☆ स्त्रियांच्या विविध आणि सुंदर छटा… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
डेअरी दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो. तिथे एकाच ठिकाणी ” दूध, दही, ताक, लोणी, तूप “
बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..! पाहूया कसे ते..?—-
“दूध”
दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन: कुमारिका.
दूध म्हणजे माहेर . दूध म्हणजे आईवडिलांशी नातं —शुभ्र, सकस, निर्भेळ—-
स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं.
त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.
“दही“
कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं की कुमारिकेची वधू होते . दुधाचं नाव बदलून दही होतं !
दही म्हणजे त्याच अवस्थेत थिजून घट्ट होणं !–लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते. –दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. ” कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला “ तरी” स्त्री त्याच्याप्रती एवढी निष्ठा का दाखवते ? नवरा हा “पती परमेश्वर” म्हणून ? नव्हे –
तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.
“ताक”
सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या की दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते, म्हणजे “ताक” होतं.– ” दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी.”
‘बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा खवळलेला नवरा असो (पित्त प्रकृती)’–ताक दोघांनाही शांत करतं.. हा यावरचा उत्तम उपाय आहे असं आयुर्वेद म्हणतो.
“ताक” म्हणजे सुनेचं सासरशी नातं. सासरी स्त्री ताकासारखी बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच ! ‘दूध’ पाणी घालून बेचव होतं पण ‘ताक’ मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष संसारातल्या सगळ्या प्रश्नांवर कामी येतं .
“लोणी”
अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं. मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं, तेव्हा मऊ,रेशमी, मुलायम, नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो . हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं. रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण कण ‘लोणी’ होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात लाजून तिला सांगत असतात. पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही . तरुण दिसण्यासाठी ती त्या बटांचं तोंड काळं करते. ‘ताकाला’ पुन्हा ‘दूध’ व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?
“तूप“
‘लोणी’ ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही. ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी, नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते – आणि त्याच लोण्याचं आता कढवलेलं “साजूक तूप होतं”. वरणभात असो ,शिरा असो ,किंवा बेसन लाडू असो, घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर साजूक तूप पडतं आणि जादू घडते.
देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.
घरासाठी, कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे ‘तूप’ संपून जातं.हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय.
” दूध ते तूप ” हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास.
” स्त्री आहे तर श्री आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.”
—” असा हा स्त्रीचा संपूर्ण प्रवास- न थांबणारा, सतत धावणारा,न कावणारा, न घाबरणारा, कुटुंबासाठी झिजणारा, कुटुंबाची काळजी घेणारा “. —–
ह्या प्रवासास तथा समस्त स्त्री वर्गास मानाचा मुजरा ll.
संग्राहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्रावण महिन्यातल्या कहाण्या ऐकणं ही पर्वणी असे माझ्या लहानपणी !
तशा ढंगात आधुनिक कथुली लिहिण्याचा हा एक प्रयत्न– यंदाच्या श्रावणमासारंभानिमित्ताने —-
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट !
(२१व्या शतकात आठेक वर्षापूर्वीची म्हणजे फार फार्रच! राईट?)
आटपाट सहनिवासात एक कुटुंब रहात असे. त्यातले राजा -राणी नि दोन राजपुत्र आधी अगदी आनंदाने रहात. जसजसे राजपुत्र राजाच्या पावलावर पाऊल टाकून शिक्षणात यशस्वी होत गेले, तसतसे ते राजाच्या मर्जीत राहू लागले आणि…..
ई-युगात राणी मात्र हळुहळु मागे पडत गेली (खरंतर मागासलेली ठरली), नि त्या त्रिकुटाची नावडती झाली.
यथावकाश, शिक्षणाच्या मोहिमेसाठी राजमान्यतेने दोन्ही राजपुत्रांनी देशांतर केलं.
राजा नि राजपुत्रांचं त्रिकुट ई-संवादा ने आणखी घट्ट जोडलं गेलं.
राणी मात्र नावडतेपणाने दुरावत गेली.
राजपुत्र मोहिमेवर गेल्यानंतरच्या पहिल्या श्रावणात तिनं पुत्रांच्या क्षेम-कल्याणासाठी व्रतवैकल्यं
करायचं योजलं. त्यातल्या देवांच्या कहाण्यां मधून राणीला प्रेरणा मिळाली नि तिनं वसा घेतला-
स्वत:साठीही !
सर्वप्रथम राणीने आपल्या खाजगी ठेवी तून वशासाठी लागणारं एकमेव साहित्य, (अगदी पारंपरिक कहाण्यातल्या एक मूठ साहित्यासारखं) म्हणजेच स्मार्टफोन खरेदी केला. देवांच्या कहाण्यांनी प्रेरित झालेल्या राणीला पतिदेव सहाय्य करतील असा भरवसा नव्हताच मुळी !
त्यामुळे—सहनिवासात राहणाऱ्या नि रोज सायंवॅाक घेणाऱ्या एका नवयौवना उमेशी जवळीक साधली.
उमेनंही, राणीला सखी म्हणून स्वीकारलं.
नंतर श्रावणातल्या दर सोमवारी सहनिवासाच्या कट्ट्यावर ह्या सखी-पार्वतीच्या जोडीनं चौसोम (४ सोमवारची) योजना आखली. राणीनं, ई-तंत्र-संथा घ्यायचं निश्चित केलं.
पहिल्या सोमवारी काय घ्यावं?—-
मुठीतल्या मोबाईलला मनोभावे नमस्कार करून राणीने संपूर्ण मोबाईल-कार्य नि ई-जोडणी आत्मसात करून घेतली ,— उमे कडून !
मग दुसऱ्या , तिसऱ्या , चौथ्या सोमवारी उमेच्या समक्ष सहाय्याने, ई-मेल, व्हाट्सअप, फेसबुकमध्ये लक्ष वाहिलं राणीने !!—’ उतणार नाही मातणार नाही । घेतला वसा टाकणार नाही ।। ’ हे ब्रीद वाक्य ठेवून राणीने उपासना सुरूच ठेवली.
राजपुत्रांना पहिल्यांदा ‘मेल’ करून ई-धक्का देत देत हळूहळू राणी ई-स्मार्ट तर झालीच, –
पण…
आत्तापर्यंत ‘राजपुत्र’ हीच दुनिया असलेल्या राणीच्या कक्षा रुंदावल्या नि ती संपूर्ण जगाशी जोडली गेली.
वसा फळाला आला . — * राजा आणि राजपुत्रांची* कमालीची आवडती झाली राणी !
(जसा जसा वसा परिपक्व होत गेला तसा तसा राणीचा नेट पेमेंट शॅापिंगवरचा दहशतवादी वरचष्मा राजाच्या नजरेत भरू लागला.)
पूर्वी रात्रीची जेवणं आठ साडेआठ च्या सुमारास होत असत.साडेनऊ पर्यंत दिवे मालवून रेडिओवरची श्रुतिका ऐकत किंवा कधी रात्री दहाची आकाशवाणी संगीतसभा ऐकत लोक झोपेच्या आधीन होत.तत्पूर्वी गाद्या घालणे हे नित्य काम करावे लागे.तेंव्हा घरात एक किंवा दोन पलंग असत.खर म्हणजे लोखंडी ,उभ्या आडव्या पट्ट्या असलेलली एकच कॉट असे.२/३ खोल्यांच्या लहान घरात जागाही नसे आणि प्रत्येकाने कॉटवर झोपण्याची चैन करण्याची पद्धतही नव्हती.सिंगल बेड,डबल बेड,सोफा कम् बेड,बंक बेड चा तो जमाना नव्हता.त्यामुळे घरातील ती एक कॉट वडिलांसाठी राखीव असे.ते घरात नसतील तेंव्हा दुपारी पडायला वगैरे इतरांना ती मिळे.त्यामुळे रात्री घरातील इतर सर्वांनी खाली गाद्या घालून झोपायचं हे ओघानेच आले.
घरात भिंतीला टेकवून ३/४ गाद्यांच्या वळकट्या एकावर एक रचून ठेवलेल्या असत.त्यावर एखादी सतरंजी किंवा चादर घातलेली असे ज्यायोगे गादीतला क्वचित् उसवून बाहेर आलेला कापूस दिसू नये.गाद्या घालण्यापूर्वी पुन्हा एकदा झाडून घ्यायचे.पूर्वी दोन वेळा केर काढायची पद्धत होतीच. फक्त दिवेलागणीला केर काढायचा नाही असा नियम होता.कारण ती वेळ घरात लक्ष्मी येण्याची वेळ.केर काढल्यावर सतरंज्या अंथरायच्या आणि त्यावर गाद्या पसरायच्या.गाद्या घालायचं काम सामान्यपणे घरातली पुरुषमंडळी करत आणि लहान मुले त्यांना आवडीने मदत करत.गादीवरची चादर काढून त्या चादरीने गादी जोरजोरात झटकायची. ढेकणांचाही बंदोबस्त करावा लागे..मग त्यावर हळुवारपणे चादर पसरायची.चादरीची एका बाजुची दोन टोके एकाने पकडायची आणि दुसरी दोन टोके दुस-याने पकडून हळुहळु चादर खाली आणून गादीवर अंथरायची.त्यावेळी चादरीत हवा भरुन मोठा फुगा होत असे.मग गादीवर रांगत रांगत चादरीच्या चारही बाजू ताणून ,निगुतीने गादीखाली दुमडून टाकायच्या.एकही सुरकुती तिथे असता कामा नये यावर वडिलांचा कटाक्ष असे.हे सगळं करताना घरातलं लहान मूल वडिलांच्या पाठीवर घोडा घोडा खेळत असे.घोड्यावरुन गादीवर रपेट मारली जात असे.मुलं कोलांट्या उड्या मारत .हा खेळ रोज चाले.म्हणून गादी घालणे हे मुलांनाही काम वाटत नसे तर उलट त्यांच्या मौजेचा भाग वाटे.शेवटी डोक्यापाशी उशा आणि पायापाशी पांघरायची चादर ठेवली की हे काम पूर्ण होत असे.गादीवर अंथरायची ‘बेडशीट ‘च असे अस काही नाही.आईची किंवा आजीची जुनी मऊ नऊवार साडीसुद्धा पांघरायला असे.हे सगळं झालं की वडिलांच्या पाठीवर पाय देणे असा एक कार्यक्रम असे.भिंतीचा आधार घेऊन आम्ही वडिलांच्या पाठीवर पाय देऊन त्यांची पाठ रोज रगडून देत असू.आईच्या वाट्याला कधीच हे कौतुक आले नाही.पण तरी ती मात्र न चुकता रोज झोपायच्या वेळी आमच्या तळपायाला साजूक तूप लावून देत असे, थंडीत पायांच्या भेगा कोकम तेलाने बुजवत असे,उन्हाळ्यात वर्तमानपत्राच्या घडीने झोप येईपर्यंत वारं घालत असे…सगळं निरपेक्ष …शेवटी आई ती आईच.
आपण सर्व ह्या अनुभवाचा आनंद आज ही आठवणीत साठवलेला असेलच !!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ वारकर्याची श्रीमंती… ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆
वारकर्याची काळजी पांडुरंग घेतो असे म्हणतात. खरोखर हे खरे असेल का ? नेमकी वारकर्याची श्रीमंती कोणती ? तर ती असते त्याची पांडुरंगावरची श्रद्धा.
नोकरी निमित्त फिरतीवर असायचो. तेव्हा कंपनीच्या गाडीने महाराष्ट्रात फिरण्याचा योग यायचा.
असाच एकदा सोलापूर -जत मार्गे कोल्हापूरकडे येत होतो. आषाढी एकादशी संपून ५-६ दिवस झालेले होते. वारकरी मंडळी आपापल्या मार्गाने घरी परतत होती. सकाळी सोलापूरहून लवकर निघालो होतो. सांगोला सोडलं होतं. भूक लागलेली होती. बरोबर दोघे assistant होते. त्यांनी सुचवलं एखाद्या ढाबा वजा टपरीवर नाष्टा चहा चांगला मिळेल. ९.३० चा सुमार. मंडळींनी गाडी एका ढाबा वजा टपरी जवळ थांबवली. उतरलो, पाय मोकळे केले आणि नाष्ट्याला काय विचारपूस केली. कांदे पोहे, उसळ पाव आणि चहा काॅफी अशी ऑर्डर दिली. २०-२५ मिनिटे लागणार होती. ऊन खात उभे होतो.
तेव्हढ्यात एक 60 – 65 वयाचं वारकरी जोडपं चालत चालत आमच्याच टपरीपर्यंत आलं. अंगावरचा एकही कपडा धड नाही. बाईंच्या डोक्यावर तुळस आणि खाकेत एक बोचकं. बाबांच्या डोकीवर एक बोचकं नी खांद्यावर एक भली मोठी पिशवी. पायताणं यथा तथाच .बरीच दमलेली वाटत होती. टपरीच्याच बाजूला सारं सामान उतरवून ठेवत जमिनीवरच बसले.
मी आपलं सहज कौतुकाने विचारपूस केली. मंडळी वारी वरूनच परतत होती. मी विचारलं नाष्टा करणार का ? बाबांनी एकदा बाईकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. मी सहज सुचवलं- बाबांनो पोटभर खाऊन घ्या. मला उगीचच वाटलं, चला तेव्हढच पुण्य . मी बाबांना विचारलं,” वाटेत चालता चालता काय करता ?” ते म्हणाले,
“ कधी अभंग तर कधी पाडुरंगाचं नाव घेत जातो. म्हनजे अंतर कसं पार झालं उमगत नाय. “
मी आपली विनंती केली की एखादा अभंग ऐकवाल का ? बाबांनी क्षणाचा विलंब न लावता अभंगाला सुरुवात केली आणि बाईंनी टाळावर साथ दिली. खरंच वेळ कसा गेला समजलंच नाही.
नाष्ट्यावर ताव मारला. त्या वारकरी जोडप्याला आग्रहानी आमच्या बरोबर बसवलं. सहज चौकशी केली की अजून यांना घरी पोहचायला किती दिवस .लागतील ? तर कळले की अजून ४-५ दिवस. निरोप घेण्याची वेळ आली. आम्ही त्यांचे आणि त्यांनी आमचे आभार मानायचे सोपस्कार पार पडल्यावर निघालो.
सहज मनात आले की यांना घरी पोचायला अजून ४-५ दिवस आहेत. त्यांना काहीतरी मदत करूया. वारकरी बाबा आणि बाईंना थांबवलं आणि 100 रुपयांची नोट त्यांना मदत म्हणून पुढे केली. बाबांनी अदबीने मदत नाकारली. मला आश्चर्य वाटले. न राहवून मी विचारले, “ का ?”
बाबांनी उत्तर दिलं –
“वारीला निघताना घरून एक छदाम घेतला नाही. आत्ता या क्षणालाबी खिशात छदाम नाही. पूर्ण वारी तो पांडुरंगच आम्हा जिवांची काळजी घेतो की. त्यापुढे दादा तुमची ही १०० रुपयांची नोट आमच्या काय हो कामाची. “
मी अवाक झालो. क्षणभर काय react व्हावं मला सुधरत नव्हतं. केवळ सुन्न. क्षणात मला माझी लायकी समजली, डोळ्यातून खळ्ळं आसू आले आणि मी त्या माउलीच्या पायावर डोकं ठेवलं.
सुमारे 30 वर्षांनंतर………
आज जवळपास 30 वर्षांनी ही घटना आठवली आणिक सारा क्रम आणि संवादातील शब्द नी शब्द परत ताजे तवाने होउन डोळ्यासमोर फिरू लागले.
त्या वारकरी बाबा आणि बाईंच त्यावेळचं वय आज माझं होतं. आज माझ्याकडे सगळं आहे. घर, गाडी, उर्वरित आयुष्य बर्यापैकी सुखात पार पडेल एव्हडी व्यवस्था. तरीही मला उद्याची निश्चिंती नक्कीच नाही. पण मग त्या वारकरी बाबांना अंगावर धड कपडे नाहीत, धड अंथरूण पांघरूण बरोबर नाही. वेळ पडली तरी खिशात छदाम नाही. असं असून सुद्धा एक emergency साठी म्हणून मी पुढे केलेले १०० रुपये सुद्धा हा भला माणूस अव्हेरतो, आणि प्रचंड आत्मविश्वासानी सांगतो की माझ्या पुढच्या प्रत्येक क्षणाची काळजी तो पांडुरंगच करेल. त्याला आयुष्यात कसलीही पुंजी करून ठेवावं असं नाही वाटलं कारणं त्याने जमवली होती पांडुरंगाच्या श्रद्धेची पुंजी. त्यामुळे त्याला ना उद्याची भ्रांत ना आयुष्याची चिंता.
ती त्याची श्रीमंती पाहिली आणि नजर स्वतः कडे वळली. त्यांनी शाश्वत श्रद्धेची नी भक्तीची पुंजी जमवली आणि मी अशाश्वत पुंजी जमवण्यात धन्यता मानत राहिलो.
— हे परमेश्वरा अजूनही वेळ गेलेली नाही. त्या वारकर्याची श्रद्धा आणि भक्ती मला सुद्धा जमवता यावी अशी बुद्धी मला दे, हीच कळकळीची प्रार्थना तुझ्या चरणी.
संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 2 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
(तर कधी आंबटगोड जायफळ-केशर घातलेलं घट्ट “श्रीखंड” … तर कधी उच्च प्रतीच्या आंब्याचा रस असे…!) इथून पुढे —-
थंडीच्या दिवसात बासुंदी…. उन्हाळ्यात श्रीखंड.. आम्ररस… असे. बदलत्या ऋतूप्रमाणे पदार्थ बदलत असत. त्या गंजाशेजारील वाटीत… मैदा दुधात भिजवून केलेल्या नाजूक “वळवटाच्या खिरीची” वाटी.. त्याच्याबरोबरच हाटून एकजीव केलेली “वरणाची” वाटी असायची.! त्याशेजारी ओल्या नारळाचं सारण घातलेल्या “करंज्या”… मुरडीचे पुरणाचे “कानवले”…. अन राहिलेल्या मोकळ्या जागेत… लाल तिखट- मीठ- ओवा घातलेली खुसखुशीत तिखट चव असणारी “भजी”.. अन त्याच पिठात थोडा चिंचगुळाचा कोळ घालून तळलेली हिरव्यागार पानांची “आळूवडी” …! या सर्व पदार्थांवर टप्पोरी तुळशीची पानं ठेऊन “शुद्ध” केलेला … “महानैवेद्य”.. !
या महाप्रसादानंतर हिरव्यागार पाच पानांचा, चुना- कात- सुपारी- बडीशेप- साखर- वेलदोडा- खोबऱ्याचा खिस- ज्येष्ठमध घालून, त्या पानांची विशिष्टप्रकारे घडी घालून लांबसडक लवंगेने बंद केलेला त्रयोदशगुणी “विडा” मुखशुद्धीसाठी असायचा…! असा पंचपक्वान्नाचा.. “साग्रसंगीत”… गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट, कडू ..या “आयुर्वेद शास्त्रावर” परिपूर्ण अवलंबून असणारा “षडरस”युक्त.. “महानैवेद्य” खाण्याचं परमभाग्य अनेकवेळा वाट्याला आलं…!
हा “महानैवेद्य” खाण्याचा योग पंढरपूरात वास्तव्यास असणाऱ्या अनेकांच्या नशिबी आला… काहींनी याचा आनंद रोज घेतला असेल. हा नैवेद्य खाऊन संपल्यावर ती सर्व प्रासादिक भांडी मीठ- लिंबाने घासून लखलखीत करून त्या रेशमी कापडात गुंडाळून देतानाचा “भाव” एखादी षोडशोपचारे पूजा केल्याच्या तोडीचा होता.
पूर्वी “महानैवेद्य” बडवे- उत्पातांच्या घरी एखादी “माऊली” करायची… आता मंदिराच्या मुदपाकखान्यात हा “नैवेद्य” केला जातो..!
या “महानैवेद्या”च्या प्रसादाबरोबर.. सकाळच्या न्याहरीसाठी ..आंबूस-गोड तसेच लवंग-दालचिनीच्या चवीची हिंग- जिरे- कढीपाल्याची साजूक तुपाची फोडणी घातलेली गरमागरम “कढी” अन… मऊसूत मूगडाळ- तांदळाची…. वरून भरपूर कोथिंबीर- खोबरं… मधोमध साजूक तुपाची वाटी अन वर तुळशीचं पान घातलेल्या “खिचडी”ची चव… अवर्णनीय असायची. त्याचाही कित्येकवेळा लाभ झाला. कधी कधी मधूनच सकाळी ‘रामभाऊ बडवे’ सारख्या एखाद्या “सेवाधारी” मित्राचा फोन यायचा… “मन्द्या… आज “पांडुरंगाचा” दिवस घेतलाय … किटली घेऊन ये… महापूजेचं “पंचामृत” देतो..”… ते अस्सल दूध, दही, तूप, पिठीसाखर, मध, अन वरून तुळशीची पानं घालून केलेलं प्रासादिक ‘पंचामृत’ तांब्याभर प्यायल्यावर २ -४ तास भुकेची जाणीवसुद्धा व्हायची नाही. घरातल्यांनी पोटभर पिऊन राहिलेल्या पंचामृताचे “धपाटे” पुढे दोन दिवस टिकायचे… असा “प्रसाद”.. पोटभर पुरायचा. नुसत्या “महानैवेद्या”च्या ताटावरून कापड बाजूला केलं तरी… पहाटेपासून स्वयंपाकघरात स्वयंपाक केल्यासासारखा “सुवास” घरभर पसरायचा…! “पंचामृताच्या” किटलीचं झाकण उघडलं तरी त्यातील तुळशीच्या घमघमाटानं “गाभाऱ्यात” असल्याचा भास व्हायचा..!
एखाद्यावेळी थंडीच्या दिवसात थंडी बाधू नये म्हणून … “देवाला” दाखवलेला “सुंठ- लवंग- तुळशी”बरोबर अनेक औषधी वनस्पती घालून केलेला आयुर्वेदिक “काढा” घेऊन जायचा आग्रह एखादा मित्र करायचा…! उन्हाळ्याच्या दिवसात आपल्यासारखीच “देवाच्या” अंगाची ‘तलखी’ होऊ नये म्हणून भल्या मोठ्या “सहाणेवर” उगाळलेला “रुक्मिणी- पांडुरंगाच्या” मूर्तीला लेप दिलेला “चंदन उटीचा” चंदनाचा गोळा कागदात गुंडाळून एखादा मित्र द्यायचा. त्या गोळ्यातील एखादा तुकडा काढून पाण्यात कालवून कपाळावर थापल्यावर मिळणारा “थंडावा” बरेच वेळा अनुभवलाय. काही काळ मूर्तीच्या अंगावर थापलेला लेप औषधाइतकाच गुणकारी आहे. बऱ्याच जणांच्या देवघराच्या एखाद्या कोनाड्यात हा पांडुरंग-रुक्मिणीच्या मूर्तीवरील “थंडावा” कागदाच्या पुरचुंडीत गुंडाळून जपून ठेवलेला असेलही…! या सगळ्या गोष्टी आम्ही पंढरपूरकरांनी “महानैवेद्या” इतक्याच “प्रासादिक” मानल्या…!
एवढं वाचल्यावर … एखाद्या निर्जीव दगडाच्या मूर्तीसाठी एवढ्या पक्वान्नांचा सोस कशाला…? असा प्रश्नही एखादा उभा करेल. पण एवढं भरलेलं ताट बघून “किती… अन काय काय खावं..?”… असा प्रश्न न पडता… “काय खावं अन कसं खावं..”… याचं उत्तर मिळालं.
ते भरलेलं “नैवैद्या”चं ताट बघून “डाव्या” बाजूचे आंबट- तुरट- खारट- तिखट- कडवट पदार्थ कमी प्रमाणात खावे… अन “उजव्या” बाजूकडील गोड पदार्थ “डाव्या”पेक्षा थोड्या जास्त प्रमाणात खावे, हे सूत्र या ताटावरून सांगितल्यासारखं वाटतं…!
समाजामध्ये वावरताना “डावं-उजवं” समजण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो…. हे आपलं माझं अडाणी तत्त्वज्ञान…! सांप्रत परिस्थितीत आपल्याला जे शक्य आहे त्याचा “नैवेद्य” दाखवावा या मताचा मी पण आहे. त्यासाठी अट्टाहास करायची गरज नाही. नुसत्या “शर्कराखंडखाद्यानी…” एवढ्या एखाद्या साखरेच्या दाण्यावर… भक्तवत्सल “विदुराच्या” हुलग्यावर… “चोखोबारायांच्या” शिळी भाकरी अन गाडग्यातल्या दह्याच्या दही- भाकरीच्या “काल्यावर” ही प्रसन्न होणारा आमचा “वासुदेव” आहे..! फक्त “नामदेव- चोखोबां”च्या ठायी असलेली आर्तता आपल्या अंगी आणण्याची गरज आहे. तेवढी आर्तता यायला आपल्यासारख्या मर्त्य जीवांना हजारो जन्म घ्यावे लागतील. तोपर्यंत …. ताटातली पोळी श्वानाच्या वेशात असणाऱ्या “भगवंताने” हिसकावून नेली तरी … नुसत्या कोरड्या पोळीने पोट दुखेल म्हणून.. त्याच्यामागं तुपाचं तामलं (एक भांड्याचा प्रकार) घेऊन पळत सुटणाऱ्या “संतश्रेष्ठ नामदेवरायांच्या” इतकी भाबडी सजगता अंगी आली की… एकमेकांच्या “भुकेशी” तरी आपण एकरूप झाल्याचं समाधान लाभेल…!
बाकी आपण दाखवलेला “नैवेद्य” प्रत्यक्ष “भगवंतानं” जेवण्याइतकी आपली “हाक” मोठी नसली तरी… आर्त भावनेने… कधीतरी सणावारी केलेलं साग्रसंगीत “नैवेद्याचं” ताट उचलून देवाच्या तोंडापुढं धरून खाली ठेवताना … वाऱ्याच्या हलक्याशा झुळकेनं म्हणा… किंवा धक्क्यानं म्हणा… देवाच्या डोक्यावर असणारं टप्पकन खाली पडणारं एखादं फुल असू दे.. किंवा.. एखादी ढासळणारी भाताची मूद… अथवा त्या मुदेवरून खाली घरंगळणारं “तुळशीचं पान”… जरी पडलं तरी… “खाल्ला बाबा देवानं नैवेद्य…!” — अशी “देऊळ सताड उघडं” असतानाही… अन “देऊळ बंद” असतानाही आपली भाबडी समजूत करून घेणारा … आधुनिक काळातील पाडगावकरांच्या भाषेत… “भावभोळ्या भक्तीची ही एकतारी…. भावनांचा तू भुकेला रे मुरारी…”.. म्हणणारा… भगवंतापुढं त्याच्या इतकीच गेली “अठ्ठावीस युगं” त्याच्या पायाशी बसणारा….. साधा-भोळा…”पंढरीचा वारकरी” आहे… असा विचार मनात चमकून जातो … अन अंगावर शहारे येतात…!
— समाप्त —
लेखक – श्री मंदार मार्तंड केसकर
पंढरपूर, मो. 9422380146
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 1 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
घरात पहिल्यापासून कोणताही गोडाधोडाचा म्हणा किंवा बिगर कांद्यालसणाचा स्पेशल पदार्थ असो… तो तयार झाला की, एखाद्या वाटीत घालून आज्जी म्हणायची..
“मनू… देवापुढं नैवेद्य ठेव … मग खाऊन चव सांग… कसा झालाय ते..”
तसा प्रत्यक्ष माझ्या तोंडात पहिला पदार्थ गेला असला, तरी…. देवापुढं पहिल्यांदा ठेवल्यामुळं घरातला मी second taster…पहिल्यांदा ‘देवच’…! त्यामुळे…
“पाहे प्रसादाची वाट…द्यावे धावोनिया ताट…
शेष घेउनि जाईन…तुमचें जालिया भोजन…”
—अशी जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणे माझी लहानपणापासून अवस्था…!
“आज्जी… तुझं काहीतरीच असतं बघ.. देव कुठं खात असतो का..?” …. असले ‘डावे’ प्रश्न सुरुवातीला विचारले… पण… माझ्या प्रश्नाला संतश्रेष्ठ नामदेवांच्या लहानपणीची कथा सांगत…… ..
“ प्रत्यक्ष भगवंताला जेवण्याचा हट्ट करून शेवटी कंटाळून “नामदेवराय” भोवळ येऊन पडायला लागल्यावर… मग… पांडुरंग जेवला बघ..” असे म्हणून ……
” ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला…. नैवेद्य जेविला… नामयाचा …।” — या अभंगानंतर, ” उजव्या ” हाताने ठेव बरं…वाटी..” अशा संभाषणाने ” नामदेवरायांच्या ” कथेचा शेवट झाल्यावर मगच ” प्रसाद ” तोंडात पडायचा…!
रोजच्या देवपूजेनंतर दूधसाखरेबरोबर… कधी एखादा रवा-बेसन-लाडू, करंजी … उपवास असेल तर राजगिरा-शेंगदाण्याचा लाडू… खजूर… गूळ-खोबरं.. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून केलेलं ताजं लोणी-साखर.. एखादं केळ.. असं काहीही असायचं.
सणावाराला मात्र पक्वांनांनी भरलेलं ताट ‘नैवेद्याला’ असायचं..! पण प्रत्यक्ष देवळात… ” काय नैवेद्य असेल…?” अशी उत्सुकता बोलून दाखवल्यावर… ” आपण “महानैवेद्य” आणू बरं का.. ” असं म्हणून वडील तसा निरोप द्यायचे.
त्यावेळच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील अनेक “बडवे-उत्पात” मंडळी चांगल्या घरोब्याची… काही जवळच्या नात्यातली असल्यानं ” महानैवेद्य ” घरी आणण्यासाठी जास्त खटाटोप करावा लागला नाही. दोनचार दिवस आधी निरोप दिला तरी ” महानैवेद्य ” घरपोच यायचा.
ज्या दिवशी ” महानैवेद्य ” घरी यायचा, त्यादिवशी स्वयंपाकघरात चहापाण्याशिवाय जास्त काही करायची गरज नसायची… एखादा भाताचा डबा लावला तरी पुष्कळ व्हायचं….! दुपारी “नैवैद्या”चं जेवणार असल्यानं… आई-आजी सकाळी… “दूध, फळं, चिवडा”… अशा कोरड्या पदार्थाशिवाय काही खाऊ द्यायची नाही. “प्रसादिक” अन्न पोटात जायच्या आधी पोटात दुसरं शिळं-पाकं अन्न असू नये हा एक प्रांजळ हेतू… “त्याला काय होतंय…?..” अशी उद्धट बोलण्याची कधी हिंमत झाली नाही.
दुपारी साधारण साडेबारा नंतर…. परातीयेवढ्या मोठ्ठया आकाराच्या लखलखीत चांदीच्या ताटावर लाल रेशमी कापड झाकून… त्यावर चांदीचं पळी-पंचपात्र अन मुखशुद्धीसाठी पानाचा विडा घेऊन… कडक सोवळ्यात “बडवे-उत्पातांच्या” परिवारातील एखादा काका-मामा ‘ते’ वजनदार ताट दोन्ही हातांनी एका खांद्यावर घेऊन..”महानैवेद्य” आणायचा. प्रथम तो “नैवेद्य” घरातील देवासमोरील पाटावर ठेवून घरच्या देवाला .. “नैवेद्यम् समर्पयामि…” म्हणून पळीने पाणी फिरवून दाखवला जायचा. ‘नैवेद्य’ घेऊन येणाऱ्या व्यक्तीस त्याच्या वयाकडे न बघता त्याच्या हाती दक्षिणा देऊन घरच्या सगळ्यांनी नमस्कार करण्याचा “आज्जीचा” शिरस्ता असायचा.
त्या अवाढव्य ताटावरील कापड बाजूला सारून ते भरगच्च ताट बघण्याची उत्सुकता मोठेपणीपर्यंत तशीच कायम राहिली… कारण ते नैवेद्याचं ताट… असायचंच तेवढं… “देखणं”… आणि पाच-सात व्यक्तींना भरपेट पुरेल एवढं “पूर्णब्रह्म”…! ताटाच्या मधोमध मोठ्या चांदीच्या वाडग्यात खचाखच शिग लावून भरलेला उत्तम प्रतीच्या वासाच्या तांदळाचा भात… त्यावर नुसता पांढरा भात नसावा म्हणून शास्त्रासाठी पिवळं धम्मक डावभर वरण…त्या भाताच्या शिगेवर अस्सल लोणकढी तुपाची वाटी खोचलेली…. त्याच्या शेजारी थोड्या छोट्या वाडग्यात तसाच शिग लावलेला केशरी रंगाचा अस्सल तुपातला “साखरभात”… त्यावर मस्तपैकी काजू, बदाम, बेदाणे, लवंग, वेलदोडे अन चार दोन केशराच्या काड्यानी सजावट केलेली…! त्या भाताच्या भांड्याच्या खालच्या बाजूला घसघशीत आकाराच्या पातळ पदर सुटलेल्या… वेलदोडा.. जायफळाच्या सुवासाने मोहित करणाऱ्या पिवळसर रंगाच्या तुपाने माखलेल्या “पुरणपोळ्या”…. तशाच पातळ साध्या “पोळ्या”… त्यावर पुरणाचा गोळा.. त्या गोळ्यावर वरच्यावर पापुद्रा काढता येणाऱ्या… चवीला नकळत मिठाळ लागणाऱ्या, वरून थोडं तूप टाकलेल्या पातळ “पुऱ्या”….! त्याच्या डाव्या बाजूला एका हाताच्या ओंजळीत बसतील एवढ्या आकाराचे तुपात खरपूस भाजलेले… टाळ्याला न चिकटणारे तुपाळलेले दोन “बेसन लाडू”…!
त्या लाडवाशेजारील एका वाटीत दह्यात मीठ- साखर- लालतिखट- दाण्याचं कूट घालून कालवलेली… वरून जिरे-मोहरीची फोडणी दिलेली.. आंबट-गोड-तिखट मिश्र चवींची “शेंगादाण्याची चटणी”… तर दुसऱ्या वाटीत बारीक खिसलेल्या काकडीची… मीठ- साखर- दही घालून कालवलेली आंबट-तुरट चवीची “कोशिंबीर”…! त्याच्या शेजारील अजून एका वाटीत त्या ऋतूत उपलब्ध असेल त्या पद्धतीने कधी पीठ पेरलेली “मेथीची”… अथवा मीठ- मिरची- साखर घालून.. वरून लिंबू पिळुन… बारीक किसलेलं खोबरं-कोथिंबिरीनं सजवलेली “बटाट्याची” सुकी भाजी असे….. त्याच वाटीत वर दोन लिंबाच्या फोडी असत….! ताटाची डावी बाजू झाल्यावर उजव्या बाजूच्या एका तांब्यात हरभऱ्याची डाळ, मेथ्या, शेंगादाणे, खोबऱ्याचे बारीक काप, मिरच्यांचे तुकडे घालून… चिंचगुळाचा कोळ घालून केलेली “आळू-चुक्याची” पातळ भाजी असे…
कधी शेंगदाण्याचं कूट… चिंचगुळ.. हिरव्या मिरच्या.. हिंग- मोहरी- जिरे- कढीपाल्याची फोडणी घातलेलं… चटकदार “मिरच्यांच पंचामृत”…! तर दुसऱ्या तांब्यात… खास पुरण करताना बाजूला काढून ठेवलेल्या कटाची अन थोड्या पुरणाचा गोळा एकत्र केलेल्याची… कढीपाल्याच्या फोडणीची… वरून कोथिंबीर.. खोबऱ्याचा खिस तेलावर तरंगताना दिसणारी चिंचगुळाचा कोळ घातलेली थोडी झणझणीत- आंबट- गोड चवीची “कटाची आमटी”… असायची. ज्या “कटाच्या” आमटीच्या एका ‘भुरक्यात’… तोंडं- घसा- नाक- कान- डोकं … हे सगळे अवयव refresh करायची ताकद आहे, ज्या आमटीच्या “भुरक्यात” … बेसनाचा लाडू अन साखरभाताने तुपाळलेला घसा… पूर्ववत करण्याची किमया आहे… ती कटाची आमटी..! त्या आमटीच्या बाजूलाच कधी एका गंजात (गंज – एक भांड्याचा प्रकार) दुधापासून आटवलेली.. जायफळाची चव खाताना जाणवणारी घट्ट “बासुंदी” असे… तर कधी आंबटगोड जायफळ-केशर घातलेलं घट्ट “श्रीखंड” … तर कधी उच्च प्रतीच्या आंब्याचा रस असे…!
– क्रमशः…
लेखक – श्री मंदार मार्तंड केसकर
पंढरपूर, मो. 9422380146
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सदगुरु ही एकच व्यक्ती नसते, नसावी— बा. भ. बोरकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
सद्गुरू ही एकच व्यक्ती नसते ; नसावी ! गुरु केवळ मानवस्वरुपातच असतो असेही नाही ! सारी सद्गुणी माणसे आपल्यासाठी गुरुवत् असतात . कधी एखादे पुस्तक , एखादे मूल्य , एखादे तत्व , एखादा अनुभव आपल्याला बरेच काही शिकवीत असतो . एखाद्याला गुरुपण दिले तरी ते डोळस असावे ! असा प्रवास करत जाता आपण पोहोचतो विवेकापर्यंत ! म्हणूनच बोरकर आठवतात !
देखणे ते चेहरे
जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे
या मोल नाही फारसे !
तेच डोळे देखणे
जे कोंडिती सार्या नभा
वोळती दुःखे जगाच्या
सांडिती चंद्रप्रभा !
देखणे ते ओठ जे
की ओविती मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने
सत्य होते कोवळे !
देखणे ते हात
ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले
सुंदराचे सोहळे !
देखणी ती पाऊले
जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातून सुध्दा
स्वस्तिपद्मे रेखिती !
देखणे ते स्कंध ज्या ये
सूळ नेता स्वेच्छया
लाभला आदेश प्राणी
निश्चये पाळावया !
देखणी ती जीवने
जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके
शुभ्र पार्यासारखे !
देखणा देहान्त तो
जो सागरी सूर्यास्तसा
अग्निचा पेरून जातो
रात्रगर्भी वारसा !!!
~ बा. भ. बोरकर
संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈