मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सांभाळ बेटा स्वतःला… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

डॉ. तेजस्विनी वाळिंबे

? मनमंजुषेतून ?

☆ सांभाळ बेटा स्वतःला… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषदेतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा मार्केटिंग हेतूने उभारलेला स्टॉल…

दिव्यांचा झगमगाट… मांडून ठेवलेली अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे. अशाच एका अत्याधुनिक दुर्बिणीजवळ डोळ्याची शस्त्रक्रिया करायला आवश्यक असलेल्या मायक्रोस्कोप जवळ मी थबकले. एका गुलाबावर फोकस केलेला तो प्रकाश गोल. क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर त्या गुलाबाच्या जागी माझ्या पेशंटचा डोळा दिसला…सफाईदारपणे ऑपरेशन करणारी माझी बोटं दिसली. नकळत मी त्या दुर्बिणीची किंमत विचारली.

७२ लाख… क्षणभर मी जागच्या जागी थबकले. फक्त दुर्बीण ७२ लाख, बाकी उपकरणे वेगळीच !! लुटतात या कंपन्या आम्हा डॉक्टरांना ! 

दुसरीही बाजू विचार करण्यासारखी आहेच. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या पेशंटना होतोच. आज पाश्चिमात्य देशात जे तंत्रज्ञान वापरले जाते, तेच आज आपण भारतीय डॉक्टर वापरतो हे किती अभिमानाने सांगतो आपण !

आपल्या रुग्णांना या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उत्कृष्ट उपचारांचा फायदा मिळतो, तोही पाश्चात्य देशांच्या तुलनेत फारच कमी खर्चात !!

पण मी या दुर्बिणीच्या खर्चाचं गणित कसं मांडणार ? 

बँकेचे कर्ज, नको रे बाबा !! आतापर्यंत भरपूर कर्ज घेतलं आणि फेडलं. आता या वयात नक्कीच नको. रात्रंदिवस मेहनत करण्याचे दिवस गेले आता.

विचारचक्र चालू होतं, तोच मोबाईल मधून ‘बीप’ आवाज आला…मेसेजेस, व्हिडिओचा महापूर!

भिरभिरत्या डोळ्यांनी मी हपापल्यासारखे मेसेजेस वाचत होती. सभोवतालच्या झगमगाटातही माझ्या डोळ्यासमोर काळ्या ढगांनी गर्दी केली होती. तोंडाला कोरड पडली. हातपाय थरथरायला लागले. एक डॉक्टर -हत्यारा, खुनी, चोर, लुटारू, नालायक …. वाचवेना.

अभ्यासासाठी केलेल्या अनेक रात्रींची जागरणं, जीवघेण्या शिक्षणाचा तो लांबलचक प्रवास, मेसच्या डब्यातले तेलात पोहणारे पिवळे बटाटे, मेडिकल कॉलेजमध्ये अस्वच्छ टॉयलेट्स, सारं काही डोळ्यासमोर नाचत होतं.

चार गावाला खेडोपाडी ऑपरेशन करून थकून भागून रात्री अडीच वाजता घरी परतणारा डॉक्टर नवरा… बँकेचं कर्ज मिळवण्यासाठी केलेली धडपड… रक्ताचं पाणी करून वाढवलेलं माझं हॉस्पिटल, ज्याचा मला खूप अभिमान वाटतो असं…

चहूबाजूनी नराधम माझ्यावर आक्रमण करत आहेत असं काहीतरी मला भासलं.

जड पायांनी मी त्या गुबगुबीत सोफ्यावरून उठली.

” मॅडम, मॅडम, काय डिसिजन घेतलं तुम्ही ?कॉफी घेणार का ?”

“नको, बघू नेक्स्ट फायनान्शिअल इयर मध्ये. ” असं बोलून मी उठले.

चार पावलं जात नाही तर फोन खणखणला.

” हॅलो आई. “

” बोल बेटा, ठीक आहेस ना? तू जेवलास का?”

” जेवतो कशाचा? काल कॅम्पचे 70 पेशंट आले. रात्री अडीच वाजले रूमवर जायला. फक्त अडीच तास झोपलो. परत सकाळी साडेसहा वाजता हॉस्पिटल. ” 

“अरे जेवत जा वेळेवर. कसं होणार असं ? 

तुला कळली का रे बातमी?”

” अगं इथे तामिळनाडूत कशा पुण्याच्या बातम्या येणार?

पण मी बघतो ना मोबाईलवर पुण्याच्या बातम्या. तू विचार करू नकोस आता. “

” तुझ्या हॉस्पिटलमध्ये असं काही झालं तर? जमावाचं मानसशास्त्र फार भीतीदायक असतं. निष्पाप लोकांचा बळी घेतात हे नराधम. तू लहान आहेस, जगाचा अनुभव नाही तुला. आपलं शरीर आणि मन सांभाळ रे बेटा. “

” आई, तू माझी काळजी करू नकोस. चल ठेवतो मी. बाय”

हाच तो माझा मुलगा दोन वर्षांपूर्वी मला म्हणाला होता, आई सगळे मित्र 

USMLE देत आहेत, ज्याला त्याला अमेरिकेत जायचं, पण मी मात्र भारतातच राहणार.

मीही म्हणाले होते, अरे योग्य निर्णय घेतलास, “जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी”

आता मात्र वाटतं योग्य सल्ला दिला का मी माझ्या मुलाला? बुद्धिवंत, बुद्धिजीवी लोकांसाठी नरक तर नाही ना होणार ही माझी मातृभूमी? 

अशीच एकदा सायन हॉस्पिटलमध्ये भाचीच्या होस्टेलला गेले होते. संपूर्ण देशात लाखो विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या शंभरात नंबर पटकावणारी ही बुद्धिमान मुलगी…

कोंडवाड्यात ठेवाव्यात अशा या सहा डॉक्टर्स मुली एका खोलीत कोंबलेल्या !!आरोग्याला घातक वातावरण.

ढेकूण व झुरळांचे साम्राज्य.

रात्रंदिवस कामाचा बोजा.

मनात आलं आज आयआयटीत गेली असतीस, तर गलेलठ्ठ पगाराची नोकरी घेऊन देशात किंवा परदेशात सुखात राहिली असतीस. काय डॉक्टर व्हायचं खुळ घेतलंय आपल्या घरातल्या मुलांनी? पोटातले हे शब्द ओठापर्यंत न आणता तशीच परतले.

प्रथमच एक अवघड ऑपरेशन बघून उत्साहीत झालेली माझी मुलगी म्हणाली, ‘आई सगळे हुशार टॉपर्स मुलं-मुली रेडिओलॉजी आणि डरमॅटॅालॉजी(क्ष- किरणशास्त्र आणि त्वचा रोगशास्त्र) अशा ब्रांचेस घेतात, मला मात्र सर्जन व्हायचंय. “

“हो ना, मलाही आश्चर्य वाटतं. खरंतर सर्जन, स्त्रीरोगतज्ञ, इमर्जन्सी मेडिसिन अशा विषयांमध्ये निर्णयक्षमता, कार्यतत्परता, शल्य कौशल्य, शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता याची खरी परीक्षा होते ; हे विषय सोडून हुशार विद्यार्थी दुसऱ्या ब्रांचेस कशा घेतात? आमच्या वेळी असं नव्हतं. ” “आई, तुझा काळ गेला आता. हिंसक हल्ले होतात ना डॉक्टरांवर म्हणून घाबरतात सगळे. ” 

“अग पण पेशंटचं काय? त्यांना चांगले डॅाक्टर कसे मिळणार असे झाले तर ?अर्धे हुशार डॉक्टर देशाबाहेर जातात. अर्धे हुशार डॉक्टर नॉन इमर्जन्सी ब्रांचेस घेतात. “

” हो, पण मला मात्र सर्जन व्हायचं आहे हं आई. “

त्या दिवशी आपल्या लेकीकडे बघून माझा ऊर अभिमानाने भरून आला होता, पण आता….

.. माझं मन काळजीने व्यापून गेलं आहे..

“बाळा, गिधाडं आहेत गं या समाजात. ते सुखाने आपल्याला जगू देणार नाहीत बेटा. माझं ऐकशील का? 

आईचं काळीज आहे गं हे….. सांभाळ बेटा स्वतःला !!!”

 

© डॉ. तेजस्विनी वाळिंबे

(नेत्रतज्ञ)

 (एक डॅाक्टरची आई)

पुणे मो. ८८८८८३१९०५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लाईफ विदाऊट पुणे…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? मनमंजुषेतून ?

☆ लाईफ विदाऊट पुणे☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

दहा वर्ष.

दहा वर्ष झाली रेवाच्या लग्नाला.

खरंच कळलं नाही. भुर्रकन उडून गेली ही वर्ष.

आठवतंय तर..

किती तरी चांगली स्थळं नाकारलेली तिनं.

बरं झालं. नाहीतर, रवी कसा मिळाला असता तिला ?

कारण ?.. कारण एकच… पुण्याबाहेर जायचं नाही… पुणं रक्तात… नसानसात… रोमारोमात.

.. ‘पुणं’ जगण्याचा आॅक्सीजन.

रेवा विदाऊट पुणे ? शक्यच नाही.

रेवानं आधीपासूनच ठरवलेलं. “मुलगा कसाही असला, तरी चालेल. काळा कुट्ट, तिरळा, टकला.

दोन खोल्यांत सुखानं संसार करीन. पण… पुण्यातला हवा… “

अगदी आयटी वाल्यांनाही, सरळ नाही म्हणायची ती.

‘अय्यो… यांचा काय भरवसा ? म्हणायला आज हिंजवडीत… उद्या उठून चालायला लागतील, बंगलोरला.

नाहीतर हैद्राबादला… परवा एकदम स्टेटस् ला. नको रे बाबा.. ‘

नशीब काढलं पोरीनं. रवी मिळाला तिला. शनवारात माहेर… नारायणात सासर. अगदी मुठेला सुद्धा ओलांडायला नको.

सुख म्हणजे दुसरं काय असतं ? हेच…

नारायणात पत्र्या मारूतीशी तिचं सासर.

“परशुराम क्षुधाशांती गृह”.. अस्सल मराठमोळ्या चवीचं, धो धो चालणारं हाॅटेल.

रवी, गल्ल्यावर बसणारी तिसरी पिढी… हाॅटेलमधल्या कामगारांचीही तिसरी पिढी. रवीच्या आजोबांनी चालू केलेलं.

तिथलं थालीपीठ, साबुदाण्याची खिचडी, आणि साजूक तुपातला अस्सल बदामी शिरा.. अजून बरच काही.

एकही पदार्थ कधी शिल्लक रहायचा नाही.

हाॅटेल पहिल्यापासून फेमस… टोकन सिस्टम. दोन मजली हाॅटेल… जागा कमी पडायची. मोस्ट अवेटींग वेटींग..

तिसऱ्या, चौथ्या मजल्यावर घर… ऐसपैस… प्रशस्त.

रवी हाॅटेलमधे कमीच असायचा. त्याचे बाबाच सांभाळायचे हाॅटेल. रवीनं रीतसर हाॅटेल मॅनेजमेंट केलेलं.

आयटी कंपनीतली दोन कॅन्टीन्स घेतलेली चालवायला. त्याच्याकडे चांगली टीम होती. थोडी धावपळ व्हायची. मस्त बस्तान बसलं होतं.

रवी तसा मवाळ… करलो दुनिया मुठ्ठीमें टाईप. रेवाच्या मुठीतला प्राणी. सासू सासरे प्रेमळ. साठ डेसीबल्सच्या वरच्या आवाजाची सवयच नव्हती घराला.

रेवा तिच्या माहेरी, शनवारात नर्सरी स्कूल चालवायची. लग्न झाल्यावर रवी म्हणाला…

” कॅरी आॅन रेवा… “

रवीनं नळस्टाॅपला एक बऱ्यापैकी मोठी जागा घेतली. सध्या भाड्यानेच.

रेवाचं नर्सरी स्कूल झोकात. ” लिटील एन्जल्स “

त्यांच्या घरात पण आलीय, आता एक लिटील एन्जल… तन्वी.

तन्वी आता जरा, मोठी झालीय. आजीबरोबर मस्त राहते. रेवा दिवसभर तिच्या नर्सरी स्कूलमधे बिझी.

पुढच्या वर्षी तन्वी पण जायला लागेल. घरची शाळा.

एकंदर काय ? रेवा जाम खुष होती. ” जिंदगी का सफर… ” काहीच suffer नव्हतं.

– – अचानक काल विनायकराव… रवीच्या बाबांचे सख्खे मित्र. परशुरामला रहायचे. मोठ्ठी वाडी होती त्यांची… डोंगरउतारी… वाशिष्ठीकडे तोंड करून. अप्रतिम नजारा दिसायचा. ऐसपैस मोठ्ठं घर. नुकतंच बांधलेलं. समीर.. त्यांचा एकुलता एक मुलगा आस्ट्रेलियात असतो. इकडे परत यायची शक्यता नाही.

तिथं दोघंच म्हातारा म्हातारी. बऱ्याच वेळा जाऊन आलीयेत, सगळी तिथं. दोन घरात खूप घरोबा.

काल रात्री विनायकराव अचानक आले. बऱ्याच वेळ रवीशी, त्याच्या बाबांशी बोलणं चाललेलं. रेवा, तिची सासू स्वयपाकघरात. जेवणं आटोपली. सगळी हाॅलमधे जमली. रवीच्या बाबांनी सुरुवात केली.

.. ” विनायकनं एक प्रोपोजल ठेवलंय. परशुरामला त्याची वाडी, तुम्ही बघितलीच आहे. तिथं एक हाॅलीडे रिसाॅर्ट डेव्हलप करतोय तो. समीरनं… त्याच्या लेकानं, बऱ्याच डाॅलर्सचा रतीब घातलाय तिथं. काम पूर्ण होत आलंय. पंचवीस तीस एसी रूम्स… काॅन्फरन्स हाॅल… स्विमिंग पूल… ईनडोअर गेम्स… प्युअर व्हेज रेस्टाॅरंट… सगळ्या थ्री स्टार फॅसिलिटीज … सगळा सेट अप रेडी आहे. समीर काही इकडे येणार नाहीये.

रवीला पार्टनरशीप ऑफर करतोय तो. मला वाटतं रवीनं जावं. फूड इंडस्ट्रीजचा त्याला एक्सपिरीयन्स आहेच. हाॅलीडे होम थ्रू बरंच शिकायला मिळेल. इथलं हाॅटेल अजून काही वर्ष तरी मी नक्की सांभाळीन.

निदान वर्षभर तरी जावं. नाही आवडलं तर, ये परत… “

रवी कनफ्युजलेला. तो रेवा की नस नस से वाकीफ. पुण्याबाहेर पडायचं ? शक्यच नाही… त्याचा डिसीजन ठरलेला… बायकोशी दुश्मनी ?.. नको रे बाबा ?

तो नाही म्हणणार, एवढ्यात रेवा उवाच.

” बाबा, आम्ही तयार आहोत. पण एकच वर्ष. जास्त नाही. पुढे मागे पुण्यात एखाद मोठ्ठ हाॅटेल, चालवायला घेवू आपण. हा एक्पेरीअन्स खूप काही शिकवून जाईल. “

…. अजूबा… रेवानं सोप्पं गणित मांडलेलं. एकच वर्ष तर काढायचंय. यूऽऽ कट जायेगा..

खरं सांगू ? एक नाही, साडेचार वर्ष झालीयेत आता. “वाशिष्ठी दर्शन मोटेल” जोरात चाललंय. विनायकराव आणि काकू खूष.

समीर तर रवीला म्हणतोय, ‘तूच सांभाळ सगळं, लाईफटाईम. ‘

वाडीतल्या रिकाम्या जागेवर, रेवाचं स्कूल उभं राहिलंय… ‘समीर फायनान्स’च्या सहकार्यानं.

चिपळूणातलं पहिलं आय सी एस ई स्कूल… जोरात चालंलय. ” पुण्याच्या बाईंची शाळा ” फेमस झालीये.

तन्वीही मस्त रमलीये. रेवा पुणं विसरलीय बहुतेक.

परवाचीच गोष्ट… एक निवांत संध्याकाळ. रेवा आणि रवी गॅलरीत उभे…काॅफीच्या सोबतीला समोरची वाशिष्ठी.. वळणदार, नागमोडी.

“रेवा, मै तुम्हे कभी समझ ही नही पाया…. पुणं सोडून, तू कशी काय राहिलीस इथं ?”

रेवानं मोठ्ठा पाॅझ घेतला.

“रव्या, कोण म्हणतंय मी पुण्यापासून लांब आहे ? पुणं इथंच आहे, माझ्यासोबत.

पुणं म्हणजे फक्त पिनकोड नाहीये… पुणं म्हणजे संस्कार… पुणं म्हणजे लाईन ऑफ थिंकींग… पुणं म्हणजे वर्क कल्चर.. जे फक्त पुण्यात राहूनच, शिकता येतं. आज तू अन् मी इथं, आपापलं छोटसं विश्व उभारू शकलो ते याच संस्काराच्या जीवावर. आहे ते शिस्तीत सांभाळायचं, वाढवत न्यायचं. फुकाचा माज करायचा नाही. स्वतःची ओळख निर्माण करायची. अटकेपार डंका फडकवायचा. अन्… रिटायरमेंनंतर पुण्यात परत यायचं….. हे असलं, अस्सल जगणं, म्हणजेच पुणं… मी चुकत होते रव्या.. पुण्यापासून लांब गेलं की, पुण्याची किंमत कळते. माणूस शहाणा होतो. प्रगती करतो. “पुण्या”च्या वाटेवर चालू लागतो.

अस्सल पुणेकरानं, दोन चार वर्ष बाहेर काढावीतच… ते जाऊ दे. ही शाळा मला बारावीपर्यंत न्यायचीय.

तुझं हाॅटेल बारा महीने फुल्ल रहायला हवं.. ”

“होणार.. असंच होणार. वाशिष्ठीच्या साक्षीनं… ओंकारेश्वराच्या आशीर्वादानं… एकदा लेकीचं लग्न झालं, की जाऊ पुण्याला परत. अजून एक, जावई मात्र पुण्यातलाच हवा.. “

खरंय.. रेवा पुण्याशिवाय राहूच शकत नाही. रग रग में पुणे.. ” ये बयो लवकर परत…पुणं वाट बघतंय. ” 

– – ‘पुण्या’ची गणना कोण करी ?”

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आम्ही पेशवेकालीन मोरोबादादांच्या वाड्यात…

रोड वायडिंग मध्ये आमची जागा गेली. जोगेश्वरीच्या अगदी समोरच्या दीपमाळेजवळची, जागा सोडून आम्ही पोटभरे वाड्यात म्हणजे जोगेश्वरीच्या पाठीमागे आलो. आई देवीला हात जोडून म्हणाली, ” माते आम्ही तुझ्या पोटाशी होतो तु पाठीशी घातलसआणि तुझ्या परिसरातच ठेवलंस”.

हा पेशवेकालीन मोरोबा दादांचा वाडा चार चौकी आणि पुष्कर्णी हौदाचा होता. पेशव्यांची रंगपंचमीची रंगत ह्याच वाड्यात रंगली. शानदार, नक्षीदार दरवाजातून आत गेल्यावर लांबरुंद हेssभले मोठे सुंदर हौद दिसायचे. पेशवे काळात पूर्णपणे हे हौद भरून रंग तयार केला जायचा. आणि रंगपंचमीचा जल्लोष साजरा व्हायचा. पेशवाई संपली, वाडा ओस पडला आणि ह्या वाड्यात नंतर 100 बिऱ्हाड आली. त्यात 101 च्या आकड्यात आमची वर्णी लागली. घराची दुरुस्ती, लाईट बिल खर्च, मालकांनी करायचा असा नियम होता. पण जुनी पडझडीची वास्तू, तुळया, सळया जुन्या पुराण्या झाल्या. तेलपाण्या अभावी त्यागंजलेल्या होत्या. लाकडी जिन्याच्या पायऱ्या तुटलेल्या असून, जिन्यात इतका अंधार होता की पायरी चुकली तर पावलं उचलायचा त्रास वाचून, वरचा माणूस घसरगुंडी खेळत l पहिल्या पायरीवरच पोहोचायचा. जिन्यात दिवसाढवळ्या इतका काळोख असायचा की चढणारा आणि उतरणारा टक्कर देउन कसाबसा तोल सावरत कपाळ चोळायचा. अहो!लहान काय, मोठ्ठे सुद्धा ‘ठो देरे ठोचा ‘ खेळ त्या अंधाऱ्या जिन्यात खेळायचे. मग काय कपाळावर हात मारून, एक सणसणीत शिवी हांसडून एकमेकांना म्हणायचे. “साल्या दिसत नाही कां तुला?”डोळे फुटलेत का तुझे? आंधळा झालास की काय?” पहिल्या पायरीवरून हा रंगलेला डाव बघणारे आम्ही हंसू दाबून एकमेकांना विचारायचो. ” हे तर चांगले डोळस आहेत, पण जिनाच आंधळा आहे त्याला ते तरी काय करणार? 

अहो !काय सांगू तुम्हाला! पुण्यात सगळ्याच वाड्यांची ही कथा होती. कारण वाडे जुने झाले होते नां!मालक तरी काय करतील? आभाळाला किती ठिगळ जोडतील? भाडेकरूही चिवट होते. वाडा पडेपर्यंत ते बहाद्दर जाम हलले नाहीत. जिने उतरतांना तर आम्ही कड्या कठडे खुळखुळ्यासारखे हलवायचो. लाईट कनेक्शन तुटलं, मालक भाडेकरूंची शब्दांची हाणामारी झाली तरीही, चार भिंतींना जुनी बिऱ्हाड चिकटूनच राह्यली. पोटभरे वाड्यात कमीत कमी जागेचे भाडेकरूंचं भाडे होतं फक्त 2 रुपये. आमच् घर म्हणजे एक हॉलचं होता. माझ्या मावशीने आणि वर्षा वहिनीने त्याला आकार देऊन ‘टू इन वन’ केलं होतं. तेव्हा कुठली आलीय हो प्रायव्हसी, ? पण थोडीफार प्रायव्हसी असावी म्हणून आमच्या बंधूराजांनी घरात शामियान्यासारखे पडदे सोडले होते.

सगळ्या बिऱ्हाडांना जोडलेला, सार्वजनिक पटांगणासारखा भला मोठा हॉल पहिल्या मजल्यावर होता. ‘आव जाव हॉल तुम्हारा’अशी प्रथा पडून मंगळागौर लग्न, मुंज, डोहाळे जेवण सारं काहीं या फुकटच्या हॉलमध्ये फुकटात साजरं व्हायचं. वाड्यात सगळ्यात जास्त म्हणजे मोठ्या आकड्याचं भाडं आम्हालाच होतं. ते किती होतं माहितीय का? फक्त रु. 12 नगद. आजच्या लाखोवारीच्या जगामध्ये ते बारा रुपये म्हणजे कुठलातरी कोपराचं म्हणावं लागेल. मालक श्री. व सौ. पोटभरे सगळ्या भाडेकरुंचे भाऊ आणि वहिनी होते. माहेरवाशिणीचे माहेरपण तिथे कौतुकाने साजरं व्हायचं. इतकंच काय, आम्ही वाड्यातल्या मुली उपवर झालो की, आमची लग्न, रुखवत, धान्य निवडणे सारी सारी तयारी वाडा अगदी आपलं घरचं कार्य समजून करायचा. त्यात उत्साहाचा वाटा आणि गाईडन्स अर्थात पोटभरे भाऊ वहिनीचंच असायचं.

तुम्हाला एक नवलाईची गोष्ट सांगू?तिथले एक भाडेकरू श्री. कळमकर ह्यांना आई वडील भाऊ बहिण कुणीच नव्हते. खोटं वाटेल तुम्हाला पण त्यांचं लग्न या वाड्यांनी लावलं. देव देवक भाऊंनी बसवलं. करवल्या झालो आम्ही. आणि कार्यवाहक झाला संपूर्ण वाडा. असं हे शुभमंगल वाड्यातल्या हॉलनी दणक्यात लावलं. इतकचं काय त्यांचे बारा महिन्यांचे लगेचच आलेले १२ सण हौसेनी केले. मंगळागौरीचं, हरतालिकेचं जागरण, झिम्मा, दणादण फुगड्या या वाड्यानेच जागवल्या काही दिवसांनी कळमकर वहिनीनीं गोड गुपित माझ्या आईच्या कानांत सांगितलं. आईतली माय माऊली जागी झाली आणि कौतुकाने हंसली मग काय! माझ्या आईनी चोर चोळीचा कार्यक्रम गुपचूप उरकला. पुढे सातवा महिना लागल्यावर डोहाळतुलीचं सजून धजुन डोहाळेजेवणही हौसेत झालं. त्या वहिनीची तिच्या मामीकडे माहेरी पाठवणी झाली. “सांभाळून, सावकाश जा गं! तब्येतीची काळजी घे हो. जड ओझं उचलू नकोस हं!काही खावसं वाटलं तर सांग बरंका! “ अशा एका अनेक प्रेमाच्या सूचना झेलत डोहाळकरीण माहेरी रवाना झाली. आणि मग काही दिवसांनी, बालराजांना घेऊन बाळंतींण आपल्या घरी, मोरोबादादांच्या वाड्यात परतली.

बालराजांचं स्वागत अगदी थाटामाटात पायघड्यांवरून फुलांच्या मऊ शार पाकळ्यांवरून झालं. आणि बाळकृष्ण बोळकं पसरून हंसले. बाळकृष्ण कलेकलेने वाढत होता त्याचं उष्टावण झालं संक्रांत सण, बोरनहाण, करदोडे वाण, अगदी सगळे सगळे सोहळे कौतुकाने वाड्यातल्या आयाबायांनी साजरे केले. इतकचं काय मुलांची मुंज पण इथे निर्वीघ्नपणे पार पडली. प्रेम, जिव्हाळा, सहकार्य, आणि शेजारधर्म ह्या तत्वावर आधारलेली संस्कृती त्यावेळच्या जुन्या पुण्यात पाय रोउन घट्ट रुतली होती.

ते सगळं खरं आहे हो!पण ह्या वाडा संस्कृतीत देवाला स्थान हे हवेच नाही कां! वाड्याच्या मागच्या बाजूला छोटसं विष्णू मंदिर होतं आणि अजूनही आहे. बायका इतक्या उत्साही की भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत सुस्नात होऊन काकड्याला जायच्या. तितक्याच हौसेने जवळच्या प्रभात टॉकीजच्या मराठी सिनेमाला पण घोळक्यांनी भेट द्यायच्या. हळव्या रडक्या सिनेमात रडून आणि विनोदी सिनेमात हसून बाहेर पडायच्या. आमच्या वहिनीला सिनेमाची खूप आवड होती म्हणून आमची आई वाड्यातल्या बायकांना तिचं पण तिकीट काढायला सांगायची. एकदा तर गंमतच झाली बहिणीबरोबर वहिनीने 12 ते 3 सिनेमा बघितला, घरी आली तर वाड्यातल्या बायकांनी ‘मोलकरीण’ सिनेमासाठी तिचं तिकीट काढलं होतं. प्रभात टॉकीजला वेगवेगळे मॅटिनी शो असायचे त्यातून तर हा सुलोचनाचा गाजलेला कौटुंबिक चित्रपट होता. वहिनीला जेवायला सुद्धा वेळ मिळाला नाही. ‘शो’ ची सुरुवात जायला नको म्हणून आईने घरी भाजलेले खारे शेंगदाणे आणि कोरड्या भेळेचा पुडा बायकांच्या हातात कोंबला. तेव्हा थिएटरमध्ये सर्रास शेंगा, फुटाणे, भेळ, फरसाण खायची फुल परमिशन होती. सिनेमाचा आस्वाद घेताना रसिक प्रेक्षक, शेंगा फराळ करायचे. शेंगा फोलपटांचा ढीग, कागदाचे बोळे बाकाखाली इतके पडायचे की ते आवरतांना सफाई कामगारांचं कंबरडच मोडायचं. पुढची गंमत तर ऐका ना, वहिनी बहिणीबरोबर 12 ते 3 सिनेमा बघून नुकतीच आली होती. वाड्यातल्या बायकांबरोबर 3 ते 6 दुपारचा शो बघून घरी येऊन चहा प्यायला टेकली न टेकली तोच आमचे बंधुराज घाईघाईने आले. आणि म्हणाले, “वर्षा लवकर चहा पी, मी तिकीट काढलीत, आपल्याला 6 ते 9 च्या शोला जायचय पटकन उठ. सिनेमाची सुरुवात जायला नको” आता आली का पंचाईत!. हो म्हणावं की नाही म्हणावं? ह्या विचारांच्या गोंधळात वहिनींबाईंनी आईकडे बघितलं, माझी आई सगळ्यांना सावरून घेणारी, सगळ्यांची मर्जी सांभाळणारी होती. माझ्या भावाला राग येऊ नये म्हणून तिने वहिनीला त्याच्याबरोबर जाण्याची खूण केली. अहो!वहिनीला तशी सिनेमाची आवड होती म्हणा! पण त्या एकाच दिवशी तीन प्रकारचे तीन सिनेमे बघून तिच्या डोक्यात अगदी सिनेमांची खिचडी झाली. 12 ते3, – 3 ते6 आणि शेवटचा 6 ते 9चा शो बघून घरी आल्यावर अर्धी अधिक अमृतांजनची बाटली तिने संपवली. हंसून हंसून आम्ही लोळण फुगडी घेतली. त्यानंतर मात्र वहिनीने पाच-सहा महिने ‘चला जाऊया सिनेमाला’ ह्या वाक्याचा धसका घेऊन सिनेमाचं नांवच काढलं नाही.

बरं का मित्रमैत्रिणींनो अशा गंमतीशीर आठवणी आम्हाला मोरोबा दादांच्या वाड्याने दिल्या आहेत. मग आवडली का तुम्हांला ही त्यावेळच्या वाड्यातली गमतीशीर गम्मत?.

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चराचरात आहे राम… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

??

☆ ✍️ चराचरात आहे राम… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

श्रीराम जय राम जय जय राम 🙏🚩

या जगातील सगळ्या गोष्टींची जबाबदारी भगवंताची आहे

कुणी मानतं कुणी मानत नाही,

एवढाच काय तो फरक आहे..

 *

पृथ्वी, जल, आप, वायू, अग्नी तर त्याचेच, जीवाचा श्वास ही “त्याचा” आहे 

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….

 *

दृश्य, अदृश्य, ऊन, सावली, सुख दुःखाचा तोच द्रष्टा आहे

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे…

 *

निर्माता तर आहेच पण निर्मितीचे कारणही तोच आहे 

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे…

 *

साधु संतांनी हे ओळखले व त्याला जाणले आहे 

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे…

 *

मानणे न मानणे हया पलिकडचे अस्तित्व “तो” आहे

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….

 *

गुह्यतम हे ज्ञान हेच केवळ सत्य आहे 

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….

 *

ज्याने जाणले त्याला त्याचाच तो आहे 

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….

 *

त्याला जाणल्यावर जाणण्याचे काही शिल्लक रहात नाही 

स्वतः तच त्याला अनुभवल्यावर वेगळे काही असत नाही…

 *

स्वानंदाचा हा आनंदकंद निर्मितेचे कारण आहे

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….

 *

“शीतोष्ण सुख दुःखेषु” असा तो स्थितप्रज्ञ ज्ञानी आहे 

कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे…

 *

मानणे, न मानणे अंध:कार संपला

फरक ओळखून जगी “सुवर्ण मध्य” साधला…

 *

सत्यमेव जयते 🙏

 आत्माराम (च)राजाराम *

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वेळीच दाद द्या। ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ वेळीच दाद द्या। ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

एका अतिशय चांगल्या Whats अप मेसेज वरून सहज सुचलं.

माणूस असतानाच, आपण त्याला, का चांगले म्हणत नाही?

तो दुर्दैवाने गेल्यावर, मग त्याचे चांगले गुण आपण गौरव करून सांगतो.

आपले मन एवढे मोठे का बरे नसावे, की आपण एखाद्याला, त्याच्यासमोरच, कौतुकाचे शब्द ऐकवावे.

विशेषे करून, आपण बायका, समोरच्या बाईंचे कौतुक, जरा हात राखूनच करतो ना?

काय हरकत आहे हो, की.. “ अग, किती सुंदर आहे ही तुझी साडी, अगदी मस्त दिसतेय तुला. ”

का नाही पटकन आपण म्हणत, “ किती ग मस्त केलेस तू वडे. अगदी अन्नपूर्णा आहेस बघ. ” 

पण सहसा लोकांच्या हातून हे होत नाही.

हे फक्त बायकांच्याच बाबतीत नाही मला म्हणायचे, तर पुरुष मंडळीही याला अपवाद नाहीत.

ऑफिसमध्ये, जरा कनिष्ठ पदावरचा माणूस प्रमोशन मिळून वर गेला तर, खुल्या दिलाने त्याचे कौतुक किती सहकारी करत असतील?.. तर फार कमीच.

आणि ही वृत्ती लहान मुलांतही असतेच. पण पालकांनी त्याला खतपाणी घालता कामा नये.

पहिल्या आलेल्या मुलाचे खुल्या दिलाने अभिनंदन करायला, मुलांना आई वडिलांनी शिकवले पाहिजे.

आपण सुंदर दिसणाऱ्या मुलीचे कित्ती तरी वेळा मनातून कौतुक करतो, पण मग तिला तसे जाऊन सांगत का नाही की “अग, किती छान दिसतेस तू. तुझा चॉईस खूप छान आहे, तुला कपड्यातले खूप छान कळते ग. माझ्या बरोबर येशील का खरेदीला? “ बघा किती आनंदच होईल ना तिला.

सुनेने एखादा पदार्थ खरोखरच सुंदर केला, तर द्यावी ना सासूबाईंनी दाद की “ किती चव आहे ग तुझ्या हाताला. मस्त केलेस हो हे. “ आनंद हा कौतुक केल्याने द्विगुणित होतो.

आम्ही पुण्याच्या प्रख्यात हुजूरपागेत शिकलो. मुख्याध्यापक बाईंच्या त्या ऑफिसमध्ये जायचीही भीती वाटायची तेव्हा इतका त्या खुर्चीचा दरारा होता.

फार वर्षांनी माझी मामे बहीण हुजूरपागेची मुख्याध्यापिका झाली. इतके कौतुक वाटले ना तिचे.

तिला न कळवता तिचे कौतुक करायला आम्ही बहिणी तिला भेटायला ऑफिसमध्ये गेलो.

तिला म्हटले, “ आमची बहीण कशी दिसते या खुर्चीत ते बघायला आलोय आम्ही. ” 

तिचे डोळे आनंदाने भरून आलेले आजही आठवतात.

कौतुकाची थाप पाठीवर दिलेली तर आपल्या कुत्र्यालाही आवडते, मग आपण तर माणसे.

.. का नाही समोरच्याचे वेळीच कौतुक करू?

.. चार चांगले शब्द काय जड होतात का हो उच्चारायला?

– – – या वरून आपल्या लाडक्या सुधा मूर्ती आठवतात. तळागाळातील बायकांशी मैत्री करून, त्यांची सुखदुःख्खे जाणून घेऊन, त्यावर उपाय शोधून, पुन्हा कुठेही मोठेपणाची हाव न धरणाऱ्या सुधाताईंचे किती कौतुक करावे ? 

…. समाजाने वाळीत टाकलेल्या बायकांनी केलेल्या सुबक गोधड्या बघून त्यांचे मन भरून कौतुक करणाऱ्या सुधाताई तिथेच नुसत्या थांबल्या नाहीत, तर त्यांना त्या तयार करून विकायला त्यांनी

बाजारपेठ उपलब्ध करून दिली. त्यांना मान खाली घालायला लावणारा व्यवसाय सोडायला लावून,

नवीन दिशा दिली… यातूनच ‘ तीन हजार टाके ‘ हे पुस्तक जन्माला आले.

‘ कौन बनेगा करोडपती ‘ मध्ये सुधाताईंनी साक्षात अमिताभ बच्चनना त्या बायकांनी केलेली सुबक गोधडी प्रेझेन्ट दिली… असे मोठे मन आपण किती लोकांकडे बघतो?

आपणही, खुल्या दिलाने कौतुक करायला शिकले पाहिजे.

.. मी मुलीकडे हॉंगकॉंगला गेले होते. तिकडे फिरत असताना आम्हाला बाबा गाडीत इतकी गोड बाळे दिसली ना.. मला लहान मुले अतिशय आवडतात. त्यातून ही जुळी मुले तर गुबगुबीत, मिचमिचे डोळे करून बघत होती. मी त्यांच्या आईला विचारले, “ मी बोलू का यांच्याशी? “ ती हसली आणि म्हणाली,

“ हो, पण ती चावतात बर का. जपूनच बोला. ”

मी गुढग्यावर बसले, आणि चक्क मराठीत बोलू लागले त्या गोड बाळांशी.

ती दोघेही जोरजोरात दंगा करायला लागली, आणि हात पसरून माझ्याकडे झेप घेऊ लागली.

त्यांच्या आईला खूप मजा वाटली. किती अभिमानाने ती आपल्या गोड बाळांकडे बघत होती !

प्रेमाला भाषा नसते हो, फक्त तुम्ही ते व्यक्त करा, ते समोर पोचते लगेच.

.. माणूस जिवंत असतानाच दाद द्या, चार शब्द कौतुकाचे बोला, तो माणूस शहरातून बदलून गेल्यावर,

किंवा दुर्दैवाने, या जगातूनच निघून गेल्यावर मग हळहळून काय उपयोग?

आपल्या भावना, लगेचच पोचवायला शिका. वेळ आणि वाट नका बघू. नंतर हळहळून, गेलेली वेळ परत येत नसते. मग आपल्या हातात, ‘अरेरे।’ असा पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही उरत नाही.

मंडळी, तर मग करा सुरुवात दिलखुलास दाद द्यायला…. न कचरता.

…. आणि बघा, समोरचाही किती खुश होतो, आणि तुमचाही दिवस किती सुंदर जातो ते ।।।

©  डॉ. ज्योती गोडबोले 

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “Training and Employment Centre: एक आढावा…!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ Training and Employment Centre : एक आढावा…!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

याचना करणाऱ्या मंडळींसाठी प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र सुरू करत आहोत. तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

पण तयारी झाली झाली, म्हणता म्हणता, एक एक गोष्ट आठवत आहे, आणि त्या तयारीत दिवस निघून जात आहेत.

काहीही असो, अक्षय तृतीयेपासून हे सेंटर पूर्ण जोमाने काम करायला सुरुवात करेल.

दुसऱ्यांचे काही “शुभ” होत असेल तर “चिंता” करणारे अनेक शुभ(?)चिंतक आपल्या सर्वांच्या आसपास असतात.

अशापैकी अनेकांचे अनेक सवाल…

‘डॉक्टर हे लोक खरंच काम करणार का ??? 

ते सेंटरवर येणार का ??? 

बसचा पास काढून दिला तरी सुद्धा हे लोक बस मधून येऊ शकतील का ???’

अगदी मनापासून सांगायचं तर आमच्या या एम्प्लॉयमेंट सेंटरची बातमी जेव्हा आमच्या भिक्षेकरी समाजात सांगितली, तेव्हापासूनच इथे कामाला येण्यासाठी, आमच्या लोकांची चढा ओढ सुरुवात सुरू झाली.

साडेतीनशेच्या वर माझ्याकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. आणि अजूनही दिवसागणिक ते वाढत आहे.

कामाला येणाऱ्या लोकांची संख्या पाहून माझे डोळे दिपले…!

पण इथे मात्र मी कमी पडलो….!

रोज 200 रुपये प्रमाणे एका महिन्याच्या चार सुट्ट्या सोडून 5200 रुपये होतात.

सुरुवातीला 30 लोकांना जरी आपण कामावर घेतले, तरी दर महिन्याला मला रुपये 1,56,000 (एक लाख छप्पन्न हजार रुपये) इतका पगार वाटावा लागणार आहे.

कच्चा माल आणि इतर अनेक खर्च वेगळे…

इतका निधी दर महिन्याला माझ्याकडे जमा होणार का ? 

ज्या विश्वासाने माझ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून कामासाठी नोंदणी केली आहे, त्यांचा विश्वास माझ्याकडून तुटला तर जाणार नाही ना ? या विचाराने रात्र रात्र झोप येत नाही…!

असो…

सुरुवातीला वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींवर फोकस केला आहे.

कोणती बस पकडायची, कुठे उतरायचे, कसे जायचे याची काल आम्ही रंगीत तालीम केली.

कामासाठी ज्यांची निवड केली आहे, अशा सर्वांना PMT बसमधून घेऊन आलो.

या सर्वांची भीक मागणे सोडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची, स्वयं प्रकाशित होऊन “मध्यरात्रीचे सूर्य” होण्याची मनापासून असलेली “मनीषा” पाहून भारावून गेलो…!

All is well…. All is well…. असं सतत स्वतःशी म्हणत पुढे पुढे सरकत आहे…

जे करतो आहे ते आपणा सर्वांच्या साथीने…. 🙏 🙏

पुढे जे होईल ते कळवित राहीनच….

आपले स्नेहांकित,

डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे 

11 एप्रिल 2025

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… परिवर्तन – भाग – ३९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… परिवर्तन – भाग – ३९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

ठाण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मागच्या गल्लीतल्या गांगल बिल्डिंग मधल्या वन रूम किचन ब्लॉक मध्ये ताईच्या संसाराची घडी हळूहळू बसत होती. अनेक नकारात्मक बाजूंना आकार देत स्थिरावत होती. ताईचे मोठे दीर प्रकाशदादा आणि नणंद छाया नोकरीच्या निमित्ताने ताई -अरुणच्या घरी रहात असत. काही दिवसांनी ताईची धाकटी नणंद अभ्यासाच्या दृष्टीने चांगले म्हणून त्यांच्या सोबत रहायला आली. ताई -अरुणने सर्वांना ममतेने, कर्तव्य बुद्धीने आणि आपुलकीने सामावून घेतले. ताईचे सासू-सासरे मात्र सासऱ्यांच्या निवृत्तीनंतर लोणावळ्यात राहायला गेले होते तिथे त्यांनी एक बंगला खरेदी केला होता. एकंदर सगळे ठीक होते.

विशेष श्रेणीत कला शाखेत एमए झालेली हुशार ताई “रांधा, वाढा, उष्टी काढा यात अडकलेली पाहून माझं मन मात्र अनेक वेळा कळवळायचं. चौकटीत बंदिस्त असलेल्या गुणवंत स्त्रियांच्या बाबतीत मी तेव्हापासूनच वेगळे विचार नेहमीच करायचे मात्र त्यावेळी माझे विचार, माझी मतं अधिकारवाणीने मांडण्याची कुवत माझ्याकडे नव्हती. मी आपली आतल्या आत धुमसायची पण ताईचं बरं चाललं होतं.

बाळ तुषारच्या बाललीला अनुभवण्यात आणि त्याचं संगोपन करण्यात ताई अरुण मनस्वी गुंतले होते पण जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ. तुषार अवघा दहा महिन्याचा होता.

एके रात्री ऑफिसच्या पार्टीला जाण्याची तयारी करत असताना अरुणच्या पोटात अचानक तीव्र कळा येऊ लागल्या. सुरुवातीला ताईने घरगुती उपचार केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही तेव्हा तिने दादाला (मोठे दीर) फोन करून सर्व हकीकत सांगितली आणि ताबडतोब घरी यायला विनविले. दादांनी तात्काळ ऑफिसच्या गाडीतून अरुणला फॅमिली डॉक्टर अलमेडा यांच्याकडे नेले. त्यांनी तात्पुरते बॅराल्गनचे इंजेक्शन देऊन घरी पाठवले पण दुखणे थांबले नाही उलट ते वाढतच होते. अरुणचे मेव्हणे, ठाण्यातले प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर मोकाशी यांनी “हे दुखणे साधे नसल्याचे” सुचित केले व त्वरित ठाण्यात नव्यानेच सुरू झालेल्या शल्यचिकित्सक डॉक्टर भानुशालींच्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये अरुणला दाखल केले. अरुणला “पँक्रीयाटाइटिस”चा तीव्र झटका आलेला होता. अंतर्गत रक्तस्त्राव होत होता. १९६८साल होते ते. आजच्या इतकं शल्यचिकित्सेचं विज्ञान प्रगत नव्हतं. डॉक्टरांनी ताईला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. ” पेशंटची स्थिती नाजूक आहे. डॉक्टरांच्या हाताबाहेरचे आहे कारण या व्याधीवर लागणारे Trysilol हे औषध भारतात उपलब्ध नाही. तेव्हा आता फक्त भरवसा ईश्वराचाच. काही चमत्कार झाला तरच…”

ताई इतकी कशी धीराची! ती पटकन म्हणाली, ” डाॅक्टर! तो मला असे सोडून जाऊ शकत नाही. चमत्कार होईल. माझी श्रद्धा आहे. मी तुम्हाला हे औषध २४ तासात मिळवून देईन. “

त्यावेळी अरुण लंडनच्या B O A C या एअरलाइन्समध्ये इंजिनीयर होता. (आताची ब्रिटिश एअरलाइन्स). ताईने ताबडतोब सर्व दुःख बाजूला ठेवून प्रचंड मन:शक्तीने पुढचे व्यवहार पार पाडले. अरुणच्या मुंबईतल्या ऑफिस स्टाफच्या मदतीने तिने सिंगापूरहून ट्रायसिलाॅल हे औषध इंजेक्शनच्या रूपात डॉक्टरांना २४ तासात उपलब्ध करून दिले आणि अरुणची हाताबाहेर गेलेली केस आटोक्यात येण्याचा विश्वास आणि आशा निर्माण झाली. डॉक्टर भानुशाली यांनी लगेचच ट्रीटमेंट सुरू केली. अरुणने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. आता त्याने धोक्याची रेषा ओलांडली होती. अरुणचे आई-वडील, भाऊ, बहिणी, इतर नातेवाईक सारे धावत आले. ताई सोबत आम्ही होतोच. याही सर्वांचा ताईला मानसिक आधार मिळावा हीच अपेक्षा असणार ना? पण ताईच्या जीवनातल्या एका वेगळ्याच कृष्णकाळ्या अंकाला इथून सुरुवात झाली.

पुन्हा एकदा मनात खदखदणाऱ्या घटनांचा प्रवाह उसळला. जातीबाहेरचे, विरोधातले लग्न, आचार विचारांतली दरी, पुन्हा एकदा पट्टेकरी बुवा विचारधाराही उसळली. वास्तविक आमचं कुटुंब सोडलं तर आमच्या आजूबाजूचे सारेच या पट्टेकर बुवांच्या अधीन झालेले. तसे पट्टेकर बुवा पप्पांशी, माझ्या आजीशी भेटल्यावर आदराने बोलत पण कुणाच्या मनातलं कसं कळणार? पट्टेकरांना पप्पांच्या बुद्धिवादी विचारांवर कुरघोडी करण्याची जणू काही संधीच मिळाली असावी. सर्वप्रथम त्यांनी अरुणच्या परिवारास “ढग्यांची आजी ही करणी कवटाळ बाई आहे” असे पटवून दिले. परिणामी आमच्या कुटुंबास हॉस्पिटलमध्ये अरुणला भेटायला येण्यापासून रोखले गेले. हाच “बुवामेड” कायदा मुल्हेरकरांनी ताईलाही लावला.

अरुण त्याच्या आईला विचारायचा, “अरु कुठे आहे? ती का आली नाही. अरुणची आई उडवाउडवीची उत्तरे द्यायची.

पप्पा ऑफिसातून जाता येता हाॅस्पीटलमध्ये जात. अरुणच्या रूममध्ये बाहेरूनच डोकायचे. अरुण अत्यंत क्षीण, विविध नळ्यांनी वेढलेला, रंगहीन, चैतन्य हरपलेला असा होता. तो हातानेच पपांना आत येण्यासाठी खुणा करायचा. खरं म्हणजे पप्पा बलवान होते. ते या सगळ्यांचा अवरोध नक्कीच करू शकत होते पण प्राप्त परिस्थिती, हॉस्पिटलचे नियम, शांतता अधिक महत्त्वाची होती. ते फक्त डॉक्टर भानुशालींना भेटत व अरुणच्या प्रकृतीचा रोजचा अहवाल समजून घ्यायचे. डॉक्टरांनाही या मुल्हेरकरी वर्तणुकीचा राग यायचा पण पप्पा त्यांना म्हणत, ” ते सर्व जाऊद्या! तुम्ही तुमचे उपाय चालू ठेवा. पैशाचा विचार करू नका. ”

अत्यंत वाईट, दाहक मनस्थितीतून आमचं कुटुंब चालले होते. बाकी सगळे मनातले दूर करून आम्ही फक्त अरुण बरा व्हावा” म्हणूनच प्रार्थना करत होतो ज्या आजीनं आम्हाला कायम मायेचं पांघरूण पांघरलं तीच आजी नातीच्या बाबतीत कशी काय “करणी कवटाळ” असू शकते. काळजाच्या चिंध्या झाल्या होत्या. ओठात केवळ संस्कारांमुळे अपशब्द अडकून बसले होते.

आजारी अरुणला ताईने भेटायचेही नाही हा तिच्यावर होणारा अन्याय, एक प्रकारचा मानसिक अत्याचार ती कसा सहन करू शकेल? ती तिच्याच घरी याच साऱ्या माणसांसोबत त्यांची उष्टी खरकटी काढत लहानग्या तुषारला सांभाळत मनात काय विचार करत असेल? एक दिवस डोक्यात निश्चित विचार घेऊन मीच ताईच्या घरी गेले आणि उंबरठ्यातच ताईला म्हणाले, ” बस झालं आता! बॅग भर, तुषारला घे आणि चल आपल्या घरी. ”

ताईचे सासरे जेवत होते. ते जेवण टाकून उठले. त्यांनी माझ्या हातून तुषारला घेण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्या मोठ्या डोळ्यांनी त्यावेळी मला साथ दिली. ते घराबाहेर गेले. ताईने मला घट्ट मिठी मारली आणि ती हमसाहमशी रडली. मी तिला रडू दिले. एक लोंढा वाहू दिला. शांत झाल्यावर तिला म्हटले, ” चल आता. सगळं ठीक होईल. बघूया.”

ताई आणि तुषारला घेऊन मी घरी आले. हा संपूर्ण निर्णय माझा होता आणि आमचं संपूर्ण कुटुंब त्यानंतर ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं!

दोन अडीच महिन्यांनी अरुणला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. तिथून त्याला त्याच्या ठाण्यातल्याच मावशीकडे नेलं. त्यानंतर एक दोनदा ताईने मावशीच्या घरी जाऊन अरुणची विरोधी वातावरणातही भेट घेतली होती. नंतर अरुणच्या परिवाराने अरुणला लोणावळ्याला घेऊन जाण्याचे ठरवले. त्यावेळी अरुणने “तूही लोणावळ्याला यावेस” असे ताईला सुचवले पण ताईने स्पष्ट नकार दिला. म्हणाली, ” आपण आपल्याच घरी जाऊ. मी तुझी संपूर्ण काळजी घेईन याची खात्री बाळग” नाईलाजाने तिने तो हॉस्पिटलमध्ये असताना काय काय घडले याची हकीकत सांगितली आणि या कुटुंबीयांवरचा तिचा विश्वास ढळल्याचेही सांगितले. अरुणने ऐकून घेतले पण तरीही लोणावळ्याला जाण्याचा बेत कायम राहिला. समस्त कुटुंब लोणावळ्याला रवाना झाल्यावर ताईने एक दिवस गांगल बिल्डिंग मधल्या तिच्या घरी जाऊन घर आवरून त्यास कुलूप घातले आणि ती कायमची आमच्या घरी राहायला आली.

ताईच्या वैवाहिक जीवनातल्या कष्टप्रद अध्यायाने आणखी एक निराळे वळण घेतले.

एक दिवस अरुणचे पत्र आले. अरुणच्या पत्राने ताई अतिशय आनंदित झाली. तिने पत्र फोडले आणि क्षणात तिचा हर्ष मावळला. अरुणने पत्रात लिहिले होते, ” तुझे माझे नाते सरले असेच समज.. ”

पत्रात मायना नव्हता. खाली केलेल्या सहीत निर्जीवपणा, कोरडेपणा होता. “सखी सरले आपले नाते” या गीत रामायणातल्या ओळीच जणू काही हृदयात थरथरल्या पण या वेळेस ताई खंबीर होती. ती अजिबात कोलमडली नाही, ढासळली नाही, मोडली पण वाकली नाही. तिने डोळे पुसले, ढळणारे मन आवरले आणि जीवनातलं कठिणातलं कठीण पाऊल उचलण्याचा तिने निर्धार केला.

संकटं परवानगी घेऊन घरात शिरत नाहीत पण ती आली ना की त्यांच्या सोबतीनं राहून त्यांना टक्कर देण्यासाठी मानसिक बळ वाढवावं लागतं.

शिवाय यात ताईचा दोषच काय होता? खरं म्हणजे तिचा स्वाभिमान दुखावला होता. तिच्या अत्यंत मायेच्या माणसांना अपमानित केलेलं होतं. त्यांच्या भावनांना, वैचारिकतेला पायदळी तुडवलेलं होतं. NOW OR NEVER च्या रेषेवर ताई उभी होती आणि ती अजिबात डळमळलेली नव्हती. नातं खरं असेल तर तुटणार नाही आणि तुटलं तर ते नातच नव्हतं या विचारापाशी येऊन ती थांबली. आयुष्याच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी जणू तिने शूर सैनिकाचं बळ गोळा केलं आणि या तिच्या लढाईत आमचं कुटुंब तिच्या मागे भक्कमपणे उभं होतं. पिळलेल्या मनातही सकारात्मक उर्जा होती.

काही काळ जावा लागला पण अखेर हा संग्राम संपण्याची चाहूल लागली. या साऱ्या घटनांच्या दरम्यान प्रकाश दादाने (ताईच्या दिराने) अनेकदा सामंजस्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. हे त्यांनी अगदी मनापासून केले. त्याच्या कुटुंबीयांनी ताईच्या बाबतीत किती चुका केल्या आहेत याची जाणीव ठेवून केले पण तरीही ताईने माघार घेतली नाही. तिच्या स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा, अस्तित्वाचा, स्वयंप्रेरणेचा स्त्रोत तिला विझू द्यायचा नव्हता. प्रचंड मानसिक ताकदीने ती स्थिर राहिली.

एक दिवस अरुण स्वत: आमच्या घरी आला. त्याचे ते एकेकाळचे राजबिंडे, राजस रूप पार लयाला गेले होते. दुखण्याने त्याला पार पोखरून टाकलं होतं. त्याच्या या स्थितीला फक्त एक शारीरिक व्याधी इतकंच कारण नव्हतं तर विकृत वृत्तींच्या कड्यांमध्ये त्याचं जीवन अडकलं होतं त्यामुळे त्याची अशी स्थिती झाली होती. जीजीने त्याला प्रेमाने जवळ घेतले. त्याचे मुके घेतले. अरुणने जवळच उभ्या असलेल्या ताईला म्हटले, “अरु झालं गेलं विसरूया. आपण नव्याने पुन्हा सुरुवात करूया. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ”

ताईने त्याला घट्ट आलिंगन दिले. त्या एका मिठीत त्यांच्या आयुष्यातले सगळे कडु विरघळून गेले.

इतके दिवस ठाण मांडून बसलेली आमच्या घरातली अमावस्या अखेर संपली आणि प्रेमाची पौर्णिमा पुन्हा एकदा अवतरली.

त्यानंतर माझ्या मनात सहज आले, अरुण फक्त घरी आला होता. तो जुळवायला की भांडायला हे ठरायचं होतं. त्याआधीच जिजी कशी काय इतकी हळवी झाली? मी जेव्हा नंतर जिजीला हे विचारलं तेव्हा ती म्हणाली, “भांडायला येणारा माणूस तेव्हाच कळतो. अरुणच्या चेहऱ्यावर ते भावच नव्हते. ”

माणसं ओळखण्यात जिजी नेहमीच तरबेज होती.

“फरगेट अँड फरगिव्ह” हेच आमच्या कुटुंबाचं ब्रीदवाक्य होतं.

शिवाय जीजी नेहमी म्हणायची, ” सत्याचा वाली परमेश्वर असतो. एक ना एक दिवस सत्याचा विजय होतो. ”

त्यानंतर ताई आणि अरुणचा संसार अत्यंत सुखाने सुरू झाला. वाटेत अनेक खाचखळगे, काळज्या होत्याच. अजून काट्यांचीच बिछायत होती पण आता ती दोघं आणि त्यांच्यातलं घट्ट प्रेम या सर्वांवर मात करण्यासाठी समर्थ होतं. बिघडलेली सगळी नाती कालांतराने आपोआपच सुधारत गेली इतकी की भूतकाळात असं काही घडलं होतं याची आठवणही मागे राहिली नाही. ढगे आणि मुल्हेरकर कुटुंबाचा स्नेह त्यानंतर कधीही तुटला नाही. सगळे गैरसमज दूर झाले आणि प्रेमाची नाती जुळली गेली कायमस्वरुपी. ही केवळ कृष्णकृपा.

आज जेव्हा मी या सर्व भूतकाळातल्या वेदनादायी घटना आठवते तेव्हा वाटतं युद्धे काय फक्त भौगोलिक असतात का? भौगोलिक युद्धात फक्त हार किंवा जीत असते पण मानसिक, कौटुंबिक अथवा सामाजिक युद्धात केवळ हार -जीत नसते तर एक परिवर्तन असते आणि परिवर्तन म्हणजे नव्या समाजाचा पाया असतो. यात साऱ्या नकारात्मक विरोधी रेषांचे विलनीकरण झालेले असते आणि जागेपणातली किंवा जागृत झालेली ही मने शुचिर्भूत असतात याचा सुंदर अनुभव आम्ही घेतला. तेव्हाही आणि त्यानंतरच्या काळातही. खरं म्हणजे आम्हाला कुणालाच ताईचं आणि अरुणचं नातं तुटावं असं वाटत नव्हतं पण ते रडतखडत, लाचारीने, कृतीशून्य असमर्थतेत, खोट्या समाधानात टिकावं असंही वाटत नव्हतं. कुठलाही अवास्तव अहंकार नसला तरी “स्वाभिमान हा महत्त्वाचा” हेच सूत्र त्यामागे होतं त्यामुळे त्यादिवशी समारंभात भेटलेल्या माझ्या बालमैत्रिणीने विचारलेल्या, ” इतक्या खोलवर झालेले घावही बुझू शकतात का?” या प्रश्नाला मी उत्तर दिले, “ हो! तुमची पायाभूत मनोधारणा चांगली असेल तर खड्डे बुझतात नव्हे ते बुझवावे लागतात.”

 – क्रमश: भाग ३९

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “English prayer…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “English prayer…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

रोज वेळ मिळेल तेव्हा नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणीं आणि अनोळखी वाचक यांच्याशी फोनवर मस्त गप्पा मारण्यात एक वेगळीच मजा येते. आणि मी ती नेहमीच एन्जॉय करतो.

आज सकाळी कॉन्व्हेंट मधून शिकलेल्या आणि माझ्याबरोबर कॉलेजमध्ये असलेल्या मैत्रिणीशी गप्पा मारताना, मैत्रीण (नाव छाया) म्हणाली – 

छाया : मी रोज सकाळी एक श्लोक म्हणून देवाची प्रार्थना करते. पण श्लोकाचा अर्थ काहीच समजत नसतो आणि बऱ्याच शब्दांचे उच्चार पण नीट करता येत नाहीत. त्यामुळे प्रार्थना म्हणण्यात मनापासून मजा येत नाही. इंग्रजीमध्ये देवाची काय प्रार्थना करता येईल ? 

तुझं चौफेर लिखाण असल्यामुळे तू नक्कीच इंग्रजी मधली सोपी प्रार्थना सांगू शकशील. मला रोज इंग्रजी मध्ये प्रार्थना म्हणायला नक्कीच आवडेल. आणि प्रार्थना सोपी असेल तर मी सकाळ, संध्याकाळ आणि वेळ मिळेल तेव्हा म्हणत जाईन. मला प्रार्थना म्हणायला खूप आवडतं.

इंग्रजीमध्ये प्रार्थना सूचवणं आणि ते पण मी, हे जरा अवघडच होतं. मी थोडा विचार केला, वर बघितलं, म्हणजे देवाकडे बघितलं, आणि मला एक छान आणि अगदी सोपी प्रार्थना क्लिक झाली. आणि गंमत म्हणजे मला स्वतःला पण ती मनानी तयार केलेली प्रार्थना खूप आवडली.

मी म्हटलं : एकदम सोपी प्रार्थना सांगतो. इंग्रजीमधे आहे. तुझ्यासारख्या इंग्लिश मीडियम वाल्यांना तर एकदमच सोपी. आणि देवाने जर तुझी ही प्रार्थना ऐकली तर जगामधले सगळेच जण आयुष्य एन्जॉय करतील.

प्रार्थना अशी आहे –

Hey God, let my mind and all parts of my body always remain and grow as per your original design for human body.

And let this logic apply to everyone on the earth.

छाया एकदम खुश झाली. म्हणाली, अरे एकदम सोपी आहे आणि अर्थपूर्ण तर आहेच आहे. पाठांतर पण करायला नको. आणि तिनी मला ही प्रार्थना लगेचच तिच्या इंग्लिश स्टाईल मध्ये म्हणून पण दाखवली. तिची बोलण्याची स्टाईल जरा इंग्लिश असल्यामुळे ऐकताना मजा आली.

असं म्हणतात देवाला प्रार्थना आपण कुठल्या भाषेत करतो ते महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं की प्रार्थना मनापासून आहे की नाही. आणि प्रार्थना नीट म्हणता आली आणि प्रार्थनेचा अर्थ जर समजला, तरच ती मनापासून होऊ शकते. आणि मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच एक वेगळाच आनंद देते आणि चेहऱ्यावर प्रसन्नता आणते.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेमाचे झाड… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ प्रेमाचे झाड… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

आमच्या सोसायटीच्या दारातच चिंचेचे झाड आहे. हळूहळू मोठे होत होत ते आमच्या गॅलरीपर्यंत आले. कोवळी पोपटी मऊशार पानं दिसायला लागली. त्यावरून अलगद हात फिरवावा असं वाटे.

हळूहळू पान मोठी होत जाताना बघणं फार आनंदाच वाटत होत. अगदी गॅलरीतल्या कठड्या जवळच फांद्या होत्या. काही फांद्या आतही आल्या…

एके दिवशी बघितलं तर गुलाबी पिवळसर रंगाची फुलं दिसली..

“अरे म्हणजे आता चिंचा येणार “

मी अगदी आतुरतेनी वाट पाहायला लागले. कोवळी नाजूक चिंच दिसली….

हळूहळू मोठी होत गेली… निसर्गाचा तो सोहळा बघताना फार मजा येत होती. रोज उत्सुकतेनी मी बघत होते.

होता होता चिंच चांगलीच मोठी झाली. चिंचेचे आकडे तयार झाले.

ते बघून शाळेच्या दारात चिंचा विकणाऱ्या मावशी आठवल्या… तेव्हा चिमणीच्या दाताने तोडलेला तुकडा आठवला. मैत्रिणी, शाळा, बाई आठवल्या……..

आणि नंतर या झाडाची गंमतच सुरू झाली.

घरी कोणी आलं की आधी त्यांना घेऊन गॅलरीत जायचं आणि हे झाड दाखवायचं..

एकदा मैत्रिण व तिची जाऊ आली. तिच्या जावेने तर फांदी हातात घेऊन अगदी गालाजवळ नेली… तिचे डोळे भरूनच आले होते. ती म्हणाली

“अग नीता आमचं घर म्हणजे फक्त दोन छोट्या खोल्या होत्या. पण दारात एक भलं मोठं चिंचेचे झाड होतं. त्याच्या सावलीतच आम्ही अभ्यास केला तिथेच मैत्रिणींशी गप्पा मारल्या. बाबा आणि आजोबा त्याच्या सावलीत झोपायचे. या झाडाला आज स्पर्श करून खूप समाधान वाटलं बघ.. त्याच झाडाची आठवण आली. “

विलक्षण प्रेमाने ती बोलत होती.

झाडाला बघून तिचा हळवा कोपरा उघडला होता…. निघताना पण तिने हलकेच फांदीवरून हात फिरवला…

झाड मोठं व्हायला लागलं. चिंचा आता छान वाळल्या होत्या.

एक मध्यम वयाच जोडपं आलं. झाड झोडपून देतो म्हणाले.

“आम्हाला थोड्या चिंचा द्या बाकी तुम्ही घेऊन जा “म्हणून सांगितलं.

त्यांनी चिंचा पाडल्या. पोती भरली. आम्हाला दिल्या. खुश होऊन निघाले. निघताना त्या बाईं झाडाजवळ गेल्या झाडाला डोकं टेकवलं….. कवटाळलं नमस्कार केला… देवाला करावा तसा..

मी बघत होते 

“फार झोडपल बघा झाडाला… पण चिंचा पाडण्यासाठी असं करावंच लागतंय बघा… “

त्या म्हणाल्या.

झाडाबद्दल तेवढी कृतज्ञता..

पुढे सांगत होत्या..

“आम्ही शेतकरीच आहोत भाऊकी सुरू झाली…. छोटा तुकडा वाट्याला आला.. मग शेती विकली. पैसा घेतला आणि आता शहरात आलो जगायला… “

काय बोलावं मला पण काही सूचेना…. डोळे भरून आले..

” बरं ताई येतो आम्ही परत पुढच्या वर्षी” असं म्हणून दोघं निघाले.

निघताना दादांनीही झाडाला डोकं टेकवलं…

हाडाचे शेतकरीच होते ते…

काही दिवसांनी लक्षात आलं की झाडावर दोन पक्षी येऊन बसत होते. त्यांचे विभ्रम चालायचे..

मैत्रीण आली होती तिला सहज सांगितले.

“हेच दोघे येऊन वेगळे बसतात बघ. प्रेमात पडलेले असतील बहुतेक” 

ती बघायला लागली..

” चल ये आत कॉफी करते”

म्हटलं तर ती तिथेच उभी…

लक्ष त्या पक्षांकडेच म्हणाली “पक्षांमध्ये जात, धर्म, पंथ नसतात हे किती बरं आहे ना… सुखात राहू दे यांची जोडी… “

पक्षांना बघून तीच खूप जुनं दुःख नकळत वर आलं होतं…

अशावेळी काही बोलूच नये..

शांतपणे मी आत आले.

नंतर पण घरी आली की गॅलरीत जाऊन झाड बघून यायची…

का… अजून काही आठवायची…………

खारूताईच चिंच खाणं बघत राहावं असं असायचं. बाईसाहेब मजेत दोन पायांच्या मध्ये चिंच धरायच्या आणि खात बसायच्या…

ह्या झाडाच्या तर मी प्रेमातच पडले होते.

री डेव्हलपमेंट होणार म्हणून काही दिवस घर सोडायचे होते. झाडाला सोडायचे वाईट वाटत होते.

दोन्ही नातवंड साहिल शर्वरी आले. चिंचा काढल्या. त्यांनाही झाडाबद्दल विलक्षण प्रेम वाटत होतं. ममत्व होतं….

“आता खाली पार्किंग येणार मग आपला फ्लॅट अजूनच वर जाणार आपल्या गॅलरीत हे झाड नसणार रे” साहिलला मी म्हणाले.

तर तो म्हणाला 

“अग आजी तोपर्यंत झाड पण वाढणार नाही का? मग ते आपल्या गॅलरीत येणार… “

“अरे हो खरंच की”

त्याच्या बोलण्याने मन आनंदुन गेलं.

येताना झाडाचाही निरोप घेतला.

भेटू काही वर्षांनी…

आणि मधुन मधुन येत जाईन रे तुला बघायला… झाडाला सांगितलं.

वारा आला.. फांद्या हलल्या…

माझं मलाच छान वाटलं…

असा जीव जडला की लांब जाताना त्रासच होतो…

मग तो झाडावर जडलेला असला तरी…

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ केव्हा शिकू आपण हे ??—  मूळ हिन्दी लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ अनुवाद व प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ केव्हा शिकू आपण हे ??—  मूळ हिन्दी लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ अनुवाद व प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे

काही दिवसांपूर्वीची गोष्ट !

त्यावेळी मी रशियातील मॉस्को इथे होते. एका रविवारी मी बागेत गेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते पण हलका रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हवेत सुखद गारवा आला होता. बाग अतिशय सुंदर होती. एका चबुतऱ्याखाली बसून मी त्या सुंदर वातावरणाचा आस्वाद घेत होते.

अचानक माझी नजर एका युवक युवतीच्या जोडीवर पडली. अगदी थोड्या वेळापूर्वीच लग्न झाले असावे त्यांचे !

ती नववधू अगदी सुंदर होती ! पंचवीस एक वर्षांची, सोनेरी केसांची आणि निळ्या चमकत्या डोळ्यांची ! जणू बाहुलीच ! नवरा मुलगाही साधारण त्याच वयाचा वाटत होता ! तडफदार आणि आकर्षक ! त्याने सैन्याचा पोशाख घातला होता. नववधूच्या अंगावर सॅटिनचा पांढराशुभ्र, मोती आणि नाजूक लेसने सजवलेला पोशाख होता. तिच्या दोन मैत्रिणीही तिच्यामागे उभ्या होत्या. नववधूचा पोशाख मळू नये म्हणून त्यांनी तो हातांनी उचलून धरला होता. एका मुलाने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली होती. पाऊस पडत होता ना ! नववधूच्या हातात फुलांचा सुंदर गुच्छ होता. दोघांची जोडी अगदी साजेशी आणि सुरेख दिसत होती.

मी विचार करु लागले, ‘ बाहेर पाऊस पडत असताना इतके छान कपडे घालून हे दोघं लगेच असे बागेत का बरं आले असावेत ? लग्न लागल्यावर त्यांच्याकडेही एखादा काही समारंभ वगैरे असेलच की !’ 

मी आता त्यांच्याकडे लक्षपूर्वक पहात होते. ते दोघेही बागेत असलेल्या युद्ध-स्मारकाकडे गेले. हातातला गुच्छ त्यांनी त्या स्मारकावर अर्पण केला. तिथे दोन मिनिटे शांत उभे राहून त्यांनी मनोमन श्रद्धांजली वाहिली व ते हळूहळू परत फिरले.

आता मात्र माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना !

या जोडीबरोबर एक वृद्ध गृहस्थही आलेले होते. मी त्यांच्या जवळ जाताच त्यांनी माझी साडी पाहून विचारलं 

“ आपण भारतीय आहात का ?”

“ हो, मी भारतीय आहे. “

मग नकळत आमच्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्यांना विचारलं, “ आपल्याला इंग्रजी कसं येतं ?” 

“ मी काही दिवस परदेशात काम करत होतो.”

“ मला एक गोष्ट सांगता का ? हे नवविवाहित जोडपं लग्नानंतर लगेचच या युध्दस्मारकाला भेट द्यायला का आलं आहे ? “ न राहवून मी लगेच माझी शंका एकदाची विचारून टाकली.

ते म्हणाले, “ ही रशियातली परंपरा आहे. इथे कोणाचाही विवाह नेहमी रविवारीच होतो, मग ऋतू कोणताही असू दे ! विवाह-नोंदणीच्या रजिस्टरवर सह्या केल्यानंतर त्या जोडप्याने तिथल्या जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन तिथे श्रध्दांजली अर्पण करणं बंधनकारकच आहे असं म्हणता येईल. काय आहे.. ह्या देशात प्रत्येक युवकाला कमीत कमी दोन वर्षे सैन्यात नोकरी करावीच लागते. लग्नाच्या दिवशी आपला सैनिकी पोशाख घालूनच लग्नाला उभं रहावं लागतं.. मग तो कोणत्याही पदावर वा कुठल्याही खात्यात असू दे.” 

“ आणि याचं कारण काय ? “ मी विचारलं.

ते जरासे सरसावून बसले आणि सांगू लागले……

– – “ हे कृतज्ञतेचं प्रतीक समजलं जातं. आपल्या कितीतरी पूर्वजांनी आपल्या देशासाठी कितीतरी युद्धांमध्ये भाग घेतला होता. किती जणांनी प्राणांची आहुती दिली होती.. काही युद्धं जिंकली, काही हरली ! पण त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं ते फक्त आमच्या या देशासाठी… त्यांच्या त्यागाचं मोल फार मोठं आहे. आणि प्रत्येक नवविवाहित जोडप्याला ह्याची जाणीव असणं फार आवश्यक आहे. ज्या शांत स्वतंत्र राष्ट्रात ते दोघं आता आनंदाने राहणार आहेत ते राष्ट्र आज ह्या लोकांच्या बलिदानावर उभं आहे… ही जाणीव. आम्ही वयस्कर लोक ही परंपरा जपण्याचा आग्रह धरतो. विवाहाच्या दिवशी युद्ध-स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहणं ही गोष्ट प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी जणू अनिवार्यच आहे. मग लग्न कुठेही असो, मॉस्को, पिटर्सबर्ग अथवा रशियातल्या कोणत्याही शहरात !” 

मी विचारात पडले… ‘आता हे दोघं लग्न करताहेत’ म्हणून काय शिकवतो आपण आपल्या मुलांना ? महाग महाग साड्या आणि उंची कपडे, किंमती दागदागिने, महागडे जेवणाचे मेनू, अनावश्यक डेकोरेशन, आणि डिस्को पार्टी.. बस्.. फक्त एवढंच तर शिकवतो. एक भारतीय म्हणून आनंदाने आणि शांतपणे जगण्यास आतुर झालेल्या त्या जोडप्याला.. त्यांच्या आयुष्यातल्या त्या महत्वाच्या दिवशी आपल्या शहिदांची आठवण ठेवायला का शिकवत नाही आपण ? का त्यांचे महत्त्व आपण पटवून देऊ शकत नाही आपल्या पुढच्या पिढीला…. आणि खरं तर स्वत:लाही ?

माझे डोळे भरून आले ! मन दाटून आले !

खरंच !आपण भारतीयांनी रशियाकडून ही महान परंपरा आणि ही कृतज्ञतेची जाणीव शिकलीच पाहिजे. देशासाठी आणि पर्यायाने आपणा सर्वांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे त्यांचा योग्य तो सन्मान आपणही केलाच पाहिजे… आपल्या आनंदाच्या प्रत्येक क्षणी त्यांचे स्मरण तर केलेच पाहिजे.

– – पण केव्हा शिकू आपण हे ????

 

मूळ हिन्दी लेखिका : सुश्री सुधा मूर्ती

अनुवाद व प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares