मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनुष्य इंगळी, अति दारुण – – ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ मनुष्य इंगळी, अति दारुण – – ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

“पणत्या कशा दिल्या काकू? ”

“नक्षीच्या ६० रूपये डझन आणि साध्या ४० रूपये डझन”

“मला ६ हव्यात. ”

“६ नं कुठं दिवाळी होत असती का दादा? दोन्ही घ्या की एकेक डझन.. नव्वद ला देते मी.. ”

हो-नाही, हो-नाही करत करत शेवटी एक डझन पणत्या घ्याव्यात असा निर्णय झाला. ‘वैशाली’त उत्तप्पा मागवताना एवढा विचार नाही करत कुणी. पण पणत्या सहा घ्याव्या की बारा? याचा निर्णय घेण्यासाठी पाच मिनिटं घेतो आपण. माणसाची तऱ्हाच निराळी.

लग्न ठरवण्यासाठी भेटताना बरिस्ता किंवा सीसीडी मध्ये भेटून बिलासाठी पाचशे रूपयांच्या दोन नोटा देणाऱ्या तरूणाचं रूपांतर लग्नानंतर एक किलोच्या भावात घासाघीस करून पाव किलो भाजी घेणाऱ्यात कसं होतं, ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. याला दुटप्पीपणा म्हणता येणार नाही, ही स्वाभाविक वृत्ती आहे. कोणत्या गोष्टी गृहित धराव्यात, कोणत्या गोष्टींना महत्व द्यावं, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात याच्या धोरणांमध्ये गडबड झाली की जगण्या-वागण्याची पुढची सगळी समीकरणं चुकतच जातात आणि आपल्याच चुकांमुळं हे घडतंय, हे बहुतांश लोकांच्या लक्षातही येत नाही.

“हव्यात कशाला ढीगभर पणत्या? दारात लावायला दोन पणत्या पुरे झाल्या. ” असं म्हणणाऱ्या गृहलक्ष्मीनं स्वत:चा चारखणी वाॅर्डरोब उघडून त्याचं ऑडीट करावं आणि मग पुढची प्रत्येक साडी खरेदी करताना “हवेत कशाला ढीगभर कपडे? ” असं म्हणावं. जमेल का?

एका ग्राहकरूपातल्या गृहलक्ष्मीला समोरच्या विक्रेतीमधली गृहलक्ष्मी दिसू नये, हे स्वत:च्याच कोषात गुरफटून गेलेल्या कमालीच्या असंवेदनशील व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे.

मंडई- तुळशीबागेपासून खरेदी सुरू होते, तेव्हा पाकीट लहान असतं, तिथल्या वस्तू महागड्या वाटतात. पुढं बेलबाग चौकातून डावीकडे वळलं की, तेच पाकीट प्रत्येक पावलागणिक आकारानं मोठं-मोठं व्हायला लागतं आणि खरोखरच्या महागड्या गोष्टीसुद्धा स्वस्त वाटायला लागतात. हा केवळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीतला खेळ नाही, हा माणसांच्या जगण्याविषयीच्या अस्पष्ट आणि अंधुक कल्पनांचा खेळ आहे.

एक जुना प्रसंग सांगतो. जोगेश्वरीच्या बोळात एक विक्रेता मेणाच्या उष्णतेवर चालणाऱ्या पत्र्याच्या बोटी विकत होता. मला त्या बोटी हव्या होत्याच. मी त्या निवडून घेत होतो. एक तरूण वडील आपल्या मुलाला घेऊन आले. त्यांना एक बोट हवी होती.

“केवढ्याला दिली रे?”

“साठ रूपये साहेब.”

“साठ? अरे, खेळणं विकतोस की खरी बोट विकतोस? ”

“खेळणंच आहे. ”

“साधी पत्र्याची तर आहे. माझ्या लहानपणी पाच रूपयांना मिळायची. आता साठ रूपये? वीस ला दे. ”

“साहेब, माझी खरेदीच चाळीस रूपयाची आहे. वीस ला कशी देऊ? ”

तेवढ्यात त्यांच्या लहान मुलानं सूर लावला. “पप्पा, मला प्ले स्टेशन देणार होतात तुम्ही. मला हे नकोय. हे एकदम थर्ड क्लास आहे. ”

“चल. देतो तुला प्ले स्टेशन. ”

बाप-लेक निघून गेले. तीस हजार रूपयांचं प्ले स्टेशन घेताना त्यानं पाचशे रूपयांत मागितलं असेल का? “आमच्या वेळी तर असलं काहीच नव्हतं. म्हणून दे आता फुकट. ”असं म्हटलं असेल का त्यानं? नक्कीच नाही. तो काय, कुणीच असं म्हणणार नाही.

“दादा, हे गिऱ्हाईक दुसऱ्यांदा येऊन गेलं बघा. नुसतंच बघून भाव करून जातो. खरेदी तर करत नाही. ” मी निरूत्तर होऊन त्याचा निरोप घेतला. पण तो मुद्दा मनात राहिला तो राहिलाच.

डाॅ. कलामांनी एकदा प्रश्न विचारला होता, “जगातली सगळ्यात मोठी समस्या कोणती? ” त्यावर एका लहान मुलीनं उत्तर दिलं होतं, “गरिबी. ” त्या मुलीचं उत्तर किती खरं होतं, याचा प्रत्यय दरवर्षी दिवाळी आली की येतो. सणासुदीच्या वस्तू, ज्याला आजकाल ‘सिझनल्स’ म्हणायची पद्धत आहे, ती बाजारपेठ ही खरं तर आपल्या देशातली एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. पण अन्य व्यवसायांच्या चकचकाटात तिची गर्भश्रीमंती आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. या बाजारपेठेचे विक्रेते शालेय शिक्षणाच्या दृष्टीनं अडाणी असतीलही पण भारतीय मनांचं आणि सश्रद्धतेचं मर्म त्यांना अचूक उमगलेलं आहे. त्यांना या गोष्टींना ब्रॅन्डचं रूप देता आलेलं नाही, ही गोष्ट खरी आहे पण त्याचं कारण कदाचित या बाजारपेठेचं असंघटित असणं हेही असू शकेल. त्यामुळे तो दोष माणसांचा नाही, असलाच तर तो चुकीच्या धोरणांचा आहे आणि कोरोनाच्या सावटाखालच्या या दिवाळीत तर त्याचा रंग अधिकच ठळकपणे दिसतो आहे.

वडापाव विकणारा, चहा विकणारा आणि झेंडूची फुलं विकणारा असे तीन विक्रेते एकाच रस्त्यावर शेजारी शेजारी उभे राहून व्यवसाय करतायत. त्यात वडापावच्या भावाची घासाघीस होत नाही आणि चहाचीही होत नाही. पण झेंडूची फुलं विकणाऱ्याशी मात्र जवळपास प्रत्येकजण घासाघीस करतो, हुज्जत घालतो. गजरे विकणाऱ्यानं दहा रूपये असं म्हटलं की, ‘पन्नासला सहा देतोस का? ’ असं दहापैकी नऊपण विचारतातच. पण वीस-पंचवीस वडापाव खरेदी करूनही ते वडापाव विक्रेत्याला हा प्रश्न अजिबात विचारत नाहीत, पैसे देतात. तसं पाहिलं तर, दोघेही रस्त्यावरचेच विक्रेते. मग हा फरक का?

फरक विक्रेत्यात नाही, फरक आपल्या दृष्टीकोनात आहे. आपल्याला स्वत:ला बदलावंच लागेल..!

 

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मानसिक डाएट – लेखक : अनामिक  ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

☆ मनमंजुषेतून ☆ 

☆ मानसिक डाएट – लेखक : अनामिक  ☆ प्रस्तुती –  अंजली दिलीप गोखले ☆

मानसिक डाएट

ही कन्सेप्ट जरा नवीन आहे, पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे.

 

म्हणजे बघाना,

आपलं वजन वाढतं,  

फिगरवर परिणाम होतो,

बीपीच्या गोळ्या सुरु होतात,  

शुगर डिटेक्ट होते.

किंवा कधी कधी स्वत:ची आगाऊ काळजी म्हणुन सुद्धा.. किंवा कधी कधी तर चक्क फॅशन म्हणुन आपण डाएट करायचा प्रयत्न करतो.

 

हे सगळ करतं असताना आपण आपल्या मानसिक आरोग्या कडे पुर्णपणे दुर्लक्ष करतो.

मी नेहमी सांगत असतो की 

“तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो” 

आपल्या मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का? जेवढी शरीराला आहे.

आपण जागृत व्हायला हवंय!

 

“इथे मानसिक डाएट प्लॅन करून मिळतील“… असे बोर्ड्स अजुन दिसले नसतील ना मार्केटमधे; 

अवघड आहे असं होणं,

 

मानसिक डाएट म्हणजे काउंसिलिंग नव्हे.

मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल!

हल्ली सगळ्यांना सगळं कसं टेस्टी लागतं स्वत:च तोंड कडू का असेना,

पण लाईफ मधे स्पाईस महत्वाचा आहे बाॅस!

स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते. 

मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते.  

– – तर मानसिक डाएट  म्हणजे काय करायचं तरं आपले विचार आधिकाधीक फिल्टर्ड कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा,

 

– – तेलकट-तुपकट म्हणजे फडतुस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही,

– – अती-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसर्याला विसरुन जाणारे विचार आपण जवळ येऊ देणार नाही.

– – दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु. 

– – दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकून देऊ

– – आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ.

 

या अशा मूल्यशिक्षणाबरोबरच महत्वाचं आहे ते म्हणजे – – 

– – स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक ओळखून स्वत:ला “रीझनेबल” बनवणं,

– – दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं,

– – दुसर्‍यांना वेळ देणं, संवाद चालू ठेवणं. 

– – मनातलं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं,

– – एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं 

… आणि बरंच काही.

 

या सगळ्यातला समतोल हरवला ना की आपल्या नात्यांना अपंगत्व येणारंच 

आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही म्हणुन मनाला कायमची बेडरेस्ट पण मिळू शकते.

 

माणुस आहे, मनं पण थकतं हो कधीकधी,

– – त्याला इंस्टंट एनर्जी मिळते ती फक्त एक कप काॅन्फिडन्सच्या चहाने, आत्मविश्वास! ! !

 

सगळ्यात महत्वाचं कि आपल्या डाएट चे साईड इफेक्ट्स खुप मस्त असतात.

– – लोकं प्रेमात पण पडु शकतात तुमच्या.

– – तुमच्या चेहर्‍यावरचा ताण कमी होतो,

– – तुम्ही यंग वाटू लागता, टेंन्शन कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच हलकं होतं.

 

… वास्तविक, मन ओके असेल तरचं लाईफ ओके असतं, नाही कां?

 

असं ह्या डाएट चं व्रत – – 

– – हे आजच्या सॅन्डविच जीवनशैली मधे एक संजीवनी देईल हे नक्की.

– – साध्या आणि ताज्या विचारांच सॅलड आपली नक्की काळजी घेईल.

– – शाकाहारी विचार बेस्ट लाईफ देऊन जातील.

 

बदल हा नेहमीच चांगला असतो.

असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकतं आहे ना?

– – – कारण गुगलवर “एव्हरेस्ट” बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघण्यातं जास्त मजा आहे 

आणि त्या एव्हरेस्टवर जायला आपलं मनच खरी ताकद देणार आहे..

 

लेखक : अनामिक 

प्रस्तुती : अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पत्रास कारण की…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“पत्रास कारण की… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

 

 Capt. Amol Kalia,

 12, JAK LI

 02, June, 99

प्रिय आई आणि बाबा! चरणस्पर्श!

मी इथं छान आहे आणि तुम्ही सर्व छानच असाल अशी आशा करतो. मी २८ मे रोजी तुमच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही सर्वजण माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेल्याचे समजले.

मी २९ तारखेलाच इथं पोहोचलो. इथं सर्वकाही आलबेल असून तुम्ही माझी काहीही चिंता करू नका.

मी बहुदा या महिना अखेरीस दिल्लीत परतेन. तुम्हांला माझ्या लग्नाची घाई झालेली असेल तर, मी दिल्लीत आल्यावर तुम्ही माझं लग्न ठरवू शकाल! अ

आता मला तुम्हांला फोन करणे शक्य होणार नाही, मी पत्रं लिहित राहीनच. मनूदादा आणि वहिनीला माझा नमस्कार सांगा. त्यांचा कुठं आणि कधी फिरायला जाण्याचा बेत आहे?

 तुमचा,

 अमोल

पंजाबातील रोपड जिल्ह्यातल्या नांगल गावात २६ फेब्रुवारी, १९७४ रोजी जन्मलेले अमोल कालिया पुढे भारतीय सैन्यातील JAK.. JAMMU AND KASHMIR LIGHT INFANTRY दलात प्रवेश करीत पुढे कॅप्टनपदी पोहोचले. श्री. सत्पाल आणि श्रीमती उषा कालिया यांच्या पोटी जन्मलेल्या अमोल यांच्या धाकट्या भावानेही, अमन कालिया यांनीही भारतीय वायू दलात प्रवेश मिळवला होता. एकाच कुटुंबातील दोन सुपुत्र भारतमातेच्या रक्षणार्थ तैनात होते. १९९९.

पाकिस्तानने कारगिल पर्वत परिसरातील भारतीय सैन्यचौक्या कपटाने ताब्यात घेऊन तिथवर पोहोचू पाहणा-या भारतीय रसद वाहनांवर वरून अचूक हल्ले करायला प्रारंभ केला. बटालिक नावाच्या परिसरातील सुमारे १७०० फूट उंचीचा पर्वत पाकिस्तानी सैन्याने बळकावला होता. तेथून त्यांना खाली गोळीबार करणं अगदी सहज शक्य होत होतं. त्यामुळे आपल्या सैन्याच्या वाहनांचे खूप मोठे नुकसान झाले होते. शत्रूला तेथून हुसकावून लावणे अनिवार्य झाले होते. पण यासाठी पर्वतांवर चढून जाऊन लढाई करू शकणा-या सैनिकांची आवश्यकता होती.

कॅप्टन अमोल नेमके याचवेळी त्यांच्या सैन्यासह चंडीगढ येथे पोहोचले होते आणि पुढे त्यांना आराम करण्यासाठी शांतता क्षेत्रात पाठवले जाणार होते. पण एवढ्यात युद्ध पेटल्याने त्यांची सुट्टी रद्द झाली आणि त्यांच्या दलाला कारगिलमध्ये तातडीने बोलावून घेण्यात आले. कारण त्यांची J. A. K. L. I. डोंगर-द-यांत लढण्यासाठी प्रशिक्षित केली गेली होती. कॅप्टन अमोल कालिया तर पट्टीचे गिर्यारोहक आणि सैनिकी नेता होते… ते तातडीने युद्धक्षेत्राकडे निघाले. त्या दिवसाच्या आधी कॅप्टन साहेबांनी वर उल्लेख केलेले पत्र त्यांच्या घरी पाठवण्यासाठी संबंधित संपर्क यंत्रणेकडे सोपवले होते.

७ जूनच्या मध्यरात्री कॅप्टन अमोल कालिया यांच्या मातोश्री अचानक जाग्या झाल्या… त्यांनी त्यांच्या पतीला, जे सेवानिवृत्त शिक्षक होते, झोपेतून हलवून जागे केले… म्हणाल्या, ”आपल्या मुलांची खूप आठवण येते आहे… हे दोघेही ठीक असतील ना? ” कालिया सरांनी आपल्या पत्नीची कशीबशी समजूत काढली!

कालिया साहेबांच्या कुटुंबियांना हे पत्र ९ जून रोजी मिळाले… आणि एक अत्यंत धक्कादायक बातमी!

इकडे कारगिलमध्ये ७ जूनचा दिवस बुडाला मध्यरात्र झाली… ८ जून सुरु झाला… पहाटेचे तीन वाजले होते. कॅप्टन अमोल कालिया आपल्या १३ सैनिकांना सोबत घेऊन तो १७ हजार फुटांचा पर्वत चढू लागले. अंधार, बर्फाळ वाट आणि प्रचंड थंडी… खडा पहाड… एक एक पाऊल वर चढत सैन्य आगेकूच करीत होतं. काही वेळातच वर आरामात बसलेल्या शत्रूला यांची चाहूल लागली… आणि… पाकिस्तानी सैन्याने वरून यांच्यावर तुफान गोळीबार आरंभला. याही वादळी गोळीबारात कॅप्टन अमोल थांबले नाहीत… ते सर्वांच्या पुढे होते… शत्रूच्या अगदी जवळ पोहोचलेही होते… त्यांच्या सैनिकांपैकी LIGHT MACHINE GUN मधून गोळीबार करणारा सैनिक धारातीर्थी पडल्यावर कॅप्टन साहेबांनी स्वत: त्या GUNचा ताबा घेत तीन पाकिस्तानी सैनिक ठार मारले… आणि तितकेच जखमी केले!

सकाळी ९ वाजेपर्यंत हा संघर्ष सुरु राहिला… कॅप्टन साहेबांच्या तुकडीत असलेल्या १३ पैकी १० सैनिकांनी… हवालदार राजिंदर सिंग, नाईक पवन कुमार, लान्स नाईक लियाकत अली, लान्स नाईक मोहमद खान, रायफलमन दर्शन लाल आणि अब्दुल सलाम दार, रविंदर सिंग, ईश्तीयाक अहमद यांनी सर्वोच्च बलिदान दिले होते… आणि हवालदार कर्तार सिंग आणि रायफलमन तर्सैम लाल प्राणांतिक जखमांनी विव्हळत पडले होते… स्वत: कॅप्टन साहेबही प्रचंड जखमी झालेले होते… तरीही त्यांनी गोळीबार थांबवला नाही. पाकिस्तानी सैन्य यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक संख्येने आणि मोक्याच्या जागी होते… त्यांचे नेम चुकत नव्हते! कर्तार सिंग आणि तर्सेम लाल काही वेळातच देवाघरी गेले आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे नेतृत्व करणारे बहादूर कॅप्टन अमोल कालिया साहेबही. साहेबांच्या मातोश्रींना पडलेले स्वप्न अशा रीतीने खरे झाले होते… त्यांनी त्यांचा सुपुत्र गमावला होता! भारतीय सैन्याला हा एक मोठा धक्का होता. पुढे आपल्या इतर सैनिकांनी आणखी बलिदाने देत हा ५२०३ बटालिक पर्वत २१ जूनला जिंकून घेतला! आणि यामुळे भारताची लढाई आणखी परिणामकारक होण्यात साहाय्य झाले!

पुढे १३ दिवस या वीरांचे मृतदेह कारगिलच्या त्या पर्वतांवर पडून होते… पाकिस्तानी सैन्याच्या तोफांच्या मा-यामुळे हे मृतदेह खाली आणणे अशक्य झाले होते! पुढे युद्ध थांबल्यावर हे काम करण्यात आले… तोवर कालिया कुटुंबीय प्रतीक्षेत राहिले… आपल्या मुलाच्या मृतदेहाची वाट पाहण्यासारखी कठीण गोष्ट जगात अन्य नसावी… त्यांच्या पार्थिवाला खांदा देत त्याच्या चितेला अग्निडाग देणे तर महाकठीण. वीरपिता श्री. सत्पाल सिंग यांनी हे कर्तव्य पार पाडले. वीरमाता उषा यांनी आपल्या लाडक्या लेकाला अंतिम मानवंदना दिली… त्याच्या विवाहाचे स्वप्न त्यांच्यासमोर चितेवर जळत जळत भस्म झाले! देशाने कॅप्टन अमोल कालिया यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करून त्यांच्या शौर्याला वंदन केले!

कारगिल युद्धात कालिया आडनावाचे दोन सैनिक भारताने गमावले… आधी कॅप्टन सौरभ कालिया आणि नंतर कॅप्टन अमोल कालिया. या अधिकारी आणि सैनिकांच्या बलिदानांच्या पायावर आजची आपली स्वातंत्र्याची इमारत भक्कमपणे उभी आहे… आपण स्वतंत्र श्वास घेतो आहोत! आज २ जून, २०२६. कॅप्टन साहेबांनी त्यांच्या माता-पित्यांना लिहिलेल्या पत्रास सत्तावीस वर्षे पूर्ण झालीत… पत्र आलं… पण कॅप्टन साहेब हुतात्मा होऊन स्वर्गाकडे प्रयाण करते झाले!

(कारगिल स्मृती.).

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जावईबापूंचे प्रकार – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ जावईबापूंचे प्रकार – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

आपल्याकडे जावईबापूंचे साधारणपणे पाच प्रकार सांगितले जातात… ते पुढीलप्रमाणे:

१) साखऱ्या जावई

साधारणत: २% जावई या प्रकारात मोडतात. हे जावई १०० कि. मी. पेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्यामुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जात-येत असतात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडे-लत्ते देवून त्यांचा मानपान होत असतो. चांगलीच बडदास्त असते यांची, ‘कुठे बसवू अन् कुठे उठवू? ‘ अशी अवस्था सासरच्या मंडळींची होत असते, म्हणून यांना ‘साखऱ्या जावई’ असं म्हटलं जातं. जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे…

२) भाकऱ्या जावई

या प्रकारात ९५% जावई मोडतात. हे जावई सासुरवाडीच्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर/वारंवार जात-येत असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई-बाबांची आठवण आली तर तिच्या सोबतसुध्दा जावे लागते. यांचे जाणे-येणे नेहमीचे असते, त्यामुळे या जावयांना जेवणासाठी जो घरात स्वयंपाक केलेला असतो, तोच वाढला जातो. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते… हे नेहमीचेच आहेत, ‘नित उठे, अन् कपाळ बसे. ‘ या म्हणीतल्या उक्तीप्रमाणे. म्हणून यांना काही खास मानपान नसतो, म्हणून यांना ‘भाकऱ्या जावई’ असं म्हटलं जातं.

३) ढोकऱ्या जावई

या प्रकारात २% जावई मोडतात. हे ‘घरजावई’ असतात. या जावयांना घरात पाणीसुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दूध अशा वस्तूसुध्दा आणून द्याव्या लागतात. झाडलोटीची कामे पण करावी लागतात. घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस तरी यांचा अपमान नक्कीच केला जातो. म्हणून यांना ‘ढोकऱ्या जावई’असं म्हटलं जातंय.

४) दयावान जावई

हे जावई सासरच्या लोकांना कायम मदत करीत असतात. बायकोचं ऐकतात, शालकाला उसने पैसे देतात. सासरची मंडळी त्यांना कायम गोड-गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढवून चांगलेच लुटतात. हे एक-दोन वर्षातून सासरी येत-जात असतात, त्यावेळी त्यांच्याकडे आजूबाजूचे लोक सहानुभूतीपूर्वक बघतात. म्हणून यांना ‘दयावान जावई’ असं म्हटलं जातंय.

५) बेरकी जावई 

हे दूर असोत किंवा जवळ ते सासुरवाडीला जातच नाहीत अन् गेलेच तर त्यांना हवं तेच जेवायला करावं लागतं, तेवढं करूनही ते गोड काही बोलत नाहीत, तुसडेपणाने वागतात, म्हणून यांना ‘बेरकी जावई’ असं म्हटलं जातंय.

शेवटी आपल्या पूर्वजांनी अर्थात आपल्या माता-भगिनींनी ‘जात्यावरच्या ओवीत’ म्हटलंच आहे, की

(१)

जावाई, जावाई नको करू तू मायबाई,

जिन्ही वं दिधा जन्म, तिना तिले झाया नही.

(२)

जावयाची जात फार बेईमान सांगती,

‘लक्ष’ गं केलं दान, तरी माझ्या ‘ताई’ ला गांजती.

शेवटी जावयाच्या महिमेचं कौतुक करतांना सासुबाई म्हणतात,

“शंभर ब्राह्मण, एक जेवाले जावाई,

म्हणून ‘दादासले’ पुण्य काशीतून सवाई. “

आता तुम्हीच ठरवा आपण स्वत: कोणत्या जावईबापूंमध्ये मोडतात ते…  

या समूहातील सर्वच धोंडोपंतांना आहे धोंड्याच्या महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (या सदरातील अखेरचा भाग)

माझ्या अजाण वयापासूनच्या विविध टप्प्यांवरचे हे सगळे अनुभव ‘त्या’चा कृपालोभ म्हणजे काय याची पुन्हा नव्याने प्रचिती देणारे साक्षात्कारच होते माझ्यासाठी!

‘देव’ ही मानवनिर्मित संकल्पना आहे. तो अस्तित्वातच नसतो. तो आहे असं मानणं हा एक भ्रम आहे’ असं आग्रहाने सांगणाऱ्यांची भूमिका माझं वय वाढत गेलं तसं अनेकदा ऐकता, वाचताना माझ्या मनात संभ्रम नाही पण प्रश्न मात्र निर्माण करायचीच. पण त्या प्रश्नांची उत्तरं अट्टाहासानं लगेचच मिळवावीत आणि ती टोकाची मते खोटी ठरवावीत अशी असोशी माझ्या मनात कधी निर्माण झाली नाही तरी त्यातलं तथ्य समजून घ्यावं असं, माझं वाचन वाढत गेलं तसं मला मनापासून वाटू लागलं हेही खरंच. हे समजून घ्यावं असं वाटणंच पुढे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात असणारी पुसटशी अंधूक रेषा माझ्यापुरती अधिकाधिक ठळक व्हायला निमित्त झाली. अर्थातच हे सगळं एका क्षणात घडून गेलेलं नाही. तरीही ते घडायला निमित्त झालेले एक एक क्षण मात्र मी समतोल मनाने स्वीकारल्यामुळे माझ्यासाठी ते हितकारक ठरले एवढं मात्र नक्की. या संदर्भातला एक प्रतिनिधिक अनुभव पुढे लिहिण्याच्या ओघात येईलच.

सुरुवातीच्या माझ्या अनुभवांबद्दल यापूर्वी सविस्तर लिहिल्याप्रमाणे माझ्या नकळत्या अजाण वयातच माझ्या बालमनात आजुबाजूचं वातावरण आणि घरातले संस्कार यामुळे माझ्याही नकळत ‘त्या’ची प्रतिष्ठापना झालेली होती! त्याची जाणिव अर्थातच पुढे आयुष्यातल्या कसोटी पहाणाऱ्या असंख्य प्रसंगांमध्ये हळूहळू दृढ होत गेली.

माझ्या मनातलं ‘त्या’चं हे आश्वासक अस्तित्व माझ्या आजवरच्या जीवनप्रवासातला माझा श्वासच कधी आणि कसं बनलं ते मलाच समजलं नव्हतं! तोच श्वास पुढे माझी घुसमट व्हायची वेळ आलेल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात माझ्यासाठी संजीवक ठरत असायचा! !

‘श्रध्दा’ म्हणजे तरी वेगळं काय असतं? ‘तो’ आहे हा मनोमन असणारा ठाम विश्वास म्हणजेच तर श्रध्दा! ‘देव’ आहे की नाही हा संभ्रम माझ्या मनात निर्माण व्हायची वेळ जशी कधीच आली नाही तसेच ‘तो’ आहे हे इतरांना अट्टाहासाने पटवून द्यावे असंही मला कधी वाटलं नाही.

खरंतर देवाचं अस्तित्व मानणं किंवा न मानणं हा माझ्यापुरता मी ज्याचा त्याचा प्रश्नच मानला. म्हणूनच असेल कदाचित पण जवळचे अनेक मित्र आणि नातेवाईक नास्तिक असूनही आमचे परस्परसंबंध सलोख्याचेच राहिले. किंबहुना माझ्या मनातली श्रद्धा तिच्यावर अंधश्रद्धेची सावली पडू न देता अलवारपणे जपणं मला त्या सर्वांमुळेच सुलभ झालं असं मला मनापासून वाटतं.

माझ्या मनातल्या या श्रद्धेचं एरवीच्या दैनंदिन जीवनात मला कधीच प्रदर्शन करावं असं वाटलं नाही. कारण माझी श्रध्दा ही माझ्या हाडामांसासारखीच एक नैसर्गिक गोष्ट आहे असंच मला वाटायचं. त्यात आवर्जून मिरवावं असं वाटण्याचा प्रश्नच नव्हता.

मी जसा कधी कर्मकांडात रुतलो नाही तसंच माझ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यं हेच माझे सतत प्राधान्यक्रम राहिले. त्यामुळे अट्टाहासाने अध्यात्मिक ग्रंथांचं वाचन आवर्जून करावं अशी ओढ मला असोशीने कधी वाटलीच नाही. त्यांचं वाचन झालं ते केवळ गरजेनुसार संदर्भ पहाण्यापुरतंच. तरीही लेखनाइतकीच मला वाचनाचीही आवड होती आणि त्या वाचनात नकळत आलेल्या विविधतेमुळे मी त्या त्या वेळी आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त झालो हे आवर्जून सांगायलाच हवं!

अगदी योगायोगाने वाचनात आलेलं ‘साद देती हिमशिखरे’ हे श्री जी. के. प्रधान यांचे पुस्तक मला प्रभावित करून गेले होते. श्री. हिराभाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ आणि ‘मृत्यूचे महात्म्य’ या पुस्तकांनी अतिशय मौलिक असं जगण्याचं आणि मृत्यूचंही महत्व मला समजून सांगितलेलं होतं. श्री. संजय पंडित यांच्या ‘मनाचे व्यवस्थापन’ या पुस्तकाने माझ्या मनातली श्रद्धा तपासून पहायला मला प्रवृत्त केले आणि पुढेही माझ्या विचारांना योग्य दिशा देण्याचे कामही केले. श्री नरेंद्र दाभोळकरांच्या ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’, ‘भ्रम आणि निरास’, ‘उच्चाटन अंधश्रद्धेचे’ यासारख्या पुस्तकांनीही माझ्या मनातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या दरम्यान असणारी पुसट रेषा अधिक ठळक केली. हे सगळंच मला समृध्द करायला निमित्त ठरलेलं आहे!

श्रद्धेवर नकळत पडणारं अंधश्रद्धेचं सावट हळूहळू अधिक गडद होत जाण्याची प्रक्रिया सद्सदविवेकाच्या टोचणीनंतरही आपण सजगतेने थोपवू शकलो नाही तर मनातली श्रद्धा प्रदूषित व्हायला आपोआपच सुरुवात होते. हे अशिक्षितांच्या बाबतीतच नाही तर शिकलेल्या, सुजाण म्हणवणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीतही नकळत कां होईना पण सर्रास घडत असते. यासंदर्भातला माझा एक अनुभव आवर्जून सांगायलाच हवा असं मला वाटतं. तो तसा अगदी साधाच अनुभव पण आपली त्याकडे पहाण्याची दृष्टी स्वच्छ असली तर साध्या साध्या गोष्टीही आपल्याला बरंच कांही शिकवून जातात याचा प्रत्यय देणारा!

माझं पोस्टिंग कोल्हापूर ब्रँचला होतं तेव्हाचा हा प्रसंग. साधारण १९७८-७९ दरम्यानचा. तिथे एकात एक अशा तीन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत आमचं बि-हाड होतं. रोजची देवपूजा म्हणजे फुले हवीतच. त्याशिवाय पूजा कशी पूर्ण होणार? हाच विचार तेव्हाच्या अननुभवी वयात माझ्या मनात खोलवर रुजलेला होता. आणि ती जागाच अशी होती की निदान एखाद्या कुंडीत फुलझाडाचं रोप लावावं एवढीही जागा घराभोवती कुठे नव्हतीच. त्यामुळे पूजेसाठी फुलपुडी लावण्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि त्यात मला कांही गैरही वाटलं नव्हतं. फुलवाला पहाटेच कधीतरी फुलपुडी आणून शटरमधून आत टाकून जायचा. त्यामुळे सकाळी उठल्यावर चूळ भरुन मी आधी फुलवाल्याने टाकलेली ती फुलपुडी आत आणून ठेवायचो. रोजच्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी ती फुलपुडी आत आणायला मी गेलो तर मला ती कुठे दिसेचना. नीट पाहिल्यावर लक्षात आलं की ती फुलपुडी बंद दाराच्या जवळच ठेवलेल्या छोट्या शूज स्टॅंडवरच्या माझ्या बुटाच्या खाचेत पडलीय. मी नाराज झालो. पण तरीही ती फुलपुडी उचलून आत आणली आणि त्या फुलांवर पाणी शिंपडून फुलं तबकात नेऊन ठेवली. आंघोळ आवरून पूजेला बसलो. देव पुसून ताम्हनात ठेवले. गंध लावलं. आणि नेहमीच्या सवयीनं देवाला वाहण्यासाठी तबकातली फुले हातात घेतली. आणि… क्षणभर थबकलो. ती फुलं देवाला वाहावीत असं वाटेचना. हातातली फुलं तशीच परत तबकात ठेवली. देवाला फक्त हळद-कुंकू वाहिलं आणि निरांजन लावून नैवेद्य दाखवला. कांहीतरी निसटून गेल्याची रुखरुख मात्र मनात होती पण क्षणभरच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली पुसट रेषा ओळखण्याचा तो क्षण होता. एरवी बुद्धीमुळे भ्रम होतो म्हणतात. पण माझ्या बुद्धीनेच त्या क्षणी ती रेषा नकळत ओलांडू पहाणाऱ्या माझ्या मनाला सावरलं. योग्य आणि अयोग्य यांच्यातल्या फरकाची नेमकी जाणीव करून दिली. पूजेला फुलं न मिळाल्याने मनाला झालेली नाराजी बुद्धीनं अलगदपणे दूर केली. हे अयोग्य आहे हे पटवून दिलं. केवळ उपचारापेक्षा शुचिर्भूतता महत्त्वाची आहे हे समजावून सांगितलं. आणि मग मनातली रुखरुख विरून गेली. मन शांत झालं. मी अलगद डोळे मिटले. हात जोडले. आणि अतिशय नम्रपणे ‘त्या’ला सांगितलं,.. ‘देवा, आता उद्यापासून तुझी रोजची पूजा ही अशीच. जेव्हा केव्हा माझ्या दारात एखाद्या लहानशा कुंडीत कां असेना पण चार-दोन फुलं फुलतील तेव्हाच मी ती तुला वाहिन. “

पुढे जवळजवळ पंधरा- सोळा वर्षांनंतर १९९३ साली आम्ही सांगलीतल्या गावभागातल्या आमच्या स्वतःच्या फ्लॅटमधे रहायला गेलो तेव्हा बाल्कनीतल्या कुंड्यांमधे निशिगंध लावला. आवर्जून लावलेल्या निशिगंधाला लगडलेल्या शुभ्र सुवासिक फुलांची ओंजळ भक्तियुक्त अंत:करणाने मी जेव्हा ‘त्या’च्या चरणी प्रथम वाहिली, तेव्हा मनाला स्पर्शून गेलेली सुखसंवेदना माझ्या मनाला आत्यंतिक उल्हसित करुन गेली होती!

२००६ पासून आम्ही हरिपूर रोडवरील ‘त्रिदल’ या आमच्या नवीन वास्तूत रहायला आलो. आता सभोवतालच्या प्रशस्त बागेत विविध रंग, रूप, वासांच्या फुलांनी दोन-तीन मोठ्या परड्या तुडुंब भरतील एवढी फुले रोज मिळतात आणि तेवढीच झाडावेलींवर शिल्लकही असतात. त्या ताज्या टवटवीत फुलांचे वाटे कितीतरी परिचितांच्या घरच्या देवघरांमधल्या आणि जवळच्या मंदिरामधील ‘त्या’च्यापर्यंत रोज पोचतात आणि कृतार्थता म्हणजे काय याचा अर्थ यथार्थपणे मनाला स्पर्शून जातो! देणाराही तोच असतो आणि घेणाराही तोच! पण त्यात आपलं असं निमित्तमात्र असणंही किती सुखदायी असतं याच्या अनुभव मला रोज नव्याने येतो आहे! !

‘त्या’ला एकदा मनोमन मानल्यानंतर नकळत सुरू झालेल्या ‘त्या’ला जाणण्याच्या प्रक्रियेतील या सगळ्या वाटा आणि वळणे! या प्रवासात या प्रत्येक टप्प्यावर ‘तो’ माझ्याबरोबर असायचाच. त्यामुळे अनेकांना पडतात तसे ‘तो कोठे आहे? ‘ ‘कसा आहे? ‘ हे प्रश्न मला कधीच पडायचे नाहीत. ‘तो’ आहे हेही माझ्यापुरतंच असायचं! इतरांनीही ते स्वीकारावं असं मला कधीच वाटलं नाही. मी माझ्याही नकळत जीवनाचं गणित सोडवण्यासाठी माझ्या नकळत्या वयापासून ‘त्या’चं असणं हे असं एक गृहीतच मानत आलो. आज हे गृहीत चुकलेलं नाहीय याची आजवरच्या अनुभवांती मला पूर्ण खात्री पटल्यानंतर आपल्या जीवनाचं गणित अचूक सुटणार याचा पूर्ण विश्वास मला वाटतो आहे!

‘तो’ माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्याच मनामनात अंश रुपाने असतोच. म्हणूनच ‘त्या’ला अंतर्यामी म्हणतात ना? ‘त्या’चं रंगरुप त्या प्रत्येकाच्या श्रध्दा आणि विचारांनुरुप वेगवेगळं असतं एवढंच. त्या वेगवेगळ्या रुपातला ‘तो’ प्रत्येक आस्तिकाच्याच नव्हे तर नास्तिकाच्या मनातही असतोच. त्यातील कुणाला त्याची जाणिव असो वा नसो. केवळ असा प्रत्येकाच्या अंतर्यामीच नव्हे तर चराचरातल्या प्रत्येक कणाकणात अंशरुपाने भरुनसुध्दा ‘तो’ वर अंगुलीभर उरतोच! !

‘त्या’च्याच साक्षीने मी माझ्या मनातल्या ‘त्या’चा आजवर घेतलेला हा मागोवा!

 या निमित्ताने माझ्या ओंजळीत साठलेली ही सगळी सुगंधी शब्दफुले मी आज अतिशय विनम्र आणि कृतज्ञभावाने ‘त्या’च्याच चरणी अर्पण केलीयत हीच भावना याक्षणी माझ्या मनात आहे!

 – पूर्णविराम –

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विश्वचषक फुटबाॅल 2026 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ विश्वचषक फुटबाॅल 2026 ☆ अमृता देशपांडे 

फिफा (FIFA) फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबाॅल असोसिएशन ही विश्वचषक सामने खेळवणारी संस्था आहे.

हे विश्वचषक सामने दर चार वर्षांनी खेळले जातात.

या वर्षी 11जून ते 19 जुलै 2026 या दिवसात खेळले जातील. हे सामने कॅनडा, मेक्सिको, आणि युनायटेड स्टेट्स् येथे खेळले जाणार आहेत. कॅनडामध्ये प्रथमच सामना होतो आहे. 1998 पासून 32 देशातले खेळाडू भाग घेत होते. 2026 ला 48 देश क्वालिफाय झाले आहेत. एकूण 104 सामने खेळले जातील.

काबो वेर्दे, कुरकाओ, जाॅर्डन आणि उझबेकिस्तान हे चार संघ प्रथमच भाग घेत आहेत. युकेचे इंग्लंड आणि स्काॅटलंड हे दोनच संघ सामील होतील.

48 संघ सोळा भागात विभागून सामने खेळले जातील. अंतिम निर्णायक सामना न्यू जर्सी (अमेरिका) येथे मेटलाईफ स्टेडियमवर 19 जुलैला खेळला जाईल. 2022 वर्षी अर्जेंटिना व फ्रान्स यांच्यात अंतिम सामना खेळला गेला, तो अर्जेंटिनाने जिंकला होता.

पहिला विश्वचषक फुटबाॅल सामना 1930 साली उरुग्वे येथे खेळला गेला. तेव्हा 13 संघांनी भाग घेतला होता.

यानंतर पुढच्या चार वर्षांनी म्हणजे 2030 ला हे सामने मोरोक्को, पोर्तुगाल, आणि स्पेन येथे खेळले जातील. 2030 हे वर्ष या विश्वचषक सामन्यांचे 100 वे वर्ष असेल. विश्वचषक शतकपूर्तीचा मान म्हणून यातील एक सामना उरुग्वेच्या ईस्तादियो सेंटेनरी स्टेडियमवर खेळला जाईल.

विजेत्याला सन्मानाने, गौरवाने देण्यात येणारा कप हा सुवर्णचषक असतो. तो 3. 5 फूट उंच आणि त्याचे वजन 6. 2 किलो असते. त्याची किंमत 15 मिलियन पौंड म्हणजे भारतीय चलनात करायची तर असते दीडशे करोड रुपये.

पण विजेते ही ट्राॅफी घेऊन जात नाहीत, ती स्वित्झर्लंडच्या FIFA म्युझियम मध्ये ठेवली जाते. विजेत्या प्रत्येक खेळाडूला ब्राॅन्झची प्रतिकृती दिली जाते.

खेळाडूंची धावण्याची शारिरीक क्षमता, स्थिर आणि बळकट मन, समान गोल असताना पुढचा गोल करण्यासाठी लागणारी सांघिक एकात्म शक्ती, विरुद्ध संघातला खेळाडू बाॅल कुठल्या दिशेने कुठे पास करतो त्याप्रमाणे बाॅल गोलपोस्टकडे ठोकणे याला शारिरीक हालचाली आणि मेंदूची अतिशय तत्परतेची क्षमता लागते, तसेच गोलरक्षकाची येणा-या बाॅलचा अंदाज घेण्याची ताकद, मांजरासारखी धारदार नजर, चित्त्यासारखी झप् कन उडी घेण्याची चपळता

आणि सर्वात महत्वाचे, प्रत्येक सामना आणि विश्वचषक जिंकण्याची प्रचंड आणि जबरदस्त इच्छा हेच खेळाचे वैशिष्ट्य!

खेळाडूंच्या बरोबरीने पळणारा रेफरी हा तर प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा आणि खेळातला महत्वाचा दुवा.

खोडकर, रागीट, पळताना पायात पाय घालून पाडणा-या खेळाडूला एका शिट्टीवर बाहेरचा रस्ता दाखवणारा मास्तरच!

टीव्हीवर सामना बघताना सरासर धावणारे खेळाडू, रेफरी, गोलरक्षक, मध्येच धडाडकन् पडणारे धावक आणि एकत्र आवाजाने आणि टाळ्यांनी प्रोत्साहन देणारे प्रेक्षक हा सगळा नजारा बघायला आणि सामन्याचा थरार अनुभवायला तयार राहूया.

लिओनेल मेस्सी, पेले, रोनाल्डो, डायगो माराडोना यांची आठवण करत, चला तर, 11 जून पासून विश्वचषक फुटबाॅल सामन्यांचा आनंद घेऊया.

©  अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टपरीवरचा चहा… भाग – २ ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ टपरीवरचा चहा… भाग – २ ☆ राधिका भांडारकर ☆

(चहा, पाऊस आणि कांदा भजी यांचं काय नातं असेल ते असो पण त्यात ब्रह्मानंद आहे नक्की. आम्ही “माऊली अमृततुल्य” चहाच्या टपरीजवळच आलो होतो. वंदना अगदी उत्साहात होती. “चल! चल! आता मस्त चहा पिउया. ”) 

इथून पुढे – – 

टपरीभोवती चहा-बाज लोकांची गर्दी होतीच. अनधिकृतपणे का असेना त्या भर गर्दीतही फुटपाथवरच समोरासमोर दोन बाके, बसून चहा पिणाऱ्यांसाठी होती. रस्त्यावरच्याच बोर्डवर खडूने चहाबाबतचा मेनु लिहिला होता किंमतींसह. गुळाचा चहा, साखरेचा चहा, बिनसाखर चहा, आलं गवतीचहा, वेलदोडा चहा वगैरे. फुल कप, हाफ कप, कटींग असेही शब्द वाचायला मिळाले. माझ्यासाठी खरोखरच हे सगळं अनोळखी, गंमतीदार होतं.

वंदना अगदी सराईतपणे त्या चहावाल्या जवळ जाऊन म्हणाली, “भैय्या दो कप कमशक्करवाली चाय दो. ” खरं म्हणजे चहावाला मराठी माणूसच होता पण वंदनाने कदाचित सवयीने त्याला “भैय्या” म्हटले असणार. या उत्तर प्रदेशीय लोकांचं वर्चस्व महाराष्ट्रात किती आहे हे सहज जाणवलं.

दणदण गॅस स्टोव्ह पेटलेला आणि त्यावर मोठ्या ॲल्युमिनियमच्या भांड्यात उकळणारा चहा. ऑर्डर प्रमाणे तो दूध, पाणी, चहाची पत्ती, काही आस्वाद वाढवणारे मसाले एकापाठोपाठ एक भराभर टाकत होता आणि एका डवल्याने ते सर्व मिश्रण खालीवर इतकं काही लयीत ढवळत होता की ते पाहताना माझ्या मनात सहज आलं, ” काम कुठलेही असो, कुठेही असो पण त्यातली तल्लीनता, एकाग्रता महत्त्वाची. शिवाय ग्राहकांची खुशी ही विक्रेत्यांच्या यशाची गुरू किल्ली! हेही जाणवलं चहाची ही टपरी नक्कीच लोकांची आवडती जागा असेल. काही लोक उभे होते. काही बाकावर बसले होते पण एक कपभर लज्जतदार चहासाठी त्यांच्यात असलेली थांबण्याची चिकाटी कौतुकास्पद होती. तिथे असलेल्या सर्वांसाठीच तो एक मस्त स्पेस टाइम होता. तिथे राजकारणावरच्या चर्चाही घडत होत्या. मतं मांडणारा प्रत्येक जण जणू काही त्या विषयात त्याच्या इतकं पारंगत कुणीच नव्हतं अशा अविर्भावात होता. घरापासून दूर वसतीगृहात राहणारे विद्यार्थी तिथे श्रमपरिहारासाठी थांबले होते. त्यांच्यात आगामी परीक्षांविषयी, शिक्षण पद्धतीविषयी, ऐकायला मिळत होतं. कुणाला सरकारी दिरंगाईमुळे हवी ती ओळखपत्रे मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भविष्याची काळजी होती. त्याच जमावात पुणं पाह्यला आलेले पर्यटकही होते. त्यातले काही ज्येष्ठ पूर्वीचं आणि आजचं पुणं यावर बोलता बोलता मानवाचं सारंच जीवन कसं यांत्रिक झालं आहे यावरची खंतही व्यक्त करत होते. मग विकास, पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, हरित वायू, जागतिक परिषदांपर्यंत ते युद्धांपर्यंत सर्व विषय घुसळले जात होते. या व्यतिरिक्तही अनेक विषय होते. ती केवळ चहाची टपरीच नव्हती तर एक भलीमोठी गाव चावडी होती असे मला वाटले. एक चालतं बोलतं मुक्त बातमीपत्रच म्हणाना. लोकशाही तत्त्वांचं प्रतीकच जणू काही!

इतक्या सर्वांसाठी चहा बनवणारा तो चहावाला मला खरोखरच एक महात्मा वाटू लागला. त्या चहातलं एकतत्त्व या वैविध्यपूर्ण, वेगवेगळ्या स्वभाव जाती धर्मातल्या जनसमूहात आनंदमयी होउन, उर्जा बनून एकवटलं होतं. वंदना मला सांगत होती, ” अगं! पुण्यातली ही “माऊली चहा टपरी” अनेक वर्षांपूर्वीपासून आहे बरं का? टपरीचं थोडंफार आधुनिकीकरण झालं असेल पण बाकी सारं अगदी ४०/५० वर्षांपूर्वी होतं तसंच आहे. चहाची चव सुद्धा बदललेली नाही. आता तिसरी चौथी पिढी असेल पण या कामात त्यांच्या कुटुंबातलीच माणसं आहेत. इथे तुला एकही बालकामगार दिसणार नाही. गरजूंना रोज मिळतो. मात्र. हा मुलगाही पदवीधर आहे पण याच पारंपरिक व्यवसायात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. नाही तरी नोकऱ्या कुठे मिळतात? हा व्यवसाया उत्तम! या क्षणी माझ्या मनात विचार येत होता की बहुसंख्य चहाप्रेमी लोकांची गरज ओळखून या व्यवसायाची परंपरा सांभाळणारे हे खरोखरच थोर लोक नाहीत का? काम हीच प्रतिष्ठा असते. या व्यवसायांद्वारे इतकी सधनता प्राप्त करूनही त्यांनी या टपरीचे चांगल्या हॉटेलमध्ये का नाही रूपांतर केले?

पण तसं नसतं.

इथे एक मानवी मानसशास्त्र असतं. टपरीवरचा चहा आणि चहा पिणारे यांची भावनिकता ही या टपरीशीच परंपरेप्रमाणे जोडलेली असते. तो आनंद, ती भावनिकता, ते वातावरण आणि तो स्वाद जपणं हा त्यामागचा प्रयत्न आणि हेतू असावा. शिवाय टपरी चहा ही एक आगळीवेगळी संस्कृती आहे.

टपरीवर चहा पिण्याचा अनुभव माझ्यासाठी पहिलाच होता. तो कडक, सुगंधी, मसालेदार, वाफाळलेला कपात ओसंडून बशीत सांडलेला चहा मला चहापानाचा एक वेगळाच आनंद देत होता जणू काही मी त्या वातावरणातला एक भाग बनले होते आणि ते फीलिंग मला आवडत होतं. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे, स्टेडीअममध्ये जाऊन क्रिकेटची मॅच पाहणे आणि टपरीवरचा चहा पिणे यातला आनंद एकाच जातीचा आहे असेच मला वाटले. चहापानाची माझी चौकट मी मोडली होती पण या निमित्ताने मी मानवी जीवनाचं एक वर्तमानपत्र जणू काही वाचत होते.

म्हटलं तर तो एक उनाड दिवस होता पण त्या उनाड दिवसांने मला एक वेगळी दृष्टी मात्र नक्कीच दिली. जीवनातली ही रांगडी सार्वजनिकता मला मजेची वाटली. असेही जगावे..

वंदनाने रिक्षानेच मला एका सोयीच्या वळणावर सोडले. उतरताना मी तिचा हात धरला आणि म्हटले, ” थँक्यू वंदना! आज मला खूप मजा आली. “माऊली अमृततुल्य चहा” प्यायला आपण परत या टपरीवर नक्की जाऊया.” 

 समाप्त –

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संकल्प आणि सिद्धी ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ संकल्प आणि सिद्धी ☆ उज्ज्वला केळकर

संकल्प करणे, म्हणजे एखादी गोष्ट नियमितपणे, न चुकता, खंड पडू न देता करणे. मला लहानपणापासून संकल्प करण्याचा नाद होता. मी ५वी-६वीत असेन तेव्हा. आम्ही मैत्रिणींनी नवं वर्षाचा संकल्प केला, पहाटे उठायचं. फिरून यायचं. मग तासभर अभ्यास करायचा. मग नेहमीच रूटीन. ३-४ दिवस तसं केलंही. त्यानंतर मात्र आमचा संकल्प आमच्यासारखाच ऊबदार पांघरुणात गुडूप झाला. मैत्रिणींना विचारलं, ‘तुम्ही जाता का रोज फिरायला? ’ त्यांचंही माझ्या सारखंच झालं होतं. ४-५ दिवसात सगळ्यांचाच संकल्प गारठून गेला होता.

शाळेत असताना, मी दरवर्षी जूनमध्ये संकल्प करी, की यंदा गृहपाठ वेळच्या वेळी आणि घरीच करायचा. काही आठवडे, महिने ते सुरळीत चालू राही. पुढे पुढे कधी नवीन छान पुस्तक मिळालं म्हणून, टी. व्ही. ची सिरिअल चांगली आहे म्हणून, बऱ्याचदा झोप आलीय म्हणून, गॅदरिंगच्या वेळी कार्यक्रमाची प्रॅक्टीस म्हणून यात खंड पडत जाई आणि माझा संकल्प गडबडून जाई. मग शाळेत थोडं लवकर येऊन, कुणाचं तरी पाहून गृहपाठ पूर्ण करायची लगबग चालू व्हायची. किंवा गृहपाठ मोठा असेल, तर तो न होण्यामागची खरी-खोटी कारणं शोधायची. पण एवढं मात्र खरं, मी दर वर्षी, जूनमध्ये नव्या उत्साहाने हा संकल्प करायचीच!

शाळेत असताना मी एकदा संकल्प केला. होय, ८वीत असेन बहुधा मी तेव्हा, शाळेत कधीही कुणाशीही भांडायचं नाही. सगळ्यांनी ‘मिलनसार’ मुलगी म्हणून माझं कौतुक केलं पाहिजे. बरेच दिवस हा संकल्प निभावला. कारण ठरवलं होतं, भांडणं झाली, तरी आपण नमतं घ्यायचं. आपली चूक नसली तरी… एकदा वार्षिक क्रीडा सामने चालू होते. ८अ विरुद्ध ८ब ‘खो खो’ची मॅच होती. आम्ही दोन्ही वर्गातल्या मुली भवतीनं गोल करून खेळाडूंना प्रोत्साहन देत होतो. आमच्या वर्गाच्या टीमची कॅप्टन मीना. छानच खेळत होती. मी म्हंटलं, ’काय छान खेळतेय मीना! ’ माझ्या शेजारीच ब वर्गातली मधुरा उभी होती. ती म्हणाली, ‘नीता जास्त चांगली खेळतेय! ’ मी म्हंटलं, ‘नाही मीनाच जास्त चांगली खेळतेय. ’ ‘मुळीच नाही नीता… ‘ मीना… नीता… मीना… नीता… ’ आणि जुंपलीच की आमची. मॅच संपली मीना-नीता गळ्यात गळे घालून खो खोच्या मैदानातून बाहेर आल्या. आमचं आपलं ‘मीना… नीता… ’ चालूच. मग काय माझ्या संकल्पाची झाली ना ऐशी न् तैशी!

पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर संकल्प केला, आता स्टडी रूममध्ये फक्त अभ्यासाची पुस्तके वाचायची किंवा संदर्भ ग्रंथ बघायचे. पण काऊंटरवर एखादा देखणा कविता संग्रह किंवा कथा संग्रह किंवा कादंबरी दिसली की आपोआपच ती पुस्तके चाळली जात. आणि नकळतच त्यातले पुस्तक नोंद करून घेतले जाई आणि मी बैठक जमवून वाचायला सुरुवात करी. पानामागून पाने उलटली जात आणि संकल्प बिचारा बापुडवाणा होऊन मान खाली घालून बसे.

याच वयात काही कविता आवडणार्‍या आणि करणार्‍यासुद्धा काही मैत्रिणी भेटल्या. मग आम्ही सगळ्यांनी संकल्प केला, रोज एक कविता करायची. पहिले दोन –तीन दिवस काही तरी नवे नवे सुचत गेले. नंतर नंतर काही सुचेना. कविता संग्रह चाळून चाळून नवीन विषय शोधत राहिलो. ‘र ला र आणि टला ट’ जुळवून कविता करत राहिलो. मग तेवढेही जमेना. भवतीनं अनेक विषय दिसत होते. सुचतही होते, पण ते कवितेत यायला मात्र तयार नव्हते. शेवटी नाईलाजाने रोज एक कविता करायची, निदान चार ओळी तरी लिहायच्याच, या संकल्पाला पूर्णविराम द्यावा लागला. तशी अजूनही मी कविता करते म्हणा, पण रोज एका कवितेचं सृजन व्हावं, अशी प्रतिभा देवाने नाही दिली.

एकदा संकल्प केला रोजनिशी लिहायची. रोज जे घडलं, ते लिहून ठेवायचचं. अनेक थोरा-मोठ्यांनी रोजनिशा लिहीलेल्या आहेत. त्यातल्या काही ना काही, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात छापूनही आल्या आहेत. मग मी १ जानेवारीपासून मोठ्या उत्साहाने रोजनिशी लिहायला लागले. वाटलं, न जाणो आपल्याही रोजनिशीला हे भाग्य लाभेल. पण ८-१० दिवस रोजनिशी लिहिल्यावर लक्षात आलं, सकाळी उठले. कॉलेजमध्ये गेले. स्टडीत बसून आभ्यास केला. घरी आले. जेवले. टी. व्ही. बघितला. झोपले. रोज तेच ते. तेच ते. कधी बदल म्हणजे तास बुडवून टेबल-टेनीस खेळले. किंवा ‘मॅटिनीला ‘प्यासा‘ बघायला गेले. चित्रपटाने भारून टाकले. गाणी तर… अहाहा… कधी तरी बदल म्हणजे, आज अभ्यास सोडून कथा-कादंबार्‍या वाचते, म्हणून बाबा रागावले. नवीन ड्रेस घ्यायला आई नाही म्हणाली, म्हणून मी रूसले. असे सटर फटर बदल. शेवटी तेच तेच लिहून मी इतकी कंटाळले, की माझं रोजनिशी लेखन मी थांबवलंच!

लग्नं झालं. नव्या नवलाईचे अद्भूतरम्य, स्वप्नील वगैरे, ‘तू म्हणशील तसं’ म्हणायचे दिवस सरले. वास्तव जीवनात ‘मी म्हणेन तसं’ असं ‘तू.. तू… मैं… मैं’ चालू झालं. ‘नळ का बंद केला नाहीस? दिवा का मालवला नाहीस? ’ अशा साधा साध्या प्रश्नांवरून वाद झडू लागले. त्यातून भांडणे होऊ लागली. या वादा-भांडणाला कंटाळून मी एकदा संकल्प केला, की नवर्‍याशी अबोला धरायचा. बोललंच नाही, तर वाद- भांडणं होतीलच कशी? टाळी एका हाताने थोडीच वाजते? दोन दिवस अबोल्यात गेले. तिसर्‍या दिवशी हे ऑफीसमधून सांगत आले, ‘आज रात्री तुझे आई-बाबा आपल्याकडे येताहेत. आठवडाभर रहाणार आहेत. त्यांचं काही काम आहे. आता त्यांच्यादेखत न बोलता कसं रहाता येईल? विचारल्या प्रश्नांची उत्तरे तरी नकोत का द्यायला? झालं! माझा अबोला बोंबलला.

नेहमीसारखा संसार सुरू झाला. दोन गोजिरवाणी मुले झाली. राकेश आणि रिया. मुले हळू हळू मोठी होऊ लागली. आमच्या दोघांऐवजी मुलांच्यात तू… तू… मैँ… मैँ… सुरू झालं. बालमानसशास्त्र अभ्यासलेली मी… मी ठरवलं होतं, इतर बायकांसारखं आपल्या मुलांवर ओरडायचा नाही. त्यांना मारायचं नाही. त्यांच्याशी गोड बोलून त्यांना समजववायचं. पण माझ्या वागण्याचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी, मुलं जास्तच दाणगट, हट्टी, आक्रमक झाली. उद्धटपणे उलट उत्तरे देऊ लागली. शेवटी व्यवहारात प्रत्ययाला आलं, ‘लाथों के भूत बातों से नाही मानते. ’ शेवटी बलमानसशास्त्राचं पुस्तक मनाच्या कपाटात मिटून ठेवलं आणि भांडणार्‍या मुलांना बाजूला करत चार दणके दिले. तेव्हा ती गप्प झाली. आई रागावतीय म्हंटल्यावर त्यांचा हटवादीपणाही कमी झाला. थोडक्यात काय माझा दीर्घकालीन संकल्प, पावसाळयातल्या भूछ्त्र्यांप्रमाणे उगवला आणि मावळला.

राकेशची मराठीची टेस्ट होती. मी त्याचा अभ्यास घेत होते. बाबा आमट्यांवरचा धडा होता. त्यावरचे काही प्रश्न त्याला विचारता विचारता, माझ्या एकदम मनात आलं, आपल्यासारख्या सामान्यांचे संकल्प सिद्धीला न जाण्यासाठीच असतात. पण काही महात्मे असे असतात, की कितीही अडचणी येवोत, परिश्रम होवो, ते आपल्या संकल्पापासून जराही ढळत नाहीत. बाबा आमटे यांनी केलेला संकल्प, महारोग्यांना स्वावलंबी बनवणे. खूप त्रास सहन करावा लागला त्यांना, पण ओसाड जमिनीवर आंनंदवन फुलावलंच त्यांनी! अगदी कुष्ठरोग्यांच्या हातांनी.

मग एकदम हेलन केलर आठवली. मुकी, बहिरी आणि आंधळी. तिच्या शिक्षिकेने अ‍ॅना सुलिव्हनने तिच्या मनात वस्तूंची संकल्पना निर्माण करण्यासाठी काय काय प्रयत्न केले, वाचूनही थक्क व्हायला होते. पण तिने संकल्प केला आणि अखेर तो सिद्धीस नेला. तिची जिद्द आणि हेलनचे प्रयत्न, याबद्दल अनेक साहित्यिकांना लिहिल्याशिवाय राहवले नाही. वी. वा. शिरवडकरांनी तर अ‍ॅनाला किमयागारच म्हंटलय॰ हेलन ही अंध, बाहिरी असूनही तिने पदवी मिळवली. पुढे ती व्यख्याती, उत्तम लेखिका, अंधांसाठी आणि बहीर्‍यांसाठी वकील म्हणून काम केले. पुढे अनेक अंधांना तिने ब्रेल लिपीचे धडे दिले.

नेहमीसारखा संसार झाला. उतारालाही लागला. अधून मधून मला नवे नवे संकल्प करण्याची हुक्की येते. मी नव्या उत्साहाने ते करतेही पण… नित्यनेमाने होणार्‍या पानगळीप्रमाणे ते गळून पडतात. माझे संकल्प हा घरात आता चेष्टेचा विषय झालाय. मुले दर वर्षी न चुकता १ ज्ंनेवारीला विचारतात, ‘आई, यंदा कोणता संकल्प करणार आहेस तू? ’ मी तितक्याच खेळीमेळीने उत्तरते, ‘बघू या. ठरवलं नाही अजून! ’

असाच एक संकल्प. मुलं आता मोठी झालीत. त्यांना सगळं कळतं. त्यांचे निर्णय ती घेऊ शकतात. त्यांना काही बोलायचं नाही. त्यांना काही विचारायचा नाही. काही सांगायचं नाही. रागावायचं तर नाहीच नाही. पण मुले शिस्तीच्या नावाखाली, त्यांच्या मुलांना बोलली, रागावली, कधी मारलंसुद्धा… नातवंडांचे चेहरे हिरमुसले झाले, की मग पडावं लागतंच ना मधे? अखेर, संकल्प महत्वाचा की नातवंडे महत्वाची? परिणाम काय? संकल्प सिद्धी नाही.

यंदा मात्र नव वर्षाला मी असा संकल्प केला आहे, की सिद्धीला जाईलच जाईल. कोणता संकल्प विचारताय? अहोsss यापुढे कधीही संकल्प न करण्याचा संकल्प केलाय मी यंदा!

© उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आडनावांचा इतिहास…” – माहिती संग्राहक / लेखक : मोरेश्वर कुंटे ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “आडनावांचा इतिहास…” – माहिती संग्राहक / लेखक : मोरेश्वर कुंटे ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

आपले आडनाव किती जुने असेल? दोनशे वर्षे? पाचशे वर्षे? काही चित्पावन आडनावांचा इतिहास थेट हजार वर्षांपूर्वीच्या ताम्रपटांपर्यंत पोहोचतो, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल..!

एखाद्या समाजाचा इतिहास लिहिताना राजे, युद्धे किंवा राज्यकारभार यांच्याइतकाच महत्त्वाचा विषय म्हणजे त्या समाजातील व्यक्तींची नावे आणि आडनावे. कारण आडनावे ही केवळ ओळख नसते; ती स्थलांतर, व्यवसाय, सामाजिक प्रतिष्ठा आणि सांस्कृतिक परंपरांची साक्ष देत असतात. चित्पावन ब्राह्मण समाजाच्या आडनावांचा मागोवा घेतला असता काही आश्चर्यकारक ऐतिहासिक धागे समोर येतात.

आज सर्वपरिचित असलेली अनेक चित्पावन आडनावे किमान हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, याचे पुरावे ताम्रपट, शिलालेख आणि तत्कालीन कागदपत्रांतून मिळतात. चित्पावन आडनावांचा सर्वांत जुना उल्लेख गुजरातमधील जुनागढ परिसरात सापडलेल्या शिलादित्य राजाच्या ताम्रपटात आढळतो. गुप्त संवत २८६ (शके ५२७, इ. स. ६०५) च्या या ताम्रपटात बापट (वपटक) आणि भानू या आडनावांचा उल्लेख आहे. आजही चित्पावन समाजात प्रचलित असलेली ही आडनावे किमान चौदाशे वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, हे या पुराव्यावरून स्पष्ट होते.

त्यानंतरचा महत्त्वाचा पुरावा रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सापडलेल्या शके ९८२ (इ. स. १०६०) च्या मराठी ताम्रपटात दिसतो. या ताम्रपटात देवल आणि घेसास या आडनावांचा उल्लेख आहे. मराठी भाषेतील प्रारंभीच्या ताम्रपटांपैकी हा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.

गोव्यातील मांद्रे परिसरातील जमिनींच्या जुन्या नोंदी आणखी एक वेगळा धागा देतात. तेथे भाटले लिमये, भाटले गोखले, भाटले पटवर्धन आणि भाटले गाडगीळ अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जमिनींची नोंद आढळते. या जमिनींना त्या कुटुंबांची नावे प्राप्त झाली होती. यावरून इ. स. १४९८ पूर्वीच या घराण्यांची तेथे वस्ती झालेली असावी, असा निष्कर्ष काढला जातो.

पटवर्धन हे नाव हजार वर्षांपूर्वीच्या शिलालेखात सापडते, तर गोखले या उपनावाचा उल्लेख इ. स. १४८८ मधील एका पत्रात आढळतो. याचप्रमाणे शिदोरे आणि बर्वे ही उपनावे इ. स. १५२४ च्या चौलच्या अधिकाऱ्यांच्या दप्तरी नोंदलेली दिसतात.

आडनावांच्या इतिहासात भाषाशास्त्रीय निरीक्षणेही महत्त्वाची ठरतात. गोठणे परिसरातील एका जुन्या गोत्रावळीत ‘निमये’ असा उल्लेख सापडतो. हेच नाव पुढे ‘लिमये’ झाले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जाते. संस्कृत व्याकरणातील ध्वनीबदलांच्या नियमांच्या आधारे या परिवर्तनाचा विचार करता येतो.

आडीवरे गावातील श्री सत्येश्वर देवस्थानाशी संबंधित एक उल्लेख विशेष लक्षवेधी आहे. शके १२५० मध्ये मंदिरातील प्रमुख धार्मिक कार्यातील ‘ब्रह्मा’ या मानाच्या पदाचे अधिकार तेथील एका प्रतिष्ठित लिमये घराण्यास बहाल करण्यात आले होते. या परंपरेची आठवण म्हणून त्या घराण्यातील मंडळी स्वतःचा उल्लेख ‘लिमये ब्रह्मे’ असा करीत असत, अशी नोंद उपलब्ध आहे.

या सर्व पुराव्यांचा एकत्रित विचार केला असता एक गोष्ट स्पष्ट होते—चित्पावन आडनावांचा इतिहास हा पेशवाईपासून सुरू होत नाही. त्याची मुळे शिलाहार, कदंब आणि यादवकालीन महाराष्ट्र-कोकणाच्या इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. प्रत्येक आडनावामागे केवळ एक कुटुंब नसून स्थलांतर, वसाहत, धार्मिक संस्था आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचा अनेक शतकांचा प्रवास दडलेला आहे.

माहिती संकलक / लेखक : मोरेश्वर कुंटे

(संदर्भ – देव दर्शन, जिल्हा रत्नागिरी) 

प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहजीवन श्रद्धा.. – लेखक : श्री मिलिंद हिरे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ सहजीवन श्रद्धा.. – लेखक : श्री मिलिंद हिरे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये पेशंट्सच्या व्हिजीटर्सकडून फी वसूल करून ती रूग्णांच्या बिलातून वजा करतात अशा आशयाचा एक व्हॉट्सॲप मेसेज वाचला, तेव्हा आमचे धुळ्याचे परममित्र व मार्गदर्शक धरमचंद चोरडीया यांनी पक्ष-कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितलेला फार पूर्वीचा एक किस्सा आठवला.

शहाद्याचे डॉ. कांतीलाल टाटीया हे धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील गरीब, वंचित आदिवासी बांधवांच्या सेवेमध्ये स्वतःला पूर्ण वेळ झोकून दिलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे – एक ज्येष्ठ स्वयंसेवक व भाजपाचे कार्यकर्ते. जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातील आदिवासी गावे, पाडे, अतिदुर्गम भागातील लहानलहान वस्त्या येथे ते जाऊन पोहोचायचे. रस्त्यांची, विहिरींची कामे, एकशिक्षकी का होईना शाळा, वनखाते, तलाठी, पोलिस या ठिकाणांची असंख्य कामं, पाण्याचे टँकर्स, आवश्यक असलेली बी-बियाणे, रोजगार, रूग्णांना, गर्भवतींना धुळ्यापर्यंत आणून उपचारांची व्यवस्था करणे, अशा कुणालाही माहित नसलेल्या रचनात्मक कामांमध्ये ते अहोरात्र बुडालेले असायचे.

भौगोलिकदृष्ट्या अवघ्या जगापासून तुटलेल्या वनवासी जीवांना जगायला सर्व मदत ते मनापासून आणि जमेल तेवढी करायचे आणि हे सगळं त्यांच्या जुनाट मोटरसायकलवर फिरून. उन्हातान्हाची, पाऊसपाण्याची, थंडीवाऱ्याची अजिबात पर्वा न करता प्रचंड प्रवास करून घराघराशी संपर्क, लग्नकार्य, उत्सव, सुखदुःखात ते सतत सामील होत.

– – – पण हे निवेदन प्रामुख्याने फक्त डॉ. टाटीयांविषयी नाही.

त्यांच्या याच वाहनाने एकदा दगा दिला. त्यांना गंभीर अपघात झाला. पायाचे हाडच मोडल्यामुळे प्रदीर्घ काळ दवाखान्यात बेडवर खिळून राहणे भाग होते.

त्यांच्या अपघाताची बातमी खेडोपाडी पोहोचायला बराच वेळ लागला. पण ती पोहोचली, तेव्हा ते दाखल असलेल्या हॉस्पिटलपुढे एक मोठीच समस्या उभी राहिली. डॉ. टाटीयांच्या समाचाराला येणाऱ्या वनवासी लोकांची जत्रेसारखी रीघ लागली.

त्यात उघडेवाघडे पुरूष होते, ठिपक्याठिपक्यांच्या तांबड्या ‘फडक्या’ डोक्यावर घेतलेल्या डॉक्टरांच्या शेकडो लेकुरवाळ्या बहिणी होत्या. म्हातारे, म्हाताऱ्या, तरूण मुलं, मजूर झाडून सगळे भेटायला येऊन जात होते. आठवड्याकाठी एखादी दहा रूपयांची नोट कशीबशी पहायला मिळणारी, ३-४ रूपये रोजावर कंबरतोड मेहनत करणारी, ही शापित माणसं.

भेटीनंतर त्या दवाखान्याच्या आवारातच ठिय्या मारून मिरच्या–भाकरी बांधलेली कळकट फडकी सोडून पोटात भरत आणि डोळ्यातलं पाणी पुसत घरी परत जात.

उसनेपासने घेतलेले पैसे बसभाड्यासाठी खर्च करून आणि तेही शक्य नसेल, तर मैलोन् मैल रस्ता अनवाणी पायांखाली तुडवत रस्ता विचारत विचारत ही माणसं डॉक्टरांना बघायला रांगेने येत होती..

भेटणंही कसं असे? एक एक जण घाबरत घाबरत बेडजवळ जाई. शिस्तीत, आवाज न करता. डॉ. टाटीयांचा हात हातात घेई. आयाबाया त्यांची बला घेत, म्हातारी कोतारी माणसं त्यांच्या डोक्यावरून, कपाळावरून, गालांवरून मायेनं हात फिरवीत आणि गहिंवरलेल्या अहिराणीत आशीर्वाद देत…

पण हा प्रत्येक ‘व्हिजिटर’ एक गोष्ट न चुकता करीत होता. निरोपाचा रामराम झाला, की, त्यांचा हात डॉक्टरांच्या उशीखाली जाऊन बाहेर येई.

टाटीया कुटुंबातील कुणालाच कळेना, हे काय सुरू आहे? एकाला विचारले, तर उत्तर आलं, “काही नही भाऊ, आहेर करना पडस. आजारी मानुसले. ”

हे ऐकताक्षणी डॉ. टाटीयांनी चट्कन उशी बाजूला करून पाहिलं. सगळे उपस्थित थक्क झाले आणि डोळ्यांत पाणी तरारलं. काही क्षणातच त्या पाण्याचं अश्रुधारा आणि हुंदक्यांत रूपांतर झालं…

उशीखाली एक रूपया, दोन रूपये, पाच रूपयांच्या बारीक घड्या घातलेल्या असंख्य मळक्या नोटा, चार आणे, आठ आण्याची, अगदी दहा-वीस पैशांचीदेखील काही नाणी होती.

आजारी माणसाला उपचारांचा न झेपणारा खर्च असतो आणि त्याचे मित्र, सगेसंबंधी, जातभाई, रक्ताची माणसं यांनी त्यात जमेल तेवढा खारीचा वाटा उचलणं हे त्यातल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं या धारणेतून निर्माण झालेली “आजारपणाच्या आहेरा”ची पिढ्यान् पिढ्या सुरू असलेली परंपरा ही माणसं डॉ. टाटीयांच्या बाबतीतही इमानाने पाळत होती.

खरं तर हॉस्पिटलचं बिल बरंच होणार होतं आणि टाटीया परिवारही काही फार श्रीमंत नव्हता. ही ‘आहेराची’ सगळी रक्कम मोजली तरीही दवाखान्याच्या एका दिवसाच्या खर्चाहून अधिक होणार नव्हती. पण एक रूपया, दोन रूपयांची किंमत काय असते हे धुळे जिल्हयातल्या त्या निष्कांचन, आदिवासी भागात गेल्याशिवाय आपल्यातल्या कुणालाही अजिबात कळणार नाही.

हे सगळं सांगतांना धरमचंदच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या आणि आमच्यासारख्या तरूण कोवळ्या कार्यकर्त्यांना देखील ऐकतांना अश्रु अनिवार झाले. त्या क्षणी सगळ्यांनाच असं वाटत होतं की आपणही डॉ. टाटीयांसारखंच व्हायचं.

तो निर्धार आता अनेक कारणांनी इतिहासजमा झाला. पण त्या तीव्र आणि अपूर्ण इच्छेच्या सावल्या भुते बनून अद्यापही माझ्याप्रमाणेच सर्वांना त्रास देत असणार हे नक्की.

शहरी भागात कितीही कष्ट उपसले तरीही एवढी कृतज्ञता, एवढा सन्मान, एवढं प्रेम कुणाही सामाजिक कार्यकर्त्याच्या नशिबी क्वचितच येतं.

कुणीही कसलीही भाषणं, प्रवचनं न देता, कुठलाही थोर संत न लाभलेल्या या मंडळींची चांगुलपणावरची, सत्कृत्यावरची ही श्रद्धा.

जिथे ते या जगात आले, वाढले, आणि जिथे त्यांचा जन्मभराचा रहिवास असणार होता, त्या जंगलातच उगवून वाढलेल्या झाडांइतकीच नैसर्गिक आणि तेवढीच उंची असलेली अशी ही ‘सहजीवन श्रद्धा’ आहे. नाही का?

अशी ‘मेडिकल इन्शुअरन्स स्कीम’ त्यांच्या अक्षरशत्रु पूर्वजांना शेकडो वर्षांपूर्वी सुचली आणि तिचं एका गुप्त व अखंड चालणाऱ्या परंपरेत रूपांतर झालं असणार.

आपणां तथाकथित सुविद्यांना देखील असं काही सुचेल, तो सुदिन!

परमेश्वरा, पुढील जन्मी मला फार मोठा माणूस नको बनवूस. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर तेवढंच निष्कपट प्रेम करणारा, वेळ पडली तर त्या प्रेमापोटी अगदी न झेपणारा देखील त्याग करणारा असा त्या गर्दीतील एखादा उपाशीपोटी, अशिक्षित पण कृतज्ञ आदिवासी बनलो, तरी मी तुझा आभारी राहीन.

लेखक : श्री मिलिंद हिरे 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares