मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 40 – भाग-2 – साद उत्तराखंडाची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 40 – भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ साद उत्तराखंडाची  ✈️

जिम कार्बेट ते रानीखेत हे अंतर तसं कंटाळवाणं आहे. रानीखेत हे भारतीय लष्करातील नावाजलेल्या कुमाऊँ रेजिमेंटचं मुख्य ठिकाण आहे. रानीखेतमधील कुमाऊँ रेजिमेंटच्या म्युझियममध्ये भारतीय लष्करातील धाडसी, निधड्या छातीच्या वीरांची यशोगाथा बघायला मिळते. दोन परमवीर चक्र व तीन अशोक चक्राचे मानकरी यात आहेत. रानीखेतहून कौसानीला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या उतारावर सारख्या उंचीचा काळपट हिरवा गालिचा पसरल्यासारखे चहाचे मळे आहेत. कौसानीला चहाची फॅक्टरी पाहिली. तिथे विकत घेतलेला चहा मात्र आपल्याला न आवडणारा गुळमुळीत चवीचा निघाला. रानीखेत- कौसानी रस्त्यावर जंगलामध्ये लाल बुरांस म्हणजे होडोडेंड्रॉन वृक्षाची लालबुंद फुलं सतत दिसतात. या फुलांच्या गोडसर सरबताचा उन्हाळ्यात औषधासारखा उपयोग होतो अशी माहिती मिळाली. कौसानीतल्या आमच्या हॉटेलच्या बगीच्यात किंबहुना  तिथल्या बहुतांश बगीच्यात , हॉटेलात शोभेच्या जाड पानांची अनेक झाडे, कॅक्टसचे वेगवेगळे शोभिवंत प्रकार होते. यातील एका प्रकारच्या कॅक्टसच्या खोडांचा पल्प काढून त्यापासून प्लायवुड बनविले जाते असे तिथल्या हॉटेल मॅनेजरने सांगितले.

‘पृथ्वीचा मानदंड’ असे ज्याचे सार्थ वर्णन कवी कुलगुरू कालिदासाने केले आहे तो ‘हिमालयो नाम नगाधिराज’ म्हणजे भारताला निसर्गाकडून मिळालेलं फार मोठं वरदान आहे. जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, ईशान्य भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगाल या साऱ्यांना हिमालयाचा वरदहस्त लाभला आहे. अशा अफाट हिमालयाच्या उत्तुंग पहाड रांगांना वेगवेगळी नावे आहेत. धौलाधार, पीरपांजाल, कुमाऊँ ,गढवाल अशा विविध रांगांच्या अनंत हातांनी हिमालय आपल्याला बोलावत राहतो. एकदा हिमालयाच्या प्रेमात पडलं की अनेक वेळा तिथे जायचे योग येतात.

साधारण वीस- पंचवीस वर्षांपूर्वी चारधाम यात्रेचा बेत केला. हरिद्वारपासून हरिद्वारपर्यंत असं चारधाम प्रवासाचे बुकिंग गढवाल निगमतर्फे केलं होतं. यात्रा सुरू होण्याआधी चार दिवस डेहराडून एक्सप्रेसने डेहराडूनला पोहोचलो. डेहराडून ही उत्तराखंडाची राजधानी गंगा आणि यमुनेच्या खोऱ्यात वसली आहे. भरपूर पाऊस, आकाशाला भिडणारे वृक्ष, डोंगरउतारावरची छोटी छोटी घरं, नाना रंगांची फुलझाडं असणाऱ्या डेहराडूनमध्ये अनेक नावाजलेल्या शैक्षणिक संस्था आहेत. इंडियन मिलिटरी अकादमी, पेट्रोलियम रिसर्च इन्स्टिट्यूट, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जीऑलॉजी, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट अशा संस्था तसेच लष्कराला अनेक प्रकारचे साहित्य पुरविणारी ऑर्डनन्स फॅक्टरी आहे. आम्हाला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बघायला मिळाली. तिथे पुरातन मजबूत वृक्षांचे ओंडके गोल कापून ठेवले होते. त्या खोडांच्या अंतरेर्षांवरून त्या झाडाचं वय कितीशे वर्ष आहे, त्याचे उपयोग, सध्या या जातीचे किती वृक्ष आहेत अशी माहिती तिथे सांगितली.

तिथून मसुरीला गेलो. साधारण साडेसहा हजार फुटावरील मसुरीला हिल स्टेशन्सची राणी म्हणतात. स्क्रूसारख्या वळणावळणांचा मसुरीचा रस्ता केव्हा एकदा संपतो असं झालं होतं. डोंगरकपारीतली एकावर एक वसलेली चढती घरे पाहत मसुरीला पोहोचलो. मसूरी हेसुद्धा शैक्षणिक व औद्योगिक केंद्र आहे. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS) मधील यशस्वी उमेदवारांना इथे ‘लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन’मध्ये ट्रेनिंग दिलं जातं. सुप्रसिद्ध डून स्कूल तसेच मोठी ॲग्रीकल्चर यूनिव्हर्सिटी आहे. रोपवेने गनहिलला गेलो. इथून संपूर्ण मसुरी, डून व्हॅली व दूरवर हिमालयाच्या शिवालिक रेंजेस दिसतात. मसुरीला मोठे बगीचे व मासेमारीसाठी तलाव आहेत. इथून हिमालयातील लहान- मोठ्या ट्रेकिंगच्या मोहिमा सुरू होतात. त्यांचे बेस कॅम्पस् व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इथे आहे. आमचे सीडार लॉज खूप उंचावर होते. सभोवती घनदाट देवदार वृक्षांचे कडे होते. मसुरीहून दुसऱ्या दिवशी केम्प्टी फॉल्स बघायला गेलो. गोल गोल वळणांच्या रस्त्याने दरीच्या तळाशी पोहोचलो. खूप उंचावरून धबधबा कोसळत होता. त्याच्या थंडगार तुषारांनी सचैल स्नान झाले. हौशी प्रवाशांची गर्दी मुक्त मनाने निसर्गाच्या शॉवरबाथचाआनंद घेत होती.

मसुरीहून हरिद्वारला मुक्काम केला.  दुसऱ्या दिवशी ऋषिकेशला गेलो. तिथल्या झुलत्या पुलावरून पलीकडे गेल्यावर अनेक आश्रम होते. साधू, बैरागी, शेंडी ठेवलेले परदेशी साधक यांची तिथे गर्दी होती. इथे गंगेच्या खळाळत्या थंडगार पाण्याला खूप ओढ आहे. गंगाघाटाच्या कडेने बांधलेल्या लोखंडी साखळीला धरून गंगास्नानाचा आनंद घेतला. संध्याकाळी हरिद्वारला गंगेच्या घाटावर आरती करून दीप पूजा केली.

उत्तराखंड भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 39 – भाग-1 – साद उत्तराखंडाची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 39 – भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ साद उत्तराखंडाची  ✈️

शाळेत असताना हिंदीच्या पाठ्यपुस्तकात ‘चांदणी’ नावाची एक गोष्ट होती. अलमोडा पहाडात राहणाऱ्या अबूमियांची चांदणी नावाची एक खूप लाडकी बकरी होती. कापसासारख्या शुभ्र, गुबगुबीत चांदणी बकरीच्या कपाळावर एकच काळा ठिपका होता. एकदा चरण्याच्या नादात चांदणी एकटीच पहाडात दूर दूर जाते. चुकलेल्या चांदणीला अबूमिया हाकारत राहतात आणि शेवटी नाइलाजाने इतर बकऱ्यांना घेऊन उदास मनाने घरी परततात. पहाडात सैरभैर फिरणाऱ्या चांदणीची गाठ एका कोल्ह्याशी पडते. चांदणी प्राणपणाने कोल्ह्याशी झुंज देते. पण…….! चांदण्याने निथळलेला गुढरम्य अलमोडा पहाड, तिथली घनदाट वृक्षराजी, चांदणीची आर्त साद आणि एकाकी झुंज दीर्घकाळ स्मरणात राहिली. त्यानंतर खूप वर्षांनी हिमालयातील अलमोडा पर्वतराजी पाहण्याचा योग आला तेव्हा चांदणीची आठवण झाली.

पूर्वीच्या उत्तर प्रदेशचे २००० साली विभाजन करून उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली. डेहराडून ही या राज्याची राजधानी. गढवाल आणि कुमाऊँ असे उत्तराखंडचे दोन भाग पडतात. गढवालचे टेहरी गढवाल आणि पौरी गढवाल असे दोन मोठे विभाग आहेत, तर कुमाऊँ टेकड्यांमध्ये नैनीताल, अलमोडा हा पूर्वेकडचा भाग येतो. उत्तराखंडाच्या उत्तरेकडे तिबेट, पूर्वेकडे नेपाळ आणि पश्चिम व दक्षिणेकडे उत्तर प्रदेश राज्य आहे.

आम्ही लखनौहून रात्रीच्या ट्रेनने काठगोदाम इथे सकाळी पोहोचलो. काठगोदामहून नैनीताल हा साधारण दोन तासांचा रस्ता अतिशय सुंदर आहे पण आमची बस अर्ध्यावाटेमध्ये बिघडल्याने मेकॅनिकची वाट पाहण्यात बराच वेळ गेला. शेवटी तिथेच उतरून पहाडाच्या माथ्यावरच बरोबर आणलेलं जेवण घेतलं. एका बाजूला खोल दरी होती. लांबवर कुमाऊँ पहाडांची रांग दिसत होती. सगळ्या दऱ्या डोंगरांवर साल, देवदार आणि पाईन वृक्ष ताठ मानेने उंच उभे होते. गाडी दुरुस्त होऊन थोडा प्रवास झाल्यावर डोंगर आडोशाच्या एका छोट्या टपरीत चहासाठी थांबलो. पण कसले काय? भन्नाट वाऱ्याने तिथे थोडा वेळसुद्धा थांबू दिले नाही. टपरीवाल्याचे टेबलांवरचे, छपरावरचे प्लास्टिक उडून गेले. टेबल- खुर्च्या थरथरायला लागल्या. पाऊसही सुरू झाला. धावत पळत कसेबसे गाडीत येऊन बसलो. नैनितालला पोहोचायला रात्र झाली.

आमचं हॉटेल नैनी लेकच्या समोरच होतं. लंबगोल प्रचंड मोठ्या नैनीतालच्या भोवती रमत- गमत एक फेरी मारली. तलावात बोटिंगची सोयही आहे. वातावरणात थंडी होती आणि डोक्यावर ऊन होते. मॉल रोडवर प्रवाशांना हाकारणारी शेकडो दुकाने आहेत. तिबेटी स्त्रियांच्या दुकानातील असंख्य स्वेटर्स, आकर्षक कपडे, परदेशी वस्तू, वस्तूंच्या भावावरून घासाघीस सारे हिल स्टेशनला साजेसे होते. नैना देवीचं दर्शन घेतलं. दुपारी भीम ताल, सात ताल  बघायला बाहेर पडलो. बसमधून घनदाट वृक्ष आणि कुमाऊँ रेंजची दूरवर दिसणारी बर्फाच्छादित शिखरं न्याहाळत चाललो होतो. आमचा गाईड चांगला बोलका व माहीतगार होता. कालच्या  सोसाट्याच्या भन्नाट वाऱ्यात ठामपणे उभ्या असलेल्या वृक्षांबद्दल विचारलं. तर त्याने पाईनवृक्षाचे एक पडलेले फळ आणून दाखविले. त्या फळाच्या देठाशी जो चिकट द्रव होता तो म्हणजे राळ. या राळेपासून टर्पेंटाईन बनवलं जातं. इथल्या गावातून दिव्यात घालण्यासाठीसुद्धा राळ वापरली जाते. पाईनचे लाकूड पटकन पेट घेते म्हणून थंडीच्या दिवसात शेकोटीसाठी याचा वापर करतात. या लाकडापासून बनवलेली झाकणं स्वयंपाकाच्या भांड्यांवर ठेवतात. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत पदार्थ बराच वेळ गरम राहू शकतो अशी छान माहिती त्याने सांगितली. भीमतालवर जाण्यासाठी उतरलो पण तिथे पोहोचू शकलो नाही. मुसळधार पाऊस सुरू झाला. थंडीने हृदय काकडले. कसेबसे हॉटेलला परतलो.

दुसऱ्या दिवशी जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान बघायला निघालो. जाताना खोल दऱ्यांमधील अनेक छोटेमोठे जलाशय दिसत होते. त्यात स्वच्छ निळ्याभोर आकाशाचे प्रतिबिंब पडल्यामुळे ते नीलमण्यांसारखे भासत होते. पुढचा रामनगरपर्यंतचा रस्ता पहाडी नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गव्हाची आणि मोहरीची मोठी शेती होती. भरपूर आम्रवृक्ष होते. आपल्याइथला हापूस आंब्याचा सिझन संपत आला की बाजारात येणारे दशहरी, केशर, नीलम, लंगडा आंबे हे उत्तराखंड, उत्तर प्रदेशचे असतात. थंडगार पहाडावरून सपाटीवर आलो होतो. भरपूर वृक्ष आणि हवेतला ओलसर दमटपणा यामुळे घामाघूम झालो होतो .एका धाब्यावर गरम चविष्ट पराठा खाऊन मोठा ग्लास भरून दाट मधुर लस्सी घेतली आणि पोटभरीचे जेवण झालं. अभयारण्यच्या आधी ‘जीम कॉर्बेट’ म्युझियम आहे. पुढे थोड्या अंतरावर छोटासा धबधबा आहे. रंगीबेरंगी पक्षी, सुगरणीची घरटी, हरणे, रान कोंबड्या यांचं दर्शन झालं. तीन-चार फूट उंच वारूळं रस्त्याच्या दोन्ही कडांना होती. ड्रायव्हरने जंगलवाटा धुंडाळल्या पण व्याघ्रदर्शन झाले नाही. दूरवर चरणारे जंगली हत्ती, मोर, गरुड दिसले. कडूलिंबाचे प्रचंड मोठे वृक्ष होते.

उत्तराखंड भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 38 – भाग 3 – काळं पाणी आणि हिरवं पाणी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 38 – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ काळं पाणी आणि हिरवं पाणी  ✈️

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून बसने निघालो. जारवा आदिवासींच्या जंगलात जायचे होते. त्या संरक्षित जंगलात जाण्या- येण्याच्या वेळा ठराविक असतात. सर्व प्रवासी बसेसना एकदम एकत्र सोडण्यात येतं. त्या जंगल विभागाशी पोहोचेपर्यंत दुतर्फा आंबा, फणस, नारळ, सुपारी, केळी, एरंड, भेंडी अशी झाडं व विविध प्रकारचे पक्षी  दिसत होते. संरक्षित जंगल विभागात साधारण ३०० जारवा आदिवासी राहतात. बंद काचेच्या धावत्या बसमधून त्यातील काही आदिवासी दिसले. स्त्री व पुरुषांच्या फक्त कमरेला झाडाच्या सालींचे उभे उभे पट्टे रंगवून कमरेच्या दोरात अडकवलेले होते. पुरुषांच्या हातात तिरकमठा होता व स्त्रियांच्या कडेवर छोटी मुलं होती. लोखंड खूप तापवलं तर त्याचा जसा तांबूस काळा रंग दिसतो तसा त्यांचा तकतकीत रंग होता. काही छोटी मुलं बसमागे धावत होती. सरकारतर्फे त्यांना कपडे, धान्य देण्याचा प्रयत्न होतो. मानव वंशशास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास करीत असतात पण सारे त्यांचे रीतीरिवाज सांभाळून, त्यांचा विश्वास संपादन करून करावं लागतं.

जंगल ओलांडल्यावर थोड्यावेळाने आम्ही बसमध्ये बसूनच बार्जवर चढलो. पलिकडे उतरल्यावर स्पीड बोटीने, लाईफ जॅकेट घालून, ‘बाराटांगा’ वन विभागात पोहोचलो. दुतर्फा  मॅनग्रोव्हजचे घनदाट जंगल आहे. नीलांबर गुंफा बघायला जाताना स्पीड बोटीच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या मॅनग्रोव्हज् व इतर झाडांची सुंदर दाट हिरवी कमान तयार झाली होती. हे गर्द हिरवे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे.  हजारो वर्षी पाणी या गुंफेमध्ये ठिबकल्याने त्यांचे नैसर्गिक आकार तयार झाले आहेत.

. एलिफंट बीच २. एलिफंट बीचला जाताना वाटेत दिसलेले एक बेट ३. समुद्री कोरल्स

हॅवलॉक आयलँडला जायला लवकर उठून सहाची बोट पकडली. तिथल्या हॉटेलवर आज मुक्काम होता. जेवून दुपारी राधानगर समुद्रकिनाऱ्यावर गेलो. तीव्र उन्हामुळे समुद्राचे पाणी व वाळू चकाकत होती.  दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलजवळच्या बीचवर फिरायला गेलो . अंदमानच्या जवळजवळ सर्व बेटांवर सदाहरित जंगलं व किनाऱ्याजवळ खारफुटीची दाट वनं आहेत. किनारे प्रवाळाने समृद्ध आहेत.  विविध पक्षी आहेत. तिथल्या समुद्रकिनाऱ्यावरील शंख- शिंपले, कोरल्स बाहेर नेण्यास बंदी आहे. इथला निसर्ग लहरी आहे आणि बंगालचा उपसागर सदैव अस्वस्थ असतो.

हॅवलॉकवरून छोट्या होडीतून ( डिंगीतून ) एलिफंट बीचसाठी केलेला प्रवास थरारक होता. वाटेतल्या एका डोंगराचं टोक गरुड पक्षाच्या नाकासारखं पुढे आलं आहे. त्यावर दीपगृह आहे.  एलिफंट बीचवर नितळ समुद्रस्नानाचा आनंद घेतला. पूर्वी इथे लाकडाचे भले मोठे ओंडके  वाहण्यासाठी हत्तींचा उपयोग करीत म्हणून या किनाऱ्याला ‘एलिफंट बीच’ असं  नाव पडलं. आता तिथे हत्ती नाहीत. तिथून हॅवलॉक आयलँडला परत आलो.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हॅवलॉक बंदरात छान गोरीगोमटी कॅटामरान उभी होती. हलत्या बोटीच्या बंद काचेतून तसंच वरच्या डेकवरून सूर्यास्त टिपण्यासाठी सगळ्यांनी कॅमेरे सरसावले होते. एकाएकी सारं बदललं. आकाश गडद झालं. सूर्य गुडूप झाला. जांभळे ढग नंतर दाट काळे झाले.  कॅटामरान जोरजोरात उसळू लागली. टेबल टेनिसचा चेंडू उडवावा तसा समुद्र बोटीला उडवत होता. सारे जण जीव मुठीत धरून बसले. बऱ्याच परदेशी प्रवाशांना, लहान मुलांना उलट्यांनी हैराण केलं. ‘समुद्री तुफान आया है’ असं म्हणत बोटीचा स्टाफ धावपळ करीत साऱ्यांना धीर देत होता, ओकाऱ्यांसाठी पिशव्या पुरवीत होता. दीड तास प्रवासापैकी हा एक तास भयानक होता. निसर्गापुढे माणूस किती क्षुद्र आहे हे दाखविणारा होता.

पोर्ट ब्लेअरला तुफान पावसाने स्वागत केलं. आभाळ फाडून वीज कडाडली. जीव घाबरला, पण आता पाय जमिनीवर टेकले होते. किनाऱ्यावर सुखरूप उतरलो म्हणून त्या अज्ञात शक्तीचे आभार मानले. आकाशातून बरसणाऱ्या धारा आता आशीर्वादासारख्या वाटत होत्या.

 भाग ३ व अंदमान समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 37 – भाग 2 – काळं पाणी आणि हिरवं पाणी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 37 – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ काळं पाणी आणि हिरवं पाणी  ✈️

अंदमान आता प्रवासी स्थान झालं आहे. जैवविविधतेने नटलेला निसर्ग, अनेक दुर्मिळ झाडं, प्राणी, पक्षी, जलचर असा दुर्मिळ खजिना इथे आहे. वर्ल्ड हेरिटेज म्हणून आणि इको टुरिझम म्हणून अंदमानला मान्यता मिळाली आहे. इथे सेंटेनल, जारवा,  ओंगे, ग्रेट निकोबारी अशा आदिम जमाती आहेत. त्यांना एकांतवास व त्यांची जीवनपद्धतीच प्रिय आहे. आपण प्रवाशांनी त्यांच्या जीवनात हस्तक्षेप न करता, तिथल्या श्रीमंत निसर्गाला धक्का न लावता, तिथल्या टुरिझम बोर्डाच्या नियमांप्रमाणेच वागणं आवश्यक आहे. इथले आदिवासी हे मानववंशशास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांना इथलं प्राणी व पक्षी जीवन, सागरी जीवन, विविध वृक्ष, त्यांचे औषधी उपयोग यांचं पारंपरिक ज्ञान आहे. या दुर्मिळ खजिन्याच्या रक्षणासाठी त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या कलाने उपयोग करून घेणं महत्त्वाचं आहे.

पोर्ट ब्लेअरच्या दक्षिणेला वांडूर बीच जवळ लहान मोठी पंधरा बेटे मिळून ‘महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क उभारण्यात आलं आहे. इथली सागरी संपत्ती पाहिली की निसर्गाच्या अद्भुत किमयेला दाद द्यावीशी वाटते. कोरल्सचे असंख्य प्रकार इथे बघायला मिळतात. आपल्या मेंदूसारखे लाटालाटांचे कोरल, बशीसारखे, झाडासारखे असे विविध आकारांचे कोरल्स आहेत. विंचवासारखा, वाघासारखा, सार्जंट, गिटार, वटवाघुळ, फुलपाखरू यांच्या आकारातील मासे आहेत. पोपटाच्या चोचीसारखे तोंड पुढे आलेले हिरवट पॅरट मासे आहेत. हे सारे जलचर एकमेकांशी सहकार्याने राहतात. सी-ॲनम हा जलचर खडकाला चिकटून राहतो तर जोकराच्या आकाराचा मासा त्याला खायला आणून देतो व सी-ॲनम जोकर माशाला खडकाचं घर देतो.काळ्या चंद्रकलेवर मोती जडवावे तसे काळ्या छोट्या माशांवर स्वच्छ पांढरे ठिपके होते. एका प्रचंड व्हेल माशाचा सांगाडा ठेवला आहे.

सेल्युलर जेलजवळ आता अंदमान वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारलं आहे. त्यात मोटार बोटी,पॅडल बोटी, वॉटर स्कूटर्स,स्किईंग  वगैरे प्रकार आहेत. पोर्ट ब्लेअर जवळील चातम आयलंडला एका पुलावरून गेलो. इथे आशियातील सर्वात जुनी व सर्वात मोठी सॉ मील आहे. रेडवूड, सागवान, सॅटिन वूड, ब्लॅक चुगलम, थिंगम, कोको, महुआ, जंगली बदाम, डिडु अशा नाना प्रकारच्या वृक्षांचे भले मोठे घेर असलेले ओंडके ठेवले होते. दुसऱ्या महायुद्धात या मिलच्या  काही भागाचं नुकसान झालं. हे मोठमोठे लाकडी ओंडके कापणाऱ्या, धारदार, विजेवर चालणाऱ्या करवती होत्या. यातील काही लाकूड इमारत कामासाठी तर काही फर्निचर व कोरीव कामासाठी,बोटी बनविण्यासाठी वापरण्यात येतं. पूर्वी रेल्वे रूळांचे स्लीपर्स बनविले जात.  तिथल्या म्युझियममध्ये रेडवूडपासून बनविलेले कोरीव गणपती, देव्हारे, पुतळे, घड्याळे अशा सुंदर वस्तू आहेत. तिथून मानव विज्ञान संग्रहालय पाहायला गेलो. अंदमान- निकोबारच्या आदिवासींच्या वापरण्यातल्या वस्तू म्हणजे बांबूच्या चटया, पंखा, झाडू, टोपली मशाल, बाण, तिरकमठा, हुक्का, मधपात्र, बरछी, मासे पकडायची जाळी, सामुदायिक झोपडी, लाकडाची डोंगी म्हणजे होडी, झाडाच्या सालींच्या पट्ट्या रंगवून त्या डोक्याला व कमरेला गुंडाळायचे वस्त्र, शंख- शिपल्यांच्या माळा, कवड्यांच्या माळा, सुंभाचे बाजूबंद, समुद्र कोरलचे पैंजण, लाल मातीने चेहऱ्यावर केलेले पेंटिंग,नृत्याचे रिंगण अशा वस्तू, पुतळे पाहिले की आदिम काळापासून स्त्रियांची नटण्याची हौस आणि उपलब्ध सामग्रीतून जीवनोपयोगी वस्तू बनविण्याची मानवाची बुद्धी लक्षात येते.

रॉस आयलँड ही ब्रिटिशांची जुनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह राजधानी होती. तिथे ब्रिटिशांनी घरे, स्विमिंग पूल, चर्च, जिमखाना, क्लब, ओपन एअर थिएटर सारं काही उभारलेलं होतं. नारळाची व इतर अनेक प्रकारची झाडं आहेत. हरणं व बदकं फिरत असतात. विहिरी व जपानी सैन्याने खोदलेले बंकरही बघायला मिळाले. आता हे बेट आपल्या नौदलाच्या ताब्यात आहे. वायपर आयलंड इथे कैद्यांना फाशी देण्याची ब्रिटिशकालीन जागा आहे. तसंच स्त्री कैद्यांसाठी तिथे तुरुंग बांधण्यात आला होता. आमच्या गाईडने अगदी तन्मयतेने त्या काळातील राजकीय कैद्यांचा त्याग, त्यांनी भोगलेल्या शिक्षा आमच्यापुढे शब्दातून उभ्या केल्या. त्या अज्ञात शूरवीरांना आम्ही ‘वंदे मातरम्, भारत माता की जय’ असं म्हणत आदरांजली वाहिली.

नॉर्थ बे आयलंड इथे स्नॉर्केलिंगची  मजा अनुभवता आली. आपल्याला डोळ्यांना विशिष्ट प्रकारचा चष्मा लावायला देतात. त्यामुळे नाकपुड्या बंद होतात. आपण दातांमध्ये धरलेल्या नळीचं तोंड समुद्राच्या वरच्या पातळीवर राहतं. आपल्याला तोंडाने श्वास घ्यायला लागतो. तेथील प्रशिक्षकाच्या सहाय्याने पाण्यावर तरंगत हा निसर्गाचा खजिना बघायला मिळाला. या भागात किनाऱ्याजवळच खूप प्रवाळ बेटे आहेत. पाणी संथ व स्वच्छ असल्यामुळे नाना तऱ्हेचे व रंगाचे छोटे-मोठे मासे सुळकन इकडे तिकडे फिरताना दिसत होते. बटरफ्लाय, टायगर, गोल्डन टेट्रा असे मासे झुंडीने फिरत होते. स्पंजसारखे जिवंत कोरल्स होते. त्यांना स्पर्श केल्यावर ते तोंड उघडत. त्यांचा फिका जांभळा रंग व तोंडात छोटे छोटे गोंड्यासारखे जांभळ्या रंगाचे पुंजके दिसले.

अंदमान – भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 36 – भाग 1 – काळं पाणी आणि हिरवं पाणी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 36 – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ काळं पाणी आणि हिरवं पाणी  ✈️

अंदमान, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि काळं पाणी या शब्दांचं नातं अतूट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पदस्पर्शाने हे स्थान पवित्र झालं आहे. लोकमान्यांना ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात नेताना एका दिवसासाठी येथील कारागृहात ठेवण्यात आलं होतं. इसवी सन १९४२ साली सुभाषचंद्र बोस यांनीही या तुरुंगाला भेट दिली होती.

अंदमान व निकोबार हा दक्षिणोत्तर पसरलेला जवळजवळ ३५० बेटांचा समूह भारताच्या आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागरात आहे. चेन्नई आणि कोलकता  अशा दोन्हीकडून साधारण १२०० किलोमीटर अंतरावर ही बेटं येतात. पूर्वी तिथे बोटीने पोहोचण्यासाठी चार-पाच दिवस लागत. आता चेन्नई किंवा कोलकताहून विमानाने दोन- तीन तासात पोहोचता येतं. आम्ही चेन्नईहून विमानाने अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर विमानतळावर उतरलो. जेवून लगेच सेल्युलर जेल बघायला निघालो.

ब्रिटिशांनी १९०६ साली या जेलचं बांधकाम पूर्ण केलं. चक्राच्या दांड्यांसारख्या सात दगडी, भक्कम तिमजली इमारती व त्या इमारतींना जोडणारे मधोमध असलेले वॉच टाॅवर अशी या तुरुंगाची रचना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर काही काळ अंदमान जपानी लोकांच्या ताब्यात होते. इमारतींच्या सात रांगांपैकी तीन रांगा जपान्यांनी नष्ट करून टाकल्या. आता एका इमारतीत हॉस्पिटल आहे व एकात सरकारी कर्मचारी राहतात.हा सेल्युलर जेल म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक ज्ञात व अज्ञात शूरवीरांनी भोगलेल्या हालअपेष्टांचं काळं पान. साम्राज्यवादी ब्रिटिशांना हाकलून देऊन स्वातंत्र्य मिळविण्याच्या वेडाने भारलेल्या अनेकांनी या यज्ञकुंडात उडी घेतली. अशा अनेकांना  अंदमानला सश्रम कारावासाच्या शिक्षेवर पाठविले जाई. ब्रिटिशांच्या क्रूर, कठोर, काळ्याकुट्ट शिक्षांमधून केवळ काळच त्यांची सुटका करू शकणार असे. अंदमानचा तुरुंग म्हणजे काळं पाणी. एकदा आत गेला तो संपल्यातच जमा!

दगडी, दणकट, अंधारलेले जिने चढून तिसऱ्या मजल्यावर आलो. तिथल्या शेवटच्या ४२ नंबरच्या खोलीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य होते. आज त्याला पवित्र तीर्थस्थानाचं महत्त्व आहे. सावरकरांनी लिहिलेले ‘कमला’ काव्यही तेथील दगडी भिंतीवर आहे. स्वातंत्र्यवीरांचा फोटो व अशोकचक्राची प्रतिमा आहे. एकावेळी एकच माणूस जेमतेम वावरू, झोपू शकेल अशी ती अंधार कोठडी. भिंतीवर अगदी वरच्या बाजूला एक लहानशी खिडकी. जेलची रचनाच अशी की समोरासमोरच्या खोल्या एकमेकांना पाठमोऱ्या. खोल्यांच्या दगडी भिंती भक्कम आणि बाहेर लोखंडाचे मजबूत दार. बाहेरून कुलूप लावायची कडी सरळ भिंतीत घुसवलेली. स्वातंत्र्यासाठी हे लोक काय साहस करतील याचा नेम नाही म्हणून एवढा बंदोबस्त केलेला असावा. आम्ही तिथे ‘ने मजसी ने….’ जयोस्तुते श्री महन् मंगले….’ अशी गाणी म्हणून श्रद्धांजली वाहिली. अनेक ज्ञात- अज्ञात वीरांना मनोमन, मनःपूर्वक नमस्कार केला.

ध्वनीप्रकाश शोमध्ये  पूर्व इतिहासावर प्रकाश पाडला आहे. अपार कष्ट भोगणारे, कदान्न खाणारे, कोलू पिसणारे,  उघड्या पाठीवर फटके खाणारे, वंदे मातरम् म्हणत हसतमुखाने फासावर जाणारे ते कोवळे जीव हृदयात कालवाकालव निर्माण करतात.

स्वातंत्र्यवीर सावरकर अतिशय विज्ञाननिष्ठ होते. आधुनिक विचार व विज्ञान आपलंसं केलं तरच राष्ट्राची प्रगती होईल. राष्ट्र कणखर सुसज्ज व बलवान हवं अशीच या साऱ्या थोर नेत्यांची  शिकवण होती. गोरगरीब, कष्टकरी, दलित या साऱ्यांबरोबर माणुसकीने वागण्याची, शिक्षणाचे महत्त्व सांगणारी अशी त्यांची शिकवण होती. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही हे विचार आपण पूर्णतः आत्मसात करू शकलो नाही याची खंत वाटली.

देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आज अंदमान- निकोबार बेटांना अतिशय महत्त्व आहे. निकोबार ही संरक्षित बेटं आहेत. आपल्या हवाई दलाचा तळ इथे आहे. सर्वसामान्य प्रवाशांना तिथे जाण्याची परवानगी नाही. या निकोबार बेटाचं दक्षिण टोक जे कन्याकुमारीपेक्षाही दक्षिणेला होतं त्याला इंदिरा पॉईंट असं नाव दिलं होतं. २००४ सालच्या त्सुनामीमध्ये हे स्थान सागराने गिळंकृत केलं. अंदमानला आपल्या नौदलाचा तळ आहे. तसंच तटरक्षक दलही आहे. त्यांची अति वेगवान व अत्याधुनिक जहाजं सतत समुद्रावर गस्त घालित असतात. किनाऱ्याजवळ फ्लोटिंग डॉक आहे. त्याचे १६ अवाढव्य टँकर्स पाण्याने भरले की ते डॉक समुद्राखाली जातं. मग डॉकच्या  वरच्या प्लॅटफॉर्मवर दुरुस्तीसाठी बोटी घेतल्या जातात. बोटीची दुरुस्ती, देखभाल होऊन ती बाहेर पडली की टँकर्समधलं पाणी काढून टाकलं जातं व डॉक पुन्हा समुद्रावर येतं

अंदमान – भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 35 – भाग 4 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 35 – भाग 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे  ✈️

टंगमर्गवरून आम्ही गुलमर्ग इथे गेलो. पायथ्याशीच थंडीचे कोट व बूट भाड्याने घेतले. गोंडेला राइड ( केबल कार राइड ) जिथून सुरू होते त्याच्या दीड किलोमीटर आधी आपल्या गाड्या थांबतात. तिथून बर्फावरील स्लेजने, स्थानिक सहाय्यकांच्या मदतीने गोंडेला स्टेशनवर पोहोचता येते किंवा बर्फ बाजूला केलेल्या चांगल्या रस्त्यावरून थोडासा चढ चढून चालत जाता येते. आम्ही रमतगमत चालण्याचे ठरवले. प्रवाशांचे जत्थे कुणी चालत तर कुणी स्लेजवरून गोंडेला स्टेशनला जात होते .प्रवाशांना ओढत नेणाऱ्या स्लेज गाड्यांची उजवीकडील बर्फातील रांग आणि डावीकडील अर्धी बर्फात बुडलेली घरे पाहत गोंडेला स्टेशनवर पोहोचलो. खूप मोठी रांग होती. चार- चार प्रवाशांना घेऊन गोंडेला (केबल कार्स ) जात होत्या. त्यात धावत्या गाडीत बसल्याप्रमाणे पटकन बसल्यावर दरवाजे बंद झाले. खालीवर, सभोवती पांढरे शुभ्र बर्फच बर्फ. काही धाडसी ट्रेकर्स ती वाट चढून जाताना दिसत होते. त्यांच्या गुडघ्यापर्यंत आत गेलेल्या बुटांच्या खुणा गोंडेलातून स्पष्ट दिसत होत्या. बर्फात बुडालेली मेंढपाळ गुराखी या गुजर जमातीची घरे रिकामी होती. हे लोक बर्फ वितळेपर्यंत गुरे, शेळ्यामेंढ्यांसह खाली सपाटीवर येऊन राहतात व नंतर परत आपल्या घरी येतात. पश्मिना या एका विशिष्ट जातीच्या मेंढ्यांच्या लोकरीच्या पश्मिना शाली हलक्या, उबदार असतात. महाग असल्या तरी त्यांची नजाकत और असते.

गोंडेलाने पहिल्या टप्प्यापर्यंत म्हणजे कॉंगडोरीपर्यंत गेलो. त्यापुढचा अफरबटचा टप्पा इथून धुक्यात हरवल्यासारखा दिसत होता. पण हौशी, धाडसी प्रवासी तिथेही जात होते. पहिल्या टप्प्यावर उतरून तिथे बांधलेल्या लाकडी कठड्यांवर निस्तब्ध बसून राहिले. नगाधिराज हिमालयाचं दर्शन म्हणजे विराटाचा साक्षात्कार! ते भव्य- दिव्य, विशाल, थक्क करणारं अद्भुत दर्शन आज युगानुयुगे तिथे उभे आहे.  अभेद्य कवचकुंडलासारखे आपले संरक्षण करीत चिरंजीवित्वाने ताठ उभे आहे. अशावेळी वाटतं की, आपण असणं आणि नसणं ही फार फार क्षुल्लक गोष्ट आहे. हे सनातन, चिरंतन वैभव आहे म्हणून आपल्या अस्तित्वाला किंचित अर्थ आहे.

थोड्याच दिवसात तिथे स्कीईंग कॉम्पिटिशन सुरू होणार होत्या. त्यात भाग घेणारी तरुणाई तिथे उत्साहाने प्रॅक्टिस करीत होती. हौशी प्रवासी स्कीईंगची मजा घेण्यासाठी तिथल्या लोकांच्या सहाय्याने धडपडत होते. आम्ही स्लेजची राइड घेतली. छोट्याशा लाकडी चाकवाल्या फळकुटावरून, मागेपुढे मदतनीस घेऊन बर्फाच्या गालीच्यावरून थोडे चढून गेलो आणि त्यांच्याच मदतीने घसरत परतलो.  आल्यावर गरम- गरम छान कॉफी प्यायल्यावर थोडे उबदार वाटले. गरम चहा, कॉफी, भेळ, सँडविच सारा नाश्ता अगदी तयार होता.स्वित्झर्लंडला जुंगफ्रा येथे लिफ्टने वर जाऊन बर्फात जायच्या आधी गरम- गरम टोमॅटो सूप घेतले होते तेव्हा त्या व्यवस्थेचे कौतुक वाटले होते. तेही आता उरले नाही. ‘हम भी कुछ कम नही’ हे सप्रमाण सिद्ध  झाले.

जम्मू ते श्रीनगर या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाची जोरदार उभारणी सुरू आहे. अतिशय अवघड आणि आव्हानात्मक असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाचे बरेचसे काम झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर काश्मीर खोऱ्याच्या गरजा द्रुतगतीने पूर्ण होतील आणि पर्यटनातही चांगली वाढ होईल.

असे सतत जाणवत होते की सर्वसामान्य काश्मिरी माणसाला असे तणावपूर्ण आयुष्य नको आहे. गरिबी आणि अज्ञान यामुळे त्यांच्यापुढील  मार्ग बदलले आहेत. अजूनही तरुणांची दिशाभूल करून त्यांना  दहशतवादाच्या मार्गाला लावले जाते. राजकीय परिस्थितीमुळे या देवभूमीतून ज्यांना विस्थापित व्हावे लागले त्यांचे दुःख फार मोठे आहे. या भूप्रदेशाची कथा आणि व्यथा खूप वेगळी आहे. त्यामुळे  सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय अशा अनेक समस्या इथे ठाण मांडून उभ्या आहेत. आपले ‘सख्खे शेजारी’ हर प्रयत्नांनी ही परिस्थिती अशीच ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना मदत करणारे ‘विषारी ड्रॅगन’ त्यात भर घालतात.  दहशतवादाची काळी सावली आज साऱ्या जगावर पसरली आहे.

वैष्णोदेवी, कारगिल, लेह- लडाख, अमरनाथ, काश्मीरचे खोरे अशा अनंत हातांनी हिमालय आपल्याला साद घालीत असतो. आपल्या आवडीप्रमाणे, सवडीप्रमाणे या हाकेला आपण प्रतिसाद दिलाच पाहिजे. शांततापूर्ण सौंदर्याची, समृद्धीची बहुरंगी ट्युलिप्स इथे बहरतील अशी आशा करुया.

भाग ४ आणि श्रीनगर समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 34 – भाग 3 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 34 – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी पहलगाम इथे खूप मोठी छावणी उभारलेली आहे. यात्रेकरूंची वाहने इथपर्यंत येतात व मुक्काम करून छोट्या गाड्यांनी चंदनवाडीपर्यंत जातात. तिथून पुढे अतिशय खडतर, एकेरी वाटेने श्रावण पौर्णिमेच्या यात्रेसाठी लक्षावधी भाविक सश्रद्ध अंतकरणाने पदयात्रा करतात. हिमालयाच्या गूढरम्य पर्वतरांगांमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय या आदिशक्तींची अनेक श्रध्दास्थाने आपल्या प्रज्ञावंत पूर्वजांनी फार दूरदृष्टीने उभारलेली आहेत.(चार धाम यात्रा, अमरनाथ, हेमकुंड वगैरे ). हे अनाघ्रात सौंदर्य, ही निसर्गाची अद्भुत शक्ती सर्वसामान्य जनांनी पहावी आणि यातच लपलेले देवत्व अनुभवावे असा त्यांचा उद्देश असेल का? श्रद्धायुक्त पण निर्भय अंतःकरणाने, मिलिटरीच्या मदतीने, अनेक उदार दात्यांच्या भोजन- निवासाचा लाभ घेऊन वर्षानुवर्षे ही वाट भाविक चालत असतात.

सकाळी उठल्यावर पहलगामच्या हॉटेलच्या काचेच्या खिडकीतून बर्फाच्छादित हिमशिखरांचे दर्शन झाले. नुकत्याच उगवलेल्या सूर्यकिरणांनी ती शिखरे सोन्यासारखी चमचमत होती. पहलगाम येथील अरु व्हॅली, बेताब व्हॅली, चंदनवाडी, बैसरन म्हणजे चिरंजीवी सौंदर्याचा निस्तब्ध, शांत, देखणा आविष्कार! बर्फाच्छादित पर्वतरांगांमधील सुरू, पाईन, देवदार, फर, चिनार असे सूचीपर्ण, प्रचंड घेरांचे वृक्ष गारठवणाऱ्या थंडीत, बर्फात आपला हिरवा पर्णपिसारा सांभाळून तपस्वी ऋषींप्रमाणे शेकडो वर्षे ताठ उभी आहेत. दाट जंगले,  कोसळणारे, थंडगार पांढरे शुभ्र धबधबे आणि उतारावर येऊन थबकलेले बर्फाचे प्रवाह. या देवभूमीतले  सौंदर्य हे केवळ मनाने अनुभवण्याचे आनंदनिधान आहे.

पहलगामला एका छोट्या बागेत ममलेश्वराचे (शंकराचे) छोटे देवालय आहे. परिसर बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला होता. शंकराची पिंडी नवीन केली असावी. त्यापुढील नंदी हा दोन तोंडे असलेला होता. आम्ही साधारण १९८० च्या सुमारास काश्मीरला प्रथम आलो होतो. त्या वेळेचे काश्मीर आणि आजचे काश्मीर यात जमीन- अस्मानाचा फरक जाणवला. सर्वत्र शांतता होती पण ही शांतता निवांत नव्हती. खूप काही हरवल्याचं, गमावल्याचं  दुःख अबोलपणे व्यक्त करणारी, अविश्वास दर्शविणारी ,  संगिनींच्या धाकातली, अबोलपणे काही सांगू बघणारी ही कोंदटलेली उदास  शांतता होती.

श्रीनगर भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग 2 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

वेरीनाग इथल्या निर्झरातून झेलमचा उगम होतो. ‘श्री’ च्या आकारात वाहणाऱ्या झेलमच्या दोन्ही तीरांवर श्रीनगर वसले आहे. श्रीनगरमध्ये फिरताना सफरचंद आणि अक्रोड यांचे पर्णहीन वृक्ष दिसत होते.  बदाम, जरदाळू यांची एकही पान नसलेली सुंदर मऊ पांढऱ्या मोतीया आणि गुलाबी रंगाच्या फुलांनी डवरलेली झाडे दिसत होती. लांबवर पसरलेली मोहरीची शेतं हळदी रंगाच्या फुलांनी डोलत होती तर अजून फुलं न आलेली शेतं काळपट हिरव्या रंगाची होती. थंडी खूपच होती.पायघोळ झग्याआड पोटाशी शेगडी घेऊन जाणारे स्त्री- पुरुष दिसत होते. सर्वत्र तणावपूर्ण शांतता जाणवत होती. रस्तोरस्ती लष्कराची वाहने आणि बंदूकधारी जवान मनातल्या अस्वस्थतेत भर घालीत होती. दुकानांमध्ये कलिंगडे, संत्री, केळी, कमलकाकडी, इतर भाज्या दिसत होत्या. कहावा किंवा कावा या काश्मिरी स्पेशल चहाची दुकाने जागोजागी होती. अस्सल काश्मिरी केशराच्या चार काड्या आणि दालचिनीच्या तुकडा असं उकळत ठेवायचं. त्यात साखर घालायची. एका कपाला एक सोललेला बदाम जाडसर कुटून घालायचा आणि त्यावर केशर दालचिनीचे उकळते मिश्रण ओतायचं. झाला कहावा तयार!

गाईडने दिलेल्या या माहितीमुळे ‘कावा’ पिण्याची इच्छा झाली पण बस मध्येच थांबविणे अशक्य होते.

जहांगीरच्या काळात साधारण चारशे वर्षांपूर्वी निशात बाग, शालीमार बाग, व चष्मेशाही अशा सुंदर बागा बांधण्यात आल्या. तळहाताएवढ्या सुगंधी गुलाबाच्या फुलांचा हंगाम अजून सुरू झाला नव्हता, पण वृक्षांसारखे झाड बुंधे असलेली गुलाबाची झाड लालसर पानांनी बहरून फुलण्याचा तयारीत होती. उंचावरून झऱ्यासारखे वाहणारे पाणी पायऱ्या- पायऱ्यांवरून घरंगळत होते. मध्येच कमळाच्या आकारातली दगडी कारंजी होती. सगळीकडे दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर चालू होती.

चष्मेशाहीमध्ये मागच्या पीर- पांजाल पर्वतश्रेणीतून आलेले झऱ्याचे शुद्ध पाणी आरोग्यदायी असल्याचे सांगण्यात आले. डेरेदार काळपट- हिरव्या वृक्षांना चोचीच्या आकाराची पांढरी फुले लटकली होती. ती नासपतीची झाडे होती.  हिरवा पर्णसंभार असलेली मॅग्नेलियाची (एक प्रकारचा मोठा सुगंधी चाफा ) झाडे फुलण्याच्या तयारीत होती. निशात बागेजवळ ‘हजरत बाल श्राइन’ आहे. हजरत मोहमद साहेबांचा ‘पवित्र बाल’ इथे ठेवण्यात आला आहे. मशीद भव्य आणि इस्लामिक स्थापत्यकलेचा नमुना आहे.मशिदीच्या आत स्त्रियांना प्रवेश नव्हता. मागील बाजूने थोडा पडदा किलकिला करून स्टेनगनधारी पहारेकर्‍याने ‘पवित्र बाल’ ठेवलेल्या ठिकाणाचे ‘दूरदर्शन’ घडविले. स्वच्छ आवारात चिनारची झाडं होती. दल सरोवराच्या पश्चिमेकडील काठावर असलेल्या या मशिदीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.

श्रीनगरपासून तीन किलोमीटरवर पांडेथ्रान गाव आहे आणि साधारण १४ किलोमीटरवर परिहासपूर नावाचं गाव आहे. या दोन्ही ठिकाणी राजा ललितादित्याच्या कारकिर्दीत म्हणजे आठव्या शतकात उभारलेल्या बौद्ध स्तूपांचे अवशेष आहेत. अनंतनागपासून चार-पाच किलोमीटरवर मार्तंड देवालयांचा समूह आहे.  डावीकडचे कोणे एकेकाळी भव्य दिव्य असलेल्या सूर्यमंदिराचे भग्नावशेष  संगिनींच्या पहाऱ्यात सांभाळले आहेत.

पहेलगामच्या रस्त्यावर खळाळत अवखळ वाहणारी लिडार नदी आपली सतत सोबत करते. नदीपात्रातील खडक, गोल गुळगुळी दगड यावरून तिचा प्रवाह दौडत असतो. गाईड सांगत होता की मे महिन्यात पर्वत शिखरांवरील बर्फ वितळले की नदी तुडुंब पाण्याने उसळत वेगाने जाते. त्यावेळी तिच्यावरील राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी अनेक देशी-विदेशी प्रवासी येतात. तसेच नदीपलीकडील पर्वतराजीत ट्रेकिंगसाठी अनेक प्रवासी येतात. त्याशिवाय घोडदौड, ट्राउट माशांची मासेमारी अशी आकर्षणे आहेत. हिमालयाच्या पार्श्वभूमीवर पोपटी हिरवळीवर वर्ल्डक्लास गोल्फ कोर्टस आहेत. त्यासाठीही हौशी खेळाडू येतात.

पहलगाम रस्त्यावर प्राचीन काळापासून केशराच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेलं पांपूर( पूर्वीचं नाव पद्मपूर ) लागतं. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जमिनीलगत उगवलेल्या जांभळ्या सहा पाकळ्यांच्या फुलांनी शेतेच्या शेते बहरतात. या फुलांमधील सहा केसरांपैकी केसरिया रंगाचे तीन केसर हे अस्सल केशर असतं. उरलेले तीन हळदी रंगाचे केसर वेगळ्या पद्धतीने वापरले जातात.

श्रीनगर भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी – 23 – राइट हैंड ड्राइव/लेफ्ट हैंड ड्राइव ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं. श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं. तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है. आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है. आज प्रस्तुत है आपकी विदेश यात्रा के संस्मरणों पर आधारित एक विचारणीय आलेख – ”न्यू जर्सी से डायरी…”.)

? यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी – 23 – राइट हैंड ड्राइव/लेफ्ट हैंड ड्राइव ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ?

लक्ष्य की ओर बढ़े चलना जीवंतता है । अमेरिका सहित अधिकांश पश्चिमी देशों में गाडियां सड़क के दायीं ओर चलती हैं और कार की स्टेयरिंग बायीं ओर होती है जबकि भारत में अंग्रेजी शासन के चलते इंग्लैंड के ही नियम लागू रहे, अर्थात भारत में गाड़ियों की स्टेयरिंग दायीं ओर होती है (Right hand driving in India) और गाड़ियाँ सड़क की बायीं ओर चलायीं जातीं हैं.

यूनाइटेड नेशंस आर्गनाइजेशन यूक्रेन युद्ध या कश्मीर समस्या जैसी बड़ी समस्याएं तो सुलझा नहीं पाता कम से कम सारी दुनियां में एक सी ड्राइविंग, एक से बिजली साकेट, एक सरीखी वोल्टेज पर बिजली प्रदाय, एक से मोबाइल चार्जर, वगैरह पर ही कोई सर्वमान्य योजना ले आए तो भी इस वैश्विक दुनियां में आम लोगों को कुछ राहत मिले और यूएनओ अपनी उपयोगिता सिद्ध कर सके। इंटरपोल के जमाने में यदि ग्लोबल ई-वीजा बनने लगें तो युवा पीढ़ी को विज्ञान, व्यापार के सिलसिले में दुनियां एक कर रही है उसे लाभ हो सकता है.

अस्तु, आज नहीं तो किसी दिन यह होगा, इस आशा में प्रसन्न रहना चाहिए.

1792 में सर्वप्रथम अमेरिका के पेन्सिल्वेनिया प्रान्त में सड़क पर दायीं ओर चलने के नियम को लागू किया गया और 18वीं शताब्दी के अंत तक यह नियम पूरे संयुक्त राज्य अमेरिका और कनाडा में अनुसरण किया जाने लगा.

आज दुनियां भर अधिकांश क्षेत्रों में यही दाहिने ओर से चलने का नियम है, इससे भारत, इंग्लैंड या अन्य बाईं ओर से चलने वाले देशों के लोगों को यहां ड्राइविंग में कठिनाई होती है. यद्यपि भारत सहित अन्य देशों के ड्राइविंग लाइसेंस के आधार पर यहां कार चलाने की वैधानिक अनुमति है. रेंटल कार सहजता से मिल जाती हैं. एक शहर से कार लेकर दूसरे शहर में ड्राप किए जाने की सुविधाएं भी आसान हैं. ज्यादातर गाडियां आटोमेटिक गेयर वाली हैं, मतलब बिना क्लच पैडल के केवल दाहिने पैर से ही एक्सेलटर   और ब्रेक के नियंत्रण से कार मजे में दौड़ती हैं. टोल पर कोई बैरियर नहीं है, यदि बिना ई पास के गाड़ी टोल पार करती हैं तो कैमरा नंबर प्लेट की फोटो लेकर ई बिल बना देता है. सड़के चिकनी चौड़ी हैं. लेन पर सभी नियम पूर्वक पर्याप्त दूरी बनाकर चलते हैं. रेलवे क्रासिंग पर भी बैरियर नहीं मिला, केवल लाइट सिग्नल ही हैं. भले ही कोई ट्रैफिक न हो पर कोई भी लाइट सिग्नल की अनदेखी नहीं करता. यहां ड्राईविंग आनंद देती है.

विवेक रंजन श्रीवास्तव, न्यूजर्सी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग 1 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

समोर नगाधिराज हिमालयाची झबरबन पर्वतराजी, मागे तीन बाजूच्या निळसर हिरवट पर्वतरांगांच्या कोंदणात  नीलपाचूसारखा चमकणारा दल सरोवराचा विस्तीर्ण जलाशय आणि यामध्ये पसरलेलं ट्युलिप्सच्या अनेकानेक रंगांचं लांबवर पसरलेलं स्वर्गीय  इंद्रधनुष्य! अवाक होऊन आम्ही ते अलौकिक दृश्य नजरेत साठवत होतो. रक्तवर्णी, हळदी, शुभ्र मोत्यासारखी, गुलाबी, जांभळी, सोनपिवळ्या रंगावर केशरकाडी लावल्यासारखी कमळकळ्यांसारखी ट्युलिप्सची असंख्य फुलंच फुलं! साक्षात विधात्याने विणलेला अस्सल काश्मिरी गालिचा पुढ्यात पसरला होता. त्यांच्या मंदमधूर मोहक सुगंधाने वातावरण भारून टाकलं होतं

कुणाच्या कल्पनेतून, प्रयत्नातून साकार झालं असेल हे अनुपम सौंदर्य? या प्रकल्पाविषयी जाणून घेण्यासाठी काश्मीर गव्हर्मेंटचे डिस्ट्रिक्ट फ्लोरिकल्चर ऑफिसर डॉक्टर जावेद अहमद शाह यांची मुद्दाम भेट घेतली. इथे ट्युलिप्स फुलविण्याच्या कल्पनेला सरकारचा सक्रिय पाठिंबा मिळाला. दल सरोवरासमोरील हिमालयाच्या झबरबन टेकड्यांच्या उतरणीवर थोडं सपाटीकरण करून मोठ्या गादीसारखे वाफे तयार करण्यात आले. ॲमस्टरडॅमहून ट्युलिप्सचे फक्त कंद आयात करण्यात आले. बाकी सारी मेहनत, तंत्रज्ञान हे इथल्या फ्लोरिकल्चर डिपार्टमेंटचे योगदान आहे.

एकूण ७० एकर जागेवर ही फुलशेती करण्यात येते. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ट्युलिप्सच्या कंदांची लागवड करण्यात येते. साधारण डिसेंबरच्या उत्तरार्धापासून जानेवारी संपेपर्यंत साऱ्या श्रीनगरवर बर्फाची चादर पसरलेली असते. लागवड केलेला हा संपूर्ण भूभाग बर्फाने अच्छादलेला असतो .जमिनीच्या पोटातले कंद लहान शाळकरी मुलांसारखे महिनाभर तो भला मोठा बर्फाचा गोळा चोखत बसलेले असतात. साधारण फेब्रुवारीत बर्फ  वितळतं आणि कंदांच्या बालमुठीला हिरवे लसलशीत कोंब फुटतात. त्यांची मशागत करावी लागते. शेळ्या- मेंढ्या, गाई, खेचरं यांचं शेणखत ठराविक प्रमाणात घालतात. तसंच जंतुनाशकं, रसायनिक खतं यांचाही मोठ्या प्रमाणात वापर करतात. मार्च अखेर रोपांची वाढ पूर्ण होते.निरनिराळ्या प्रजातीप्रमाणे ही रोपं दीड ते अडीच फूट उंच वाढतात आणि मग बहरतात. या रंगपऱ्यांचं आयुष्य किती? तर तीन ते चार आठवडे! साधारण मार्चअखेर ते एप्रिलअखेर एक महिना हा सारा बहर असतो. अवेळी पाऊस पडला तर तीन आठवड्यातच त्यांच्या पाकळ्या गळून पडतात.

बहर संपल्यावर एक महिना ती झाडं तशीच ठेवतात. जून महिन्यात जमिनीतले कंद नेटकेपणे अलगद काढलेले जातात. ते जपून ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली आहे. साधारण १७ ते २३ सेंटीग्रेड उष्णतेत निर्जंतुक करून त्या कंदांना सांभाळण्यात येतं. जरुरीप्रमाणे काही नवीन जातीचे, रंगांचे कंद ॲमस्टरडॅमहून आणण्यात येतात. ऑक्टोबरपर्यंत सारं नीट सांभाळत, जमिनीची मशागत करून पुन्हा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लागवड केली जाते. भारतीय व परदेशी प्रवासी आवर्जून हा अलौकिक नजारा पाहायला गर्दी करतात.

विस्तीर्ण दल सरोवरातून शिकारा सहल करताना शंकराचार्य टेकडीवरील मंदिर, हरी पर्वताची रांग दिसते. सरोवरामध्ये झाडांचं वाळकं गवत, वेली व माती यांचा एकमेकांवर थर बसून इथे अनेक छोटी बेटं तयार झाली आहेत. त्यावर तरंगती घरं, मीना बाजार आहे. पाणथळ जागेतील लहान- मोठ्या झाडांवरून गरुड, खंड्या, बुलबुल यांनी दर्शन दिलं. चार शाळकरी मुली होडीत दप्तरं ठेवून स्वतःच ती  छोटी होडी वल्हवत दल सरोवराकाठी असलेल्या त्यांच्या गावाकडे जात होत्या. चौकशी केल्यावर कळलं की त्यांना रोज एक तास जायला आणि एक तास यायला  वल्हवावं लागतं तेव्हा त्या श्रीनगरच्या शाळेत पोहोचतात.

श्रीनगरहून पहेलगामला जाताना दुतर्फा चिनार आणि सफेदा यांचे प्रचंड घेरांचे वृक्ष दिसत होते.  चिनारच्या वठल्यासारख्या वाटणाऱ्या पोकळ, प्रचंड घेरांच्या बुंध्यातून चिनारची हाताच्या पंजासारखी पान असलेली कोवळी पालवी लवलवत होती. सफेदा वृक्षांच्या फांद्या घरांच्या उतरत्या छपरांसाठी वापरल्या जातात. विलो, देवदार, फर असे अनेक प्रकारचे वृक्ष होते. विलोच्या झाडांपासून क्रिकेटच्या बॅट बनविल्या जातात.

आठव्या शतकातील ललितादित्य या राजाच्या कालखंडात इथे मंदिर वास्तुकला बहरली होती. त्यानंतरच्या अवंतीवर्मन आणि जयसिंह यांनी ही मंदिर वास्तुकला वैभवसंपन्न केली. राजा जयसिंह याच्या काळात राजकवी कल्हण याने आपल्या ‘राजतरंगिणी’ या दीर्घ काव्यग्रंथात काश्मीरमधील शिल्पवैभवाने नटलेल्या अनेक देवालय समूहांचं सुंदर वर्णन केलेले आहे. ब्रिटिश संशोधक सर ऑरेट स्टेन यांनीही आपल्या संशोधनामध्ये या मंदिरशिल्पांवर प्रकाश टाकला आहे. श्रीनगर- सोनमर्ग रस्त्यावर कनकिनी नदीच्या तीरावरील नारंग येथे भव्य देवालयांचा शिल्पसमूह ग्रानाईटच्या लांबट- चौकोनी दगडांमध्ये इंटरलॉक पद्धतीने बांधलेला होता. त्याच्या अखंड काळ्या दगडातून कोरलेल्या घुमटाचं वर्णन ‘राजतरंगिणी’मध्ये केलेलं आहे. तिथल्या नैसर्गिक नितळ झर्‍यांचं, त्यातील माशांचं वर्णनही त्यात आहे. सम्राट अशोकाचा पुत्र जालुका याने २००० वर्षांपूर्वी बांधलेलं शिव-भूतेश देवालय याचा उल्लेखही ‘राजतरंगिणी’ मध्ये आहे. आज त्याचे काही भग्न अवशेष शिल्लक आहेत.

श्रीनगर भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print