मराठी साहित्यात निसर्गाचे अत्यंत कोमल, चित्रमय आणि भावस्पर्शी वर्णन करणाऱ्या कवितांमध्ये “औदुंबर” या कवितेचे स्थान विशेष आहे. बालकवींनी अवघ्या काही ओळींत एक जिवंत निसर्गचित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे केले आहे. ही कविता वाचताना आपण एखाद्या शांत नदीकाठी उभे आहोत आणि त्या दृश्याकडे तल्लीन होऊन पाहत आहोत, असा अनुभव येतो.
कवितेच्या सुरुवातीलाच कवी म्हणतात की झऱ्याच्या दोन्ही तीरांवर हिरवीगार वनराई पसरलेली आहे. निळसर पाणी बेटाबेटांतून संथपणे वाहत आहे. या वर्णनामुळे मनात शांत, प्रसन्न आणि रमणीय वातावरण निर्माण होते. पुढे पाण्यातील काळसर डोह, त्यातील पांढऱ्या पायवाटा, हिरव्या कुरणांवर चरणारी जनावरे अशा तपशीलांमुळे दृश्य अधिक सजीव बनते.
बालकवींची एक मोठी ताकद म्हणजे शब्दांतून चित्र निर्माण करण्याची क्षमता. हिरवे, निळे, काळे, पांढरे अशा रंगछटांचा अत्यंत प्रभावी वापर त्यांनी केला आहे. त्यामुळे कविता केवळ वाचली जात नाही, तर ती डोळ्यांसमोर उभी राहते.
मात्र या कवितेचे खरे सौंदर्य शेवटच्या ओळीत दडलेले आहे—
“पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर.”
येथे औदुंबर वृक्षाचे मानवीकरण केले आहे. तो एखाद्या समाधानी, चिंतनशील ऋषीसारखा पाण्यात पाय सोडून शांत बसला आहे, असे वाटते.ही फक्त झाडाची प्रतिमा नाही. आयुष्याच्या धावपळीतून निवृत्त झालेला, जगाकडे शांत नजरेने पाहणारा एखादा ज्ञानी मनुष्यही त्या औदुंबरात दिसतो. सभोवताली हिरवळ, पाणी, पशुपक्षी, जीवनाची हालचाल सुरू आहे; पण औदुंबर मात्र निर्विकार, समाधानी स्थिर आहे.ही प्रतिमा केवळ निसर्गचित्र राहत नाही, तर ती जीवनदृष्टी बनते. जगातील गोंधळ, धावपळ आणि अस्थिरतेच्या मध्यभागी स्थिर, शांत आणि समाधानी राहण्याचा संदेश या प्रतिमेतून सूचित होतो.
या कवितेचा स्थायीभाव शांत रस आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मिळणारी प्रसन्नता, निवांतपणा आणि अंतर्मुखता यांचा अनुभव कविता देते. अलंकारांच्या दृष्टीने मानवीकरण, अनुप्रास आणि चित्रमयता यांचा सुंदर उपयोग आढळतो.
“औदुंबर” ही केवळ एका वृक्षाची किंवा नदीकाठची कविता नाही. ती निसर्गाशी एकरूप होण्याची, क्षणभर थांबून जीवनाकडे शांत नजरेने पाहण्याची प्रेरणा देते. म्हणूनच ही कविता आजही वाचकांच्या मनात तितकीच ताजी आणि जिवंत राहिली आहे.
थोडक्यात, “औदुंबर” ही निसर्गसौंदर्य, शांतता, स्थैर्य आणि समाधानी जीवनदृष्टी यांचे अत्यंत प्रभावी कलात्मक दर्शन घडवणारी बालकवींची अजरामर कविता आहे.
☆ – नकार पचविता आला पाहिजे… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆
रोज न्यूज पेपर उघडला की अगदी सहज दोन चार तरी बातम्या सहज वाचायला मिळतात.. प्रेमात नकार.. आयुष्य संपवले.. , परिक्षेमध्ये मिळालेल्या अपयशा मुळे विद्यार्थांनी उचलले टोकाचे पाऊल.. , मुलाना हवे ते खेळणे न मिळाल्यामुळे अल्पवयीन मुलाने जीवन संपवले.. , आयुष्यात मिळालेला नकार आणि प्रेमिकाचे टोकाचे पाऊल.. आपल्या मित्राची मैत्रिणीची हत्या.. अशा अनेक बातम्या वाचल्या की मन सुन्न होत.. नकार, अपयश न स्वीकारता आल्यामुळे टोकाची भूमिका घेतली जाते.. यातून येणारे नैराश्य स्वतःचे किंवा समोरच्याच्या मृत्यूचे कारण बनते, अपयश, नैराश्य ह्याने अहंकार दुखावतो आणि त्याचे परिणाम समाजाला, कुटुंबाला भोगावे लागतात.. छोट्या छोट्या नकारांमुळे मनावर परिणाम होतो आणि टोकाची पाऊले उचलली जातात.. आजकाल सगळ्यानाच इन्स्टंट सुख यश हव असत वाट बघण कोणालाच मंजूर नाही आणि याच मानसिकतेमुके अनेक अपराध घडतात अशा बातम्या विचार करायला भाग पाडतात.. काय चूक काय बरोबर ह्यातला फरक न कळल्यामुळे अहंकार निर्माण होतो आणि आयुष्याची गाडी वळणावरून कधी घसरते आणि चुकीच्या मार्गावर कधी जाते हे कळत सुद्धा नाही.. हे सगळं टाळण्यासाठी आपल्या मनावर असणारा संयम आणि स्वतःवरील विश्वास फार महत्वाचा असतो.. नकार, अपयश ह्याकडे एक संधी म्हणून पाहिले तर आयुष्याच्या गाडीला योग्य दिशा मिळते आणि ही गाडी आपोआप ध्येयापर्यंत पोहचतेच गरज असते ती संयम आणि विश्वासाची..
नकार पचविता आला पाहिजे…
जीवनात प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं घडतंच असं नाही. कधी नोकरीत, कधी व्यवसायात, कधी नात्यांमध्ये तर कधी आपल्या स्वप्नांच्या वाटेवर आपल्याला नकाराचा सामना करावा लागतो. नकार मिळाला की मन दुखावतं, आत्मविश्वास डळमळतो आणि आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. पण खरं तर नकार हा अपयश नसतो; तो पुढे जाण्याचा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा एक टप्पा असतो.
नकार स्वीकारण्याची क्षमता माणसाला अधिक परिपक्व बनवते. प्रत्येक नकार आपल्याला काहीतरी शिकवून जातो—आपल्या चुका दाखवतो, सुधारण्याची संधी देतो आणि नवीन मार्ग शोधायला प्रेरित करतो. ज्याला नकार पचविता येतो, तोच संकटांवर मात करून यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो.
जीवनातील अनेक यशस्वी व्यक्तींना सुरुवातीला अनेकदा नकार मिळाले होते. पण त्यांनी त्या नकारांना शेवट न समजता नव्या सुरुवातीची संधी मानली. म्हणूनच नकार मिळाला तर खचून न जाता त्यातून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे..
नकार हा आपल्या किमतीचा मापदंड नसतो. तो फक्त त्या क्षणी मिळालेला एक प्रतिसाद असतो. त्यामुळे नकार स्स्वीकारून त्यातून धडा घेतला पाहिजे आणि नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत कारण कधी कधी एक नकारच आपल्याला अधिक मोठ्या यशाकडे घेऊन जात असतो.
नकार हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा अपरिहार्य अनुभव आहे. परंतु नकार मिळणे जितके महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा तो कसा स्वीकारला जातो हे अधिक महत्त्वाचे असते. अनेकदा आपण नकाराला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, कर्तृत्वाचा किंवा अस्तित्वाचा नकार समजतो. त्यामुळे मन दुखावते, अहंकार जखमी होतो आणि आत्मविश्वास कमी होतो. पण वास्तवात नकार हा व्यक्तीचा नसतो; तो एखाद्या परिस्थितीचा, निर्णयाचा किंवा त्या क्षणाच्या गरजेचा असतो.
नकार स्वीकारणे म्हणजे पराभव मान्य करणे नव्हे. उलट, वास्तव स्वीकारण्याचे धैर्य दाखवणे असते.. जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार घडेल, अशी अपेक्षा ठेवणे हेच दुःखाचे मूळ आहे. जेव्हा आपण आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवायला शिकतो, तेव्हा नकाराचे दुःखही कमी होते. कारण आपल्याला समजते की प्रत्येक गोष्ट मिळवणे हेच यश नाही; काही गोष्टी न मिळणेही आपल्या भल्यासाठी असू शक तात..
नकार माणसाला अंतर्मुख करतो. यशाच्या क्षणी आपण स्वतःकडे फारसे पाहत नाही; पण नकार मिळाल्यावर आपण स्वतःला प्रश्न विचारतो. माझ्यात काय कमी पडले? मी आणखी काय सुधारू शकतो? हा आत्मपरीक्षणाचा प्रवास माणसाला अधिक सक्षम आणि प्रगल्भ बनवतो. म्हणूनच नकार हा अनेकदा व्यक्तिमत्त्व घडवणारा सर्वोत्तम शिक्षक असतो.
अहंकाराला नकार सहन होत नाही. कारण अहंकाराला नेहमी स्वीकार, कौतुक आणि मान्यता हवी असते. परंतु जीवन प्रत्येक वेळी आपल्याला मान्यता देईलच असे नाही. ज्याने स्वतःची किंमत इतरांच्या स्वीकारावर अवलंबून ठेवली आहे, तो प्रत्येक नकाराने तुटत जातो. पण ज्याला स्वतःची ओळख आणि स्वतःवरील विश्वास आहे, तो नकाराने ढासळत नाही. कारण त्याला माहीत असते की इतरांचा निर्णय माझ्या यशाची व्याख्या असू शकत नाही.
नकार पचविणे म्हणजे मनातील कटुता सोडणे असते अस मला वाटतं. अनेक जण नकार मिळाल्यानंतर राग, द्वेष किंवा सूडभावना बाळगतात. पण अशा भावना सर्वात जास्त नुकसान स्वतःचेच करतात. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्या स्वीकारणे आणि पुढे जाणे हीच खरी मानसिक ताकद आहे. नदीला दगड आडवा आला म्हणून ती थांबत नाही; ती नवीन मार्ग शोधते. तसेच जीवनातही अडथळे आणि नकार यांच्यावर अडकून न पडता पुढे वाहत राहणे गरजेचे असते.
खरे तर प्रत्येक नकारामध्ये एक संदेश दडलेला असतो. काही नकार आपल्याला अधिक मेहनत करण्याची आठवण करून देतात. काही नकार चुकीच्या दिशेने जाण्यापासून वाचवतात. तर काही नकार आपल्या संयमाची परीक्षा घेतात. त्या संदेशाला समजून घेतले तर नकार ओझे राहत नाही; तो मार्गदर्शक बनतो.
ज्याला नकार स्वीकारता येतो, त्यालाच खऱ्या अर्थाने स्वीकार मिळतो. कारण नकारातूनच सहनशीलता, नम्रता, संयम आणि आत्मविश्वास यांचा जन्म होतो. यश माणसाला प्रसिद्धी देऊ शकते, पण नकार माणसाला गहन विचार करायला मदत करतो. यश तुमची ओळख निर्माण करते; नकार तुमचे व्यक्तिमत्त्व घडवतो.
म्हणून आयुष्यात जेव्हा नकार भेटेल तेव्हा त्याला शत्रू समजू नका. त्याच्याकडे शिक्षक म्हणून पाहा. कारण प्रत्येक नकार हा तुमच्या प्रवासाचा शेवट नसतो; तो तुम्हाला अधिक सक्षम, अधिक शहाणा आणि अधिक मजबूत बनवणारा एक महत्त्वाचा टप्पा असतो.
“ज्याला नकार पचविता येतो, त्याला जीवनातील कोणतीही परिस्थिती पचविता येते. कारण नकार स्वीकारणे म्हणजे वास्तवाशी मैत्री करणे होय. ”
“नकार हा शेवट नसतो; तो नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो.”
इयत्ता आठवी ड चा वर्ग… सहामाहीचे पेपर वाटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि गणितात नापास… कारण या विद्यार्थिनी बाहेरच्या शाळेतून आलेल्या… जिथे इंग्रजी फारसे करून घेतले जात नाही… आणि गणिताची तितकी तयारी नसते. या वर्गाला शिकवणारे आम्ही दोन शिक्षक मी आणि डॉक्टर पार्वतीबाई मोहोळकर !.. दोघी आम्ही मेहनती, मुलींबद्दल कळवळा, प्रेम, आपल्या विषयात तयार असल्या पाहिजे याची जाणीव. हे सगळं आमच्या दोघींकडे होतं. मग आम्ही ठरवलं की यांचं कोचिंग घ्यायचं. कोचिंगला सकाळी या मुली लवकर येत नाहीत कारण या मुलींना घरामध्ये कामाला खूप गुंतवले जाते. अतिशय खालच्या वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांनी असतात एकल पालक विद्यार्थिनी. पैशाची चणचण आणि मुलीला कुठेतरी कामाला लावलेले असते. त्यामुळे तिला सकाळी वेळ नाही. मग आम्ही ठरवलं शाळा सुटल्याबरोबर वर्गात घुसायचे एकाही मुलीला घरी जाऊ द्यायचं नाही पालकांना तशी कल्पना दिली होती आणि गुरुदक्षिणा म्हणून वर्गाला एक रुपया फी ठेवली होती. तीन दिवस मोहोळकर बाई इंग्रजी शिकवायचे आणि तीन दिवस मी गणित करून घ्यायची. मुलींना हा तास बुडवता येत नव्हता. अगदी बेसिक पासून आम्ही शिकवायला सुरुवात केली त्यामुळे मुलींना समजायला लागलं त्या शंका विचारायला लागल्या आणि त्यानंतरच्या नऊमाही परीक्षेमध्ये थोडी प्रगती झालेली दिसली. त्यांचाही उत्साह वाढला आमचाही उत्साह वाढला. आणि वार्षिक परीक्षेला मात्र त्या मुलीने कमालच केली सर्व मुलीने उत्तम गुण मिळवले होते आता एक चार दोन असतात ते सुधारत नाहीत ते सोडले तर बाकी सगळ्या मुलींनी चांगले मार्क मिळवले चांगले म्हणजे त्यांच्या दृष्टीने जिथे आज सात आठ दहा पंधरा मार्क पडायचे तिथे ते 40 45 50 पर्यंत गेल्या मुख्य म्हणजे त्यांना विषयाची गोडी लागली, आणि आम्हाला खात्री पटली की आता या दहावीपर्यंत नापास होणार नाहीत. या वर्गाला असणारी एक रुपया फि. वर्गांची संख्या 50 ते 55. शेवटचा वर्ग असायचा. साधारणपणे महिन्याला चाळीस एक रुपये जमायचे. बाकी काही गरीब विद्यार्थीना रुपयाही माफ होता. त्यातले 20 डॉक्टर पार्वती बाई मोहोळकर आणि वीस शीला पत्की अशी वाटणी व्हायची. वीस रुपये फी मिळत असताना आम्ही तीन दिवस एक तास जीव तोडून शिकवत होतो त्या तर बाई पीएचडी करत होत्या.
दुसरी घटना मी मुख्याध्यापक झाल्यावर रिझल्ट वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दहावी वर प्रयत्न सुरू झाले दहावीत जातानाच सर्व नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी एका वर्गात घातल्या जेणेकरून आम्हाला त्यांच्याकडून ठोस काही करून घेता येईल. त्या सर्व मुलींच्या पालकांची मीटिंग बोलवली आणि त्यांना सांगितले की आम्ही या वर्गाला कोणतेही शुल्क घेणार नाही. फक्त मुलींना सकाळी बरोबर आकरा वाजता पाठवा. पालकांची मीटिंग झाली ह्या मुलींवर आता काम केले तर त्या सहज दहावी पास होऊ शकतील असा विश्वास आम्ही पालकांना दिला. कारण त्यावेळेला वीस मार्काच्या कुबड्या नव्हत्या. पालकांनाही कल्पना पटली एक महिना हा वर्ग चालू ठेवला तेव्हा बऱ्याच विद्यार्थिनी उशिरा येत होत्या किंवा आल्या तर बाहेर बसायच्या असे चालू झाले. पुन्हा एकदा विद्यार्थिनी आणि पालक यांची एकत्रितरित्या मीटिंग घेतली. त्यामध्ये एक अडाणी असलेल्या पालक बाई म्हणाल्या,
“मी या सगळ्याची जबाबदारी घेते रोज अकरा वाजता मी येऊन शाळेपाशी बसते एकही मुलगी इकडे तिकडे फिरणार नाही सगळ्या आत जातील ही जबाबदारी मी घेते आणि त्या बाईने मुलींना एक लेक्चर दिले अगदी… का ग टिंब टिंब नो एवढी शाळा तुमच्यासाठी काय काय करायली,… ही बाई एवढं तळमळून सांगायली… अन तुम्हाला नग वाटते होय ग… आमच्या काळात शिक्षण नव्हतं म्हणून आमची अशी तरा झाली… तुम्हाला एवढ आम्ही शाळेत घातले चांगले शिका की
… मग बसाल आमच्यासारख्या भाकऱ्या थापत अन शेण लावत. अगं पोरींनो तुम्ही पास झाला तर तुमच्या आई बाचं नाव होईल ह्या बाईचं नाव होणार आहे का ?ऐका जरातेवढी तळमळून सांगायला लागली “
झालं या भाषणा नंतर सभेचा नूरच बदलला प्रत्येक पालकाने आपल्या मुलीची जवाबदारी घेतली वर्ग व्यवस्थित सुरू झाले आणि त्यावर्षीचा रिझल्ट सेवासदन च्या आत्तापर्यंतच्या रिझल्ट मध्ये सर्वाधिक म्हणजे 92 टक्के लागला तेव्हा एवढे रिझल्ट लागत नव्हते आणि कॉपी वगैरे प्रकरणं फार प्रचलित नव्हती आणि आमच्या शाळेत तर नाहीच नाही.
हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आज एक बातमी वाचली 45 हजार रुपये देणाऱ्यांनाच मोटेगावकर प्रश्न देत असत.
फुकट शिकवल्यावर किंमत नसते म्हणून 1रू घेऊन महिनाभर शिकवणारे आम्ही शिक्षक आणि त्याला गुरुदक्षिणा हे भक्कम नाव देणारे… आणि शाळेचा निकाल उत्तम पद्धतीने वाढला पाहिजे यासाठी मुलींच्या वर्गाचे नियोजन करूनमोफत शिकवणारे आमचे शिक्षक त्याला सहकार्य करणारे पालक या सगळ्या घटना 20-22 वर्षांपूर्वीच्या आहेत 22 वर्षांमध्ये एवढ अधःपतन व्हावे याचे वाईट वाटले…!
आता तुम्ही म्हणाल तुमचं काय नीट च नव्हतं पण आमचं त्या गरीब मुलींचं नीट व्हावं म्हणून तरी नक्कीच होतं
माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे वळण येते जिथे शब्दांच्या तलवारीने काळजावर वार केले जातात. जेव्हा एखादी व्यक्ती आपला सतत अपमान करते तेव्हा सुरुवातीला मनात संताप येतो मग वेदना होते आणि हळूहळू आपण स्वतःच्याच नजरेत स्वतःला कमी लेखू लागतो. पण खरं सांगू का?अपमान हा देणाऱ्याचा स्वभाव असतो पण तो स्वीकारायचा की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. जेव्हा समोरची व्यक्ती वारंवार कटू शब्द बोलते तेव्हा ती प्रत्यक्षात तिच्या स्वतःच्या मनातील गोंधळ मत्सर किंवा न्यूनगंडाला वाट करून देत असते. आपण मात्र ते शब्द एखाद्या ओझ्यासारखे आपल्या खांद्यावर वाहत राहतो.
खरंतर समुद्राच्या लाटा जशा किनाऱ्यावरील खडकावर आदळून परत फिरतात तसाच आपला स्वभाव असायला हवा. खडक शांत असतो स्थिर असतो आणि लाटांच्या आदळण्याने त्याचे अस्तित्व संपत नाही. आपली शांतता हेच अशा अपमानाला दिलेलं सर्वात सडेतोड उत्तर असतं. कारण आपण जेव्हा प्रत्युत्तर देतो तेव्हा आपण नकळत समोरच्याच्या पातळीवर उतरलेलो असतो. कधीकधी हा अपमान आपल्याला खूप काही शिकवून जातो. ज्यांनी आपल्याला कमी लेखलं ज्यांनी आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं तेच लोक कळत-नकळत आपल्याला प्रगतीची जिद्द देऊन जातात. अपमान पचवणं सोपं नसतं पण जो तो पचवून त्याचं रूपांतर ऊर्जेत करतो तोच इतिहासाच्या पानात स्वतःचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहितो.
जगातील मोठ्या क्रांती या बहुतेक वेळा कोणाचे तरी हसे उडवल्यामुळे किंवा कोणाचा तरी घोर अपमान झाल्यामुळेच घडल्या आहेत. अशा वेळी स्वतःला दोष देणं थांबवा. तुमच्या सौंदर्याची तुमच्या बुद्धीची किंवा तुमच्या कर्तृत्वाची किंमत एखाद्या व्यक्तीच्या शब्दांवरून ठरत नाही. ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांच्यापासून हळूच दोन पावलं मागे होण्यातच शहाणपण असतं. स्वतःचा आदर करायला शिका कारण जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता तेव्हा जगातील कोणताही शब्द तुम्हाला जखम करू शकत नाही. तुमचं मौन इतकं प्रगल्भ असू द्या की समोरच्याला स्वतःच्या शब्दांच्या पोकळपणाची जाणीव व्हावी. शेवटी सूर्याला कोणी कितीही दूषणं दिली तरी त्याचा प्रकाश कमी होत नाही तसंच तुम्ही तुमच्या तेजाने तळपत राहा अपमान करणाऱ्यांचे शब्द आपोआप हवेत विरून जातील. तुमच्या शांततेत इतकी ताकद असू द्या की, समोरच्याच्या शब्दांना स्वतःचीच लाज वाटली पाहिजे.
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी
महात्मा गांधी हे टागोरांपेक्षा बरेच लहान. पण दोघे अगदी सख्खे मित्र होते. गंमत म्हणजे ही मैत्री ते समविचारी आहेत म्हणून होती कां, तसेही नाही. आपण म्हणतो नं, ‘तुझं माझं पटेना आणि तुझ्याशिवाय गमेना’ तसा प्रकार आहे हा! कित्येक बाबतीत त्यांच्यात मतभेद होते, कधी कधी टोकाचे, पण त्यामुळे मैत्रीत बाधा आली नाही.
त्यांच्यातल्या मतभेदाला सुरवात, गांधींजींनी शांतिनिकेतनला दिलेल्या पहिल्या भेटीपासूनच झाली. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आले आणि लगेंच ६ मार्च १९१५ ला त्यांनी शांतीनिकेतन ला पहिली भेट दिली. तोपर्यंत टागोर जगप्रसिद्ध झाले होते, कारण १९१३ मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता.
शिक्षणाबद्दलच्या विचारात दोघांमध्ये मूलभूत मतभेद होते. गांधीजींच्या मते शिक्षण हे व्यावहारिक व सर्वांगीण विकासावर केंद्रित हवे. जागतिक प्रवाहाशी जुळवून घेण्याची त्यांना गरज वाटत नव्हती. शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार त्यांना गरजेचा वाटत नव्हता. याउलट टागोरांचा शिक्षण विषयीचा दृष्टिकोन वैश्विक होता. तरीही भारतीय परंपरांचा पण शिक्षणात अंतर्भाव व्हायला हवा म्हणून त्यांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली, जिथे भारतीय परंपरा व आंतरराष्ट्रीय मूल्ये यांचा मेळ घालणारे शिक्षण देणारी व्यवस्था होती. यामुळे गांधीजी शांतिनिकेतनच्या शिक्षण पद्धतीवर संतुष्ट नव्हते.
गांधींच्या मते अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतःची कामे स्वतः करावी. नोकर, स्वयंपाकी, झाडूवाले, पाणीवाले यांची गरज नसावी. त्यांनी हे मत टागोरांकडे व्यक्त केलं व टागोरांनीही कोणताही किंतु न बाळगता ही पद्धत अंमलात आणली. तो दिवस (१० मार्च) ‘गांधी दिवस’ म्हणून रविंद्रनाथांनी घोषित केला. आजही तेथे या दिवशी सर्व कामगारांना सुट्टी दिली जाते व विद्यार्थी सर्व कामे करतात.
स्वातंत्र्य, समता व मनुष्य धर्म यांची दोघांनाही ओढ आहे पण गांधीनी लोकलढ्याचा मार्ग अवलंबिला. मात्र टागोरांना अहिंसात्मक लढा प्रसंगी हिंसक होतो याचे भय वाटे. हा लढा सामान्य माणसातील सुप्त सामर्थ्य जागे करतो यावर दोघांचा विश्वास होता. पण विराट समुदायाच्या भावनांना गांधी ऐनवेळी कसा आवर घालणार ही चिंता टागोरांना होती. उपोषणात टागोरांना अतिरेक दिसे तर गांधीजींना त्यात आत्मशुद्धी दिसे. उपोषण हा एक अहिंसक जुलूम आहे ही टागोरांची भूमिका तर तो नैतिक बळाचा वापर आहे ही गांधीजींची भूमिका होती.
दोघेही वसाहतवाद व भांडवलशाहीच्या विरोधात होते. पण गांधीजींनी राजकारणाचा मार्ग स्विकारला आणि टागोरांनी शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्राचा! असहकार चळवळ, शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार, परदेशी कपडे जाळणे याला टागोरांचा प्रचंड आक्षेप होता.
रोज अर्धा तास प्रत्येकाने चरखा चालवावा असे आवाहन गांधीजींनी केले, तेव्हा टागोर उपहासाने म्हणाले, “जर यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत होणार असेल तर मग अर्धा तास का, साडे आठ तास का नाही?” एकूणच गांधींच्या चरखा प्रकरणावर ते टीका करत, व यामुळे भारत पुन्हा मध्ययुगात जाईल, अशी शंका व्यक्त करत.
स्वातंत्र्य चळवळीत उपेक्षित घटकांसह समाजातील सर्व घटकांच्या समावेशाचा आग्रह गांधीजींनी धरला. हिंदू मुस्लिम ऐक्य, दलितांची उन्नती यावर त्यांनी भर दिला. ते अनेकदा पाश्चात्त्य संस्कृतीवर टीका करत. याउलट टागोरांचा राष्ट्रवाद विश्व व्यापी व मानवतावादी होता.
बिहारच्या भूकंपानंतर गांधीजी म्हणाले होते, “हरिजनांना अस्पृश्य म्हणून वाळीत टाकल्याबद्दलची ही शिक्षा देवानेच दिली आहे. “
यावर टागोरांनी कडाडून टीका केली. कारण ते अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याच्या विरोधात होते. त्यांच्या मते लोकांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे. वैज्ञानिक प्रगतीनेच राष्ट्र समृद्ध होईल यावर त्यांचा दृढ विश्वास होता.
दोघेही अहिंसा, सहिष्णुतेवर आधारित मानवतावाद व निसर्ग प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करत होते. दोघेही आत्मनिर्भरतेच्या बाजूने होते. दोघेही गरिबी व दयनीय अवस्थेत जगणाऱ्यांच्या बद्दल प्रेम व सहानुभूती बाळगून होते. दोघेही भारताच्या प्राचीन संस्कृतीचा व आध्यात्मिक इतिहासाचा अभिमान बाळगणारे होते.
गांधीजींच्या मते, माणसे सगुण ईश्वराची पूजा करत असतील तर ती मानसिक गरज म्हणून पहावी. जनसामान्यांना दिलासा देणारा परमेश्वर त्यांना मान्य होता. टागोरांचं उपनिषदीय अध्यात्म सामान्यांच्या पचनी पडणारं नाही म्हणून त्यांना पसंत नव्हतं.
गांधीजींना ईश्वर सत्यामधे दिसत होता तर टागोरांना ईश्वर प्रेमात दिसत होता व दोघांचे मार्गही वेगळे होते. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने सत्य मिळविण्याचा प्रयत्न केला. तर टागोरांनी सहकार्य, परस्पर आदर व सहिष्णुतेच्या मार्गाने प्रेम म्हणजेच ईश्वर मिळविण्याचा प्रयत्न केला.
दोघांना एकमेकाबद्दल प्रचंड आदर होता. दोघे एकमेकाचे प्रचंड चाहते होते. मूल्ये सारखीच पण तपशिलात मतभेद होते. त्यांच्यात सतत पत्र व्यवहार होत होता. त्यात मतभेदांची मोकळी चर्चा व्हायची कारण दोघांनाही परस्परांची थोरवी मान्य होती. आणि त्यामुळेच गांधीजींनी टागोरांचा उल्लेख ‘गुरुदेव’ असा केला तर टागोरांनी गांधीजींना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली
दोघांनीही मैत्रीचे नाते कसे निभावले याचीही उदाहरणे आहेत.
अनुसूचित जातींना स्वतंत्र मतदार संघ देण्याच्या ब्रिटिश प्रस्तावाच्या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले होते. त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटल्याने टागोर स्वतः त्यांना भेटायला गेले. त्यावेळी सुदैवाने इंग्रज सरकारने त्यांची मागणी मान्य केली होती आणि या नेत्याने उपोषण सोडले. त्यावेळी महात्माजींनी टागोरांना स्वतः रचलेले गाणे गाण्याची विनंती केली आणि खरोखरच टागोरांनी ‘जीवन जाखन शुकै ए जय करुणाधारे’ हे गाणे म्हटलं.
विश्वभारतीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी निधी गोळा करणे या उद्देशाने नृत्य नाट्य पथक घेऊन टागोर दिल्ली दौरा करत होते. ही बातमी गांधीजींपर्यंत पोहोचली. इतक्या उतार वयात निधी गोळा करण्यासाठी त्यांना फिरताना पाहून गांधीजींना अतीव दुःख झाले. गांधीजी त्यांना भेटले व त्यांच्या पैशाची व्यवस्था ही केली.
टागोरांच्या मृत्यूच्या आधी एक वर्ष म्हणजे १९४० मध्ये गांधीजी कस्तुरबांसह या आजारी कवीला भेटायला गेले होते. टागोरांनी त्यांना विनंती केली की आपल्या नंतर गांधींनी विश्वभारतीचा कार्यभार स्वीकारावा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५१ मध्ये विश्वभारती ला भारत सरकारने केंद्रीय विद्यापीठ म्हणून मान्यता दिली.
एकाच वेळी एकमेकांचे विरोधक व प्रशंसक असणाऱ्या या दोन महान विभूतीं सारखी शुद्ध, स्पष्ट व आदरयुक्त मैत्री पुन्हा होणे नाही.
—–
☆ गीत : ८२ ☆
TIME is endless in thy hands, my lord. There is none to count thy minutes.
Days and nights pass and ages bloom and fade like flowers. Thou knowest how to wait.
Thy centuries follow each other perfecting a small wild flower.
We have no time to lose, and having no time we must scramble for our chances. We
are too poor to be late.
And thus it is that time goes by while I give it to every querulous1
man who claims it, and thine altar is empty of all offerings to the last.
At the end of the day I hasten in fear lest thy gate be shut; but I find that yet there is time.
MOTHER, I shall weave a chain of pearls for thy neck with my tears of sorrow.
The stars have wrought their anklets of light to deck thy feet, but mine will hang upon thy
breast.
Wealth and fame come from thee and it is for thee to give or to withhold them. But this my sorrow is absolutely mine own, and when I bring it to thee as my offering thou rewardest me with thy grace.
☆ बायो क्लॉक… – लेखक – रणजीत भोसले ☆ प्रस्तुती – सुनिता जोशी ☆
जेव्हा आपल्याला पहाटे लवकर प्रवास करायचा असेल, तेव्हा आपण सकाळी ४ वाजता गजर लावतो आणि झोपतो; पण बऱ्याच वेळा, गजर न वाजता देखील आपण ठरलेल्या वेळेला जागे होतो. यालाच बायो-क्लॉक म्हणतात. बऱ्याच लोकांचा विश्वास असतो की, माणसाचे आयुष्य सरासरी ८०-९० वर्षांपर्यंत असते. तसेच ५०-६० वर्षांनंतर आजार सुरु होतात, असेही त्यांना ठामपणे वाटते. ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली असते की, नकळत ते स्वत:च आपले बायो-क्लॉक तसेच सेट करतात. म्हणूनच, अनेकांना ५०-६० वयानंतर तब्येतीच्या तक्रारी सुरु होतात. खरं म्हणजे, आपणच मनाने आपले बायो-क्लॉक चुकीच्या पध्दतीने प्रोग्राम करतो. चिनी लोकांचे दृष्टिकोन वेगळे आहेत! चीनमध्ये, अनेक लोक ठामपणे विश्वास ठेवतात की १२० वर्षांपर्यंत ते निरोगी आयुष्य जगू शकतात. या सकारात्मक मानसिकतेमुळे त्यांचे बायो-क्लॉक तशा प्रकारे सेट आहे. आणि म्हणूनच! तुमच्या बायो-क्लॉकला पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्याचा आनंद घ्या! हे करा आणि १०० वर्षांपर्यंत आरोग्यदायी जगा!
१. मनाने बायो-क्लॉक सकारात्मक रीतीने सेट करा. नियमित ध्यानधारणा (मेडिटेशन) केल्यास, आपण किमान १०० वर्षे निरोगी जगू शकतो.
२. ४० ते ९० या वयोगटात कोणताही आजार होणार नाही यावर ठाम विश्वास ठेवा. वृध्दत्व हे १२० वर्षांनंतरच सुरु होते, असे स्वत:ला पटवा.
३. केस पांढरे झाले तरी त्यांना नैसर्गिकरित्या रंगवा. नेहमी तरुण दिसण्याचा प्रयत्न करा. कपडेही युवक-युवतींसारखे परिधान करा. हे तुमचा आत्मविश्वास वाढवेल. कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला वृध्द समजू नका.
४. खाण्याच्या वेळी नकारात्मक विचार करु नका. उदा. हे अन्न भेसळयुक्त आहे, अपायकारक आहे असे विचार टाळा. त्याऐवजी ठामपणे विश्वास ठेवा की, ध्यानधारणेच्या सामर्थ्याने मी घेतलेले अन्न शुध्द होत आहे आणि माझ्यासाठी अमृतासमान आहे. हे अन्न मला १२० वर्षांपर्यंत निरोगी आणि दीर्घायुष्य देईल. अन्यथा, नकारात्मक विचारांमुळे शरीरात घातक एन्झाईम्स तयार होतात, जे पचन आणि आरोग्यास हानिकारक ठरतात.
५. सदैव सक्रिय राहा. चालण्याऐवजी शक्य असल्यास हलके धावण्याचा (जॉगिंग) प्रयत्न करा.
६. वाढत्या वयानुसार आरोग्य अधिक चांगले होत जाते, यावर विश्वास ठेवा. (हे शास्त्रीयदृष्ट्या खरे आहे!)
७. आनंद आणि आजारपण एकत्र राहू शकत नाहीत. जिथे आनंद असेल, तिथे आजार टिकू शकत नाही. म्हणूनच, आनंदी राहा, निरोगी राहा! रोज विनोदी चित्रपट पाहा आणि मन मोकळं हसा!
८. मी आता म्हातारा/म्हातारी होत आहे असे कधीही बोलू नका, अगदी गंमतीतही नाही! तुमच्या विचारांतून आणि शब्दांतूनच तुमचे आयुष्य घडते. बायो-क्लॉक पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्य अनुभवा! दृष्टीकोन बदला, आयुष्य बदलेल! जगण्याचा आनंद घ्या….
लेखक – रणजीत भोसले
प्रस्तुती : सुनीता जोशी
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
’हसणं’ ही ईश्वराने फक्त माणसाला दिलेली एक अद्भुत देणगी आहे. पण आजच्या धावपळीच्या जगात आपण हे साधं, सोपं सुख कुठेतरी हरवून बसलोय की काय, असं वाटतं. ज्या दिवशी आपण मनमोकळं हसलो नाही, तो दिवस खरोखरच ‘वेस्ट’ आहे.. !
आयुष्यात संकटं कोणाला नाहीत? प्रत्येकाच्या पाठीवर दुःखाची एक छोटी-मोठी गोणी असतेच. पण जो माणूस या संकटांकडे बघून एक ‘तिरकस’ का होईना, पण हसू देऊ शकतो, त्याच्यातला अर्धा ताण तिथेच विरघळतो.
लहानपणीच्या त्या “हसी तो फसी” या डायलॉगमध्ये आपण अडकून पडलो होतो, पण मोठेपणी कळतं की हसू हे कोणाला ‘फसवण्यासाठी’ नाही, तर स्वतःला ‘सावरण्यासाठी’ असतं. लाफ्टर थेरपीमध्ये कृत्रिमरीत्या हसणारे लोक जेव्हा आपण पाहतो, तेव्हा जाणीव होते की, ‘आतलं हसू’ आज किती महाग झालंय. समोरच्याचा अपमान करण्यासाठी आलेलं हसू हे विष असतं, तर कुणाचं दुःख हलकं करण्यासाठी दिलेलं हसू हे अमृत असतं. स्वतःवर हसायला ज्याला जमतं, त्याला जग जिंकणं सोपं जातं. जगातील सर्वात पुण्यवान माणूस तोच, जो स्वतःच्या डोळ्यात पाणी असताना समोरच्याला हसवण्याची ताकद ठेवतो.
तुमचा हसरा चेहरा हा केवळ तुमचा दागिना नाही, तर तो तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी एक आशेचा किरण असतो. म्हणूनच, अट्टाहासाने का होईना, पण हसायला शिका. आरशात बघून स्वतःला एक स्माईल द्या, जुन्या आठवणी काढून मित्रांसोबत खिदळा आणि हो… एखादा विनोद समजला नाही, तरी दुसऱ्याचं हसू बघून हसा! त्यातही एक वेगळीच मजा आहे.
हसण्याचं हे ‘बजेट’ कधीच कमी होऊ देऊ नका!
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “बुद्धि दे रघुनायका ..” – कवी : श्री समर्थ रामदास ☆ रसग्रहण – श्री दिवाकर बुरसे ☆
काव्यानंद
समर्थांची मूळ कविता…
☆ बुद्धि दे रघुनायका ☆
☆
युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥
नेणता भक्त मी तुझा। बुद्धी दे रघुनायका॥१॥
*
मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥
कल्पना धावते सैरा। बुद्धी दे रघुनायका॥२॥
*
बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥
बहुत पीडिलो लोकी। बुद्धी दे रघुनायका॥३॥
*
तुझा मी टोणपा झालो। कष्टलो बहुतापरी॥
सौख्य ते पाहता येत नाही। बुद्धी दे रघुनायका॥४॥
*
नेटके लिहीता येना। वाचिता चुकतो सदा॥
अर्थ तो सांगता येना। बुद्धी दे रघुनायका॥५॥
*
प्रसंग वेळ तर्केना। सुचेना दीर्घ सूचना॥
मैत्रिकी राखता येना। बुद्धी दे रघुनायका॥६॥
*
संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥
वीसरु पडतो पोटी। बुद्धी दे रघुनायका॥७॥
*
चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥
आळसू लागला पाठी। बुद्धी दे रघुनायका॥८॥
*
कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥
हे लाज तुजला माझी। बुद्धी दे रघुनायका॥९॥
*
आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥
आणीक नलगे काही। बुद्धी दे रघुनायका॥१०॥
सद्गुरु श्री समर्थ रामदासस्वामी
“बुद्धी दे रघुनायका”
साधक समर्थांच्या अंतःकरणातील आर्त स्वर
🪷
प्रस्तावना
दुर्गुणांशी झुंज, असहाय्यतेची स्विकृती आणि शरणागतीतील तेजस्वी साधना.
समर्थ रामदासांच्या साधनाकाळात उमटलेले हे आर्त उद्गार म्हणजे एका संताच्या अंतःकरणातील निखळ प्रामाणिकपणा. “युक्ति नाही बुद्धि नाही” अशी स्वतःच्या अपूर्णतेची निर्भीड आणि प्रांजळ स्विकृती देत ते ज्या स्वरात रामरायाला साद घालतात, तो स्वर केवळ भक्तीचा नाही, तर आत्मपरिक्षणाचा, आत्मनिवेदनाचा आणि अखेरीस संपूर्ण शरणागतीचा आहे!
ही कविता म्हणजे एका साधकाच्या अंतर्मनातील वादळाचे काव्यमय चित्रण. मनाची चंचलता, वासनांची चक्रावर्ते, विवेकाचा अभाव, सामाजिक अपयश, आत्मविश्वासाची ढासळलेली भिंत— या सर्वांचा अत्यंत हळवा, तरीही धैर्यवान स्वीकार येथे दिसतो. समर्थांचा हा आर्त स्वर त्यांना अधिक महान करतो; कारण येथे संतत्वाचा गर्व नाही, तर साधकाची नम्रता आहे.
आत्मस्वीकाराचा निर्भय प्रकाश
“युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥”
या आरंभीच्याच ओळीत समर्थ जणू आपल्या मनाच्या दर्पणात स्वतःकडे पाहतात. आत्मप्रौढीचा लवलेश नाही. स्वतःच्या उणिवांची जाणीव हेच खरे साधनाचे पहिले पाऊल.
साधक जेव्हा आपल्या दुर्गुणांना ओळखतो, तेव्हा तो त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर निघतो. समर्थांची ही स्विकृती म्हणजे आत्मशुद्धीचा आरंभबिंदू. येथे संतत्वाचा दिव्य तेजोमय मुकुट नाही, तर साधकाची विवंचना आहे—एक जिवंत, धडधडणारी, प्रामाणिक विवंचना.
मनाचा उच्छाद आणि वासनांची वावटळ
“मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा…”
मनाची ही चंचलता म्हणजेच साधनेतील सर्वांत मोठा अडसर. समर्थांनी या अवस्थेचे केलेले वर्णन अत्यंत जिवंत आहे. कल्पना सैरभैर धावते, वासना विवेकाला झाकोळून टाकते, आणि मनावरचे नियंत्रण सुटते.
ही अवस्था केवळ समर्थांची नाही, तर प्रत्येक साधकाची आहे. म्हणूनच ही कविता सार्वकालिक ठरते. समर्थांचे मनही आपल्यासारखेच चंचल आहे, हे जाणवले की त्यांच्या संतत्वाशी आपली जवळीक वाढते.
परंतु या चंचलतेवर ते स्वतःच्या सामर्थ्याने विजय मिळवण्याचा गर्व करीत नाहीत; ते विनम्रतेने म्हणतात, “बुद्धी दे रघुनायका. ”
हा ‘दे’ शब्द म्हणजे संपूर्ण शरणागतीचा उत्कट स्वर.
सामाजिक अपुरेपणाची वेदना
“बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥ बहुत पीडिलो लोकी…”
येथे समर्थांची वेदना अधिक गडद होते. समाजात स्वतःचे अपुरेपण जाणवणे ही फार मोठी मानसिक वेदना असते. लोकांच्या हसण्याने, टोमण्याने, दुर्लक्षाने मन विदीर्ण होते.
“संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥”
या ओळींतून त्यांच्या मनातील असहाय्यता झिरपते. एक संत म्हणविणारा पुरुष स्वतःला “टोणपा” म्हणतो—याहून मोठी आत्मनम्रता कोणती?
ही वेदना त्यांच्या अहंकाराला भेदून जाते आणि त्यांना अधिकच शरणागत बनवते.
असहाय्यतेचे सावट आणि शरणागतीचा प्रकाश
“चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी…”
मन, बुद्धी, चित्त, वर्तन—सर्वच स्तरांवर अपयशाची छाया आहे. परंतु समर्थ या अंधारात हरवून जात नाहीत. उलट, त्या अंधारातूनच ते रामरायाच्या चरणांपाशी जाऊन प्रकाश मागतात.
“कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥ हे लाज तुजला माझी…”
येथे भक्तीचा परमोच्च क्षण येतो. ‘मी तुझा आहे’ ही जाणीव आणि ‘माझी लाज तुला’ हा भाव—हीच खरी भक्तीची पराकाष्ठा. भक्त स्वतःचे अपुरेपण देवाच्या चरणी अर्पण करतो आणि त्याच्या कृपेची याचना करतो.
निराशेच्या उदरात दडलेली आशेची कळी
“आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥ आणीक नलगे काही…”
ही ओळ म्हणजे या कवितेचा उत्कर्षबिंदू. सर्व अपुरेपण, दुर्गुण, असहाय्यता—यांच्या पलीकडे समर्थांची आशा अढळ आहे. निराशेच्या उदरात आशेची कळी दडलेली असते; तीच येथे फुलते.
समर्थ अन्य काहीही मागत नाहीत— ना संपत्ती, ना कीर्ती, ना वैभव. ते केवळ “बुद्धी – सद्बुद्धी” मागतात. कारण बुद्धी म्हणजे विवेक, संयम, साधनेचे सामर्थ्य आणि आत्मोद्धाराचा मार्ग.
समाप्ती : आर्ततेतील सौंदर्य आणि संतत्वाचा पाया
ही कविता म्हणजे संताच्या अंतःकरणातील निर्मळ अश्रूंची माळ आहे. समर्थांची आर्तता त्यांना लहान करत नाही; उलट तीच त्यांच्या संतत्वाचा पाया ठरते.
स्वतःच्या दोषांचे निर्भीड स्वीकार, मनाच्या चंचलतेची जाणीव, समाजातील अपयशाची वेदना, आणि अखेरीस दैवी कृपेची उत्कट याचना—या सर्वांचा संगम म्हणजे “बुद्धी दे रघुनायका. ”
ही कविता आपल्याला शिकवते की, साधनेचा मार्ग हा दोषरहित नसतो; तो दोषांच्या जाणीवेने आणि त्यागाच्या आकांक्षेने उजळतो. जेव्हा साधक आपल्या अपुरेपणाला देवाच्या चरणी अर्पण करतो, तेव्हाच त्याच्या अंतःकरणात खऱ्या बुद्धीचा, खऱ्या प्रकाशाचा उदय होतो.
समर्थांचा हा आर्त स्वर आजही प्रत्येक साधकाच्या अंतर्मनात निनादतो—
“मी कमी पडतोय देवा… मला सद्बुद्धी दे.”
रसग्रहण – श्री दिवाकर बुरसे,
पुणे
संपर्कः ९५ ५ २६ २९ २ ४ ५
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “पॉपकॉर्न ब्रेन : डिजिटल युगातील मनाची नवी व्याधी…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
मानवी मेंदू हा जगातील सर्वात गुंतागुंतीचा आणि अद्भुत अवयव मानला जातो. त्यानेच माणसाला इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवले आहे. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनंतरही हा मेंदू बदलत्या जगाशी जुळवून घेत राहतो. परंतु गेल्या दोन दशकांत झालेल्या तंत्रज्ञानक्रांतीने या मेंदूवर इतका वेगाने आणि तीव्रपणे परिणाम केला आहे की आता मेंदूच्या नैसर्गिक कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडिया, मोबाईल फोन, इंटरनेट आणि सतत वाहणारी माहिती या सगळ्यामुळे आजचा माणूस एका नव्या मानसिक स्थितीचा अनुभव घेत आहे. ही स्थिती म्हणजेच “पॉपकॉर्न ब्रेन” — एक असा मेंदू जो सतत उडणाऱ्या, फुटणाऱ्या, चमकणाऱ्या माहितीच्या फटकाऱ्यांना इतका सरावलेला आहे की शांतता, एकाग्रता आणि स्थिरता यांची क्षमता हरवू लागली आहे.
“पॉपकॉर्न ब्रेन” हा शब्द प्रथम सुमारे २०११ च्या सुमारास अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड लेव्हिन यांनी वापरला. त्या काळात स्मार्टफोनचा प्रसार झपाट्याने होत होता, आणि लोक सतत ऑनलाइन राहण्याची सवय लावत होते. लेव्हिन यांनी निरीक्षण केले की डिजिटल साधनांचा अतिरेकी वापर करणाऱ्यांचा मेंदू जणू पॉपकॉर्नच्या दाण्यासारखा सतत उड्या मारत असतो. एका क्षणात एका विचारातून दुसऱ्या विचारात, एका माहितीपासून दुसऱ्या सूचना, एका व्हिडिओपासून दुसऱ्या पोस्टमध्ये उडी घेणारा हा मेंदू स्थिर राहू शकत नाही. जसे गरम तेलात टाकलेले दाणे फुटत राहतात, तसेच या युगातील मेंदूही सतत “फुटत” आणि “उडत” राहतो. म्हणूनच या अवस्थेला “पॉपकॉर्न ब्रेन” असे नाव देण्यात आले.
या संकल्पनेचा वैज्ञानिक पाया मेंदूतील न्यूरोट्रांसमिटर “डोपामिन”मध्ये आहे. डोपामिन हे ‘रिवॉर्ड केमिकल’ मानले जाते. जेव्हा आपण काही सुखद अनुभव घेतो, काही नवीन माहिती मिळवतो, लाइक किंवा नोटिफिकेशन पाहतो, तेव्हा डोपामिनची पातळी वाढते आणि आपल्याला आनंदाची लहर जाणवते. या आनंदाचा शोध मेंदू पुन्हा पुन्हा घेत राहतो, त्यामुळे आपण वारंवार फोन तपासतो, सोशल मीडिया स्क्रोल करतो, व्हिडिओवरून व्हिडिओकडे जात राहतो. कालांतराने ही सवय इतकी दृढ होते की मेंदू सतत नवीनतेची मागणी करू लागतो. त्यामुळे जेव्हा एखाद्या शांत वातावरणात बसावे लागते, जसे की पुस्तक वाचणे, संवाद साधणे, किंवा फक्त शांतपणे विचार करणे इ. तेव्हा मेंदू अस्वस्थ होतो, लक्ष केंद्रित करणे अवघड जाते, आणि आपोआप हात पुन्हा मोबाईलकडे जातो. हीच “पॉपकॉर्न ब्रेन”ची मूळ मानसिक यंत्रणा आहे.
मानसशास्त्रज्ञांच्या मते, या स्थितीत मेंदूतील “अटेंशन नेटवर्क” आणि “डीफॉल्ट मोड नेटवर्क” या दोन भागांमधील समतोल बिघडतो. अटेंशन नेटवर्क हे कामावर लक्ष केंद्रीत ठेवते, तर डीफॉल्ट मोड नेटवर्क हे विश्रांतीच्या अवस्थेत कार्यरत असते, जिथे कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मचिंतन घडते. सततच्या डिजिटल उत्तेजनामुळे अटेंशन नेटवर्क थकते आणि डीफॉल्ट मोड नेटवर्कला पुरेशी संधी मिळत नाही. परिणामी, माणूस सतत काहीतरी करण्याच्या धावपळीत असतो पण प्रत्यक्षात काही खोल विचार करू शकत नाही. ही स्थिती एखाद्या संगणकावर हजारो टॅब उघडे ठेवून एकाच वेळी सर्व वापरण्याच्या प्रयत्नासारखी आहे. शेवटी संपूर्ण प्रणाली हळूहळू अडकते, मंदावते आणि क्रॅश होते.
पॉपकॉर्न ब्रेनचा सर्वाधिक परिणाम तरुण पिढीवर होत आहे. इंटरनेटसह वाढलेली ही पिढी सतत बदलणाऱ्या डिजिटल जगाशी इतकी जुळलेली आहे की वास्तव जग त्यांना बोअर वाटते. वर्गात शिकवले जाणारे धडे, लांब व्याख्याने, किंवा पुस्तकातील मोठे परिच्छेद वाचणे त्यांना कठीण जाते कारण त्यांच्या मेंदूला १० सेकंदांच्या रील्स, २० शब्दांच्या ट्विट्स आणि सततच्या नोटिफिकेशनच्या जगाशी सवय झाली आहे. परिणामी, एकाग्रतेचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. अमेरिकन नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीने केलेल्या संशोधनानुसार २००० साली मानवाची सरासरी एकाग्रता सुमारे १२ सेकंदांची होती, तर २०२० पर्यंत ती फक्त ८ सेकंदांवर आली, म्हणजेच सोनमाश्याच्या एकाग्रतेपेक्षा कमी.
पॉपकॉर्न ब्रेन केवळ लक्ष केंद्रीत होण्यावर परिणाम करत नाही, तर भावनिक आणि सामाजिक आयुष्यावरही खोल परिणाम घडवतो. जेव्हा मेंदू सतत उत्तेजनांना सरावतो, तेव्हा तो शांततेत असहाय होतो. अशा व्यक्तींना एकांतात राहणे, एखाद्या मित्राशी खोल संवाद साधणे, किंवा दीर्घ काळ एकाच कामावर लक्ष ठेवणे जड जाते. त्यांना लगेच कंटाळा येतो आणि नवीन उत्तेजनाची भूक लागते. या प्रक्रियेला मानसशास्त्रात “डिजिटल रिवॉर्ड सर्किट” म्हणतात. जणू मेंदूला सतत साखर मिळत आहे आणि एकदा साखरेचा पुरवठा थांबला की तो थरथर कापतो. म्हणूनच लोक मोबाईल हातात नसला तरी नकळत तो हातात शोधतात, नोटिफिकेशनचा आवाज नसतानाही “फँटम वायब्रेशन” अनुभवतात.
पॉपकॉर्न ब्रेनचे शारीरिक परिणामही लक्षणीय आहेत. झोपेची गुणवत्ता घटते, डोळ्यांवर ताण येतो, मेंदू सतत सतर्क राहिल्यामुळे शरीराचा जैविक घड्याळ बिघडतो. सततच्या स्क्रीन एक्स्पोजरमुळे मेलाटोनिनचे स्राव कमी होते, त्यामुळे झोप येण्यास उशीर होतो आणि सकाळी थकवा जाणवतो. या स्थितीला “डिजिटल इनसॉम्निया” म्हटले जाते. दीर्घकाळात ही समस्या नैराश्य, चिंता, आणि आत्मसन्मानाच्या कमीपणाशी जोडली जाते कारण सोशल मीडियावरील सततची तुलना, लाईक्स आणि फॉलोअर्सची गणना मेंदूवर दडपण आणते. व्यक्तीला स्वतःचे अस्तित्व इतरांच्या मान्यतेवर अवलंबून असल्यासारखे वाटते.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, पॉपकॉर्न ब्रेन ही एका प्रकारची “न्यूरोप्लॅस्टिक ऍडॅप्टेशन” आहे. म्हणजेच मेंदू स्वतःला नवीन परिस्थितीशी जुळवून घेतो. परंतु ही जुळवणूक नैसर्गिक नाही, तर तात्पुरती आणि कृत्रिम आहे. मेंदूतील “सिनॅप्सेस” म्हणजे न्यूरॉन्समधील जोडणी सतत बदलणाऱ्या उत्तेजनांशी जुळवून घेतात, त्यामुळे हळूहळू “डीप फोकस” करणे कठीण बनते. संशोधन दर्शवते की ज्यांच्या जीवनात स्क्रीन टाइम जास्त आहे त्यांच्यात “प्रि-फ्रंटल कॉर्टेक्स” (निर्णय घेण्याचा भाग) आणि “हिप्पोकॅम्पस” (स्मरणशक्तीचा भाग) यांची क्रियाशीलता कमी होत जाते. त्यामुळे दीर्घकाळात विचारशक्ती, तार्किक निर्णय क्षमता आणि आत्मनियंत्रण या सर्व गोष्टींवर परिणाम होतो.
इतिहासाच्या दृष्टीने बघितले तर प्रत्येक तांत्रिक क्रांतीने मेंदूवर परिणाम केला आहे. मुद्रणयंत्राच्या काळात वाचनसवयींनी मेंदूच्या भाषिक भागाचा विकास केला, औद्योगिक क्रांतीने यांत्रिक विचार वाढवला, पण डिजिटल क्रांतीने पहिल्यांदाच मेंदूला बाह्य जगाशी सतत जोडून ठेवले आहे. हा जोड अखंड आहे, त्यामुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही. आधीच्या युगात एक दिवस संपला की संवाद थांबत असत, परंतु आता रात्री झोपेतही नोटिफिकेशन येत राहतात. अशा परिस्थितीत मेंदूचा “रेस्ट मोड” जवळजवळ नाहीसा झाला आहे. काही न्यूरोसायंटिस्ट्स तर म्हणतात की आजचा माणूस “पॉज” बटण विसरला आहे.
औद्योगिक युगाने शरीरावर परिणाम केला, तर डिजिटल युगाने मेंदूवर. पण माणसात आत्मपरीक्षण करण्याची एक विलक्षण क्षमता आहे. हीच क्षमता आज पुन्हा जागवण्याची वेळ आली आहे. मेंदूला पुन्हा शांततेचा, शून्यतेचा, आणि विचाराच्या गाभ्याचा अनुभव द्यावा लागेल. जेव्हा आपण स्वतःच्या विचारांवर पुन्हा नियंत्रण मिळवू, तेव्हाच आपण “पॉपकॉर्न ब्रेन”मधून मुक्त होऊ. मानवाच्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा कृत्रिम बुद्धिमत्तेशी एकरूप होण्याचा नसून — सजग बुद्धिमत्तेशी परत एकरूप होण्याचा आहे. माहितीचा ओघ थांबवणे शक्य नाही, पण त्यात वाहून जाणे टाळणे शक्य आहे. म्हणूनच, या युगात सर्वात क्रांतिकारी कृती म्हणजे थांबणे. थांबून विचार करणे आणि थांबून स्वतःला पुन्हा शोधणे. “पॉपकॉर्न ब्रेन” आपल्याला शिकवतो की सतत उडत राहणारा मेंदू चमकदार असू शकतो, पण विचारशील मेंदूच खऱ्या अर्थाने प्रकाशमान असतो.
परिचयातल्या एकाच्या मुलीच्या लग्न होतं. आग्रहाचं आमंत्रण असल्यानं तासाभराचा प्रवास करून संध्याकाळी सहाच्या सुमारास विवाहस्थळी पोचलो. सव्वा सहाचा मुहूर्त होता. भल्या मोठ्या लॉनमध्ये जंगी तयारी. पाचसातशे खुर्च्या मांडलेल्या. पाहुणे मंडळीचा ओघ सुरू होता. स्टेजवर सत्कार सुरू होते. तीस-चाळीसजण तिथं उगीचच गर्दी करून उभे होते. माईकवर नावं पुकारणाऱ्या दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींमध्ये मोठा आवाज कुणाचा? यावर स्पर्धा चाललेली त्यात भरिसभर म्हणजे दोघं एकाचवेळी बोलत असल्यानं सत्कार घ्यायला येणाऱ्यांना नक्की कोणत्या बाजूला जायचं हे कळत नव्हतं. यामुळे वातावरण तापायला लागल्यावर नवरीच्या मामानं आपल्या माणसाला थांबायला सांगितल्यानं पुढचे सत्कार नीट सुरू झाले. काही वर्षांपासून लग्नात सत्काराचं फॅड बरचं वाढलंय. त्यावरून बऱ्याच मानपानाच्या घटना घडतात. खरं तर या सत्कारांकडं कोणाचं फारसं लक्ष नसतं पण त्याला फार महत्व आलंय. एवढं मात्र नक्की!! असो.
अचानक मुहूर्ताची आठवण झाल्यानं नवरा-नवरीला स्टेजवर बोलावलं गेलं तोपर्यंत साडे-सहा वाजलेले. मुहूर्तची वेळ टळून गेलेली पण त्याविषयी कोणाला देणघेणं नव्हतं. मुहूर्ताची वेळ फक्त पत्रिकेत छापण्यासाठीच असते. बाहेर डीजेच्या दणदणाटात वरात सुरू झाली.
घोड्यावर विराजमान नवरदेव, समोर नाचणारे मित्र-नातेवाईक तर लॉनच्या दाराशी वाट बघणारी नवरी. स्टेजवर चालू असलेले सत्कार आणि वेलकम ड्रिंक, स्टार्टरमध्ये गुंतलेली पाहुणेमंडळी. असं एकूणच नजारा.
सुमारे पाऊण तासानं वरात दाराशी आल्यावर जोरात नाचगाणं झालं त्यात नवरदेवही नाचले. नवरीला पण आग्रह झाला पण ती आली नाही. सुवासिनींनी ओवाळल्यावर रंगबिरंगी दिव्यांच्या झगमगत्या रथात नवरा-नवरी बसले. साधारणत: पाचशे मीटरचं अंतर त्यातही रथाच्या बाजूंनी फटाक्यांची आतषबाजी, मशीनमधून धूर सोडला जात होता सोबत सोनेरी कागदाची चमचम उधळली जात होती, पुढे सहा तरुणींचे समईनृत्य परंतु स्पीकरवरचं गाणं सारखं बंद पडायचं म्हणून वैतागून सगळ्याजणी चालायला लागल्या. या शाही वरातीचे उत्सवमूर्ती नवरा नवरी मात्र अवघडल्यासारखे बसलेले. त्यातही नवरी खूप एक्साईट झालेली. सगळा प्रकार फार भन्नाट, भारी वाटत असल्याचं तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं. नवरा मात्र बावचळल्यासारखा टकामका पाहत होता. रथ स्टेजजवळ पोचल्यावर सत्कार थांबले. दोन्ही कुटुंबातर्फे पुन्हा पाहुण्यांचं स्वागत केल्यानंतर दोन पुढऱ्याचं आशीर्वादपर भाषणं झालं आणि अंतरपाट धरला गेला.
पहिली मंगलअष्टका झाल्यावर अक्षतांची वारेमाप उधळण झाली. त्यानंतर एकच मंगलअष्टका म्हटली गेली आणि “लग्न” लागलं. आकाशात डोळे दिपवणारी फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. ती दहा मिनिटं चालली आणि “लग्न” मात्र अवघ्या तीन मिनिटांत लागलं. लगेचच पाहुणे मंडळीं जेवणाच्या हॉलच्या दिशेने पळाली. काही क्षणांपूर्वी सेलिब्रिटी असणारे नवरा-नवरी एकदम बेदखल अर्थात ती दोघंसुद्धा जग विसरून फोटोसाठी पोजेस देण्यात बिझी. नवीन जोडप्याला शुभेच्छा आणि आहेर देण्यासाठी लागलेल्या रांगेत मीही सामील झालो.
बुफे काउंटर जवळ तुफान गर्दी झालेली. दिसेल त्या मोकळ्या जागेत बसून खाणं चाललेलं. प्रत्येकाची ताटं गच्च भरलेली. त्यातलं बरंचसं टाकून दिलं जात होतं. अन्नाची नासाडी पाहून जेवायची इच्छा राहिली नाही. घड्याळात पाहिलं तेव्हा साडेआठ वाजून गेलेले. न जेवताच निघालो.
डोक्यात विचारांचा कल्लोळ…
आताशा ‘लग्न” मंगल सोहळा न राहता भपकेबाज इव्हेंट झालाय.
परंपरांसोबतच अनेक फिल्मी आणि खर्चिक गोष्टींच प्रमाण वाढलंय.
आपुलकी, आपलेपणा, अगत्य कमी आणि दिखाऊपणा जास्तच असतो.