मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अ _न_ मोल…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “अ _न_ मोल…” ☆ श्री मंगेश मधुकर

रात्री नऊच्या सुमारास फोन वाजला. पलीकडून आवाज “साहेब, नमस्कार”

“नमस्कार!! कोण? ”

“मी अनमोल, आपला जुना परिचित, स्मरणात आहे का? ”

“आहे तर, वा वा, बऱ्याच दिवसांनी.. ”

“आपली तीव्रतेनं आठवण आली म्हणून फोन केला. रागावू नका. ”

“अजिबात नाही. उलट आठवणीनं फोन केल्याबद्दल छान वाटलं”

“आपलं आरोग्य कसंयं”

“उत्तम, तुझं”

“चांगलयं. नियतीनं संधी दिली तर भेट होईल. धन्यवाद!! शुभ रात्री” एवढं बोलून फोन कट. थोडं विचित्र वाटलं पण अनमोल असाच आहे.

त्याची पहिली भेट आठवली. खूप महिन्यांपूर्वी आमच्या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून भरती झाला. गोल चेहरा, बारीक कापलेले केस, शिडशिडीत बांधा, उंचापूरा, लांब नाक, मोठाले डोळे आणि किंचित हसरा चेहरा असलेल्या अनमोलला भेटल्यावर काही विशेष वाटलं नाही पण जेव्हा त्यानं बोलायला सुरवात केली तेव्हा वेगळेपण जाणवलं. तो बोलीभाषेत न बोलता पुस्तकी बोलायचा. काम नीट करण्याविषयी सांगितल्यावर ताबडतोब विनम्रपणे नमस्कार करत तो म्हणाला“आपणास तक्रार करण्याची संधी मिळणार नाही याची पुरेपूर आणि शक्य ती काळजी घेईन. फक्त लोभ असू द्या. यथाशक्ती उत्तम प्रयत्न करीन. ” खरं सांगायचं तर मला त्याचं वागणं आणि बोलणं नाटकी वाटलं.

“गुड, ऑल द बेस्ट” मी शेकहँडसाठी हात पुढे केल्यावर नमस्कार करत म्हणाला “धन्यवाद”.

अनमोलचं व्यक्तिमत्व, वागणं, काम आणि बोलणं यात प्रचंड विरोधाभास होता. केवळ वाचलेले जड जड मराठी शब्द तो बोलताना सर्रास वापरायचा आणि तेच ऐकायला विचित्र वाटत होतं. इंग्रजी शब्द मात्र कटाक्षानं टाळायचा. कुणी ‘गुड मॉर्निंग’ म्हटलं की ‘आपला दिवस सुखकर जावो”असा प्रतिसाद द्यायचा. जरा हटके बोलण्यामुळं साहजिकच कंपनीत अनमोल चर्चेचा आणि चेष्टेचा विषय झाला. अनेकजण मुद्दाम त्याच्याशी बोलून मजा घ्यायचे. हे कळत असूनही अनमोलनं बोलण्याची पद्धत बदलली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर अतिसौजन्यानं वागणारा अनमोल कामाच्या बाबतीत एकदम ढिला. कायम मोबाइल नाहीतर वाचत बसलेला. कामाकडे फारसं लक्ष नसल्यानं वारंवार चुका व्हायला लागल्या तेव्हा पुन्हा पुन्हा समज दिली परंतु काही फरक पडला नाही म्हणून सिक्युरिटी मॅनेजरला कळवल्यावर दुसऱ्याच दिवशी अनमोल भेटायला आला. “खूप व्यस्त तर नाही ना. काहीसं बोलायचं होतं”

“आता नको. उद्या बोलू. महत्वाचं काम चालूयं”

“व्यत्यया बद्दल क्षमा असावी. माझ्याकडून कामात कुचराई झाली. अक्षम्य चुका झाल्या म्हणून तुम्ही दबाव टाकलात”

“कसला दबाव? काहीही काय बोलतोयेस. ”

“आमच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की तुम्ही नाराज आहात. ”

“तुझ्या कामात सुधारणा हवी एवढंच सांगितलं. दबाव बिबाव काही नाही. बाबा रे, चुकीचे शब्द वापरू नकोस. फार वेगळे अर्थ निघतात. असलं काही बोलण्यापेक्षा कामाकडे लक्ष दे. नाहीतर… ”मी पुढचं मुद्दामच बोललो नाही.

“जसा आपला आदेश, मनपूर्वक आभार आणि धन्यवाद”

“एक मिनिट, फक्त काम नीट कर एवढंच सांगितलंय. आदेश वगैरे काही दिलेला नाही. कळलं”माझा आवाज वाढला तेव्हा अनमोलचा चेहरा पडला. नमस्कार करून निघून गेला. मी कामात हरवलो.

 

संध्याकाळी घरी जाताना कळलं की दुपारीच अनमोल नोकरी सोडून गेला. धक्काच बसला. अनमोल असं काही वागेल असं अजिबात वाटलं नव्हतं. एकदम नोकरी सोडण्याइतकं काहीच घडलं नव्हतं. फोन केला पण त्यानं उचलला नाही. पुन्हा प्रयत्न केला तेव्हा फोन स्वीच ऑफ. त्यानं आपल्यामुळे नोकरी सोडली याचं वाईट वाटलं. भेटून समजावं असं वाटलं पण प्रयत्न करूनही भेट झाली नाही तेव्हा मीदेखील नाद सोडला. दोन महिन्यानंतर एका पुस्तक प्रदर्शनात अचानक अनमोल भेटला.

“अरे, भल्या माणसा, तुला किती फोन केले पण एकदाही उत्तर दिलं नाहीस. इतका रागावलास. ”

“मी व्यर्थ कशाला रागवेल. घरच्यांचा अतीव आग्रह, दबाव आणि चांगला पगार म्हणून ते काम स्वीकारलं. इच्छेविरुद्ध काम म्हणजे मनाला जाच. आता पुस्तकांच्या दुकानात काम करतोय. हे आमचंच प्रदर्शन आहे. इथं पगार कमी असला तरी काम आवडीचं आहे. माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं.”

“तू कामावर परत ये. मॅनेजरशी बोलतो”

“आपण दाखविलेल्या आपुलकीबद्दल धन्यवाद!! मला जीवनाचा मार्ग सापडलायं. ”

“म्हणजे”

“कायम पुस्तकांच्या सानिध्ध्यात रहायचं म्हणून या दुकानात काम करतोय. खजिन्याची चावी हातात आलीय असं समजा. वेगवेगळी पुस्तकं पहायला, हाताळायला, वाचायला मिळतात आणि पगारसुद्धा मिळतो सुख म्हणजे अजून काय असतं. ”

“नाहीतरी तुला वाचनाची आवड आहेच. ”

“आवड नाही वेड म्हणा. ”

“ते कसं”

“वडिलांची कृपा!! मजुरी करणारे वडील चौथीपर्यंत शिकले. इच्छा असूनही पुढं शिकता आलं नाही पण त्यांना वाचायचा नाद. रोज पेपर विकत घेऊन वाचायचे. वडिलांना पाहून मलाही वाचनाचा नाद लागला. माझी आवड समजल्यावर वडील रद्दीतून जुनी पुस्तकं आणून द्यायचे. कोणताही विषय वर्ज्य नव्हता. वाचत गेलो. त्यांच्या अपेक्षा होत्या पण माझं अभ्यासात फार डोकं चाललं नाही. कसाबसा दहावी पास झालो. आमच्याकडं पिढीजात गरीबी, आजूबाजूची परिस्थिती भयावह. भांडणं, मारामाऱ्या, शिव्या हे नित्याचच. परिस्थितीत फार सुधारणा झाली नसली तरी वाचनामुळं माझ्यात लक्षणीय बदल झाला. विचार सुधारले आणि बोलणं तर मी ठरवून बदललं अर्थातच त्यासाठी वाचनाचा खूप फायदा झाला. ”

“अच्छा म्हणजे मुद्दाम तू… ”

“म्हणून तर दखल घेतली जाते. *गर्दीत आपलं अस्तित्व दाखवायचं असेल तर वेगळेपणा पाहिजेच*”

“हुशारेस, फार पुढे जाशील” 

“आपल्यासारख्यांचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर काळजी नाही. पुन्हा नक्की भेटू यात. पुस्तकं जरूर घ्या. तुम्हांला विशेष सवलत द्यायला मालकांना आग्रह करतो. धन्यवाद!! ”अनमोलच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. निरोप घेऊन तो आपल्या कामाला गेला.

“बाबा, इज ही नॉर्मल”माझ्या मुलानं विचारलं.

“हंड्रेड पर्सेंट”

“मग असं का बोलत होते. ”अनमोलविषयी सविस्तर सांगितल्यावर मुलगा म्हणाला. “लकी मॅन”

“ काम तर सगळेच करतात. पैसे, प्रतिष्ठा मिळवतात. आवड मनाच्या खोल कप्प्यात बंद करून भलतंच काम करत राहतात. अनमोलच्या स्टाईल मध्ये बोलायचं तर *आवडीचं कामच उदरनिर्वाहाचं साधन असणं* यासारखे परमसुख नाही. प्रत्येकाच्या नशिबात हे नसतं. त्याबाबतीत हा खरंच सुदैवी. नावाप्रमाणेच *अ न मोल. *

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ऊब…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? जीवनरंग ?

☆ “ऊब…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

“ते चाॅकलेटी स्वेटरवाले का ? .. रोज सकाळी काठी टेकत, नाक्यापर्यंत जातात ते ? ते तुमचे वडील काय ?”

“हो…तेच ते.” जीवावर आल्यासारखं विन्यानं उत्तर दिलं.

.. तो चाॅकलेटी स्वेटर आता, विन्याच्या डोक्यात गेलेला.

त्या जुनाट चाॅकलेटी स्वेटरवाल्या म्हाताऱ्याचा मुलगा.

हीच आपली लायकी… हीच आपली ओळख.

भर थंडीत विन्या धुसफुसू लागला.

खरं तर आपल्या वडलांवर विन्याचा भारी जीव.

फार जपायचा त्यांना तो.

आई गेल्यानंतर तर फारच.

 

तो ,रूही , नील आणि त्याचे बाबा.

छोटा परिवार.

सुखी परिवार.

 

पण या सुखालाच नजर लागली होती.

 

हल्ली थंडी नकोशी वाटते विन्याला.

जरा कुठे गारवा आला की झालं..!

त्याचे बाबा कपाटातून, तो चाॅकलेटी स्वेटर बाहेर काढायचे.

आठ महिने तो स्वेटर ,कपाटात अंग चोरून बसलेला.

साचलेपणाचा कुबट वास यायचा त्याला.

बाबांना त्याचं काही वाटायचं नाही.

स्वेटर आणि ते!

पुढचा चातुर्मास.

 

नाईलाज म्हणून, आंघोळीच्या वेळा काढला जायचा तेवढाच.

बाकी कर्णाच्या कवचकुंडलासारखा, तो आपला बाबांच्या अंगाला चिकटलेला.

सलग वापरून वीण बरीचशी विरळ झालेली. रंगही उडालेला.

पण नाही म्हणजे नाही.

एकदा ऐकायचं नाही म्हणल्यावर काय ?

म्हातारी माणसं म्हणजे हट्टी मूल… समजूत पटायची नाही.

आता तर विन्याला वाटायचं , की बाबा आपल्या वयाचा गैरफायदा घेतात, छळतात मला.

 

खरं तर दोन वर्षांपूर्वी विन्यानं नवीन ओसवालचा स्वेटर आणलेला.

तसाच.

चाॅकलेटी.

 

बाबा जुनाट झालाय तुमचा स्वेटर. 

हा नवीन वापरा

फेकून द्या तो.”

 

बाबांनी नवा स्वेटर फेकून दिला.

 

मीही जुनाट झालोय.

मलाही फेकून द्या.”

 

काय बोलणार ?

 

विन्या नुसता आतल्या आत कुढत बसायचा.

उगाच लोकांना वाटायचं , 

हा आपल्या म्हातार्या बापाला साधा स्वेटरही घेवून देत नाही.”

लाज वेशीवर टांगलीय या स्वेटरनं.°

रूही आपल्या म्हातार्या सासर्याला खूप सांभाळून घ्यायची.

थंडी संपली की, स्वेटर गुपचूप ड्रायक्लीन करून आणायची. नीट घडी करून कपाटात ठेवायची.

 

पण…,

वाढत्या वयाला इलाज नाही.

बाबांच्या .

आणि स्वेटरच्याही.

 

बापलेकाच्या प्रेमाला ग्रहण लागलं होतं.

नात्याची लोकर ऊसवत चाललेली.

 

रूहीनं ठरवलं.

सप्टेंबरपासून सुरवात केली.

चाॅकलेटी रंगाचा गुंडा.

सतत विणत बसायची.

बाबांच्या लक्षात आलं.

“कुणासाठी गं ?”

‘नीलसाठी…’

 

नोव्हेंबर उगवला.

हुडहुडी थंडी.

रूहीचे तीन स्वेटर तयार.

 

नील.

विन्या.

बाबा.

तिघांचे डिट्टो.

 

एक हिवाळी रात्र.

जेवणं झालेली.

हाॅलमधे मिटींग.

रूहीनं बोलावलेली.

” आज मिटींग  बोलावलीय ती स्वेटरसाठी.

तुम्ही कुणीही  बिलकुल बोलायचं नाही.

फक्त ऐकायचं.

मी तीन स्वेटर विणलेत.

तुमच्या तिघांसाठी.

या थंडीत तेच वापरायचे.”

 

विन्या , बाबांना त्यांच्या स्वेटरवरनं बोललेलं, मला आवडायचं नाही.”

 

बाबा ,तुमच्या स्वेटरवरनं विन्याला कुणी बोललेलंही मला आवडणार नाही.”

मला माहित्येय.

बाबा , त्या स्वेटरमधे तुमचा जीव आहे.

सासूबाईंनी विणलाय तो.

म्हणूनच मीही स्वतः विणलाय हा.

तुम्हीही समजून घ्या.

आमच्या प्रेमाची ऊब तेवढीच आहे.

सासूबाईंइतकी.

तो जुना स्वेटर तुम्ही जरूर वापरा.

पाहिजे तर शर्टाच्या आतून.

पण त्यापायी आपल्या नात्याची वीण उसवता कामा नये.

त्या स्वेटरला जपूच आपण.

पण कधीतरी तो संपणारच आहे.

त्याच्या नसण्याची सवय करायलाच हवी.

पण सासूबाईंची आठवण सदैव आपल्याबरोबरच आहे.

त्या स्वेटरशिवायही, त्याची ऊब मिळणारच आहे.

 

तेव्हा… आता नई शुरूआत.

 

बस..!

 

मिटींग ओव्हर.

नो अर्ग्युमेंटस्.”

खरंच विषय संपला.

 

डबल कोटेड बाबा, गुलाबी थंडी एन्जाॅय करू लागले.

 

ते चाॅक्लेटी स्वेटरवाले तिघे म्हणजे , तुमचे सासरे ,तुमचे हे आणि तुमचा मुलगा काय ?”

कुणीतरी रूहीला विचारलं.

 

रूही मनापासून हसली.

हो…”

 

स्वेटरची ऊब तिलाही जाणवली.

नात्यांची घट्ट वीण.

थंडी वाजायचीच नाही.

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जय जय राम कृष्ण हरी… भाग – २ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ जय जय राम कृष्ण हरी… भाग – २ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(‘‘सगळे मान्यवर स्थानापन्न झाले… (हे शब्द कसे माहिती गण्याला? … पुन्हा कुजबूज) पण गण्या जणू आता तलवार परजून उभा होता… बुवाच भांबावून, अवाक् होऊन थोडे मागे सरकले होते.) 

इथून पुढे – – 

‘‘आणि तो क्षण आला बरं का मंडळी… त्या नववधूने रंगमंचावर पाऊल टाकले… नुकतीच ब्युटी पार्लर मधून मेकअप करून आलेली… (गण्याच्या मित्रांनी कपाळावर हात मारला. पण गण्याच्या डोळ्यासमोर फक्त ती सुंदर वधू होती आणि वाचेवर शब्दांचे उधाण)… आणि दागदागिन्यांनी नशखिशांत मढलेली ती वधू… तुम्हाला सांगतो… अगदी नक्षत्रासारखी सुंदर दिसत होती… सगळे उपस्थित डोळे विस्फारून तिच्याकडेच बघत राहिले होते. राजपुत्र राजेसाहेबांच्या शेजारीच उभे होते… जागेवरच खिळल्यासारखे. राजांची मात्र थोडी पंचाईत झाल्यासारखी वाटत होती… मनमोकळं बघूही शकत नव्हते ना ते…”

‘‘अहो गणोजी… हे किर्तन चालू आहे.. विसरताय का तुम्ही? ”… बुवांनी गणूला कोपराने ढोसलं… पण आता गण्याला भानावर आणणं कुणाच्या बापालाही जमणार नव्हतं.

– – अखेर बुवांनी जयघोष सुरू केला… ‘जय जय रामकृष्ण हरी’… आणि गणूने त्यांच्याकडे रागाने पाहिलं खरं…. पण स्वत:च्या उफाळणाऱ्या मनाला कसंतरी आवरलं आणि त्या मुलीचं वर्णन आवरतं घेऊन एकदाचं ते लग्न लावून टाकलं, आणि आपणहूनच म्हणायला लागला… ‘जय जय राम कृष्ण हरी’… 

… आणि मग त्याने बुवांना खूण केली… ‘‘आता बोला तुम्ही. ”… पण आता ही कथा पुढे कशी न्यायची ते बुवांना कळत नव्हतं. गण्या सलग बोलत होता… मध्ये ना अभंग… ना श्लोक… 

हे असे “अत्याधुनिक“ कीर्तन सुरू होऊन जेमतेम पाऊण तास झाला होता… त्यांना दीड तासाच्या कीर्तनाचे पैसे मिळाले होते… आता काय करायचं? .. गण्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांचा प्रॉब्लेम हुशार गण्याच्या लगेच लक्षात आला. ‘‘तुम्ही थांबा… मीच सांगतो…” त्याने बुवांना खूण केली… आणि ‘जय जय रामकृष्ण हरी’… स्वत:च्या भसाड्या आवाजात म्हणायला सुरुवात केली.. श्रोत्यांची चुळबूळ चांगलीच वाढलेली त्याच्या लक्षात आली…

‘‘तर मंडळी, आता त्या लग्न सोहळ्यातून बाहेर या आणि पुढची कथा ऐका… ‘जय जय रामकृष्ण हरी’… आता फक्त पेटीवर वाजलं…

‘‘तर अशा रीतीने राज्याला पुन्हा सुस्वरुप तरुण अशी राणी मिळाली… राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसली. आता राजपुत्रानेही कारभारात लक्ष घालावे… निर्णय घ्यायला शिकावेत असा राजेसाहेब त्यांना आग्रह करायला लागले होते. खुशालचेंडू असला तरी राजपुत्र चांगलाच हुशार होता… त्याहीपेक्षा धूर्त होता. ‘राजेसाहेबांची नवी तरुण राणी ही माझ्या दृष्टीने फक्त राज्याची राणी आहे… ती माझी आई होऊच शकत नाही…मुळात मी तसं कधीच समजणार नाही’.. ही खूणगाठ तिला पहिल्यांदा पाहताक्षणीच त्याच्या मनात आपोआपच बांधली गेली होती. आणि नव्या राणीसाहेबांची मनोभूमिकाही याहून फार काही वेगळी नव्हती… ‘‘ 

.. गण्यामधला सुप्तावस्थेतला कथाकार जसजसा जागा होत होता तसतशी राजेंद्रबुवांची अस्वस्थता वाढत चालली होती. खरंतर गण्याच्या गोष्टीत पुढे काय होणार याची त्यांनाही खूप उत्सुकता होती, पण ते ती दाखवू शकत नव्हते… आणि श्रोते? ते तर विसरूनच गेले होते की ते कीर्तनाला आले होते. आता सगळा माहोल केवळ कथाकथनाचा होता… ‘तर मंडळी’ हा शब्दही अनावश्यक वाटायला लागला होता..

‘‘ तर आता राज्याची घडी पुन्हा व्यवस्थित बसली होती. नव्या राणीसरकारही मान-सन्मानाला चांगल्याच चटावल्या.. म्हणजे सरावल्या होत्या हो… भरजरी पैठण्या…शालू-शेले, पेलवणार नाहीत इतके दाग-दागिने या गोष्टींना तर फार झटकन् आपलंसं केलं होतं त्यांनी… मात्र राजपुत्र समोर आले की त्या का इतक्या गडबडून जातात, स्वत:ला विसरल्यासारख्या भांबावून का जातात हे काही त्यांना कळत नव्हतं, आणि बहुतेक राजपुत्रालाही…” गण्या क्षणभर थांबला.. स्वत:च भारावल्यासारखा… पण लगेच सावरला… आणि सांगायला लागला… 

‘‘काळ स्थितप्रज्ञासारखा त्याच्या गतीने पुढे चालला होता…” (पण हा आपला पूर्वीचाच गण्या आहे का या विचाराने त्याची मित्रमंडळी मात्र वेगाने अस्वस्थ होत होती)… क्षणभर थांबून गण्या पुन्हा बोलायला लागला… “ सगळं काही पूर्ववत् सुरू झालं होतं. राणीसाहेब गेल्याचं दु:खही मावळलं होतं. राजांच्या बरोबरीने राजपुत्र कारभारात लक्ष घालत होते… नव्हे आता तरबेज व्हायला लागले होते… आणि… आणि…” गण्या बोलायचा थांबला… ‘‘काय सांगू श्रोतेहो…(इथे गण्याने चेहेऱ्यावर त्याला अतीव दु:ख झाल्याचा मस्त अभिनय केला).. आणि अचानक एक दिवस राज्य पुन्हा एकदा दु:खाच्या गर्तेत कोसळलं … फक्त कोसळलं नाही…जोरात आपटलं…अचानक राजेसाहेबांचं निधन झालं… संपूर्ण राज्य हादरून गेलं… राज्याला सुतकी कळा आली… (आणि एकीकडे गण्याचं शब्दभांडार मात्र बहरत होतं… राज्यावर कोसळलेला दु:खाचा पहाड त्याने आपल्या ओघवत्या वाणीने उत्तमपणे जणू चित्रित केला.) राजेसाहेबांचा असा अचानक मृत्यू कसा झाला हा प्रश्न काही सुटत नव्हता… अनेक प्रकारे तपासून पहाणं कितीतरी दिवस चालू होतं. जनतेच्या विचारातून मात्र हा प्रश्न एव्हाना हळूहळू पुसला गेला होता. जनजीवन पुन्हा बरंच सुरळीत सुरू झालं. जगरहाटीनुसार राजपुत्राचा राज्याभिषेक केला गेला गेला, आणि जनतेला नवा राजा मिळाला….

… तर मंडळी, असेच काही महिने गेले आणि नव्या राजाच्या विवाहाची चर्चा सुरू झाली… वाढली… आणि अनपेक्षितपणे एक दिवस त्यांच्या विवाहाचा मुहूर्त घोषित केला गेला… सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलं होतं… संपूर्ण राज्यच सजवलं गेलं होतं…. युवराज्ञी कोण हे जरी तोपर्यंत गुलदस्त्यातच होतं तरी तिच्या स्वागताची तयारी मात्र जोरदार सुरू होती… दरम्यान राजांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे निदान जाहीर केले गेले होते, पण ते अगदी अनपेक्षित म्हणावं इतक्या झटकन् पडद्याआडही गेले होते…” गणू नकळत क्षणभर थांबला… आणि पुन्हा बोलायला लागला… ‘‘आणि अखेर ती विवाह घटिका समीप येऊन ठेपली. ”… गण्याची भाषा एव्हाना फारच ओघवती झाली होती… 

.. ‘‘आणि काय सांगू श्रोते हो… युवराज्ञी मंचावर दाखल झाल्या… कमालीच्या सुंदर… राजघराण्याच्या एका वेगळ्याच तेजाचं वलय त्यांच्याभोवती स्पष्ट जाणवत होतं… एक एक पाऊल हळुवारपणे टाकत त्या पुढे आल्या… राजपुत्रासमोर उभ्या राहिल्या… राजपुत्र भान हरपून त्यांच्याकडे बघत राहिले होते…” (आणि इकडे स्वतःच्या लग्नासाठी कमालीचा आतुर झालेला गण्या मात्र फारच भावविवश झाल्याचं त्याच्या मित्रांनी अचूक हेरलं होतं).. “ आणि.. आणि… बाकी सगळे उपस्थित…काय सांगू तुम्हाला.. अहो कधी चक्कर येतेय याची वाट पहात असल्यासारखे… प्रचंड संभ्रमित… स्वत:लाच चिमटा काढून बघत होते… आ वासून एकमेकांकडे बघत होते… ‘या आहेत युवराज्ञी…? या?? … काहीच महिन्यांपूर्वी महाराणी म्हणून स्वागत केलं होतं ना आपण यांचं? … आणि आता…” आता मात्र गण्या अतिशय भांबावून गेल्याचं बुवांच्या नेमकंच लक्षात आलं होतं…

‘.. जय जय राम कृष्ण हरी… जय जय रामकृष्ण हरी…’.. बुवांनी कसंबसं स्वत:ला सावरून जयघोष सुरू केला होता… तोल जाऊन पडता पडता गण्यानेही स्वत:ला सावरलं होतं… ‘ही गोष्ट मला माहिती होती? खरंच की…’ तो भंजाळून गेला होता. ‘ 

‘आता गण्याच्या या स्वप्नरंजनात पुढे आणखी सांगण्यासारखं काय असणार आहे? ’ या सूज्ञ विचाराने सगळे जाणते श्रोतेही एकएक करत जायला निघाले होते… 

… आणि बुवांसमोर दक्षिणेसाठी ठेवलेल्या तबकावर मात्र आज नाणी टाकल्याचा ‘खण खण’ आवाज येत नव्हता.. बुवा डोळे फाडून बघायला लागले तर काय.. चक्क नोटा फडफडत होत्या त्या तबकात… अजिबात आवाज न करता..

बुवा गजर थांबवत मागे वळले. खूश होऊन मुरलीधरापुढे हात जोडायला… पण त्याच्या गाभाऱ्याचे दार मात्र घट्ट बंद झाले होते… बहुतेक आतून… 

समाप्त

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नवीन अध्याय… (अनुवादित कथा) – मूळ हिन्दी लेखक : अज्ञात  ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ नवीन अध्याय… (अनुवादित कथा) – मूळ हिन्दी लेखक : अज्ञात  ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

उज्जैनची कडाक्याची थंडी आणि महाकालेश्वर महादेवांच्या शहरातून वाहणारी थंड हवा अजूनही रूपाच्या मनात एक विचित्र भावना निर्माण करत असते.

रूपा ही एक अतिशय शांत आणि सुसंस्कृत मुलगी होती जिचे लग्न उज्जैनमधील एका प्रतिष्ठित कुटुंबात झाले होते. रूपाचा नवरा, केशव, या शहरातील एक मोठा धान्य व्यापारी होता. तो स्वभावाने थोडा कडक होता आणि शिस्त हाच घर चालवण्याचा एकमेव मार्ग आहे असे त्याला वाटत होते. त्याच्यासाठी, फक्त व्यवसायातील नफा महत्वाचा होता व त्याच्या ठायी भावनांची किंमत शुन्य होती.

रूपाची दिनचर्या पहाटे चार वाजता सुरू व्हायची. ती उठायची, क्षिप्रा नदीवरून वहाणाऱ्या थंड बर्फाळ वाऱ्यात आंघोळ करायची आणि नंतर ती मंदिर स्वच्छ करायला लागायची. थंडीमुळे तिचे हात सुन्न पडायचे, पण तिने कधीही तक्रार केली नाही.

केशवची आत्याही त्यांच्याच घरात राहत होती. तिचा स्वभाव फारच कडक होता आणि ती प्रत्येक वाक्यावर तिच्यावर डाफरत असे. रूपा तिचे प्रत्येक शब्दबाण मान खाली घालून झेलत असे आणि तरीही तिची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडत नसे.

त्या डिसेंबरमध्ये धुके इतके दाट होते की अंगणातले तुळशीचे रोपही अस्पष्ट दिसत होते. रूपाला तिच्या आईवडिलांच्या घराची सतत आठवण येत असे, जिथे तिची आई तिला गरम दूध देऊन उठवत असे. इथे तिला सर्वांची काळजी घ्यावी लागत असे.

केशव बऱ्याचदा कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जात असायचा. रूपाला घरी अगदी एकटे पडल्यासारखे वाटायचे. आत्यांचे कठोर शब्द आणि केशवची उदासीनता यामुळे तिची अवस्था वाऱ्याच्या झोताबरोबर उडणाऱ्या वाळलेल्या पानासारखी झाली होती.

एकदा त्यांच्या घरी एका उत्सवाची तयारी सुरू होती. रूपा सकाळपासूनच स्वयंपाकघरात स्वयंपाकाला लागली होती. तूप आणि मसाल्यांचा सुगंध घरात दरवळत होता. मग, आत्यांनी एका क्षुल्लक गोष्टीवरून रूपाला सर्वांसमोर खूपच फटकारले.

रूपाचे डोळे अश्रूंनी भरून आले, पण ती काहीच बोलली नाही. शांतपणे, तिने तिच्या साडीच्या पदराने डोळे पुसले आणि परत कामाला लागली. पण त्या दिवशी, तिचं हृदय खुपच दुखावलं गेलं होतं. तिला याचं राहून राहून आश्चर्य वाटत होतं की तिचे अस्तित्व फक्त इतरांची सेवा करण्यापुरतंच मर्यादित आहे का?

त्या संध्याकाळी केशव परत आला तेव्हा त्याला दिसले की रूपाची तब्येत बरी दिसत नाहीये. पण तिच्या प्रकृतीबद्दल विचारण्याऐवजी त्याने फक्त एवढेच म्हटले की उद्या उत्सवासाठी पाहुणे येणार आहेत आणि सर्व तयारी वेळेपूर्वीच झाली पाहिजे. रूपाने फक्त मान हलवली आणि गप्प राहिली.

रात्री, जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपी गेलेले होते, तेव्हा रूपा छतावर एकटी उभी होती. आकाशात धुके पसरले होते आणि थंड वारा तिच्या चेहऱ्याला बोचत होता. तिला राहून राहून असं वाटत होतं की ती तिचे संपूर्ण आयुष्य असेच मुक्या बाहुलीसारखे घालवेल का?

मग तिने मनात एक संकल्प केला. तिला असं जाणवलं की आदर, प्रेम हे मागून मिळणार नाही, ते मिळवावे लागेल. तिला तिचे मौन सोडावे लागेल, पण सन्मानाने, कुणाचं मन न दुखावता.

दुसऱ्या दिवशी सकाळी पाहुणे आले तेव्हा रूपाने तिच्या साधेपणाने, सेवाभाव आणि बुद्धिमत्तेने सर्वांची मनं जिंकली. तिने सहजतेने तिची शालीनता आणि व्यवहारकौशल्य दाखवले. तिने पाहुण्यांकडून कौतुकाची थाप मिळवली. आत्या आणि केशव त्यांच्या ठायी असलेल्या या मुक्या बाहुलीकडे पहातच राहिले. त्यांना पहिल्यांदाच जाणवले की रूपा ही फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाही तर तिचं स्वतःचंही काही अस्तित्व आहे.

जेव्हा आत्याने तिला पुन्हा टोमणे मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा रूपाने मोठ्या प्रेमाने आणि आदराने त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. ती म्हणाली, “आत्या, मोठ्यांचे आशीर्वाद तेव्हाच फळ देतात जेव्हा लहानांचा आदर केला जातो. “

संपूर्ण घर स्तब्ध झाले. केशवलाही त्याच्या पत्नीचे एक नवीन रूप दिसले. संपुर्ण घर एकहाती सांभाळत असलेल्या रत्नाच्या अस्तित्वाची त्याला जाणीव झाली. त्या रात्री पहिल्यांदाच केशव रूपासोबत बसला आणि शांतपणे तिचं मनातलं ऐकून घेतलं.

थंडी अजूनही तशीच होती, पण आता रूपाची खोली उबदारपणाने भरलेली होती, हिटरने नाही तर प्रेम आणि आदराच्या उबदारपणाने. आत्यांचा स्वर आता हळूहळू मवाळ होत गेला. तिच्या संयमाने, रूपाने त्या जुन्या घराचे वातावरण बदलून टाकले होते.

आता, जेव्हा जेव्हा रूपा क्षिप्रा नदीच्या काठावर जायची तेव्हा तिला वाऱ्याच्या झुळूकीत संगीत ऐकू येत असे. तिला कळले होते की धुके कितीही दाट असले तरी, सूर्यप्रकाशाचा एक किरण त्याला छेद देण्यासाठी पुरेसा असतो. तो किरण तिचा स्वतःचा आंतरिक आत्मविश्वास होता.

संवादाच्या अभावामुळे अनेकदा नातेसंबंधात कटुता येते. रूपाने ती पोकळी तिच्या गोडव्याने भरून काढली. केशव आता रुपाच्या स्वप्नांमध्ये आणि त्याच्या व्यवसायात अधिक रस घेऊ लागला. त्याने तिला कुटुंबाच्या व्यवसायाच्या कामामध्येही समावून घेतले.

उज्जैनचे रस्ते आता रूपाला परके वाटत नव्हते. तिला असे वाटले की तिने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा जुना भव्य वाडा आता तिला तुरुंगासारखा वाटत नाही, तर आपल्या स्वतःच्या घरासारखा वाटत होता. धुके दूर झाले होते आणि सूर्यप्रकाश आणखी सोनेरी वाटत होता.

आजही, थंडी पडली की रूपा तिच्या सासू आणि आत्यांसाठी आल्याचा चहा बनवते. पण आता तिच्यात मनात भीतीची नाही, तर जवळीकतेची भावना आहे. त्याग आणि संघर्षातून तिने तिचे स्थान मिळवले आहे.

शेवटी, रूपाला जाणवले की प्रत्येक माणसामध्ये एक शक्ती असते; फक्त ती ओळखण्याची गरज आहे. तिने तिचा खरा स्वाभिमान शोधला व आपला सन्मान राखला, हा तिचा सर्वात मोठा विजय होता आणि तिच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आता सुरु झाला होता.

 

मूळ हिंदी कथालेखक : अज्ञात

मराठी अनुवाद : मेघःशाम सोनवणे

नाशिक.

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विदाई… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ विदाई… ☆ डॉ. शैलजा करोडे

“भरली, भरली, भरली मंगलघटिका भरली “… तशी लग्न मंडपातील धावपळ वाढली. घोड्यावरून नवरदेव आला. त्याच्या स्वागताला वधुकडील मंडळी मंडपाच्या दाराशी मंगल कलश, पुजेचं ताट घेऊन उभी होती. आगत स्वागत झालं.

” वधूला आणा ” माझे काका म्हणाले, तसे मामांनी मला उचलून मंडपात आणले.

नवरदेवासह मला फुलांच्या राशिवर चालवत स्टेजवर आणले, डी जे वर गाणे वाजत होते ” बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है “

 

अंतरपाट धरला गेला व मंगलाष्टकं सुरू झाली.

: तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि ॥

या मंत्रोच्चाराबरोबर

गुरूजींनी दोन्ही हात वर नेले टाळी वाजवून वाजंत्रीला इशारा देण्यासाठी. अक्षतांची बरसात आमच्यावर होऊ लागली. आंतरपाट दूर झाला व मी वरमाला घालणार तोच अशोकला त्याच्या मित्रांनी वर उचलले. मी बावरले, आता कशी घालणार वरमाला. तोच माझा भाऊ व त्यांच्या मित्रांनी मलाही वर उचलले. मी आणखीनच गडबडले. मी वरमाला घालण्यासाठी वाकले, तोच अशोकच्या मित्रांनी त्याला मागे खेचले. या गडबड, गोंधळ, हसी मजाकमध्ये एकदाची मी अशोकच्या गळ्यात वरमाला घातली.

आम्हांला खाली उतरविले तसा मी निःश्वास सोडला. शालूचा पदर व शाल सावरत रूमालाने मी घर्मबिंदू टिपले. नजरेच्या कडेतून अशोक मला न्याहाळत होते, तशी नकळत मी ही लाजले. आरक्त गाल आणखी लाल झाले.

सप्तपदी, कन्यादान सगळे विधी पार पडले. जेवणावळी उठल्या. व प्रत्येक वधूला हळवा करणारा विदाईचा क्षणही आला. फुलांनी सजवलेली कार तयारच होती. आई बाबा, काका काकी, मामा मावशी माझ्या मैत्रिणी सगळ्यांचा निरोप घेऊन साश्रू नयनांनी मी लग्नमंडप ओलांडून बाहेर आले.

कारजवळ भाऊ उभा आपले दोन्ही हात पसरवून, मी रडतच त्याच्या कुशीत शिरले. डोळ्यातील पाणी थांबवत भाऊने कारचा दरवाजा उघडला मला विदाई देण्यासाठी. ” ताई, तुला काय भेट देऊ मी. ” ” अरे हा एवढा मोठा आनंद दिलास तू. मला लग्नाच्या बोहल्यावर चढवलंस. आणखी काय हवं आणि हे केवळ तुझ्यामुळे तर शक्य झालं, विद्येचं दान तू मला भरभरुन दिलंस “

मी सासरी निघाले, हळूहळू निरोप देणारे हात मागे पडले अन मी भूतकाळात शिरले.

“सोनाली, ए पोरी प्रकाशचा डबा भरलास काय? त्याची तयारी कर, आटप लवकर आणि शाळेला सोडून ये त्याला. सोनालीची आई रखमा बोलत होती.

” हो मी केलीय त्याची तयारी, नेते त्याला शाळेत “

“अन हे बघ, शाळेतून लवकर घरी ये, इकडे तिकडे भरकटू नकोस, घरातलं सगळं आवर आणि शेवंता आजीने बोलावलंय, त्यांची मोलकरीण चार दिवस रजेवर आहे, त्यांची कामं करशील, चार पैसे मिळतील तर घरखर्चाला कामा येतील. चल मी निघते कामावर “

प्रकाशचा हात धरून आम्ही दोघी भावंडं शाळेकडे चालू लागलो.

प्रकाशला सोडलं आणि माझी पावलं तिथंच थबकली. प्रार्थना सुरु होती 

” खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ” नकळत माझेही मन गुंतले. प्रार्थना संपवून मुले वर्गात केव्हा गेली मला कळलेही नाही. वर्गात गणिताचा तास सुरु झाला. आणि माझेही कुतूहल वाढले. मी वर्गाच्या खिडकीशी लपून तर मध्येच डोकावून गुरूजींनी शिकवलेले, ऐकत होते, पाहात होते.

” काय गं, सोनाली शेवंता आजीकडे इतक्या उशीरा का कामाला गेलीस? कोठे होतीस तू? “

” काही नाही आई, घरातलं काम आवरलं नी गेली की त्यांच्याकडे “

” खोटं नको बोलूस? उद्या वेळेवर जा त्यांच्याकडे ” ” हो आई, जाईन मी वेळेवर “

प्रकाशला शाळेत सोडले, पण आजही माझा पाय तेथून निघत नव्हता. आज इतिहासाचा तासात पानिपतचे तिसरे युध्द शिकवले जात होते, मराठा साम्राज्य व अहमदशाह अब्दालीचे अफगाण सैन्यात हे युध्द झाले. या युद्धात मराठ्यांचा दारूण पराभव झाला व अहमदशाह अब्दाली विजयी झाला. पण त्याला फारसा लाभ झाला नाही व नरसंहारात त्याचेही सैन्य बरेच मारले गेले.

संध्याकाळी आई घरी परतली ती संतापातच. ” कार्टे कुठे भटकत असतेस ग. आज शेवंता आजीकडे गेलीच नाहीस म्हणत फाडकन माझ्या मुस्कटात मारली. मी कळवळले. प्रकाश माझा भाऊ मध्ये आला, नको आई, ताईला मारु नकोस, ताई माझ्यासाठी शाळेच्या आवारातच होती. ” ” आवारात होती, तिथे काय करत होती ही ” ” आई, ताई माझ्या वर्गाच्या खिडकीतून अभ्यासाकडे लक्ष देत होती. तिलाही शिकायचंय आई, तिलाही येऊ दे ना शाळेत ” ” हिला शाळा शिकवू? मग घरातल्या भाकरी कोण भाजणार? तू? का मी काम सोडून घरी बसू. मी घरी बसली तर तुम्ही खाणार काय? हवा कि पाणी? हवा खाऊन, पाणी पिऊन जगता आलं असतं ना तर काहीच कमवायची गरज नसती पडली रे. पण खायला तर कमीत कमी दोन टाईम तर लागतंच. महागाई या प्रकारची, एकट्या तुझ्या बापाच्या कमाईत काय भागतं.? पुढे हिचं लगीन पण करावं लागील ना, कोठून आणायचा एवढा पैसा? आता शिक्षण, पुढे लगीन. बस झाली तुझी बडबड. तुला शिकवतोय आम्ही हेच भाग्य समज. जास्त शहाणपणा करू नकोस. ‘ प्रकाश गप्प झाला.

रात्री झोपतांना माझा दुर्मुखलेला चेहरा पाहून प्रकाश म्हणाला, तू काळजी करू नकोस ताई, रोज शाळेत काय शिकवलं ते मी तुला शिकवत जाईन. दुपारी माझी शाळा सुटली कि मी तुला शिकवत जाईन. आई बाबा दुपारी कामावर गेलेले असतात. मी तुला घरकामातही मदत करीत जाईन. ‘ ” पण प्रकाश मला परीक्षा कशी देता येईल, माझा जर शाळा प्रवेशचं झाला नाही तर ” ” ताई परीक्षा नाही देता येणार, पण मी घरी आल्यावर प्रश्नपत्रिका सोडवत जा ना. म्हणजे तुला प्रश्नांचे स्वरूप कळत जाईल, परीक्षा, गुणांकन, निकाल या गोष्टी तुझ्यासाठी नाही घडल्यात तरी तुझं ज्ञान तर वाढेल.

मी अठराव्या वर्षात पदार्पण केलं तशी आई बाबांना माझ्या लग्नाची चिंता सतावू लागली. स्थळ पाहणी सुरु होती, , रुप रंग जरी असलं तरी माझ्याकडे शिक्षण नव्हतं. मध्यंतरीच्या स्त्री भ्रूण हत्येमुळे सगळ्याच समाजातील मुलींची संख्या घटली होती, त्यामुळे मुलींच्या बाबतीत हुंडा, मान पान, रूप रंग या बाबी गौण ठरू लागल्या. फक्त मुलगी द्या, खर्च आम्ही करू म्हणणारी मंडळींचे प्रमाण वाढले होते.

अशोक चे स्थळ माझ्यासाठी सांगून आले. पण माझ्याकडे रूप रंग असले तरी शिक्षण नव्हते. अशोक शिक्षित व आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर होता. मुलगी फार शिकलेली नसली तरी त्याला अशिक्षित नको होती. रूपाने देखणा उंचपुरा, अशोक मलाही भावला होता, पण माझं शिक्षणचं आडवं येत होतं.

बैठकीत मंडळी बसली होती. ” मुलगी पसंत आहे, पण शिक्षण नाही, फार नाही पण नवर्‍याला व्यवसायात मदत होईल एवढं शिक्षण हवं होतं ” ‘ नमस्कार, मी तुम्हां सगळ्यांमध्ये लहान आहे तरी बोलण्याचं धाडस करतोय. माझी बहीण अशिक्षित नाही, तिला सगळं लिहिता वाचता येतं, हवं तर यावर्षी दहावीच्या परिक्षेला बहिःस्थ विद्यार्थिनी म्हणून फाॅर्म भरावा, ती नक्कीच पास होईल याची मी गॅरंटी घेतो, व लगेच पुढच्या वर्षी बारावीचीही परीक्षा देईल. “प्रकाश बोलत होता.

” मग हरकत नाही. मुलीचं शिक्षण होईल व तोपर्यंत ती 21 वर्षांचीही होईल. चालेल आम्हांला “

आणि आज प्रकाशने माझी विदाई केली होती. त्याच्यामुळेच तर मला शिक्षणाचं अनमोल रत्न मिळालं व अशोकसारखं सोनं लाभलं. तरी माझा भोळा भाऊ म्हणतो ताई तुला मी काय भेट देऊ “

सनईचे सूर वाजू लागले. स्वागताला सवाष्णी आल्या, तशी माझी तंद्री भंग पावली. ” ये सुनबाई, पहिला उजवा पाय टाक ” म्हणत कुटुंबातील जेष्ठ स्त्रियांनी माझा गृहप्रवेश केला, व मी एका नव जीवनाला सुरूवात केली.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आजोबा आणि बुढ्ढाश्रम… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ आजोबा आणि बुढ्ढाश्रम… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

दर शनिवारी, आजोबा आणि मी आमच्या घराजवळ असलेल्या बुढ्ढाश्रमात तिथल्या आजीआजोबांना भेटायला जातो. “त्याला बुढ्ढाश्रम नाही म्हणत, ” आजोबा मला सांगत, आणि मग काहीतरी खूप जोडाक्षरं असलेला एक कठीण शब्द म्हणत, पण मला काही तो शब्द म्हणता येत नाही.

तिथे आजोबांचे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना भेटायला आजोबांना आणि मला फार आवडतं. शिवाय आजोबा नेहमी म्हणतात, “जे आजारी लोकांना भेटतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, त्यांचं मनोरंजन करतात, ते त्यांना नवीन उभारी देतात, खूप पुण्याचं काम करतात. ” 

तिथं आम्हाला अन्नपूर्णाअम्मा भेटायच्या. त्या चेन्नईजवळील एका गावाहून आलेल्या आहेत. त्या नेहमी त्यांच्या गावातील एकाहून एक सरस खाद्यपदार्थांबद्दल सांगायच्या. त्यांचे तिथं एक छोटे हॉटेल होतं आणि त्यांच्या हातचं इडलीसांबार खायला लोक दूर-दूरहून येत असत.

नंतर भेटायचे पेस्तनकाका, ते खूप गमतीशीर बोलायचे. त्यांच्या पारशी ढंगात वेगवेगळे जोक्स सांगायचे. त्यांचे काही जोक्स फार फनी असत, काही मला समजतही नसत. पण ते स्वत:च्याच विनोदांवर जोरजोराने हसत, हसताना त्यांची ढेरी अशी गदागदा हलायची आणि नुसतं ते बघूनही मला हसू यायचं.

त्यांच्या शेजारी संगीतकाका असतात, हे नेहमीच काहीतरी गुणगुणत असत. खूप मूडमध्ये असले की ते आम्हालाही कोरसमध्ये गायला लावायचे.

मग भेटतात मेहताआजी! त्या नेहमी आपल्या नातवंडांच्या गोष्टी सांगतात, त्यांच्याकडे त्यांच्या नातवंडांचे ढीगांनी फोटो आणि अल्बम आहेत.

बापटकाकू शाळेत इतिहासाच्या शिक्षिका होत्या. त्या नेहमी आम्हाला जुन्या काळातल्या पौराणिक, ऐतिहासिक कथा सांगत.

सिंग साहेब सैन्यातून निवृत्त झाले आहेत. एका युद्धात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला होता. ते आम्हाला सैनिकांच्या शौर्याच्या कथा सांगतात.

गुप्ताकाका फार बोलत नाहीत, फक्त माझी वटवट ऐकतात, मान डोलावतात आणि “पुढच्या शनिवारी परत ये ग” असं मला म्हणतात.

मला आणि आजोबांना या सगळ्यांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला खूप आवडायचं आणि ऊन असो, वारा असो किंवा पाऊस असो, दर आठवड्याला आम्ही त्यांना भेटायला जायचोच.

पण एकदा माझे आजोबा आजारी पडले आणि त्यांना हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. “ते क्रिटिकल आहेत, कोमात गेले आहेत, ” असं काहीतरी डॉक्टर म्हणाले, म्हणजे काय ते मला नीटसं कळलं नाही, पण एवढं नक्की समजलं, की या शनिवारी ते माझ्याबरोबर त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेटायला येऊ शकणार नाहीत.

मग मी त्या शनिवारी एकटीच बुढ्ढाश्रमात गेले. सगळे मला पाहून खूप आनंदी झाले. आजोबा का नाही आले असं सगळ्यांनी विचारलं, मी त्यांना हॉस्पिटल, क्रिटिकल, कोमा वगैरे सांगितलं. त्यांना काय कळलं कोणास ठाऊक, पण आज ते सगळेच मला हसवण्याच्या प्रयत्नात होते. अन्नपूर्णाअम्मानी त्यांची फेवरेट रेसिपी मला सांगितली, पेस्तनकाकांनी जोक्स सांगितले, मेहता आजींना माझा रेड फ्रॉक खूप आवडला असं त्या म्हणाल्या, बापट काकूंनी एका शूर छोट्या मुलीची गोष्ट सांगितली.

मी परत जायला निघाले, तेव्हा का कोणास ठाऊक पण सगळे आजीआजोबा डोळे पुसत होते. मी पुढच्या आठवड्यात नक्की आजोबांना घेऊन येईन असं त्यांना प्रॉमिस केलं आणि निघाले.

पण पुढच्या शनिवारीसुद्धा आजोबा हॉस्पिटलमध्येच होते. ते काही खातपीत नव्हते, बोलत नव्हते, हसत नव्हते, नुसते छताकडे बघत पडून राहायचे. बाबा गप्प गप्प असायचे, आईचे डोळे लाल दिसायचे.

आजही आजोबा माझ्यासोबत येणार नाहीत हे मला कळलं, मग मी पाचच मिनिटांसाठी बुढ्ढाश्रमात जाऊन आले. त्यांना सांगितलं की आजोबांना अजून बरं वाटत नाहीये आणि आई बाबा पण बोलत नाहीयेत, तर मी आज त्यांच्याशी गप्पा मारायला जाते.

आजी आजोबा काही बोलले नाहीत. का माहीत नाही, पण गुप्ताकाकांनी मला जवळ घेतलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि “सगळं ठीक होईल, बरं, बाळ! ” असं मला म्हणाले.

“मला कुठं काय झालं होतं? ” या आजोबांची गंमतच आहे, मला वाटलं.

दुसऱ्या दिवशी, रविवारी, आईबाबांसोबत मी हॉस्पिटलमध्येच होते. आता ते डोळे उघडत होते, पण ते काही खातच नव्हते, त्यामुळे त्यांना ताकद येत नव्हती. मी त्यांना कित्ती कित्ती सांगितलं, की vegetables खाल्ल्या पाहिजेत, दूध प्यायलं पाहिजे, पण ते ऐकतच नव्हते.

एवढ्यात आजोबांच्या हॉस्पिटलच्या खोलीबाहेर खूप आवाज ऐकू यायला लागले. “ऐसा कैसा खबर नहीं? मेरे को पक्की खबर हैं के इधर आज पार्टी है! ” असं मोठमोठ्यांदा बोलत पेस्तनकाका आजोबांच्या खोलीत घुसले. अम्माने गरमागरम इडलीसांबार आणलं होतं. सिंगसर बाबांशी बोलत होते, बापट काकू आईच्या पाठीवरून हात फिरवत होत्या, मेहताआजी त्यांच्या नातवंडांनी केलेलं “get well soon” ग्रीटिंग कार्ड आजोबांना देत होत्या, संगीतकाका कुठलं तरी, जुन्या काळातलं “सुहाना सफर, और ये मौसम हसीन” वगैरे गाणं म्हणत होते, गुप्ताकाका माझा हात घट्ट धरून उभे होते.

रूममध्ये नुसता आरडाओरडा चालला होता, इतका की तिथल्या नर्सताईसुद्धा काय चाललं आहे बघायला, आम्हाला गप्प करायला खोलीत आल्या. पण ही सगळी मंडळी पाहिली, नर्सताईला काय झालं माहित नाही, पण त्या डोळे पुसत – आम्हाला काहीच न बोलता बाहेर निघून गेल्या.

आजोबांनी हाताने खूण करून बाबांना बोलावलं, “मला जरा बसतं करतोस का? मला भूक लागली आहे, ” एकदम हळू आवाजात ते म्हणाले.

मग त्यांनी अम्माने आणलेली इडली खाल्ली.

आई बाबा आणि आलेले सगळे आजी आजोबा वेडे आहेत! तिकडे आजोबा खात होते, आणि इकडे या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं.

“आता तुझे आजोबा लवकर बरे होणार, बरं का! ” माझ्या डोक्यावर टपली मारत डॉक्टरकाका सांगत होते, आणि मी आजोबांबरोबर पुढच्यावेळी बुढ्ढाश्रमात गेले की काय करायचं याचे प्लॅन्स करण्यात गुंग झाले होते.

© श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ म्हाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(दिपूच्या आईने दोन चुली तयार केल्या. चुली सारवून ठेवल्या. टिपूला मदतीला घेऊन परसातील लाकडे जमवून ठेवली. अगदी आगपेटी पण तयार ठेवली. आता पैसे आले की दुकानातून सामान आणायचे आणि रात्र 11 पर्यंत स्वयंपाक पुरा करायचा, एवढेच बाकी होते.) 

इथून पुढे – – 

दिपूच्या आईने अंगण शेणाने सारवले. पानंदीपासून घरापर्यंत रांगोळी घातली. आता तिचे लक्ष येणाऱ्या एसटीवर होते. कधी एकदा पैसे हातात येतात आणि दुकानाचे मन आणतो असे तिला झाले होते.

त्यांच्या गावात एसटी नदीपलीकडे थांबत असे. टिपूच्या घरातून गाडी आल्याचा अंधुकसा आवाज येत असे. इतक्या वर्षाच्या सरावाने गाडी थांबल्याचा आणि वळण्याचा आवाज कळत असे.

दोन वाजायला आले आणि दिपूची आई आत बाहेर करू लागली. पण दुपारच्या गाडीने दिपूचे बाबा आले नाहीत. पण तिला निश्चित माहित होते चारच्या गाडीने ते येणारच. पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा तिच्या आत बाहेर सुरु झाल. साडेपाचच्या सुमारास गाडीचा आवाज आला तशी ती बाहेर येऊन उभी राहिली. लांबून तिला दिपूचे बाबा येताना दिसले. तसा तिला खूप आनंद झाला, तिने दिपूला हाक मारली ” दिपू ती सामानाची यादी आणि पिशव्या घेऊन ये बाहेर. बाबा आले, त्यांचे कडून तीन चार हजार घे आणि यादी घेऊन दुकानात जा. आणि सर्व सामान व्यवस्थित आण. ‘

” हो आई येतो, म्हणत दिपू यादी आणि पिशव्या घेऊन आला. तोपर्यंत दिपूचे बाबा घराजवळ पोहोचले होते. पण तिच्या लक्षात आले त्यांचा चेहरा पडलेला दिसत होता.

” मिळाले ना पैसे? दिपूच्या आईने विचारले. बाबा रडविले होत म्हणाले ” नाही, बँकेत त्यांच्या अकाउंट वर पैसेच नाही ‘.

” काय? दिपूची आई रडविली होत किंचाळली.

” सकाळपासून बँकेत होतो, स्टेट बँकेच्या अकाउंट वर त्यांच्या अकाउंटला फक्त 220 रुपये होते, म्हणून परत त्या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो. तेव्हा तेथे मॅनेजर म्हणाले ” काळजी करू नका, आजच एक मोठा चेक पास होऊन गेला म्हणून पैसे कमी झाले. मी दोन वाजता पुन्हा पैसे भरतो. तुम्ही दोन नंतर तुमचा चेक पास करा. म्हणून न जेवता परत दोन पासून बँकेत उभा. अडीच वाजता चेक बँकेत दिला तर तो बँकेचा माणूस म्हणाला अहो या लोकांनी अनेकांना असे चेक दिलेत, सर्वांचे चेक परत गेलेत, यांच्या अकाउंटला काही रक्कम नाहीच आहे. त्यामुळे कुणाचे चेक पास झालेले नाहीत. ‘ मी परत या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसला भले मोठे कुलूप. चार वाजेपर्यंत मी तेथे वाट पाहिली आणि शेवटी कंटाळून एसटी पकडली “.

दिपूच्या बाबांचे शब्द दिपूच्या आईच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. तिच्या लक्षात आले आपल्या डोळ्यासमोर अंधार येतोय. आता आपण निश्चित खाली पडणार हे तिला कळत होते. पण तिच्या मनाने उसळी घेतली. ” छे छे, मला खाली पडून चालणार नाही. आपला नवरा साधा आहे. तो हातपाय गळून बसेल. आपल्याला धडपड करायलाच हवी ‘. पटकन ती सावरली. खुर्चीला धरून उभी राहिली. आईला बरं वाटत नाही हे पाहून दिपू घरात धावला आणि पाणी घेऊन आला. त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास तिने तोंडाला लावला आणि घटाघटा पाणी प्यायली. दिपूचे बाबा डोकं धरून बसले. शेवटचा प्रयत्न म्हणून ती दिपूला म्हणाली ” दिपू ही यादी घे आणि वासूच्या दुकानात दे, म्हणावं आज म्हाई येणार आमच्याकडे,. एवढे द्या आणि पैसे लिहून ठेवा ‘. दिपू यादी आणि पिशव्या घेऊन गेला. तिला अंदाज होता वासू वस्तू द्यायचा नाही. कारण गेल्या चार महिन्यापासून त्याचे बिल द्यायचे होते. पाच मिनिटात दिपू धावत आला. ” आई वासू काका म्हणतात, म्हाईच्या दिवशी आम्ही कुणाला उधार देत नाही. ‘ तिला अंदाज होताच. आता म्हाई यायला पाच तास बाकी होते. एवढ्या माणसांचे जेवणखांन व्हायलाच हवे. तिचा डावा हात गळ्याकडे गेला. गळ्यातील मंगळसूत्रात तीन चार ग्रॅम सोने होते. आता हाच एकमेव उपाय. तिला खूप वाईट वाटले. गावातील सर्वात प्रतिष्ठित मानकर यांची ही परिस्थिती. प्रतिष्ठित मानकरी म्हाईच्या भक्तांना जेवण घालू शकत नाही? ज्या घरात कुळाकडून वसुलीसाठी घोडे ठेवले होते, रोज दहा वीस बाहेरची माणसे जेवून जात होती, सकाळपासून चुलीवर ठेवलेले चहाचे आधन बंदच होत नव्हते, ज्या घरातील शिल्लक अन्नावर तीन चार कुटुंब रोज जेवत होती, त्या कुटुंबाची आज काय परिस्थिती? घरात रिकामे डबे या कुटुंबाच्या आश्रयावर मोठा झालेला वासू दुकानदार म्हाईसाठी माल नाही म्हणतो?? “.

दिपूच्या आईला रडू येत होते. हुंदक्यावर हुंदके येऊन गळ्यावर आदळत होते. पण तिने डोळे पुसले. दिपूला म्हणाली ” दिपू चल माझ्याबरोबर. ‘

” कुठे आई?

” रघु सोनार किती पर्यंत दुकान उघडे ठेवतो? तिने गळ्यातील मंगळसूत्राला हात लावत विचारले.

” सहा पर्यंत ‘.

” मग चल चप्पल घाल ‘.

तिने घरात नेसलेली साडी ठीकठाक केली. डोळे कोरडे केले. केसावरून हात फिरविला आणि पायात चप्पल घातली. चप्पल घालून ती आणि दिपू चार पावले चालली एवढ्याच संज्या डोक्यावरून टोपली आणताना दिसला. ती संजय कडे पहात म्हणाली ” काय हे संज्या?

” आईने पाठवले तुमच्याकडे, ‘. संजयच्या डोक्यावर जड होणारी टोपली दिपूच्या आईने हाताला धरून खाली घेतली. उतरलेल्या टोपलीकडे दिपूची आई पहातच राहिली. टोपली तीन चार किलो तांदूळ, गव्हाच्या पिठाच्या दोन पिशव्या, तेलाची पिशवी, कांदे बटाटे, वाटाणे, साखर इत्यादी होते.

” अरे हे कोणासाठी संज्या? दिपूची आई आश्चर्याने ओरडली.

” तुमच्यासाठी काकी, तुमच्याकडे म्हाई येणार ना, मग हा दिपूचे बाबा एसटीतून उतरले तेव्हा माझ्या बाबांना वाटेत भेटले. तेव्हा ते रडत होते. माझ्या बाबांना म्हणाले, ” संस्थेने फसवलं, खोटा चेक दिला, आज आमच्याकडे म्हाई येणार, तिच्याबरोबर वीस पंचवीस लोक असणार त्यांचे जेवण करावे लागणार. घरात अन्न शिजवायला धान्य नाही ‘. माझ्या बाबांनी आईला हे सांगितलं. आई म्हणाली” संजय ताबडतोब हे सामान दिपूच्या घरी पोहोचव, आज त्यांना याची गरज आहे. गावच्या मानकऱ्यांचे घर ते. त्या घराण्याच्या जीवावर अनेक जण जेवले, मोठे झाले, आज त्यांची परिस्थिती खराब आहे. पुन्हा त्यांचे दिवस येतील. माझ्या आईने ही टोपली भरली आणि आणि तुमच्याकडे हे सामान पोहोचवायला सांगितलं ‘.

दिपू ची आई रडत रडत खाली बसली. ” काय हे संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू मी. म्हाई रात्री येणार खरी पण संज्याच्या आई मला खरी म्हाई तुमच्याच रूपात आत्ताच भेटली. ‘. दिपू ची आई चटकन उभी राहिली डोळे पुसले आणि पुढे येऊन संजयला जवळ घेतले. ” बाळा, माझ्यासाठी डोक्यावर टोपलीतून एवढे सामान आणलंस, तुला द्यायला लाडू पण नाही रे घरात ‘. संजाने आणि दिपू ने सर्वसामान घरात घेतले. आईने त्यांना डबे दाखवले त्या डब्यात भराभर भरले.

आता दिपूच्या आईच्या अंगात हत्तीचे बळ आले. तिने भराभर दोन चुली पेटवल्या. वाटाणे पाण्यात फुगत घातले. बटाटे कांदे चिरायला घेतले. कोथिंबीर मोडून ठेवली. एका चुलीवर तेल तापवून पुऱ्या करायला घेतल्या.

इकडे देवळात ढोलांचे ताशांचे आवाज सुरू झाले. ढम… धम.. ढम, ताशांचे आवाज ताड ताड ताड, शिंग वाजले पु… उ… पु…

म्हाई निघाली, म्हाई निघाली, भक्तांच्या भेटीला म्हाई निघाली. सगळ्या गावात उत्साह संचारला.

दिपूच्या आईची घाई होत होती. दोन चुली रट्टा रट्टा पेटत होत्या. तिने दोन अडीच तासात सगळा स्वयंपाक पुरा केला. आधी पूजा बाबांनी आंघोळ केली आणि सोवळे नेसून ते तयार राहिले. दिपूच्या आईच्या मदतीला शांती भाजीवाली हजर झाली तसेच शेजारची शोभा काकी पण आली. दिपूच्या आईने अंघोळ करून घेतली, आणि त्यातल्या त्यात चांगले लुगडे ती दिसली. दिपू ही आंघोळ करून तयार झाला.

साडेअकरा वाजले आणि ढोल ताशे जवळ वाजायला लागले. ढम… ढम… ढम, ताड.. ताड… ताड… , शिंग वाजू लागले. दिपूच्या बाबांनी म्हाईला घरापर्यंत आणलं. दिपूच्या आईने सर्वांच्या पायावर पाणी ओतून त्यांना आत घेतलं. म्हाईची पालखी आत ओसरीवर आली. दिपूच्या आईने तिची ओटी भरली. पुजार्यांनी गाऱ्हाणे घातले. तीर्थप्रसाद सर्वांना दिला. मग सोबतची मंडळी विसावली. गेले कित्येक वर्षे देवीच्या मानकर यांच्या घरी सर्व भक्तांना जेवण असते. त्याप्रमाणे पत्रावळी मांडून त्यांना जेवण वाढले. दिपू च्या मदतीला शांती भाजीवाली आणि शोभा काकी पण होत्या. भराभर वाढून झाले. मंडळींनी ” पुंडलिक वरदे ‘ म्हणत जेवणाला सुरुवात केली. वरण-भात, वाटाण्याची बटाट्याची भाजी, कोशिंबीर, शेवयाची खीर आणि पुरी. भक्त मंडळी भरपूर जेवली. सर्वांनी दिपूच्या आई-वडिलांना आशीर्वाद दिले. आणि म्हाईची पालखी दुसऱ्या घरी जायला निघाली.

रात्री दिपूची आई अंथरुणावर पडली पण तिच्या डोळ्यासमोर संज्याची आई होती. संजय ची आई म्हाई सारखी धावली म्हणून गावच्या मानकरांची अब्रू वाचली, नाहीतर…

दिपू च्या आईला झोप येईना. आज दिवसभर जो मनस्ताप झाला त्याची तिला एक सारखी आठवण येत होती.

सकाळ झाली. म्हाईच्या ढोलांचा आवाज लांब लांब ऐकू येत होता. दिपूच्या आईने डब्यात शेवयाची खीर आणि पुरी आणि वाटाणा बटाट्याची भाजी घेतली. आणि ती मागच्या दरवाजाने बाहेर पडली. त्याच अळीत शेवटचं घर संज्याच. संजयच्या घरी मागच्या दरवाजावर तिने टकटक केले. संजयच्या आईने मागचं दार उघडलं. तिला पाहता दिपूची आई पुढे गेली आणि तिने सध्याच्या आईला मिठीच मारली. रडत रडत ती बोलू लागली ” संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू? तुम्ही काल सामान पाठवले नसते तर गळ्यातील मंगळसूत्र मोडाव लागणार होतं. त्यात तरी काय तीन-चार ग्रॅम सोनं. पण गावातील सोनारसमोर घराण्याची अब्रू जाणार होती. सज्यांच्या आई, माझी म्हाई मला काल संध्याकाळीच भेटली. संज्याच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई “.

” असं बोलू नका दिपूच्या आई, अश्रू आवरा.

” कशी आवरू संज्याच्या आई, रात्री आलेल्या म्हाईला आमची काळजी असती, तर आमचे कष्टाचे पैसे त्या संस्थेने बुडवले असते का, आणि ज्यांनी पैसे खाल्ले ते गाड्या घेऊन मजेत. आमची म्हाईत्यांना शिक्षा देत नाही. संज्यच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाय. ‘.

संजयच्या आईला मिठी मारून दिपूची आई रडत होती आणि संजय ची आई तिला समजावत होती. त्यांचे बोलणे रडणे ऐकून तेथे आलेले संजय चे बाबा आणि संजय आपले डोळे पुसत होते.

समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ म्हाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

शांती भाजीवाली डोक्यावर भाजीची टोपली घेऊन आळीत घरोघरी फिरत होती. दिपूच्या आईचं घर येताच तिने टोपली जमिनीवर ठेवली आणि मोठ्याने हाळी दिली ” ओ दिपूच्या आई, भाजी घेणार काय? ‘

तिची हाळी ऐकून दिपूची आई पदराला हात पुसत बाहेर आली.

” घेणार का भाजी, कांदापात हाय, माठ हाय, मुळा हाय, कोबी हाय. “

शांतीला पाहतात दिपूच्या आईला आनंद झाला. तशी दोन दिवसाआड येणारी शांती ही त्यांची मैत्रीणच. दोघी एकमेकांसमोर आपलं मन मोकळ्या करायच्या.

” होतीस कुठे इतकं दिवस? लय दिसानं आलीस? ‘

” ताप येत होता दादल्याला, त्याला डागदर कडे नेत व्हते ‘.

आता बर हाय का?

” व्हय, घेणार का भाजी? ‘

” लाल माठ दे दोन जुड्या, “.

शांतीने माठाच्या दोन जुड्या दिपूच्या आईच्या हातात दिल्या.

” मग दिपूच्या आई, म्हाई येणार की आता लवकरच ‘. “म्हाई ‘ म्हटल्याबरोबर दिपूच्या आईचा चेहरा चिंताग्रस्त झाला.

“काय झालं, गप का रवला? शांतीने विचारले.

” काय सांगावं शांते, घर वाल्यांची नोकरी राहिली नाही, पैसे मिळाले होते फंडाचे ते त्या संस्थेत ठेवले होते नव्हे “. कुठल्या? ती

ती बुडाली त्या संस्थेत की काय?

” होय बाई, ‘

” लई लोकांचे बुडाले बघा, मग मग आता म्हणणं काय त्यांचं? ‘

” पैसे मिळणार, बुडायचे नाहीत म्हणत्यात, पण आता”म्हाई ‘ यायची झाली आणि खिशात पैसे नाहीत अशी परिस्थिती.

” होय बाई, आणि दिपू अजून लहन हाय.

” हो बाई, खूप दिवसांनी झालाय ना तो. ‘

” पण तुम्ही देवीचे मानकरी, म्हणजे तुम्हास्नी म्हाईचा लई खर्च असणार?

” होय बाई, आम्ही मानकरी देवीचे, म्हाई आमच्याच घरी येणार, सोबत वीस पंचवीस देवीचे भक्त पण असतात, एवढ्या मंडळीचे जेवण व्हायला पाहिजे. 50 60 लोकांचे चहापाणी, देवींची पूजा, ओटी भरणे हायचं. “

मग दिपूच्या बाबांनी काहीतरी व्यवस्था केलीच असेल?

” ते काय करतात, साखर कारखान्यातून रिटायर झालेत, त्यात त्यांचा पगार तो कितीचा होता, पेन्शन वगैरे काही नाही, काय फंड मिळाला तो त्या संस्थेत घातला, चार वर्षात डबल होणार म्हणून सांगितलं, ठेवून दोन वर्षे झाली, सहा लाखाचे बारा लाख होणार म्हणून ठेवले, पण आता संस्था बुडाली म्हणे “.

” अरे देवा, मग फुड काय व्हायचं ‘.

” बघूया ‘ असं म्हणून दिपूच्या आईने माठाच्या दोन जुड्या घरात नेल्या. शांतीला दहा रुपये दिले तशी शांती गेली.

दिपूच्या आईच्या लक्षात आलं, फेब्रुवारी महिना आला म्हणजे, या महिन्यात “म्हाई ‘ येणार, त्यात आपण देवीचे मानकरी, उत्पन्न काही नसलं तरी खर्च थांबत नाहीत. तिने डबे उघडले. तांदुळाच्या डब्यातले तांदूळ तळाला टेकले होते. पिठाच्या डब्यात जेमतेम चार दिवसापूर्वी पीठ शिल्लक होते. तेल जवळ जवळ संपले होते. वाटाणे हरभरे शेंगदाणे सर्व संपत आले होते. अजून पंधरा दिवस आहेत म्हाईला. अजून पंधरा दिवसाला खायला तर पाहिजे.

एका महिन्यापूर्वी तिच्या आईने धान्य पाठवलं होतं. जोंधळे, शेंगदाणे, तांदूळ गहू इत्यादी. आता परत तिच्याकडे कसे मागायचे? आता आईचे काही चालत नाही घरात. भावजई चा कारभार. आणि तेथे सुद्धा रयत फारसे देत नाहीत. आपला भाऊ तसा सतत आजारीच असतो. त्यांची परिस्थिती पण आता फारशी बरी नाही. त्यांच्याकडे परत मागायला नको. तिने नवऱ्याला हाक मारली “अहो, ऐकलंत का, घरातलं धान्य तसेच पीठ संपत आलंय. पाच-सहा दिवसा पुरते आहे. या महिन्यात”म्हाई ‘ येणार, तिच्या पालखीसोबत वीस-पंचवीस माणसे असतात. त्यांना दरवर्षी आपल्याला जेवण खान करावे लागतं. आणि 50 60 माणसांना चहा पाणी.

” मग मी तरी काय करू? सगळे पैसे त्या संस्थेच्या बोडक्यावर टाकलेत ना?

” पण मी म्हणत होते, असल्या संस्थेमध्ये पैसे ठेवू नका, ते पैसे घेतात आणि मग खाका वर करतात, “

” बघू, आबा म्हणत होता, रिझर्व बँक काहीतरी करेल.

” त्या आबावर विश्वास ठेवून पैसे ठेवलेत ना, मग मग आबाला सांगा आमचे पैसे दे म्हणून ‘.

” आबा काय देतो, त्याचा पोरगा त्या संस्थेत मॅनेजर होता म्हणून तो सर्वांना तेथे पैसे ठेवायला सांगायचा, आता सर्वजण त्याला विचारतात, तेव्हा तो रिझर्व बँकेकडे बोट दाखवतो “.

” म्हणजे पैसे मिळवले ह्या लबाडानी आणि पैसे कोण देणार म्हणे तर रिझर्व बँक. ते काही नाही, तुम्ही या पतसंस्थेच्या तालुक्याच्या ऑफिसात जाऊन खडसावून विचारा, म्हणावं आम्ही खावं काय? आमचे फंडाचे सर्व पैसे विश्वासाने तुमच्याकडे ठेवले, पैसे तुम्ही खाल्ले आणि ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसलात “.

” जातो मी उद्या’. “

” चावाच आणि खडसावून विचारा, त्यांना सांगा पंधरा दिवसांनी आमच्याकडे “म्हाई ‘ येणार आहे, आम्हाला मोठा खर्च आहे, तोपर्यंत आम्हाला काहीतरी पैसे द्या ‘. शेवटी मानकरी ना तुम्ही देवीचे, उत्पन्न काही नसले तरी मानकरी, जमीन सगळी कुळांना गेली. पण मान फक्त तुम्हालाच. खर्च फक्त तुम्ही करायचे “.

दिपू च्या आईचा संताप संताप झाला. खरं तर ती आपल्या नवऱ्याला जास्त बोलायची नाही. कारण तिला माहीत होते आपला नवरा स्वभावाने गरीब आहे. त्यांचा जन्म झाला जमीनदाराच्या कुटुंबात पण चुलत भावांनी फसविले. घरातील दाग दागिने, सोने, रोख रक्कम घेऊन पळाले. मोठ्या शहरात जाऊन स्थायिक झाले. आता ढुंकूनही गावाकडे पाहत नाहीत. कुळांकडे असलेल्या जमिनी आपल्या नवऱ्याकडे आल्या. कुळ कायद्याने त्या जमिनी गेल्या. राहिले फक्त फुकटचे मोठेपण. हे जुने मातीचे पडणारे घर सोडून दुसरे काही नाही. आपल्या नवऱ्याचे शिक्षण फारसे झाले नाही. या जमीनदार कुटुंबाकडे पाहून आपल्या वडिलांनी आपल्याला या घरात दिले. त्यावेळी घर गजबजलेले होते. येणे जाणे होते. कुळाकडून वसुली करण्यासाठी घोडे ठेवले होते. स्त्रियांसाठी मेणे होते. सर्व गेले. राहिली फक्त भोके. उत्पन्न काही नाही.

नशीब त्यावेळी खासदार जयवंतराव नवीन साखर कारखाना काढत होते. आम्ही या गावचे मानकरी म्हणून देवीला नमस्कार करून सरळ ते आमच्या घरी आले. मी त्यांना आमची परिस्थिती सांगितली. आमच्याकडे उत्पन्नाचे काही साधन नाही हे त्यांना सांगितले. त्यांनी नवऱ्याला कारखान्यात नोकरी देण्याचा शब्द दिला. दोन वर्षांनी कारखाना उभा राहिला तेव्हा जयवंतरावांना मी परत भेटले. त्यांनी आपल्या नवऱ्याला नोकरीला ठेवले. पण शिक्षण जास्त नसल्याने उसाच्या वजन काट्यावर वजन नोंदवून ठेवण्याचे काम दिले. थोडाफार पगार घरात येऊ लागला आणि संसार टुकूटुकू का होईना चालू झाला.

बारा वर्षांपूर्वी दिपू चा जन्म झाला, दोनाची तीन माणसे झाली. पण दोन वर्षांपूर्वी आपला नवरा निवृत्त झाला आणि पगार थांबला. दिपू शाळेत. उत्पन्न काही नाही. फंडाची रक्कम आली ती गावातल्या आबांना कळली. त्यांच्या रोज सायंकाळी फेऱ्या वाढू लागल्या. चार वर्षात डबल पैसे होतील, तुझ्या दिपूच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे येतील अशी आश्वासने देऊ लागले. आम्हाला ते खरेच वाटले, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आता हा पश्चाताप झाला. नवऱ्याने पतसंस्थेचे सर्टिफिकेट दाखवली तेव्हा आपण पण खुश झालो. आपले शिक्षण पर फारसे नाही. बाहेरच्या लबाड जगाची एवढी कल्पना नव्हती. पैसे डबल झाले म्हणजे दिपूला शिकवायचं, मग घर बांधायचं, मग दिपूला नोकरी मिळेल, मग दिपू च लग्न…

पतसंस्था अडचणीत आल्याचे कळले, लोकांचे पैसे मिळत नाहीत याची कल्पना आली आणि पायाखालची वाळू सरकली. मग संस्थेत आपल्या नवऱ्याच्या रोज खेपा सुरू झाल्या. आपल्यासारखे शेकडो लोक रोज संस्थेत येत होते. मॅनेजरला भंडावून सोडत होते. मॅनेजर हाता

पाया पडून पुढची आश्वासने देत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या एसटीने तालुक्याच्या गावी गेले. त्या संस्थेच्या मुख्य ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटले.

” साहेब मी गरीब माणूस. कारखान्यातून मिळालेली सर्व फंडाची रक्कम तुमच्या संस्थेत ठेवली. आम्हाला पेन्शन वगैरे काही नाही. आमच्या पैशांचे काय? पंधरा दिवसांवर आमच्या गावातली “म्हाई ‘ आली. आम्ही देवीचे मानकरी. आम्हाला दरवर्षी मोठा खर्च असतो. तातडीने काहीतरी पैशाची व्यवस्था करा.

” अहो काका, इथे रोज शेकडो माणसे येऊन गर्दी करतात. सर्वांचेच पैसे अडकले. अडकले याचा अर्थ बुडाले असे नव्हे. पैसे मिळणार पण ते केव्हा ते मी सांगू शकत नाही. रिझर्व बँकेने तात्पुरते निर्बंध घातलेत. आपले चेअरमन जाऊन दिल्लीला अर्थमंत्र्यांना भेटलेत. सर्व व्यवस्थित होणार काळजी करू नका ‘.

” पण साहेब पंधरा दिवसावर आमची म्हाई आली. खर्चाला आमच्याकडे पैसे नाहीत ‘.

” हो का केव्हा आहे तुमची म्हाई? ‘

” या महिन्याच्या 22 तारखेला साहेब ‘. 22 तारखेला ठीक आहे, मी 22 तारीख ची तुमची व्यवस्था करतो. तुम्हाला 22 तारीख चा स्टेट बँकेचा चेक देतो. त्यादिवशी येऊन बँकेतून पैसे घेऊन जा ‘. साहेब यांनी 50 हजाराचा चेक लिहून दिला. खाली आपली जोरदार सही केली. दिपूचे बाबा खुश झाले. दुपारच्या एसटीने गावी आले. घरी आल्याबरोबर त्यांनी दिपूच्या आईला पन्नास हजाराचा चेक दाखवला. ती पण खुश झाली. आता निर्धास्तपणे 22 तारखेच्या म्हाई ची तयारी सुरु केली.

गावात सगळीकडे लगबग सुरू होती. देवीच्या देवळात झाडलोट केली गेली. देवळाला नवीन रंग दिला. देवीची पालखी तसेच भांडीकुंडी सर्व काही झकपक झाले. गावातील प्रत्येक घराघरात म्हाईची तयारी सुरू झाली. घरांची साफसफाई झाडलोट सुरू होती.

दिपूच्या घरी दिपूच्या आईने घर वर पासून खालपर्यंत झाडलं. प्रत्येक भांड धुतलं. घरातली अंथरूण पांघरून पुन्हा टाकली. घराकडे येणाऱ्या पानंदी स्वच्छ केल्या.

नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले लोक आपल्या गावात यायला लागले. वर्षभर बंद असलेली घर उघडून साफसूफ करायला लागले. गावाला जाग आली. अनेक चाकरमानी गावात दिसायला लागले.

दिपूचे बाबा परत परत तो 50000 चेक पाहत होते. त्या खालची ती झोकदार सही पाहत होते. 22 तारखेला सकाळी आठच्या गाडीने दिपूचे बाबा तालुक्याच्या गावी गेले. दिपूच्या घरची तशी सर्व तयारी झाली होती. फक्त घरात धान्य सामान आणि साखर वगैरे नव्हते. पैसे आले की ताबडतोब वासूच्या दुकानातून सर्व सामान आणण्याची तयारी दिपूच्या आईने केली. सामान घरात आले की ताबडतोब जेवण करायला सुरुवात करायची. दिपूच्या आईने दिपूला कागद पेन घेऊन लिहायला सांगितले. दिपूच्या आईने यादी करायला घेतली

तांदूळ पाच किलो, गव्हाचे पीठ पाच किलो, साखर पाच किलो, वाटाणे दोन किलो, बटाटे दोन किलो, कांदे दोन किलो, गोडेतेल दोन लिटर, शेवया दोन पॅकेट, वेलची 100 ग्रॅम, गूळ दोन किलो.

दिपूच्या आईने दोन चुली तयार केल्या. चुली सारवून ठेवल्या. टिपूला मदतीला घेऊन परसातील लाकडे जमवून ठेवली. अगदी आगपेटी पण तयार ठेवली. आता पैसे आले की दुकानातून सामान आणायचे आणि रात्र 11 पर्यंत स्वयंपाक पुरा करायचा, एवढेच बाकी होते.

 – क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका स्त्रीचा अपूर्ण श्वास… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ एका स्त्रीचा अपूर्ण श्वास… ☆ सौ.प्रभा हर्षे

रात्रीचे अकरा वाजले होते. संपूर्ण घर झोपेत बुडालं होतं.

फक्त स्वयंपाकघरातून येणारा मंदसा छन-छन आवाज त्या शांततेला भेदत होता.

टेबलवर अर्धवट जेवलेले ताट ठेवलेलं होतं… भाजी थंड झाली होती, पोळी कडक झालेली,

आणि अनाया त्या ताटाकडे बघत होती.

तिच्या डोळ्यात झोप नव्हती, फक्त थकवा आणि ओलसरपणा होता.

दाराच्या पलीकडून कुणीतरी डोकावलं, पण तिला पाहणारा कोणीच नव्हता.

पहाटे पाच वाजता घरातील सगळे अजूनही निजलेले, आणि अनाया झाडू हातात घेऊन स्वयंपाकघरात कामाला लागलेली.

– – गॅसवर दूध ठेवलेलं, सासूबाईंसाठी चहा तयार होत होता, मुलांच्या डब्यासाठी आलू पराठे बनवले होते,

आणि नवरा रोहनचा शर्ट प्रेस होत होता.

“इतका उशीर का झाला? माझा चहा थंड झाला! ”.. सासूबाईंचा रोजचा ओरडा कानावर पडला.

अनाया काहीच बोलली नाही. फक्त मान खाली घालून तिने पुन्हा चहा बनवला – जणू तिने आपल्या तोंडाला कुलूप लावलं होतं.

रोहन ऑफिसला जाताना फक्त एवढंच म्हणाला, “कपडे नीट ठेव, मीटिंग आहे, उशीर होतोय मला. ”

ना “निघतो” म्हटला, ना “काळजी घे. ”

– – फक्त चाव्या टेबलावर आपटल्या आणि निघून गेला.

दुपारपर्यंत घर चमकत होतं,… पण ती स्वतः मात्र फिकी दिसत होती.

.. सासूबाई त्यांच्या कमरेच्या दुखण्याचं रडगाणं गात होत्या,

.. सासरे टीव्हीवर बातम्या पाहत होते,

.. मुलं शाळेत होती..

.. आणि ती भिंतीला टेकून बसली होती.

– – तिच्या बोटांपर्यंत थकवा पोहोचला होता, तरीही ती सगळ्यांसाठी जेवण बनवत होती.

जेव्हा ती स्वतः जेवायला बसली, तेव्हा भाजी थंड, पोळी कडक झाली होती.

तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. शेजारच्या माधवीताई आल्या… 

“अगं अनाया, तू दिवसभर या कामातच गुरफटलेली असतेस! थोडा वेळ स्वतःसाठीही काढ ना! ”

अनाया हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली – (ते हसू तोंडावर होतं, मनात नव्हतं)

“वेळ माझ्या वाट्याला फक्त झाडू आणि भांडी घेऊनच आला आहे, ताई. ”

सायंकाळी मुलं परत आली.

त्यांच्यासाठी दूध, खाऊ, गृहपाठाचा डोंगर तयार होता.

रोहन आला तेव्हा फोनवर कुणाशी तरी बोलत हसत होता.

“आज ऑफिसमध्ये खूप काम होतं का? ” अनायाने हळूच विचारलं.

तो म्हणाला, “हो, थकलोय, ” आणि थेट टीव्हीसमोर बसला.

– – अनाया काही बोलू पाहत होती…

“मीसुद्धा थकलेय, रोहन…”

पण तिचे ओठ बंद झाले. कारण तिला ठाऊक होतं, या घरात तिला थकण्याचा हक्क नव्हता.

रात्र गडद झाली. मुलं झोपली, सासू-सासरे त्यांच्या खोलीत गेले.

अनाया अजूनही स्वयंपाकघरातच होती – गॅस बंद करत होती, सिंक पुसत होती, उद्यासाठी भाजी चिरत होती.

– – अचानक तिचं डोकं गरगरलं, तिने भिंतीचा आधार घेतला. डोळे मिटले,.. आणि कधी झोप लागली हे कळलंच नाही.

रात्री दोनच्या सुमारास रोहन जागा झाला. स्वयंपाकघराची लाईट लागलेलीच होती.

तो चिडला, “ही अजून काय करतेय? ”

तो तिथं गेला.. अनाया खुर्चीवर बसलेली,.. डोकं खाली, पूर्ण शांत.

“अगं अनाया, झोपलीस का? ” – – कुठलाही प्रतिसाद नाही.

त्याने खांदा हलवला – शरीर गार झालं होतं.

त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तो किंचाळला – “आई! आई! ”

सगळं घर धावत आलं. डॉक्टर आले.. पण उशीर झाला होता – – 

डॉक्टर म्हणाले,

“शरीर पूर्ण थकलं होतं… कदाचित अनेक दिवस तापात होती, पण विश्रांती घेतली नाही. ”

रोहनच्या कानात जणू कुणीतरी हातोडा मारला.

तो पुटपुटला –

“पण तिने कधी सांगितलंच नाही की ती आजारी आहे. ”

डॉक्टर शांतपणे म्हणाले –

“सांगण्यासाठी ऐकणारा तरी हवा ना. ”

सकाळ झाली.

सूर्य उगवला, पण त्या घरात काळोख होता.

स्वयंपाकघरात तेच अर्धवट ताट पडलं होतं… थंड आणि निःशब्द.

सासूबाई चहा बनवत रडत होत्या,

“कधी विचारच केला नाही की ती इतकं सहन करत होती. ”

मुलांनी विचारलं, “आई कुठे आहे? ”

रोहन काहीच बोलू शकला नाही.

काही दिवस गेले.

घर चालू होतं, पण जीवन थांबलं होतं.

एका संध्याकाळी रोहनला कपाटात एक डायरी सापडली – वर लिहिलं होतं, “माझं मौन”.

पहिलंच पान उघडलं, आणि डोळ्यातून अश्रू ओघळले –

“आज ताप आहे, पण काम तर करायचंच आहे मला. मी थांबले तर हे घर थांबेल. कुणी विचारेल का की मी ठीक आहे का? बहुतेक नाही… मी आता एक मशीन झालेय, जी सकाळी सुरू होते आणि रात्री बंद होते. ”

“मला भीती वाटते की एखाद्या दिवशी मी कोसळेन, आणि कुणाला कळणारही नाही. कदाचित तेव्हा लक्षात येईल — 

– – घर भिंतींनी नाही… एका स्त्रीच्या श्वासांनी चालतं. ”

शेवटच्या ओळीवर रोहन थांबला – “जर माझ्या जागी कधी दुसरी कुणी आली, तर तिला एवढंच विचार…

“थकलीस का? “… हे शब्द एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतात. ”

रोहनचे हात थरथरू लागले.

… त्याचे डोळे पाण्याने भरले. पहिल्यांदा तो खऱ्या अर्थाने रडला.

त्या दिवसानंतर त्याने स्वयंपाकघरातले ते ताट जपून ठेवले… 

आठवण म्हणून की…

स्त्रीची मेहनत कधीच हलकी नसते – – जरी तिचा आवाज कुणाला ऐकू येत नसला तरीही.

प्रत्येक घरात एक “अनाया” असते… जी सगळ्यांची काळजी घेते, पण स्वतःला विसरते.

ती बोलत नाही, पण तिचे हात, तिचे डोळे, आणि तिचा थकवा रोज ओरडतो.

… कधी तिच्या शेजारी बसून फक्त एवढंच विचारा –

“थकलीस का? ”

… कारण हेच शब्द एखाद्याचं जीवन वाचवू शकतात.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – २ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – २ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

(पीठ पेरून असो, डाळ घालून असो नाहीतर गोळा भाजी असो.. पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर… मेथी स्वत:च्या गंधाची पदोपदी जाणीव देत असते.. अगदी दुसरे दिवशीपर्यंत…) –

इथून पुढे —-

ताकातला पालक, ताकातलं चाकवत किंवा अळूचं फदफदं… गरम गरम आंबेमोहर किंवा इंद्रायणीचा मऊसर भात, त्यावर भरपूर लोणकढं तूप… तो भात पाचही बोटांनी शिते मोडेपर्यंत कालवावा आणि एकेक घास करून त्यावर ही पातळ भाजी ओतून तो घास पुन्हा कालवावा नि पाच बोटांनी तोंडात घालावा. जिव्हा आणि आत्मा असा काही तृप्त होतो की जगणं जगणं रहात नाही.. त्याचं गाणं होऊन जातं!

बटाट्याची बातच और… वरून नशीब घेऊन आलेला… त्याचं काहीही केलं तरी सोनच व्हावं असा!

उगाच नाही राहुल गांधी बटाट्याचं सोनं बनवणारं मशीन करणार होता!

तर अशा या भाज्या… किती नावं घ्यावीत त्यांची नि किती वर्णन करावं त्यांचं?

रोजच्या जेवणात वैविध्य निर्माण करणा-या या भाज्या ” कोणती भाजी करावी? ” या रोजच्या प्रश्नचिन्हानं गृहिणींना सतावणा-या नि “अमुक भाजी करावी तर सुधानेच बरं का… ” असं प्रशस्तीपत्रक बहाल करणा-या… म्हणूनच भाजी हा गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय..

आज विविध अॅपद्वारे घरापर्यंत भाजी येते नि फ्रीजमधे ती आठवडाभर साठवलीही जाते.

पण माझ्या बालपणी ना ऐप होते ना फ्रीज… गृहिणींना रोजची भाजी रोज आणावी लागे… टी. व्ही. , इंटरनेट, मोबाईल नसण्याच्या त्या काळात रोज संध्याकाळी बाजारात जाऊन भाजी आणणे, हा एक विरंगुळा होता… रोजची वेगळी भाजी हा जसा खाद्यजीवनातील विरंगुळा तसा भाजी आणायला जाणे हा रोजच्या जीवनातला!!

माझी आईही याला अपवाद नव्हती… चेहरा धुवून, छान साडी नेसून आई पावडर, कुंकु लावायची. कानातलं घालायची… आधीच गोरीपान, निळ्या डोळ्यांची अशी छान दिसणारी माझी आई अजूनच सुरेख दिसायची. आठ-नऊ वर्षांची मी तिचं बोट पकडून तिच्या बरोबर भाजीला जायचे. वाटेत ओळखीच्या बायका भेटायच्या. त्यांच्याबरोबरच्या गप्पा व्हायच्या. मग भाजी खरेदी व्हायची.

भेंडी, दुधी, मुळा, काकडी यांना नख लावून त्यांचं कोवळेपण पारखणे, गोल, पातळ पानांची मेथी कडू नसते, वांगी किडलेली नाही नं ते पाहून कशी घ्यायची.. अशा अनेक गोष्टी मी कोणीही न शिकवता केवळ पाहून शिकले… विविधरंगी ताज्या भाज्यांतून घडणारा निसर्गाचा अविष्कार मला तेंव्हापासून आजतागायत आनंद देतोय..

“कमी पैशांत जास्तीत जास्त खरेदीचा आनंद भाज्या देतात. “. हे सत्य मला खूप लहानपणी समजलं. म्हणूनच कदाचित आजही मला इतर कोणत्याही खरेदीत रस वाटत नाही पण भाजी खरेदी मात्र मनापासून आवडते.

कधी कलिंगडासाठी तर उसाच्या रसासाठी केलेला हट्ट आणि तो पूर्ण झाल्यावर मिळालेला जग जिंकण्याचा आनंद…!! परतीला आईच्या मैत्रिणीच्या घरी जाणं, तिथे प्यालेली कॉफी किंवा सरबत… किंवा त्यांच्या पायरीवर बसून मारलेल्या गप्पा… कधी कधी बाजारात जाताना घरच्या विवंचनेनी वैतागलेल्या आईची कळी परतताना मात्र खुललेली असे!!

गवारी, घेवडा किंवा पालेभाजी निवडणे हा घरातला एक सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. आई गच्चीत किंवा घराच्या पायरीवर बसून भाजी निवडे. मी, माझी थोरली बहीण घरी असलो तर तिला मदत करायचो. भाजी निवडताना आई तिच्या लहानपणीच्या सुखदु:खाच्या गोष्टी सांगायची.. तिच्या बरोबर तिच्या आठवणींच्या सहलीत आम्हीही सामील व्हायचो… मोठ्या होताना आम्ही भाजी निवडतानाच तिची सुखं दु:खं वाटून घेतली.. नि तिनेही आमची!! .. सुखात आम्ही तिघीही हसलो नि डोळ्यातल्या पाण्याबरोबर दु:खही साजरं केलं!! … कदाचित त्या भाजीने आमच्यातील बंध अजूनच घट्ट केले..

” आज भरलेली वांगी करा “, ” उद्या चाकवताची भाजी करणार नां? ” बाबा हक्काने सांगायचे नि आई आवडीने त्या भाज्या करायची..

कधीतरी आईबाबांचं काहीतरी बिनसलेलं असायचं.. काही दिवस सारं घर शांत असायचं.. दोघांत अबोला.. त्या तणावाने आम्ही मुलेही गप्प गप्प असायचो..

एक दिवस पानात बाबांची आवडती भरल्या वांग्याची भाजी आणि तोंडलीभात दिसायचा … बाबांचं आईकडे पाहून खुदकन् हसणं आमच्या चिमुकल्या नजरांनाही जाणवायचं… आईचा चेहराही प्रसन्न व्हायचा नि अमावस्येचं सावट सरून सारं घर चांदण्याच्या शुभ्र प्रकाशात हसतं खेळतं व्हायचं!!

एकदा आमच्या कारखान्यातल्या पाठीमागच्या भल्यामोठ्या मोकळ्या जागेत भाजी लावायचं आईबाबांच्या डोक्यात आलं. रोज सकाळी बागकाम सुरू झालं.. गवा-या, दुधीभोपळे जोमाने आले.. घरी, दारी, काकांकडे रोज गवा-या नि दुधी जाऊ लागले..

सुरुवातीला सगळा आनंदीआनंद होता.. नंतर मात्र गवारी नि दुधीच्या रोजच्या वासाने जेवणावरची वासना उडू लागली..

 ” चार कानाखाली द्या पण गवारी, दुधी नको ” असे शेजारीपाजारीही म्हणू लागले नि आई बाबांच्या बागकामाच्या आवडीने निरोप घेतला..

भाजी पुराण तर झालं … पण माझी आवडीची भाजी मी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं…

मला ” लाल माठाची ” भाजी भयंकर आवडायची.. मी वाटीभर भाजी नुसतीसुद्धा खायचे.. पोळी, भाकरीबरोबर अगदी गरमगरम तूप भातासोबतही मी लाल माठाची भाजी मिटक्या मारत खात असे..

एखादी रविवारची सकाळ असायची.. बाबा कारखान्यात गेलेले असायचे. भाऊ बहीण जादा तासाला किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणीकडे… मी खोलीत अभ्यास करत बसलेली.. आदले दिवशी गणिताच्या पेपरात बरेच कमी मार्क पडलेले.. आईने अभ्यास घेऊनही… आईने पाठीत घातलेले दोन धपाटे नि धरलेला अबोलाही… जगणंच फोल वाटायला लावणारा… दिवसभर नि रात्रीही डोळ्यातून न थांबणारं पाणी… आई नि माझ्यात पडलेलं हजारो मैलाचं भावनिक अंतर… नि आईचा आलेला हजारो टन राग…

आदले दिवशी रात्रीच्या जेवणावर टाकलेला बहिष्कार… त्यामुळे सकाळी पोटात उसळलेला भुकेचा डोंब..!! .. स्वयंपाकघरातून जाणवणारी आईची चाहूल… हळूच सवयंपाकघरात डोकावणं… आई विळीवर एक पाय वर घेऊन बसलेली… शेजारी स्टीलच्या चाळणीत धुतलेली लालबुंद माठाच्या भाजीची पाने… आईचं ती पाने मुठीत घेऊन विळीवर चिरणं.. चिरण्याचा येणारा चरचर आवाज… आईचे भाजीमुळे लालबुंद झालेले हात… गॅसवर ठेवलेला काळाभोर लोखंडी तवा… त्यात घातलेलं तेल नि पाठोपाठ घातलेला भरपूर लसूण… नि त्यावर घातलेली चिरलेली माठाची भाजी… चर्रर्र… आवाज नि पाठोपाठ उसळलेला स्वर्गीय सुगंध… एका बाजुला पोटातली जबरदस्त भूक नि दुसरीकडे आईवरचा राग..

“हिने मुद्दाम आज माझ्या आवडीची भाजी केलीय पण मी जेवणार नाही “… मनाशी केलेला निश्चय… आईचं खोलीत येणं नि हाताला धरून स्वयंपाकघरात ओढत नेणं! दुस-या तव्यावर टाकलेली भाकरी… आता ताटलीत टम्म फुगलेली गरमागरम भाकरी, त्यावर तूप नि कडेला मला भयानक आवडणारी लाल माठाची भाजी…

आई ताटली घेऊन माझ्याजवळ बसलेली… भाजी लावून भाकरीचा एक घास माझ्या तोंडाजवळ आईने नेलेला… मला भरवण्यासाठी..

” मला नको… मी नाही खाणार “

” असं रागावतात आईवर? आई चांगल्यासाठीच रागावते नं? आता पुढच्यावेळी जास्त अभ्यास करून छान मार्क मिळवायचे.. शहाणं माझं बाळ! आणि माझे हात पाहिले का कसे लाल झालेत.. आणि भाकरी पाहिली का.. माझ्या बांगडीची कशी नक्षी उमटलीय भाकरीवर!! “

आईचे भाजीमुळे रंगलेले हात नि भाकरीवरची तिच्या सोन्याच्या बांगडीची नक्षी पाहिली नि मला हसू आवरेना नि त्याचवेळी डोळे पाझरू लागले… आईला घट्ट मिठी मारली… आईची मऊ साडी ओलीकच्च झाली नि त्याचवेळी माझे केसही…!!

माठाने रंगलेल्या आईचे हात नि भाकरीवर उमटणारी तिच्या सोन्याच्या बांगड्यांची नक्षी आम्हा भावंडांना प्रत्येक वेळी हसवायची… यावेळी मात्र त्यांनी आम्हा दोघी़ंना रडवलं!!

दिवस कसे पळत होते ते कळलच नाही…

एके दिवशी डोक्यावर अक्षता पडल्या नि सासरचा मार्ग धरला… माहेर मागे पडलं.. नव्या आयुष्यात जुन्या गोष्टी दिसेनाशा झाल्या… सासरी रोज स्वयंपाक करायचे पण सोलापुरात ” तांबडा माठ ” मिळत नाही ही गोष्ट लक्षातही आली नाही… प्राधान्यक्रम बदलले होते..

मिरजेला माहेरी गेल्यावर आई विचारायची, ” उद्या लाल माठाची भाजी करू कां गं? “

पण त्या तारुण्याच्या बहरात आईनं केलेल्या लाल माठाच्या भाजीपेक्षा हॉटेलातील लाल रंग घातलेल्या बटर पनीर मसाल्याकडे जीव ओढला जायचा… अशावेळी त्या माऊलीचं अंत:करण नक्कीच दुखावत असणार.. पण तिने ते चेह-यावर कधीच दाखवलं नाही!

काळ पुढे जातच होता… त्याने आईच्या स्वय़ंपाक करणा-या हातांचा वेग कमी केला… आता आई फक्त भाजी निवडण्याचं काम करू शकायची…

… आणि एके दिवशी काळाने तिला पुर्णपणेच थांबवलं… नि तिला अनंताच्या प्रवासाला तो घेऊन गेला…!!

मानवी मन मात्रं अनाकलनीय असतं..

त्याचे हिशोब, त्याचं वर्तन सारं गूढ प्रदेशातलं…!!

आई गेल्यानंतर तिच्या आठवणींनी पिंगा घालायला सुरूवात केली.. ती असताना जी लाल माठाची भाजी मनाच्या पडद्याआड गेली होती… तिची रोज आठवण येऊ लागली…

… म्हणूनच वहिनीकडे फक्त लाल माठाची मागणी केली… वहिनीने आणलेला लाल माठ पाहून जीव सुखाच्या गावातून फिरून आला…

भाऊ वहिनी दुसरे दिवशी सकाळीच परत गेले… त्याच दिवशी लाल माठाची भाजी नि भाकरीचा बेत आखला… स्वयंपाकाच्या मावशींनी मी सांगितल्याप्रमाणे भाजी नि भाकरी केल्या… भाजी चांगलीच लागत होती… भाकरी तर आईच्या भाकरींपेक्षा पातळ होत्या..

 

– – पण… भाजी-भाकरी घशात अडकत होती… कारण लेकराला आनंदाने जेवताना पहाणारी माझ्या माऊलीची ती स्निग्ध नजर आज नव्हती… लाल माठाच्या भाजीमुळे लाल लाल झालेले आईचे गोरेपान हात नव्हते… नि ते पाहून वेड्यासारखं हसत सुटणारी माझी बहीण माझ्यासोबत नव्हती..

… आणि मुख्य म्हणजे पांढ-याशुभ्र भाकरीवर आईच्या सोन्याच्या बांगड्यांची नक्षी उमटलेली नव्हती!

– समाप्त –

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares