श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “गाथा कोकणच्या सागरदुर्गांची” – लेखक : प्रा. प्र. के. घाणेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : गाथा कोकणच्या सागरदुर्गांची
लेखक: प्रा. प्र. के. घाणेकर
पृष्ठे: ३८१
मूल्य: ६००₹
कोकणचा भूभाग प्राचीन काळापासून अत्यंत महत्वाचा राहिला आहे. दमण-डहाणूपासून ते गोवा-कारवारपर्यंत हा भूभाग निखळ मराठी भाषिक आहे. कित्येक शतकांपूर्वीपासून या प्रदेशातील बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्वाची भूमिका बजावीत आहेत. इथल्या खाड्या एकेकाळी खूप आतवर जहाजांच्या वावरास उपयुक्त ठरल्या होत्या. पण या सगळ्या घडामोडींसाठी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका इथल्या सागरदुर्गांनी बजावलेली दिसते.
कुलाबा, खांदेरी, पद्मदुर्ग, जंजिरा, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, अंजदीव हे सागरबेटांवरील जलदुर्ग किंवा पाणकोट जसे कोकणात आढळतात, तसेच आफ्रिकन सिद्दींनी उभारलेले उंदेरी (जयदुर्ग) आणि जंजिरा (जझीरे मेहरूब) किंवा उत्तर फिरंगाणातील केळवे-माहीमचे किल्ले, तसेच दक्षिणेस गोव्यातील आग्वाद, गास्परदियश, रेईसमागोस, खोलगड उर्फ काब-द-राम असे अनेक किल्ले पोर्तुगीजांनी बांधून घेतले. त्यातही रेवदंडा आणि वसई यांची दुर्गबांधणी खूप वेगळ्या त-हेची आहे.
हे पुस्तक लिहिताना लेखकाने खालील अपेक्षा व्यक्त केली आहे…
कोकणचे किल्ले पाहावयाचे ते ह्यासाठी. आपण का? कसं? कोणासाठी अन् कशासाठी जगायचं? ह्याचा अर्थ या जलदुर्गांच्या सहवासात कळतो. जळणारं मन, उघडे डोळे अन् चालणारे पाय असतील तर हे सारं नीट कळतं आणि मग अशा जागी गेलं की, आपले आपण हरवून जातो. सागराची गाज आपल्याला शिवरायांच्या कल्पनेतील झेप अन् मनसुब्यातील फेक सांगू लागते. इथल्या दुर्गाची ढासळणारी तटबंदी शिवस्पर्शाची कहाणी सांगू लागते. तसं झालं की, अशा किल्ल्यांवर कधीमधी दिसणाऱ्या पुंड तरुणांच्या शहरी टोळक्यांची नाच-गाणी, हावभाव यांची कीव येते. “देवा, त्यांना क्षमा कर… ” असं वाक्य आपल्याही तोंडी येतं.
हे किल्ले पाहताना आपला गौरवशाली इतिहास आपल्याला स्मरणार नसेल, तर हे किल्ले पाहायला जायचंच कशाला? तिथं गेल्याचा ‘पराक्रम’ अजरामर करण्यासाठी खडू, कोळसा, विटकर, चुना आणि तैलरंग अशा गोष्टींचा उपयोग करून घाणेरड्या अक्षरात आपली नावं कोरून ठेवण्याचा उपक्रम करताना आपल्याला स्मरलं पाहिजे की, आपल्या पूर्वजांनी घाम गाळून अन् रक्त सांडून हे दुर्ग उभारले अन् प्राणपणाने जपले, पण त्यांपैकी एकानंही आपलं नाव नाही कुठे कोरून ठेवलं. इथं आल्यावर इथल्या वास्तू, इथली प्रेक्षणीय ठिकाणं, पूजनीय स्थानं, इथली माणसं या सर्वांची जाण आपण राखली पाहिजे. ते आपलं कर्तव्यच आहे. कारण या देशाचा हा वैभवशाली इतिहास आपला आहे.
या किल्ल्यांवर लोकांनी यावं, डोळे भरून ही दुर्गरत्नं पाहावीत. शिवरायांनी ही दुर्गपुष्पे समृद्ध रत्नाकराच्या अन् तात सह्याद्रीच्या माथी वाहून केलेली शौर्यपूजा पाहावी, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. इये मुलखी हिंडणाऱ्यांचे चार गट प्रामुख्याने मला आढळतात. शिवरायांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत श्रद्धेने या गडकोट, किल्ले अन् दुर्गावर मनापासून प्रेम करणारे, हा झाला पहिला वर्ग. पाठपिशवी लटकावून ट्रेकिंग -रॉकक्लाइंबिंग करणारे अन् हिमालयात जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सह्याद्रीत हिंडणारे, हा दुसरा वर्ग. ह्या भागातील पशू -पक्षी -वनस्पती, भूरचना अशा निसर्गविशेषांचा अभ्यास करण्यासाठी हिंडणाऱ्यांचा तिसरा गट, केवळ गंमत म्हणून केव्हातरी-कसंतरी-कारणपरत्वे बाहेर पडणाऱ्यांचा चौथा गट. पण हे किल्ले डोळसपणे पाहावेत, त्यांचं महत्त्व जाणून घ्यावं, तेथे घडलेला इतिहास समजून घ्यावा; तेथील निसर्गविशेषही परिचयाचा असावा, असं सर्वसमावेशक असणं, मला अपेक्षित आहे. पैकी गिर्यारोहण प्रेमींचा कोणत्याही किल्ल्यावर नव्या सुखसोयी, रस्ते, विजेचे दिवे, राहण्याजेवणाची सोय करण्यास सामान्यतः विरोध असतो. या ठिकाणांची दुर्गमता, निर्मनुष्यपणा, अडचणी तशाच राहाव्यात असा यांचा आग्रह असतो. पण आश्चर्य असं की, सर्व सुविधा तिथे उपलब्ध झाल्या, तर त्यांचा लाभही ही मंडळी घेतातच.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ५-१५ किल्ल्यांवर लोकांनी जावं, तिथला इतिहास स्मरावा; वृद्ध, लहान मुलं, माता, भगिनी, आजारी, अपंग अशा सर्वांना तिथं जाणं सुकर असावं, त्यांना तिथं व्यवस्थित राहता यावं, असं मला नेहमी वाटतं. कारण इथे आपला इतिहास घडला आहे. अवघड वाटा, दुष्कर मार्ग, मानवी संपर्कापासून दूर जावं असं ज्या ट्रेकर्सना वाटतं, त्यांना हिंडायला या दुर्गांच्या देशात अनेक ठिकाणं आहेत. मात्र या साऱ्या सोयींच्या पाठोपाठ येऊ शकणारा बकालपणा टाळणं हे फक्त तिथे जाणाऱ्या आपल्या सर्वांच्याच हाती आहे. तेवढं सांभाळलं जावं असं आवर्जून वाटतं.
– – –
अशा ७८ किल्ल्यांची नकाशांसह माहिती प्रसिद्ध दुर्गअभ्यासक व लेखक प्रा. प्र. के. घाणेकर सरांनी या पुस्तकात दिली आहे. ती सर्वांनाच निश्चितपणे उपयुक्त ठरेल.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



















