मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ परवा अचानक… कवयित्री : इरावती ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ परवा अचानक… कवयित्री : इरावती ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

परवा अचानक मी मेले

आणि चक्क स्वर्गात गेले 

म्हटलं चला पृथ्वीवरच्या

कटकटीतून सुटले

 

स्वर्गात मला माझे

बरेच आप्त भेटले.

संध्याकाळी विचार केला

जरा फेरफटका मारू

स्वर्गाचा आनंद लुटण्यासाठी

पाय मोकळे करू

 

पहिल्याच वळणावर मला

विंदा आणि बापट भेटले

त्यांना पाहून अवाक् झाले

शब्दच माझे मिटले.

 

मला पाहिल्यावर बापट

छान मिश्कील हसले

विंदा म्हणाले याच्या या

हसण्यावरच सगळे फसले.

 

मी नमस्कार केल्यावर

हळूच म्हणाले विंदा

ज्ञानपीठ पुरस्काराचा म्हणे

क्रायटेरिया बदललाय यंदा.

 

मी म्हटलं मी काय बोलणार

मी तर एक सामान्य वाचक

तुमच्या साहित्य पंढरीतला

एक साधासुधा याचक.

 

पुढच्या वळणावरच्या बाकावर 

गडकरी होते बसले

त्यांच्या शेजारी गप्पा मारताना

बालकवी अन् मर्ढेकर दिसले

 

तशीच गेले पुढे

करीत मजल दरमजल

छोट्याशा पारावर होते

सुरेश भट अन् त्यांची 

भन्नाट गझल!!!

 

पुढे एका कल्पवृक्षाखाली

सावरकर होते बसले

मी नमस्कार करताच

हात उंचावून हसले

 

म्हणाले मला,” कसा आहे

माझा भारत देश?

मला दूर नेणा-या सागराचा

तसाच आहे का अजून उन्मेष?”

 

त्यांच्या बलिदानाची आम्ही

काय ठेवलीय किंमत 

हे त्यांना सांगायची

मला झालीच नाही हिंमत.

 

तशीच पुढे गेले तर

गडबड दिसली सारी

कोणत्यातरी समारंभाची

चालली होती तयारी.

 

कोणी बांधीत होते तोरण

कोणी रचित होते फुलं

स्वागतगीताची तयारी 

करीत होते पु ल.

 

पुढं होऊन नमस्कार केला

म्हटलं, ‘कसली गडबड भाई?

विशेष काय आहे इथे? 

कसली चालल्ये घाई?’

 

पुल म्हणाले उद्या आहे

इथं मोठा सोहळा

त्याच्यासाठी थोडासा

वेळ ठेव मोकळा.

 

डोळे मिचकावून भाई म्हणाले

उद्या आहे शिरवाडकरांचा बर्थ डे

तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे

उद्या आहे मराठी भाषा डे!!

 

असं नाही हं भाई

मी म्हणाले हसून

मराठी दिनाला आम्ही

‘दिन’ च म्हणतो अजून.

 

अरे वा! पुढे येऊन

म्हणाल्या बहिणाबाई

आसं दिवस साजये करून

व्हतंय का काही?

 

एक दिस म-हाटी तुम्ही 

वरीसभर करता काय?

एक दिस पंचपक्वान्न

पन वरीसभर उपाशी

असती तुमची माय!!! 

कवयित्री  : इरावती

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कडी… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

कडी… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

घराची ही साधी कडी. पण काम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे, याची खात्री देणारी ही कडी. खरं तर घराची देखणी नथच मानावी.

ज्या घराला कडीकोयंडेच नाहीत,ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः  स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला ‘मैं हूं ना!’ असं बेलाशक सांगते. कडी नुसती कडी नसते, तर आधारासाठी कायम खडी असते. ती आपल्या सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्री घरात एकटे असू आणि दार नुसतंच लोटलेलं असेल, तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते.

मनाच्याही दरवाजाला अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल, याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो.

मन जर कायम असं सताड उघडं असेल तर….

कोणीही आपल्याला गृहीत धरून   आपल्याशी कसेही व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल, तर मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात, जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. म्हणजे इतरही ठरावीक अंतर ठेवून आणि अदबीने आपल्याशी वागतील.

बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो, वाहवत जातो. आपल्याला पश्चाताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला हवी होती, हे सहज विसरुन जातो.

नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत,घरात, समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते.

कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही, असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे?

आगरकर आणि टिळक यांनी  एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे, शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले. डोळे भरुन एकमेकांना पाहिले. पण बोलले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतिव दुःख झाले. पण काय उपयोग?मित्र कायमचा गेला.

आपणही जरुर कड्या लावा. पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल.

म्हणून ती लावायची कुठे आणि कधी यावर जरुर विचार करा.

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संसारी लोणचं… लेखक : श्री. प्रमोद पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ संसारी लोणचं… लेखक : श्री. प्रमोद पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात,

नंतर कुरकुरत का होईना,

हळूहळू मुरतात.

 

हे लोणचं बाजारात मिळत नाही.

कुटुंबानं मिळून ते घालायचं असतं.

त्याशिवाय जगण्याला

चव येत नाही.

 

कडवट शब्दांची मेथी जरा

जपूनच वापरावी.

स्वत:च्या हातांनी कशाला

लोणच्याची चव घालवावी ?

 

जिभेने तिखटपणा आवरला, तर

बराच फायदा होतो.

लोणच्याचा झणझणीतपणा

त्यानं जरा कमी होतो.

 

‘मी’पणाची मोहरी जास्त झाली,

तर खार कोरडा होतो

इतरांच्या आपुलकीचा रस

त्यात उगाच शोषला जातो.

 

रागाचा उग्र हिंग तसा तितकासा

बाधत नाही.

लवकर शांत झाला तर

लोणच्याची चव बिघडत नाही.

 

प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते.

विकारांच्या बुरशीपासून संरक्षणही करते.

 

समृध्दीचं तेल असलं, की

काळजीचं कारण नसतं.

त्या थराखाली लोणचं बरचसं सुरक्षित असतं.

 

लोणचं न मुरताच नासावं, तसं काही संसारांचं होतं.

सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण बहुधा कमी पडलेलं असतं.

लेखक : श्री.प्रमोद पाटकर

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ होतं असं कधी कधी… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पै ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ होतं असं कधी कधी… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पै ⭐

एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला.

दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत

तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो. तरीही

काहीतरी दुसरेच घेऊन बाहेर पडतो आपण.

परतताना मनात विचार येतो की,

‘तो ड्रेस घ्यायला हवा होता…’

होतं असं कधी कधी.

 

सिग्नलला गाडी थांबते.

चिमुरडी काच ठोठावते.

गोड हसते, पण भीक मागत आहे ,

हे लक्षात घेऊन तिच्या त्या हसण्याकडे

फार लक्ष देत नाही आपण.

२-३ रुपये द्यावे असे मनात येते.

रेंगाळत सुटे शोधता-शोधता

“देऊ का नको, ” हा धावा मनात सुरू असतो.

तेवढ्यात सिग्नल सुटतो.

गाडी पुढे घ्यायची वेळ येते.

थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते,

” सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला.”

होतं असं कधी कधी

 

जेवणाच्या सुट्टीत

ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास

फार विश्वासाने सांगतो,

त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात.

वाईट वाटते खूप.

नशीब आपण त्या परिस्थितीत नाही,

असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो.

‘” काही मदत हवी का ?’” असे विचारायचे असूनही

आपण गप्प राहतो.

जेवणाची सुट्टी संपते.

तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो.

क्षणभर स्वत:चा राग येतो,

मदत  विचारली नाही,

निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात

तरी ठेवायला हवा होता मी!

होतं ना असं कधी कधी?

 

असंच होतं नेहमी,

छोट्या-छोट्या गोष्टी राहून जातात…

खरं तर या छोट्या गोष्टीच

जगण्याचे कारण असतात.

 

गेलेले क्षण परत येत नाहीत.

राहतो तो ” खेद “,

करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा.

 

जगण्याची साधने जमवताना

जगणेच राहून जात नाहीयेना

ते चेक करा.

 

आनंद झाला तर हसा,

वाईट वाटलं,तर डोळ्यांना

बांध घालू नका.”

 

चांगल्या गोष्टीची दाद द्या,

आवडले नाही तर सांगा,

पण घुसमटू नका.

 

त्या-त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा.

नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.

 

आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,

त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात

गुंफणे म्हणजेच जगणे.

 

आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली

तर ” लाईफ ” कसले ?

 

आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले

तर ” लाईफ ” कसले?

 

मित्रांच्या फालतू विनोदांवर

पोट दुखेस्तोवर हसलो नाही

तर ” लाईफ ” कसले ?

 

आनंदात आनंद

आणि

दु:खात दु:ख नाही जाणवले

तर ” लाईफ ” कसले…?

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अपेक्षांच  सेटिग… लेखिका: सुश्री मंजिरी राजेंद्र पाठक ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ अपेक्षांच  सेटिग… लेखिका: सुश्री मंजिरी राजेंद्र पाठक ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

मिताली नुकतीच लग्न होऊन नव्या घरी आली होती. तिच्या सासूबाई फारच प्रेमळ आणि कार्यतत्पर होत्या. कार्यतत्पर याकरता, की त्यांच्या कामाचा उरक वाखाणण्याजोगा होताच शिवाय त्यांच्या म्हणण्यानुसार घरचं पानही हलत नसे त्यांच्याशिवाय..

हळूहळू मिताली नव्या घरी रुळू लागली होती. त्यादिवशी सगळ्यांचं झाल्यावर सासू-सून जेवायला बसल्या. इतक्यात सासऱ्यांचा आवाज आला, अग tv चा रिमोट मिळत नाहीये. तशा सासूबाई पटकन उठल्या आणि त्यांना tv वरच असलेला रिमोट देऊन आल्या आणि सुनेला म्हणाल्या, “माझ्याशिवाय बाई पानच हलत नाही यांचं.”

सकाळी योगा करतानापण मुलाने म्हणजे मितालीच्या नवऱ्याने अशीच हाक मारली, “अग आई,  माझा डबा भरला का, निघायला उशीर होतोय.” तशा पटकन योगा सोडून सासूबाई डबा भरायला गेल्या.

मिताली हे सगळं पहात होती.

एक दिवस सासूबाईंच्या भिशीचा ग्रुप घरी आला. सगळे एक आठवड्याच्या महाबळेश्वर ट्रिपचे ठरवत होते, पण सासूबाई म्हणाल्या, “मी काही येणार नाही, मी आले तर सगळंच कोलमडेल घरातलं.” तशी मिताली म्हणाली, “आई तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं बघेन. मला माहितीये तुम्ही काय काय करता ते.” सासूबाई म्हणाल्या, ” अग, बरंच काही असतं, तुला नाही जमणार.” तशी मिताली म्हणाली  ” आई जमवून दाखवीन. बघाच तुम्ही.” मितालीने दिलेल्या विश्वासावर सासूबाई दोन दिवसात ट्रिपला गेल्या.

मिताली तिचं ऑफिसचं आवरत होती, तेवढ्यात नवऱ्याने आवाज दिला, “अग, माझा रुमाल , पाकीट कुठे आहे? आई नेहमी काढून ठेवते.” तसे मितालीने जागेवरूनच उत्तर दिले, “कपाट उघडलं की समोर जो ड्रॉवर आहे ना, त्यात आहे. रोज तिथेच असतं.उद्यापासून घेत जा हाताने.”

नवऱ्याने जराशा नाराजीनेच रुमाल आणि पाकीट ताब्यात घेतले. तेवढ्यात मितालीचा आवाज आला, “डबा मावशींनी धुवून ठेवलाय. कढईमध्ये भाजी आणि बाजूलाच डब्यात पोळ्या आहेत,त्यापण भरून घे. मी निघते ऑफिसला.” हे सगळं करण्याची सवय नसलेल्या नवऱ्याला हे ऐकून थोडा धक्का बसला; पण स्वतःच घेण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

ती निघत असतानाच सासऱ्यांचा आवाज आला, “अग, पूजेसाठी फुलं नाहीत परडीत.”  तशी मिताली म्हटली, “अहो बाबा, घरचीच बाग आहे की, घ्या तोडून बागेतून. तेवढीच मोकळी हवा मिळेल आणि चालणंही होईल.”

हे ऐकताच सासऱ्यांनी मुलाकडे पाहिले, तसा तो खांदे उडवून निघून गेला.

त्यादिवशी रात्री मिताली जेवायला बसली, आणि नेहमीप्रमाणे सासऱ्यांचा आवाज आलाच रिमोट साठी, मिताली जागेवरून म्हणाली, “समोर tv वरच आहे, बाबा, ” सासऱ्यांनी निमूटपणे उठून रिमोट घेतला.

अशी अनेक छोटी-मोठी कामे मितालीने स्वतः न करता ज्याची त्याला करायला लावली.

आठवडा सरला, सासूबाई आल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जरा उठायला उशीरच झाला. लगबगीने उठून त्या स्वयंपाकघरात आल्या , तर त्यांचा मुलगा डबा भरून घेत होता. आईला पाहताच त्याने विचारले, “आई, कॉफी देऊ का?”

सासूबाईंचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्या बाहेर आल्या, तर सासरे बाहेर बागेत मस्त कानात हेडफोन लावून फुलं तोडत होते, सासूबाईंना कळेना, हे काय चाललंय आपल्या घरात?

इतक्यात मिताली  कॉफीचे दोन मग घेऊन आली, म्हणाली “आई चला, कॉफी घेऊ.” सासूबाई अजूनही आश्चर्यचकीत होत्या, तशी मिताली म्हणाली, “आई, चिल, expectation setting झालं आहे घराचं आणि घरातल्या लोकांचं, आता आरामात दिवस एन्जॉय करा.”

अचानक सासूबाईंनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, “थॅंक्यू,मॅनेजर बाई. That’s what I was trying to achieve for so many years.”

मिताली खुदकन हसली.

लेखिका :सुश्री मंजिरी राजेंद्र पाठक

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पॉश किचन… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ पाॅश किचन…  ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

रिमाने आज किचनमधली सगळी जुनी भांडी काढली. जुने डबे, प्लास्टिकचे डबे,जुन्या वाट्या, पेले, ताटं …सगळं इतकं जुनं झालं होतं.

सगळं तिने एका कोपऱ्यात ठेवलं. आणि नवीन आणलेली भांडी तिने छान मांडली..

छान पॉश वाटत होतं आता किचन…

 

आता जुनं सामान भंगारवाल्याला दिलं की झालं काम.

इतक्यात रिमाची कामवाली सखू आली.

पदर खोचून ती लादी पुसणार इतक्यात तिची नजर कोपऱ्यात गेली.  “बापरे !!  आज घासायला इतकी भांडीकुंडी काढली का ताई ?”…तिचा चेहरा जरा त्रासिक झाला.

रिमा म्हणाली “अग नाही. भंगारवाल्याला द्यायचीत.”

सखूने हे ऐकलं आणि तिचे डोळे एका आशेने चमकले.

“ताई,तुमची हरकत नसेल तर हे एक पातेलं मी घेऊ का?” सखूच्या डोळ्यासमोर तिचं तळ पातळ झालेलं आणि काठाला तडा गेलेलं एकुलतं एक पातेलं सारखं येऊ लागलं.

रीमा म्हणाली, “अग एक का?काय आहे ते सगळं घेऊन जा. तेवढाच माझा पसारा कमी होईल.”

“सगळं!”सखूचे डोळे विस्फारले… तिला जणू अलिबाबाची गुहाच सापडली.

तिने तिचं काम पटापट आटपलं.सगळी पातेली,डबे-डूबे, पेले… सगळं पिशवीत भरलं आणि उत्साहात घरी निघाली.आज जणू तिला चार पाय फुटले होते.

 

घरी येताच अगदी पाणीही न पिता तिने तिचं जुनं तुटकं पातेलं.. वाकडा चमचा… सगळं एका कोपऱ्यात जमा केलं .

आणि नुकताच आणलेला खजिना नीट मांडला. आज तिचा एका खोलीतला किचनचा कोपरा पॉश दिसत होता.

इतक्यात तिची नजर तिच्या जुन्या भांड्यांवर पडली आणि ती स्वतःशी पुटपुटली,”आता जुनं सामान भंगारवाल्याला दिलं, की झालं काम.”

 

इतक्यात दारावर एक भिकारीण पाणी मागत हाताची ओंजळ करून उभी राहिली.

“माय, पाणी दे.”

सखू तिच्या हातावर पाणी ओतणार, इतक्यात सखूला तिचं पातळ झालेलं पातेलं दिसलं. तिने त्यात पाणी ओतून त्या गरीब बाईला दिलं.पाणी पिऊन तृप्त होऊन ती भांडं परत करायला गेली.

सखू म्हणाली,”दे टाकून.”

ती भिकारीण म्हणाली “तुले नको?मग मला घेऊ?”

सखू म्हणाली” घे की आणि हे बाकीचं पण ने,”

असं म्हणत तिने तिचा भंगार त्या बाईच्या झोळीत रिकामा केला.

 

ती भिकारीण सुखावून गेली.

पाणी प्यायला पातेलं… कोणी दिलं तर भात, भाजी, डाळ घ्यायला वेगवेगळी भांडी…आणि वाटलंच चमच्याने खावं तर एक वाकडा चमचा पण होता….

आज तिची फाटकी झोळी पॉश दिसत होती. .!

 

“पॉश” या शब्दाची व्याख्या,

सुख कशात मानायचं, हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं.

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फुलवणारे/सुकवणारे…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “फुलवणारे/सुकवणारे…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५% मिळवून ही २% कमीच पडले, म्हणून रडत बसणारेही बघितले.

जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायासे सुट्टीच आहे, तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.

जिभेच्या कॅन्सरमुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि ‘नको त्या गर्दीत नाटक बिटक, उगीच कशाला आजाराला निमंत्रण?’म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.

‘बाल्कनीतुन किती छान दिसतंय इंद्रधनुष्य!’ म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि ‘कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं’, म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनर ही बघितला आहे

फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमध्ये  तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता, म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंब ही बघितलं आहे.

हे नको खायला- असं होईल, ते नको प्यायला- तसं होईल ह्या टेन्शनमध्ये ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे आणि जातील त्या ठिकाणी, मिळेल ते झणझणीत, चटपटीत  बिनधास्त खाऊनही ‘काही नाही होत यार’, म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.

आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं; पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात

आता त्याला कोण काय करणार?

संकलक:प्रा. माधव सावळे

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रार्थना… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ प्रार्थना… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

प्रार्थना म्हणजे ती नाही,

जी आपण हात जोडून,

गुडघ्यावर बसून देवाकडे काहीतरी

मागण्यासाठी केलेली असते.

 

 सकारात्मक विचार करून,

लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करणं,

ही खरी प्रार्थना!

 

जेव्हा तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी,

अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता,

ती प्रार्थना असते!

 

जेव्हा आपण लोकांना निरोप देताना,

त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो,

ती प्रार्थना असते!

 

जेव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो,

ती प्रार्थना असते!!

 

जेव्हा आपण कोणाला तरी,

मनापासून माफ करतो,

ती प्रार्थना असते!!

 

प्रार्थना म्हणजे कंपनं असतात.

एक भाव असतो.

एक भावना असते.

एक विचार असतो.

प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो,

मैत्री, निखळ नाती, हे सगळं

म्हणजे प्रार्थनाच तर असते…!!

 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझे माझे -तुझे तुझे…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “माझे माझे -तुझे तुझे…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

        माझे   माझे  चे   गाठोडे    

        तुझ्या  चरणाशी  वाहिले

        तुझे      तुझे    म्हणताना

        किती मोकळी  मी  झाले ।।

 

        माझे    माझे    गणगोत

        चिंता    सर्वांची   वाहिली

        तुझे      तुझे    म्हणताना

        गुंतागुंत   ती      सुटली   ।।

 

        माझा   माझा  रे   संसार

        करिता   आयुष्य हे  गेले

        तुझे     तुझे     म्हणताना

        मुक्त    मनोमनी    झाले. ।।

 

        माझी  माझी    मुलेबाळे

        मोह    सुटता      सुटेना

        तुझे     तुझे      म्हणताना

        चिंता    काहीच    वाटेना ।।

 

        माझे   माझे    हे    वैभव

        हाच    ध्यास    जीवनात

        तुझे    तुझे      म्हणताना

        मन     झाले   हे  निवांत  ।।

 

        माझे   माझे   हे   चातुर्य

        करी    सदा   रे    विवाद

        तुझे    तुझे      म्हणताना

        ऐकू    येई      अंतर्नाद    ।।

 

        माझे   माझे    म्हणताना

        मोह   माया  ताप   जाळी

        तुझे    तुझे      म्हणताना

        लागे   ब्रह्मानंदी     टाळी ।।

 

        माझे   माझे    मी    पण

        तुझ्या    चरणी    वाहिले

        तुझे    तुझे      म्हणताना

        तुझ्यातच        विलोपले  ।।

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आमोर फाती (AMOR FATI)… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ आमोर फाती (AMOR FATI)… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहीत नाही. मी आमोर फाती  असा करतोय.

याचा अर्थ आहे नशिबाचा स्वीकार.

आपल्या आयुष्यात घडून गेलेली प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली, तरीही ती तशी घडणे आवश्यक होते. अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्वीकारणे. ती गोष्ट आवडली नाही, तरीही ती स्वीकारणे. अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्वीकारणे.

थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती.

एडिसनने त्याला कसा प्रतिसाद दिला असेल, असे वाटते?

“अरे देवा, काय हे… माझं नशिबच फुटकं… माझी सगळी मेहनत वाया गेली… ” अशी?

की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?

पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला “अरे, तुझ्या आईला आधी बोलाव. तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही”

स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला “आग लागली, हे बरं झालं. माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या.”

आमोर फाती  म्हणजे काय, याच हे उत्तम उदाहरण म्हणता येईल – आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी खऱ्या स्वरूपात आनंदाने स्वीकारणे.

६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

मी या आमोर फाती  कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशीब स्वीकारण्यातली ताकद मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकद आहे, की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही.  प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्वीकारणे हे तुमच्या हातात असते.

  • कदाचित तुमचा जाॅब गेला असेल,
  • कदाचित तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,
  • कदाचित तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीला असाध्य रोग झाला असेल,
  • कदाचित तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणूक दिली असेल,
  • कदाचित आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल, ज्यातून तुमची सुटका नाही.

तुम्ही हे सगळं हसत स्वीकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता, याला आमोर फाती  म्हणतात.

तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्याच, तर तेव्हा तुम्हाला ओके किंवा चांगलं वाटावं, हा या लेखाचा उद्देश नाही. काहीही घडलं तरी तुम्हाला ते ग्रेट वाटावं आणि तुम्ही ते हसत स्वीकारावं हा उद्देश आहे.

जर ते घडलं तर ते घडणारच होतं आणि त्यातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्यावा, हा उद्देश आहे.

एखादी आपत्ती आली असताना शांत रहाणं, हे अनैसर्गिक वाटतं. पण तेव्हा शांत रहा.

जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल, तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नवीन उर्जा देणारं ठरेल.

बस आता, झालं तेवढं खुप झालं, असं वाटेल, तेव्हा ते शांत रहाणं नवं इंधन देणार ठरेल.

सगळं विपरीत घडत असताना ते शांत रहाणं  थिंक बिग सांगणारं ठरेल.

हताशा आली असताना ते शांत रहाणं, तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरेल.

 

आमोर फाती  हा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वीरीत्या मात करण्याचा पहिला टप्पा आहे.

कुणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा, आपल्यासाठी कुणी किती केलं हे लक्षात ठेवलं की जगणं अगदी सोप्पं होतं.

 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares