मराठी साहित्य – विविधा ☆ अस्तित्व ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ विविधा ☆ अस्तित्व ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

एकवीस दिवसाच्या युरोप ट्रीप वरून आम्ही परतलो. अजूनही ट्रीपच्या मूडमध्येच होतो.

इतकं प्रगत राष्ट्र, इतकी मोहमयी दुनिया नजरेत साठवून घ्यावं असं सौंदर्य इतकी आधुनिकता भव्य रस्ते भव्य इमारती इतका सुरेख निसर्ग हे सर्व पाहून डोळ्याच्या बाहुल्या विस्फारल्या होत्या.

आल्या आल्या मला स्वयंपाकाच्या कट्ट्याचे दर्शन घ्यावं लागलं. चहा करण्यासाठी सरसावले तर डोळे आणखीनच विस्फारले ओट्याच्या एका कोपऱ्यात एक छोटासा हिरवा देठ आणि त्याच्यावरच पिवळे फूल मला खुणावत होतं.

जाताना मीच बीजारोपण केलं होतं जणू! मोहरीचा एक दाणा रुजला होता आणि आपलं अस्तित्व दाखवत होता. मी जणू त्याला पंधरा-वीस दिवसाचा ‘ब्रीदिंग टाईम ‘दिला होता एरवी रोजच्या साफसफाईत तो अंकुरला नसता.

खूपच गोंडस निरागस हिरवट इवलसं पिवळ्याधमक फुलांन नटलेलं असं ते हळुवार डोलत होतं.

माझ्या मनातील सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकली त्याने

एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले

त्या कुणी ना पाहिले…..

या गाण्यांच्या ओळी मला सहाजिकच आठवल्या. त्या क्षणी कवीच्या भावनाही समजल्या.

….मी युरोप मध्ये पाहिलेलं ट्यूलिप फूल सुंदर की हे मोहरीचं फुल याचा विचार करत बसले आणि दूध उतू गेलं.

अस्तित्वा साठीची ही त्याची धडपड मला जाणवली . माझ्या डोळ्याला ते दिसणं हे त्याचं असणं! आणि माझ्या हदयात त्याचं बसणं हे त्याचं अस्तित्व!!

नाही का?…

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

jvilasjoshi@yahoo.co.in

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कल्पवृक्ष भेटला तर…. विषय एक : दोन बहिणी – दोन लेख ☆ सौ. राधिका भांडारकर आणि सुश्री अरूणा मुल्हेरकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ कल्पवृक्ष भेटला तर…. विषय एक : दोन बहिणी – दोन लेख ☆ सौ. राधिका भांडारकर आणि सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

☆ कल्पवृक्ष भेटला तर.. ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

देव जरी मज कधी भेटला। माग हवे ते माग म्हणाला…..हे गाणं मला फार आवडायचं.

अजुनही आवडतं…तेव्हां विचार करायची, खरंच देव भेटला तर…?नियोजन हा माझा स्थायी स्वभाव असल्यामुळे मी अगोदरच मागण्यांची यादी करुन ठेवली होती…कारण ऊगीच देव घाईत असला तर ऊशीर नको व्हायला…. आपली तयारी असलेली बरी…!! पण देव काही भेटला नाही.जगाचा कारभार सांभाळण्यात इतका गुंतला की माझ्यासारख्या सूक्ष्म जीवासाठी त्याला वेळच मिळाला नाही…

माझी यादी वर्षानुवर्षे तशीच पडून आहे….

आणि आता अलीकडे माझ्या मनात सहज विचार आला, देव नाही तर नाही, त्याचा एखादा सचीव भेटला तर….

शंकराच्या देवळांत नाही का..? आधी नंदीला पुजावे लागते…

मानवाच्या बाबतीतही कुणा स्टारची भेट हवी असेल तर अगोदर सेक्रेटरीशीच बोलावे लागते…..

मग आठवलं…कल्पवृक्ष…!! स्वर्गातला देवांचा सहकारी…तो भेटला तर…?

मी जपून ठेवलेली ती यादी बाहेर काढली…एकेका मागणीवरुन नजर फिरवली……

तशी म्हणा मागण्यांची सवय माणसाला जन्मजातच असते….मानवाचा पहिला ट्याँहा च मुळी मातेच्या दूधाची मागणी करण्यासाठी असतो….कळत नकळत तो आयुष्षभर मागतच असतो….माझ्यासारख्या सरकारी नोकरीतल्या व्यक्तीला तर संप, मागण्या हे नवीन नाहीच….मागण्या पुर्‍या झाल्या तर आनंद …

मागण्या फिसकटल्या तर पुन्हां संप…

पण कल्पवृक्ष एकदाच भेटणार…संधी वाया घालवायची नाही…एका आंधळ्या गरीब बेघर निपुत्रिक दरिद्री माणसाला देव भेटतो…एकच वर देतो ,म्हणतो माग…

तो मागतो, माझ्या विद्याविभूषित पुत्रपौत्रिकांना सुवर्णाच्या माडीवर, रहात असलेले मला पहायचे आहे…..एकाच वरात त्याने सरस्वती ,लक्ष्मी ,संतती  वैभव दीर्घायुष्य, दृष्टी सगळं मागितलं….

कल्पवृक्ष भेटला तर असेच बुद्धीचातुर्य आपल्याला दाखवावे लागेल…

पुन्हा एकदा यादी ऊलट सुलट वाचली….आणि लक्षात आले ही तर पन्नास वर्षापूर्वीची यादी…आता आपण पैलतीरावरचे …संध्यारंग पाहणारे ..एकेका मुद्यावर फुली मारत गेले…हे कशाला..? हे तर आहे.हेही नको.

याची आता काहीच गरज नाही..नव्वद टक्के यादी तर आपली पुरीच झाली आहे.. मग कल्पवृक्ष भेटला तर काय मागायचे?? बघु. करु विचार.

टी.व्ही लावला.

जगभराच्या बातम्या…कुणा कृष्णवर्णीयावर गोळ्या झाडल्या…. चॅनल बदलला. अल्पवयीन दलित बालिकेवर अत्याचार….मी चॅनल बदलत राहिले … संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून…. शेतकर्‍याची आत्महत्या…  करोनाचे बळी… दुष्काळ. .महापूर, अपघात. शैक्षणिक राजकीय सामाजिक भ्रष्टाचार… आरक्षण वाद… सर्वत्र नकारात्मक वातावरण….. मन सुन्न झाले…टी.व्ही. बंद केला…

सर्वत्र द्वेष, मत्सर, चढाओढ…. कल्पवृक्ष भेटलाच तर काय मागायचे?

विंदांची कविता आठवली… घेता घेता देणार्‍याचे हात घ्यावेत…. बस् ठरलं…. कल्पवृक्ष भेटला तर मागायचे….

“बा कल्पवृक्षा, मला तुझे हातच दे…!!!”

© सौ. राधिका भांडारकर

 

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ कल्पवृक्ष भेटला तर.. ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

स्वच्छ सुंदर सकाळ! निळे निरभ्र आकाश! हवेतील तापमानही १९/२० डिगरी सेलसियस्,त्यामुळे सुखद गारवा! आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर लोकांना चालण्यासाठी जवळ जवळ पांच मैल लांबीचा ट्रेल बांधला आहे. दुतर्फा उंच, हिरव्यागार वृक्षांच्या रांगा! त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी चालायला जा सतत शीतल सावली.

परवा अशीच चालत असतांना मनांत विचार आला वर्षानुवर्ष्ये हे वृक्ष उन्हांत उभे राहून आपल्याला सतत सावली देत असतात, मधूर फळे देत असतात, त्यांच्यावर उमलणार्‍या फुलांच्या सुगंधाने वातावरणांत प्रसन्नता निर्मीत असतात. परोपकार म्हणजे काय ते निसर्गाकडूनच शिकावे. दुसर्‍याच्या जीवनांत आनंद निर्माण करणे हेच यांचे महान कार्य!

मग स्वर्गातील कल्पवृक्ष आणखी वेगळे कसे असतात? असे म्हणतात की कल्पवृक्षाखाली बसून मनांतली एखादी इच्छा व्यक्त केली तर ती ताबडतोब पूर्ण होते. इच्छांची यादी तर खूपच लांबलचक आहे. कधीही न संपणारी. खरोखरच असा कल्पवृक्ष असतो का? आणेल का कोणी त्या वृक्षाला भूतलावर? दिसेल का तो आपल्याला?

चालता चालता माझ्या विचारांची साखळी लांबतच गेली. आता हळूहळू मन बेचैन झाल्यासारखे वाटू लागले. मग walking trail वर अंतरा अंतरावर ठेवलेल्या एका बाकड्यावर मी जरा डोळे मिटून शांत बसले.

काय सांगू ? मला एकदम डोळ्यासमोर लक्ष्मी~विष्णू उभे असल्याचा भास झाला आणि काय आश्चर्य त्या जोडीत मला माझे आई बाबाच दिसले. बाबा विचारत होते,” काय हवं आहे बेटा तुला? तुला जे पाहीजे ते देतो.” मला साक्षात्कारच झाला.

खरेच! आजपर्यंत काय केले नाही माता पित्यांनी आपल्यासाठी?अनेक खस्ता खाल्या, कष्ट केले, आपले सगळे हट्ट पुरविले, आजारपणांत रात्री रात्री जागवल्या. आज समाजांत आपल्याला जे मानाचे स्थान आहे ते केवळ त्यांनी दिलेल्या उच्च शिक्षणाने, त्यांनी घातलेल्या सुविचारांच्या खत पाण्याने, उत्तम संस्कारांने!

खाडकन् डोळे उघडले. खूप आनंद झाला.

अरे! कुठला कल्पवृक्ष शोधतो आहोत आपण?

कल्पवृक्षाच्या छत्र छायेतच तर आपण वाढलो!

धन्यवाद!

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग पहिला) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग पहिला) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆ 

संध्याकाळचे सहा वाजले असावेत. नेहमीप्रमाणे मी गॅसवर चहाच भांडं ठेवलं.

वासू येईलच इतक्यात. एक तासभर समोरच्या बागेत फिरून सहा वाजेपर्यंत येतोच तो.चहा घेत घेत अर्धा तास Zee Business बघतो. नंतर रात्रीच्या जेवणाची वेळ होईपर्यंत आबांच्या खोलीत पुस्तक वाचून दाखवयाला जातो. मी टेबलवर चहा बिस्किटं ठेवली आणी बागेला पाणी घालायला गेले. थोड्या वेळाने देवापाशी दिवा लावण्यापूर्वी रिकामा कप सिंक मध्ये ठेवला. तेव्हढ्यात . .

“सुधा –s s  सुधा चहा  . . .s s s ”

काय हे? केव्हढा ओरडतोय हा! आणी चहा ? परत ?

“वाजलेत किती बघ.आणी आज स्वारीला पुन्हा तल्लफ आलीय? आत्ताच तर घेतलास.”

“कुठे? तू दिलाच नाहीस? काय हो आबा? घेतला का मी चहा?” अरे, आत्ताच तर रिकामा कप धुतला मी. मग हा चहा प्यायला काय भूत आलं होतं कि काय!”

“विसरतेस तू अलिकडे. दिलाच नाहीस तू चहा मला.”

मी थोड्या घुश्शातचं पुन्हा चहा ठेवला.

रात्री नेहमीप्रमाणे झाकापाक केली. उरलेली पोळी भाजी use and throw च्या डब्यात ठेवली. किचनचे लाईटस् ऑफ केले. दारखिडक्या बंद आहेत ना बघून बेडरुमकडं वळले. WhatsApp चे messages चेक केले.

‘आजही वेदचा मेसेज नाही. आता कानच ओढले पाहिजेत याचे’ असं मनात म्हणत मी चादर अंगावर ओढली… काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी चरफडतच ऊठले. किचनची खिडकी ऊघडी राहिली असावी. छे: छे: स्वत: लाच टपली मारून मी किचन मध्ये आले. आणी… आणी… बघते तर काय …. ?

कोपर्‍यावरच्या घरातल्या बकूमावशी मनलावून पोळी भाजी खात बसल्या होत्या.किचनची खिडकीवार्‍याने ‘थाड  थाड’

वाजत होती .अगबा s s ई s s s. माझ्या

अंगावर सर्रकन काटा आला. या… या… इथे?

..   क्क .. क्क्. ..  क… शा?

 क्रमश:

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  deepapujari@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नाटक…एक अपूर्व योगायोग..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ नाटक…एक अपूर्व योगायोग..! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

अगदी न कळत्या वयापासून एक प्रेक्षक म्हणून माझ्या जडणघडणीला सुरुवात झाली त्याला निमित्त ठरलं ते किर्लोस्करवाडीत व्यतित झालेलं माझं बालपण.किर्लोस्करवाडी ही टुमदार काॅलनी.तिथल्या सांस्कृतिक आणि संस्कारक्षम वातावरणातील मोकळे श्वास हेच आमचं (त्या काळातही बाहेरच्या जगात अप्राप्य असणारं) वैभव होतं.माझ्या मनात रुजलेली नाटकाची आवड ही त्या वैभवाचीच देन..!

त्या टुमदार काॅलनीत सुरक्षाव्यवस्थेचा भाग म्हणून बाहेरच्या कुणाचाच परवानगीशिवाय वावर नसे.घरी येणाऱ्या पाहुण्यांनासुध्दा संपूर्ण चौकशी होऊन व रजिस्टरमधे सविस्तर नोंदी करुन घेऊन मगच प्रवेश दिला जात असे.अशा वातावरणामुळे स्थानिकांच्या करमणुकीचं कोणतंच साधन तिथं उपलब्ध नव्हतं.सिनेमा पहायलाही शेजारच्या रामानंदनगरच्या तंबूमधे(टूरिंग टाॅकीज)जावं लागे.तेव्हा रेडिओही घरोघरी नसायचे.

यामुळेच काॅलनीतील नागरीकांची सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन किर्लोस्कर व्यवस्थापनातर्फे पुण्यामुंबईतील व्यावसायिक नाटक कंपन्यांची नाटके निमंत्रित करुन त्याचे खास प्रयोग आम्हाला विनामूल्य दाखवले जायचे.त्या विद्यार्थी दशेत  तिथे पाहिलेली बाळ कोल्हटकरांची ‘वेगळं व्हायचंय मला’,’दुरितांचे तिमिर जावो’,बाबुराव गोखल्यांची ‘करायला गेलो एक’, ‘व-हाडी मानसं’ अशी कितीतरी नाटकं आजही मी विसरलेलो नाहीय.

शेजारच्या कुंडल या गावी त्याकाळी खूप प्रसिध्द असलेली ‘आनंद संगीत मंडळी’ नावाची एक नाटककंपनी होती.खरंतर नाटककंपनी ही संकल्पना नुकतीच लयाला गेलेल्या त्या काळात ही ‘आनंद संगीत मंडळी’ मात्र अद्याप आपला आब राखून कार्यरत होती.किर्लोस्करांतर्फे दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या या कंपनीचा तिथे सलग आठ दिवस मुक्काम असे आणि तो मुक्काम म्हणजे आमच्यासाठी गाजलेल्या संगीत नाटकांची पर्वणी..!माझी पुण्यप्रभाव, मंदारमाला,एकच प्याला सारख्या

सगळ्या गाजलेल्या संगीत नाटकांशी ओळख त्यामुळेच होऊ शकली.

बाबूराव गोखल्यांच्या ‘श्री स्टार्स’या संस्थेचं एक ठळक वैशिष्ठ म्हणजे त्यांच्या जाहिरातीतून जाहीर केली जाणारी नाटक सुरु होण्याची वेळ.प्रयोगाची वेळ रात्री ८वाजून २८ मिनिटे,किंवा ८वाजून १७ मिनिटे अशी एखाद्या शुभकार्याचा मुहूर्त असावा तशी जाहीर केली जायची.आणि तिसरी घंटा रात्री बरोब्बर आठ वाजल्यानंतरच्या नेमक्या त्या मिनिटाला होत असतानाच पडदा उघडला जायचा.नाटकाची अनाउन्समेंट होतानाही पहिला,दुसरा,तिसरा अंक संपण्याच्या आणि पुढचा अंक सुरु होण्याच्या अशाच ‘नेमक्या’ वेळा उदघोषित करून पाळल्याही जायच्या.त्यांची नाटकेही तशीच दर्जेदारही असायची.पण वेळेच्या बाबतीतली त्यांची ती शिस्त मात्र एकमेवाद्वितीयच.वेळेचं हे नियोजन खरंच थक्क करणारं.आज आठवलं तरी हे सगळं अविश्वसनीय आणि म्हणून स्वप्नवतच वाटत रहातं.

याखेरीज तिथल्या सोशलक्लबतर्फे काॅलनीतील हौशी कलाकारानी स्वत: बसवून सादर केलेली असंख्य नाटकेही आनंद देऊन गेलेली आहेत.एका वर्षी स्थानिक हौशी कलाकारांनी बसवलेल्या पु.लंच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकात पुढे कवी आणि गीतकार म्हणून रसिकप्रिय झालेल्या , तेव्हा नवतरूण असलेल्या सुधीर मोघे यानी केलेल्या कवी संजीव या भूमिकेची आठवणही मी विसरलेलो नाहीय.(श्रीकांत आणि सुधीर मोघे हे बंधूद्वय त्याकाळचे वाडीकरच.)

माझ्या न कळत्या वयापासून दर्जेदार नाटके सातत्याने पहायचा योग किर्लोस्करवाडीतील आमच्या वास्तव्यामुळे आला हे खरेच,पण पुढेही नोकरीनिमित्ताने मी प्रथम मुंबईत गेलो तो १९७१-७२चा काळ हा प्रायोगिक रंगभूमीचा पायाभरणीचा काळ तर होताच शिवाय आधुनिक व्यावसायिक रंगभूमीचा भरभराटीचा काळही होता.त्यात योगायोगाने माझे वास्तव्य शिवाजी मंदिरला चालत जाता येईल अशा दादरच्या नूर बिल्डिंग

मधे.त्यावेळच्या पगाराचा विचार केला तर तेव्हाचे नाटकांचे ४-५ रुपयांचे दरही न परवडणारेच वाटायचे.पण बालपणीच मनात पेरली गेलेली नाटकाची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हतीच.मग जमेल तिथे टोकाची काटकसर करत पैसे साठवून शिवाजी मंदिरला जाऊन नाटकं पहायची चैन करावी लागायची.त्यावेळी मी पाहिलेल्या नटसम्राट, संध्याछाया, जास्वंदी,अशा पुढे मैलाचा दगड ठरलेल्या असंख्य नाटकांनी माझ्यातला प्रेक्षक घडवतानाच माझ्याही नकळत माझ्या अभिरूचीला योग्य वळणही लावलं.पुढच्या काळात मी पाहिलेल्या विषवृक्षाची छाया, पुरुष,बॅरिस्टर,गारंबीचा बापू, हयवदन,ऋणानुबंध,सख्खे शेजारी,नातीगोती,हमीदाबाईची कोठी,महासागर यासारख्या असंख्य नाटकांच्या विषयवैविध्य आणि सकस मांडणीने मला कधीच विसरता न येणारा नाट्यानुभव दिलेला आहे.प्रेक्षकम्हणून मला घडवण्यात या सगळ्याच नाटकांचा महत्वाचा वाटा आहे.

या वेळेपर्यंत एक आवड म्हणून कथालेखनाचा व्यासंग जपलेल्या आणि त्यात बऱ्यापैकी स्थिर झालेल्या मला नाट्यलेखन हे एक वेगळंच तंत्र आहे आणि ते आपल्याला जमणार नाही असंच वाटायचं आणि मग मी दुधाची तहान ताकावर भागवावी तसा डोळसपणे नाटके पहात रहायचो.मी नाट्यलेखनाकडे वळलो तेही पुढे खूप वर्षांनंतर.तोही अतिशय अनपेक्षित योगायोगच होता.त्या संपूर्ण प्रवासाबद्दलही सांगण्यासारखं बरंच कांही आहे पण ते पुन्हा कधीतरी…!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 7 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 7 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

 

पहाटेच्या वेळी एकदा एक कळी हळूच आली

आपले मनोगत हळुवार सांगून गेली.

रात्र कधीची संपली,पहाट झाली.

ही कळी म्हणजे माझ्या मनात नृत्य शिकण्या विषयी विचारांनी घेतलेला जन्म. या कळीला हळूवार फुंकर घातली धनश्री ताई रुपी वाऱ्या ने हळूवार फुंकर घालत असताना त्या कळीच्या आणि वाऱ्याच्या झालेल्या एकत्र प्रवासाविषयी थोडेसे.

खरेतर सुरुवातीला भरतनाट्यम हा नृत्यप्रकार शिकणे केवळ आणि केवळ डोळ्यांनी पाहून शिकणे हीच कला आहे. त्यामुळे सुरुवातीला मोठा अडसर ताईंच्या आणि माझ्या वाटेत उभा होता.

पण ताईंनी माझं मन नावाचं organजा गं करायला सुरुवात केली. आणि आमच्या दोघांच्याही असं लक्षात आलं की शरीर हे केवळ माध्यम आहे, साधन आहे आणि शरीरा पलीकडे म्हणजे अतिंद्रीय शक्तीच्या आधाराने आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो. ताईनी मग स्पर्श, बुद्धीआणि मनातील अंतरिक प्रेमभाव यांच्या माध्यमातून नृत्य शिकवायला सुरुवात केली. अशाप्रकारे नृत्यातील अडवू, हस्त मुद्रा शिकत असताना कधी आमचे सूर जुळून गेले हे कळलेच नाही.

नृत्यामध्ये बरीच अवघड वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असतात. जसे की डावा हात डोक्यावर असताना उजवा पाय लांब करणे, उजवा हात कडेला असताना डाव्या पायाचे मंडल करणे, भ्रमरी घेताना उजवा हात डोक्यावर ठेवूनडावा हात फिरवत उजवीकडून वळणे आणि त्याच वेळी गाण्या नुरूप चेहऱ्यावरचे हावभाव दाखवणे. अशा खूप अवघड अवघड गोष्टी ताईंनी अगदी कौशल्यपूर्ण रीतीने शिकविल्या. खरंतर दृष्टिहीन व्यक्ती ला समोर असलेले पाण्याचे भांडे घे हे सांगताना दुसऱ्याची खूप तारांबळ होते. पण इथे तर अच्छे मृत्य शिकवायचे होते.

नृत्याचे शिक्षण प्रशिक्षण जसजसे पुढे जात होते तसच या नवीन अडचणी समोर येत होत्या.  ८-९ वर्षे शिकल्यानंतर अभिनयाचा भाग आल्यानंतर प्रश्न निर्माण झाला तो अभिनय  शिकविण्या विषयी. पण पण तिथेही ताईंनी आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून घेतला आणि लहान मुलांना गोष्टी सांगून जसे मनात भाव निर्माण केले जातात त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला.

माझ्या अनेक अडचणी मध्ये मला येणारी अडचण म्हणजे आवाजाची .नृत्यात गिरकी घेतल्यानंतर माझे तोंड प्रेक्षकांच्या कडे आहे की बाजूला हे मला कळत नसे. पण या अडचणीवरही ही ताईंनी मात केली आणि आवाजाची दिशा ही नेहमी माझ्यासमोरच ठेवली की ज्याच्या आधाराने माझे दोन फिरून समोरच येत असे.

ताईंचे अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन, त्यांनी घेतलेले कष्ट, माझी मेहनत, रियाज आणि साधना याचा परिपाक असा झाला की मी नृत्यामध्ये गांधर्व महाविद्यालयाची  नृत्य विशारद ही पदवी, कला वर्धिनी चा ५ वर्षा चा कोर्स, टिळक महाराष्ट्र विद्यापीठा ची नृत्यातली एम. ए. ही पदवी,यशस्वी रित्या संपादन केली.ज्यामुळे आज मी अनेक ठिकाणी,माझ्या एकटीचा स्टेज प्रोग्राम करू शकत आहे.

या माझ्या यशाचे कौतुक अनेक वर्तमान पत्रांनी आणि दूरदर्शन वरील अनेक वाहिन्यांनी, प्रसार माध्यमांनी भरभरून केले.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर ! ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

आज त्रिपुरी पोर्णिमा! दसरा दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते. त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो ! तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो.लहानपणी त्रिपुर पहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू!

वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ उजळून  गेलेली दिसत असे. गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दिप माळा मी खूप पाहिल्या.

पण… माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला! सासुबाई  सांगत, ‘समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला! त्याकाळी जन्मवेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! आणि लग्नानंतर तारखे पेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला ह्यांचा वाढदिवस साजरा केला जाई!

सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात प्रकाश भावजींचा पुढाकार असे. मग मुले आणि आम्ही सर्वजण पणत्या , मेणबत्या घेऊन त्रिपुर लावण्यात मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या स्निग्ध प्रकाशाने उजळून गेलेले पहाण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे. शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या  तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे नीरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खुपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!

प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस शालीत गुरफटून  घेत डिसेंबर ,जानेवारी येतात, पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.

ह्यांच्या आयुष्याचे 70 त्रिपूर पूर्ण झाले! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो,असेच आनंदाचे, आरोग्याचे टिपूर चांदणे यांना आयुष्यभर मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! जीवेत शरद: शतम्!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 74 ☆ चेत जाओ ! ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।

श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली  कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 74 – चेत जाओ ! 

रेल में भीड़-भड़क्का है। हर कोई अपने में मशगूल। एक तीखा, अनवरत स्वर ध्यान बेधता है। देखता हूँ कि साठ से ऊपर की एक स्त्री है संभवतः जिसके स्वरयंत्र में कोई दोष है। बच्चा मचलकर किसी वस्तु के लिए हठ करता है, एक साँस में रोता है, कुछ उसी तरह के स्वर में भुनभुना रही है वह। अंतर बस इतना कि बच्चे के स्वर को बहुत देर तक बरदाश्त किया जा सकता है जबकि यह स्वर बिना थके इतना लगातार है कि खीज़ पैदा हो जाए। दूर से लगा कि यह भीख मांगने का एक और तरीका भर है। वह निरंतर आँख की ज़द से दूर जा रही थी और साथ ही कान भुनभुनाहट से राहत महसूस कर रहे थे।

किसी स्टेशन पर रेल रुकी। प्लेटफॉर्म की विरुद्ध दिशा से वही भुनभुनाहट सुनाई दी। वह स्त्री पटरियों पर उतरकर दूसरी तरफ के प्लेटफॉर्म पर चढ़ी। हाथ से इशारा करती, उसी तरह भुनभुनाती, बेंच पर बैठे एक यात्री से अकस्मात उसका बैग छीनने लगी। उस स्टेशन से रोज़ यात्रा करनेवाले एक यात्री ने हाथ के इशारे से महिला को आगे जाने के लिए कहा। बुढ़िया आगे बढ़ गई।

माज़रा समझ में आ गया। बुढ़िया का दिमाग चल गया है। पराया सामान, अपना समझती है, उसके लिए विलाप करती है।

चित्र दुखद था। कुछ ही समय में चित्र एन्लार्ज होने लगा। व्यष्टि का स्थान समष्टि ने ले लिया। क्या मर्त्यलोक में मनुष्य परायी वस्तुओं के प्रति इसी मोह से ग्रसित नहीं है? इन वस्तुओं को पाने के लिए भुनभुनाना, न पा सकने पर विलाप करना, बौराना और अंततः पूरी तरह दिमाग चल जाना।

अचेत अवस्था से बाहर आओ। समय रहते चेत जाओ अन्यथा समष्टि का चित्र रिड्युस होकर व्यष्टि पर रुकेगा। इस बार हममें से कोई उस बुढ़िया की जगह होगा।

© संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

writersanjay@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फिरूनी नवी जन्मेन मी ☆ सौ. अंजली गोखले

☆ विविधा ☆  फिरूनी नवी जन्मेन मी ☆ सौ. अंजली गोखले ☆

सकाळपासून गल्लीमध्ये काहीतरी विचित्र हालचाल जाणवत होती. त्या वृक्षाच्या आसपास ज्यांच्या गाड्या होत्या त्या हलवण्यासाठी सगळ्यांना फोन केले गेले. कुऱ्हाडी, मोठाले दोर घेऊन माणसे झाडाभोवती गोळा झाली होती.. सगळेजण  वर बघून बघून निरीक्षण करत होते.  अन ते दृश्य बघून माझ्या मनात चर्र झाले.संशयाची पाल मनात चुकचुकली. आम्हा  मैत्रिणींना जे होऊ नये असे वाटत होते तेच घडणार होते.

काही वर्षापूर्वी मुद्दाम कोणीही वृक्षारोपण न करता समोरच्या बिल्डींगच्या बाहेर एक इवलेसे झाड वाढायला लागले होते. ना कोणी त्याला पाणी घालत होते, ना कोणी त्याची निगा राखत होते.बघता बघता त्याचे खोड गलेलठ्ठ झाले,वेगाने त्याच्या फांद्या इतस्ततः फैलावत गेल्या. छोट्या-छोट्या हिरव्यागार पानांनी डोळ्यांना गारवा दिला.ते झाड अलगदपणे सावली द्यायला लागलं. रखरखीत उन्हामध्ये जाणा येणाऱ्या ला दोन मिनिटांचा का होईना. पण शांतपणा जाणवायला लागला.

झाडाच्या टोकाला झिप्री गुलाबी नाजूक नाजूक फुले डोलायला लागली. आमच्या मनाला ते झाड आनंद,विसावा,गारवा द्यायला लागलं. पण त्याच वेळी याच वाढलेल्या फांद्या मुळे बिल्डिंग मध्ये अंधार पडायला लागला. झाडाच्या पानांची पानगळ होऊन घरामध्ये उडून येऊन कचरा व्हायला लागला. झाडणार्‍या म्युनिसिपालिटीच्या कामगारांनाही त्या वाळक्या पानांचा कचरा त्रासदायक व्हायला लागला. रोज त्या झाडाला शिव्या घालत घालत, झाडून वाळलेली पाने त्याच झाडाच्या बुंध्यापाशी जाळायला सुरूवात झाली. बिचारे झाड ते चटके सहन करत होते. आपला देण्याचा स्वभाव ते सोडत नव्हते  की चटके देणाऱ्याला शिव्याशाप मुळीच देत नव्हते.

एकदा अशीच एक माकडांची टोळी आली. त्या झाडावर उड्या मारुन मारुन धुमाकूळ घालायला सुरुवात केली. बिल्डिंगच्या गॅलरीमध्ये त्यांनी हैदोस घातला आणि झाडाबद्दल चा लोकांचा दुस्वास वाढायला लागला. सगळ्यांना ते नकोसे झाले. त्या झाडाच्या सावली पेक्षा,त्या शीतल गारव्या पेक्षा लोकांच्या डोळ्यांमध्ये तिरस्काराचे अंगारे फुलत गेले.

अखेर बहुमताचा विजय झाला आणि त्या आमच्या लाडक्या,डेरेदार हिरव्यागार वृक्षावर सपासप कुऱ्हाड चालवायला सुरुवात झाली.बघता बघता झाडाच्या फांद्या रस्त्यावर कोसळत होत्या.वेदनांचे घाव झेलत तो वृक्ष निर्दयी माणसापुढे शरण येऊन आपली होणारी कत्तल मुकाट्याने सहन करत होता. ज्या इवल्याशा रूपाचे डेरेदार वृक्षा मध्ये रूपांतर व्हायलाअनेक वर्षे लागली,तोच डेरेदार वृक्ष बिना फांद्यांचा बोका बोका दिसायला लागला काही तासांमध्ये!

हाच तो वृक्ष होता जो हवेतील कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेत होता आणि आम्हाला हवा असलेला ऑक्सिजन फुकट देत होता. जो आपल्या हिरव्या पानांच्या मदतीने आपले अन्न आपणच बनवत होता. त्यांनी आमच्याकडे कधीही भीक मागितली नव्हती, “द्या हो आम्हाला खायला. द्या हो आम्हाला पाणी प्यायला”. आपल्या मुळां वाटे आपल्यालालागणारे पाणी आपल्या पण तो मिळवत होता. उंच उंच गेलेल्या फांद्यांच्या शेवटच्या पानापर्यंत ते पाणी पोहोचवत होता.

त्याच उंचीपर्यंत पाणी घेण्यासाठी आम्हाला इलेक्ट्रिक मोटर लागते. त्यासाठीचे बिल आम्ही भरतो. एक पैसाही खर्च न करता आपली गरज तो आपणच पूर्ण करत होता. आम्हाला सावली देत होता पण आम्हाला त्याचे हे फायदे, तो उपयोग कधीच दिसला नाही.

एक मताने झाडावर कुऱ्हाड मारून मारून संध्याकाळपर्यंत त्या महान वृक्षाचे होत्याचे नव्हते झाले. रस्त्यावर मोठमोठाल्या लाकडांचा खच पडला होता. निष्प्राण पाने जमिनीवर झोपली होती. पानांचे, फांद्यांचे, खोडाचे श्वास घेणे पूर्णपणे थांबले होते. आता फक्त निर्जीव लाकडे झाली होती.संध्याकाळ पर्यंत टेम्पो मधून लाकडाचे ओंडके भरून भरून नेले गेले. निर्जीव हिरवी पाने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांनी आणखीनच मारून टाकली.

अंधार पडला, रात्र झाली. झाडाच्या त्या रिकाम्या रिकाम्या जागेला मी मनोमन श्रद्धांजली वाहिली. “किती जरी तुझा त्रास झाला तरी तू आम्हाला सावली दिली होतीस रे! आमच्या डोळ्यांना तुझ्या हिरवाईने गारवा दिला होतास.”

रात्री लवकर झोप लागेना. तो प्रचंड वृक्ष डोळ्यासमोरून हलत नव्हता. तेवढ्यात माझ्या कानाशी कोणी कुजबुजले, “अगं वेडे,.. नको मनाला लावून घेऊ. आमचे संपूर्ण आयुष्यच तुमच्याच साठी आहे. आम्ही हवा शुद्ध करतो, तुम्हाला फुले फळे देतो, सावली देतो. थोडं स्पष्ट बोलतो वाईट वाटून घेऊ नको, टेम्पो मधून जी सगळे लाकडे भरून ने ली गेली ना, ती सुद्धा तुमच्या शेवटी तुम्हालाच उपयोगी पडणार आहेत. तुला एक सांगतो तुझ्या घरी एक फुलझाड लाव ना ! येईनच मी तुला भेटायला फुलांच्या रूपात.

इवलेसे रोप माझ्या स्वप्नांमध्ये रुजले आणि वाढायला लागले.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ६) – भैरव ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ६) – भैरव ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

रागांविषयी एक पौराणिक कथा अशी आहे कि, भगवान शंकरांनी पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण आणि (आकाश)ऊर्ध्वदिशा अशा पाच दिशांकडे मुख केले असताना त्यांच्या मुखातून अनुक्रमे भैरव, हिंडोल, मेघ, दीपक व श्री ह्या पाच रागांची उत्पत्ती झाली आणि ‘कौशिक’ ह्या सहाव्या रागाची उत्पत्ती देवी पार्वतीच्या मुखातून झाली. ह्यापैकी ‘भैरव’ ह्या रागाविषयी आज थोडेसे जाणून घेऊया.

मागच्या भागात दहा थाटांविषयी जाणून घेताना ‘भैरव’ हा एक थाटही असल्याचे आपण पाहिले. ज्यावेळी एखाद्या थाटाचे नावच रागाला दिले जाते तेव्हां त्या रागास जनकराग किंवा आश्रयराग असे म्हणतात आणि त्याच थाटातून निर्माण होणाऱ्या इतर नाव असलेल्या रागांना त्या थाटाचे जन्यराग असे म्हणतात. त्यामुळे भैरव हा भैरव थाटाचा जनकराग म्हणता येईल.

भैरव रागाचे आरोह-अवरोह अनुक्रमे, सा (रे) ग म प (ध) नि सां आणि सां नि (ध) प म ग (रे) सा. अर्थात, थाटातल्याच स्वरांनुसार रे आणि ध कोमल व बाकी सगळे स्वर शुद्ध आहेत. रागाचा वादी स्वर ध आणि संवादी स्वर रे असून हा प्रात:कालीन ‘संधिप्रकाश’ राग आहे. ह्या रागाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे अवरोहात ग वरून रे वार येताना मधे म ह्या सुराला स्पर्श करून यावं लागतं. म्हणूनच भैरवच्या इतर प्रकारांमधेही हा नियम पाळलेला दिसून येतो. दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ह्या रागातील रे आणि ध हे दोन सूर आंदोलित आहेत, त्यामुळेच ह्या रागाची गंभीर प्रकृती अधोरेखित होते असं मला वाटतं.

मुळात आंदोलन म्हणजे काय? पूर्वीच्या काळचं जितके वाजले तितके ठोके देणारं लंबकाचं घड्याळ सर्वांनाच माहिती असेल. त्यातल्याह दोन ठोक्यांच्या मधे तो लंबक एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत फिरायचा. ती दोन टोकं म्हणजे दोन सूर असं आपण समजूया. तर, जो सूर आंदोलित असेल त्याच्या मागच्या/पुढच्या (रागानुसार मागच्या कि पुढच्या सुराला स्पर्श होतो हे बदलते) स्वराला स्पर्श करून पुन्हा त्या सुरावर यायचं, अशा प्रकारे तो सूर गायला जातो. भैरवात ‘रे’ गाताना ‘ग’ ला स्पर्श करून आणि ‘ध’ गाताना ‘नि’ ला स्पर्श करून तो पुन्हापुन्हा गायला जातो. भैरवच्या चलनानुसार वरती जाताना बहुतेक वेळा गमधनिसां असं ‘प’ ला उल्लंघून गायलं जातं.

‘भैरव’ म्हणून त्या रागाची बारीक-सारीक वैशिष्ट्ये सूक्ष्मपणे मांडायची झाली तर अजूनही बरंच काही लिहिता येईल. परंतू, फक्त श्रवणानंद घेणाऱ्या श्रोत्यांना एकदम खूप बारकावे लिहून गोंधळात टाकायला नको म्हणून तितक्या खोलात शिरणे मी मुद्दाम टाळतेय.

कर्नाटकी संगीतात तर मूळ सप्तक हे आपल्या भैरव रागाचे स्वर आहेत. त्यामुळेच कि काय, त्यांच्या पद्धतीत विद्यार्थ्यांना ह्याच रागापासून शास्त्रीय संगीत शिकवायला सुरु करतात. कर्नाटकी संगीतपद्धतीत ह्या रागाचं नाव ‘मायामालवगौळा’ असं आहे. शास्त्रीय संगीतकारांचा हा आवडता राग असला तरी थोडा गंभीर प्रकृतीचा असल्याने सुगम संगीतात ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर आढळून येत नाही.

संसार चित्रपटातील ‘अम्मा रोटी दे’ हे गीत ऐकताना अंगावर काटा येतो इतका भैरवचा प्रभावी वापर तिथं झाला आहे. ‘जागो मोहन प्यारे’ हे गीत भैरव रागाची आठवण करून देते असं मी म्हणेन कारण इतर काही स्वरांचा वापर काही ठिकाणी रचनेत झाला आहे. संगीत स्वयंवर मधील ‘गवळण होऊनिया फिरता’ आणि ‘धाडिला राम राम तिने का वनी?’ह्या नाटकातील ‘मंद मंद ये समीर’ ह्या रचनांचीही ‘भैरव’निमित्ताने आठवण होते… नुसती आठवण म्हटलं कारण रचनेत सगळंच अगदी भैरवबरहुकूम नाही!

अगदी हेच आरोह-अवरोह असणारा परंतू वादी ‘प’ आणि संवादी स्वर ‘सा’ असणारा आणि अर्थातच इतर रागस्वरूप, रागचलन भैरवहून भिन्न असणारा राग म्हणजे ‘कालिंगडा’! ह्या रागात रे आणि ध ला आंदोलन घ्यायचं नाही, असं हा राग शिकवायला सुरू करण्यापूर्वीच गुरुजन सांगतात आणि इतरही बारकाव्यांसहित कसं गायचं व कसं गायचं नाही, हे गाऊनही दाखवतात. पुस्तकात दोन्ही रागांचे आरोह-अवरोह सारखेच दिसतील मात्र गुरुजन त्यात जाणीवपूर्वक राखायचा फरक सांगत त्या-त्या रागाची तालीम देतात. अशी ‘गुरुमुखी विद्या’ मिळाली तरच आपण रागाची शुद्धता राखू शकतो.

कालिंगडा रागावर आधारित मात्र बऱ्याच रचना आढळून येतात. संगीत स्वयंवर नाटकातील ‘मम मनी कृष्णसखा रमला’ हे सुंदर पद ह्याच रागातले! ‘जाळीमंदी पिकली करवंदं’, ‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘बुगडी माझी सांडली गं’ अशा प्रसिद्ध लावण्यांमधे ह्या रागाचा वापार दिसून येतो. गंभीर भैरवहून अगदी भिन्न अशी ह्या रागाची चंचल प्रकृती अशा रचनांसाठी पोषक ठरली असावी. बैजू बावरा मधील ‘मोहे भूल गए सावरिया’ ही रचनाही ह्या रागावर आधारित म्हणता येईल. त्याच स्वरांच्या विशिष्ट वापरानुसार बदलत जाणारी दोन्ही रागांची प्रकृती ह्या रचनांच्या आधारेही थोडीफार उमजू शकेल.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आधुनिक शाळेतील एक दिवस ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ आधुनिक शाळेतील एक दिवस ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(सर्व पात्रे आणि लेख काल्पनिक)

चांगली हायस्कुलच्या  ७ वी तील एक वर्ग. शनिवारचा  सकाळचा दिवस. शनिवारची अर्धीच शाळा असल्याने सगळे तसे आनंदातच होते.  हनुमान पूजेचा सेक्रेटरी  लवकरच आला होता. द्रोणागिरी पर्वत उचलून घेऊन जात असलेला हनुमानाचा फोटो  त्याने पेन ड्राईव्ह वरून मेन सर्व्हर  वर उतरवूनन घेतला होता. जे वर्गात येत होते त्यांच्या कडून  डेबिट / क्रेडिट कार्ड घेऊन  तो वर्गणीच्या मागे लागला होता. हळूहळू एक एक जण वर्गात येत होते  आणि आल्या आल्या आपला लॅपटॉप चालू करत होते. संगणक चालू होता क्षणी लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकला की आपोआप हजेरी लागायची.

बंड्या आल्यापासून लॉगीन करण्याचा प्रयत्न करत होता पण  ते होत नव्हते. २-३ दा  तसे झाल्यावर त्याच्या लक्षात आले या महिन्याची फी भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि त्याने फी भरली नव्हती. शेवटी स्पेशल परमीशन घेण्यासाठी तो तडक मुख्याध्यापकांकडे पळाला.

जग्गू वर्गात आला तेच जरा रागावत. त्यात ‘स्वाइप से  (मशीन) करेंगे सबका स्वागत’ असे म्हणत जेंव्हा मारुती पूजेचा सेक्रेटरी त्याच्या जवळ पोचला  तेव्हा  तो म्हणाला  नाही देत वर्गणी जा.  काल गुरुजींनी रात्री उशीरा व्हाटसप ग्रुप वर घरचा अभ्यास  म्हणून निबंध लिहायला सांगितला होता  ‘व्यसन शाप की वरदान’. जग्गूने या सेक्रेटरीला  मेसेज टाकून  हिंट/मुद्दे  देण्यास सुचवले होते पण त्याचा रिप्ल्याय न आल्याने तो रागावलेला होता.

इकडे चंपा आज लँपटाॅप चा चार्जर आणायला विसरली होती. तिने राणीकडे मागताच तिने नकार दिला. म्हणाली तू माझ्या मेसेजना ग्रुपवर एकदा तरी लाईक देतेस का? मग मी का म्हणून देऊ CHARGR? प्रश्न रास्त होता.

या सगळ्या गडबडीत  वर्ग शिक्षक आले. रिमोट कंट्रोल ने त्यांनी डिजिटल फळा खाली घेतला आणि त्यांचा संगणक चालू करून प्रोजेक्टर  वरून  डिजिटल फळ्याशी लींक केला.  सर्वाना ३०/१२ तारखेवर क्लिक करायला सांगितले.  तत्क्षणी मारुती राया आले. त्यांची डिजिटल पूजा झाली, भीमरूपी स्तोत्र mp3  वर वाजू लागले, आरती झाली  आणि नंतर प्रसाद म्हणून ( प्रत्यक्ष ) खोबरे दिले गेले. त्यानंतर प्रत्येकाच्या संगणकावर आजचे वेळापत्रक पॉप -अप झाले.

पहिलाच तास गणिताचा निघाला. आज सर शिकवणार होते चक्रवाढ जीएसटी आणी रोजचे बदल हे कोष्टक. फळ्यावर दिसणारे आकडे आले तसे गेले. यात मोजक्या हुशार मुलां शिवाय कुणाला काहीही कळले नाही

दुसरा तास होता संस्कृत.  आफळे सर वर्गात आले  आणि त्यांनी भगवद्गीतेतील एक श्लोक  शिकवायला घेतला.  त्यातले ‘सोमरस’ चे वर्णन वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या.. आफळे सरांनी ही मग  मुलांच्या मनातील सर्व प्रश्णांचे वेगवेगळी उदाहरणे सांगून  शंकानिरसन केले.हा तास संपूच नये असं पहिल्यांदाच सगळ्यांना वाटत होते. पण तेवढ्यात संगणकावर  नागरिकशास्त्र  तास पॉप-अप झाला. पण आज कुलकर्णी सर न आल्याने अचानक ‘अमरधाम’ खेळ म्हणून बदल आला.

इंडियन पिनल कोड पासून सुटका झाली म्हणून  मुल आनंदली आणि अगदी  फ़टाफ़ट  त्यांनी डेस्टोप वरचे  ‘अमरधाम अँप’ चालू केले. आज दोन ग्रुप करून पोकेमॉन  खेळायचे यावर वर्गातील तमाम  मुला – मुलींचे  एकमत झाले आणि हा तास कसा संपला ते कळलेच नाही

नशीब महिना अखेर आणि त्यात शनिवार म्हणून  तुम्हाला एवढेच वाचायला मिळालं, पूर्ण  दिवसाचा वर्ग भरला असता तर?  माझं/तुमचं काय खरं नव्हतं

पण  हे वाचतांना एकदा तरी मनाने शाळेत  जाऊन आलात ना?

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares