परलोक ही संकल्पना मानवी भीती, अनिश्चितता आणि नियंत्रणाच्या गरजेतून निर्माण झालेली आहे, असे अनेक इहलोकवादी तत्त्वज्ञ मानतात. जेव्हा माणसाला मृत्यूचे रहस्य समजत नाही, तेव्हा तो त्याला अर्थ देण्यासाठी “परलोक” ही कल्पना उभी करतो. वेदांत परंपरेत हा परलोक केवळ अस्तित्वाचा पुढचा टप्पा नसून, नैतिक नियंत्रणाचे साधनही बनतो. इहलोकात ज्या गोष्टींना “भोग”, “वासना” किंवा “मोह” म्हणून नाकारले जाते, त्याच गोष्टींना परलोकातील स्वर्गात अधिक शुद्ध, अधिक उंच रूपात मिळण्याची कल्पना मांडली जाते. त्यामुळे एक प्रकारचा विरोधाभास तयार होतो—इथे नाकारणे आणि तिथे अपेक्षा ठेवणे.
याच्या अगदी उलट भूमिका चार्वाक (लोकायत) मांडतात. चार्वाकांचा मूलभूत आग्रह असा आहे की, प्रत्यक्ष अनुभव हाच ज्ञानाचा एकमेव विश्वसनीय स्रोत आहे. जे दिसत नाही, जे अनुभवता येत नाही, त्यावर विश्वास ठेवणे ही भ्रमनिर्मिती आहे. म्हणूनच ते परलोक, आत्मा, पुनर्जन्म यांसारख्या संकल्पना नाकारतात. “यावत् जीवेत् सुखं जीवेत्” ही त्यांची प्रसिद्ध भूमिका केवळ भोगवाद म्हणून पाहणे ही मोठी चूक ठरते; कारण येथे “सुख” म्हणजे बेफाम उपभोग नव्हे, तर या एकमेव आयुष्याचे महत्त्व ओळखून त्याचा अर्थपूर्ण उपयोग करणे असा व्यापक अर्थ घ्यायला हवा.
एवंच चार्वाक तत्त्वज्ञानात सकारात्मकतेचे अनेक पैलू दिसतात. पहिले म्हणजे, चार्वाक विचार माणसाला वास्तवात ठेवतो. तो काल्पनिक भीती (नरक) आणि काल्पनिक लालसा (स्वर्ग) यांपासून मुक्त करतो. दुसरे म्हणजे, तो जबाबदारी वाढवतो. जर परलोक नाही, तर या जगातच न्याय, आनंद आणि अर्थ निर्माण करण्याची जबाबदारी पूर्णपणे माणसावर येते. ही भूमिका पलायनवादी नसून अत्यंत सक्रिय आणि जबाबदार आहे. तथापि, चार्वाक विचारावर एक टीकाही कायम केली जाते, ती म्हणजे तो नैतिकतेचा पाया कमकुवत करतो. कारण जर “परलोकातील शिक्षा” नाही, तर माणूस अनैतिक वर्तनाकडे झुकू शकतो. पण हा आक्षेप पूर्णपणे पटणारा नाही. कारण नैतिकता ही केवळ भीतीवर टिकत नाही; ती सामाजिक सहजीवन, सहानुभूती आणि परस्पर अवलंबित्वावर उभी असते. चार्वाक तत्त्वज्ञान हेच सूचित करते की, नैतिकता ही मानवी करारातून आणि व्यवहारातून निर्माण होते, बाह्य दैवी नियंत्रणातून नव्हे. म्हणूनच, चार्वाक तत्त्वज्ञानाला “सकारात्मक” म्हणतात. कारण ते माणसाला भ्रमातून बाहेर काढून वास्तवात जगायला शिकवते. ते जीवनाला नाकारत नाही, तर उलट त्याला मध्यवर्ती ठेवते. परलोकाच्या आशेवर जगण्याऐवजी इहलोकातील न्याय, आनंद आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देण्याची प्रेरणा देते. या अर्थाने ते बौद्धिक प्रामाणिकपणाचे आणि जीवनाभिमुखतेचे तत्त्वज्ञान आहे.
हे तत्त्वज्ञान मान्य करणे म्हणजे फक्त एक विचार स्वीकारणे नाही, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलणे आहे. भीतीवर आधारित नव्हे, तर अनुभव आणि जबाबदारीवर आधारित जीवन जगणे होय. त्यामुळे हा निर्णय वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही पातळ्यांवर खोल परिणाम करणारा ठरतो. म्हणून साथींनो, चार्वाकवादी होणे म्हणजे आधुनिक काळात वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणे होय. अदृश्य आणि काल्पनिक देवाच्या भीतीपोटी नैतिकतेने जगणे योग्य की स्वतःच्या जबाबदारीवर निर्भयतेने जगणे योग्य? यापैकी तुम्ही कशाची निवड कराल?
☆ जागतिक पुस्तक दिन… – लेखक : संजय थोरात ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
दरवर्षी २३ एप्रिलला शंभरहून अधिक देशात साजरा होणाऱ्या जागतिक पुस्तक दिनाचे २०२२ रौप्य महोत्सवी वर्ष होते.
औपचारिक दृष्ट्या २०२२ हे रौप्य महोत्सवी वर्ष असले तरी १९२३ पासून पुस्तक दिन ही कल्पना राबवली जाते.२०२६ या वर्षी मोरोक्को ची राजधानी बरात हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे
२३ एप्रिल १९२३ ला स्पेनमध्ये मिगुएल सर्वेंटीस च्या स्मृतीसाठी पहिल्यांदा पुस्तक दिन साजरा करण्यात आला. इंग्लंड मध्ये मार्च महिन्यातील पहिल्या गुरुवारी हा दिवस साजरा होतो. ३८ नाटके लिहणारा विल्यम शेक्सपियर याचा जन्म व मृत्यू दिवस २३ एप्रिल आहे. इंका गार्सिलोसा, सर्व्हेंटीस, विल्यम वर्डस्वर्थ ब्लादिमिर नाबोकाव यांचा ही स्मृतीदिन २३ एप्रिल आहे. युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) म्हणजे मराठीत संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना यांनी १९९५ ला २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन व कॉपी राईट दिन म्हणून मान्य केला. १९९५ ला युनेस्कोच्या पॅरिस येथे झालेल्या सर्व साधारण सभेत वाचन आवड व लेखक सन्मान करण्यासाठी या दिवसाला मान्यता देण्यात आली. वाचनाची आवड, लेखक व पुस्तकांचा सन्मान ही संकल्पना आहे. वाचन, लेखन, प्रकाशन, पुरस्कार असे कार्यक्रम होतात. भारत सरकारने २३ एप्रिल २००१ पासून हा जागतिक पुस्तक दिन साजरा करायला सुरवात केली. विनामूल्य पुस्तक वितरण, स्पर्धा, पुरस्कार अशा कार्यक्रमांद्वारे वाचनाविषयी आवड व जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.
दरवर्षी जागतिक पातळीवर पुस्तकांची राजधानी निवडली जाते. आतापर्यंत शारजा, माद्रिद, मट्रीयल अमस्टरडम, क्रोनकी, बँकाक, अथेन्स, व्रोक्ला, बोगोटा, बैरूत, इंचिऑन, येरेवान आदि शहरे पुस्तक राजधानी म्हणून निवडण्यात आली. २००३ ला आपले नवी दिल्ली हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते. पुस्तकाच्या राजधानीत वर्षभर पुस्तक स्वामित्व हक्क, वाचन, पुरस्कार असे कार्यक्रम होतात. मेक्सिकोतील गुडलजरा हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित झाले होते कोरोना काळात ऑनलाईन कार्यक्रम झाले.
युनेस्को मार्फत पुस्तक राजधानी प्रमाणेच दरवर्षी वाचकांसाठी संदेश, theme, संकल्पना दिली जाते. 2024 ला, you are a reader तुम्ही वाचक आहात ही मुलांसाठी संकल्पना होती.२००३ ला दिल्ली पुस्तकाची राजधानी असताना, ‘ जीवनाचा दोस्त – पुस्तक ‘ असा संदेश होता. आतापर्यंत वाचन म्हणजे थंड हवा, एक पुस्तक द्या, आनंदाचे तास, जीवनाचा मित्र, वाचन एक अखंड यात्रा, अभ्यास, कायमस्वरुपी साक्षरता जीवन बदलते, वाचन हाच उपाय, भाषेचं आंतरराष्ट्रीय वर्षे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विकास, प्रकाशन, मानवाधिकार, संस्कृती संपर्क, पुस्तक निर्मितीचा इतिहास – लिहण्यापासून डिजीटल पर्यंत, पुस्तके आणि अनुवाद, वाचन ही बौद्धिक संपदेची सुरक्षा, पुस्तक वाचा, हुशार व्हा, जग वाचा, वाचन माझा अधिकार, कथा share करा, पुस्तक : जगाची खिडकी अशा संकल्पना व संदेशावर काम करण्यात आले.
❀꧁꧂❀┉
लेखक : संजय थोरात
प्रस्तुती : हर्षल सुरेश भानुशाली
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ असा असतो जीवन-संघर्ष… – लेखक : डॉ. राजेंद्र भारुड ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(कोल्हापूर शहराचे नूतन आयुक्त मा. राजेंन्द्र भारुड यांचा जीवन संघर्ष… )
मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर
माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती.
मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणार्यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती.
पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणि शिकून असा कोणचा डॉक्टर – इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.
त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं.
पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किमी दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच. मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतःच्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते.
एम. बी. बी. एस. च्या शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम. बी. बी. एस. ची पदवी आणि दुसर्या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता.
घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं.
माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.
आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहोत होतो. डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं. माझी माय, माझीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे. कोणाच्या आनंदानं स्वतःच्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा?
छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता.
पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुःखद कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता.
वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो.
आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही?
जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहेत. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते.
लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.
┉❀꧁꧂❀┉
लेखक : डॉ. राजेंद्र भारुड
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
भीती ही सजीवांच्या उत्क्रांतीतील अत्यंत मूलभूत आणि संरक्षणात्मक यंत्रणा आहे. चार्ल्स डार्विन यांनी ‘नैसर्गिक निवड’ या सिद्धांतात दाखवून दिले आहे की, ज्या प्राण्यांमध्ये धोक्याच्या जाणीवेनंतर त्वरेने प्रतिक्रिया देण्याची क्षमता होती, तेच अधिक काळ टिकले. भीती ही म्हणूनच कधीकधी नकारात्मक नसून जीवनरक्षक ठरली आहे. जंगलात अचानक साप दिसल्यावर पाय मागे घेणे, आगीपासून दूर पळणे किंवा वेगाने धावणाऱ्या वाहनापासून बाजूला होणे, या सर्व क्रिया भीतीमुळेच घडतात. मेंदूमधील अमिग्डाला हा भाग संभाव्य धोक्याचे संकेत ओळखून शरीरात ‘लढा किंवा पळा’ (fight or flight) अशी प्रतीक्षिप्त प्रतिक्रिया निर्माण करतो. त्यामुळे हृदयाची गती वाढते, स्नायूंमध्ये रक्तपुरवठा वाढतो आणि क्षणार्धात निर्णय घेतला जातो. म्हणून भीती ही कमकुवतपणाची नव्हे, तर सजगतेची खूण आहे.
परंतु माणूस केवळ जैविक प्राणी नाही; तो सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणात घडत असतो. लहानपणापासून मिळालेले संस्कार, पालकांची वागणूक, शाळेतील अनुभव, समाजातील मूल्यव्यवस्था, या सर्व गोष्टी मिळून भीतीचा स्वभाव ठरवतात. ज्या मुलाला सतत दडपण, शिक्षा, अपमान किंवा चुकलास तर संपलास, अशी भीती दाखवली जाते, त्याच्या मनात असुरक्षिततेची पायाभरणी होते. तो प्रसंगासमोर उभा राहण्याऐवजी मागे हटण्याची सवय लावतो. उलट ज्या मुलाला चुका करण्याची मुभा, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि प्रयत्नांचे कौतुक मिळते, त्याच्यात आत्मविश्वासाची बीजे रुजतात. त्यामुळे एकाच परिस्थितीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया भिन्न असतात—एक घाबरते, दुसरी धैर्याने उभी राहते. पण कधीकधी समाज ‘शूर’ म्हणून ज्या व्यक्तीला ओळखतो, तीही विशिष्ट प्रसंगी घाबरते. कारण धैर्य हा गुण कायमस्वरूपी नसून परिस्थितीनुसार बदलणारे मानसिक स्थित्यंतर असते. एखादा सैनिक रणांगणात निडर असू शकतो, पण कुटुंबीयांच्या आजारपणासमोर असहाय्य वाटू शकतो. एखादा वक्ता मंचावर प्रभावी बोलू शकतो, पण अन्यायाविरुद्ध सार्वजनिक भूमिका घ्यायची वेळ आली की सामाजिक बहिष्काराच्या भीतीने गप्प बसू शकतो. उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांनी विलायतेतून परत आल्यानंतर हिंदू शास्त्रानुसार प्रायश्चित्त घेतले होते. कारण येथे भीती ही केवळ शारीरिक धोक्याची नसते; ती सामाजिक प्रतिमेची, नातेसंबंधांची, आर्थिक सुरक्षिततेची किंवा सत्तेच्या दबावाची असते. म्हणूनच सत्य आपल्या बाजूला असले तरी त्यासाठी उभे राहण्याचे धैर्य सर्वांकडे असतेच असे नाही. समाजात अनेकदा ‘शूर’ आणि ‘भ्याड’ अशी द्वैती विभागणी केली जाते. पण प्रत्यक्षात धैर्य आणि भीती हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत. भीती नसलेला माणूस बेजबाबदार ठरू शकतो; तर भीतीच्या अतिरेकाने माणूस निष्क्रिय होतो. खरे धैर्य म्हणजे भीतीची जाणीव असूनही योग्य कृती करणे होय.
सामाजिक संरचना भीतीला अनेकदा साधन म्हणून वापरते. कुटुंब, धर्म, राजकारण, कार्यालयीन व्यवस्थापन या सर्वच ठिकाणी ‘भीती’ ही नियंत्रणाची पद्धत म्हणून कार्यरत असते. “लोक काय म्हणतील? ”, “नोकरी जाईल”, “देव रागावेल”, “समाजातून बहिष्कृत केले जाईल”, या मानसिकतेपोटी भीतीची संस्कृती रुजवली जाते. भीतीत वाढलेला माणूस प्रश्न विचारणे टाळतो, अन्याय सहन करतो आणि शक्तिशाली व्यक्तींच्या आक्रमणाला बळी पडतो. येथे मानसशास्त्रीय दृष्टीने सामाजिक असहाय्यता दिसते. वारंवार पराभव किंवा दडपशाही अनुभवल्यानंतर माणूस प्रतिकार करण्याची इच्छा गमावतो. याच्या उलट, भीतीवर मात करणारी व्यक्ती यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते, कारण ती कृतीशील असते. काही व्यक्तींच्या बाबतीत भीती पूर्णपणे नाहीशी होत नाही; परंतु ती स्वीकारूनही पुढे जाण्याची क्षमता विकसित केली जाते. मानसशास्त्र सांगते की, धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे, तर भीती असूनही योग्य कृती करणे. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहते, तेव्हा बाह्य दबावांची तीव्रता कमी होते. सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आढळतात की, भीतीवर मात केलेल्या व्यक्तींनीच अन्यायाला आव्हान दिले आणि समाजात बदल घडवले. जसे महात्मा गांधी न्यायालयासमोर सत्य सांगण्यास कधीही कचरले नाहीत आणि मिळेल ती शिक्षा आनंदाने भोगली. याचा अर्थ त्यांच्याकडे अलौकिक शक्ती होती असे नव्हे तर त्यांच्याकडे होते ते आत्मभान, तर्कशक्ती आणि परिणामांची जाणीव असतानाही उभे राहण्याचे साहस.
मानसिकदृष्ट्या भीतीवर मात करण्यासाठी काही घटक महत्त्वाचे ठरतात. पहिला घटक म्हणजे आत्मजागरूकता. ही आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते हे ओळखायला शिकवते. दुसरा, अनुभवांची पुनर्रचना करणे. म्हणजे असे की, एखादा प्रसंग अपयशाचा नसून शिकण्याची संधी आहे, असा दृष्टिकोन स्वीकारणे. तिसरा, सामाजिक पाठबळ मिळणे. मित्र, कुटुंब किंवा सहकारी यांचे समर्थन व्यक्तीला स्थैर्य देते. चौथा, मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी तयार होणे. स्वतःच्या तत्त्वांवर उभे राहण्याची तयारी. या प्रक्रियेत व्यक्ती हळूहळू भीतीला शत्रू न मानता मार्गदर्शक म्हणून पाहू लागते.
थोडक्यात, भीती ही मानवी स्वभावाची अपरिहार्य आणि नैसर्गिक प्रेरणा आहे. ती आपल्याला धोक्याची जाणीव करून देते, पण तिच्या अधीन राहणे किंवा तिला नियंत्रित करणे हे आपल्या सामाजिक संस्कारांवर, मानसिक प्रशिक्षणावर आणि मूल्यव्यवस्थेवर अवलंबून असते. जो माणूस भीतीच्या छायेतून बाहेर पडून परिस्थितीला सामोरे जातो, तो केवळ वैयक्तिक यशाकडेच वाटचाल करत नाही, तर सामाजिक परिवर्तनाचाही वाहक ठरतो.
” Exclusive category च्या मुलांसमोर असलेले challenges. “
काल ताईचा फोन आला. म्हणाली, अग! आमंत्रण द्यायला फोन केलाय. उद्या अजयच्या नवीन घराची वास्तुशांत आहे. तेंव्हा तुम्ही सर्व सादर आमंत्रित आहात. जरा लवकरच ये ग.
मी म्हंटले अरे व्वा!! अभिनंदन!! खूप आनंदाची गोष्ट. आम्ही नक्की येणार. कुठे घेतलंय ग नवीन घर???
ताई म्हणाली अग! ‘प्रभात रोड’ वर. पेंट हाऊस घेतलय. चांगल मोठं घर, चार बेडरुम चे आहे
मी म्हटलं अरे व्वा!!! मस्तच.
माझ्या डोळ्यासमोर ताईची आधी ची दोन मुंबईची घर, एकानंतर एक आली. तसेच अनिता, ताईची एकुलती एक सून व तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी. त्यांची पण दोन घर नागपुरात आहेत म्हणे. आणि आता हे पाचवे घर पुण्यात, तेही ‘प्रभात रोड’ वर. व्वा मस्तच!! .
अजय, ताईचा एकुलता एक मुलगा. अजय आणि अनिताची पण एकच मुलगी ‘अनघा ‘.
म्हणजे जेवढी माणसे घरात, तेवढीच घर. ‘Per head one house’. असा तो हिशोब आहे.
मी स्वतः शीच हसले. हे म्हणाले, अगं! काय म्हणाल्या ताई??
मी म्हंटले, अहो, वास्तुशांती चे आमंत्रण आले आहे. अजयने नवीन घर घेतलय. आमच्या चेहऱ्यावर आनंद, व कौतुक तर होतेच, बरोबर मनात अनेक प्रश्न एकानंतर एक आले.
मी स्वतः शीच बोलले, आपल्या वेळेस लग्नात आम्ही पांच साड्या देऊ. अशा गोष्टी होत असत. आता अनघाच्या लग्नात आम्ही पांच घर देऊ अशा गोष्टी होतील का?? गोष्टी जरी नाही झाल्या, तरी हिशोब करताना हा विचार मनात येणारच. आणि मुलगा पण असाच मिळाला, ‘एकुलता एक ‘व त्यांच्या घरी पण असंच ‘status’ असलं तर ‘अनघा व Mr X ‘ यांची एकुण दहा घर असतील. आणि याच status चा मुलगा मिळायची शक्यता जास्त आहेच.
खरं तर हे मुलांचे भाग्य आहे. त्यांच्या आजी आजोबांचे कष्ट. नंतर त्यांच्या आई-वडीलांचे कष्ट. उच्च शिक्षित आई-वडीलांनी आपल्या मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे साम्राज्य उभं केले आहे. त्यांनी हे सर्व कमवले आहे. व मुलांना नशीबाने मिळाले आहे.
अनघाच्या पिढी ला सर्व ऐश्वर्य सहज मिळाले आहे.
आपल्या पिढी ने काटकसर करून एकेक गोष्ट/ वस्तू जमविली. पगार कमी असायचे. घरात मुलांची संख्या जास्त असायची. त्यामुळे काहीही घ्यायचे म्हणजे आधी’ planning ‘करावे लागायचे. आता हे घ्यायचे. पूढच्या वेळेस पैसे जमले की, मग आपण डायनिंग टेबल घेऊ या. हळूहळू एकेक सामानाची आवश्यकतेनुसार लिस्ट बनत गेली. व वस्तू घरात येत गेल्या. प्रत्त्येक वेळी किती आनंद होत होता. जेंव्हा आपण फ्रिज घेतला, तेंव्हा तर आनंदाला पारावार नव्हता. सर्वांना सांगुन झाले. आईला पत्रात सविस्तर कळविले. त्या दिवशी आपली आता श्रीमंत लोकांत गणना होणार का?? असा पुसटसा विचार मनात येऊन गेला. त्यांनंतर स्कूटर, वाशिंग मशीन, microwave व इतर अनेक गोष्टी घरात येत गेल्या व हळूहळू आम्ही श्रीमंत होत गेलो. प्रत्त्येक येणाऱ्या वस्तू ने आम्हाला खूप आनंद दिला. एवढे पैसे आपण खर्च करू शकलो याचा अभिमान वाटत असे. हळूहळू आयुष्याचा ग्राफ वर जात होता. व त्याबरोबरच समाधान, आनंद होत होता. आयुष्यातील या घटना मनावर कोरल्या गेल्या आहेत. आजही कितीदा तरी आम्ही घरचे सर्व एकत्र बसलो, तर या सर्व गोष्टींची चर्चा होते. व तेवढाच आनंद आजही होतो.
एवढे सर्व विचार मनात आले. केसेट rewind झाली. घर घेणे म्हणजे तर कितीदा तरी पैशाचा हिशोब झाला. हप्ता कसा भरायचा??? यावर चर्चा झाली. आता नको, पूढच्या वर्षी बघूया. असं करत करत शेवटी हिम्मत करून एक फ्लॅट घेतला.
या सर्व विचारांचा अजयच्या नवीन घरातल्या वास्तुशांती च्या कार्यक्रमाशी काय बरं संबंध????
मनात सहज आलं, अनघाला या लहान सहान (?? ) गोष्टींचा आनंद मिळणार नाही. कारण तिच्या समोर परिस्थिती वेगळी असेल. त्यांचे विश्व वेगळेच असेल. सर्व महागाच्या वस्तू ज्या बहुतेक आम्हाला माहीत ही नाहीत त्या सर्व तिच्या घरी सहजच असणार आहैत.. कदाचित त्यांच्या लिस्टमध्ये world tour करणे, five/seven star हॉटेल मधे सहज जाणे, विमानाने प्रवास करणे, BMW घेणे, I phone, प्रत्येकाची वेगळी कार, भरपूर नोकर चाकर, अशा अनेक गोष्टी त्यांच्या जीवनात सहज असतील.
पैशाचा हिशोब करावा लागणार नाही. मनात आलं आणि घेतलं. असं असेल.
पीढी दर पीढी असे बदल दिसणारच आहेत. याचे फायदे व नुकसान दोन्ही आहेत. मुलांना नशीबाने सर्व मिळत आहे. भाग्यवान आहेत. कष्टाने कमविलेल्या पैशाची किंमत असते. सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत करणे जमले पाहिजे. ऐश्वर्य टिकवता आले पाहिजे. त्यात भर घालता आली पाहिजे.
या ‘exclusive category ‘च्या आई-वडीलांसमोर ‘challenges ‘वेगळेच असतात. समोर पंचपकवानांनी भरलेलं ताट असताना मुलांना शिस्त लावायची आहे. स्वतः शिस्तीत राहुन ते शिकवायचे आहे. .
खूपदा मनात आले, खरच गरज असते का एवढ्या गोष्टीं जमविण्याची?? पण मग कमविलेल्या पैशांचे काय करायचे.???? ही अशी क्षमता प्रत्येकात असतेच असे नाही. ज्यांच्यात असते, त्यांचे ‘status’ असेच वाढत जाते. आणि त्यात चूक असे काही नाहीच.
शिक्षणाच्या जोरावर मिळविलेले साम्राज्य आहे हे. आणि शिक्षणाचा पर्याय सर्वांनाच असतो. संधी प्रत्येकाला मिळतेच. अशा गोष्टी मिळावायला भाग्य लागतच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे, म्हणजे वेळेवर कष्ट व वेळेवर बरोबर निर्णय घेता आले पाहिजे. पैशाचे ‘Investment’ बरोबर जागी करता आले पाहिजे. सवयी चांगल्या असल्या पाहिजेत.
” संघर्ष करता आला पाहिजे “.
म्हणतात ना
“संघर्ष प्रकृती का ‘आमंत्रण ‘ है ।
जो स्विकार करता है, वही आगे बढ़ता है।”
पैसे कमविणे जेवढे कठीण आहे. तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त कठीण ते टिकविणे आहे. नाही तर पैसा संपायला किती वेळ लागतो???
या पैसाचा माज डोक्यात जाता कामा नये. नाही तर राजाचा रंक व्हायला ही वेळ लागत नाही.
एक वाचलेले छान वाक्य सहज आठवलं,
“Kite gives us very good message
Fly high but always stay connected to the ground. “
☆ “पहाटेचे स्वप्न…” भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
आज रोजच्या प्रमाणेच सकाळी फिरायला बाहेर पडलो. बायको मुलीकडून दुपारी येणार होती, त्यामुळे बाहेरचं चहा, असा प्लॅन ठरला. फिरतांना फक्त समोर बघून चालायची रोजचीच सवय लागल्यामुळे, आज फिरतांना, जरी बायको बरोबर नव्हती, तरी मान इकडे- तिकडे फिरायला तयार नव्हती. मारुती मंदिराजवळ पोहोचलो आणि मंजूळ स्वरातली हाक ऐकू आली – काका, या चहा प्यायला, कुठे होता! आज बऱ्याच गॅप नंतर भेटताय, आमच्या मॉर्निंग वॉक मैत्रिणी मनवा – मेघना बोलवत होत्या. बाजूच्या दुकानातून लगेच चहाचे ग्लास हातात आले. गप्पा सुरु झाल्या. तेवढ्यात मनवा म्हणाली – काका, समोर भारद्वाज पक्षी बघा. आज नक्कीच काहीतरी चांगले घडणार.
मी : माझा पण हाच अनुभव आहे. आमच्या बागेत, सकाळी रोजच भारद्वाज दिसतो आणि रोजचाच दिवस छान जातो. आज तुम्ही पण भेटल्या मुळे, आज काहीतरी एक्सट्रा चांगले असणार!
मेघना : काका कंपाऊंड च्या गेटवर बसलेला भारद्वाज बघितला, तर स्वप्नामध्ये देव येतो असे म्हणतात. कधी दिसला, तर तुमचा अनुभव सांगा, आणि त्यावर लिहा.
मस्त आणि भरपूर गप्पा – टप्पा झाल्या आणि बाय करून आम्ही आपापल्या दिशेला निघालो.
आज मनवा आणि मेघना भेटल्यामुळे दिवस छान जाणारच होता, त्यामुळे भारद्वाज पक्षानी आज सुटी घेतली, तरी चालण्यासारखे होते. रोज फिरून आल्यानंतर, माझी बागेत चक्कर असते आणि तेव्हाच, चिक्कूच्या झाडावर किंवा जमिनीवर चालतांना मला भारद्वाज दिसतोच. मी लगीच बायकोला हाक मारून, पक्षी बघायला सांगतो. तिचा दिवस चांगला गेला, तरच माझा जाणार, हे पक्के असते.
आज खरोखरच भारद्वाज पक्षानी सुटी घेतली होती. उद्या सकाळी भारद्वाज नक्की गेट वर बसलेला दिसणार, हा विचार दिवसभर डोक्यात घोळत होता.
नेहेमीप्रमाणे, दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी फिरायला बाहेर पडलो. फिरून परत आलो, आणि गेटवर चक्क भारद्वाज! मी लगेच हात जोडून नमस्कार केला व त्याला थँक्स म्हणालो. बघता बघता पक्षी उडून गेला. म्हणजे आज रात्री स्वप्नात देव येणार हे नक्की.
स्वप्न पडणं, हे एक कोडंच आहे. ठरवून ती कधी पडत नाहीत आणि न ठरवून ती थांबत पण नाहीत. स्वप्न सुंदर असेल, का भयदायक असेल, का असंबध्द असेल, हे पण आपल्या हातात नसतं. काहीही असो, पण आज रात्री स्वप्नात देव येणार, हा विचार दिवसभर मनात डोकावत होता. नेहेमीप्रमाणे रात्री ११ ची गाणी ऐकता ऐकता, केंव्हा झोप लागली, ते समजलेच नाही.
कुणीतरी मला झोपेतून उठवत होतं, असं मला जाणवलं. कुणीतरी प्रेमानी हाक मारतंय, असं वाटलं आणि मी उठलो. बघतो तर समोर साक्षात परमेश्वर. मी लगेच उठून देवाला नमस्कार केला.
मी : देवा, तुम्ही मला सगळ्याच आवश्यक गोष्टी भरभरून दिल्याबद्दल, मी तुमचे खूप खूप आभार मानतो. तुमची कृपा सगळ्यांवर कायम असू द्या.
देव : मी समोर न दिसता सुद्धा, लोक माझ्या मूर्तीसमोर उभे राहून, मागण्यांची यादी वाचत असतात. आणि मी तुझ्या समोर असूनही, तू काहीच मागत नाहीस! चल माग, काय काय पाहिजे?
मी : मला खरोखरच काहीही नको. ज्यांना खरी गरज आहे, त्यांनाच माझ्याऐवजी द्या!
देव : अरे तुझ्या मित्रांकडे, नातेवाईकांकडे दोन दोन – तीन तीन फ्लॅट्स आहेत, परदेशी गाड्या आहेत. तू अजूनही वडिलांनी ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या घरात राहतोस, भारतीय छोटी कार वापरतो. माग, तुला मागायला खूप स्कोप आहे.
मी : मला खरंच काहीही नको, सगळं मस्त चाललंय.
देव : तुझ्या मनात काहीतरी मागायचे आहे, हे नक्की. पण, मागू का नको असं तुला होतंय!
मी : देवा, तुमच्यापासून काहीच लपू शकत नाही, हेच खरं. खरंच मागू का?
मी : रोज दिवसभरात, खूप मनाला खटकणाऱ्या गोष्टी घडत असतात. त्या सुरळीत करता आल्या, तर सगळ्यांचेच जीवन आनंदाचे होऊ शकेल. रस्त्यावरची जीवघेणी वाहतूक, भ्रष्टाचाराच्या घटना, अन्नपदार्थ – औषधे यामध्ये भेसळ, पैशांकरता आणि फॅशन च्या नावाखाली नट – नट्यांनी आणि सगळ्यांनीच सुरु केलेले अंग प्रदर्शन आणि त्याचे दुष्परीणाम, स्त्रियांवर वाढणारे अत्याचार, टीव्ही / मोबाईलचा अतिरेक आणि मुलांवर त्याचे दुष्परिणाम, अशी बरीच मोठी यादी आहे.
देव : तुझे म्हणणे अगदी रास्त आहे. मी मनुष्याला बुद्धी दिली आहे. काय चांगले – काय वाईट हे त्याला समजते. तुम्ही लोक बुद्धी गहाण ठेवता. मी आणि माझे, यातंच तुमचं आयुष्य खर्ची पडतं, मी यात काय हस्तक्षेप करणार! आणि हे कलियुग सुरु आहे, यामध्ये, या अशा गोष्टी घडणारच. माझा पुढचा आणि शेवटचा ‘कल्कि’ हा अवतार आहे, त्याचाच हा पूर्व रंग आहे, असे पण सांगता येईल.
मी : सगळे लोक नेमून दिलेले कायदे कानून पाळतील, एवढा जरी धाक तुम्ही निर्माण केला, तर सगळेच आनंदात राहू शकतील.
देव : ठीक आहे. आपण एक एक विषय घेऊ.
तुझ्या यादीतला पहिला विषय घेऊ – जीवघेणी वाहतूक. याकरता मी काय करायचे, ते तू मला सांगायचे. कुठलेही कायदे – कानून मोडता कामा नयेत, जे चांगल्या मार्गानी जात आहेत, त्यांना त्रास होता कामा नये. योजलेले उपाय, योग्य जागी चिमटा बसेल इतपतच कठोर असावेत.
‘जीवघेणी वाहतूक’ याकरता मी काय करावे, ते एका कागदावर लिही आणि कागद घडी करून झोपताना देवघरात ठेव. मला सगळे मुद्दे पटत असतील, तर सकाळी तुला कागद उघडलेला दिसेल व त्याच दिवशी, सकाळ पासून माझी कार्यवाहीची पूर्वतयारी तुला दिसेल. आणि नंतरच्या दिवशी, सकाळी ८ वाजता अंमलबजावणी सुरु होईल. फक्त एक महिना असे सुरु राहील.
जर लिहिलेले मुद्दे मला पटले नाहीत, तर कागद बाजूला केलेला दिसेल. तुला पुन्हा वेगळे लिहावे लागेल. गुड नाईट अँड गुड मॉर्निंग.
सकाळी नेहेमीप्रमाणे रात्रभर सुरु असलेल्या रेडिओ स्टेशन च्या मंजुळ स्वरांनी मला जागे केले. आज एकदमच फ्रेश वाटत होते. सकाळी बागेत भारद्वाज पक्षाचे दर्शन झाले. दिवस मस्त गेला.
देवाबरोबर बोलणे झाले त्याप्रमाणे जीवघेणी वाहतूक सुरळीत होईल याकरता देवाने काय काय करावे हे मुद्दे मी लिहून कागद तयार केला आणि झोपण्यापूर्वी तो कागद देवघरात ठेवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. देवघरात जाऊन बघितले, तर ‘अहो आश्चर्यम्’. कागद उघडलेला होता. म्हणजे देवाला मी लिहिलेले सगळे मुद्दे पटले आहेत. मी खूप खुश झालो.
सकाळचा चहा घेऊन आम्ही फिरायला बाहेर पडलो. सिटी मल्टिप्लेक्स वरुन, पुढे मेन रोडवर आलो. नेहेमी सगळ्याच रस्त्यांवर विविध पक्षांचे अभिनंदनपर होर्डिंग असतात / वाढदिवसाचे होर्डिंग असतात, जाहिरात करणारे होर्डिंग असतात. कार्पोरेशन अधून मधून होर्डिंग काढण्याची कारवाई करत असते. पण पुन्हा होर्डिंग आपापल्या जागेवर येतच असतात. आज सगळी होर्डिंग जागेवरच होती, पण त्यावरचा सगळा मजकूर रातोरात बदललेला होता. सगळ्यांवर वाहतुकीविषयी माहिती दिसत होती, वाहतुकीचे नियम दिसत होते. एका मोठ्या होर्डिंग वर मजकूर असा होता —
रस्त्यावर आलेल्या सगळ्यांचेच स्वागत. पादचारी आणि वाहनचालक या सगळ्यांचेच जीव मोलाचे आहेत. रस्त्यावर असेपर्यंत, तुमची सुरक्षा, ही जबाबदारी आमची आहे. वाहतुकीचे नियम हे सगळ्यांवरच १०० टक्के बंधनकारक राहतील. नियम अगदीच मोजके आणि सोपे आहेत. नियम लक्षात कसे ठेऊ, असे टेन्शन घेऊ नका. रस्त्यांवरची सगळी होर्डिंग यापुढे फक्त वाहतूक नियम दाखवतील. इतर जाहिराती करण्याकरता, इतर माध्यमे वापरली जातील.
वाहतूक नियम —
१) लाल – हिरवा दिवा ‘थांबा’ आणि ‘जा’ सांगतो. ते पाळा
२) दाखवलेली स्पीड लिमिट बंधनकारक आहे. लिमिट ३० असेल तर वेग +/- ५ एवढाच चालेल.
८) स्वतःच्या डोक्याची काळजी वाटत असेल तर हेल्मेट वापरा – सीट बेल्ट वापरा.
काही लोकांना होर्डिंग मधला हा बदल लक्षात आलेला दिसत नव्हता. पण काही ठिकाणी घोळके जमायला लागले होते. थोडं पुढे गेल्यावर एलबीएस रोड लागला. ठिकठिकाणी स्पीड लिमिट ३० किमी असे बोर्ड दिसत होते.
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
‘वर्डस्वर्थ‘ म्हणतात बालक हा माणसाचा पिता आहे. त्यांचा मुलांच्या निरागसतेवर, प्रामाणिकपणावर, बेफिकीर स्वभावावर व शुद्ध हृदयावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे टागोर सुद्धा निरागस, निष्कपट बालकांमध्ये रमतात. लहान मुले पाहताना त्यांच्यात त्यांना निसर्ग दिसतो, परमेश्वर अनुभवता येतो.
टागोरांना वाटतं, लहान मुले व निसर्ग आपल्याला खूप कांही शिकवित असतात. टागोरांच्या आठव्या कवितेमध्ये ते एका राजघराण्यातील मुलाबद्दल लिहितात. मौल्यवान वस्त्रांमुळे व अलंकारांमुळे त्या मुलाला खेळतांना मोकळेपणा मिळत नाही. त्यामुळे तो उदास होऊन बसतो. मुलांसाठी खेळ, मित्र त्या मौल्यवान वस्रांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. पण हे मोठ्या माणसांना कळत नाही. त्यांना आपलं समाजातील स्थान, त्या स्थानाचा आब राखणं जास्त महत्वाचं वाटतं. कवी त्या मुलाच्या आईला सांगतात की या तुमच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पनांमध्ये लहानांना जखडू नका. मातीत खेळल्यामुळे मुले निरोगी राहतात. सर्व थरांतील मुलांबरोबर खेळल्यामुळे त्यांना सामाजिक भानही येतं. टागोरांना वाटतं की हे मानवी जीवन जत्रेसारखं आहे. बरंच काही वाईट आहे, दुष्टपणा आहे, गलिच्छपणा आहे, पण बरंच काही आनंद देणारं, चैतन्य देणारं, जगण्याची इच्छा बळावणारंही आहे. जसं जत्रेतून जावं असं कधीच वाटत नाही तसंच हे जीवन देखिल आपल्याला बांधून ठेवतं, आसक्ती निर्माण करतं. लहान मुलं मात्र ह्या लोभ, मोह, स्वार्थ यापासून कोसो दूर असतात.
आजच्या साठाव्या कवितेत देखिल टागोर लहान मुलांच्या विश्वावर भाष्य करतात. हे विश्व म्हणजे एक सागर आहे. ते म्हणतात लहान मुलं निरागसपणे काठावर वाळूत खेळतात. पाण्यात कागदाच्या नावा सोडतात. शिंपल्यांशी खेळतात. वाळूत घर बांधतात. आणि निसर्गाकडून घेतलेलं सगळं निसर्गावरच उधळून देतात. त्यांना ना तिथल्या मोत्यांचा, ना तिथल्या माशांचा हव्यास आहे. लाटा क्रुद्ध होतात तेव्हा त्यांची भीती इतरांना, मोठ्यांना आहे पण लहान मुलांना ती भीती पण नाही. लाटा लहान मुलांसारख्या असतात, त्या कितीही क्रुद्ध झाल्या तरी किनाऱ्यावर येईपर्यंत शांत होतात आणि जणू त्या मुलांसाठी मृदु स्वरांत अंगाई गातात.
टागोरांनी गीतांजलीत लहान मुलांशी संबंधित अशा मोजक्याच ३/४ कविता समाविष्ट केल्या आहेत. त्यातून ते अधोरेखित करतात की, मुलांचे विश्व आणि मोठ्यांचे विश्व खूप वेगळे असते. मोठ्यांना मोह असतो, भय असते. जे मुलांना स्वभावतःच अजिबात नसते. या कवितांमधून ते लहान मूल आणि प्रौढ माणसं यांच्यातल्या विरोधी वृत्ती प्रकर्षाने दाखवतात.
—–
☆ गीत: ५८ ☆
LET all the strains of joy mingle in my last song ⎯ the joy that makes the earth flow over in the riotous excess of the grass, the joy that sets the twin brothers, life and death, dancing over the wide world, the joy that sweeps in with the tempest, shaking and
waking all life with laughter, the joy that sits still with its tears on the open red lotus of
pain, and the joy that throws everything it has upon the dust, and knows not a word.
ON the seashore of endless worlds children meet. The infinite sky is motionless overhead and the restless water is boisterous. On the seashore of endless worlds the children meet with shouts and dances.
They build their houses with sand and they play with empty shells. With withered leaves they weave their boats and smilingly float them on the vast deep. Children have their play on the seashore of worlds.
They know not how to swim, they know not how to cast nets. Pearl fishers dive for pearls, merchants sail in their ships, while children gather pebbles and scatter them again. They seek not for hidden treasures, they know not how to cast nets.
The sea surges up with laughter and pale gleams the smile of the sea beach. Deathdealing waves sing meaningless ballads to the children, even like a mother while rocking her baby’s cradle. The sea plays with children, and pale gleams the smile of the sea beach.
On the seashore of endless worlds children meet. Tempest roams in the pathless sky,
ships get wrecked in the trackless water, death is abroad and children play. On the
seashore of endless worlds is the great meeting of children.
एका शांत आश्रमात एक साधक राहत होता. त्याने अनेक वर्षे तप, जप, ध्यान केलं होतं. आता सर्वजण त्याला “योगीजी” म्हणून ओळखू लागले होते.
एके दिवशी तो आपल्या गुरूकडे गेला—
“गुरुदेव, मला योग प्राप्त झाला आहे. आता मला पुढे काय करायचं? ”
गुरु हसले, पण काही बोलले नाहीत.
काही दिवसांनी तो पुन्हा आला—
“गुरुदेव, मला आता ज्ञानही झालं आहे. शास्त्रांचा अर्थ कळतो, आत्मा कळतो. ”
गुरु पुन्हा शांतच राहिले.
काळ गेला…
एक दिवस तो अत्यंत भावुक अवस्थेत आला— “गुरुदेव, आता माझ्या हृदयात अपार प्रेम आहे. मला वाटतं, मी प्रेमात पूर्ण झालो आहे. ”
यावेळी गुरु त्याच्याकडे प्रेमाने पाहून म्हणाल, “तू अजूनही ‘मी’ मध्येच आहेस. ”
साधक थोडा चकित झाला—
“गुरुदेव, मी इतकी साधना केली, तरी ‘मी’ कसा राहिला? ”
गुरु शांतपणे म्हणाले— “तू म्हणतोस— मी योगी आहे, मी ज्ञानी आहे, मी प्रेमी आहे.
जोपर्यंत ‘मी’ बोलतो आहे, तोपर्यंत तू त्या अवस्थांचा भोग घेतो आहेस, त्यात अडकलेला आहेस. ”
हे ऐकून साधकाच्या मनात काहीतरी हललं…पहिल्यांदाच त्याने स्वतःकडे खोल पाहिलं. त्या रात्री तो एकटाच बसला.
ना जप, ना ध्यान… फक्त शांत साक्षीभाव.
हळूहळू त्याला जाणवलं—
योग, ज्ञान, प्रेम… हे सगळं येतं आणि जातं पण “मी” जो म्हणतो आहे, तोच खरा अडथळा आहे.
अचानक त्याच्या आत काहीतरी विरघळलं…
जणू “मी” हा शब्दच नाहीसा झाला.
फक्त शांतता उरली…
निर्विचार, निरहंकार, नितळ अस्तित्व.
दुसऱ्या दिवशी तो गुरूकडे गेला…
पण यावेळी तो काही बोललाच नाही.
गुरु त्याच्याकडे पाहून हसले—
“आता तुला कळलं…
जिथे ‘मी’ नाही, तिथेच खरा योग, ज्ञान आणि प्रेम आहे. ”
योग प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण योगी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण योगाचे भोगीच आहोत.
आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण ज्ञानी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण ज्ञानाचे भोगीच आहोत.
तसेच प्रेम प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण प्रेमी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण प्रेमाचे भोगीच आहोत.
आणि बंधूंनो, जो प्रेमाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘कामाचा’ भोगी होऊ शकतो.
जो ज्ञानाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘अज्ञानाचा’ भोगी होऊ शकतो.
आणि जो योगाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘भोगाचा’ भोगी होऊ शकतो.
आपली बुध्दी ही खऱ्या ज्ञानापर्यत पोहोचण्यातील खरा अडथळा आहे! हे जाणवणं म्हणजे खरी स्वयंजागृती! ज्याला मी समजतो तो मी मर्यादित आहे व आज बुध्दीचा विलय झाल्यावर उरला तोखरा मी आहे जो अनंत आहे अमर्याद आहे असीम आहे, अमर्याद आहे.
कुठे होता तो? आतच होता पण झाकोळला होता मर्यादित मी ने च! इतर कशाचाही अडथळा नव्हता असे समजल्यावर दोषारोप थांबतात व कृतज्ञताच प्रगट होते जी आतून, हृदयातून, सहजतेने प्रकट होते.
“मीपण विरघळे”(वृत्त: आर्या)
मीपण धरुनी अंतरी, म्हणे “मी योगी ज्ञानी” ।
भावांच्या या लहरींमध्ये, अडकला जीव अभिमानी ॥
ज्ञानदीप उजळता, उरला तरी सूक्ष्म अहंभाव ।
प्रेमाच्या त्या सागरात, उठती “मीपणाचे” ठाव ॥
शांत बसुनी पाहता, विरती सारे भाव हळूच ।
उरे न काही म्हणण्यास, साक्षी निखळ तोच ॥
जिथे नाही “मी”पणा, तिथेच सत्य फुले सहज ।
योग-ज्ञान-प्रेम एक, तेथेच परम तेज ॥
“‘मी’ हा सूक्ष्म धागा सुटेपर्यंत, साधना पूर्ण होत नाही;
“शेवट हीच सुरुवात आहे” किती गहन विचार आहे जो जीवनातील प्रत्येक समाप्तीतून नवीन संधी, शिकवण आणि बदलाची नवी दिशा कशी मिळते हे सांगत असतो ज्यात संकट, पराभव, अपयश किंवा एखादी गोष्ट संपल्यावर नवीन प्रवास सुरू होतो, हा विचार जीवनचक्राचे चक्र आणि सकारात्मक दृष्टिकोन दर्शवतो.. निसर्गातील अशा कित्येक उदाहरणांमधून अंतः अस्ती प्रारंभः ह्याच दर्शन घडत असत.. एखाद वठलेलं झाड, पान गळतीने निष्पर्ण झालेला बगीचा मनात उदासीनतेचे भाव आणत असतो तोच बगीचा चैत्र पालवीने सोनेरी रंगात जेंव्हा बहरून फुलतो तेंव्हा मनाला सुखावत असतो.. इथे पान गळती हा शेवट आणि चैत्र पालवी ही सुरुवात असते पुन्हा नव चैतन्य फुलविण्याची.. एखाद अपयश एखाद संकट आपल्याला दुःखी करत संपल आता सगळं अस वाटत असताना एक नवी संधी चालून येते एक नवा मार्ग सापडतो तेंव्हा अपयशाकडे पाहण्याचा ही दृष्टिकोन बदलतो.. आपण नेहमी आपल्यासाठी योग्य तेच निवडतो आहोत अस वाटत असत आपल्याला पण त्या विधात्याचे खेळ काही निराळे असतात आपल्यासाठी आपण निवडलेल्या पर्याय शिवाय त्याचे पर्याय जास्त योग्य असतात.. तो जेंव्हा एखाद संकट देतो तेंव्हाच त्याचा शेवट ही त्याने ठरविलेला असतोच.. पण आपला नकारात्मक दृष्टिकोन मात्र आपल्याला दुःखी करत असतो.. जर शेवट ठरलेला आहे तर नवी सुरुवात ही निश्चित असते पण त्यासाठी गरजेचा असतो तो संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन.. पण आपण नेहमी उलटाच विचार करत असतो हे अस माझ्याच बाबतीत का होत नेहमी वाईटच होत हा दृष्टिकोन आपल्या प्रगतीतील मोठा अडथळा ठरतो.. कोणतीच गोष्ट चिरकालीन नसते प्रत्येकाचा शेवट हा ठरलेलाच असतो आणि जिथे शेवट असतो तिथे नवी सुरुवात ही असतेच.. हा विश्वास मात्र आपल्या मनाशी पक्का हवा.. एखादी गोष्ट जर अचानक बदलत असेल नव वळण घेत असेल तर येणाऱ्या प्रत्येक वळणावर एक नवी दिशा एक नवी संधी किंवा एक नवी सुरुवात असतेच हा सकारात्मक दृष्टिकोन मनात असेल तर कोणताच पराभव संकट किंवा आयुष्यात येणारे अवघड वळण ही सोप्पे होते.. आयुष्याच्या प्रवासात अनेक अशी वळणं येतात जिथे आपण मानसिक रित्या पूर्णपणे कोसळून जातो.. कुठे जिवलग नात्यांचा शेवट असतो कुठे समाजाने दिलेले धोके असतात कुठे आलेली अनेक संकटे आव्हाने असतात तर कुठे सतत होणारा पराभव असतो अशावेळी स्वाभाविकच आपण कोलमडतो, दुःखी होतो पण अशा वेळी हा शेवट सकारात्मकतेने स्वीकारून त्यातून येणाऱ्या नव्या संधी कडे वाटचाल करत ध्येय ठरवाव लागत आणि हे जेंव्हा आपण स्वीकारतो तेंव्हा तिथे आयुष्याला एक नवी कलाटणी मिळते एक नवी सुरुवात आपली वाट बघत असते.. गरज असते ती आपल्या संयमाची आणि चिकाटीने चालत राहण्याची.. जिथे एक गोष्ट संपते, तिथूनच दुसऱ्याची सुरुवात होते.
हा विचार जीवनातील बदल आणि निरंतरतेचे प्रतीक आहे, प्रत्येक शेवट नवीन संधींना जन्म देतो. अपयश किंवा संकट हे नवीन कौशल्ये शिकण्याची आणि अनुभवांची संधी असते. हा विचार खचलेल्या व्यक्तीला नवी उभारी देतो आणि जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास शिकवतो.
‘अंतः अस्ति प्रारंभः’ हे जीवनाचे सार आहे. हे तत्त्व आपल्याला अपयशातून शिकायला, नवीन मार्ग शोधायला आणि आव्हानांना संधी म्हणून बघायला शिकवते. त्यामुळे, आयुष्यात जेव्हा गोष्टी संपल्यासारखे वाटतात, तेव्हा निराश न होता नवीन प्रवासाची तयारी करणे महत्त्वाचे आहे.
थोडक्यात, ‘अंतः अस्ति प्रारंभः’ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. हा विचार आपल्याला प्रत्येक शेवटाकडे एका नव्या सुरुवातीच्या आशेने पाहण्यास शिकवतो, ज्यामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि सकारात्मक बनते.