मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “विचारचक्रांचा योग्य उपयोग” – लेखक : अब्राहम थॉमस – अनुवाद : स्नेहा केणी☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “विचारचक्रांचा योग्य उपयोग” – लेखक : अब्राहम थॉमस – अनुवाद : स्नेहा केणी☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : विचारचक्रांचा योग्य उपयोग 

 – – – मनावर प्रभावीपणे ताबा मिळवा

लेखक : अब्राहम थॉमस

अनुवाद : स्नेहा केणी

मूल्य: ३३०₹ 

रोजच्या धकाधकीच्या जीवनाने भांबावून न गेलेली व्यक्ती सापडणे जणू अशक्यच आहे. मनात सतत गोंधळ सुरू असतो… त्यामुळे आपण नेहमी दुख, राग आणि वैतागाच्या दुष्टचक्रात अडकलेलो असतो… मग अशा परिस्थितीत मदतीसाठी पाहावे तरी कोणाकडे? याचं उत्तर आपल्यातच दडले आहे. हे पुस्तक प्रभावी मन नियंत्रणाद्वारे पुढे जाण्याचे व्यवहार्य आणि शाश्वत मार्ग सुचवते.

– – रागावर नियंत्रण कसे ठेवावे. संयम कसा वाढवावा. दुःखाला कसे सामोरे जावे. अपराधीपणाचा सामना कसा करावा. अचानक आलेल्या निराशेच्या खोल गर्तेतून कसे बाहेर पडावे. समाधानी आयुष्य कसे जगावे. जीवन अर्थशून्य भासत असल्यास, या निराशापूर्ण भावनेला कसे टाळावे. हे पुस्तक ‘इफेक्टिव माईंड कंट्रोल’ या संकेतस्थळावरील मनासंबंधीच्या ए. आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रबंधातील वर्तनात्मक पैलूंचा संक्षिप्त आढावा घेते. ईएमसी या संकेतस्थळाला जगभरातून भरघोस प्रतिसाद लाभला. १५० देशांतील सुमारे पाच लाखांहून अधिक लोकांनी या वेबसाईटला भेट दिली. इएमसी असे गृहीत धरते की आय. ए. (अंतर्ज्ञानाची नियतरीती) मुळे मनाला विगमक तर्क वापरून वृत्ती आणि वर्तन नियंत्रित करता येते.

– – हे पुस्तक शतकानुशतके ज्ञानी व्यक्तींनी आचरणात आणलेल्या साध्या सोप्या मानसिक व शारीरिक सरावांची शिफारस करते. यामुळे आपला दृष्टिकोन व कृती बदलण्यास मदत होते आणि आपण आयुष्याचे सकारात्मक अनुभव घ्यायला शिकतो.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ सैतान…  लेखक : श्री नारायण धारप ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ सैतान…  लेखक : श्री नारायण धारप ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक : सैतान 

लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

नारायण धारप म्हणजे भयकथांचे अनभिषिक्त सम्राट असं म्हटलं जायचं ते का याचं उत्तर मला नारायण धारपांची पुस्तकं वाचल्यावर मिळालं. खरंतर भयकथा हा मी आवर्जून वाचण्याचा साहित्यप्रकार नाही. पण वाचनामध्ये नावीन्यपणा आणण्यासाठी किंवा वाचनाची गोडी टिकवण्यासाठी म्हणून हा साहित्यप्रकार वाचायला मी सुरुवात केली. असं असलं तरी नारायण धारपांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांनी मात्र अनेक वर्षांपासून माझं लक्ष वेधून घेतलं होतं. बऱ्याचदा मुखपृष्ठ बघूनच आपल्याला आतला मजकूर फारसा भावणार नाही असं वाटून मी ती पुस्तकं वाचण्याचं आवर्जून टाळलं होतं.

आता वाचायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं की मुखपृष्ठं भयानक असली तरी आतला मजकूर मात्र केवळ भय भावनाच सांगत नाही. धारपांच्या पुस्तकांमध्ये सगळ्यात जाणवणारी गोष्ट म्हणजे मती गुंग होणे. भयकथांचं महत्त्व केव्हा वाढतं तर तुम्हाला त्या भयामागचं कारणच समजत नाही तेव्हा. पण इथे कारण समजलं असलं तरी त्याचा जो भयावह परीणाम होतो किंवा त्या कथेतून आपल्याला वाचायला मिळतो त्याने जास्त भय वाटत राहते.

‘सैतान’ या मी वाचलेल्या कादंबरीबाबत बोलायचं झालं तर कथानक साधं घेतलं आहे. पुण्याजवळच्या एका गावात तीनवाडीमध्ये एका खडकाळ डोंगराळ निर्मनुष्य वस्तीवर विमान कोसळतं. आणि सबंध विमान पेट घेऊन त्यातील एकही व्यक्ती जिवंत राहत नाही. सर्वच्या सर्व मृत पावतात. आणि या दुर्घटनेच्या प्रसंगानंतर त्या तीनवडी गावावर जे संकट बेततं त्याची ही कथा. कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना ध्यानीमनी नसलेला मृत्यू स्वीकारणं हे शरीराला जरी अपरिहार्य असलं तरी मानवी वासना भावना यांना ते सहज शक्य होत नाही. आणि या मृतात्म्यांच्या आक्रोशातून स्वतःला जिवंत ठेवण्याच्या धडपडीतून निर्माण झालेल्या वासनांतून पुढे घडणाऱ्या गोष्टी म्हणजे हे कथानक.

प्रसंगांचं तपशीलवार वर्णन आणि अचूक शब्द योजना हे नारायण धारपांच वैशिष्ट्य यातून दिसून येतं. म्हणजे रहस्य कथा असो किंवा भयकथा असो शब्दयोजना प्रचंड महत्त्वाची असते. आणि तिच वाचकाच्या मनावर पकड घालू शकते. अनेकदा प्रसंग खूप रहस्यमय नसतील तरी चालेल पण त्यांची मांडणी आणि त्यातले शब्द हेच वाचकाच्या मनावरती प्रभाव टाकतात आणि यामध्ये धारपांचा हातखंडा जाणवतोच.

आणखीन एक त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे एक सलग कथानक घेऊन सरळसोटपणे लेखन ते करत नाहीत. त्यांच्या कथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपकथानकं असतात. आणि त्या उपकथानकांचा एकमेकांशी संबंध असतो तो वाचकाला समजून घ्यावा लागतो. म्हणजे धारपांच पुस्तक वाचताना वाचक म्हणून लागलेली आपली तंद्री फार महत्त्वाची असते. नाहीतर आपल्याला उपकथानकातला मूळ कथेशी असलेला धागा पटकन समजू शकत नाही. कारण प्रत्येक उपकथनकात एखाद्या घटनेचा धागा जरी समान असला तरी पात्रांची नावे, परिस्थिती, वर्णन त्यांची कामं ही पूर्णपणे वेगळी असतात. एक विमान कोसळून पडणं या एका घटनेचा संबंध पुजारी, पादरीबुवा, फोटोग्राफर, आर्मी मधले रिटायर्ड ऑफिसर, गावातील गुंड प्रवृत्तीची माणसं आणि ती घटना पाहण्यासाठी जमलेली एक लहान मुलगी या सगळ्यांवर किती वेगवेगळ्या प्रकारे होतो आणि ते त्याला कसे सामोरे जातात त्याचं अत्यंत प्रत्ययकारी वर्णन यात आलं आहे.

काही प्रसंगात ती बाहुली जेव्हा चालत येते तेव्हा तिचं वर्णन, नंतर खसखस हसण्याच्या आवाजाचे वर्णन हे वाचताना अंगावर अक्षरशः काटा येतो. त्यांचं कथानक वाचताना आपली तर्कनिष्ठा बाजूला ठेवावी लागते असं न म्हणता मी तर उलट म्हणेन आपल्या तर्कनिष्ठेला आव्हान देणारं कथानक ते लिहितात. आणि त्यामुळे त्यांचं लेखन परिणाम करतं. ‌

विमान अपघात या एका दुर्दैवी घटनेचे वेगवेगळ्या मनोवृत्तीच्या लोकांवर कसे परिणाम होऊ शकतात हे दाखवणं सोपं नाही. पण ते कसब यात सहज साधलं गेल्यामुळे कथानक जास्त रोचक होत जातं.

सैतानी वृत्तीची शक्ती आणि सामान्य व सज्जन शक्ती या दोघांमधला संघर्ष हा अनादी काळापासून चालत आलेला आहे. आणि तोच संघर्ष अनेक मानवी मूल्य जिवंत ठेवतो आणि त्याचबरोबर त्या मूल्यांची होणारी पायमल्लीसुद्धा दाखवतो. हा जो प्रचंड विरोधाभास आपल्या जगण्यामध्ये आहे. तो फार उत्तमरीत्या ते मांडतात आणि त्याने त्या कथानकावरती विश्वास ठेवावासा वाटतो.

माणसांच्या मनोवृत्तीचं अचूक निरीक्षण, भरपूर अभ्यास आणि अनेक तांत्रिक गोष्टींचाही अभ्यास, स्थळ काळानुसार माणसाच्या जीवन पद्धतीत होत गेलेले बदल टिपणे अशी कितीतरी वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात दिसून येतात. त्यामुळे फक्त भय या नावातच माझ्याप्रमाणे जर कोणी अडकलं असेल तर त्यांनी तो एकांगी दृष्टिकोन न ठेवता एका वेगळ्या दृष्टिकोनातून हे पुस्तक जर वाचलं तर त्यांना निश्चितच काहीतरी वेगळं वाचल्याचा अनुभव मिळेल.

परिचय – तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अरुणोदय” – लेखिका : श्री भावेश ब्राह्मणकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अरुणोदय” – लेखिका : श्री भावेश ब्राह्मणकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : अरुणोदय.

लेखक: भावेश ब्राह्मणकर

पृष्ठ: २७६

फ्री होम शिपिंग

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या अभ्यासवृत्तीद्वारे साकारलेले अरुणोदय पुस्तक अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय सैन्याच्या खडतर कार्यावर आणि संघर्षावर प्रकाश टाकते. श्री. ब्राह्मणकर यांनी स्वतः प्रत्यक्ष सीमेवर जाऊन या कादंबरीचे लेखन केले असून, यात ‘अरुण’ नावाच्या जवानाचा चित्तथरारक जीवनपट उलगडण्यात आला आहे. एका पत्रकाराने प्रत्यक्ष सीमेवरील अनुभवातून सैनिकांच्या त्यागाची ही शौर्यगाथा मांडणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.

व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे (निवृत्त) (अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, नौसेना मेडल) आपल्या प्रस्तावनेत म्हणतात – – 

– – अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमा हा विषय सद्यस्थितीत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि भौगोलिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत कळीचा आहे. मुळातच अशा प्रकारचा आव्हानात्मक विषय लेखक स्वीकारत नाहीत. मात्र लेखकाने तो स्वीकारल्याने मला मनापासून आनंद झाला. या शिष्यवृत्तीसाठी मी त्यांना शिफारसपत्रही दिले होते. अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष राहून लेखकाने सैन्याचे कामकाज जाणून घेतले. तेथील वातावरण, भौगोलिक स्थिती पाहिली. तेच त्यांच्या लेखनात उतरले आहे. संरक्षण मंत्रालयाचा प्रतिष्ठित डिफेन्स करस्पॉन्डन्स कोर्स केला असल्याने लेखकाला अरुणाचल प्रदेशातील परिस्थितीचा अंदाज आलेला दिसतो. अरुणाचल प्रदेशातील सीमा प्रदेश हा विषय तसा मराठी लेखकांसाठी अतिशय दुर्मिळच म्हणावा लागेल. त्या भागावर फारसे लेखन मराठीमध्ये होत नसल्याचे निरीक्षण अनेकांनी मला सांगितले आहे. तोच विषय घेऊन ‘अरुणोदय’ ही कादंबरी लेखकाने लिहिल्याने ही बाब मराठी साहित्याच्या दृष्टीनेही मला महत्त्वाची वाटते.

भारतीय सैन्य किती खडतर परिस्थितीमध्ये राहते, कामकाज करते, शत्रूबरोबरच देशांतर्गत, भौगोलिक, पर्यावरणीय किती आव्हाने त्यांच्यासमोर आहेत हे सारे लेखकाने चपखलपणे मांडले आहे. अशा प्रकारचे लेखन होणे गरजेचे आहे. यामुळे सैन्याच्या कामकाजाबरोबरच अन्य स्वरूपाची माहितीही वाचकांपर्यंत पोहोचते. अरुण या जवानाची कथा सांगतानाच लेखकाने त्याच्या जीवनातील भावनिक, मानसिक, कौटुंबिक पैलू अचूकपणे उलगडले आहेत. त्याशिवाय ग्रामीण जीवनाचे विविध पदरही उत्तमरीत्या शब्दबद्ध केले आहेत. छोट्या छोट्या प्रसंगांमधून त्यांनी सैन्यातील खडतर परिस्थिती वाचकांसमोर ठेवली आहे. आजच्या काळाशी सुसंगत असे लेखन आणि कादंबरी लिहून लेखकाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली असावी, असे मनोमन वाटते.

लेखकाला मी २०१५ पासून वैयक्तिक व व्यावसायिकरीत्या ओळखतो. पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत असताना सातत्याने उल्लेखनीय आणि मोलाचे योगदान लेखक देत आहे. अत्यंत कष्टाळू पत्रकाराबरोबच लेखकाची आकलनशक्ती तसेच विश्लेषणात्मक विचारपद्धती वाखाणण्याजोगी आहे. विशेषतः पर्यावरण आणि संरक्षण यांसारख्या अत्यंत संवेदनशील व तांत्रिक विषयांवर सातत्याने सखोल लेखन करण्याची हातोटी लेखकात आहे.

‘कुसुमाग्रज शिष्यवृत्ती’ च्या निमित्ताने अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमा आणि भारतीय लष्कराचे कामकाज यावरील अप्रतिम लेखन वाचकांपुढे येत आहे. त्याचे सर्वांनी स्वागत करायला हवे असे मला वाटते. कादंबरीचा नायक असलेल्या अरुणची पत्नी त्याच्या शोधार्थ सीमाभागात जाते. मात्र, सैन्यशिस्तीच्या ते विरुद्ध आहे हे सुद्धा अचूकपणे लेखकाने पुस्तकात मांडले आहे. सैन्यातील कामकाजाचे बरेच बारकावे लेखनात आल्याने हे पुस्तक वास्तवाच्या समीप जाणारे आहे. केवळ युद्ध किंवा संघर्ष यावर होणारे लेखन आणि शांतता काळातील लेखन यात कमालीचा फरक आहे. भारतीय सैन्य हे अनेक आघाड्यांवर लढत असते. त्याची विस्तृत माहिती या पुस्तकाच्या रूपाने वाचकांना होईल, असे वाटते. सैन्यात गुणवत्तेला किती किंमत आहे आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी किती सक्षमपणे सांभाळली पाहिजे, याचेही दर्शन या पुस्तकात होते. हे पुस्तक म्हणजे अभ्यासपूर्ण प्रबंधच आहे. भारतीय सैन्य, त्याचे कामकाज, अरुणाचल प्रदेशातील सीमा या सर्व विषयांकडे पाहण्याचा एक नवीन आणि व्यापक दृष्टिकोनही वाचकांसमोर आला आहे. वाचकांना नक्कीच हे पुस्तक आणि त्यातील लेखन आवडेल, अशी मला ठाम खात्री आहे.

पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया  

हे पुस्तक सर्वार्थाने अद्वितीय आहे. ते भारतीय लष्कराचे सार नेमकेपणाने मांडते. राष्ट्रीय सुरक्षेसारखा गंभीर विषय रोमँटिक कथेच्या स्वरूपात मांडून लेखकाने कमालच केली आहे. हे पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केल्यावर खाली न ठेवता येण्यासारखे आहे. ते प्रत्येक भारतीयाने वाचलेच पाहिजे.

– कर्नल विनायक भट (सेवानिवृत्त)

पत्रकारितेतील ‘वस्तुनिष्ठता’ व साहित्यातील ‘सर्जनशीलता’ यांचा अनोखा अनुबंध भावेश ब्राह्मणकरांच्या या कादंबरीत आढळतो. अरुण देशकर या भारतीय लष्करातील जवानाची कहाणी वाचकाला खिळवून टाकते. यानिमित्ताने ‘अरुणाचल’ या निन्तातसुंदर प्रदेशातील खडतर जीवनाची झलकही वाचकाला मिळते.

– प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “माणिक मोती” — लेखिका : शोभा बेंद्रे ☆ परिचय – उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “माणिक मोती” — लेखिका : शोभा बेंद्रे ☆ परिचय – उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

पुस्तक : माणिक मोती – – माणिक वर्मा आणि परिवार..

लेखिका – शोभा बोंद्रे 

राजहंस प्रकाशन 

आवृत्ती पहिली, 12 मे 2025..

अलौकिक कलाकार आणि अलौकिक व्यक्तिमत्व— माणिक वर्मा (दादरकर) आणि अमर वर्मा — 

शोभा बोंद्रे यांनी माणिक ताईंच्या संपूर्ण परिवाराकडून त्यांच्याबद्दलची दिलेली माहिती तसेच माणिक ताईंचे बालपण, त्यांची शैला दातार यांनी घेतलेली मुलाखत या सर्व गोष्टींचा या पुस्तकात समावेश केला आहे. तसेच विशेष म्हणजे पु. ल. देशपांडे यांनीही माणिकताईं विषयी लिहिलेले या पुस्तकात समाविष्ट आहे.

माणिक ताईंच्या आईने त्यांनी संगीत शिकावे म्हणून खूप परिश्रम घेतले. त्यांनी स्वतः जातीने त्यांच्या गायन, शिक्षणात लक्ष घातले. त्यांची गाण्याची पहिली रेकॉर्ड वयाच्या बाराव्या वर्षीच निघाली. गाण्याबरोबरच शाळेचा अभ्यास, परीक्षा, गाण्याची तालीम हे सर्व त्या वयाच्या तेराव्या वर्षीच करत होत्या. माणिकताई दिसायला सुंदर आणि त्यांचे व्यक्तिमत्व सोज्वळ असे होते. त्यांचे गाजलेले पहिले गाणे ‘सावळाच रंग तुझा… ‘त्यानंतर त्यांनी गायलेले ‘हसले मनी चांदणे’ हे गाणेही प्रसिद्ध झाले. माणिकताईंची शेकडो गाणी सुपरहिट झाली!

चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत अमर वर्मांना माणिक भेटली आणि पहिल्याच भेटीत ती त्यांना आवडली. आयुष्याचा जोडीदार म्हणून दोघांनीही एकमेकाची निवड केली आणि 21 मे 1948 ला त्यांचे लग्न झाले. प्रथम पुण्याला संसार थाटला. राहायची सोय झाली. माणिक ताईंचे गाणेही बहराला आले. त्याचबरोबर माणिक ताईनी आपले बी. ए. चे शिक्षण ही पूर्ण केले.

‘अमृताहुनी गोड.. ‘हे गाणे त्यांनी बालगंधर्वांना म्हणून दाखवले, तसेच बालगंधर्वांची नाट्यगीते ही माणिकताईंनी गायली.

माणिक ताईंना चार मुली… भारती, अरुणा, वंदना आणि राणी..

या चारही मुलींनी त्यांचे आयुष्य भरभराटीला आणले होते. त्या चौघीही वेगवेगळ्या कलेच्या प्रांतात सुप्रसिद्ध झाल्या. माणिक ताईनी मुलींना उत्तम वळण लावले. आपल्या गाण्याच्या दौऱ्यांमुळे मुलींकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मुलींना मामा-मामींच्या सहवासात पुणे येथे ठेवले होते. या सर्वांनी एकमेकांना साथ दिली. या पुस्तकात प्रत्येकाने आपल्या आईबद्दलच्या आठवणी सुंदर शब्दात सांगितल्या आहेत.

या पुस्तकात लिखाणाची अशी विविधता असल्याने पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही आणि कादंबरी प्रमाणे सलगच वाचले पाहिजे असे होत नाही. कुठूनही सुरुवात केली तरी वाचनाचा आनंद घेता येतो!

माणिकताईंचा भरभराटीचा काळ चालू असतानाच त्यांना अचानक मोठा आजार झाला. त्यांची मेमरी गेली. गाणेच काय तर त्यांना बोलता ही येईना. मुंबईच्या मकरंद सोसायटीतील खूप आठवणी या पुस्तकात वाचायला मिळतात.

हैदराबाद इस्टेट मधील घरात राहत असतानाच माणिक ताईंना मॅनेंजायटीस झाला आणि त्या कोमात गेल्या. त्यावेळी अमर वर्मा नी सर्व कुटुंबाला आधार दिला. माणिक ताईंची काळजी घेतली. तीन महिने कोमात असलेल्या माणिक ताईंनी एक दिवस डोळे उघडले आणि त्या हळूहळू शुद्धीवर आल्या.

शुद्धीवर आल्यावर काही दिवस त्या विस्मरणातच होत्या, पण हळूहळू सुधारणा होऊन पुन्हा त्यांचे गाणे सुरू झाले. या काळात त्यांना कुटुंबाची मोलाची साथ मिळाली.

भारतीताईंना गाण्याची आवड नव्हती, तर वंदनाताईंच्या लेखनातूनच त्यांचा खोडकर स्वभावही दिसून येतो. अरुणाला वेगळ्या क्षेत्राची आवड होती तर राणीला लहान मुलींची गाणी गायला मिळाली होती! राणी वर्मा ची बालगीते अजूनही प्रसिद्ध आहेत. चौघीनींही आपापल्या क्षेत्रात चांगले नाव मिळवले.

चौघीही मुलींना चांगले वळण माणिक ताईंनी लावले होते. माणिकताईंचे व्यक्तिमत्व अतिशय सोज्वळ होते. तसेच स्वभाव मृदू होता.

या पुस्तकात पु ल देशपांडे, शिष्या शैला दातार, आशा खाडीलकर, किशोरी आमोणकर, विकास कशाळकर, डॉक्टर केशव चैतन्य कुंटे, सुहास व्यास यांचेही लेख आहेत.

यांच्या लेखातून माणिक वर्मा यांच्या व्यक्तिमत्त्वावर चांगला प्रकाश टाकला आहे, तसेच त्यातून माणिक ताईंचे सुसंस्कृत, गुणी व्यक्तिमत्व समोर येते. माणिक वर्मांची अनेक गाणी खूप गाजली आहेत, आवडली आहेत त्यामुळे अर्थातच माणिक ताईंच्या आयुष्यातील घटना संबंधी वाचायला चांगले वाटले! तसेच एका सुप्रसिद्ध गायिकेची कारकीर्द कळली. माणिक वर्मांची गाणी अजूनही आपल्याला ऐकायला खूप आवडतात.

 रामनवमीच्या निमित्ताने ‘विजय पताका श्रीरामाची, झळकते अंबरी… ‘ हे गाणे नुकतेच ऐकायला मिळाले 

आणि माणिक ताईंचे पुस्तक वाचायला मिळाले याचा आनंद झाला..

©  उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद” – लेखक : श्री श्रीकांत तलगेरी ☆ परिचय –  डॉ. प्रमोद वि. पाठक ☆

 डॉ. प्रमोद वि. पाठक

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद” – लेखक : श्री श्रीकांत तलगेरी ☆ परिचय –  डॉ. प्रमोद वि. पाठक ☆

पुस्तक : आर्य आक्रमण सिध्दांत आणि भारतीय राष्ट्रवाद

लेखक : श्रीकांत ग. तलगेरी

अनुवादक : प्रा. म. मो. पेंडसे.

प्रकाशक : साप्ताहिक विवेक,

पृष्ठे : ३७७,

मूल्य : रु. ५००/-

आर्यांनी भारतावर आक्रमण करून स्थानिक जनसमूहांवर विजय मिळवला, आपले वर्चस्व प्रस्थापित केले, इथे पूर्वीपासून वसती करून असलेल्या लोकांवर आपली संस्कृती लादली हे गृहितक इंग्रजी राज्यकर्त्यांनी लादलेल्या भारतातील इतिहास शिक्षणक्रमाचा अविभाज्य भाग म्हणून गेली दिडशे वर्षे शिकवले जात आहे. इ. स. १९२० नंतर मोहेंजोदारो आणि हरप्पा येथे झालेल्या उत्खननाने त्यावर जणू शिक्कामोर्तब झाले. उत्खनित झालेली सिंधू संस्कृतीची शहरे आर्यांनी नष्ट केली असे ठरविण्यात आले. ते गृहीत इथल्या आणि परदेशातील अभ्यासकांच्या मनात इतके घट्ट रुजले की त्याला आव्हान न देता येणाऱ्या सिध्दांताचे महत्त्व प्राप्त झाले. आज सर्वसाधारण सुशिक्षित भारतीय नागरिकाच्या मनावर हेच बिंबलेले आहे की आर्य हे पश्चिमेकडून आलेले आक्रमक होते. त्याला धरून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक लिखाण होत राहिले. त्यातून या देशातील विविध जनसमूहांमधे यशस्वी रित्या सामाजिक फूट पाडली गेल्याचे चित्र गेल्या शतकभरात दृढ झालेले आपण पाहतो. त्याचे पडसाद आजही आपल्याला तामिळनाडूच्या राजकारणात पहायला मिळतात. आजकाल हिन्दू-आर्यांना सनातन संस्कृतीशी जोडून त्यांच्या विरोधात प्रक्षोभ आणि संधर्ष उभा करण्याचे राजकारण तेथे चालते आहे.

सिध्दांताचा प्रतिवाद

आर्य आक्रमण सिध्दांत विशेष करून इंग्रजी राज्यकर्त्यांनी जगावर, त्यातल्या त्यात भारतीय आणि युरोपातील जनमानसावर यशस्वीपणे थोपवला. त्याला एक प्रकारे पुष्टी बोगाझकोई येथे हजारोंच्या संख्येने मिळालेल्या लिखित मातीच्या मुद्रांनी मिळाली. कारण त्या मुद्रांवरील मजकूरात वैदिक देवता, इतर संस्कृत नावे आणि संख्यांचा समावेश होता. काही मुद्रांवरील मजकूरानुसार त्यांचा काळ निश्चितपणे इ. स. पूर्व १३८०च्या दरम्यानचा होता हे ठरविता आले. त्याला धरून तो जनसमुदाय मजलदरमजल करत ईराणमार्गे इ. स. पूर्व १२००च्या दरम्यान भारतात पोहचला असा निष्कर्ष सहज काढता आला. मॅक्समुल्लरने अंदाजपंची ठरविलेल्या आर्य आक्रमणाच्या काळाशी तो जुळल्याने त्यावर मोहर लागली. त्याचा अमिट प्रभाव आतही अनेक बिनीच्या प्राच्यविद्या संशोधकांवर आहे. माझ्या मते ही संशोधक मंडळी बोगाझकोई मातीच्या मुद्रांच्या दलदलीत फसून बसली आहेत. आर्य आक्रमण प्रतिपादनाचा सविस्तर संशोधन करून प्रतिवाद करणारे पाच ग्रंथ नारायणराव भवानराव पावगी यांनी १८९०च्या दशकात प्रसिध्द केले होते. याच्याही पुढे जाऊन पश्चिमेतील अनेक प्राचीन साम्राज्ये भारतीयांनी प्रस्थापित केली होती असे त्यांनी नमूद होते.

आर्य आक्रमण सिध्दांताचा ठोसपणे पुरस्कार लो. टिळकांनी केला. त्याचा प्रतिवाद करणारे ग्रंथ नंतरच्या काळात अनेक संशोधकांनी लिहिले. जसे जसे नवे संशोधन होत गेले तसे तसे आर्य आक्रमण सिध्दांताच्या विरोधातील पुरावे पुढे येऊ लागले आहेत. त्याच विषयाला धरून श्रीकांत तलगेरींनी लिहिलेला THE ARYAN INVASION THEORY: A REPREAISAL हा ग्रंथ (पृष्ठे ३७३) १९९३ साली आदित्य प्रकाशन, नवी दिल्लीने प्रसिध्द केला होता. आता सुमारे ३२ वर्षांनंतर प्रा. म. मो. पेंडसे यांनी केलेला मराठी अनुवाद साप्ताहिक विवेकने प्रसिध्द केला आहे. तीन दशके जुनी असली तरी, एका बहुचर्चित विषयाची सटीक आणि दोन्ही विचारधारांची माहिती करून घेण्याची संधी या ग्रंथाव्दारे मराठी वाचकांना मिळेल.

प्रस्तुत ग्रंथात विशेष भर भाषाशास्त्रीय विश्लेषणावर आहे. संस्कृत, इराणी, ग्रीक आणि लॅटिन भाषांमधील शब्द साम्य लक्षात आल्यावर मूळ भाषा कोणती आणि तिचे मूळ ठिकाण कोणते असावे असा प्रश्न समोर येणे साहजिकच होते. त्याचे उत्तर शोधताना मात्र ब्रिटिश संशोधकांनी युरोपीय संस्कृती केन्द्रस्थानी ठेवून या दोन्ही प्रश्नांचे उत्तर, शोधले नाही तर तयार केले. ज्या ब्रिटिशांना १८व्या शतकात डॉ. सॅम्युअल जॉन्सनने इंग्रजी शब्दकोश तयार करेपर्यंत शब्दांचे स्पेलिंग एकसारखे असावे याची अक्कल नव्हती ते, ज्या भारतीयांनी हजारो वर्षांपूर्वी ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार, विसर्ग इ. उच्चारांना धरून संस्कृत व्याकरणाची बांधणी केली, बिनीचे व्याकरणकार दिले त्यांना हे उपटसुंभ संस्कृत भाषा मूळ शिकवू लागले. त्याने सर्व घोटाळा केला. त्यांनी प्राथमिक Indo-European root language – भारोपिय मूळ असलेल्या भाषेची संकल्पना मांडली. ही भाषा युरोपच्या आसपासच्या प्रदेशात निर्माण झाली हेही ठोस पुरावे उपलब्ध नसताना ठरवले. त्यातून पुढे जाऊन आर्य स्थलांतर आणि आक्रमणाचे गृहितक मांडले गेले. खरेतर संस्कृत भाषा अति प्राचीन काळापासून ज्या प्रदेशात प्रचारात आणि वर्धिष्णू होती त्या प्रदेशात तिचे मूळ असणे अगदी स्वाभाविक होते. त्याच्या उलट असलेल्या दिशेकडून स्थलांतराचे इमले रचले गेले. त्यावर अमाप ग्रंथ रचना झाली. आता स्थिती अशी आहे की सत्य स्वीकारायचे तर आजवर उभारलेल्या आणि आता अवैध ठरू लागलेल्या तुलनात्मक भाषिक संशोधनाच्या महालांवर बुलडोझर चालवून ते जमिनदोस्त करावे लागतील.

अपभ्रंश की उद्भ्रंश

काही वर्षांपूर्वी माझी दोन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भाषाशास्त्रीं बरोबर भेट झाली. ते दोघेही अमेरिकेतील प्रख्यात विद्यापिठांत नावाजलेले प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यातील एक मराठी (माणूस) होते. मी त्यांना एकमेकांशी संबंधित असलेल्या शब्दांच्या तीन जोड्यांच्या भौगोलिक प्रवासा विषयी विचारले. ऋग्वेदात इंद्राने वध केलेल्या “वृत्र” या महाभयंकर भुजङ्गाचा वारंवार उल्लेख येतो. त्या भुजङ्गाचे पर्यायी नाव “अहि-दास” असेही आहे. त्याचा वध करणारा या अर्थी इंद्राला “वृत्रघ्न” असे नाव दिले गेले. या वृत्रघ्नाला पर्यायी म्हणता येईल असा शब्द पारशी लोकांचा धर्मग्रंथ अवेस्तात “वेरेत्रघ्न” असा आहे. त्याच्या उत्तरेला असलेल्या आर्मेनियात तो “वाहग्न” असा झाला आहे. त्याला समांतर असलेल्या भुजङ्ग दर्शक शब्दांची रूपे “अझी दाहक” आणि “अझो दाह” अशी आहेत. मी त्यांना विचारले होते की हा शाब्दिक अपभ्रंशाचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडे की उलट्या दिशेने झाला असावा. त्या दोघांनीही या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले होते. साधारणपणे कठीण उच्चारी शब्दांचे अपभ्रंश सोप्या उच्चारात होतात. “क्षेत्र” चे शेत, (हिंदीत खेत) होते, शेतचे “क्षेत्र” असा “उद्भ्रंश” होत नाही. हे एक व्यवहारातील उदाहरण झाले. तसे वृत्रघ्नचे वेरेत्रग्न आणि वाहग्न असे अपभ्रंश होणे साहजिकच ठरते. पण बोगझकोई मुद्रांच्या दलदलीत फसलेल्या त्या दोघांनी पूर्वे कडून पश्चिमेकडे हा पर्याय स्वीकारला असता तर आजवर केलेल्या दशकांच्या संशोधनाचा डोलारा एका क्षणात जमिनदोस्त होईल, आर्य आक्रमण मोडीत निघेल ही भिती त्यांना होती. तेही माझ्यासारख्या नाव नसलेल्या (उपटसुंभा) कडून.

तसे पाहता भारोपीय भाषा मूळ युरोपात असणे हे थोतांड आहे. तलगेरींनी या थोतांडाचे अंतरंग उघडे पाडून त्यातील खाचाखोचा समोर आणल्या आहेत. त्यांनी अनेक प्रस्थापित आणि नावाजलेल्या भाषाशास्त्रज्ञांच्या संशोधनातील कच्चे दुवे स्पष्ट केले आहेत. विशेष करून मध्यपूर्वेतील आणि दक्षिण युरोपातील प्राचीन भाषांमधील प्रचलित शब्द आणि त्यांचे मूळ असू शकणारे संस्कृत अथवा संस्कृतोद्भव शब्द यांचे सविस्तर विवेचन केले आहे. त्यातून असे दिसते की भाषाशास्त्रीय विवेचनातून आर्यांचे स्थलांतर पूर्वेकडून पश्चिमेकडे झाले असण्याचीच शक्यता होती. त्याला आधुनिक पुरातत्त्वीय आणि जनुकीय विस्तारावरील संशोधनाचा ठोस आधार मिळतो आहे. यावर विषयाला धरून दै. मुंबई तरुण भारत (दि. ५ नोव्हे. २०२२) मधे माझा प्रसिध्द झालेला लेख, तसेच “पुरातत्त्वावर वेदमुद्रा” या माझ्या पुस्तकातील प्रकरण “आर्य आक्रमणाच्या थोतांडाला साम्यवादी मक्केतून सुरूंग” (नचिकेत प्रकाशन २०२३, पृ ९९-१०६) यात वाचकांना वाचता येईल.

पुराणांमधील वंशावळ्या

पाश्चात्य संशोधक आणि त्यांची री ओढणाऱ्या भारतीय संशोधकांनी पुराण ग्रंथांना विश्वासार्ह नाहीत असे ठरवून वैचारिक अडगळीत टाकले होते. त्या पुराणांची ऐतिहासिक उपयुक्तता दाखविण्याचे महत्त्वाचे काम तलगेरिंच्या पूर्वी ए. डी. पुसाळकर आणि पी. एल. भार्गव यांनी केले. पुराणांमधील वंशावळ्या व्यवस्थित लावून कालदृष्ट्या इतिहासाची बांधणी केली जाऊ शकते हे त्यांनी सिध्द केले. तलगेरी त्यांच्या दोन पाऊले पुढे गेले आहेत. त्यांनी वैदिक राजे आणि मध्यपूर्वेतील प्राचीन राजे आणि राजवंशांची योग्य सांगड घातली आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य मानता येईल. या विषयाला धरून विस्तृत चर्चा या ग्रंथात आहे. पुराणांमधील राजवंशावळ्या भाकडकथा म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत हे वास्तव या ग्रंथाने ठळकपणे पुढे आणले.

एक महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतो. जर सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती एकच होत्या तर हे स्थलांतर होण्याचे कारण काय होते? त्याचा उलगडा गेल्या दोन तीन दशकातील संशोधनाने अधिक स्पष्टपणे झाला आहे. इ. स. पूर्व २०००-१८०० दरम्यान सिंधू नदी खोऱ्यात अनेकदा मोठ्या प्रमाणावर भूपृष्ठीय (Tectonic) उत्पात झाले. त्याच्या परिणामी जवळपास सर्व मोठी शहरे आणि गावे सामूहिक स्थलांतर होऊन ओस पडली. सिंधू संस्कृतीचे लोक चार दिशांना स्थलांतरित झाले. त्यातील जे दोन जनसमूह वायव्येकडे आणि पश्चिमेकडे स्थलांतरित झाले त्यांचा मागोवा तुलनात्मक भाषाभ्यासातून (Comparative philology) घेतला गेला. त्याचा घटनांचा विस्तृत आढावा “पुरातत्त्वावर वेदमुद्रा” यात (पृ. ११-२३) घेतला आहे. य़ा स्थलांतरा मागची अभूतपूर्व पूरांची वस्तुस्थिती लक्षात घेतली की तलगेरींच्या आणि प्रख्यात पुरातत्त्वविद डॉ. बी. बी. लाल यांनी प्रतिपादन केलेल्या आर्यांच्या वायव्य आणि पश्चिमेकडील स्थलांतरांचा वस्तुनिष्ठ उलगडा होतो.

प्रा. म. मो. पेंडसे यांनी केलेले हे भाषांतर एकदम छान झाले आहे. सामान्य वाचकांना वाचताना मूळ ग्रंथ वाचल्याचे समाधान मिळेल, मात्र एक तांत्रिक तृटी अभ्यासकांना जाणवत राहील. जागोजागी संक्षिप्त रूपात दिलेल्या संदर्भ ग्रंथाची यादी त्यात देण्याचे राहून गेलेले दिसते. या ग्रंथाच्या पुढील आवृत्तीत संदर्भ यादी न चुकता समाविष्ट व्हावी.

परिचय : डॉ. प्रमोद वि. पाठक

नाशिक   भ्र. – ९९७५५५९१५५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अवकाश.. शोध अंतराळाचा” – संपादक : निखिल विद्याधर पंडितराव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“अवकाश.. शोध अंतराळाचा” – संपादक : निखिल विद्याधर पंडितराव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : अवकाश … शोध अंतराळाचा 

संपादक : निखिल विद्याधर पंडितराव

पृष्ठ : २००

मूल्य : २४०₹

पृथ्वी भोवतीचे अवकाश… अथांग पोकळी… गूढ… विस्मयकारी… कुतूहल जागवणारी… अभ्यासक, संशोधकांना खुणावणारी… अब्जावधी वर्षांचं संचित सोबत बाळगणारी… ग्रह-ताऱ्यांना मिरविणारी… आव्हान देणारी… पृथ्वी नावाच्या ग्रहावरील मनुष्यप्राण्यास सदोदित मोहवणारी….

आतापर्यंत झालेल्या संशोधनातून या अवकाश विश्वाबद्दलचे केवळ ज्ञानच वाढले नाही तर भविष्यातील पिढ्यांना दूर अंतराळाच्या पोकळीमध्ये अखंड फिरणाऱ्या ताऱ्यांना स्पर्श करण्यासाठी, तेथे पोहोचण्यासाठी सातत्याने प्रेरित केले आहे. अनंत शक्यतांची पडताळणी करून शोध आणि नवनिर्मितीचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी… आपल्या सूर्यमालेबाहेरील ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या शोधामुळे पृथ्वीच्या पलीकडेही जीवन आहे का, हे पाहण्याची उत्कंठा वाढली आहे. अवकाश संशोधनामध्ये सातत्याने होत असलेली प्रगती ही उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि विश्वाचे अमर्याद रहस्य उलगडण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग असेल. याचाच घेतलेला वेध म्हणजे ‘अवकाश’ हे पुस्तक…

अवकाश’ हे पुस्तक अशा सर्व गोष्टींवर भाष्य करते. अवकाशाच्या अमर्याद ताकदीबाबत आपल्याला माहिती करून देते. भारताला प्राचीन काळापासून खगोलशास्त्रीय परंपरा लाभली आहेच; त्याला विज्ञानाची जोड मिळत गेली आणि आज विज्ञानाधिष्ठीत समाज घडवण्यामध्ये इस्त्रो, नासा आदी अनेक संस्था प्रत्यक्षात काम करत आहेत. अवकाशातील विश्वाबद्दल आपले आकर्षण संस्कृतीइतकेच प्राचीन आहे. पृथ्वीच्या पलीकडे जाऊन अत्याधुनिक मोहिमा भारताने यशस्वी करून दाखवल्या आहेत. पृथ्वीच्या पलीकडे असणारे विश्व समजून घेण्याच्या प्रयत्न सातत्याने केला आहे, करत आहोत आणि करत राहणार आहोत. ‘अवकाश’ या पुस्तकात याचाच वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाकांक्षा, संशोधन आणि भविष्यात अवकाशातील माणसांचे जगणे या सगळ्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.

या पुस्तकात भूषण जोशी, डॉ. बाळ फोंडके, अच्युत गोडबोले/आसावरी निफाडकर, सुरेश नाईक, डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. अनिल लचके, प्रा. डॉ. आर. श्रीआनंद, डॉ. श्रीकांत कार्लेकर, डॉ. संजय ढोले, डॉ. प्रकाश तुपे, प्रमोद काळे, अथर्व पाठक, सुधीर फाकटकर, अनघा शिराळकर, बी. एच. पाटील, सोनल थोरवे, डॉ. व्ही. एन. शिंदे, दिशा सावंत, सुरेंद्र पाटसकर, गोपाळ कुलकर्णी, सारंग खानापूरकर, मानसी शहा, संजय उपाध्ये यांनी सर्वस्पर्शी अवकाशाचा वेध घेतला आहे. भारताच्या अंतराळ संशोधनातील उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकणारे विविध लेख त्यामध्ये एकत्र केलेले आहेत, ज्यामध्ये चांद्रयानपासून विविध मोहिमांचा समावेश आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण नवी दृष्टी, विज्ञान आपल्यासमोर उभे करते.

या पुस्तकातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्राच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातील योजनांच्या वाटचालीविषयीचा मांडलेला पट नक्कीच उपयुक्त ठरणारा असेल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अस्वस्थ पिढी” – लेखक : जोनाथन हाइट – अनुवाद : अभय इनामदार ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अस्वस्थ पिढी” – लेखक : जोनाथन हाइट – अनुवाद : अभय इनामदार ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : अस्वस्थ पिढी

लेखक: जोनाथन हाइट

अनुवाद: अभय इनामदार

प्रकाशक : My Mirror Publications, पुणे 

पृष्ठ: ३६८

मूल्य: ₹३५० 

२०१० पासून, किशोरवयीन मुलांनी साध्या फोनऐवजी सोशल मीडिया ॲप्सने भरलेल्या स्मार्टफोनकडे वळायला सुरुवात केली. प्रत्यक्षात जगाचं निरीक्षण करण्याऐवजी, अनुभव घेण्याऐवजी ते ऑनलाइन राहून आभासी जगात आपला जास्तीतजास्त वेळ घालवू लागले. त्यामुळे कुटुंब आणि मित्रांसोबतचा प्रत्यक्ष संवाद आणि मानसिक आरोग्य दोन्ही झपाट्याने घसरले..

हे पुस्तक आधुनिक संशोधनाच्या आधारे दाखवून देतं की, मुक्त खेळापासून स्मार्टफोनकडे झालेल्या या संक्रमणामुळे विकास प्रक्रियेत व्यत्यय येतात. अगदी झोपेच्या कमतरतेपासून ते व्यसनाधीनतेपर्यंत अनेक समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत. प्राचीन ज्ञानावर आधारित आणि अत्याधुनिक विज्ञान व उपयुक्त सल्ल्यांनी सजलेले हे आश्चर्यचकित करणारे पुस्तक वेगाने घडत असणाऱ्या बदलांना समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

या पुस्तकात  

== डिजिटल युगात सुदृढ बालपण जपण्यासाठी पायऱ्या

== किशोरवयीन मुलांमध्ये आढळणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्या व त्यावरील उपाय

== इंटरनेटच्या मायाजालाचा मुलांवर काय परिणाम होतो व मुलींवर काय परिणाम होतो

== चार मूलभूत हानी

== पालक, समाज, शाळा आणि शासन यांनी बजावण्याची भूमिका

मुलांना आभासी जगातून खऱ्या जगात आणण्यासाठी… हे पुस्तक फक्त एक वाचन नाही, तर आजच्या पिढीच्या मानसिक आरोग्याचा आरसा आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या किंवा स्वतःच्या डिजिटल जीवनशैलीचा परिणाम समजून घ्यायचा असेल, तर हे पुस्तक नक्की वाचावे.

इंटरनेटच्या मायाजालात हरवलेली मुलं – आभासी जगातील अस्वस्थ पिढी – समस्या आणि समाधान

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “एक चिरंतन चित्रपट : मुगल -ए -आझम” – लेखिका : डॉ. मीना श्रीवास्तव ☆ परिचय –  श्री विश्वास देशपांडे☆

श्री विश्वास देशपांडे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “एक चिरंतन चित्रपट : मुगल -ए -आझम” – लेखिका : डॉ. मीना श्रीवास्तव ☆ परिचय –  श्री विश्वास देशपांडे ☆

पुस्तक : एक चिरंतन चित्रपट: मुग़ल-ए-आज़म 

लेखिका – डॉ. मीना श्रीवास्तव

प्रकाशक- लोकव्रत प्रकाशन 

पाने – १५४

किंमत – ₹ ३००

डॉ. मीना श्रीवास्तव

डॉ. मीना श्रीवास्तव हे नाव माझ्या माहितीनुसार बहुतेक मराठी वाचकांना परिचित आहे. त्यांची लेखनशैली आवडणारे अनेक वाचक आहेत. माझ्या आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांवर त्यांनी अत्यंत ओघवत्या आणि लालित्यपूर्ण भाषेत परीक्षणे लिहिली आहेत. त्याचप्रमाणे माझ्या लेखनावर त्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रिया वाचक वर्गाची दाद घेऊन गेल्या आहेत. माझ्या ‘ रामायण महत्व आणि व्यक्तीविशेष’ आणि ‘महर्षी वाल्मिकी’ या दोन्ही पुस्तकांचे त्यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये केलेले अनुवाद रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. तसेच प्रा. हेमंत सामंत यांच्या अनामिक क्रांतिकारकांच्या आंदोलनाविषयी मराठी लेखांवर आधारित त्यांची दोन हिंदी अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे लेखन वाचताना वैद्यकीय व्यवसायात असलेली ही व्यक्ती इतके सुंदर मराठी लेखन करू शकते याचेही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

मुगले आजम म्हणजे काळाच्या पडद्यावर अमिट ठसा उमटवून गेलेली अजरामर कलाकृती. हा चित्रपट १९६० मध्ये प्रदर्शित झालेला असला तरी त्यातील कथा आजही ताजी आणि टवटवीत वाटते. ही प्रेम कथा म्हणजे कलेच्या प्रांतातील सगळ्याच कलाकारांनी पाहिलेले एक भव्य दिव्य स्वप्न असे म्हणता येईल. या पुस्तकात डॉ. मीना श्रीवास्तव यांनी या स्वप्नाचा प्रवास, त्यामागील निर्मिती प्रक्रिया आणि तो तयार होत असताना करावा लागणारा संघर्ष अतिशय सुंदर रीतीने उलगडला आहे. 

खरे म्हणजे एखाद्या चित्रपटावर एखादे सुंदर पुस्तक लिहिले जाऊ शकते ही कल्पनाच मुळात आपल्याला सुखद धक्का देणारी आहे. तेही १९६० मध्ये निर्माण झालेल्या चित्रपटाबद्दल लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. त्या काळात जाऊन, त्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ शोधून त्यांचे हे पुस्तक सिद्ध झाले आहे. त्यांचे हे पुस्तक वाचत असताना आपण थेट त्या काळात जाऊन पोहोचतो. हे भव्यदिव्य स्वप्न साकार करीत असताना निर्माते आणि कलाकार यांच्या मनातील दडलेल्या संवेदना, त्यांनी केलेला त्याग आणि के. आसिफ यांच्यासारखे दूरदृष्टी असलेले दिग्दर्शक यांच्या जिवापाड केलेल्या प्रयत्नांची माहिती त्या या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाल्या आहेत.

हे पुस्तक पाहताक्षणीच आपले मन आकर्षून घेते. मधुबाला म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य! मुखपृष्ठावरील आपल्या हाताने आपल्या चेहऱ्यावरील घुंघट बाजूला करणाऱ्या मधुबालाची आकर्षक छबी आपले मन मोहून घेते. तिचा हसतमुख चेहरा, बोलके डोळे हे चित्र जिवंत करतात. या पुस्तकात या चित्रपटाबद्दल सगळं काही सांगणारी माहितीपूर्ण अशी १५ प्रकरणे आहेत. पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथांची यादी लेखिकेने दिली आहे. त्यातून लेखिकेची पारदर्शकता, प्रामाणिकपणा तर दिसतोच परंतु पुस्तकातील माहितीची अधिकृतता सुद्धा प्रमाणित होते. पुस्तकामध्ये ठिकठिकाणी या चित्रपटाशी संबंधित कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदींची कृष्णधवल छायाचित्रे दिली आहेत. त्यामुळे पुस्तक अधिक बोलके होते.

या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखिकेने अपार कष्ट घेतले आहेत. मुगले आजम या चित्रपटाने लेखिकेच्या मनावर आधीपासूनच गारुड केले होते. परंतु हे पुस्तक लिहायचे ठरल्यानंतर संदर्भ ग्रंथ मिळवणे, आंतरजालावरील माहिती मिळवणे या सगळ्या गोष्टीत त्या कमालीच्या गढून गेल्या आणि जवळपास दोन वर्षे त्या मुगले आजमच्या जगातच मनाने वावरत होत्या याची साक्ष त्यांचे मनोगत वाचल्यानंतर मिळते.

शहजादा सलीम आणि दासी अनारकली तरुण वयामध्ये भेटतात. त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते पण हे दोन प्रेमी जीव एकत्र येऊ शकत नाहीत. शहजाद्याचे वडील त्यांच्या प्रेमात भिंत बनून उभे राहतात आणि दोघांचे मार्ग वेगळे होतात. अशी ही खरंतर साधी सोपी कथा. परंतु या कथेमध्ये दिग्दर्शक के. आसिफ यांनी इतके सुंदर रंग भरले की ही कथा पडद्यावर जिवंत झाली आणि युगानुयुगे लोकांना ती आठवत राहील अशा प्रकारे तिचे सादरीकरण त्याने आणि इतर कलाकारांनी केले. 

या चित्रपटाचे संगीत आणि गाणी हा सुद्धा एक वेगळ्याच संशोधनाचा आणि लेखनाचा विषय व्हावा इतके ते उच्च दर्जाचे आहे. ती गाणी आजही ताजी टवटवीत वाटतात. या सगळ्या गोष्टींचा मनोरम धांडोळा खास स्वतंत्र प्रकरणातून लेखिकेने घेतला आहे. चित्रपटाचे संगीतकार नौशाद अली यांच्याबद्दलची आणि गीतकार शकील बदायुनी यांच्याबद्दलची अतिशय सुंदर माहिती लेखिकेने दिली आहे. लिहिण्याची शैली तर एवढी ओघवती आहे की वाचक उत्सुकतेने पुढे पुढे वाचत जातो.

आधी श्वेतधवल असलेला हा चित्रपट आधुनिक तंत्रज्ञानाच्या किमयेने नंतर नवरंगात न्हाऊन आला. त्याचप्रमाणे त्याचे रंगमंचीय सादरीकरण देखील झाले. त्या चित्रपटाची ही सगळी रूपे लेखिकेला अपार भावली. या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या के. आसिफ यांच्या जीवन चरित्रावर लेखिकेने टाकलेला प्रकाशझोत आणि चित्रपटाला आर्थिक सहाय्य करणारे शापूरजी पालोनजी यांच्या बद्दलची माहिती आपल्याला चित्रपट कसा तयार झाला हे समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची मदत करते.

त्याचप्रमाणे या चित्रपटात काम करून आपल्या अभिनयासाठी अमर झालेले पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला, दुर्गा खोटे, निगार सुलताना, इत्यादी कलाकारांबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल लेखिकेने फार रोचक शब्दात माहिती दिली आहे. त्यांचे जीवनातील फारसे कोणाला माहीत नसलेले हृद्य प्रसंग सांगितले आहेत. 

या चित्रपटातील संवादांचे सौंदर्य लेखिकेने चित्रपटातील प्रत्यक्ष संवाद देऊन वाचकांच्या नजरेस आणले आहे. त्यामुळे चित्रपटातील कथा प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. या चित्रपटाशी संबंधित छोटे-मोठे कलाकार, तंत्रज्ञ, त्यासाठी प्राणपणाने मेहनत करणारी सगळी माणसे या सगळ्यांची माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते. या चित्रपटाशी संबंधित कुठलीही छोटीशी माहिती देखील दुर्लक्षित होणार नाही याची काळजी हे पुस्तक लिहिताना लेखिकेने घेतलेली दिसते. त्यामुळेच चित्रपट रसिकांसाठी हे पुस्तक म्हणजे मस्ट रीड असे आहे. 

एकदा हातात घेतल्यानंतर हे पुस्तक सोडवत नाही. लेखन, भाषाशैली, चित्रे, छपाई या सर्व दृष्टीने पुस्तक अत्यंत देखणे झाले आहे. केवळ चित्रपट रसिकांसाठीच नव्हे तर साहित्य आणि कलेचा अभ्यास करणाऱ्या प्रांतातील सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे एक अनमोल ठेवा ठरणार आहे.

अशा या सुंदर पुस्तकासाठी मी लेखिका डॉ. मीना श्रीवास्तव आणि प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हे पुस्तक वाचकांना नक्कीच एक चांगले पुस्तक वाचल्याची अनुभूती देईल अशा शुभेच्छा व्यक्त करून थांबतो.

परिचय : श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव,  मो. ९४०३७४९९३२

– – (पुस्तकाविषयी अधिक माहितीसाठी डॉ. मीना श्रीवास्तव यांच्याशी ९९२०१६७२११ या व्हाट्सऍप नंबर वर संपर्क साधावा.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “गाथा कोकणच्या सागरदुर्गांची” – लेखक : प्रा. प्र. के. घाणेकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “गाथा कोकणच्या सागरदुर्गांची” – लेखक : प्रा. प्र. के. घाणेकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : गाथा कोकणच्या सागरदुर्गांची

लेखक: प्रा. प्र. के. घाणेकर 

पृष्ठे: ३८१

मूल्य: ६००₹ 

कोकणचा भूभाग प्राचीन काळापासून अत्यंत महत्वाचा राहिला आहे. दमण-डहाणूपासून ते गोवा-कारवारपर्यंत हा भूभाग निखळ मराठी भाषिक आहे. कित्येक शतकांपूर्वीपासून या प्रदेशातील बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्वाची भूमिका बजावीत आहेत. इथल्या खाड्या एकेकाळी खूप आतवर जहाजांच्या वावरास उपयुक्त ठरल्या होत्या. पण या सगळ्या घडामोडींसाठी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका इथल्या सागरदुर्गांनी बजावलेली दिसते.

कुलाबा,  खांदेरी,  पद्मदुर्ग,  जंजिरा,  सुवर्णदुर्ग,  सिंधुदुर्ग,  अंजदीव हे सागरबेटांवरील जलदुर्ग किंवा पाणकोट जसे कोकणात आढळतात,  तसेच आफ्रिकन सिद्दींनी उभारलेले उंदेरी (जयदुर्ग) आणि जंजिरा (जझीरे मेहरूब) किंवा उत्तर फिरंगाणातील केळवे-माहीमचे किल्ले,  तसेच दक्षिणेस गोव्यातील आग्वाद,  गास्परदियश,  रेईसमागोस,  खोलगड उर्फ काब-द-राम असे अनेक किल्ले पोर्तुगीजांनी बांधून घेतले. त्यातही रेवदंडा आणि वसई यांची दुर्गबांधणी खूप वेगळ्या त-हेची आहे.

हे पुस्तक लिहिताना लेखकाने खालील अपेक्षा व्यक्त केली आहे… 

कोकणचे किल्ले पाहावयाचे ते ह्यासाठी. आपण का? कसं? कोणासाठी अन् कशासाठी जगायचं? ह्याचा अर्थ या जलदुर्गांच्या सहवासात कळतो. जळणारं मन,  उघडे डोळे अन् चालणारे पाय असतील तर हे सारं नीट कळतं आणि मग अशा जागी गेलं की,  आपले आपण हरवून जातो. सागराची गाज आपल्याला शिवरायांच्या कल्पनेतील झेप अन् मनसुब्यातील फेक सांगू लागते. इथल्या दुर्गाची ढासळणारी तटबंदी शिवस्पर्शाची कहाणी सांगू लागते. तसं झालं की,  अशा किल्ल्यांवर कधीमधी दिसणाऱ्या पुंड तरुणांच्या शहरी टोळक्यांची नाच-गाणी,  हावभाव यांची कीव येते. “देवा,  त्यांना क्षमा कर… ” असं वाक्य आपल्याही तोंडी येतं.

हे किल्ले पाहताना आपला गौरवशाली इतिहास आपल्याला स्मरणार नसेल,  तर हे किल्ले पाहायला जायचंच कशाला? तिथं गेल्याचा ‘पराक्रम’ अजरामर करण्यासाठी खडू,  कोळसा,  विटकर,  चुना आणि तैलरंग अशा गोष्टींचा उपयोग करून घाणेरड्या अक्षरात आपली नावं कोरून ठेवण्याचा उपक्रम करताना आपल्याला स्मरलं पाहिजे की,  आपल्या पूर्वजांनी घाम गाळून अन् रक्त सांडून हे दुर्ग उभारले अन् प्राणपणाने जपले,  पण त्यांपैकी एकानंही आपलं नाव नाही कुठे कोरून ठेवलं. इथं आल्यावर इथल्या वास्तू,  इथली प्रेक्षणीय ठिकाणं,  पूजनीय स्थानं,  इथली माणसं या सर्वांची जाण आपण राखली पाहिजे. ते आपलं कर्तव्यच आहे. कारण या देशाचा हा वैभवशाली इतिहास आपला आहे.

या किल्ल्यांवर लोकांनी यावं,  डोळे भरून ही दुर्गरत्नं पाहावीत. शिवरायांनी ही दुर्गपुष्पे समृद्ध रत्नाकराच्या अन् तात सह्याद्रीच्या माथी वाहून केलेली शौर्यपूजा पाहावी,  असं मला प्रामाणिकपणे वाटतं. इये मुलखी हिंडणाऱ्यांचे चार गट प्रामुख्याने मला आढळतात. शिवरायांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत श्रद्धेने या गडकोट,  किल्ले अन् दुर्गावर मनापासून प्रेम करणारे,  हा झाला पहिला वर्ग. पाठपिशवी लटकावून ट्रेकिंग -रॉकक्लाइंबिंग करणारे अन् हिमालयात जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सह्याद्रीत हिंडणारे,  हा दुसरा वर्ग. ह्या भागातील पशू -पक्षी -वनस्पती,  भूरचना अशा निसर्गविशेषांचा अभ्यास करण्यासाठी हिंडणाऱ्यांचा तिसरा गट,  केवळ गंमत म्हणून केव्हातरी-कसंतरी-कारणपरत्वे बाहेर पडणाऱ्यांचा चौथा गट. पण हे किल्ले डोळसपणे पाहावेत,  त्यांचं महत्त्व जाणून घ्यावं,  तेथे घडलेला इतिहास समजून घ्यावा; तेथील निसर्गविशेषही परिचयाचा असावा,  असं सर्वसमावेशक असणं,  मला अपेक्षित आहे. पैकी गिर्यारोहण प्रेमींचा कोणत्याही किल्ल्यावर नव्या सुखसोयी,  रस्ते,  विजेचे दिवे,  राहण्याजेवणाची सोय करण्यास सामान्यतः विरोध असतो. या ठिकाणांची दुर्गमता,  निर्मनुष्यपणा,  अडचणी तशाच राहाव्यात असा यांचा आग्रह असतो. पण आश्चर्य असं की, सर्व सुविधा तिथे उपलब्ध झाल्या,  तर त्यांचा लाभही ही मंडळी घेतातच.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ५-१५ किल्ल्यांवर लोकांनी जावं,  तिथला इतिहास स्मरावा; वृद्ध, लहान मुलं,  माता, भगिनी, आजारी, अपंग अशा सर्वांना तिथं जाणं सुकर असावं,  त्यांना तिथं व्यवस्थित राहता यावं,  असं मला नेहमी वाटतं. कारण इथे आपला इतिहास घडला आहे. अवघड वाटा,  दुष्कर मार्ग,  मानवी संपर्कापासून दूर जावं असं ज्या ट्रेकर्सना वाटतं,  त्यांना हिंडायला या दुर्गांच्या देशात अनेक ठिकाणं आहेत. मात्र या साऱ्या सोयींच्या पाठोपाठ येऊ शकणारा बकालपणा टाळणं हे फक्त तिथे जाणाऱ्या आपल्या सर्वांच्याच हाती आहे. तेवढं सांभाळलं जावं असं आवर्जून वाटतं.

– – – 

अशा ७८ किल्ल्यांची नकाशांसह माहिती प्रसिद्ध दुर्गअभ्यासक व लेखक प्रा. प्र. के. घाणेकर सरांनी या पुस्तकात दिली आहे. ती सर्वांनाच निश्चितपणे उपयुक्त ठरेल.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आयुर्वेद फॉर किड्स (मराठी)” – लेखकगण  : मिराया पटवर्धन / चित्रा गोडबोले / भूषण पटवर्धन ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आयुर्वेद फॉर किड्स (मराठी)” – लेखकगण  : मिराया पटवर्धन / चित्रा गोडबोले / भूषण पटवर्धन ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : आयुर्वेद फॉर किड्स (मराठी)

लेखक गण : मिराया पटवर्धन, चित्रा गोडबोले आणि भूषण पटवर्धन

पृष्ठ: १०८ A4 size

मूल्य: ४९९₹ 

आयुर्वेद फॉर किड्स (मराठी) हे लहान मुलांना आयुर्वेदाची ओळख करून देणारे अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तक आहे. मिराया पटवर्धन, चित्रा गोडबोले आणि भूषण पटवर्धन यांनी हे पुस्तक मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत आणि आकर्षक चित्रांच्या माध्यमातून तयार केले आहे.

या पुस्तकात आयुर्वेदातील मूलभूत संकल्पना – शरीराची काळजी, आहाराचे महत्त्व, ऋतूनुसार सवयी, आणि नैसर्गिक पद्धतीने आरोग्य टिकवण्याचे मार्ग – गोष्टीसारख्या शैलीत मांडले आहेत. पुस्तकातील पात्रे आणि रंगीत चित्रे मुलांच्या कुतूहलाला चालना देतात आणि त्यांना आरोग्याबद्दल जागरूक बनवतात.

विशेष म्हणजे, मिराया, चित्रा आणि आबा यांच्या संवादातून मुलांना आयुर्वेदाचे तत्त्वज्ञान सहज समजते. त्यामुळे हे पुस्तक केवळ माहिती देणारे नसून मुलांना आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा देणारे ठरते.

वैशिष्ट्ये :

  • मुलांसाठी सोपी व मनोरंजक भाषा
  • आकर्षक आणि रंगीत चित्रे
  • आयुर्वेदाच्या मूलभूत संकल्पनांची ओळख
  • आरोग्यदायी सवयींचे मार्गदर्शन

– – एकूणच, आयुर्वेद फॉर किड्स हे पुस्तक मुलांना लहानपणापासूनच आरोग्य, आहार आणि निसर्गाशी जोडणारे ज्ञान देणारे उपयुक्त व प्रेरणादायी वाचनीय पुस्तक आहे. आणि फक्त लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनाही अनेक बाबतीत या पुस्तकातल्या माहितीचा उपयोग करून घेता येऊ शकेल.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares