श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “वळणबिंदू” – लेखिका : डॉ. अंजली जोशी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : वळणबिंदू
लेखिका : डॉ. अंजली जोशी
मूल्य : २६२
मूल्य: ३५०₹
आपल्या डोळ्यांसमोर वाढणारी आपली मुलं जेव्हा तारुण्यात प्रवेश करतात, तेव्हा येणारा टप्पा हा पालक मुलांच्या नात्यातला एक महत्त्वाचा वळणबिंदू असतो. वळणबिंदू अनुभवण्यासाठी खूप मोठी घटनाच घडावी लागते असं नाही, तर त्यांचा एखाद्याशी झालेला संवाद, त्यांचं व्यक्त होणं, बाजू मांडणं हेही वळणबिंदू ठरू शकतात. असे अनेक ‘वळणबिंदू’ पालकांना अनुभवण्यास मिळावेत, या उद्देशाने ‘वळणबिंदू’ ही लेखमाला २०२३ मध्ये ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीत दर पंधरवड्याला लिहली होती. सर्वसाधारणपणे पालकांसाठी लिहिल्या गेलेल्या लेखनात पालकांच्या बाजूवर भर दिला जातो. मुलांबद्दल पालकांना काय वाटतं, त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्यावर काय केलं पाहिजे, हे त्यात विशद केलेलं असतं. पालकांना ही बाजू आपण स्वतः त्या भूमिकेत असल्यामुळे माहीत असते. पण तरुणांच्या बाजूबाबत पालक अनेकदा अनभिज्ञ असतात. म्हणूनच तरुणांची फारशी सामोरी न आलेली बाजू पालकांपुढे मांडण्याच्या उद्दिष्टाने या लेखमालेची निर्मिती झाली होती. ज्या पालकांची मुलं पूर्व-प्रौढावस्थेच्या (early adulthood) टप्प्यात म्हणजेच १८ ते ३५ वर्षे या वयोगटात आहेत, त्या पालकांना डोळ्यांसमोर ठेवून ही लेखमाला लिहिली होती.
तरुण पिढीच्या मानसिक स्पंदनांचा आवाज पालकांना अनेकदा ऐकू येत नाही. पालक स्वतःच्या मानसिक आवर्तात इतके गुरफटलेले असतात, की दुसरे आवाज ऐकू येण्याचे दरवाजे त्यांनी बंद केलेले असतात. मुलांचं म्हणणं पालकांपर्यंत पोचतच नाही. मुलांचे ताणतणाव, भावनिक चढउतार, आपल्यापेक्षा भिन्न असणाऱ्या त्यांच्या विचारपद्धती हे पालकांना परकं वाटू लागतं. त्यांना समजून घेण्यामध्ये एक भिंत उभी राहते आणि मग ही पिढी स्वार्थी आहे, चंगळवादी आहे, एन्टायटल्ड आहे, असे शिक्के पालक सहजपणे त्यांच्यावर मारून मोकळे होतात. पण त्यामुळे त्यांना समजून घेण्यातलं अंतर कमी तर होतच नाही, पण उलट वाढत जातं!
पूर्व-प्रौढावस्थेत प्रवेश केलेल्या मुलांचं शिक्षण एकतर संपलेलं असतं किंवा त्यांच्या उच्च शिक्षणाचा शेवटचा टप्पा चालू असतो. आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचा हा काळ असतो. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित होत असते. नवीन नाती जोडली जात असतात. वेगळे मार्ग, वेगळ्या वाटा निवडाव्याशा वाटत असतात. नवीन मतं, नवीन विचार, नवीन दृष्टिकोन यांचं आकर्षण असतं. एकूणच हा काळ स्थित्यंतराचा असतो. अनेक आव्हानं समोर ‘आ’ वासून उभी असतात. शिक्षण-नोकरी-व्यवसायाच्या संधी वाढल्या असल्या तरी तिथेही रस्सीखेच चालू असते. नोकरी-घर-छंद यांच्यातल्या प्राधान्यक्रमाचा पेच असतो. मैत्री जशी जुळते तशीच ती तुटूही शकते, याचं प्रत्यंतर ब्रेकअप्समधून अनुभवायला येत असतं. लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. पण त्यातली गुंतागुंतही ते अनुभवत असतात, मग तो प्रेमविवाह असो नाहीतर जुळवून आणलेला! जोडीदाराच्या अपेक्षा, तडजोडीचे निकष, अनुरूपतेच्या कल्पना पारखून घेण्याचा हा काळ असतो. या सगळ्यांतून स्वतःसाठी सुयोग्य जोडीदार निवडणं सोपं नसतं. घटस्फोट घेणं हे पूर्वीसारखं अपवादात्मक राहिलेलं नसलं, तरी ते मानसिकदृष्ट्या थकवणारं असतं. ‘लिव्ह-इन’, ‘लाँग टर्म रिलेशन्स’ यांसारखे सहजीवनाचे अनेक पर्याय समोर येत असले तरी त्यांतही आव्हानं असतात.
या आव्हानांना तोंड देताना या मुलामुलींचा स्वतःशी, पालकांशी, समाजाशी सूक्ष्म किंवा मोठ्या पातळीवर संघर्ष चालू असतो. मुलांच्या आयुष्यात येणारी ही स्थित्यंतरं फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित राहत नाहीत, तर पालकही या स्थित्यंतरांतून नकळतपणे जात असतात. मुलांबरोबर त्यांच्या बदललेल्या दृष्टिकोनांशी जुळवून घेताना पालकांचीही दमछाक होत असते. मग नात्यामध्ये तणाव येतो. हा कधी दृश्य असतो तर कधी अदृश्य. पण तोपर्यंत पालक-मुलांच्या नात्याचा स्थिर रेषेतला चाललेला प्रवास चढउताराचा होऊ लागतो. संघर्षाच्या ठिणग्या उडतात. आरोप-प्रत्यारोप होतात, खटके उडतात, मनं दुखावली जातात. कधी कधी सांधली न जाणारी दुखापत होते. संवादाला विपरीत वळण लागतं. तणावाची नवीन आवर्त तयार होतात. आम्ही कसे बरोबर आणि तुम्ही कसे चूक, या हमरीतुमरीमध्ये काय म्हणायचंय तेच हरवून जातं.
ऐकून घेण्याची मानसिकता जोपासणं म्हणजे इतरांना त्यांची बाजू असू शकते, ती आपल्या विरुद्धही असू शकते, पण ती तशी असण्याचा त्यांना अधिकार आहे, हे मान्य करणं. अनेकदा हा अधिकार आपण मान्य करत नाही. जवळच्या माणसांच्या बाबतीत तर हे हमखास होतं. त्यांना आपल्यासारखंच वाटलं पाहिजे किंवा त्यांनी आपल्यासारखाच विचार केला पाहिजे, असा दुराग्रह धरला जातो. मात्र त्यांना जर आपल्यापेक्षा वेगळं वाटलं, तर आपण म्हणतो की त्यांना असं कसं वाटू शकतं? त्यांना असं वाटताच कामा नये. मग आपण त्यांचं वाटणं कसं चुकीचं आहे, हे सांगायला जातो, त्याची छाननी करायला जातो आणि संवाद फिसकटतो. एकदा त्यांना असं वाटू शकतं याचा स्वीकार केला, की मग पुढल्या पायरीवर त्यांच्या मतांची छाननी करता येते. पण वाटण्याचा स्वीकार न करताच मतांच्या छाननीवर घसरलो तर संवाद सुधारण्यापेक्षा तो जास्त बिघडत जाण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच ‘ऐकून घेण्याची मानसिकता’ जोपासण्याचं व विरोधी विचार स्वीकारण्यासाठी खुली जीवनदृष्टी ठेवण्याचं आवाहन प्रस्तुत पुस्तकात केलं आहे. दुसरी बाजू कळली तर समतोल विचार करता येईल, युवा पिढीशी होणाऱ्या संघर्षाची धार निवळत जाईल, दुराव्याचं अंतर कमी होऊ शकेल, परस्परसंवाद वाढीला लागेल आणि हेच ‘वळणबिंदू’ या पुस्तकाचं मुख्य उद्दिष्ट आहे.
पालकांशी संघर्ष होणाऱ्या तरुण पिढीचे मनोव्यापार व त्यांची भावनिक आंदोलनं उलगडून दाखवण्यासाठी या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक पात्रांची मनोगतं यात सादर केली आहेत. अशा परिस्थितीतून प्रवास करणाऱ्या पालकांनी व मुलांनी परस्परांतला तणाव निवळण्यासाठी काय करावं, याबाबतच्या टिप्स दोन्ही बाजूंसाठी स्वतंत्रपणे नमूद केल्या आहेत. तसंच पालक व मुलं ह्या दोघांनाही त्या परिस्थितीत उपयोगी पडेल असं मानसशास्त्रीय तंत्र सुचवून ते कसं अवलंबात आणावं, याबद्दलही मार्गदर्शन केलं आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




















