मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दहावी पास… (अनुवादित कथा) — भाग १  मूळ हिन्दी लेखिका : पूजा मिश्रा  ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ दहावी पास… (अनुवादित कथा) — भाग १  मूळ हिन्दी लेखिका : पूजा मिश्रा  ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे

ढचे दोन दिवस घरात स्मशानशांतता पसरली होती.  घर विकण्याचे नक्की झाले होते.  दलाल येणार होता.  रोहित आणी मोहित कागजी कारवाईत व्यस्त होते.  सुमित्रा देवींनी बघितलं की त्यांच्या पतींना रात्री झोप येत नव्हती.  त्यांना माहित होतं की हे घर म्हणजे त्यांचा आत्मा आहे.

सायंकाळ च्या चहाची वेळ होती.  माजघरात सोफ्यावर बसलेले मिस्टर खन्ना आणि त्यांची दोन्ही मुलं – रोहित आणि मोहित – चिंताग्रस्त होते.  घरातील वातावरण तनावग्रस्त होते.  खन्ना टेक्सटाइल्स, जे कधी शहराचा अभिमान म्हणून ओळखले जात होते, आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती.  मागील सहा महिन्यांपासून बाजारातील मंदी आणि एक मोठी ऑर्डर रद्द झाल्याने परिस्थिती अजून खराब झाली होती.  बँकेची नोटिस आलेली होती – जर पुढच्या पंधरा दिवसांत पन्नास लाख रुपये जमा नाही केले, तर त्यांचे वडिलोपार्जित घर आणि कारखाना, दोघांचा लिलाव केला जाईल.

स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता.  55 वर्षांच्या सुमित्रा देवी, मिस्टर खन्नांच्या पत्नी, नेहमीप्रमाणे रात्रीच्या जेवणाची तयारी करण्यात व्यस्त होत्या.  त्या अधूनमधून माजघराकडे बघत होत्या, परंतु तेथे सुरू असलेल्या गंभीर विचारविनीमयात दखल देण्याची त्यांची हिम्मत होत नव्हती.

“पप्पा, आता दूसरा काही रस्ता दिसत नाही.  आपल्याला हे घर विकावेच लागेल, ” रोहित डोकं गच्च धरत म्हणाला.  त्याने एमबीए करून आता व्यवसाय सांभाळत होता, पण आज त्याच्या सर्व पदव्या त्याला फोल वाटत होत्या.

मोहित, जो अजून कॉलेज मध्ये शिकत होता आणि व्यवसायात ही हातभार लावत होता, त्यानेही भावाचीच री ओढली.  “दादा बरोबर बोलत आहे.  कारखाना वाचवण्यासाठी घर तर विकावेच लागेल.  आणि असंही, आता एवढ्या मोठ्या बंगल्याचं आपण करणार तरी काय? एखाद्या भाड्याच्या फ्लॅट मध्ये रहायला जाऊ “

मिस्टर खन्ना यांच्या डोळ्यात अश्रू होते.  हे घर त्यांच्या वडिलांची आठवण होती.  “रोहित, बाजारातून काही उसने पैसे मिळू शकत नाहीत का? किंवा कुणी गुंतवणुकदार?”

“पप्पा, मार्केट मध्ये आधीच बातमी पसरली आहे की आपण धंद्यात बुडत आहोत.  कोणी पैसा लावण्यास ईच्छुक नाही.  आणि नातेवाईक? त्यांनी तर फोन उचलणंही बंद केलं आहे, ” रोहित वैतागून म्हणाला.

तेव्हड्यात सुमित्रा देवी ट्रे मध्ये चहा आणि नाश्ता घेऊन तेथे आल्या.  टेबलावर कप ठेवत त्यांनी हळू आवाजात विचारले, “अहो काय झालंय? तुम्ही लोकं एवढे चिंतित का दिसतात? बँक वाले पुन्हा आले होते का? “

रोहित ने चिडून आपल्या आई कडे बघितलं.  “आई, कृपया! तू चहा ठेव आणि स्वयंपाकघरात जा.  या बिजनेस च्या गोष्टी आहेत, तुला नाही समजणार.  तूला फक्त घरातील किराणा आणि भाजीपाल्याचा हिशोब समजतो, हा करोड़ोंचा विषय आहे. “

सुमित्रा देवींचा हात क्षणभर थरथरला, पण त्यांनी स्वतःला सावरलं.  ही काही पहिली वेळ नव्हती की त्यांना ‘फक्त गृहिणी’ असल्याची जाणिव करून दिली गेली होती.  “बाळा, मी फक्त विचारत होती.  जर माझी काही मदत… “

“मदत? ” मोहित चेष्टेत हसत म्हणाला, “आई, तू काय मदत करशील? तुझ्या किटी पार्टी च्या मैत्रिणींना पैसे मागशील? की पप्पांची जुनी स्वेटरं उधडून विकशील? बघ, आम्ही आधीच खूप तनावात आहोत.  तू फक्त जेवण बनव.  तेवढंच येतं तुला. “

मिस्टर खन्नांनी पण मुलांना टोकलं नाही.  बहुतेक त्यांनाही असंच वाटत असावं की सुमित्रा, ज्या दहावी पास होत्या आणि ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त चुल आणि मुल सांभाळण्यातच धन्यता मानली होती, त्या या आर्थिक संकटात काय मदत करू शकणार?

सुमित्रा देवी तेथून शांतपणे निघून गेल्या.  त्यांच्या डोळ्यांत अश्रू नव्हते परंतू हृदयात एक विचित्र बोच होती.  त्यांना याचं दुःख नव्हतं की मुलं त्यांचा अवमान करीत होते, परंतू याचं होतं की आपल्या आई ला ते इतकं नगण्य समजत होते.

पुढचे दोन दिवस घरात स्मशानशांतता पसरली होती.  घर विकण्याचे नक्की झाले होते.  दलाल येणार होता.  रोहित आणी मोहित कागजी कारवाईत व्यस्त होते.  सुमित्रा देवींनी बघितलं की त्यांच्या पतींना रात्री झोप येत नव्हती.  त्यांना माहित होतं की हे घर त्यांचा आत्मा आहे.

तिसर्‍या दिवशी सकाळी, जेव्हा रोहित दलाल ला फोन करणारच होता की, सुमित्रा देवींनी त्याला थांबवलं.  “रोहित, एक मिनिट थांब.  मला तुम्हा सर्वांशी काही बोलायचं आहे. “

रोहित ने घड्याळात पाहीलं, “आई, आता नाही, दलाल इतक्यात येईलच.  घराचा व्यवहार करायचा आहे. “

“घर विकलं जाणार नाही, ” सुमित्रा देवींच्या आवाजात एक अशी दृढ़ता होती जी आधि कधी कुणी ऐकली नव्हती.

मिस्टर खन्ना, रोहित और मोहित- तिघं चमकून त्यांचेकडे बघू लागले.

“घर विकलं जाणार नाही म्हणजे? आई, तू भावनिक होत आहेस, जरा व्यावहारिक विचार कर.  पन्नास लाख रुपये आकाशातून टपकनार नाहीत, ” रोहित चढ्या आवाजात बोलला.

सुमित्रा देवी काहीच बोलल्या नाहीत.  त्या आपल्या खोलीत गेल्या आणि तेथून एक जूनी, लोखंडाची गंजलेली पेटी ओढत घेऊन आल्या.  ही तीच पेटी होती जिला मोहित नेहमी भंगारात फेकण्याविषयी बोलत असे.

त्यांनी आपल्या साडीच्या पदरात बांधलेल्या चावीने त्या पेटीचं कुलूप उघडलं.  आत जुणे कपडे घड्या करून ठेवलेले होते.  सुमित्रा देवींनी कपडे बाजूला केले आणि खालून एक मखमली कपड्याचं बोचकं आणि काही जुन्या वह्या काढल्या.

त्यांनी ते बोचकं सोफ्यावर रिकामं केलं.  छन-छन आवाज करत काही सोन्याची नाणी, जुन्या घडणीचे जाड कंगन, आणि काही महागडे रत्न सोफ्यावर पसरले.  आणि सोबतच त्यांनी एक डायरी उघडली ज्यात बैंकेचे काही मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉजिट) (FD) च्या पावत्या आणि पोस्टाचे सेविंग्स सर्टिफिकेट्स ठेवलेले होते.

माजघरात शांतता पसरली.  रोहित आणि मोहित चे डोळे विस्फारले गेले.

– क्रमशः भाग पहिला  

मूळ हिंदी कथा लेखिका : पूजा मिश्रा

मराठी अनुवाद : मेघःशाम सोनवणे

नाशिक.

मो 9325927222

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
2

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “‘फादर्स डे’ ला बापाचा बदला – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

☆ “‘फादर्स डे’ ला बापाचा बदला – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर

फादर्स डेच्या दिवशी सकाळी-सकाळी मी फेसबुक उघडलं.

मित्रमंडळी त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो टाकत होती.

कोणी लिहित होतं—

“माझे बाबा माझे हिरो आहेत… ” 

कोणी लिहित होतं—

“माझे बाबा माझे सुपरमॅन आहेत… ” 

मीही जोशात येऊन पोस्ट टाकली—

“माझे बाबा कोणत्याही फादर्स डेचे मोहताज नाहीत. त्यांना जेव्हा वाटतं, तेव्हा चप्पल उचलून आठवण करून देतात की बाप म्हणजे बापच असतो!” 

पोस्ट व्हायरल झाली.

हजारो लाईक्स.

शेकडो कमेंट्स.

मी आनंदाने फुलून गेलो होतो.

तेवढ्यात दारावरून आवाज आला—

“अरे लेखक साहेब!” 

मी बाहेर पाहिलं…

बाबा हातात मोबाईल घेऊन उभे होते.

आणि त्यांच्या चेहऱ्यावर असं हसू होतं, जे पाहून माझा आत्माच थरथरला.

त्यांनी विचारलं—

“खूप मोठा कॉमेडियन झाला आहेस का रे?” 

मी समजलो…

पोस्ट त्यांच्या हाती लागली होती.

मी पळायला लागलो.

पण यावेळी काहीतरी वेगळंच झालं.

बाबांनी चप्पल उचलली नाही.

ते म्हणाले—

“आज नाही मारणार. ” 

मी सुटकेचा निःश्वास टाकला.

पण मला काय माहिती…

खरं संकट तर आता सुरू होणार होतं.

संध्याकाळी घरी नातेवाईक आले.

काका, मामा, मावशी, आत्या…

संपूर्ण परिवार.

मी विचार करत होतो, काही पूजा-वगैरे असेल.

तेवढ्यात बाबा खुर्चीवर उभे राहिले.

आणि म्हणाले—

“आज फादर्स डे आहे. आणि माझ्या मुलाने फेसबुकवर माझ्याबद्दल खूप काही लिहिलं आहे. आता माझीही पाळी. ” 

माझ्या पायाखालची जमीन सरकली.

त्यांनी मोबाईल काढला.

आणि माझे लहानपणीचे फोटो दाखवायला सुरुवात केली.

पहिला फोटो…

मी नागडा बसलो होतो आणि समोरच्या स्टीलच्या ताटातली माती खात होतो.

सगळं घर हसायला लागलं.

मी म्हणालो—

“बाबा, हे काढा!” 

ते म्हणाले—

“अरे, ही तर फक्त सुरुवात आहे बेटा. ” 

दुसरा फोटो…

मी पाच वर्षांचा होतो.

शेजारच्या पिंकीसोबत लग्न-लग्न खेळत होतो.

कपाळावर लाल टिळा.

गळ्यात हार.

बाबा म्हणाले—

“हा आमचा मुलगा. पाचव्या वर्षीच प्रेमविवाह करून बसला होता. ” 

सगळे खळखळून हसू लागले.

मी घामाघूम झालो.

मग त्यांनी एक जुनी वही काढली.

म्हणाले—

“आता याच्या लहानपणीच्या कविता ऐका. ” 

मला वाटलं काहीतरी चांगली कविता असेल.

पण त्यांनी वाचायला सुरुवात केली—

“चांदोबा चांदोबा भागलास का, भजी करून पळालास का… ” 

सगळे हसून-हसून लोळायला लागले.

मी लाजेने मेलोच होतो.

मग अचानक बाबा शांत झाले.

त्यांनी वही बंद केली.

आणि म्हणाले—

“मस्करी खूप झाली. “

खोलीत शांतता पसरली.

मी पहिल्यांदाच पाहिलं…

त्यांच्या डोळ्यांत हलकंसं पाणी आलं होतं.

ते माझ्याकडे पाहत म्हणाले—

“आज हे सगळे हसत आहेत ना… पण त्यांना एक गोष्ट माहिती नाही. “

“जेव्हा हा जन्मला होता, तेव्हा हॉस्पिटलचं बिल फक्त १७०० रुपये होतं… आणि माझ्या खिशात ९०० रुपये होते. “

सगळे शांत.

“मी माझं घड्याळ विकलं होतं. ” 

खोलीतील शांतता आणखी गडद झाली.

ते पुढे म्हणाले—

“जेव्हा हा पाचवीत नापास झाला होता… तेव्हा संपूर्ण कॉलनी याला मूर्ख म्हणत होती. “

“पण मी कोणालाही काही बोललो नाही. “

“रात्री गच्चीवर जाऊन एकटाच रडलो होतो. ” 

माझ्या घशात काहीतरी अडकलं.

ते माझ्याकडे पाहून हसले.

आणि म्हणाले—

“जेव्हा हा पहिल्यांदा नोकरीसाठी शहरात गेला होता… तेव्हा स्टेशनवरून परतताना मी बसने आलो नव्हतो. “

“पूर्ण दहा किलोमीटर पायी चाललो होतो. ” 

“कारण बसमध्ये बसलो असतो तर लोक विचारले असते—”

“इतका उदास का आहेस?”

“आणि मी रडायला लागलो असतो. ” 

आता संपूर्ण घराच्या डोळ्यांत पाणी होतं.

मग त्यांनी खिशातून काहीतरी काढलं.

एक छोटंसं तुटलेलं प्लास्टिकचं खेळणं.

मी ओळखलं.

माझी लहानपणीची लाल गाडी.

जी मी पाचव्या वर्षी हरवली होती.

मी आश्चर्यचकित झालो.

“ही तुमच्याकडे कशी?”

बाबा हसले.

म्हणाले—

“ज्या दिवशी तू रडत-रडत तिला शोधत होतास… त्या दिवशी ती मला शेतात सापडली होती. “

“मोठा झाल्यावर देईन असं ठरवलं होतं. “

“पण तू मोठा झालास… आणि मी विसरलो. ” 

आता मी स्वतःला रोखू शकलो नाही.

मी उठलो आणि त्यांच्या गळ्यात पडून रडलो.

सगळ्यांसमोर.

पहिल्यांदाच.

तेवढ्यात बाबांनी हळूच माझ्या कानात म्हटलं—

“आणि ऐक… “

मी म्हणालो—

“हो बाबा?”

ते हसून म्हणाले—

“फेसबुकवर लिही… “

“बाप फक्त चप्पल उचलत नाही. “

“कधी-कधी तो संपूर्ण आयुष्य उचलून चालतो… फक्त मुलगा पडू नये म्हणून. ” 

बस…

त्या दिवशी मला समजलं की लहानपणी ज्या चपलांची मला भीती वाटायची…

तीच चप्पल उन्हात भाजलेल्या पायांनी चालत माझ्यासाठी भाकर कमवायला जात होती.

आणि ज्या माणसाची मी मस्करी करत होतो…

तो माणूस शांतपणे त्याचं संपूर्ण आयुष्य माझ्या आनंदाच्या नावावर लिहून गेला होता.

त्या रात्री मी फेसबुकवर फक्त एकच ओळ लिहिली—

“लहानपणी वाटायचं बाबा मला चपलीने चालवतात… आज समजलं, ते स्वतः झिजले म्हणून मी चालू शकलो. ” 

आणि विश्वास ठेवा…

त्या पोस्टवर सर्वात पहिला लाईक माझ्या बाबांचाच होता.

 “तुमच्या बाबांनी तुमच्यासाठी केलेली अशी कोणती गोष्ट आहे, जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही?” 

समाप्त

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुटकी पेन्सिल – भाग ३ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ तुटकी पेन्सिल – भाग ३ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(पण आता या क्षणी परिस्थिती वेगळी होती. मरणाच्या दारात असलेल्याने कुणास शिव्या-श्राप देणे योग्य नव्हते.) 

इथून पुढे – – 

माझा रक्तदाब मोजला गेला, तर तो १६० च्या वर होता. काल रात्रीपासूनच माझ्या हृदयाची धडधड मर्यादा ओलांडून सैरभैर झाली होती. घराचा विचार मनांत येताच आधीच माझे काळीज दुःखातिरेकाने काळवंडले होते. अशातच त्यात माझ्या मनांत असंबद्ध विचार डोकावू लागले, “माझ्या अंशूच्या आयुष्यात दुसरी कुणी आली तर? नाही… तो तर माझा एकाधिकार आहे. ” जर एखाद्या मरणासन्न महिलेला दुसऱ्या स्त्रीचा असा जोरदार झटका लागला तर तिचा रक्तदाब कसा वाढणार नाही? एकामागून एक असे झटके बसत होते की काय सांगू अन कसं सांगू!

आराम-कक्षात थोडा वेळ राहिल्यानंतर, आता माझ्या समोर एक नवीन चेहरा होता, त्यासोबतच एक नवीन खोली होती. मला एका विशालकाय इमेजिंग मशीनमध्ये झोपवण्यात आले होते. मशीन सुरु झाली, अधूनमधून कामाला लागत तिने नियत वेळी प्रत्येक कोनातून आतील शिरांच्या अगणित प्रतिमा घेतल्या. मी त्या मशीनच्या बोगद्यात सुमारे पंधरा ते वीस मिनिटे होते. मशीन माझ्या अंगप्रत्यंगावरून फिरत राहिली. डावीकडे, उजवीकडे, पुढे, मागे, सर्वत्र, फोटोच फोटो घेतल्या जात होते. प्रत्येक वेळी ते अजस्त्र यंत्र माझ्याजवळ येताच माझी भीतीने गाळण उडायची. असे वाटत होते की जणू बदामाचा शिरा, गुलाबजाम आणि जिलेबीसारख्या चविष्ट मिष्टान्नांचेच फोटो काढल्या जात आहेत.

इकडून तिकडून धावत आणि चालत हकनाक फेऱ्या मारल्यावर परतलेला एकच विचार माझ्या मनात येत होता, “कुठलेही लक्षण नसतानाही, मी इतकी आजारी कशी काय असू शकते?” आशंकेच्या निव्वळ कल्पनेनेच सशासारख्या बावरलेल्या मनाला अंशूचा अदृश्य आवाज ऐकू यायला लागला, “आता भोग आपल्या कर्माची फळे!”

ते अवाढव्य यंत्र आता वर्तुळाकार फिरत होते, माझ्या शरीरातील असल्या-नसल्या प्रत्येक लहान-मोठ्या आतड्याचा आणि रक्ताच्या एक-एक थेंबाचा हिशोब करत होते. मी त्याच्या कार्यशैलीने भलतीच प्रभावित झाले होते. कुणास ठाऊक कोण्या डोकेबाज माणसाने ती निर्माण केली होती. लोकांचा मेंदू किती कुशाग्रतेने चालतो! वैद्यकीय शास्त्रातील कित्येक चमत्कार मानवाच्या अनवट कल्पनाशक्तीतून अवतरले आहेत. शेवटी हा टप्पाही मी यशस्वीरित्या पूर्ण केला.

काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर माझी बहुप्रतिक्षित ट्रेडमिल वर धावण्याची चाचणी झाली. घरी मला असंख्य वेळा समजावण्यात आले होते की जर मी धावू शकत नसेन तर तिथल्या लोकांना लगेच सांगावे. तिथे हजर असलेल्या तंत्रज्ञांनी त्याचीच पुनरावृत्ती केली, ती ही अनेक वेळा! माझा रक्तदाब मोजण्यात आला. आता तर तो १७० पर्यंत पोहोचला होता. माझ्या दंडाभोवती रक्तदाबमापक यंत्राचा पट्टा आवळलेला होता. त्यात भर घालीत छातीवर तारांना जोडलेले अनेक चिकट पॅचेस लावल्या गेले.

धावण्याचे यंत्र सुरू झाले. ट्रेडमिलवर धावत असताना, मी कधी शिकवता-शिकवता माझ्या वर्गात चकरा मारीत होते, तर कधी युवी या माझ्या नातवासोबत विडिओ गेममधील माझ्या पात्राला वाचवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करीत होते. ट्रेड मिलच्या मार्गिकेवर चालतांना या सर्व आनंददायक क्षणांची मी प्रत्यक्षात गळा भेट घेत होते. हे सर्व आनंदाचे क्षण माझ्या मार्गावर येत राहिले.

“तुम्ही बऱ्या आहात कां?”

“हो. “

“मी वेग वाढवत आहे. “

“हो. “

“जर तुम्हाला बरे वाटत नसेल तर मला लगेच कळवा. “

“हो. “

“जर तुम्हाला किंचितही छातीत दुखायला लागले तर मला लगेच सांगा. “

“हो, मी ठीक आहे. “

या वळणावर मी अगदी आरामात जणू गुलाबी झोपेच्या तंद्रीत असल्यागत माझ्या जीवनातील सुखद क्षणांच्या आठवणी जागवायला लागले. ते आनंदाचे क्षण स्मरले जेव्हा एका प्रतिष्ठित नियतकालिकाने माझी कथा त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कथा म्हणून घोषित केली होती. वाचकांकडून अभिनंदनपर संदेशांचा ओघ सुरु होता. त्या अनावर आनंदाच्या प्रवाहात तेव्हाही माझा रक्तदाब नक्कीच वाढला असावा. आम्ही सर्वजण माझ्या यशाचा क्षण साजरा करण्यासाठी एका हॉटेलात गेलो होतो. त्या रात्रीचा पनीर कोफ्ता इतका चविष्ट होता की त्याच्या चवदार चवीने माझ्या जिभेचा लगेच ताबा घेतला. त्या भावुक क्षणांनी भारलेल्या स्मृतींच्या धुक्यात ट्रेडमिलचा वाढता वेग, छातीचे दुखणे इत्यादी प्रश्न मागच्या मागे कुठे तरी हरवून गेले.

“मी तुम्हाला सर्वोच्च वेगवान बिंदूवर घेऊन जात आहे. कृपया मला सांगा की तुम्ही ठीक आहात की नाही. “

“हो, मी अगदी व्यवस्थित आहे. ” ती देखील माझ्या चेहऱ्यावरील संपूर्ण समाधानाचे भाव पाहून आश्चर्यचकित झाली होती. त्या सुरेख क्षणी, हॉटेलमधील मिष्टान्न माझ्या डोळ्यांसमोर होते आणि मी अत्यानंदाने रबडीत न्हायलेल्या गुलाबजामचा आस्वाद घेत होते.

वेगाने, अति वेगाने… त्याच गतीच्या ओघात मला आणखी एक इंजेक्शन देण्यात आले. मी बेफिकीरपणे आपल्याच जगात हरवून गेले होते, आणि त्याच वेगाने पुढे पुढे धावत राहिले. तेव्हां मी विचार करत होते, “मी आता पडेन, नंतर पडेन. पडण्याआधीच अंशू येऊन मला सावरतील. ” त्यांच्या आश्वस्त करणाऱ्या हातांचा स्पर्श जाणवण्यापूर्वीच, अचानक मशीनची गती कमी झाली आणि त्यासोबत माझे विचारही मंदावले. माझ्या मेंदूत एक प्रश्न उगवला, “एवढ्या धिम्या गतीने चालणाऱ्या मशीनमधून मी कशी काय पडू शकेन?” हळू हळू मशीनचा वेग कमी होऊन ती पूर्णपणे थांबली.

“खाली उतरा! या. ”

“कां, काय झालंय?” मी हतप्रभ होऊन गोंधळलेल्या नजरेने विचारलं.

“आटपली चाचणी!”

मला वाटलं, कदाचित ते मला थोडा वेळ विश्रांती घ्यायला बसवतील आणि नंतर पुन्हा धावायला लावतील. माझा रक्तदाब परत एकवार मोजण्यात आला. आश्चर्य म्हणजे तो १५५ पर्यंत घसरला होता. अरे देवा! इतक्या झटपट कसा काय कमी झाला? मी पहिल्यांदा मेले नाही, मात्र दुसऱ्यांदा धावता-धावता मी नक्की मरणार! माझ्या समोरची तंत्रज्ञ आपले चार्ट भरत होती. मी धाडस करून विचारले, “किती वेळ विश्रांती घेतल्यावर मला पुन्हा धावायला लावणार आहात?”

“तुमची चाचणी संपली. “

“तुम्हाला काय म्हणायचंय?”

“म्हणजे तुमची परीक्षा चांगल्या तऱ्हेने पार पडली. “

“हो कां?” मी स्तब्ध होऊन तिचे बोलणे ऐकत होते.

तितक्यात मागून एक आवाज आला, “तुम्हाला रेडिओ ट्रेसरच्या फोटोजचा आणखी एक सेट द्यावा लागेल. “

 त्या यंत्राने संपूर्ण प्रक्रियेची पुन्हा पुनरावृत्ती केली. तेच वीस मिनिटांचे चक्र फिरले. मात्र या चक्रादरम्यान, मला झोप येऊ लागली होती. कालची रात्र अस्वस्थ अवस्थेत अक्षरशः जागूनच काढली होती. म्हणून आता ही निद्रा! या अनिवार झोपेपायी “तुमच्या जीविताला खूपच धोका आहे, ” या डॉक्टरांच्या शब्दांना जणू कुजबुजण्याची देखील परवानगी नव्हती.

घरी परतल्यानंतरही अंशू काळजीतच असलेले दिसले. येणाऱ्या चाचण्यांच्या रिपोर्टबद्दल त्यांची ही बेचैनी मला जाणवत होती. तीन दिवसांतच फॅमिली डॉक्टरांनी आम्हाला फोन करून बोलावून घेतले. आम्ही अर्धा तास लवकरच पोहोचलो. आता आम्ही तिघेही समोरासमोर होतो: मी, अंशू आणि डॉक्टर.

विखुरलेल्या कागदपत्रांकडे पाहून डॉक्टर स्मित करीत म्हणाले, “तुम्हाला A+ मिळाले आहे, श्रीमती रेमी. “

“डॉक्टर, मी समजले नाही!”

“तुमच्या सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य आहेत. “

मी क्षणभर सुन्नच झाले. पुढच्याच क्षणी मला सत्य उमगले – “पण डॉक्टरसाहेब, मला नेमकं काय झालं होतं? तुम्ही इतक्या चाचण्या केल्या माझ्या!”

डॉक्टर उद्गारले, “तुमच्या कुटुंबाचा इतिहास! तुमचे स्वतःचे टेस्ट रिपोर्ट सामान्य आहेत पण तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हृदयरोगामुळे होत गेलेल्या मृत्यूसह, तुमचे हे अंक वाढतच राहिले. आणि आता तर तुम्ही पासष्ट वर्षांच्या आहात, म्हणून तुम्ही आपसूकच ‘अति धोका’ असलेल्या श्रेणीत येऊन पोचलात. “

“म्हणजे हे जे सगळे रामायण घडले ते कुटुंबाच्या इतिहासामुळे?”

“होय!”

माझ्या कुटुंबातील सदस्य एक एक करून माझ्यासमोर हजर होऊ लागले. त्यांनी स्वतःहून सर्व काही सहन केले होते. त्याची धग त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचू दिली नव्हती. समोर उभे असलेले अंशू माझ्यावर ओढवलेल्या या भीषण अनुभवाने खूपच हादरून गेले होते. आम्ही क्लिनिकमधून बाहेर पडताच, बराच वेळ माझा हात घट्ट पकडून ठेवीत ते माझ्या डोळ्यांत खोलवर पाहत राहिले. यावेळी, त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांचे डोके पुन्हा हलले. पण आता ते समाधानाने होते. माझ्या खांद्याला हळुवारपणे स्पर्शाने थोपटीत ते बोलले, “माफ कर मला, मी खूप कांही बोललो तुला! आता पुरे झाले डाएट. चल, तुला जे हवे ते खाऊन घे बरं!”

माझ्या तोंडून निरागस शब्द बाहेर पडले, “मी नऊ दिवसांपासून चहा घेतलेला नाही!” आमच्या दोघांचेही डोळे पाणावले होते. कदाचित संभावित विरहवेदनेच्या निव्वळ कल्पनेपुढे आम्ही असहाय होत गुढघे टेकले होते.

घरी पोहोचताच मी सर्वात आधी काय केले असेल तर मला केविलवाण्या नजरेने बघणाऱ्या पेंसिलीचे टोक सुबकतेने तीक्ष्ण केले! लगोलग त्याच टोकदार पेंसिलीने दवाखान्यातून नुकत्याच आणलेल्या कागदपत्रांच्या भेंडोळ्यावर लिहिले: “कौटुंबिक इतिहास!” या घाटदार अक्षरांचे सौंदर्य अतुलनीय होते, कारण पेंसिलीला नवतीचे धारदार टोक प्राप्त झाले होते!

समाप्त  

मूळ हिन्दी कथा : ‘ टूटी पेन्सिल ‘.

मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप 

अधिव्याख्याता, टोरोंटो विद्यापीठ, कॅनडा

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे (पश्चिम)

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुटकी पेन्सिल – भाग २ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ तुटकी पेन्सिल – भाग २ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(घरी परतताना अंशू माझ्यावर अपमानजनक शब्दांची बॉम्बफेक करायला जणू टपलेलेच होते. “तू जर थोडी काळजी घेतली असती तर ही परिस्थिती भोगावी लागली नसती. तुझ्या घरातल्या लोकांचे काय काय झाले हे तुला माहिती नव्हते कां?”)

इथून पुढे – – 

आता मात्र माझ्या धैर्याची कमाल मर्यादा संपली होती. “जरा सांगता कां मी कोणती काळजी घेतली नाही?”

“ठीक आहे! सगळ्यांची फोड करून सांगू का बाई? पाव-भाजी कोण चापून खातं चांगलं वरून भरभरून लोणी घालून?”

“मी… पण… ”

अंशूने मला पुढे बोलूच दिले नाही आणि मला थांबवत रागाने बोलताच राहिले, “आणि हो, रव्याचा शिरा, बदामाचा शिरा, झालंच तर मुगाचा शिरा घरात सगळ्यात जास्त कोणाला आवडतो? छोले भटूरे, बटाट्याची भाजी व पुऱ्या सारखं सारखं कोण बनवतं? आरोग्याला पोषक असलेल्या सॅलडला ‘गवत-पालापाचोळा’ सारखी शेलकी नांवे ठेवत कोण हात लावत नाही? दिवसातून चार वेळा चहा कोण पीत असतं? आणि ऐका बाईसाहेब! कोणाच्या ताटात सर्वात जास्त जिलेब्या आणि गुलाबजाम असतात?”

अंशूच्या रंगाचा पारा खरोखरच अस्मानाला भिडला होता.

मी अगदी असहाय्यपणे रडायला लागले होते. जणू ते प्रत्येक क्षण भरल्यापोटी मलाच हिशेब मागत होते आणि माझे गणित अगदीच कच्चे असल्याने मी रडवेली होऊन त्या अंकांच्या जुलूमाचे ओझे सहन करीत आसवांच्या प्रत्येक थेंबात माझी असहाय्य स्थिती व्यक्त करत होते. ऐकिवात होते की बायकोचे अश्रू नवऱ्याच्या रागावर पाणी फेरतात. उलट इथे तर त्यांनी जणू आगीत तेल ओतले. त्यामुळे अंशूचा क्रोधाग्नी अजूनच भडकला. “आता असं रडून काय उपयोग आहे? निदान माझ्याबद्दल विचार करून तरी स्वतःची काळजी घ्यायला हवी होतीस ना. जसं कांही तुला माहित नाही की तू गेल्यानंतर माझे काय होईल! मी जिवंत असूनही मेल्यासारखाच असेन. “

कुणास ठाऊक की हे प्रेम होते, आरडाओरडा होता की राग! जे काय असेल ते, पण माझ्या भावनांचा बांध पार फुटून जाण्यासाठी पुरेसे होते. आतून माझी शकले होत असतांना देखील माझे अंतरिम विचार-तर्क माझ्या बचावाची खिंड लढवीत प्रयत्नांची शिकस्त करीतच होते. “पण कुठे ना कुठे कांही तरी दिसायला हवे होते. मला कुठेही ना वेदना होत आहेत ना कोणती लक्षणे आढळली आहेत!”

“लक्षणे गेली खड्ड्यात. कोविडच्या काळातही लोक लक्षणांशिवाय मरत होते ना. तुला माहिती नाही का?”

आता निराशेने आणि अगतिकतेने कळस गाठला होता. हृदयाच्या आत इतके दिवस साचलेले दुःख वितळून गेले होते व अश्रूंच्या रूपात डोळ्यांतून झरझर पाझरत होते. माझे सगळे आवडते पदार्थ माझ्याभोवती फेर धरून ता-थई-थईच्या तालावर नाचत होते. मरणासन्न मंद प्रकाशाने माझा चेहरा फिकुटला होता. मला कधीही अन्नाची हाव नव्हती, पण या घडीला माझ्यावर लादलेला हा प्रचंड आरोप स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतर नव्हते.

“खाऊ शकते, म्हणून कधीतरी त्या गोष्टी खाते. ” असे शब्द माझे शस्त्र असायचे.

घरी परतल्यावर, अंशूने दोन्ही मुलांना अशा प्रकारे समजावून सांगितलं की त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माझ्यासोबत संपूर्ण वेळ राहण्याचा निर्णय घेतला. असे वाटत होते की जणू डॉक्टरांनी अंशूला माझ्याविषयी अशी कांही माहिती दिली आहे, जी मला ठाऊक नव्हती आणि ती इतक्या टोकाची होती की मी आता या आजारातून वाचू शकणार नाही. माझ्या माघारी तिघेही गुपचूप हेच बोलत असावेत असे मला वाटायला लागले.

मी कांही गोष्टी ऐकल्या, तर कांही ऐकून न ऐकल्यासारख्या केल्या.

“पोरांनो! आईला सांगू नका बरं. त्या आपल्या घरासमोर राहणाऱ्या विसूकाकांची अगदी अशाच अवस्थेत चाचणी केली होती. बिचारे ट्रेडमिलवर जे बेशुद्ध पडले ते कधीच उठले नाहीत. “

“त्यांचं सोडा हो बाबा. इतकं देखील दूर जाण्याची गरज नाही. खुद्द आमच्या मामांना पण असंच झालं ना. आठवतंय? घरी जातांना रस्त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “

याचा एकंदरीत अर्थ असा होता की मी ट्रेडमिलवर पडणार हे निश्चित झाल्यासारखेच होते. जाण्यापूर्वी घर व्यवस्थितपणे लावून जाण्यासाठी माझ्याकडे अद्याप आठ दिवस उरले होते. मात्र सर्वप्रथम मी माझ्या शैक्षणिक जबाबदाऱ्या अशा रीतीने पूर्ण केल्या की जेणेकरून, मी गेल्यावर उर्वरित सत्रात माझ्या विभागाला आणि माझ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.

मी माझ्या दोन्ही मुलांजवळ माझ्या दागिन्यांच्या पेटीचे सविस्तर वर्णन केले: “सर्व दागिने बँकेच्या लॉकरमध्ये आहेत. माझ्या सवयीप्रमाणे मी घरातल्या कानाकोपऱ्यात लहान सहान दागिने लपवलेले आहेत. पोरी, तुला न बघता वस्तू फेकून देण्याची सवय आहे. तेव्हा आता तरी काहीही फेकण्यापूर्वी ते नीट तपासून पाहत जा. जितके आठवते आहे ते एका ठिकाणी ठेवते आहे. घर आणि गाडी यांच्याविषयी कांही समस्या असेल तर तुमचे पप्पा बघून घेतील. “

या दिवसांत गवत- पालापाचोळा (सॅलड) खातांना, अगतिक अवस्थेत अधूनमधून आसवांचे थेंब टपकायचे, जणू डोळ्यांच्या कोपऱ्यात ते वाटच बघत असायचे की मी केव्हां थोडी तरी उदास होईन आणि त्यांना बाहेर वाहत येणाची संधी मिळेल. रागाच्या भरात मी माझा अतिप्रिय चहा पिणे देखील बंद केले. ही मी स्वतःला दिलेली खूप भयानक अशी अंतिम शिक्षा होती. त्याचा माझ्या मनावर आणि मेंदूवर विघातक परिणाम असा झाला की त्या ठणक्याने माझे डोके फुटायची वेळ आली होती.

दवाखान्यातून सतत फोन येत होते: “ही पाच ते सात तासांची चाचणी आहे. त्याच्या चोवीस तास आधीपासून कॅफिन (चहा-कॉफी) घेणे बंद करा. बारा तास आधीपासून काहीही खायचे नाही. सकाळी उठल्यावर थोडेसे पाणी पिऊन या. सोबत काही नाश्ता नक्की घेऊन या. “

प्रत्येक सूचनेबरहुकूम परिस्थितीचे गांभीर्य वर्धमान होत होते. मी रोगग्रस्त असल्याची भावना माझ्या डोक्यात अधिकाधिक तीव्रतेने रुजत गेली.

आता शेवटचे कार्य उरले होते. ते म्हणजे माझी अमूल्य संपदा सोपवणे. “अंशू, हे सगळे माझ्या रचनांचे बाड आहे. त्यातील बहुतेक रचना प्रकाशित झाल्या आहेत, पण काही प्रकाशित व्हायच्या बाकी आहेत. कृपया मी गेल्यावर या कथांचा संग्रह प्रकाशित कराल. ” हे सांगता सांगता माझा कंठ दाटून आला आणि त्यातून आवाज देखील फुटेना. आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांना सोडून जातांना त्यांच्या शेवटच्या स्पर्शाने कासावीस होऊन आतल्याआत घुसमटत धाय मोकलून रडत असते तसे माझे झाले होते.

परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेत अंशूने मला आश्वासन दिले, “काळजी करू नकोस, मी तुझे पुस्तक छापून त्याचे प्रकाशन देखील करीन. “

त्या दिवसांत अंशू क्षणभरही माझी साथ सोडत नव्हते. या वागण्याने माझे दिवस भरले आहेत या जाणीवेची पुष्टीच होत होती. मध्यरात्री मी जराशीही हालचाल केली तर ते लगेच विचारायचे, “काय झालं? कांही होतंय कां?”

कहर म्हणजे मधेच रात्री झोप उघडल्यावर मी उठून टॉयलेटकडे जायला निघाल्यावर त्यांचा विचित्र प्रश्न असायचा, “तू टॉयलेटला कां जाते आहेस?”

“टॉयलेटला कोणी कां जात असतं?” या असंबद्ध प्रश्नावर हसावं की रडावं हे कळेनासे होऊनही अंशूवर चिडायची सोय नव्हती. ही नाजूक वेळ वादविवाद करण्याची नव्हती. चाचणीच्या दोन दिवस आधीपासून माझी झोप, माझे जेवण, इत्यादी नित्यक्रमांवर बारकाईने लक्ष दिल्या जात होते. त्या रात्री झोपणे खूपच अवघड झाले होते. मी कित्येक वेळा उठून बघत घड्याळाचे काटे पाहत होते की अजून त्याचा गजर कां होत नाहीय.

शेवटी एकदाची ती काळरात्र सरली आणि मी सर्व आवरत आंघोळ करून तयार झाले.

मी दवाखान्याच्या परिसरात गेल्यावर एका रुग्णाच्या भूमिकेत जात तेथील खुर्चीत स्वतःला अक्षरशः कोंबले. नर्सने माझ्या नांवाचा पुकारा करताच अंशूने मला घट्ट आलिंगन दिले, जणू तो त्यांचा शेवटचा चैतन्याने भरलेला आणि भारलेला स्पर्श होता, ज्याला ते स्वतःच्या अंतरंगात आतवर त्याचा अनुभव समाहित करण्याचा प्रयत्न करीत होते. मला रुग्णांचा गणवेश असलेला एक गाऊन घालण्यास सांगितले गेले. माझ्या छातीवर तारांसह अनेक चिकट पॅचेस जोडले गेले. अंगात गणवेश आणि मास्कने नाकतोंड झाकून लगबगीने यंत्रमानवासारखे सर्वत्र संचार करणारे तेथील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, इत्यादी व्यावसायिक तर मला मृत्यूची प्रमाणपत्रे बनवणारे यमदूतच प्रतीत होत होते.

मला एका किओस्कमध्ये बसवण्यात आले आणि सांगण्यात आले, “प्रथम, तुम्हाला आयव्ही इंजेक्शनद्वारे शिरेत (व्हेन) किरणोत्सर्गी रसायनाचे इंजेक्शन टोचण्यात येईल. ठराविक काळानंतर, हे ट्रेसर (माग काढणारे रसायन) तुमच्या शरीरातील शिरांतून मधून कसा प्रवास करते त्याचे एका इमेजिंग मशीनद्वारे अनेक फोटो घेतल्या जातील. यामुळे हृदयाच्या रक्तप्रवाह मंद झालेल्या आणि हृदयाला इजा पोचलेल्या क्षेत्रांचा नेमका शोध घेण्यास मदत होईल. ”

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या नर्सला दहा मिनिटे उलटून गेल्यावर देखील आयव्हीसाठी माझ्या हाताची शीर सापडली नाही. यासाठी तिने माझ्या दोन्ही हातांमध्ये दोन-तीन वेळा जोरात सुई घुसवली. जर हे अन्य वेळी घडले असते तर, मी तिला अशा भेदक नजरेने पाहिले असते की ती पुढील वेळेस रुग्णावर असे अत्याचार करण्यास धजावली नसती. पण आता या क्षणी परिस्थिती वेगळी होती. मरणाच्या दारात असलेल्याने कुणास शिव्या-श्राप देणे योग्य नव्हते.

– क्रमशः भाग दुसरा 

मूळ हिन्दी कथा : ‘ टूटी पेन्सिल ‘.

मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप 

अधिव्याख्याता, टोरोंटो विद्यापीठ, कॅनडा

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे (पश्चिम)

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भीमाचे गर्वहरण… लेख दुसरा  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

??

☆ भीमाचे गर्वहरण… लेख दुसरा  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

कौरवांच्या नाशानंतर, असे म्हणतात, की एकदा भीमाला आपणच जगात सगळ्यात बलशाली आहोत असा गर्व झाला. मग मारुतराया वृद्ध वानराच्या रुपात आला, माझी शेपूट हलवून बाजूला कर म्हणाला आणि भीमाचे गर्वहरण केले.

— — 

मी gym मध्ये अक्षरशः घाम गाळत होतो. यंदा सालाबादप्रमाणे होणारा माझा नवीन वर्षाचा gym ला जायचा संकल्प बराच तग धरून होता. माझी लेकही नेटाने gym ला जात होती, पद्धतशीर व्यायाम करत होती आणि डायटही फॉलो करत होती. आणि त्याचा सुडौल परिणामही दिसून येत होता. आणि त्यामुळे माझ्या gym ला जाण्यावर तिचं विशेष लक्ष होतं.

माझीही ताकत आणि वजनं उचलायची capacity वाढत चालली होती. लेकीच्या आग्रहामुळे आणि सुचनांमुळे वजनं उचलण्याच्या पहिल्या सेटनंतर मी आवर्जून पुढचा सेट जास्त वजनांचा घेत होतो. I was becoming pretty good at this.

आजही gym मध्ये छान लय मिळाली होती. आज gym मध्ये कोणी एक साठीच्या आजूबाजूच्या वयाचे काका नवीनच दिसत होते. शरीरात stiffness होता आणि dumb bells घेऊन त्यांना जमेल तसं, झेपेल तसं ते front raise, hammer curl वगैरे करत होते.

माझे घाम गाळणं चालू होतं आणि ते काका माझ्याकडे कौतुकानं बघत होते. मी squats मारत असताना, ते अगदी थांबून लक्षपूर्वक पाहत होते. माझे leg press करून झाल्यावर त्यांना राहवेना. ते मुद्दाम माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, “व्वा, फारच छान करता हो तुम्ही. “

माझ्या शरीरावर मूठभर मांस चढले. मी हळूच तिरक्या नजरेने gym मधले आणखी कोणी या कौतुकसोहळ्याचे साक्षीदार आहेत का बघून घेतलं.

“फक्त, squats करताना तुम्ही खाली जाताना जोरात खाली जाता, तसं करू नका. आणि वर येताना spring action ने वर येता, तसंही करू नका. भार खांद्यांवर आणि गुडघ्यांवर नकोय, hip joint आणि मांड्यांवर हवा आहे. आणि त्या टाचा उचलल्या जातात, तेवढ्या सांभाळा, बरं का !”

“Leg press लासुद्धा तुमचा angle बदलायला हवा आहे. आणि वजन पुढे ढकलताना पाय गुडघ्यातून सरळ करत आहात तुम्ही, तेही टाळा. “

माझा तोंडाचा वासलेला “आ” तसाच राहिला होता. ते काका त्यांच्या पुढच्या gym routine कडे वळले आणि मी आमच्या gym trainer ला – राजू सरांना गाठलं.

“राजू सर, हे नवे काका कोण ?” माझी पृच्छा.

राजू सरांनी कानाच्या पाळ्यांना हात लावला, जीभ चावली आणि म्हणाले – “सर, चैनी सरांचं नाव ऐकलं आहेत का तुम्ही ? नातीचा वाढदिवस आहे म्हणून चार दिवस आले आहेत इथं चिंचवडला.

Weight lifting चे नॅशनल लेव्हल चॅम्पियन होते ते. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत मेडल्स मिळवली आहेत त्यांनी. ७३ वर्षांचे आहेत, पण फिटनेस बघा त्यांचा.

एअर फोर्स मध्ये होते. आता बदलापूरला स्वतःचं gym आहे. Weight lifting, power lifting साठी मुलं तयार करतात ते. पुढच्याच आठवड्यात त्यांचे दोन विद्यार्थी रोमानियात स्पर्धेत भाग घ्यायला चालले आहेत. त्यांच्या अनेक शिष्यांनीही एशियाड, कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे. “

माझा तोंडाचा वासलेला “आ” अजूनही तसाच राहिला होता.

— —

भीमाच्या ताकदीचे, पुन्हा एकदा, पार गर्वहरण झालं होतं.

(ताजा कलम : निवृत्त ज्युनियर वॉरंट ऑफिसर, श्री हेरंब चैनी, वायू सेना यांचा या मे महिन्यात (२०२६) लवकरच माननीय संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते दिल्लीला सत्कार होणार आहे.)

– लेख दुसरा

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुटकी पेन्सिल – भाग १ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ तुटकी पेन्सिल – भाग १ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

गेल्या कित्येक वर्षांपासून, दर दोन वर्षांनी माझी वैद्यकीय तपासणी होत आलेली आहे. दर वेळी, डॉ. क्लार्कच्या क्लिनिकमधील भेटीच्या शेवटी “सर्व काही ठीक आहे, आजवर तुम्ही जे करीत आला आहात तेच करीत राहा” हे त्यांचे नेमके शब्द असत. माझे स्वयंपाकघर, माझे शैक्षणिक वर्ग आणि पेंसिल या त्रिकूटाच्या परिघात माझा दैनंदिन दिनक्रम जसाच्या तसा चालू असे.

आयुष्याचे सर्व टप्पे पार करीत मी अशा टप्प्यावर पोहोचले होते जिथे वयाचा पासष्टावा आकडा माझ्याकडे टकमक पाहत होता. डॉक्टर सावध झाले होते. आज माझ्या शरीराच्या अंग-प्रत्यंगाची सखोल तपासणी होणार होती. वजन, उंची, हृदयाचे ठोके, नाडी आणि रक्तदाब, या सर्वांची मोजदाद अतिशय बारकाईने लक्षपूर्वक होणार होती. माझ्या दंडाभोवती रक्तदाब मोजणाऱ्या मशीनचा पट्टा घट्ट आवळल्या जात होता, हृदयाची धडधड अनियंत्रित होत होती, जलद होत होती, आणि आता तर आणखीनच वाढली होती. आकड्यांचे गणित सोडवण्यात मग्न असलेले मशीनचे काटे सारखे वर-खाली गिरक्या घेत होते. त्या काट्यांसोबतच, डॉक्टरांच्या डोळ्यांची हालचाल देखील कधी खाली-वर होती होती तर कधी स्थिर होऊन आकड्यांवर नजर टाकीत होती. त्याच प्रक्रियेची अनेकवार पुनरावृत्ती झाल्यानंतर डॉक्टरांनी अंतिम निकाल जाहीर केला, “तुमचा रक्तदाब खूप वाढलेला आहे. “

मी म्हणाले, “अहो डॉक्टर, तुमच्या या दवाखान्याच्या परिसरात प्रवेश करताच माझा रक्तदाब आपोआपच वाढत असतो. तुम्ही हा पट्टा गुंडाळायला सुरुवात केली की तो आणखीनच अधिक वाढतो. “

उत्तरादाखल डॉक्टरांनी केलेलं स्मितहास्य आणि त्यामागे दडलेला गर्भितार्थ मला अजिबातच आवडला नाही. त्यातच माझा नवरा, अंशू डोके हलवीत होता, त्याने तर माझी आतल्याआत चिडचिड व्हायला लागली. काहीही घडले तरी त्याचे खापर माझ्या डोक्यावर फोडण्याची त्यांची सवय जुनीच आहे. ते असे कांही डोके हलवीत होते, की जणू मी एखादा जघन्य अपराध केलाय. त्यांचे डोळे मला म्हणत होते, “ही तुझीच चूक आहे. तुला स्वतःची अजिबात काळजी घेता येत नाही. “

अंशूच्या अशा प्रतिक्रिया बघितल्या की माझा नेहमीच रागाने पारा चढतो. पण आज या पासष्टच्या आकड्याने मला माझा राग आटोक्यात ठेवावा लागत होता. डॉक्टरांनी पुनश्च एकवार माझ्या कुटुंबाची समग्र माहिती घेतली. मागील नोंदी परत वाचून दाखवल्या.

माझा भारतातला जन्म, पालकांच्या मृत्यूच्या कारणांची खोल मीमांसा, मोठ्या बहीण-भावाच्या अकाली मृत्यूचा उहापोह, व यातच जोडल्या गेलेली नवी कोरी अद्ययावत पुस्ती चिंताजनक होती. ती म्हणजे माझ्या धाकट्या भावाचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्याच्या मृत्यूची कारणे लक्षात घेत, डॉक्टरांनी तो मजकूर अधोरेखित केला आणि मला म्हणाले – “श्रीमती रेमी, मी तुम्हाला वेगवेगळ्या आवश्यक चाचण्यांसाठी कागद लिहून देत आहे. या सर्व चाचण्या तुमच्या प्राधान्यक्रमात असायला हव्यात. सर्वप्रथम तुम्ही इकोकार्डियोग्राम (२डी इको चाचणी) करून घ्या. मला त्याचा रिपोर्ट लवकरात लवकर हवा आहे. “

डॉक्टर याआधी इतक्या गंभीरपणे कधीच बोलले नव्हते. मी बळीच्या बकऱ्यासारखे डोके झुकवून निर्बुद्धासारखी होकारार्थी मान डोलावली आणि त्यांनी एकामागून एक दिलेले कागद घेत गेले. वेगवेगळ्या प्रकारच्या रक्त चाचण्या! याशिवाय, मल-मूत्र तपासणी, मॅमोग्राम (स्तनांची एक्स रे तंत्राने विशेष चाचणी), गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाकरिता तपासणी आणि खास करून इकोकार्डिओग्राफी हे सर्व करायचे होते.

मी माझ्या टेबलावरील कागदांवर पेंसिलने मोठं मोठे वर्तुळ काढत सुटले. मला माझ्या जीवनरेखेचे अंकगणित सोडवून बरेच कांही-बाही लिहायचे होते. निराशेच्या भरांत मी पेंसिल इतकी जोरात दाबली की तिचे तीक्ष्ण टोक क्षणार्धात तुटून खाली पडले. तिचा तो तुटलेला तुकडा मला वाकुल्या दाखवीत चिडवत होता. जणू मी स्वतःला देखील याच प्रकारे खंडप्राय केले होते. आतून मी अक्षरशः कोलमडले होते. माझ्या आयुष्याच्या घड्याळाचे शिस्तीत गोलाकार फिरणारे काटे जणू अकस्मात थांबल्यासारखे वाटत होते मला!

दररोज एका चाचणीची आठवण करून देत असताना, अंशूच्या डोक्यात एकच विचार ठाण मांडून बसला होता. “यावेळी चाचण्यांतून तुझ्या निष्काळजीपणाचा परिणाम नक्कीच दिसेल, बघच तू! ” माझे अहवाल येण्यापूर्वीच अंशूच्या अशा फटकारण्यामुळे माझा राग इतका अनावर होत होता की माझ्या देहातली असली नसली पीडा डोळ्यांतल्या आसवांद्वारे बाहेर येण्याचा मार्ग शोधत होती. रडून स्वतःचे मन हलके करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय कुठे होता? एका पाठोपाठ एक अशा चाचण्यांच्या आक्रमणाला तोंड देणे अंशूच्या तिखट नजरेचा मारा झेलण्यापेक्षा अधिक वेदनादायक निश्चितच नव्हते.

चाचण्यांच्या अहवालाच्या भीतीची सावली माझ्यासोबतच घराच्या कानाकोपऱ्यात ऐसपैस पसरली होती. मी स्वतःला धीर देण्याचा भरपूर प्रयत्न करीत होते, “ही सगळी फक्त वयोमानाप्रमाणे निभावण्यात येणारी एक औपचारिकता आहे. मी मस्त झोपते, माझे खाणे -पिणे यथास्थित सुरु आहे आणि मी खूप खूप काम देखील करते. मला कांहीही होणे शक्य नाही. “

असा विचार करतांना डॉक्टर आणि अंशू, दोघांची नजर मला जणू आरपार छेदून जायची. जसा एखादा विजेता अहंकाराने दर्पोक्ती करतो, तद्वतच अंशूचे शब्द माझ्या कानांवर पडायचे, “एवढा हलगर्जीपणा चांगला नव्हे. एका विशिष्ट वयानंतर आपसूकच येणाऱ्या मर्यादांचे भान ठेवणे अतिशय गरजेचे आहे. ही साधी गोष्ट तुला कधी कळणार? “

मी आपली वरकरणी गप्पच बसायचे. मात्र मनातल्या मनात माझा जबाब असायचा, “मी औषधे घेतल्याने तुम्हाला एकदाची शांती मिळेल आणि या डॉक्टरांनाही! “

असो, एकामागून एक चाचण्यांचे अहवाल येऊ लागले. त्या अहवालांसोबत क्लिनिकमध्ये जाण्यासाठी माझ्या भेटीची वेळ ठरवण्यात आली. याचा सरळ सुस्पष्ट अर्थ असा दिसून येत होता की काहीतरी गंभीर बिघाड असावा. अहवालांचे बरेचसे आकडे लक्षणीयरित्या खालीवर सरकले होते. या चढउतारांवर नजर टाकणारी अंशूची धारदार नजर जणू सांगत होती की माझा एखादा घोर अपराध सिद्ध झालाय. त्यांच्या आग ओकणाऱ्या नजरेची तीक्ष्णता चरम सीमेवर पोहोचली होती. आता खरं सांगायचं तर हेच अंशू गेल्या पंधरा वर्षांपासून स्वतः प्रत्येक प्रकारची औषधे घेत आहेत. त्यांना या घटकेला हे विचारणे अगदीच व्यर्थच होते की त्यांनी त्यांच्या तब्येतीची नीट काळजी का घेतली नाही? या पंधरा वर्षांनंतर माझ्यासोबत असे घडणे म्हणजे गुन्हा कसा काय असू शकतो?

क्लिनिकमध्ये डॉ. क्लार्क माझ्या समोर कागदपत्रे पसरून बसले होते आणि माझ्या चाचणी निकालांची आकडेमोड करीत होते. ते कांहीतरी बोलतील या प्रतीक्षेत मी बसले होते. पुन्हा एकवार त्यांनी कुटुंबाच्या इतिहासाची माझ्याकडून पुष्टी करवून घेतली. असे करता करता दुसरीकडे त्यांची मोजणी चालूच होती. अव्याहतपणे त्यांचे गणित सुरुच होते. माझ्या शरीराचे गणित: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार! हे आठवत असतांनाच माझे हृदय धडधडू लागले. त्याचे ठोके माझ्या कानांपर्यंत ठक-ठक करीत आदळू लागले. अंकगणित, बीजगणित, भूमिती. त्रिकोण, चतुर्भुज, षटकोन अष्टकोन! ही अनाहूत पाहुण्यांसारखी आलेली मंडळी एका मोठ्या वर्तुळात सामावली होती व त्या वर्तुळाच्या घेराबंदीत आपसूकच अडकून पडली होती.

“तुम्हाला बराच जास्त धोका आहे. ” मला असे सांगितल्यावर डॉक्टर अंशूकडे वळून म्हणाले, “मिस्टर अंशू, मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. एक अपवाद वगळता इतर सर्व चाचण्यांचे निकाल सामान्य दिसत आहेत. तुमच्या पत्नीला सध्या उच्च प्रतीचा धोका आहे. आपल्याला लगेच हृदयरोगतज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. उद्या तुम्हाला क्लिनिकमधून फोन येईल. “

मी अवाक होऊन डॉक्टरांकडे पाहत राहिले. क्लिनिकमधून घरी येताना, आम्ही दोघेही गप्पच बसलो होतो. कदाचित पुढील काळात काय होणार, याने भयग्रस्त झाल्यामुळे तसे असावे. अर्थात ही वादळापूर्वीची शांतता होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला फोन आला: “तुम्हाला एका आठवड्याच्या आत हृदयरोगतज्ञांना भेटायचे आहे. “

“तुला याचा अर्थ कळतोय ना? ” अंशूच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या या उल्कापाताचे उत्तर मी काय आणि कसे देणार होते? आमच्यातल्या अबोल्यामुळे मी तशीही दुःख सहन करीत होतेच. मी अंशूकडे केविलवाण्या नजरेने बघत राहिले. एक आठवडा गोंधळलेल्या द्विधा मनस्थितीत घालवल्यानंतर, अखेरीस हृदयरोगतज्ञांनी माझ्या हृदयाची सखोल तपासणी केली.

“इथं दुखतंय का? ” “तिथं दुखतंय का? ” त्यांच्या सर्व प्रश्नांना माझे नकारार्थी उत्तर ऐकून डॉक्टरांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले.

थोडा विचार केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, “कुठलीच लक्षणे नसणे हे तर मला अजूनच चिंताजनक वाटते आहे. तुमची केस निश्चितच ‘उच्च-जोखीम’ या श्रेणीत येते. म्हणूनच मी तुम्हाला शक्य तितक्या लवकर न्यूक्लियर स्ट्रेस टेस्टसाठी पाठवणार आहे. “

घरी परतताना अंशू माझ्यावर अपमानजनक शब्दांची बॉम्बफेक करायला जणू टपलेलेच होते. “तू जर थोडी काळजी घेतली असती तर ही परिस्थिती भोगावी लागली नसती. तुझ्या घरातल्या लोकांचे काय काय झाले हे तुला माहिती नव्हते कां? “

– क्रमशः भाग पहिला

मूळ हिन्दी कथा : ‘ टूटी पेन्सिल ‘.

मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप 

अधिव्याख्याता, टोरोंटो विद्यापीठ, कॅनडा

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे (पश्चिम)

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भीमाचे गर्वहरण… लेख पहिला  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

??

☆ भीमाचे गर्वहरण… लेख पहिला  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

कौरवांच्या नाशानंतर, असे म्हणतात, की एकदा भीमाला आपणच जगात सगळ्यात बलशाली आहोत असा गर्व झाला. मग मारुतराया वृद्ध वानराच्या रुपात आला, माझी शेपूट हलवून बाजूला कर म्हणाला आणि भीमाचे गर्वहरण केले.

— —

मी एकदा सोलापूर रस्त्याने संत श्री नारायण महाराजांच्या केडगाव बेटातून चिंचवडला इनोव्हा गाडीतून एकटाच परत येत होतो.

संध्याकाळी ६ चा सुमार होता. हायवेला भांडगावच्या सोनाक्षी मंगल कार्यालयातले लग्नकार्य आटोपत आले होते. कार्यालयाच्या दारात “बुढ्ढीके बाल” विकणारा पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना लिफ्टसाठी हात करत उभा होता. in न केलेला काळा पिवळा चौकडीचा हाफ शर्ट, पायात साध्याशा चपला, खांद्यावरच्या दांडीला ५-१५ बुढ्ढीके बाल च्या पिशव्या लटकवलेल्या, खांद्याला रिकामीशी शबनम छाप झोळी.

म्हटलं आज याला AC गाडीतून lift द्यावी. हा तरी कधी गाडीत बसणार? त्याच्यासाठी गाडी थांबवल्याचे त्याला आश्चर्य वाटले. तो गाडीत बसला व माझी बडबड सुरू झाली. त्याचं नाव बबलू आणि तो हडपसरला भाड्याने रहात होता.

“ काय काय विकता?”

“बुढ्ढी के बाल, साबणाचे बुडबुडे व साधे मोठे फुगे.”

“दिवसाला किती बुढ्ढीके बाल विकले जातात?”

“तीन एकशे. पाच रुपयाला एक.”

“ते कसे बनवतात?”

– – मग बबलूने ती process सांगितली. २ किलो साखरेतून तीनशे पिशव्या बनतात. वगैरे वगैरे.

२ किलो साखर म्हणजे फारतर १०० रुपये आणि या पिशव्या विकून त्याला १५०० रुपये मिळत होते. म्हणजे १४०० रुपये नफा.. दिवसाला. म्हणजे महिन्याला??? माझ्या डोक्यात आकडेमोड वेगाने सुरू झाली.

“आणि बुडबुडे व फुगे कुठेत? ”

“संपले. ”

– – त्यांच्यातही कमीतकमी १००% नफा होता. बबलूच्या दिवसाच्या नफ्याचा आकडा माझ्या कल्पेनेपेक्षा खूपच मोठा होत चालला होता.

“इथे कसे काय? ”

“लग्न असलं की विक्री चांगली होते. पुण्यापासून (१०० किलोमीटर दूर असलेल्या) इंदापूरपर्यंतच्या सर्व मंगल कार्यालयांच्या मॅनेजरशी माझे कॉंट्रॅक्ट आहे. मी फोननुसार विक्रीला आलो की मॅनेजरला १०० रुपये द्यायचे. …” – उन्हाने रापलेला, साधासा दिसणारा पण दिवसाकाठी किमान २-३००० रुपये नफा करणारा बबलू सांगत होता.

“पण इतक्या सर्वांशी कॉंट्रॅक्ट करून काय उपयोग? तुम्ही तर एकाच ठिकाणी जाऊ शकता. ” – माझा चाणाक्ष सवाल.

“ मुलं ठेवली आहेत ना…”. त्याचं शांत उत्तर…..

“ गावचीच १८-२० मुलं आहेत. २ खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. मेहुणा मार्केटिंग करून raw material आणतो. मी सगळ्यांसाठी बुढ्ढीके बाल बनवतो. मुलांना महिना १०-१२, ००० पगार देतो… ”

मला यातून दोनच आकडे डोळ्यांसमोर नाचत होते. हा माणूस महिना २ लाख रुपये पगार वाटतो. आणि रहाणं, खाणं, पिणं वगळता प्रत्येक मुलामागे महिना ७०-८०, ००० रुपयांचा नफा कमावतो. अशी १८-२० मुलं. म्हणजे स्वत:सकट महिन्याला याचा निव्वळ नफा लाख्खो रुपयांच्यावर जातो.

“दिल्लीजवळ ७० किलोमीटरवर मीरतला रहातो. तुमच्यासारख्यांच्या आशिर्वादाने तीन मजली इमारत आहे, ४ गाड्या आहेत… ” बबलू सांगत होता, आणि मी तोंड उघडे टाकून गाडी चालवत होतो.

— —

या प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी मी व बायको म्हात्रे पुलाजवळ dp road वर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारीच एक मंगल कार्यालय होतं. दारात एक मुलगा बुढ्ढीके बाल विकत उभा होता.

मी त्याच्याजवळ गेलो, विचारलं, “कुठे रहातोस? ”

तो म्हणाला : “ हडपसरला. ”

“बबलूकडे का? ”

तो चकित. ‘हो’ म्हणाला.

“त्याला सांग काल तो ज्या गाडीने आला त्याचा “ड्रायव्हर” भेटला होता. ”

भीमाच्या ताकदीचे पार गर्वहरण झालं होतं.

– लेख पहिला 

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “सत्यवान पौर्णिमा – एक नवीन क्रांतीचा धागा…” ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

माझा परिचय

मी सौ. तृप्ती श्रीकांत देव, भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे.

मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथा विश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात.

एखादा विषय मनाला भिडला की त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे.

शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.

? जीवनरंग ?

☆ “सत्यवान पौर्णिमाएक नवीन क्रांतीचा धागा…तृप्ती देव

जून महिन्याची ती प्रसन्न सकाळ होती.

रात्रीच्या पावसाने धरतीने जणू हिरवागार शालू नेसला होता. अंगणात उभा असलेला वड अधिकच टवटवीत दिसत होता. त्याच्या पानांवर रेंगाळलेले दवबिंदू सकाळच्या कोवळ्या उन्हात मोत्यांसारखे चमकत होते. वाऱ्याच्या मंद झुळुकीसोबत ते थेंब अलगद खाली झेपावत होते, जणू निसर्ग स्वतःच आजच्या दिवसाची आरास करत होता. 

घरात मात्र एका वेगळ्याच उत्सवाची चाहूल लागली होती.

स्वयंपाकघरातून उकळत्या चहाचा सुगंध दरवळत होता. एका बाजूला फुलांची परडी, हळद-कुंकू, अगरबत्ती, फळं आणि वडाला अर्पण करायचा पवित्र दोरा प्रेमाने सजवलेला होता. सुमन नव्या कोऱ्या साडीत नटली होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज होतं. वटपौर्णिमा तिच्यासाठी केवळ सण नव्हता; तो आयुष्यभर जपलेल्या नात्याच्या श्रद्धेचा उत्सव होता.

 

तेवढ्यात पंधरा वर्षांची अन्वी डोळे चोळत बाहेर आली.

“आई, एवढ्या सकाळी काय करतेस गं?”

सुमनने हसत तिच्याकडे पाहिलं.

“आज वटपौर्णिमा आहे ना बाळा. वडाची पूजा करायची आहे.”

अन्वीने आळस देत विचारलं,

“म्हणजे आज पुन्हा उपवास?”

“हो.”

“संपूर्ण दिवस?”

“हो.”

“भूक नाही लागणार?”

सुमन हसली… “लागेल की. पण काही गोष्टी प्रेमासाठी केल्या जातात.”

अन्वी काही क्षण शांत राहिली.

“पण आई, तू हा उपवास नक्की कशासाठी करतेस?”

सुमनने सहज उत्तर दिलं, “तुझ्या बाबांना निरोगी, आनंदी आणि दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून.”

– – अन्वीने मान डोलावली. पण तिच्या मनात एक छोटासा प्रश्न घर करून बसला.

थोड्याच वेळात बाबा हॉलमध्ये चहा पीत वर्तमानपत्र वाचत बसले होते. अन्वी जाऊन त्यांच्या शेजारी बसली.

“बाबा, एक विचारू?”

“विचार.”

“आई तुमच्यासाठी उपवास करते ना?”

“हो.”

“मग तुम्ही आईसाठी काय करता?”

वर्तमानपत्रावरून नजर वर आली.– क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला.

“म्हणजे?”

“म्हणजे आई देवाला सांगते की माझ्या बाबांना चांगलं आयुष्य दे. मग तुम्ही आईसाठी देवाला काय सांगता? तुम्ही तिच्यासाठी काय करता?”

अन्वीचा आवाज निरागस होता… ना तक्रार… ना राग… ना वाद.

– फक्त एक प्रश्न.

.. .. पण काही प्रश्न एवढे साधे असतात की ते थेट मनाच्या दारावर येऊन उभे राहतात.

अन्वी शाळेत निघून गेली. पण तिचा प्रश्न बाबांच्या मनात रेंगाळत राहिला.

दुपार झाली. घरात शांतता होती. उपवास असूनही सुमन सगळ्यांचं जेवण वाढत होती. आजीला औषधं देत होती. घर आवरत होती. संध्याकाळच्या पूजेची तयारी करत होती.

.. .. बाबा तिच्याकडे पाहत होते… वर्षानुवर्षे ते हेच पाहत होते.

.. .. पण कदाचित पहिल्यांदाच समजून घेत होते.

त्यांना अचानक जाणवलं—

खरंच…

ती माझ्यासाठी किती काही करते.

आणि मी?

मी तिच्यासाठी काय करतो? …. 

 

सुमन वडाची पूजा करून घरी परतली.

वडाभोवती फेऱ्या मारून, दोरा बांधून आणि मनोभावे प्रार्थना करून ती थोडी दमलेली दिसत होती.

घरात सगळे एकत्र बसले होते.

तेवढ्यात बाबा उठले.

त्यांनी सुमनसमोर एक छोटंसं ताट ठेवलं.

ताटात एक गुलाबाचं फूल होतं.

एक शुभ्र धागा होता.

आणि एक छोटीशी चिठ्ठी.

 

सुमनने आश्चर्याने विचारलं,

“हे काय आहे?”

 

बाबांनी तिचा हात आपल्या हातात घेतला.

“आज तू माझ्यासाठी व्रत केलंस. अनेक वर्षांपासून करते आहेस. पण आज आपल्या अन्वीने मला एक प्रश्न विचारला.”तृप्ती देव

 

घरात शांतता पसरली.

“तू माझ्या आयुष्यासाठी प्रार्थना करतेस… पण मी तुझ्यासाठी काय करतो? याचा मी कधी विचारच केला नव्हता.” .. .. सुमन निःशब्द झाली.

 

बाबा पुढे म्हणाले,

“आजपासून मीही एक व्रत करणार आहे.”

 

अन्वी उत्साहाने म्हणाली,

“म्हणजे बाबांची पण वटपौर्णिमा?”

 

सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

बाबांनी हलकेच मान डोलावली.

“हो… पण थोडी वेगळी.”

.. .. ते म्हणाले,

“आज मी तुझ्या हाताला हा संकल्पधागा बांधतो.”

 

.. .. त्यांनी सुमनच्या मनगटावर तो शुभ्र धागा बांधला.

“तू माझं आयुष्य वाढावं म्हणून देवाला साकडं घालतेस… पण आज मी एक वचन देतो… तुझ्या स्वप्नांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन… तुझ्या आरोग्याची काळजी घेईन… तुझ्या आनंदासाठी वेळ काढीन.

तुझं आयुष्य फक्त संसारात विरघळून जाऊ देणार नाही… तुझा सन्मान, तुझं अस्तित्व आणि तुझी स्वप्नं जपणं हेच माझं व्रत असेल.”

 

सुमनच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

इतक्या वर्षांच्या संसारात तिने अनेक भेटवस्तू पाहिल्या होत्या.

पण तिच्या मनाची, तिच्या कष्टांची आणि तिच्या अस्तित्वाची अशी दखल घेणारी ही पहिलीच भेट होती.

 

अन्वीने उत्सुकतेने विचारलं,

“बाबा, मग या नवीन व्रताचं नाव काय?”

 

बाबा हसले.

“सत्यवान पौर्णिमा.”

 

“का?”

“कारण सावित्रीने सत्यवानासाठी यमाशी झुंज दिली होती.

आता प्रत्येक सत्यवानाने आपल्या सावित्रीच्या आनंदासाठी, तिच्या सन्मानासाठी आणि तिच्या अपूर्ण स्वप्नांसाठी उभं राहायला हवं.”

 

.. त्या रात्री घरात कोणतीही मोठी घोषणा झाली नाही.

.. कोणतीही जुनी परंपरा मोडली नाही.

.. कोणताही नवा धर्म जन्माला आला नाही.

 

.. पण एका लहान मुलीच्या निरागस प्रश्नाने एका पुरुषाला खऱ्या अर्थाने सत्यवान बनवलं होतं.

 

वर्षानुवर्षे वडाच्या झाडाला बांधले जाणारे धागे तसेच होते.

.. पण त्या दिवशी एक नवीन धागा जन्माला आला होता.

.. कृतज्ञतेचा.

.. समानतेचा.

.. आदराचा.

 

खिडकीबाहेर उभा असलेला वडाचा वृक्ष मंद वाऱ्यावर डोलत होता.

त्याच्या पारंब्या जणू काळाच्या साक्षीदाराप्रमाणे या नव्या विचाराचं स्वागत करत होत्या.

 

सुमनने हातात बांधलेल्या त्या शुभ्र धाग्याकडे पुन्हा एकदा पाहिलं… वर्षानुवर्षे ती वडाला दोरा बांधत आली होती….. पण आज पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या मनाला सन्मानाचा धागा बांधला होता.

 

कारण संसार केवळ एका व्यक्तीच्या त्यागावर उभा राहत नाही…

तो परस्परांच्या सन्मानावर, विश्वासावर आणि एकमेकांच्या स्वप्नांना दिलेल्या पंखांवर फुलत असतो.

खरी क्रांती परंपरा मोडण्यात नसते…

.. ती परंपरेला नव्या विचारांची पालवी फुटू देण्यात असते.

.. ती जुन्या श्रद्धा नाकारण्यात नसते…

.. तर त्यांना समानतेचा आणि कृतज्ञतेचा नवा अर्थ देण्यात असते.

 

पिढ्यान् पिढ्या जूनची पौर्णिमा आली की लोक सावित्रीची कथा सांगत आले…

.. यापुढे कदाचित त्या कथेसोबत एक नवीन कथा सांगितली जाईल.

.. .. .. त्या सत्यवानांची… ज्यांनी आपल्या सावित्रीच्या स्वप्नांनाही जगण्याचा अधिकार दिला.

आणि त्या दिवसापासून त्यांच्या घरात एक नवी सुंदर परंपरा सुरू झाली…

.. .. .. “सत्यवान पौर्णिमा”

.. ज्या दिवशी प्रत्येक सत्यवान आपल्या सावित्रीला एक वचन देतो—

“तू माझ्या आयुष्यासाठी प्रार्थना केलीस…

आता मी तुझ्या स्वप्नांसाठी जगण्याचा संकल्प करतो.”

(कथा आवडल्यास नाव न गाळता शेअर करावी ही विनंती.. हे माझे वैयक्तिक विचार आहेत ). 

© तृप्ती देव

भिलाई( छत्तीसगड)

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उंचावर… भाग – २ ☆ गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ उंचावर… भाग – २ ☆ गौरी गाडेकर

(विकास-अश्विनी अरविंदकडे जेवायला गेले नाहीत, त्यासंदर्भात बोलायला विकास आणि अरविंद संध्याकाळी भेटले. आता पुढे……) 

संध्याकाळी विकासने अरविंदला अश्विनीविषयी सगळं सांगितलं – ती अख्खा दिवस टक लावून समोरच्या कन्स्ट्रक्शन वर्कर्सकडे बघत बसलेली असते. तिचा राग येतो;पण तिच्या चेहऱ्यावर निरागसता असते वगैरे.

“तू गावी असताना ती कशी वागायची? ” 

“खूप आनंदी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारी मुलगी आहे ती. बाबांना फ्रॅक्चर झालं, त्यामुळे आमचं हनिमूनला जाणं कॅन्सल करावं लागलं, तेही समजून घेतलं तिने. ” 

“एवढ्या दिवसांत काही विचित्र गोष्टी लक्षात आल्या तुझ्या? ” 

“नाही रे. ” मग थोडा वेळ विचार करून विकास म्हणाला, “मी तिला म्हटलं, ‘आधीच लग्नात खूप खर्च झालाय, शिवाय घर सजवायचंय, तेव्हा आपण हनिमूनसाठी लांब कुठे नको जाऊया. जवळच माथेरान, महाबळेश्वरला जाऊया. ‘ ती म्हणाली, ‘जवळच्या ठिकाणी जायला हरकत नाही. पण माथेरान, महाबळेश्वर नको. तिथे डोंगर आहेत. ‘ नंतर मुंबईत आल्यावर स्टेशनचा ब्रिज चढताना घाबरली होती. माझा हात घट्ट धरला होता तिने. वर पोचेपर्यंत भिजून चिंब झाला होता तिचा हात. घरी आल्यावरही तिसरा मजला म्हटल्यावर थोडी नाखूष झाली होती. खिडकीतून खाली बघायला सांगितलं, तर टाळाटाळ केली… ” 

अरविंदने पुढचं ऐकायचं सोडून कोणालातरी फोन लावला, “किती वाजेपर्यंत आहेस तिथे? … मी लगेचच निघतोय. थांब मी येईपर्यंत. ” एका घोटात कॉफी पिऊन निघालासुद्धा. “बिल प्लीज तूच दे. मला उशीर होईल. “

विकासला त्याचा रागच आला. म्हणजे बिल द्यावं लागलं म्हणून नव्हे. तर आपलं एवढं महत्त्वाचं बोलणं अर्धवटच सोडून…

 

रात्री अरविंदचा फोन आला – “मघाशी तू सांगत होतास, तेव्हा मला भयगंडाची शंका आली. माझा एक मित्र सायकिऍट्रिस्ट आहे. त्याला मी फोन केला आणि तो क्लिनिकमधून निघण्यापूर्वीच त्याला गाठायचं, म्हणून घाईघाईने गेलो. माझी शंका खरी असावी, असं त्यालाही वाटतंय. उद्या सकाळची अपॉइंटमेंट मिळालीय. ऑफिसला रजा घेऊया. हे जास्त महत्त्वाचं आहे. उद्या सकाळी अश्विनीला घेऊन मला दादर स्टेशनवर भेट. ” 

 

त्या रात्री विकासच्या डोळ्याला डोळा लागला नाही. ‘असं काही खरंच असू शकेल का? पण एरव्ही तर ती… ‘ 

 

अश्विनी तशी नाइलाजानेच घराबाहेर पडली होती. स्टेशनचा ब्रिज चढावा लागू नये, म्हणून विकासने तिला टॅक्सीनेच दादरला नेलं. क्लिनिक सहाव्या मजल्यावर होतं. लिफ्टमध्ये अश्विनीने विकासचा हात घट्ट धरला होता, हे अरविंदच्या नजरेतून सुटलं नाही.

 

डॉक्टरांनी पहिल्यांदा विकासला आत बोलावलं, “अरविंदने मला जे सांगितलं, त्यावरून मला वाटतं, की तुमच्या पत्नींना ऍक्रोफोबिया असावा. ऍक्रोफोबिया म्हणजे उंचीचा भयगंड. माझ्या मते याचं कारण त्यांच्या बालपणात दडलेलं असावं. मी त्यांच्याशी बोलून त्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी अशा गोष्टी सुप्त मनात दडलेल्या असतात. त्या पेशन्टला आठवतही नाहीत. अशा वेळी हिप्नोथेरपीचा वापर करावा लागतो. ” 

विकासचा चेहरा आधीच पडला होता. आता तर त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.

डॉक्टरांनी त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हटलं, “डोण्ट लूज होप, मिस्टर विकास. त्या नक्की बऱ्या होतील. आणि त्यांनी लवकर बरं व्हावं, म्हणूनच मी आजच हिप्नोथेरपीचा प्रयोग करणार आहे. अर्थात आवश्यकता असेल तरच. ” 

“तुम्हाला योग्य वाटेल, ते सर्व करा. पण माझ्या अश्विनीला बरं करा, डॉक्टर. ” 

 

डॉक्टरांनी अश्विनीशी बोलायला सुरुवात केली. त्यांचा शांत, आश्वासक सूर कानावर पडताच तिच्यावर आलेलं दडपण नाहीसं झालं. ती अरविंदशी ज्या मोकळेपणाने बोलत असे, त्याच मोकळेपणाने डॉक्टरांशीही बोलू लागली. मग डॉक्टरांनी तिला मुंबईत आल्यावर आई-वडिलांची आठवण येते का वगैरे विचारताच ती गप्पांच्या मूडमध्ये आली. त्यांनी तिला आताच्या, पूर्वीच्या बऱ्याच गोष्टी विचारल्या. पण ऍक्रोफोबियाचा उगम सापडेल, अशी कोणतीच माहिती त्यांना मिळाली नाही.

मग त्यांनी मधला पडदा ओढला. आता विकासला आणि अरविंदला अश्विनी दिसत नव्हती, पण तिचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं.

डॉक्टरांनी तिला दीर्घ श्वसन करायला सांगितलं. पायापासून डोक्यापर्यंतचा एकेक अवयव – पहिल्यांदा त्याला ताण देऊन मग रिलॅक्स करायला सांगितलं. हळूहळू ती संमोहनावस्थेत गेली.

डॉक्टर तिला म्हणाले, ” तू आता डोंगर चढत आहेस. कसं वाटतंय तुला? ” 

“नाही, नाही. मी डोंगरावर जाणार नाही. ” 

“का? ” 

“… ” 

“का नाही जाणार तू डोंगरावर? ” 

“का ते मला माहीत नाही, पण मी नाही जाणार. ” 

“ठीक आहे. नको जाऊस… हे बघ, अश्विनी. तू आता पाच वर्षांची आहेस. आई-बाबांबरोबर फिरायला चालली आहेस. कुठे जायला आवडेल तुला? ” 

“डोंगरावर. मी धावतधावत डोंगर चढणार. आई खूप घाबरते, मी धावायला लागले की. मग मला गंमत वाटते. ” तिचा सूर अगदी लहान मुलासारखा वाटत होता.

” आता तू थोडी मोठी झालीस हं, अश्विनी. समज सात वर्षांची. आता परत जा डोंगरावर. ” 

“नाही, नाही, मी नाही जाणार डोंगरावर, “भेदरलेल्या आवाजात अश्विनी म्हणाली.

” का ग? काय झालं? ” 

“तिथे तो घाणेरडा माणूस आहे. ” 

“हो? काय करतो तो? ” 

“तो आणि ती बाई… शी! नीट कपडेपण नाही घातले त्या दोघांनी. मी त्यांना बघितलं, हे कळल्यावर तो धावत आला. त्याच्या तोंडाला एवढी घाण येत होती! मला ओकारी आल्यासारखं वाटलं… आणि त्याची भीतीपण वाटली. त्याने मला उचललं आणि डोंगराच्या टोकाला नेलं. मला उंच धरून विचारलं, ‘खाली टाकून देऊ तुला? ‘ मी… मी.. घाबरले आणि… रडायला लागले. ‘चूप! गप्प बस. तोंडातून आवाज काढायचा नाही. आणि आम्हाला बघितलं, हे कोणाला सांगायचं नाही. विसरून जायचं सगळं. कळलं? विसरून जायचं! सगळं विसरायचं! नाहीतर डोंगरावरून खाली फेकीन. ‘ ” आणि अश्विनी रडायला लागली. एखादी लहान मुलगी रडावी तशी.

डॉक्टरांनी थोडा वेळ तिला रडू दिलं. मग ते म्हणाले, ” तुला माहीत आहे, बाळा, त्या माणसाचं पुढे काय झालं? त्याला ना पोलिसदादाने पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. आणि मार मार मारलं. तो मेला आता. आता तो तुला त्रास द्यायला कधीच येणार नाही. ” 

“खsरं ss? ” 

“अगदी खरं. तेव्हा आता तुला डोंगरावर जायला काहीच हरकत नाही. जाणार आता डोंगरावर? ” 

” तो माणूस नक्की येणार नाही? ” 

“अजिबात नाही. मेला तो. मग जाणार तू डोंगरावर? तुला आवडतं ना डोंगरावर फिरायला? ” 

“हो! आई-बाबांबरोबर जाणार मी डोंगरावर. “

“आता मोठी हो. आणि नवऱ्याबरोबर जा डोंगरावर. जाणार ना? ” 

“हो. “बाहेर विकासाच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले.

“एक गंमत सांगू, अश्विनी मॅडम? खिडकीकडे जा आणि खाली बघा. ती माणसं, वाहनं कशी दिसतात, ते बघा. ” 

“खरंच, किती लहान दिसतात ना! आणि आपण आकाशातच आहोत असं वाटतं. मस्तच! ” 

 

पडदा बाजूला करून विकास आत आला आणि डॉक्टर, अरविंद कोणाचीही पर्वा न करता त्याने अश्विनीला मिठीत घेतलं.

– समाप्त –

©  गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “देणगी…!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “देणगी…!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

कॅम्पमध्ये एका चर्च बाहेर अर्धनग्न (हा शब्द लिहिण्यासाठी योग्य आहे म्हणून वापरला, अन्यथा अवस्था याहून वाईट होती)अवस्थेत बेशुद्ध पडलेला हाच तो…

गलीच्छ वागतो, काम करत नाही, प्रसंगी आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करणारा हाच तो…

शेवटी आई बापालाच नालायक ठरवून, घराबाहेर पडून, भीक मागून – दारू पिऊन कुठेही पडणारा हाच तो…

… दोनेक वर्षे अंघोळ नाही – स्किन इन्फेक्शन – रस्त्यावर उघडे झोपणे – शुद्ध नाही – अंगावर किमान दोन इंचाचा मळ – घोंगावणाऱ्या माशांचे, हक्काचे पार्टीचे ठिकाण… हाच तो…

– – यापुढचे त्याचे वर्णन आता मुद्दाम करत नाही, वाचतानाही घृणा येईल…

दोन वर्षांपूर्वी मी याला जेव्हा पाहिले तेव्हा मला याचा राग आला नाही, वाईट वाटलं…!

बेफाट वाहणाऱ्या पाण्याला बांध घातला की ते संथ होतं…

बेफाट वाहणाऱ्या मनाला बांध घातला कि ते संत होतं…

याच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं, याला कुणी बांध घातलाच नाही… तू नालायक आहेस, निकम्मा आहेस, दारुड्या आहेस, जगण्याच्या लायकीचाच नाहीस, मरत का नाहीस, माझ्या पोटी हि असली अवलाद नको होती… अशा वाक्यांनी त्याचे खच्चीकरण केले गेले…!

सगळीकडून धिक्कारला गेलेला तो, हाच तो…

तू तो है अलबेला… हजारो मे अकेला… असं एकदा तरी, भले खोटं खोटं तरी, कोणीतरी त्याला म्हणायला हवं होतं… नेमकं तेच घडलं नाही आणि हा बिघडत गेला…!

लागल्यावर प्रत्येक वेळी औषधच लागतं असं काही नाही, प्रेमाची एक फुंकर सुद्धा पुरेशी ठरते…!

– – Diagnosis झाल्यावरच उपचाराची दिशा कळते. त्याची दुखरी नस मला समजली होती, उपचाराची दिशा नकळत ठरून गेली…

“ बाळा… माझ्या सोन्या… “ म्हणत मी जेव्हा त्याला धुंदीतून प्रथम उठवले होते, तेव्हा त्याने माझा हात पकडून डोळ्यातून अश्रू काढले होते… त्याला वाटलं पोलीस असतील आणि आता काठी मारतील…

झालं उलटंच…! मी त्याच्या डोक्यावर मायेनं हात ठेवला होता.

जागा झाल्यावर पहिल्यांदा त्याच्या ओठी शब्द आले, “ पप्पा तुम्ही इथे कसे…? “

– – डोळे उघडल्याबरोबर, समोर नसूनही जी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते तीच आपली…!

वडिलांच्या तो अगदी जवळ आहे हे मला जाणवलं, माझ्यासाठी एवढासा धागा पुरेसा होता आणि तेव्हापासून मी त्याचा “पप्पा” बनण्याचा प्रयत्न करत गेलो.

मध्ये अनंत गोष्टी घडल्या, ज्या अत्यंत भावुक होत्या, त्या काही आता लिहीत नाही, लेख खूप मोठा होईल.

सर्वप्रथम त्याला हाताने अंघोळ घातली, ऍडमिट केले, पूर्णतः त्याला माणसात आणले.

पूर्ण बरा झाल्यानंतर, तो मला म्हणाला, ‘ सर तुमी मला पप्पा सारकेच आहात, मी तुमाला कोनच्या स्वरूपात परतफेड करू? ”

– – मी चातकासारखी त्याच्या याच शब्दांची वाट पाहत होतो.

म्हटलं ‘नक्की करशील परतफेड…?’

.. क्षणाचाही विचार न करता म्हणाला… ‘हां सर… ‘

“मग आता कामाला लाग, नोकरी मी शोधतो… “ त्याच्या डोळ्यात डोळे घालून पहात मी म्हणालो.

काही क्षणांचा अवधी घेऊन, पण निर्धाराने म्हणाला “ हो सर, करतो… “

… निम्मी लढाई मी येथे जिंकली होती…!

प्रसंग दोन

शनिपार परिसरात असलेले एक मोठे दुकानदार, नेहमी मला फोन करतात आणि म्हणतात,

‘डॉक्टर तुमाला मला डोनेशन द्यायचं हाय, पण साला या कामांमंदी मी अडकून जाते, आनी राहूनच जाते, तुमाला कंदी टायम गावला तर तुमी या ना दुकानी ‘

(आजवर अकरा वर्षाच्या कामाच्या आयुष्यामध्ये कोणालाही मी देणगी मागितली नाही, पुढे सुद्धा कधी मागणार नाही, पण समाज म्हणून आपण इतके मोठ्या मनाचे आहात, की न मागताच माझ्या झोळीमध्ये आपण इतकं काही टाकता, की मला कुठे जाऊन पदर पसरायची गरजच पडत नाही, यानिमित्ताने माझा प्रणाम आपणा सर्वांना)

– – यावेळी आवर्जून मी शेठजींकडे गेलो, मला पाहून त्यांना आनंद झाला, मी त्यांना म्हणालो, ‘सर बरेच दिवस डोनेशन द्यायचे म्हणत होतात, ते घ्यायला आज आलो आहे… ‘

‘क्या बात है, आवो ने पधारो… पधारो म्हणत त्यांनी माझं स्वागत केलं, ड्रॉवर मधील चेक काढला, जिभेला बोट लावून, मला न विचारताच त्यांनी एक चेक फाडला.

मी हात जोडून म्हणालो, ‘सर पैसे नको आहेत… ‘

‘मंग…? ’ ते गोंधळून म्हणाले…

‘दुकान मदली तुमाला पसंत येईल ती कोणचीबी गोष्ट घिवून जावा, कायी वांदा नाय सायेब… ‘

माझ्याही-वडिलांच्या वयाचे असणाऱ्या त्या शेठजींचे हात मी हाती घेतले, कपाळी लावले आणि म्हणालो, ‘माऊली इतके कामगार तुमच्याकडे काम करतात, माझ्या एका मुलाला काम द्या… तेच माझ्यासाठी डोनेशन…! ‘

सुरुवातीला त्यांना काही कळलं नाही… यानंतर सविस्तर सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या…

यानंतर ते हसत म्हणाले, ‘काय तुमी बी वार्ता करते… पोराला उद्यापासून पाठवून द्या आणि हा चेक बी घेऊन जा… ‘

– – तो चेक पुन्हा कपाळाला लावत मी त्यांना म्हणालो, “या चेकवर जी आपण रक्कम लिहिणार होतात, ती रक्कम माझ्या मुलाला दर महिन्याला पगार म्हणून द्या… हेच माझं डोनेशन…! “

वडिलांच्या वयाचे… व्यवसाय करून अनुभव सिद्ध झालेले… सहजासहजी न बधणारे शेठजी…

यावेळी चष्म्याआड त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते…! त्यांचे भरलेले डोळे पाहून, आता माझ्या डोळ्यात पाणी येईल, त्याच्या आत मला दुकानातून बाहेर पडणे आवश्यक होते…!

‘निघतो‘ म्हणत, मी त्यांच्या पाया पडलो आणि निघालो…

जाताना ते म्हणाले “ पोराला द्या पाठवून, कामाला लावतो…! आणि हो… पुढल्या वर्षी डोनेशन आणखी वाढवून देईन… ” डोळ्यात पाणी घेऊन मी फक्त त्यांना नमस्कार करून निघालो.

यानंतर या मुलाला तिथे कामाला लावला, त्याने माझे नाव राखले, मनापासून काम केले, , घरी पैसे देऊ लागला, आई-वडिलांचा सन्मान करू लागला, आई-वडिलांनी मनापासून याला स्वीकारलं…

सुरुवातीला त्याच्या भेटी होत होत्या परंतु पुढे पुढे तो त्याच्या कामात व्यग्र झाला आणि मी माझ्या…

याला एक वर्ष लोटलं…!

प्रसंग तीन

शनिवार दिनांक 13 जून… परत शनिपार, सर्व कामं आटपली… निघालो…

मोटरसायकल वर बसलो आणि एका हँडसम दिसणाऱ्या मुलाने माझ्या मोटरसायकलला त्याची सायकल आडवी लावली…

.. पुढच्या स्पॉटवर जायचे असल्याकारणाने, गडबडीत मी त्या मुलाकडे नीट पाहिलेच नाही, नेहमीची मवाळ भूमिका घेत मी त्या मुलाला म्हणालो, ‘बाळा माझं काही चुकलं का? थांब मी गाडी मागे घेतो… ‘

‘हो सर लय चुकलं तुमचं…? ‘ तो गुरगुरला

मी चमकून पाहिलं… हा तोच शेठजींकडे कडे काम करणारा…!

‘अरे तु…? किती बदल झाला आहे… मी ओळखलंच नाही तुला बाळा…!

‘एका जाग्यावर बसत जावा ना वो सर, शोधून पाय आन सायकल थकली… ‘ तो हसत बोलला.

‘एका जागेवर बसलो असतो, तर तू भेटला असतास का रे नालायका…? ’ जुन्या गोष्टींची आठवण करून देत, बाप असल्याचा गैरफायदा घेऊन बोललो.

तो सुद्धा हसला…

‘सायकल कोणाची रे…? ‘

‘सर पगारातून नव्वी कोरी सायकल हत्या हप्त्यानं घेतली’ त्याच्या चेहऱ्यावर कौतुक आणि समाधानाचे भाव होते.

… मुळचा गोरापान, अंगावर छान कपडे आणि नवीन सायकल… माझी नजर या पोरावरून हटेना, वाटलं याला माझीच दृष्ट लागेल.

… या नंतर तो माझ्या जवळ आला, खांद्यावर डोकं ठेवून अचानक रडू लागला… त्याला सर्व जुन्या गोष्टी आठवत होत्या… ‘ सर तुम्ही नसते तर… ’ वगैरे वगैरे बोलू लागला, मी फक्त हसत त्याची पाठ थोपटत होतो…!

बोलता बोलता त्याने माझ्या खिशात काहीतरी टाकले…

मी सहज काढून पाहिले, ते पाचशे एक रुपये होते…

माझ्या सर्व गोष्टी माझ्या कमरेला अडकवलेल्या बॅगेत असतात, खिशात काहीही नसते, मग हे 500 रुपये आले कुठून?

मी त्याला म्हणालो, ‘अरे बाळा हे पाचशे रुपये माझ्या खिशात तू ठेवलेस का? हे माझे नाहीत… ‘

तो म्हणाला, ‘सर तुमचेच आहेत… ‘

‘म्हणजे…??? ‘

“ मागच्या महिन्यामध्ये, कामावर एक वर्ष पूर्ण झालं, माजी बडती झाली, पगार वाडला, मी तुम्हाला कदीपासून शोधतोय तुम्ही सापडले नाहीत, आज शेवटी हितं घावले… मला तुमाला डोनेशन का काय ते द्यायचे होते ना, बडतीच्या पैशातून…!!! ”

– – त्याचं वाक्य संपायच्या आधी माझ्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. गाडीवरून उतरून मी त्याला घट्ट मिठी मारली.

‘बाळा किती मोठा झालास रे…? ‘ मला खूप काही बोलायचं होतं पण, हुंदक्यांच्या घाटाघाटा मधून शब्दांची गाडी पुढे सरकेना…!

– – घासातला घास काढून देऊन, “परतफेड” या शब्दाचा अर्थ, आज मला नव्याने समजला.

त्यातला एक रुपया माझ्या बॅगेत ठेवून, उरलेले पाचशे मी त्याला परत केले, आणि म्हणालो, ‘जेव्हा मला लागतील तेव्हा मी परत मागून घेईन तुझ्याकडून. ‘

पुण्यात राहणाऱ्यांना माहित आहे, शनिपार हा चौक किती गजबजलेला असतो, इतक्या गर्दीच्या ठिकाणी तो माझ्या आणि मी त्याच्या गळ्यात पडून रडत होतो, लोक थांबून कुतूहलाने पहात होते… काय चाललंय हे त्यांना कळत नसावं…! माझ्या डोळ्यातून सतत अश्रू ओघळत होते, आणि माझे डोळे पुसत तो निरागसपणे म्हणत होता, ‘सर तुमी नगा ना रडू, तुमाला रडताना पायलं की मलाबी लय रडू येतं मंग… ‘

– – एवढ्या गर्दीतही मला फक्त तो आणि तोच दिसत होता… आणि डोक्यात गाणं सुरू होतं, ये तो है अलबेला… हजारो मे अकेला…!!!

त्याचा निरोप घेऊन मी पुढल्या मुक्कामी निघालो, गाडीवर जाताना सतत त्याचेच विचार…

… सहज डोक्यात आलं, इतर कर्मचारी सोडून शेठजींनी याच मुलाला एका वर्षात बढती कशी बरं दिली असावी? आणि पगार सुद्धा वाढवला…? आणि झटकन मला शेठजींनी त्यावेळी बोललेलं वाक्य आठवलं,

‘आणि हो… पुढल्या वर्षी डोनेशन आणखी वाढवून देईन… ‘

– – सहज बोललेल्या त्या वाक्यात किती गहन अर्थ होता, त्याचा उलगडा मला आज एका वर्षानंतर झाला.

डोळ्यात पुन्हा पाणी आलं… मनातल्या मनात मी शेठजींच्या पायांना स्पर्श केला…!

… शेठजींनी या मार्गाने दिलेलं हे “डोनेशन” आणि माझ्या पोरानं दिलेली “देणगी” मनातल्या तळ कप्प्यात साठवून, मी निघालो श्रीमंत बाप होऊन…!

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares