कर्ण कृष्णाला विचारतो – “माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?
मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो.
परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईन . कारण मी क्षत्रिय नव्हतो!
एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.
द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.
कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.
मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.—-तर मग मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?”
कृष्णाने उत्तर दिले:
“कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.
जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता.
रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.
तुम्ही तलवारी, रथ, घोडे, धनुष्यबाण, यांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.
मला गौशाला, शेणमाती मिळाली. आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.
ना कोणती सेना, ना शिक्षण.
मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.
तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.
सांदिपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.
तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.
मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.—–मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.
जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल… फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.
एक गोष्ट लक्षात घे कर्णा…
प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत.
आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही.
दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.
परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते…
कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,
कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,
कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,
तरीही—
त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.
तक्रारी थांबव कर्णा!
आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.
म्हणून, तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगीदेखील तुम्ही चांगलाच विचार करा, भगवंताचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद…!
—— पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते…
जय श्रीकृष्ण
संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ समिधा..!! 🔥 ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
एका वळणावर दोन गुरुजी स्कूटरवरून माझ्या शेजारून गेले. तर… त्यातले एक गुरुजी दुसऱ्या गुरुजींना म्हणत होते, “अरे समिधांची काय एव्हढी काळजी करतोस? त्यांचं काम फक्त अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू अग्नीपर्यंत पोचवायचं…!”
बस्स एवढंच?
ह्या पलीकडे त्या ‘समिधां’च्या जळून जाण्याला काहीच महत्व नाही ?
खरं तर ह्या अशा अनेक ‘समिधा’ आहेत ज्यांनी मूकपणे जळून जाऊन अनेक यज्ञ यशस्वी केलेत —-!
विचारांच्या वावटळीवर स्वार होऊन मन प्रवासाला निघालं—-
पहिलीच आठवली ती उर्मिला.
लक्ष्मण तर गेला निघून भावामागून चौदा वर्षं वनवासाला… रामसीतेच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं कौतुक झालं, भरताचंही झालं—- पण अयोध्येत राहूनसुद्धा चौदा वर्षं वनवास, तोही एकटीनं भोगणाऱ्या, उर्मिलेच्या आयुष्याच्या आहुतीची दखल वाल्मीकींनीही घेतली नाही—-मला नेहमी वाटतं की त्या उर्मिलेला कुणीतरी बोलतं करायला हवं. रामराज्याच्या आदर्शवादी यज्ञात ह्या एका ‘समिधेची आहुती अशीच पडून गेली.
मग आठवतात त्या… काशीबाई, सकवारबाई आणि इतर तिघी—शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांपैकी तीन—
सईबाई, सोयराबाई व पुतळाबाई या आपल्याला माहीत असतात. त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या गोष्टीही
आपण ऐकलेल्या असतात—पण बाकीच्या पाच…? केवळ राजकीय कारणासाठी जिजाबाईंनी ह्या पाचजणींबरोबर महाराजांचा विवाह लावला. पण नंतर? —-‘अफझलखान येतोय,’ म्हटल्यावर ह्या पाचजणींना चिंता वाटली नसेल? आपला नवरा औरंगजेबाच्या कैदेत अडकलाय म्हटल्यावर यांचाही जीव सैरभैर झाला नसेल ? निश्चितच झाला असणार ! पण स्वराज्याच्या यज्ञात ह्या पाच ‘समिधा’ तशाच जळून गेल्या!
बहुतेक सर्व ‘समिधा’ या स्त्रियाच ! —-
कारण हे निमूटपणे जळून जाणं त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं जणू!
गोपाळराव जोशांसारखा एखादा अपवाद की आपल्या पत्नीला- आनंदीबाईला
डॉक्टर करण्यासाठी स्वतः ‘समिधा’ झाला !
काही थोड्याफार ‘समिधा, कस्तुरबा म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा—
स्वकर्तृत्वाने उजळूनही गेल्या ! पण बाकीच्या…?
टिळकांनी, सावरकरांनी मांडलेल्या स्वराज्याच्या यज्ञात पहिली आहुती सौ. टिळकांची व सौ. सावरकरांची पडली.
या आणि अशा अनेक…!!!
विचारांच्या चक्रात घरी आलो. आमच्या घरच्या ‘समिधे’नं दार उघडलं.
मुलाचा अभ्यास आणि नवऱ्याचं करीअर यासाठी स्वतःचं आयुष्य पूर्णपणे झोकून देणाऱ्या त्या ‘समिधे’ला पाहून
मला एकदम भरून आलं!
घरोघरी अशा ‘समिधा’ रोज आहुती देत असतात. घर उभं करत असतात, सावरत असतात. माझं घरही याला काही अपवाद नाही.
मात्र यापुढे या ‘समिधां’ची आहुती दुर्लक्षित जाऊ न देणं गरजेचं आहे !
या नव्या कठीण काळात, सर्व आव्हानांना भिडण्याची तयारी करतांना, जी आनंदाने स्वतःची आहुती देऊन
आपल्याला ऊर्जा देणार आहे, त्या आपल्या प्रत्येकाच्या घरच्या ‘समिधे’ला… मनापासून नमस्कार..
दिनू त्याच्या ८६ वर्षाच्या आईकडे पाहून हसत म्हणाला, “आता पुरे वटसावित्रीचा उपवास..
केलास आता इतकी वर्षे..आणि खरच बाबा तुला सात जन्म हवे आहेत का? “
“ त्यांना माझ्याविषयी काही वाटत नाही..हे ठाऊक आहे मला..पण घेतला वसा टाकायचा नाही. इतकी वर्षे पूजा..उपवास केला वटसावित्रीचा..उद्याही करणार “ …आई काहीशा तटस्थ निश्चयी स्वरात उत्तरली..
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो तो काय? आई सर्व आटोपून एका कागदावर हिरव्या स्केच पेनने वडाचं झाड काढून पूजा करत बसलेली..दिनूला कौतुकमिश्रित आश्चर्य वाटले…
अजूनही बिछान्यावर असलेल्या आपल्या सावित्रीला हलकेच जागे करून त्याने ती बातमी दिली. सावित्री म्हणाली,
“ मीही करणार आहे पूजा..मागणार आहे तुलाच सात जन्म..पण देवाला काही अटी..पण.. परंतू घालणार आहे..’
दिनूने विचारलं ‘कोणते पण?’ तशी तिने कविताच त्याच्यासमोर सारली.. म्हणाली ‘ तुला कवितेतलं चटकन कळतं,म्हणून रात्री जागून केली आहे..फार यमक..मीटर पाहू नकोस…भावार्थ समजून घे..आणि पटतं आहे का सांग. पटलं तरच आज पूजा आणि उपवास…”
दिनूने कविता वाचली मात्र..त्याच्या लक्षात आलं..सावित्री बदलते आहे…किमान आता वेदना ..अपेक्षा व्यक्त तरी करायला लागली आहे..
तो म्हणाला,
“ मी तुला समजून घेईन…. सात जन्मीची साथ सखये कुणी पाहिली..
याच जन्मी सुख सारे सारे देईन तुजला….”
हे दिनूकडून ऐकलं मात्र.. दिनूची सावित्री आन्हिक वगैरे आटोपून पूजेला बसली..हाच दिनू सात जन्म मिळावा म्हणून…
(कुपी अत्तरी)
आपणही सावित्रीची ही कविता वाचू या…
वटपौर्णिमा…
देवासमोर ठेवणार
काही माझे ‘पण’
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
एक साकडं त्याला
आहे मी घालणार
‘रोल’ आमचा बदल
आहे मी सांगणार
प्रार्थना करणार आहे
अशी विलक्षण
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
देवाला सांगणार
जोडी हीच राहू दे
कर त्याला स्त्री नी
पुरुष मला होउ दे
मलाही करायची आहे
थोडी तणतण
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
मला कर राजा नी
त्याला कर राणी
येउ दे थोडेसे
त्याच्या डोळा पाणी
ह्यालाही भासुदे
माहेराची चणचण
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
येऊ दे ह्याला पाळी
न पोट ह्याचं दुखु दे
झोपून राहावंसं वाटतं
ह्याला थोडे कळू दे
पाय किती दुखतात
नि तापासारखी कणकण
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
नऊ महिने एक बाळ
याच्या पोटात येऊ दे
नाकी नऊ कशी येते
ह्यालाही ते कळू दे
नाही वैतागला गडी
तर हरेल मी काय पण
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
कळेल याला का येतो
स्वयंपाकाचा कंटाळा
हजारो वेळा ती चिकट
कणिक सारखी मळा
नको वाटेल त्याला ती
भांड्यांची खणखण
करुन वडाची पूजा
साजरा करेन मी सण
होईन मी जावई
माझा मग थाट
सून झाल्यावर ह्याची
लागेल पुरती वाट
थांबणार नाही सासरी
मग हा एकही क्षण
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
रात्री बेरात्री मी
खुशाल बाहेर पडेल
सातच्या आत घरात
यायचं याला म्हणेल
पेटून उठेल ह्याच्या
रक्ताचा कणनकण
करुन वडाची पूजा
साजरा करेन मी सण
माझा रोल प्ले केला
की समजेल माझं दुःख
समजून घेईल मग मला
मिळेल थोडे सुख
साता जन्माची ती सारी
थांबून जाईल वणवण
करुन वडाची पूजा
साजरा करेन मी सण
………आपणही सांगू या आपल्या सावित्रीला..’मी समजून घेईन तुला आणि देईल सुखाला.. फक्त role तेवढा नको बदलू या..please..
(वरील कविता सौ. सविता सतीश मोघे यांची आहे…इतर पात्र काल्पनिक 😊)
…सतीश मोघे
(कुपी अत्तरी)
संग्राहिका : बिल्वा अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कृष्ण अंधारात जन्मला. त्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी त्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.
कृष्ण खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही…!
अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच…
चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही.
कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.
चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ”चालू” आहे असंच म्हणा हवं तर… चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो.
फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे…
तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो,” जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा…”
अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.
श्रीकृष्ण ” न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार ” अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र ! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन…
विमोह त्यागून कर्मफलांचा, सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था—
कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज…
अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो…
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥
जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार…? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल…
असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगाराचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो…
रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो…कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणूत भरलो…
तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती – अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन…
म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.
कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.
श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.
श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.
आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.
कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही….!
।।जय श्रीकॄष्ण।।
संग्राहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘अन्न हे पूर्णब्रह्म‘☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
एका लग्नाला गेलो होतो . जेवणाचा तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते . युनिफॉर्म घातलेल्या सुंदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला …. हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो …..
तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ. ने हात खेचत म्हटले ” अहो जरा दमाने घ्या , मिळते म्हणून सर्व घेऊ नका , मग फेकून द्याल ”
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली . थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले ….. अधिक काही खाववेना . नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो . रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता …..
माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला—-
“सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??”
अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले .
” ही तुमची डिश आहे ना ?? “
” होय,” मी परत उत्तरलो .
” हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ?? म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल ”
मी चकित झालो . थोडा रागही आला . त्याच रागात बोललो, ” अहो थोडे राहिले अन्न ? काय हरकत आहे .
नाही अंदाज आला .म्हणून काय घरी न्यायचं ?? “
” रागावू नका ” तो गोड हसत म्हणाला .“ हे मोठ्यांच लग्न आहे . पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला . हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे . बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही . कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ . आमची 25 माणसे . पण तरीही अन्न उरणारच . आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न !! त्याचे काय ?? राग मानू नका . पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय , उत्कृष्ट प्रतीची भाजी , मसाले खरेदी केले. आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तम प्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत…. होय ,त्यासाठी आम्ही मागू तेवढे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे . पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत . आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा …..म्हणून आम्ही ही शक्कल लढवली , हॉटेलमध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता…….. का ??? कारण तुम्ही पैसे मोजलेले असता. मग इथे का नाही ?? कारण ते दुसऱ्याने दिले म्हणून का ?? “
” आणि हो , यातील काहीही यजमानांना माहित नाही . हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका . पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा, नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा .”
मला काही सुचेना काय बोलावे . थोडी लाजही वाटली आणि पटतही होते —-
खरेच भारतातच काय, आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकताहेत आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय ….
इतक्यात सौ .म्हणाली “बरोबर बोलताय भाऊ , यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे , तेव्हा करण्याला किती वेदना होतात . द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला . आता रात्रीचे जेवण होईल . मेहनत , इंधन सर्व काही वाचेल .
थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो ….
(आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता….
एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच….
पण भूभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही )
—अन्नावाचून , अन्न पिकवता आत्महत्या करतोय …
अन्न हे पूर्णब्रम्ह– ते वाया घालवू नका. 🙏
संग्राहक : विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈