मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ ” – लेखिका : ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सायबर गुन्हेगारी आणि स्वसंरक्षण” – लेखक : सीए शिरीष देशपांडे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : “ सायबर गुन्हेगारी आणि स्वसंरक्षण “

लेखक: सीए शिरीष देशपांडे

पृष्ठ: २३६ 

मूल्य: ३००₹ 

सायबर सजगता अभियान!!!! 

बदललेली समाज व्यवस्था, त्या बरोबरच तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे इंटरनेट म्हणजेच आंतरजालाचा वाढता प्रभाव हा प्रत्येकाच्या सध्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत आहे. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून बहुसंख्य लोक इंटरनेट वापर आणि मोबाईल वापर प्रचंड प्रमाणात करत आहेत. सायबर चोरटे बरोबर ह्याचा बेमालूम फायदा उठवत आहेत.

होम मिनिस्ट्रीच्या अखत्यारीत असलेल्या इंडियन सायबर क्राईम को ऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या २०२५ मध्ये नोंदवल्या गेलेल्या सायबर गुन्ह्यांची आकडेवारी धक्कादायक आणि काळजी वाढवणारी आहे. त्या अहवाला-नुसार रोज नवीन नवीन युक्त्या लढवून सायबर चोरटे हा लूटमारीचा मोठ्ठा व्यवसाय म्हणून करत आहेत.

ह्या पुस्तकात सध्या होत असलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांतील काही महत्त्वाचे गुन्हे, त्यांची कारणे आणि ते होऊ नयेत म्हणून उपायही सुचवले आहेत. सदरहू लेख वेळोवेळी दैनिक सकाळ, पॉझिव्ह्यू सकाळ, सकाळ मनी आणि लोकसत्तामध्ये छापून आले आहेत. अनेक वाचक आणि हितचिंतक यांचे आग्रहामुळे एक संकलित पुस्तक छापावे म्हणून हा सायबर सजगतेचा प्रयोग.

सायबरगुन्हे होण्याच्या मागे काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे. पहिले म्हणजे अदृश्य भीती अथवा घाबरून जाणे आणि चोरटे त्याचा फायदा घेऊन समोरच्याच्या मेंदूचा ताबा घेतात, आणि त्यात ‘मी आहे ना’ असा खोटा मदतीचा हात पुढे करतात. दुसरे कारण पैशाचा मोह ह्यामध्ये कोणतीही व्यक्ती त्यात पटकन अडकत जाते. तिसरे कारण सायबर गुन्ह्यांची अजिबात माहिती नसणे किंवा तंत्रज्ञान वापराचे धोके माहीत नसणे. चौथे कारण म्हणजे आभासी जगतातील सर्व माहिती खरी समजणे. ह्या सर्वावर उपाय म्हणजे क्षण प्रतिक्षण सतर्कता. हे पुस्तक वाचून ही सतर्कता नक्कीच वाढू शकेल.

भावना-भीती-भावनिक मनस्थिती याद्वारे आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेणाऱ्या ह्या सायबर चोरट्यांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने स्व-रक्षण करणे म्हणजेच सतर्क राहणे गरजेचे आहे. जे आपले आई बाप देतात तेच फुकट असते बाकी सर्व फुकटच्या गोष्टींची किंमत मोजावीच लागते. समाज माध्यमांचा अतिवापर मर्यादित करणे, आपले इंटरनेटचे वाढते व्यसन काबूत आणणे, ह्या गोष्टी आता प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक करणे गरजेचे आहे.

सायबर गुन्हेगारीचा हा विळखा वेगाने वाढत आहे. दर मिनिटाला हजारो नवीन टेलिफोन कनेक्शन्स घेतली जात आहेत. आर्थिक स्तर थोडा उंचावला कि ते स्मार्ट फोन वर जात आहेत आणि असे नवीन नवखे ग्राहक चोरट्यांच्या हातात आयते सापडत असावेत.

आगामी काळात नुकत्याच आलेल्या Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) ह्या तंत्रज्ञांनामुळे आणि स्टार लिंक (आंतराष्ट्रीय इंटरनेट कंपनी) च्या वेगवान इंटरनेटमुळे हे सायबर गुन्हे वेगाने माहितीचा वेध घेतील आणि कळायच्या आतच वेगाने लोकांना लुबाडण्यात यशस्वी होतील ही मोठ्ठी भीती आहे. वाचक हे पुस्तक वाचून येऊ घातलेल्या सायबर युद्धाची तयारी म्हणून सतर्कतेचे धडे घेतील अशी लेखकाला आशा वाटते.

हे पुस्तक वाचून बहुसंख्य वाचक स्वतःला संभावित गुन्ह्यापासून वाचवतील अशी लेखकाला खात्री आहे.

या पुस्तकात खालील विषय संदर्भात फसवणूक कशी होते आणि घ्यावयाची काळजी याची माहिती देण्यात आली आहे……

समाजमाध्यमांवरील मैत्री नवी सायबर गुन्हेगारी.

‘टेलिकॉम’ फसवणूक 

‘क्रिप्टो’ गुंतवणूक आणि फसवणूक

‘डिजिटल अरेस्ट’मुळे कोट्यवधींचा फटका.

हॉटेल बुकिंग करताना सावधान! . ९१

व्हॉट्सअॅपवर लग्नपत्रिका! सावधान! .

पॅनकार्ड २. ०च्या नावाने फसवणूक.

समाज माध्यमांवर ८०० वेबसाइट्स फसव्या.

फसवे ‘एसएमएस’

बनावट वेबसाइट आणि फसवणूक ऑनलाइन कामाच्या मोहापायी नुकसान! . १३०

‘ऑनलाइन गेम’चे अघोरी व्यसन १३५

‘पिग बुचरिंग’ फसवणुकीचे नवे तंत्र… मृत व्यक्तीच्या नावाने सायबर गुन्हेगारी.

क्रेडिट कार्डावरून फसवणूक 

फसव्या लिंकद्वारे फसवणूक कशी टाळाल? . इत्यादी

अजून बरेच विषय आहेत. विषय वाचून आणि लिहून दमायला झाले. किती नवीन नवीन प्रकारे फसवणूक होऊ शकते आणि आपण काय do’s and don’ts केले पाहिजेत हे या पुस्तकात सांगितले आहे.

सर्वांच्या घरात हे पुस्तक असेलच पाहिजे.

सायबर गुन्हेगारी संदर्भात सगळ्यांनी बघावा असा एक माहितीपर व्हिडिओ.

https://www. facebook. com/share/v/1E8uB2yNuG/

**

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “यश अपयश आणि मी” – लेखिका : डॉ. विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत ☆ परिचय – सुश्री गौरी गाडेकर ☆

सुश्री गौरी गाडेकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “यश अपयश आणि मी” – लेखिका : डॉ. विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत ☆ परिचय – सुश्री गौरी गाडेकर

पुस्तक : यश अपयश आणि मी 

…. असाध्य ते साध्य.

लेखक: डॉ. विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत 

प्रकाशक: माय मिरर पब्लिशिंग हाऊस 

प्रथमावृत्ती: नोव्हेंबर २०१७

पृष्ठे:१९२

किंमत:₹१९५/-

‘यश अपयश आणि मी’ हे डॉ. विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत यांनी लिहिलेलं पुस्तक. आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या आईला पुन्हा जीवनोत्सुक बनवण्याच्या प्रयत्नांची ही अनुभवगाथा आहे.

आईंच्या शेजारीच राहणाऱ्या विठ्ठल सरांच्या भावाने ‘तू दोन तास आईबरोबर काढून दाखव, ‘ या शब्दांत आईंची हेटाळणी केली. त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या वागण्यामुळे आईंच्या आत्मसन्मानावर आघात झाला आणि त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. त्यातूनच अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सनचा उद्भव झाला.

यावर काहीही उपाय नाही, असं डॉक्टरांनी सांगूनही विठ्ठल सरांनी हार मानली नाही. आपल्या कर्तृत्ववान, खंबीर आईला यातून बरं करण्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं.

एकेक प्रयोग करत पायरीपायरीने सरांनी आपल्या आईला या रोगांच्या विळख्यातून कसं मुक्त केलं, यांची ही कहाणी आहे. त्यांच्या मते, यामागचं रहस्य म्हणजे ट्रिपल Aकॅप्सूल – Attention, Affection & Appreciation. यातून त्यांनी दिलेला अत्यंत महत्त्वाचा धडा म्हणजे ‘If you take care of your parents, your children will take care of their parents. ‘

या अनुषंगाने आपण, अपयशाचे रूपांतर यशात कसं केलं, याची इतरही अनेक उदाहरणं सरांनी दिली आहेत.

तसेच सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतरही पैलू, त्याविषयीचे संदर्भ या पुस्तकात वाचावयास मिळतात. उदाहरणार्थ, पर्यावरणप्रेमी सरांनी पक्ष्यांसाठी केलेली व्यवस्था, ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई’ या गीतावरून स्फुरलेलं ‘A child gives birth to a mother’ हे शिल्प, हे बांद्रा, मुंबई येथील ज्या बागेत आहे, तशा तऱ्हेने जोपासलेल्या अनेक बागा वगैरे.

सौ. वर्षा बेटावदकर यांच्या लेखनसहाय्यामुळे हे पुस्तक अतिशय परिणामकारक झाले आहे.

आईचा उसवलेला चेहरा विणून पूर्ववत करणारे विठ्ठलसर दर्शवणारे मुखपृष्ठ हे या पुस्तकाचे सार आहे. ही कल्पकता श्री. सतीश भावसारांची.

एकंदरीत, ‘यश अपयश आणि मी…. असाध्य ते साध्य’ हे पुस्तक नुसतंच वाचनीय नाही, तर संग्रहणीय आहे. एवढंच नव्हे, तर किशोरवयीन मुलांवर चांगले संस्कार घडावेत, यासाठी त्यांना भेट म्हणून देण्यासारखं आहे.

परिचय –  सुश्री गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “पैलतटावर” – लेखक : श्री विलास कोल्हे ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? पुस्तकावर बोलू काही ?

“पैलतटावर” – लेखक : श्री विलास कोल्हे ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर 

पुस्तक – पैलतटावर 

लेखक-विलास कोल्हे

प्रकाशक-मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस.

पृष्ठ संख्या-२०२.

पुस्तक मूल्य- रुपये-२५०/

ऐलतटावरून पैलतटावर गेलेल्या या सुहृदांच्या आठवणींचा, जन्म आणि मरण या दोन टोकांच्या मधल्या जीवनात या मंडळींनी किती आणि कसं काम केलं याचं चित्रचं. यात एकूण तेरा दिग्गजांच्या लेखातून साहित्याचा अभ्यास करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, प्रज्ञेला चिकाटीची जोड कशी द्यावी लागते हे उलगडत जाते. 

एका अर्थानं हे लेख वाचणे हे आजच्या काळातल्या साहित्याच्या अभ्यासकांसाठी एक उत्तम प्रकारचे शिक्षणच आहे. मराठीमध्ये किती मोठ्ठ्या गुणवत्तेची माणसं बौध्दिक परिश्रम अहर्निश करत होती आणि त्यांनी मराठी समीक्षा-संशोधनाच्या क्षेत्रात काय काम करून ठेवलं आहे, आणि ते एकंदरीत मराठी साहित्याला कसं उपकारक आहे, याची जाणीव करून देणारे हे लेख आहेत. 

हा संग्रह म्हणजे साहित्यक्षेत्रातील दिग्गजांच्या कार्याची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा .. वाचकाला अनेक अर्थानं समृध्द करणारा संग्रह आहे.

परिचय : श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दुडिया” – लेखक : श्री विश्वास पाटील ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “दुडिया” – लेखक : श्री विश्वास पाटील ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर 

पुस्तक – दुडिया  

लेखक-विश्वास पाटील.

प्रकाशक-मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस.

पृष्ठ संख्या-१४७

पुस्तक मूल्य- रुपये-२००/

दुडिया या एका शरणार्थी नक्षलवादी तरुणीची कहाणी सांगणार्‍या या कादंबरीत नक्षलवादींच्या प्रश्नामागची उकल करून दाखवतात. यात त्यांची कार्यपध्दती, त्यांच्या नेत्यांची विचारसरणी आणि जीवनशैली, नक्षलवादानं देशापुढं उभा केलेला धोका, आदिवासिंची हलाखीची परिस्थिति, त्याचं सरकारी

कर्मचारी आणि नक्षलवादी यांनी कठीण केलेलं जीवन या सार्‍याचचं चित्र वाचकाच्या नजरेसमोर उभं करते.

विश्वास पाटील यांच्या छत्तीसगड भागातील सरकारी कामानिमिताने काही काळाच्या वास्तव्यात असताना त्यांच्या सराईत लेखणीनं नक्षलवादाचा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे आणि भयानक आहे, स्थानिक आदिवासीचं जीवन त्यानं कसं आणि किती व्यापून टाकलं आहे. त्यांचे आयुष्य अनिश्चिततेच्या भोवर्‍यात अडकलेल हे जग प्रत्ययकारक पध्दतीनं अनेक तपशिलांसह जिवंत केलं आहे. त्यामुळचं ही कादंबरी आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. वाचकाला अस्वस्थ करतानाच त्याला विचारात पाडते.

परिचय : श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “श्रीमद् भागवतातील भारत” – लेखक : डॉ. विद्यासागर पाटंगणकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “श्रीमद् भागवतातील भारत” – लेखक : डॉ. विद्यासागर पाटंगणकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : श्रीमद् भागवतातील भारत

लेखक: विद्यासागर पाटंगणकर

पृष्ठ: १६४

मूल्य : २५०₹ 

श्रीमद् भागवत हा एक अपूर्व ग्रंथ आहे. महर्षी वेदव्यास रचित हा ग्रंथ प्रासादिक तर आहेच, तसाच तो प्रसन्न शैलीतून प्रसाद, माधुर्य, ओज आदी गुणांसह निर्वेद स्थितिप्रत नेणारा व मानवी जीवनाच्या कल्याण, साफल्य व अंतिम उद्देशाचे भान देणारा ग्रंथ आहे. श्रीमद् भागवतात मूळ अध्यात्म ज्ञानाचे चिंतन व विवरण असले, तरी भौतिक सृष्टीतील सर्व विषय त्यात सहज ओघात येऊन गेलेले आहेत. भारतीय ऋषिमुनींची जीवनदृष्टी, त्यांची मूल्यदृष्टी, त्यांची जीवनधारणा व जीवनप्रेरणा या सर्वांचे त्यात सखोल व सूक्ष्म दर्शन घडते. त्यात मानवी जीवनातील सर्वच विषयांचे, शास्त्र विचारांचे दिग्दर्शन घडते. भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र यांप्रमाणेच गणित, भौतिकशास्त्र, वास्तुशास्त्र, आरोग्यशास्त्र, स्त्रीरोग विज्ञान, विविध कला, साहित्य, नाट्य, धर्म, तत्त्वज्ञान, विविध कालगती, कालमान व कालभान यांचेही दर्शन घडते. व्यासनिर्मित हे भागवत म्हणजे खरोखरच त्यांनी प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे,

निगमकल्पतरोर्गलितं फलम् (वेदरूपी वृक्षाला आलेले व पिकलेले रसमय फलच आहे! )

देवर्षी नारदांच्या अनुग्रहाने या ग्रंथाची निर्मिती महर्षी व्यासांनी केली व त्यांना मनःशांती मिळाली, हीच संहिता त्यांनी शुकमुनींना शिकवली व तेच त्यांनी राजा परीक्षितास कथन केले.

श्रीमद् भागवत हे एक दिव्यपुराण आहे. त्याला ‘महापुराण’ अशी संज्ञा आहे. सामान्य पुराणे पंचलक्षणयुक्त असतात, तर भागवत दशलक्षण युक्त आहे.

‘अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः । मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः ।।’

पुराणांच्या माध्यमातून द्रष्ट्या ऋषी-महर्षीनी बहुसंख्य लोकांना ज्ञान देण्याचाच शुद्ध विचार केलेला आहे. बहुजन समाजाला, स्त्रिया व शूद्रांना वेदाचा अधिकार नसल्याने, त्यांना पुराणांच्या माध्यमातून वेदज्ञान त्यांनी सांगितले. हे ज्ञान निर्दोष आणि निष्कपट होते. त्यांनीच म्हटले आहे की,

धर्मः प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां । वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं

महर्षी वेदव्यासांनी ‘स्त्रीशूद्र द्विजबंधूनाम् त्रयीन श्रुतिगोचरा’ ही भूमिका ठेवून हे ज्ञान पुराणात ग्रंथित केले म्हणून ‘पुराणातील वांगी पुराणात ठेवा, ‘ असे उपरोधाने – उपहासाने म्हणणे म्हणजे त्या द्रष्ट्या महर्षीचा केवळ अपमान आपण करतो! केवळ अज्ञानाने किंवा पुराणांचा नव्या दृष्टीने शोध न घेतल्याने आपणास पुराण / पोथी गतार्थ वाटते; पण हे चुकीचे आहे. पोथी-पुराण हा विषय उपहासाचा परिहासाचा – टिंगलटवाळीचा नसून, खरे शास्त्रज्ञान, त्रिकालज्ञान देणारे ते प्रकाशगर्भ आहेत. म्हणून, पुराण वेद उपनिषद भारतीय परंपरेचे एकूणच ग्रंथ नव्याने, नव्या संदर्भात नवा अन्वयार्थ देऊन तपासणे, ही काळाची गरज ठरते. भागवत पुराणाकडे त्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.

या भारताबद्दलचे निरतिशय, प्रगाढ प्रेम, राष्ट्रनिष्ठा व भारतीय जीवनाबद्दलची नितांत ओढ व्यास महर्षीच्या वाणीतून प्रकट झाली आहे. आज ज्याला राष्ट्रप्रेम, देशनिष्ठा (Patriotism, Nationality) म्हणतात, ती फार पूर्वीच ५००० वर्षांपूर्वीच ऋषिमुनींनी प्रकट केली आहे. ती पाहण्यासारखी आहे. या भारतात एक क्षणभर जरी जन्म मिळाला तरी मी धन्य होईन. हे ऋषींचे उद्गार काय सांगतात?

श्रीमद् भागवतातील भारत’ या ग्रंथाचे लेखक विद्यासागर पाटंगणकर यांनी भागवतातील देशभक्तीकडे सर्वांचे लक्ष वेधले, ही अत्यंत अभिनंदनीय व स्तुत्य बाब होय. श्रीमद् भागवतातील ‘भारतवर्षा’चा शोध घेताना व माहिती सांगताना लेखक केवळ भारताच्या भौगोलिक सीमा व तीर्थस्थळे यांच्यात न रमता भारतीय संस्कृतीचे ज्ञानात्मक व भावात्मक हृदय त्यांनी यात उलगडून दाखविले आहे. प्राचीन भारतीयांची जीवनदृष्टी, कालगणना, पर्यावरणविचार, वैज्ञानिक प्रगती, वर्णाश्रम धर्म, स्थापत्य विज्ञान, राष्ट्र विकास, समन्वयाचा संदेश, आध्यात्मिक उपदेश, कथारूपकांचा उलगडा, विश्वकल्याणाची आकांक्षा अशा अनेक विषयांचे सादर व सकस, पण सुलभ व प्रांजळ प्रतिपादन करून लेखकाने भारतीय संस्कृतीचे अंतर्बाह्य मनोज्ञ दर्शन घडवले आहे.

मूळ ग्रंथाच्या वाचन-परिशीलनाने अभ्यासक व वाचक सुखावतील!

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ध्यास ‘वंदे मातरम्’ चा” – लेखक : श्री मिलिंद प्रभाकर सबनीस ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“ध्यास ‘वंदे मातरम्’ चा” – लेखक : श्री मिलिंद प्रभाकर सबनीस ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

 (एका अमर राष्ट्रगीताची दीडशेवी वर्षपूर्ती होत आहे… त्या निमित्ताने…)

 

पुस्तक : ध्यास ‘वन्दे मातरम्’ चा

लेखक: मिलिंद प्रभाकर सबनीस

पृष्ठे: १६०

मूल्य: २३० ₹ टपाल ३५ ₹ एकूण २६५ ₹ घरपोच

वन्दे मातरम् हे शब्द शालेय जीवनात रोजच शाळा सुटताना उच्चारत असलो, तरी त्याबद्दलची फारशी माहिती आजही सर्वसामान्यांना नाही. शालेय विद्यार्थ्यांना तर बंकिमचंद्रांनी हे गीत लिहिलं, एवढीही माहिती फार कमी प्रमाणात असते.

अमरेंद्र गाडगीळ हे त्या काळातील बालकुमारांसाठी संस्कारक्षम आशयाच्या कथा लिहिणारे लेखक म्हणून प्रसिद्ध असले, तरी त्यांचा मूळ पिंड संशोधक, अभ्यासक अशा कोशकाराचा होता. अमरेंद्र गाडगीळ हे ‘वन्दे मातरम्’ या विषयावर मराठीत पुस्तक लिहिणारे पहिले लेखक. १९७३च्या सुमारास मराठीत प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे इंग्रजी, हिंदीसह आणखी काही भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. १९७५च्या आणीबाणीच्या काळात या पुस्तकातील काही भागावर सरकारी यंत्रणेकडून आक्षेप घेण्यात आला. आणीबाणीच्या आसपास सरकारनं सुचवलेला भाग वगळून या पुस्तकाची आवृत्ती प्रकाशित झाली तरी आणीबाणी उठल्यानंतरच्या काळातल्या सर्व आवृत्त्या मात्र मूळ मजकुरासह प्रकाशित झाल्या व पुढे हे पुस्तक अधिकच लोकप्रिय झालं. पुस्तक पृष्ठसंख्येच्या दृष्टीनं छोटं असलं तरी आशयात्मकदृष्ट्या मोठं होतं. वन्देमातरम् विषयी अधिक उत्कंठा निर्माण करण्याचं सामर्थ्य अमरेंद्रांच्या शब्दांत होतं.

ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे या पुस्तकाबद्दल म्हणतात की – –

‘राष्ट्रभक्तीने भारलेले असंख्य असतात; पण वेदमंत्राइतकेच वंदनीय असणारे ‘वन्दे मातरम्’ हे आपले राष्ट्रीय स्तोत्र, राष्ट्रीय गीत! या गीताच्या जन्माला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे सुमंगल लेणे लाभले असताना, या परमपवित्र राष्ट्रीय गीताचा, जन्मस्थळाचा व त्याभोवती असलेल्या काहीशा निगूढ पदरांचा वेध घ्यावासा वाटणे, हे संवेदनच विलक्षण दुर्मीळ आहे.

अमरेंद्र गाडगीळ यांनी लिहिलेल्या बंकिमचंद्रांच्या छोटेखानी चरित्र पुस्तकातून ‘वन्दे मातरम्’ या मंत्राशी मिलिंद सबनीस यांचे भावोत्कट नाते जुळले. भले हे छोटेखानी पुस्तक असेल, पण त्यामुळे एका अद्भुत यात्रेसाठी मनाने पाऊल पुढे निघण्यासाठी ते आतुर झाले. पुढे मग निमित्ते कशी येत गेली आणि ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा समग्र संदर्भाने शोध घेण्याचा ध्यास लेखकाला कसा जडला, याचा प्रवास लेखकाने या पुस्तकात उलगडला आहे. ’

ही ध्यासयात्रा केवळ ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या जन्मस्थानाभोवती वा त्यातून प्रसरणाऱ्या मंत्रवत प्रार्थनालहरीपर्यंत न राहता, पुढे नव्या पिढीत हा राष्ट्रीय विचार रुजावा म्हणून त्यांनी अथकपणे जिवाचे जे रान केले, त्या घटनांचेही दर्शन या पुस्तकातून घडते. प्रत्येक देशभक्ताच्या संग्रही असावे असे हे पुस्तक.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हँगमन” – लेखक : सुश्री ज्योती पुजारी ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर  ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “हँगमन” – लेखक : सुश्री ज्योती पुजारी ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर 

पुस्तक : हँगमन 

लेखिका : ज्योती पुजारी

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन

पृष्ठ संख्या-२०८

पुस्तक मूल्य- रुपये-२०/

फाशी हा शब्द ऐकताच तनमन थरारते.

‘फाशी देणारा माणूस’ आणि त्याचे अंतर्बाह्य जीवन कसे असते, या प्रश्नांचे उत्तर म्हणजे ज्योती पुजारी

लिखित ‘हँगमॅन’ ही कादंबरी.

जल्लाद! .. फाशी देणारा, दूसरा अर्थ आहे क्रूर, निर्दय.

अशा माणसांचे जीवन जवळून पाहण्याची संधी ज्योती पुजारीनां मिळाली. कादंबरीचा नायक हा फाशीचा साक्षीदार. फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना फाशी देणारा नायक एक सरकारी नोकरदार माणूस.

… माणुसकी जपणारा. आपुलकिने वागणारा. कैद्यांना फाशी देणे म्हणजे एका जीवाने दुसर्‍याचा जीव घेणे हे पाप आहे असे समजणारा. गुन्हेगार मरतात पण कादंबरीचा नायक मात्र मानसिक यातना भोगत राहतो.

प्रत्येकाला आपला जीव प्यारा.

फाशीचा तेलकट गळफास लावताना मनातल्या मनात जल्लाद माफी मागतो.

प्रत्येक प्रसंग जिवंत करण्याची लेखिकेची अभ्यासपूर्ण शैली आणि वातावरणनिर्मितीची भक्कम पकड

या दोन गोष्टी भाषेची शान आणि प्रवाहीपण कायम राखतात.

अगदीच वेगळ्या विषयावरचे हे पुस्तक निश्चितच वाचण्यासारखे आहे.

परिचय : श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “उसवण ” – लेखक : श्री देविदास सौदागर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “उसवण ” – लेखक : श्री देविदास सौदागर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक : “ उसवण “.

लेखक : देविदास सौदागर.

प्रकाशक : देशपांडे  आणि कंपनी पब्लीशर्स. पुणे

पहिली आवृत्ती :अॉगस्ट २०२२

दुसरी आवृत्ती:जून २०२४

पृष्ठे:११६

किंमत: १६० रु 

देविदास सौदागर यांची युवा साहित्य पुरस्कार २०२४ ची विजेती कादंबरी वाचण्यात आली जी मनाला भिडली, डोक्यात रेंगाळत राहिली आणि म्हणूनच विचार करायला लावणाऱ्या या कादंबरी विषयी मला लिहावसं वाटलं. विशेष म्हणजे प्रस्तुत लेखकाची ही पहिलीच  कादंबरी आहे.

संपूर्ण कादंबरीतले संवाद, पात्रांच्या मनातले विचार हे ग्रामीण भाषेत असले तरीही लेखकाच्या भाषाशैलीमुळे त्यातला गोडवा, गावरान भावना वाचकाच्या मनापर्यंत अलगद पोहोचतात. जो विषय या कादंबरीत  हाताळला आहे त्या विषयातला सजीवपणा, ती संस्कृती टिकवण्यासाठी ही बोलीभाषा अत्यंत प्रभावी ठरलेली आहे. पुस्तक वाचताना झालेली माझी ही पहिली महत्त्वाची प्रतिक्रिया.

या कादंबरीतलं मुख्य नायक पात्र आहे “विठू”.

एका लहानशा गावात “विठू”चा शिवणकामाचा छोटासा अगदी पोटापुरताच दाम देणारा व्यवसाय आहे. संपूर्ण गावात कापडं शिवणारा शिंपी हीच विठूची ओळख आहे.

त्याची पत्नी “गंगी” ही त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असते आणि त्याच्या प्रत्येक कामात, सुखात, दुःखात तिची अगदी “नाति चरामि” अशी समर्पित साथ  असते. या पती-पत्नीचं प्रेमाचं नातं अतिशय विलोभनीय आणि मनाला भावविभोर करणारं आहे. त्यांच्या प्रेमविवाहाची कहाणीसुद्धा अतिशय गंमतीदार आणि लडिवाळपणे लेखकाने लिहिली आहे. या दांपत्यास दोन मुलं आहेत. मुलगी अतिशय हुशार आणि महत्त्वकांक्षी तर मुलगाही आईबापांवर माया करणारा, काळजी घेणारा, कर्तव्यदक्ष असाच आहे. एकंदर विठूचं दारिद्र्यातलं कौटुंबिक चित्र जिव्हाळ्याचं आहे. संकटात, गरिबीतही प्रेमभावाच्या अतूट धाग्याने बांधलेलं आहे.

गाव, गावातली माणसं, शिक्षक, विद्यार्थी, वेगवेगळ्या स्वभावाचे आणि मनोवृत्तीचे गावकरी आणि विठूचा शिवणकामाचा छोटासा धंदा– यांचे परस्परांशी असलेलं कधी स्नेहभावाचं, अप्रामाणिकपणाचं, फसवणुकीचं, गुंडगिरीचं, दादागिरीचं नातं आणि विठूचा जीवन प्रवास हे या कादंबरीतील कथानकाचे मुख्य सूत्र आहे.

लग्नसराई, सणवार याच दिवसात नवे कपडे शिवून वर्षभर पुरेल इतकी तुटपूंजी का होईना कमाई करणाऱ्या विठूच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या खडतर जीवनाविषयी वाचताना वाचकाच्या मनात करुणा, दया भावना, सहजपणे उत्पन्न होते तसेच फसव्या गोड बोलून काम करून घेऊन पैसे बुडवणाऱ्या धनदांडग्या  लोकांची मनस्वी चीड येते. लेखकांनी कादंबरीत विखुरलेली पात्रं, त्यांच्या मनोवृत्ती, आपसातले संवाद, भांडणे अतिशय सरळ साध्या शब्दात पण रसाळपणे मांडले आहेत. वाचता  वाचता  आपणही  त्या गावाचा एक भाग बनून जातो.

या कादंबरीत वेगवेगळ्या टप्प्यांवर सर्व भावभावनांचे स्त्रोत  अनेक प्रसंगातून अनुभवायला मिळतात.

पती-पत्नीचं नातं, मुलांविषयीची जागृत कर्तव्य भावना, त्यासाठी मेहनत करण्याची तयारी, आईवडिलांच्या श्रमाची जाणीव ठेवणारी मुलं आणि दुसरीकडे धक्का देणार्‍या दुनियादारीचा मन कालवून टाकणारा अनुभव याचं एकत्रिकरण इतकं प्रभावी पद्धतीने लेखकाने केलं आहे की ही कादंबरी अक्षरशः वाचकाच्या मनावर गारुड करते.

प्रामाणिकपणे लोकांची गरज, नड जाणून, विश्वास ठेवून काम करणाऱ्या विठूवर, एका खून झालेल्या मृत व्यक्तिच्या अंगावर विठूने शिवलेले कपडे आढळल्यामुळे त्यालाही या गुन्हेगारी प्रकरणात विनाकारण गोवले जाण्याचा प्रसंग उद्भवतो. अनेकदा पोलीस चौकीवर चौकशीसाठी त्याला बोलावले जाते. या साऱ्या प्रकरणात विठू आणि त्याचे कुटुंब अगदी केविलवाणे होऊन भरडले जाते. या सर्व प्रसंगांची वर्णने वाचताना वाचकाला चीड, हळहळ, दया, करुणा, दुःख, सत्याचा वाली कुणीच नसतो वगैरे भावना ग्रासून टाकतात.

साध्या साध्या वाक्यातूनही खूप मोठ्या जीवनतत्त्वांना लेखकाने या कादंबरीतून स्पर्श केला आहे.

“अन्यायाची मांडणी करणारी सगळी सामग्री जाळून टाकली पाहिजे

उरलेल्या मजकुरावर राख उपटेपर्यंत आपणच डोळ्यात तेल घालून पेटवली 

पाहिजे ही आग…”

किंवा,

“सरळसोट जगता आलं पाहिजे 

रात्रीच्या उरावर बसलेले दिवस

ओळखता आले पाहिजे 

बेवारस क्षणाच्या निर्मितीला 

चाप लावता आला पाहिजे

डोक्यावर पाय देणारे लोक

कोलता आले पाहिजेत…”

ही  एका वेडसर पण नैराश्य आलेल्या सुशिक्षित तरुणाच्या तोंडची सैरभैर वाक्ये काळीज चिरून टाकतात.

कालांतराने रेडीमेड कपड्यांचा नवीन जमाना येतो आणि विठूच्या हातात कामं उरतात ती फक्त उसवलेलं, फाटलेलं, विरलेलं, बिघडलेलं, शिवण्याचं. त्यावेळी विठूच्या मनात येणाऱ्या विचारांचं अगदी हृदयद्रावक शाब्दिक वर्णन लेखकाच्या लेखणीतून उतरलं आहे.

“आपलं आयुष्य चिंध्यासारखं झालय. धड जपता यिना ना धड फेकता यिना. अवघा देह म्हणजे चिंधी झालाय जणू! सगळ्या जगण्यावर ठिगळ लावलेलं ठळक दिसालय. ”

थोडक्यात “उसवण” ही एका शिंप्याच्या जीवनातली पराभवाची, दुःखाची कहाणी आहे. परिवर्तन काळात, लहानसहान जीवने सर्वांगाने उध्वस्त कशी होतात हे विदारक सत्य दर्शविणारं एक वास्तविक कथानक यात आहे. आजकालच्या अराजकतेच्या, अमानवीकरण्याच्या सीमेवर पोहोचलेले लोकजीवन, याचेही दर्शन या कादंबरीत घडते.

या कादंबरीचे “उसवण, हे शीर्षकही खूप अर्थपूर्ण आहे. “जेव्हा आभाळच फाटतं तेव्हा कुठे कुठे ठिगळं लावणार” असा एक असाहाय्य उसाचा या “उसवण” शब्दात जाणवतो. या कादंबरीतला नायक “विठू” तुटू पाहणाऱ्या, मोडकळीस आलेल्या त्याच्या व्यवसायाची भिस्त  पुढच्या पिढीवर ठेवून एक सकारात्मक आशावाद बाळगतो. त्यामुळे वाचकाच्या मनातही नकारात्मक वास्तवाला सामोरे जाताना एक आशेचा किरण दिसतो. जिथे गोष्ट संपते तिथूनच ती पुन्हा अद्रुश्यपणे  नव्याने सुरू झाल्याचाही भास होतो.

निरनिराळ्या क्लेषदायक  प्रसंगातून उलगडणार्‍या आणि एका होरपळणाऱ्या मानवी जीवनाचं दर्शन देणारी ।उसवण”  ही कादंबरी साहित्य प्रेमी लोकांनी जरूर वाचावी.

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ मला कवीचा चष्मा लागला (काव्यसंग्रह)… कवी : अरुण वि. देशपांडे ☆ परिचय – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? पुस्तकावर बोलू काही ?

मला कवीचा चष्मा लागला (काव्यसंग्रह)… कवी : अरुण वि. देशपांडे ☆ परिचय – सौ.ज्योत्स्ना तानवडे

पुस्तक : मला कवीचा चष्मा लागला (काव्यसंग्रह)

कवी – श्री. अरुण वि. देशपांडे

प्रकाशन – संवेदना

किंमत- रु. १५०/-

ज्येष्ठ लेखक कवी श्री. अरुण वि. देशपांडे यांचा ‘मला कवीचा चष्मा लागला’ हा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला. कवी, लेखक, बालसाहित्यिक, समीक्षक असे साहित्याच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री. देशपांडे यांचा ७७ पुस्तकांचा प्रदीर्घ मोठा अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे कवीची लेखणी सशक्त समृद्ध बनलेली आहे. हे कवीचे ७८ वे पुस्तक म्हणजे कवीचा ३२ वा. कवितासंग्रह आहे. या पुस्तकांमध्ये ३ कवितासंग्रह पुस्तक स्वरूपात, अनेक बालकवितासंग्रह, ई बुक स्वरूपातले कवितासंग्रह, प्रिंट बुक स्वरूपातील २ हिंदी कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मराठीसह हिंदी भाषेतही त्यांनी काव्य लेखन केलेले आहे. तसेच त्यांनी श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज यांच्यावरही अनेक रचना लिहिलेल्या आहेत.

या कवितासंग्रहाच्या वेगळ्या शीर्षकाने मन आकर्षून घेतले‌. सर्वसाधारणपणे चष्मा लागणे हे प्रौढत्वाचे लक्षण आहे. काही अपवाद असू शकतात. पण रूढार्थाने चष्मा लागणारी व्यक्ती ही वैचारिक परिपक्वता येऊन अनुभवसिद्ध असते. तशीच इथे कवीची स्थिती आहे.

आपल्या या दीर्घकालीन काव्य लेखनाबद्दल कवी आपल्या मनोगतात खूप छान व्यक्त होतात. कवी म्हणतात, ” सतत कवितांच्या संपर्कात येण्याने, लिहिण्या, वाचण्याने माझी कवीची नजर अधिक सूक्ष्म, सजग होत आहे असे वाटू लागले आहे. ” आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या ‘दर्शनी’ आणि ‘अंतरंग’ अशा दोन्ही स्वरूपात फार फेरफार झाले आहेत. तसेच कवी- वृत्तीत वाढ झाली आहे असे कवी पुढे म्हणतात. कवी मनाची अस्वस्थता, घालमेल, स्वप्नाळू वृत्ती, व्यक्त होण्याची असोशी हे सर्व कविगुण आपल्यात झिरपत गेल्याचेही कवी सांगतात.

या गोष्टींचा या संग्रहातील कविता वाचताना सतत अनुभव येतो. अतिशय साध्या, सोप्या, सुलभ भाषेत सर्व कविता लिहिलेल्या आहेत. ४ ते ५ कडव्यांच्या या आटोपशीर कविता आहेत.

या सर्व कविता अक्षरवृत्त, अभंग, ओवी, मुक्तछंद स्वरूपातील आहेत. उपमा, अलंकाराची कारागिरी नाही. छंदोबद्ध, वृत्तबद्ध कविता, गझल लेखन अशा तंत्रशुद्ध कविता लेखनासाठी लागणारा अभ्यास, लेखन तंत्रशुद्धता याचा आपल्यापाशी अभाव आहे याची कवी मनोगतात प्रांजळ कबुली देतात. त्यामुळे त्यांची कविता सुबोध आणि वाचकप्रिय झालेली आहे.

त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनातल्या विविध अंगांना स्पर्श केलेला आहे. निसर्ग, पाऊस, आपला गाव, नाती, आई, कुटुंब, आठवणी, संस्कृती, मैत्री, कवी, कविता, ध्येय, स्वप्नं अशा आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित असंख्य गोष्टींवरील या एकूण ८३ रचना यात समाविष्ट आहेत.

कवीचा चष्मा लावून आजूबाजूच्या विश्वाचा वेध घेणारा कवी आपल्या शब्दात त्या त्या भावना व्यक्त करतो, कारण

शब्द वश या वेड्याला

वेदनेची कविता लिहायला!

 

कवी असतो 

भावनांचा दूत 

म्हणूनच तो तुमच्या आमच्या भावना त्याच्या कवितेतून व्यक्त करतो. कारण संवेदनशील मनात भावना दाटल्या की त्या व्यक्त झाल्यावरच मनाला स्थिरता येते.

अस्वस्थ मनास स्थिरता 

देऊ शकते ती कविता 

भावनांचे प्रतिबिंब असते 

सहज सुंदर ती कविता…

प्रत्येक आई बाईच असते आणि प्रत्येक बाईत आई असते. तिच्याविषयी आदरयुक्त शब्दात कवी लिहतो,

घराची अब्रू बाई 

दुःख लपवे आई,

घराचे सुख बाई 

घराचे घरपण आहे!

मोह, आकर्षण, लालसा, बेगडी वैभव अशा विविध गोष्टींनी आयुष्य आपल्याला गुंतवून ठेवते आणि त्या गुंत्यात आपण फिरत राहतो.

आयुष्य नावाच्या कोळ्याने 

विणून ठेवलंय जगणे नावाचे 

सुंदर मोहक फसवेसे जाळे 

घेते खेचूनी भक्ष्यास हे जाळे….

आयुष्याचे अगदी सोप्या शब्दात वास्तव दर्शविले आहे. आपल्याला आपली ओंजळ कायम सुखाने, आनंदाने भरलेली आहे असेच वाटत असते. पण ही गळकी ओंजळ कधी रिकामी होते हे समजत नाही. हे पण आयुष्यातले एक वास्तव आहे.

गळक्या ओंजळीचे हात आपले

त्यात कधीही काहीच ना मावले.

जे जे मनाला कधी कधी भावले

नशिबास मात्र कधी ना भावले..

आपली नाती, आपले वागणे, स्वभाव, इच्छा- अपेक्षा, बदलत्या काळातली मनोभूमिका, मनाचे वागणे, मित्रांशी व्यवहार अशा जगण्यातल्या मूलभूत गोष्टी, दुनियादारी, निसर्ग अशा विविध गोष्टींवर कवीने छान भाष्य केले आहे. काही काही कविता खूप छान आहेत.

उदा:- ‘डागडुजी इमारतीची’– आपल्या शरीराला एका इमारतीचे रूपक मानून तिची देखभाल कशी करावी हे छान मांडले आहे.

‘मनात असले तरी’– या कवितेत इतरांशी कसे वागावे हे छान समजावले आहे.

मला कवीचा चष्मा लागला

नवाच नंबर बदलून आला,

दृष्टिदोषात सुधारणा झाली 

माझ्या नजरेत फरक पडला….

कवीचा चष्मा लागल्याने आपल्या विचारसरणीत कसा बदल झाला याचे हे आत्मपरीक्षण आहे. आपल्या मातृभाषेचा योग्य सन्मान सगळ्यांनी करायला हवा. त्रिभुवनात गौरव झाला असला तरी घरात तिला मानाचे स्थान द्यावे हे सांगताना कवी म्हणतो

हे मराठी माणसा, ऐक ना

व्यवहारी भाषा योग्य जरी

घरात वावरावी मराठी खरी

तिला तू विसरू नकोस ना….

शेवटची ‘ध्येय’ कविता बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचे आवाहन करते.

उजाडलीय पहा पहाट नवी 

चला, मोहिमेवर निघायला हवं,

ठरवलंय जे ध्येय मनाशी 

ते साध्य करायलाच हवं….

श्री. अरुण देशपांडे यांच्या या कविता विविधांगी विषयातून जीवनस्पर्शी झाल्या आहेत. त्या वाचताना या सगळ्या आपल्याच कविता वाटू लागतात. कारण त्यांनी आपल्याही आयुष्यातील विविध भावना त्यात

व्यक्त केल्या आहेत. त्यातून जगताना वास्तवाचे भान ठेवून कसे जगावे याचे नकळत मार्गदर्शनही केले आहे.

यामधून कवीचे प्रगल्भ विचार आणि अनुभवविश्व जाणवते. सहज सोप्या शब्दात विचार मांडण्याची त्यांची हातोटी सुंदर आहे‌. यापुढेही कवी कडून अशाच सुंदर कविता रसिकांना वाचायला मिळाव्यात ही अपेक्षा. त्यासाठी त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा!

परिचय : सौ.ज्योत्स्ना तानवडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “पितामह” – लेखक : श्री अनंत तिबिले ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पितामह” – लेखक : श्री अनंत तिबिले ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर 

पुस्तक : पितामह

लेखक-अनंत तिबिले

प्रकाशक-रिया पल्बिकेशन्स

पृष्ठ संख्या-४४०/

पुस्तक मूल्य- रुपये-४३०/

महाभारतात त्यागाचा शोध घेत असताना आचार्य भीष्म पहिले येतात. प्रस्तुत कादंबरीत आचार्य भीष्माचं त्यागमाय, निरीच्छ असं जीवन रेखाटलंय.

पितामह ….

कुरुकुलातले श्रेष्ठ पुरुष. सदाचरण नि सदवर्तनाने वागलेले. वास्तविक अष्टवसुंपैकी एक असलेले.

अल्पायुषी होते, पण उद्याच्या समाजाला आदर्श हवा होता म्हणून दीर्घायुषी ठरून आपली जबाबदारी यथायोग्य पार पाडली.

ज्या कुळात देवव्रतासारखा धर्मज्ञ, सदाचरणी, निरिच्छ, निस्वार्थी योद्धा जन्माला आला, ज्याने आपल्या अतुलनीय त्यागाने एक इतिहास घडविला त्या कुलाच्या प्रतिष्ठेला कधीच बाधा येणं, हे कुल कलंकित होणे अशक्य असच आहे.

… पण जे घडतंय आणि जे घडणार आहे ते देखील कुलाच्याच हिताचंचं असणार आहे.

पण कुरुकुलातील कलह उद्याच्या समाजाचा घृणेचा विषय जरी बनला तरी नव्या पिढीला सावधगिरीचा

सल्ला देणारं साधन ठरेल.

‘पितामह’ ही अनंत तिबिलेंची ब्याण्णवावी कादंबरी हेच सांगते. म्हणूनच ही कादंबरी रसिकांनी वाचावी अशीच आहे.

परिचय : श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares