मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अथांग मुक्तधारा… कवयित्री : राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ अथांग मुक्तधारा… कवयित्री : राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

प्रत्येकालाच कुठे जमते

सहज सुंदर बरसणे

​मनातली ओल जपत

पाऊस होऊन जगणे

 

​तो येतो तसाच

कोणताही मुखवटा न घालता

​धरेच्या कुशीत विरतो

स्वतःचे अस्तित्व न राखता

 

​आपण मात्र जगतो

हिशोबाच्या जगात भावनांच्या

​काठोकाठ भरूनही दाटतात

भिंती कोरड्या अहंकाराच्या

 

​पावसाकडे नसते कधी

भेदाभेदाची कोणतीच पट्टी

​तो सुवर्णमहालावरही बरसतो

आणि गरिबाच्या झोपडीवरही

 

​आपले प्रेम मात्र

शर्तींच्या चौकटीत अडकलेले

​माणसाचे दातृत्व नेहमी

स्वार्थाच्या तराजूत तोललेले

तो ढग होऊन येतो

आणि मुक्तहस्ते उधळतो

​आपण अमृताचा संचय करून

त्यालाच गळती लावतो

त्याच्या एका थेंबात

अंकुराचे प्राण हसतात

​आपल्या हजारो शब्दांत

नाते मात्र मुके राहतात

 

​निसर्गाचे हे देखणे रूप

कधीतरी माणसाला उमजावे

​पावसासारखे निखळ होऊन

फक्त देता देता उरावे…

कवयित्री : प्रा. राजश्री पाटील

प्रस्तुती : सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आषाढ तळावा… लेखक : डॉ.शिवानंद सासरे ☆ प्रस्तुती: प्रज्ञा गाडेकर ☆

प्रज्ञा गाडेकर

 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आषाढ तळावा… लेखक : डॉ.शिवानंद सासरे ☆ प्रस्तुती: प्रज्ञा गाडेकर ☆

 

लेखक: 

 

आषाढ तळावा.. श्रावण भाजावा..

भाद्रपद उकडावा..!

पण हे असंच का?

पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्य-योग ! पावसाळा हा केवळ ऋतू नसून, निसर्गाच्या रसपूर्ण लीला अनुभवण्याचा एक सु-काळ होय. “तळणं, भाजणं आणि उकडणं..” या एकाच पावसाच्या तीन रूपांतरामागे लपलेलं आहे – आयुर्वेदिय तत्वज्ञान, शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र! पण असं खाणं कितपत सुरक्षित आहे ? असं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं ?

 

१) आषाढ म्हणजे पावसाचा श्रीगणेशा.‌ आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधे- गुडघेदुखी, सर्दी- फडसे, थंडीताप, infections अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर आषाढात “तळलेलं” खाणं हा अफलातून उपाय आहे !

 

विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात. तळलेलं अन्न हेच त्यावेळी “औषध” बनते. आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडते !

 

म्हणूनच मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील.

 

शिवाय पावसाचा पहिला रोमॅंटिक स्पर्श.. कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदाभजी.. आणि कपातला उबदार चहा.. यासारखा Instant Romantic अंतर्बाह्य “आषाढ डायट” जगात शोधूनही सापडणार नाही !

 

२) श्रावण म्हणजे सणांचा महिना. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. वात हळूहळू कमी होऊन शरीरावयवांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशावेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्त आटोक्यात ठेवणे महत्त्वाचं, म्हणून श्रावणात “भाजलेलं” खाणं सर्वोत्तम आहे.

 

आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मका, वाटाणा, वांग्याचं सुगंधी भरीत, मातीचा वास घेणारी भाजलेली ज्वारीची भाकरी, भाजलेले पापड,‌ तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इ. सर्व पित्ताचा राग थोपवतात. परिणामी ऍसिडिटी, मायग्रेन, हाय-बिपी, मुळव्याध ह्या तक्रारींचा जन्म होत नाही.

 

आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे “श्रावणमासी हर्ष मानसी…” असं म्हटलेलं आहे.

 

३) भाद्रपद म्हणजे ‌परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे उद्रेक उत्पन्न करतो (ie पित्ताचा प्रकोप होतो).

 

हाच तो काळ जिथे जरा चुकीचं खाल्लं, की हार्टअटॅक, पॅरालीसीस, तीव्र ताप, कोणताही क्षुल्लक आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी घडू लागतात. परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू ह्याच महिन्यात होताना दिसतात.

 

अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत. जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्त प्रकोप व्हायला वाव भेटणार नाही. याचसाठी भाद्रपदात “उकडलेलं” खाणं अगदी योग्य आहे.

 

जसे की, उकडलेल्या शेंगा, कंदमुळं, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेला भात इ. प्रयत्नपूर्वक खाल्ल्याने October HEAT चे रूपांतर आपण October HIT मध्ये नक्की करू शकतो.

 

कदाचित म्हणूनच गणपती, गौरी, दुर्गा या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपदाचाच आसमंत निवडतात. कारण उकडलेलं अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता व शांतीचा स्पर्शच ! नाही का ?

लेखक:डॉ. शिवानंद बासरे

प्रस्तुती: प्रज्ञा गाडेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आईने दिलेलं सुंदर उत्तर…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आईने दिलेलं सुंदर उत्तर…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

“मम्मी, तू आणि बाबांनी अनंत अडचणी असताना त्या काळात लग्न केलंत आणि एकमेकांना खूप समजून घेतलं.

गेली छत्तीस वर्षं संसार केलात. !

आमच्या पिढीला का गं जमत नाही हे.. ?”

तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली.

चार वर्षं मज्जेत ‘बॉयफ्रेन्ड’ असलेल्याचा आठ महिन्यापुर्वी ‘हजबन्ड’ झाल्यानंतरचा हा राग होता.

“प्रश्न विचारलास का?” पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली, “उत्तर हवंय का?”

“हो, उत्तर हवंय, ” लेक म्हणाली.

 “असे आहे न बाळा, ” आई सहजच म्हणाली…

“आम्ही ‘कसं जमवता येईल’ ते शोधत होतो, तुम्ही ‘जमलं तर पाहू’ म्हणताय.

 

आमच्या वेळी प्रेम हे व्हायचं,

तुमच्या काळात ते केलं जातं.

 

आम्ही साथीदार व्हायचो,

तुम्ही भागीदार बनवता.

 

आमच्यात प्रेम ही सहजता होती,

तुमच्यात तो अट्टहास झालाय.

 

आमचं प्रेम लहानाचं मोठं व्हायचं,

तुमचं प्रेम लहानपणीच घाई करतं.

 

आमच्या वेळी मैत्री विश्वासात रूपांतरित व्हायची,

तुम्ही ‘जवळिकीला’ रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई करताय.

 

आम्ही कविता लिहायचो, तुम्ही त्या फॉरवर्ड करताय.

 

आमचे ‘जीवनसाथी’ होते,

तुमचे ‘बॉयफ्रेन्ड’ नि ‘गर्लफ्रेन्ड’ आहेत.

 

आमचं प्रेम आमच्यासाठी होतं,

तुमचं प्रेम ‘सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहिजे’, म्हणून केलं जातंय.

 

आमचे बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं. तुमच्यात इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहिजे तसा बॉयफ्रेन्डही असलाच पाहिजे.

 

आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित करायचो; तुमच्या गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल, याची कॅलक्युलेशन्स असतात.

 

आम्ही धुंद होतो;तुम्ही उधळलेले आहात.

 

आम्ही चेहऱ्यावरचं तेज शोधायचो;

तुम्ही शर्टचा ब्रान्ड पाहताय.

 

आम्हाला नजरेतली समजदार चमक भाळायची,

तुम्हाला गॉगलच्या किमती भुरळ घालतायत.

 

आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता;

तुमच्या मनालाच तो नकोय.

 

बाळा… जमणं, न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं.

क्षमता डेव्हलप करायची असते.. !

 

जगता आलं पाहिजे,

मरता केव्हाही येतं,

पण जगता आलं पाहिजे. !

सुख भोगता केव्हाही येतं,

पण दुःख पचवता आलं पाहिजे.

रंग सावळा म्हणून काय झालं,

कर्तृत्व उजळता आलं पाहिजे.

रंग गोरा असला म्हणून काय झालं,

मनावरील काजळी काढता आली पाहिजे.

यशानं माणूस उंच जातो,

पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत.

मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.

पाप काय?

कसंही करता येतं,

पण पुण्य करता आलं पाहिजे.

ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे.

ठेच जीवनात लागतेच,

सहन करता आली पाहिजे.

मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे.

शहाण्याचं सोंग घेऊन,

वेडं होता आलं पाहिजे.

कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे.

जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,

ती उणीव भरता आली पाहिजे.

हास्य आणि अश्रूचा मिलाप करून,

फक्त समाधानी राहता आलं पाहिजे…

आयुष्य खूप सुंदर आहे

 भरभरून जगता आले पाहिजे. “

 

जे काही लिहिले आहे ते आजच्या पिढीला डोळ्यात अंजन घालणारे आहे.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माणूस आजाराने मरत नाही… – लेखक : . अखिलेश राजूरकर ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ माणूस आजाराने मरत नाही… – लेखक : . अखिलेश राजूरकर ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

माणूस आजाराने मरत नाही; तो कारणं संपली की मरू लागतो…

मी गेली अनेक वर्षे आयसीयूमध्ये काम करतो आहे.

हजारो रुग्ण पाहिले.

हजारो नातेवाईकांचे डोळे पाहिले.

हजारो वेळा मृत्यूला दारात उभं पाहिलं.

आणि तरीही, आजही काही गोष्टी मला आश्चर्यचकित करतात.

 

मी जे लिहितो आहे ते कोणतं संशोधन नाही. कोणताही वैद्यकीय निष्कर्ष नाही. याला अनेक अपवाद असतील. अचानक घडणारे अपघात, क्षणात होणारे मृत्यू, नियतीचे काही क्रूर फटके — मी त्याबद्दल बोलत नाही.

 

मी त्या संघर्षाबद्दल बोलतो आहे जो आयसीयूमध्ये दिवसेन्-दिवस चालतो.

जिथे जीवन आणि मृत्यू दोघेही एकाच खोलीत बसलेले असतात.

जिथे एखाद्या माणसाला चार दिवस, आठ दिवस, कधी चार आठवडे लढावं लागतं.

 

या संघर्षात मला एक गोष्ट वारंवार दिसली आहे.

काही रुग्ण असे असतात की त्यांच्या शरीरात आजारांशिवाय दुसरं काहीच नसावं असं वाटतं.

डायबिटीज.

रक्तदाब.

थायरॉईड.

जुना हार्ट अटॅक.

पक्षाघात.

किडनीचे विकार.

फुफ्फुसांचे आजार.

 

त्यांचे अहवाल पाहिले की वैद्यकीय भाषेत त्यांच्याबद्दल आशावादी राहणं कठीण वाटतं.

पण हेच लोक कधी कधी मृत्यूच्या दारातून परत येतात.

हळूहळू बसायला लागतात.

पुन्हा चालतात.

पुन्हा घरी जातात.

आणि काही महिन्यांनी OPD मध्ये हसत भेटायला येतात.

 

दुसऱ्या बाजूला एखादा रुग्ण असतो.

वयाने कमी.

मोठे आजार नाहीत.

तुलनेने निरोगी.

पण तो मात्र आपल्या हातातून निसटून जातो.

 

वर्षानुवर्षे हे पाहिल्यानंतर मी स्वतःला एक प्रश्न विचारू लागलो.

नेमकं काय असतं ते, जे काही लोकांना परत खेचून आणतं?

काय असतं ते, जे काही लोकांना मृत्यूच्या सावलीतूनही चालत बाहेर आणतं?

 

वैद्यकीय विज्ञान त्याची अनेक उत्तरं देतं.

पण सगळी उत्तरं देत नाही.

आणि कालांतराने मला एक गोष्ट जाणवू लागली.

कदाचित माणूस किती आजारी आहे, हे नेहमी महत्त्वाचं नसतं.

कधी कधी त्याला अजून किती जगायचं आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं.

त्याला अजून मुलाचं लग्न बघायचं असतं.

मुलीचा संसार उभा राहिलेला पाहायचा असतो.

नातवाला मोठं होताना पाहायचं असतं.

कर्ज फेडायचं असतं.

घर बांधायचं असतं.

एखादं स्वप्न पूर्ण करायचं असतं.

किंवा फक्त घरी परत जाऊन आपल्या माणसांमध्ये पुन्हा बसायचं असतं.

 

व्हेंटिलेटरवर पडलेले अनेक रुग्ण मला आजही आठवतात.

त्यांच्या शरीरात शक्ती उरलेली नसते.

पण त्यांच्या डोळ्यांत भविष्य उरलेलं असतं.

आणि मला वाटतं, त्या भविष्याची ओढच त्यांना परत आणत असते.

 

आयसीयूमध्ये मशीन हृदयाचे ठोके मोजतात.

ऑक्सिजन मोजतात.

रक्तदाब मोजतात.

शरीरातल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीचं मोजमाप करतात.

 

पण एक गोष्ट मोजण्यासाठी अजून कोणतंही मशीन तयार झालेलं नाही.

“या माणसाकडे अजून किती जगण्याची कारणं उरली आहेत?”

कदाचित हीच ती संख्या आहे जी सर्वात महत्त्वाची असते.

 

मी अनेक वृद्ध जोडपी पाहिली आहेत.

पन्नास-साठ वर्षे एकत्र जगलेली.

त्यांपैकी एक व्यक्ती गेल्यानंतर दुसरी फार काळ जगत नाही.

कदाचित त्याला वैद्यकीय स्पष्टीकरण असेल.

पण एक डॉक्टर म्हणून अनेकदा मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्याचा अर्थच हरवलेला असतो.

त्यांच्या जगण्याचं कारण निघून गेलेलं असतं.

आणि ज्या दिवशी कारणं संपतात, त्या दिवशी माणूस थोडा थोडा मरायला लागतो.

 

उलट एखादा बाप असतो.

अत्यंत गंभीर अवस्थेत.

पण त्याला अजून मुलांना उभं करायचं असतं.

घर सांभाळायचं असतं.

जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतात.

आणि अशा लोकांना मी मृत्यूच्या दारातून परत फिरताना पाहिलं आहे.

 

म्हणून आज इतकी वर्षे आयसीयूमध्ये उभं राहिल्यानंतर जर कोणी मला विचारलं की जीवनाबद्दल सर्वात मोठा धडा कोणता मिळाला?

तर मी एवढंच सांगेन—

माणूस फक्त श्वासांवर जगत नाही.

तो फक्त हृदयाच्या ठोक्यांवर जगत नाही.

तो फक्त औषधांवरही जगत नाही.

तो जगतो त्या कारणांवर, ज्यासाठी त्याला उद्या पुन्हा डोळे उघडायचे असतात.

 

कदाचित म्हणूनच मानसोपचारतज्ज्ञ Viktor Frankl यांनी लिहिलं होतं—

“He who has a why to live can bear almost any how. “

“ज्याच्याकडे जगण्याचं कारण असतं, तो कोणताही संघर्ष सहन करू शकतो. “

आयसीयूने मला या एका वाक्याचा अर्थ रोज शिकवला आहे.

 

आजार शरीराला कमकुवत करतात.

पण आशा माणसाला जिवंत ठेवते. हा प्रकार फेसबुकवर पोस्ट केल्यास लोक “लाईक” करून पुढे जाणार नाहीत; ते शेवटपर्यंत वाचतील, स्वतःच्या आई-वडिलांचा, जोडीदाराचा किंवा एखाद्या ICU अनुभवाचा विचार करतील. तिथेच लेख जिंकतो.

*

लेखक :डॉ. अखिलेश राजूरकर

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जगणं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुचिता पंडित ☆

सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ जगणं– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  सुचिता पंडित ☆

 येईल साठी, येईल सत्तरी

 करायची नाही कुणीच चिंता,

 प्रत्येक दिवस मजेत जगायचा

 वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता.

*

 वय झालं म्हातारपण आलं,

 उगाच कोकलत बसायचं नाही.

 विनाकारण बाम लावून,

 चादरीत तोंड खुपसायचं नाही.

*

 तुम्हीच सांगा छंद जोपासायला,

 वयाचा संबंध असतो का ?

 रिकामटेकडं घरात बसून

 माणूस आनंदी दिसतो का ?

*

 पोटा-पाण्यासाठी पोरं-सुना

 घर सोडून जाणारच,

 प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये

 असे रितेपण येणारच.

*

 करमत नाही करमत नाही

 सारखे-सारखे म्हणायचे नाही,

 आवडत्या कामात दिवस घालवायचा

 उगाचच कुढत बसायचं नाही.

*

 घरातल्या घरात वा बागेत

 हिंडाय-फिरायला जायचं,

 वय जरी वाढलं असलं तरी

 मनपसंत गाणं मनमोकळं गायचं.

*

 गुडघे गेले, कंबर गेली

 नेहमी नेहमी कण्हायचं नाही,

 आता आपलं काय राहिलं?

 हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही.

*

 पिढी दर पिढी चालीरीतीत

 थोडे फार बदल होणारच,

 पोरं-पोरी त्यांच्या संसारात

 कळत नकळत गुंतणारच.

*

 तू-तू, मै-मै, जास्त अपेक्षा

 कुणाकडूनही करायची नाही,

 मस्तपैकी जगायचं सोडून

 रोज थोडं थोडं मरायचं नाही.

*

 स्वत:च स्वत:ला समजवायचं असतं

 पुढे पुढे चालत राहायचं असतं,

 वास्तू ‘तथास्तु’ म्हणत असते

 हे उमजून निरामय जगायचं असतं.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: सुचिता पंडित

 ≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रेमाची ताकद” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “प्रेमाची ताकद” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले..!

गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते..!

अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला तर राधा शांत-चित्त होती..!

गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली…

“कसे आहात ‘द्वारकाधीश’..? “

जी राधा त्याला कान्हा-कान्हा म्हणायची तिने ‘द्वारकाधीश’ असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला…

“राधे, मी आज देखील तुझा ‘कान्हा’च आहे..! तू तरी मला ‘द्वारकाधीश’ म्हणू नकोस गं ss..!

खूप दिवसांनी भेटतो आहोत.. एकमेकांशी सुख-दुःखाच्या गप्पा मारू… एवढ्या धावपळीत मला जेव्हां जेव्हां तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती.. * राधा म्हणाली.. “खरं सांगू..? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही..! कारण, तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही..! आणि माझ्या नजरेत तूच होतास.. फक्त तू..! त्यामुळे माझ्या अश्रूंबरोबर तू वाहून जावू नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही..!

प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू..? “

श्रीकृष्ण ऐकतच राहिला..

राधा म्हणाली..

“तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे..! गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणालाही कधीच भेटला नाहीस..! तू खूप मोठा झालास.. तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली..!

पण ह्या प्रगतीमध्ये तुझी अधोगती किती झाली..! यमुनेच्या पवित्र गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरु झाले.. त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी थेट द्वारकेस जावून पोहोचलास..!

एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरवसा ठेवलास.. पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला तू विसरलास..!

कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास, तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस..!

‘कान्हा’ आणि ‘द्वारकाधीश’ ह्यांत काय फरक आहे सांगू…?

तू ‘कान्हा’ असतास तर तू सुदामाच्या घरी गेला असतास.. सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं..!

प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे..!

‘युद्धात’ जीव घेतला जातो..!

आणि..

‘प्रेमात’ जीव ओवाळून टाकला जातो..!

कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही..!

तू तर ‘त्रैलोक्याचा स्वामी’ आहेस.. महान अशी ‘भगवद्गीता’ तू जगाला सांगितलीस..! पण तू स्वतः काय निर्णय घेतलास..?

तू राजा होतास.. प्रजेचा पालक होतास आणि तुझेच सैन्य तू कौरवांना देवून टाकलेस..?

तू स्वतः अर्जुनासारख्या ‘महारथी’चा सारथी बनलास, अर्जुनाचा ‘मार्गदर्शक’ झालास.. त्याच अर्जुनाने तुझेच सैन्य तुझ्याच नजरेसमोर मारून टाकले..?

कृष्णा, अरे तुझे सैन्य तुझीच प्रजा होती ना..? आणि प्रजा तर स्वतःच्या मुलांप्रमाणे असते..! तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास..!

इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा..? मग जा, पृथ्वीवर जाऊन बघ.. तुझी ‘द्वारकाधीश’ वाली प्रतिमा शोध..!

नाही सापडणार तुला शोधूनही..!

जिथे जाशील तिथे.. घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन..!

होय कान्हा, मला गीतेचे महत्त्व माहीत आहे. आज देखील पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते..! समाज गीतेला पूज्य मानतो..! पण भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारका-नरेश श्रीकृष्णावर नाही तर प्रेम करणाऱ्या ‘कान्हा’वर ठेवतो..!

गीतेमध्ये राधेचा तर दुरून देखील उल्लेख नाही..! पण आजही लोक गीतेचा – तुझ्या महान भगवद्गीतेचा – समारोप करताना ‘राधे-कृष्ण राधे-कृष्ण’ असाच जप करतात..!

हीच ती खऱ्या प्रेमाची खरी ताकद..!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मनाच्या वाड्यात गडबड झाली” – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “मनाच्या वाड्यात गडबड झाली” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची पंचायत भरली… आली आली ग आठवण बाई… आली ग आठवण बाई…

कोपऱ्यात बसलेले एक जुने दुःख उठले… डोळे चोळीत म्हणाले… अहो, आमचे काय ठरले? आम्ही अजून मनातच राहायचे का?

तेवढ्यात आनंदराव दारातून आत आले… हातात हास्याचे गाठोडे… खांद्यावर समाधानाचे उपरणे…

आनंदराव म्हणाले… काय रे, अजून हीच मंडळी? अजून हीच दुःखे? अजून हाच बाजार? दहा वर्षांपूर्वीचा अपमान… पंधरा वर्षांपूर्वीचा राग… वीस वर्षांपूर्वीचे अपयश… अहो, एवढा जुना माल अजून गोदामात ठेवला आहे?

तेवढ्यात एक दुःख फुगून म्हणाले… आम्ही खास आहोत… आम्ही भावनिक आहोत…

आनंदराव हसले… म्हणाले, भावनिक नाही रे बाबा… तुम्ही आता निर्माल्य झाला आहात… कालची फुले आज निर्माल्य होतात… मग कालची दुःखे आज ताजी कशी?

प्रश्न बरोबर होता… दुःखे गप्प बसली…

एवढ्यात श्रद्धाबाई पुढे आल्या… त्यांनी देवाच्या चरणी फुलांची परडी ठेवली… म्हणाल्या… ही फुले माझी होती… आता त्याची झाली…

मग दुःखांचे काय?

तीही त्याचीच…

देवा… हे राग तुझे… हे अपयश तुझे… ही चिंता तुझी… आता तूच सांभाळ…

हे ऐकताच मनाच्या वाड्यात कुजबुज सुरू झाली… अहो… आपण तर दुःखांना कायमस्वरूपी भाडेकरू ठेवले होते… आता त्यांना नोटीस मिळाली वाटते…

तेवढ्यात भारूड सुरू झाले…

मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची उचलबांगडी झाली… आली आली ग आनंद बाई… आली ग आनंद बाई…

एक दुःख पुटपुटले… आम्ही जाऊ कुठे?

आनंदराव म्हणाले… गंगार्पण व्हा… निर्माल्य घरात ठेवत नाहीत… मनातही ठेवत नाहीत…

जाता जाता एक जुनी चिंता म्हणाली… माझी आठवण येईल…

मन हसले… म्हणाले… नाही गं… तुझ्या जागी आता आनंदाची पेरणी करायची आहे…

तेवढ्यात शेतकरीबुवा आले… म्हणाले… जमिनीतील तण काढले नाही तर पीक येत नाही… मनातील दुःख काढले नाही तर आनंद उगवत नाही…

वा रे वा… मनाला मुद्दा पटला…

राग बाहेर… मत्सर बाहेर… अहंकार बाहेर… दुःख बाहेर…

आत फक्त प्रेम… आत फक्त विश्वास… आत फक्त आनंद…

तेवढ्यात समाधानराव टाळी वाजवून म्हणाले…

ठरले… ठरले… ठरले…

दुःखांचे निर्माल्य करायचे ठरले… आनंदाची पेरणी करायची ठरली…

मनाच्या वाड्यात पुन्हा उजेड झाला… आनंदाच्या घोषणा सुरू झाल्या…

जय समाधान… जय समाधान…

जय आनंद… जय आनंद…

आणि मनाच्या दारात बसलेला अनुभव नावाचा म्हातारा हसून म्हणाला…

“देवाला वाहिलेली फुले परत मागत नाहीत… मग त्याच्या चरणी ठेवलेली दुःखे पुन्हा उचलून का घ्यायची? “

 – दुःखांचे निर्माल्य करण्याचा सल्ला देणारा एक साधा निरीक्षक..

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आसक्ती आणि प्रेम” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आसक्ती आणि प्रेम” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

आसक्ती (Attachment) आणि प्रेम (Love) हे वरवर पाहता सारखे वाटतात, पण त्यांचे स्वरूप खूप वेगळे असते.

 आसक्ती म्हणजे काय?

आसक्तीमध्ये “मला तू हवा/हवी आहेस” हा भाव असतो.

त्यात अपेक्षा, मालकीभाव आणि भीती असते.

समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागली नाही तर दुःख, राग किंवा असुरक्षितता निर्माण होते.

आसक्ती स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याला धरून ठेवते.

उदा.: “तू माझ्याशीच बोलले पाहिजेस, माझ्याशिवाय कुठे जाऊ नकोस” — हा आसक्तीचा भाव आहे.

प्रेम म्हणजे काय?

प्रेमामध्ये “तू आनंदी राहा” हा भाव असतो.

त्यात स्वातंत्र्य, स्वीकार आणि समर्पण असते.

प्रेम देण्यात आनंद असतो; बदल्यात काही मिळावे अशी अपेक्षा नसते.

प्रेम दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करते.

उदा.: “तू जिथे असशील तिथे आनंदी राहा, तुझे भले होवो” — हा प्रेमाचा भाव आहे.

 योगवासिष्ठाच्या दृष्टीने आसक्ती मनाला बांधून ठेवते, तर प्रेम मनाला विस्तार देते. आसक्तीत संकुचित “मी आणि माझे” असते; प्रेमात सर्वांना सामावून घेणारी विशालता असते.

गुरुदेव श्री श्री रविशंकरजी म्हणतात:

“प्रेम तुमचा स्वभाव आहे, आणि आसक्ती हे प्रेमाचे विकृत रूप आहे.”

जेव्हा प्रेमात भीती, अपेक्षा, मत्सर, मालकीभाव मिसळतो तेव्हा ते आसक्ती बनते. आणि जेव्हा प्रेम शुद्ध, निरपेक्ष आणि व्यापक होते तेव्हा ते मुक्तीचा मार्ग बनते.

थोडक्यात:

आसक्ती म्हणते: “तू माझा/माझी आहेस.”

प्रेम म्हणते: “मी तुझा/तुझी आहे.”

आसक्ती बांधते.प्रेम मुक्त करते.

आसक्तीत आई म्हणते, “मुलाने माझेच ऐकले पाहिजे. माझ्याशिवाय त्याने कोणताही निर्णय घेऊ नये. तो दूर गेला तर मी जगू शकणार नाही.”

येथे मुलाच्या भल्यापेक्षा “माझे” हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे चिंता, भीती आणि दुःख निर्माण होते.

प्रेमात आई म्हणते, “माझ्या मुलाने प्रगती करावी, आनंदी राहावे. त्याला जिथे चांगल्या संधी मिळतील तिथे जावे.”

मुलगा दूर गेला तरी तिच्या मनात त्याच्याविषयी शुभेच्छा आणि प्रेमच असते!

* * * *

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मी आणि माझं शांत, समाधानी मन” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “मी आणि माझं शांत, समाधानी मन” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

रेल्वे गाडी हळूहळू स्टेशन सोडत होती.

खिडकीतून थंडगार वारा येत होता. समोरच्या बर्थवर माझी नजर गेली. एक हसरा चेहरा. वय साधारण ६५ च्या आसपास. एकटीच प्रवास करत होती. पाठीवर एक छोटी बॅग. मनालीची सोलो ट्रिप.

मी सहज विचारलं, “काकू, एकट्याच?

भीती नाही वाटत?”

त्या मनापासून हसल्या. अशा हसल्या, की जणू अनेक वर्षांचे ओझे त्या हसण्यात विरघळून गेले.

त्या म्हणाल्या, “बाळा, भीती तेव्हा वाटायची, जेव्हा सगळे सोबत होते. आता एकटी आहे, म्हणून खऱ्या अर्थाने मोकळी आहे.”

गप्पांच्या ओघात त्यांनी मला

एक सुंदर जीवनधडा दिला…

त्या म्हणाल्या, “मी साठीनंतर जगायला शिकले. जेव्हा मी काही गोष्टी सोडून दिल्या…”

१. नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडला. “पूर्वी नवरा, मुलं, पैसा — सगळं आपल्या मुठीत ठेवायचा प्रयत्न करायचे. आता वाळूसारखं वाहू देते. मन खूप हलकं वाटतं.”

२. लोकांकडून अपेक्षा ठेवणं सोडलं. “मुलाने फोन केला तर आनंद, नाही केला तरी ठीक. मी त्याला जन्म दिला आहे, त्याच्यावर मालकी हक्क नाही.”

३. लोकांना बदलण्याचा प्रयत्न सोडला. “पन्नास वर्षे नवऱ्याला बदलण्याचा प्रयत्न केला. तो तसाच राहिला. मग मी स्वतःला बदललं… आणि आयुष्यात शांतता आली.”

४. प्रत्येकाला खूश ठेवण्याची धडपड सोडली. “सून, नातेवाईक, समाज  सगळ्यांना खूश करताना स्वतःलाच विसरून गेले होते. आता स्वतःशी प्रामाणिक राहते.”

५. प्रत्येक चुकीसाठी स्वतःला दोष देणं सोडलं. “भाजीत मीठ कमी-जास्त झालं, तर दिवसन्-दिवस मनाला लावून घ्यायचे. आता म्हणते – मी माणूस आहे, देव नाही.”

६. प्रत्येक परिणामाची चिंता करणं सोडलं. “रेल्वे वेळेवर येईल की उशिरा, हे माझ्या हातात नाही. मग काळजी कशाला? चहा पिते आणि निसर्गाचा आनंद घेते.”

७. भविष्याच्या भीतीने वर्तमान जगणं सोडलं. “उद्या गुडघे दुखतील म्हणून आज डोंगर चढायचा नाही? आज ताकद आहे, तर आजचा दिवस जगते.”

८. आपल्या हातात नसलेल्या गोष्टींवर ऊर्जा खर्च करणं सोडलं. “कोण काय बोलेल, राजकारणात काय होईल, शेजारी काय म्हणतील, हे सगळं सोडलं. आता रक्तदाबही सामान्य राहतो.”

आता काय करते?

“स्वतःची काळजी घेते. स्वतःशी संवाद साधते. लोक काय बोलतात ते एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते.”

खिडकीबाहेर पाहत त्या म्हणाल्या..

“पाणी कोणत्या दिशेने वाहील हे माझ्या हातात नसतं बाळा… पण वादळातही माझी नाव डगमगू नये म्हणून वल्हं कसं चालवायचं,हे माझ्या हातात असतं.”

सुख आणि समाधान मॉलमध्ये मिळत नाही.

समाधान त्या उशीत असतं, जिथे कोणतीही तक्रार न करता शांत झोप लागते.

समाधान त्या पावलांत असतं, जी कोणत्याही भीतीशिवाय एकटी चालायला शिकतात.

मनाली स्टेशन जवळ आलं.

त्या उतरता उतरता म्हणाल्या..

“तरुणपणी मी जगाशी नाती जोडत राहिले… आता या उतारवयात स्वतःशी नातं जोडते आहे.”

म्हणूनच मी हसते… कारण आता माझ्यावर कोणतंही ओझं नाही. आता फक्त मी आहे… आणि माझं शांत, समाधानी मन.”

जीवनाचा खरा आनंद इतरांना बदलण्यात नाही, तर स्वतःला समजून घेण्यात आणि स्वीकारण्यात आहे.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सुदामा…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सुदामा…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

सुदाम्यासोबत बोलता बोलता श्रीकृष्ण कधी त्याचे पाय दाबू लागले, हे सुदाम्याला कळलंच नाही. सुदामा तर झोपून गेला होता, पण कृष्ण स्वतःच्या विचारांत मग्न होऊन त्याचे पाय दाबत दाबत बालपणाच्या आठवणी बोलत होते. इतक्यात रुक्मिणीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.

कृष्ण दचकले. आधी त्यांनी रुक्मिणीकडे पाहिले, मग सुदाम्याकडे, आणि परिस्थिती समजताच तेथून उठून आपल्या कक्षात आले.

कृष्णांची अशी अवस्था पाहून रुक्मिणी म्हणाल्या, “स्वामी, आज तुमचं वर्तन फारच अद्भुत वाटत आहे.

तुम्ही.. जे, या जगातील सर्वात मोठे सम्राट जरी द्वारकेत आले तरीही जरा सुद्धा प्रभावित होत नाही, ते आपल्या मित्राच्या आगमनाच्या बातमीने इतके भावूक झालात की जेवण सोडून उघड्या पायाने त्याला घ्यायला धावत गेलात.

तुम्ही, ज्यांना कोणतंही दुःख, कष्ट किंवा आव्हान कधी रडवू शकले नाही, अगदी गोकुळ सोडताना माई यशोदांच्या डोळ्यातले अश्रू पाहूनही तुम्ही रडला नाहीत, ते तुम्ही तुमच्या मित्राचे जीर्ण- शीर्ण आणि जखमांनी भरलेले पाय पाहून इतके भावुक झालात की तुमच्या अश्रूंनीच त्याचे पाय धुतले.

कूटनीती, राजकारण आणि ज्ञानाचे शिखर असलेले तुम्ही, तुमच्या मित्राला पाहून इतके तल्लीन झालात की विचार न करता त्याला तिन्ही लोकांची सर्व संपत्ती आणि समृद्धी देण्याचा निर्णय घेतलात. “

कृष्ण त्याच आनंदी अवस्थेत म्हणाले, “तो माझा बालपणीचा ‘मित्र’ आहे, रुक्मिणी. “

“पण बालपणी गुरुमातेनं तुम्हा दोघांना वाटून खायला दिलेले हरभरे त्याने तुमच्यापासून लपवून खाल्ले होते ना?  मग अशा मित्रासाठी एवढी भावना का? ” सत्यभामेनेही आपली उत्सुकता व्यक्त केली.

कृष्ण हसत म्हणाले, “सुदाम्याने असं कार्य केलं आहे, सत्यभामे, की संपूर्ण सृष्टीने त्याचे आभार मानले पाहिजेत. त्याने ते हरभरे भुकेमुळे नाही खाल्ले, तर यासाठी खाल्ले की त्याला नको होतं की त्याचा मित्र कृष्ण दारिद्र्य पाहो.

त्याला माहिती होतं की ते हरभरे आश्रमात चोरांनी सोडून दिले होते, आणि ते एका ब्राह्मण स्त्रीच्या घरातून चोरले गेले होते. त्याला हेही ठाऊक होतं की त्या ब्राह्मण स्त्रीनं शाप दिला होता की जो कोणी ते हरभरे खाईल, तो आयुष्यभर दरिद्री राहील.

सुदाम्याने ते हरभरे माझ्यापासून लपवून खाल्ले, जेणेकरून मी सुखी राहीन. तो मला ईश्वराचा अंश मानत होता, म्हणून त्याने ते खाल्ले, कारण त्याला वाटलं की जर ईश्वरच दरिद्री झाला, तर संपूर्ण सृष्टीच दरिद्री होईल. सुदाम्याने संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी स्वतः दरिद्री होणं स्वीकारलं. “

“इतका मोठा त्याग?  ”असं रुक्मिणीच्या तोंडून आपोआपच निघालं.

“माझा मित्र ब्राह्मण आहे, रुक्मिणी, आणि ब्राह्मण ज्ञानी व त्यागी असतात. त्यांच्या हृदयात जनकल्याणाची भावना ओसंडून भरलेली असते. काही अपवाद वगळता ब्राह्मण असेच असतात.

आता तुम्हीच सांगा, अशा मित्रासाठी हृदयात प्रेम निर्माण होणार नाही तर काय होणार, प्रिये?  गोकुळ सोडताना मी म्हणून रडलो नाही, कारण मी रडलो असतो तर माझ्या माईने प्राण सोडले असते. पण माझ्या मित्राचे असे पाय पाहून, त्यातील जखमा पाहून माझं हृदय भरून आलं, रुक्मिणी.

त्याच्या पायांवरील या जखमा आणि आयुष्यातील ही अवस्था फक्त यासाठी झाली की तो आपल्या या मित्राचं भलं इच्छित होता.

रुक्मिणी, कुटुंबाव्यतिरिक्त कुणीही या कृष्णाचं इतकं भलं कधीच इच्छिलं नाही. लोक माझ्याकडून स्वतःचं भलं व्हावं अशी अपेक्षा ठेवतात. पण सुदाम्यासारखे मित्रच असे असतात, जे आपल्या मित्राच्या सुखासाठी स्वेच्छेने दारिद्र्य आणि कष्ट स्वीकारतात.

असे मित्र फार दुर्मिळ असतात, आणि कळत नाही, कोणत्या पुण्यांमुळे मिळतात. आता अशा मित्राला तिन्ही लोकांची सर्व संपत्ती दिली तरी ती कमीच पडेल,” कृष्ण भावुक आवाजात म्हणाले.

इथे कक्षात सर्व राण्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, आणि तिथे कक्षाबाहेर उभ्या सुदामा यांच्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाहत होत्या…

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares