मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फ्यूजन… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ फ्यूजन… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

धाकट्या बहिणीच्या, प्रभाच्या मुलाचं लग्न दोन दिवसांपूर्वी पार पडलं. काल सत्यनारायणाची पूजा झाली आणि नवपरिणित जोडपं आज सकाळी मधुचंद्रासाठी नैनितालला रवाना झालं. विभाताई आणि त्यांचा मुलगा महेश ठाण्याहून या लग्नासाठीच बेळगावला आले होते. तीन वर्षांपूर्वी करोनामुळे विभाताईंचा नवरा गेला, त्यानंतर प्रथमच त्या अशा समारंभाला उपस्थित राहिल्या होत्या. प्रभाने मुळी तसा हट्टच धरला होता, तू जर लग्नाला आली नाहीस तर इथून पुढे आपली कट्टी! मला तरी माहेरचं कोण आहे दुसरं? आणि ती म्हटल्याप्रमाणे करेल याची विभाताईंना खात्रीच होती. विभानं आपलं दुःख विसरून चार माणसात मिसळावं हीच प्रभाची इच्छा होती.

‘आणि लग्न झाल्यावर लगेच घरी पळायची घाई करायची नाही. नंतरचे पसारे आवरायला मला मदत कोण करणार? ‘ असा प्रेमळ दमही भरला होता प्रभानी.

बाकीचे पाहुणे-रावणे पूजा झाल्यावर आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले होते.

प्रभाचे यजमान सुरेशराव नाश्ता करून, बाहेरची काही कामं पूर्ण करण्यासाठी काही वेळापूर्वीच घरातून बाहेर पडले होते. महेशलाही सोबत घेऊन गेले होते. त्यामुळे कामं करता करता दोघी बहिणींच्या गप्पा रंगल्या होत्या.

‘ताई, महेशही बत्तिशीचा झाला ना? त्याच्याही लग्नाचं बघायला हवं ना! त्याची सुपरमार्केटमधली नोकरी कशी काय चाललीय? ‘

‘नोकरी ठीक चाललीय ग! पण लग्नाचं कसं बघणार? त्याच्यासारख्या गतीमंद मुलाला स्वीकारायला कोण मुलगी तयार होईल! कसाबसा रखडत दहावी पास झालाय. वयानुसार त्याच्यातही शारिरीक बदल होताहेत आणि त्यामुळे काही वेळा खूप आक्रस्ताळेपणा करतो. मला एकटीला हे सगळं नाही ग सांभाळता येत. डाॅक्टर म्हणताहेत की त्याचं लग्न करायला हरकत नाही. कदाचित त्यानंतर त्याची चिडचिड कमी होईल. तसं दैनंदिन व्यवहार तो नीटपणे पार पाडतो. पण आकडेमोड, हिशेब काही जमत नाही. काही गोष्टी पुन्हा पुन्हा समजावून सांगायला लागतात. शिवाय याचा पगारही मोजका, माझं पेंशन व्यवस्थित आहे, म्हणून घर नीट चाललंय. लग्न करायचं तर मुलीकडचे या सगळ्या गोष्टींचा विचार करणारच की! काय त्याच्या नशिबात आहे कोण जाणे! ‘

‘ खरंय तुझं, पण अशी निराश होऊन, हातावर हात ठेवून बसलं तर कसं होईल? त्या दृष्टीने प्रयत्न तर सुरू केला पाहिजे ना! ‘

रंगरूप चांगलं दिलंय देवानं. आता स्वतःचं पोट भरण्याइतपत तर कमवतोय की महेश!

संथ असला तरी वागणं बरंच नाॅर्मल आहे त्याचं. एकदम दहा गोष्टी सांगितल्या तर गोंधळतो. पण सावकाश सांगितलं तर कळतं सगळं नीट!

‘ प्रभाताई, थोडं इडली-सांबार आणलंय, म्हणजे तुम्हाला स्वैपाक करायला नको आज! लग्नाच्या धावपळीनं दमला असाल ना! ‘ आले’, म्हणत प्रभा बाहेर गेली. कोण बरं हे, म्हणून विभाताईंनी डोकावून पाहिलं तर एक साधारण पन्नाशीची स्त्री, घराच्या मागच्या भिंतीपलीकडून प्रभाला दोन मोठे स्टीलचे डबे देताना दिसली. तिचा काळा रंग मात्र अगदी डोळ्यात भरत होता.

डबे स्वैपाकघरात ठेवून प्रभा परत आली, आणि विभाताईंना म्हणाली.. अग या सुधाआंटी, कन्नड ब्राह्मण आहेत. दोन वर्षांपूर्वी शेजारचं घर त्यांनी विकत घेतलं आणि मला छान शेजार मिळाला. मदतीला नेहमी तत्पर असतात. त्यांचा नवरा सरकारी खात्यात नोकरीला होता, नेहमी बदल्या व्हायच्या. आता रिटायर झाल्यावर मात्र त्यांनी इथे राहायचा निर्णय घेतला. बरीच वर्ष हे लोक कर्नाटक, आंध्र प्रदेशात होते. पण सुधाआंटी लहानपणी मुंबईत राहिलीय, त्यामुळे मराठी चांगलं बोलते. दोन मुली आणि एक मुलगा आहे त्यांना. एकीचं लग्न झालंय आणि मुलगा नुकताच इंजिनीअर होऊन बेंगलोरला नोकरीला लागलाय.

पण प्रत्येकाला काही ना काही दुःख दिलंय बघ देवानं! यांची मोठी मुलगी कुसुम, तिशीची आहे ती! जन्मताच तिचा उजवा पाय, डाव्या पायापेक्षा आखूड आहे

त्यामुळे पाय ओढत चालते आणि कमरेचा भागही बेढब आहे.

बारावी पास झालीय जेमतेम, पण शिक्षणात फारशी गती नाही, म्हणून पुढे शिकली नाही. शिवाय रंगही आईसारखा, एकदम काळा. रूपही सामान्यच. त्यामुळे लग्न जमलं नाही. खरंतर बोलणं वागणं खूप छान आहे. सुधाआंटीच्या बरोबरीनं घरातलं सगळं कामही करते. पण फारशी घराबाहेर पडत नाही. आपल्याकडे लग्नाला मोठ्या मुश्किलीने आली आणि लग्न लागताच घरी गेली. धाकटी उमा जरा रंगानं उजळ आणि ग्रॅज्युएट पण झाली. तिचं तिनंच जमवलं लग्न, मग यांनी करून दिलं. धारवाडला असते ती. पण कुसुमची चिंता आहेच दोघांना. असतं एकेकाचं नशीब! ‘

तेवढ्यात सुरेशराव आणि महेश बाहेरून आले आणि यांच्या गप्पा थांबल्या. मग जेवणं उरकली आणि दोघीजणी आतल्या खोलीत आणि ते दोघं दुसर्‍या खोलीत आडवे झाले. चहापाणी झाल्यावर पुन्हा दोघी घरातली आवरा-आवर करत राहिल्या. लग्नघर म्हटलं की पसारा केवढा असतो.

सुरेशरावांनी विभा आणि महेशचं दोन दिवसानंतरचं स्लीपरबसचं रिझर्वेशन करून आणलं होतं. विभाताईला बरोबर काय काय द्यायचं याची प्रभाची जमवाजमव चालली होती. दुसऱ्या दिवशी दोघी बाहेर पडून काही साड्या, कलाकंद आणि इतर सटरफटर खरेदी करून आल्या.

विभाताईंना त्यांच्या सोसायटीतल्या मैत्रिणींसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या.

उद्या संध्याकाळी सातला निघायचं होतं, साडेआठची बस होती ठाण्यासाठी. बसस्टँड घरापासून तसा तासभर अंतरावर होता. विभाताईंनी पण आपलं सामान गोळा करून बॅग भरली. महेश जेवणानंतर गोळी घेऊन आतल्या खोलीत आडवा झाला होता, त्याला जरा कणकण वाटत होती. रात्रीची जेवणानंतरची आवरा-आवर करून त्या दोघी बाहेरच्या खोलीत येऊन बसल्या.

सुरेशराव म्हणाले, महेशमध्ये खूप चांगला बदल झाला आहे. स्वतःहून चार गोष्टी बोलतो, विचारतो. पूर्वीसारखा बिचकत नाही. अंगानेही भरलाय. खूप बरं वाटलं त्याची प्रगती बघून.

‘हो ना! मी ताईला तेच म्हटलं. आता त्याच्या लग्नाचा विचार करायला हवा. ‘ 

विभाताई, मी एक सुचवू का? महेशसाठी कुसुमचं स्थळ कसं वाटतं? सहज मनात आलं ते बोललो हं. म्हणजे तुम्हाला पटलं तर बघा हं. ‘

‘अहो, काहीतरीच काय बोलता? महेश किती देखणा आहे! शिवाय ते ब्राह्मण आणि आपण मांस-मच्छी खाणारे, कसं जमणार हे? प्रभा पटकन म्हणाली.

‘ दिसण्याचं काय घेऊन बसलीस बाई, त्याच्यातही कमतरता आहेच की! पण

मुलीला आणि तिच्या घरच्यांना असं स्थळ चालेल का? , विभाचा सूर निराशेचा होता.

‘ तुम्हाला चालणार असेल तर मी बसप्पांशी बोलून तर बघतो, नाही पटलं तर राहिलं. पण पटलं तर दोघांचही भलं होईल असं मला आपलं वाटतं ‘, सुरेशराव म्हणाले.

तुम्ही बोलायला माझी काही हरकत नाही. पण मुलीला आणि तिच्या आई-वडिलांना सर्व परिस्थितीची स्पष्ट कल्पना द्यायची. उगाच खोटंनाटं सांगून, मला कोणाची फसवणूक करायची नाही.

हो हो, मी उद्या सकाळीच त्यांच्या कानावर घालतो हे. मग बघू काय म्हणतात ते! योग असेल तर जमून जाईल.

दुसर्‍या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरेशराव बसप्पांकडे गेले. त्यांनी 

कुसुमसाठी महेशचं स्थळ सुचवलं. बसप्पांनी लगेच काही प्रतिक्रिया दिली नाही. सुरेशरावांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे संबंध घरोब्याचे होते. त्यामुळे त्यांनी सुधाआंटींना बाहेर बोलावलं, ‘ हे सुरेशराव काय म्हणतात ते ऐका’. त्या काॅफीचे मग घेऊन बाहेर येतच होत्या. सुरेशरावांनी त्या दोघांना महेशची सर्व माहिती सविस्तर सांगितली. दोघेही विचारात पडले. कुसुमचं लग्न ठरत नव्हतं हे जरी खरं असलं, तरी असं जातीबाहेरच्या आणि ते पण गतिमंद मुलाशी तिची सोयरीक जुळवणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं. कुसुमला मराठी बोलता येत नव्हतं पण बोललेलं बरंचसं समजत होतं.

सुरेशराव म्हणाले, ‘ दोन्ही मुलं आपल्या जवळची म्हणून मी सुचवलं. तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्या. ‘ तसं बसप्पा त्यांना म्हणाले, ‘तुम्ही आमचे हितचिंतकच आहात. पण आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या. कुसुमशीही बोलायला हवं. शिवाय आमच्या गोतावळ्याचाही विचार घ्यायला हवा ना? ‘ 

‘ हो हो काही हरकत नाही. तुम्ही तुमचा वेळ घ्या. ‘ असं म्हणून सुरेशराव तिथून घरी आले.

प्रभाताईंकडच्या लग्नात सुधाआंटींनी महेशला बघितलं होतं. किती छान गोरापान आणि राजबिंडा दिसत होता तो. पण त्याचं गतिमंदत्व नजरेआड करता येत नव्हतं. आपल्या पोटचा गोळा कुरूप असला म्हणून काय झालं? शिवाय आपण कट्टर शाकाहारी आणि हे रोज मच्छी खाणारे. आपल्या घरात तर अंडसुद्धाआणलं जात नाही. त्यांनीआणि बसप्पांनी मग आपल्या बहिण-भावांशीही फोनवरून चर्चा केली. पण कोणी फारसं अनुकूल मत दिलं नाही. त्यांनी विश्वेशला, आपल्या मुलालाही फोन लावला. ‘ तुम्हाला मुलगा चांगला वाटत असेल आणि कुसुमदीदीला चालणार असेल तर हरकत नाही, असं म्हणाला तो.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मले बी रील कराचं हाय – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ मले बी रील कराचं हाय – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

घट बसायचे दिस जवळ आले न सखीनं मिटिंगसाठी शेजारच्या सखु बह्यनींना बबल्याच्या हाती निरोप धाळला. बबल्या तसं इच्चक पोट्टं! पण अशे कामं लय उड्या मारत करे. कमळी, विमली, यशोदी, धुरपदी, माली असा आट-धा जनींचा ग्रुप होता त्यायचा. नवरातीत भजनंयी कराच्या थ्या! कमळीची सासू लयच खराब! दादला बी सासूवानीच! मंग तिचे चारचौगीत उठनं बसनं व्हते मून बोलवेच कमळीले थे.

सगळ्यात पहिली कमळीच दबकत दबकत आली. तं ये सखी मोबाईल पाहत बसलेली! “काय पाहून रायली वं सखे! जंवा पायलं तवा मोबाईल घेऊन बसतं तं? ” कमळी तिले मने.

“अवं ये कमळे! सासू नं बरं लवकर धाळलं तुले” सखी 

“अवं ते कायची धाळते! म्याच आलू नजर चुकवून! थ्या समद्या येऊन राहिल्या बग. आटप तुयी मीटिंग लवकर. ” 

तशी सखीला आयळिया सुचली. ते म्हने; “कमळे! आपन या नवरातीला रील बनवू! पाय जो मोबाईलवर मस्त मस्त रिल टाकतात समदे.

कमळी कशी मनते; ” तुले कायी येळ बिळ तं नायी लागलं वं! नवरातीत देवीचे भजन करावं का रील बनवावं! ” 

“आवं तेच तर म्हणतो मी! आपन भजनाचच रील बनवू. “सखू मनली. तंवर समद्या जमल्या होत्या, त्यायनं बी येक जात ‘होऽऽ… ‘ मनलं.

कमळी काही नवरातीचं भजन सोळून रील बनवायला तयार नवती. परत सासूची भीती! तिनं पायलं म्हंजे!

मंग यशोदी मनली, “आपन अष्टमीले घागरी फुकतात त्याचंच रील बनवू. अन तुया सासूले सांगायलाच कोन चाललं वं? तुझ्या सख्यांना येवळंयी वळखत नाय का तू?

कशीबशी कमळी तयार झाली न् अष्टामीला रील बनवायचं ठरलं. येटाळ्यातल्याच पोट्ट्याला विडिओ काढायला तयार केलं.

थ्या दिवशी उपास म्हनून समद्या घरचं आटपून सखी कडे जमल्या तिच्या देवीपुढे घागरी फुकू लागल्या. फूऽऽ फूऽऽ…..

कमळीच्या सासूला कोन्या पोट्ट्यांनं जाऊन सांगितलं काय जनं? थे खिळकीतून पायत उभी होती अन मागून पोट्टे तिला दाखवत व्हते, आजी कमळी काकीले पायना!

कमळीनयी डोळ्याच्या कोपऱ्यातून तिले आमासक पायलं अन जोर जोरात घागर फुकू लागली. अंगातच आल्यावानी!

आई माय! इच्या तर खरंच अंगात आलं नायी वं! कमळीची सासू बळबळ करतच आत घुसली. कमळीने ऐकलं पन न ऐकल्यासारखंच दावलं. तिची सासू, “आई चुकलं माकलं माफ कर” मनत तिच्या पाया पडू लागली. कमळी तशी हुश्शार! लगेच तिच्या ध्यानात आलं काय करायला पायजे तं!

मोठ्यानं वरडून सासूला मने, “कमळीला नायी आनलं पाया पळायले? सून वायरी व्हंय मून शान दावा साधतो व्हय तिच्या संगं! ” तिच्या सासूची जोऽऽ तंतरली आन खातरीच पटली कमळीच्या अंगात देवीच हाय मून!

कमळीनंयी हुश्शारीनं साडी चोळीले हजार कबूल करून घेतले पयले. आन मंग सासूला म्हनली, “कमळी माझी लय भक्तीन हाय. तिले तरास देशील तं तुवं वाट्टोळं करीन! तिले खायला प्यायला नीट देत जा. अन काय वं! तुया पोराचे हात काय केळी खायला गेले काय वं? पानी भरायले बी तिलेच लावतो तं! कमळीनेयी आपलं समदं साधुनच घेतलं अन कबुल करून घेतलं समदं देवीपुढे. कमळीले त्रास द्यायचा नाय मून! ” 

हिकडं तिकडं पायत पायत अन् अंगात आलेल्या कमळीच्या पाया पडू पडू तिची सासू मनते कशी, “आता नाही तरास देनार वं आई कमळीले मी”.

कमळीच्या नव्या अवताराला अन तिच्या सासूच्या बी नव्या रूपाकडं बगून तिच्या समद्या सख्या टक्का मक्का बगतच रायल्या.

रील झालं तयार! अन फेसबुक वर टाकलं बी! रील टाकल्यावर तं कमळीची सासू लयच शेळीवानी झाली. इकडे नवराती झाल्यावर सखी अन तिच्या मैतरनी मने, “कावं तू तं शिक्सर का काय मनतात थेच टाकला सासूवर! आधी तं रील करायले बी तयार नवती! ” 

कमळीचं काम चांगलंच फत्ते झालतं. थ्ये कायदे बोल्ते आता कायी? निरा दातकाड काडू काडू हसू लागली.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रेश्माची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ रेश्माची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

” गेले पंधरा दिवस भुर्रकन निघुन! उद्या तुम्ही पण जाल! मग मात्र सासुबाईशिवाय हे घर मला आणि अविला खायला उठेल हो ताई! ” 

…. एवढं बोलून शरु ढसढसून रडायला लागली,…

ह्या पंधरा दिवसात ती बरीच खम्बीर होती. खरंतर, आईचं पडल्यापासूनच दुखणं या आठ महिन्यात तिनेच केलं होतं! आपण फक्त नावाला लेक होतो. तिच्या कर्तव्याने खरी लेक शरुच झाली होती!

त्यामुळे आपल्याला आईची उणीव जाणवणारच! पण शरुला ती जास्त प्रखर जाणवेल… स्मिताने तिला पटकन जवळ घेतलं.

थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही,.. कारण, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हे आता सगळेच अनुभवत होते,… “

तिघांनी परत मनसोक्त रडून घेतलं.

मग अलगद शरु उठली. कपाटातून तिने सासुबाईचे कानातले जोड आणि बांगड्या नणंदेपुढे ठेवल्या,.. कपाटही उघडच ठेवलं.

ती स्मिताला म्हणाली,

“ताई, आईची आठवण’ म्हणून हे दागिने आणि त्यांच्या ज्या साड्या पाहिजेत, त्या घेऊन जा! “

स्मिता उदास हसत म्हणाली,.. “अग, माणूस आठवणींनी मनात हृदयाच्या कप्प्यात जपलेला असतोच.. ह्या वस्तू, हे दागिने….. हे सगळं गौण आहे ग! मला काही नको ग! असु दे तुमच्याकडेच! आईचा एवढा दवाखाना, खर्च तुम्ही सगळं कसं पेललं असेल ह्याची कल्पना आहे मला. हे दागिने तुमच्याकडेच ठेवा,.. पण एक वस्तु मात्र मी हक्काने मागेन,… आईने रेशीम दोऱ्याची एक सुंदर झुल शिवली होती,.. ती मला दे! त्याच्या फार सुंदर आठवणी आहेत ग, माझ्या मनात! “

शरुने लगेच खालच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळलेली ती झुल काढली. स्मिताने ती गच्च छातीशी धरली. तिला परत आईची खुप आठवण आली. रडणं ओसरल्यावर ती बोलू लागली… 

“एकदा आमच्या घराच्या मागच्या अंगणात एक गाभण गाय हंबरत उभी होती. आईने तिला बघितलं आणि म्हणाली, “अग बाई इथेच पाडस जन्माला घालते कि काय,..? हिचा मालक कुठे गेला, का ही वाट चुकून इकडे शिरली? ” पण तिला आता हाकलून लावणं शक्य नव्हतं. अवि तुला आठवतंय का? त्या गावी बाबांची बदली झाली होती, तिथं आपलं मागच्या पुढच्या अंगणाचं घर होतं बघ. “

त्यावर अवि म्हणाला, ” फार काही आठवत नाही, पण त्या कच्च्या दुधाच्या वड्या.. खरवसाच्या वड्या आठवतात,.. पोटभर खायला मिळाल्या होत्या बघ! ” 

स्मिता म्हणाली, ” हं sss! तू लहान होतास फार! मला मात्र स्पष्ट आठवत सगळं! आपल्याकडे कामाला येणाऱ्या शामलाबाईंना आईने लगेच बोलवलं. त्यांना सगळी माहिती होती… 

आई म्हणाली, ” मुकं जनावर असलं, तरी त्रास आणि लाज दोन्ही असतातच प्राण्याला. ” 

भिंतीच्या कोपऱ्यात घुसून हंबरत होती ती गाय! मग आईने तिला आडोसा केला. गरम पाण्याचा शेक,…. अगदी जणू लेकीचं बाळंतपण केल्यासारखं केलं. पाडस तर किती सुंदर होतं! आणि काही क्षणात चार पायावर उभं राहिलं.

आई म्हणाली, “देवाला काळजी सगळ्या जीवांची! ह्या मुक्या प्राण्यांना बघा मिनिटात उभं करतो तो. आपली लेकरं वर्षं घेतात,.. “.

शामला बाई आईला म्हणाल्या, “फार जीव लावू नका. कधी मालक येईल आणि घेऊन जाईल तर करमणार नाही,… ” 

…. आईने तेंव्हा त्या पाडसासाठी ही झुल केली,.. अगदी रातोरात जागुन!

 म्हणाली, “आपल्याकडे नव्या लेकराला कपडे करतात त्याला झुल तरी करू! मला फार आवडली होती रेश्मी झुल! सुंदर रंगांची! मऊमऊ! मी पण जागी होते त्या रात्री. सकाळी उठून कधी त्या पाडसावर घालू असं झालं होतं! पण सकाळी जाग आली ती आईच्या रडण्याने! गाय, वासरू निघून गेल होतं आपल्या वाटेने! तू खुप रडला होतास! “बांधलं का नाहीस? ” तिला विचारत होतास.

आई म्हणाली, “ती आपली मालकीची नव्हती. तिची अडचण, म्हणून आडोश्याला उभी राहिली. आपलं मन वेडं! लगेच गुंतल त्यात! ” मी ही झुल छातीशी घट्ट धरून रडत होते.

आई म्हणाली, “रडू नकोस. स्त्री जन्म अगदी असाच असतो, बघ! तुझ्या या वयात ही गाय येऊन तुला काय काय शिकवून गेली बघ! लज्जा, वेदना, मातृत्व! बघितलंस ना, वासराला कशी चाटत होती? आनंदाने दूध पाजत होती! सगळ्या वेदना विसरून… परत आपण दिलेल्या आरामाच्या मोहात रमली नाही. गेली निघून, आपल्या कर्तव्यांचं पालन करायला! असंच असतं स्त्रीचं जगणं! माहेरी दोन दिवस यायचं, लाड करून घ्यायचे, आणि जायचं निघून परत आपल्या भूमिकेच्या युद्धावर! ” 

आईने झुल हातात घेतली. म्हणाली, ” आता येणाऱ्या प्रत्येक चैत्र गौरीला मी ही झुल घालेन. त्यावर माझी गौर बसेल. कारण, ही गाय माझ्या लेकीसारखीच आली माझ्या आयुष्यात, राहिली आणि निघून गेली. पण ह्या रेशमी झुलीवर तिच्या आठवणींच्या पाऊल खुणा सोडून गेली. ” 

…. “ आईने ह्या झुलीतून मला खूप काही शिकवलं, आयुष्यभरासाठी! ही तिची आठवण मात्र मला द्या! “

अविने आणि शरुने स्मिताला जवळ घेतलं. तिघेही आईच्या आठवणीने रडत होते, आणि ‘रेशमी झुल म्हणजे आईनेच हातात हात धरलाय, ‘ असं अनुभवत होते!

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओटी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ ओटी… ☆ डॉ. शैलजा करोडे

आज सात वाजले तरी मोलकरणीचा पत्ता नव्हता. बरं उशीरा येईन कि येणार नाहीचा फोनही केला नाही. बाप रे, आज नाही आली तर एवढा कामाचा बोजा माझ्यावर, ऑफिसमध्येही कामाचा डोंगर उपसायचा, त्यात हे सणवार, नवरात्र चालू आहे, रोजची माळ व अखंडदिप मी एवढेच करू शकते. आज अष्टमी, सासुबाईंची भुणभुण ‘आज देवीची ओटी भरुन ये ग’. दरवर्षी त्याच जात होत्या पण यावर्षी अर्धांगवायूत पाय जडावलाय, डाॅक्टरी ईलाज, औषधं, फिजिओथेरेपी सगळं चालू आहे. येईल हळूहळू गुण म्हणतात. “यावर्षी मी जाऊ शकत नाही. तू जा बाई, देवीची ओटी भर, माझा नियम मोडू नकोस, देवीला माझं गार्‍हाणंही घाल. पुढील वर्षी पाच सुवासिनींची साडी, खणा नारळानं ओटी भरीन, करशील ना ग एवढं श्रीकला. “

त्यांच्या डोळ्यात अगतिकता, कारूण्य आणि काहीतरी हरवल्याचा भास मला झाला. अश्रूंचे दोन थेंब त्यांच्या गालावरून ओघळले. मी हलकेच त्यांचे डोळे पुसले. ‘आई, काही काळजी करू नका, मी आहे ना, मी भरीन देवीची ओटी, सायंकाळी ऑफिसातून येतांना जाईन देवळात. बरं तुम्ही दात ब्रश करता काय आता. अजून मंगलाही आली नाही कामाला. चहा आणते तुमच्यासाठी. ” 

सासूबाईंनी मान हलविली. अंथरूणात पडल्यावर खरंच माणूस खूप अगतिक होतो. दुसर्‍यावर अवलंबन म्हणजे जणू परमेश्वराने दिलेली शिक्षाच. कर्तव्य भावनेने आपण करतोही, पण सातत्याने सक्रिय असणारी व्यक्ती अंथरूणाला खिळणं ही तिच्यासाठी धक्कादायक बाबच.

दरवाज्यावरची बेल वाजली अन माझी तंद्री भंग पावली. “किती ग उशीर मंगला, बघ साडेसात वाजले, माझ्या घरात आजारपण, रोहनची शाळा, यांचं ऑफिस, माझं ऑफिस. किती तारांबळ उडतेय माझी. “

“वहिनी, आज सकाळी आपली ग्रामदेवता ईच्छादेवीच्या दर्शनाला गेले होते. फुल हार चढविले देवीला, बाकी मी गरीब काय करू शकणार. हिच सेवा माझी देवीला. “

“बरं बरं, चल लाग चटकन कामाला. आईंचीही वेणी, आंघोळ कर. “

“होय वहिनी, ” मंगला चटकन कामाला लागली, तिच्या हाताला उरकही होता.

“वहिनी”

“हं, आता काय? ” 

“वहिनी मला एखादी तुमची जुनी साडी द्या ना. ” 

मागच्याच आठवड्यात बोहारणीला कपडे देऊन सासूबाईंनी तिच्याकडून भांडी घेतली होती. “आता नाही ग माझ्याकडे साडी, सासूबाईंनी मागच्याच आठवड्यात बोहारणीला दिली. “

“मग वहिनी एखादा जुना तुकडा असला पातळाचा तरी चालेल, बघा ही साडी नेमकी कमरेवर फाटलीय. ” 

मला एकदम भडभडून आलं. आज ही स्त्री मला साडी मागतेय आणि मी नवीन साडी चोळी देवीला चढवायला निघालीय. मंदिरात हजारो साड्या येतात देवीला, पुढे त्या साड्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. आपल्या समोर आपण देवीला वाहिलेली साडी एका सेकंदात बाजूला सारली जाते. यात कोणते समाधान? देवी काही मागत नाही. दोन हात तिसरे मस्तक झुकवून नमस्कार केला तरी देवीला पुरेसा असतो.

“मंगला पटापट कामं आटोपून देवघरात ये. “

मंगलाला बसायला आसन देवून तिचीच मनोभावे मी साडी खणा नारळाने ओटी भरली आणि साडी एकच नाही बरं का, दोन साड्या मी तिला दिल्या. त्या दोन्ही साड्यांवरून ती मायेनी हात फिरवू लागली आणि माझी पूजा सफल झाल्याचा भास मला झाला.

“पण वहिनी, आजी काय म्हणतील? त्या रागावतील, त्यांना काय उत्तर द्याल तुम्ही. ” 

“ते मी पाहून घेईन, तू नको काळजी करूस”.

मंगला प्रसन्न हसली.

मंगला आज सायंकाळी मला कुमारी पूजनही करायचंय. तुझ्याच आळीतील पाच गरीब मुली घेऊन येशील? त्यांना चांगले कपडे व शृंगाराचं साहित्य देईन. पोटभर जेवतीलही. आणि लवकर येऊन स्वयंपाकाला मला मदतही करशील. ” 

“होय वहिनी, येईन मी लवकर. “

धावपळ करत 8. 57 ची लोकल मिळाली. तुडुंब गर्दी, पण कोपर्‍यात खिडकीजवळ माझी मैत्रीण उषा बसलेली. “ये इकडे, तिने खुणेनेच मला बोलावले. रोजचाच प्रवास असल्याने तसे सगळे ओळखीचे चेहरे, माझ्यासाठी सगळ्यांनी दाटीवाटीने जागा केली. नवरात्रीचे दिवस असल्याने प्रत्येकीनेच जरी काठाच्या साड्या तर काहींचे कलरफुल पंजाबी ड्रेस, मॅचिंग ज्वेलरी, मोगर्‍याचे, जुईचे गजरे, इतक्या दाटीवाटीतही नुसता सुगंध दरवळत होता.

खिडकीजवळच्या गार वार्‍याने मला हलकेच पेंग येऊ लागलेली. हळूच मी भूतकाळात शिरलेली. मी नुकतीच तेव्हा नोकरीला लागलेली. कामाची धावपळ पाहाता कमीत कमी भांडी विसळायला तरी मोलकरीण हवी होती. आणि मैत्रीण मीना तिला घेऊन आलेली, एक शाळकरी मुलगी, आठवीत शिकत होती. काम मागत होती. व्यसनी बाप, लहान भावंडं, आईची होणारी ओढाताण ती पाहात होती.

“अगं, तू इतकी लहान, कशी काम करशील, “

“करीन ताई मी काम आणि शाळेतही जाईन. माझी मदत करा, मला काम द्या, नाही म्हणू नका.” 

 माझा नाईलाज झाला. “किती पैसे घेशील कामाचे?” 

तिने सांगितले व मी कोणतीही घासाघीस न करता ते मान्य केले.

“ताई “

“हं बोल, आणिक काय? ” 

“ताई मला खायला काही मिळत जाईल काय? शिळंपाकंही चालेल. ” 

माझा स्वयंपाक मोजकाच राहायचा. अन्न शिळं करण्याची मला सवयच नव्हती. “नाही, माझ्याकडे शिळं अन्न नसतं, पण मी तुला दोन ताज्या पोळ्या व एक वाटीभर भाजी देत जाईन, मी तुला टिफीन बाॅक्स आणून देईन, तो घेऊन तू शाळेत निघून जात जा. “

मुलगी खुश झाली. मलाही समाधान वाटलं. भुकेल्याची भूक आणि तहानलेल्याची तहान जाणण्याचं बाळकडूच मला मिळालं होतं.

“श्रीकला ऊठ, पुढचं स्टेशन आपलं. ” 

आम्ही दरवाज्याजवळ आलो. “काय ग, आज बरं नाही काय? ” 

“तसं नाही गं, पण थकवा जाणवतोय. कामाचा ताण, सासुबाईंचं आजारपण, त्यात हे सणवार, जीव नुसता मेटाकुटीला आलाय. ” 

सायंकाळी कुमारी पूजन साग्रसंगीत पार पडले. यांनीही देवीला नमस्कार केला आणि ऑफिसातून येतांना यांनी माझ्यासाठी आणलेली, माझ्या आवडीचा कलर असलेली भरजरी जांभळ्या रंगाची पैठणी व मोगर्‍याचा गजरा मला दिला. “ही माझ्या घरच्या लक्ष्मीची पूजा।” म्हणत यांनी मला भाळी कुंकू, भांगात सिंदूर भरला. दिवसभराचा माझा सगळा शीण, कामाचा ताण क्षणार्धात मिटला. देव्हार्‍यातील देवीचा चेहराही प्रसन्नतेने उजळला होता. आशीर्वादासाठी उंचावलेला तिचा हात जणू आमच्या शिरावर असल्यासारखा वाटत होता.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन अनुवादित कथा – (१) ‘स्क्रीनच्या अलीकडे.. पलिकडे‘ (२) ‘दिवे, वाती आणि तेल’ – हिन्दी लेखक : श्री हेमंत बावनकर ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ दोन अनुवादित कथा – (१) ‘स्क्रीनच्या अलीकडे.. पलिकडे‘ (२) ‘दिवे, वाती आणि तेल’ – हिन्दी लेखक : श्री हेमंत बावनकर ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

श्री हेमंत बावनकर

[ हिन्दी लघुकथाएँ – (१) देट साइड ऑफ़ स्क्रीन (२) दिया, बाती और तेल ] 

(१) स्क्रीनच्या अलिकडे.. पलिकडे – – 

आता हे नेहमीचंच झालं होतं. जेव्हा जेव्हा एखादा सण किंवा मुलांचे -नातवंडांचे वाढदिवस असे काही खास दिवस असायचे,  तेव्हा सेवकराम आणि त्यांची पत्नी अनुराधा आपल्या परदेशी असणाऱ्या मुलांना फोनवरूनच शुभेच्छा द्यायचे.. पण अशावेळी ते एकमेकांशी फक्त बोलायचे नाहीत,  तर विडियोवर कॉन्फरन्स कॉल लावायचे. कुणाचा वाढदिवस असेल तर त्यावेळी प्रत्येकाच्या मोबाईल स्क्रीनवर एक एक केकही असायचा.. आणि गंमत म्हणजे सगळे केक सगळेजण एकाच वेळी कापायचे … सणही असेच एकत्र.. अर्थात ऑनलाइन.. virtually एकत्र साजरे करायचे सगळे मिळून. असा आभासी का होईना.. पण सगळे मिळून त्या दिवसाचा आनंद साजरा करायचे – ‘ दुधाची तहान ताकावर ‘ म्हणतात ना.. अगदी तसंच.

या वर्षीही नेहेमीप्रमाणे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या मुलाचा फोन आला.. अर्थात नेहेमीसारखाच विडियो कॉल… दोघांनाही खूप आनंद झाला आणि लगेच त्यांनी मोबाईल उचलला.. मुलगा – सून दोघेही स्क्रीनवर दिसत होतेच,  आणि सेवकरामांचा आठ वर्षांचा मोठा नातू आणि अजून तीन वर्षेही पूर्ण न झालेला धाकटा नातूही स्क्रीनमध्ये त्यांना बघण्यासाठी आई-बाबांना बाजूला सारण्याचा प्रयत्न करत होते. दिवाळी म्हणून आजी-आजोबांनी मांडलेली सुंदर पूजा दोन्ही नातू अतिशय उत्सुकतेने बघत होते.. आणि आजी-आजोबांचा आनंद जणू गगनात मावेनासा झाला होता.

– – मोठ्या नातवाने आजोबांच्या घरची दिवाळी.. पूजा.. सगळं काही आधीही पाहिलेलं होतं. पण धाकट्या नातवासाठी ते सगळंच नवीन आणि वेगळं होतं.. आणि त्याचं कुतूहल त्याच्या चेहेऱ्यावर पाहतांना सेवकरामही फार खूश झाले होते. मग मोबाईल हातात घेऊन ते घरभर फिरत होते. बाहेरची रोषणाई.. आणि त्या रोषणाईसोबत आसपास सगळीकडेच जणू झगमगत असलेला सणाचा उत्साह आणि आनंद…. सगळं काही त्यांनी त्या सगळ्यांना दाखवलं. धाकटा नातू.. त्याचं नाव होतं ‘देव’.. तो तर कमालीच्या कुतुहलाने सगळीकडे बघत होता. स्वतः हातात धरून फुलबाज्या उडवणारी लहान लहान मुलं आणि फटाक्यांची आतषबाजी करणारी आसपासची मोठी माणसंही बघून तर त्याचे डोळे कमालीच्या कुतुहलाने भरून गेले.. त्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसायला लागली. आणि ते पाहून सेवकराम त्यांच्याही नकळत म्हणाले.. “ next year we all will celebrate Diwali in India “.. हे ऐकताच मुलगा सून दोघेही आश्चर्यचकित झाले. पण देव मात्र जरा वेळ काहीच बोलला नाही.. आणि मग आजोबांच्या इथली रंगीबेरंगी झगमगती दिवाळी पाहून भारावलेला तो त्यांना म्हणाला.. “ no Ajoba.. I would like to come to that side of screen just now.. “……

– – त्याच्या वडिलांच्या हातातल्या त्या मोबाईल स्क्रीनच्या बाहेर दिसणाऱ्या दुसऱ्या बाजूला येण्यासाठी तो मग हट्ट करायला लागला होता आणि त्यासाठी आता रडायलाही लागला होता… सेवकराम आणि त्यांची पत्नी अनुराधा त्या स्क्रीनच्या या बाजूने.. आणि मुलगा-सून स्क्रीनच्या त्या बाजूने असहाय्यपणे एकमेकांकडे पहायला लागले – – 

…. आणि.. आणि काही क्षणातच तो विडियो कॉल कट केला गेला….. पलिकडून.. आणि अलिकडे मात्र मनात रेंगाळत राहिलं देवचं मुसमुसणं……

मूळ हिन्दी कथा : ‘दॅट साइड ऑफ स्क्रीन’ – कथाकार : श्री हेमंत बावनकर 

अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(२) दिवे.. वाती.. आणि तेल – – 

एखाद्या शहरातून खळखळत वहात जाणाऱ्या नदीच्या काठाला हल्ली ‘नदीकाठ’ म्हणत नाहीत बरं का.. तर त्याला मुद्दाम सुशोभित करून ‘ रिव्हर फ्रंट ‘ असं म्हणतात.. आता आधीचे ते हिरव्यागार तजेलदार वृक्षांनी सजलेले सुंदर नैसर्गिक काठ म्हणजे जणू भूतकाळ झाला आहे. निसर्गाची ओढ लावणाऱ्या अशा

नदीकाठांच्या जागी आता दिसतात मुद्दाम सपाटीकरण करून तयार केलेल्या बागा नाहीतर मैदाने,  सिमेंटचे प्रशस्त रस्ते – सगळं कृत्रिम सुशोभीकरण.

सेवकराम रहातात त्या शहरातूनही ‘ पुण्यसलीला ‘ नावाची एक सुंदर नदी वहाते. रोज पहाटे सेवकराम जवळच्याच एका बागेत चालायला जात असत,  आणि संध्याकाळी मात्र त्यांच्या मित्रांबरोबर या नदीच्या 

‘रिव्हर फ्रंट‘ वर फिरायला जात असत. या नदीच्या काठावर एक सुंदर प्राचीन मंदिर आहे,  जिथे भाविकांची आणि पर्यटकांची नेहेमी ये-जा सुरू असते. त्या मंदिरापर्यंतच्या मार्गावरही आता पूजा-सामान आणि इतर काही वस्तूंच्या दुकानांसाठी सोय करून देण्यात आलेली आहे. आणि मंदिरापासून नदीच्या पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्याही बांधलेल्या आहेत… आता त्या पायऱ्यांवरच संध्याकाळची आरती दिमाखाने केली जायला लागली होती… आणि सगळ्यांनी हे सगळे बदल स्वीकारले होते.

नदीच्या दोन्ही काठांवर असलेल्या घरांमध्ये अजूनही पूर्वीसारखाच सकाळ-संध्याकाळ देवासमोर दिवा लावला जातो,  पण त्याच्या जोडीने आता विद्युत रोषणाईमुळे संध्याकाळी तो सगळाच परिसर छान झगमगत असतो… नदीच्या लाटांवर लहरणारा हा प्रकाश बघण्याचा मनमोहक आनंद काही वेगळाच.

लवकरच या रिव्हर फ्रंटवर एकाच वेळी लाखों पणत्या लावण्याचा विश्व विक्रम करण्याची तयारी सुरू असल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती. त्या रम्य प्रसंगाचे साक्षीदार होण्याची संधि अजिबात गमवायची नाही असा सेवकरामांचे मित्र हरिभाऊ यांचा फारच आग्रह चालला होता. रात्री १० ते ११ अशी या कार्यक्रमाची वेळ होती. ते दोघेही ठरलेल्या दिवशी,  ठरलेल्या वेळी नदीकाठावर पोहोचले होते. तिथे अगदी कडक सुरक्षाव्यवस्था होती कारण हा सोहळा बघायला प्रचंड गर्दी झाली होती. कितीतरी लोक स्वयंसेवक म्हणून आपणहून काम करत होते. सगळे दिवे एकाचवेळी सहज पेटवता येतील अशा रीतीने मांडून ठेवले होते.

…. ठरलेल्या वेळी सगळे दिवे पेटवले गेले.. ते दृश्य आणि एकूणच सगळा आसमंत अतिशय नेत्रदीपक.. सुंदर वाटत होता. त्या सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी आकाशात ड्रोन कॅमेरे तयारच होते. वेगवेगळ्या कोनांनी त्यांनी लगेच त्या दृश्याचे कितीतरी फोटो आणि विडियो काढले.. आणि थोड्याच वेळात विश्व विक्रम झाल्याची घोषणाही केली गेली. लोकांनी एकच जल्लोष केला आणि मग कार्यक्रम संपल्याची घोषणा केली गेली. या कार्यक्रमाचे साक्षीदार झाल्याबद्दल सेवकराम आणि हरिभाऊ यांनी एकमेकांचे अभिनंदन केले आणि ते जायला निघाले. त्यांना त्या दिव्यांमधूनच वाट शोधत जावं लागणार होतं…

ते जाण्यासाठी वळले आणि….

…. आणि जागीच थबकले.. त्यावेळचं तिथलं दृश्य मन सुन्न करणारंच होतं.. सुरक्षा व्यवस्था संपली होती..

…. इतक्या वेळानंतर सगळे दिवे हळूहळू विझायला लागले होते आणि अचानक कितीतरी बायका-पुरुष आणि लहान मुलांची एक झुंडच घाईघाईने तिथे पोहोचलीही होती … आणि बघताबघता त्या विझलेल्या दिव्यांवर तुटून पडली होती. त्या दिव्यांमधलं जळका वास येणारं उरलेलं तेल हातातल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ओतून घेण्याची घाई करत होते सगळेच… 

– – सेवकराम आणि हरिभाऊ हतप्रभ होऊन ते दारुण दृश्य बघत तिथेच थबकले होते…. इतका वेळ तिथे रेंगाळलेला प्रकाश अचानक गायब झाल्यासारखा वाटत होता त्यांना….

…. प्रतिष्ठितांचं विश्व विक्रम करण्याचं स्वप्न तर पूर्ण झालं होतं.. पण आत्ता इथे गर्दी केलेल्या या लोकांना त्यांच्या त्या स्वप्नाशी काहीच देणंघेणं नव्हतं… ते सगळेही खरंतर एक स्वप्न घेऊनच तिथे आले होते.. पण त्यांचं स्वप्न फारच वेगळं होतं.. ….

‘ कदाचित आता पुढचे काही दिवस तरी आपल्याला घरी जेवण बनवता येईल ’ हे ते स्वप्न …. तेच डोळ्यात साठवून आशेने ते सगळे तिथे घाईघाईने आले होते… विश्वविक्रम या शब्दाचा अर्थही बहुतेक माहिती नसावा त्यांना …तिथलं आधीचं आनंदाचं.. उत्साहाचं वातावरण या लोकांच्या आरड्याओरड्यात पार हरवून गेलं होतं…. फोटो काढणारे आधीचे ड्रोन आणि सगळे कॅमेरेवाले तर मागे वळूनही न बघता कधीच परतीच्या वाटेला लागले होते.. या आत्ताच्या दाहक दृश्यांचे फोटो काढण्याची गरजच वाटली नव्हती त्यांना.. ना त्यांना,  ना आधीच्या त्या नेत्रदीपक कार्यक्रमाच्या आयोजकांना.. आणि ना तिथे झुंडीने जमलेल्या बघ्यांनासुद्धा …….

मूळ हिन्दी कथा : ‘दिया बाती और तेल’ – हिन्दी कथाकार : श्री. हेमंत बावनकर 

अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हुंदका…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ हुंदका… ☆ प्रा. भरत खैरकर 

हुंदका – – – 

‘आपली गुड्डी आता बरीचशी मोठी दिसते! तिला आठवण वगैरे येत नाही.. कारण आम्ही तिची खूप काळजी घेतो.. “दिदी तेरा देवर दिवाना” ह्या गाण्यावर ती चांगली हातपाय हालविते आणि तोंडाने तोतरे बोल काढून नाचायला लागल्यावर साऱ्यांच्या कौतुकाचा विषय बनते! आम्ही सर्वजण म्हणजे मी, गुड्डी आणि ‘हे’ होळीला बैतुलला येणार आहोत. तुम्हीही या. भेट तिथेच होईल.

आपलीच 

अलका.

नारायणची ही मागील १५ मिनिटांपासून पत्र वाचायची तिसरी वेळ होती. त्यानं चौथ्यांदा वाचायला सुरुवात केली, तर बाहेर कसलासा आवाज आला. दोन पोरं कंपाऊंडच्या आतल्या ताराचा बंडल काठीने ओढत होते. त्याने दरवाज्यात ठेवलेली काठी संपूर्ण ताकतीने त्या पोट्ट्यांच्या दिशेने भिरकावली. पोरं तार टाकून पळाली.

आता त्याचं मन मात्र पत्रात लागत नव्हतं. कारण तो नुकत्याच गेलेल्या पॅसेंजर गाडीने येणाऱ्या शंकरची वाट पाहत होता. तो मागच्या आठवड्यात, जो गेला तो अजूनही आला नव्हता. आणि आजच्या पॅसेंजरने येतो असं त्यांना सांगितलं होतं. परवाची होळी असल्यामुळे आजच जब्बार सुद्धा उद्या येतो. म्हणून त्या आत्ताच्या पॅसेंजरने गेला होता. पण शंकर परतला नव्हता. तो आलाच नाही.

रेल्वे खात्यात नारायण ठेकेदारीत काम करायचा. शंकर, जब्बारही त्याचे सहकारी होते. ब्रॉड गेजचं काम सुरू असल्याने लाखो रुपयांच सामान शेडमध्ये नि शेडच्या कंपाउंड मध्ये पडलेलं होतं.. त्याची राखण करण्यासाठी सेक्युरिटी म्हणून तीन शिफ्ट मध्ये तिघं काम करत होते आणि एक जास्तीचा होता. शंकर मात्र मागच्या आठवड्यात गेला तो अजून उगवलाच नव्हता. त्यामुळे शंकरची ड्युटी नारायण, जब्बार आळीपाळीने करीत होते.

हे इतकं महागडे सामान आपण दोन- दोन, तीन तीन दिवट्या लागोपाठ करून राखायचं म्हणजे जिकरीचं काम आहे. थोडसं झोपतो म्हटलं तरी बाजूच्या झोपडपट्टीतील पोट्टे काही ना काही पळवायला तयारच असायचे! त्यामुळे नारायण जरा चिडला होता. त्यातल्या त्यात हे पत्र वाचून त्याला ‘कधी गावाला जातो आणि कधी नाही! ‘ असं वाटत होतं.

पण शंकर यायला हवा.. शंकर तर गोंड आहे! त्यांच्यामध्ये होळी आणि दसरा खूप जोशात मनवतात मग दोन दिवसांवर होळी असताना तो येईलच कसा? ह्या विचाराने मात्र शंकरचा नारायणला खूप राग आला. ‘सालं, आपण किती दिवस झाले बैतूलला गेलो नाही. ह्यांचं काय ह्यांना रोज रोज घरचे लोक भेटतात. मला कुठे तसे? धड आठवड्यातून एकदा तरी भेटता येत नाही. रेल्वेशी संबंधित म्हणून बरं! साहेब लोक तिकीट तरी विचारीत नाही. मागे असंच ह्यांच्या अशा सुट्ट्या मारण्याने आपण गावाला जाणार.. पण गेलो नाही. बायकोने तिच्या भावाला अजनी हेडक्वार्टरला ‘कां आले नाही? ‘ म्हणून चौकशी करायला पाठवलं तिथून तो इथे साइटवर भेटायला आला होता.. ह्या खेड्यात.. किती समजावून सांगावं लागलं होतं त्याला आणि हे मस्त उद्या येतो म्हणून चार चार दिवस गायब होतात.. मी तक्रार करीत नाही याचा अर्थ असा थोडीच होतो.. आता मी जर उद्या गावाला गेलो नाही तर काय वाटेल घरच्यांना.. बाबा घरचा कर्ता माणूसच लगोलग कळवून सुद्धा आला नाही! आणि आपल्या लहान भावाला काय वाटेल? तो तर तेवढ्या लांबून डेहराडून वरून येतोय.. सोबत अलका येणार आहे.. गुड्डीला घेऊन.. लग्न झाल्यावर आपली त्याच्याशी भेटत नाही.. सालभर झालं बहुदा.. अलकाच्या लग्नात आपली गुड्डी केवढीशी होती. धड तिचं दूधही सुटलं नव्हतं.. तर अलकानं आपल्या बायकोकडून तिला मागून नेलं होतं.. ‘आम्हांला करमणार नाही म्हणायची… शेखर ड्युटीवर गेला की तिला कॉर्टरवर गुड्डीची साथ मिळणार होती.. आपण ह्यांचं नुकतंच लग्न झालंय कशाला मध्ये गुड्डी.. वगैरे पाठवायला नको.. म्हणून ‘नाही नाही ‘म्हटलं तरी रडून रडून तिला नेली होती.. शेखरही हट्टाला पेटला होता. शेखरचा हट्ट आपल्याला कधीच मोडवत नाही मग आपणच गुड्डीला त्या दोघांच्या स्वाधीन केलं होतं..

शेखर किती लहान होता. तेव्हाच आपले बाबा वारले होते. मधल्या भावाने बैतुलला एमआयडीसीत नोकरी पकडली होती. तिथे बायकोसह स्थायिक झाला होता. त्यामुळे शेखरच शिक्षण, आईचा सांभाळ आणि आपली नोकरी एवढं सगळं सांभाळाव लागायचं आपल्याला! तेव्हाचा आपला पगार फक्त दीडशे रुपये होता आता शेखरला एकदम साडेपाच हजार रुपये पगार आहे. आईच्या मताचं ऐकलं असतं तर शेखर आज मिलिटरीत नसताच!!

बैतुलला त्यावेळी मिल्ट्री कॅम्प लागला होता. शेखर सकाळी तिथे दूध पोचवायचा. आपल्यापेक्षा तो धट्टाकट्टा वाटायचा. एक दिवस त्याच्या पेपरमुळे आपण दूध द्यायला गेलो तर मिलिटरीच्या साहेबांनी शेखर विषयी विचारून त्याला मिल्ट्रीत टाका असं म्हटलं. मी किती समजूत घालून शेखरला मिलिटरीत टाकला. आता पाहता पाहता त्याच सातव वर्ष सुरू आहे मिलिटरीतलं! मागच्या वर्षी त्यानं लग्न केलं. अलका सारखी सोज्वल भाऊसून मिळाली.. शेखरला पाहिजे होती अगदी तशीच ती आहे. आणि आता ते सर्वजण होळीला येणार आहे.. मी येथे अडकून पडलो एकटा.. ‘ नारायणला हे सारं आठवून आठवून हुंदका दाटून आला. तो बिछान्यावर आडवा पडला.. तर लगेच बाहेर पुन्हा कसला तरी आवाज आला.. नारायण चिडला.. त्यान पुन्हा काठी उचलली आणि बाहेर आला.. तर दरवाजा उघडून शंकर आत येत होता. त्याला पाहून नारायणचा दाटलेला हुंदका अश्रूच्या रूपाने बाहेर पडला..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ Life is a game of chess… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ Life is a game of chess… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

काही दिवसांपासून अजय खूप शांत शांत होता. नेहमी प्रमाणे गप्पा नव्हत्या. त्याला शांत बघायची सवयच नाही. अनिताने शेवटी विचारलेच, •••••

काय झाले? बर वाटत नाहीये का? ? की आॉफिस चे काही टेंशन? ? ••••

अजय म्हणाला, •••• तसं काही नाही ग. काल परागला अचानक भारतात जावे लागले. त्याच्या बाबांना बरं नाहिये म्हणून. हे ऐकून मला पण आई बाबांची आठवण येतेय. आता दोघांचे वय झालंय. या तीन वर्षांपासून आपण भारतात जाऊ शकलो नाही. फक्त फोनवर काय तेवढं बोलण होत. तेही आई बरोबरच. बाबांबरोबर तर तेवढंही बोलण होत नाही. मला खूप अपराधी असल्यासारखे वाटतंय. बाबांबरोबर मोकळेपणाने कधी बोलल्याचे आठवतच नाही. प्रत्त्येक वेळी असंच होतं. बाबांच्या मनातही बऱ्याच गोष्टी असतील ना. कधी त्यांच्या मनातलं समजायचा प्रयत्नच केला नाही. त्यांच्या आयुष्यातील चढ उतार, प्रश्न, पैशाचे प्रोब्लेम, ऑफिसचे टेंशन, त्यांना पण कधी ‘बरं वाटतं नाहिये ‘असं झालं असेलच ना. आता नोकरी केल्यानंतर मला कळतंय किती कठीण काम आहे हे. त्यांनी कसे मॅनेज केले असेल? ? ?. माझे व ताईचे कॉलेज शिक्षण साधारण एकाच वेळेस झाले. जेमतेम मिडिल क्लास परिस्थिती, बाबा एकटेच कमविणारे, घरी आई सर्व छान सांभाळत होती. पण बाबा नेहमी मागेच राहिले. त्यांच्याही काही इच्छा असतीलच ना. •••

अग! आई नेहमीच महत्वाची पण बाबांना का विसरलो मी? ? ?. •••••

आईने नऊ महिने पोटात सांभाळले. घरही छान सांभाळले, बाबांनी पण कष्ट केले. नोकरी केली. पैसे कमविले. स्वतः ला मागे ठेवून घराच्या, मुलांच्या आवश्यकता पूर्ण केल्या. मला पंचवीस वर्षे सांभाळले. आपल्या परिस्थिती च्या बाहेर जाऊन अमेरिकेला जायची माझी इच्छा पूर्ण केली. ••••

‘ बाबा म्हणजे पाठीचा कणा. ‘ म्हणून मागे राहून घराला आधार देत होते का? ? पण मी त्यांना का समजू शकलो नाही.? ? ? त्यांनी आपल्या किती तरी इच्छा मागे ठेवून आमचं ऐकलं. ••••

मागे आपण भारतात गेलो, तेंव्हा मी आपल्या मित्रांना जास्त वेळ दिला. आई बाबांनी काही सूचना पण दिल्या होत्या. आई म्हणाली होती… •••”अरे, कुलकर्णी काकांना भेटून ये. त्यांना बरं नसतं आता. तुझी आठवण नेहमी काढतात. ” •••

आईला आपल्या घरी भजन करायचे होते. तिला आपल्या सूनेला मैत्रिणींना दाखवायचे होते. आपण शेजारच्या लोकांना भेटावे, असे तिची इच्छा होती. एकदा सर्वांना घरी बोलवायचे ठरविले होते तिने. पण तेही जमले नाहीच. आई बोलून तरी दाखवते, बाबा मात्र शांत असतात म्हणजे दिसतात. ••••

किती छोट्या अपेक्षा होत्या त्यांच्या आपल्या कडून. पण त्याही आपण पूर्ण करत नाही. काही ही विरोध न करता, तक्रार न करता, आपल्या मनाची सहज समजूत घालतात. याउलट आपल्या येण्याची जय्यत तयारी करून ठेवतात. ••••

आता यावेळेस आपण गेलो की पूर्ण वेळ आई बाबांनाच द्यायचा. काही दिवस घरी राहून, तू तुझ्या आई बाबांना भेटायला जा. तेथे रहा. नंतर मी येईनच. त्यांच्या लहान सहान इच्छा पूर्ण करायच्या त्यांची सर्व कामे मार्गी लावायची. मेडिकल चेक अप, घरातील आवरासावर, ठरवून सगळी कामं करून‌ येऊ. त्यांच्या वयाप्रमाणे, सवयीनुसार घरात काही बदल करुन घेऊ. •••••

यावेळेस अजय अनिताचा ‘ India Visit Plan ‘ ठरला होता. फक्त घर, आई बाबा, मुख्य म्हणजे यावेळेस तो बाबांना वेळ देणार होता. बाबांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी गप्पा मारणार होता. मला तुमच्या बद्दल काय वाटतं? ? तुम्ही आमच्याकरिता जे काही केले, त्याबद्दल तो धन्यवाद म्हणणार होता. त्यांना मिठी मारणार होता. त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार होता. पेंडिंग कामं पूर्ण करणार होता. ••••

बरोबर आहे, •••••

” Your best teacher is your last mistake. ”

म्हणतात ना, ••••

 

” रिश्ते निभाने के लिए बुद्धि नहीं, दिल की शुद्धि होनी चाहिए ।”••••••

येथे आई बाबा दोघेही अजय अनिता येणार म्हणून खूप आनंदात आहेत. ••••

आई. बाबांना म्हणाली, •••••

यावेळेस आपण आपल्या कडून काही सांगायचे नाही, •••काही काम सांगायची नाही. •••याला भेटा, •• त्यांना फोन करा ••असं काही म्हणायचे नाही. •• एकतर मुलांना वेळ कमी असतो. ••त्यांचे काही कार्यक्रम ठरलेले असतात. •• खरेदी असते, •• ‘ वैशाली ‘ मधे सर्व मित्र जमतात, •• धमाल करतात. एकदा का पुन्हा परत अमेरिकेत गेले की त्यांना तरी कुठे वेळ मिळतो? ? ?. ऑफिसच काम, घरचे काम सर्व त्यांनाच तर करायचे असते. ••••

आपण सर्व साहित्य घरी आणून ठेवूया. त्यांना जेंव्हा वेळ असेल, ते जे म्हणतील तेवढं करायचे. सामान काय नंतर ही वापरता येते. मी त्या वेळेस भजनाला वगैरे काही जाणार नाही. आपण घरातच असायला हवे नाही का? ? ••••

असे आईने ठरवूनच ठेवले. •••

आई बाबांना म्हणाली… ••••अहो, तुम्ही घरी घालायला काही नवीन कपडे घेऊन या. , नवीन टॉवेल, टॉयलेट पेपर, बिसलेरी पाण्याच्या बाटल्या, अशी आईंने लिस्टच बाबांना दिली. अजय अनिताची खोली स्वच्छ करून ठेवली. एअरपोर्ट वर जायला टॅक्सी व नंतर ही येथे फिरायला टॅक्सी ड्रायव्हर बरोबर बोलून ठेवले. ••••

आईने मावशींकडून फराळाचे सर्व पदार्थ तयार करून घेतले. दिवाळीची सर्व तयारी हळूहळू सुरू केली. ••••

यावेळेस अजय अनिताला काय द्यायचे? ? या विचारात आई होतीच, तेंव्हा बाबा म्हणाले, •••• अगं! काही ‘ fixed deposit ‘ आहेत ते, या महिन्यात मॅच्युअर होतील. तेंव्हा तुला काय द्यायचे असेल ते दे. काही प्रश्न नाही. आई ने अगदी दोन पाकिट तयार करूनच ठेवली. ••••

दोघेही एकमेकांना भेटायची आतुरतेने वाट बघत होते. यावेळेस दोघांचा माइंडसेट मात्र वेगळाच होता. ••••

यावेळेस दिवाळी वेगळीच साजरी झाली. दोन्हीकडून एकमेकांना समजण्याचा, काळजी घेण्याचा प्रयत्न होता. आईने घरी भजन ठेवले. सुनेची ओळख करून दिली. अमेरिकेतुन आणलेले चॉकलेट व केसरची छोटी डबी सर्वांना दिली. •• शेजारच्या सर्वांना एकत्र बोलावून अजय अनिता शी ओळख करून दिली. ••• छान पार्टीच केली. अजय अनिता ओळखीच्या काका काकूंना भेटून आले. •••आई बाबांना जेथे एकटं जाण जमतं नाही, तेथे टॅक्सी ने घेऊन गेले. ••• अजयने आईच्या हातचे सर्व पदार्थ खाल्ले. लहानपणी खाल्लेल्या काही पदार्थांची डिमांड केली. ••• अजयने बाबांसाठी T shirts आणले. •• जाताना मला हे सर्व न्यायचे आहे असं म्हणून एक लिस्ट आईच्या हातात दिली. ••••

आईसाहेबांचा उत्साह तर बघण्यासारखा होता. •••

यावेळेस बाबा व अजयला गप्पा मारताना बघून आई चे डोळे सारखे भरून येत होते. हे आनंदाश्रु ती पदराने पुसत होती. मनोमन देवाचे आभार मानत होती. ••••

अजय बाबांना त्यांच्या नोकरी बद्दल, तुम्ही पैशाची गुंतवणूक कसे करत होता? ? त्यावेळचे आॉफिस कल्चर कसे होते.? ? ? एकंदरीत बाबांना बोलतं करत होता. त्यांचे मन समजायचा प्रयत्न करत होता. •••

कुठे तरी अजयला समाधान मिळत होत. बाबा पण खूप खुश होते. ••••

यावेळेस दिवाळी वेगळीच पार पडली. बाहेरच्या दिव्यांच्या प्रकाशापेक्षा, प्रत्येकाचे अंतर्मनात जास्त प्रकाश होता. मन उजळून निघाले होते. ••••

लहानपणी रस्ता पार करताना एक नियम शिकवला होता. ” थोडं थांबा, डावीकडे बघा मग उजवीकडे बघा, मग पुन्हा डावीकडे बघून रस्ता पार करा” ••••

खरंय, हाच नियम आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर पाळावा, सुसाट धावताना, थोडं थांबावं, काही राहिलं का? ? द्यायचे? ? घ्यायचे? ? बोलायचे? ? याचा विचार करावा. वेळेवर मन हलके करून टाकावे. म्हणजे पूढे पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही. ••••

म्हणतात ना, ••••

” Life is a game of chess. You cannot undo the moves but you can play the next move better. ” •••

” इतरांच्या आनंदासाठी केलेला प्रयत्न स्वतःचा आनंद द्विगुणित करतो. ” ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सिल्वर लायनिंग – –  लेखिका :  सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

☆ सिल्वर लायनिंग – –  लेखिका :  सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

“ ताई, मी आज लवकर घरी जाऊ? त्यो मेला कालपास्नं पिऊन पडलाय.. घरातच.. जिता हाय का न्हाई ते तरी बघत्ये एकदा” गंगूचे शब्द ऐकताच सुचेतानं लॅपटॉप वरचं काम थांबवून तिच्याकडे बघितलं.

“गंगू, असं काय बोलतेस? जा बरं घरी पटकन आणि बघ त्याच्याकडे! ” सुचेताने गंगूचा पगार तिच्या हातात ठेवला. वर शंभर रुपये जास्त दिले.

“अग, ताई काय वाईट बोलल्ये मी? त्याला सांगितलया..

भाईर पिऊन रस्त्यावर पडण्यापेक्षा घरीच पी. रस्त्यावर पडतोय कुटतरी अन् मग शोधून घरी आनावं लागतं…आता घरीच पितुया. ते फार चांगलय. ” गंगू पगार झाल्यानं खूष झाली होती. मटणाचे भाव लई वाढलेत म्हणत तिनं पैसे तिच्या लाल रंगाच्या चंचीत ठेवले.

सुचेता काही बोलली नाही पण बाबांचं व्यसन आई व आपण गंगूसारखं कधीच स्वीकारू शकणार नाही याची तिला परत एकदा जाणीव झाली. बाबा त्यांच्या उच्च वर्तुळातील मिटींग्ज मध्ये पिऊन घरी आले की ती व आई कोमेजून जात असत. दुसऱ्या दिवशी बाबा “परत कधी घेणार नाही” म्हणत केवळ पुढच्या वेळेपर्यंत! त्याला काहीच अर्थ नव्हता. पण बाबांना घरी पिऊ द्यावं हे आईला कधीच मानवलं नसतं. आईला रडत बसलेली बघून सुचेतालाही रडवेली व्हायची.

गेली पंचवीस वर्षं गंगू सुचेताकडे कामाला होती. दोन मुली व एक मुलगा होता. नवरा असून नसून सारखाच होता. तो दारू पिण्यासाठीच जन्माला आला होता. किराणा मालाच्या दुकानात बरी नोकरी होती पण ती त्याच्या दारूमुळं टिकली नाही..

“ताई, तो मनानं लई चांगला हाय.. आपण दारू पिनाऱ्यास शिव्या देतो.. पन मानूस का प्यायला लागला ह्ये नाही बघत कधी.. हाल झालेत त्याचे.. ” गंगू त्याची कुठली चांगुलकी घेऊन सारवासारव करत बसली होती ईश्वराला ठाऊक. ती त्याला अस्सल ठेवणीतल्या शिव्या मोजत असे पण नंतर मटण भाकरी खायला घालत असे. भुगा झालाय शरीराचा म्हणून दूध पाव देऊन त्याला झोपवत असे.

गंगूच्या संसाराचं वस्त्र छप्पन ठिगळं लावूनही फाटत आलं होतं. पण तरी ती ते पूर्ण फाटू न देण्याचा तिचा निश्चय कधीच डळमळला नाही. कौशल्यानं ती एकेक नवं ठिगळ जोडत राहिली! मोठ्या मुलीनं, मीनाने, एका ख्रिश्चन तरूणाबरोबर पळून जाऊन लग्न केलं तेव्हा सुचेतानं गंगूकडील नव्या शिव्यांचा साठा ऐकून कान झाकून घेतले.. पण त्यानंतर पोरं सासरी गेली.. मी तिची नीट पाठवणी केली नाही.. म्हणून डोळ्याला पदर लावलेलाही सुचेता बघत होती! मीना पळून गेल्याच्या तिसरे दिवशी गंगू कामाला आली ती बदाम वेलदोडा घातलेला शिरा घेऊनच!

“ताई, किरीस्तावाशी लगीन केलं मीनाने एवडं सोडलं तर बाकी समदं उत्तम हाय. प्रामानिक हाय मुलगा. त्याचं हाटेल आहे. भरपूर पैसा मिळिवतो. स्वताचं घर हाय. सासु सासरं न्हाईत मीनाला. काय वाईट हाय? त्यो म्हनं चर्चला घेऊन जातोया मीनाला अन् किरिस्ताची गाणी शिकवतुया! काय बी वाईट न्हाई. समदे देव सारखचं बघ. समदे चांगल्या गोष्टीच करा म्हनतात.. आणि दारू न पिनारा मानूस म्हणजे द्येवच की! छान हाय जावई माजा. ब्येस झालं मीनाचं! ”

दोन दिवसात आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून तिचं तिनं स्वत:साठी जे तत्त्वज्ञान बनवलं ते ऐकून सुचेता चकित झाली होती. धर्म बदलला म्हणून मुलीशी नाळ तोडलेले तिचे काका काकू नातवंड झालं तेव्हा जळाबाहेरील माशासारखे तडफडले होते पण त्यांनी लेकीला माफ केलं नाही की नातू बघितला नाही. सतत पूजा पाठ करणारे काका पारशी माणसाशी लग्न केलेल्या लेकीला कधीच क्षमा करू शकले नाहीत..

आणि ही अडाणी गंगू.. दोन दिवसात लेकीला माफ करून मीनाचं कसं चांगलं झालं साऱ्यांना ऐकवत होती. नात झाली तेव्हा लेकीचं बाळंतपण मनापासून करत होती. “ताई, अळवाचे लाडू करू का मीनासाठी” विचारून दोन लाडू सुचेतालाही खायला घालत होती.

गंगूची धाकटी, शलाका, हुशार निघाली. सरकारी कचेरीत कसलीशी नोकरी करत तिनं तिथल्या एका पोलिसाशी लग्न करून गंगूला सुखाचे चार दिवस दाखवले. पण गंगू सुखानं जगायला जन्माला आलीच नव्हती..

किर्तनाला गेलेला तिचा लेक, सदा, हार्ट अटॅक येऊन जागच्या जागीच गेला अन् गंगू उन्मळून पडली. यातून गंगू सावरणार नाही वाटत असताना मुलाचे दिवस करून कामाला आलेली गंगू सुचेताला म्हणाली, “ताई, बरी हायस नव्हं? डोळ्याखाली लई काळं दिसतया.. भांडलीस की काय सायबांशी? ”

“तापातून उठलेय ग गंगू. तुझा सदा गेला कळलं अन त्याच रात्री एकदम ताप भरला मला. माझ्या जीवाला त्याचं जाणं आणि तुझे हाल झेपले नाहीत. ” सुचेता छताकडे बघत होती..

गंगू खिन्न चेहऱ्यानं हसली. “अगं ताई, मानसाची जन्मायची व जायची येळ ठरलेली असतीया. सदा किरतानाला बसला होता! आवडला विठूरायाला. म्हणाला.. चल रे सदा.. हा तयार झाला. आता इतं राहून तरी कुटलं युध जिंकायचय आपल्याला? चांगलं झालं त्याचं. आपल्याला काय आपलं मानूस हवच असतय. मी कंबर कसून उभी आहे बघ सुनेच्या व नातवाच्या पाठीशी…त्या पोरीचं चांगलं झाल्याशिवाय डोळं मिटनार न्हाई मी.. नातू हुशार हाय माजा!

गंगू डोळे पुसता पुसता हसत होती.. माजं आयुष लई चांगलं गेलं बघ. दु:ख आलं नशीबी पन ताई परत्येक दु:खात ना कायतरी चांगलं दडलं होतं बघ. ते मी शोधाया शिकले म्हनून समदं चांगलं झालं.. नरक नरक मंजे काय दुसरं नाई ताई.. जन्माला येऊन दु:खातलं सुख न दिसनं म्हणजे नरक. लई दिलं देवानं! काय बी तक्रार नाही माझी! ”

तिनं हात जोडले. त्या रापलेल्या चेहऱ्यावरून फक्त कृतज्ञता ओघळत होती. देवावर राग नव्हता की नशीबावर राग नव्हता. कुठल्या तोंडानं ती तक्रार नाही म्हणत होती तिचं तिलाच ठाऊक!

महिनाभरात तिच्या कपाळ्यावरच्या अधेली एवढ्या कुंकवाचा धनी पण दारू पिऊन गेला तेव्हा तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला नाही. ती त्याच्या तिरडीजवळ शांत बसली होती. मयताला आलेल्या लोकांकडे बघून म्हणाली,

“गेला ते बरं झालं.. दारू तरी सुटली. आपल्या समाजाचा या दारूने लई नाश केलाय.. किती कुंकवं पुसली.. आता तरी शिका आणि सोडा दारू नाहीतर रोज एका मयताला जाऊ आपण सगळे. ” तिचा थरथरणाऱा आवाज तेथील स्तब्धता चिरत गेला. रोज दारू पिणारे काही महाभाग मान खाली घालून उभे होते.. फारशी आशा न ठेवता गंगू काहीबाही बोलत राहिली आणि बाया बापडे ते ऐकत राहिले..

सुचेतानं तिच्या लॅपटॅापकडे बघितलं. एक मेसेज फ्लॅश होत होता. बुध्द तत्वज्ञानाच्या एका कोर्ससाठी ती नाव नोंदवत होती. स्क्रीनवर मेसेज होता..

“बुध्द टिचिंग्ज वर्कशॅाप”

“Be happy not because everything is good, but because you see good in everything”

Register in next 10 mins to save your spot..

गंगू आतून चहा घेऊन आली.

“लई अंधारून आलंय ताई.. चहा घे. काम झालं नव्हं? मुगाची खिचडी टाकू का? खाऊन घे दोन घास! ”

तिनं उठून गंगूला कडकडून मिठी मारली. हे चालतबोलतं तत्वज्ञान समोर असताना तो कोर्स काय नवीन शिकवणार होता? शाळा न शिकलेली गंगू काय बुध्दाकडे कोर्स करायला गेली होती? संकटांच्या सतत धगीतून आणि ती रोज गाणाऱ्या अभंगातून ते तत्वज्ञान साकार झालं होतं!

गंगू गोंधळून गेली होती. ताईला आपल्यासाठी वाईट वाटतंय? गंगू सुचेताची पाठ थोपटत होती..

“ताई, माज्यासाठी नको वाईट वाटून घेऊ. मी छान हाय. तुज्यासारख्या जीवाभावाच्या, नोकर माणसाला समजून घेणाऱ्या म्याडमकडं मी नोकरी करते. उसनं पैसं मागते. काय खाल्लं काय प्यायलं तू कधी काही विचारत नाहीस.. मला धीर देऊन उभं करतेस.. तू आहेस म्हणून बळ येतं पुढचा घाव सोसायला. यापेक्षा काय हवं माणसाला? ”

Every cloud has a silver lining! ते ज्याला बघता आलं त्यानं सारं काही मिळवलं.. कुणाच्या आयुष्यात काळे ढग येत नाहीत? पण त्यामागे लपलेलं इंद्रधनुष्य बघता आलं पाहिजे.. ते बघण्याची इच्छा व सामर्थ्य असावं लागतं.. ते केवळ आपल्या साधनेतून निर्माण होतं! सुचेतानं डोळे पुसले.

लॅपटॅापवरील बुध्दाच्या कोर्सची विंडो केव्हाच बंद होऊन गेली होती.. Expired असा मेसेज दिसत होता..

आकाशात काळे ढग दाटून आले होते.. कधी कोसळेल माहित नव्हतं..

त्या ढगांची चंदेरी कड शोधण्यात सुचेता रमून गेली होती!

(सत्य घटनांवर आधारित)

लेखिका :  सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाक – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ बाक – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(तो त्या सर्वांबद्दल विचार करायचा आणि आनंद व्यक्त करायचा. त्या सर्वांना प्रोत्साहन देत असतांना, आतल्या आत कुठेतरी आणि कधीतरी स्वतःबद्दल विचार करतांना उदास होणे हे तर स्वाभाविकच होते.) – इथून पुढे —- 

 मैदानात पाणी पोहोचवणे, कर्णधाराचा संदेश देणे आणि मैदानातील खेळाडूंना शुभेच्छा देऊन परत येणे हे ठरलेले होते. मग तो दिवस आला जेव्हा संघातील तीन खेळाडूंना एकाच वेळी पेटके यायला लागले. मात्र इतरांचा हा त्रास त्याच्यासाठी संधी बनली. आता मैदानात जायची पाळी त्याची होती आणि ज्या दिवसाची तो गेली कित्येक वर्षे वाट पाहत होता तो दिवस आला. तो नेटवर सतत सराव करीत होता. त्याचे हात चांगलेच स्थिरावले होते. तो इतरांपेक्षा अधिक मेहनत करत होता आणि त्याचे आरोग्यही त्याला चांगल्या प्रकारे साथ देत होते. प्रत्येक खेळाडूच्या कमकुवतपणाची स्थाने त्याच्या मनात घट्ट रुजली होती. शेवटी इतकी वर्षे धीर धरल्याचे त्याला गोड फळ मिळाले.

आतापर्यंत तो इतरांचा जयघोष करीत त्यांना प्रोत्साहित करीत होता, पण आता मैदान त्याच्या जयजयकाराने दुमदुमले होते. पण वर्षानुवर्षांपासून ज्या आनंदासाठी तो अत्यंत आसुसलेला होता, जो आनंद त्याने पूर्णपणे अनुभवला देखील नव्हता, नेमक्या त्याच वेळी एका जबर दुखापतीने त्याला बाकावर तर सोडाच, थेट घरीच बसवले. मात्र याच बाकाच्या कृपेने तो केवळ एक उदयोन्मुख खेळाडूच नाही तर एक लढाऊ व्यक्ती बनला. बाकावर बसून प्रेक्षकासारखा सामना बघणे आणि विरोधी संघाचा सामना करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरणे हे दोन संपूर्णपणे वेगळे अनुभव होते. याच संघर्षशील वृत्तीने त्याच्या नशिबाची दारे सताड उघडली. त्या प्रतिक्षेच्या क्षणांत त्याने दाखवलेली संयमी वृत्तीच त्याचे सर्वात मोठे आणि महत्वाचे संचयित धन बनले. तेव्हापासून आजतागायत त्याने मागे वळून पाहिले नाही. हा बाकच त्याची प्रचंड शक्ती बनली. याच बाकावर बसलेला असतांना तो शगुनला सर्वप्रथम भेटला होता, इथेच शगुनने त्याला तो बाप बनणार आहे, ही गोड बातमी दिली होती आणि याच बाकावर त्याला शगुन गेल्याचे देखील कळले होते. या बाकाभोवतीच त्याच्या आयुष्याचे कित्येक अध्याय लिहिल्या गेले होते, आणि हो! अजून किती लिहिण्याचे शिल्लक होते कोणास ठाऊक!

 तो फक्त कामातून निवृत्त झाला होता, आयुष्यातून नाही. तो अनेक ठिकाणी गेला, पण त्या प्रत्येक ठिकाणी तो बाक हजर असायचा. तो त्याला जणू कांही प्रेमळ साद घालत होता, “ये ना! तुझ्या स्वागतासाठी मी इथेही हजर आहे बरं कां! ” निवृत्तीपूर्वी बाक त्याचा सवंगडी होता आणि आता निवृत्तीनंतर तर तो त्याचा आधारच बनला. त्याच्यासाठी बाक ही निव्वळ चार पायांवर उभी राहिलेली निर्जीव अशी बसण्याची जागा नव्हती. त्याच्या आयुष्यात या बाकाला वेगळाच अर्थ होता. या बाकाच्या प्रत्येक पायाने त्याला किती मोठे योगदान दिले. पहिल्याने व्यवसाय बहाल केला, दुसऱ्याने कुटुंब दिले, तिसऱ्याने त्याला आशेने जगायला शिकवले आणि चौथ्या पायाने त्याचा ध्यास जिवंत ठेवला. अशाप्रकारे, त्याच्या आयुष्यातील आनंदाची प्रसन्न पहाट असो वा दुःखाची कठीण काळरात्र, प्रत्येक प्रसंगी हा बाकच त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.

 कधीकधी तो एकटाच बसायचा. मग त्याच्या जीवनात शगुनने प्रवेश केला. दोनाचे चार हात झाले. त्यांच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या आणि मग काय, मुलांसोबत चाराचे आठ हात झाले. दोन्ही मुले मोठी झाली. त्यांना पंख फुटले आणि ते त्यांच्या आसमंतात विहार करायला उडून गेले. पुन्हा एकदा, फक्त ते दोघेच पती-पत्नी असे दोघेच मागे राहिले. काळ पुढे सरकत होता आणि एक दिवस हे वर्तुळ पूर्ण करीत शगुन देखील त्याला एकट्याला सोडून निघून गेली, कधीही न परतण्यासाठी! आता फिरून तो शून्यावर येत एकटाच उरला. इकडे तिकडे भटकत जीवनचक्राचे वर्तुळ पूर्ण करीत जिथून सुरुवात केली होती तिथेच तो परत येऊन पोचला. जणू एखादा मूर्ख माणूस आपल्याच घरापासून फारकत घेत दूर दूर भटकून येत परत त्याच घरी येऊन विसावतो. काळाच्या प्रवाहात जुने इमले ढासळत होते आणि नवीन वास्तू बांधले जात होते. अनेक ठिकाणी बाकडे गायबच झाले होते. वयोमानाने थकल्यामुळे आता तो फार दूर जाऊ शकत नव्हता. त्याने आपल्या मुलांकडे तक्रार केली, “माझी शगुन मला सोडून गेली आणि आता एकाकीपणाच्या या वेदना मला असह्य होत आहेत. ” त्याच्या लाडक्या लेकीने यावर एक कल्पना सुचवली, “बाबा, आता तुमच्या अंगणातच तुमचा आवडता बाक बनवून घ्या बरं. बघा, आपल्या स्वतःचा बाक असला की तुमचे सुख तुमच्याच हाती असेल. हवे तेव्हां आणि हवे तितके बसा, आडवे व्हा, अंमळ एखादी छानशी डुलकी घ्या किंवा मस्त झोप काढा. ” हे ऐकल्यासारशी जणू संपूर्ण जगाचा आनंद एकवटून त्याच्या चेहऱ्यावर झळकला होता. लगेचच एका तयार आरामदायी बाकाची ऑर्डर देऊन तो मागवल्या गेला. त्यावर स्थानापन्न होताच त्याच्या चेहऱ्यावरील हास्य म्हणाले, “ह्यॅ! एवढी लहानशी गोष्ट! हे तुला आधीच कां सुचले नाही? ” 

 मात्र प्रत्यक्षात घडले असे की जसजसे दिवस मंदगतीने पुढे सरकत होते तसतसा त्याचा एकमात्र प्रवास खोलीपासून अंगणातील बाकापर्यंतच सीमित झाला. तरीही हे समाधान होते की, कसा का होईना हा प्रवास सुरु होता. त्याच्या मालकीचा तो बाक भलेही घरात होता तरी त्यावर बसल्या बसल्या तो विचारांच्या वेगवान स्वैर अश्वावर आरूढ होत दूरवर मैलोनमैल फिरून यायचा. वर्षानुवर्षे जपलेल्या आठवणींचे चर्वितचर्वण अनवरत सुरूच असायचे. आणि मग, आपल्या स्वतःच्या बाकावर बसण्याचा अपरिमित आनंद काय वर्णावा! त्यात काय नव्हते! प्रेम-ममता, आदर-सन्मान, संवेदना -धैर्य, मोह-माया सर्व कांही!

 उणीव होती एकच, ती म्हणजे वर्तमान स्वीकारण्याचे धाडस! निष्क्रिय क्षणाची संख्या वाढत वाढत शेवटी असंख्यांवर जाऊन पोहोचली. ते क्षण त्याला टोचून टोचून भयंकर वेदना देत गेले. कधीकधी दगडांचे घासून घासून वाळूत रुपांतर व्हायचे तर कधी वर्षे उलटल्यानंतर त्याच रेतीचे ढीग जमा होत तेच कठोर खडक बनत. इतिहासाच्या पानांचे देखील असेच परिवर्तित होणारे थर असत. सरतेशेवटी, एके दिवशी, त्याच्याच प्रिय बाकावर बसल्या बसल्या तो अनंताच्या यात्रेला निघाला, कधीही परत न येण्यासाठी! निर्जीव बाक तिथेच ठामपणे बसला होता चार पायांवर, कुठल्या तरी अनामिक पथिकाची वाट पाहत! अखेरचे मिटण्यापूर्वी त्याच्या अदृश्य, तरीही सजीव नेत्रांनी बाकाकडे रोखून पाहिले. त्या बाकावर एक धूसर प्रतिमा उमटत होती. त्याने ओळखले! बाकावर तूलीच बसलेली होती!

– समाप्त –

हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप 

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाक – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ बाक – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

आज तूली या त्याच्या नातीची व्हॉलीबॉल संघात निवड झाली. त्याला असे वाटत होते जणू आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे जाते आहे. तो मोठ्या उत्साहाने शेवटचे दोन सामने बघायला गेला, पण प्रत्येक वेळी त्याला त्याची नात बाकावरच बसलेली दिसली. ती कधी तिच्या संघाला प्रोत्साहित करतांना दिसत होती, कधी संपूर्ण संघाबरोबर जयजयकार करताना दिसली, तर कधी संपूर्ण संघात दाटीवाटीने सामील होताना दिसली. त्या निरागस बालिकेला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी तो तळमळत होता. त्याला समाधान याचे वाटत होते की तूली संयमाने आणि संतुलन राखून वागत होती. घरी आल्यानंतरही तिने अजिबात तक्रार केली नाही. त्याला एकाच गोष्टीची भीती वाटत होती की जरी ती काही बोलली नाही तरी तिला मनातल्या मनात या गोष्टीचे शल्य नक्कीच बोचत असणार.

मात्र तूलीला जास्त काळ वाट पाहावी लागली नाही. लवकरच ती खेळू लागली आणि संघातील एक विशेष खेळाडू म्हणून ती ओळखल्या जाऊ लागली. आता मात्र त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. मंडळी, खेळ कोणताही असो, कांही खेळाडू नेहेमीच बाकावर तिष्ठत बसलेले असतातच, आपली पाळी केव्हां येईल याकडे अत्यंत आतुरतेने डोळे लावून बसलेले असतात ते! आजकाल टीव्हीवर क्रिकेट सामने पाहतांना, त्याची नजर मैदानापेक्षा बाकांवर बसलेल्या खेळाडूंकडेच जास्त वळायची. ते कधी मैदानावर पाण्याच्या बाटल्या घेऊन जायचे, तर कधी मैदानात खेळणाऱ्या फलंदाजाची बॅट बदलण्यासाठी. कधी तर कर्णधाराचा शीघ्र संदेश देण्यासाठी सुद्धा त्यांना मैदानावर जावे लागे. त्याने आयुष्यभर हेच तर केले होते. खेळ जीवनाचा असो वा मैदानातला, हा बाक त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून राहिला. एका पतीच्या नात्याने त्याने पत्नीसोबत याच बाकावर बसून प्रेमाचे हितगुज केले. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर जेव्हां तिची साथ सुटली, त्यानंतरही या बाकावर ती कित्येकदा अवचितपणे येत त्याला लगटून बसल्याचा त्याला भास व्हायचा. दोघांचे संभाषण सुरू व्हायचे, अनवरत चर्वितचर्वण असायचे ते!

तो एक पिता होता, साहजिकच कामे आटोपताच फुरसत मिळाल्याबरोबर तो बागेतल्या बाकावर निवांत बसून विश्रांती घ्यायचा. आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल, त्यांचे आयुष्य स्थिरस्थावर होण्याबाबत आणि त्याच्या नातवंडांच्या संगोपनाबद्दल अखंड विचार सुरु असायचे. जणू काही एका मालिकेप्रमाणे एकामागून एक घटनाचक्र त्याच्या नजरेसमोर तरळत असे. या घटना असायच्या कधी वर्तमानातील, कधी भविष्यकालीन तर कधी भूतकाळात घडलेल्या. कांहीही असो, तो एक असा खेळाडू होता ज्याने बाकावर बसून जीवनाचे तत्वज्ञान आत्मसात केले होते, जणू कांही त्याच्या जीवनात प्रवेश करणारा प्रत्येक बाक त्याच्या प्रत्येक प्रवासाची दशा आणि दिशा ठरवत होता.

निवृत्तीनंतर एक बाक सोडला तर सर्व कांही मागे राहिले! सकाळचे चालणे असो वा संध्याकाळचे, मध्ये अंमळ विश्रांती घेण्यासाठी तो नेहमी बाकावरच टेकायचा. हालचाल करत राहा, थांबा आणि पुढे जा. घराबाहेर पडण्याचे हे लहान सहान प्रयत्नही आता एका लांब लचक प्रवासासारखे वाटायचे. थोडे चालणे, थोडा वेळ उसंत घेणे, तजेला आला की परत पुढे चालणे हे सुरु असायचे. तेव्हां बाकावरील विसावा त्याला नवीन ऊर्जा देत राहायचा, कारण त्याच्या शरीरात ना आता पूर्वीसारखी ताकद राहिलेली होती ना मनामध्ये तशी उभारी! तरीही, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन अनुभव देऊन जायचा. प्रत्येक दिवसाचा छोटेखानी प्रवास, एक अनवट अनुभव आणि एक अपरिचित भावविश्व घेऊन अवतरायचा, जणू कांही ही नुकतीच घडलेली घटना आहे.

बाकावर बसताच, त्याच्या भूतकाळातील असंख्य स्मृतींच्या रिळांच्या गुंडाळ्या जणू फ्लॅशबॅकसारख्या उलट्या दिशेनं गोल गोल फिरायला लागत. ती स्थळे, चेहरे, घटनाक्रम… सगळे त्याच्या समोर उभे ठाकायचे. भूतकाळाच्या राखेत दबलेले कित्येक स्फुल्लिंग वाऱ्याची चाहूल लागताच अग्निज्वालेचे रूप धारण करण्यास आसुसलेले असत. दैवदुर्विलास असा की बऱ्याच गोष्टी आपल्या समोर असतानाही अदृश्य असतात आणि ज्या नसतात त्या सतत आपल्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचत गात असतात. कदाचित यालाच आपण म्हातारपण म्हणतो, जेव्हा शरीर आणि मन यांच्यातील गुंतागुंतीचे संबंध अधिकच जटिल होत जातात. जणू काही तलम रेशमी धागे एकमेकांत गुंतत आणखीनच विचित्रपणे गुंफले जातात. त्यामुळे पडलेल्या गाठी उलगडण्याऐवजी अधिकच घट्ट होत गुंतागुंतीत भर घालतात आणि त्यांच्यातच विचित्रपणे अडकलेले तन व मन या अस्वस्थतेत भरच टाकीत जाते.

आजही, नेमक्या त्याच गोष्टी जणू त्याला चिडवण्यासाठी मुद्दाम त्याच्यासमोर आल्या होत्या. या त्याच गोष्टी होत्या ज्यांना आयुष्यभरासाठी विसरण्याची त्याची इच्छा होती. त्याने त्या गोष्टींपासून सुटका मिळवण्याचा जितका कसून प्रयत्न केला, तितक्याच इर्षेने त्या त्याचा पाठलाग करीत त्याला आयुष्यभर छळत राहिल्या. जीवनातील खडतर काळातल्या आठवणींच्या उभ्याआडव्या धाग्यांनी विणलेल्या शुभ्र कापडावर पडलेला अमिट डाग कधीही नष्ट होत नाही कापड फाटेस्तोवर धुतला तरी! कित्येक वर्षे उलटून गेली, पण ती घटना जणू काही आत्ताच घडल्यासारखी ताजी वाटत होती. जेव्हां संघात त्याची निवड झाली, तेव्हां त्याच्या आनंदाला पारावर नव्हता. घरच्या, कुटुंबातील इतर सदस्यांच्या आणि गावातील सर्व लोकांच्या आनंदाला उधाण आले होते, अभिमानाने त्यांची हृदये काठोकाठ भरून गेली होती. त्यांच्यापैकीच एक असा मुलगा जन्माला आला होता ज्याने त्यांचे आणि गावाचे नांव गौरवान्वित केले होते. राष्ट्रीय संघासाठी खेळणे ही खरोखरच फारच अभिमानास्पद गोष्ट होती. खेळाडूचा गणवेश घातल्या घातल्या त्याचा फोटो काढल्या गेला. आता सामना सुरू झाला, एक, दोन, तीन. खेळाडूंची मोजणी सुरू होती. पण त्याचे दुर्दैव असे की त्याला खेळण्याची संधी मिळालीच नाही. वाट पाहणाऱ्या बाकावर बसल्या बसल्या तो प्रत्येक खेळाडूचा कमकुवतपणा आणि त्याचे वैशिष्ट्य बारकाईने ओळखू लागला. तो त्या सर्वांबद्दल विचार करायचा आणि आनंद व्यक्त करायचा त्या सर्वांना प्रोत्साहन देत असतांना, आतल्या आत कुठेतरी आणि कधीतरी स्वतःबद्दल विचार करतांना उदास होणे हे तर स्वाभाविकच होते. 

– क्रमशः भाग पहिला 

हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप 

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares