मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?इंद्रधनुष्य? 

☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(श्री. विश्वास पाटील यांच्या “ पानिपत “ या गाजलेल्या कादंबरीचा परामर्श ) 

खूप वर्षांपासूनची  पानिपत वाचण्याची इच्छा पूर्ण झाली.  पण  वाचून झाल्यावर मनात एक हुरहूर,  एक विव्हळ वेदना अंतर्यामी भरून राहिली. डोळे नकळत पाणावले. पानिपतचा रणसंग्राम,मनुष्यहानी आणि निसटता पराभव पाहून मन हळहळते,व्याकूळ होते आपण स्वतःस माफ करू शकत नाही.

‘मराठ्यांचे पानिपत झालं, विश्वास पानिपत मध्ये गेला”– किती सहजपणे म्हणतो आपण. पण दिल्लीचे तख्त सांभाळायला आणि मराठ्यांचा बिमोड करायला निघालेल्या अब्दाली-नजीबशी कडवी झुंज देऊन उपाशी अनुशी माती, झाडपाला खाऊन, निसर्गाच्या प्रतिकूलतेला टक्कर देत उघड्या मैदानातल्या बोचऱ्या थंडीत कुडकुडत, कुठल्याही क्षणी गिलच्यांचा -वैऱ्याचा हल्ला चढेल ही धाकधूक मनात ठेवून पानिपतच्या समरात जिंकू किंवा मरू म्हणत तळहातावर शीर घेऊन प्राणपणे लढणे आणि अस्मिता, स्वाभिमान जिवंत ठेवून भर उन्हात, आगीच्या लोळात प्राणपणे चिवट झुंज देणे म्हणजे खायचं  किंवा तोंडाच्या वाफा दवडण्याइतकं सोपं नाही! केवळ सेनापतीवरील आणि तेही अगदी वसंतातल्या कोवळ्या पानासारखे वय असलेल्या हळव्या पण कणखर मनाच्या भाऊंच्या, ज्यांचे वय फक्त सत्तावीस-अठ्ठावीस (आणि विश्वासरावांचे तर अवघे सतरा-अठराचे ज्या वयात सामान्यजन डोळे मन स्वप्नात रंगतात आणि  पहातात आणि त्याच धुंदीत जगतात!) विश्वासाखातर,प्रेमाखातर. मातीच्या,धर्माच्या,मायमराठीच्या अब्रूच्या रक्षणासाठी संकटाला समर्थपणे तोंड द्यायला शरीर आणि मनही तितक्याच चिवट,कडव्या वेगळ्या मातीचे बनलेले असावे लागते.

सैन्य पोटावर चालते हे खरे असले तरीपण आपल्याला एक दिवस उपवास घडला तर जीवाची घालमेल होते, तिथं महिनोंमहिने कधी अर्धपोटी तर कधी उपाशी अन्न पाण्याविना परक्या मुलुखात कोणत्या जाणिवेने तग धरला असेल ? माती खाऊन,पाणी भरून पोटातली आग शमवत कोणत्या ध्येयाने आणि धैर्याने तग धरून राहिले असतील ? उजाड झालेल्या कोणत्या झाडांचा पाला लाखो सैनिकांची भूक भागवत असेल ? आपल्या मातीपासून ,आपल्या मुलखापासून कोसो दूर रहात, तिकडील न काही हालहवाल न काही खबरबात जाणून घेता ,’ भविष्यात आपलं काय होईल?’ याची तमा न बाळगता शत्रूशी दोन हात करायला थांबलेल्या त्या शूर,बाजींद, कडव्या लढवैय्यांच्या कौतुकास शब्द तोकडे आहेत.इथं फक्त त्यांच्या जिगरीला, शौर्याला,संयमाला,अफाट -अमर्याद इच्छाशक्तीला सलाम करणे इतकेच आपल्या हाती आहे;कारण तोफांचे धमधमे बांधण्यापासून तोफगोळे उडवतानाचा जो त्रास आहे तो मेणाच्या किंवा लेच्यापेच्या माणसाला सहन होणे शक्यच नाही.त्यासाठी लोहचणे पचवलेले पोलादी कणखर तन मन हवे.पोटाची भूक माणसाला काहीही करायला लावते-प्रसंगी चोरी,लबाडी, खूनही.मधल्या आधल्या रस्त्याने सैन्य आपल्या घरी परतू शकले असते,बंड करून आम्ही इथून पुढं येणार नाही आपल्या मुलुखात परत जातो म्हणू शकले असते.पण रणांगणातून पळ काढणे किंवा पाठ लावून पळणे हे मर्दाचे,लढवैय्याचे लक्षण नव्हे,आणि भूषण तर नाहीच.अश्याना पळपुटे म्हणून मराठी मातीने हिणवले असते; उलट रणांगणावर मृत्यू येणे हे वीरांचे भूषण आहे म्हणून लाखो जीव आपले प्राण कुर्बान करायला तयार झाले.

‘तुका म्हणे तेथे जातीचे हवे, येऱ्या गबाळ्याचे ते काम नव्हे’ हीच उक्ती इथं चपखल वाटते. वर्षभर तळ ठोकून उपास घडत महिनोंमहिने युद्धाची कोंडी फुटण्याची वाट पहाणारे लाखो लोक दोनच दिवसात मातीत गाडले गेले.महाभयानक न भूतो न भविष्यती नरसंहार ,पशुसंहार , सैनिकांचे आणि पशूंचे देखील हाल पानिपतच्या मातीने प्रथमच पाहिले असावे आणि तिचेही काळीज फाटले असेल, तिच्याही मनाचा थरकाप उडाला असेल. ‘ युद्ध नको मज बुद्ध हवा ‘ असे तीही म्हणली असेल. भौगोलिक परिस्थिती, हवामान, स्थानिक सरदार यापैकी काहीच अनुकूल नसताना फक्त प्रचंड जिद्दीच्या आणि विजयाच्या आशेने धगधगत राहिलेल्या त्या रणकुंडास दुर्दैवाच्या फटकाऱ्याने क्षणार्धात विझवलेच, पण प्रचंड नामुष्की आणि मानहानीही पत्करावी लागली.

क्रमशः……

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मेंदू वापरा, नाहीतर विसरा…भाग 1 ☆ सुश्री मंगला जोगळेकर

?  विविधा  ?

☆ मेंदू वापरा, नाहीतर विसरा…भाग 1 ☆ सुश्री मंगला जोगळेकर ☆

जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला जग कसं अगदी आश्चर्यांनी भरलेलं दिसतं, जगाकडे पाहाण्याची आपली दृष्टी कायमच विस्मयजनक असते.

मेंदू वापरला नाही तर तो गंजतो, हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणूनच  मेंदूला सतत कामाला लावायला हवं. रोजच्या रोज, घरच्या घरी करता येणाऱ्या गोष्टी, कोडी यांनीही ते करता येतं. मेंदूला कृतिशील ठेवण्यासाठी जगभरात विविध ‘वेब पोर्टल्स’तर आहेत याशिवाय ब्रेन एरोबिक्स, ब्रेन जिमही सुरूझालीत. विविध अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पुण्यासह इतरही काही ठिकाणी मेमरी क्लब सुरू करण्यात आले आहेत.

डॉडेव्हिड स्नोडन हे अमेरिकेच्या केन्टकी विद्यापीठात काम करतात. १९८६ पासून ते एका महत्त्वपूर्ण अभ्यासात गुंतले आहेत. हा अभ्यास मिनीसोटा राज्यातील आडवळणाच्या गावात चर्चमध्ये काम करणाऱ्या नन्सचा आहे. यातील बहुतेक नन्स नव्वदीच्या घरात पोहोचल्या आहेत, वा होत्या. त्यांचा अभ्यास करण्याचं कारण तुमच्या लक्षात आलंच असेल; ते म्हणजे त्यांचं असाधारण आयुष्यमान. या सर्वेक्षणाद्वारे आतापर्यंत जवळजवळ ७०० नन्सचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये असं दिसून आलं, की त्यांच्या उत्साही दीर्घायुष्याचं रहस्य त्या मेंदूला देत असलेल्या व्यायामात आहे. त्यांच्या चर्चमध्ये प्रश्नमंजूषा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, इत्यादी कार्यक्रम आय़ोजित केले जातात. आपापले छंद जोपासणं, शब्दकोडी सोडवणं यालाही प्रोत्साहन दिलं जातं. याशिवाय सर्वजणी चर्चमध्ये आपली नेमून दिलेली कामं मोठ्या वयातही करतात.

या अभ्यासासाठी आतापर्यंत शंभराहून जास्त नन्सनी आपले मेंदू दान दिले. त्यांच्या मृत्यूनंतर केलेल्या पाहणीमध्ये त्यांच्या मेंदूच्या पेशींची मुळं (म्हणजे डेंड्राइट आणि अ‍ॅक्झान) आक्रसलेली तर दिसली नाहीतच. परंतु त्यांनी मेंदूच्या आत दळणवळणाचे नवीन मार्ग प्रस्थापित केलेले दिसले. याशिवाय निकामी झालेल्या मार्गांवर त्यांची जागा घेणारे पर्यायी मार्गही तयार झालेले आढळून आले. यावरून मेंदूच्या व्यायामांमुळे, त्याला आव्हान दिल्यामुळे डेंड्राइट्सची चांगली वाढ होते आणि पेशींमधील संदेशवहनाची क्षमता वाढते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर झालेल्या मेंदूच्या पाहणीमध्ये यांपैकी कित्येक नन्सना अल्झायमर्स झालेला होता असं आढळलं. परंतु वर्षानुवर्षं मेंदूला मिळणाऱ्या व्यायामांमुळे रोजच्या जीवनावर स्मृतिभ्रंशाचा कुठलाही दृश्य परिणाम न होता त्या आपलं आयुष्य निश्चिंतपणे जग़ू शकल्या. ही खूपच मोठी आश्चर्याची बाब आहे. या निरीक्षणाचे तरंग जगभर उमटले. त्याची चर्चा सुरू झाली.

ज्यांना शिक्षणाची आवड आहे, जे पदवीधर आहेत, जे बुद्धीला खाद्य देणाऱ्या गोष्टींमध्ये रस घेतात, वाचन, लेखन, आवडीच्या विषयांवर चर्चा, माहितीपूर्ण कार्यक्रम बघणं, नवीन भाषा शिकणं इत्यादी तऱ्हेतऱ्हेच्या प्रकारांनी ‘मेंदूचा जागर’ घडवून आणतात, त्यांच्यामध्ये ‘डिमेंशिया’ होण्याची शक्यता थोडीफार कमी होते.  न्यूयॉर्कमध्ये पंचाहत्तर वर्षांपेक्षा वयानं अधिक असलेल्या लोकांच्या अभ्यासातून असं दिसलं, की जी मंडळी बुद्धिबळ, सोंगट्यांसारखे खेळ नियमितपणे- म्हणजे आठवड्यातून चार वेळा तरी खेळतात, विविध प्रकारांनी मेंदूला जागृत ठेवतात, त्यांच्यात डिमेंशिया होण्याची शक्यता कमी होते. चीनमधल्या अभ्यासातूनही असं दिसून आलं, की जी मंडळी मोठ्या वयातही आव्हानात्मक गोष्टी करणं चालू ठेवतात त्यांच्या बुद्धीची झीज कमी प्रमाणात होते.

जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला जग कसं अगदी आश्चर्यांनी भरलेलं दिसतं, जगाकडे पाहाण्याची आपली दृष्टी कायमच विस्मयजनक असते. रोजच्या रोज नवीन आव्हानं आपल्या मेंदूला ताजंतवानं ठेवतात. नित्य नवीन शिकल्यामुळे मेंदू कृतीशील राहातो. त्यातील बदलांकडे बघून शास्त्रज्ञांना पेशींच्या नवनिर्मितीचा दाखला मिळत जातो. औत्स्युक्य टिकवल्यामुळे वयानुसार होणारी झीज घडत असतानादेखील, आपली ताकद राखून ठेवण्याचा मेंदू प्रयत्न करतो. परंतु असंही दिसतं, की मेंदूला अनाठायी आराम दिल्यामुळे, निवृत्तीनंतर येणाऱ्या सुस्तीमुळे, जीवनात रस घेणं थांबवल्यामुळेही मेंदू विसावतो. आपला स्वभावधर्म सोडून, स्मरण ठेवण्याचं आपल्याला नेमून दिलेलं काम करण्यात तो कुचराई करायला लागतो. त्याचाच परिणाम म्हणून आपलं विस्मरण वाढतं. विस्मरणाऐवजी स्मरणाची गाडी द्रुतगतीच्या मार्गानं वळवण्यासाठी ‘आराम हराम हैं’ हा मंत्र लक्षात ठेवा. मेंदूला वापरायला शिका. ‘मला काम द्या, मी कामाचा भुकेला आहे,’ असं सांगणारं मेंदूशिवाय दुसरं कोणी या जगात भेटणार नाही, याबद्दल सर्वांचं एकमत व्हावं! या वृत्तीमुळे मेंदूच्या कक्षा आपण कितीही रुंदावू शकतो.

‘ड्युक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर’मधील प्रोफेसर डॉ. लॉरेन्स कॅट्झ यांनी नावीन्यातून मेंदूला जागवा, असा संदेश दिला. आपण ज्या गोष्टी एरवी करतो त्या करण्याऐवजी त्यामध्ये वेगळेपण ठेवा, ही कल्पना त्यांनी मांडली. नावीन्याच्या या अनुभवाला ‘न्युरोबिक्स’ असं समर्पक नाव त्यांनी दिलं आहे. न्युरोबिक्सच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीत पाचही ज्ञानेंद्रियं आणि त्याबरोबर आपलं मन, भावना अनोख्या मार्गानं वापरल्या जातात. अशा रीतीनं ज्ञानेंद्रियांना एक प्रफुल्लित अनुभव देणं म्हणजे न्युरोबिक्स.

फ्रान्समधील मोनिक ल पॉन्सिन यांनी असं स्पष्ट के लं आहे, की मेंदूचे व्यायाम अवघड, अनाकलनीय असण्याची काही आवश्यकता नाही. सोपे, आनंददायी व्यायाम केल्यानंसुद्धा फायदा होऊ शकतो. ‘हे व्यायाम करण्यासाठी वेळ नाही असंही कारण पुढे करू नका,’ असं त्या सांगतात. कारण प्रवास करताना, जेवणाच्या सुट्टीमध्ये, स्वयंपाक करताना, इतर काही बारीकसारीककाम करतानाही असे व्यायाम करता येऊ शकतात.

क्रमशः….

© सुश्री मंगला जोगळेकर

 ≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देव-बीव सगळं झूठ आहे ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ वाचताना वेचलेले ☆

☆ देव-बीव सगळं झूठ आहे ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

“देव-बीव सगळं झूठ आहे..थोतांड आहे..’मेडिकल सायन्स’ हाच खरा परमेश्वर आहे..गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्स मुळे जेवढे प्राण वाचले असतील,तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत..मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे ‘ऑपरेशन थेटर ‘ च्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात..”

डॉक्टर कामेरकरांच्या या वाक्यावर, सभागृहात एकच हशा उठला..डॉक्टर कामेरकर एका ‘मेडिकल कॉन्फरन्स’ मध्ये बोलत होते..डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर..त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत..कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले..वाटेतच त्यांच्या ‘मिसेस’ चा मेसेज होता कि “मी आज किटी-पार्टीला जात आहे.मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत..जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय..घरी गेलात की जेवा”…

डॉक्टर घरी आले..हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले..जेवण आटोपल्यावर लक्षात आलं,कि बरंचसं जेवण उरलंय..आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं..म्हणून उरलं-सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधलं आणि कुणातरी भुकेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले..

लिफ्ट मध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं..”देव-बिव सगळं झूट आहे” -हे वाक्य त्यांच्याच भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं..डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक..देव अशी कुठलीही गोष्ट,व्यक्ती,शक्ती जगात नाही यावर ठाम..जगात एकच सत्य..’मेडिकल सायन्स’..बाकी सब झूट है’..

डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले..जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं..ते त्या दिशेने चालू लागले..जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि एक मध्यम वयाची बाई,आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे.ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं..ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती..डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली..आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई,तिच्या मुलाला म्हणाली 

“बघ बाळा..तुला सांगितलं होतं ना..आज आपल्याला जेवाया मिळेल..देवावर विश्वास ठेव..हे बघ..देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलंय”……

हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळ-पायाची आग मस्तकात गेली..ते त्या बाईवर कडाडले, “ओह शट-अप..देव वगैरे सगळं खोटं आहे..हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय..देव नाही..हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो..पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय..काय देव देव लावलंयस..नॉन-सेन्स..”

“साहेब..हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलंत यासाठी मी तुमची आभारी आहे..पण साहेब..देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो..माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस,हा देवच आहे..आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधाया जातो एवढंच..माझ्यासाठी तुम्ही ‘ देव ‘च आहात साहेब..आज माझ्या लेकराचं तुम्ही पोट भरलंत..तुमचं सगळं चांगलं होईल…हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला..”

डॉक्टर कामेरकर, त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले..एक रोगट-भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती..आणि ते याच विचारात दंग झाले कि ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ? 

चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो…चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे..चांगल्या माणसात देव आहे..प्रत्येक ‘सत्कृत्यात’ देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही?

आपण ‘देवावर विश्वास’ ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ?तर आपल्याला चांगली माणसं भेटतील,चांगली परिस्थिती निर्माण होईल यावरच तो विश्वास असतो…

डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं..आपल्या भुकेल्या लेकराला ती माऊली भरवत होती..त्यांच्या चेह-यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..

एक कणखर डॉक्टर त्या दोन अश्रूंत विरघळला होता…

डोळे मिटून,ओघळत्या अश्रूंनी,डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते…..!!

 

प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्नाची दुनिया ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ स्वप्नाची दुनिया ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

माझ्या व्यवसायात,मला इतके विविध अनुभव येत असतात, नाना प्रकारची  माणसेही भेटतात.

माझे आयुष्य अगदी समृद्ध केलेय ,या अनुभवांनी. कसे जगावे,संकटातही कसे आनंदी राहावे,

हे या निम्न स्तरातील बायकांकडून मी शिकले. 

 माझ्या कडे आया म्हणून  काम करणारी शकू—

फार आनंदी,उत्साही. सतत नवीन शिकायची हौस, आणि  गप्पा मारण्याची तर प्रचंड हौस.

शकू धडपडीही होती. एकदा,तिच्या वस्तीतली एक बाई,कशी कोण जाणे  दुबईला,घरकामासाठी नेली कोणीतरी–झाले–शकू च्या डोक्यातही तेच—

” बाई, दुबईला जायला काय लागते हो करायला ? मी पण जाते की.लै पैसा भेटतो म्हणे.

चार वर्ष गेले, तर जन्माचे कल्याण होते. शेजारची रेखा गेलीय बघा. माजी बी लै विच्छा हाये.

इथे किती राबा, काय चव न्हया बघा. पुरतच नाही पैसा.” 

रोज रोज शकू हेच बोलायची. आमच्या इतर स्टाफचा, चेष्टेचा विषय झाली होती शकू.

रोज विचारायच्या तिला बाकीच्या आया–

” काय शकू,झाली का तयारी दुबईची ?’

मी रागवायची त्यांना–” नका ग असं बोलू. जाऊ दे ना मिळाली संधी तर. ” 

 एक दिवस नवऱ्याला घेऊन आली. तो उर्मटपणे म्हणाला, ” बाई,आत्तापर्यंत झालेला पगार द्या शकीचा–ब्यांकेत टाकत होतात तो–तिचा पासपोर्ट करतोय मी.”

मी हादरलेच हे ऐकून—” अहो, कोण नेणारे तिला? सगळी नीट चौकशी केलीत का.”

” हा.केलीय. आमचा गाववाला हाये. समदं करतोय तो. वीस हजार द्यायचे की तो दुबईला जाब लावून देणारे.” —-मी कपाळाला हात लावला. ” अहो,असे नसते, नीट करा चौकशी.”

” बाई, तेवढे पैशे द्या. मी बघीन बाकीचे.”

दुसऱ्या दिवशी शकू सगळे पैसे घेऊन गेली. आम्ही सगळे हळहळलो. तो उर्मट माणूस डोक्यात गेला आमच्या. दरम्यान,शकूने केव्हाच काम सोडले. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. खूप वर्षे झाली ,मीही अनेक गोष्टीत गढून गेले होते.

मध्ये एकदा मंडईत गेले होते. एकदम हाक ऐकू आली—” बाई –बाई, अहो डॉक्टरबाई ” 

मी चमकून बघितले. कैरीच्या मोठ्या ढिगाजवळ बसलेली बाई मला हाका मारत होती–

” बाई,ओळखलं नाही न्हवं. “

” मी शकू नाही का.” 

” अरे हो की–शकू,तू इथे काय करते आहेस? दुबईला ना गेली होतीस? “

“कर्म माझं व.कसली दुबई. या मेल्याने सगळे पैसे खाल्ले.”

मी बघितले, शेजारीच,शकुचा नवरा मान खाली घालून बसला होता. सगळी  गुर्मी उतरलेली दिसत होती. गप गरिबा सारखा बसला होता.

शकू म्हणाली, ” तुम्ही सांगत होतात, तेच खरे होतं हो बाई. कोणी पासपोर्ट नाही केला,न काय न्हाय. पण मग एका  बाईबरोबर मला मुंबईचे काम आले.–घरकाम–ती बाई10 हजार पगार देणार होती राहून. तिची जुळी मुले सांभाळायची. सगळे सगळे काम,करायचे. माझा पिट्ट्या पडायचा हो कामाने. पण बाई चांगल्या होत्या. माझे सगळे पैसे त्या बँकेत टाकायच्या.

मी महिन्यातून  एकदा पुण्याला येऊन भेटून जायची. सासूने बघितले हो लेकरांकडे. या मेल्याला  दिले होते घरातून हाकलून तीन वेळा, मग सुतासारखा सरळ आला बघा. दारू सोडवली मी केंद्रात नेऊन. बाई,चार वर्षे लै राबले बघा. मग इकडे परत आले. त्या 

माऊलीने माझे ४ लाख साठवून दिले बघा. इथे आले,तर शेजारीण घर विकतेय समजले.

मी तिला रोख पैसे देऊन घर घेतले. या बाबाला गाळा घेऊन दिला बघा. आता मस्त जातोय पहाटे ४ ला उठून.” 

 शकुचा नवरा म्हणाला, ” बाईंना घरी नेशील,का न्ह्याय–का नुसतीच माजी गाऱ्हाणी गाशील. 

चा पाज त्यांना.” 

माझ्या हाताला  धरून शकू म्हणाली, ” चला चला,गरीबाच घर बघा चला.” 

जवळच होते शकुचे घर. मला इतके आश्चर्य वाटले, चांगला 3 खोल्यांचा फ्लॅटच  होता की तो.

शकूने घर सुंदरच ठेवले होते. म्हणाली आधी 2 खोल्या घेतल्या, मग या दोन पण घेतल्या.” 

शकुचा मुलगा अभ्यास करत होता. म्हणाला,” बाई,पोलीसात जाणार मी.” दुसरा मुलगा कॉलेज करत होता. शकू  म्हणाली,” लै मस्त चाललंय आमचं. आता बघितला ना,मालक कसा नीट वागतोय ते. आणला वठणीवर बघा.” 

–आम्ही दोघीही हसायला लागलो. तिच्या गाळ्याजवळच माझी गाडी मी लावली होती.

शकूने, मी नकोनको म्हणत असताना,पिशवी भरून कैऱ्या गाडीत ठेवल्या–

” बाई,येत जा.  गरीबांनी, स्वप्ने बघूच नयेत का हो? काय चुकले,मी दुबईची स्वप्ने बघितली त्यात– मला हे  दरिद्री जिणे नको होते हो. आणि  दुबई नाही, पण मुंबई तर भेटली.

मिळाले भरपूर पैसे. राबलेही खूप हो बाई चोवीस तास.”  शकूच्या डोळ्यात पाणी आले.

मी म्हटले,” शकू,आहेस खरी ग बाई जिद्दीची.किती सुंदर मांडला आहेस संसार.”

मी purse मध्ये होत्या , त्या सगळ्या नोटा तिच्या हाती ठेवल्या.तिचा नवरा ही गाडी जवळ आला—-

” बाई,मी खूप चुकलो,पण शकूने  मला साथ दिली. आज हे दिवस तिच्या मुळे दिसत आहेत. ” .

दोघांनी मला हसून निरोप दिला.

—–समाजात अशा अनेक शकू आहेत, की त्यांच्या जिद्दीला आपण सलाम करायला हवा 

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रंग जीवनाचे…..☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ रंग जीवनाचे ….⛱ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

जन्मतः च बाळाला रंग ओळखता येत नाहीत पण हळू हळू कळू लागतात… म्हणजे भडक काही दिसले की ते तिकडेच पहाते म्हणून मग पाळण्याच्या चिमण्या रंगीत… जरा मोठे झाले की मग येतो सोबतीला चेंडू, प्लास्टिक पोपट,वेगवेगळी खेळणी वेगवेगळे रंग घेऊन !  लाल, हिरवा, निळा  तिकडे मग बाळ आकर्षित होते अन खेळण्यात हरवते.

अशा रीतीने रंग जीवनात हळू हळू डोकावू लागतात.शाळेत जाऊ लागले की होते मग रंगांची ओळख अन मग रंगीत कपडे, खेळणी, बांगड्या, मेंदी, रांगोळी रंग भरत जातात जीवनात !  कळत्या वयात एकच कुठला तरी रंग आवडतो अन त्याच रंगांच्या सोबतीने मनुष्य चालत रहातो..

खरेच देवाने रंगांची ही दुनिया दिलीच नसती तर ? माणसाचे जीवन निरस बेरंग असते !  उगवतीला अन तिन्ही सांजेला क्षितिजावर सूर्याने उधळलेले लाल पिवळे, केशरी रंग… फुलांचे, पानांचे रंग, पक्ष्यांचे रंग, काजव्याचे… कीटकांचे रंग.. किती रंग असतात अवतीभोवती !

आकाशाचा… ढगांचा… झाडांचा… रंग पांघरता यायला हवा, घेता आणि जगताही यायला हवा अन नकोसे रंग टाकताही यायला हवेत चटकन नाहीतर मग बेरंग होतो जीवनाचा !

समोरच्याचा राग रंग ओळखता यायला हवा.. अन्यथा आपला रंग बिघडतो ! असे असले तरी फरुडासारखे रंगही बदलणे नकोच कारण मग तुमचा रंग नक्की कोणता ? कळणे मुश्किल होईल अन विश्वासही उडेल तुमच्यावरचा !

सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा अन आवडीचा रंग प्रेमाचा ! हा रंग एकच पण तो जीवन रंगीबेरंगी करतो ! सप्तरंगी इंद्रधनू छेडतो. प्रीतीचा हा गुलाबी रंग ज्याच्या आयुष्यास    लाभला त्याचे जीवन विविधरंगानी बहरते,ताजेतवाने होते,सदाबहार ठेवते जीवनाला अन वयालाही !

रागाचा रंग लाल अन शांतीचा पांढरा, दुःखाचा काळा, रात्रही काळी अन निसर्ग हिरवा !

जीवनातला  महत्त्वाचा गडद न पुसणारा रंग अध्यात्माचा… जीवन सन्मार्गावर नेणारा… शांत संयमित जगायला शिकवणारा तो भक्तीचा रंग…

विठूच्या भाळी सजणारा तो अबिराचा काळा, विठ्ठलही काळा अन माणसाचे पोट भरणारा मातीचा रंगही काळा !  सर्वच रंग जीवनात तितकेच महत्वाचे..

रंगांची ही विविधरंगी दुनिया मानवाचे जीवन रंगीत करते हेच खरे !

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना यम सदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजूक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे। 

दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजूक्ता जर कधी आपल्या समोरून गेली तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही। एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेहि आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं। त्यामुळे संजूक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरहि लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात। 

आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून नंतर दिल्लीच्या जेएनयु मधून डिग्री घेणारी संजूक्ता 2006 मध्ये आयपीएस देशात 85 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। युएस फॉरेन पॉलिसी विषयात तीने पीएचडी केल्यामुळे ती डॉक्टर संजूक्ता पराशर म्हणून ओळखली जाते। तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी। त्यांना 6 वर्षाचा मुलगा आहे। संजूक्ताची आई त्याला सांभाळते। 

संजूक्ताची पोस्टिंग 2014 मध्ये आसाम मधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ  पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली। बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता। शेकडो लोकांचे बळी गेले होते। आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण। हातात एके 47 घेऊन संजूक्ता सीआरपीएफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची तेव्हा जवानानाही दहा हत्तीचं बळ मिळायचं। अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरिकेही संजूक्ताच्या नावाने कापू लागले होते। तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या। परंतु शिर तळ हातावर घेऊन फिरणाऱ्या संजूक्तावर कसलाच परिणाम झाला नाही। तब्बल 16 अतिरेकी मारले गेले आणि 64 अटक झाले, तेही तिच्या अवघ्या 18 महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये। 

आज संजूक्ता पराशर दिल्ली मध्ये कार्यरत आहे। देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे। अशा ह्या खऱ्या खुऱ्या रणरागिणीच्या अफाट कर्तुत्वाला आपण सर्वानीच मानाचा मुजरा करायला हवा। सलाम करायला हवा!

#I_Salute_Sanjukta_Parashar

(सुवर्णमेघ या फेसबुकपेज वरुन साभार)

 

संग्राहक : सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनाचे संतुलन…. ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ मनाचे संतुलन…. ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

-अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत भाषण करण्यासाठी गेले. सर्व सिनेट सदस्यांनी भरलेल्या सभागृहात त्यांना आपलं अध्यक्ष म्हणून पहिलं भाषण करायचं होतं. त्या भरलेल्या सभागृहात लिंकन पोहोचले आणि भाषण सुरु करण्यापूर्वी एक जेष्ठ सदस्य, जे अत्यंत श्रीमंत उद्योगपती होते, ते उठून उभे राहिले आणि लिंकनना उद्देशून म्हणाले, ” मि. लिंकन, तुम्ही हे विसरू नका की तुमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बूट बनवत होते.”

सगळे उपस्थित जोरात हसले आणि त्यांना वाटलं की याने लिंकन यांना एक जोरदार चपराक लावली आहे, आणि त्यांची लायकी दाखवली आहे.

मात्र काही व्यक्ती कशाच्या बनलेल्या असतात कोणास ठाऊक? ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाहीत आणि आपल्या हजरजबाबी विद्वत्तेने समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करून आपला मोठेपणा सिद्ध करतात, तेही अगदी शांतपणे—– लिंकन ही असेच !!

—-सभागृह काय होणार याकडे जिवाचा कान आणि डोळ्यात जीव आणून पहात होतं.

प्रेसिडेंट लिंकन यांनी सरळ सरळ त्या व्यक्तीवर नजर रोखून धरली , आणि त्याला म्हणाले,

“सर, मला माहित आहे हे, की माझे वडील आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी बूट बनवत होते.  तसेच इथे अनेक इतरही सदस्य आहेत की ज्यांच्या कुटुंबासाठी माझे वडील बूट बनवत होते, कारण त्यांच्यासारखी पादत्राणे इतर कोणीच बनवू शकत नव्हतं.”

—“ते एक कलाकार होते, ते एक निर्माते होते, त्यांच्या हातात जादू आणि कला होती.  त्यांनी बनवलेल्या चप्पल-बूट फक्त ह्या फक्त चपला आणि बूट नव्हते, आपलं संपूर्ण मन आणि कसब  त्यात ओतून अत्यंत काळजीपूर्वक हे काम ते करत होते. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, तुम्हाला या पादत्राणाविषयी काही तक्रार आहे काय? कारण हे कसब मलाही अवगत आहे की हे बूट कसे बनवायचे. आपली काही तक्रार असेल तर नक्की सांगा.  मी आपल्याला एक नवीन बुटांचा जोड बनवून देईन– पण माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत माझ्या पिताजींनी बनवलेल्या बुटांविषयी अजून तरी कोणाची काहीच तक्रार आलेली नाही. ते एक अत्यंत हुशार आणि मनस्वी कलाकार आणि कारागीर होते आणि माझ्या वडिलांचा मला आजही सार्थ अभिमान आहे !!!”

—-सर्व सभागृह बधिर झालं होतं, कोणाला काय बोलावं हे सुचत नव्हतं. अब्राहम लिंकन ही काय व्यक्ती आहे याची एक छोटीशी झलक आणि चुणूक या प्रसंगातून सगळ्यांना दिसली होती आणि त्यांना त्यांच्या वडिलांचा अभिमान असल्याचा आता त्यांनाही अभिमान वाटू लागला होता.

यातून एकच गोष्ट लक्षात घ्या, प्रसंग कसाही असो, आपला तोल जावू देवू नका.

कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या. 

 ” आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही ” –हे वाक्य मनावर कोरून ठेवा.

आणि— कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मन:शांती ढळू देवू नका.

“काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो— तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते..!!

चला खंबीर मनाने प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी सज्ज होऊया… # Calm # मनशांती

 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळीची सांगता… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ दिवाळीची सांगता… ☆ सौ राधिका भांडारकर  

चार दिवसांची दिवाळी.धामधूमीत आली आणि गेलीही.

खप्पून ,पूर्वतयारी करून केलेले फराळाचे भरले डबे तळाशी गेले.रांगोळीतले रंग भुरकटले .तेलवातीत भिजलेल्या पणत्या गोळा करून ठेवल्या. काही दिवसांनी आकाश कंदीलही उतरवले जातील.ईलेक्ट्रीकच्या माळा गुंडाळून पुढच्या दिवाळीपर्यंत नीटनेटक्या कपाटात ठेवल्या गेल्या.

अंगणातला फटाक्यांचा ,धूम्मस वास असलेला कचराही गोळा करुन झाला..

गॅलरीतल्या एका टाईलवर सारवलेला गेरु मात्र होता.

कसा रिकामा ,रंगहीन दिसत होता.सकाळी झाडपूस करणारी बाई मला विचारत होती,”अव ताई पुसु का आता हे तांबड..?लई वंगाळ दिसतय्…”

मी म्हटलं,”पुस बाई..झाली आता दिवाळी….”

करोना,सुरक्षित अंतर,भयभीत मने या सगळ्या पार्श्वभूमीवरही प्रत्येकाने आपापली दिवाळी साजरी केलीच.अंधारावर मात करणारा प्रकाशाचाच सण …

धाग्यांच्या गुंतागुंतीत एखादा कलाबुतीचा तार कसा चमकून जातो ना …तशीच या दिवाळीनं चमक आणली…

चार दिवसांचे चार सोहळे..गायीला घास भरवला,धनाची पूजा केली,लक्ष्मीलाही पूजलं,रूपकात्मक नरकासुराचाही वध केला,ईडा पीडा टळो,बळीचं राज येवो,असा गजर केला,सहजीवनाची आनंद औक्षणे केली, आनलाईन भाऊबीजही साजरी केली..तेल ऊटणे सुगंधी साबणांनी स्नानं ऊरकली… रांगोळ्यांनी दार सजले.

फुलांच्या तोरणांनी चौकट नटली..कोपरा न् कोपरा प्रकाशानं ऊजळवला…झुमवर सगळं गणगोत गोळा झालं..व्हर्चुअल फराळ .व्हर्चुअल फटाके…शुभेच्छा ,आशिर्वाद. सगळं सगळं आॅनलाईन…

कसं असतं ना ,मनुष्यप्रवृत्ती मूळातच आनंद साजरा करणारी असते.भले आनंदाची माध्यमे बदलोत पण हेतु नाही बदलत…दिवाळी हा तर आनंदाचा, प्रकाशाचा,
स्नेहबंधनाचा ,स्नेहवर्धनाचा सण!!

शिवाय या सणांत निसर्ग,देवदेवता ,पशुपक्षी झाडंपानं सार्‍यांचं संवर्धन असतं…आपल्या संस्कृतीत केरसुणीलाही लक्ष्मी मानून तिचीही पूजा केली जाते.

यामागचा संदर्भ खूप अर्थपूर्ण आहे…चराचरात लहान थोर असं काही नसतं…मनातली विषमता दूर करुन सार्‍यांना सामावून घ्यायचं असतं… एका वातीनं दुसरी वात पेटते म्हणूनच तेलाचा दिवा पूजनीय…

मनातल्याच आसुरांचा संहार करायचा…नको लोभ,नको स्वार्थ..नको हिंसा नको असत्य…नको द्वेष नको मत्सर..असुया…वृद्धी प्रेमाची ,स्नेहाची..परोपकाराची व्हावी..
दिवाळी म्हणून साजरी करायची…

दिवाळी आली,संपली पण जाताना याच जाणीवा देऊन पुन्हा येण्यासाठीच परतली…

कवीवर्य ना.धो.महानोर परवा म्हणाले,

“मोडलेल्या माणसांचे..

दु:ख ओले झेलताना..

त्या अनाथांच्या ऊशाला..

दीप लावू झोपतांना..।।

दिवाळीची सांगता करताना याच ओळी सोबत रहाव्यात…

शूभ दीपावली!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गाणं नेमकं कसं सुचतं?….गुरू ठाकूर ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ मनमंजुषेतून ☆ गाणं नेमकं कसं सुचतं?….गुरू ठाकूर ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

2019 ची कोजागरी पौर्णिमा मला आजही आठवते.तारीख होती 13 October 2019 कोजागिरी निमित्त मी आणि राहुल रानडे “मैफिल शब्द सुरांची ” हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात  करत होतो. गाणं सुचण्याची प्रक्रिया आणि त्याला चाल लावण्याची प्रक्रिया यावर चर्चा झाल्यानंतर राहुल रसिकप्रेक्षकांना  म्हणाला , ” आपण आता गाणं नेमकं कसं सुचतं याचं प्रात्यक्षिकच पाहू, म्हणजे तुम्ही एक विषय आणि शब्द गुरूला द्यायचे आणि तो इथल्या इथे तुम्हाला गाणं लिहून दाखवेल” . रसिक अर्थातच उत्साही. त्यांनी विषय निवडला रोमॅण्टिक साँग..  दिलेल्या शब्दात  मुक्त छंदात कविता लिहिणे सोपे पण गाणे ते देखीलछंद आणि वृत्त सांभाळून  कारण पुढे राहुल त्याला चाल ही लावतो त्या मुळे  धुवपद म्हणजे मुखडा आणि शिवाय एक कडवे असं गाणं बसवणं म्हणजे सत्वपरीक्षा . तरीदेखील रोमॅंटिक सॉंग आहे म्हटल्यावर होईल असा एक विचार डोक्यात आला  तेवढ्यात प्रेक्षकातून कोणीतरी म्हणालं की आज कोजागिरी आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला जे शब्द देऊ त्यात कोजागिरीच्या रात्रीचे रोमांटिक सॉंग लिहा. इथे माझ्या पोटात गोळा आला. कारण या सगळ्या करता वेळ जास्तीत जास्त दहा मिनिटांची असते.

यावर मी काही बोलण्या आधीच राहुल म्हणाला , “हो हरकत नाही सांगा शब्द.” आणि मग रसिकांकडून शब्द येऊ लागले. आणि माझ्या लक्षात आले की रसिक हे खरेच मराठी रसिक आहेत. त्यांनी दिलेले शब्द आशय विषयाला धरुन आणि गेय होते. ते असे होते..

मिठी ,चांदणे, स्पर्श, हुरहूर, कोजागिरी,सूर,

 डोळे, मधुरात्र, सागराची गाज, ओढ,रात्र,

मी शब्द कागदावर उतरवता उतरवता डोक्यात त्यांची जुळवाजुळव करत होतो.. इतक्यात कोणीतरी म्हणाला फितूर.. आणि मला नाहीच सापडणार असं वाटता वाटता सेलोटेपचं टोक सापडावं तसं गाणं सापडलं..  अतिशय अवघड वाटणारा पेपर त्यादिवशी पाच मिनिटातच सोडवून झाला..हेच ते गाणं——  

                              फितुर डोळे गुंतता ,

                                                मधुरात्र झाली बावरी 

                              ये मिठीतच होऊ दे 

                                                साजरी कोजागिरी —-

                              कोवळी हुरहूर आहे 

                                                 स्पर्शवेडा सूर आहे 

                              या रुपेरीशा घडीला 

                                                 प्रीतीचे काहूर आहे —-

                              वाजू दे प्राणात 

                                                  आता मिलनाची पावरी 

                              ये मिठीतच होऊ दे 

                                                   साजरी कोजागिरी —–

— गुरू ठाकूर

संग्राहक :- सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहस्रचंद्रदर्शन शांती ☆ संग्राहक – श्री अशोक काका कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ सहस्रचंद्रदर्शन शांती ☆ संग्राहक – श्री अशोक काका कुलकर्णी ☆

वयाच्या ५० व्या वर्षापासून प्राचीन काळी वेगवेगळ्या शांती सांगितल्या आहेत.

त्या म्हणजे,—–

५० व्या वर्षी वैष्णव शांती, 

५५ व्या वर्षी वारुणी शांती,

६० व्या वर्षी उग्ररथ शांती, 

६५ व्या वर्षी मृत्युंजय महारथी शांती, 

७० व्या वर्षी भौमरथी शांती,

७५ व्या वर्षी ऐन्द्री शांती, 

८० व्या वर्षी सहस्त्र चंद्र दर्शन शांती,

85 व्या वर्षी रौद्री शांती, 

९० व्या वर्षी कालस्वरूप शांती,

९५ व्या वर्षी त्र्यंबक मृत्युंजय शांती 

आणि १०० व्या वर्षी त्र्यंबक महामृत्युंजय शांती. 

सहस्त्र चंद्र दर्शन म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात १००० वेळा पूर्ण चंद्र पहिला आहे. किंवा त्याच्या आयुष्यात १००० वेळा पौर्णिमा येऊन गेल्या. इतके सार्थ आयुष्य खूप कमी लोक जगतात म्हणूनच हे विशेष आहे. आपली मराठी कालगणना चान्द्रवर्षीय आहे म्हणून १००० चंद्र पाहण्याचा सोहळा केला जातो. हे मोजायची पण पद्धत आहे.

ती अशी –

८० वर्षात १२ x ८० म्हणजे ९६०, त्यात २७ अधिक महिने येतात म्हणजे ९६० + २७ = ९८७. म्हणजे ८० वर्षात १००० चंद्र पहिले जात नाही म्हणून ८१ वर्ष पूर्ण झाल्यावर येणाऱ्या १००० व्या पौर्णिमेला हा दिवस साजरा करतात. ह्या मध्ये काही ज्योतिष्यांच्या मते ३२ अधिक मास येतात म्हणून ८१ व्या वर्षातील ८ व्या महिन्यात सहस्त्र चंद्र पूर्ण होतात. पुन्हा ह्यामध्ये खग्रास चंद्र ग्रहण पण जमेस धरावे लागते. यावर शौनक ऋषिच्या विवेचनाच्या आधारे “वयोवस्थाभीधशांतीसमुच्चय:” ह्या पुस्तकात धर्मशास्त्र कोविद श्री नारायण शास्त्री जोशी, यांनी दिले आहे. त्यांच्या मते दरवर्षी सुमारे १२ अशी ७९ वर्षात ९४८ चंद्र दर्शने आणि खग्रास चंद्रग्रहणा नंतर नव्याने होणारे चंद्रदर्शन व असे २४ चंद्रदर्शन एव्हडे मिळून ९४८ + २८ + २४ = १००० चंद्रदर्शन होतात. ८० व्या वर्षानंतर ८ व्या महिन्यात केलेला विधी हा सौर कालगणनेनुसार असतो. म्हणजे वैखानस गृह्य सूत्रानुसार रविवर्षेण असते. शांती साठी देवता आणि हवन सामग्री पण ठरलेली आहे. सहस्त्र चंद्र दर्शनाला देवता आहे चंद्र आणि हवन सामग्री आहे आज्य. ह्या शान्तींच्या वेळी देवतेला हवन अर्पून त्या व्यक्तीच्या आयुरारोग्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यायोगे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य सुखात जाते.

सामान्यत: एकसष्ठी, पंचाहत्तरी आणि ८१ वर्षानंतर अशा शान्त्या केल्या जातात. आता सहस्त्रचंद्र दर्शनच का सूर्य दर्शन का नाही? तर “चंद्रमा मनसो जात:”– म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. मला वाटते साठीनंतरच वयस्क लोकांना आपण उपयोगाचे नाही, आपली सद्दी संपली, आपल्याला अडगळीत टाकतील, कोणी विचारणार नाही अशा अनेक शंका घेरून टाकतात. ऐंशी वर्षे म्हणजे फारच जास्त होतात, त्यांचीच मुले साठीला येतात. कधी – कधी जोडीदार पण साथ सोडून जातो. अशा वेळी घरातल्याच लोकांनी त्यांचे मन जाणून घेऊन ते अजून आम्हाला हवे आहेत असे एक सुंदरसा घरगुती का होईना कार्यक्रम करून त्यांना तसे वाटू दिले, त्यांना कपडे किंवा चष्मा, कवळी, चांगली पुस्तके, एखादा छोटासा टीव्ही अशी भेट देऊन, सहस्त्र दिव्यांनी ओवाळले तर त्यांना किती बरे वाटते. आपण अजून हवे आहोत ही भावनाच किती चांगली आहे. म्हणून सहस्त्रचंद्र दर्शन विधी असावा. आता होम करायचा कारण उत्सव मूर्ती ऐंशी वर्षे तंदुरुस्त का राहिली म्हणून कोणी नजर पण लावेल, सगळ्यांच्या नजरा चांगल्या असतात असे नाही. म्हणून होम करून सगळी अरिष्टे दूर करायची.

संग्राहक – श्री अशोककाका कुलकर्णी   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares