला हवं.. त्याचं नीट संवर्धन करायला हवं.. तर आणि तरच आपला पुढचा येणारा मानववंश टिकेल… पण त्याच्याकडे कुणी ढुंकूनही बघत नाही… एक मानसिक संतुलन हरवलेला वेडा म्हणून त्याला ओळखतात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात त्याला ढकलून देतात.. आलाय मोठ्ठा ज्ञान सांगणारा, आम्हाला अक्कल शिकवणारा.. वातावरण वाचवा… आमचा काहीही संबंध त्याच्याशी नसताना… आणि आम्ही तरी कुठे एव्हढे मोठे आहोत.. आहेत त्या पंच महाभूतांच्यापासून बनलेलो एक घटक तर आहोत… मग त्या निर्मात्यानेच आमच्या प्रमाणे त्या वातावरणाची काळजी घ्यावी… आधीच आमच्या आयुष्याला काळजीने काय कमी घेरलयं, त्या एकेक कमी करत करत सगळं आयुष्य संपून जातं तरी काळजी संपत नाही.. मग आणखी कुठली जादाची काळजी उरावर लादून घ्या… तुला हे काय सांगतोय, तुला तर रोजचाच अनुभव येतोय ना माझ्यासारखा… पण तूझ्या त्या दिवसभराच्या प्रयत्नाला काही यश येतं नाही हे पाहून मावळतीला तर तू रागाने तांबडा लाल होतोस.. चिडचिड होतेय तुझ्या मनाची आता तुमचं तोंड देखील पाहू नये कधी असं मनाशी ठरवतोस आणि शेवटी शिक्षा म्हणून त्यांना अंधाराचा बागुलबुवा त्यांच्यावर सोडून जातोस… उद्याच्या भविष्याची गोड सुंदर स्वप्नं तुझ्या त्या हूशार सेरसेनापती चंद्र आणि चांदण्यांना माणसांना भूरळ घालण्यास सांगतोस.. हा एक तुझा छुपा प्रयत्न असतो… विघातक विचारांपासून विधायक विचाराकडे वळविण्याचा… पण माणसं कसली त्या भ्रामक कवि कल्पनेच्या स्वप्नाला भुलत नाही.. त्यांना प्रतिक्षा असते उद्या उगवणारी सोनेरी सकाळाची… आणि मग कालच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याची पुर्णता करण्याची.. मागच्या पानावरून पुढच्या पानावर तेच ते आणि तसंच्या तसं चालू ठेवण्याची… गांधारीच्या पट्टी सारखी स्वार्थाची झापडं डोळ्यावर ओढून घेतलेली असतात… आणि बाकी सगळे तन मन त्याला गुलामसारखं जुंपलेलं असतं.. तारतम्य, साधकबाधक, हित अहिताचे अणू रेणू कस्पटासारखे वाऱ्यावर ऊधळले जातात… संध्याकाळी रागावून गेलेला तू उद्या सकाळी पुन्हा उगवूच नये असा निर्णय घेतोस… पण पहाटेचं उषास्तवन तुला तुझं कर्तव्याची जाणीव देतं… कर्मण्ये….. मा फलेषु कदाचन… गीतेचं अमृत वचन तुला सेवन करायला लावतं… आपला कर्ममार्ग कुठल्याही परिस्थितीत सोडू नकोस… ते तुझं विधिलिखित आहे ते तुला टाळता येणार नाही.. असं समजावून परत सकाळी तू उदईक येतोस… सगळी सृष्टी, चराचर तुझ्या प्रतिक्षेत असतं… आणि तू निदान आजतरी एखादी गोष्ट माझ्यामनासारखी होईल आणि मी संध्याकाळी हसत हसत निरोप घेईन अशी अंधुकशा आशेचा उमला अंकुर मनी घेऊन अवतरतोस…. आणि आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्नचा अनुभव घेऊनच ऊदास निराश मनाने परत जातोस…

मी एक तुझा बालमित्र असल्याने या सगळ्या गोष्टी मला समजतात… पण मला भौतिक मर्यादा असल्याने इथून हलता येत नाही तुला मदत करता येत नाही… इतकचं काय तुझ्यासारखचं मलाही त्यांना शब्दाने या भावना कळवता येत नाहीत… मग मी ही जमेल तसं माझ्या सामर्थाचा वापर करत भरती ओहोटीच्या अक्राळविक्राळ लाटांच्या तडाख्याने सांगू पाहतो… तर काही जमेल ते पोटात ओढूनही घेत असतो… तरीही त्यांना काहीही अर्थबोध होतच नाही… उलट मला त्यांनी त्यांच्या टाकाऊ वस्तूंचं गोडाऊनच केलयं… एकेकाळी माझं मंथन केलं होतं त्यावेळी माझ्या पोटी दडलेली चौदा रत्ने बाहेर काढली आणि तिथून पुढे तर रोजचं माझ्या तळागाळात जाऊन उत्खनन करून, जाळं टाकून माझ्याकडे असली नसलेली दौलत मात्र लुबाडून घेतात… किती म्हणून त्यांचे अपराध पोटात घालावेत… पर्यावरणाचा र्हास कसा केला जातो याचा जीता जागता साक्षीदार आहे मी… मावळतीच्या उतरणीच्या उन्हाला माणसं येतात थंड हवा खाण्यासाठी या किनाऱ्यावर… पण त्यांना माझा कोलाहल कुठे कळतो… ते शोधत असतात अंधारातला एकांत मनाची घटकाभर रूंजी करण्यासाठी… विसावा हवा असतो त्यांना त्यांच्या थकल्या भागल्या तनाला नि मनाला… पण त्यावेळेला त्यांना तुझ्या काय नि माझ्या काय मनातल्या चिलबिचलते कडे लक्ष द्यायला वेळ कुठे असतो… मगं आपल्या मनाला होणारा त्रास तु माझ्या जवळ नि मी तुझ्या जवळ बोलणारं कि नाही… दुसरं कोणं असणार आहे आपलं हे दुख ऐकायला…. मला कल्पना आहे सगळ्याचाच होतो काही वेळेला भयंकर त्रास… मन उद्विग्न होऊन जातं… आपणं सोडून आपलं कुणीच नाही असं वाटून जातं… तोडून टाकावेत जे असतील नसतील पाश सगळे.. सोडून द्यावं सगळं आणि जावं कुठंतरी दूर दूर क्षितिजाच्या पल्याड… एकटचं एकांतात… पण मित्रा हे रागावणं चिडणं… असतं ना त्याचं आपल्याला स्वातंत्र्य नाही… त्या जगतनियंत्यानं आपल्याला अक्षय दोरीने बांधून ठेवलयं.. तू आणि मी अक्षर आहोत आणि ती बाकी मंडळी मात्र क्षर आहेत…

म्हणून मी संतापलो, खवळलो तरी शेवटी रागही पोटात गिळतो… नाईलाज होतो…

मला आजं तू असं

ये तूला ना मी ओळखंत नाहीऐ.. जा फूट.. म्हटलसं त्याचं काहीही वाटलं नाही याचं कारण हेच आहे बरं…

…. मा फलेषु कदाचन…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ उजेडी राहिले उजेड होऊन… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “उजेडी राहिले उजेड होऊन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“दिवसभर काबाडकष्ट करत घाम गाळून चार पैसे घरी आणतो ते कुणासाठी? सगळ्या हौस मौजा पुरी कुणाच्या करतो? जे जे ज्या ज्या वेळी मागशील ते ते की रे तुला देत गेलो… अगदी आपली ऐपत नसताना सुद्धा… हाडाची काडं करताना, रक्ताचं पाणी करून राबराबताना न थकता, कंटाळा न करता एव्हढे कष्ट कोणासाठी मी उचलतो? … तू माझ्याकडून हजार अपेक्षांचं ओझं सारखं आपलं लादतच राहत असतोस… आणि यात माझी साधी माफक तुझ्याकडून एकच अपेक्षा असते की तू चांगला शिकावासं… चांगल्या गुणानीं दरवर्षी उतीर्ण होऊन डॉक्टर किंवा इंजिनिअर तुला जे आवडत असेल त्यातील पदविका.. घ्यावीस. सुदैवाने साथ चांगली दिलीच तर परदेशात जाऊन पुढचं ही मास्टर डिग्री मिळवावी.. हि अपेक्षा तुझ्याकडून करताना मला कितीही त्रास झेलण्याची मी सगळ्या प्रकारे तयारी ठेवली आहे हे तुला पूर्णपणे ठाऊक असताना, हा तुझा आजचा दहावीच्या निकालाची गुणपत्रिका पाहून माझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी पाडलसं! आजवर तुझ्यासाठी घेतलेल्या कष्टं मातीमोल केलेस! कश्यातही कधीही काही कमी न करता तुझे सारे चोचले की रे पुरवले… एकवेळ अर्धपोटी चा पोटाला चिमटा घेऊन आणि मनाला आशादायी सुवर्ण स्वप्नांची झळाळी दाखवत राहिलो.. तर त्याच झळाळीच्या चटक्याने चांगलेच भाजून काढलेस… का तू गांभिर्याने अभ्यास केला नाहीस… आणि आज हा निकाल मला दाखवताना तुला थोडी तरी लाज वाटायला हवी होती… अगदी इंडियन क्रिकेट फलंदाज धावा काढत असतात तितकेच मार्क्स तुला मिळावेत… एकूण टक्केवारी 38… सगळ्या विषयाला स्पेशल क्लास लावून सुद्धा… ” इति मी आमचे एकुलतेएक कुलदिपकांवर त्यांनी दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत जे दिवे लावले त्यावर घरात पसरलेल्या नैराश्याच्या अंधारात आगपाखड करत होतो.. आणि कुलदिपकांवर त्याचा काहीएक परिणाम झाला नव्हता. ते मख्खपणे आलिया भोगासी असावे सादर या पवित्र्यात खाली मान घालून उभे… दिवटा काहीच बोलत नाही हे पाहून त्यांच्या जन्मदात्री मातेने आमच्या लढाईत उडी घेऊन माझ्यावरच शाब्दिक आणि कायिक चढाई करू लागली… प्रतिपक्षाचा हा अनपेक्षित हल्ला मला सपशेल शरणागती घेण्यासाठी भाग पाडणार अशी स्थिती झाली होती.. हा सूर्य आणि हा जयद्रथच्या थाटात त्या जगनमाउलीने मला दमात सांगितले.. “अहो ती गुणपत्रिका कुणाच्या नावाची आहे ते बघा तरी आधी.. ती तुमचीच स्वताची दहावीची गुणपत्रिका आहे समजलं… आपणच लावलेले ते दिवे आहेत.. माझ्या लाडक्या सोनूने तर मेरीट मधे पास झाला आहे… अरे मग ती आधी का नाही दाखवयाची.. कारण नसताना मी उगाच चिडलो नसतो… मला वाटलं आपले कुलदिपक चौविस तास वह्या पुस्तकातून मोबाईल लपवून सारखं काहीतरी बघत बसत होते.. परिक्षेचं, बोर्डाचं आपल्या पुढच्या करियरचं कशा कशाचं त्यांना गांभिर्य उरलचं नाही तर मग हाती हाच निकाल अपेक्षित असणार.. यात माझं काही चूक नव्हतंच… म्हणून मी हा डांगोरा पिटत राहिलो.. “

“हो का कुठल्या बाबा आदमच्या काळातले बाबा तुम्ही… आमच्या वेळेला पुस्तकातून इतका प्रकाश निघत नव्हता… पण तेच आताच्या पिढीला सगळं ऑनलाईन शिकवलं जातं, शिकवण्या घेतल्या जातात.. टेस्ट होतात… मग त्यासाठी मोबाईल, टॅब शिवाय कसं बरं हे शक्य होणार… तुम्ही आपले पंतोजींच्या स्टाईलने जाणारी माणसं नव्या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्यासाठी सुदधा होऊ शकतो हे कधीच पटवून घेणार नाहीत… तुम्हाला जुनं ते सोनं आणि नवं ते पितळ हेच ठाऊक पण आता नवं ते टाकाऊ तर नसतचं तर ते टिकाऊ देखिल असतं… सोन्या चांदीपेक्षा जास्त महाग नि दुर्मिळ असा प्लॅटिनम धातू आहे तो… “

“तुम्ही उगाच माझ्या लेकरावर डाफरलात… बिचारे ते एव्हढा आनंदात होता त्याचा तुम्ही हिरेमोड केलात… कधीतरी हे ही तुमच्या लक्षात यायला हवं होतं.. कि… आपला दहावीचा निकाल नाही तो नाही पण मुलाचा निकाल पाहून तरी म्हणावं.. मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड…. उजेडी राहिले उजेड होउन.. “

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ स्कायलॅब… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “स्कायलॅब…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आणि तुमच्या पुढच्या वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा… शलाकाला ती मेलची शेवटची लाईन वाचताना काळजात कालवल्यासारखं झालं… कंपनीचा वाढत्या तोट्याची उपाययोजना म्हणून काही कर्मचाऱ्यांना आज कंपनीने नारळ दिला होता… त्यांचा आजवरचा सगळा देय असलेला आर्थिक हिशोबही तितक्याच वेगात भागवूनही टाकला होता… आता संध्याकाळचे पाच वाजेपर्यंत थांबला नाही, तरीही काही हरकत नाही अशी सवलतही दिली होती… आजवर दिलेल्या सेवेबद्दल कंपनी आभार व्यक्त करतेय… बाकी युवर कंपनी एम. डी. एक लफ्फेदार काळ्या अक्षरातली सही… थोडक्यात तुमचं भविष्य बिघवडून टाकणारा हा पोटाचा नियंता.. लहरी विक्षिप्त. त्याच्या समाधानासाठी जीवाचे असेल नसेल तितके रक्त सांडलेलं काही वर्षे.. तरी त्याच्या मनाची हाव काही संपयाचीच नाही. रोज नवे नवे टार्गेट देऊन सकाळपासून ते रात्री पर्यंत जीवतोड पळायला लावून उसाच्या रसाच्या चक्रातून चोथा निघेपर्यंत पिळून काढून घेतल्यावरही, ‘अरे यार तुम कुछ काम के बंदे नही लगते हो ‘असा असमाधानी आत्मा. आणि एक दिवस अचानक ध्यानीमनी काही नसताना… आणि गंमत म्हणजे आजच एप्रिलच्या एंडला कर्मचारीचंं ॲप्रेझल.. रेटींग डिक्लेअर करून.. कुणाला प्रमोशन वुईथ पगारवाढ, तर कुणाला नुसतीच पगारवाढ, बोनसं, इन्सेटिव्ह वगैरे वगैरे चे मेल मिळालेले असल्याने कंपनी च्या सगळ्या सेक्शन मधे जल्लोषचा माहोल पसरलेला… पार्टी तर जरूर होना है यार.. आपापसातल्या सहाकाऱ्यांचां अशी मागणीचा जोराचा आवाज दुमदुमत होता… सगळीकडे वातावरण उत्साही होतं आणि आणि शलाका एकटीच आपला चेहरा पाडून तो आलेला मेल वाचत बसली… मन खूप विषण्ण झालं… तिच्या त्या ऑफिसमधले बाकीच्या सहकाऱ्यांना त्यांच्या या आनंदा पुढे शलाकाकडे बघायला वेळच नव्हता… कदाचित तिला फोर्थ रेंटींग मिळालं असेल आणि त्यामुळे यावर्षी नो पगारवाढ आणि रेड अलर्ट सिग्नल दिला असणार.. या समजुतीत ते सगळे होते… कंपनीच्या त्या फ्लोअर वरील फक्त शलाकालाच एकटीला हा मेल आला असल्याने… बाकी कुणालाच त्याची काहीच कल्पना नव्हती… गंभीर चेहऱ्याने शलाका आपल्या लॅपटॉपवर आलेल्या मेल कडे पाहत बसली… चिंतेचं जाळं हळूहळू तिच्या भोवती लपेटून जाऊ लागलं होतं… आणि आता डोळ्यासमोर तिला तिचं घरं, चार वर्षाचा आर्यन तिचा मुलगा, पक्षाघाताने आजारी सासू आणि आणि एकाही ठिकाणी न टिकणारा… सतत नव्या नव्या नोकरीच्या शोधात असलेला पण हतबल झालेला तिचा नवरा शिरीष… सगळेच तिच्या कडे आशाळभूत नजरेने पाहातयेत असं वाटत राहिलं… पुढचा प्रवास अनिश्चित, अंधकारमय दिसत होता… बॅंक लोनचे हप्ते, महिन्याचा किराणसामान देणारा वाणी, दूध, पेपर वाले, सोसायटी मेंनटेनस, आर्यनची पोलिओ ट्रिटमेंट, सासूबाईंचा अल्ट्रासाउंड इफेक्टची आठवड्यातील तीन सिटींग… आणि आणि नोकरीचं कुठंच सेंटीग अद्याप न जमल्यानं शिरीषचा वाढता प्रवास खर्च… मोलकरणीचां पगार… या सगळ्या घेणेकऱ्यांचे हात लांब लांब पसरत शलाकाच्या गळ्याभोवती वेढे घालू लागलेले तिला जाणवले… शलाका मनाने खूपच खचून गेली… नवी असाईंन्मेंट इतक्या लवकर मिळणं मुश्किल होतं.. त्यात कंपनीने काढून टाकलयं म्हणजे अप्रत्यक्षरीत्या आपण जाॅबला अनफिट आहोत याचचं शिक्कामोर्तब केल्यासारखे ते रिलिव्हिंग लेटर तिच्या तनामनावर चरचरा ओरखडे काढत राहिलं… मागच्या वर्षापर्यंत एक दोन रेंटिंग मिळालेलं असुन सुद्धा आपल्याला कंपनीनं नारळ दिला… आणि तो डिसुझा, रमण भाटीया, सुधाकर सावंत सारखे कायमच अनसंग असणारे गाईज मात्र कंपनीने रिटेन करून ठेवावेत… मगं आपण कशात कमी पडलो… बाॅसची हांजी हांजी करणं आपल्याला कधीच जमलं नाही.. ना कधी कुठल्याही पार्टीला, पिकनिकला ना आऊटडोअर साईटला त्याच्या सोबत गेलो नाही.. म्हणून कदाचित त्याने हा ठरवूनच डाव खेळला असणार… कदाचित मी आता लगेचच त्याच्या केबिनमध्ये जाऊन रडत भेकत आपल्याला घरच्या परिस्थितीची कल्पना देऊन एक वेळ त्याने आपल्यावर दया दाखवावी अशी त्याची कल्पना असणार बहुतेक… म्हणून तर केबिनमध्ये बसून सारखं ग्लास विंडोज लूक आऊट चाललयं त्याचं…. ही मासोळी गळाला लागायलाच हवी यासाठी त्यानं केव्हढं मोठं जाळं टाकून बसलाय.. आमिषाचे तुकडे टाकून बधत नाही म्हटल्यावर पाण्यातूनच कायमची बाहेर काढून फेकून देताना आपली पाॅवर किती स्ट्राॅंग आहे हेच दाखवयाचं होतं त्याला… पण शलाका काही कच्च्या गुरुची शिष्यां नव्हतीच मुळी.. तिनं त्या मेलला रिप्लाय देताना. गुडबाय इतकेच म्हटले.. आपला डेस्कटॉप मधील आपली सगळी महत्वाची माहिती तिनं डिलीट करायला विसरली नाही.. डेस्कटॉप शटडाऊन केला.. ड्रावर रिकामे केले.. कुठल्याही आमिषाला बळी पडणारं इतकं तकलादू सौंदर्य तिचं तर नक्कीच नव्हतं… ऑफीसच्या कामाचे काही इथिक्स, प्रिन्सिपल्स तिचे ठाम होते… त्याला मुरड घालून कंपनीत रिटेन राहणं तिच्या स्वभावात नव्हतं… हातात कौशल्य होतं नि बुद्धी ची झेप मोठी होती हेच तिचं मोठ्ठं भांडवल असल्याने आज जरी हातातला हा जाॅब सुटला तरी दूसरा मिळणारच हा आत्मविश्वास होता… तो मिळेपर्यंत संयम ठेवणं गरजेचं होतं.. शलाकाने आपली पर्स उचलली आणि कुणाशीही काही न बोलता ती एकेक पाऊल टाकत आॅफिसातून बाहेर पडली.

.. त्यावेळी तिथं असलेल्या कुठल्याही कलिगला तिचं असं निघून जाणं याकडे खास असं काहीच वाटलं नाही.. उद्या त्याचं नेहमीप्रमाणे रूटीन सुरू राहणार होतं याची आजतरी त्यांना खात्री होती… आणि शलाका मात्र उद्याला त्यांना तिच्या डेस्कला दिसणार नव्हती याची कल्पना देखील नव्हती. मग उशिराने का होईना त्यांच्यात लक्षात येणार होतं कि अरे या वेळीची स्कायलॅबचा बळी शलाका होती तर….

#

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… आणि तुम्हांला सांगतो आमच्या तालुक्यात वीज आली… आमच्या गावात वीज आली… आमच्या वस्तीत वीज आली आणि आमच्या घरात वीज आली… तो तुम्हाला चित्रात दिसतोय तो वीजेचा खांब सगळ्यात पहिल्यांदा उभा राहिलेला खांब आहे बरं आमच्या गावात, वस्तीवर वीज आपल्या डोक्यावरून वाहून घेऊन येणारा… आज उणीपुरी पन्नास वर्षे झाली बरं त्या खांबाला आमच्या गावाच्या वेशीवरं वेताळाच्या झाडाजवळ उभा आहे… त्यावेळी जसा होता तो आजही तसाच उभा आहे ना भाऊ… वीज गावात खेळत राहीली त्या दिवशी सगळ्या गावकऱ्यांनी तर दिवाळीच साजरी केली… सगळ्यांच्या घराघरातले सगळ्या असल्या नसल्या खोलीतले ओट्या्वरचे, खळ्यावरचे, परसूमधले,… आणि कशा कशातले दिवे… म्हणजे पिवळे चाळीस व्होल्टचे दिवे ते दिवसरात्र ढणढणा जळत राहिले हो… सकाळच्या सूर्य प्रकाशात त्यांचं महत्त्व वाटलं नाही पण अख्खी रात्र मात्र तेजाची फुलबाज्यांची रोषणाई सांडत राहिली… आयाबाया पोरंबाळं अंगणात दारात ठिय्या मांडून फतकल मारून बसले.. वीजेची दिव्य गोष्टीचां वार्तालाप करत… बरीच रात्र उलटून गेली तरी घरात जाऊन आता झोप घ्यावी असं कुणालाही सुचलचं नाही… तर इकडे पुरूष मंडळी कट्यावर, पारावर बसून पत्याचा डाव टाकून बसले तर काही ना हा आजचा दिवसाचा आनंद घश्यात काहीतरी गरम पेयाचे चषक इत्यादी रिते कसे करता येईल याची गुत्याच्या वाटेवर हसी मजाक चालू झाला… गोठ्यातली गुरं ढोरं आनंदानं शिंगं डोलावू लागली… आणि आणि ती राॅकेलची चिमणी तो प्रभाकरचा कंदील ह्या वीजेच्या दिव्यांनी दिवे लावलेले पाहून बिचारे रुसून कोपऱ्यात अंधारात बसून गेले… निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवाराकडे कसा अपयशाचा अंधकाराचा सन्नाटा असतो त्याच्यापेक्षा ही जास्त म्हणाना… आता आपली इथली गरज संपली गड्या तेव्हा आपला बोऱ्याबस्तरा उचलायला हवा आणि अडगळीत पथारी टाकावी अन्यथा भंगारावाल्याच्या काळ्या कभिन्न गोदामात गंजत खितपत पडावं लागेल… मग कोण कशाला वास्तपूत करतोय… गरज सरो नि… पण हि काना मागून आलेली चटक चांदणी किती दिवस.. आपलं किती रात्रं लखलखत राहीलं हे ही सांगता कसं येईल…आता हेच बघा की ते ब्रिटिशांच्या आमदनीत फक्त मोठ्या शहरात तेव्हा वीज खेळत होती आम्हाला वाटायचं हि श्रीमंतांची मिजासच आहे…ती कशाला वो तडमडयाला खेड्यापाड्यात येतेय… इथं रोजच्या रात्रीला चिमणीच्या ढणढण्या उजेडाला नि कंदिलाच्या मेणचटलेल्या प्रकाशाला अंधार लाजून मुरकून जरा दूर हटायचा… गाव शीव वालं सगळे जण त्याला सराईता सारखे चालत बोलत येत जात नि राहत होते… अगदीच  नड पडली तरच रातच्याला गावाच्या बाहेर पडतं नाही तर जो तो आपल्या घरातच.. पण हि छमक छल्लू वीज आली नि गावा गावातले लोक पायात चाळ बांधल्या सारखे बघा दिवस नाही कि रात्र नाही चौवीस तास अखंड कारण असू दे वा नसूदे हिंडायला लागले कि… कोणीतरी लै शिकलेला मोठा माणूस म्हणत होता आता वीज आली पाठोपाठ गावाचा विकास पण होत जाणार म्हणून… उद्योग धंदे वाढून सुख समृद्धी लोकांच्या घरघरात पोहचणार… मग ती चिमणी आणि तो कंदील असताना काय कमी सुखं होतं का तेव्हा… खाऊन पिऊन सुखीच होतो कि आम्ही… हिच्या मुळं आणि दोनचार सुखाची साधनं वाढली इतकंच काय ते… गावातली बाया माणसं, पोरंसोरं असं बोलत बसली होती आनी तितक्याच फक्कन अंधारच झाला जिकडं तिकडं.. अरं काय झालं या वीजंला.. दिवा एकदमच का विझला.. का वीज संपली वाटतं.. रे लावा ती आपली चिमणी आणि तो कंदील.. त्याशिवाय काही आपलं जगणं काही खरं नाही गड्या हो… आता आहे तर नंतर नाही आणि दिवसा आहे तर रातच्याला नाही अशी बेभरवश्याची वीज आपल्या काय कामाची नाही.

ऐन नडीलाच हि नडणार..तेव्हा चिमणी आणि कंदील कायमचं असू द्या घरात… वीजेच्या अति झगझगीत उजेडाच्या हव्यासापायी चिमणी नि कंदील बाजूला सारले तर दारिद्र्याचा अंधार आपल्याला गिळून टाकल्या शिवाय राहणार नाही… म्हणतात ना जुनं ते सोनं.. कितीही उत्कर्षाचा काळ आला तरी ऐनवेळी सोनंच मदतीला धावून येतं तसं या चिमणी नि कंदीलाची सोबत आहे बरं… तो वीजेचा खांब जेव्हा पहिल्यांदा इथं आला तेव्हा किती कौतुक झालं होतं त्याचं पण तेच आता पन्नास वर्षे उलटल्यानंतर त्याच्यकडं कुणीही ढुंकूनही बघना झालयं…कितीतरी उन्हाळे, पावसाळे, थंडीचा कडाका खाऊन खाऊन अगदी कणखर झाला… त्याचबरोबर आता त्याच्या अंगोपा़गांवर पानाच्या पिचकाऱ्या पडून पडून तो आता लाल तांबडा नि करडा रंगाचा झालाय तर कुठे जाहिरातीचे बोर्ड, तर कुणी त्याच्याच आधार घेऊन पानाची, चहाची टपरी टाकून बसलयं.. हळूहळू त्या खांबाची गावानं ओळखच विसरून गेलयं.. आणि खांब सुध्दा आपलं खरं काम काय होतं हे विसरून दुसऱ्या कामातच गुरफटून गेलाय… त्याला या सगळ्या गोष्टींचा उबग आलाय पण सांगतो कुणाला.. आपल्या इथून कुणीतरी हलवलं तर बरं होईल असं सारखं वाटतयं…रस्ता रुंदी करणाच्या नावाखाली तरी…वादळाने तरी उन्मळून पडावं नाहीतर वीज मंडळानं तरी आपण खूपच जूने जीर्ण झालोय म्हणून तरी बदलुन टाकावं असं त्याच्य मनात येतयं… त्याच्या मनात जे येतयं ते वीज मंडळाच्या मनात कधी यावं आणि आलचं समजा पण त्यासाठी खर्चाच्या बजेटाची मंजूरी कधी मिळायची… साराच लालफितीचा कारभार…एकवेळ देवाजीच्या मनात आलं तर इकडची दुनिया तिकडं व्हायला वेळ लागायचा नाही पण या विद्युत देवतेच्या पुजाऱ्यांच्या मनात हे येणार कधी नि कसं…याच्याच प्रतिक्षेत तो खांब तसाच असिधारा व्रतस्थाप्रमाणे प्रतिक्षेत उभा आहे…

#

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ सामान्यत्व… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “सामान्यत्व…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

स्वत:चं सामान्यत्व फार छळू लागलं की म्हातारीच्या पिसाकडे बघावे. स्वच्छंदपणे कसे उडत असते हवेत.

आपल्याला कोणी गरूड म्हणत नाही याची त्याला खंत नसते.

बळकट पंख नसल्याचा खेद नसतो. आकाशाचा अंत गाठण्याचा हव्यास नसतो.

अन पृथ्वीचा ठिपका होऊन जाण्याइतकी उंची गाठण्याचा मोहही नसतो.

आपल्या मस्तीत भिरभिरत, हवेशी जुळवून घेत,

आपल्या हलक्या अस्तित्वाला सहजपणे स्विकारत, ते मजेत जगून घेते.

उंचावर गेल्यावर त्याला जमिनीची भीती नसते.

अन् जमिनीवर उतरल्यावर नसतो आकाशाचा मोह.

हवेची हलकीशी झुळूक येवो वा सोसाट्याचा वारा आपलं काम फक्त त्याच्यासोबत तरंगत जायचं.. हसतहसत पुढे पुढे… वाटेत जर का कशाला नि कशात अडकून पडलो तर… आपला प्रवास इथवरचं होता असं समजायचं आणि जे सभोवताली असेल त्यावर आपली आनंद मुद्रेचा जमेल तितका ठसा उमटवयाचा.. हिच आपली जनमानसातील पुसटशी ओळख… मी जाता मागे राहील काय याचं वैषम्य उगाचच वाटून का घ्यायचं… आणि समजा प्रवासाच्या वाटेवर पावसाची सर वा धो धो पाऊसच आला आणि त्यानं जर आपल्याला पाण्याच्या सपकाऱ्याने खाली चिखलात मिसळंवलं तर.. आयुष्याचा चिखल झाला म्हणून वाईट वाटून का बरं घ्यायचं… तुज घडवीशी तूच फोडीशी… न कळे यातून काय साधशी… त्याच्या त्या अनाकलनीय योजनेचा आपल्याला कधी अंत ना पार लागावा कसा… पण पण आपल्या जिवीत्वाचा अंश एका नव्या सृजनाच्या निर्मीतीत अणू रेणूतला अंश झाला हे समाधान नाही का मिळणार… हे आपल्यातले दडलेले असामान्यत्व आपल्याला कधीच ओळखता येत नाही… आणि दुसऱ्यांना ते दिसतं असले तरी ते दाखवत नाहीत… इतका सामान्यत्वाची घट्ट सांगड आपल्याला बांधून असते…

म्हणूनच स्वत:चे सामान्यत्व छळू लागलं की बघावे

नि:संग भिरभिरणाऱ्या म्हातारीच्या पिसाकडे…

#

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गाड़ी बुला रही है… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “गाड़ी बुला रही है…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

 हं आता ज्याचं या 7. 32 च्या सीएसटी जलदगती लोकलचे रिझर्वेशन, पास आहे ते आधी या डाव्या बाजूने आत येतील… ही लोकल इथूनच सुटणारी असल्याने इथं एकदा सगळ्या सीट भरल्यावर कुणालाही उभ्याने प्रवास करण्यास परवानगी नाही.. या मोकळ्या जागेचा हक्क पुढील येणाऱ्या प्रत्येक स्थानकातील प्रवाशांचा असेल… या घोषणेला जो कोणी अयोग्य रित्या प्रतिसाद देईल.. नियमबाह्य वागेल तो प्रवासी या लोकल मधून जो पर्यंत खाली उतरणार नाही तो पर्यंत ही लोकल हे स्थानक सोडून पुढे जाणार नाही. याची समस्त प्रवाशांनी नोंद घ्यावी.. आणि यासाठी जो काही विलंब झालाच तर त्याची त्या आगांतुक प्रवाशाची जबाबदारी असेल.. रेल्वेप्रशासन या दिरंगाई ला जबाबदार असणार नाही… लोकल दर पाच मिनिटाला इथून सी. एस. टी. कडे जात असते… प्रवाशांनी आधी ज्याचं रिझर्वेशन असेल आधी त्याला लोकलच्या डब्यात जाऊ द्यावे.. रिझर्वेशन च्या प्रवाशांनी आपल्याला दिलेल्या सीट नंबरवरच बसून घ्यायचं आहे..

…. आता लवकरच ही व्यवस्था आणि शिस्तीची अंमलबजावणीची आत्यंतिक गरज आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने या गर्दीवर नियंत्रण करणारी खाजगी संस्थाना देकार देऊन लोकल प्रवाश्यांची सुरक्षेची काळजी वाऱ्यावर सोडून आपले हात मोकळे (झटकून) घ्यावेत… आणि फक्त ध्वनीक्षेपकावरून गोड आवाजात सुचनांचा नुसता धो धो पाऊस पाडावा.. प्रवाश्यांच्या मानसिकतेच्या, सोशिकतेचा कडेलोट कसा होईल हे पाहावे… आणि वर रेल्वे ही भारत देशाची संपत्ती आहे तेव्हा तिचं संरक्षण करणं हे प्रत्येक सुजाण प्रवाश्याचं कर्तव्य आहे आहे असे म्हणून आधीच कावलेल्या प्रवाशांच्या मनाला डागण्या द्याव्यात… ना घर का ना घाटका असलेला प्रवासी मग सरकारला, रेल्वेला ठेवणीतल्या गालीगलोचं पारायण करतो… कारण त्याला कुणीच वाली उरलेला नसतो… मधेच कधीतरी संधीसाधू राजकीय पक्ष याचं राजकारण करतो, बंद बंदची हाक घालतो… आपली राजकीय पोळी या तापलेल्या तव्यावर भाजून घेतो पण पोटार्थी नोकरदारांची या बंद मुळे चुल थंडावते आणि तो मात्र उपाशीच राहतो… प्रश्न कसा सुटेल लोकांची सोय कशी होईल याकडे कुणालाच काही पडलेलं नाही… रोज मरे त्याला कोण रडे या वचनाला सगळेच जागतात… आणि लोकलचा, रेल्वे च्या प्रवाश्याचे हाल कुत्रे खातात… चलो अंदर, चलो भैय्या करत आपल्याच भाईबंदावर चिडत रागावत, प्रसंगी हमरीतुमरी येत लोकलच्या डब्यात घुसत राहतात… एकदा असा प्रवेश मिळाला म्हणजे स्वर्गात प्रवेश मिळाल्याचा फिल येतो… वरच्या पंख्याचं पातं वातावरण कोमट राहीलं याची काळजी घेतं.. आणि मग डब्यात स्थिरावलेली ती मुटकुळी झालेली शरीरं एकमेकांशी संवाद साधताना.. छोड ना यार ये रोज की मगजमारी है… अच्छा सुन ना आज शाम कि पाच पैंतालीस डब्बल फास्ट अंबरनाथ को आ रहा है ना… मै राह देखता हूं… आणि ती संध्याकाळची आणि उद्या सकाळीची लोकल सुद्धा आपापल्या प्रवाश्यांची वाट बघत प्रत्येक स्टेशनवर थांबून पुढे पुढे जात असते…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares