मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९८ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- माझी स्वेच्छानिवृत्ती आणि त्याचे मंजुरीपत्र हे विषय माझ्यापुरते मी पुसूनच टाकले होते. पण ते खोटं ठरवणारं, मला अचंबित करणारं वास्तव वखरेसाहेबांच्या केबिनमधे माझी वाट पहातेय याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.

 आज इतक्या वर्षांनंतरही त्यातला थरार मी विसरू शकलेलो नाहीय.

 मी त्यांच्या केबिनमधे जाताच वखरेसाहेबांनी माझं हसतमुखानं स्वागत केलं होतं.

 “यु आर व्हेरी लकी मिस्टर लिमये. गेम वॉज व्हेरी टफ. बट यू हॅव वन इट.” ते म्हणाले होते.)

आज दिवसभर काय घडत होतं ते त्यांच्याकडून ऐकताना माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. ‘अतर्क्य’ म्हणजे काय याचा प्रत्यय मला प्रत्येक क्षणी येत होता. सहजासहजी घडूच न शकणारं बरंच कांही दिवसभरात घडून गेलं होतं !!

माझ्या कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ, त्यात व्यत्यय आणण्यासाठीच अचानक ठरली असावी अशी आमच्या जी.एम्. मॅडमची ती व्हिजीट, त्यादरम्यान मॅडमनी सूतोवाच केलेली नव्याने येऊ घातलेली ‘स्वेच्छानिवृत्ती’ची गोल्डन शेकहॅंड स्कीम आणि त्याच अनुषंगाने माझ्या आयुष्यांत येऊ पहाणारी अनोखी वळणं न् पुढे त्यात प्रत्येकवेळी निर्माण होत गेलेली अनिश्चितता…!

वखरेसाहेब सांगत होते ते ऐकताना हे सगळंच अधांतर अतिशय अनपेक्षितपणे हळूहळू विरून गेलंय असंच मला वाटतं राहिलं. कारण जे घडलं होतं ते अतिशय अनपेक्षित आणि नेमकं मला हवं तसंच!!

आज पंचवीस वर्षं उलटून गेल्यानंतरही त्या संध्याकाळचे ते क्षण मी विसरूच शकत नाहीय.माझ्या अनोख्या भविष्यकाळासाठी माझ्या संपूर्ण आयुष्यालाच सकारात्मक कलाटणी देणारी ती संध्याकाळ माझ्यासाठी उर्वरीत आयुष्यातली नवी पहाटच ठरली होती..!

वखरेसाहेबांनी सांगितलं त्यानुसार नागपूर रिजनल मॅनेजर श्रीवास्तव साहेब अकोला ब्रॅंचमधील बुडीत कर्जांमधे घोळ घालून ठेवलेल्या आधीच्या मॅनेजर इतकंच नंतर चार्ज घेतलेल्या मलाही जबाबदार ठरवू पहात होते आणि सर्व सुरळीत होईपर्यंत मला स्वेच्छानिवृत्तीसाठी आवश्यक असणारी ‘क्लीनचिट’ द्यायला टाळाटाळ करीत होते.३१ डिसेंबर ही सदर योजनेच्या अंमलबजावणीची अखेरची तारीख उजाडली तेव्हा माझा एकट्याचाच अर्ज अजूनही पेंडिंग असल्याचं लक्षात येताच एम्.डी.आॅफीसने तिथे सर्वांना धारेवर धरलं होतं.मी पुढे चालून आलेली एक सुवर्णसंधी हातून निसटूनच गेलीय हेच गृहित धरुन सगळं नाईलाजाने स्विकारलं होतं त्याचवेळी तिकडं सेंट्रल आॅफिस पातळीवर मात्र या प्रकरणाला अचानक हे वेगळंच वळण लागलं. तिथे हे प्रकरण थेट स्वत:च्या ताब्यात घेतलं ते नेमकं मला व्यक्तिशः ओळखणाऱ्या जी.एम्. मॅडमनीच. आणि दुसऱ्याच क्षणी वखरेसाहेबांच्या फोनचा रिंगटोन! अकोला ब्रॅंचमधील चिघळलेल्या प्रश्नाची सविस्तर पार्श्वभूमी मॅडमनी त्यांच्याकडून समजून घेतली आणि थेट श्रीवास्तव साहेबांना फोन करुन कडक शब्दांत याप्रकरणातील त्यांच्या कॅज्युअल अॅप्रोच आणि टाईम किलींग टॅक्टीजवर ताशेरे ओढत ‘ लिमयेनी तिथे अल्पकाळात प्रतिकूल परिस्थितीत जे कांही काम केलंय त्याचं पूर्ण रेकाॅर्ड झोनल व सेंट्रल आॅफिसमधे सुरक्षित आहे’ असं त्यांना स्पष्ट शब्दात बजावून ‘ घ्याल तो निर्णय पूर्ण जबाबदारीने घ्या आणि त्याच्या परिणामांना सज्ज रहा’ असं त्यांना बजावलं.

पुढच्या पंधरा-वीस मिनिटातच मला क्लीनचीट देणारा फॅक्स श्रीवास्तव साहेबांनी सेंट्रल आॅफीसला पाठवला होता आणि त्याची एक प्रत वखरेसाहेबांकडे.

वखरेसाहेब काय किंवा या जी.एम्.मॅडम काय, या सर्व घटनाक्रमात तिथं दुसरं कुणीही असतं तर? हे असंच या क्रमाने घडलं असतं? सगळं योगायोगानेच घडावं तसंच घडत गेलेलं असूनही त्या मागचा सूत्रधार मात्र ‘तो’च होता. त्या शिवाय हे सगळं असंच घडणं शक्य तरी होतं का? माझ्या आयुष्यातल्या अशा असंख्य बिकट वाटांवरच्या प्रत्येक अंधाऱ्या वळणावर मला लख्ख प्रकाशवाट दाखवणाराही ‘तो’च तर होता!

“सोs..टूमारो वील बी ए लास्ट डे आॅफ युवर सर्व्हिस लाईफ. विश यू आॅल द बेस्ट!” वखरेसाहेबांचे शब्द ऐकून मी दचकून भानावर आलो.स्वप्नवत वाटावेत असे त्यांचे ते शब्द मला भानावर आणतानाच आतून हळवं करून गेले.

“नका काळजी करु.सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना?” या त्यांच्याच शब्दांनी कांही दिवसांपूर्वीच मला आश्वस्त केलं होतं आणि आज त्यांचेच शब्द मला आनंदाने नव्या हव्याहव्याशा अशा अनोख्या वाटेवर निश्चिंतपणे मार्गस्थ व्हायचे संकेत देत होते!!

“थॅंक्यू व्हेरी मच सर..थॅंक्स फाॅर एव्हरीथिंग..”

माझा आवाज भरून आला होता. कसंबसं स्वतःला सावरत मी त्यांचे आभार मानले आणि जाण्यासाठी उठलो.

“बसा. हॅव अ कप आॅफ टी वुईथ मी..” ते मनापासून म्हणाले.

आज पंचवीस वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या संध्याकाळपर्यंतचे हे असे सगळे क्षण आपसूकच माझ्या मनात अलगद जपले गेलेयत. कारण माझा अनोखा भविष्यकाळ खऱ्या अर्थाने कृतार्थ करण्यासाठी माझ्या संपूर्ण आयुष्यालाच अतिशय रेखीव अशी सकारात्मक कलाटणी देणारी ती संध्याकाळ माझ्या उर्वरित आयुष्यासाठी एक नवी पहाटच ठरली होती!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘हे देवाघरचे देणे’… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘हे देवाघरचे देणे’…  ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

तो सुप्रसिद्ध गायक स्व. मुकेश यांचा जन्मदिवस होता. आणि मला जुनी गाणी ऐकण्याची आवड असल्याने त्यांचे ‘ मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है.. ’ हे सदाबहार गीत योगायोगाने ऐकत होतो. हे गीत पडद्यावर राजेंद्रकुमार आणि वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झाले असून सुमन कल्याणपूर आणि मुकेश यांचे हे अजरामर आणि अवीट गोडीचे द्वंद्वगीत आहे. आपला असा समज होण्याची शक्यता आहे की मी आज स्व. मुकेश यांच्याविषयी किंवा या गीताविषयी बोलणार आहे पण खरे तर मला सांगायचे आहे ते वेगळेच. जेव्हा राजेंद्रकुमार वैजयंती मालाला म्हणतो की ‘ मेरा प्यार भी तू है…’ तेव्हा त्याला तिच्या ठायी निसर्गातील सगळ्या गोष्टी असलेल्या प्रतिबिंबित होतात. निसर्गातील फुलात, सगळ्या निसर्ग सौंदर्यात जणू तिचाच भास त्याला व्हायला लागतो. किंवा दुसऱ्या एखाद्या गीतात एखादा प्रियकर आपल्या सुंदर प्रेयसीकडे पाहून म्हणतो, ‘ तेरे चेहरेसे नजर नही हटती, नजारे हम क्या देखे…’ असे चित्रपटातील नायक आणि नायिकेचे प्रेम आपण नेहमी पडद्यावर पाहतो. किती छान वाटते हे सगळे बघायला आणि ऐकायला सुद्धा.. ! सगळे कसे romantic…! ‘ क्या यही प्यार है…? ‘

आपल्याला चित्रपटातील, टी व्ही वरील मालिकातून नायक नायिकेचे प्रेम बघायची इतकी सवय झालेली आहे की हे सगळे आपण पाहतो ते म्हणजेच प्रेम असा आपला समज होत असतो. इतकं ते आपल्या रक्तात भिनलेले असते जणू. मंगेश पाडगावकर यांची ‘ प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं.. ’ या ओळी आम्हाला पाठ असतात किंवा ऐकून माहिती असतात. पण खरं प्रेम कसं असतं ? ‘ प्रेमा तुझा रंग कसा ?’ प्रेम हे सर्वव्यापी आहे. प्रेमाला स्वतःचा मुळचा रंग नाही. प्रेम हे पाण्यासारखे असते. ‘ पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिला दो लगे उस जैसा… ’ एक सुंदर मराठी गीत आहे, ‘ प्रेमाला उपमा नाही, हे ते देवाघरचे देणे.. ’ खरंच किती सुंदर शब्द आहेत ! प्रेम हे देवाघरचे देणे आहे.

प्रेम हे जीवनाच्या वेलीवर उमललेले सर्वात सुंदर फुल आहे ! फुलासारखेच नाजूक आणि सुंदर. जणू काही ‘ जपून हाताळा ‘ दुष्ट आणि क्रूर मानवी भावनांनी ते करपून जाते. त्याला सतत मायेचे पाणी घालावे लागते नाही तर ते कोमेजण्याचा धोका असतो. प्रेमाचे एक वैशिष्ट्य आहे. प्रेम दिल्याने वाढते. जेवढे देऊ त्याच्या अनेक पटींनी परत मिळते. जसे शेतात काही मुठ दाणे पेरावे आणि अनेक पटींनी पीक घ्यावे. What we give, we get back in abundance. प्रेम दिले तर प्रेम मिळेल आणि द्वेष पेरला तर द्वेशाचेच पिक येईल. म्हणूनच तर आपण ‘ पेरावे तसे उगवते ‘ असे म्हणतो. एकदा गौतम बुद्धांकडे एक गरीब माणूस आला. तो म्हणाला, ‘ महाराज मी गरीब का आहे ते सांगावे. ’ बुद्ध त्याला म्हणाले, ‘ तू तुझ्याजवळ असलेले लोकांना देत नाहीस म्हणून तू गरीब आहेस. ’ त्याने विचारले की माझ्याजवळ काय आहे देण्यासारखे ? बुद्ध म्हणाले, ‘ अरे लोकांना प्रेम तर देऊ शकतोस की नाही, लोकांशी प्रेमाने तर बोलता येईल की नाही ?’ मग बघ तू गरीब राहणार नाहीस. किती सुंदर उपदेश बुद्धांचा… !

खरे प्रेम कसली अपेक्षा करीत नाही. आई आपल्या मुलांवर निरपेक्ष प्रेम करते. तिला कोणती अपेक्षा असते ? आपल्या वृद्धापकाळी आपल्याला हे मूल सांभाळील या भावनेनेच ती त्याचे सगळे करते का ? पित्याचेही मुलांवर असेच निरपेक्ष प्रेम असते. त्यांनी आपल्या आईवडिलांना वृद्धापकाळी सांभाळायचे की नाही हा प्रश्न या प्रेमापुढे गौण ठरतो. असेच प्रेम भावंडांचे एकमेकांवर असते. पण जिथे नात्यात स्वार्थ आला तिथे प्रेम संपते. स्वार्थ, कपटीपणा या सारख्या भावनांनी प्रेमाचे फुल करपते. पती पत्नींचे एकमेकांवरील प्रेम असेच निरपेक्ष असते, असले पाहिजे. लग्नानंतरचे मंतरलेले जादुई दिवस काही वर्षातच भुरकन उडून जातात. मग वास्तवाला सामोरे जावे लागते. एकमेकांच्या स्वभावातील दोष, उणीवा जाणवू लागतात. पण खरे प्रेम या सर्व गुणदोषांसह समोरच्याचा स्वीकार करते. तसे नसेल तर ते खरे प्रेम नाहीच असे समजायला हरकत नाही.

मी वाचलेली एक गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा मोह आवरत नाही. एका डॉक्टरांचे हे निवेदन आहे. ते त्यांच्याच शब्दात. “ सकाळची ८. ३० ची वेळ. माझ्या दवाखान्यात कोणीही रुग्ण नव्हता. एवढ्यात एक ८० वर्षांचे वृद्ध गृहस्थ दवाखान्यात आले. त्यांच्या अंगठ्याला जखम झालेली होती. तिला टाके घातलेले होते. हे टाके काढण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. ते मला म्हणाले डॉक्टर, लवकर माझी जखम बघा आणि टाके काढा. मला दुसरीकडे जायचे आहे. माझी नऊ वाजताची दुसरीकडे appointment आहे. दवाखान्यात गर्दी नसल्याने मी त्यांचा रक्तदाब इ. तपासला. आणि त्यांच्या जखमेचे परीक्षण करू लागलो. जखम बऱ्यापैकी भरली होती. मी सहाय्यक डॉक्टरांना टाके काढण्याचे साहित्य घ्यायला सांगितले.

जखमेचे टाके काढले आणि जखमेची मलमपट्टी करताना त्यांच्याशी बोलू लागलो. मी विचारले, तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांकडे जायचे आहे का ? त्यावर ते म्हणाले, मला माझ्या पत्नीला भेटायला जायचे आहे. ती शुश्रुषा गृहात आहे. मी दररोज सकाळी तिच्यासोबत नाश्ता करतो. मग मी विचारले की कशी आहे त्यांची तब्येत ? त्यावर ते म्हणाले ती वृद्धापकाळी होणाऱ्या विस्मृतीच्या आजाराने (Alzheimer Disease) ग्रस्त असून गेली पाच वर्षे अंथरुणावर आहे. मी विचारले की तुम्हाला उशीर झाला तर त्या काळजी करतील का ? यावर ते म्हणाले की गेली पाच वर्षे ती मला ओळखत नाही. त्यामुळे माझी काळजी करण्याचा प्रश्नच येत नाही.

मी आश्चर्यचकित होऊन विचारले की त्या तुम्हाला ओळखतही नाहीत आणि तरीही तुम्ही गेली पाच वर्षे त्यांना नियमाने भेटायला जात आहात ? यावर त्यांनी दिलेले उत्तर मला थक्क करणारे होते. ते म्हणाले, मग काय झाले ? ती जरी मला ओळखत नसली तरी मी तिला ओळखतो ना.. ! अशा वेळी साथ सोडायची का ? आणि त्यांनी माझा हात हलकेच थोपटला. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यातील नकळत येणारे अश्रू मी रोखले. “

असे असते खरे प्रेम. खरे प्रेम केवळ शारीरिक नसते किंवा romantic ही नसते. खरे प्रेम म्हणजे जे काही आहे, असणार आहे या सगळ्यांचा स्वीकार करणे. जगातील सर्वात सुखी दिसणाऱ्या माणसांना सर्वच गोष्टी उत्तम मिळालेल्या असतात असे नाही पण जे काही मिळाले आहे त्यातून सर्वोच्च आनंद मिळवण्याची त्यांची क्षमता आणि मानसिक तयारी असते. म्हणूनच ते सुखी आणि समाधानी असतात.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ही दंतकथा नाही हो…” – लेखक : श्री सुधीर गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “ही दंतकथा नाही हो…” – लेखक : श्री सुधीर गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

महादेव काशिनाथ गोखले 

पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर.

आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल.

नाव महादेव काशिनाथ गोखले, जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे.

आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला.

महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3. ३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या २१ व्या वर्षी सुरु झाला ते ९० वर्षापर्यंत सुरूच होता.

सहज म्हणून घरातून फिरायला निघायचे आणि लोणावळाला जाऊन यायचे तेही पायी.

शीर्षासन करून फक्त दोन्ही हातावर पर्वती चढायचे तर कधी पाठमोरं चढायचे. आपल्या बायकोला पाठंगुळीवर घेऊन पर्वती चढायचा विक्रम तर ४३ वेळा वेळा केला होता.

आता एवढा व्यायाम असेल तर खुराक पण तसाच हवा नां राव. नव्वद वर्ष पूर्ण केल्यावरही एकावेळी ९० जिलेब्या पैजेवर सहज फस्त करायचे. त्यांचे एक मित्र होते साताऱ्याचे तुळशीराम मोदी. ते त्यांना सकाळच्या नाश्त्याला खास एक किलो कंदी पेढे पाठवून द्यायचे. पुण्याच्या सुप्रसिद्ध काका हलवाई दुकानातून रोज एक किलो पेढे त्यांच्या घरी पोहचवले जायचे.

या अचाट भिडूच्या स्कीलचा वापर कोणी केला नसता तर नवल.

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता. तेव्हा त्यांनी क्रॉसकंट्री मॅरेथोन स्पर्धेत २५७ मेडल मिळवले होते. त्यांची किर्ती ऐकून ४ ब्रिटीश अधिकारी त्यांच्याकडून ऑलिम्पिकसाठी ट्रेनिंग घ्यायचे. फावल्या वेळात त्यांना मराठी, हिंदी शिकवायचे.

पुढे त्यांना साठेबिस्कीट कंपनीमध्ये नोकरी लागली. साठे बिस्कीटचे मुख्यालय होते कराचीला. तर बाबुरावांना पावसाळ्याचे ४ महिने सोडले तर कराचीला आठ महिने नोकरीसाठी राहावं लागायचं. पण तिथेही त्यांची अंगातली रग शांत बसायची नाही. कराची-पुणे हा प्रवास ते सायकलवरून करायचे. तिथूनच त्यांनी मानसरोवरला सायकलप्रवास देखील केला होता.

पुण्यात असताना त्यांना बालगंधर्वांच्या गाण्याची आवड निर्माण झाली होती. ते स्वतः उत्कृष्ट तबला वाजवायचे. (आता बास की किती काय करणार)

मग बालगंधर्वांची गाणी ऐकण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाचा डोअरकीपर म्हणूनही नोकरी केली होती. तिथे त्यांची सगळी गाणी पाठ झाली. पुढे कराचीला आल्यावर सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिसची आई म्हणजेच जद्दनबाई, बेगम आरा या त्याकाळच्या सर्वोत्तम गायिका गोखल्यांकडून गंधर्व स्टाईलचं गाण शिकण्यासाठी येत.

त्यांची किर्ती बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्यापर्यंत पोहचली. बाबुराव गोखलेंना त्यांनी बडोद्याला प्रिंटींग शिकवण्याच्या नोकरीवर ठेऊन घेतलं. पण खरा उद्देश त्यांच्या धावण्याला वाव देणे हा होता.

१९३६ साली जेव्हा बर्लिनमध्ये ऑलिम्पिक होणार होते तेव्हा बडोद्याच्या महाराजांना हिटलरचे खास निमंत्रण होते. सयाजीराव जर्मनीला आपल्या सोबत बाबुराव गोखल्यांना घेऊन गेले.

स्पर्धेदरम्यान गोखल्यांची हिटलरशी ओळख करून दिली. अनवाणी रोज ६०-७० किलोमीटर धावणाऱ्या या अवलिया धावपटूवर हिटलर फुल इम्प्रेस झाला. त्याने गोखल्यांना जर्मनीत काही दिवस ठेवून घेतले. त्यांचा पाहुणचार केला होता. हिटलरशी त्याकाळात त्यांची चांगली मैत्री झाली होती.

पुढे ते जेव्हा लंडनला गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे जुने शिष्य व तेव्हाचे गव्हर्नर स्वतः आले. हे बघून बडोद्याचे महाराजसुद्धा आश्चर्यचकित झाले होते.

असा हा अवलिया माणूस. तारुण्यात गंमत म्हणून घरात चित्ता, अजगर असे प्राणी पाळायचा.

टिळकांचे नातू म्हणजेच माजी विधानसभा अध्यक्ष जयंतराव टिळक हे त्यांचे खास मित्र. त्यांच्यासोबत अनेकदा शिकारीसाठी रानोमाळ भटकन्ती केली होती. स्वातंत्र्यानंतर मात्र स्वतःचं पेपरविक्री आणि बुक बाईंडिंगच छोटसं दुकान उघडलं आणि आयुष्यभर ते संभाळल.

जवळपास १०३ वर्ष जगले. रोज जेवणाला १५ भाकऱ्या खाल्ल्या. आणि हे त्यांच्या शरीरयष्टीकडे बघून जाणवायचं देखील नाही.

आयुष्यात एकदाही दवाखान्याचे तोंडही बघितलं नाही. त्यांच्या मृत्यू नंतर मेडिकल सर्टिफिकेट कुठून आणायचं हा प्रश्न त्यांच्या लेकीला आणि जावयाला पडला होता.

 – – – ही कथा वाचली तरी आपल्याला वाटेल भिडू आपल्याला थापा मारतोय. मात्र आजही पेठेत गेले तर अनेक जण त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या पराक्रमाचे साक्षीदार सापडतील. २००१ साली त्यांना प्रसिद्ध योगगुरु बिसी अय्यंगार, जेष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी, संस्कृत पंडीत लक्ष्मणशास्त्री शेंडे यांच्यासोबत पुण्याचा मानाचा शारदा ज्ञानपीठ सन्मान देण्यात आला.

लेखक : सुधीर गाडगीळ

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रफू… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रफू… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

गावातल्या जुन्या बाजारपेठेत एक छोटंसं दुकान होतं — ‘रफूवाला’.

दुकान इतकं छोटं की आत उभं राहिलं की बाहेरचं जग विसरून जावं.

भिंतीवर टांगलेले जुने कोट, फाटलेल्या शाली, झिजलेले स्वेटर्स… आणि टेबलावर एक छोटं भिंग.

 

दादाभाईचं काम एकच — रफू.

.. .. रफू म्हणजे फक्त सुई-दोऱ्याचं काम नाही.

रफू म्हणजे फाटलेलं इतकं जपून जोडणं की फट कुठे होती हेही दिसू नये.

.. .. पण हे काम सगळ्यांना जमत नाही.

कारण फक्त सुई-दोरा असला म्हणून रफू होत नाही.

त्यासाठी लागतात — वर्षांचा अनुभव, संयम, आणि कपड्याची भाषा समजणारे डोळे.

 

त्या दिवशी दादाभाईच्या दुकानात एक तरुण आला. हातात त्याने एक जुना स्वेटर धरला होता.

“भाई… हे रफू होईल का?”

भाईने भिंग लावून स्वेटर पाहिला. फट मोठी होती.

 

ते शांतपणे म्हणाले, “रफू होईल… पण वेळ लागेल.”

 तरुण थोडा चिडून म्हणाला, “इतका वेळ कशाला? दोन टाके मारले की झालं ना?”

 

भाई हलकंसं हसले.

“बाबा… दोन टाके मारणं म्हणजे शिवण.

पण रफू म्हणजे जखम लपवणं.”

 

 दुकानात एक वृद्ध माणूस बसलेला होता.

तो सगळं ऐकत होता. त्याने हळूच विचारलं ,

“भाई… कपड्याला रफू असतो…

पण नात्यांना असतो का?”

.. .. दुकानात क्षणभर शांतता पसरली.

 

त्या वृद्धाचं नाव होतं दत्ताभाऊ.

त्यांचा एक जिवलग मित्र होता — गणेश.

शाळेत एकत्र, कॉलेजात एकत्र, लग्नात एकमेकांच्या बाजूला.

लोक म्हणायचे,

“हे दोघे मित्र नाहीत…एका आत्म्याचे दोन भाग आहेत.”

 

पण आयुष्यात एक दिवस आला.

व्यवसायात पैसे आले.

पद, प्रतिष्ठा, सत्ता आली.

आणि त्याच्यासोबत आली —

.. .. अहंकाराची बारीक फट.

 

सुरुवातीला ती फट दिसलीच नाही. मग गैरसमज वाढले. एकमेकांवर शब्द झडले.

आणि एक दिवस…

.. .. नातं फाटलं.

 

दत्ताभाऊ हळू आवाजात म्हणाले,

“सुरुवातीला वाटलं… दोन फोन केले की सगळं ठीक होईल. पण अहंकाराचा दोरा खूप घट्ट असतो.”

 

वर्षं गेली.

.. दोघेही आपापल्या आयुष्यात मोठे झाले.

पण आत कुठेतरी एक जागा रिकामी राहिली.

 

भाई शांतपणे रफू करत होते.

ते म्हणाले,

“दत्ताभाऊ… कपडं फाटलं की लोक लगेच आणतात.

पण नातं फाटलं की लोक थांबतात.

अहंकार सुकू देतात… जखम खोल जाऊ देतात… .. आणि मग रफू करायला येतात तेव्हा…”

 

ते स्वेटर उचलून दाखवत म्हणाले,

“दोरा जुळत नाही… रंग जुळत नाही… आणि फट जास्त मोठी झालेली असते.”

 

दत्ताभाऊंच्या डोळ्यात पाणी आलं.

 

ते म्हणाले, “भाई… मग उपाय काय?”

 

भाईने सुई हळूच ठेवली.

.. “उपाय एकच… रफू लवकर करायचा.”

“फट दिसली की लगेच बसायचं.

दोरा संयमाचा, सुई समजुतीची, आणि गाठ माफीची.”

.. .. स्वेटर तयार झाला. फट कुठे होती हे ओळखूही येत नव्हतं.

 

तरुण आश्चर्याने म्हणाला,

“भाई… खरंच दिसत नाही!”

 

दादाभाई म्हणाले,

“कारण मी फक्त टाके मारले नाहीत.

कपड्याच्या धाग्यांतूनच धागा काढून रफू केला.”

 

दत्ताभाऊ उठले. त्यांनी फोन काढला. खूप वर्षांनी एक नंबर डायल केला.

 

फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला…

“हॅलो…?”

दत्ताभाऊंचा आवाज थरथरला.

“ गण्या, आपल्या मैत्रीला थोडा रफू करायचा आहे. वेळ आहे का?”

 

त्या दिवशी दादाभाई दुकान बंद करताना हळूच पुटपुटले , “कपड्याचा रफू मी करू शकतो. पण नात्यांचा रफू माणसांनी स्वतः करायचा असतो…

कारण –

– – फाटायला एक क्षण लागतो, पण रफू करायला कधी कधी संपूर्ण आयुष्य लागतं.”

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “यशामागे काही रहस्य वगैरे नसते…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “यशामागे काही रहस्य वगैरे नसते…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

काल खूप दिवसांनी सागर‌ भेटला. मला आवडतो तो मुलगा. खूप positive एकदम शांत. मी त्याला गुरुजीच म्हणते कारण तो माझे मोबाईल चे सर्व doubts शांतपणे clear करतो. नेहमी प्रोत्साहन देतो.

काकू येईल तुम्हाला, असं म्हंटल की माझा पण उत्साह वाढतो.

एका कंपनीचा मालक आहे तो. त्याचे चांगले दिवस खूप कष्टानंतर आले आहेत. स्पष्ट ध्येय, कष्ट, धैर्य, clear thought process व घरच्यांचा सहयोग, हीच यशाची गुरुकिल्ली आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

चांगली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वतः चा व्यवसाय सुरू करणे, ही धमक आजकाल नवीन मुलांमधे दिसते. त्या प्रवासात येणारे चढ- उतार calculated risk लक्षात घेतलेली असतेच. तरीही सर्व आपण विचार केल्याप्रमाणेच होते असे नसते ना. दुसरे, म्हणजे स्थिरस्थावर व्हायला किती वेळ लागेल?? हे निश्चित नाही. आयुष्याची तरुणाईची महत्वाची वर्षें तीच, कामाची तीच, परिवाराची मजा करायची वेळ पण तीच. म्हणजे संकल्प, त्याग, घरच्यांचे सहकार्य तर हवेच. बरोबर आयुष्याच्या गणिताकडे पण लक्ष द्यायचे आहे. सर्व गोष्टींचा balance सांभाळुन काम करायचे. कुठे थांबायचे ?? कुठे रेघ ओढायची ???हे समजले पाहिजे. व तसे वागताही आले पाहिजे. कुठे लक्ष द्यायचे ??व कुठे दुर्लक्ष करायचे ??हे ही ठरविता आले पाहिजे. पडलो तर उठून उभा राहिन ही धमक व आत्मविश्वास पाहिजे. ‌व अशा वेळेस घरच्यांचा विश्वास व आधार हवाच. .

काही लोकांना सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करून त्यांची क्रमवार मांडणी करता येते. तीच यशाची पहिली पायरी असते असं नाही की ते खूप हुशार असतात. पण त्यांना हे नक्की माहित असतं. केंव्हा काय करायचे.

विचार स्पष्ट असले व स्वतः वर विश्वास असला तरच ते करता येते. दुसरं म्हणजे यश आणि अपयशाकडे बघायचा त्यांचा योग्य दृष्टिकोन असतो. यशाची कारणे व अपयशाचे बरोबर विश्लेषण करता येते त्यांना. अशी माणसे blame game खेळत नाही. सर्व जबाबदारी स्वतः वर घ्यायची हिम्मत ठेवतात. लहान सहान गोष्टींवर लक्ष देत नाही. व घाबरत तर त्याहून नाही. कोणाचे ऐकायचे व कोणाचे नाही हे त्यांना छान जमते.

यशस्वी माणसे खूप चतुर असतात.  ते focussed असतात. शिस्तप्रिय असतात. कोणत्याही कामात मदत लागतेच, तेंव्हा योग्य लोकांची निवड करणे हे महत्त्वाचे, कारण आयुष्याला चांगले वळण मिळायला चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या माणसांची गरज असते.  

टीम management, योग्य कार्य पध्दती, कर्मचाऱ्यांचे आपापसातील संबंध, थोडक्यात आपल्या टीम ला एक मोठा परिवार समजून ज्याला काम करणे जमते, तो अर्धी लढाई तर तेथेच जिंकतो.

रोज रात्री दुसऱ्या दिवशी चे planning व दिवस संपला की त्याचे विश्लेषण ही सवय असली, तर वेळ वाया जात नाही. व योग्य दिशेने प्रवास होतो. विचारांना योग्य दिशा देता येते. सर्वात सुक्ष्म पण ताकदवर काही असेल‌ तर ते आपले विचार असतात. परिवर्तन आणण्याची अफाट शक्ती असते त्यांच्यात. संधी चालून येत नसते. ती शोधायची असते व मिळताच त्याचे सोने करता आले पाहिजे.

सर्व सामान्य माणसांची परिस्थिती साधारण सारखीच असते. झेप घेण्याची तयारी, मेहनत करण्याची प्रबळ इच्छा असली तर कदाचित वेळ लागेल पण यश नक्कीच. मिळते.  

गीतेतही सांगितले आहेच जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल.

आजचा दिवस चांगला जाणार या विचाराने जर दिवसाची सुरवात केली तर कठिण प्रसंगाचा सामना करायचे बळ आपल्या विचारांतच मिळते.

आज सागर बरोबर गप्पा मारताना चर्चेत बऱ्याच गोष्टी कळल्या. ‘ Positivity ‘ खऱ्याखुऱ्या अर्थाने समजली नवीन पिढी बद्दलचा माझा आदर अजूनच वाढला.

नवीन पिढी हुषार आहे. त्यांचे विचार, risk घेण्याची तयारी, आपल्या कामाचे ज्ञान व अभ्यास खरच कौतुकास्पद आहे.

बदलत्या जगाबरोबर धावणे जमते त्यांना. आपला मार्ग ते स्वतः आखतात. अनुभवाने श्रीमंत होतात. अशी मुले रोज नव्याने आयुष्य जगतात.

सागर सारखी मुले सध्या चालू असलेल्या ‘आत्मनिर्भर भारत ‘ या मोहिमेत आपले योगदान देत आहेत.

“जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी ही थांबवू शकत नाही.”

म्हणतात ना

“यशामागे काही रहस्य वगैरे नसते. प्रचंड कष्ट व योग्य नियोजन आणि अपयशातून जिंकायची वृत्ती त्यातुन हे साध्य करता येते.”

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मन‌ वढाय वढाय… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

 

??

☆ ✍️ मन‌ वढाय वढाय☆ सुश्री अपर्णा परांजपे

बहिणाबाईंनी मानवीमन अचूक ओळखलं आहे. मन असंख्य कल्पना सतत करत असतं. मनात विचार येणं नैसर्गिक आहे. त्या विचारांच्या दिशेने कृती केली जाते ऐच्छिक कर्माचे एक वैशिष्ट्य आहे, कर्म करावे वाटते, त्यानुसार कर्म करावेही वाटते पण सहेतुक ! काहीतरी मनात विशिष्ट विचार ठेवूनच कृती केली जाते त्यामुळे त्या कृतीचा परिणाम ही आवश्यक असतो व तो मिळतो ही! प्रश्न असा आहे की आलेला परिणाम मनाला कधी आवडतो कधी आवडत नाही. आवडणारा परिणाम त्या व्यक्तीचा अहंभाव पुष्ट करतो व नावडता परिणाम त्याला दुखावतो. विचार व कर्माची ही शृंखला अव्याहतपणे सुरू असते सोबतच सुख व दुःखही मिळत रहातात. थोडासा जरी विचार केला तर हे सुख असो की दुःख काहीच टिकाऊ नाही. सुखामागे दुःख व दु:खामागे सुख सुरुच असते त्यामुळे समाधान मात्र दूर रहाते. विचार व कृती ही धावपळ घडवतात त्यामुळे समाधान मिळत नाही. मनाचा गुणच संकल्प विकल्पाचा आहे. म्हणूनच बहिणाबाईंनी मनाला ओढाळ म्हंटले आहे. कुठेही न थांबता केलेले विचार व त्यानुसार कृती दमछाक करवतात व व्यक्ती थकून जातो.

सत्याचा शोध घेतल्याशिवाय ही दमछाक थांबणार नाही असे सांगत समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिलेत. ज्यात मनाला आधीच सज्जन संबोधून त्याच्यावर समाधान मिळवण्याची जबाबदारी टाकली. द्वाड म्हणून हेटाळणी न करता सज्जन म्हणून सन्माआन केला व त्या सन्मानाला पात्र होण्यासाठी काय करावे हा समुपदेश केला. ओढाळ मनाला शांत प्रशांत प्रसन्न करण्यासाठी ज्ञान दिले स्वतः चेच!मी कोण आहे हे कळणे प्राथमिकता ठरवली. देव कोण आहे हे सांगत आपलाच विस्तार सांगितला. आपण त्याचे अंश आहोत हे जर जाणवले तर त्याचे गुण अंगिकारणे परम कर्तव्य आहे फक्त त्यामुळेच सुख दुःखाचे हे दुष्टचक्र थांबू शकते अन्यथा पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं ही मालिका सुरूच राहील व आपला मूळ स्वभाव आनंदी आहे हे कळणारच नाही.

मनाचा उपयोग समाधान मिळवण्यासाठी करायचा असेल तर हदयाची विशालता त्याला समजावी लागेल तरच स्वतः ची मर्यादा मन ओळखू शकेल व शाश्वत समाधानासाठी स्वतः चे विचार व त्यानुसार कृती थांबवेल. मनाचा गोंधळ थांबल्याशिवाय हृदयातील शांती मिळणार नाही हे पटले की काम झाले!

मनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे त्याला जर एखादी गोष्ट पटली की मग त्याला काहीही करताना त्रास वाटत नाही. वाटणेच तर घात करते किंवा समाधान देते त्यामुळे ओढाळ मनाला तू मर्यादित नसून अमर्याद आहे असे पटले की अमर्यादाची म्हणजेच देवाची तळमळ लागते. अमर्याद कृती त्याच्याकडून विनासायास घडतात त्याही अपेक्षा विरहित व “इदं न मम”म्हणत! 

आधीच सज्जन म्हणून सज्जनासारखी कृती करवून घेणारे स्वामी म्हणूनच समर्थ आहेत.

समर्थ भेटण्यासाठी आपली तशी ओढ आवश्यक आहे. जशी तळमळ असेल तसेच सद्गुरू करवून घेतात यावर ठाम निष्ठा असणे मात्र आपले काम आहे जे मनाद्वारे केले जाते. म्हणून मनावर लक्ष ठेवणे हा समाधानाचा पाया आहे.

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुख आणि समाधान… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ सुख आणि समाधान… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

ती आणि तो रेल्वेने बडोद्याहून मुंबईला परत चालले होते. त्याने नुकतेच भरूचचे खारे शेंगदाणे विकत घेतले होते, शेंगदाणे खात गप्पा चालू होत्या आणि बोलताबोलता चर्चा “सुख” आणि “समाधान” या विषयाकडे आली.

“दोन्ही एकच आहेत की, ” तो सांगत होता.

ती हळूच हसली, आणि म्हणाली, “नाही, फरक आहे. आज ज्या गोष्टीचे सुख वाटते, उद्या त्याच गोष्टीने दुःख वाटू शकते की.

गेल्या आठवड्यापर्यंत आपल्या शेजारणीला तिच्या ४३ इंची टीव्हीबद्दल अभिमान वाटत होता, असा मोठ्ठा टीव्ही आपल्याकडे असल्यामुळे तिला आपण सुखी आहोत असे वाटत होते. पण तेच काल रमेशभाईंकडचा ५५ इंची टीव्ही पाहिल्यावर तिला दुःख झाले, ” ती सांगत होती.

“सुख – दुःख या अस्थिर कल्पना आहेत, त्या नेहमी तुलनात्मक असतात. सुख हे तात्पुरते असते, आपल्या मनासारखं अमुक अमुक घडलं, की आपल्याला सुख मिळते.

याउलट, समाधान ही आंतरिक भावना आहे, समाधानासाठी आपण बाह्य घटनेवर अवलंबून नसतो. ” ती बोलत होती, पण त्याचे तिच्याकडे लक्षच नव्हते.

मगाशी १२० रुपयाचे शेंगदाणे १०० रुपयाला मिळाल्याबद्दल ते जाम खुश होता, आपल्याला भरुचचे प्रख्यात दाणे स्वस्तात मिळाले ही कल्पना त्याला सुखी करून गेली होती, पण आता तोच शेंगदाणेवाला, तेच शेंगदाणे १०० रुपयांना दोन पाकिटे या दरात विकत होता, आणि आपण मगाशी, घाई करून ते शेंगदाणे १०० रुपयांना घ्यायला नको होते असं आता त्याला वाटत होतं.

सुख आणि समाधान यातला फरक त्याला चांगलाच समजला होता.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आठवणींच्या पोतडीतून” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “आठवणींच्या पोतडीतून☆ श्री जगदीश काबरे ☆

अवैज्ञानिक मते लादू पाहणाऱ्या धर्ममार्तंडांच्या विरोधात उभा राहिलेला पहिला वैज्ञानिक गॅलिलिओ यांची ३००वी पुण्यतिथी ठरलेला ८ जानेवारी १९४२ हा स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस आणि १४ मार्च आधुनिक विज्ञानेश्वर अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिन हा हॉकिंग यांचा मृत्यूदिन.

हॉकिंग यांना ‘का’ या प्रश्नाने आयुष्यभर पछाडले. खरे तर सामान्यही अनेकदा या ‘का’ प्रश्नास सामोरे गेलेले असतात. परंतु सर्वसामान्यांना आणि हॉकिंग यांना पडणाऱ्या ‘का’ या प्रश्नातील फरक असा की जनसामान्य आयुष्याच्या रेटय़ात या ‘का’ प्रश्नाला शरण जातात. तर हॉकिंगसारखा प्रज्ञावंत त्या ‘का’स पुरून उरतो. पृथ्वीचा जन्म मुळात झालाच का? झाला असेल तर तो कशामुळे झाला? ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ असतो. मग या पृथ्वीलाही मृत्यू आहे का? असल्यास तो कधी असेल? आणि मुख्य म्हणजे तो कशाने असेल? अशा अन्य काही पृथ्वीही आहेत का? त्यांना शोधायचे कसे? या आणि अशा प्रश्नांचा, काळाचा शोध घेणे हे हॉकिंग यांच्या जन्माचे श्रेयस आणि प्रेयसही होते.

अत्यंत खडतर आयुष्य जगावे लागत असताना कोणत्याही टप्प्यांवर त्यांची विज्ञाननिष्ठा कमी झाली नाही की अन्य कोणा परमेश्वर नावाच्या ताकदीची आस त्यांना लागली नाही. *‘‘इतकी वर्षे पृथ्वीचा उगम आणि विश्वाचे संशोधन केल्यावर माझी खात्री झाली आहे की परमेश्वर अस्तित्वातच नाही. या विश्वाचा, आपला कोणी निर्माता नाही की भाग्यविधाता नाही. म्हणूनच स्वर्ग नाही आणि नरकही नाही. या विश्वाचे अस्तित्व समजून घेण्यासाठी हाती असलेला क्षण तेवढा आपला आहे आणि तो मिळाला यासाठी मी कृतज्ञ आहे, ’’* असे हॉकिंग म्हणत.

याच अर्थाने ते धर्म या संकल्पनेचे टीकाकार होते. ‘‘धर्म हा अधिकारकेंद्रित आहे, तर विज्ञानाच्या केंद्रस्थानी असतात ते निरीक्षण व तर्क. या दोघांच्या संघर्षांत अंतिम विजय हा विज्ञानाचा असेल, कारण ते जिवंत आणि प्रवाही आहे, ’’ हे त्यांचे मत विचारी माणसाला मान्य होण्यासारखेच आहे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलगा काय करतो? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

मुलगा काय करतो? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

लग्नाच्या ठरवून केलेल्या भेटीत, मुलगी पाहायला गेल्यावर एक प्रश्न जवळजवळ हमखास विचारला जातो: “मुलगा काय करतो?”

भुराचे कुटुंब त्याच्यासाठी मुलगी पाहायला गेले. चहा-नाश्ता आणि थोड्या गप्पा झाल्यावर, मुलीच्या वडिलांनी हळूच मुख्य विषय काढला: “तर, तुमचा मुलगा सध्या काय काम करतो?”

भुराच्या वडिलांनी चष्मा नीट केला, घसा खाकरला आणि अगदी कॉर्पोरेट स्टाईलमध्ये बोलायला सुरुवात केली: “पहा, आमचा भुरा सध्या एक agro-based Direct-to-Consumer स्टार्टअपचा Founder आणि Managing Director आहे. आम्ही organic health आणि wellness सेक्टरमध्ये काम करतो. ”

हे ऐकून मुलीचे वडील अर्धे प्रभावित झालेच. “वा! मग नेमकं तुमचं प्रॉडक्ट काय आहे?”

भुराचे वडील आत्मविश्वासाने पुढे म्हणाले: “आमच्या मुख्य पोर्टफोलिओमध्ये high-protein roasted legumes आणि traditional caramelized sweets आहेत. आम्ही कच्चा माल थेट wholesale supply chain मधून घेतो, आणि मग तो आमच्या स्वतःच्या thermal processing unit मध्ये dry-roast करतो. आणि सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आमचं packaging 100% eco-friendly आणि biodegradable आहे!”

हे सगळं ऐकून मुलीचं कुटुंब थक्क झालं. एखाद्या मोठ्या multinational कंपनीसारखं वाटत होतं!

मुलीच्या काकांना राहवलं नाही, त्यांनी विचारलं: “तुमच्या कंपनीचं मुख्य ऑफिस कुठे आहे? आणि किती कर्मचारी आहेत?”

अजिबात न घाबरता भुराचे वडील म्हणाले: “पहा, हा modern lean startup चा काळ आहे, त्यामुळे आम्ही दुकानाचं भाडं आणि वीज यांसारख्या अनावश्यक खर्चांना टाळतो. आमच्याकडे एक mobile retail outlet आहे, जो रोज traffic आणि लोकांच्या गर्दीनुसार जागा बदलतो. आणि सगळं काम माझा मुलगा एकटाच पाहतो — तो एक solopreneur आहे!”

आता मात्र मुलीचे वडील पूर्णपणे गोंधळले. ही इंग्रजी त्यांना काही समजेनाशी झाली. ते म्हणाले: “मला ही marketing language नीट समजली नाही. साध्या भाषेत सांगाल का, मुलगा नेमकं काय करतो?”

तेवढ्यात कोपऱ्यात बसलेला मुलाचा मित्र हळू आवाजात म्हणाला: “काका, याचा अर्थ असा आहे की आपला भाऊ हायवेवर गाडी लावून शेंगदाणे, भाजलेले हरभरे आणि रेवडी विकतो! तो कढईत वाळूत हरभरे भाजतो आणि वर्तमानपत्राच्या घड्या करून ग्राहकांना देतो — ज्याला हे लोक biodegradable packaging म्हणतायत!”

हे ऐकून मुलीच्या वडिलांच्या हातातील चहाचा कप पडायचीच वेळ आली!

म्हणून मित्रांनो, marketing शब्दांची जादू फार मोठी असते. तुमची presentation जोरदार असेल, तर शेंगदाण्याची गाडी सुद्धा corporate startup वाटू शकते!

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “साडेतीन शहाणे…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “साडेतीन शहाणे…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

साडेतीन म्हटल्यावर नकळतच तोंडातून शहाणे असाच पुढचा शब्द बाहेर पडतो. किंवा साडेतीन शहाणे अस म्हंटल्यावर पेशवाई व सोबत सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस हीच नांव डोळ्यासमोर येतात.

पेशवाईच्या अगोदर किंवा नंतर अशा प्रकारची माणसं नव्हती किंवा नाहीत अस नाही. पण पेशवाई आणि हिच नांव साडेतीन शहाणे असा ऊल्लेख झाल्यावर येतात.

राजेशाही, पेशवाई संपली. राज्य, संस्थानं जाऊन देश, व प्रादेशिक प्रदेश म्हणजे राज्य उदयास आली. याच बरोबर वेगवेगळे पक्ष आणि त्या पक्षातल्या खंबीर नेतृत्वाची माणसं समोर आली. काहिंंनी खंबीरपणे पक्षाच नेतृत्व केलं. तर आपण खंबीर असल्याच्या बळावर काहींनी वेगळा पक्ष, गट तयार केला. तसंच काही घराणी आणि घराण्यातली काही माणसं कर्तुत्ववान असल्याच दाखवत त्यांना पुढे आणण्याचा अटोकाट प्रयत्न सुरु झाला, व तो अजूनही काही प्रमाणात बर्‍याच ठिकाणी सुरु आहे. आणि हीच राज्य, पक्ष, आणि कुटुंबातील काही माणसं पाहिली की परत आठवण होते ती साडेतीन शहाणे या शब्दाची.

पेशवाई काळातले साडेतीन शहाणे यांचा ऊल्लेख नक्की कोणत्या अर्थाने (म्हणजे चांगले का कारस्थानी) करतात हे ठामपणे सांगता आलं नाही तरी ते नक्की कोण आणि त्यातले पूर्ण आणि अर्धे शहाणे कोण हे पक्क होतं. या माणसांची आज एक उद्या अर्धा अशी अदलाबदल नव्हती. पण आज जाणवणाऱ्या साडेतीन शहाण्यांच तसं वाटत नाही.

कारण आज जो पूर्ण शहाणा वाटतो तो कदाचित उद्या अर्धा शाहणाच वाटेल, किंवा शहाणा या यादितही नसेल. तसेच सध्या एकाच पक्षात, राज्यात, घराण्यात या प्रकारचे लोक असल्याच बोललं जातं. सत्तेसाठी किंवा विरोधासाठी एकत्र येण्याचा कल दिसतो. यासाठी धर्म, जात, भाषा, ऊत्सव या (साडेतीन) गोष्टिंचा आधार घेतलेला दिसतो. काहीवेळा खरंच याच गोष्टिंना आधार देण्याची, व यांचा आधार घेण्याची गरज आहे याची जाणीव होते. तर काही वेळा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी याचा वापर केला असं वाटतं. मग यासाठी एकत्र आलेल्या लोकांमधे या प्रकारचे साडेतीन शहाणे सत्तेेसाठी, विरोधासाठी एकत्र असल्याचा सुर निघतो. या एकत्र आलेल्या साडेतीन शहाण्यांचे परत आपले आपले साडेतीन शहाणे असल्याची चर्चा होते. आणि या साडेतीन शहाण्यांची साखळी किंवा संख्या वाढत जाते असं वाटलं तरी जनमानसात सगळ्यांचा ऊल्लेख साडेतीन शहाणे असाच होतो. आणि बर्‍यचदा त्यात उपहास, टिंगलच जाणवते.

यातला एखादा मुळातच अर्धा असतो. पण आपणच पूर्ण असल्याच्या विश्वास त्याला वाटतो. लोक आपल्यामागे फिरतील असा भ्रम त्याच्या मनात निर्माण झाल्याने मग तो तळ्यात मळ्यात करतो. आणि तो येऊन मिळाल्याने अगोदर संख्येने तीन असणारे व्यावहारिक द्रृष्ट्या साडेतीन झाल्याची चर्चा सुरू होते. विचारांप्रमाणे या चर्चेत गांभीर्य, उपहास, विनोद सगळच जाणवतं.

मुहूर्तांंमधे साडेतीन मुहूर्त, देेवस्थानात साडेतीन शक्तीपीठं हे शब्द कायम वापरले जातील. तसंच शहाणे हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला तरी साडेतीन शहाणे असा वापर यापुढे सुध्दा होत राहील असं वाटत.

 ©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares