मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्नाची दुनिया ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ स्वप्नाची दुनिया ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

माझ्या व्यवसायात,मला इतके विविध अनुभव येत असतात, नाना प्रकारची  माणसेही भेटतात.

माझे आयुष्य अगदी समृद्ध केलेय ,या अनुभवांनी. कसे जगावे,संकटातही कसे आनंदी राहावे,

हे या निम्न स्तरातील बायकांकडून मी शिकले. 

 माझ्या कडे आया म्हणून  काम करणारी शकू—

फार आनंदी,उत्साही. सतत नवीन शिकायची हौस, आणि  गप्पा मारण्याची तर प्रचंड हौस.

शकू धडपडीही होती. एकदा,तिच्या वस्तीतली एक बाई,कशी कोण जाणे  दुबईला,घरकामासाठी नेली कोणीतरी–झाले–शकू च्या डोक्यातही तेच—

” बाई, दुबईला जायला काय लागते हो करायला ? मी पण जाते की.लै पैसा भेटतो म्हणे.

चार वर्ष गेले, तर जन्माचे कल्याण होते. शेजारची रेखा गेलीय बघा. माजी बी लै विच्छा हाये.

इथे किती राबा, काय चव न्हया बघा. पुरतच नाही पैसा.” 

रोज रोज शकू हेच बोलायची. आमच्या इतर स्टाफचा, चेष्टेचा विषय झाली होती शकू.

रोज विचारायच्या तिला बाकीच्या आया–

” काय शकू,झाली का तयारी दुबईची ?’

मी रागवायची त्यांना–” नका ग असं बोलू. जाऊ दे ना मिळाली संधी तर. ” 

 एक दिवस नवऱ्याला घेऊन आली. तो उर्मटपणे म्हणाला, ” बाई,आत्तापर्यंत झालेला पगार द्या शकीचा–ब्यांकेत टाकत होतात तो–तिचा पासपोर्ट करतोय मी.”

मी हादरलेच हे ऐकून—” अहो, कोण नेणारे तिला? सगळी नीट चौकशी केलीत का.”

” हा.केलीय. आमचा गाववाला हाये. समदं करतोय तो. वीस हजार द्यायचे की तो दुबईला जाब लावून देणारे.” —-मी कपाळाला हात लावला. ” अहो,असे नसते, नीट करा चौकशी.”

” बाई, तेवढे पैशे द्या. मी बघीन बाकीचे.”

दुसऱ्या दिवशी शकू सगळे पैसे घेऊन गेली. आम्ही सगळे हळहळलो. तो उर्मट माणूस डोक्यात गेला आमच्या. दरम्यान,शकूने केव्हाच काम सोडले. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. खूप वर्षे झाली ,मीही अनेक गोष्टीत गढून गेले होते.

मध्ये एकदा मंडईत गेले होते. एकदम हाक ऐकू आली—” बाई –बाई, अहो डॉक्टरबाई ” 

मी चमकून बघितले. कैरीच्या मोठ्या ढिगाजवळ बसलेली बाई मला हाका मारत होती–

” बाई,ओळखलं नाही न्हवं. “

” मी शकू नाही का.” 

” अरे हो की–शकू,तू इथे काय करते आहेस? दुबईला ना गेली होतीस? “

“कर्म माझं व.कसली दुबई. या मेल्याने सगळे पैसे खाल्ले.”

मी बघितले, शेजारीच,शकुचा नवरा मान खाली घालून बसला होता. सगळी  गुर्मी उतरलेली दिसत होती. गप गरिबा सारखा बसला होता.

शकू म्हणाली, ” तुम्ही सांगत होतात, तेच खरे होतं हो बाई. कोणी पासपोर्ट नाही केला,न काय न्हाय. पण मग एका  बाईबरोबर मला मुंबईचे काम आले.–घरकाम–ती बाई10 हजार पगार देणार होती राहून. तिची जुळी मुले सांभाळायची. सगळे सगळे काम,करायचे. माझा पिट्ट्या पडायचा हो कामाने. पण बाई चांगल्या होत्या. माझे सगळे पैसे त्या बँकेत टाकायच्या.

मी महिन्यातून  एकदा पुण्याला येऊन भेटून जायची. सासूने बघितले हो लेकरांकडे. या मेल्याला  दिले होते घरातून हाकलून तीन वेळा, मग सुतासारखा सरळ आला बघा. दारू सोडवली मी केंद्रात नेऊन. बाई,चार वर्षे लै राबले बघा. मग इकडे परत आले. त्या 

माऊलीने माझे ४ लाख साठवून दिले बघा. इथे आले,तर शेजारीण घर विकतेय समजले.

मी तिला रोख पैसे देऊन घर घेतले. या बाबाला गाळा घेऊन दिला बघा. आता मस्त जातोय पहाटे ४ ला उठून.” 

 शकुचा नवरा म्हणाला, ” बाईंना घरी नेशील,का न्ह्याय–का नुसतीच माजी गाऱ्हाणी गाशील. 

चा पाज त्यांना.” 

माझ्या हाताला  धरून शकू म्हणाली, ” चला चला,गरीबाच घर बघा चला.” 

जवळच होते शकुचे घर. मला इतके आश्चर्य वाटले, चांगला 3 खोल्यांचा फ्लॅटच  होता की तो.

शकूने घर सुंदरच ठेवले होते. म्हणाली आधी 2 खोल्या घेतल्या, मग या दोन पण घेतल्या.” 

शकुचा मुलगा अभ्यास करत होता. म्हणाला,” बाई,पोलीसात जाणार मी.” दुसरा मुलगा कॉलेज करत होता. शकू  म्हणाली,” लै मस्त चाललंय आमचं. आता बघितला ना,मालक कसा नीट वागतोय ते. आणला वठणीवर बघा.” 

–आम्ही दोघीही हसायला लागलो. तिच्या गाळ्याजवळच माझी गाडी मी लावली होती.

शकूने, मी नकोनको म्हणत असताना,पिशवी भरून कैऱ्या गाडीत ठेवल्या–

” बाई,येत जा.  गरीबांनी, स्वप्ने बघूच नयेत का हो? काय चुकले,मी दुबईची स्वप्ने बघितली त्यात– मला हे  दरिद्री जिणे नको होते हो. आणि  दुबई नाही, पण मुंबई तर भेटली.

मिळाले भरपूर पैसे. राबलेही खूप हो बाई चोवीस तास.”  शकूच्या डोळ्यात पाणी आले.

मी म्हटले,” शकू,आहेस खरी ग बाई जिद्दीची.किती सुंदर मांडला आहेस संसार.”

मी purse मध्ये होत्या , त्या सगळ्या नोटा तिच्या हाती ठेवल्या.तिचा नवरा ही गाडी जवळ आला—-

” बाई,मी खूप चुकलो,पण शकूने  मला साथ दिली. आज हे दिवस तिच्या मुळे दिसत आहेत. ” .

दोघांनी मला हसून निरोप दिला.

—–समाजात अशा अनेक शकू आहेत, की त्यांच्या जिद्दीला आपण सलाम करायला हवा 

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दादा नावाचं रसायन !!!! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ दादा नावाचं रसायन !!!! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

लहानपणी घरात असताना 

माझ्यावर दादागिरी करणारा 

माझ्या प्रत्येक लहानसहान गोष्टीत 

माझ्यापेक्षा लहान होऊन 

आपला हक्क बजावणारा 

दादा…

 

घराबाहेर पडलो की आपोआपच मोठा होतो

माझा हात घट्ट धरून गर्दीमधून सुखरूप नेतो

कधी मी हरवले तर ? म्हणून 

माझ्या फ्रॉकच्या खिशात पत्ता लिहून ठेवतो

तर कधी रस्ता क्रॉस करताना 

माझ्यावर ओरडून मला पळत पळत पैलतीरी नेतो 

हा दादा मला वेगळाच वाटतो

 

आम्ही दोघंही एकत्र वाढू लागतो

कालांतराने चपलांचे साईज बदलतात 

पोशाखाच्या पद्धती बदलतात

दादा जगाला ओळखू लागतो

टक्केटोणपे खाऊ लागतो

तेव्हा जरासा अबोल अंतर्मुख होणारा दादा 

आणखीनच वेगळा वाटतो.

 

काही चुकलंमाकलं तर

पूर्वीसारखा ओरडत नाही

भांडाभांडी करत नाही

उलट जगातल्या चार वेगळ्याच गोष्टी 

हळुवारपणे समजावून सांगतो…

आई-बाबांपेक्षाही,  माझं मोठं होणं

हे दादाच अधिक समजावून घेतो.

 

घरी यायला उशीर झाला की

बाबांच्याही आधी त्याची पावलं चालू लागतात

प्रसंगी हाताची मूठ वळवून 

समोरच्याला कसं शहाणं करता येतं

याचे धडे त्यानंच गिरवून घेतलेले असतात…

माझ्याआधीच दादाला समजलेली असते

बाहेरच्या पुरुषाची नजर

आणि तीच कशी ओळखायची 

हे दादाच समजावून देतो

 

माझं सुरक्षित, स्वाभाविक मोठं होणं

घडू शकतं ते दादाच्या भरभक्कम पाठिंब्यामुळेच

माझं शिकणं, स्वावलंबी होणं…

या सगळ्यात आई-बाबांइतकाच 

मोठा सहभाग असतो दादाचा

 

लग्नानंतर तर बदलतंच जातं 

दादा आणि बहिणीचं नातं

तो समजावून सांगतो बहिणीला 

वैवाहिक जीवनातल्या कालौघात 

बदलत जाणाऱ्या चार गोष्टी 

आणि तशाच समजून घेतो बहिणीकडूनही

चार कानगोष्टी

 

तेव्हाचा दादा तर फारच वेगळा दिसतो. 

आता सहजपणे जमतं त्याला 

घरी असो वा बाहेर 

माझ्या प्रत्येक कृतीकडे 

एकाच वेळी समवयस्क म्हणून पाहणं 

आणि मोठेपणही पेलणं.

 

कुठून आणि कसा शिकतो हे दादा

मला कधीच कळत नाही 

दादा नावाचं रसायन 

काही केल्या उलगडत नाही.

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गाणं नेमकं कसं सुचतं?….गुरू ठाकूर ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ मनमंजुषेतून ☆ गाणं नेमकं कसं सुचतं?….गुरू ठाकूर ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

2019 ची कोजागरी पौर्णिमा मला आजही आठवते.तारीख होती 13 October 2019 कोजागिरी निमित्त मी आणि राहुल रानडे “मैफिल शब्द सुरांची ” हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात  करत होतो. गाणं सुचण्याची प्रक्रिया आणि त्याला चाल लावण्याची प्रक्रिया यावर चर्चा झाल्यानंतर राहुल रसिकप्रेक्षकांना  म्हणाला , ” आपण आता गाणं नेमकं कसं सुचतं याचं प्रात्यक्षिकच पाहू, म्हणजे तुम्ही एक विषय आणि शब्द गुरूला द्यायचे आणि तो इथल्या इथे तुम्हाला गाणं लिहून दाखवेल” . रसिक अर्थातच उत्साही. त्यांनी विषय निवडला रोमॅण्टिक साँग..  दिलेल्या शब्दात  मुक्त छंदात कविता लिहिणे सोपे पण गाणे ते देखीलछंद आणि वृत्त सांभाळून  कारण पुढे राहुल त्याला चाल ही लावतो त्या मुळे  धुवपद म्हणजे मुखडा आणि शिवाय एक कडवे असं गाणं बसवणं म्हणजे सत्वपरीक्षा . तरीदेखील रोमॅंटिक सॉंग आहे म्हटल्यावर होईल असा एक विचार डोक्यात आला  तेवढ्यात प्रेक्षकातून कोणीतरी म्हणालं की आज कोजागिरी आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला जे शब्द देऊ त्यात कोजागिरीच्या रात्रीचे रोमांटिक सॉंग लिहा. इथे माझ्या पोटात गोळा आला. कारण या सगळ्या करता वेळ जास्तीत जास्त दहा मिनिटांची असते.

यावर मी काही बोलण्या आधीच राहुल म्हणाला , “हो हरकत नाही सांगा शब्द.” आणि मग रसिकांकडून शब्द येऊ लागले. आणि माझ्या लक्षात आले की रसिक हे खरेच मराठी रसिक आहेत. त्यांनी दिलेले शब्द आशय विषयाला धरुन आणि गेय होते. ते असे होते..

मिठी ,चांदणे, स्पर्श, हुरहूर, कोजागिरी,सूर,

 डोळे, मधुरात्र, सागराची गाज, ओढ,रात्र,

मी शब्द कागदावर उतरवता उतरवता डोक्यात त्यांची जुळवाजुळव करत होतो.. इतक्यात कोणीतरी म्हणाला फितूर.. आणि मला नाहीच सापडणार असं वाटता वाटता सेलोटेपचं टोक सापडावं तसं गाणं सापडलं..  अतिशय अवघड वाटणारा पेपर त्यादिवशी पाच मिनिटातच सोडवून झाला..हेच ते गाणं——  

                              फितुर डोळे गुंतता ,

                                                मधुरात्र झाली बावरी 

                              ये मिठीतच होऊ दे 

                                                साजरी कोजागिरी —-

                              कोवळी हुरहूर आहे 

                                                 स्पर्शवेडा सूर आहे 

                              या रुपेरीशा घडीला 

                                                 प्रीतीचे काहूर आहे —-

                              वाजू दे प्राणात 

                                                  आता मिलनाची पावरी 

                              ये मिठीतच होऊ दे 

                                                   साजरी कोजागिरी —–

— गुरू ठाकूर

संग्राहक :- सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ☆ अल्लड अवखळ मन ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

 ?  मनमंजुषेतून  ?

☆ अल्लड अवखळ मन ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते

नात्याच्या गंधात धुंद मोहरते

मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे

का होते बेभान कधी गहिवरते—-

मन…कधीच न उलगडणारे कोडे… शब्दात न मांडता येणारे मन वेडे.. आकाशासारखे अथांग… सागरासारखे गहिरे.. क्षणात फुलणारे… क्षणात कोमेजणारे .. सावरणारे …अडखळणारे,

तर कधी आशेच्या हिंदोळ्यावर झुलणारे हे मन….

किती  सांगावी महती या मनाची.. मन चंगा तो कटोती  मे गंगा असे म्हणतात म्हणूनच उत्तम शरीराबरोबरच मनही निरोगी असणे तितकेच गरजेचे आहे. रिकामे मन हे सैतानाचे घर असते. यासाठी मनाला नेहमी चांगल्या गोष्टीत गुंतवायला हवे.

आपण इतरांची मने जपण्यासाठी खूप काही करतो. स्वतःच्या आशा अपेक्षांना मुरड घालतो पण या सर्वांची मने जिंकताना आपल्यालाही एक मन आहे हे साफ विसरून जातो. कधीतरी आपलेच मन आपल्याला विचारेल की, माझ्यासाठी तू काय केलेस? आहे उत्तर?….

योग्य आहार ,विहार, व्यायाम याने जसे शरीर चांगले राहते तसेच छंदाची जपणूक, चांगले मित्र, छान पुस्तक वाचन, गायन, वादन, बागकाम … मनापासून आवडणारे कोणतेही काम हे भरभरून आणि आनंदाने करायला हवे. थकलेल्या शरीराला जसे स्फूर्ती येण्यासाठी टॉनिक देतात तसेच आपले छंद आपल्या मनासाठी टॉनिक म्हणून काम करतात…

स्वतःचे ही मन जपा. त्याला काय हवे-नको ते बघा. त्याचेही कोड कौतुक करा.सकारात्मक विचारांनी त्याला फुलवा.आनंदी क्षणात भुलवा ..मग बघा जीवनाचे इंद्रधनुष्य कसे सप्तरंगानी बहरून येते…

    नजर को बदलो

नजारे बदल जायेंगे

    मन को बदलो

धूप मे भी छांवको पाओगे—–

 

© सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळी  कालची आणि आजची.. भाग –2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ?  मनमंजुषेतून  ?

☆ दिवाळी  कालची आणि आजची.. भाग –2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

दिवाळी गोवत्स द्वादशी पासूनही साजरी करतात. गुरुद्वादशी असंही म्हटलं जातं. खेड्यात  गोधनाला खूप महत्त्व असल्याने पूर्वीपासून आताही गाय-वासराची किंवा त्याच्या फोटोची पूजा करतात. शिष्य गुरूंचे पूजन करायचे. मात्र आज ही प्रथा फारशी दिसत नाही.

धनत्रयोदशी दिवशी पूर्वी आणि आताही व्यापारी वह्या आणि तिजोर्यांची पूजा करतात. धन्वंतरी जयंती असल्याने वैद्य डॉक्टर त्याची पूजा करतात. पूर्वी आणि आताही. पूर्वीची आणखी एक प्रथा कणकेच्या तेलाचा दिवा घराबाहेर संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून लावला जायचा. आणि सर्वजण मिळून सूर्याला प्रार्थना करायचे मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामसह त्रयोदश्यां  दीपदानात सूर्यज प्रियतां मम . आज क्वचित ठिकाणी हे दिसते. पूर्व परंपरेनुसार   क्वचित  ठिकाणी ब्रह्मास्त्राच्या  प्रतिमेची , निर्जळी उपास  करून, पुरणाचा नैवेद्य दाखवून पूजा करतात. ही प्रथा आज फारशी माहित नाही पाण्याचे हांडे  घासूनपुसून तेही पूजले जायचे.आज गिझर आणि गॅस असल्याने हांडे कोठे दिसत नाहीत. नरक चतुर्दशी दिवशी चे अभ्यंगस्नान आजही आहे. पण पूर्वी इतका मसाज करणे होत नाही. पूर्वी तीळ, खसखस, वाटून ते उटणे अंगाला लावत. आज उटण्याची तयार पावडर मिळते. नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट फोडले जायचे. आज कारिट कोणाला माहित असेल असे वाटत नाही. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी विष्णू आणि कुबेर आणि घरातील दागदागिने यांची पूजा केली जायची.तसेच अलक्ष्मीचा नाश व्हावा म्हणून घरातला कचरा काढणारी केरसुणीची पूजा करून दमडी आणि सुपे वाजवून बाहेर टाकला जायचा. आजही काही ठिकाणी हे चित्र दिसते. काही घरात, घरातली स्त्री समाधानी, आनंदी रहावी , म्हणून गृहलक्ष्मी  म्हणून तिची पूजा केली जाते. पूर्वीचे फटाके आणि आता चे फटाके यातही खूप फरक पडला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री जागवत असत. पगडी पट मांडला जायचा .खेळ रात्री उशिरापर्यंत चालायचा. करमणुकीचे दुसरे साधन नव्हते. आता नवीन पिढीला पगडी पट हा खेळ आणि ते नावही माहीत नसावे. पाडव्यादिवशी खेड्यात लव्हाळीची दिवटी करून त्याने गायी वासरांना ओवाळून त्यांचे आशीर्वाद घेतले जायचे . यादिवशी शेणाचा गोवर्धन पर्वत करून, त्यावर दुर्वा फुले  खोचून , कृष्ण गाई वासरे यांची चित्रे त्यावर मांडून पूजा आणि मिरवणूक काढण्याची  प्रथा होती ही प्रथा आज फारशी दिसत नाही. पत्नी पतीला ओवाळण्याची पद्धत पुर्वापार आहे.फक्त देणे-घेणे वाढले आहे. भाऊबीज, या दिवशी भावाने घरी न जेवता बहिणीकडे जेवावे, आणि तिने भावा प्रति प्रार्थना करून कुशल चिंतावे.”हातजोडी ते उगवत्या नारायणा, जतन कर देवा ,माझा बंधूजी  राणा”. असे म्हणून ओवाळावे. ही प्रथा आज आहे . फक्त भेटवस्तू देण्यात फरक पडलाय.

दिवाळी हा सण नात्या नात्यांशी इतकंच काय पर्यावरणातल्या प्रत्येक गोष्टीशी भाव बंधनांनी आणि आत्मीयतेने जवळीक आणणारा असा  हा सण !कालच्या दिवाळीतला आनंद, चैतन्य ,उत्साह, यात बदल होतच राहणार. काल आणि आज प्रमाणे उद्याच्या दिवाळीतही फरक पडणारच. लाईटच्या माळा, भडक सजावटी, मिठाया ही सगळी आनंदाची बाह्यरूप. खरी दिवाळी मनांकडून  मनाकडे. एकमेकांबद्दल वाटणारा प्रेम जिव्हाळा आपलेपणा हीच खरी दिवाळी मनामनांची.

   “सर्वांना दिवाळी भरभराटीची, समृद्धीची, शांतीची आणि आरोग्यदायी जावो”

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लहानपणीची दिवाळी ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ लहानपणीची दिवाळी ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

आनंदाची दिवाळी

घरी बोलवा वनमाळी

घालिते मी रांगोळी

गोविंद गोविंद—–

अशी गीते गात शेणाने सारवलेल्या स्वच्छ अंगणात रांगोळी काढत आमची दिवाळी सुरू व्हायची. बांबूच्या कामट्या आणि रंगीत कागद वापरून केलेला आकाश कंदील घरावर उंच   टांगलेला असायचा.

आईच्या हाताखाली फराळ करताना जाम मजा यायची. घराची साफसफाई , देवघर, तुळशीवृंदावन धुवून रंगवून ठेवलेले असायचे.

फराळाची सुरुवात शकुनाच्या करंजीनेच करायची असा जणू अलिखित नियम होता. त्यातही सुरुवातीला मोदकच करायचा गणपतीला नैवेद्य दाखवायचा हेही पूर्वापार चालत आलेले. करंजीचे पीठ म्हणजे रवा मैदा  आई निरशा दुधात भिजवायची त्यामुळे करंजी खुसखुशीत व्हायची व सोवळ्यात राहायची. नरक चतुर्दशीला पहाटे देवाला नैवेद्य दाखवून मगच आम्हाला खायला मिळायची. करंज्या झाल्या की लगेच चिरोटे, शंकरपाळी, रव्याचे व बेसनाचे लाडू,

साध्या भाजणीची खमंग कडबोळी व विशिष्ट भाजणीची चकली तयार व्हायची. त्याच तळणीच्या तेलात चिवडा परतायचा की झाला  फराळ संपन्न. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आई दहीपोहे करायची व त्या दिवशी हवा तितका फराळ खा म्हणायची. नंतर मात्र ती देईल तितकेच आम्ही आनंदाने खात असू. घरोघरी फराळाची ताटे फिरत असत.

दिवाळी हा सणांचा राजा——–

मांगल्याचा, प्रकाशाचा, खमंग फराळाचा, गोड-धोड पक्वान्नांचा, जल्लोषी फटाक्यांचा, बाळगोपाळांनी कल्पकतेने साकारलेल्या किल्ल्यांचा, रंगीबेरंगी आकाशकंदीलांचा, भेट कार्ड देऊन साधणाऱ्या जिव्हाळ्याचा, झेंडूची फुले, आंब्याची पाने यांनी बनवलेले तोरण दाराशी बांधून सर्वांचे स्वागत करण्याचा, सुंदर सुंदर रांगोळ्यांचा,  पणत्यांच्या दीपोत्सवाचा, कोर्‍या करकरीत कपड्यांचा, फुलांनी सुगंधित झालेल्या देवघराचा, जावईबापूंच्या दिवाळसणाचा, पाडवा , भाऊबीज साजरे करून त्यातील नात्यांचा गोडवा वाढवणारा , सर्वांना तृप्त करणारा हा सण.

उगारला चाळीमध्ये मुले किल्ला, आकाश कंदील व तोरणे करत असत. आम्ही मुली फराळ व रांगोळ्या यात आमचे कौशल्य दाखवत असू. सगळेच मध्यमवर्गीय पण मिळेल त्यात समाधान मानून आपले काम जास्तीत जास्त चांगले करायची धडपड सगळेजण करायचे.सांगलीचे एक काका दरवर्षी फटाके विकायला यायचे. त्यांच्याकडूनच वडील मंडळी.  खरेदी करायचे. केवढा आनंद व्हायचा. मिळेल तो वाटा पुरवून पुरवून वापरायचा. बायका भाजणीचे पीठ, अनारसा पीठ, करंज्यांचे सारण, घरीच मन लावून करायच्या.” इन्स्टंट चा जमाना” अजून आलेलाच नव्हता.

वसुबारसेला दिवाळीची सुरुवात व्हायची. मूल झालेल्या प्रत्येक बाईने त्या दिवशी उपवास करायचा असे आई सांगायची. त्यामुळे आपली. मुलेबाळे आरोग्यसंपन्न व सुखासमाधानात राहतात असा तिचा दृढ विश्वास होता. संध्याकाळी गायवासराची पूजा प्रार्थना करताना वेगळा आत्मविश्वास यायचा.

धनत्रयोदशीला सगळ्यांच्या दिव्यांच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला. त्याला मनोभावे नमस्कार केला की अपमृत्यु टळतो हे आजही पटत आहे. त्यादिवशी  बायकांची दिवाळी असायची. सुवासिक तेल , शिकेकाई भरपूर गरम पाणी घेऊन साग्रसंगीत नहाणे व्हायचे. पित्त होऊ नये म्हणून गोड शिरा खायचा. दुपारी पाट , रांगोळी, उदबत्ती, एखादे पक्वान्न असे उदरभरण झाले की गोविंदविडा खायचा. अशी चैन असायची. एका दिवाळीला आजोळी चिकुर्डे येथे गेलो होतो. आजोबा नामांकित वैद्य  असल्यामुळे त्यांनी मनोभावे केलेली  धन्वंतरीची पूजा आजही आठवते.

नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान केले नाही तर नरकात जावे लागते असा  धाक असल्यामुळे सगळे पहाटे उठून अभ्यंग स्नान करीत असत. आई सर्वांना औक्षण करायची. मग नवे कपडे, वडील मंडळींना नमस्कार, त्यांनी तोंड भरून दिलेले आशीर्वाद, पोटभर फराळ, फटाके उडवणे, दुपारी सुग्रास भोजन, एखादी डुलकी संध्याकाळी थाटामाटात लक्ष्मी पूजन , हळदी कुंकू अशी धमाल असायची.

पाडव्याला पत्नीने पतीला सुवासिक तेल लावून आंघोळ घालावी व आंघोळ घालतानाच ओवाळावे अशी पद्धत होती. महागडी बक्षिसे देण्याची पद्धत नव्हती. बायका देखील हट्ट करत नव्हत्या. भाऊबीजेला बंदा रुपाया मिळाला की आम्ही बहिणी हुरळून जायचो. उगारला कानडी लोक खूप. भाऊबीजेच्या दुसरे दिवशी त्यांच्याकडे

“आक्कनतदगी ” म्हणजे “आक्काची तीज” अर्थात आक्काची तृतीया असे. त्यादिवशी भाऊ बहिणीला ओवाळून भेट देत असे .कधीकधी आम्ही दिवाळीला आमच्या मूळ गावी वाळव्याला जात असू. तिथे मोठ्ठ घर होतं. पडवीत गाई-म्हशी पाडसं होती. खूप मोठ्ठा ओटाहोता . तिथे गाईच्या ताज्या शेणा ने सारवून शेणाचे गोकुळ आम्ही बहिणी उत्साहाने तयार करत असू. गोप गोपी कृष्ण राधा तुळशी वृंदावन उखळ मुसळ जाते गाय वासरू सारे निगुतीने तयार करत असू. बलीप्रतिपदेला भलामोठा बळीराजा बनवताना मला फारच मजा यायची. पांडव पंचमीला पाच पांडव, द्रौपदी, कृष्ण, बलराम , राधा , सत्यभामा, रुक्मिणी , यशोदा, गोपी असे आठवून आठवून खूप पात्र॔ उभी करतांना दुपार होऊन जायची. आईचा स्वयंपाक तयार असायचा. मग आम्ही प्रत्येक पात्रासमोर शेणाची ताटली ठेवून सर्व जेवण वाढत असू.

त्यावेळी दिवाळीच्या पहिल्या दिवशी परटिणीचा मान असायचा. घरोघरी जाऊन ती पुरुषांना ओवाळायची. प्रत्येक जण यथाशक्ती ओवाळणी द्यायचे.

आता जमाना बदलला. जुने रीतिरिवाज मागे पडले. जागेची अडचण, वेळेची कमतरता, आधुनिकतेचे फॅड यामुळे दिवाळी साजरी करण्याच्या कल्पना बदलत चालल्या.सुट्टी त बाहेर भटकणे बाहेरचे खाणे सहली काढणे यात या पिढीला रस आहे. आनंदाच्या कल्पना बदलत चालल्या आहेत.” कालाय तस्मै नम:”

 

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळी  कालची आणि आजची.. भाग –1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ?  मनमंजुषेतून  ?

☆ दिवाळी  कालची आणि आजची.. भाग –1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

भारतीय संस्कृती ही  निसर्गाधिष्ठित  तर आहेच,पण त्याचप्रमाणे विज्ञाननिष्ठ अशी महान संस्कृती आहे.सण , उत्सव  हे ही निसर्गाला अनुसरूनच आहेत.

सगळ्या सणांचा राजा म्हणजे दिवाळी.दिव्यांच्या ओळी .तेल आणि वात यांची ज्योती तोच दीप.पूर्वी अंगणात  दिव्यांच्या ओळी प्रज्वलित करत असत.आज जागे अभावी एखादी पणती आणि रंगबिरंगी लाईटच्या माळा लावलेल्या जातात.पूर्वी  दारात अंगणात सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून सडा टाकून  रंग भरून मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जायच्या.आज मोठ्या शहरात लहान जागेत कुंदनच्या तयार  रांगोळ्या ठेवून  हौस भागवली जाते.दिवाळी हा सण खरा कृषीवलांचा सर्वोच्च आनंदाचा सण. घरात आलेली धान्यलक्ष्मी हीच धनलक्ष्मी. गोठ्यात असंणार  जित्राब गाई ,म्हशी, बैल ,वासरे यांची दिवाळी.सगळ्यांच्या कष्टातून आलेलं धन  त्याची पूजा ही दिवाळी.70 वर्षापूर्वीची माझ्या आठवणीतली आणि आजची. दिवाळी यामध्ये  खूप फरक पडलेला मी पहातेय. एकशे वीस वर्षापूर्वी कवी केशवसुतांनी दिवाळी छान वर्णन केली आहे भिंती रंगविल्या नव्या फिरूनिया केली नवी आंगणे…….. पूर्वी अंगणात मातीचे किल्ले छोटे गाव शेत केल जायचं. पण आज अंगण खूपच कमी ठिकाणी असली तरी आहे त्या जागेत सजावट करून कृत्रिम किल्ले आणून ठेवले जातात खरा लोकसंस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर खेड्यात जायला हवं. माझ्या लहानपणीची दिवाळी मला आठवते. शेणाने अंगण सारवून शेणाच्याच  गवळणी, विहीर, जात ,दळणारी बाई असे अनेक प्रसंग, म्हणजे गावगाडा करायचा. शेतातील झेंडूचे फुले त्यावर खोचायची. रोज पहिलं काढायचं आणि नवीन करायचं पांडव पंचमी दिवशी पांडव, द्रौपदी, उठून बसलेला बळीराणा , त्यांच्यासमोर ताट,वाट्या  भांडी सगळ  शेतातच. त्या ताटांमधे थोडं,थोडं फराळाच घालायचं वरती जोंधळ्याच्या  धाटांचा मांडव करायचा. मात्र शेणाची कधी घाण वाटली नाही. आज हे चित्र क्वचितच पहायला मिळेल. पूर्वी दिवाळीच्या अगोदर कामट्या आणून, तासून ,चिरमुरे कागद लावून आकाश दिवे  घरी करत असत. आता बाजारात नवनवीन रंग बिरंगी आकाशदिवे मिळतात. वेळ आणि कष्टही वाचले. पूर्वी दिवाळीची अपूर्वाई म्हणजे नवीन कपडे. सर्वसामान्यपणे एक कपडा दांडीवर आणि एक  अंगावर  असे असायचे. त्यामुळे वर्षातून एकदा दिवाळीला नवीन कपडे घेणे असायचेच. आता कपडा आवडला की घेतला, असे नेहमीच कपडे घेणे चालू असते. त्यामुळे पूर्वीचा दिवाळीच्या कपडे खरेदीचा आनंद हा वेगळाच होता. आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे फराळाचे पदार्थ. पूर्वी फराळाचे अनेक प्रकारचे पदार्थ करत असत . वर्षातून एकदाच सगळं  व्हायचं. जवळच्यांना फराळाचे डबे द्यायचे असायचे. बारा बलुतेदारांना फराळ द्यावा लागायचा. आज शहरात आणि त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात ऑर्डरचे आणि मर्यादित पदार्थ असल्याने ते शक्य होत नाही. आता सर्व पदार्थ कायम मिळत असल्याने त्याचे अप्रूप वाटत नाही. पूर्वी दिवाळीची चाहूल लागली की सासरी गेलेल्या मुली माहेरासाठी आसुसलेल्या असायच्या. मायबापही मुली नातवंडे येणार, म्हणून मनाचे मांडे रचत असत. आता मुलींना माहेरी जाण्यापेक्षा कुटुंब आणि ग्रुपने ट्रीपला जाण्यात, मौजमजा करण्यात जास्त ओढ वाटते. पूर्वी दिवाळीला पाहुणे आले की आनंद व्हायचा तो एक नात्यांच्या  गुंफणीचा  उत्सव असायचा. विभक्त कुटुंबात पाहुणे येणे हे प्रमाण खूप कमी झालेलं आहे.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संकेत आनंदाचा…. ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  मनमंजुषेतून ?

☆ संकेत आनंदाचा…. ☆ सौ राधिका भांडारकर 

तेव्हां आम्ही धोबी गल्लीत रहात होतो.आमचं एक माडीचं घर होतं.तसं मोठं होतं पण खालच्या मजल्यावर दोन खणी घरात भाडोत्री होते. गद्रे आणि मोहिले. तशी गल्लीत नऊ दहाच घरं होती. काही बैठी काही एक मजली. एकमेकांना चिकटून. गुण्या गोविंदाने रहात होती.

तसे किरकोळ वाद ,भांडणं ,जळुपणा होता. पण किरकोळच. बाकी गल्लीतली सलाग्रे, मथुरे, मुल्हेरकर,दिघे,आब्बास, वायचळ ही मंडळी म्हणजे एक संपूर्ण कुटुंब होतं.सर्वधर्मीय,सर्वसमावेशक. आम्ही घराघरातील सगळीच मुले एकत्र वाढलो ,खेळलो, बागडलो.एकमेकांच्या घरातलं भुकेच्या वेळी मनमुराद खाल्लं. कुठलाही सण असो,एकत्रच साजरा केला. ईद,नाताळ, दिवाळी सारेच. ईदची खीरकुर्मा, नाताळचा केक,आणि दिवाळीचे करंजी लाडू  सगळ्यांचा आनंद लुटला….

आजही त्या सणांच्या आठवणी मनाच्या कप्प्यात तितक्याच टवटवीत आहेत..

दिवाळी तर गल्लीतला सर्वात मोट्ठा सण !! कधी परिक्षा संपतात, आणि दिवाळीची मज्जा लुटतो अस्सं होऊन जायचं!!

जैन मंदीरात जाऊन संगमरवरी दगडाचे तुकडे गोळा करायचे.लपत छपत घरी आणायचे ,कुटायचे ,गाळायचे आणि वस्त्रगाळ पांढरी शुभ्र रांगोळी बनवायची.तांदळाची कांजी बनवायची- कंदील करायला. दुकानात जाऊन काठ्या, रंगीत जीलेटीन पेपर्स, सोनेरी, चंदेरी कागद आणायचे.आणि सगळ्यांनी मिळून घरोघरीचे कंदील बनवायचे. दिलीप ,शरद,हे मुख्य कलाकार.आम्ही मदतनीस. भांडणेही व्हायची पण गंमत कमी नाही झाली.

पेटत्या उदबत्तीच्या टोकाने, ठिपक्यांच्या रांगोळीसाठी कागदावर आखून भोके पाडायची.

फराळ तर मिळूनच व्हायचा.आज काय मुल्हेरकरांच्या चकल्या, नाहीतर मथुर्‍यांकडे करंज्या…कुणाचा चिवडा कुणाची शेव..सामुदायिक मान मोडून केलेला फराळ..

अवीट गोडीचा अन् चवीचा..

मृदुला रांगोळ्या काय मस्त काढायची…घरोघरी तिला डिमांड….कुठे बदकाची, कुठे मोराची….गल्लीत रांगोळ्यांचं प्रदर्शनच व्हायचे….अभ्यंग स्नानाने सारी गल्ली सुस्नात व्हायची…धनाची पूजा..राक्षस म्हणून पायाखाली चिरडलेलं ते सांकेतिक चिराटं….ईड जावो, पीडजावो..सारे सुखी राहो..ही काळोखातच  काठी आपटून केलेली प्रार्थना घरोघरी घुमायची..

रात्री तर सारी गल्ली पण त्यांच्या मंद प्रकाशात उजळून जायची….फटाक्यांचीही आतषबाजी असायचीच….

अशी खूप सुंदर दिवाळी..नव्या वस्त्रांची ,नव्या रंगांची, निर्मळ प्रकाशाची…ना कसाला देखावा,ना चढाओढ…निव्वळ आनंद..सणाचा सांकेतिक सामुदायिक उत्सव…

काळ बदलतोच. काळाबरोबर कल्पना बदलणारच. जे काल होतं ते आज कसं असणार…जीवनाची गतीच वाढली..पराकोटीच्या तांत्रिक विकासाने जग जवळ आले.  पण आत्मे विखुरले..,रेडीमेडचा जमाना आला.आयता फराळ,आयत्या रांगोळ्या..आयते कंदील..पारंपारिक सण आजही धूमधडाक्यात होतातच….मला ” ,पण..”घालून काही भाष्य नाही करायचय्..सगळ्या नव्याचं स्वागतच आहे…

नवं जपताना जुनं चांगलं राखावंं…परंपरेतलं मूळ आणि उद्देश सांभाळावे. अतिरेक टाळावा. आनंद जपावा..पर्यावरण जपावेच..सृष्टीचेही आणि नात्यांचेही…

शुभ दीपावली…!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ त्या गोड आठवणी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  मनमंजुषेतून ?

☆ त्या गोड आठवणी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आठवणीतली दिवाळी’ म्हटल्याबरोबर मनात असंख्य आठवणींची सुदर्शन चक्रे, भुई चक्रे, फिरू लागली. फुलबाज्या तडतडू लागल्या आणि असंख्य सुखद क्षणांची सोनफुले उधळत झाडे उंच उडू लागली. किती सुंदर होते ते दिवस.

माझे माहेर म्हणजे छोटेसे तालुक्याचे गाव. गावापासून काही अंतरावर मुख्य रस्त्यालगत पण शेतात अशी आमची वस्ती होती. आम्ही, काका, शेतात काम करणारे गडी  यांची घरे होती.

दिवाळीपूर्वी घराची रंगरंगोटी होई. दारापुढचे अंगण सारवून स्वच्छ केले जाई.आई अतिशय सुंदर ठिपक्यांच्या रांगोळ्या घालायची.मोठे अंगण असल्याने आम्ही प्रत्येकीने रांगोळी काढायची असा दंडक होता. सर्वांच्या वरती ठळक रेषेत वडील ॐ, श्री, स्वस्तिक अशी शुभचिन्हे रेखाटायचे. मग आम्ही रंग भरायचो.अंगण  एकदम खुलून यायचे.

गावामध्ये बरीच आधी वीज आली होती. पण आमच्या वस्तीवर १९७०च्या सुमारास वीज आली. त्यामुळे रोज कंदील लावायचो. दिवाळीत मात्र भरपूर पणत्यांची आरास असायची. पुढचे, मागचे अंगण, पायऱ्या, तुळशी वृंदावन उजळून उठायचे. घर एकदम प्रकाशमान व्हायचे.

दिवाळी आणि किल्ला यांचे समीकरणच असते. आम्ही भावंडे मोठा किल्ला बनवायचो. त्यावर मोहरी पेरून छान हिरवळ उगवायची. शिवाजी महाराज, मावळे, प्राणी अशी खूप चित्रे होती. वाई हे आजोबांचे गाव. तिथे ही चित्रे खूप छान मिळायची. संध्याकाळी रांगोळी घालून, चित्रे मांडून किल्ला सजवणे एक मोठे आनंददायी काम असायचे. एकदा गडबडीत महाराजांचे चित्र तुटले गेले. तर भावाने सिंहासनावर ‘महाराज लढाईवर गेले आहेत’ असा बोर्ड लावला. सगळ्यांनी त्याच्या समय सूचकता कौतुक केले. एकूणच ती मजा काही औरच होती.

दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे फराळाचे जिन्नस. आतासारखे हे पदार्थ बारा महिने बनवत नव्हते. विकतही  मिळत नव्हते. सर्व पदार्थ आई घरीच बनवायची. तेही जात्यावर पीठ दळून. दिवाळीपूर्वी बरेच दिवस आधी तिची तयारी सुरू व्हायची. माझी आई साक्षात अन्नपूर्णा होती. तिच्या हातच्या चकल्या ,चिवडा, अनारसे, शंकरपाळी, चिरोटे अतिशय चविष्ट, खमंग, खुसखुशीत असायचे. नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटते, जिभेवर चव रेंगाळू लागते. त्यावेळी एकमेकांकडे फराळाची ताटे दिली जात. आलेल्या ताटात परत आपले फराळाचे दिले जाई. आई-वडिलांचा लोकसंग्रह  खूप मोठा होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फराळाचे केले जाई.आईचे फराळाचे पदार्थ खाण्यासाठी काही जण आवर्जून घरी येत असत. जेवतानाची श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, गोड पोळ्या, खिरी ही पक्वान्ने आई घरीच बनवायची.श्रीखंडाचा चक्काही घरीच बनवला जाई.या खास पंगतीची गोडी न्यारीच असायची.

त्यावेळी शेतात थंडी पण बरीच असायची. त्यामुळे कोणी आधी आंघोळीला जायचे यावर भावंडांची चर्चा सुरू व्हायच्या. चुलीवर गरम पाण्याचा हंडा तयार, तेल उटणे लावून अभ्यंगस्नानाचा थाट असायचा.

प्रत्येक दिवशी साग्रसंगीत पूजा व्हायची. दिवाळी स्पेशल नव्या कपड्यांचे खास आकर्षण असायचे.हे कपडे घालून देवाच्या दर्शनाला जायचे. मोठ्यांचे आशीर्वाद घेणे, सर्वांना शुभेच्छा देणे-घेणे यात दिवाळी आनंदात साजरी व्हायची. आज हे सर्व आठवताना मनामध्ये त्यांच्या स्मृतींनी फेर धरला आहे.आई- वडिलांच्या आठवणींनी मन भावूक झाले आहे. पुन्हा त्या दिवाळीची अनुभूती येते आहे. मग उगाच वाटून गेलं, खरंच ते दिवस पुन्हा कधी येतील का? 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणीतील पुणे: दिवाळी उत्सव ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

? मनमंजुषेतून ?

 ☆ आठवणीतील पुणे: दिवाळी उत्सव ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

लहानपणी सदाशिव पेठेत असताना धमाल असायची… जागा भाड्याची असली तरी त्या छोट्याश्या जागेत खरे जीवन सामावले होते असे वाटते.  आता कितीही मोठी जागा , प्रत्येकाला स्वतंत्र रुम असली तरी जागा अपुरीच वाटते.  छोट्या जागेत माणसे जवळ होती. आता मोठ्या रूम्समुळे माणसांमध्ये दुरावा व भिंती निर्माण झाल्या आहेत.  

त्याकाळी परिस्थिती बेताची असली तरी सण आला की उत्साहाचे वातावरण असायचे.  त्यात दिवाळी सण म्हणजे सर्व सणांचा राजा. आमची सहामाही परीक्षा संपतच आलेली असायची. घरात एव्हाना सणाची तयारी सुरू झालेली असायची.  रेडीमेड कपड्यांची तेव्हा फारशी चलती नव्हती. कापड घेवून आधीच कपडे शिवायला टाकायचे.  प्रत्येकाचे कापड घ्यायचे व कपडे शिवायला टाकायचे ठिकाण ठरलेलेच असायचे.  मी माझे कापड बाळाराम मार्केट मधून घेवून लक्ष्मी रोड वर असलेल्या चार्ली मध्ये शिवायला टाकायचो. वर्षाला ठराविक कपडे फक्त दिवाळीलाच मिळायचे. आत्ता सारखे कधीही जावून कपडे आणायची परवानगी व पर्वणीही नव्हती. आई मंडई मधून चुरमुरे व पुढे रविवार पेठेतून चिवडा तसेच इतर दिवाळी पदार्थ बनविण्यासाठी सामान आणायची. दिवाळी पदार्थ रेडीमेड आणायची पद्धत नव्हती. आईच्या हातच्या पदार्थांचा एक वेगळाच स्वाद होता, मायेचा ओलावा होता. जेमतेम आर्थिक परिस्थिती आई सर्व खर्चाचे नियोजन कसे करायची तीच जाणे. दिवाळी पदार्थ बनवायला सुरुवात झाली की वाड्यातील प्रत्येक घरातून वेगवेगळ्या पदार्थांचा गंध यायला लागायचा. बायका घरात वासावरुन समजायच्या कोणाच्या कडे कोणता पदार्थ चालू आहे. बायका एकमेकींना मदतही करायच्या. दिवाळीच्या एखाद्या दुसर्‍या दिवस आधी नवीन कपडे आलेले असायचे. वाड्यात ते प्रत्येक घरात जावून दाखवायचा कार्यक्रम व्हायचा.  स्त्रियांची खरेदी व ती खरेदी एकमेकींना दाखविणे हा एक वेगळाच विषय, नव्हे वेगळे विश्व असायचे. वाड्यात विकायला आलेल्या विक्रेत्यापासून ते लक्ष्मी रोड वरील दुकानातील सेल् मधील खरेदी असा व्यापक विषय असायचा. फटाके  खरेदी हा पण स्वतंत्र विभाग असायचा. पुण्यात सारसबाग समोर फक्त फटाक्यांचे स्टॉल असायचे. फटाके सुद्धा ठराविक असायचे. लवंगी, पानपट्टी, मिरची,  नाग गोळी,  लक्ष्मी बॉम्ब,  सुतळी बॉम्ब,  चिमणी बॉम्ब, भुईनोळे , बाण यांचीच रेलचेल होती. टिकली रोल आणि पिस्तूल मिळाली तरी खूप भारी वाटायचे.  वाड्यात अभ्यंगस्नानासाठी पहाटेच नंबर लागायचे. पहाटे सर्वात पहिला फटाका कोण फोडतो यात शर्यत लागायची. थंडीने कुडकुडत असताना आई उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ घालायची. मग नवीन कपडे घालून देवाला व घरातील मोठ्यांना नमस्कार करून फटाके उडवायला पळायचे. किल्ला ही तोपर्यंत तयार असायचा. फटाके उडवून झाले की घरी फराळ व्हायचा. मग आम्ही दिवसभर किल्ला, क्रिकेट,  पत्ते असा धुडगूस घालायला मोकळे. दिवाळीचे सर्व दिवस त्या त्या दिवसाच्या महत्वाप्रमाणे उत्साहात साजरा केला जायचा. वाड्यात मग एकमेकांची फराळाची ताटे एकमेकांत फिरायची. त्यात बरीच टीकाटिप्पणी व्हायची. पण एक वेगळीच गंमत व आपुलकी त्यात असायची. वडीलधारी मंडळी देवाला जावून यायची. बायकांच्या उत्साहाला तर पारावार नसायचा. दिवाळीचा शेवट दिवसात मग उरलेल्या फटाक्यांचे भस्म बनवायचे प्रकार चालायचे. किल्ल्या मधील बुरुज बॉम्ब लावून उडवून दिले जायचे.  पुण्यातील सर्व पेठांमध्ये एकच लगबग व उत्साह असायचा. पाहुणे घरी असतील तर मग मुलांचा प्रचंड धुडगूस चालायचा. दिवाळीचे दिवस सरले की मग मन उदास व्हायचे. प्रत्येकजण हळूहळू आपापल्या कामाला लागायचा. पाहुणे त्यांच्यात्यांच्या गावाला रवाना व्हायचे. 

आता मोबाईल आले. आता कोणाकडे यायची जायची गरज नाही. सर्व फोन कॉल,  video कॉल नाहीतर whatsapp मेसेज वर होवून जाते. महागाचे फटाके उडवून सुद्धा आत्ता तशी मजा नाही,  नव्हे फटाक्यांना आता बंदीच आहे. फराळाची ताटे आता सोसायटी संस्कृतीत फिरत नाहीत. घरात वडिलधारे नाहीत,  नवरा बायको दोघे नोकरीला. आता सुट्टी मिळवायची हेच मोठे दिव्य. चितळे कडून अथवा ओळखीच्या बाईकडून पदार्थ विकत आणले म्हणजे झाले. कपड्यांचे नावीन्य नाही कारण आता येता जाता कधीही अथवा ऑनलाईन सुद्धा आपण कधीही खरेदी करत असतो. सर्वांकडे आता लक्ष्मी आहे पण लहानपणच्या जुन्या फोटोमधील लक्ष्मीची  प्रसन्नता आताच्या डिजिटल फोटो मध्ये जाणवत नाही. आठवणीतील पुण्याची  दिवाळी अजूनही मनांत घर करून आहे.

ले. – जितेंद्र भूस

संग्राहक – श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares