मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “व्हाट्सऍपची काठी” –  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “व्हाट्सऍपची काठी” –  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित 

उतार वयात  मिळाली

व्हाट्सऍपची काठी !

कपाळावरची मिटली

आपोआप आठी !

 

वेळ कसा जातो आता

हेच कळत नाही !

वर्तमान पत्राचं पानसुद्धा

हल्ली हलत नाही !

 

चहा पिताना लागतो

व्हाट्सऍप हाताखाली !

डाव्या बोटाने हलके हलके

मेसेज होतात वरखाली !

 

कुणाचा वाढदिवस आहे ?

कोण आजारी आहे ?

कोण चाललंय परदेशात

अन काय घडतंय देशात ?

 

कधी लताची जुनी गाणी तर

कधी शांताबाईंची कविता !

बसल्या बसल्या डुलकी लागते

कधी एखादी गझल समोर येते ! 

 

टीव्हीवरचं चॅनेलसुद्धा

हल्ली बदलत नाही

व्हाट्सऍपशिवाय आमचं

पान जरासुद्धा हलत नाही !

 

वय जरी होत चाललं

हातपाय जरी थोडे थकले !

तरी व्हाट्सऍपच्या औषधाने

मन मात्र रिलॅक्स झाले !

 

आता फार काळजी करत नाही

आता चिडचिडसुद्धा होत नाही !

व्हाट्सऍपचा मित्र भेटल्यापासून

आता मनातसुद्धा रडत नाही !

 

आनंदी कसे  जगायचे याचे

आता कळले आहे तंत्र !

व्हाट्सऍपच्या या जादूच्या

काठीने दिला सुखाचा मंत्र.

  

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कट्टी-बट्टी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – दीप्ती गौतम ☆

सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कट्टी-बट्टी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – दीप्ती गौतम

कट्टी आणि बट्टी दोन साधे शब्द, पण मानसिक स्वास्थ्याच्या दोन गुरू किल्ल्या!

आपल्या सगळ्यांच्या बालपणात हे दोन शब्द आपल्या आयुष्याचा भाग नक्की असायचे.

 

कट्टी म्हणजे आपला पहिला emotional withdrawal.

 

ना भांडण, ना आरडाओरड, ना मोठं स्पष्टीकरण…

फक्त शांतिपूर्वक घेतलेली तात्पुरती माघार.. …

“मला तुझ्याशी बोलायचे नाही.”

 

त्याचा साधा अर्थ होता,

“मी दुखावलो आहे… पण ते कसं सांगायचं कळत नाही. ”

 

आणि बट्टी?

ती म्हणजे दुरुस्ती.

थोडी awkward असायची..

थोडी न बोलता झाली, तरी पण लगेच व्हायची…

 आपलं मन शांत झाले की लगेच..

 

ना माफीची गरज,

ना कुठले स्पष्टीकरण…

 

एक चॉकलेट शेअर व्हायचे,

एक चोरटे हसू यायचे…

एक “चल ना, जाऊ दे ना”

आणि सगळं पुन्हा मस्त!

 

लहानपणी आपण emotional regulation चांगले करायचो…

फक्त हा शब्द माहीत नव्हता.

पण शरीराने, वयाने मोठे होताना, मनाचा मोठेपणा मात्र लहान होत गेला…

 

आता मोठेपणी कट्टी झाली की,

Emotional distance,

Ghosting,

थंड responses,

लांबलेला आणि अहंकाराच्या खांद्यावर बसलेला अबोला…

न वाचलेले मेसेज,

कधीकधी वरवरची नम्रता,

कोरडे बोलणे…

 

आणि बट्टी?

ती मात्र कठीण होत गेली,

बर्‍याचदा झालीच नाही..

निरागसपणा गेला,

अहंकार आला,

आणि अबोला कायम त्याच्या खांद्यावर घर करून बसला…

 

आपण “तू दुखावलंस मला” न म्हणता, बाहेरून

“ठीक आहे” म्हणायला शिकलो …

आणि आतून मात्र त्याच्यापासून दूर चालायला लागलो…

 

आपण वस्तू Repair करायला जसे विसरलो, तसेच उसवलेल्या फाटलेल्या मनालासुद्धा Repair करायला विसरलो.

 

मनात साठवून ठेवायला लागलो..

भावनांच्या जागी हिशेब आणि गणिते ठेवू लागलो…

आणि डोक्याला त्रास नको म्हणून लांब रहायला लागलो..

 

लहानपणी कट्टी ही तात्पुरती असायची, पण मोठेपणी ती कायमची झाली…

 

आपण विसरलो —

कट्टी म्हणजे शिक्षा नव्हती,

फक्त दुखावलेल्या मनाला थोडी space हवी असायची, म्हणून हक्काने घ्यायचो…

 

आणि बट्टी म्हणजे जिंकणं किंवा हरणं नव्हतं, ते होतं पुन्हा आपल्या मूळ स्वभावात येणं..

आपल्या अमूल्य अशा मैत्रीला जगणं…

 

भक्कम नाती ती नसतात, जिथं भांडणं होत नाहीत.

भक्कम नाती ती असतात, जिथं

“बट्टी” अबोल्याला अहंकाराच्या खांद्यावरून खाली घेते आणि पुन्हा एकदा गप्पिष्ट बनविते…

 

मोठं होणं म्हणजे कट्टीला टाळणं नाही, तर बट्टीला कडेवर घ्यायचा मोठेपणा दाखवणं..

 

हेच खरं ‘कटी-बट्टी’चं सौंदर्य!

 

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : दीप्ती गौतम

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ बहावा फुलला… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बहावा फुलला… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

बहावा फुलला…

बहावा फुलला की ६० दिवसांनी पाऊस पडतो.

याला पावसाचा “नेचर इंडीकेटर” असेही म्हणतात, या वर्षी हा लवकर फुलला आहे.

आता साधारण 28 मे नंतर पाऊस पडेल. या झाडाला शॉवर  ऑफ फॉरेस्ट  असेही म्हणतात.

आणि या वृक्षाचा अंदाज अचूक असतो…

 *

नकळत येती ओठावरती

तुला पाहता शब्द वाहवा,

सोनवर्खिले झुंबर लेउन

दिमाखात हा उभा बहावा ।

 *

लोलक इवले धम्मक पिवळे

दवबिंदूतुन बघ लुकलुकती,

हिरवी पर्णे जणू कोंदणे

साज पाचुचा तया चढवती ॥

 *

कधी दिसे नववधू बावरी

हळद माखली तनु सावरते

झुळुकीसंगे दल थरथरता

डूल कानिचे जणू हालते ।

 *

युवतीच्या कमनीय कटीवर

झोके घेई रम्य मेखला,

की धरणीवर नक्षत्रांचा

गंधर्वांनी झुला बांधला ॥

 *

पीतांबर नेसुनी युगंधर

जणू झळकला या भूलोकी,

पुन्हा एकदा पार्थासाठी

गीताई तो सांगे श्लोकी ।

 *

ज्या ज्या वेळी अवघड होई

ग्रीष्माचा तुज दाह सहाया,

त्या त्या वेळी अवतरेन मी

बहावा रुपे तुज सुखवाया ॥

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दिखाव्याचा ‘मदर्स डे’ आणि एकाकी ‘आई…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “दिखाव्याचा ‘मदर्स डे’ आणि एकाकी ‘आई…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

मे महिन्याचा दुसरा रविवार उजाडतो आणि अचानक संपूर्ण आभासी जग (Social Media) भावूक होतं. मोबाईलच्या स्क्रीनवर ‘Happy Mother’s Day’ चे स्टेटस झळकू लागतात. कुणी फुलांचा गुच्छ देतं, कुणी केक कापतं, तर कुणी आईसोबतचं एखादं जुनं कृष्णधवल छायाचित्र शेअर करतं. दिवस संपतो, त्या फोटोंवरचे ‘लाईक्स’ मोजून आपण सुखावून जातो आणि पुन्हा आपल्या दिनचर्येत व्यस्त होतो. पण या उत्सवाच्या झगमगाटात एक जळजळीत प्रश्न उभा राहतो — मदर्स डे म्हणजे कॅलेंडरने दिलेला केवळ २४ तासांचा तुकडा आहे, की तो आपल्या बोथट होत चाललेल्या संवेदनांना आरसा दाखवणारा एक क्षण?

भारतीय संस्कृतीने आपल्याला ‘मातृदेवो भव’ हा मंत्र दिला. तैत्तिरीय उपनिषदातील हा विचार केवळ भिंतीवर टांगण्यासाठी किंवा भाषणात वापरण्यासाठी नव्हता, तर ते एक मूलभूत जीवनमूल्य होतं. घराच्या देव्हाऱ्यात देव असतोच, पण एका बालकाच्या जगात देवाची पहिली सगुण प्रतिमा ही आईच्या रूपातच उभी राहते. देव निराकार असतो, पण आई साकार असते—स्पर्शात, शब्दात आणि नजरेत. मात्र, आज हेच ‘दैवत’ अनेक ठिकाणी वृद्धाश्रमांच्या उंबरठ्यावर का दिसते? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. आपण भक्तीचा उच्चार तर मोठमोठ्याने करतो, पण व्यवहारात मात्र स्वतःची ‘सोय’ बघतो. आईच्या अथांग कष्टांच्या पायावर आपल्या आयुष्याची देखणी इमारत उभी राहिली; पण तिच्या वार्धक्यात तिला पेलताना आपल्याला ‘जागा नाही’, ‘वेळ नाही’ किंवा ‘परिस्थिती नाही’ या सबबी आठवू लागतात. आईने मात्र आपल्याला वाढवताना कधीही ‘परिस्थिती’ची अट घातली नव्हती, हे आपण सोयीस्करपणे विसरतो.

आजच्या आधुनिक आणि तथाकथित प्रगत जगात काही जण केवळ बुद्धीची कसरत करत असं मांडतात की, “आपण आईच्या उदरातून आलो, म्हणून तिचा आपल्यावर मालकी हक्क नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे आणि जन्म घेणं हा केवळ एक जैविक ‘इन्सिडन्ट’ (योगायोग) आहे.” तत्त्वज्ञान म्हणून हे ऐकायला आकर्षक वाटतं, कारण ते जबाबदारीतून मुक्त करतं. मान्य आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे आणि नातं म्हणजे गुलामगिरी नव्हे. पण नातं हे केवळ जैविक नसतं, ते ‘ऋणाचं’ असतं. आणि ऋण म्हणजे ओझं नव्हे, तर ते कृतज्ञतेचं भान असतं. आपल्या पहिल्या भीतीला जिने कुशीत घेतलं, आपल्या पहिल्या पडण्यावर जिने मायेची फुंकर मारली आणि आपल्या पहिल्या यशात जिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले, त्या नात्याला केवळ ‘योगायोग’ म्हणणं ही हृदयाशी केलेली प्रतारणा आहे. बुद्धीला ते पटू शकतं, पण हृदयाला ते कधीच शिवणार नाही.

आई ही कोणी परिपूर्ण ‘देवी’ नाही. ती एक हाडामांसाची माणूस आहे. तिलाही अपेक्षा असतात, तिच्याही मर्यादा असतात आणि तिच्याकडूनही चुका होऊ शकतात. म्हणूनच ती आपल्याला अधिक जवळची वाटते. आपण तिला देव्हाऱ्यात बसवतो आणि तिच्याकडून ‘त्याग’ आणि ‘सहनशक्ती’ची अपेक्षा करतो. पण तिला देव्हाऱ्यापेक्षा तुमच्या सोफ्यावर बसून तुमच्याशी दोन शब्द बोलायचे असतात. म्हणूनच मदर्स डे हा केवळ उत्सवाचा क्षण नसावा, तर तो आत्मपरीक्षणाचा क्षण असावा. आपण शेवटचं आईशी निवांत कधी बोललो? तिच्या आरोग्याची मनापासून विचारपूस कधी केली? तिला एखादं महागडं गिफ्ट देणं सोपं असतं, पण तिला आपला ‘वेळ’ देणं कठीण असतं. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट टाकणं सोपं असतं, पण तिच्या वाढत्या वयातील हट्टासमोर संयम बाळगणं कठीण असतं.

आईचा खरा सन्मान म्हणजे तिच्या वार्धक्यात तिच्या थरथरत्या हाताला आधार देणं. तिच्या एकटेपणाला आपली जिवंत उपस्थिती देणं आणि तिच्या आयुष्याच्या संध्याकाळी तिला ‘ओझं’ नव्हे तर ‘आपलं’ असल्याची जाणीव करून देणं. ‘मातृदेवो भव’ हा मंत्र उच्चारण्यासाठी नसून तो जगण्यासाठी आहे. भावना व्यक्त करणं सोपं असतं, पण जबाबदारी उचलणं कठीण असतं. ही जबाबदारी म्हणजे केवळ आर्थिक तरतूद नव्हे, तर तिला आदराचं स्थान देणं होय.

कॅलेंडरवर ‘मदर्स डे’ दरवर्षी येईल आणि जाईल. पण आईचा वरदहस्त आपल्या डोक्यावर किती काळ राहील, याची कोणतीही शाश्वती नाही. फुले देण्यापेक्षा तिला मानसिक आधार द्या. पोस्ट टाकण्यापेक्षा तिच्या शेजारी बसून तिचं ऐकून घ्या. ज्या दिवशी घरातील आई खऱ्या अर्थाने आनंदी आणि समाधानी असेल, तो प्रत्येक दिवस ‘मदर्स डे’ ठरेल. कारण आईची सावली असेपर्यंतच आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित असतं.

तिच्या सुरकुतलेल्या कपाळावर, तुझ्या सुखाचा इतिहास आहे,

तिच्या थरथरत्या हातांमध्येच, जीवनाचा विश्वास आहे…

 

तिची सोबत आहे तोवर  तिचं हसणं कमावून घे,

मदर्स डे च्या स्टेटस पेक्षा, तिचं मन कुरवाळून घे!

 

वेळ निघून गेल्यावर रडून, काहीच साध्य होणार नाही,

आई नावाचं विद्यापीठ, पुन्हा पुन्हा मिळणार नाही…

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भारतीय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भारतीय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

जपानमध्ये वर्षभरापेक्षा जास्त काळ राहणाऱ्या एका भारतीयाने एक गोष्ट पाहिली..

त्याचे जपानी मित्र अतिशय नम्र, सभ्य आणि मदत करणारे होते,

पण त्यातील एकानेही त्याला कधी घरी बोलावले नाही…

ना चहासाठी, ना साध्या भेटीसाठी.

 

तो भारतीय थोडा आश्चर्यचकित झाला आणि दुखावला गेला.

एके दिवशी त्याने आपल्या एका जपानी मित्राला विचारले,

“तुम्ही इतके चांगले, प्रेमळ आहात… तरीही मला का कधीच घरी बोलावत नाही?”

 

त्या जपानी मित्राने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं –

“आम्हाला भारतीय इतिहास शिकवला जातो… पण प्रेरणा म्हणून नाही,

तर सजगता म्हणून.”

 

तो भारतीय थक्क झाला..

“सजगता? भारतीय इतिहास सावधानतेसाठी शिकवला जातो? का?”

 

जपानी मित्र म्हणाला,

“सांग बरं, इंग्रज जेव्हा भारतात राज्य करत होते,

तेव्हा किती इंग्रज असतील?”

भारतीय म्हणाला, “कदाचित… दहा हजार?”

 

जपानीने गंभीर चेहऱ्याने मान हलवली,

आणि विचारलं — “आणि त्या वेळी भारतात किती भारतीय होते?”

“सुमारे ३० कोटी,” भारतीय म्हणाला.

 

जपानी शांतपणे म्हणाला —

“मग सांगा, अत्याचार कोणी केला?

भारतीयांवर चाबकाचे फटके कोणी मारले?

गोळ्या कोणी झाडल्या?”

 

तो पुढे म्हणाला —

“जेव्हा जनरल डायरने जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश दिला,

ट्रिगर कोणी दाबला?

इंग्रज सैनिकांनी?

नाही… ते भारतीय सैनिकच होते.”

 

“कोणत्याही भारतीयाने जनरल डायरकडे बंदूक का उगारली नाही?

एकाने पण का नाही?”

 

“तुम्ही ज्याला गुलामी म्हणता,

ती शरीराची नव्हती… ती आत्म्याची होती.”

 

भारतीय गप्प उभा राहिला, डोळ्यात पाणी.

 

जपानी मित्र पुढे म्हणाला —

“मध्य आशियातून आलेले मुगल किती होते? काही हजार?

आणि तरी त्यांनी शतकानुशतके राज्य केलं.

 

ते बलाच्या जोरावर नव्हे,

तर तुमच्याच लोकांच्या नम्रतेवर,

त्यांच्या विश्वासघातावर.”

 

“तुमच्याच लोकांनी धर्म बदलला,

तुमच्याच लोकांनी आपल्या बहिणींचं, मुलींचं त्यांच्याशी लग्न लावून दिलं.

तुमच्याच लोकांनी तुमचे नायक इंग्रजांच्या हाती दिले.

 

चंद्रशेखर आझाद कुठे लपले आहेत हे इंग्रजांना कोणी सांगितलं?

भगतसिंहांना फाशी देणं इतकं सोपं होते का? पण तुमच्याच लोकांनी पाठ फिरवली”

 

 

“तुम्हाला बाहेरून शत्रूंची गरजच नाही.

तुमचे स्वतःचे लोकच सत्तेसाठी, पदासाठी,

थोड्याशा फायद्यासाठी तुम्हाला वारंवार धोका देतात.

म्हणूनच आम्ही भारतीयांपासून थोडं अंतर ठेवतो.”

 

“जेव्हा इंग्रज हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये आले,

तेव्हा एकाही स्थानिकाने त्यांच्या सैन्यात प्रवेश केला नाही.

पण भारतात?

तुम्ही त्यांच्या सैन्यात भरती झालात,

त्यांची सेवा केली,

त्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्याच लोकांना मारलं.”

 

“आणि आजही तुम्ही बदलले नाही.

थोडीशी मोफत वीज,

एक बाटली दारू,

एक चादर दिली की

तुमचं मत, तुमचा आत्मा,

सगळं विकत घेता येतं.”

 

तुमची निष्ठा देशाशी नाही,

तर तुमच्या पोटाशी आहे.”

“तुम्ही घोषणा देता, आंदोलन करता,

पण जेव्हा देशाला तुमच्या त्यागाची गरज असते,

तेव्हा तुम्ही कुठे असता?

 

तुमची पहिली निष्ठा अजूनही

तुमचे घर, कुटुंब आणि पैशाशी आहे —

देश आणि धर्म नंतर.”

 

इतकं बोलून तो जपानी शांतपणे निघून गेला,

आणि तो भारतीय तिथेच उभा राहिला —

डोळ्यांत लाज, मनात वेदना ठेऊन…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नंतर नाही, आताच… – लेखिका : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ नंतर नाही, आताच… – लेखिका: अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले

“साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी… आणि आयुष्य सरण्यापूर्वी जगून घ्यायला हवं. ”

ही ओळ साधी वाटते, पण तिच्यात आयुष्याचं खूप मोठं तत्त्वज्ञान दडलं आहे.

आपल्या कपाटात अनेक साड्या असतात… काही खास प्रसंगासाठी, काही “नंतर कधीतरी” म्हणून ठेवलेल्या. पण तो “नंतर” अनेकदा कधीच येत नाही. साडी तशीच राहते… आणि हळूहळू तिचा रंग फिका होत जातो.

हेच आपल्या आयुष्याबाबतही होत नाही का?

आपण सतत काहीतरी पुढे ढकलत राहतो—

“आत्ता वेळ नाही… नंतर करू…”

“थोडं स्थिर झाल्यावर जगू…”

“जबाबदाऱ्या कमी झाल्यावर स्वतःसाठी वेळ काढू…”

पण खरं सांगायचं तर,

आयुष्य कुणासाठीही थांबत नाही.

क्षण निघून जातात… आणि आपल्याला कळतही नाही.

आपण इतरांसाठी जगताना स्वतःला विसरतो.

इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधताना,

आपली स्वप्नं, आपल्या इच्छा… हळूहळू मागे पडतात.

साडीप्रमाणेच आयुष्यही जपून ठेवायचं नसतं,

ते जगून घ्यायचं असतं.

मनात येईल तेव्हा हसायचं,

आवडेल तसं सजायचं,

ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना वेळ द्यायचा,

आणि स्वतःलाही थोडंसं जगू द्यायचं.

कारण शेवटी,

ना साड्या कायम राहतात…

ना क्षण परत येतात…

म्हणूनच—

“साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी…

आणि आयुष्य सरण्यापूर्वी मनापासून जगून घ्यायला हवं. ”

कारण आयुष्य खूप मोठं नसतं,

पण ते सुंदर नक्की असू शकतं…

जर आपण ते मनापासून जगलो तर…

शेवटी इतकंच—

“उद्या” कधीच खात्रीचा नसतो…

म्हणून आजचं आयुष्य, आजचं हसू, आजचं प्रेम…

आजच जगून घ्या…

 

लेखिका:अज्ञात

प्रस्तुती: अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ टेस्ट…  लेखिका: गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

टेस्ट…  लेखिका: गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

आईच्या काही पुढच्या टेस्ट करून घेण्याकरता टेस्ट सेंटरमध्ये गेले होते. व्हीलचेयरमध्ये बसून आई आत गेली मी बाहेर वेटिंगरूम मध्ये बसले. बराच वेळ लागणार होता. ‘देव करो अन् सगळं ठीक निघो’, मनाशी म्हणत मी एकदा वर आकाशाकडे/देवाकडे बघत शांत बसून राहिले. एकेकाळी आपले आजार, दुखणी काढलेल्या आईला, हॉस्पिटलचा गाऊन घालून देऊन “जा, आत. सगळं नीट होईल” सांगताना फार विचित्र वाटतं. हे रोल रिव्हर्सल मान्य व्हायला हवं, हे माहीत असतं; पण थोडा वेळ लागायचा तो लागतोच.

सहज लक्ष शेजारी बसलेल्या एका मुलीकडे गेलं. छान चुडीदार ड्रेस, गळ्यात छोटं मंगळसूत्र, हातात मोबाईल आडवा धरलेला आणि तोंडाने सतत काहीतरी पुटपुटत होती. फार टेन्शन मध्ये दिसत होती. आजूबाजूला काय सुरू आहे याकडे अजिबात लक्ष नव्हतं. फक्त मोबाईल आणि ती. तिच्या पुटपुटण्याचा स्पीड इतका जोरात होता की हातात धरलेल्या मोबाईलसकट ती थोडं मागेपुढे होत होती. मग लक्षात आलं, देवाचं काहीतरी स्तोत्र वगैरे म्हणत असणार. म्हणता म्हणता मधेच डोळे बंद करून मोबाईल डोक्याला लावून नमस्कार करत होती. हॉस्पिटल, टेस्ट, सर्जरी ही नावं जरी घेतली तरी भीती वाटायची ती वाटून जातेच. मनात विचार आला, हिचं नक्की कोण आत गेलं असेल? आई, वडील, सासू, सासरे, भाऊ, बहीण की नवरा? का ही एवढ्या टेन्शनमध्ये असेल? ज्या कोणाची उपासना करत होती, त्यावर तिची नितांत श्रद्धा असणार. एक क्षणही न थांबता तिचा जप सुरू होता. माझ्या मनाला मग एक खेळच मिळाला. नक्की तिची आई आत असणार. ज्या मनोभावे ती जप करते आहे त्यावरून आईच असेल असं वाटतं. जगात अपवादानेच एखाद्याला आपली आई नकोशी असते. पण मग वडीलही असू शकतील. बापलेकीतलं प्रेम वेगळं असतं. नवरा असेल तर? इतक्या तरुणपणी काय झालं असेल त्याला? काही गंभीर निघालं तर ही काय करणार? माझ्या मनाचा चाळा संपेना. एवढ्यात एक तरुण तिच्या शेजारी येऊन बसला आणि म्हणाला, वीस मिनिटं तरी लागतील. तरुणीने पटकन त्याच्या डोक्याला मोबाईल लावला आणि जप सुरू ठेवला. आता माझी उत्सुकता शिगेला पोचली. नक्की आत आहे तरी कोण? नवरा शांत बसून होता, तरुणीचा एक क्षणही न गमावता जप सुरू होता. आता तर तिला सभोवती काय सुरू आहे ह्याचीही फिकीर नव्हती. ती आणि तिचा जप. मी स्वतः श्रद्धाळू असले तरी अशी टोकाची आस्तिक नाही. मी तिच्या जागी असते तर कदाचित हे काही केले नसते याची जाणीव मला आहे पण म्हणून ती जे करते आहे त्याची चेष्टा किंवा अवहेलना करायचाही मला काही अधिकार नाही हे ही मला माहीत आहे. ज्याला ज्यातून positive energy मिळते त्याने ते करावं.

बघता बघता वीस मिनिटं झाली. आई अजूनही आतच होती. तेवढ्यात टेस्ट सेंटरच दार उघडलं आणि एक छोटीशी गोड मुलगी दोन वेण्या उडवत आत आली. छान फुलाफुलांचा फ्रॉक घातलेली आणि टपोरे डोळे असलेली! तिला पाहून जप करणारी मुलगी ताडकन उठून उभी राहिली. मुलगी पळतपळत तिच्याकडे गेली आणि पुढचे दोन दात पडलेले बोळकं पसरून “आई, झालीsss टेस्ट! डॉक्टर काका म्हणाले, मी एकदम स्ट्राँग गर्ल आहे!” आईबाबा दोघांनीही तिला जवळ घेत चौकशी सुरु केली.

अरेच्चा! ही शक्यता तर मी गृहितच धरली नव्हती. लहान मुलांना काही गंभीर होत असेल हा विचारच आपल्या डोक्यात येत नाही. जप करणाऱ्या मुलीच्या बाबतीत मी सगळ्या शक्यता मनात आणल्या पण प्रत्यक्ष तिची छोटी लेकच टेस्ट करण्याकरता आत गेली असेल हा विचार देखील मनाला शिवला नाही. Mothers can never think ill about any child in the world. जपवाल्या मुलीने श्रद्धेने परत मोबाईल डोक्याला लावला आणि लेकीला मांडीवर घेऊन बसली.

आपल्या भोवती रोज कितीतरी वाईट गोष्टी घडत असतात पण जगात जोवर आई नावाची जमात आहे तोवर positive energy चा स्त्रोत कायम सुरू राहील. कधीकधी वाटतं हे जग सुरू रहाण्याकरता फक्त आणि फक्त आई नावाची बाई कारणीभूत असते.

त्या छोटीला पटकन बरं वाटू देत अशी प्रार्थना करत मी माझ्या आईचे उत्तम रिपोर्ट हातात घेऊन, तिची आई बनत तिला आधार देत टेस्ट सेंटरमधून बाहेर पडले.

लेखिका : गौरी ब्रह्मे

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चाळीस वर्षांपूर्वी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुचिता पंडित ☆

सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ चाळीस वर्षांपूर्वी– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  सुचिता पंडित ☆

चाळीस वर्षांपूर्वी लग्ने सहज व्हायची आणि घटस्फोट मिळणे अवघड होते. आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपे बनले आहे.

चाळीस वर्षांपूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावे लागायचे. आता कोलेस्टेरॉल आणि कॅलरीजच्या भीतीने लोक खायला घाबरतात.

चाळीस वर्षांपूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे. आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात.

चाळीस वर्षांपूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावे, यासाठी प्रयत्न करायचे. आता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डायट करतात.

चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत असत. आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.

चाळीस वर्षांपूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. आता कुटुंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करत असतात.

चाळीस वर्षांपूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हते. आता संवादासाठी माणसे नाहीत.

याला प्रगती म्हणावी का अधोगती…?

 _कुठे आणि कसे पोहोचलो आपण…?

शोधा म्हणजे सापडेल.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: सुचिता पंडित

 ≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खाण्याची विकृती टाळावी, भारतीय संस्कृती जपावी – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ खाण्याची विकृती टाळावी, भारतीय संस्कृती जपावी – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,

पण जेवणापूर्वी वदनी कवळआणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो llll

वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो,

पण आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो llll

 *

चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,

पण शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो llll

 *

हाताने वरण भात, ताक भात कालवून खायची लाज वाटू लागली,

आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो ll ll

 *

पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो,

पण गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो llll

 *

बिर्याणी, फ्राईड राइस, जिरा राइस खायला शिकलो,

पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय.. ?ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो llll

 *

पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो

आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो llll

 *

दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो,

पण आईने शिकवलेले, एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार विसरलो llll

 *

सॅलड या भपकेदार नावाने झाडपाला खायला शिकलो,

पण कोशिंबीर, चटणी, रायते आणि पंचामृत खायचे विसरलो llll

 *

इटालिअन पिझ्झा, पास्ताची चटक लागली,

आळूची पातळ भाजी, भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll

 *

मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले,

फ्रेश लेमन ज्यूस, सोडा का नाही? म्हणून विचारू लागलो ll११ll

 *

साखर भात, गव्हाची खीर, लापशी इतिहास जमा झाली,

अन स्वीट स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll

 *

मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नॅपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो,

पण पाण्याने खळखळून तोंड धुवायला मात्र विसरलो ll१३ll

 *

फॉरवर्ड झालो, फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना,

स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला (जाणून बुजून) विसरलो…

*

कवी : अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “डॉ. आनंद नाडकर्णी गेले?” – लेखक : श्री प्रसन्न पेठे ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “डॉ. आनंद नाडकर्णी गेले?” – लेखक : श्री प्रसन्न पेठे ☆ शोभा जोशी

बाप रे… ज्यांना आपल्या नावाचा अर्थ परफेक्ट लागू होतो असा “आनंदी” चेहरा लाभलेलं हे व्यक्तिमत्त्व!

परिचय नसतानाही काही माणसं “आपली” वाटून जातात त्यांपैकी हे एक प्रसन्न, हसरं व्यक्तिमत्त्व. जी मराठी माणसं समाजात असल्याचा अभिमान बाळगावा त्यांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी! मला ज्याम आवडायचा हा माणूस. सावकाश नेमके शब्द वापरत समोरच्याला समजावणं भारीच!

मागे एका ‘वेध’च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘स्व’ कसं घडतो ते किती छान सांगितलं होतं – “नेचर, नर्चर, कल्चर आणि युनिकनेस” – या चार गोष्टींनी ‘स्व’बनतो!

थोडक्यात- ‘नेचर’ म्हणजे आपण आपल्या पूर्वसुरींचं गुणसूत्रांतून काय घेऊन येतो, ‘नर्चर’ म्हणजे आपल्यावर होणारे संस्कार, ‘कल्चर’ म्हणजे अर्थातच आजूबाजूचं वातावरण किंवा संस्कृती आणि याबरोबरच आपली अशी जी एक खासियत असते ती म्हणजे आपलं ‘युनिकनेस’!”

आईशप्पथ! किती मस्त बोलून गेलेत डॉक्टर!

आणि डॉक्टरांचं लेखन? ते तर प्रेमात पाडणारंच्च! त्यांचं पहिलं पुस्तक मी वाचलं त्यालाही पस्तीसेक वर्षं होत आली. आणि त्यावेळी त्याला कारणीभूत ठरली होती माझी मैत्रिण शमा! खळखळून हसणाऱ्या शमाशी पहिल्याच भेटीत मैत्र जुळलं! आवडीनिवडी सारख्या असल्यामुळे आमच्या अखंड गप्पा रंगायच्या आणि त्यातच एकदा शमाने सरप्राईझ दिलं. “मैत्रिणीचं नातं” या शीर्षकाचा अफलातून लेख लिहिलेले तीनचार फूलस्केप्स माझ्या हातात ठेवले. मी चाट! आधीच शमाचं सुंदर अक्षर आणि त्यात तो अफलातून लेख! तो वाचला आणि डाॕ. आनंद नाडकर्णींच्या प्रेमातच पडलो. लगोलग जाऊन तो लेख असलेलं डाॕक्टर नाडकर्णींंचं “गद्धेपंचविशी” विकत आणलं. झाली बरीच वर्षं.

आता डॉक्टरांच्या स्मृतींना नमन करत आज परत एकदा “गद्धेपंचविशी”कडे वळेन…

“गद्धेपंचविशी” – मिश्कील, चुरचुरीत, टवटवीत लेखांचं हे पुस्तक!

डॉक्टर आनंद नाडकर्णींना का कुणास ठाऊक ‘आनंदबाबू’च म्हणावंसं वाटतंय. पण शून्य ओळख असल्यामुळे उगाच सलगी नको नै का! तर, डाॕक्टरांनी आपल्या पत्नीला पुस्तक अर्पण करताना पाब्लो नेरुदाच्या एका कवितेतल्या ओळीं दिल्यात आधी त्याच्यातच अडकलोय मी काही क्षण-

” I want to do with you

what spring does —

— to the cherry trees!.. “ 

आह्ह!. दोन ओळींतच किती गहिरी भावना! अर्पणपत्रिका वाचूनच खूष होत मी पुढचं पान उलटतो तर “दुसऱ्या आवर्तनाच्या निमित्ताने” हे मनोगत समोर येतं. त्याच्या शेवटाकडची ही वाक्यं अगदीच्च पटणारी –

“… आता पन्नाशीच्या आतबाहेर असणारे ‘पहिले’ वाचक हे पुस्तक ‘नव्याने’ जवळ घेतील आणि ‘नव्या’ पिढीचे वाचक पहिल्या वाचनासाठी या पुस्तकाला आपलं मानतील अशी आशा व्यक्त करुन, नव्या कपड्यातल्या पण ओळखीच्या दोस्ताला तुमच्या हाती सोपवतो… “

अगदीच डॉक्टर ! तुमचा विश्वास सार्थ आणि यथार्थ ठरवत मी घेतलंच आहे या दोस्ताला जवळ पुन्हा एकवार!

अवघ्या १२४ पानांचं, २१ लेखांचं हे छोटेखानी पुस्तक! पण त्यातनं ताजेपणा.. धमाल.. मिश्किलता… जोष… तारुण्यातला उत्साह जाणवतो. मन प्रसन्न होतं!

८०च्या दशकातले गद्धेपंचविशीतले तरुण जे उद्योग करायचे ते सगळं आलंय यातल्या लेखांमधे! त्याकाळात व्हिसीआर असायचे आणि मग प्रोजेक्टर आणून खोलीतच पडदा लावून पन्नासेक तरुण मित्रांनी धडधडत्या छातीने आणि कमालीच्या औत्सुक्यानं “ब्ल्यू फिल्म्स BF/ ब्ल्यू प्रिंट BP” बघण्याचा प्रसंग आणि बघितल्यावर मनांत उठणारे भावनिक कल्लोळ धमाल शब्दांत मांडलेत डाक्टरांनी!

डाक्टरांचे अनेक पैलू आहेत. डाक्टरकी, कौन्सेलींग करत असताना त्यांनी आपल्यातला नाटककारही छान जपला होता. “आम्ही जगतो बेफाम”, “जन्मरहस्य”, ” रंग माझा वेगळा” सारखी लोकप्रिय नाटकं लिहिणारे नाटककार, कालेजकाळात नाटकं करण्यासाठी काय काय उचापती करायचे ते “इनर्शिया आणि किडा” लेखात समजतं. नाटकातल्या साउंडसाठी जीव धोक्यात घालून मित्रांबरोबर लोकलच्या रुळांवरुन धडधडत जाणाऱ्या लोकलचा आवाज टेप करणं असो, नाटकातल्या अँन्टिएअरक्राफ्ट गनसाठी भंगारातला एअरकंडिशनर मिळवणं असो, एका एकांकिकेच्या प्रत्येक प्रयोगासाठी बांबूच्या कुंपणाच्या नेपथ्यासाठी दरवेळी ताज्या वेली आणणं किंवा प्रयोगाआधी तीनतास कुष्ठरोग्यांसाठीचा मेकअप असो. असे अनेक किडे त्यांनी या लेखात जिवंत केलेत.

मेडिकल कालेजमधला संप, प्रसिद्ध डाक्टरना घेराव.. ती सगळी तयारी… गंमत… अस्वस्थता… पूर्ती.. हे सगळं “आपरेशन ब्लिट्झक्रिग” लेखात आलंय. त्यातलं सुरूवातीचं वाक्य माझ्या डोक्यात घुसलंच एकदम -“हरण्याची खात्री असताना लढाई लढायला जिगर लागते.. ”

मित्राच्या लग्नासाठी त्याच्या प्रेयसीच्या वडिलांशी बोलून केलेल्या यशस्वी मध्यस्थीवर “माझी मध्यस्थी” हा लेख आणि आयुष्यात मुलीकडून नकार पचवायचा आलेली वेळ किंवा त्यांनाच समोरचीला नकार देताना मनात उभे राहिलेले अनेक विचार.. प्रश्न “नकार” या लेखात समोर येतात.  

आणि मग समोर येतो तो “मैत्रिणीचं नातं” हा लेख!माझ्या मनात कायमचा घर करुन बसलेला! अवघ्या तीन-चार पानांचा लेख पण ज्या तरल, संवेदनशीलतेनं लिहिलाय डाक्टरांनी की क्या केहने! त्यातली काही वाक्यं इथे द्यायचा मोह होतोय –

“मैत्रिणीच्या नात्याची गंमत कळायला तशा मैत्रिणी मिळायचं भाग्य मात्र लागतं. मैत्रीण याचा अर्थ “पोरी फिरवणं” असा घेतला तर मात्र सगळंच संपतं. मुलींवर “इंप” मारणं असा घेतला तर त्यातली सारी नजाकतच जाते. सगळीच नाती उत्क्रांत होत जाण्याची एक प्रक्रिया असते. त्या उत्फुल्ल प्रक्रियेचा एक भाग बनून जेव्हा येतं ना हे नातं, तेव्हा त्यात मजा असतो. हा मजा आस्वादायचा असेल तर एक मात्र करावं, या नात्याला चौकटीत बसवू नये. “मानलेली बहीण” वगैरे बनवू नये. मैत्रिणीच्या नात्यामधल्या सेक्शुअलिटीच्या किनारीने आपण का धास्तावतो नेहेमी? अशी किनार या नात्याला असणारच की! मला वाटतं, या धास्तीचं एक कारण असं असावं की सेक्शुअलिटीची म्हणजे लैंगिकतेची किनार असलेल्या प्रत्येक नात्याचा परिपाक ‘समागमातच’ व्हायला पाहिजे अशी आपली रुढ समजूत. लैंगिकता आणि तिचे पदर “समागमापुरते” नसतात. लैंगिकतेच्या तरल किनारींना सामोरं जाण्यासाठीसुद्धा दिलखुलासपणा लागतो.. दोन्ही बाजूंनी.. !” 

“… स्पर्शाला आपण घाबरतो. कारण प्रत्येक स्पर्श जणू शरीरसंबंधांचं आमंत्रण. त्यामुळे स्पर्श आपणहून चोरटा आणि भित्रा बनतो. दोन भिन्नलिंगी व्यक्तिंमध्ये मैत्रीचा जवळिकीचा स्पर्श असू शकत नाही हे प्रमेय कोणी सिद्ध केलं आहे?.. “

“… संधिकालच्या धूसरतेचं कुणी गणिती समीकरण मांडू नये, तसं मैत्रिणीच्या नात्यालासुद्धा नेहेमीच्या मोजपट्ट्या लावू नयेत. नेहेमीच्या मोजपट्ट्या जर लटक्या ठरवायच्या असतील तर मात्र या नात्यासारखं दुसरं नातं नाही.. “

व्वाह्… काय सुरेख लिहिलाय हा लेख तुम्ही डाक्टर!

त्यापुढचा “रिलेटिव्हिटी माझी आणि आईनस्टाइनची” हा लेखही भावणारा! आपल्याला “nice किंवा छान” वाटणारं समोरच्याला वाटेलच असं नाही. ते सापेक्षच वगैरे सांगणारा लेख! डाक्टर लिहितात, ” मला जी ‘छान’ वाटेल ती दुसऱ्याला वाटेलच असं नाही. कदाचित ‘छान’ शब्दामधे फक्त सौंदर्यच अभिप्रेत नसतं म्हणून. जेव्हा सौंदर्य नात्याच्या जाणिवेतून, साथ-संगत शोधण्याच्या उर्मीतून आणि संवादाच्या ओढीतून पाहिलं जातं, तेव्हा त्याचं स्वरुप बदलतं. आता “छान वाटणं” म्हणजे “प्रेम” का? मला वाटतं, प्रेम जमण्याच्या वाटेवरचा पहिला मैलाचा दगड म्हणजे “छान वाटणं”.. प्रेम नावाचा प्रोसेस असतो. त्याला हिरवा कंदील मिळतो तो ‘छान’ वाटण्याचा… प्रेम वगैरे जमो न जमो, तो “छान वाटण्याचा” अनुभव अतिशय जपून ठेवावा असा असतो… “

“मुलगी: एक पाहणे” मधे डाक्टरांनी “ट्रिंग ट्रिंग” होण्याच्या अनुभवाविषयी लिहिलंय. तो मजेदार आहे. “ट्रिंग ट्रिंग” झालं की प्रेम जमतंच असं नाही. पण प्रेम जमायचं असेल तर “ट्रिंग ट्रिंग” व्हावंच लागतं.. ” वगैरे.

आणि असेच सारे. सगळे मिळून २१ छोटे छोटे भावणारे लेख!

डाक्टरांचं हसरं, खेळकर व्यक्तिमत्व, वेगवेगळ्या विषयांवरच्या त्यांच्या बुद्धिमान प्रतिक्रियांमधून उलगडणारं. त्यांच्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि उमद्या लेखणीतनं उतरलेलं हे पुस्तक सदैव टवटवीत राहणारं आणि गद्धेपंचविशीतल्याच नव्हे तर कोणत्याही वयातल्या कुणालाही आपलंसं वाटणारं!

डॉक्टरांना आदरपूर्वक नमन!

 लेखक : श्री प्रसन्न पेठे

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares