मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कस्तुरी… – भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  जीवनरंग ?

☆ कस्तुरी… – भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(आई क्षणभर भयकंपित झाली अन् तिने हवेतच देवाला हात जोडले. ” स्वामी माझ्या कस्तुरीचं रक्षण कर.”) इथून पुढे – – 

पण कस्तुरी उमलत होती. फुलत होती. शाळेतही ती शिक्षकांची खूप आवडती झाली होती. तिची शैक्षणिक प्रगती विलक्षण होती. पण परीक्षेत तिला वेळेत पेपर पुरा करता यायचा नाही हा मात्र समजून घेण्याचा भाग होता. मात्र तिला आता मित्र -मैत्रिणी ही मिळू लागल्या होत्या.

 एका स्नेहसंमेलनात तिने तिची एक कविता सादर केली.

*

चांदणझूल पांघरते 

राउळाच्या कळसावरती

 गाभारीचा तम सारतो 

पेटलेल्या सांजवाती 

*

तिच्या आवाजात थरथर, काहीसा घोगरेपणा होता पण अंतरीच्या गाभ्यातून सुंदर शब्दांची झालेली उधळण लोकांना स्तब्ध करून गेली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि त्या दिवसापासून कस्तुरीला एक सूर गवसला जगण्यासाठीचा. तिच्या अंतरीच्या गाभ्यातला सुगंध नकळत तिलाच गंधित करून गेला.

तिला जन्मतःच प्राप्त झालेल्या शारीरिक असंतुलनामुळे तिला पूर्णपणे सर्वसाधारण जीवन जगता येत नव्हते. कधीकधी ती संवादातही कमी पडायची. कधी तिला भोवताली घडणाऱ्या अनेक घटनांचा अर्थ लावता यायचा नाही पण घटनेतली कुरूपता, विकृती कुठेतरी आतल्या मनात तिला जाणवायची आणि तिच्या चिडण्यातून, रागवण्यातून, कधीकधी तर अनावर झालेल्या क्रोधातून ते प्रत्यक्षपणे व्यक्त व्हायचं. अशा प्रत्येक क्षणी तिची आई मात्र तिच्याजवळ कायम असायची पण कधीकधी हेच क्षण तिच्या मनात कविता फुलवायचे आणि त्यात ती झपाटल्यासारखी मग्न व्हायची.

दुर्दैवाने, ईश्वराने तिच्यावर आघात करणं सोडलं नाही. आत्ता कुठे तिला जीवन जगणं जाणवू लागलं होतं. काहीतरी गवसलं होतं. खूप काही नसण्यामधलं असणं सापडत होतं. तोच एका दुर्दैवी अपघातात तिच्या आई-वडिलांचं – दोघांचही प्राणोत्क्रमण झालं. अवाढव्य जगात ती केवळ एकटी. अनेक अभावांचं आयुष्य घेऊन अंधार डोहात उभी. जंगलात हरवलेल्या हरिणी सारखीच तिची अवस्था झाली.

तिच्या आई-वडिलांशी संबंधित असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेने तिला नंतर मिशनरी सेवा केंद्रात दाखल केले. आई-वडिलांच्या मागे त्यांच्या मालमत्तेची ती एकमेव वारस होती. त्या संपत्तीचा तिच्या विकासासाठी ट्रस्ट केला गेला. बाकी तिचे सारे भवितव्य एका अज्ञात शक्तीवरच सोपवले गेले.

कितीतरी दिवस ती इथल्या इमारतींच्या भींतीकडे, छताकडे निस्तेज नजरेने पहात राहायची. मी कोण? मी इथे का? असे प्रश्न तिला पडायचे. बालपणी कार्टून फिल्ममध्ये पाहिलेली “पळणारी हरिणी” तिला स्वप्नात दिसायची. ती भयभीत व्हायची, किंचाळून जागी व्हायची, रडायची.

सिस्टर मोना तिची काळजीवाहू..  एक केअरटेकर होती. तिने मात्र तिला आईसारखे प्रेम दिले. ती शांत झाल्यावर सिस्टर मोना तिला म्हणायची, “तुझं नाव कस्तुरी आहे ना? तुला माहीत आहे कस्तुरी म्हणजे काय? एक विशिष्ट जातीचे, वेगळेच आणि विरळा हरीण असते. कुठेतरी हिमालयात क्वचित कुणाला बघायला मिळत असेल. त्याच्या पोटाखाली असलेल्या नाभीत चिकट द्रव्यरूप स्वरूपात सुगंधी काहीतरी पाझरत असते. त्या सुगंधी द्रव्यास कस्तुरी म्हणतात. त्या हरणाला सुद्धा ते माहीत नसतं. तोही त्या वासामुळे बेचैन होऊन हा गंध कुठून येतो हे शोधण्यासाठी इकडे तिकडे पळत असतो पण त्याला कळतच नाही की सुगंध त्याच्यापाशीच आहे. तशीच तू आहेस कस्तुरी! तुझे आहे तुझ्यापाशीच. ”

हळूहळू कस्तुरीची ऊर्जा प्रेरित होत होती. केंद्रात अनेक लहान थोर माणसं होती. अपंग, अनाथ, मनोरुग्ण! मतिमंद अॅबनॉर्मल. जीवनातल्या एका भयाण कुरूपतेला ती न्याहळत होती. पाहता पाहता तिच्यातल्या अबोल अदृश्य जाणिवा उजळत होत्या. ती त्यांच्यातलीच एक होती पण तिच्यात एक गंधकोष होता. सुगंधित. तो गंधस्पर्श तिला जाणवत होता. एक शक्ती होती तिची.

केंद्रातल्या अनेक माणसांच्यातले स्थित अंश तिच्यात वाहणाऱ्या प्रवाहाशी जुळायचे त्यामुळे ती त्या सर्वांशीच एक सुंदर नाते प्रस्थापित करू शकली. जणू काही ते तिचं राज्य होतं आणि त्या राज्याची ती राणी होती. कोणी रडलं, कोणी हसलं..  सगळ्यांच्या भावभावनात ती सहजपणे सामील व्हायची. पटकन डोळ्यातून ओघळणारे कोणाचे अश्रू पुसून त्याला अशाच मजेशीर कवितांतून हसवायची.

वारा वारा गरा गरा सो सो सुम

ढोल्या ढोल्या ढगात ढूम ढूम ढूम 

सगळेच हसायचे. टाळ्या वाजवायचे आणि समोर असलेल्या फाटक्या जीवनाला झोळीत घालून जगण्याचा सोहळा करायचे. लहान थोरांसाठी कस्तुरी म्हणजे खरोखरच त्या केंद्रातला एक आनंदाचा झराच बनला. खरं म्हणजे इथूनच तिच्या प्रतिभेला अनंत धुमारे फुटले. तिच्या लेखणीतून तिचं हास्य, कारुण्य, अश्रू, एकाकीपणा, मनातली स्पंदनं, घुसमट शब्दांमधून वाहू लागली. तिच्या कवितांचं जगच निराळं होतं. अंतर्मनाचा ठाव घेणारं होतं. तिच्या कवितांना सहजच प्रसिद्धी मिळू लागली. “कवयित्री कस्तुरी” म्हणून तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. तिने तिच्या असाध्य नैसर्गिक अभावांवर जणू काही मात केली. जगण्यातला क्षण नि क्षण आनंदात बुडवून टाकला.

एक दिवस तिच्या “लावण्यागंधा” या कवितासंग्रहाला राष्ट्रीय वाङमय परिषदेचा मोठा पुरस्कार जाहीर झाला. रोख दहा लाख, शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र. या तिच्या यशोदीप सोहळ्यात मिशनरी सेवा केंद्रातील सर्वच उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हातून पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा ती व्यासपीठावर आली तेव्हा टाळ्यांचा गजर झाला. कवितेतून दिसणारी कस्तुरी आज तिच्या शारीरिक अपंगत्वात पाहताना इतर जनसागर थक्क झाला. तिच्या स्वरयंत्रातून अनियमितपणे ओघळणारे ते शब्दांचे लावण्य ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले.

ती म्हणाली, ” मी लहान असताना आई मला कस्तुरीमृगाची गोष्ट सांगायची आणि नंतर म्हणायची प्रत्येक माणूस व्यक्ती या कस्तुरीमृगासारखीच असते. प्रत्येकापाशी एक निसर्गदत्त सुगंध असतो फक्त तो जाणून घ्यावा लागतो. समाजाने मला समजून घेतले. मी समाजाची ऋणी आहे. मला मिळालेली पुरस्काराची रक्कम मी आमच्या केंद्राला देते जेणेकरून माझ्यासारख्या अनेकांना घडवण्यासाठी त्यांना बळ मिळावं. सगळ्यांना प्रणाम! धन्यवाद! ”

प्रेक्षागृहात कमालीची शांतता होती. नंतर निवेदिकेनेच तिला संबोधित करत म्हटलं, “कस्तुरी आज तू तुझ्या नावाला सार्थ केलंस. तू स्वतःच लावण्यगंधा आहेस आणि तुझ्या अंतरातल्या या सुवासाने आम्हा सर्वांनाच सुवासिक केलेस! देव तुला उदंड आयुष्य देवो! तुझा गंध स्त्रोत सदैव असाच दरवळत राहो! ” 

– समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कस्तुरी… – भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  जीवनरंग ?

☆ कस्तुरी… – भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

जेव्हा ती जन्माला आली तेव्हा खरं म्हणजे तिचं जन्माक्षर हे काहीतरी वेगळंच होतं. क हे नव्हतंच पण तरीही तिच्या आईने तिचे नाव “कस्तुरी”च ठेवले. देवानं मला हिच्या रूपात एक  कस्तुरीमृगच भेट दिलाय. स्वतःशीच एक सुगंध बाळगणारा! माझंही  बाळ असंच आहे. ही माझी “कस्तुरीच” आहे.” तिच्या या बोलण्याने आजूबाजूच्या लोकांना म्हणजेच तिच्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना नेमके काय वाटले असेल कोण जाणे पण पाळण्यात झोपलेले एक गोंडस, गुलाबी, गोरंपान बाळ पाहून कुठेतरी सारेच हळहळले असावेत हे नक्कीच. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकाच अर्थाची भावाक्षरे होती. “कसं होणार हिचं? भविष्यात हिच्यासाठी कुणास ठाऊक  काय काय वाढून ठेवलं असेल ?”

कस्तुरी ही जन्मापासूनच “सेरेब्रल पाल्सी”(CP) नावाच्या न्यूरोलॉजिकल असंतुलनाची शिकार होती.  वेळेच्या आधी तिचा जन्म होताना किंवा गर्भातच मेंदूला पुरेसा प्राणवायू न मिळाल्यामुळे ती अशा अवस्थेत जन्माला आली. तिच्या जन्मानंतर दहा-बारा दिवसांनीच डॉक्टरांनी “सेरीब्रल पाल्सी” हे तिच्या बाबतीतलं निदान तिच्या आई-बाबांना सांगितलं. त्यानंतर ते असंही म्हणाले,” याचे परिणाम कितपत गंभीर असतील हे आत्ताच सांगता येणार नाही. जसजशी ती मोठी होईल तसतसे ते आपल्याला कळत जाईल पण घाबरू नका, धीर कायम ठेवा. तुमचीच कसोटी आहे ही पण तरीही सकारात्मक रहा. ही व्याधी बरी होणारी नसली तरी, मूळात ही व्याधी नाही हा सीन्ड्रोम, एक प्रकारची मेंदूशी संबधित अनियमितता आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे तिचं जीवन तुम्ही नक्कीच वेगळ्या प्रकारे उमलवू शकता. कधी कधी अशाही मुलांमध्ये अदृश्य रुपात काही दैविक क्षमताही असू शकतात. तुम्हाला फक्त त्या केंद्रित कराव्या लागतील.”

खरं म्हणजे ही परीक्षा  कस्तुरीच्या मात्या-पित्यांचीच होती. असाध्यतेतून साध्याकडचा किंवा विकृतीतून  शाश्वताकडे जाण्याचा हा एक खोल अंधारातला प्रवासच होता त्यांच्यासाठी.

कस्तुरी वाढत होती. बाल्यावस्थेतले अनेक विकासाचे टप्पे ती गाठू शकत नव्हती. अजून ती उभी राहू शकत नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, “स्नायूंवरचं मेंदूचं नियंत्रण कमी पडत असल्यामुळे असं होऊ शकतं. आपण वाट पाहूया.”

एक दिवस खिडकीत गजाला धरून कस्तुरीच्या आईने तिला आधार देऊन उभे केले. खिडकीतून दिसणारं सुंदर काळसर निळं आभाळ आणि शुभ्र पूर्ण चंद्र पाहताच कस्तुरीच्या तोंडून एक भावपूर्ण आनंदमिश्रित नवलाचा उद्गार उमटला. अचानक ती खिडकीतच नाचण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या आईला हा एक सकारात्मक संकेतच वाटला जणू! एक आशावाद प्रबळ झाला.

तेव्हापासून आई कस्तुरीला कडेवर घेऊन कधी बागेत, कधी एखाद्या तलावाच्या काठी तर कधी छोट्याशा टेकडीवर घेऊन जाऊ लागली. झाडावरची उमललेली फुलं, पाण्यात पोहणारी बदकं, उंच टेकडीवरून दिसणारी हिरवळ पाहून कस्तुरी मनापासून आनंदायची. आईच्या  कडेवरून मग ती हळूच उतरायचा प्रयत्न करायची आणि जागच्या जागीच हातापायांची चमत्कारिक पण आशावादी हालचाल करायची. त्यावेळीच ती बोलण्याचाही प्रयत्न करायची. तिला फुलं, पाणी, हिरवळीवर.. खूप काहीतरी छान बोलायचं आहे हे तिच्या डोळ्यातून, नजरेतून जाणवायचं. अशा बोलक्या क्षणी प्रत्येक वेळी आईला हेच वाटायचं “हा माझा कस्तुरीमृग आहे एक सुगंध घेऊनच ती जन्माला आली आहे. हा सुगंधच मला जपायचाय.”

एक दिवस डॉक्टर म्हणाले,” सुदैवाने कस्तुरीला बौद्धिक अपंगत्व आलेलं नाही. ती शाळेत जाऊ शकते,अभ्यास करू शकते, वाचन लेखन ती नक्कीच करू शकेल.”

काही थेरेपीज्..उपचारपद्धती आई-बाबांनी डॉक्टरांच्या सांगण्यावरून तिच्यासाठी आयोजिल्या. एक दोन शस्त्रक्रियाद्वारेही  तिच्या स्नायूंवरचं नियंत्रणही बऱ्याच प्रमाणात साधलं गेलं. शिवाय एका शस्त्रक्रियेत तिच्या मेंदूत “ब्रेन स्टिम्युलेटिंग डिव्हाईस” बसवलं त्यामुळे तिच्या अविकसित शारीरिक हालचाली सुधारू लागल्या. आता ती कुणाचाही हात न धरता उभी राहू शकत होती, चालू शकत होती. तिच्या तोंडातून उमटणाऱ्या अस्पष्ट उद्गारांनाही आता थोडा थोडा शाब्दिक आकार येऊ लागला होता. सुरुवातीला काही साधारण विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळेतल्या व्यवस्थापनाने तिच्यासाठी प्रवेश नाकारला. “तिला दिव्यांगासाठी असलेल्या शाळेत जाऊ द्यावे” असा अनाहूत सल्लाही दिला गेला पण आई-बाबा ठाम होते. अखेर कस्तुरीला एका मिशनरी शाळेत प्रवेश मिळाला.

तसं पाहिलं तर तिचं शारीरिक वय वर्गातल्या इतर मुलांपेक्षा जास्त होतं.तिचं दिसणं,हालचाली साधारण नव्हत्या.  वर्गातली मुलं तिच्याशी मैत्री करतील का? तिला स्वीकारतील का की तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन तिची अवस्था अधिकच कठीण होईल?  हे भय मनात होतं पण तरीही मनात एक अदृश्य स्वरूपातला कस्तुरीमृग आई-बाबांनी जपून ठेवला होता कस्तुरीचं व्यक्तिमत्व खुलेल आणि तिच्यापाशी असलेला  सुवर्ण चाफ्याचा दरवळ इतरांनाही आनंदवेल, प्रसन्न करेल याची कुठेतरी खात्री त्यांना वाटत होती.

सुरुवातीला शाळेत जरी कुणी तिच्याशी वाईट वागत नसलं तरी फारसं कोणी तिच्याजवळ जाऊन मैत्री ही करत नव्हते त्यामुळे कस्तुरीला एकटेपणा जाणवायचा आणि तिच्यात होणाऱ्या शारीरिक संप्रेरक बदलांमुळे तिलाच आता हळूहळू जाणवायला लागलं होतं की,”ती वेगळी आहे, तिच्यात त्रुटी आहेत, अभाव आहेत, ती इतरांसारखी नॉर्मल नाही.”

पण मग ती बागेत बागडणाऱ्या फुलपाखरांना बघायची आणि मनातच गुणगुणायची.

छान किती दिसते फुलपाखरू 

या वेलीवर फुलांबरोबर 

गोड किती हसते.. फुलपाखरू.

तिलाही खुदकन हसू यायचं. डोक्यावरचं निळं अथांग आभाळ बघताना तिला वाटायचं,

“देवा तुझे किती सुंदर आकाश 

सुंदर चांदणं चंद्र हा सुंदर.”

सूर्य,चंद्र तारे तिचे सवंगडी झाले होते. निसर्गात ती रमायची.  त्या सुंदरतेमुळे तिच्यातल्या काही अदृश्य ऊर्जा जणू काही हलकेच जागृत व्हायच्या.

एकदा मात्र टीव्हीवर कार्टून फिल्म ती बघत होती. एक भेदरलेलं हरिण सर्व शक्ती एकवटून पळत होतं आणि एक पट्टेरी वाघ  तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावत होता. ते दृश्य खूप भयानक होतं. ती किंचाळू लागली.ओरडू लागली. आईने खोलीत येऊन पटकन टीव्हीच बंद केला. कस्तुरीला छातीशी लपेटून घेतलं. शांत केलं. त्या क्षणी काही निर्णय घेण्यापूर्वी आईला हे कळत नव्हतं की,” कस्तुरीला सौंदर्यासोबत कुरूपतेचंही दर्शन घडवायला हवं की नको? याशिवाय तिच्या व्यक्तिमत्त्वात परिपूर्णता कशी येईल?शिवाय खरंच कधी भविष्यात तिच्यावरच असा प्रसंग गुदरला तर?”आई क्षणभर भयकंपित झाली अन् तिने हवेतच देवाला हात जोडले.” स्वामी माझ्या कस्तुरीचं रक्षण कर.” 

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुधारस… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  जीवनरंग ?

☆ सुधारस… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

“आई, कोण आलंय बघ गं” समीरचं बोलणं ऐकून शैलानं बाहेरच्या खोलीत येऊन दरवाज्याकडं पाहिलं.तिचा मोठा भाऊ दारात महेश उभा होता.जवळपास दहा बारा वर्षांनी ती त्याला पहात होती.

“आत या  म्हण पाहुण्यांना” असं समीरला  म्हणून ती आत गेली.

“हे पाणी दे  पाहुण्यांना.

आणि पाया पड त्यांच्या.तुझे ते मोठे मामा आहेत”.

समीरनं पाण्याचा ग्लास आणून महेशच्या  हातात दिला आणि त्याच्या  पायावर डोकं ठेवण्यासाठी तो वाकला.त्याला  आपल्या हातांनी उठवून  महेश म्हणाला,

“बाळा,आईला म्हणावं लवकर ओवाळून घे.आणि लगेच जेवायला वाढ.मामाला भूक लागलीय”.

समीर आत येताच शैलानं त्याला  दुकानातून  नारळ आणि करगोटा आणायला पाठवलं आणि ती ओवाळण्याचं  ताट भरभर करू लागली.ते करताना तिच्या डोळ्यापुढून सारा इतिहास सरकून गेला. 

शैला आईवडिलांची धाकटा  लेक.महेश  थोरला मुलगा. काॅलेजात जाणारी 

शैला  अभ्यासाबरोबरच अनेक  अ‍ॅक्टिव्हीजमध्ये सतत सक्रीय होती. एन्.एस्. एस्., वादविवाद  स्पर्धा,खेळ, महिलांवर होणारे अन्याय, कुठे होणारे भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन असो, ती सतत आघाडीवर असे.

काॅलेजातल्या  अन्वर नावाच्या  मुलाशी  तिची ओळख झाली.तोही तिच्याबरोबर अनेक सामाजिक कार्यात भाग घेत होता.ओळखीचं पर्यावसान प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.पण शैलाचा हा निर्णय तिच्या आईवडलांना आवडला नाही.’लग्न हे केवळ दोन व्यक्तिंचे मिलन नसते तर दोन कुटुंबांचेही  संबंध  त्यातून जोडले जातात आणि लग्न करताना, दोघांनी केवळ भावनिक  न होता, आपला कुटुंबाचा आर्थिक पाया भक्कम आहे ना? हे पाहूनच निर्णय घ्यावा’ असं त्यांना वाटत  होतं.

 ‘वो  लडकी आपनी बिरादारीकी  नही ‘ या मुद्द्यावर अन्वरच्या  घरच्यांनीही या लग्नाला विरोध केला होता.अखेर घरच्यांचा विरोध डावलून दोघांनी लग्न करायचं ठरवलं.रजिस्टर पध्दतीनं त्यांनी लग्न केलं.मात्र यामुळे दोघांनाही आपापल्या घरांतून बाहेर पडावं लागलं होतं. उदरनिर्वाहासाठी अन्वरनं, ओळखीनं 

जिल्ह्य़ाच्या ठिकाणी जाऊन  एका सहकारी पतपेढीत नोकरी मिळवली. अनेक अडचणींतून त्यांचा संसार सुरू झाला.त्यांना एक मुलगा झाला – समीर .

समीर चार वर्षाचा झाला आणि एक दिवस  घरी येताना,अन्वर रेल्वेचा रूळ ओलांडताना रेल्वेखाली चिरडला गेला.

शैलाचं आभाळच फाटलं.मात्र लवकरच ती त्या धक्क्यातून सावरली. एका एन्. जी.ओ.त तिनं नोकरी पत्करली आणि समीरला मोठं करणं हेच  आयुष्याचं ध्येय ठेवून ती जगत राहिली;

परिस्थितीतीशी झगडत राहिली.जवळच्याच शाळेत तिनं समीरला टाकलं.मात्र कितीही अडचणी आल्या तरी माहेर किंवा अन्वरच्या  घरच्यांकडून तिनं काहीच अपेक्षा ठेवली नाही.असेच दिवस लोटले गेले आणि एका दिवाळीत तिचा भाऊ महेश तिच्या घरी आला होता.

दरवाजा उघडला. दुकानातून  समीर आला .

“हे घे बाळा खाऊ” असं  म्हणून महेशनं समीरच्या समोर एक बाॅक्स धरला.”मम्मी…” आईकडं  समीरनं  प्रश्नार्थक दृष्टीनं पाहिलं.

“आईसारखाच मानी दिसतोय”. महेश. 

” घे समीर ,मामानं तुझ्यासाठी काय आणलंय बघ”

“मला खाऊ नको”.

“मग काय पाहिजे?”

“पुस्तक”.

“ठीक आहे बाबा…

आधी हे तर घे. मी ऑनलाईन काॅमिक आत्ताच मागवतो…” असं म्हणून महेशनं नेटवरून  एक   काॅमिक  शोधून, त्याची एका 

वर्षाची वर्गणी मोबाईलवरून पाठवली. 

तोवर शैलानं ओवाळणीची तयारी केली.

लग्नानंतर ती पहिल्यांदाच महेशला ओवाळत होती.तिला आठवलं,लग्नाआधी भाऊबीजेला महेशला ओवाळून झाल्यावर ती हक्कानं तिला हवं ते गिफ्ट मागवून घेत असे.यावेळी मात्र तिनं तसं केलं नाही.महेशनं तिच्या ओवाळणीच्या  ताटात एक बंद पाकीट टाकलं. हळूच ते घेऊन शैलानं ते किचनवर ठेवून दिलं.

” गिफ्ट काय आहे हे उघडून  पण पहाणार नाही का शैला?”

हसत शैलानं ते उघडलं.पाकीटात 

एक  जुनी किल्ली होती.

“हे काय?”

“आपल्या कापडाच्या दुकानाची किल्ली आहे”

“म्हणजे ?”

“अगं,म्हणजे  सगळं सोडून तू आपल्या घरी यायचं.कापडाचं दुकान आता तू चालवायचं?”

“आणि तू काय करणार?”

“गावातच दुसरं दुकान मी विकत घेतलंय.ते मी पाहीन”.

“कशासाठी हे दादा? आणि इतक्या दुरून मी हे कसं पहाणार? आणि आता समीरची शाळाही सुरू आहे.”

“तुम्ही दोघांनीही तिकडंच रहायला यायचं.आपल्या बंगल्यातल्या तीन खोल्यात  तुम्ही रहायचं.

तो बंगला तुझ्याच आईवडलांचा आहे ना.”

“अरे, तुझं आणि आईपप्पांचं ठीक आहे.पण वहिनीचं  म्हणणं जाणून  घेतलं का?”

” अगं बाई, तिनंच मला इकडं पाठवलं.सकाळी काही नाष्टापण करून दिला नाही  तिनं. बहिणीकडं जा जेवायला म्हणाली ती.थांब. तिच्याशीच बोल”.असं म्हणून त्यानं मोबाईल काढला.शैलानं तो परत त्याच्याकडं देत म्हणाली, “आधी मामा भाचे जेवून घ्या. मग बोलू”.

जेवण झाल्यावर  महेशच्या बायकोबरोबर ती व्हिडिओवरून बोलली,

“काय वन्सं,आज काय जेवण केलं तुमच्या भावासाठी?”

” फराळाचं होतंच.आणि 

 दादाच्या आवडीचा सुधारस  केला होता वहिनी.”.

”  वन्सं, येता कधी मग इकडं दुकान  संभाळायला?”

” समीरच्या शाळेचा दाखला मिळाला की येऊ “.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- sks.satish@gmail.com

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “नाईलाज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “नाईलाज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादात होता की नाही ठाऊक नाही, पण त्यावेळी तिच्या मनात आठवांची बरसात मात्र अखंडित होत असावी… संततधार!

शरीरात चैतन्य पेरीत वाहणारं रक्तच जेव्हा मृत्यूच्या मागे खळाळत धावू लागतं ना… महापुरात एखाद्या दुथडीभरून वाहणाऱ्या नदीसारखं.. तेंव्हा जगणं खूप मागं पडत जातं आणि क्षणार्धात दृष्टीआड होऊन जातं.

तिचं असंच झालं असावं. वैद्यकशास्त्र त्याचा निवाडा देऊन नामानिराळं झालं होतं. बापानं तिला आवडतात त्या गोष्टी तिला घेऊन देण्याचा सपाटा लावला… तेंव्हाच तिलाही कळून चुकलं… आयुष्याच्या शाळा सुटण्याची घंटा कोणत्याही क्षणी घणघणू लागेल!

पण तिला ही शाळा सुटू नये असंच वाटत राहिलं.

मूल शाळेत पहिलं पाऊल ठेवतं ना तेंव्हा त्याचा पुन्हा एकदा जन्म झालेला असतो. नऊ महिने नऊ दिवस आईच्या गर्भगृहात नांदलेला जीव जगाच्या झगमगत्या प्रकाशात बुजून जातो.. आणि म्हणूनच रडू लागतो. शाळेत असंच रडू येतं पोरांना!

तिलाही शाळेतले तिचे पहिले पाऊल आठवत असेल बहुदा. हळुवार पडलेली पावलं पुढे कधी धावायला लागली हे तिला समजलेही नसेल.

शाळा हे दुसरे जग. या जगातले सर्वजण आयुष्याचा एक अवयव बनून राहतात. घरातल्या छोट्याशा कुटुंबातून मूल मोठ्या आणि विविधरंगी कुटुंबात येतं. सुरुवातीला तर घरात आई आणि शाळेत बाई असा भावनिक पदर लागत राहतो मनाच्या देहाला.

 घरातलं शाळेत सांगितलं जाईलच असं नसतं… पण शाळेतलं मात्र घरात हमखास सांगितलं जातं.

वर्गातील मैत्र मनीचे गुज सांगण्याइतकं घट्ट होत जातं आणि मग आधी हवीशी वाटणारी सुट्टी थोड्याच दिवसांत नकोशी वाटू लागते.

एखाद्या स्पर्धेत मिळालेला एखादा क्रमांक आणि त्यावर वर्गात झालेला टाळ्यांचा गजर कित्येक दिवस कानांत गुंजत राहतो.

मुले शिक्षकांच्या व्यक्तिमत्वात खूप काही शोधत असतात. काहींनी आई गवसते तर काहींना वडील. आणि काहींना मित्रही दिसतात शिक्षकांत. सहली आणि त्यातून राहत्या सहली दीर्घकाळाची शिदोरी बनून जातात… पुढे आपल्याही मुलांना सहलीला सोडवायला गेल्यावर सहलीच्या बस बघून आपणही काळाच्या मागे जातो!

मुलांनी शिक्षकांचे द्वितीय नामकरण केलेले असते तर शिक्षकांनीही मुलांचे दुसरे बारसे घातलेले असते कित्येकदा.

मध्येच शाळा सोडून इतर गावांत शाळेत जावे लागणाऱ्या मुलांची अवस्था केविलवाणी होत असते. नव्या मातीत रुजायला वेळ लागतोच.

दहावीच्या वर्गाचा, निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा, शिपाई काकांचा निरोप समारंभ इतर मुलांना आपणही असेच इथून बाहेर पडणार याची हलकीशी जाणीव करून देणारे ठरतात.

तिला मात्र शाळेचाच नव्हे तर या जगाचा असा मधूनच निरोप घ्यावा लागला. असाध्य व्याधी तिला तिच्या ध्यानीमनी जडली आणि तिचा जीवनप्रवास खंडित करून गेली.

ही मानसक्का.. म्हणजे मानसी अक्का… अक्का हे तिच्या शिक्षकांनी दिलेलं लाडाचं नाव. नाशिक मधल्या एका शाळेतील विद्यार्थिनी.

तिने तिच्या शिक्षकांना लिहिलेल्या पत्रात तिने जमेल त्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न केला जाता जाता… ती शाळेत आणि या जगात असतोवर एखादी सहल झाली असती तर बरे झाले असते, असेही ती म्हणते.

तिच्या अक्षरातील नाविलाज अर्थात नाईलाज शब्द काळजाचा ठाव घेणारा ठरला आहे.

पालक, शिक्षक आणि एकूणच सर्वांनी एकमेकांना जितेपणी किती जीव लावणे गरजेचे आहे, हेच यातून अधोरेखित होते, नाही का? कारण आयुष्याच्या शांत भासणाऱ्या समुद्रात एखादी मोठी लाट अनपेक्षितपणे उसळू शकते.. आणि गलबत तळाशी जाऊ शकते!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # ८२२ ⇒ चेहरे पर चेहरा ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “चेहरे पर चेहरा।)

?अभी अभी # ८२२ ⇒ आलेख – चेहरे पर चेहरा ? श्री प्रदीप शर्मा  ?

(THE BEARD)

क्या दाढ़ी चेहरे पर एक और चेहरा नहीं। केश को महिलाओं का श्रृंगार माना गया है और दाढ़ी को मर्दों की खेती, जब चाहे उगा ली, और जब चाहे काट ली। एक समय था, वानप्रस्थ और सन्यास के वेश में दाढ़ी का भी योगदान होता था। आज भी साधु, बाबा और संन्यासियों का श्रृंगार है यह दाढ़ी।

चलती का नाम गाड़ी की तर्ज पर किशोर कुमार ने एक फिल्म बनाई थी, बढ़ती का नाम दाढ़ी ! आप अगर काटो नहीं, तो दाढ़ी और नाखून दोनों बढ़ने लगते हैं। क्या विचित्र सत्य है, हमारे शरीर के नाखून और बाल, शरीर का हिस्सा होते हुए भी, इनमें खून नहीं है। इन्हें काटो, तो दर्द नहीं होता।

कैसी अहिंसक पहेली है यह ;

बीसों का सर काट लिया।

ना मारा ना खून किया।।

हमारे दिव्य अवतार राम, कृष्ण, बुद्ध और महावीर के मुखमंडल की आभा देखते ही बनती है। स्वामी विवेकानंद के चेहरे का ओज देखिए। कलयुग के फिल्मी सितारों को ही देख लीजिए, देव, राज और दिलीप। धरम, राजेश खन्ना, जीतू और गोविंदा ही नहीं एंग्री यंग मैन अमिताभ भी ! बेचारे अमिताभ को तो स्क्रीन टेस्ट में भी बड़ी परेशानी आई थी। भला हो सात हिंदुस्तानी आनंद, नमकहराम, मिली और शोले और दीवार जैसी फिल्मों का, जिसने अमिताभ को सदी का महानायक बना दिया और हमारे बिग बी ने एक चेहरे पर एक और चेहरा चढ़ा लिया।

कितनी पते की बात कह गए हैं हसरत जयपुरी साहब फिल्म असली नकली में ;

लाख छुपाओ छुप ना सकेगा

राज दिल का गहरा।

दिल की बात बता देगा

असली नकली चेहरा।।

साहिर ने अपने चेचक के दाग वाले चेहरे को कभी दाढ़ी में नहीं छुपाया लेकिन एक चेहरे पे कई चेहरे लगा लेने वालों की अच्छी खबर ली। गुलजार तो कह गए हैं, मेरी आवाज ही पहचान है, और आज इधर जहां देखो वहां, दाढ़ी ही मेरी पहचान है।।

एक समय था, जब मर्द की पहचान मूंछों से होती थी।

लिपटन टाइगर वाला मुछंदर याद है न? लिपटन माने अच्छी चाय। मूंछ पर ताव देना और शर्त हारने पर मूंछ मुंडवा देने की कसम खाना आम था। मूंछ तो हमने भी बढ़ाई थी, लेकिन जब दाढ़ी भी बढ़ने लगी तो पिताजी ने डांट पिला दी, यह क्या देवदास बने फिर रहे हो, जाओ दाढ़ी बनाकर आओ। पिताजी के सामने कभी हमारा मुंह नहीं खुला, मन मसोसकर रह गए। लेकिन मन ही मन बड़बड़ाते रहे, पिताजी क्या जानें, बिना दाढ़ी के कोई येसुदास नहीं बनता।

कभी दाढ़ी फैशन थी, आज तो दाढ़ी का ही प्रचलन है।

कबीर बेदी की दाढ़ी बड़ी स्टाइलिश थी। क्या जोड़ी थी कच्चे धागे में विनोद खन्ना और कबीर बेदी की। बेचारे संत महात्मा तो दाढ़ी बढ़ाकर भूल जाते हैं, लेकिन जो लोग शौकिया दाढ़ी रखते हैं, उन्हें तो दाढ़ी का बच्चों जैसा खयाल रखना पड़ता है। ब्यूटी पार्लर से महंगे होते जा रहे हैं आजकल मैन्स पॉर्लर।

वैसे हमें क्या, बंदर क्या जाने अदरक का स्वाद।।

बिग भी, हमारे नरेंद्र मोदी और विराट कोहली तीन टॉप के दाढ़ी वाले हैं आज के इस युग के। विराट की स्टाइल की कॉपी ने तो पुराने फैशन के सभी रेकॉर्ड तोड़ दिए हैं। सोलह बरस की बाली उमर से ही आज के युवा में विराट की छवि नजर आने लगती है।

आज के युवा अभिनेता हों या क्रिकेट प्लेयर, कॉलेज का छात्र हो या प्रोफेसर, टॉप एक्जीक्यूटिव और मोटिवेशनल स्पीकर, सभी जगह दाढ़ी वाले ही नज़र आएंगे आजकल।

आज अगर बिग बी और मोदी जी आपके सामने बिना दाढ़ी के प्रकट हो जाएं, तो वे कैसे लगेंगे ? हो सकता हैं, वे अपने आपको ही नहीं पहचान पाएं। अगर गांधी और नेहरू भी दाढ़ी भी रखते, तो कैसे नज़र आते। कई दार्शनिक और वैज्ञानिक तो इतने व्यस्त रहते थे, कि उन्हें दाढ़ी बनाने की फुर्सत ही नहीं होती थी।।

वैसे मनोविज्ञान तो यही कहता है कि पुरुष भी किसी महिला के लिए ही सजता, संवरता है। जरूर आज की युवतियों की भी पहली पसंद दाढ़ी वाले युवा ही होंगे। बुढ़ापे में तो दाढ़ी इंसान के कई ऐब छुपा लेती है। किस दाढ़ी में साधु है और किस दाढ़ी में शैतान, यह तो सिर्फ भगवान ही जानता है।

कभी अभिनय के लिए नकली दाढ़ी लगाते थे, आज तो असली दाढ़ी ही अभिनय के काम आती है। जो दाढ़ी में भी सहज और सरल है, बस वही सच्चा साधु है।

होंगे हमारे अधिकांश अवतार क्लीन शेव्ड, हमारी कृत्रिम बुद्धि, यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस, तो यही कहती है कि अगला कल्कि अवतार भी हमारे आसपास कहीं किसी दाढ़ी में छुपा हुआ बैठा है, बूझो तो जानें।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्रीण…  — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ मैत्रीण…  — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(एक वाजला.. आता वासंतीताईंना सहन होईना.. अचानक त्यांना काल सुधाने त्यांच्या मोबाईलमध्ये भरलेला नंबर आठवला.. त्यानी कॉल लावला.. पलीकडे सुधा..) – इथून पुढे – – 

‘काय झाले वासंती?

‘सुधा.. तूझ्या मुलीला इथे ताबडतोब पाठव.. मला बाथरूमला जायचे आहे..

काय झाले असेल हे सुधाताईंनी ओळखले. त्यानी फोन खाली ठेवला आणि मुलगी प्रज्ञासह स्वतः हजर झाल्या. बेल दाबली.. मोबाईलवर गाणी ऐकणाऱ्या आशाने दार उघडले.. दोघी आत गेल्या.. सुधाताईंनी काल बेडरूम पाहिली होतीच.. त्यांनी वासंतीताईंचा हात पकडला आणि बाथरूमला घेऊन गेली. बाहेर आल्यावर त्या सुधाताई ना म्हणाल्या” सुधा.. मला इथे राहायचे नाही.. मला नेशील तुझ्याकडे?

‘हो चल ना.. म्हणूनच प्रज्ञाला सोबत आणलय.. तुझे डॉक्टर रिपोर्ट्स, औषधे, थोडे कपडे बरोबर घेऊ.. कुठे ठेवले आहेत ते दाखव. वासंतीबाईंनी जे जे दाखवले ते प्रज्ञाने एका बॅगेत भरले आणि त्यान्च्या हाताला धरून बाहेर आणले आणि गाडीत बसवून घरी घेऊन गेली.. तोंड उघडे टाकून आशा सारे बघत राहिली आणि तिने सुजाताला फोन लावला.

सुजाता आशाला म्हणाली.. ‘जाऊ दे.. जाऊन जाऊन कुठे जाईल? तिचे आहे कोण.. एक भाची वसु.. ती सांगलीला.. कोणी नेली ती संध्याकाळी आणून पोचवणार.

सुधाताईंनी हाताला धरून वासंतीताईना घरात आणलं.. खुर्चीवर बसवलं.. तोपर्यंत पटकन प्रज्ञा घरात गेली आणि गरमभात.. त्यावर तूप ओतून घेऊन आली. वासंतीताई त्या गरम भातावर तुटून पडल्या.. सकाळपासून त्या उपाशी होत्या. त्यांचे जेवण होईपर्यंत प्रज्ञाने त्यांना सुधाताईच्या खोलीत बेड घातला होता.

दोन घास खाऊन वासंतीताई शांत झाल्या.. मग प्रज्ञा त्याना तिच्या आईच्या खोलीत घेऊन गेली.

‘तू आराम कर वासंती.. संध्याकाळी बोलू.. ’ असे म्हणत सुधाताईंनी एक पुस्तक उघडले. चांगला दोन अडीच तास आराम करून वासंतीताई जाग्या झाल्या. सुधाताईंनी दोघीसाठी कॉफी करून आणली…

‘मग मघा बाहेरच्या खोलीत गाणी ऐकत बसलेली आशा की नवीन बाई? ’

‘आशाच ती.. मी सुजाताला सांगितले तिला बोलावू नकोस.. तरी सुजाता म्हणाली.. आशाच येणार, तिच्याकडूनच तुमचे काय ते करून घ्या.. ’

‘मग?

‘सकाळी नेहेमीसारखी आशा आली.. पण आज ती माझ्या खोलीत येईना.. तिने सुजाताची कामे उरकली आणि ती बाहेर गाणी ऐकत बसली.. मी तिला किती हाका मारल्या. पण ती ढिम्म.. काल रात्री मी तिला बोलले.. कामावरून काढते म्हणाले ना म्हणून.. माझा पगार घेते आणि त्या काळात नकोते धंदे हिचे.. मला असले सहन होत नाही ग सुधा.. ’

‘पण मी तुला इथे आणलं.. मग तुझा मुलगा सून काही म्हणायची नाहीत ना? ’

‘मला वाटत नाही तसं.. त्यांना आनंदच वाटेल.. म्हातारी माणसं कुणाला हवी असतात? पण आज बघू.. न्यायला येतात का? ’

‘वासंती.. मी तुला माझी मैत्रीण मानलंय.. तुला वाटेल तितके दिवस राहा.. पण तुला तुझ्या मुलाकडे जायचे असेल तेंव्हा सांग.. ’

‘खरच सुधा.. आपली कालची ओळख.. पाच मिनिटाच्या ओळखीवर तू मला मैत्रिण केलंस? ’

‘याचे क्रेडिट माझ्या नवऱ्याला मी देईन.. तो नाही आहे या जगात.. पण चेहेऱ्यावरून कसे माणूस ओळखायचे.. हे त्याने मला शिकवले. त्याने अनेक विद्यार्थ्यांना असेच घरात आणले.. त्यांना शिकवले आणि मार्गाला लावले. तुला आसरा हवा होता हे काल माझ्या लक्षात आले.. मुलगा सून आणि तुझे आजारपण या बेचकीत तू सापडली होतीस.. वाटेल तेवढे दिवस इथे राहा.. कायमची राहिलीस तरी माझी मुलगी तुझं सर्व करेल.. कारण बापाचे तिच्यावर तसे संस्कार आहेत. ’

‘तुझे कसे उपकार फेडू सुधा.. ’

‘अग उपकार कसले? उलट मी कंटाळते.. मुलगी आणि जावई कामात असतात.. माझ्याशी बोलायला कोणी नसतं.. आता तू आलीच आहेस.. आपण गप्पा तरी मारू. ’

एवढ्यात प्रज्ञा दवाखान्यातून आली. तशा सुधा आणि वासंती तयार झाल्या आणि सुधाने वासंतीचा हात पकडला आणि दोघी पार्कमध्ये फिरायला गेल्या.

वासंतीताईचा मुलगा आणि सून सुजाता घरी आली आणि त्यांनी दार उघडले. त्याना आशाने फोन करून कुणीतरी दोन बायका सासूला घेऊन गेल्याचे सांगितले होते.. पण त्यांना वाटले एव्हड्यात त्यांना आणून पोचवले असेल.. पण त्यानी वाकून बेडरूम मध्ये पाहिले.. सामसूम होती.

‘आई आलेली दिसत नाही.. ’ कपिल म्हणाला..

‘जाऊ दे.. नाहीतरी त्त्यांचे नाच बघायला कुणाला वेळ आहे? ही बाई नको… ती नको.. कुठे आहे तिथे सुखाने राहा म्हणावे.. आमच्या संसारात लुडबुड नको.. तू अजिबात फोन करू नकोस.. ती सांगून गेली का.. नाही, मग आपण चौकशी का करायची? ’

कपिल गप्प बसला.

पार्क मधून फिरून दोन मैत्रिणी घरी आल्या. प्रज्ञाने सरबत करून ठेवले होतेच. तोपर्यंत सुधाताईचा जावई प्रवीण आला. सुधाताईंनी त्याच्याशी ओळख ‘माझी मैत्रीण वासंती ‘म्हणून करून दिली. त्याने हाताने नमस्ते केले आणि तो आपल्या रूममध्ये गेला..

प्रज्ञा घरात आली तीच वासंतीताई समोर बसली. तिने त्यांना व्यवस्थित तपासले.. त्यांचे रिपोर्ट्स पाहिले… त्यांच्या डॉक्टरनी दिलेली औषधे पाहिली.. त्यांना थोडे चालवून पाहिले.. मग म्हणाली..

‘मावशी.. तुला फिजिओ करायची गरज आहे.. माझ्या ओळखीची मुलगी आहे मी तिला बोलावते.. ती मालिश करील.. व्यायाम करून घेईल. एक मावशी रोज येतात.. त्या आंघोळ घालतील.. बाकी पूर्ण दिवसभर आई आहेच आणि बाहेर मी दवाखान्यात आहे.. काही वाटलं तर ही बेल वाजवायची.. मी एक मिनिटात हजर. आमची म्हणजे माझ्या बाबांची छोटी लायब्ररी आहे.. भरपूर पुस्तके आहेत.. हवे ते पुस्तक घे आणि वाच. धार्मिक वाचायला आवडत असेल तरी पण ग्रंथ.. पुस्तके आहेत. या तुमच्या बेडरूमला लागून ग्यालरी आहे.. तिथे दोघी बसलात तर रस्त्यावरील रहदारी दिसते आणि आमची छोटी बाग पण दिसते.. तेंव्हा कसलीच काळजी करायची नाही.. एन्जॉय आणि मस्त रहा. ’

वासंतीताई तोंड उघडे ठेऊन ऐकत राहिल्या.. आपली मुले एव्हडी आपली काळजी घेऊ शकतात? त्यांना त्यांचा मुलगा कपिल आणि सून सुजाता आठवली.. आणि त्यांचे तोंड कडू झाले.

वासंतीबाईंना मुलाचा किंवा सुनेचा फोन आला नाही पण सांगलीच्या भाचीचा एक दिवस आड फोन येत राहिला. मावशी एका मैत्रिणीकडे आनंदात आहे, हे ऐकून तिला समाधान वाटले.. मध्येच घाईघाईत ती मुंबईला आली आणि मावशीला पाहून गेली.. तिची ओळख सुधाबाईशी आणि प्रज्ञा बरोबर झाली.

रोजची फिजिओ आणि व्यायाम यामुळे वासंतीताई स्वतः पाऊल टाकायला लागल्या.. हळूहळू चालू लागल्या. चांगले जेवण आणि विश्रांती यामुळे त्यान्च्या अंगात शक्ती आली. सुधा आणि त्त्यांची मैत्री घट्ट झाली होती. सुधा त्याना कथा, कविता वाचून दाखवी आणि दोघी चर्चा करत.. हळूहळू दोघी रिक्षा करून नाटकें पहायला जाऊ लागल्या.. संगीताचे कार्यक्रम ऐकू लागल्या.. हे सर्व सुख असले तरी वासंतीताईना आपला मुलगा आणि सून.. आपली साधी चौकशी पण करत नसल्याने वाईट वाटतं होत.. आणि त्यांना त्यांचा राग पण येत होता. खरे तर त्त्यांचा मुलगा सून रहात असलेली जागा त्यान्च्या नावावर होती आणि ही दोघे त्यात राहत होती. यांना चांगली अद्दल घडवायला हवी असे त्याना वाटतं होते.

एक दिवस त्या सुधाचा जावई आणि प्रज्ञाच्या नवऱ्यासमोर आल्या.

‘प्रवीण.. जर कुणी माझ्या जागेत मला भाडे न देता रहात असेल.. तर मी काय करू शकते?

‘त्याला नोटीस द्यायची.. घर खाली कर म्हणून…’

‘आणि तरी तो खाली करत नसेल तर?

‘कोर्टात जायचे.. तुम्हा जेष्ठ मंडळीसाठी वेगळे नियम आहेत.. तुमचा निर्णय शीघ्र गतीने लागणार.’

‘मग मला नोटीस काढायची आहे.. माझ्या जागेत माझ्या परवानगी शिवाय एक माणूस रहात आहे.. ’

‘कोण ग? कुणाला नोटीस काढणार तू? ’ तिथे बसलेल्या सुधाने विचारले..

‘माझ्या मुलाला नोटीस देणार मी? ’

‘काय? मुलाला नोटीस? ’

‘होय.. माझा मुलगा असला तरी काय झाले.. जो मुलगा आईच्या म्हातारपणी तिची साधी चौकशी करत नाही.. त्याने आई वडिलांच्या प्रॉपर्टी वर तरी हक्क का सांगावा? ’

‘खरे आहे वासंती.. आता आपण वृद्ध लोकांनी सजग व्हायला हवे.. अशा मुलांना धडा शिकवायलाच हवा.. पण काय होते.. आपण इमोशनल होतो… आपण मुलांना जन्म दिलेला असतो.. त्यानी काही केले तरी त्यान्च्या करणीवर आपण पांघरूण घालतो. ’

‘पण मी नाही घालणार पांघरुण.. मी माझ्या मुलाला सुनेला धडा शिकवणार.. ’

‘एव्हडी घट्ट कशी झालीस वासंती.. ’

‘तू पाठी आहेस म्हणून.. सुधा.. तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून.. ’

‘काय तो निर्णय घे. पण त्याच्याबद्दल फर्म रहा.. मुलाचा पुळका येऊ शकतो.. ’

‘नाही.. माझा निर्णय पक्का.. ’

वासंतीताईनी आपल्या मुलाला नोटीस पाठवली. ‘एक महिन्यात जागा खाली करावी’ म्हणून.

नोटीस मिळताच मुलाचा फोन आला..

वासंतीबाईंनी ‘माझी जागा खाली करा.. ती माझ्या माहेरहुन मला मिळालेली आहे.. तुझ्या बाबाकडून नाही.. ’ असे ठणकवले..

 मग मुलगा आणि सून भेटायला आले.. दोघे रडू लागली, ‘आम्ही दुसरी जागा घेऊ शकत नाही.. आमची परिस्थिती नाही म्हणून.. ’. वासंतीबाई स्थिर होत्या.. त्यानी मुलाला.. सुनेला ठणकवले..

‘जर तुम्हाला आजारी आईची देखभाल करता येत नसेल तर तिच्या प्रॉपर्टीवर हक्क का सांगता? तुम्ही जागा खाली करा.. नाहीतर ज्येष्ठाच्या कोर्टात जाऊन मी तुम्हाला बाहेर काढेन.. ’

 

चार दिवसात कपिलने जागा खाली केली.

जागेची किल्ली वासंतीताईच्या हातात आली.

‘वासंती… काय करणार या जागेत आता? ’

‘काहीही करेन.. मी राहीन काही काळ किंवा माझ्यासारख्या ज्येष्ठ लोकांना देईन किंवा माझी सांगलीची भाची वसु… तिला देईन.. तिचा मुलगा दोन वर्षात दहावी पास होईल.. त्याला मेडिकलला जायचे आहे… तो शिकेल येथे राहून.. ’

‘खरच वासंती.. मला पार्कमध्ये टॉयलेटला जाण्यासाठी आशाची वाट पहात हवालदिल झालेली वासंती आठवते आणि आज स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढणारी खंबीर वासंती.. माझ्या समोर बसली आहे.. ’

‘हे तुझ्यामुळे सुधा.. तुझ्यासारखी लाख मोलाची मैत्रीण मिळाली ना.. तिने माझ्यात आत्मविश्वास भरला.. श्रेय त्या मैत्रिणीला… आणि त्या मैत्रीला…‘ 

समाप्त

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्रीण…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ मैत्रीण…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर

वासंतीताई सैरभैर झाल्या होत्या… आत्त्ता जाऊन येते, म्हणून सांगून गेलेली आशा दिड तास उलटला तरी आली नव्हती. काळोख पसरू लागला होता आणि वासंतीताईना टॉयलेटला जायचं होत.. त्यांना मदतीशिवाय चालता येत नव्हतं.. परत परत त्यांचे लक्ष पार्कच्या गेटकडे होत… आशा येईल आणि आपल्याला टॉयलेटला नेईल म्हणूंन त्या गेटकडे पहात होत्या.. मोठा निश्वास सोडत होत्या… त्यांची ही परिस्थिती पाहून त्यान्च्याच वयाची एक स्त्री पुढे आली..

‘तुम्हाला काही हवं आहे काय?

त्या स्त्रीचा त्यांना एकदम आधार वाटला..

‘होय हो.. मला आधाराशिवाय चालता येत नाही.. माझी मदतनीस आशा..’पाच मिनिटात येते.. म्हणून गेली ती आलेलीच नाही.. मला टॉयलेटला जायचंय हो.. नाहीतर गडबड होईल..

‘चला.. मी तुम्हाला नेते..

ती स्त्री पटकन पुढे आली आणि तिने वासंतीताईचा हात पकडला आणि त्यांना ती हळूहळू टॉयलेटकडे घेऊन गेली.

दोघी टॉयलेटमधून बाहेर आल्यावर वासंतीताई म्हणाल्या..

‘सहा महिन्यापूर्वी मला प्यारालिसिसचा अटॅक आला आणि डावी बाजू लंगडी झाली.. त्यातून मी आता सावरतेय.. एक बाई ठेवली मी.. माझ्यासाठी… मला नवऱ्याची अर्धी पेन्शन मिळते ना.. मुलगा सून माझ्या घरातच राहतात.. पण ती दोघे नोकरी करतात.. सुनेचे हिडीस फिडीस चालू असतेच..पण मी माझ्या पैशातून ही बाई ठेवली.. हल्ली थोडी थोडी फिरते मी.. संध्याकाळी त्या बाई बरोबर या पार्क मध्ये थोडा वेळ येते.. जरा बदल होतो..

‘पण गेली कुठे बाई तुमची?

‘हल्ली ती अशीच करते.. मला इथे सोडते आणि जरा जाऊन येते असे सांगून नाहीशी होते.. तिचे खूप नखरे पाहिले मी.. आता तिला हाकलूनच लावणार?

‘कुठे राहता तुम्ही?

‘त्या अश्वमेघ सोसायटीत.. दोनशे एक नंबरमध्ये..

‘माझा पण बंगला त्याच भागात आहे.. चला मी सोडते तुम्हाला..

त्या स्त्रीने वासंतीबाईचा हात पकडला आणि हळूहळू त्याना पार्कबाहेर आणले.

‘तुमचे नाव?

‘मी सुधा.. सुधा नाईक.. बँकेत नोकरी करायची मी. माझे मिस्टर प्रोफेसर होते पुण्यात. मला एकच मुलगी.. डॉक्टर आहे ती. जावई वकील आहेत.. दोघे माझ्यासोबत राहतात. माझी मुलगी आमच्याच बंगल्याच्या तळमजल्यावर प्रॅक्टिस करते.जावई इथल्या कोर्टात. चला माझ्याघरी..तुम्हाला आमचे घर दाखवते.

सुधाताई वासंतीताईचा हात पकडून आपल्या घरी घेऊन आल्या.

येताना वासंतीबाईंना आशा दिसलीच.. एका झाडामागे एका पुरुषाला खेटून थट्टामस्करी जोरात सुरु होती.. वासंतीबाईचा जळफळाट झाला… तिला हाकलून लावायचेच असे त्यानी ठरविले.

सुधाताईंनी वासंतीताईचा हात पकडून आपल्या घरात आणले… बंगल्यात आत जाता जाता उजव्या बाजूला त्यान्च्या मुलीचे.. प्रज्ञाचा दवाखाना दिसत होता.. तिचे पेशंट बाकावर बसले होते..

‘या.. ताई.बसा..

त्या घरात गेल्या बरोबर का कोण जाणे पण वासंतीताईना समाधान आणि शांती वाटली.

वासंतीताई कोचवर बसताच सुधाताई किचनमध्ये गेल्या आणि दोन सरबताचे ग्लास घेऊन आल्या..

‘घ्या.. बाहेरून आल्यावर तहान लागते ना, म्हणून प्रज्ञा सरबत तयार ठेवते.

वासंतीताईंना कौतुक वाटले… नाहीतर आपल्या घरी सकाळी गारढोण झालेला चहा.. संध्याकाळी आशाच्या मनात असेल तर चहा.. नाहीतर दोन बटर..

एवढ्यात डॉ. प्रज्ञा घरात आली.. आई सोबत अजून तिच्याच वयाची बाई पाहून ती म्हणाली..

‘मी केबिन मधून पाहिले, आई तुझ्यासोबत कोण ग या बाई?

‘ ही माझी मैत्रिण ग.. वासंती..

वासंतीबाईंनी चमकून पाहिले… जेमतेम पंधरा मिनिटांपूर्वी आपली ओळख झाली आणि ही चक्क म्हणाली..’ही माझी मैत्रिण..

वासंतीताईच्या डोळ्यात पाणी आले.. नवरा गेल्यावर हल्ली बरेच दिवसात कोणी प्रेमाचे दोन शब्द कधी बोलले नाही.. आणि ही सुधा पटकन बोलून गेली.. ही माझी मैत्रिण..

वासंतीताई इतक्या भावुक झाल्या हे पाहून सुधा त्यान्च्या जवळ आली..

‘, माझे काही चुकलं काय वासंती?

‘नाही ग सुधा.. अस प्रेमाने माझ्याशी कोण बोलत नाही ग.. सगळे हिडीसफिडीस..

‘तूझ्या घरी मुलगा आणि सून आहेत ना?

‘आहेत.. पण आहेत म्हणायचे.. दोघेही नोकरी करतात.. पण मुलाचा पगार कमी, त्यामानाने सुनेचा जास्त.. म्हणून सून जातायेत सुनावत असते मला आणि नवऱ्याला.माझा मुलगा पण तिच्याच हाताने पाणी पिणारा.. आई पेक्षा सासूवर प्रेम करणारा.. जोपर्यत मी खमकी होते.. तोपर्यंत सुनेचे काही चालत नव्हते.. पण मला अटॅक आला आणि मी परावलंबी झाले, पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये होते, माझी भाची आली धावून सांगलीहून.. आपल्या छोटया मुलाला सासूकडे ठेवून.. उपकार झाले त्या वसूचे.. वसुमती.. तिनेच केले माझे. पंधरा दिवस रात्र आणि दिवस राहिली माझ्यासोबत. हॉस्पिटलचे बिल भरायला माझ्याकडे पैसे होते ग.. नवऱ्याची पेन्शन मिळते मला.. पण मायेचे कुणी हवे का नको? त्यावेळी माझ्या सुनेने चक्क मला रजा मिळतं नाही म्हणून सांगितले.. मुलगा कपिल दोन दिवस येत होता.. पण वसु आली म्हंटल्यावर तो पण येईनासा झाला.

‘मग हॉस्पिटलमधून तू घरीच गेलीस ना?

‘हो.. शेवटी माझे घर ना ते..बिल्डिंगमध्ये कामाला बाई येते.. तिच्या ओळखीने ही आशा मिळाली.

जवळजवळ सहा महिने आहे सोबत.. घटस्फोटीत आहे.. सुरुवातीला बरी होती पण सुजाताच्या नादाला लागून आता बिघडली.. गेले आठ दिवस मला पार्कमध्ये सोडते आणि नाहीशी होते…. आता आपण येताना दिसली ती.. कुणा पुरुषाला चिकटून बसली होती.. असले धंदे हिचे?

‘पण हा आशा गेली तर.. पुन्हा तुला प्रॉब्लेम नाही होणार?

‘मी मुलाला सांगते.. कुणीतरी दुसरी बाई बघ, नाहीतर तूझ्या बायकोला थोडे दिवस रजा घ्यायला सांग..बघू आईसाठी काय करतो ते..

‘बर.. वासंती.. तुझा मोबाईल दे.. त्यात माझा नंबर सेव्ह करते.. काहीही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर.. मी धावत येईन किंवा प्रज्ञाला पाठवीन..चल तुला आता तुझ्या घरी सोडते..

सुधाबाईंनी आपला फोन वासंतीबाईच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि त्यांनी हाताने त्यांना उचलले आणि हळूहळू त्यांच्या घरी पोचवले. त्यांच्या घरी लॅचने घर उघडून त्यांच्या बेडरूममध्ये त्याना बसवले आणि पुन्हा दार व्यवस्थित बंद करून त्या माघारी आल्या. 

 आशा पार्कमध्ये गेली.. तेव्हा वासंतीताई तिथे नव्हत्या. ती घाबरली आणि घरी आली.. किल्लीने दार उघडले तर बाई बेडरूमच्या खुर्चीत बसलेल्या होत्या.. त्या कडाडल्या..

‘कुठे फिरत होतीस?

‘, कुठ न्हाई..

‘मग पार्कच्या बाहेर कुणाला चिकटून उभी होतीस?

‘माजा भाव व्हता..

‘मग भावाला काय चिकटून बसायचं? मी बघितलं तुला… चालती हो.. किल्ली ठेव आणि परत मला तोंड दाखवू नकोस..

‘मला सुजाताबाय ने काम दिलाया… तेसनी बोलली तर मी जाईन.. आशाने त्याना जेवण दिले नाही आणि ती निघून गेली.

.

वासंतीबाईंना आशाचा भयंकर राग आला होता.. आपण हिला पगार देतो आणि ही उलट बोलते..’मला सुजाताताईंनी काम दिलय.. बेशरम.. मला पार्कमध्ये सोडून याराला चिकटते? पुन्हा तोंड पहाणार नाही हीच’.. मनातल्या मनात वासंतीबाई बडबडत होत्या.

लॅचने दार उघडले आणि त्त्यांची सून सुजाता आत आली.. चप्पल काढून सरळ सासूच्या खोलीत आली..

‘तुम्ही आशाला उद्यापासून कामावर येऊ नको अस सांगितलंत? मग कोण करणार तुमच? मी घरी राहू शकत नाही.. माझ्या पगारावर हे घर चाललंय.. तुमच्या मुलाचा पगार तो किती?

‘अग पण ती मला पार्कमध्ये एकटं सोडून तिच्या यारा बरोबर चाळे करत होती..

‘मग काय झाल? ती घटस्फोटित आहे माहिती आहे ना? तिला पण काही भावना असतील… मुंबई सारख्या शहरात बाई मिळतं नाही.. तुमचे काही चालू देणार नाही मी.. आशा उदया पण येईल… तिच्यामुळे मला घरकामात मदत होते.. भांडी कपडे होतात..

‘तू थोडे दिवस रजा घे.. तुझ्या आईच्या आजारपणात घेतलीस तशी..

‘माझ्या आईच्या आजारपणात रजा संपली माझी.. आता नाही मिळायची.. उद्या आशा येईल.. तिच्याचकडून काय ती सेवा करून घ्या.

वासंतीबाईचा नाईलाज झाला.. थोडयावेळाने त्यांचा मुलगा कपिल आला आणि गार झालेले जेवण टेबलावर ठेऊन गेला.. त्या मुलाशी काही बोलू पहात होत्या.. पण त्यांचे न ऐकता तो बाहेर गेला.

दहा वाजता सून आली.. त्यांना एकदा बाथरूमला नेऊन आणलं आणि ती झोपायला गेली.

सकाळ झाली.. वासंतीताई जाग्या झाल्या आणि चहाची वाट पहात राहिल्या.. आठ वाजता सून आली आणि त्याना बाथरूमला घेऊन गेली. ती गेली ती गेलीच.. त्या चहा नाश्त्याची वाट पहात राहिल्या. थोडया वेळाने त्यांना दार बंद केल्याचा आवाज आला.. त्यांनी ओळखले.. दोघे नोकरीवर गेले. आता आपण..

 साडेनऊला आशाने दार उघडले आणि ती घरात काम करत राहिली. त्याना भूक लागली होती.. तहान लागली होती… त्या हाक मारत राहिल्या.. आशा.. आशा.

पण आशा बाहेर ढिम्म होती. मोबाईल वर गाणी ऐकत होती.

बारा वाजले.. आज वासंतीताईची आंघोळ राहिली. तहान लागली पण पाणी मिळतं नव्हते.. भूक लागली होती. त्यांना बाथरूमला जायचे होते.. घाई लागली होती.

त्या हाक मारत राहील्या..’आशा.. आशा ग.. मला बाथरूमला ने ग.. नाहीतर..

एक वाजला.. आता वासंतीताईंना सहन होईना.. अचानक त्यांना काल सुधाने त्यांच्या मोबाईलमध्ये भरलेला नंबर आठवला.. त्यानी कॉल लावला.. पलीकडे सुधा..

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नाण्याची दुसरी बाजू… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ नाण्याची दुसरी बाजू…  भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(“सासूबाईंच्या नांवाने बॅंकेत कसलेच डिपॉझिट नाहीये तर त्यांच्या नावाने त्या स्वत: एक रिकरिंग खाते उघडायचे म्हणत होत्या आणि त्यासाठी कुठली स्कीम चांगली आहे, हे त्या मला विचारत होत्या.”) इथून पुढे – –

राघवसाठी हे सगळं नवीनच होतं. “मग तू काय सांगितलंस?” राघवनं अधीरतेनं विचारलं.

“पाच वर्षासाठी खाते उघडा. त्यात व्याजही जास्त मिळेल, असं मी सरळपणे सांगताच नम्रता वन्संनी लगेच फोन कट करून टाकला. तुम्ही कशाला त्यांचं रिकरिंग खाते उघडताय, आम्हीच सुरू करू की असं मी म्हणावं अशी त्यांची अपेक्षा असणार. आपणही शेवटी नोकरदारच. घराचे हप्ते, फर्निचर लोनचे, कार लोनचे हप्ते, कुकचा पगार, मोलकरणींचा पगार, फ्लॅटसचे जबरदस्त मेन्टेनन्स, असे एक ना अनेक खर्च आहेत. झालंच तर वर्षातून एखादी दुसरी लांबची सहल आणि लग्नमुंजीसाठी प्रवास असतोच.

आपण सगळ्याच सहलींना आईबाबांना घेऊन जातोच. त्यांना केरळला जायचं होतं. वर्षाखेरमुळे आपल्याला सुटी मिळत नव्हती तेव्हा ट्रॅव्हल कंपनीतर्फे तुम्ही त्यांना पाठवलं होतं. आपण दोघंही त्यांचा प्रत्येक शब्द झेलत असतो. त्यांचं औषधपाणी आणि अथर्वच्या पुढच्या शिक्षणाची चिंता डोक्यावर आहेच. बाबांना किती पेन्शन मिळते हे आपण कधी विचारलं नाही.

आता सासूबाईंच्या नावाने डिपॉझिट कशाला हवे आहे? थोडक्यात काय, अजूनही त्या दोघांना आपल्याकडे असुरक्षित वाटतं. हेच माझ्या मनाला खूप लागलं. जाऊ दे कुणाला काय वाटायचं ते वाटो. म्हणतात ना, अपेक्षांचं शेपूट कधी संपतच नाही म्हणून. दिवसागणिक अपेक्षा वाढतच जातात. ” बोलता बोलता जानकीनं वळून पाहिलं, राघव कधीच झोपेच्या आधीन झाला होता.

दुसऱ्याच दिवशी राघवनं बाबांचे मित्र विष्णु प्रभाकर यांना भेटायचं ठरवलं. फोन करून संध्याकाळी राघव आणि जानकी त्यांच्या घरी पोहोचले. सुदैवाने त्यावेळी ते एकटेच होते. राघवने आपल्या घरी झालेल्या पार्टीनंतर उमटलेले पडसाद ह्यासंबंधी त्यांना थोडक्यात सांगितलं. मग राघवच पुढे म्हणाला, “काका, तुम्हाला एक सांगू? कडक सोवळं ओवळं असणाऱ्या माझ्या आजीला मांसाहार केलेलं अजिबात खपायचं नाही. ‘काय शिजवायचं, खायचं असेल तर ते बाहेरच्या बाहेर करून खा, ’ असं म्हणायची. घरांत काहीच चालायचं नाही. तिने ती भांडी देखील मागच्या पडवीत ठेवून दिली होती. त्यावेळी मी बाबांना कधी रागावल्याचं पाहिलं नाही. कारण ते माझ्या आजीच्या साधनशुचितेचा, भावनेचा मान राखत होते. तसंच त्यांनी आता स्वत:च्या सुनेच्या भावनेचाही विचार करायला काय हरकत होती?” 

विष्णु प्रभाकर लक्षपूर्वक ऐकत होते.

“काका, मला अजूनही आठवतं. मी त्यावेळी नऊ दहा वर्षाचा असेन. एक चित्र रंगवायचं होतं. चित्रातले रंग बदलताना ब्रशला असलेला आधीचा रंग दुसऱ्या रंगात बुडवायच्या अगोदर ब्रश स्वच्छ करावा लागतो. स्वयंपाकघरातली वाटी कशाला घ्या म्हणून बाबा दाढी करताना वापरायचे ती वाटी घेतली. चित्र रंगवून झाल्यावर ती वाटी स्वच्छ धुवून ठेवणार होतो. बाबांनी ते पाहिलं. ती वाटी कशाला घेतलीस म्हणून त्यांनी माझ्या गालावर मारलेली थप्पड मी अजूनही विसरलेलो नाही. दाढीच्या पाण्यासाठी असलेली वापरलेली वाटी अधून मधून ब्रश साफ करण्यासाठी वापरली तर म्हणून त्यांना एवढा राग आला होता, मग मांसाहार करण्यासाठी वापरलेली प्लेट जानकीने बदलली असेल तर तिने अशी काय मोठी चूक केली होती सांगा. ” 

“होय, राघवा सदाशिवाचं चुकलंच. ” विष्णु प्रभाकर म्हणाले.

“काका, कोण चूक, कोण बरोबर आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. वरिष्ठांनी तरूणांच्या भावना समजून घ्याव्यात एवढंच मला वाटतं. लहानसहान गोष्टीवरून दर दोन तीन महिन्यांनी ‘आम्हाला इथं राहायचं नाही. आम्ही गावी परत निघालो’ असे ‘मानापमान’ नाटकाचे प्रयोग चालू असतात ना ते थांबवावेत. आम्ही दोघेही नोकरी करतो. शाळेतून आल्यावर अथर्वला कोण सांभाळणार, अशी आम्हाला सतत धास्ती वाटत राहते. मला आजीआजोबांच्या सहवासाचे सुख फार काळ मिळालं नाही. निदान माझ्या मुलाला तरी त्या प्रेमापासून कशाला वंचित करा म्हणून आम्ही त्यांची मनधरणी करत असतो. दुसऱ्या अपत्याचा विचार तर आम्ही कधीच सोडून दिला आहे. असो. ”

विष्णु प्रभाकर यांनी राघवचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, “राघवा, एक गोष्ट लक्षात घे. आजवर कार्यालयात वर्चस्व गाजवायची सवय असलेल्या ह्या निवृत्त मंडळींची स्थिती हवा गेलेल्या फुग्यांच्यासारखी असते. ही मंडळी आपल्या अहंकाराचा फुगा फुगवण्यासाठी घरच्या मंडळींवर डाफरायला लागतात. त्या अहंकाराला प्रतिरोध झाला की ते आक्रस्ताळेपणा करतात. मी पाहिलं आहे, बहुतेक वृद्ध मंडळी चिमूटभर दु:खाला कुरवाळत बसतात. किरकोळ अशा जखमांना स्वत:च्या नखांनी ओरबाडून घेतात आणि त्याच जखमा दाखवत सगळ्यांच्याकडून सहानुभूतिच्या मलमपट्ट्या मागत हिंडत असतात. राघवा, माझ्यावर विश्वास ठेव.

तसं पाहायला गेलो तर, ह्या परक्या राज्यात आम्ही सुदैवाने एकत्र आलो आहोत. तुझ्या बाबांनी ही घटना सांगणे तर लांबच. त्यांनी आजवर तुमच्याविषयी तक्रारीचा चकार शब्दही काढला नाही. आम्हाला सदानकदा त्यांच्याकडून तुम्हा दोघांचं कौतुकच ऐकायची सवय झालीय. खरं सांगू, सदाशिवरावांना असा मुलगा आणि सून लाभली ह्याचा इतरांना हेवा वाटत असतो. ” 

राघव नम्रपणे म्हणाला, “काका, बाहेरच्या लोकांत आमच्यावर कौतुकाची फुलं उधळण्यापेक्षा त्या फुलांतली एखादी पाकळी जरी बाबांच्याकडून आमच्या वाट्याला आली असती तरी आम्ही कृतार्थ झालो असतो. काका, ह्या तक्रारी करणाऱ्या वृद्धांनी एकदा ज्यांची मुलं परदेशात कायमची स्थायिक झाली आहेत अशा वृद्धांचे केविलवाणे चेहरे पाहावेत. कित्येक उच्चभ्रू मुलांच्या आपल्या चौकोनी कुटुंबात आई वडिलांना जागा नसते. हे आजूबाजूला असलेले विदारक सत्य पाहिले म्हणजे आपण स्वत: किती सुखी आहोत हे तुम्हा लोकांना कळेल. वृद्धांनी हट्ट सोडून थोडी तडजोडही स्वीकारावी.

दूर असलेल्या लेकीला जसा जीव लावता तसाच थोडा जीव सदैव सोबत राहणाऱ्या आपल्या सुनेवरही लावा. तिलाही थोडे प्रेमाने वागवा म्हणावं. मग बघा सगळ्याच घरातले निम्मे प्रश्न आपोआपच सुटतील.

काका, सगळीच मुलं नतद्रष्ट नसतात हो. त्यात एखादा श्रावणबाळ देखील असतो. खरं तर अनुभवातून तुम्हाला माणसं कळतात. मग तुम्हाला तुमची मुलंच कळत नाहीत, असं कसं म्हणता येईल? काका राग मानू नका. सगळेच लेखक आम्हा मुलांना नतद्रष्ट ठरवत, वृद्धांच्या व्यथांना आपल्या कथालेखनात गडदपणे रंगवून वाहवाही मिळवतात. काका, तुम्ही माझ्या बाबांच्या जागी आहात. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, मनात होतं ते बोलून गेलो. तुम्ही लेखक आहात, माझी तुम्हाला एक विनंती आहे. ही नाण्याची दुसरी बाजू मांडत तुम्ही एखादी कथा जरूर लिहा. माझ्या बाबांच्या वयाची वयोवृद्ध मंडळी तुमच्या लिखाणाने निदान विचारप्रवृत्त तरी होतील. येतो आम्ही. ” उभयतांनी निरोप घेतला.

काय जादू झाली कुणास ठाऊक, राघवने बेल वाजवताच दार उघडायला बाबा चक्क हसतमुखाने सामोरे आले. आज अथर्व आजीजवळ बसून चक्क गृहपाठ करत होता. असं वाटत होतं, जणू आकाश पूर्ण चांदण्यांनी भरून गेले होते !

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नाण्याची दुसरी बाजू… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ नाण्याची दुसरी बाजू…  भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

“फिफ्टीन वनSज फिफ्टीन, फिफ्टीन टूSज थर्टी…” अथर्व मोठमोठ्याने पाढे पाठ करत होता. सुभद्राबाई हातात कपडा घेऊन टीव्हीवरची धूळ साफ करत होत्या. राघव आणि जानकी ऑफिसहून थकून भागून नुकतेच घरी आले होते. राघव वैतागूनच म्हणाला, “अथर्व, शाळेतून आल्यापासून काय करत होतास रे? आता पाठ करतो आहेस ते.” अथर्व काही बोलला नाही. परंतु गेल्या चार पाच दिवसापासून हेच दृश्य दिसत असायचं. साडेसातला या किंवा आठला या, अगदी तेच दृश्य रिपीट व्हायचे. अथर्वचे पाढे म्हणणे आणि आईंच्या हातात डस्टिंगचा कपडा आणि बाबा बंद खोलीत बसलेले. 

जानकी पटकन आत जाऊन फ्रेश होऊन आली. अथर्वने अनपेक्षित गुगली टाकत विचारलं, “मम्मी, पप्पांचा पगार किती आहे ग?” 

जानकी क्षणभर गडबडून गेली परंतु ती पटकन म्हणाली, “मला नाही माहित. तुझ्या पप्पांना त्यांचा पगार किती आहे, मी हे कधी विचारलंच नाही.” 

“बघ तुलाच पप्पांचा पगार माहित नाहीये तर मला कसे माहित असेल? बरं ते असू दे. तुझा पगार किती आहे ते तरी सांग.”

अथर्वच्या त्या प्रश्नाचं उत्तर टाळत घड्याळाकडे पाहत ती म्हणाली, “बाळा, किती वाजलेत पाहिलंस का? चल आधी तुला जेवायला वाढते.” 

अथर्वचं जेवण आटोपताच तिने त्याचा गृहपाठ करवून घेतला. अथर्व अजूनही भरमसाठ स्पेलिंग मिस्टेक्स करत राहायचा. गृहपाठ संपल्यावर तिने हळूच विचारलं, “अथर्व, तू नेमके आम्ही घरी यायच्या वेळीच पाढे कसे पाठ करतोस रे?” 

अथर्व अगदी निरागसपणे म्हणाला, “अग, आजी खिडकीजवळ बसलेली असते ना, तुमची गाडी गेटमध्ये शिरताच ती मला लगेच जोरजोरात पाढे पाठ कर म्हणून सांगते. आणि मी ते करतो.” 

“काय रे, आज तू बाबांचा पगार किती म्हणून कशाला विचारलंस? शाळेतल्या मॅडमने हा प्रश्न विचारला होता का?” जानकीने सावधपणे प्रश्न टाकला. 

अथर्व हसत हसत म्हणाला, “ते होय, अग आजोबा आजीला डोळे मिचकावत म्हणत होते की, ‘अथर्वला त्याच्या बाबांचा पगार किती आहे माहीतच नसेल बघ’. त्यावर ते दोघेही खळखळून हसत होते.” 

जानकी हळुवारपणे अथर्वच्या केसांतून हात फिरवत होती, तसा अथर्व झोपून गेला. त्यानंतर तिचं जेवण, मग आवराआवरी. तिला रोजच रात्री झोपायला अकरा वाजून जायचे.

गेल्याच आठवड्यात सदाशिवरावांच्या घरी सिनियर सिटीझन्स मित्रांचे गेट-टुगेदर होते. आठ दहा लोकच होते. ते त्यांच्याबरोबर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ग्रुपचे सदस्य होते. कुटुंब सदस्यांशी ओळख परेड झाली. सदाशिवरावांच्या तोंडून अधूनमधून त्यांची नावं ऐकलेली होती. त्यात रविवारच्या दैनिकात प्रासंगिक लेख वा कथा लिहिणारे विष्णु प्रभाकरही होते. शमी कबाब, चिकन करी, रोटी आणि बिरयानी असा मस्त मांसाहारी मेनू होता. विष्णु प्रभाकर यांच्यासाठी शुद्ध शाकाहारी मेनू होता. गप्पागोष्टींना ऊत आला होता. त्या सगळ्यांनीच मस्त एंजॉय केलं.

त्या नंतरच्या दिवसापासून मात्र घरात एक प्रकारची नि:स्तब्ध उदास शांतता पसरून राहिली होती. काय कारण असेल…? तेच तर समजत नव्हतं. 

“येत्या शुक्रवारी आम्ही नागपूरला जाणार आहोत, ” असं अचानकच सुभद्राबाईंनी सांगून टाकलं. बस्स. त्या व्यतिरिक्त त्या चकार शब्दही बोलल्या नाहीत. येण्याजाण्याच्या तिकीटाच्या रिझर्व्हेशनबद्दल काही बोलले नाहीत. मग हे दोघे अचानक असे कसे नागपूरला निघाले? काय बिनसलं असावं? राघवची आणखीनच चिडचिड होत होती. सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत असताना त्यांच्याशी बोलावं म्हटलं की ते दोघेही मॉर्निंग वॉकला गेलेले असतात. संध्याकाळी थकून भागून येतो तर बाबा आपल्या बंद रूममध्ये कोंडून बसलेले असतात. त्यांच्याशी बोलायचं तरी कधी?

अखेर राघवने आईला गाठलं आणि एकदाचे सोक्षमोक्ष लावायचेच या इराद्याने त्यानं विचारलं, “आई काय झालंय ग, तुम्ही दोघे असे आमच्याशी तुटक तुटक का वागताय ते? आमचं काही चुकलं का? तसं काही असेल तर स्पष्ट सांगा. मनांत काही ठेवू नका.”

त्या प्रश्नाचं उत्तरही सरळ न देता सुभद्राबाईनी तुटक तुटकच दिलं. ते सगळं बोलणं एकत्र जोडल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की, जानकीने बाबांचा काहीतरी घोर अपमान केला होता. 

झालं काय तर, त्या पार्टीच्या दिवशी सामिष मांसाहारी भोजनाचा बेत होता. कपाटात कित्येक नवीन डिनर सेट न वापरता तसेच पडून होते. त्यातले प्लेट्स आणि बाऊल वापरायचे सोडून, त्या पार्टीत जानकीची एक फेवरिट फिकट गुलाबांची फुलं रेखाटलेली पांढरी शुभ्र प्लेट आणि बाऊल वापरले गेले.

शुद्ध शाकाहारी असलेल्या जानकीने दुसऱ्याच दिवसापासून निमूटपणे नवीन प्लेट आणि बाऊल वापरायला काढलं. तिथंच सगळं बिनसलं. समजा मांसाहारी भोजनासाठी तो बाऊल आणि ती प्लेट वापरली गेली असेल तर धुवून पुसून घेतलं की झालं ना? त्यासाठी कपाटातून नवीन प्लेट आणि बाऊल काढायची काय आवश्यकता होती? बस्स, बाबांनी त्याचा फार मोठा इश्शू केला. बाबांचा अहंकार दुखावला गेला. ते कोप-भवनात गेले आणि हुप्प करून बसले. बाबांच्यासमोर तोंड उघडायची, आईची काय बिशाद? नेहमीप्रमाणेच या वेळीही ती हो ला हो म्हणणार. 

कारण तसं अतिशय क्षुल्लक होतं. बरं जानकीनं नवीन प्लेट आणि बाऊल घेतले म्हणून काय बिघडले? त्या प्लेटस आणि बाऊल काय वर्षानुवर्षे शोकेसमध्ये ठेवून मिरवायच्या आहेत का? बरं, शुद्ध शाकाहारी असलेल्या जानकीला सामिष भोजन केलेल्या प्लेटमध्ये जेवायला आवडलं नसेल तर तिने नवीन प्लेट आणि बाऊल काढलं असेल तर त्यात एवढा मोठा इश्शू काय करायचा? तिने फार मोठी चूक केली असल्यासारखे तिनेच दरवेळेप्रमाणे या वेळीही जाऊन त्यांची माफी मागावी का? राघव विचार करीत सुन्नपणे बसला होता. 

रात्रीची जेवणं संपून सगळं आवरता आवरता अकरा वाजले होते. जानकी राघवला म्हणाली, “राघव, आज दुपारी नम्रता वन्संचा ऑफिसमध्ये फोन आला होता. “सासूबाईंच्या नांवाने बॅंकेत कसलेच डिपॉझिट नाहीये तर त्यांच्या नावाने त्या स्वत: एक रिकरिंग खाते उघडायचे म्हणत होत्या आणि त्यासाठी कुठली स्कीम चांगली आहे, हे त्या मला विचारत होत्या.” 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फ्यूजन… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ फ्यूजन… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(त्यांनी विश्वेशला, आपल्या मुलालाही फोन लावला. तुम्हाला मुलगा चांगला वाटत असेल आणि कुसुमदीदीला चालणार असेल तर हरकत नाही, असं म्हणाला तो.) — इथून पुढे —- 

त्यांच्या धाकट्या मुलीने, उमाने मात्र त्यांना बजावलं, ‘ अम्मा, ताईवर कोणतीही जबरदस्ती करू नका. तिला मान्य असेल तरच पुढचा विचार करा. सुरेशकाकांवर विश्वास आहेच. पण शेवटी लग्न करून संसार ताईला निभावायचा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. इतर नातेवाईकांची पर्वा करण्याचं काही कारण नाही. ते नुसती तोंडपाटिलकी करणार आणि दोन्ही बाजूंनी बोलणार. माझ्या लग्नात सगळ्यांचे मानपान केले तरी कुजबूज चालूच होती या लोकांची. जातीपातीच्या गोष्टीला आजकाल कोणी महत्त्व देत नाही. शाकाहारी म्हणवणारे पण सर्रास मांस-मच्छी खातात आणि मांसाहारी असलेले कित्येक जण पूर्ण शाकाहार घेतात.

 कुसुमने मात्र लग्नाला सहमती दर्शवली. विभाताईंनी सुरेशरावांना महेशबद्दल, सगळी खरी माहिती मुलीकडच्यांना द्यायला सांगितली, त्यामुळे तिला त्यांच्याबद्दल विश्वास वाटला. नाहीतर कितीतरी लग्नांच्या बाबतीत झालेल्या फसवणूकीचे किस्से तिने आजूबाजूला आणि दूरदर्शनवर ऐकले होते, पेपरमध्ये बातम्यांमध्ये वाचले होते. शेवटी लग्न म्हटलं की तडजोड आलीच. आजवर कमी का प्रयत्न केले अम्मा-अप्पांनी आपल्या लग्नासाठी? पण कधी आपल्या रंग-रूपा मुळे मुलाकडून नकार तर कधी त्यांच्या होकारासोबत अवास्तव मागण्यांमुळे आपल्याकडून नकार हेच घडत आलं. त्यामानाने हा प्रस्ताव चांगला आहे आणि नशिबात असेल तसंच होणार की! निदान अम्मा-अप्पांच्या डोक्याची चिंताही कमी होईल. शिवाय विश्वेशच्या लग्नाचा मार्गही सुकर होईल, असा विचार तिने केला.

सुधाआंटी आणि बसप्पांनीही मग विचार केला की निदान लग्न झाल्याचं सुख तर मुलीला मिळेल. पुढचं पुढे बघता येईल. सगळं चांगलं दिसत असतानाही आजकाल किती घटस्फोट होताना दिसतात. इथे मुलाची सगळी माहिती असताना काळजीपूर्वक वागलं तर कदाचित कुसुमचं भाग्य उजळेलही!

संध्याकाळी सहा वाजताच मग बसप्पांनी सुरेशरावांना फोन करून आपली संमती कळवली आणि पुढची बोलणी कधी करायची ते सांगा म्हणाले. विभाताईंची निघायची तयारी सुरू होती. सुरेशरावांनी बसप्पांचा निरोप त्यांना दिला, तसं त्या खूष झाल्या. सुरेशरावांनी एजंटला फोन करून त्यांचं रात्रीचं बसचं रिझर्वेशन रद्द करायला सांगितलं. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी बसप्पांसोबत पुढची बोलणी करण्याचं ठरलं. कुसुम आणि महेशची समोरासमोर भेट होणं देखील आवश्यक होतं. कुसुमबद्दल आणि लग्नाबाबत विभाताईंना महेशशीदेखील बोलायचं होतंच. बसप्पांच्या होकारामुळे त्यांना आता हुरूप आला होता.

महेशवर उपचार करणाऱ्या नेहमीच्या डाॅक्टरांशी त्यांनी आधी संपर्क साधला. त्यांनी लग्नाच्या प्रस्तावाला अनुमोदन देत सर्व प्रकारचं मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली. विभाताई मग महेशशीदेखील बोलल्या. लग्नाच्या कल्पनेने त्याच्या चेहर्‍यावरही आनंद पसरला. कुसुमला त्याने लग्नात एकदाच पाहिले होते. पण आपली आई आपल्या भल्याचा निर्णय घेईल यावर त्याचा विश्वास होता. आपल्यातल्या कमतरतेची जाणीवही त्याला होतीच. त्यामुळे त्याने या लग्नाला होकार दिला. मग रात्री उशिरापर्यंत सर्व मंडळी लग्नाविषयी चर्चा करण्यात मश्गुल राहिली.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सुधाआंटी, कुसुम आणि बसप्पा असे तिघेही प्रभाताईंकडे आले. विभाताईंनी सरळ विषयालाच हात घातला.

कुसुम तू आणि महेश, आतल्या खोलीत बसून हवंतर एकमेकांशी बोलून घ्या आणि मग काय ते ठरवा, असं म्हणून त्यांनी दोघांना आत पाठवलं.

महेशबद्दल तुम्हाला सर्व माहिती सांगितली आहेच. तो सुपरमार्केटमध्ये काम करतो, त्याला दरमहा पंधरा हजार पगार मिळतो. त्याच्या वडिलांच्या दोन एल. आय. सी. पेंशन पाॅलिसीचे दरमहा सोळा हजार त्याच्या खात्यात जमा होतात. मला दरमहा ४५०००रू. पेंशन मिळते. शिवाय त्याच्या नावावर मी पोस्टाची एजन्सी घेतली आहे. त्याच्या कमिशनपोटीही किमान दोन-तीन हजार मिळतात महिन्याला. ठाण्यात आमचा तीन खोल्यांचा ब्लाॅक आहे, सातशे चौरस फुटांचा. ब्लाॅक चौथ्या माळ्यावर आहे, ग्रीन व्हॅली काॅम्प्लेक्स, खोपट भागात. घरात मी आणि महेश असे दोघेच आहोत. सात मजली पंधरा इमारतीआहेत या काॅम्प्लेक्समध्ये. दूध, भाजी, किराणा सामान, डाॅक्टर अशा दैनंदिन गरजा पूर्ण होण्याची सगळी सोय तिथे आहे. शिवाय मध्यभागी तरणतलाव आणि बगिचादेखील आहे. एक दीर-जाऊ ठाण्यात राहतात, पण त्यांचा संबंध फक्त सण-समारंभात मिरवण्यापुरवताच. लग्नाचं पक्कं ठरवण्याआधी तुम्ही ठाण्याला आमच्याकडे या. म्हणजे घरही बघता येईल आणि महेशच्या डाॅक्टरांशीही तुमची भेट घालून देईन. तुम्हाला या लग्नाबाबत काही शंका असतील तर त्यांना विचारता येतील.

बसप्पा म्हणाले, आम्ही येऊ तसं, पण तुम्ही एवढ्या प्रामाणिकपणे सगळं सांगितलं आहे तर आपण पुढच्या गोष्टी ठरवायला आमची काही हरकत नाही. हो ना सुधा? सुधाताईंनी हसून होकार भरला.

लग्नसमारंभ विधिवत पण मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करावा असं मला वाटतं. मी कुसुमला मंगळसूत्र आणि दोन सोन्याच्या बांगड्या घालीन. तुम्हाला अजून काय विचारायचं असेल तर निःसंकोच विचारा.

आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत. अंडपण खात नाही आम्ही…. सुधाआंटी म्हणाल्या.

आम्ही तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही त्यासाठी. वयानुसार मी पण आजकाल क्वचितच मांसाहार करते. महेशसाठी आठवड्यातून एक – दोनवेळा बनवते, पण ती भांडी मी नेहमीच वेगळी ठेवते. हां आता मासळीचा थोडाफार वास मात्र सहन करावा लागेल तिला.

बसप्पा म्हणाले, ‘ लग्न बेळगावला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करायला आमची काही हरकत नाही. तुमची किती माणसं येणार ते कळलं तर त्याप्रमाणे सर्व व्यवस्था करणं सोपं होईल. त्यांचे मानपान पण आम्ही रीतसर करू. आम्ही धाकट्या मुलीला दहा तोळ्याचे दागिने घातले, तसेच कुसुमलापण देणार. ‘

विभाताईं म्हणाल्या, ‘ एक सांगू का? नातेवाईकांचा मानपान म्हणजे ४-५ जणांना साड्या – शर्टपीस किंवा तत्सम एवढाच. त्यावर जास्त खर्च करण्याची गरज नाही. मुंबईत सोन्याचे दागिने घालून फिरण्याची काही सोय नाही. त्यापेक्षा ती रक्कम तुम्ही कुसुमच्या नावाने फिक्स डिपाॅझिटमध्ये ठेवलीत तर भविष्यात तिलाच उपयोगी पडेल. ‘

विभाताईंचं हे बोलणं उभयतांना पटलं. मग लग्नाचा मुहूर्त काढून, बाकी तपशील ठरवू असं ठरलं. कुसुम आणि महेशही बाहेर येऊन बसले होते. दोघांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने, त्यांचा होकार निश्चित केला होता.

आणि मग दोन महिन्यानंतर हे लग्न ठरवल्याप्रमाणे पार पडलं. कुसुम ठाण्याच्या घरात सून म्हणून राहायला आली. सुरुवातीला भाषेची अडचण जाणवत होती. विभाताईं मदतीला होत्याच. पण हळूहळू ती कामचलाऊ मराठी बोलायला लागली. डाॅक्टरांशी चर्चा करून तिचं आणि महेशचं सहजीवनही सुरू झालं. ग्रीन काॅम्प्लेक्समधल्या इतर लोकांशीही कुसुमचा परिचय झाला. काही चांगल्या मैत्रिणीही मिळाल्या. कुसुमनं पोस्टाच्या एजन्सीच्या कामातही लक्ष घालायला सुरुवात केली.

कुसुमच्या सुगरणपाचा अनुभव घेतल्यावर, एका मैत्रिणीने तिच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीची आॅर्डर घेशील का म्हणून विचारलं. २५ जणांसाठी वडा – सांबार आणि अननसाचा शिरा बनवून हवा होता. विभाताईंशी बोलून तिने ही आॅर्डर स्वीकारली आणि त्यांच्या मदतीने ती पूर्णही केली. त्या मैत्रिणीकडे आलेल्या सगळ्यांनी या पदार्थांची खूप तारीफ केली. आता इतरांकडूनही तिला अश्या प्रकारच्या आॅर्डर घेण्यासाठी विचारणा होऊ लागली. अर्थप्राप्ती आणि स्वावलंबनाचं हे एक नवं दालन कुसुमसाठी खुलं झालं. तिचा आत्मविश्वास वाढला.

दरम्यान तिच्या संसारवेलीवर पार्थ नावाचं फुलही उमललं. हा सगळा प्रवास खूप अवघड होता. पायातील व्यंगामुळे तिच्या उभं राहण्यावर, हालचालींवर काही मर्यादा होत्या. शिवाय महेशशी जुळवून घेण्यासाठीही तिला खूपच प्रयत्न करावे लागत होते. पण कुसुमने ही आव्हानं समर्थपणे झेलली.

इकडे तिला रोजच नवनवीन आॅर्डर मिळू लागल्या. विभाताईंनी वयोमानानुसार 

तिला मदत करणं कठीण जाऊ लागलं. घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व करायचं तर रगडा, मोठी भांडी अशा अनेक गोष्टींची आवश्यकता होती. शिवाय पार्थला सांभाळून सगळं करणं कुसुमसाठी पण अवघड होत होतं. आॅर्डर पोचवण्यासाठी काहीवेळा महेशची मदत व्हायची, पण त्याची नोकरीची वेळ सांभाळून! त्यामुळे आता एखाद्या मदनिसाचीही गरज होती. त्याचवेळी त्यांच्या काॅम्प्लेक्समध्ये एक गाळा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं कळलं.

 मग या तिघांनी थोडा विचार विनिमय करून तो गाळा विकत घ्यायचं ठरवलं. महेशनी नोकरी सोडून या व्यवसायातच मदत करण्याचा निर्णय घेतला. कुसमच्या आई-वडिलांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली. लग्नाच्या वेळी विभाताईंच्या सल्ल्यानुसार फिक्समध्ये ठेवलेले पैसे याकामासाठी उपलब्ध करून दिले.

 विभाताईं आता फक्त पार्थला सांभाळतात आणि जमेल तशी कुसुमच्या व्यवसायात देखरेख करतात. महेशच्या जीवनाला अशी कलाटणी मिळेल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. कुसुमने आणखी तीन बायका मदतीला ठेवल्या आहेत. तिने महाराष्ट्रातील पुरणपोळी, गुळपोळी, अळूवडी, कोथिंबीरवडी यांसारखे पदार्थही शिकून घेतले आहेत. दाक्षिणात्य पदार्थ तर तिची खासियतच आहे. कुसमच्या साथीने महेशचाही आत्मविश्वास वाढला आहे. सुपरमार्केटमधील कामाचा त्याचा अनुभव, मालाची खरेदी – विक्री करताना उपयुक्त ठरतो आहे. आता तिचं हे मराठी-कानडी फ्यूजन एकदम जोरात चालू आहे.

— समाप्त —

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares