छोट्या बोटीतून जाताना आम्हाला भीती वाटत होती,पण त्या बोटीवर काम करणारे लोक मात्र लीलया या होडीतून त्या होडीत जा -ये करत होते.
दूरवर दिसणारी छोटी छोटी बेटं हिरवीगार दिसत होती. त्या हिरवाईचे प्रतिबिंबच जणू पाण्यात दिसत होते! या बीच वर काचेच्या बोटीतून समुद्रात खोलवर घेऊन जातात, तेव्हा पायाशी असलेल्या काचेतून समुद्राच्या तळाशी असलेले तर्हेतर्हेचे रंगीबेरंगी मासे, कोरल्स, कासवं आणि खूप रंगीत रंगाचे दगड-गोटे आणि काय काय पहात होतो ते सांगता येत नाही. त्या बोटीतून बाहेर पडल्यावर आम्ही तिथे स्नाॅर्केलिंगही केले. समुद्राच्या तळातील दौलत बघता-बघता चार पाच तास कसे गेले कळलंच नाही.
या नंतर पोर्टब्लेअर चा मुक्काम संपवून आम्ही दुसऱ्या दिवशी राॅस आयलंड बघण्यासाठी निघालो.
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-२) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
मारवा~पूरिया या प्रसिद्ध जोडीतील पूरिया या रागाविषयी आपण आज विचार करू या.
मागील लेखांत आपण पाहीले आहे की मारवा पूरिया सोहोनी ही एकाच कुटुंबातील सख्खी भावंडे! परंतु वादी~ संवादी स्वरांच्या भिन्नतेमुळे प्रत्येकाचे चलन स्वतंत्र, अस्त्तित्व स्वतंत्र! पूरियांत गंधार व निषाद ह्या स्वरांना अधिक महत्व आहे. रात्रीच्या प्रथम प्रहरी हा राग सादर केला जातो. मध्यम जरी तीव्र असला तरी मारव्याची उदासीनता पूरियांत नाही. मात्र ह्याची प्रकृती काहीशी गंभीरच! अधिकतर पूरिया मंद्र व मध्य सप्तकात गायिला वाजविला जातो, म्हणजेच हा पूर्वांगप्रधान राग आहे. स्वरांच्या वक्रतेमुळे हा राग मनाला मोहवितो. जसे~”नी (रे)ग, (म)ध ग(म)ग, ध नी (म)ध ग(म)ग,” अशा प्रकारे वक्र स्वररचना आढळते. नि (रे)सा, ग(म)ध नी (रे)सा/सा नी ध (म)ग (रे)सा असे याचे आरोह/अवरोह आहेत. ‘ग, नी (रे)सा, नि ध नि (म)ध (रे) सा’ या स्वरसूमूहावरून पूरियाची तात्काळ ओळख पटते. या रागाचे पूर्ण चलनच वक्र आहे.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक बडे गुलाम अली खाॅं यांच्याविषयी असे सांगितले जाते की मुंबईत विक्रमादित्य संगीत परिषदेत बडे गुलाम अली यांनी अल्लादिया खाॅं, फैय्याज खाॅं, हाफीज अली खाॅं यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत मारवा आणि पूरिया हे दोन राग एकापाठोपाठ गायले होते, आणि त्यांचे गायन ऐकून बूजूर्ग मंडळी अगदी अवाक झाली. एका रात्रीतच बडे गुलाम अलीना मुंबईत प्रसिद्धी मिळाली.
वियोग,शृंगाररसोपयुक्त असा हा पूरिया,कारूण्यपूर्ण श्रृंगार हाच या रागाचा स्थायीभाव!
शूद्ध पूरियांतील गाणी सहसा सांपडत नाहीत, परंतु ‘सांज ये गोकुळी सावळी सावळी’, ‘मुरलीधर शाम हे नंदलाला’, ‘क्षणभर उघड नयन देवा’ ही काही भावगीते, भक्तीगीते पूरिया रागावर आधारित म्हणून उदाहरणादाखल देता येतील. “जिवलगा राहीले दूर घर माझे” ह्या भावगीतांत पूरियाचे स्वर असले तरी त्याबरोबर धनाश्री येऊन तो पूरिया धनाश्री झाला आहे. पूरियांत नसलेला पंचम ह्यांत आहे. सूरत और सीरत या चित्रपटांतील ‘प्रेम लगन’, आई मिलनकी रात मधील कितने दिनो की बात आई सजना रात मिलनकी, ‘रंगीला मधील ‘समा ये क्या हुआ, रुत आ गयी रे रुत छा गई रे’ ही काही बाॅलीवूड गाणी पूरिया धनाश्रीची उदाहरणे सांगता येतील ह्या गाण्यांकडे पाहीले असता पूरिया हा करूणरसप्रधान शृंगार वर्णन करणारा राग असल्याचे सर्वसामान्यांच्याही लक्षात येते.
पोर्ट ब्लेअर च्या सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सेलर जेलच्या दर्शनाने भारावून गेलो होतो. पण आता निसर्गाच्या सानिध्यात समुद्रावर फिरून काही दिवस तोही अनुभव घ्यायचा होता. पोर्ट ब्लेअरच्या आसपास समुद्रात बरीच बेटे आहेत. त्यापैकी हॅवलॉक आयलंड या ठिकाणी आम्ही जाणार होतो. एक दिवस माउंट हॅरियट येथे जाऊन आसपासचा अप्रतिम सुंदर निसर्ग पाहिला. गन पॉईंटवर फोटो काढले. ‘सागरिका’ म्युझियम पाहिले आणि हॅवलॉक आयलँड ला जाण्यासाठी तयार झालो.
हाय लॉक आयलँड ला जाण्यासाठी प्रथम समुद्रातून बोटीने साधारणपणे दीड तास प्रवास केला व पुढे कारने काही अंतर जाऊन ब्ल्यू रिझाॅर्ट या ठिकाणी पोहोचलो. इथून अगदी जवळ होता. त्यामुळे संध्याकाळी साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बीचवर आम्ही चालत गेलो. सेल्युलर जेल पाहून आलेला गंभीरपणा नकळत जाऊन निसर्गाच्या या रम्य रूपात रमून गेलो. समुद्रकिनाऱ्यावर बरीच गर्दी होती. पाण्यात खूप वेळ खेळायला मिळाले. सूर्यास्त होत आल्यावर दिसणारे सागराचे घनगंभीर रूप डोळ्यात साठवले गेले. सूर्यास्त लवकर म्हणजे साडेपाच वाजता सूर्यास्त झाला की बीच बंद होत असल्याने पोलीस गाडी घेऊन सर्वांना बाहेर काढले जाते! आम्ही येताना गोड पाणी आणि खोबरे खाऊन रेसोर्ट वर आलो. त्या दिवशीचा मुक्काम तिथेच होता. सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा समुद्राला भेटायला जाऊन आलो. सकाळी नाश्ता करून एलिफंटा बीचवर जाण्यासाठी प्रथम कारने आणि पुढे छोट्या बोटी ने एक दीड तास प्रवास करायचा होता. समुद्राचे रूप कितीदा आणि कितीही पाहिले तरी मनोहारी वाटते. इथे तर पाण्याचा रंगही बदलताना दिसत होता. कुठे पाचू सारखा हिरवा रंग तर कुठे निळा, ग्रे कलर दिसत होता.
दृष्टिकोन ही एक अशी गोष्ट आहे की, जी प्रत्येक माणसागणिक बदलत जाते. पण ती सकारात्मक असण फार आवश्यक आहे. मग ती एखाद्या माणसाकडे बघण्याची असो किंवा घटनेकडे. प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघण्याचा दृष्टीकोन असला पाहिजे. एखादे संकट जरी आले, तरी तेही आपल्याला खूप काही शिकवून गेले असा दृष्टीकोन पाहिजे, नाहीतर त्यावर रडत कुढत बसुन काहीच साध्य होत नाही. काहीजण प्रत्येक गोष्ट सकारात्मकपणे घेऊन पुढे जातात तर काही प्रत्येक गोष्टीतच रडत बसतात. काहीजणांना अर्धा ग्लास भरलेला दिसेतो तर तोच काहींना अर्धा रिकामा.
तिर्हाईत माणसांकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा. एखाद्याला एखादी व्यक्ति खूप आवडते, दुसर्याला तीच व्यक्ति आजिबात आवडत नसते. मला एक कळत नाही की, एखाद्याशी चार वाक्य बोलली की लगेच आपण त्याच्या बद्दल मनात एक चित्र म्हणजेच आपला त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टीकोन तयार करून टाकतो. आपल्याला सर्वसाधारण पणे अस वाटत असत की I’m the best judge आणि आपण कोणत्याही व्यक्तीला आगदी पंधरा वीस मिनटात पूर्ण ओळखू शकू. पंधरा वीस वर्ष संसार करूनही जिथे आपण आपल्या जोडीदारला ओळखू शकत नाही तिथे तिर्हाईत माणसाला आपण पंधरा मिनटात ओळखू शकतो असं आपण ठामपणे कसं काय सांगू शकतो ह्याच मला नवल वाटते.
मी एवढेच म्हणेन की पटकन कोणाबद्दल दृष्टिकोन बनवू नका मग तो चांगला असेल किंवा वाईट त्याच्या मनात खोल शिरा, काही वेळा जे वर दिसत नाही, ते खोल दडलेले असते. जिभेवर साखर पेरून बोलणारा माणूस आतून कारल्या सारख्या कडू असू शकतो किंवा तलवारी सारखी जिभेला धार असणारा माणूस आतून मृदू.
माणूस सोडा एखाद्या निर्जीव वस्तूकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा वेगवेगळा असतो. एकच वस्तू एखाद्याला विलक्षण आवडते, मोहून जाते हवीहवीशी वाटते तर तीच वस्तू दुसर्याला नको नकोशी, कुरूप तिटकारा आणणारी वाटू शकते.
एखाद्या फुलाची सुंदरता एखाद्याला मोहरून टाकेल तर दुसर्याला नाही. पहाटेच्या रम्य वेळी पक्ष्यांची किलबिलाट काहीजणांचा सुखकर वाटेल तर काहींना त्याच किलबिलाटीची कटकट वाटेल.
दृष्टिकोन दृष्टीकोन म्हणजे काय हो? आपणच आपल्या विचारांना दाखवलेली दिशा. आपल्याच मनाचे विचार एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे. काही वेळा आपण ज्याचा वेग इतका ठेवतो की आपल्या नकळत समोरच्या बद्दल, एक आपले मत बनवून बसतो.
प्रेक्षकांना सर्कशीत काम करणारा जोकर हा केवळ विदुषक असतो, सगळ्यांना हसवणारा पण त्याच्या दृष्टीकोनातून मात्र तो एक कलाकार असतो आणि आपला प्रत्येक कार्यक्रम उत्तम झाला पाहिजे असा असतो त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. लोक तुमच्या बद्दल काय विचार करतात याचा विचार करू नका सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे जात रहा.
शेवटी एवढचं म्हणेन की कदाचित माझा हा लेख वाचून तुमचा प्रत्येकाचा माझ्याकडे बघण्याचा किंवा माझ्या लिखाण बद्दलचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो हे नक्की?
अकरावी पर्यंत शाळा असायची.आणि मग काॅलेज जीवन सुरु.
शाळेच्या शेवटच्या वर्षापासूनच काॅलेजचे वेध लागले होते. काॅलेज म्हणजे खूप काहीतरी वेगळं, फुलपाखरी वातावरणाचं, जिथे गणवेष नसतो, खूप स्वातंत्र्य असलेलं म्हणजे मनात आलं तर वर्गात जायचं नाहीतर दांडी मारायची.. आणि दांडी मारली म्हणून कुणी शिक्षा करत नाही. आणि एखादे प्राध्यापक असतीलच जरा कडक तर आपल्या ऐवजी मैत्रीणीने present sir म्हटलं तरी आपला अटेन्डन्स लागतो…. कारण शाळेसारखे तिथे प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखणारे शिक्षक नसतात. वगैरे वगैरे अनेक सूरसकथा ऐकलेल्या होत्या. आणि त्याचं अतीव आकर्षण होतं. आणखी एक, माझं शालेय शिक्षण कन्या शाळेत झालं. त्यामुळे आता मुलांबरोबर एकत्र वर्गात बसून शिकण्याची काय निराळी गंमत असते ते अनुभवायला मिळणार होतं.. मनाच्या खोल कोपर्यात कुठेतरी चोरटेपणाने येऊनही गेलं,”……भेटला एखादा स्वप्नातला राजकुमार तर…..”
तेव्हां काॅलेजच्या प्रांगणात पाऊल टाकलं तेव्हा या सगळ्या गंमतकथा घेऊन… शाळेचा तो तास आणि काॅलेजचे ते लेक्चर, पीरेड. शाळेच्या बाई काॅलेजच्या मात्र मिस.
त्या विवाहित असल्या तरी मिसच… इथे मास्तर नव्हते. इथे सर होते. ते आमच्या डोंगरे मास्तरांसारखे हातात काठी अन् ढगळपगळ कपडे घालणारे नव्हते तर छान सुटाबुटात टाय लावलेले असत..
काॅलेजची ती लेडीजरुम… तिथली मजा औरच होती. तिथे लाॅकर्समधे आपलं सामान ठेवायचं… कधी पीरिएड बंक केला तर मैत्रीणीशी केलेल्या खास गुजगोष्टी असायच्या.. कुणी छान गाणं म्हणत असेल तर तिला गाण्याचा आग्रह करायचा..
कधी मिस किंवा सरांंची नक्कल वगैरे….. मजाच वाटायची सगळ्याची… शिवाय कँटीन या संस्थेशी नव्याने ओळख झाली होती. रेस्टाँरंटमधे खाण्याची संस्कृती नव्हतीच तेव्हां… त्यामुळे मित्रमैत्रीणीं समवेत मुक्तपणे कधी वडा, कधी मिल्कशेक, नाहीतर कोक प्यायला धम्माल वाटायची…..अर्थात पुन्हा हे सर्व पाॅकेटमनीवर अवलंबूनही असायचंच….पाॅकेटमनी हा एक आणखी पाहुणा शब्द…..
आमच्या काॅलेजमधे सुदैवाने रॅगींग हा प्रकार नव्हता.
मुलांच्यात होतं थोडंफार….फिजीक्स लॅबमधे कुठल्यातरी एका प्रयोगात, एका पात्रात वाफ कोंडवून ठेवल्यामुळे, एक बिच्चारा, काॅलेजयुवकाचा झीरो स्मार्टनेस असलेला मुलगा भाजला होता….कुणीतरी मुद्दाम हे कृत्य केले होते हे नंतर कळले……त्यालाच सतावण्यासाठी..
एकेका वर्षानंतर काॅलेजात चांगलेच रूळलो…
अभ्यास,महत्वाकांक्षा,भविष्याचे विचार होतेच,..
सोबत कॉलेजची गेटटुगेदर्स…आंतरमहावाद्यालयीन नाट्यस्पर्धा…त्या तालमी यांचीही खूप मजा, आनंद, भोगला. काही नाती जुळली. काही तुटली.
काॅलेजच्या बोटॅनीकल गार्डन मधे जीवलग मैत्रीणींबरोबर केलेल्या शेअरींगचे क्षण,आजही तसेच्या तसे आठवतात. भावना बोथट झाल्या असल्या तरी त्या क्षणांनी जे दिलं ते अजुन तसंच आहे मनाच्या खणात…
शेवटचं वर्षं मात्र अभ्यासातच गेलं…आयुष्याची दिशा शोधण्याचं ते वर्ष….आता ही सगळीजणं दूर जाणार.. कुठे कधी कोण भेटणार… काही प्रेमी युगुलांची नाती जमलीही होती… जीवनाच्या वाटेवरचे सोबती भेटले होते… त्यांच्याविषयी कौतुकाबरोबर किंचीत असुयेची छटा होती….आपली वाट अजुन एकलीच…पण सोबत सोनेरी स्वप्नं होतीच की…..
पण असे हे काॅलेजचे रंगीन,सुनहरे दिवस कधी संपले ते कळलंच नाही…
त्यादिवशी फेसबुकवर एक फ्रेंड रीक्वेस्ट होती…
फोटोतला चेहरा नाही पटकन् ओळखला. पण नाव स्मरणात होतं…. नंतरच्या मेसेजमधे त्याने लिहीलं होतं, डोळ्यांवरुन मी तुला ओळखलं…. खूप आवडायचे मला……. गंमत वाटली मात्र… पण माझ्या संस्काराने मात्र रोखलं म्हणताना….
अंदमान सहलीचे बुकिंग करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या ठिकाणी दहा वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली तो सेल्युलर जेल बघणे हेच ध्येय मनाशी होते. सेल्यलर जेल म्हणजे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र म्हटले पाहिजे. ब्रिटिशांनी सावरकरांना दोन जन्मठेपांची शिक्षा देऊन अंदमानला पाठवले होते. 1910 ते 1921 या कालखंडात स्वातंत्र्यवीर सावरकर देशासाठी कारावास भोगत अंदमानला होते. तीव्र बुद्धिमत्ता पण तितकेच कणखर मन आणि प्रतिभा त्यांच्या ठायी होती. आत्तापर्यंत ‘माझी जन्मठेप’चे पारायण झाले होते. त्यामुळे कोलू फिरवणे, काथ्या कूटणे यासारखे शारीरिक कष्ट, अंगावरची दंडा बेडी, बारी नावाच्या ब्रिटिशाच्या तुरुंग सुप्रिटेंडंटचा होणारा जाच, स्वातंत्र्य सैनिकांना होणाऱ्या यातना ,काहींना फाशी या सर्व गोष्टी आठवून या परिसरात गेल्या बरोबरच मन खूप भारावून गेले. अंदमानच्या भिंती हा इतिहास बोलका करीत असल्या तरी प्रत्यक्ष तेव्हा त्यांचा छळ कसा झाला असेल याची कल्पनाच करवत नाही. सेल्युलर जेलमध्ये प्रवेश करताच उजव्या हाताला जो पिंपळाचा पार आहे तो आजही या सर्वांची साक्ष देत उभा आहे. या पाराखाली सावरकरांनी अनेकांना साक्षरतेचे, स्वातंत्र्याचे धडे दिले म्हणून हे जणू आपले पहिले विद्यापीठच होते!
अंदमान सहलीच्या पहिल्याच दिवशी आम्ही सेल्युलर जेल पहायला गेलो. सात फूट रुंद, दहा फूट उंच आणि साडेतेरा फूट लांब कोठडी होती.तिथे फक्त एक खिडकी होती. इथेच सावरकरांनी भिंतीवर ‘कमला’ काव्य लिहिले.
आम्ही सावरकर कोठडीत काही वेळ थांबून सर्व परिसर बघितला. फाशी गेट तसेच सावरकरांना देण्यात येणाऱ्या शिक्षांची पुतळ्यांच्या रूपात दाखविलेली झलक पाहिली. तेथील साऊंड आणि लाईट शो बघून बाहेर आलो. मन खूप भारावून गेले होते. बाहेर सावरकर बागेतील इतर क्रांतिकारकांचे पुतळे पाहिले. संध्याकाळी हॉटेलवर परत आलो, पण मन अजूनही तिथेच होते.
दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही दुपारच्या वेळी सेल्युलर जेल ला गेलो तेव्हा शांतपणे सावरकर कोठडीत बसून ‘जयोस्तुते श्री महन्मंगले..’ हे गीत म्हंटले, तेव्हा मन आणि डोळे नकळत भरून आले.
☆ विविधा ☆ बोलणे-विचार करून बोलणे ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆
निसर्गाने बोलण्याची शक्ति फक्त मनुष्यालाच दिली आहे. कोणताही प्राणी, पक्षी बोलु शकत नाही. मनुष्यप्राणीच फक्त बोलु शकतो. हे निसर्गाने मनुष्याला दिलेले वरदानच आहे.
आपल्या भावना, विचार, इच्छा, गरजा व्यक्त करण्याचे ते एक मोठे साधन आहे. आपण बोललो ते बरोबर आहे का, योग्य आहे का अयोग्य हे मनुष्याला बोलल्यानंतरच त्याच्या परिणामावरूनच समजते. तेंव्हा मनुष्याने विचार करूनच बोलले पाहीजे. बोलल्यानंतर विचार करण्यात काय अर्थ? न विचार करता बोलले तर समोरची व्यक्ति दुखावली जाण्याची, दुरावली जाण्याची शक्यता अधिक असते. बोलल्यानंतर मी असे बोललोच नाही, मी असे कांही म्हणालोच नाही, मला तसे म्हणायचे नव्हते अशी सारवासारव करण्यात काय अर्थ? म्हणुन बोलल्यानंतर विचार करीत बसण्यापेक्षा विचार करूनच बोलणे अधिक चांगले. त्यामुळे अनेक अनर्थ टळतील.
तुम्ही कसे आहात हे तुमच्या बोलण्याच्या पध्दतीवरून समजते. बोलताना तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातील खरेपणा, प्रामाणिकपणा यावरूनच तुमची पारख केली जाते. तसेच त्यावरून तुमचा “सुसंस्कृतपणा” लक्षांत येतो. आवाजाची पट्टी नेहमीच मध्यम असावी. वरच्या पट्टीत बोलणे टाळावे.बोलताना योग्य शब्द वापरले पाहीजेत. अयोग्य शब्द, अपशब्द टाळावेत. बोलण्यातुन समोरच्याबद्यल आदर व्यक्त झाला पाहीजे. बोलण्यात कोरडेपणा असु नये. आपुलकी जिव्हाळा असावा. आणि तो खरा असावा.त्यामध्ये तोंडदेखलेपणा नसावा. बोलणे नेहमी मुद्देसुद आणि मुद्याला धरूनच असावे. पाल्हाळ लावले की समोरचा माणूस कंटाळतो.ऐकुन घेण्यास टाळाटाळ करतो.
“कौन बनेगा करोडपती” मधील अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकत रहावे असे वाटते. समोरची व्यक्ति कितीही लहान असो अथवा मोठी, अमिताभ बच्चन त्यांच्याशी आदरानेच बोलतात. त्यांना प्रोत्साहित करतात. त्यामुळे समोरची व्यक्ति अधिक मोकळी होते, रिलॅक्स होते आणि ऊत्साहित होते. बच्चन यांचेबद्दलची भिती जाऊन तिही मोकळेपणाने बोलायला लागते. हे बच्चनजींच्या बोलण्याचे, संवाद साधण्यामागचे कौशल्य आहे. अशा निरीक्षणातुनच आपलाही विकास होतो.
कसे बोलावे हे खरे तर अनेक गोष्टीतून साध्य करता येते. अनेक दिग्गजांचे बोलणे ऐकुन, विद्वान लोकांचे मार्गदर्शन घेऊन आपण ही कला अवगत करू शकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे साहित्य वाचुन आपण आपले शब्द सामर्थ्य वाढवु शकतो. यामधुनच बोलताना आपल्याला योग्य शब्दांची निवड करता येते.
भाषण देणारे अनेकजण असतात. पण मुद्दाम आवर्जुन ऐकावे ते आदरणीय श्री अटल बिहारी वाजपैयीजी तसेच प्राचार्य श्री शिवाजीराव भोसले सर यांची भाषणे,व्याख्याने. आपले बोलणे नेहमीच अर्थपूर्ण असले पाहीजे. निरर्थक बोलण्याला कांहीच अर्थ नसतो आणि कोणी ऐकतही नाही. बोलताना मोजकेच बोलले पाहीजे. अती बोलले की त्यामध्ये हमखास वावगे, अनावश्यक बोलले जाते. समोरचा माणुस त्यामुळे दुखावला जाऊ शकतो.
शब्द हे शस्र आहे. शस्रापेक्षाही अधिक घायाळ करण्याची शक्ती त्यामध्ये असते हे कायम लक्षांत ठेवले पाहीजे. तेंव्हा बोलताना विचार करूनच बोलले पाहीजे.
कोणतं साल होतं नक्की आठवत नाही, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरची व्याख्याने होती. खासबान मैदानावर.रोज रात्री नऊ वाजता सुरू होत. संपून घरी परत पोचायला साडेबारा व्हायचे. तुफान गर्दी होती. आम्ही सर्वजण जात असू. शिवाजी महाराजांचे लहानपणापासूनचे प्रसंग, छोटा शिवबा, जिजाबाई, शहाझीराजे, तानाजी मालुसरे, सूर्याजी, नेताजी पालकर, औरंगजेब, शाहिस्तेखान, अफझलखान, रोहिडेश्वराची शपथ, आधी लगीन कोंढाण्याचं…..असे प्रसंग आणि व्यक्तिरेखा हुबेहूब डोळ्यासमोर उभे केले होते. आम्ही अगदी भारावून गेलो होतो. आजच्या व्याख्यानात ऐकलेला प्रसंग दुसरे दिवशी आम्ही घरी प्रत्यक्ष नाटकरूपाने अभिनय करायचो. खूपच मजा यायची. जिजाबाई होण्यासाठी माझी आणि बहिणीची अंजूची वादावादी व्हायची. शिवाजी होण्यासाठी दोघं भाऊ, राजू उजू.ची मारामारी व्हायची. मग आम्ही तह केला. व एकेक दिवस वाटून घेतला.
???
सर्वांत शेवटचा दिवस राज्याभिषेकाचा.
राज्याभिषेक सोहळा प्रत्यक्ष घडवून आणला होता. अनेकजण त्यात अभिनय करत होते. जे आम्ही गेले 15 दिवस घरी करत होतो, ते इथं मोठी माणसे आजचा सोहळा करत होती. प्रचंड प्रचंड गर्दी होती. श्री. बाबासाहेब पुरंदरे खास गुलाबी फेटा बांधून व्याख्यान देत होते.स्टेजवर राज्याभिषेकाचा सेट लावला होता. प्रेक्षक श्वास धरून, जीवाचे कान करून ऐकत होते, डोळ्यांनी अनुभवत होते. काशीहून आलेल्या गागाभट्टानी मंत्रोच्चाराने सप्तसागर, सप्तसरिताचा पवित्र जलाभिषेक केला. राजवस्त्रे, जिरेटोप लेवून राजे सिंहासनाजवळ गेले. त्यांनी सिंहासनाला मुजरा केला. पाय न लावता आरूढ झाले.
शिंग- तुता-या निनादल्या. चौघडे ताशांचा गजर झाला. 32 मण वजनाचे सिंहासन रोमांचित झाले. दणदणीत आवाजात घोषणा झाली,
जमलेल्या हज्जारोंनी जयजयकार केला. प्रत्येकाची छाती अभिमानाने भरून आली होती. जयजयकाराने अवघे खासबाग मैदान दणाणून गेले होते. मैदानाच्या बाहेर हजारो लोक उभे होते. अख्खे कोल्हापूर रात्री साडे बारा वाजता जयजयकार करत होते.
दुसरे दिवशी वर्तमान पत्रात सोहळ्याचे फोटो आणि वर्णन वाचले आणि त्या सोहळ्यात आपल्याला उपस्थित रहायला मिळाले, ही गोष्ट भाग्याची, अभिमानाची वाटली.
नंतर पुढे महिनाभर आमची शिवचरित्राची नाटके चालू होती. परिक्षा आली म्हणून ते वेड बाजूला ठेवावं लागलं.
हे नकळत आमच्यात रुजलेले संस्कार आयुष्य भराची शिदोरी ठरले.
आई जगदंबेचे एक रूप म्हणजे गोव्यातील कवळे येथील श्री शांतादुर्गा देवी.
देवीचे मंदीर सुंदर व भव्य असून पोर्तुगीज व भारतीय स्थापत्य रचनेचे उत्तम उदाहरण आहे.
देवालयाच्या गाभाऱ्यात शांतादुर्गा देवीची मनमोहक आणि तेजस्वी मूर्ती आहे. शंकर आणि विष्णू यांचे भांडण मिटवून दुर्गेने त्यांना शांत केले म्हणून तिचे नाव शांतादुर्गा पडले.
शांतादुर्गा देवी संस्थानाचा वार्षिक जत्रा महोत्सव माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध अष्टमी पर्यंत चालतो.
माघ शुद्ध पंचमीला पहाटे ४.३० वाजता देवीची मिरवणूक निघते. या वेळी सागवानी चार मजली रथ फुलांनी सुंदर सजविला जातो त्यावर विद्युत रोषणाई केली जाते. ती रोषणाई पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. देवीचे आकर्षक मंदिर व दीपमाळेवरील रोषणाई मुळे शोभा अजूनच वाढते. प्रथम देवळातून मूर्ती पालखीतून मंदीरासमोर आणली जाते. नंतर टाळ आणि ताशांच्या गजरात आरती होते. देवळाला एक प्रदक्षिणा घालून पालखी महारथाजवळ आणली जाते. रथाच्या तिसऱ्या मजल्यावर मूर्ती बसवली जाते व मठाधिपती श्री स्वामींच्या हस्ते नारळ फोडून महारथ हलवला जातो. सात फुटाहून जास्त व्यास असलेल्या चाकांचा रथ दोरखंडांनी ओढला जातो. जो तो पुढाकार घेऊन , एकामेकांच्या साथीने भाविक जन रथाची देवळाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. ठीक ठिकाणी भाविक रथाला स्पर्श करून श्रद्धेने दर्शन घेतात. प्रदक्षिणा पूर्ण झाली की सोन्याच्या पालखीतून मूर्ती मंदिरात नेतात पुन्हा मंदिरात आरती होते.
ह्या विलोभनीय दर्शनाने स्थैर्य व शांतता मिळते.
मंदिराची जागा हरिजनांनी देवस्थानला दिलेली आहे म्हणून षष्ठीला पालखीसोबत आलेल्या हरिजनांचा सत्कार व सन्मान केला जातो.
☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून… – भाग-5 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे ☆
शिर्डीचे साईबाबा खूप जणांना माहिती असतात. पण त्यांचे शिष्य उपासनी महाराजांबद्दल फार कमी माहिती असते. काशिनाथ गोविंदराव उपासनी हे नाशिकमध्ये सटाणा येथे जन्मले. कर्मठ सनातनी घराण्याचे संस्कार असलेला हा मुलगा औपचारिक शिक्षणाच्या बाबतीत उदासीन होता. पण जन्मतः अलौकिकत्वाची लक्षणे घेऊन आला होता. त्यांचं सविस्तर चरित्र सांगण्याची ही जागा नाही. पण लहानपणी विवाह झाल्यावर त्यांची ती पत्नी वारली. दुसराही विवाह (जो त्यांना नको होता..) त्या पत्नीच्या निधनामुळे संपुष्टात आला आणि महाराज योगसाधना करायला मोकळे झाले. ती साधना करीत असताना श्र्वासाचा त्रास होऊ लागला. त्यांना गुरुंनी साईबाबांकडे जायला सुचवलं. पण ते मुस्लिम असल्यामुळे महाराजांनी जायला नकार दिला. पण साईबाबा येऊन उपाय सुचवून गेले. असं दोन वेळा झालं पण उपाय न करण्यामुळे त्रास वाढला. शेवटी निरुपायाने ते शिर्डिला गेले आणि साईबाबांनी त्यांना बरं केलं. यानंतरही त्यांनी शिर्डि सोडून जायचा प्रयत्न केला पण जमला नाही आणि साईबाबांच्या इच्छेनुसार ते तिथेच राहिले. चार वर्षं अत्यंत कठोर, अकल्पनीय साधना केल्यावर ते सद्गुरुपदाला पोचले.
साईबाबांनी त्यांना दिलेल्या अंत: प्रेरणेनुसार त्यांनी शिर्डिजवळच साकुरी इथे कन्याकुमारी स्थान उभं केलं. त्यांच्या पहिल्या आणि त्यांच्यानंतर गुरुपदावर बसलेल्या शिष्या म्हणजे पू.गोदावरीमाता. उपासनी बाबांनी मूळ २४ कन्यांना साकुरीत ठेवून घेऊन चारही वेद, यज्ञकर्म, पौरोहित्य शिकवलं. त्यासाठी संस्कृतचा पाया भक्कम करून घेतला. स्त्रियांमधे पावित्र्य, सहनशीलता, श्रध्दा, चिकाटी, करूणा, समर्पणभाव असे गुण असतात हे एक कारण… पण बाबांना स्त्रियांना वेदाधिकार, साधनेचा अधिकार द्यायचा होता. कडक ब्रह्मचर्याचं तेज आणि स्त्रीत्वाची कोमलता यातून एक कार्य उभं करायचं होतं. पण त्यांच्या कार्याची दिव्यता लक्षात न आल्याने त्यांच्यावर खटला भरला गेला.. विलक्षण बदनामी झाली. स्त्रियांना घेऊन केलेलं काम… त्यामुळं चारित्र्य हनन करण्याचे प्रयत्न केले गेले. पण महाराज यातून अग्नीतून झळाळत्या सोन्यानं बाहेर पडावं तसे बाहेर पडले. अत्यंत सन्मानाने त्यांना दोषमुक्त केलं गेलं आणि त्यांच्या कार्याचा गौरव झाला. पुढे आकाशवाणीवर वेदांमधले काही भाग ऐकवण्याची योजना आखली गेली. तेव्हा अत्यंत अचूक, अधिकृत वेदोच्चार करणाऱ्या फक्त उपासनी महाराजांच्या शिष्याच आहेत हे लक्षात आलं. खूप वर्षे आकाशवाणीवर “उपासनी कन्यां” चे वेदपठण /उपनिषदांचे पठण/सूक्ते ऐकवली जात असत.
हिंदू स्त्रियांना विविध क्षेत्रात विविध लोकांनी स्थान मिळवून दिले आणि हिंदू स्त्रियांनीही या संधींचा सोनं केलं. वेद पठण, पौरोहित्य यांचा अधिकार देऊन यज्ञसंस्था त्यांच्याकरवी जिवंत ठेवण्याचं काम उपासनी महाराजांनी साईबाबांनी दिलेल्या अंत:प्रेरणेनं केलं आज सनातन हिंदु धर्मातील शास्त्रशुध्द पूजाअर्चा, यज्ञयाग, वैदिक ज्ञान साकुरीमधे व्रतस्थ स्त्रिया जतन करीत आहेत.
अशा विभूतींनी हा धर्म काळाबरोबर प्रवाहित ठेवला. त्याचं डबकं होऊ दिलं नाही.