☆ ‘निळी सावळी नभाळी (काव्यसंग्रह)’ – कवयित्री : डॉ. स्वाती पाटील ☆ प्रस्तुती – सुरेखा चिखलकर ☆
पुस्तक : निळी सावळी नव्हाळी (कविता संग्रह)
कवयित्री – डॉ.स्वाती पाटील
प्रकाशन – प्रतिभा पब्लिकेशन बुक
मूल्य – 200 /-
“निळी सावळी नव्हाळी’—हे शीर्षकच मनाला एका अनामिक प्रसन्नतेचा अनुभव देते. डॉ. स्वाती पाटील यांच्या या काव्यसंग्रहात निसर्गातील निळाई आणि मानवी मनातील सावळ्या छटांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. श्रीकृष्णाच्या छटांमधून उमटलेली ‘सावळी’ भावना आणि आकाश-पाण्यातील ‘निळाई’ यांच्या माध्यमातून कवयित्रीने मानवी नात्यांमधील ‘नव्हाळी’ म्हणजेच नवेपण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या संग्रहातील प्रत्येक कविता वाचकाला अंतर्मुख करणारी आणि निसर्गाच्या अधिक जवळ नेणारी आहे.कवितेशिवाय जगणं अवघड झालं असतं आणि सावित्रीमाय नसती तर लेकींना शहाणपणाचा प्रदेश सापडला नसता, अशा शब्दांत डॉ. स्वाती पाटील यांच्या काव्यप्रतिभेचे कौतुक केले जाते. ‘निळी सावळी नव्हाळी’ हा केवळ एक कवितासंग्रह नसून तो स्त्रीच्या अंतर्मनातील तरल भावभावनांचा, निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा आणि जगण्याच्या तत्त्वज्ञानाचा एक अनोखा आविष्कार आहे. या संग्रहातील कवितांमधून लेखिकेने दुःखाला हसतमुखाने सामोरे जाण्याची आणि वेदनेला कलेची किनार लावण्याची किमया साधली आहे.”
मराठी साहित्यातील प्रगल्भ काव्यपरंपरेत डॉ. स्वाती पाटील यांचा ‘निळी सावळी नव्हाळी’ हा कवितासंग्रह आपले स्वतंत्र स्थान निर्माण करतो. या संग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कवयित्रीची शब्दकळा आणि त्यातील लयात्मकता. केवळ शब्द मांडणे म्हणजे कविता नव्हे, तर त्या शब्दांतून एक जीवंत अनुभव उभा करणे, हे कौशल्य डॉ. स्वाती पाटील यांना अवगत आहे. घर, पाऊस, निसर्ग ,ती वाहत राहते ,प्रीत नव्हाळी, उसवले श्वास ,भूक ,लेक माझी आणि स्त्री-अस्तित्व अशा विविध कविता विषयांना स्पर्श करताना त्यांची लेखणी कुठेही अडखळत नाही, उलट ती अधिक समृद्ध होत जाते.”
डॉ. स्वाती पाटील यांच्या कवितेचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्या निसर्गाशी साधत असलेला संवाद. ‘निळी सावळी नव्हाळी’ या संग्रहात निसर्ग केवळ पार्श्वभूमी म्हणून येत नाही, तर तो एका जिवंत पात्रासारखा वावरतो. विशेषतः ‘पाऊस’ आणि ‘श्रावण’ या ऋतूंच्या छटा कवयित्रीने अत्यंत हळुवारपणे टिपल्या आहेत. त्यांच्या मते, पाऊस हा केवळ आकाशातून पडणारा जलधारांचा समूह नसून तो मनाच्या गाभाऱ्यात रुजणारा एक भाव आहे.”तुझ्या-माझ्यातला पाऊस देहातीत व्हावा…” अशी साद घालताना कवयित्री पावसाला आध्यात्मिक आणि भावनिक उंचीवर नेऊन ठेवते. श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ असो किंवा पावसाच्या सरींनी चिंब भिजलेली सृष्टी असो, त्यांच्या शब्दांतून निसर्गाचा हा उत्सव वाचकासमोर जिवंत होतो. हिरव्यागार माळरानावरील ‘हिरवी दुलई’ पांघरण्याची भाषा करणारी ही कविता निसर्गाच्या सानिध्यात मानवी दुःखाला विसरायला लावते. पावसाच्या थेंबांना आणि निसर्गाच्या रंगांना कवयित्रीने ज्या प्रकारे मानवी भावनांशी जोडले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. हा निसर्ग अनुभवताना वाचकही त्या ‘निळ्या सावळ्या’ वातावरणात हरवून जातो.
– – त्यांच्या निळी सावळी नव्हाळी या काव्यसंग्रहास आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!
परिचय :सुरेखा महिपती चिखलकर
गोटखिंडी, तालुका वाळवा
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “हाऊ टू कंट्रोल द अनकंट्रोलेबल” – इंग्रजी लेखिका : बेन ऑल्डरिज – मराठी अनुवाद : संध्या रानडे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : हाऊ टू कंट्रोल द अनकंट्रोलेबल
लेखक : बेन ऑल्ड्रिज
अनुवाद : संध्या रानडे
प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठ: ३०४
मूल्य: २९९₹
“ आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींना आपण जितकं जास्त महत्त्व देतो, तितकं आपलं नियंत्रण कमी होतं. ” – एपिक्टेटस
आयुष्यात कठीण प्रसंग येणार, हेच माणूस असण्याचं वास्तव आहे. पण त्यांना अधिक मजबूतपणे सामोरं जाण्याचा काही मार्ग असेल तर? तो मार्ग आहे, स्टोईक तत्त्वज्ञान
ही प्राचीन ग्रीक विचारसरणी आजही तितकीच उपयुक्त आहे, जितकी ती दोन हजार वर्षांपूर्वी होती. याचा मूलभूत उद्देश एकच आहे तो म्हणजे, आपल्याला अधिक चांगलं आयुष्य जगायला मदत करणं. स्टोईक तत्त्वज्ञानाचं सूत्रमंत्र सांगतो: “आपण बाह्य घटनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण त्यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र आपण ठरवू शकतो. ”
व्यावहारिक तत्त्वज्ञ आणि सल्लागार व्यक्तिमत्त्व बेन ऑल्ड्रिज स्टोईक विचारांतील १० महत्त्वाच्या तत्त्वांद्वारे तुम्हाला अधिक लवचिक, संतुलित आणि समृद्ध जीवन कसं घडवायचं हे शिकवतील.
हे पुस्तक केवळ विचार करण्यासाठी नाही, तर कृती करण्यासाठी आहे.
बेन तुम्हाला काही आव्हानात्मक पण उपयुक्त सरावही सुचवतात, ज्यामुळे तुम्ही स्टोईक तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवू शकता. जसे की,
* स्वतःची अँटी-बकेट लिस्ट तयार करणं
* जाणूनबुजून थोडंसं अस्वस्थ अनुभव घेणं
* निःस्वार्थी दृष्टीकोन विकसित करणं
* स्वतःच्या मृत्यूचा विचार करणं (मेमेंटो मोरी)
– – – – – –
” तुमचं नियंत्रण तुमच्या मनावर आहे-बाह्य घटनांवर नाही. हे ओळखा, आणि तुम्हाला तुमच्यातील खरी ताकद सापडेल. –
– – मार्कस ऑरेलियस”
– – – – –
लेखक बेन ऑल्ड्रिज यांच्याबद्दल – –
बेन ऑल्ड्रिज हे व्यावहारिक तत्त्वज्ञान, कम्फर्ट झोन, मानसिक आरोग्य आणि साहस यांवर लेखन करतात. त्यांच्या आव्हानात्मक आणि वेगळ्या प्रयोगांमुळे ते ओळखले जातात.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष’ – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष – एका डोळस रामभक्तीचा रसाळ प्रवास
लेखक – श्री. विश्वास देशपांडे, ९४०३७४९९३२
प्रकाशक – सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन
रामायणाच्या आजवर हजारो आवृत्त्या आणि शेकडो भाष्ये उपलब्ध असताना, “यात आणखी नवीन काय असणार? ” या शंकेला पूर्णविराम देणारे हे एक अत्यंत आगळेवेगळे आणि समकालीन काळाला दिशा देणारे पुस्तक आहे. लेखक श्री. विश्वास देशपांडे सरांनी कोणत्याही पारंपरिक पठडीत न अडकता, आधुनिक पिढीच्या मानसिकतेचा विचार करून या ग्रंथाची केलेली मांडणी खरोखरच कौतुकास्पद आहे.
आजच्या ‘रील्स’ आणि वरवरच्या वाचनाच्या युगात, मूळ संहिता न वाचता खलनायकांचे होणारे उदात्तीकरण (उदा. रावणाचे उद्दात्तीकरण) आणि त्यातून निर्माण होणारे गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक एका दीपस्तंभासारखे काम करते.
१. मानवी मूल्यांचा मेरुमणी : पुरुषोत्तम राम
लेखकाने रामाचे चित्रण करताना त्याला देव्हाऱ्यात कोंडून न ठेवता, एक ‘सर्वगुणसंपन्न माणूस’ म्हणून आपल्यासमोर उभे केले आहे. एक सामान्य माणूस आपल्या आचरणाने, कर्तव्याने आणि नैतिकतेने कशा प्रकारे देवत्वाच्या उंचीवर पोहोचू शकतो, याचे सुरेख विश्लेषण पुस्तकातील तीन भागांमध्ये आले आहे. पुत्र, पती, बंधू, राजा, योद्धा आणि अगदी शत्रू म्हणूनही रामाचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व वाचकाला अंतर्मुख करते. राम आणि रावण यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन व्यक्तींमधील नसून, तो “विश्वात्मक विचार विरुद्ध टोकाचा व्यक्तिवाद” आणि “संस्कारित रामवृत्ती विरुद्ध नैसर्गिक रावणवृत्ती” यांमधील फरक स्पष्ट करणारा आहे.
२. स्त्रीत्वाचा स्वाभिमान आणि इतर व्यक्तिरेखा
“जेथे राघव तेथे सीता” या उक्तीप्रमाणे सीतेच्या अलौकिक आणि स्वतंत्र अस्तित्वाचे दर्शन यात घडते. सीतेवरील कथित अन्यायाचा आणि तिच्या अग्निपरीक्षेचा संवेदनशील प्रसंग लेखकाने अत्यंत निष्पक्ष आणि संयतपणे हाताळला आहे. आजच्या ‘झटपट लग्न आणि झटपट काडीमोड’ या अस्थिर काळात राम-सीतेचे नाते एक आदर्श वस्तुपाठ ठरते.
याशिवाय लक्ष्मण, भरत, उर्मिला, मंदोदरी आणि बिभीषण यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे अचूक आकलन लेखकाने मांडले आहे. त्यातही संकटमोचक आणि परमभक्त हनुमंतावरील दोन प्रकरणे लेखकाच्या आत्मीयतेमुळे प्रचंड वाचनीय झाली आहेत. अगदी नकारात्मक मानल्या गेलेल्या कैकयीच्या मनाचे विश्लेषणात्मक चित्रण करून तिच्याविषयीचे गैरसमज दूर करण्याचा स्तुत्य प्रयत्न यात दिसतो.
३. प्राचीन व्यवस्था आणि आजची परिस्थिती
एक शिक्षक म्हणून देशपांडे सरांनी रामायणकालीन राजसत्ता आणि गुरुसत्ता (शिक्षण पद्धती) यांच्यातील सुवर्णसमन्वयावर अचूक बोट ठेवले आहे. आजच्या व्यावसायिक आणि भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी ती जीवनपद्धती किती श्रेष्ठ होती, हे प्रकर्षाने जाणवते. अष्टप्रधान मंडळ, ऋषिमंडळ आणि राजा यांच्या त्रिसूत्रीवर चालणारी रामराज्याची न्यायप्रिय शासन व्यवस्था आणि आदर्श कुटुंबसंस्था आजच्या विस्कळीत समाजाला आरसा दाखवणारी आहे. लक्ष्मणरेषेचे सामाजिक महत्त्व, वालीवध यांसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर लेखकाने अत्यंत परिपक्वतेने भाष्य केले आहे.
४. सांगीतिक गोडवा आणि रसाळ भाषा
पुस्तकाचा शेवट म्हणजे सुग्रास जेवणानंतरचा ‘गोडाचा घास’ आहे! ‘गीतरामायणा’व्यतिरिक्त असणारी, रामाच्या बालपणापासून राज्याभिषेकापर्यंतची वेगळी ‘रामगाणी’ समाविष्ट करून लेखकाने आपल्यातील गहिऱ्या संगीततज्ज्ञाची ओळख करून दिली आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत साधी, सरळ आणि प्रवाही असल्याने ते कुठेही क्लिष्ट वाटत नाही.
हे पुस्तक केवळ एका विशिष्ट धर्मापुरते मर्यादित नसून मानवी मूल्यांचा आदर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ‘संग्रहणीय’ आहे. लेखकाची रामावरील प्रगाढ आणि डोळस श्रद्धा या पुस्तकाच्या पानापानातून पाझरते. आजच्या तरुण पिढीने आणि पालकांनी हे पुस्तक केवळ वाचावे असे नाही, तर त्यावर मनन करून ते आचरणात आणण्याची गरज आहे. अक्षरांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केलेली ही एक नितांत सुंदर आणि चैतन्यमय ‘भावांजली’ आहे. प्रत्येकाने आवर्जून अनुभवावा असा हा एक “नवनवोन्मेषशालिनी वाङ्मयीन उत्सव” आहे!
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “घे गगन भरारी” – लेखक : प्रा. वसंत गिरी ☆ परिचय – श्री विश्वास देशपांडे ☆
पुस्तका : घे गगन भरारी
लेखक : प्रा. वसंत गिरी
प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे
यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे यांच्या वतीने प्रकाशित झालेले घे गगन भरारी हे पुस्तक नुकतेच हातात पडले. नावाला साजेशा मुखपृष्ठामुळे हे पुस्तक आकर्षक झाले आहे.
गिरी सर हे प्राध्यापक म्हणून तर विख्यात आहेतच. परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते एक उत्तम विचारवंत आणि संवेदनशील मार्गदर्शक आहेत. अध्यापनाच्या व्यासपीठावरून, वर्तमानपत्रातील लेखांमधून, तसेच त्यांच्या असंख्य व्याख्यानांतून त्यांनी जे विचारमंथन समाजापर्यंत पोहोचवले, त्याचा गहिरा ठसा या पुस्तकात उमटलाआहे. त्यांच्या लेखनात केवळ अनुभवाचा गाभा नाही, तर आजच्या समाजस्थितीचे अचूक भान आणि भविष्यातील मार्गदर्शनही आहे. हाती आलेले हे पुस्तक म्हणजे त्या ज्ञानदीपाची नवी ज्योत आहे. या पुस्तकात सरांच्या विचारांचा झरा वाहतो आहे – कधी चिंतनशील, कधी भावस्पर्शी तर कधी वाचकाला जागं करणारा. प्रत्येक लेखात विचारांची ठिणगी आहे जी वाचकाच्या मनाला उजळून टाकते, आत्मपरीक्षणाची ज्योत प्रज्वलित करते.
सरांचे हे सातवे पुस्तक आहे. या आधी त्यांची सहा पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत. उगवतीचे उन्मेष, तरुणाचे आयडॉल सुभाषचंद्र बोस, क्रांतिउद्यानाचे तपस्वी, गोस्वामी शौर्यगाथा ही त्यांची पुस्तके म्हणजे तरुणाईसाठी इतिहासाचा प्रेरणादायी असा महान ठेवा आहे. तर हास्यगिरी भाग एक व दोन मधून विनोदी आणि उपरोधिक पद्धतीने आजच्या समाजव्यवस्थतील दोषांवर त्यांनी कोरडे ओढले आहेत.
शब्द हे फक्त ध्वनी नसतात; ते विचारांचे दीप असतात. एखादा शब्द अंतःकरणात शिरला, तर तो मनाच्या अंधाऱ्या काना-कोपऱ्याला उजळून टाकतो. प्रा वसंत गिरी सरांचे ‘ घे भरारी ‘ हे पुस्तक हाती घेतल्यावर असाच अनुभव येतो. हे लेखन म्हणजे विचारांचा आणि चिंतनाचा वसंत फुलवणारे एक उत्तुंग पर्वत शिखर. या पर्वत शिखरापर्यंत भरारी घेऊन तेथून दिसणार्या दृश्याचे निरीक्षण मात्र बारकाईने करायला हवे.
या पुस्तकातील प्रत्येक लेख म्हणजे वाचकाला विचारांची नवी वाट दाखवणारा दिवा. त्यांची भाषा ओघवती आहे, पण क्लिष्ट नाही किंवा डोळे दिपवणारी नाही. ती साधेपणाच्या कळसावर उभी आहे. वाचकासमोर ते सहजपणे मुद्दे ठेवतात तसेच प्रश्नही ठेवतात. प्रश्नचिन्हांचे हे बीज इतके टवटवीत आहे की वाचकाच्या मनात आत्मपरीक्षणाची पालवी फुटल्याशिवाय राहात नाही.
‘हे बुद्धिनाथा, आम्हाला विवेक दे’ या लेखात गणरायाची स्थापना होत असताना मूर्ती आपण का स्थापन करतो, मूर्तिपूजा का करतो, प्रार्थना का करतो हे सांगताना ते म्हणतात, ” मूर्ती हे देवाचे सूक्ष्म रूप. आपले मन एकाग्र करण्यासाठी मनःशांती, संयम, विचारक्षमता, कार्यक्षमता आणि क्षमाशील वृत्ती वाढावी यासाठी मूर्तीची स्थापना आणि प्रार्थना आपण करतो. मानवी मनाची वाटचाल प्रगल्भतेच्या दिशेने व्हावी हाच त्यामागचा हेतू असावा. मानवी मन उच्चतम मानवतेच्या दिशेने चालावे यासारखी विचारप्रवण करणारी सुंदर वाक्ये लेखात आपल्याला आढळतात. ते उत्सवाच्या गलबल्याला आरसा दाखवतात. मिरवणुकीतील गैरप्रकार उन्माद, दिखाव्याची स्पर्धा, भपकेबाज पूजा याबाबत कठोर शब्दात नाराजी व्यक्त करतात. खरी भक्ती ही साधेपणात आहे, ही जाणीव त्यांनी वाचकासमोर अत्यंत सोप्या पण प्रभावी भाषेत मांडली आहे.
‘आजच्या अर्जुनाचा अभ्यासयोग कोणता?’ या लेखात गीतेतील अर्जुन आजच्या विद्यार्थ्याच्या मनात उभा राहतो. “ मन अत्यंत चंचल आहे. त्याला नियंत्रणात ठेवणे महाकठीण बाब आहे. ” हे वाक्य वाचताना आपल्यालाही आपल्या धडपडीचे आणि चंचलतेचे भान येते. लेखक सांगतात—“अभ्यास आणि वैराग्यात मनोग्रहाचे रहस्य आहे. यालाच अभ्यासयोग म्हणतात. ” हा विचार म्हणजे दिशाहीन तरुणाईसाठी दीपस्तंभच आहे. गिरी सरांमधला चिंतनशील माणूस या ठिकाणी दिसतो. ते म्हणतात, ” वर्तमान स्थितीत अभ्यासयोग विद्यार्थ्याला उमजला नाही; कारण तो गुरुलाही उमजला नाही. त्यासाठी आपल्यातील दोष, उणीवा यांची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. या ठिकाणी एका वक्त्याच्या भाषणातील एक सुंदर उदाहरण लेखकाने दिले आहे. वेरूळ अजिंठ्याच्या पाषाणात जे शिल्प तत्कालीन कारागिरांनी निर्माण केले, त्यात त्या पाषाणमूर्तींच्या चेहेऱ्यावर हास्य, आनंद, दुःख, क्रोध, असूया, प्रेम इ. भावभावना दाखवण्यात ते कलाकार यशस्वी झाले आहेत. जर पाषाणात या भावभावना ओतता येतात, तर सजीव अशा विद्यार्थ्यांच्या मनात आवश्यक असे विचार शिक्षकाला का रुजवता येणार नाहीत ? आजी आम्ही भौतिक सुखसुविधात अडकलो आहोत. आध्यात्मिक पातळीवर जाऊन समाधानाचा मार्ग आम्ही शोधतो का ? जगा आणि जगू द्या यासारखी तत्वे आम्ही आचरणात आणतो का ? यासारख्या मूलभूत तत्वांचा विचार या लेखात आपल्यापुढे सर मांडतात. आजच्या अर्जुनाला यशस्वी होण्यासाठी या तत्वांचा विचार करणे गरजेचे आहे.
‘क्रोधावर नियंत्रण’ या लेखात ते म्हणतात, ” क्रोध हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. नकारात्मक वृत्तीच्या लोकाांना क्रोध विनाशाकडे नेतो. सकारात्मकवृत्तीचे लोक आपला क्रोध संयमाने व्यक्त करतात. तर दुसऱ्या प्रकारचा क्रोध देशाभिमान रुजवतो, सत्कार्य करायला शिकवतो. आपली वृत्ती शांत, संयमी, समाधानी आणि आनंदी ठेवल्यास आपण तणावमुक्त जगू शकतो.
‘सद्गुणाने होते जीवन सुंदर’ हा लेख म्हणजे अंतःकरणातील आरसा. “आपले प्रत्येक कर्म आपल्या व्यक्तिमत्वाची उंची वाढविते आणि घटविते सुद्धा. ” या एका वाक्यात जीवनाचे सार सामावले आहे. सद्गुण म्हणजे बाहेरून लावलेला रंग नाही; तो व्यक्तिमत्त्वाच्या गाभ्यातून उमलणारा सुगंध आहे, हे लेखक जाणवून देतात. या लेखात ते म्हणतात, “सत्कार्यातील आनंदामागे अपार मेहनत आणि अविरत कष्ट असतात. ही माणसे त्यांच्या दैनंदिन जीवनात कमालीची प्रसन्न असतात. शुभ्र, स्वच्छ झऱ्यासारखे वाहत असतात. ही अवस्था ज्याला प्राप्त झाली त्याच्या अंतरंगात सत्याचा दीप तेवत असतो. तो आपली तो आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सत्याचा शोध घेत राहतो. त्याचे जीवन म्हणजे निखळ वास्तवतेची प्रयोगशाळा.
तर ‘युवाशक्तीच्या उत्साहाला दिशा हवी’ या लेखात लेखकाने तरुणाईला थेट प्रश्न केला आहे—“उत्साहाला विवेकाची दिशा मिळाली, तरच समाज परिवर्तन घडते. ” ही ओळ तरुणांच्या हृदयात नवी उमेद, नवा संकल्प जागवणारी आहे.
‘जीवनात संयम का हवा?’ या लेखातील ते म्हणतात, ” युवावस्थेत विचारांची दिशा हवी, म्हणजे जीवनाची दशा होणार नाही. ” या लेखातील वाक्य ” भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या संपत्तीला कष्टाचा सुगंध येत नाही ” आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.
तर प्रगल्भ विचारांची मानवी संपत्ती या आपल्या लेखात गिरी सर म्हणतात, ” युवाशक्ती ही देशाची मानवी संपत्ती आहे. हे आपल्या देशातील केंद्र व राज्य शासनालाही कळले पाहिजे. शिक्षणाकडे अनुत्पादक क्षेत्र म्हणून पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. शिक्षण क्षेत्र खाजगी क्षेत्राकडे सोपवून त्याचे बाजारीकरण करणे योग्य नाही. अशा परिस्थितीत भावी पिढीकडून भरीव कार्याची अपेक्षा कशी करणार ? या लेखातून लेखकाची तळमळ आणि शासनव्यवस्थेतील नाकर्तेपणाविषयीचा संताप तीव्र शब्दात व्यक्त झाला आहे.
आपल्या ‘ घे भरारी ‘ या लेखात ते म्हणतात, ” मनुष्यदेह हे एक साधन आहे, त्याद्वारे आपण व्यापक व चिरंतन ठरणारी कार्यपूर्ती करणार आहोत. हे आपल्या स्मरणात राहील तर आपणास देहासक्ती (शरीराचे आकर्षण) राहणार नाही. आणि आपली अपेक्षित कार्यपूर्ती झाल्यावर देहाची किंमत काहीच नाही. ” या लेखात युवकांसाठी मोलाचा संदेश लेखक देतात.
असे या पुस्तकातील एकूण ३१ लेख वाचकाला विचारप्रवण करतात. या पुस्तकाची एक मोठी ताकद म्हणजे त्याची शैली. लेखक वाचकाला प्रवचन देत नाहीत; ते त्याच्याशी संवाद साधतात. त्यांचे लिखाण म्हणजे एखाद्या हृदय संवादासारखे आहे. या संवादात कधी व्यंगाची धार आहे, कधी आत्मीयतेची ऊब आहे, तर कधी अनुभवाच्या गाभ्याला भिडणारी गंभीरता आहे. लेख वाचताना लेखकावर असणारा स्वामी विवेकानंद तसेच देशभक्तांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. आपले म्हणणे ते विविध उदाहरणे देऊन पटवून देतात.
“ज्ञानाचा दीप जिथे लागतो तिथे अंधार नाहीसा होतो;
आणि जे शिक्षक हा दीप लावतात ते स्वतःच प्रकाशरूप होतात. ”
मला वाटते हे पुस्तक सर्वांसाठी आणि विशेषतः आजच्या तरुणाईने वाचणे आवश्यक ठरते. आजच्या काळात जेव्हा आपण वेग, स्पर्धा, उपभोगवाद यांच्या भोवऱ्यात अडकलो आहोत, तेव्हा ‘ घे भरारी ’ हे पुस्तक आपल्याला शांत पण ठाम आवाजात सांगते, “थांब जरा… स्वतःकडे बघ… विचार कर…आणि जीवनाचे खरे ध्येय शोध. ” त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच वाचक या पुस्तकाचेही मनापासून स्वागत करतील अशी खात्री आहे.
परिचय : श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव, मो. ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “ताठ कणा” – लेखिका : श्री अभिनव भुते, अजय कोठारी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : ताठ कणा
लेखक : अभिनव भुते, अजय कोठारी
पृष्ठ: २४०
मूल्य: ३५०₹
हे पुस्तक म्हणजे पाठदुखी समजून घेण्याचा, भीतीवर मात करण्याचा आणि कण्याला नव्याने ओळखण्याचा प्रवास…
“डॉक्टर, माझी पाठ का दुखते?”
हा प्रश्न आज लाखो लोकांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. ऑफिसमध्ये तासन्तास बसून काम करणारा कर्मचारी असो, दिवसभर कष्ट करणारा शेतकरी असो किंवा घराची जबाबदारी सांभाळणारी गृहिणी — पाठदुखी आता प्रत्येक घरात पोहोचली आहे. पण या वेदनेपेक्षा जास्त त्रास देतात ते गैरसमज, भीती आणि अपुरी माहिती.
‘ताठ कणा’ हे केवळ पाठदुखीवरचं वैद्यकीय पुस्तक नाही; तर रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला विश्वासाचा संवाद आहे. सोप्या भाषेत आणि रोजच्या उदाहरणांतून हे पुस्तक कण्याची रचना, पाठदुखीची कारणं, योग्य व्यायाम, चुकीच्या सवयी, MRI आणि रिपोर्ट्समागचं वास्तव, तसेच ऑपरेशन खरंच कधी आवश्यक असतं हे समजावून सांगतं. प्रत्येक घरात असायला हवं असं हे पुस्तक.. जरूर वाचा.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘माझी माय आक्का’ – लेखक : श्री आत्माराम जाधव ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : माझी माय आक्का
– – एका कृतज्ञ आत्म्याचा भावस्पर्शी प्रवास
लेखक: आत्माराम जाधव
प्रकार: आत्मकथन
पार्श्वभूमी: सुपने, पाटीलवाडी (जि. सातारा) आणि पुणे
प्रकाशन – संवेदना प्रकाशन, चिंचवड.
‘माझी माय आक्का’ हे केवळ एका शिक्षकाचे आत्मवृत्त नाही, तर प्रतिकूलतेवर मात करुन यशाचे शिखर सर करणाऱ्या एका संपूर्ण पिढीचा प्रातिनिधिक दस्तऐवज आहे. निसर्गाचा लहरीपणा, गरिबी, कौटुंबिक आपत्ती आणि भूकंपासारखी नैसर्गिक संकटे या सगळ्यांमधून तावूनसुलाखून निघालेल्या एका संवेदनशील ‘आत्म्याचा’ (आत्माराम) हा विलोभनीय प्रवास आहे. या लेखनाला ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांची लाभलेली प्रस्तावना या पुस्तकाचे वाङ्मयीन वजन अधिक वाढवते.
मुख्य कथानक आणि विषयसूत्र
कथानकाची सुरुवात सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या काठावर वसलेल्या ‘सुपने’ या निसर्गरम्य आणि पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या गावापासून होते. अवघ्या सहा महिन्यांचे असताना आईचे छत्र हरवलेल्या ‘आत्मा’ नावाच्या बालकाला त्याची मावशी ‘रकू आक्का’ पोटच्या गोळ्यासारखं सांभाळते. पुढे तीच त्याची सावत्र आई होते.
लेखकाचे बालपण, उजव्या हातावरून बैलगाडीचे चाक गेल्याचा अपघात, शिक्षणासाठी केलेला संघर्ष, मुंबईतील माथाडी कामगारांचे अनुभवलेले कष्टप्रद जीवन, आणि अखेर डी. एड. , बी. ए. , एम. ए. करत पुणे महानगरपालिकेत आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून मिळवलेली प्रतिष्ठा… असा हा थक्क करणारा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो.
पुस्तकाची बलस्थाने व वैशिष्ट्ये
वात्सल्याची त्रिमूर्ती: ‘माय आक्का’ आणि ‘आबा’ पुस्तकाचा केंद्रबिंदू ‘आक्का’ (रुक्मिणी) आहे. “माय मरो मावशी उरो” या म्हणीला आक्काने आपल्या अपार मायेने खरे करून दाखवले. स्वतः अशिक्षित असूनही “मी मास्तर, इंजिनिअर, डॉक्टराची आई आहे” हा तिचा स्वाभिमान आणि तिची जिद्द वाचकाला हेलावून टाकते. आबांचे शांत, प्राणिमात्र प्रिय व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी विमानाचे स्वप्न पाहण्याऐवजी “विमानात बसण्याचे स्वप्न बघ” असा दिलेला जीवनाचा कानमंत्र पुस्तकाला वेगळी उंची देतो.
ग्रामीण संस्कृतीचे हुबेहूब चित्रण
लेखकाने ७०-८० च्या दशकातील ग्रामीण संस्कृती जिवंत केली आहे. जात्यावरच्या ओव्या, गुऱ्हाळातील उकळणारा रस, विहिरीवर पोहण्याच्या गमती, सुगीचे दिवस, बैल ‘गणप्या’ आणि कुत्रा ‘नगऱ्या’ यांच्याशी असलेले माणसासारखे नाते, तसेच गावातील जत्रा, तमाशा, आणि भूकंपानंतरचे पुनर्वसन यांचे अत्यंत प्रामाणिक चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.
‘श्यामची आई’ या संस्काराची सावली
लेखकाच्या जीवनावर साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा असलेला प्रभाव संपूर्ण लेखनात जाणवतो. पहिल्या पगारातून पुस्तक विकत घेणे आणि आपल्या आक्कात ‘श्यामची आई’ पाहणे, हा प्रसंग वाचकाच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही.
गुरुवर्यांप्रती कृतज्ञता
डी. आर. पवार गुरुजी, संदे गुरुजी, डांगेसर (ज्यांनी इंग्रजीची गोडी लावली), प्राचार्य नानासाहेब माने या सर्व शिक्षकांबद्दल लेखकाने व्यक्त केलेली कृतज्ञता आजच्या काळात दुर्मिळ आणि मार्गदर्शक आहे.
भाषाशैली आणि सादरीकरण
लेखकाची भाषा अत्यंत साधी, सरळ, प्रवाही आणि प्रामाणिक आहे. कुठेही भाषेचा बडेजाव नाही की कृत्रिमता नाही. सातारी/ग्रामीण बोलीतील संवादांमुळे (उदा. “माझ्या आत्माला चांगलं शिकवा, त्याला आय नायं…”) कथनाला मातीचा सुवास येतो. पुस्तक वाचकाची उत्सुकता शेवट पर्यंत टिकवून ठेवते. शेवटी आक्काच्या निधनानंतर झालेला पसायदानाचा आणि हरिपाठाचा ‘दृष्टांत’ मनाला चटका लावून जातो.
‘माझी माय आक्का’ हे केवळ एका व्यक्तीचे चरित्र नसून तो कृतज्ञतेचा महामंत्र आहे. आई-वडिलांचे अपार कष्ट आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे एक सामान्य ग्रामीण मुलगा कसा घडतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. आजच्या भौतिकवादी आणि विभक्त कुटुंबपद्धतीच्या काळात, एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व आणि आई-वडिलांचे ऋण काय असतात, हे सांगणारे हे पुस्तक प्रत्येक कुटुंबाने आणि विशेषतः नवीन पिढीने वाचलेच पाहिजे.
थोडक्यात सांगायचे तर… हे आत्मकथन वाचताना मन भूतकाळात रमते, डोळे पाणावतात आणि शेवटी एका आदर्शाची शिदोरी हाती लागते! एक उत्कृष्ट, हृदयस्पर्शी आणि संग्राह्य साहित्यकृती.
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “संतांची चरित्रे” – पुस्तकांचा संच लेखक : माधवराव आप्पाजी मुळे / ल. रा. पांगारकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : संतांची चरित्रे – ४ पुस्तकांचा संच.
१. श्री नामदेव चरित्र : रू. २५०/-
२. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि ग्रंथ विवेचन : रू. २००/-
३. संत तुकाराम चरित्र : रू २५०/-
४. एकनाथ चरित्र : रू २००/-
सव्वाशे वर्षे झाली या संतांच्या चरित्रांना प्रकाशित होऊन! माधवराव आप्पाजी मुळे आणि ल. रा. पांगारकर यांनी १२५ वर्षांपूर्वी लिहिलेले चार संतांचे चरित्र:
पुस्तक पहिले
संत नामदेव महाराज चरित्र !
लेखक: माधवराव आप्पाजी मुळे
पृष्ठ:२५६
औंढा नागनाथ मंदिर ज्यांच्यासाठी स्वतःची दिशा बदलून घेते, ज्यांच्या रचना गुरू ग्रंथ साहेब मध्ये समाविष्ट आहेत, ज्यांच्या दर्शनासाठी जगभरातून शीख बांधव नरसी येथे येतात, अशा संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे हे चरित्र!
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।
नामा तयाचा कंकर । तेणे केला हा विस्तार ।।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।
बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।
संत बहिणाबाई यांनी लिहिलेला अभंग महाराष्ट्रीय संताचे कार्याचे यथार्थ वर्णन करणारे आहे. संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी पंथाला सुसंघटित केलं. त्याचा पाया घातला…. पण त्याला विस्तृत करण्याचे कार्य मात्र संत नामदेवांनी केलं. हे तत्वज्ञान भारतभर जावे म्हणून देशाटन केलं. संत बहिणाबाई नामदेव महाराज यांना बांधकाम पूर्ण करणारा, त्याला आकार देणारा किंकर म्हणून त्यांचा उल्लेख करतात. संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांच्या मध्ये जो स्नेहभाव होता तो वाचताना आपल्याला कळवळून आले नाही तर नवल! अकृत्रिम प्रेम काय असते? संत संगत काय असते?
संत परंपरेतील सर्वात वडीलधारे संत नामदेव !दीर्घायुषी ! वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देशभर प्रवास करणारे संत नामदेव पंजाबमध्ये ही गेले. त्यांच्या रचना “गुरूग्रंथ साहेब” आहेत. अशा संतांचे हे चरित्र!गुरू नानक, संत कबीर अशा श्रेष्ठ संताशी त्यांच्या भेटी आणि झालेला संवाद या चरित्रात आहे. हा फार महत्वाचा भाग आहे.
हे चरित्र वाचताना अनेक अभंग यात आलेले आहेत. ते अभंग स्वतः च त्या त्या घटना सांगणाऱ्या आहेत. त्यामुळे चरित्र आणि अभंग असा सुंदर ग्रंथ वाचकाला मिळतो.
शतकोटी कवने केली असे त्यांच्या बाबत म्हटले जाते. त्यांच्या अभंगांत समकालीन चरित्र आहेत. इतर संतांची माहिती आहे. त्या सगळ्या अभंगाचा अभ्यास करून लेखकाने नामदेव महाराज यांचे अतिशय रसाळ आणि सुरेख पण वास्तवदर्शी चरित्र तयार केलं आहे.
*****
संतचरित्रे लिहिण्यासाठी आवश्यक असलेली मनोभूमिका पांगारकरांच्या ठायी होती. उत्कट भक्तिभावामुळे ते संतांच्या जीवनाचे व कार्याचे मर्म सहृदयपणे समजून घेऊ शकले. चरित्राची साधने ते परिश्रमपूर्वक जमवत. संतांच्या जीवनातील आणि काव्यातील दोष दाखविणे त्यांना मान्य नव्हते. संतांनी केलेल्या चमत्काराच्या पारंपरिक कथांवर अविश्वास दाखविणे त्यांना योग्य वाटत नसे. श्री ज्ञानेश्वर, तुकाराम व एकनाथ महाराज या संतांची चरित्रे त्यांनी लिहिली. कोणाही सत्पुरुषाचे वर्णन ते नम्रभावाने करीत.
ल. रा. पांगारकर यांनी १२५ वर्षांपूर्वी लिहिलेले संत चरित्र ल. रा. पांगारकर उर्फ लक्ष्मण रामचंद्र पांगारकर हे संतचरित्रे लिहिण्यासाठीच जन्माला आले होते असे म्हणतात. हे विधान अतिशयोक्तीचे नाही याची प्रचीती त्यांनी लिहिलेले संत तुकारामांचे चरित्र वाचताना येते. तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिताना त्यांनी अगदी रामेश्वर भटासदेखील झुकते माप दिले आहे. ल. रा. पांगारकर यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. ‘आतां प्राकृत भाषेंत अधिकारसंपन्न शूद्रालाही धर्मरहस्य सांगायला हरकत नाहीं. कारण धर्मरहस्य भगवत्कृपेनें कोणत्याही जातीच्या शुद्धचित्त मनुष्यांत प्रगट होतें. ही गोष्ट सिद्ध करून देण्याला तुकोबाचा छळ होऊन ते त्यांत यशस्वी व्हावयास पाहिजे होते व या छळाचा कस होण्याचा मान रामेश्वरभटास मिळाला!’ अशा शब्दांत रामेश्वरभट्टांची भलामण केली आहे.
पांगारकरांच्या चिकित्सक वृत्तीचा परिचय करून घ्यायचा असेल तर त्यांचे मोरापंत चरित्र पाहावे, तुकाराम चरित्र पाहावे. प्राचीन वाङमयाचा विचार करताना पांगारकरांची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येण्यासारखे नाही. त्यांनी प्राचीन मराठी वाङमयाचे अत्यंत आवडीने आणि समरसतेने अध्ययन केले. मराठी भाषा आणि इतिहास यांचा व्यासंग करून, आपल्या लेखणीचा आणि वाणीचा प्रभावी वापर करून, जनमानसात या विषयांची गोडी निर्माण करण्याचे महान कार्य त्यांनी आमरण केले. त्यांना अनेक चाहते, मित्र लाभले. भगवंतांच्या स्मरणात त्यांनी नेहमीच गोडी मानली. आयुष्यभर ग्रंथरचनेचा हव्यास अडचणी सोसून रसिकतेने केला.
पुस्तक दुसरे
संत तुकाराम चरित्र
पृष्ठ : ३४६
ह्या ग्रंथाची इमारत कोणत्या आधारांवर उभारली आहे याचा उलगडा करणे अवश्य आहे. पहिला आणि मुख्य आधार म्हणजे तुकोबांचे अभंग हा होय. तुकोबांचे चरित्र त्यांच्या अभंगातच उत्कृष्ट लिहिले गेले आहे. त्यांचे अंतरंग, त्यांचा अभ्यास, त्यांचे अनुभव, त्यांचे उपदेश त्यांच्या अभंगात इतक्या स्पष्ट रीतीने प्रकट झाले आहेत की दुसऱ्या कोणालाही ते तसे वर्णन करून सांगता येणार नाहीत. अभंगंचे परिशीलन आणि मनन जितक्या आस्थेने, आवडीने व आदराने करावे तितके महाराज आपले हृदय उघडे करून दाखविण्यास तयार आहेत. परंपरेचे साह्य मात्र अवश्य धेतले पाहिजे.
ह. भ. प. पांगारकरांनी ‘आठ वर्ष’ मेहनत घेऊन लिहिलेले हे तुकारामचरित्र प्रथम 1920 साली तत्कालीन इंदूर संस्थानचे अधिपती सवाई तुकोजीराव होळकर यांनी दिलेल्या देणगीतूनच छापले होते. त्या काळी, संस्थानिकांच्या मदतीशिवाय अशी कामे होणे अशक्यच होते व आजही असे काम कठीणच आहे म्हणून गेल्या १०० वर्षात कोणत्याच प्रकाशकाने हे चरित्र छापण्याचे धाडस केले नाही यात नवल नाही. पण, वारकरी मंडळींच्या वाढत्या प्रतिसादामुळे दुसऱ्याच आवृत्तीपासून हे चरित्र कायमच उपलब्ध ठेवण्याचे ठरविले आहे आणि याप्रमाण आणखीही संतचरित्रे छापण्याचा वरदा प्रकाशन चा मनोदय आहे.
पुस्तक तिसरे –
श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि ग्रंथ विवेचन –
पृष्ठ:२०४
ज्ञानेश्वर माऊलीचे हे रसाळ चरित्र वाचून मराठी माणसाचे हृदय हेलावून येईल. जाने ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आहे, त्याला तर या चरित्रातील अक्षरे अमृतालाही सजनी जिंकत आहेत असे वाटेल. सर्वसामान्य व्यक्तीला हे चरित्र पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटेल. ज्ञानेश्वर हे मराठी संतांचे शिरोमणी! त्यांच्याविषयी अनेक संतांनी आपल्या अभंग त्यांची स्तुती केलेली आहे. हे अभंग ही लेखकाने ग्रंथाच्या शेवटी एकत्रित दिलेले आहेत.
पहिल्या प्रकरणांमध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वर जन्मापूर्वीचा काळ म्हणजेच महाराष्ट्रातील पार्श्वभूमी समजते. यात महाराष्ट्राचा राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक इतिहास समजतो. मराठी माणसाला, राजा रामदेवराय यादव हे परिचित आहेत. पण यात यादव कुळाचा तपशील मिळतो. अनेक ग्रंथ रचनाकरांचा तपशील मिळतो. उदा भास्कराचार्य.
दुसरे प्रकरण कुलवृत्तान्त आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्वज, यांचे माता पिता रुक्मिणी व विठ्ठलपंत यांचा विवाह, त्यांचा संन्यास रामानंदस्वामींचा अनुग्रह इत्यादीची माहिती मिळेल. याच प्रकरणांमध्ये संन्याशाच्या पोटची मुलं आणि त्यांचा छळ आलेला आहे.
असे एकेक प्रकरण सविस्तर आणि व्यापकपणे दिलेले आहे. प्रत्येक प्रकरणात गरजेनुसार अनेक अभंग रचना आहेत. त्या संदर्भ किंवा प्रमाण म्हणून वापरल्या आहेत.
पुस्तक : चौथे
संत एकनाथ चरित्र
पृष्ठ:२२२
गृहस्थाश्रमात राहून नाथांनी ब्रह्म स्थिती अभंग ठेवली! गृहस्थी जीवन अर्थात प्रपंच आणि अध्यात्मिक जीवन अर्थात परमार्थ या दोन्हीचा सुरेख मेळ घालण्याचे अत्यंत कठीण कार्य नाथांनी आपल्या जीवनात केलेले आहे.
शांतीब्रह्म या नावाने ओळखले जाणारे संत एकनाथ गृहस्थ जीवनातील आदर्श! शालीवाहन राजाची राजधानी पैठण नाथांमुळे आज महाराष्ट्राला माहिती आहे.
संस्कृत इतकीच प्राकृत ही महत्त्वाची आहे, असे सांगणारे संत एकनाथ माणसामाणसातील भेद मानत नसत. देश भ्रमण करताना काशी येथील ब्राह्मणांनी नाथांचा अतोनात छळ केला. पण नाथांच्या सद्वर्तन आला भुलून पुढे त्यांचा जय जयकार केला.
भागवत धर्माचा प्रसार नाथांनी केला. अभंग गवळणी भारुड यामाध्यमातून नाथांनी समाजामध्ये जागृती निर्माण केली. नाथांनी रचलेल्या आजही जगभर मागणी असते.
दासोपंत आणि नाथांचे भेट त्याच प्रमाणे नाथांनी ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन कसे घेतले याचेही या चरित्रामध्ये वर्णन वाचायला मिळते.
– – – –
ही माहिती आणि पुस्तकेही आपल्या परिचित वाचकांना, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, मराठी विषयाचे विद्यार्थी यांना आवर्जून पाठवू!
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “निरोगी रहा ” – लेखक / लेखिका : वैद्य परीक्षित शेवडे / वैद्य स्वराली शेंड्ये ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : निरोगी रहा
लेखक: वैद्य परीक्षित शेवडे
वैद्य स्वराली शेंडये
पृष्ठ: १२८
मूल्य: २२०₹
Prevention is better than cure म्हणजेच “आपण रोगाच्या प्रतिबंधाबाबत उपचारांपेक्षा अधिक सजग असायला हवं” हे आजच्या घडीला जगन्मान्य तत्त्व आहे. हा प्रतिबंध करण्याचा मार्ग म्हणजेच आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या. या दोन्हींचं पालन आजच्या काळात कसं शक्य आहे, त्यातील तपशील, खाचखळगे यांसहच काही सोप्या पथ्याच्या रेसिपी, मानसिक आरोग्याची काळजी अशी पुरेपूर उपयुक्त माहिती असलेलं पुस्तक म्हणजे “निरोगी रहा”
दैनंदिन जीवनात निरोगी आणि संतुलित राहण्यासाठी आयुर्वेदाच्या तत्त्वांवर आधारित मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक. आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने उपाय सांगण्यात आले आहेत.
या पुस्तकात आहार, दिनचर्या, मानसिक स्वास्थ्य, रोगप्रतिबंधक सवयी आणि नैसर्गिक आरोग्य व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान आणि आजच्या जीवनशैलीचा समतोल साधणारे हे पुस्तक प्रत्येक कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल.
पुस्तकातील वैशिष्ट्ये
— निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदिक मार्गदर्शन
— दैनंदिन आरोग्य टिप्स आणि सवयी
— मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याविषयी माहिती सोपे, व्यावहारिक आणि प्रभावी उपाय
.. सर्व वयोगटांसाठी उपयुक्त मार्गदर्शक.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘भगवद्गीता’ हा महाभारतातील एक भाग आहे. संस्कृतमधील सातशे श्लोकांचे ज्ञानेश्वरांनी सुमारे नऊ हजार ओव्यांत रूपांतर केले. प्रश्न असा पडला, आपण याचं संक्षिप्त रूप कसं करायचं? भगवद्गीतेत काय आहे, सोप्या भाषेत समजून घ्यावं, असं ठरवून मी ‘गीता’ वाचत राहिले. समजलं ते लिहायचं ठरवलं आणि लिहायला घेतलं. लिहीत राहिलं तर वाटत होतं अजून अपूर्ण आहे. तहानच भागेना. या निमित्तानं समजून घेतलेलं लिहीत गेले. मुलांसाठी ती एक युद्धकथा आहे आणि मुलांना युद्धकथा आवडतात, पण ही युद्धकथा इतर युद्धांपेक्षा वेगळी आहे. कारण या युद्धकलेत रणांगणावर सगळे असतात, पण युद्धच सुरू होत नाही. आपल्याला वाटेल की, मग कौरवांनी युद्धाला सुरुवात करायची ना! अठराव्या अध्यायापर्यंत कृष्ण, अर्जुनाला, त्याच्या गोंधळलेल्या, निराश झालेल्या मनाला, मारू की मारू नको, या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी तयार करतो. अशी अवस्था मुलांची होते, पण कृष्ण ज्या पद्धतीने अर्जुनाला युद्धासाठी तयार करतो, ती पद्धत खूप महत्त्वाची वाटते. कृष्ण आज्ञा करत नाही, सक्ती करत नाही, तर कृती मागील कारणमीमांसा करताना दिसतो. अर्थात हे सारं तत्त्वज्ञान मुलांसाठी सोपं करताना अवघड होतं.
हजारो वर्षांपूर्वी लिहिलेलं महाभारत आजही तेवढंच आपल्या जीवनाला व्यापून आहे. आजच्या काळात अनेक ठिकाणी मुलं ‘गीते’तील काही अध्याय पाठ करताना दिसतात आणि अनेक मोठ्या माणसांची संपूर्ण ‘गीता’ पाठ असते, पण आजच्या विज्ञान युगात मुलांना अर्थ समजणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. असं वाटलं, की प्रत्येक अध्यायाचा अर्थ, त्यांतील तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मुलांना सांगितलं, तर मुलांना भगवद्गीतेत रुची वाटू शकेल. काळ बदलला तरी आपली अवस्था आणि अर्जुनाची अवस्था एका पातळीवर सारखीच आहे. फक्त गरज आहे ती अवघड असलेली कृष्णाची भूमिका घेण्याची. म्हणून जेवढ्या सोप्या भाषेत सांगता येईल, तेवढ्या सोप्या भाषेत सांगायचा हा प्रयत्न आहे. संस्कृत भाषेबद्दल आदर असूनही, कुठेही शक्यतो संस्कृत शब्द वापरला नाही. अध्यायाचा मुलांना समजेल अशा भाषेत तो अध्याय आणि अध्यायाच्या शेवटी चौकटीत तत्त्वज्ञानाची जमेल तेवढ्या सोप्या भाषेत, वैचारिक मांडणी केली आहे.
– लेखिका रेणू दांडेकर
– – – बाहेरच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नुसती पोटार्थी विद्या संपादन न करता खऱ्या अर्थाने ज्ञान संपादन करण्याची गरज आहे. त्यासाठी प्राचीन ज्ञान-वारशाशी नाळ जोडली पाहिजे. हा वारसा म्हणजे प्राचीन काळात लिहिले गेलेले ग्रंथ. वेद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांसारखे ग्रंथ म्हणजे जीवन कसे जगले पाहिजे, याचे ज्ञान देणारे भांडारच! आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले, तरी हताश न होता आपले कर्म म्हणजेच काम निष्ठेने करणे, मूल्यांना, तत्त्वांना धरून जगणे, निसर्गाचा, आपल्या आजूबाजूच्या सजीवांचा विचार करणे किती आवश्यक आहे, याचे ज्ञान या ग्रंथांतून मिळते. माध्यमिक ते महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्कारक्षम वयात या ज्ञानवारशाचा अभ्यास करावा, त्यातून त्यांच्यावर भावनिक आणि तात्त्विक संस्कार व्हावेत, या उद्देशाने या पुस्तक संचाची निर्मिती रेणू दांडेकर यांनी केली आहे. तत्त्वज्ञानाचा हा वारसा आपण जपावा आणि पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित करावा, यासाठी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्याचा या पुस्तकाचा प्रयत्न आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘अष्टदीप ’ – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : अष्टदीप
लेखक – श्री. विश्वास देशपांडे,
एकूण पृष्ठ 300
प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे
सदर पुस्तकात आठ प्रेरणादायी ‘भारतरत्नांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री प्रथमेश नाझरकर यांनी केले आहे ते अत्यंत समर्पक व आकर्षक आहे ते बघितल्यावर लहानपणीचे थोरांची ओळख व लहान पुस्तकांची चरित्रमाला आठवते. पण या पुस्तकात अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल माहिती समजते. लेखकाची भाषाशैली सोपी, सरळ, सुटसुटीत व ओघवती आणि आबालवृद्ध सर्वांना आकलनास अत्यंत सोपी आहे. ती वाचकांना आपलेसे करणारी आहे. वाचक त्यात रंगून जातात.
पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत आठ भारतरत्नांची नावे त्यांच्या व्याक्तिमत्वातील वैशिष्ठयांसह दिसतात.
त्या नंतर आपण लेखकाचे मनोगत वाचू शकतो. खरे तर बरेचदा मनोगत, प्रस्तावना वाचले जात नाही. परंतु मनोगताची सुरुवात “आपला भारत देश म्हणजे नररत्नांची खाण आहे. हे वाक्य पुढचे मनोगत वाचण्याची उत्सुकता वाढवते. हे मनोगत काही संस्कार देते व लेखकाच्या वाचन, लेखन याचा प्रेरणास्त्रोत सांगते.
श्री विश्वास विष्णु देशपांडे
अष्ट म्हणजे आठ. या आठ महान व्यक्तिंनी दिव्याप्रमाणे उजळून, वाती प्रमाणे जळून निस्वार्थीपणे भारताला उजळून प्रकाशमान करून टाकले. लेखकाच्या भाषेत सांगायचे तर, ‘या सर्वांना आपल्या आयुष्यात अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली नैतिक मूल्ये ढळू दिली नाहीत. किंवा ते निराश झाले नाहीत. हे वर्णन करताना पुढील समर्पक काव्यपंक्ती योजल्या आहेत. “आली जरी कष्टदशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर। त्यामुळे हे मनोगत वास्तव व रंजक झाले आहे.
हे पुस्तक म्हणजे फक्त जन्म, मृत्यू व त्रोटक कार्य सांगणारे साधारण चरित्र किंवा निबंध नाही. तर आठ भारतरत्नांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यात आपले विचार जोडून व्याक्तिंकडून वाचकांनी काय घ्यावे, त्यांचे आदर्श कसे रूजवावेत हे सगळे सहज सांगावे अशा ओघवत्या शैलीत सुचवले आहे. लेखकाची शब्द क्षमता, लेखणी सामर्थ बघून ते ‘सिद्धहस्त’ लेखक अहेत हे जाणवते. या आठ भारत रत्नांना जी अर्थपूर्ण विशेषणे वापरली आहेत त्यातून हे लक्षात येते.
मनोगता नंतर ‘प्रेरणादायी व संस्कारक्षम पुस्तक’ हे पुस्तका विषयी विशेष माहीती देणारे श्री. लक्ष्मीकांत देशमुख लेखक व माजी संमेलनाध्यक्ष यांचे विचार वाचायला मिळतात. हा लेख अतिशय वाचनिय व पुस्तकाचे यथार्थ महत्व विशद करणारा आहे. या नंतर आपल्या समोर अतिशय महत्वाची माहिती सांगणारा लेख येतो. तो म्हणजे ‘भारतरत्न पुरस्काराविषयी थोडेसे’ हे सगळे लेख मुख्य पुस्तक वाचण्याची प्रेरणा देतात. व उत्सुकता वाढवतात. यात प्रत्येक व्यक्तिचे नाव त्यांच्या मुख्य वैशिष्ठयासह वाचायला मिळते. प्रथम आपल्या भेटीला येतात – निश्चयाचा महामेरु महर्षी धोंडो केशव कर्वे.
लेखाचे नाव वाचताच लक्षात येते, अतिशय प्रतिकुल परिस्थितीत
अचल निश्चय असणारे व ठाम ध्येय ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व. त्यांनी विधवांचे पुनरुत्थान करून व स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना जगात वेगळेच स्थान मिळवून दिले आहे. या काळात समाजाचा झंझावातरूपी विरोध सहन करून हे कार्य करणे, या साठी ठाम निश्चयाचा अचल महामेरूच पाहीजे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत सुरु झालेली छोटी संस्था आज मोठ्या वटवृक्षात रुपांतरीत होऊन अनेक महिलांना सक्षम बनवून त्यांना समाजात ठामपणे उभे करत आहे. त्यांचे हे कार्य लेखकाने इतके प्रभावीपणे मांडले आहे, की त्या काळातील परिस्थतीची वास्तवता लक्षात येते आणि आपण नतमस्तक होतो.
या नंतर बालपणीच देशाचा विचार करणारे, हित जपणारे द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरैया यांचे चरित्र समोर येते. यांना लहानपणी मामाकडे राहून शिक्षण पूर्ण करावे लागले. पण हुशारीच्या आड कोणत्याही गोष्टी येत नाहीत. याच बालवयात धबधबा बघताना त्यांची प्रतिक्रिया इतर मुलांप्रमाणे नव्हती. तर या द्रष्ट्या बालकाच्या मनात असा विचार होता, “केवढा हा पाण्याचा व शक्तीचा अपव्यय, याचा काही उपयोग नाही का करता येणार? मोठा झाल्यावर मी नक्कीच काहीतरी करणार, ” आणि हाच विचार त्यांनी मोठेपणी अंमलात आणला. व आपल्या कार्य कर्तृत्वाने पाणी, बंधारे, कालवे यावर प्रयोग व संशोधन केले. जे आजही आपल्याला उपयोगी पडत आहेत. आणि त्यांना काही पर्याय नाहीत. त्यांची शिस्त, वक्तशीरपणा विविध कार्य, त्यांच्या काही इमारती, वृंदावन गार्डन या विषयी अत्यंत आदरपूर्वक लिहीले आहे.
पुढे आपण भेटतो, ते भारत एकसंध करण्याच्या कामी अत्यंत मोलाची कामगिरी करणारे- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना. यांच्या कार्याचा व लोहपुरुष या विशेषणाचा अत्यंत सखोल अभ्यास करून कार्यपट समोर ठेवला आहे.
५६५ संस्थाने किती प्रयत्न पूर्वक आपल्या बुध्दिमत्तेने एका छताखाली आणली व त्या साठी काय काय करावे लागले, याचे अगदी बारकाईने वर्णन वाचायला मिळते. म्हणूनच ते भारताचे ‘लोहपुरूष’ या नावाने ओळखले जातात. भारताची एकता व अखंडता या साठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. हे सगळे वाचताना या लोहपुरुषाचे प्रयत्न, विचार यांचे समग्र दर्शन घडते. व हे व्यक्तिमत्व नसते तर काय घडले असते या विचाराने आपला थरकाप उडतो. हे सगळे वाचताना आपण किचकट इतिहास वाचत आहोत असे कुठेही वाटत नाही. यातच लेखकाच्या लेखणीचे व अवघड विषय सोपा करून सांगण्याचे कसब लक्षात येते.
द्रष्टा उद्योगपती जे आर डी टाटा
यांचे वर्णन करताना लेखक. ओबड धोबड दगडातून मूर्ती घडवणारा शिल्पकार, हिऱ्याला पैलू पाडणारा जवाहिर असे शब्द वापरतात. भारतात साखरे प्रमाणे विरघळून जाणे इथपासून टाटांचे खरे देशप्रेम व कार्य याची माहिती मिळते. यांचे चरित्र म्हणजे रत्नांची खाणच! असे वर्णन लेखक करतात. द्रष्टा उद्योगपती आपल्याला सोदाहरण वाचायला मिळतो. त्याच बरोबर सच्चा देशभक्त, गुणी माणसांची कदर, पारख असणारा, अनेक उद्योगांची टाटा समूहात भर घालणारा, माणसांचे गुण हेरुन त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारा माणूस हळवा व कुटुंबवत्सल होता हे या लेखातून समजते. यानंतर आपण भेटतो जशा व्यक्तिला, ज्यांची घोषणा लहानपणी पासून सगळीकडे देतो ती म्हणजे ‘जय जवान जय किसान, ते म्हणजे निर्मळ चारित्र्याचे धनी (साधी रहाणी, उच्च विचार सरणी असलेला नेता) लाल बहादूर शास्त्री. यांचे जीवन समजणे व समजून घेणे आणि अंमलात आणणे सगळ्याच गोष्टी अवघड आहेत. परंतू लेखकाने अत्यंत सोप्या नेमक्या व नेटक्या शब्दात सांगीतले आहे. १९४२ ची चळवळ त्यांचा तुरुंगवास, घरची साधी रहाणी, चीनचा विश्वासघात, भारत नेपाळ संबंधात फूट, हजरतबल प्रकरण, रेल्वे अपघात असे अनेक कसोटीचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले. पण या सर्वांना समर्थपणे तोंड कसे दिले. व त्यातून त्यांच्या निश्चयी स्वभावाची व उच्च कर्तृत्वाची ओळख अतिशय आदर व कौतुकाने करून दिली आहे.
अजातशत्रू नेता अटलबिहारी वाजपेयी अगदी उचित ‘विशेषण योजून या भारतरत्नाची ओळख करुन दिली आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्याच कवितेच्या ओळींमधून सांगीतल्या आहेत. ‘यमुना तट, टीले रेतीले, माँ के मुँह में रामायण के दोहे – चौपाई रस घोले।’
त्यांचे ग्वाल्हेरचे शिक्षण या पासून ते त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेत त्यांच्या घरी जाऊन दिलेल्या सर्वोच्च पुरस्कारा पर्यंत लेखक आपल्याला प्रवास घडवतात. हे सगळे लेखकाच्या अनोख्या शैलीत पुस्तकात वाचणे अधिक योग्य ठरेल.
या नंतर आपल्या समोर येते गान कोकीळा, भारताची शान आनंदघन लता मंगेशकर
सर्वच भारतीयांना जिचा अभिमान आहे. जिच्या सुरांनी सर्वावर मोहीनी घातली आहे. जगभरात हा सूर निनादतो. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी ऐकू येतो आणि जवळीक साधतो असा सूरी जणू या हारातील ‘तन्मणी! या स्वरलतेचे बालपणी पासूनचे टिपलेले सुंदर बारकावे व त्यातून घडलेले संस्कार खूपच वाचनिय आहेत. लता नामक महावटवृक्षाचा एकंदर जीवन प्रवास मांडणे म्हणजे ‘शिवधनुष्य पेलणे आहे. पण लेखकाने ते आपल्या लेखणीने समर्थपणे पेलले आहे. त्यांची सांगीतीक कारकिर्द अतिशय सुंदर व मनोवेधक पध्दतीने उलगडून दाखवली आहे.
सर्व बारकावे वाचताना लेखक दर्दी व संगीतप्रेमी आहे, हे लक्षात येते. सदर पुस्तकातील जास्त पाने ‘लतागान’ गुणगुणत आहेत असे जाणवते. तिच्या गाण्याचे रसग्रहण करताना ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ… ‘ या अभंगाचा आधार घेऊन लता नामक स्वरकमलाकडे रसिक श्रोते भ्रमराप्रमाणे कसे आकर्षित होतात ते सांगितले आहे. या स्वरसाम्राज्ञीला शेवटी भा. रा. तांबे यांच्या शब्दात भावपूर्ण श्रध्दांजली वाहतात. या पुस्तकात शेवटी आपण भेटतो ते उज्वल भारताचे
स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांना.
त्यांचे कष्टमय बालपण, निःस्वार्थीपणे केलेली देशसेवा, त्यांचे विद्यार्थी प्रेम, त्यांची रुद्रवीणा वाजवण्याची आवड. त्यांनी लिहीलेली प्रेरणादायी पुस्तके हे सर्व बारकावे वाचायला मिळतात. त्यांची अपार विज्ञाननिष्ठा सर्वपरिचित आहे. शिवाय ते दररोज कुराण व भगवतगीता यांचे पारायण करतात. त्यांच्या आगळ्या वेगळ्या कार्यशैली मुळे ते राष्ट्रपती कसे बनले हे सर्व लेखकाच्या दृष्टीतून व सिद्धहस्त लेखणीले
लिहीलेले वाचणे अधिक योग्य आहे.
सदर ‘अष्टदीप’ पुस्तक आपल्या मनात हे आठदीप उजळून आपल्याला प्रकाशमान करून टाकतात.
या पुस्तकाला नुकताच ‘तितिक्षा इंटरनॅशनलचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मी हे पुस्तक का वाचले?
एकदा रेडिओवर संगीत व माहिती यावर आधारित कार्यक्रम ‘आनंदघन लता मंगेशकर’ ऐकला. त्यातील निवेदक अतिशय शांत, धीरगंभीर आवाजात दिदींची माहिती सांगत होते. व त्यांनी हजारो गाण्यातून निवडलेली प्रसंगा नुरूप गाणी लावत होते. चौकशीअंती समजले की या कार्यक्रमाचे लेखन, सादरीकरण करणारे लेखक श्री विश्वास देशपांडे आहेत आणि हे लेखन त्यांच्या ‘अष्टदीप पुस्तकातील आहे. त्यानंतर हे पुस्तक उत्सुकतेने वाचले, तर अतिशय सुंदर चरित्रे समोर आली. याच लेखकांची दहा पुस्तके प्रकाशित झाली अहित. व त्यातील ललित लेखाचे व रामायण महत्व आणि व्याक्तिविशेष याचे सादरीकरण रेडीओवर होत असते. त्यांची सगळीच पुस्तके अत्यंत सकारात्मक, अभ्यासपूर्ण, निरीक्षणात्मक असतात. भाषा अत्यंत सोपी, सहज असते. त्यामुळे ती आपल्याला आपलीच वाटतात.
अशीच अजून पुस्तके यावीत आणि आपण सर्वांनीती आवर्जुन वाचावित. या सदिच्छेसह धन्यवाद!
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈