मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मिळवती झाले, काय मिळवले? – भाग-१ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ मिळवती झाले, काय मिळवले? – भाग-१ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

‘‘ए आई SS, अहो बाबा, लवकर या ना इकडे. ओळखा बरं काय गंमत आहे माझ्याकडे? नाही ना ओळखत? अहो मला बँकेत नोकरी मिळाली. हे पहा पत्र. आई, इतकं मस्त वाटतंय् ग मला. आता मी मिळवती होणार, माझ्या पायावर उभी रहाणार… ”

… आज अचानक माझं मन एकदम २५ वर्षं मागे गेलं होतं. अचानक तरी कसं? आज नोकरीला २५ वर्षे पूर्ण झाली. बँकेत छोटासा शुभेच्छादर्शक कार्यक्रम झाला. घरी येतांना एका वेगळ्याच आनंदात मन तरंगत होतं. कसला आनंद हा? ही कोणती वेगळीच तृप्ततेची झालर आहे या आनंदाला? माझी मीच विचारात पडले. आणि मला एकदम तो नोकरी मिळाल्याचा दिवस आठवला. पाय चालत होते पण मन मात्र आठवणींच्या गोफात गुंतून गेलं.

नोकरीचा पहिला दिवस, मग पहिला पगार, त्याचा एक वेगळाच मन भरून टाकणारा आनंद, त्यातून घरातल्या सर्वांसाठी घेतलेल्या भेटवस्तू, नकळत नोकरीत रुळत गेलेलं मन, बँकेच्या परिक्षांमध्ये मिळवलेलं यश, मनाजोगत्या जोडीदाराशी लग्न, आयुष्याची सांगता झाल्याचं सांगत आलेला पहिला मुलगा, आधी मातृत्व की आधी नोकरी या कात्रीत सापडून बराच काळ कासावीस होत राहिलेला जीव… एक एक करत जणू चित्रपटच उलगडत होता मनासमोर, आणि अचानक एका विचारापाशी गचकन् ब्रेक लागावा तसं मन थांबलं… ‘ आज २५ वर्षं झाली. काय मिळवलं मी इतक्या वर्षात? नि काय गमावलं? ‘ हा विचार – विजेसारखा कल्लोळत आला नि त्याने दोन्ही मनांना जागं केलं.

‘मिळवती झाले खरी, पण काय मिळवलं? ’ – एक मन.

‘मिळवती झाले नि काय काय मिळवलं!! ’ – दुसरं मन.

— – या दोन मनांच्या हुज्जतीत, बुध्दीला न्यायनिवाड्याचं काम देऊन सुनावणी सुरू झाली…

का मला एवढा आनंद झाला होता नोकरी मिळाल्याचा? मुलींनी खूप शिकावं आणि एवढया शिकल्या म्हणून करिअर करण्याचा जोरदार विचार करावा असे ते दिवस नव्हते. स्त्री-सुधारणेची गाडी, मुलींनी लग्नाआधी कमीत कमी पदवीधर व्हावे या वळणावर येऊन बरेच दिवस थांबलेली होती. उपवधूंसाठी ‘नोकरी करते’ हा अजूनतरी सर्वात मोठा जमेचा मुद्दा झाला नव्हता. मला आनंद झाला त्याचं कारण म्हणूनच जरा वेगळं होतं.

– – शिक्षणाचा नोकरी करतांना उपयोग होतो ही माझी प्रामाणिक समजूत प्रत्यक्षात भ्रामक आहे हे माहिती नव्हतं. त्याहीपेक्षा, आई-वडिलांनी इतके पैसे खर्च केले, आता पाठच्या भावंडांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी मी हातभार लावू शकेन हे समाधान सर्वात जास्त होतं. ऐश करण्यासाठी पैसे मिळविण्याचा विचार मनात यावा असे संस्कार नव्हतेच आमचे. थोडी स्वत:ची हौस, थोडी घरातली गरज आणि स्वत:च्या कर्तव्याची नव्याने होऊ लागलेली जाणीव यामुळेच नोकरी करावीशी वाटत होती.

तर नोकरी मिळाली. चुटकीसरशी रिकामटेकडा वेळ कामाला लागला. सुस्तावलेला मेंदू अंग झडझडून जागा झाला. त्याच्या हातात बांधलेले हातापायांचे लगाम ओढले गेले तसा हातापायांचा वेग वाढला. रिकामपणी उगाचच इकडेतिकडे भिरभिरणारे डोळे घड्याळ्याच्या काट्यांवर स्थिरावले आणि या सर्वांचा परिपाक म्हणून मी चक्क वक्तशीर झाले. आणि हो, बँकेत इतरांनी नावे ठेवू नयेत म्हणून नीटनेटकेपणाने – टापटिपीने राहू लागले. आईला केवढा आनंद. जणू हा तिचाच विजय!

हळुहळू मग एक बोचरं सत्य उजेडात आलं. माझ्या रूपागुणांच्या कानामागून येऊन चांगलाच तिखट झालेला ‘माझं मिळवतेपण’ हा asset, उपवधू म्हणून असणारा माझा भाव अचानक वधारून गेला आणि सहजपणे एक उत्तम स्थळ मिळून गेलं. सुसंस्कृत सुशिक्षित मध्यमवर्गीय घर, स्मार्ट हुशार नवरा इ. इ. — पण तरीही नोकरी हा asset हातचा घालवून स्वत: एक liability बनून रहावं हे मनाला पटेना. आणि इथेच सासरच्या लोकांशी माझं चक्क एकमत झालं.

रस्ता बदलला पण माझं मिळवतेपण चालूच राहिलं. या मिळवतेपणाचं खरं रंग रूप इथूनच पुढे नीट दिसू लागणार, एवढं कळण्याएवढी विचारशक्ती, ते रूप कोणतंही असलं तरी सहज, हसतमुखाने आपण त्याच्याशी हातमिळवणी करू हा आत्मविश्वास, इतके दिवस नोकरी करता करता आपोआपच मिळाला होता.

जीवनक्रम बदलला तसं माहेरी असणारं हट्ट करण्याचं, बेजबाबदारपणे वागण्याचं स्वातंत्र्य, ‘जबाबदारी’ चं रूप घेऊन घरी मुक्कामालाच आलं आणि इथेही, आपलं काम पार पाडतांना कुठल्याही कलीगबरोबर adjust करून घेण्याची नोकरीमुळे जडलेली सवय मदतीला पदोपदी धावून येऊ लागली. घड्याळ्यासोबत पळण्याचा वेग कमालीचा वाढला होता. आपल्या नोकरीचा घरातल्यांना त्रास होऊ द्यायचा नाही हा एक नवा संस्कार हातात छडी घेऊन सतत पाठीमागे आहे असं वाटायचं. केव्हा केव्हा खूप जाचही व्हायचा त्याचा. पण इथेच एक नवा विचार मनात उगवू पहातोय हे जाणवायला लागलं… सगळ्यांचा मानमरातब अगदी मनापासून सांभाळून, त्यासाठी कुवतीपेक्षा जास्तच धावपळ करूनही कुठेतरी आपण स्वतंत्र आहोत, बहुतेक आर्थिकदृष्ट्या, हा विचार… तो मिळवतेपणाच्या खतपाण्यावर तर रुजत होता ना? हळूहळू सासरच्या अंगणात त्याला कर्तेपणाची, स्वाभिमानाची, स्वत:चा सुगंध दरवळणारी गोड मोहक फुलं येऊ लागली. नोकरी करतो म्हणजे – जगावेगळं काही करत नाही ही स्वत:च स्वत:ला दिलेली शिकवण, या फुलांचा आल्यागेल्याच्या स्वागतासाठीच उपयोग करीत होती. आणि इथे मूठभर की ओंजळभर हा निर्णय घेण्याची शक्ती, अधिकार मला मिळवतेपणानेच मिळवून दिला होता.

यथावकाश संसारवेलीवरही फूल उगवलं. दिसामासाने वाढू लागलं. हे वळण मात्र खरं परीक्षा घेणारं होतं. वाढती जबाबदारी पेलायला आवश्यक असणारा चाकरमानीचा हात, त्या बाळमुठीत आपली बोटे सोपवून त्याच्यासोबत रिकामा रहाणार का हा यक्षप्रश्न, नव्हे एक चावरा भुंगा मनात गरगर फिरू लागला. बाळ मोठा होत होता तसंतसं हे नोकरीचं जू झुगारून द्यावसं वाटायला लागलं. त्याचं ‘आई-आई’ ऐकूनही, अडखळणारं पाऊल जबरदस्तीने दाराबाहेर टाकतांना मनावर ठेवावा लागणारा दगड त्या नोकरीवरच फेकून मारावा आणि माघारी वळावं असं रोज-रोज वाटायचं. नोकरीपायी आपण बाळाकडे दुर्लक्ष करतोय का, आईच्या कर्तव्यात कमी पडतोय का ही नोकरीपायी निर्माण झालेली पहिली आणि अत्यंत दाहक व्यथा होती. काम करतांना सतत मन कुरतडत रहाणारी, मन:स्वास्थ्य पळवून नेणारी, व्याकूळ करून सोडणारी. सोडावी का नोकरी? काय करू? पण मग बाळ मोठा होईल, त्याचं स्वतंत्र विश्व निर्माण होईल आणि आपण हळुहळू रिकामं व्हायला लागू तेव्हा काय? या महागाईच्या दिवसात, हातातली चांगली नोकरी, काही वर्षांच्या मानसिक ओढाताणीसाठी सोडणं कितपत शहाणपणाचं आहे? आणि ‘ मी ‘ की घर.. मुलगा ‘ ‘ व्यवहार की भावना ‘, ‘पैसे की प्रेम’ या दोन टोकात हिंदकाळणारा मनाचा किरकिरणारा झोका एक दिवस खाडकन थांबला. तो दिवस – मुलाला शाळेत घालण्याचा. बालवाडीत प्रवेश मिळविण्यासाठी २०००रु. डोनेशन द्यावं लागणार हे कळलं. पूर्वीचे २०००रु. खूपच होते. पण ते भरून मग मुलगा मॅट्रीकपर्यंत चांगल्या शाळेत राहील असं म्हणून खुणावणारं समाधान, आणि ते समाधान कुशीत घेऊन उभं राहिलेलं माझं मिळवतेपण.

समाधानाची किंमत पैशात मोजायला लावणारा तो पहिलाच प्रसंग. पण नंतरही बरेचदा भेटला. आणि फार शिकवून गेला. फार मोठा आत्मविश्वास देऊन गेला की मुलांचे भवितव्य उजळविण्यासाठी मी देवीसारखे चार हात लावलेत. चहू दिशांनी बाळाला प्रेमाने न्हाऊ घालणारे ममतेचे दोन हात आणि त्याचे हात हातात धरून, त्याची मान उंच आणि पावले आत्मविश्वासपूर्वक पडावी म्हणून आवश्यक ते पाठबळ पुरविणारे दोन ‘अर्थ’ पूर्ण हात. मनाची खिन्नता, मन कुरतडणारी खंत मग पळूनच गेली कुठेच्या कुठे. मुलांच्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी, त्यांना कधी काही कमी पडू नये यासाठी, त्यांचे वेगवेगळे छंद सहजपणे जोपासण्यासाठी माझं मिळवतं असणं किती उपयोगी पडणारं आहे हे दिवसेंदिवस अधिकच जाणवू लागलं.

क्रमशः भाग पहिला 

© सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संकेत मनाचे… ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ संकेत मनाचे… ☆ श्री प्रदीप केळूसकर

शुक्रवारी रात्री दहा वाजता मी घरी पोहोचलो. लॅचने घर उघडलं, बेडरूममध्ये अंजली गाढ झोपली होती. तिला दुसऱ्या दिवशी बँकेत जायचं असतं, मला शनिवार रविवार सुट्टी. मी कपडे बदलले, हातपाय धुतले आणि फ्रीझमधून बाटली काढली. ग्लास, सोडा, काजुगर सर्व तयारीनीशी मी प्यायला बसलो. एका दमात लार्ज पेग संपवला… दुसरा पेग भरला आणि रोलिंग चेअरवर डुलत बसलो. अंजली झोपली हे बरेच झाले नाहीतर माझ्या ड्रिंक वरुन चिडली असती आणि एक मोठे लेक्चर दिले असते तिने. माझे पण पिणे फार वाढले हे खरेच. अस्वस्थ मन शांत करण्यासाठी या पेयाचा आधार घेतोय मी.

शांतता आहे कुठे मनाला? मोठे होण्यासाठी धावतोय.. दुसरा कुणी पुढे जाण्याआधी माझा वेग वाढवतोय…. यात माझी दमछाक होतेय… तरी धावतोय.. धावतोय.

मला या वेळी माझ्या आईबाबांची आठवण येते आहे, कोकणातील धामापूर सारख्या खेड्यात रहाणारे, रोज धामापूरहुन मालवणला चालत शाळेत जाऊन शिक्षकांची नोकरी करणारे माझे बाबा, सकाळी पाचला उठून कमरेवर कळशी घेऊन पाणी भरणारी आणि आम्हा तीन भावंडांना संस्कार देणारी माझी माता.. दोनशे रुपये पगारात महिना चालवत होते. समाधानी होते.. त्यात सतत आलं गेलं होतं. सण आनंदाने साजरे होतं होते.. शाळेत जाताना आम्हा भावंडाच्या पायात चप्पल नसायचं तरी काटा सहजासहजी घुसायचा नाही पायात कारण पाय घट्ट होते. त्याकाळात नव्हते ताण? काळज्या? पुढे जायची घाई? थोडीपार होतीच… पण असं दारू पिऊन डोकं शांत करायच किंवा झोपेची गोळी घेऊन झोपायच, कुणाच्या मनात यायचं नाही, पण आत्ता या काळात?

माझ्या डोक्यात विचारांचा पिंगा घुमत होता.. त्याच वेळी नवीन प्रोजेक्ट पुढील आठवड्यात पूर्ण करायची डेड लाईन पण आठवत होती. कसा प्रोजेक्ट पुरा होईल? नवीन इंजिनिअर भरलेत, पण त्यांच्या कामाची गती किती धिमी? सर्व ठिकाणी मलाच मरावं लागत. नवीन मुलांच्या चुका दुरुस्त करण्यात दिवस संपतो, मग प्रोजेक्ट कसा पुरा होईल? विचार करता करता माझा पाय लागला आणि टेबलावरचा ग्लास खाली पडला आणि खळकन आवाज झाला, त्याने अंजलीला जाग आली आणि ती बाहेर आली.

झोप मोडल्यामुळे अंजली आधी चिडली होतीच त्यात मी हॉलमध्ये बाटली, ग्लास यासह बसलेला पाहून तिचा पारा चढला.. ” घर आहे का गुत्ता? किती दारू पितोस? काही लाज…? “

“अग नाही, आत्ताच सुरु केलंय ‘.

“तुला काय वाटलं, मी झोपले म्हणजे ठार मेले काय, मला जाग होती दार उघडलंस त्याची? दोन पेग तरी झाले असतील… कशाला प्यायची? “

“अग टेन्शन कंपनीत.. मनातून भीती जात नाही.. प्रोजेक्ट पुरा नाही झाला तर लाथ मारतील म्हणून… इथे तुमच्या बँकेसारखी यूनियन वगैरे काही नसतं.. “

“म्हणून दारू? “

“मग काय करू? कसा विसरू दिवसभराचा त्रास? “

“त्या करिता दारू हा पर्याय नाही अजित.. “

“मग? दुसरा कसला पर्याय आहे का? “

“आहे, माझ्या मैत्रिणीचा दीर आहे मानसोपचारतज्ञ, डॉ नाडकर्णी. ”

“म्हणजे मी वेडा झालो की काय? “

“वेडा झाल्यावरच मानसोपचारतज्ञची मदत घ्यायची असते, असं वाटतं का तुला? याकरिता वाचन हवं.. मनाचं आरोग्य महत्वाचं, आपण भारतात त्याकडेच दुर्लक्ष करतो. ताण तणाव याकरिता परदेशात कौन्सीलिंग करतात.. त्याचा खूपच फायदा होतो. ”

“मग मी उद्या डॉ नाडकर्णीना भेटायचं? “

“होय… मी पण सोबत येतेच आहे.. मी सकाळी मैत्रिणीला सांगून उद्याची अपॉइंटमेंट मिळवतेच, बघ ते किती तुझ्या मनात शिरतील.. तुझे प्रॉब्लेम्स कमी होतील.. आता पिणे पुरे.. झोप. ” 

मी गुपचूप ग्लासाचे तुकडे भरले आणि झोपायला गेलो.

दुसऱ्या दिवशी अंजलीने आपल्या मैत्रिणीला सांगून डॉ नाडकर्णी यांची रात्री आठची भेट ठरवली.

आम्ही दोघे मरीनलाईन्स स्टेशनजवळ असलेल्या डॉ नाडकर्णी यांच्या कन्सलटिंगरूम मध्ये भेटायला गेलो. बरोबर आठ वाजून दहा मिनिटांनी डॉक्टरनी आत घेतलं.

डॉ – “ बोला सामंतसाहेब.. अगदी मनातलं बोला.. कसलाही आडपडदा न ठेवता बोला. ”

एवढ्यात अंजली बोलायला लागली.. ” डॉ, माझे मिस्टर एका मल्टिनॅशनल कंपनीत जबाबदारीच्या पोस्टवर आहेत, त्यांच्या डोक्यावर सतत जबाबदारी असते.. मोठे मोठे प्रोजेक्ट्स पुरे करायचे असतात.. त्त्यांचे म्हणणे त्यांच्या टीममधील नवीन मुलं बेजबाबदार वागतात, प्रोजेक्ट यशस्वी करण्याचे दडपण सतत राहते.. त्यामुळे… “ 

डॉ – “ त्यामुळे काय? “

अंजली – “त्यामुळे यांची झोप उडाली आहे.. झोपेसाठी पिल्स घ्यायची सवय झाली आहे आणि..“

डॉ – “ आणि दारू पिण्याची सिगरेट्स ओढायची गरज निर्माण झाली आहे, बरोबर ना … “

अजित – “ होय डॉक्टर, त्याशिवाय मन शांत होतं नाही, सतत डोक्यात तेच विषय रहातात.. अस्वस्थ वाटतं. ” 

डॉ – “ दारू प्यायल्यानंतर सर्व टेन्शन नाहीस होतं काय? “

अजित – “ काही काळ सर्वांचा विसर पडतो पण…. “

डॉ – “ पण काय? दुसऱ्या दिवशी पुन्हा मन अस्वस्थ होतच ना? आणि शरीरावर हँगओव्हर रहातो त्याचे काय? दारुमुळे शरीराची नासाडी होते त्याचे काय? “

अजित – “ खरे आहे डॉक्टर, मला फार शरमिंदे वाटते, आईवडिलांची आठवण येते. ”

डॉक्टर – “ का? आई वडिलांची आठवण का येते? तुमच्या लहानपणाबद्दल सविस्तर सांगा. ”

अजित – “ डॉ, मी कोकणातला. माझे वडील शिक्षक.. मेहनती.. रोज पंधरा किलोमीटर चालत जाऊन येणारे. शिवाय घरची थोडी बागायती सांभाळणारे. आई पण खुप मेहनती. घरात गाई वासरे होती. त्त्यांचे दूध काढून विकून दोन पैसे संसारासाठी जमवणारी. मला अजून दोन भावंडे. या गरिबीत सर्वाना उत्तम शिक्षण आईबाबांनी दिले. “

डॉ – “ खरेच भाग्यवान आहेस तू. कोकणात जन्म. कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात.. तेथली माणसे गरीब असतील कदाचित पण साधी आणि कलासक्त.. अनेक मोठे कलाकार कोकण गोव्यातील दिसतील. “ 

अजित – “ होय, डॉक्टर.. माझे बाबा तबला काय वाजवायचे.. त्यांच्यासारखा तबला कुडाळ मालवण भागात कोणी वाजवत नसे. ”

डॉक्टर – “ आणि तू? तू काही वाद्य शिकला नाहीस? ”

अजित – “ मी पेटी वाजवायचो, हार्मोनियम.. बाबांना साथ द्यायचो. तीन परीक्षा दिल्या मी.. सतत सुरांच्या कैफात असायचो मी.. पण… “ 

डॉक्टर – “ पण काय? आता पेटी नाही वाजवत? “

अजित – “ नाही.. पेटी वाजवायची बंद केली मी… कारण त्या सुरात हरवल्यामुळे अभ्यासात मागे पडू लागलो.. दहावीत सहामाही परीक्षेत गणितात कसाबसा पास झालो.. बाबा काळजीत पडले.. माझ्यामागची दोन भावंडे होती शिकणारी.. मला शिकायचं होतं.. हार्मोनियम वाजवून गोविंदराव पटवर्धन होणे सोपे नसते.. शिवाय कला ही अशाश्वत… दुसरे नवीन वाद्य आलं की हे वाद्य कालबाह्य ठरतं.. मोठे होऊन पैसे मिळवणे आवश्यक.. त्यामुळे पेटी विकून टाकली त्यावेळी… “.. मी डोळे पुसत पुसत डॉक्टरना माझा भूतकाळ सांगत होतो.

डॉक्टर – “ ओके, मग.. पुढे सुरांपासून लांब गेलास.. मग शिक्षणाकडे लक्ष देऊन इंजिनीअर झालास.. मोठ्या कंपनीत नोकरीला लागलास… मोठा पगार मिळू लागला.. मोठ्या जबाबदाऱ्या.. बरोबर? “

अजित – “ होय डॉक्टर, पगार मोठा आहे.. घर मोठं घेतलय.. अंजली पण बँकेत नोकरी करते.. सारं काही आहे पण मन कमकुवत झालंय.. मनातले विचार जात नाहीत… रात्री रात्री तेच विचार.. मन घाबरतं… मग त्याकरता झोपेची गोळी नाहीतर तीन चार पेग… हे संपतच नाही. ”

डॉक्टर – “ बरं, मला लक्षात आलाय तुझा प्रॉब्लेम.. हा प्रॉब्लेम तसा सर्वच नवीन सुशिक्षित मुलांचा आहे. नोकरीत पैसे देतात पण सतत कामाचे दडपण ठेवतात, सर्वसाधारण माणूस किती काम करू शकतो, त्याच्या दुप्पट अपेक्षा ठेवली जाते. पण एवढ्या पैशांची सवय झाली की दुसरीकडे कमी पगारात ऍडजस्ट करू शकत नाही. अजित, तुझे बाबा तसे भाग्यवान. कमी पगार मिळत असेल त्यांना पण ते समाधानी होते. तुझी आई कोंड्याचा मांडा करणारी होती. तुझे बाबा नशिबी कारण त्यांना उत्तम तबला वाजवता येत होता. तू पण नशीबवान कारण तू हार्मोनियम वाजवत होतास, नव्हे ती तुझी पहिली आवड होती, बरोबर…. ‘

अजित – “ अगदी बरोबर.. “

डॉक्टर – “ पण तू तुझा छंद अपुरा ठेवलास. तू पेटी विकून टाकलीस.. मी म्हणेन तू तुझं मन विकलंस, बरोबर? अजित तू सूर विसरलास.. राग विसरलास.. गोविंदराव पटवर्धन विसरलास.. बरोबर? तुझे पेटीवादन सुरु असते तर तुला झोपेची गोळी घेऊन झोपायची गरज पडली नसती.. दारू प्यायची गरज पडली नसती. तू तूझ्या छंदापासून लांब गेलास आणि मनाने कमकुवत झालास. तू तुझी नोकरी सोडू शकत नाहीस कारण तू आयुष्याच्या मध्यानीला आला आहेस, जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात अशा वयात… पण पुन्हा सुरांची आराधना कर. पुन्हा सा.. रे.. ग.. म.. प मनात आणि घरात घुमू दे. संगीताच्या मैफिली असतात मुंबईत.. तूझ्या सुट्टीच्या दिवशी बायकोला घेऊन मैफिली ऐक.. मुद्दाम पुण्याला जा रजा घेऊन आणि सवाई मैफिलिंची मजा घे.. तू तुझी टेन्शन्स केंव्हाच विसरशील.. झोपेची गोळी घ्यायची गरजच पडणार नाही तुला. ” 

अंजली – “ बरं डॉक्टर, काही मेडिसिन वगैरे.? “ 

डॉक्टर – “ औषध एकच, जाताना दादरला थांबा आणि हरिभाऊ विशवनाथ आणि कंपनीमध्ये मस्त सुरांची हार्मोनियम खरेदी करा. सुरात भिजा, नोकरी सांभाळून गाण्याच्या मैफिली ऐका.. मोबाईलचा वापर शास्त्रीय गाणी ऐकण्यासाठी करा आणि मला पेटीवादन ऐकण्यासाठी बोलवा… आणि महत्वाचे म्हणजे अजित.. अंजली, मी पण उत्तम व्हायोलीन वादक आहे.. माझा हा छंद आहे म्हणून मी निरोगी आहे.. शरीराने आणि मनानेही… ” 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्ती… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ तृप्ती… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“आजी हे घे पटकन, चटका बसतोय मला म्हणत चिमणीने आपल्या इवल्याश्या तळहातावर आणलेले गरम दोन भजे झेलत झेलत आजीच्या शॉलमधून आत टाकले आणि आजीने ते शॉल डोक्यावर घेत मुटूमुटू खाऊन घेतले.. आजीचा मघाचा चेहरा आणि आताच्या चेहऱ्यात एकदम बदल जाणवला आणि हे सगळं बघितलेलं रमाबाई हसून म्हणाल्या, “आजी भज्यांनी काय औषधाचं काम केलं का,..? “

तिच्या या प्रश्नावर तिला हळू बोल असे दटवत आजी खुसफूस करत म्हणाली, “रमे वीट आला आहे त्या कडूझर औषधांचा आणि त्या मिळमिळीत जेवणाचा.. जिभेला असं थोडंसं चमचमीत किंवा आवडीचं खावं वाटतं ग.. पण इथे तर काळजीच्या नावाखाली पार तोंड बंद केलं आहे आमचं. बोललं तर राग येईल ह्या लोकांना, आता 80 वर्षाची मी, मला ह्यांच्या संसारात काही जागा नाही… एरवी अडगळ होऊन जगते, मग खाऊन मेले मी तर बिघडलं कुठे… पण ही लोकं औषधं देऊन आणि ते आळणी अन्न खाऊ घालून बळजबरी जगवत ठेवत आहेत मला. त्यांचा अगदीच जीव नाही असं नाही ग, पण वीस वर्षांपूर्वी रक्तातात साखर काय सापडली, सगळ्यांनी माझी पुरणपोळी बंद केली. अग मी चालून फिरून करत होते की सगळं मेंटेन, पण उगाच बाऊ करून सूनबाईंनी माझ्या गोडावर बंधनं घातली. आधी वाटलं काळजी आहे त्यांना, पण प्रत्येकवेळी ‘नको त्रास होईल’ ह्या भीतीने घास काढून घेतला… हळूहळू मी मान्य करत गेले. पण वय वाढायला लागलं आणि माझ्यातलं लहान मुल जागं झालं.. तिकडे भजे, समोसे तळले की इकडे तोंडाला पाणी सुटतं गं… वासना वाईटच गं, पण माणूस जोडलाच आहे ना वासनेशी.. मग कसं जमवायचं सगळं..

बरं माझ्याच घरात आहे का असं, तर नाही. माझ्या मैत्रिणी ही तेच सांगतात.. परवा त्या जोशीचा फोन आला.. तिच्या नवऱ्याला आंब्याचं फार वेड… आंबा सिझन आला की रसाशिवाय जेवण करत नव्हता. पण ह्या चार वर्षात पॅरॅलीसिस ने अंथरुणावर पडला.. मग सून आणि मुलांनी काही आंबा खाऊ दिला नाही. तुम्हाला त्रास होईल म्हणे. बिचारा मरताना आंबा हा शब्द उच्चारत गेला ग. मी म्हणते दिला असता अर्धी वाटी रस तर काय बिघडलं असतं का..? शेवटी हगणं मूतणं करायला माणूसच लावलाय ना… झाले असते दोन जुलाब जास्त… दोन हगीज जास्तीचे गेले असते… पण तृष्णा तर पूर्ण झाली असती ना…

मी मात्र आता चिमणीला धरलं आहे हाताशी… आणि अति खाऊ नाही हे मलाही कळतंय की, पण… त्या चावट जिभेला कोणी सांगावं… ती म्हातारी झाल्यावर जास्त त्रास देते बहुतेक… आणि तिला हे नाक साथ देतं ना गं… आता मला सांग, आयुष्य गेलं त्या स्वयंपाक घरात… तिखट, मसाले, अश्या अनेक चवीने स्वयंपाक केला… खाल्ला, खाऊ घातला, त्या अन्नातून एवढ्या सहज मन कसं बाहेर पडेल… बरं, खायचं काही खुप नसतं. उगाच त्या वासाने चाळवळलेल्या भुकेला शमवायचं असतं बस… पण ही लोकं मऊ भात, खिचडी आणून देतात ना. त्यावर लोणचं ना काही… आणि बाऊ एवढा… ‘त्यांची तब्येत बिघडेल… ‘ मला तर अस्सा राग येतो.

पण आता चिमणी आली ना कामी. मग मी ही झाले आता लबाड. हा हा… ” म्हणत आजीने आपलं बिनदाताचं बोळकं पसरवलं आणि चिमणीला टाळी दिली.

चिमणी हसली आणि म्हणाली, “चल बाय अज्जू, अभ्यास आहे मला,.. ” आणि पळाली.

आजी मग औषध घेऊन अलगद आपली खाली सरकून झोपली. रमाबाईने त्यांच्या अंगावरची शाल नीट केली. ते करताना रमाबाईला एकदम गहिवरून आलं. मागच्या पौर्णिमेला घरात कुळाचार झाला होता. आजी आपल्याला म्हणत होती, ‘रमा, पुरणाच्या पोळीचा तुकडा आणून दे गं चोरून… ‘ पण आपण नाहीच म्हणालो. सुनांना मागितलं तर सुनांनी लगेच कांगावा केला. लेकही अंगावर धावले. बिचारी आजी गप्प बसली. चिमणी नेमकी ट्रीपला गेली होती. ‘आजीला पुरणपोळी खुप आवडते असं नेहमी म्हणतात त्या… ‘ 

हे सगळं आठवून रमा गहिवरली होती. दुसऱ्या दिवशी रमा छोट्या डबीत काहितरी घेऊनच आली होती. ‘आजीची खोली झाडेपर्यंत दार लावते’ म्हणत तिने आजीला पटकन डबीतून अर्धी पोळी आणि त्यावर तूप असं खायला दिलं. आजीला आनंद गगनात मावेना. ‘किती किलोचं पुरण घालायचे गं मी,.. सगळयांना वाटायचे… ‘ एवढं म्हणत आजीला रडू फुटलं. रमाने डोक्यावर हात फिरवला. “रडू नका. घ्या खाऊन. ” आजी एक एक घास खाताना डोळे बंद करून अगदी तृप्तपणे खात बसली होती. रमाला मनातून आंनद झाला.

दुसऱ्या दिवशी रमा आली तर सूनबाईची तणतण सुरू होती आजीला.. “जरा दम धरायचा ना. पातळ खराब केलं ना… ” 

आजी अगदी अपराधी होऊन ऐकत होती. पण रमाने सावरलं. “असू द्या मॅडम, मी आवरते सगळं… जा तुम्ही… “

आजीचे डोळे भरून आले. म्हणाली, “माझ्या हावरट पणाचा रमा तुला त्रास गं… “

रमा म्हणाली, “आजी, काही वाईट वाटून घेऊ नका. ह्याचेच पैसे घेतो आम्ही. त्यात कसला त्रास… उद्या तुम्हाला आवडणारे मुगाचे लाडू आणते नक्की… “

आजी म्हणाली, “आता आवड निवड अशी नाही गं, पण काय माहीत ह्या जीवाला कशी ही अन्नाची तृष्णा लागते… फार नाही, पण अगदी घासभर का होईना खावंसं वाटतं… “

रमाबाई निघाली. आजी म्हणाली, “रमा, ह्याला तू हवरटपणा समज की काहीही, पण तू असे वयस्कर लोकांना सांभाळायचे काम करते म्हणून सांगते, जे आमच्यासारखे अगदी जाण्यासारखे आहेत‌…. त्यांना खाण्यासाठी तरसु देऊ नकोस गं,.. ह्या देहाचे हे खेळ कळत नाही कधी कधी, त्या वासनेत जीव अडकून बसतो गं,.. जा बाई, अंधार पडलाय, ये उद्या… “

रमा निघाली. रात्री झोपेत आजी स्वप्नात आली… “मुगाचा लाडू आणते म्हंटली, ह्याने सुद्धा जीव तृप्त झाला गं रमे,.. “

रमा दचकून उठली. पहाटेचे पाच वाजले होते… तेवढयात मोबाईलवर रिंग वाजली… आजीच्या घरून फोन… तिने पटकन उचलला… आजीची सुनबाई रडत बोलत होती.. “आजी गेल्या रमाबाई,.. जरा मदतीला या लवकर” म्हणत फोन ठेवला.

रमाला गहिवरून आलं. रात्री ओट्यावर काचेच्या बरणीत बांधून ठेवलेले लाडू देखील रडत होते. जणू काही तृप्ती राहिली हे सांगत होते. पण स्वप्नातलं आजीचं वाक्य रमाला आठवलं. ‘तृप्ती झाली ग रमे… ‘ हे सगळं आठवून रमाला अधिकच रडू फुटलं…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उतरंड… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

?जीवनरंग ?

☆ उतरंड…  ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे  

कॉलेजचा शेवटचा दिवस होता. सर्वजण एकमेकांना मिठ्या मारून निरोप घेत होते. मैदानावर तर त्यादिवशी जत्रा भरलेली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी दाटून आलेलं दिसत होतं. आणि मी वैशालीला आणि विनयला शोधत होतो. जवळपास अर्धा तास होऊन गेला तरी दोघेजण माझ्या नजरेला दिसत नव्हते. शेवटी मी त्यांना शोधायचा नाद सोडला आणि जायला निघालो. तर कॉलेजच्या गेटजवळ दोघेजण दिसले.

दोघेही एकमेकांच्या समोर जवळपास दहा फुटांवर उभे होते. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात टक लावून पाहत होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. आणि एकमेकांच्या जवळही जात नव्हतं. त्यांना त्या अवस्थेत मी बघितलं आणि माझ्याच काळजाचं पाणी झालं. मी विनय जवळ गेलो. त्याचा हात धरला आणि त्याला ओढून वैशाली जवळ आणून उभं केलं. तसा विनयचा हुंदका बाहेर पडला त्याच्या डोळ्यातून पाण्याची धार वाहायला लागली. त्याने खिशातला रुमाल काढला आणि डोळे पुसणार तोच वैशालीने त्याच्या दोन्ही डोळ्यातलं पाणी तिच्या दोन्ही हाताने पुसायला सुरवात केली.

मी मात्र हा खेळ शांतपणे बघत उभा राहिलो. दोघांच्याही डोळ्यातलं पाणी संपल्यावर मग दोघांना मी तिथं असल्याची जाणीव झाली. आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्या दोघांचा एकमेव आधार मी होतो. दोघांचाही मितवा मीच होतो. त्या दोघांच्यात काही भांडण झालं किंवा वाद झाले तर कायम मीच मिटवायला हजर असायचो. दोघेही जीवापाड प्रेम करायचे. त्या दोघांचा हा सिनेमा तीन वर्षे सुरू होता आणि मी एकटाच हा सिनेमा पाहत आलो होतो. काहीवेळा तर या सिनेमाचा लेखक मीच झालो होतो. कारण बऱ्याचवेळा त्या दोघांना पुन्हा एकत्र आणण्यात माझा वाटा मोठा होता.

आज आम्ही तिघेही वेगळे होणार होतो. पुन्हा भेट होईल न होईल माहित नव्हतं. पण या दोघांनी मात्र आयुष्यभर सोबत राहायचं लग्न करून संसार करायचा ही स्वप्ने बघितली होती. पण उद्यापासून भेट होणार नव्हती. एकमेकांना बोलता येणार नव्हतं. त्यावेळी मोबाईल नव्हते. वैशालीच्या घरी फोन होता. पण तो तिला वापरायला बंदी होती. एकमेकांचा निरोप एकमेकांना पोचवायचा कसा? हा त्यादिवशी मोठा प्रश्न दोघांनाही पडलेला होता. आणि याचं उत्तर फक्त माझ्याजवळ मिळेल असा त्यांना विश्वास होता.

आम्ही तिघेही चालत एस. टी स्टँड वर आलो. तिघांची तीन गावे तिन्ही दिशेला होती. त्यामुळे आता जशा गाड्या येतील तसे आम्ही वेगळे होणार होतो. दोघेही माझ्याकडे केविलवाणे पाहू लागले. आणि मला मार्ग सुचला. ठरलं असं ज्या गाड्या आमच्या गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी येतात आणि जातात त्या एस. टी. च्या मागे खडूने कोड मध्ये आपला मेसेज लिहायचा. मग ते कोड ही मी ठरवले. हळूहळू तिघांच्या गाड्या आल्या आणि आम्ही वेगळे झालो.

मी आणि विनय मात्र दुसऱ्या दिवसापासून भेटू लागलो. स्टँडवर विनय सकाळीच हजर असायचा. दुसऱ्या दिवशी वैशालीच्या गावची गाडी समोर उभी होती. विनयने खिशात खडू आणलेच होते. आम्ही गाडीच्या मागे गेलो आणि तिथं 8.. 1.. एवढच लिहिलं. त्याचा अर्थ होता आठवण येतेय.. म्हणून… दोघेही हसलो. गाडी गेली. ती गाडी जाऊन पुन्हा यायला तीन तास लागायचे. आम्ही वाट पाहत थांबलो. तीन तासाने ती गाडी पुन्हा आली. आम्ही धावत गाडीच्या मागे जाऊन बघितलं. तर वैशालीने तिथं चौकोन काढून त्यात खाडाखोड केली होती. आणि तिथं बारीक अक्षरात तीन शब्द लिहिले होते. ते असे.. त… रा… स..

याचा अर्थ तिला खूप त्रास होतोय..

दुसऱ्या दिवशी आम्ही गाडीवर लिहिलं.. एक प्रश्नचिन्ह काढलं. त्याच्या पुढे मराठीत त्रेसष्ठ लिहिलं. याचा अर्थ होता कधी भेटायचं? . गाडी गेली. पुन्हा तीन तास वाट बघत बसलो. पुन्हा गाडी आली. आम्ही तिथं जाऊन बघितलं पण तिथं काहीच नव्हतं. विनय नाराज झाला. आम्ही तिथून निघणार तेवढ्यात बाजूला चिकटवलेलं पत्रक दिसलं. ते पत्रक होतं तिच्या गावच्या जत्रेचं. आणि त्या पत्रकावर खाली तिने व्ही हे अक्षर इंग्रजी मध्ये दोनवेळा लिहिलेलं होतं. विनय आणि वैशाली. म्हणजे जत्रेत या तिथं भेट होईल. विनयला लै आनंद झाला. आम्ही गाडीवर पुन्हा लिहिलं. ओके.. आणि पुन्हा प्रश्नचिन्ह.. म्हणजे जत्रेत कुठं आणि किती वाजता.??  गाडी गेली.. आता पुन्हा वाट पाहणे गरजेचे होते. पुन्हा गाडी आली आणि उत्तर ही आलं. तिने एक गोल काढून त्यावर बारीक बारीक चौकोन काढलेले होते. आणि मध्ये दहा हा आकडा लिहिलेला होता. आम्ही डोकं खाजवून खाजवून अंदाज लावला आणि माझ्या लक्षात आलं. जत्रेत पाळणे येतात. त्या पाळण्या जवळ दहा वाजता भेट होईल. मी हा शोध लावल्यावर विनय माझ्याकडे फार कौतुकाने बघू लागला.

मी आणि विनय तिच्या गावच्या जत्रेत हजर झालो. जिथे पाळणे होते तिथं तिची वाट पाहत थांबलो. आणि काही वेळाने घामाने भिजलेली वैशाली तिथं आली. विनय आणि वैशाली दोघेही बराच वेळ तिथं थांबले. मी तोपर्यंत जत्रा फिरून आलो. विनयने तिच्या हातात गुलाबी फुगा दिला आणि मी तिथून निघालो.

सहा महिने हा खेळ सुरू राहिला. मला एका ठिकाणी नोकरी मिळाली होती. मी माझ्या कामाला जात होतो. विनय मात्र दररोज एस. टी स्टँडवर पडून असायचा. आणि रात्री एका ठिकाणी कामाला जायचा. काम संपवून सकाळी स्टँडवर हजर व्हायचा आणि प्रेमाच्या त्या अक्षरांचा खेळ रंगवत बसायचा. आता बऱ्यापैकी दोघानाही कोड ची भाषा जमायला लागलेली होती. अर्थात या शाळेचा आणि या दोघांचा मास्तर मी होतो. त्यामुळे मला समाधान होतं. मी माझ्या नव्या नोकरीत रमून गेलो होतो. विनय ही बरेच दिवस झाले मला भेटायला आला नव्हता. एस. टी दोघांच्या भावना एकमेकांच्या पर्यंत फुकट पोहचवत होती.

दोन महिन्यांनी आज विनय माझ्याकडे धावत पळत आला. मी कामावर होतो. स्टँड पासून माझं काम फार लांब नव्हतं. विनय काहीच बोलला नाही. गोंधळला होता. माझा हात धरून तो मला स्टँडवर घेऊन गेला. वैशालीच्या गावावरून आलेली एस. टी. नेहमीच्या जागेवर थांबून होती. विनयने

माझा हात धरून गाडीच्या मागे नेलं. वैशालीने पाठवलेला निरोप म्हणजे कोड त्याला आज समजला नव्हता. म्हणून तो मला घेऊन आला होता.

गाडीच्या मागे आज वैशालीने चित्र काढलेलं होतं. मडक्यावर मडके अशी पाच मडकी काढलेली होती. सगळ्यात खालचं मडकं मोठं. त्यावर त्याच्यापेक्षा लहान. त्यावर अजून लहान. अशी पाच मडकी एका रेषेत काढून बाजूला तिने एक मोठं वर्तुळ काढून ते ठळक केलं होतं. ते बघितलं आणि मला त्याचा अर्थ कळला. विनय तसाच गोंधळून माझ्याकडे पाहत होता. मला हुंदका दाटून आला. आणि मी त्याला गच्च मिठी मारली. आणि त्याला मिठीत घेत म्हणालो, ”विनय वैशाली आता कधीच तुला भेटू शकणार नाही. तू तिला विसरून जा. तुझ्या नव्या आयुष्याला सुरवात कर.. ” 

विनय चिडला. त्याने मला विचारलं याचा अर्थ काय ते नीट सांग. मी विनयला पुन्हा त्या चित्राजवळ नेलं. आणि समजावून सांगितलं.. ही एकावर एक उभी असलेली मडकी म्हणजे जातीयतेची उतरंड आहे भावा.. ही उतरंड फोडून तिला तुझ्याकडे यायला परवानगी नाही. म्हणून बाजूला मोठं वर्तुळ काढून तिने तिची वेदना यात भरून पूर्णविराम दिला आहे. म्हणजे तिला थांबण्याशिवाय आता पर्याय नाही.

विनय एकदम शांत होऊन त्या चित्राकडे पाहत उभा होता आणि मी विनयकडे एकटक नजर लावून उभा होतो. तेवढ्यात गाडी सुरू झाली. विनयने ते चित्र हाताने पुसून टाकलं आणि जोरात हंबरडा फोडून रडायला लागला. त्याने जातीयतेचे वैशालीने काढलेले चित्र हाताने पुसले खरे पण ती जातीयतेची उतरंड मात्र आम्हाला फोडता आलीच नाही.

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जिसका मन मस्त… ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? जीवनरंग ?

☆ जिसका मन मस्त… ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची ही कथा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आजच्या काळात तर ती फारच गरजेची…. म्हणून सांगतोय.

हे डॉक्टर अतिशय निष्णात. सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला. मृत्यूच्या दाढेतून अनेकांना त्यांनी बाहेर काढून जणू नवीन जीवन दिलेलं. मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्सर्न फॉर्म (ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज) भरून घेतला जातो त्याच फॉर्मसोबत हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे. त्यात त्यांनी विचारलेलं असायचं की, ‘जर तुम्ही या ऑपरेशनमुळे वाचलात, तर बाकीचे आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात ते इथं लिहून द्यायचं आणि त्याचबरोबर आजवरच्या जीवनात “करायचे राहून गेलेलं” असं काही असेल तर तेही लिहायच. की ‘मला जीवदान मिळाले तर मी अमुक तमुक करेल!’

ऑपरेशनला आलेले रुग्ण तो फॉर्म भरून डॉक्टरकडे देत. त्यात कुणी लिहिलेलं असायच की, ‘आजवर कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. तर आता यापुढे देईन. तर कुणी लिहायचं…. ‘माझ्या लहान मुलासोबत मी भरपूर खेळेन. ते राहूनच गेलं आहे. ‘ ‘कामधंद्याच्या नादात निसर्गात भटकायचं, टूरवर जायच राहून गेलं आहे. ते नक्की आता करणार. ‘ एकाने तर हेही लिहिलं की, ‘माझ्याकडून आजवर कुणाला दुखावलं गेलं असेल तर त्यांना शोधून त्यांच्याकडे स्वतः जाऊन माफी मागेन. ‘ एकीने लिहिलं…. ‘संसार, पै पाहुण्याच्या नादात स्वतःसाठी जगायचं, हसायचंच विसरून गेलेय… यापुढं मनसोक्त हसत हसत जगणार. ‘ निवृत्त वडिलांनी लिहिलेलं…. ‘माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळे अनेकांना माझ्याबद्दल तक्रारी होत्या. उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कुणाचीच येऊ देणार नाही. ‘ एका सासूने लिहिलं होतं…. ‘लेक आणि सुनेत मी थोडं डाव उजवं करत आले. आता लेकीसारखंच सुनेशी वागेन!’

अशी अनेकांनी त्यांची त्यांची उर्वरित जीवनाची संकल्पचित्रे त्या फॉर्ममध्ये शब्दात मांडली. आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थियेटर मध्ये नेत आणि यशस्वीरित्या ऑपरेशन करून जीवनदान मिळवून देत.

नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या त्या रुग्णाने भरून दिलेला तो ‘उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म’ त्याला परत देत. आणि त्याला सांगत की, “तुम्ही घरी जाल, नव्याने जीवन जगाल तेव्हा तुम्ही राहून गेलेल्या ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या प्रत्यक्षात आणल्यावर त्याच्या समोर ‘टिकमार्क’ करत जा. आणि मग सहा महिन्यांनी तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा की त्यातल्या कशासारखं जीवन तुम्ही जगला? “

आणि मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की, सगळ्यांनी सगळं लिहिलं पण कुणाशीच भांडण / वैर झालं नाही असा एकही नसणार! पण तरीही कुणीही असं लिहिलं नव्हतं की, ‘जर मी वाचलो तर मला अमुक व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे. माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे. आणि जमलं तर त्याला पूर्ण बरबाद करायच आहे’

किंवा असेही कुणी लिहिले नव्हते की, ‘मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत. खूप श्रीमंत व्हायच आहे. स्वतःला खूप बिझी ठेवायचं आहे. ‘ 

आणि मग सहा महिन्यांनी भेटायला आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारत, “ऑपरेशनपूर्वी जेव्हा कधी तुम्ही स्वस्थ होता. तेव्हा असं आयुष्य का जगला नाहीत जे गेल्या सहा महिन्यात जगलात. तुम्हाला तसे जगण्यासाठी कुणी अडवलं होत? “

यावर रुग्ण निरुत्तर होत, मात्र निघताना डॉक्टरचे पाय धरून समाधानाने घरी जात.

डॉ. डीडी क्लास : मृत्यूची घंटा वाजल्यावरच आपण जागे होतो. हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्कारण होणारी धावपळ थांबवतो. जेवणाखाण्याची हेळसांड थांबवतो. शिस्तबद्ध आयुष्य जगतो.

आज जरा हे सगळं वाचून झाल्यावर खुर्चीत स्वस्थ डोळे मिटून थोडं चिंतन करा की हातात किती आयुष्य आहे…. माहित नाही. पण निदान जितके आहे ते कशा प्रकारे जगायचे ते मनाशी नियोजन करा. आणि जमलंच तर ते सगळं एकाखाली एक असं वहीत लिहून काढा. आणि मस्तपैकी हातपाय तोंड धुवून नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरु करा. आणि स्वतःला आधी हेच सांगा की, “अजून कुठं उशीर झालाय? जब जागो तब सवेरा” यामुळे तुम्हाला अजून उत्साह येईल. आणि हे मी स्वानुभातून सांगतोय.

पंधरा वर्षांपूर्वी मीही अशीच चूक केलेली आणि मी ती जाहीरपणे मान्य देखील करतोय. जेवणाकडे हेळसांड करून धाव धाव धावत होतो. सगळं मनासारखं प्रत्यक्षात आणलं खरं पण अचानक अटॅकपायी पूना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल व्हावं लागलं. त्यातून बाहेर आलो खरा पण आत जातानाचा मी अन बाहेर आल्यावरचा मी यात जमीन अस्मानाचा फरक होता. जिथं चार पायऱ्या चढायला डॉक्टरांनी बंदी घातली होती आणि चौथ्या मजल्यावरचे (विना लिफ्ट)चे घर ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोअरला दुसरं घ्या असं सांगितलं होत तिथं मी ते काहीही न करता मस्त ठणठणीत जगतोय. गडकिल्ले चढून जातोय. योग्य आणि वेळेवर आहार, रोज स्वतःसाठी एक तास (morning walk) आणि योगासने, रात्री झोपताना गार दूध, नो जागरण…. बास याच उपायावर त्या आजारातून बाहेर आलो. एकही गोळी न खाता. म्हणून म्हणतो, मला जी अक्कल “घंटा” वाजवून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा लेखप्रपंच! 

आणि अजून एक म्हणजे…. फार वखवख करत जगणे सोडून द्यावे.

कारण… असं म्हणतात की 

जो प्राप्त है वह पर्याप्त है

और जिसका मन मस्त है

उसके पास समस्त है!

धन्यवाद.

© डॉ. धनंजय देशपांडे  

मो न. ९४२२३०४३४४ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “बर्म्युडा ट्रँगल…” भाग – २ ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? जीवनरंग ?

☆ “बर्म्युडा ट्रँगल…” भाग – २ ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

(सहज जाणवलं… हा फक्त मुखवटा आहे… खूप काही लपवणारा. काहीतरी जळतंय.. खोल.. आतून. डोळ्याच्या एका कोनातून, ते दुःख सहज रिफ्लेक्ट होणारं. निदान मला तरी तसं जाणवलं. दुसऱ्या क्षणी… त्यांनी हसून स्वागत केलं.) – इथून पुढे —- 

मी बघतच राहिलो. हृदयात गिटार वाजू लागली. वाटलं, मी ओळखतो यांना.. खूप वर्षांपासून. पण आत्ता काहीच आठवत नाहीये… छोडो यार. एखादी व्यक्ती पन्नाशीत इतकी सुंदर दिसू शकते? त्या संतूरवाल्यांना सांगायला हवं. ‘ बाबांनो, या बाईसाहेबांना तुमच्या अॅडमधे घ्या. ’ सचमुच.. उमरका पताही नही चलता…. मला काय वाटलं, शब्दात सांगणं अवघड आहे. एवढं मात्र खरं… मी हरवून गेलेलो.

आपण यांना पाहिलंत का?

बाईसाहेबांनी ड्राॅईंग्ज बघितली. आवडली.

” तुम्ही, आमच्या जुन्या वाड्यात आला होतात का कधी? “

‘नाही कधीच नाही. का? ‘

” काही नाही. सहज विचारलं. तुमची डिझाईन्स खूप ओळखीची वाटली. ” मला काहीच समजलं नाही.

काम सुरू झालं. नंतर वरचेवर बाईसाहेबांशी भेट होवू लागली. दिवसातून एकदा तरी त्यांची साईटवर चक्कर व्हायची. जयंतराव पुन्हा भेटलेच नाहीत. त्यांचं आपलं धंदा एके धंदा. बाईसाहेब येताना, नेहमी काही तरी खायला घेवून येत.. सगळ्यांसाठी. ‘बदामी शिरा मला फार आवडतो हे त्यांना कसं कळलं? ’

मनापासून केलेला आग्रह. पहिला घास तोंडात घेतला. असं वाटलं, ही चव माझ्या खूप ओळखीची आहे..

आणि खरं सांगू? ही बाईही.

मी वेडा झालेलो. घरी सोन्यासारखी बायको.. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी. मी कसा फसवू शकतो तिला? कधीच नाही.. तरीही.. ही बाई समोर आली की.. मी माझा रहातच नाही. काही तरी वेगळंच फीलींग यायला लागतं. खूप ओळखीचं. एखाद दिवस बाईसाहेब आल्या नाहीत तर.. मी अस्वस्थ व्हायचो.

खरं तर आम्ही कामाचंच बोलायचो. पण आमच्या दोघांचे डोळे.. ते काहीतरी वेगळंच करायचे. त्या बाईची ती नजर… हिप्नोटाईज करणारी.. कशाची तरी आठवण करून देणारी.. जुनी ओळख शोधणारी… जुना फ्लॅशबॅक आठवणारी… मला काहीही आठवायचं नाही.

काम जोरात सुरू होतं. मणभर सागवानी लाकूड वापरलेलं. तुळया, महिरपी, पेशवाई बैठक. जुन्या स्टाईलच्या अॅन्टीक काचेच्या हंड्या. झुंबरं. नक्षीदार झोपाळा, भिंतीतली कपाटं. अफलातून दिसत होतं सगळं. जणू नितीन देसाईंनी ऊभारलेला, पेशवाई सेट वाटावा.

.. मला कुठून सुचलं, हे सगळं कुणास ठावूक? कुठंतरी मनाच्या डोळ्यांनी पाहिलेलं. आता प्रत्यक्षात साकारलं गेलं होतं…… का कुणास ठावूक? आत्ता हे सगळं खूप ओळखीचं वाटत होतं.

डेडलाईन जवळ येत चाललेली. पंधरा दिवसांवर वास्तुशांत. कालच जयंतराव येवून गेले. तेही खूष.

बाईसाहेब आलेल्या. काही जुने फोटो घेवून.. त्यांच्या वडिलांबरोबरचे.. जुन्या वाड्याचे.. काही ग्रुप फोटो.

” यांना छान फ्रेम करून घ्या. जिन्यात लावायचेत आपल्याला, स्टेपवाईज. “

‘ओक्के.. ‘

मी कामाला लागलो. सुतार लोकांना सूचना दिल्या. खास सागवानी फ्रेम वापरणार होतो. एका ग्रुपफोटोकडे सहज लक्ष गेले. बाईसाहेबांच्या लहानपणीचा फोटो.. त्यांचे आईवडील.. त्या आणि वाड्यातली बच्चा गँग.

तो फोटो बघितला.. मी प्रचंड अस्वस्थ.. काहीतरी प्रचंड ओळखीचं.. डोक्यात जबरदस्त केमिकल लोचा.

… सहन होईना. घामानं थबथबलो. काम थांबवलं. घरी जावून झोपलो. बरं वाटलं. संध्याकाळी परत साईटवर.

जयंतराव आणि बाईसाहेब आलेल्या. जयंतरावांना बघितलं.. माझा माझ्यावर ताबाच राहिला नाही. डोळे आग ओकू लागले. नुसता संताप. हात शिवशिवू लागले. वाटलं, या हातांनी जयंतरावांचा गळा दाबावा.

हिशोब चुकता करावा…. कुठला हिशोब? ते मात्र आठवत नव्हतं. मी नुसताच थरथरत होतो.

एकदम बाईसाहेबांनी माझा हात धरला. मी भानावर आलो.

” त्यांची तब्येत ठीक नाहीये, जा त्यांना घरी सोडून या. “

माझ्या दोन पोरांनी मला घरी नेवून सोडलं. आठ दिवस सणकून ताप. नवव्या दिवशी सकाळी. आता बरं वाटत होतं. आज साईटवर जायलाच हवं.

माझ्या माणसाचा फोन.

” साहेब, कळलं का? इनामदार साहेबांनी आत्महत्या केली. आठ दिवसांपूर्वीच. आत्ताच बाईसाहेब येवून गेल्या. त्यांनी चिठ्ठी दिलीय. उरलेल्या पेमेंटचा चेकही दिलाय. काम संपत आलंय. तुम्ही साईटवर केव्हा येताय? “

… मी उडालोच ताबडतोब साईटवर पोचलो. चिठ्ठी वाचू लागलो.

” आज ना उद्या, तुम्हाला ओळख पटलीच असती. सहज ओळखू शकाल स्वतःला. तो ग्रुप फोटो.

माझ्याशेजारचा तू.. तेच हिरवे डोळे.. मी पहिल्या दिवशीच ओळखलं तुला.. वाड्यातल्या दिगूकाकांचा मुलगा तू.. ते आमच्याकडेच दिवाणजी.. माझी तुझी काय बरोबरी? तरीही… मला तूच हवा होतास.

तूही जिद्दीला पेटलास. तू शिकायला दिल्लीला गेलास. सरकारी नोकरी मिळवलीस. मला मागणी घालायला म्हणून पुण्याला निघालेला… पुण्याला पोचलास नाहीस. दिगूकाका खंगून खंगून गेले….

जयंता… आपल्या दोघांचा मित्र. चिठ्ठ्या पोचवायचा. तू गेलास दिल्लीला. त्याचा माझ्यावर डोळा. तुझं काही तरी बरं वाईट झालं असणार.. नव्हे त्यानंच केलं असणार.. तू आला नाहीस. खूप वाट बघितली. शेवटी इनामदारांकडनं रीतसर मागणी घातली गेली. माझा नाईलाज झाला. माझी खात्री होती.. जयंतानंच तुझ्याशी दगाफटका केला असणार.. त्यादिवशीची तुझी ती नजर….. जयंतानंही ओळखलं तुला. खरं तर बाकी आयुष्यभर, तो माझ्याशी चांगलाच वागला. पण त्या पापाचं ओझं सहन होईना त्याला. माझ्यापाशी कबूल केलं सगळं. रात्री कधीतरी स्वतःवर गोळी झाडून घेतली. बरं झालं… तू वाचलास. नाहीतर या बर्म्युडा ट्रँगलमधे खेचला गेला असतास.. खोल गर्तेत अडकला असतास.. सोन्यासारखा संसार आहे तुझा. सांभाळ.

गेल्या जन्मीचे हिशोब, या जन्मी चुकते करायला निघाला होतास… विसरून जा सगळं. मी कायमची निघून जातेय लेकीकडे, ऑस्ट्रेलियात. तुझा विश्वास असो वा नसो.. माझ्यासाठी एक कर… धुंडीशास्त्रींशी बोललेय मी. शांती करून घे. तुझ्यातल्या माझ्या विश्वासाला मुक्ती मिळू दे. कायमची. शुभम् भवतु. “

मी शाॅक्ड. चेक घेतला. दोन दिवसांत काम पूर्ण करून घेतलं. चाव्या बाईसाहेबांच्या वकीलाकडे सुपूर्त केल्या. बंगल्याची वास्तुशांत बहुधा कधी होणारच नाही. चॅप्टर क्लोज्ड.

ती आठवण कायमची पुसली गेली. पुन्हा कधीच, काही आठवलं नाही… तो बंगलाही… अन् बाईसाहेबही.

काल सहज, माती गणणपतीशी चक्कर झाली… एक पेशवाईस्टाईल बंगला दिसला. पितळी नावाची पाटी दिसली…..

” बर्म्युडा ट्रॅगल. “

… वाटलं, या जागेशी माझं काही तरी कनेक्शन आहे. जाम आठवण्याचा प्रयत्न केला. नाही आठवलं.

तुम्हाला आठवतंय का काही?

– समाप्त –  

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “बर्म्युडा ट्रँगल…” भाग – १ ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? जीवनरंग ?

☆ “बर्म्युडा ट्रँगल…” भाग – १ ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

असं तुमच्या बाबतीत होतं का कधी?

म्हणजे बघा, आपण एखाद्या जागी, आयुष्यात पहिल्यांदा जातो. आणि तिथं गेल्यावर एकदम वाटायला लागतं… अरे हे सगळं तर माझ्या खुप ओळखीचं आहे. इथल्या खूप आठवणी आहेत… ती जागा एकदम मनात घर करून जाते.

कुठल्या आठवणी? आपण मेंदूला खूप ताण देतो. जाम आठवत नाही. मेंदूचा नुसता बैंगन भरता.. आपण अत्यवस्थ.

डिट्टो तसंच. तसंच झालं माझ्या बाबतीत. माती गणपती मंदिराजवळ उभा होतो. एका क्लायंटची वाट बघत. सहज समोर लक्ष गेलं. कन्स्ट्रक्शन चालू होतं. रस्त्याला लागून भली मोठी जागा. पार पलीकडच्या गल्लीपर्यंत. खरं तर, एखादी मोठी स्कीम सहज झाली असती. पर नही… बंगल्याचं काम चालू होतं.

बंगला कसला? माॅडर्न वाडा. एखाद्या पेशवाई वाड्यासारखा लुक. आर. सी. सी. च. महिरपी खिडक्या, दारं.. पंधरा वीस मोठाल्या खोल्या असतील. सुबक, प्रशस्त. जुन्या नव्याचं अल्टीमेट काॅम्बो. मालक जाम पैसेवाला असणार. अन दर्दीही. मी जाम ईम्प्रेस झालो.

… एकदम आतून जाणवायला लागलं. या जागेशी, माझं खूप जवळचं कनेक्शन आहे. काय संबंध?

माझं मलाच सांगता येईना. गुहागरसारख्या छोट्या गावातला मी. इथं अभिनवला अॅडमिशन मिळाली.

आणि पुण्यात पहिलं पाऊल टाकलं. आता पुण्याचाच झालो. इंटेरियरचा डिप्लोमा केला. एका मोठ्या फर्ममधे चार पाच वर्ष नोकरी केली. अनुभव घेतला. चार ओळखी झाल्या. आता स्वतःच इंटेरियरची कामं घेतो. विशेषतः बंगल्यांची… जास्त करून कोथरूड, बाणेर, औंध या भागात. एकेक साईट सहा सहा महिने चालते. आलात कधी, तर दाखवीन एखादी साईट. क्लायंट खुश असतो माझ्यावर. दहा बारा लोकांची चांगली टीम आहे. हळूहळू जम बसतोय. लग्न झालंय. एक पोरगा आहे. सासुरवाडी कोकणातलीच. चिपळूणातली. स्वतःचा फ्लॅट बुक केलाय. इकडे पेठांमधे फारसं येणं होतच नाही. म्हणून तर म्हणतोय….. या जागेशी माझं काही कनेक्शन असणं, शक्यच नाही. निदान या जन्मात तरी.

माझ्याकडून बघून तुम्हाला काय वाटतं? हा माणूस, पक्का बनेल असणार. चूना लावणार आपल्याला.

नाही हो…. तसा नाहीये मी. चांगला उंच आहे. गोरा आहे. फक्त.. डोळ्यांनी घोटाळा होतो. माझ्या डोळ्यांचा रंग हिरवा आहे… बिल्लोरी… समुद्राचं गहिरं पाणी आणि माझे हिरवे डोळे.. बघणारा वचकतोच क्षणभर. कुणालाही मी आतल्या गाठीचाच वाटतो. शाळेत असताना तर मला बोका म्हणायचे. जाऊ दे.

खूप सहन केलंय या डोळ्यांपायी.

तर मी काय सांगत होतो?

एकदम वाटलं.. इथलं इंटेरियरचं काम मिळालं तर? मजा आयेगा. पैसा तर मिळेलच. पण अशा पेशवाई वाड्याचं इंटेरियर… जुना काळ पुन्हा उभा करीन मी. रिवाईन्ड केल्यासारखा.. मजा आयेगा.

… अवघड आहे. खूप लोकं गळ टाकून बसली असणार. मेरा नंबर कब आयेगा? शायद आयेगाही नही.

ट्राय करायला काय हरकत आहे?

समोरच्या टपरीवर चौकशी केली. इनामदार साहेंबांच्या बंगल्याचं काम चालू आहे.

‘साहेब कुठं भेटतील? ‘

‘शोरूमवर. लक्ष्मी रोडला. ” घाटगे आणि मंडळी ” मोठ्ठं ज्वेलर्स शाॅप आहे. तिथं भेटतील. ‘

.. बहुधा साहेब तिथं जनरल मॅनेजर असणार. बॅगमधे लॅपटाॅप होताच. तिथं जावून धडकलो.

जयंत इनामदार… पंचावन्नच्या आसपास वय. जिभेवर साखर. आदबशीर बोलणं. एसी केबीन.

.. त्याची हैसीयत दाखवणारं. समोरचा मोठा असो वा छोटा.. सगळ्यांना आपलसं करणारं मधाळ बोलणं.

पक्का बिझनेसमन.

मी येण्याचं कारण सांगितलं. लॅपटाॅपवर आधीच्या साईटचे फोटो दाखवले. क्लायंट लिस्ट दिली. एकाशी तो बोलला सुद्धा लगेच. सॅटीस्फाईड. त्यानं लगेच साईटप्लॅन दिला.

“बाकीचं काम पूर्ण होत आलंय. इन्टेरीयरचं काम लगेच सुरू करायचंय. दोन दिवसांत तुम्ही तुमची ड्राॅईंग्ज द्या. कोटेशन द्या. मग पुढचं बोलू. अर्थात ड्राॅईंग्ज आवडायला हवीत. बेस्ट लक”.

मी ढगात पोचलेलो. यकीन नही आता टाईप झालेलं. इतकं सहज काही चांगलं घडू शकतं? माझा विश्वासच बसत नव्हता. दोन दिवस घड्याळ बंद. फक्त कॅलेंडर बघायचं. रात्रीचा दिवस आणि व्हाईस वर्सा.

प्रत्येक रूमचा डीटेल्ड प्लॅन आणि ड्राॅईंग्ज. संपूर्ण घराच्या इन्टेरियरचा, एक अॅनीमेटेड थ्रीडी व्हीडीओ पण केलेला. हे काम प्रचंडच होतं. सत्तर ऐशी लाखाचं.

पुन्हा ‘घाटगे आणि मंडळी’ची वारी. जयंतराव झिंदाबाद. जयंतराव हुशार माणूस. त्यांनी व्यवस्थित क्वेरीज काढल्या. मीही सोल्यूशन देत गेलो. मग वाटाघाटी… दोन तास मी किल्ला लढवत होतो. आॅपरेशन सक्सेसफुल. काम मिळालं. खिशात दहा लाखाचा अॅडव्हान्सचा चेक, घेवून मी बाहेर पडलो.

” अजून काम मिळालंय, असं फायनल समजू नका हं… आमच्या बाईसाहेबांना, तुमची ड्राॅईंग्ज पसंत पडायला हवीत. त्यांनी ग्रीन सिग्नल द्यायला हवा. त्या सांगतील ते चेंजेस करावे लागतील. घरच्या बाॅस त्या आहेत…. तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी इनामदार. आमचा खरं तर डेअरीचा व्यवसाय. जोरात चालायचा. हे दुकान आमच्या सासरेबुवांचं. बाईसाहेबांशी लग्न झालं. त्या एकुलत्या एक. सासरेबुवांनी गळ घातली. आम्ही डेअरीचा धंदा बंद करून, या धंद्यात शिरलो. लक्ष्मीमातेची कृपा… एकाची चार शोरूम झालीयेत आता. ही साईट जिथं आहे, तिथे आमच्या सासरेबुवांचा वाडा होता. दीडशे वर्ष जुना. बाईसाहेबांच्या फार आठवणी आहेत तिथल्या. म्हणूनच तर बंगल्याला वाड्याचा लुक दिलाय. बाईसाहेबांना खूष ठेवा म्हणजे झालं. ” … जयंतराव हसत हसत म्हणाले.

” मी नक्की प्रयत्न करीन ” मी आश्वासन दिलं.

दोन दिवसांनी प्रत्यक्ष साईटवर. जयंतराव आणि बाईसाहेब. बाईसाहेबांशी पहिली भेट. मी हक्काबक्का.

आरस्पानी, नितळ चेहरा. केसांचा बाॅबकट. कानात हिऱ्याचं नाजुक कानातलं. कुठली तरी भारीतली साडी.

हलकासा मेकअप. धुंदी सेंटी सुवासीक वावर. मोठ्ठे बोलके डोळे. खानदानी सौंदर्य. हातचं राखून बोलणं.

तरीही.. सहज जाणवलं… हा फक्त मुखवटा आहे… खूप काही लपवणारा. काहीतरी जळतंय.. खोल.. आतून. डोळ्याच्या एका कोनातून, ते दुःख सहज रिफ्लेक्ट होणारं. निदान मला तरी तसं जाणवलं. दुसऱ्या क्षणी… त्यांनी हसून स्वागत केलं.

– क्रमशः भाग पहिला  

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मलाही वारीला जायचं… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

? जीवनरंग ?

☆ मलाही वारीला जायचं… ☆ सौ. प्रांजली लाळे

भुमी आज खुप घाईत होती. पटापट सर्व कामे हातावेगळी करत होती. आज बॉसही थक्क झाला होता तिला एवढे सिरियसली काम करताना पाहून.

ऑफिस ते घर एवढंच विश्व असलेली भूमिका विश्वास पाटील. आधी खुप वेगळ्या वातावरणात वाढलेली मुलगी. दहावीपर्यंत पुण्याजवळच्या खेडेगावात वाढलेली.. आई-बाबा तर लहानपणी गेलेले. आजी आजोबांच्या अंगा-खांद्यावर बागडून मोठी झालेली भुमी. आजोबा अतिशय सात्विक व्यक्तिमत्वाचे.. कपाळी बुक्का.. चेहऱ्यावर सतत हास्य..

आजीच्या उबदार मायेच्या वर्षावात न्हाऊन निघालेली भूमी. तिला आईची कमतरता कधी भासलीच नाही.

घरात विठोबा-रखुमाई असताना देवळात कशाला जायचं असा भाबडा प्रश्न तिला पडे. तिचे आजोबा भजन किर्तनात तल्लीन झालेले तिने अनेकदा पाहिले होते. आजीही जात्यावरच्या ओव्या सुंदर आवाजात गायची. भुमीला कधी कधी फोटोतल्या आई-बाबांची आठवण यायची. तिला वाटे काय केले देवाने आपल्यासाठी?  कुठे हरवले माझे आई-बाबा?

जेव्हा शाळेत पालक सभा असायची, सर्व मैत्रिणी त्यांच्या आई-बाबांबरोबर शाळेत यायच्या. तेव्हा मात्र भुमी सैरभैर होई.. पण आजी आजोबांचे तिच्यासाठी भक्कमपणे उभं राहणं तिचं मन शांत करी..

आजोबा दरवर्षी न चुकता वारीला जात. एकही वारी चुकलेली तिला आठवत नव्हती. आबा जेव्हा वारीला निघत. तेव्हा एक प्रकारचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसे. कपाळावर अष्टगंध आणि बुक्का आवर्जून लावत.. मोजकं सामान.. भरपूर विठ्ठलभक्त मित्र परिवारासोबत आबा निघत असत. महिनाभर आबा दिसणार नाहीत ह्या भावनेने तिचा कंठ दाटून येई.. “आबा, मी नाही बोलनाल तुमच्याशी, ” गाल फुगवून भुमी बोबडे बोले.. आबा पटकन उचलून घेत तिला.. “भुमी सरकार, आम्ही हे गेलो.. आणि हे आलो बघ.. तो विटेवरी उभा राहून वाट बघतोय बघ.. “

“कुठेय कुठेय आबा? ” भुमीचा निरागस प्रश्नं हसून परतवत आजोबा.. आजीकडे मंद हसत पहात.. पुढच्या प्रवासाला निघत.. विठू नामाचा गजर होई.. गावातून दिंड्या निघत. बरीच पुरुष माणसं दिंडीत जात.. मग काय गावातील बायकांचं आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांचच राज्य! मजाच मज्जा.

दिवस सरत होते.. दरवर्षी आषाढीची वारी सुरु असे भुमीच्या आबांची.. त्याही वर्षी आबा वारीला गेलेले. दिड महिना झाला तरी परतले नाहीत. सोबतची सगळी माणसं परतली पण “आबा”…. नाही आले घरी परत..

भुमी पंधरा वर्षांची होती.. समजती झालेली. आजीला कुशीत घेऊन धाय मोकलून रडली.. “बस्स् आता नाही पहायचं विठ्ठलाकडे!! माझ्या आबांना हिरावलंय या वारीनं.. आजी आपण ह्या गावात नाही रहायचं गं.. काही नाही केलं ह्या देवानं आपल्यासाठी.. “

आजीही आजारी पडली ह्या धक्क्याने.. पण तिला भुमीसाठी सावरावंच लागलं.. पण घरात ओव्या, विठूचं नाव घेणं बंद झालं.. एक दिवस भुमीचा मामा आला.. आणि या आजी-नातीला घेऊन शहराकडे परतला..

तिथून सुरु झाला भुमीचा एक वेगळा प्रवास. मामाच्या आधाराने दोघींचीही आयुष्यं बदलली. भुमी मोठी इंजिनिअर झाली.. पण भगवंताची पुजा, नमस्कार एकदम बंद.. मामानंही कधी आग्रह नाही केला तिला..

भुमीचं यथावकाश लग्न झालं. आजी एकटी पडली.. पण पर्याय नव्हता.. हम्म्.. तिला परदेशात जाण्याची संधी मिळाली. भारत सोडून जाताना सर्व आठवणी सोबत घेऊन गेली..

नवरा आणि तीच अमेरिकेत.. दोघेही कामाला जुंपलेले.. ज्या अपार्टमेंटमधे रहात तिथे बरेच जणं मराठी होते. त्यामुळे मराठी सणवार धडाक्यात साजरे होत. भुमीला ह्यात काहीही रस नव्हता. फक्त औपचारिकता!! मनावर उमटलेले चरे खुप वेदना द्यायचे..

तिचा नवरा अतिशय मायाळू आणि समजूतदार होता. बक्कळ पैसा असला आणि अमेरिकेत रहात असला तरी देवपूजा केल्याशिवाय बाहेर पडत नसे.. भुमीला प्रचंड चिड यायची.. एकदा दोनदा देवाच्या मुर्ती कपाटात ठेऊन दिल्या तिने.. डोळ्यासमोरही नको होत्या त्या.

ऑफिसला जाताना अचानक मोबाईल किणकिणला.. आकाश, तिचा नवरा बोलत होता.. “मी दुसऱ्या शहरात अर्जंट जात आहे. उद्यापर्यंत परत येईल. “

प्रथमच ती घरात एकटी राहणार होती. एक अनामिक भिती वाटत होती तिला आज. काही तरी हुरहूर लागली होती मनाला.. ऑफिसमध्ये जाऊन आली तशी मटकन बसली.. कारण लिफ्टमध्ये चर्चा होती की यु. स. बोईंग विमान वातावरणात खराबी आल्याने कुठंतरी दूरच्या दाट जंगलात उतरवण्यात आलंय.. भितीने पोटात गोळा आला भुमीच्या.. कारण त्या विमानाने आकाश कामासाठी दुसऱ्या शहरात जाणार होता.. त्याला फोन लावला. पण तोही लागेना.

मग मात्र तिला ब्रम्हांड आठवले. आज ती कोणाला साकडं घालणार होती?  भगवंताने आज जर साथ दिली नाही तर ती जगातील कोणत्याही शक्तीवर विश्वास ठेवणार नव्हती.

हतबल होऊन मटकन खाली बसली. तिने गच्च डोळे मिटले. ‘शांत हो बाळा येईल आकाश परत. तु काळजी करु नकोस. माऊली त्याला सुखरूप आणतील.. ‘ मागे वळून पाहिले तर तिचे आबा तिच्या डोक्यावरुन हात फिरवत होते.. “आबा कुठे होते इतके दिवस तुम्ही?  मी खुप शोधले तुम्हाला. ” 

“बाळा मी तुझ्याबरोबरच आहे की.. “

“नाही आबा, त्या विठोबाने तुम्हाला नेलं.. मला परत पोरके केलं. आता माझ्या आकाशलाही…. ” भुमीला रडू आवरेना..

“नाही गं पोरी, तो विठूच आहे बघ, तो तुझ्या आकाशला परत घेऊन येईल सुखरूप.. माझं जाणं विधिलिखित होते.. मी जवळच होतो तुझ्या.. तुला फक्त जाणवलं नाही.. जप स्वतःला, आकाशला.” 

भुमीला कपाळावर हातांचा उबदार स्पर्श जाणवला. खाडकन जागी झाली.. पाहिले तर आकाश मायेने डोक्यावरून हात फिरवत होता.

“आकाश… तु कसा काय…. ” तिच्या तोंडून शब्दही फुटेनात..

आकाश फक्त थोपटत राहिला.. “अगं तुला फोन केला आणि एअरपोर्टवर जाण्यासाठी वळालो.. तर समोर महाराष्ट्रीयन मंडळाची दिंडी निघालेली. तुला तर माहिती आहे.. देवाची सेवा करायला मला प्रचंड आवडते.. मी लगेच माझ्या सहकाऱ्यांना फोन करून पुढील अपॉईंटमेंट घेण्याची सूचना दिली आणि दिंडीत सामील झालो.. विठ्ठल नामात इतका तल्लीन होतो की तुला फोन करण्याचं भानच उरलं नाही.. आषाढी एकादशी जरी परवा असली तरी आजच दिंडी निघाली.. तिथेच देवळात मुक्काम आहे भक्तांचा.. मी देखील जाणार आहे.. “

भुमी थक्क होऊन बघत राहिली.. “अरे तुला कळाले का, तु ज्या विमानाने जाणार होता. ते कुठेतरी हरवलंय.. “

आकाश आश्चर्याने जवळ जवळ किंचाळलाच.. आज विठ्ठलाने त्याला वाचवलं होतं.. यापेक्षा दुसरा दृष्टांत तो काय असेल?

दुसऱ्या दिवशी सकाळीच भूमीनं मनात ठरवलं.. वारीला जायचं.. भगवंताला डोळे भरून बघायचं.. पटकन आवरलं.. ऑफिसला उद्याची लिव्ह टाकून तिची पावलं विठ्ठल-रखुमाईंच्या देऊळाकडे वळाली.. भगवंताच्या नामस्मरणात, टाळ गजरात तीही तल्लीन होऊन नाचू लागली.. ‘विठ्ठल विठ्ठल!! ‘

© सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निर्गुण साक्ष… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ निर्गुण साक्ष… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

श्रीधर मॉर्निंग वॉकला निघाला होता. हिरव्यागार झाडीतून वाहणाऱ्या गार वाऱ्याने मन प्रसन्न झाले.आपोआप ओठावर गाणे आले.पावलाची गती वाढली.पावले झपाझप पडायला लागली.तेवढ्यात ग्यानबा तुकारामाचा गजर कानी पडला.भगव्या पताका डोळ्यात भरल्या.समोरून वारकऱ्यांची दिंडी येताना दिसली.श्रीधरचे पाय जागीच थांबले.किती दिवसांनी जवळून दिंडीचे दर्शन घेत होता.नवी ऊर्जा मनात भरली. चैतन्य जागृत झाले.मन हलकं हलकं झालं.श्रीधरचे मन भूतकाळ गेले.

नात्यापोत्या जवळ माझे गाव होते. घराघरात हरिपाठ होत असे.गाव सात्विक गुणांचे होते.कुणाचे कुणाशी भांडण नव्हते. तंटा नव्हता.सगळे कसे गोडीगुलाबीने रहात.राबुन खात.विठ्ठल नाम ओठांत.आषाढी वारी म्हणजे मोठा सोहळा, मोठा उत्सव.प्रत्येकाच्या गळ्यात माळ. प्रत्येक माणूस सेवाभावीवृत्तीचा.या पेक्षा आमचे घर वेगळे नव्हते. नात्यापोत्याला दिंडी मुक्काला आली की त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था अण्णा, आबा करत. अण्णा म्हणजे माझे बाबा आणि आबा म्हणजे माझे काका. तेव्हा अण्णाची, काकाची गडबड होई.वारी पुढे मार्गी लागे पर्यंत त्यांना चैन पडत नसे.मी त्यांच्या सोबत असे.मी हे सारे जवळून बघत होतो.माझे बाबा नेहमी म्हणत ” वारी म्हणजे चैतन्याचा जागर.वारी म्हणजे अध्यात्मिक जीवाचा मेळा, वारी म्हणजे एकसंघभाव.इथं सगळे भेदभाव मिटतात.इथं खऱ्या भगवंताचे दर्शन होते.ते बघायला आपली तशी दृष्टी हवी.” मी कामानिमित्त शहरात आलो.शहराचा होऊन गेलो. सुट्टी काढून जेव्हा गावी जात असे तेव्हा बाबा नेहमी म्हणत “श्रीधर बाळा काही कर.पण आयुष्यात एकदा तरी पायी वारी कर.म्हणजे जगण्याचा खरा अर्थ तुला उमगेल.देव दगडात नाही तो चैतन्यात आहे.हे वारी तुला शिकवेल ” वारी करण्या एवढी सुट्टी कधी मिळाली नाही.पायी वारी कधी घडली नाही.

आज दिंडी बघून बाबाची आठवण झाली.गावाची आठवण झाली.मी करंटा.एवढं सांगून ही मला काही पायी वारी करणे जमले नाही.पण माणसातील देव शोधण्याचा यत्न मी काही सोडला नाही.माझ्या परीने मी गरजवंताला मदत करत आलो‌.आता मला चैतन्याचा पुजारी व्हायचं आहे.तिथंल्या विठूरायाची भेट घ्यायची आहे.हे माझ्या हातून कधी होईल मला माहित नाही.पण ही भेट झाल्या शिवाय मी डोळे मिटणार नाही हे खरं.

“पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय!! ” गजर झाला.दिंडी पुढे गेली.

श्रीधर सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाला.मुलाबाळाचे शिक्षण, लग्न, घर यासाठी काढलेले कर्ज भागवून काही रक्कम श्रीधरने खास राखीव ठेवली होती.त्याचा कुणाला पत्ता लागू दिला नाही.एक दिवस रमाला म्हणाला “आता मला शांतपणे गावी जाऊन रहायचं आहे.तू बरोबर येशील? “

“आता हे काय नवं खुळ.”

“हे खुळ नाही.हे माझे स्वप्न आहे.”

” तिथं तुम्हाला करमणार नाही.तुमचे सगळे आयुष्य इथं शहरात गेले.इथल्या सुखसाईची सवय लागली आहे.”

“न करमायला काय झाले? माझे बालपण खेड्यातच गेले आहे.”

“मग मला कसली अडचण असणार? पण आपण तिथं करणार काय? “

” तू तयार आहेस ना.मग झालं तर. बघ मी काय काय करतो ते”

श्रीधर, रमा गावी आले.त्यांनी जमीन विकत घेतली.तिथच एक छोट घर बांधले.विठू माऊलीचे नाव घेत घेत जागा स्वच्छ केली.जागा खणली. तिथं वीस सागाची, वीस आंबाची, वीस आवळांची, वीस चिंचेची, झाडे लावली. चिक्कू, पेरू, डाळिंब अशी खुप सारी झाडे लावली.माऊलीचे नाव घेत त्या झाडांची देखभाल केली.दोन चार जनावरे घेतली.घराच्या पुढच्या भागात भाजीपाला लावला.मन निसर्गाच्या सेवेत झोकून दिले.त्यांचे ते श्रम बघून येणाऱ्या जाणारे त्यांना खुळ्यात काढत होते.शहरातील आरामदायी जीवन सोडून, कुठे झाडे लावत बसलीत आहेत ही शहाणी माणसं? यांना काही कळत नाही.

पण जसं जशी झाडे जोमाने वाढू लागली.त्यांना फुले फळे येवू लागली. तशी तिच माणसे त्यांचे कौतुक करू लागली.चहापाण्याला हक्काने घरी जावू लागली.दोघाचे कौतुक करू लागली.

तेव्हा श्रीधर म्हणे ” ही सारी विठू माऊलीची कृपा आहे.मी निमित्तमात्र आहे.”

येणारे लोक रिकाम्या हाताने कधी परत गेले नाहीत.फळे, भाजी पाला काही ना काही त्यांना ते प्रसाद म्हणून देत.

झाडांची वाढ झपाट्याने होत होती. तिथं एक छोट रानच तयार झालं होत.अनेक पक्ष्यांनी झाडावर घरटी बांधली होती.त्यांच्या किलबिलाटाने श्रीधरला जाग येत होती.स्वर्गीय सुख तो अनुभवत होता.निसर्गातील या चैतन्यात माझा विठूराया वसला आहे.हे चैतन्य मला रोज नवी उर्जा देते. झाडाची पाने हलतात तेव्हा श्रीधरला वाटते झाडे टाळ्या वाजवत हरीनाम घेत आहेत. माझा विठूराया इथल्या कणाकणात वसला आहे.तो म्हणतो तू फक्त विश्वासाने हाक मार मी इथेच आहे. झाडाची फळे म्हणजे श्रीधरला विठूरायाची भेट वाटते.तो ती फळे येणाऱ्या जाणाऱ्यांना देतो.निसर्गाच्या चैतन्यात त्याचा विठू त्याला रोज भेटतो.

एके दिवशी रात्री सोसाट्याचा वारा सुटला.बाहेर पाऊस कोसळत होता.लाईट गेली. मेणबत्तीच्या उजेडात जेवण झाले. तेवढ्यात श्रीधरला अस्वस्थ वाटायला लागलं.घाम फुटला.छातीत दुखायला लागले.रमा घाबरली.खिडकी उघडावीत तर पाऊस घरात येईल. काय करावे? मदतीला कोणाला बोलवावे? रात्री गावात डॉक्टर नसतात. मी कुणाला बोलवू? मी काय करू? निश्चय करून तिने ओढणी घेतली. त्यांने श्रीधरला पाठीला बांधले.आता मीच गाडी घेऊन शहरातील दवाखान्यात जाते.ती दाराजवळ आली.दार उघणार एवढ्यात दारावर टकटक झाली.दार उघडले तर एक व्यक्ती पावसात भिजत होती.

” माऊली. आज रात्री पुरता आसरा दे मला.”

” मला शक्य नाही.मी माझ्या पतीला घेऊन दवाखान्यात निघाले आहे.बाबा तू दुसरीकडे आपली सोय बघ.”

” तुम्ही आसरा दिला तर माझी मदत होईल तुम्हाला.”

” “

” विश्वास ठेवा माझ्यावर.ऐक माझ.पतीला बिछानावर ठेव. मेणबत्ती जरा उंच धर.” त्या व्यक्तीच्या सांगण्या प्रमाणे रमा करत गेली.तिने विरोध केला नाही.त्या व्यक्तीने काय केले माहित नाही.पण……

“र..मा….र…मा.”म्हणून हाक ऐकू आली. श्रीधरला सुखरूप बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.हात जोडले. “विठ्ठला….तुझीच रे कृपा सारी” तेवढ्यात लाईट आली.बघते तो काय…..घरात दोघांच्या शिवाय तिसरे कोणीच…नव्हते.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आक्रमण – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ आक्रमण – श्री  सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

बावीसावं शतक. एक दिवस देशात अघटित घडलं. मोठं संकट सर्वांवर आलं. सकाळी लोक उठले आणि बघितलं, तर काय? सगळीकडे फुलपाखरंच फुलपाखरं. खेडी, लहान-मोठी गावं, शहरं, महानगरं कुठेही बघा. फुलपाखरंच फुलपाखरं. शेतात फुलपाखरं, अंगणात फुलपाखरं, घरात फुलपाखरं, गल्ली-बोळात फुलपाखरं, बाजारात फुलपाखरं, रस्त्यात-चौकात फुलपाखरं. करोडो-अब्जांच्या संख्यने फुलपाखरंच फुलपाखरं. ऑफीसमध्ये फुलपाखरं होती. मंत्रालयात फुलपाखरं होती. न्यायालयात फुलपाखरं होती. इस्पितळात फुलपाखरं होती. फुलपाखरं इतक्या मोठ्या संख्येने होती, की माणसं कमी आणि फुलपाखरंच जास्त झाली.

सामान्य जन-जीवन पूर्णपणे अस्ताव्यस्त झालं. असं वाटत होतं की जसं काही फुलपाखरांनी देशावर आक्रमण केलय. दिल्लीत संसदेचं सत्र चालू होतं. फुलपाखरं मोठ्या संख्येने लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये घुसली. प्रेक्षकांच्या गॅलरीत फुलपाखरंच फुलपाखरं भिरभिरू लागली. अध्यक्ष आणि सभापतींच्या आसनांच्या चारी बाजूंनी फुलपाखरंच फुलपाखरं फडफडू लागली. अखेर दोन्ही सदनांची कारवाई दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. राज्यातही विधानसभा आणि विधान-परिषदेची कारवाई दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. सुरक्षा यंत्रणा सावध झाली. फुलपाखरांच्या देशावरील आक्रमणात शेजारी देशाचा तर हात नसेल. हे त्यांचच षडयंत्र तर नसेल? विचार सुरू झाला.

सगळ्या देशात आरडा-ओरडा, रडणं-भेकणं सुरू झालं. रस्त्यातील वाहतूक बंद झाली. न्यायालयातील कारवाई दिवसभरासाठी स्थगित केली गेली. शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आली. मंत्रालयात, ऑफिसात काही काम होत नव्हतं. इस्पितळात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला कारण आपत्कालीन सेवा कक्षात मोठ्या संख्येने फुलपाखरं घुसल्याने नर्सेस आणि डॉक्टर रुग्णांकडे नीट लक्ष देऊ शकत नव्हते. ऑपरेशन-थिएटरमध्ये फुलपाखरं भिरभिरत असल्याने ऑपरेशन्स स्थगित करावी लागली. फुलपाखरं इतक्या मोठ्या संख्येने भिरभिरत होती की त्यांनी सूर्याला झाकून टाकलं होतं. भर दुपारी अंधार पडला. रेडिओ आणि टी. व्ही. यांचं प्रसारण बाधित झालं. टेलीफोन सेवा ठप्प झाली.

सगळे आवाक झाले. कुणालाच समाजत नव्हतं की हे अचानक काय झालं? सरकारवर आपत्ती कोसळली होती. प्रशासन लाचार दिसत होतं.

सुरुवातीला लहान मुलांना मजा वाटली. ती फुलपाखरांशी खेळू लागली, पण जेव्हा परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव लोकांना झाली, तेव्हा त्यांची शुद्ध – बुद्ध हरपली. असं नाही, की त्यांनी या समस्येवर काहीच इलाज केला नाही. बेगॉन स्प्रेपासून ते सगळ्या प्रकाराची कीटक नाशके फुलपाखरांच्या फौजेवर फवारली गेली. पण त्यांच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. पोलिसांनीही आपल्या परीने स्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. देशात अनेक ठिकाणी फुलपाखरांवर अश्रू धुराचे गोळे फोडले. त्यांच्यावर लाठीमार केला. काही ठिकाणी त्यांच्यावर फायरिंगसुद्धा केलं. पण काही उपयोग झाला नाही. फुलपाखरांची संख्या इतकी अतोनात होती, की गोळ्या कमी पडल्या. विमान आणि रस्त्यावरील वाहतुकीवर फुलपाखरांच्या अस्तित्वाचा खूप वाईट परिणाम झाला. जागोजागी दुर्घटना झाल्या. त्यात अनेक लोक मेले. शेवटी वैज्ञानिकांनी काही फुलपाखरे पकडली आणि ‘ एलेक्ट्रोन माइक्रोस्कोप ‘खाली त्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांच्या हैराणीला सीमाच उरली नाही. त्यांना दिसलं की फुलपाखरांच्या पंखांवर बारीक अक्षरात कुठलं ना कुठलं आश्वासन लिहिलय. मग हे कोडं उलगडलं. ही फुलपाखरे म्हणजे करोडो, अब्जावधी आश्वासने आहेत. १९४७ साली देश स्वतंत्र झाला. त्यानंतर पुढार्‍यांनी, अधिकार्‍यांनी गेल्या अनेक वर्षात जी आश्वासने दिली होती, पण पूर्ण मात्र केली नव्हती, ती सगळी खोटी आश्वासने, फुलपाखरे बनली होती.

ही बातमी सगळ्या देशात वणव्यासारखी पसरली. लोक चर्चा करू लागले, एक ना एक दिवस हे होणारच होतं. खोटी वचने, पोकळ आश्वासने किती काळ देणार? एक ना एक दिवस पापाचा घडा भरणारच की!

इतिहासकारांनी ताबडतोब एक आपत्कालीन बैठक बोलावली. सरकारला आठवण करून देण्यात आली, की शेकडो वर्षांपूर्वी विश्वातील पहिले गणतंत्र राज्य वैशाली होते. याच प्रकारच्या प्रकोपामुळे ते नष्ट झाले होते. ज्या लोकशाहीत नेते, पुढारी, अधिकारी खोटी वचने आणि पोकळ आश्वासने देतात, त्या लोकशाहीची परिस्थिती वैशाली गणतंत्रासारखीच होते. भविष्यवेत्त्यांनीही इतिहासकारांच्या या बोलण्याचं समर्थन केलं.

हे सगळं ऐकून सरकार सक्रीय झाले. एक सर्व पक्षीय बैठक बोलावली गेली. बैठकीत वैज्ञानिक, इतिहासएचे अभ्यासक आणि भविष्यवेत्ते यांच्या बोलण्यावर चर्चा झाली. पण एक तर चारी बाजूंनी फुलपाखरेच फुलपाखरे भिरभिरत होती. दुसरं म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपच्या अशा फैरी झडत होत्या, की त्यातून कोणताच निर्णय होऊ शकला नाही. या अशांत काळातही हे शाबीत करण्याची दोन्ही पक्षात चढाओढ लागली होती, की खोटे वायदे कुणी जास्त केले होते आणि कुणी कमी.

घरा-घरातदेखील असाच परिणाम दिसत होता. पती-पत्नीने एकमेकांना, आई-वडलांनी मुलांना खोटे वायदे केले होते, आश्वासने दिली होती. ते सगळे खोटे वायदे आणि आश्वासने असंख्य फुलपाखरे बनून घरात चारी बाजूंनी भिरभिरत होती आणि घरवाल्यांना सतावत होती.

जे वायदे १९६०च्या दशकाच्या आधी केलेले होते, ते ‘ ब्लैक-अ‍ॅंड-व्हाइट ‘ फुलपाखरांच्या रूपात चारी बाजूंनी फडफडत होते. सिनेमात रंगीत युग आलं, त्यानंतर केलेले वायदे रंगीत फुलपाखरांच्या रूपात चारी बाजूंनी फडफडत होते.

अशा तर्‍हेने पूर्ण दिवस सरला. या समस्येवर कुठलाच उपाय सापडला नाही. रात्रीचे बारा वाजून गेले आणि सगळ्या फुलपाखरांचं रूपांतरण झालं आणि ते टोळ बनून लोकांवर हल्ला करू लागले. त्यांच्या निशाण्यावर विशेष करून मंत्री, राजनेते, आणि अधिकारी होते. ते घरात घुसून झोपलेल्या लोकांवर हल्ले करू लागले. सगळीकडे हाहाकार मजला. स्थिती वाईटापेक्षा वाईट होऊ लागली.

अखेर सकाळी चार वाजता कॅबिनेटची एक आपत्कालीन बैठक झाली. सरकारने निर्णय घेतला, की सगळे अपूरे वायदे आणि आश्वासने एका निश्चित कलावधीत पूर्ण केली जातील. दुसरा कुठला उपायच नव्हता. टोळधाडीचे हल्ले चालूच होते. हे मोठं कठीण काम होतं. अपूरे वायदे आणि आश्वासने यांची संख्या कोटी, अब्जावधी होती. तेवढ्याच संख्येने टोळ होते. जेव्हा एखादा अपुरा वायदा किवा आश्वासन पूर्ण व्हायचं, तेव्हा एक टोळ गायब व्हायचा. पण कोटी – अब्जावधी वायदे आणि आश्वासने पूर्ण व्हायला वर्षे लागली. तेव्हा कुठे देशातील टोळधाडीचा कहर समाप्त झाला आणि देशाची स्थिती सामान्य झाली.

या बातमीचा परिणाम सगळ्या दुंनियेत झाला. बाबीसाव्या शतकाचा इतिहास याला साक्षी आहे, की दुसर्‍या देशातील राजनेते आणि अधिकारी यांनी टोळ्धाडीच्या भयाने आपल्या देशात केलेले सगळे अपुरे वायदे आणि आश्वासने पूर्ण केली.

मूळ हिन्दी कथा – “हमला“

मूळ लेखक : श्री सुशांत सुप्रिय

 मो: 8512070086

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares