जेवण कसलेहि असो, पंगतीला ,,तूप,, वाढले कि,मगच जेवायला सुरवात करायचि, आपलि परंपरा आहे. एकंदरित तूप हा अविभाज्य घटक आहे.
(१) जुन्या काळात युद्ध लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठि, तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारि.
(२) घ्रूत,अज्या, घि, हवि, सर्पि वैगेरे विविध नावाने तुपाला संबोधल्या जाते. तुप मधुर, अत्यंत बलवान, थंड , पित्तशामक, मेद मज्जा, शुक्र धातूंचे पोषण करणारे आहे.
(४) तुपामुळे स्मुर्ति, बुद्यि, आदिंचि वाढ होते. तूपाचे वैशिष्ट्य हे कि, तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तूपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे।
(५) तूपामूळे स्वरयंत्र सुधारते. आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाहि व रसायन गुणधर्माचे आहे.
(६) तूप कोणत्याहि रोगांत, विशेषतः वात-पित्त-कफ विकारांत वापरता येतं आयुर्वेदांत अनेक औषधि द्रव्ये तूपात सिद्ध करून त्यांचे औषधे बनवलि आहेत.
(७) डोके दुखत असेल तर, तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत. किंवा दुखर्या कपाळावर हलकेच मालिश करावि.
(८) १०० वेळा धुतलेले (शतधौत घ्रुत) तुप त्वचाविकार, जखमांवर, अंगाला खाज, टाचा फुटणे, अंग फुटणे, या विकारात गुणकारि आहे.
(९) तूप किंचित कोमट करून खाल्ल्यावर उचकि थांबते. रात्रि झोपतांना एक पेलाभर दूधांत एक चमचा तूप टाकून प्यायल्यास सकाळि पोटाचा कोठा मोकळा होतो. बद्धकोष्ठ, मुळव्याध बरि होते.
(१०) तुपामुळे मेद, चरबि वाढते हि समजूत चुकिचि आहे. नेहमि जे हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात, त्यांनि अवश्य तुप खावे.
(११) कँसरच्या रूग्णाला तूप म्हणजे अम्रूतासमान.. कारण तूपात कँसरच्या पेशिंचि वाढ थांबवण्याचि शक्ति आहे.
तेव्हा अश्या बहुगुणि तुपाला आहारात श्रेष्ठ स्थान आहे च….
संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दोन तळहात जोडून झालेला हा खोलगट भाग म्हणजे ओंजळ, एक हाताने जेव्हा काही स्वीकारता – घेता येत नाही तेंव्हा आपण ओंजळ वापरतो, लहानपणी इवल्याश्या हातात गोळ्या, चिंचोके, गोट्या, फुलं मावत नाही तेव्हा ओंजळ पुढे येते, न चुरगळता, न गळता अलवार ओंजळीत धरलेली फुले हात सुगंधी करून जातात. खरे प्रेम असेल तरच ओंजळीत प्राजक्त ताजा रहातो म्हणे !
तहानेने व्याकुळ झालेला जीव जेव्हा रानावनात भटकतो, तेव्हा झर्यातले, ओढ्यातले, विहिरीचे, नदीचे पाणी पिण्यासाठी ओंजळ पुढे येते थंडगार पाण्याने मन तृप्त होते.
शालेय जीवनात गोट्या घेण्यासाठी, शेंगा घेण्यासाठी ओंजळच उपयोगी पडते.ओंजळीत बोरे, चिंचा मावत नसतात.लपाछपी खेळताना ओंजळीत चेहरा लपवला जातो.लहानपणी गजगे बिट्ट्याचा डाव खेळताना ओंजळीचाच उपयोग होत असे.चिंचा झेलायला, फुले वेचायला, देवाला फुले वहायला ओंजळच उपयोगी पडते आणि हो! त्याची न तिची नजरानजर होताना…इश्श!…नकळत ओंजळीत चेहरा झाकला जातो.
कोणतीही वस्तू दान देताना ओंजळीचा उपयोग होतो.
जी वस्तू आपण ओंजळीत धरतो तिच्या अस्तित्वाचा गन्ध ओंजळीला लागतो.पाण्याचे अर्ध्य दिलं तर ओंजळ ओली होते.फुले असली तर गन्ध लागतो,फुलपाखरांचे रंग अन वाळू असेल तर रेती !
दान देणाऱ्याची ओंजळ तर ईश्वर कधीच रिकामी ठेवत नाही.भरलेली दानाची ओंजळ मनाची समृद्धी दाखवते अन ओंजळीत दुवा साठतो.आपल्या ओंजळीत आपण काय भरायचे हे आपली सद्सद्विवेक बुद्धीच ठरवते नाही का ??
जेव्हा पण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते.
जेव्हा आपण स्वार्था पलीकडे जाऊन निसर्गासाठी, समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो तेव्हा सिरोटोनिन तयार होते. एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा अशा प्रकारचे लिखाण करणे यामुळे सुद्धा सिरोटोनिन तयार होते.
हे अशासाठी कारण आपण आपला बहुमूल्य वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करत असतो.
ऑक्सिटोसिन
हे तेव्हा तयार होते जेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो, आपलेपणाने वागतो.
जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला अलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन तयार होते.
मुन्नाभाई सिनेमा मध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काम करते.
तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळे सुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होते.
तर मित्रांनो, खूपच सोपे आहे.
दररोज व्यायाम करून इंडॉर्फिंस मिळवा, छोट्या-मोठ्या पण अर्थपूर्ण अशा गोष्टी साध्य करून डोपामाइन मिळवा, इतरांना मदत करून सर्वांशी चांगले वागून बोलून सेरोटोनिन मिळवा आणि आप्तेष्टांना बिलगून ऑक्सिटोसिन मिळवा!
अशाप्रकारे तुम्ही आनंदी राहायला शिकलात, की तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांना तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.
आता आपल्याला समजले की उदास दिसणाऱ्या एखाद्या छोटुकल्याला किंवा चिमुरडीला आपण मिठीत घेण्याची गरज असते.
आपला आनंद दिवसागणिक वाढवत नेण्यासाठी…
१. कोणता तरी खेळ खेळण्याची सवय लावून घ्या आणि खेळाचा आनंद लुटा. – इंडॉर्फिन
२. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा. कौतुक करण्याची संधी कधीच दवडू नका. – डोपामाइन
३. जे काही चांगले आपल्याकडे आहे ते इतरांनाही मिळावे यासाठी जमेल तितके प्रयत्न करा.- सेरोटोनिन
४. जवळच्या माणसांना विना संकोच आलिंगन द्यायला शिका. यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा किती तरी पटींनी अधिक असतो.- ऑक्सिटोसिन
आनंदी राहा, मस्त जगा!
– अनामिक
संग्राहिका : – अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आनंददायी संप्रेरके – चार संप्रेरके जी माणसाला आनंदी ठेवतात….
बागेत रोजच्याप्रमाणे सकाळी फिरायला गेलेले मी आणि माझी बायको एका बाकावर बसलेलो होतो. थोडावेळ निवांत गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली की ती आयुष्यात आनंदी नाही आहे. माझा विश्वास बसेना कारण लौकिक दृष्ट्या तिच्याकडे सर्व काही उत्तम आहे. मी विचारले, “असे का वाटते तुला?”
“मला माहित नाही. सगळेजण म्हणतात की माझ्याकडे सर्व काही आहे पण मला आतून आनंदी वाटत नाही आहे.”
आता मी स्वतःला विचारू लागलो की खरच मी स्वतः आनंदी आहे का?
काही वेळानंतर मला माझा आतला आवाज सांगू लागला – नाही! मला सुद्धा आनंदी वाटत नव्हते.
माझ्यासाठी हा एक धक्का होता. मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली, असे का वाटत आहे?
आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरवले. काही लेख वाचले, तज्ञ व्यक्तींशी बोललो, पण काहीच मेळ बसत नव्हता. शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला एक उत्तर दिले ज्यामुळे माझे समाधान झाले.
त्याने जे सांगितले ते मी अमलात आणले आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी मनुष्य आहे.
तो म्हणाला, आपल्या शरीरात चार संप्रेरके असतात यांच्यामुळे आपल्याला आनंदी, प्रसन्न वाटत राहते-
१. एंडॉर्फिंस
२. डोपामाईन
३. सेरोटोनिन
४. ऑक्सिटोसिन
आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे.
इंडॉर्फिंस
आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते.
हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते.
मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो कारण इंडॉर्फिंस आपल्याला आनंदी वाटण्यास मदत करतात.
हसणे हा इंडॉर्फिंस निर्मिती साठी आणखी एक चांगला मार्ग आहे.
आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काही तरी विनोदी वाचणे ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे इंडॉर्फिंस निर्मितीसाठी मदत करू शकते.
डोपामाइन
आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होत असते.
जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते.
तून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते.. कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते. आपण जेव्हा काम करतो, पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा सुद्धा डोपामाइन तयार होते. आता आपल्याला समजले का, खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते?
क्रमशः…
– अनामिक
संग्राहिका : – अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
नरेंद्रला मन एकाग्र होण्याची अद्भुत शक्ती बालवयातच लाभली होती.मनाची एकाग्रता आणि उत्तम स्मरणशक्ती हे त्याचे विशेष गुण लहानपणापासूनच लक्षांत येत होते. लहान मुलं ऐकत नसतील तर आपण त्यांना,कशाची तरी भीती दाखवतो,तू ऐकलं नाहीस तर बाऊ होईल,बुवा येईल,देवबाप्पा अमुक करेल,असे आणखी काही.अशीच भीती नरेंद्रला ही दाखवली गेली होती,त्याला लहानपणी खेळताना झाडावर उंच चढण्याचा छंद होता.
मित्रांशी खेळताना,एकदा अंगणातल्या चंपक वृक्षावर पारंब्याना धरून लांबच लांब झोके घेण्याचा खेळ नरेंद्र खेळत होता. ते मित्राच्या वडिलांनी, रामरतन बसूंनी पाहिले,या वृक्षाच्या फांद्या फार बळकट नसतात,तुटल्या तर, खाली पडेल,नरेंद्रचे हातपाय मोडतील या काळजीने त्यांनी सांगितले,”नरेंद्र,खाली उतर,पुन्हा या झाडावर चढू नकोस”, त्यावर नरेंद्रने विचारले,”का? चढले तर काय होईल?यावर काहीतरी भीती आताच घालून ठेवली तर बरे होईल या हेतूने बसू म्हणाले,”या झाडावर ब्रम्हरक्षस आहे, मोठा भयंकर आहे, झाडावर कोणी चढलं तर तो रात्री येऊन मानगुटीवर बसतो” नरेंद्रने हे शांतपणे ऐकून घेतले आणि बसू पुढे निघून गेल्यावर तो पुन्हा झाडावर चढला, तसे मित्र म्हणाला,अरे ब्रम्हराक्षस मानगुटीवर बसेल ना? क्षणाचाही विलंब न करता, नरेंद्र म्हणाला, अरे तू काय खुळा आहेस का? आपण या झाडावर खेळू नये म्हणून असंच सांगितलंय आपल्याला, खरोखरीच ब्रह्मराक्षस असता तर तो या आधीच माझ्या मानगुटीवर नसता का बसला? असा हा घटनेच्या मुळाशी जाऊन,त्याचं स्वरूप समजावून घेण्याची नरेंद्रची वृत्ती होती.
लहान वयातच ध्यान मंदिरात ध्यानधारणा करणे हे नरेंद्र सुरुवातीला खेळ म्हणून खेळायचा. नंतर छंद म्हणून करू लागला. पण तो ध्यानासाठी बसला की सर्व देहभान विसरून जायचा. त्याला भानावर आणावे लागे.
बैराग्यांच्या मस्तकावरच्या जटांचे त्याला लहानपणी भारी आकर्षण वाटायचे. एकदा त्यानं ऐकलं होतं की बराच वेळ शिवाचं ध्यान केलं की आपल्या डोक्यावर जटा वाढतात आणि खूप लांब होऊन जमिनीत शिरतात. मग काय नरेंद्र ध्यान लावून बसला आणि आपले केस वाढताहेत का, लांब झालेत का, ते तपासू लागला. खूप वेळ झाला तरी काहीच घडेना, मग आईकडे जाऊन, “एव्हढा वेळ झाला तरी जटा का वाढत नाहीत?असे विचारले. आईने सांगितले, इतका थोडा वेळ ध्यान केल्याने जटा वाढत नसतात, त्यासाठी खूप दिवस जावे लागतात,”अशा घटनातून नरेंद्रला संन्यासी आणि बैरागी यांच्या बद्दल मनातून ओढ असायची हे दिसते. संन्याश्या चे नाते शिवाशी असते असे त्याला माहिती होते.
एक दिवस त्याने आपल्या अंगावर भस्माचे पट्टे काढले,कपाळावर टिळा लावला,कमरेभोवती एक भगव्या रंगाचे कापड गुंडाळले,आणि “हे बघा मी शिव झालो,”असे आनंदाने ओरडत घरभर उड्या मारू लागला.ही नकळत असलेली ओढ पाहून भुवनेश्वरींना मनातून धास्ती वाटली,की आपला हा मुलगा आजोबांच्या मार्गाने जाऊन संन्यासी तर होणार नाही ना?
मोठा होता होता नरेंद्र युवावस्थेत येईतो लहानपणीचे ध्यान लावणे, मित्रांना जमवून गप्पा मारणे, चर्चा करणे, गंगेवर जाणे हे प्रकार पुढे परिपक्वतेने होऊ लागले. ज्ञानाच्या आधारे होऊ लागले.
दिखाऊपणा किंवा उथळपणा त्यांच्या वृत्तीत मुळातच नव्हता, केवळ उत्तम कपडेलत्ते घालून मिरवणे म्हणजेच आपले सर्वस्व समजणारी मुले/मित्र यांचा त्याला खूप तिटकारा होता. कुठल्याही मिळमिळीत गोष्टी करमणुकीसाठी का असेना, नरेंद्रच्या जीवनात त्याला स्थान नव्हते.
त्याच्या संन्यस्त वृत्तीचा युवा अवस्थेतला एक बोलका प्रसंग आहे. ‘शांतपणे अभ्यास करायला नरेंद्र आपल्या आजीच्या घरी अधून मधून जात असे, माडीवरच्या खोलीत तो अधून मधून गाणी पण म्हणत असे. गाणे चालू असताना, एकदा समोरच्या घरांत एक वैधव्य आलेली तरुण मुलगी नरेंद्रच्या मधुर आणि धुंद स्वरांनी भान हरखून गेली आणि क्षणात बाहेर पडून,नरेंद्र गात होता त्या खोलीच्या दारात येऊन उभी राहिली,एक नवयौवना आपल्या दाराशी येऊन आपल्याला निरखते आहे हे कळताच नरेंद्र तत्परतेने उठून तिच्या पायाशी वाकून तिला प्रणाम करत म्हणाला,”माताजी का आला होतात? काय काम होतं? मोकळेपणाने सांगा, मी तुम्हांला माझ्या आईच्या जागीच मानतो” यातून व्यक्त झालेला अर्थ त्या मुलीने समजायचा तो समजला आणि दुसऱ्याच क्षणी निमुटपणे घरी निघुन गेली. नरेंद्रने त्या दिवसापासून अभ्यासाची खोली बदलली, पुन्हा कधीही तो तिथे बसला नाही, या तरुण वयात संन्यस्त वृत्तीच्या प्रकृतीचा आविष्कार एका क्षणात घडला होता. ही नरेंद्रच्या आंतरिक अध्यात्मिकतेची च खूण होती.
हो ना …तू असा दुनियेच्या संसारात गुंतलेला तुला कुठे ठाऊक आहेत या उरीच्या वेदना ?? या प्राजक्ताच्या झुळुकीसारखेच तुझे अस्तित्व …तू आलास म्हणून मोहरून जातात दिशा …स्तब्ध होतो वारा …… मध्यान रात्री पक्षी फडफडतात …सूर्यही अवचित डोकावतो अवेळी काळ्याशार ढगांच्या जळात …गायी कान टवकारतात ..इतकेच काय ती तुझी बासुरी सुद्धा अधीर होते तुझ्या कोमल अधरांवर विसावायला …थरथरते तिचीही काया अन अधीर होते तुझ्या मंजूळ स्पर्शासाठी …केवड्याच्या बनात नाग उगीचच सळसळत रहातात …निशिंगन्ध डोकावतो हळूच हिरव्या पानाअडून तुझ्या आगमनाची वार्ता पसरावयाला ! पण …पण तू येतोस …विद्युल्लतेच्या वेगाने … धड -धड होते काळजात ..कालिंदीच्या डोहात तरंग उठत रहातात …आसुसतो तोही डोह …तुझ्या चरण कमलाना स्पर्शायला … धावते वेड्यासारखी मीही तुझ्या भेटीला पण …पण पितांबर लहरत रहातो रुक्मिणीच्या परसदारात …चांदण झुला झुलत राहतो …..कर -कर आवाज अंधार कापत जातो ..कस्तुरी रेंगाळत रहाते आसमंतात …खोलवर श्वासात रुतत जाते माझ्या .. .. अन … अबोल प्राजक्त हळुवार ओघळतो त्या काजळलेल्या डोळ्यांच्या व्याकूळ काळोखात नि:शब्द ….
माझ्या आई-बाबांनी एकमेकांना त्यांच्या नावाने कधीच हाक मारली नाही… निदान आमच्यासमोर, चार चौघात तरी नाहीच.
त्यावेळी यांना एकमेकांजवळ बसून अगदी प्रेमाचं तर सोडाच, पण कधी साधं कुजबुजतांनाही ऐकल्याचं आठवणीत नाही.
बाबा आईसाठी साडी घेऊन येत असत नवी, तेव्हा तिला जवळ बोलावून, प्रेमाने तिच्या हातात ती साडी देणं, हा प्रकार नसे, तर पिशवी टेबलावर ठेऊन बाहेरुनच ओरडून सांगत असत “अगं हे बघ जरा बरंय का?”
आणि आईला ते बरं नाही, तर कायम अप्रतिमच वाटत असे…! बदला बदलीचा प्रश्न कधीच ऊद्भवला नाही.
बाबा आईवर ओरडायचे… चिडायचे… अगदी आमच्यासमोर तिला बोलायचे.
पण आईने चुकून कधी ‘अरे’ ला ‘कारे’ केल्याचं पुसटसही स्मरणात नाही.
तसं करणं चुकीचं आहे, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण त्याकाळातही बाई नोकरी करत असे…
कदाचित घरच्या परिस्थितीमुळेही, असेल, पण…
“मीही कमावते… मीही खुप दमते… मग मीच एकटीने का म्हणून करायची ही राब राब?” हे वाक्य त्या पिढीतील कुठल्याही बाईने, तिच्या नव-याला ऐकवलं नसेल… कधीच.
राग यायचा बाबांचा… एक wicked thought यायचा खुप लहान असतांना मनात की, सुट्टीच्या दिवशी दुपारचं जेऊन मस्त घोरत पडलेल्या बाबांच्या ऊघड्या राहिलेल्या तोंडात भांडंभर पाणी ओतावं नी पळून जावं…
पण हा विचार मी त्या कधीच न घेतलेल्या भांड्यातील पाण्याच्या घोटाबरोबरच गिळत असे.
एक भक्कम अस्तित्व त्यांचं, आम्हा सगळ्यांना निर्धास्त करत असे, यात काडीमात्र शंका नाही.
या माझ्या बाबांना आईच्या आजारपणांत… दोन-एक मोठ्या आँपरेशन्स दरम्यान मी दिवस रात्र तिच्यासाठी झटतांना पाहिलंय… तिच्या उशाशी जागतांना पाहिलय, एखाद्या क्षणी हतबल… हळवं होऊन डोळ्यांची ओली किनार रुमालात लपवतांना पाहिलंय.
गोवंडीला झालेली आईची बदली जीवाचा आटापीटा करुन, महिन्याभराच्या आत विक्रोळीला आणून ठेवल्याचंही पाहिलंय.
माहेराला गिरगावात आलेल्या आईला नी आम्हाला, दिवसाआड आँफिसमधुन येऊन… भेटुन… फक्त डोळ्यांवाटे तीची चौकशी करुन… आधी डोंबिवली नी मग मुलुंडला अपरात्री परततांना पाहिलय.
आताशा आई बाबांवर ओरडते… आणि बाबांची गोगलगाय होते… पण आईचा राग येत नाही… ऊलट मजा वाटते,फिरलेली चक्र पाहून. कारण, मला माहित असतं, की, ‘हे तिचं ओरडणं म्हणजे स्वतःआधी बाबांसाठी जगणं असतं.’
बाबांची औषधं… पथ्य-पाणी ही तीची priority झालीये अगदी स्वतःची, वितभर वरुन बोटभर झालेली खळगी भरण्याही आधीची.
‘बाबांनी कमरेला पट्टा बांधलाय/ नाही बांधलाय,’ याला ती ‘आपण गळ्यात मंगळसुत्र घातलय/ नाही घातलय’, या गोष्टीईतकच महत्व देते.
रात्री झोपतांनाही मंगळसुत्र गळ्यातुन न काढणारी ती, बाबांनी पट्टा काढलाय की नाही हे आवर्जुन बघते.
आमच्या पिढीच्या उघड… उथळ… दिखाऊ प्रेमापेक्षा, ह्या पिढीचा अव्यक्त… अबोल… खोल जिव्हाळा, हे अनाकलनीय सत्य आहे माझ्यासाठी… अगदी निर्विवादपणे.
आयुष्यभर एकमेकांशी चार घटकाभरही निवांत होऊन न बोललेली ही पिढी, एव्हढी घट्ट एकमेकांशी कशी राहू शकते?
एकमेकांना कधी चोरटा स्पर्श ही न करणारी ती पीढी, फक्त डोळ्यांतून साठलेल्या प्रेमावर एव्हढा लांबचा पल्ला एकत्रीत कसा गाठू शकते?? हे मला सतावणारे गहन प्रश्न होते… आहेत… राहतील.
ह्या त्यांच्या अबोल ‘Attachment’ ला खरंच माझं साष्टांग दंडवत आहे 🙏
पत्रकार विकास शहा
दैनिक लोकमत, शिराळा (सांगली)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
शब्द सुंदर असतात. त्यांना रंग असतात आणि भावनाही. पण शब्द फसवेही असू शकतात यावर एरवी माझा विश्वास बसला नसता. पण मला खूप वर्षांपूर्वी एकदा ‘साळसूद’ या शब्दामुळे आणि आता या विषयाच्या निमित्ताने ‘डल्ला’ या शब्दामुळे याचे प्रत्यंतर आले.
‘साळसूद’म्हणजे साधा, भोळा, पापभीरू असा माणूस.खूप वर्षांपूर्वीची गोष्ट.तेव्हा टिव्हीवर गाजत असलेल्या स्मिता तळवळकर निर्मित आणि दिलीप प्रभावळकर अभिनित ‘साळसूद’ या प्रचंड लोकप्रिय मालिकेमुळे मराठी भाषिकांमधेही फारसा रोजच्या बोलण्यात न येणारा ‘साळसूद’ हा शब्द घरोघरी जाऊन पोहोचला होता. पण त्या शब्दाच्या अतिशय चुकीच्या अर्थासह.यात अर्थात त्या शब्दाची कांहीच चूक नव्हती. त्या मालिकेमधे वरवर साळसूद वाटणार्या माणसाची मध्यवर्ती भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी केलेली होती. तो इतरांसमोर वागता बोलताना अतिशय गरीब, पापभीरू वाटणारा पण प्रत्यक्षात अतिशय बेरकी आणि कपटी असा माणूस असतो.संधी मिळेल तेव्हा तो इतरांच्या नकळत जमेल तिथे डल्ला मारुन नामानिराळा राहून सर्वाना फसवत असतो. त्याच्या साळसूदपणामुळे कुणालाही त्याचा संशय मात्र येत नाही. या मालिकेच्या जन मानसावरील प्रभावामुळे अनेकांचा ‘साळसूद’ म्हणजे कटकारस्थानी, कपटी असाच समज दृढ झालेला होता.त्या निमित्ताने हा शब्द सर्रास बोलण्यातही येऊ लागला होता पण तो मात्र कुणाही बेरकी माणसाचं वर्णन करताना ‘तो एक नंबरचा साळसूद आहे’ असा चुकीचा वापर करुन. याला आपल्या भाषेबद्दलच्या अज्ञानापेक्षाही त्या टीव्ही मालिकेचा प्रभाव हेच तत्कालिक कारण असलं तरी शब्दही फसगत करु शकतात याचं ते एक उदाहरण होतं.
‘डल्ला’ शब्दही असाच. ‘डल्ला’ म्हणजे ‘चोरणे’असा अर्थ सर्रास गृहीत धरला जातो. खरंतर ‘डल्ला’ असा सुटा शब्द आपण कधीच वापरत नाही.तो ‘डल्ला मारणे’ असाच ‘ चोरी करणे’ या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे नकळत डल्ला म्हणजे चोरी असे गृहीत धरले जाते पण तो या शब्दाच्या वापरातील ध्वनीत अर्थामुळे झालेला चुकीचा समज आहे.
‘डल्ला’ या शब्दाचा खरा अर्थ ‘पैसाअडका’, ‘संपत्ती’, ‘खजिना’असा आहे. त्या पैशावर, संपत्तीवर हात मारणे,खजिन्याची लूट करणे म्हणजे ‘डल्ला मारणे’.
म्हणजेच चोरी करणे.’डल्ला मारणे’ हा दोन शब्दांच्या संयोगाने तयार झालेलाच पण जोडशब्द नव्हे तर ‘वाक्यप्रचार’ आहे. ‘वाक्यप्रचारा’चं वैशिष्ट्यच हे की तो तयार होताना त्या दोन्ही शब्दांचे मूळ अर्थ नाहीसे होऊन त्या वाक्यप्रचाराचा एक वेगळाच अर्थ निर्माण होत असतो. उदाहरण म्हणून ‘डल्ला मारणे’ हाच वाक्यप्रचार घेऊ.इथे ‘डल्ला’ या शब्दाचे पैसा,संपत्ती,खजिना यासारखे अर्थ आणि ‘मारणे’ या शब्दाचा ‘ताडन करणे’ हा असे दोन्ही अर्थ लोप पावून ‘चोरी करणे’ हा अर्थ निर्माण होतो.अशा वाक्यप्रकारांची ‘हात दाखवणे’ , ‘हात मारणे’, ‘डोळा असणे’, ‘घामटा निघणे’,’नाक खुपसणे’ ‘साळसूदपणाचा आव आणणे’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.
अर्थात चोरी केल्यामुळे होणाऱ्या फसगतीसारखा त्रास या अशा फसव्या शब्दांच्या फसगतीमुळे होत नाही हे खरेच.म्हणूनच याला फारतर हसत हसत फसवून असे शब्द स्वतःकडे कारणपरत्त्वे आपलं लक्ष वेधून घेतात असे फारतर म्हणता येईल.तरीही अशा फसव्या शब्दांचा वापर करताना आपणं सावध रहायला हवंच.
खिडकीतून बाहेर आकाशाकडे पहाताना उन्हाच्या झळा घरात बसून सुध्दा अंगाला जाणवत होत्या! एप्रिल महिन्याचा मध्य म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता खूप जास्त! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके विखुरलेले दिसतात होते आणि माझं मनही असंच विचारांच्या आवर्तात भरकटत होतं!
लहानपण डोळ्यासमोर आले,परिक्षा संपण्याच्या आनंदाबरोबरच मोठ्या उन्हाळी सुट्टी ची चाहुल लागलेली असे.ही सुट्टी कशी घालवायची याची स्वप्नं रंगवत दिवस जायचे. आतासारखे टिव्ही, मोबाईल, मोबाईल गेम, सिनेमा हे विश्व आमच्या समोर नव्हते, फार तर परिक्षा झाल्यावर एखादा सिनेमा बघायला मिळायचा! कोकणात तर सुटीत पत्ते खेळणे, समुद्रावर फिरायला जाणे आणि गाण्याच्या भेंड्या,डबा ऐसपैस सारखे खेळ खेळणे हीच करमणूक होती.सकाळी आटवल भाताचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणापर्यत आम्ही घरात फिरकत नसू!आंबे बाजारात सुरु झाले की रोज आमरसावर ताव मारणे,फणस,काजूचा आस्वाद घेणे यात दुपार कधी सरायची कळत नसे.घामाच्या धारा वहात असायच्या,पण संध्याकाळी ऊन उतरले की समुद्रावरचा वारा ‘शीतल विंझणवार्या’सारखा वाटायचा.
बालपण कोकण चा मेवा खात कधी संपलं कळलंच नाही आणि काॅलेजसाठी देशावर आले.देशावरचे उन्हाळी वातावरण खूपच वेगळे! ऊन खूप असे, पण घामाच्या धारा कमी! संध्याकाळी ४/५नंतर हवा एकदम बदलत असे या दिवसात! अभ्यासाच्या वार्या बरोबरच बाहेरची हवाही बदलती असे.दुपारचे कडक ऊन संध्याकाळी वार्या वावटळीत कमी तीव्र वाटायचे! हाॅस्टेलवर रहात असताना जानेवारी नंतर हवेतला गारवा कमी होऊन वातावरण तापत असे.आमच्या काॅलेजच्या परिसरातील झाडांची पाने पिवळी, करड्या रंगाची दिसू लागत, अधून मधून वावटळीत सुटे आणि दूरवर फुफाटा उधळत असे.वसंत ऋतूच्या चाहुलीने निसर्गात सृजनाची निर्मिती दिसायला सुरुवात होई.झाडांवर पालवी फुटलेली दिसे.कोकिळेचे कूजन ऐकायला येई, कुठेतरी निष्पर्ण चाफा पांढर्या, गुलाबी रंगाचे वस्त्र पांघरून दिसे तर कुठे पिवळ्या, जांभळ्या फुलांची शाल पांघरलेला कॅशिया असे! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर गुलमोहराचे केशरी तुरे खुलून दिसत! मोगरा,मदनबाणाची छोटी छोटी झुडुपे पांढर्या कळ्यांनी भरून गेलेली दिसत.संध्याकाळी त्यांचा सुगंध सगळा परिसर गंधमयी करत असे!अशा या वातावरणात आकाशात ढगांची बदलाबदली कधी सुरू होई कळत नसे! पांढरे शुभ्र ढग हळूहळू करडे बनत,बघता बघता आकाश काळ्या ढगांनी भरून जाईल.ढगांचा कडकडाट, आणि विजेच्या गडगडाटासह हवा आपलं रूपच पालटून टाकत असे.जोराचा वारा सुटला की पाखरे लगबगीने आपल्या घराकडे परतू लागत आणि मग जी वळवाची सर येई त मृद्गगंध उधळीत, जीवाला शांत करीत येई!तो पाऊस अंगावर झेलू की टपटप पडलेल्या गारा वेचू असं होऊन जाई, छपरावर, रस्त्यावर सगळीकडे गारांचा सडा पसरलेला दिसे.डोळ्यासमोर तो वळीव असा उभा राहिला की मन मोराचा पिसारा किती फुलून जाई ते वर्णनच करता येत नाही.पावसाची पहिली सर अंगावर घेतली कि तो वळीव प्राशन करून घ्यावासा वाटतो! पावसाची सर थांबता थांबताच आकाशात इंद्रधनुष्याची कमान बघायचं सुख अनुभवायला मिळते.पांढर्याशुभ्र ढगातून बदलत जाणारा तो काळा ढग!असा ओथंबून येतो की,त्याची होणारी बरसात मनाचे शांतवन करते. कधी कधी मनाला प्रश्र्न पडतो की,ते पांढरे ढग काळ्यामध्ये परावर्तित झाले तरी कधी? विजेच्या संगतीने कडकडाट करीत हे भावव्याकुळ ढग प्रुथ्वीवर रिते कसे बरं होतं असतील? पांढरे ढग श्रेष्ठ की काळे ढग?अशा आशयाचा वि.स.खांडेकरांचा धडा आठवून गेला! दोन्ही ही तितकेच महत्त्वाचे!काळ्या ढगांचे अस्तित्व च मुळी पांंढर्या ढगांवर अवलंबून! विचारांच्या आवर्तातही ही. ढगाळलेली अवस्था येते कधी कधी! विचारांचे पांढरे ढग जेव्हा परिपक्व होतात, तेव्हा ते हळूहळू करडे बनतात. पुढे दाटून येते आणि काळे बनतात.योग्य वेळ आली की डोळ्यातून सरीवर सरी बरसत रहातात आणि मनावरचे अभ्राचे पटल नष्ट करून स्वच्छ मनाने पुन्हा नाविन्याचा आस्वाद घेतात! नवनिर्मिती करणार्या त्या बरसणाऱ्या ढगांची माझे मन आतुरतेने वाट पहात रहाते!
“नमस्कार पंत, हा तुमचा पेपर आणि आपल्या चाळीची बातमी आली आहे आजच्या पेपरात पान सहावर, ती आठवणीने वाचा, येतो मी !”
“कसली बातमी मोऱ्या ?”
“पंत तुम्ही वाचलीत तर तुम्हांला कळेल ना आणि त्या बातमीत माझं पण नांव छापून आलं आहे, अगदी फोटो सकट !”
“अरे गाढवा तू ती बातमी सांगितलीस तर तुझी जीभ काय झडणार आहे ? आणि तुझा फोटो कशासाठी छापलाय पेपरात ? तू साधा गल्लीतला नेता पण नाहीस अजून !”
“तसं नही पंत, तुमच्यामुळेच ती बातमी आणि माझा फोटो छापून आला आहे पेपरात !”
“माझ्यामुळे ? ते कसं काय ?”
“अहो पंत, तुम्हीच नाही का मला गेल्यावेळेस नवीन आयडिया दिलीत त्या बद्दलच ती बातमी आहे !”
“मोऱ्या, नेहमी तू मला ‘कोड्यात बोलू नका’ असं सांगतोस आणि आज तू स्वतःच कोड्यात बोलतोयस ! आता मला जर ती बातमी उलगडून नाही सांगितलीस तर उद्यापासून आमच्या पेपरला हात लावायचा नाही, कळलं ?”
“असं करू नका पंत ! अहो तुमचा पेपर वाचल्या शिवाय माझी ‘प्रातरविधी’ पासूनची सारी कामं अडतात हे तुम्हांला पण माहित आहे !”
“हॊ ना, मग आता मुकाट्यानं मला ती बातमी सांगतोस का उद्यापासून आमचा पेपर वाचण बंद करतोस ?”
“सांगतो सांगतो पंत ! आता तुम्ही माझ्या वर्मावरच वार करायला निघालात तर….”
“उगाच अलंकारिक बोलायला जाऊ नकोस, पट पट बोल !”
“पंत, अहो गेल्यावेळेला तुम्ही नाही का म्हणाला होतात, की आपल्या अहमद सेलरच्या आठ चाळीत रोज कोणाकडे ना कोणाकडे कसलं तरी मंगल कार्य असतं आणि लोकं हजारो रुपये खर्च करून DJ लावून ते साजर करीत असतात, त्या ऐवजी…….”
“त्याच पैशातून गरीब हुशार विद्यार्थ्यांना मदत करावी अथवा कुठल्यातरी सामाजिक संस्थेला देणगी द्यावी, असं मी सुचवलं होत खरं !”
“बरोबर पंत आणि चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने मी तो कार्यक्रम यशस्वीपणे राबवला त्याचीच बातमी आली आहे आजच्या पेपरात !”
“अरे व्वा ! तुझं अभिनंदन मोऱ्या !”
“धन्यवाद पंत, पण तुमच्यामुळेच हे शक्य झालं ! येतो आता !”
“मोऱ्या थांब जरा, माझं काम आहे तुझ्याकडे !”
“कसलं काम पंत ?”
“अरे माझा मित्र वश्या जोशी पूर्वी डोंबिवलीला रहात होता, अगदी स्टेशन जवळ आणि आता तो ठाण्यात घोडबंदरला आला आहे रहायला !”
“बरं मग ?”
“मोऱ्या वश्याला ठाण्यात आल्यापासून निद्रानाश जडला आहे, रात्रभर झोप म्हणून लागत नाही त्याला !”
“मग जोशी काकांना एखाद्या डॉक्टरकडे जायला सांगा ना !”
“अरे चार, पाच डॉक्टर करून झाले त्याचे पण काडीचा उपयोग झाला नाही त्याला, उगाच पैशा परी पैसे गेले ते वेगळेच !”
“पंत जोशी काकांच्या निद्रानाशावर जर चार पाच डॉक्टरांनी हात टेकले असतील तिथे मी बापडा काय करू शकणार सांगा ?”
“सांगतो ना ! अरे परवाच वश्याचा फोन आला होता आणि तो माझ्याकडे अगदी रडकुंडीला येवून, त्याच्या निद्रानाशावर काहीतरी उपाय सांग रे असं म्हणत होता ! त्यावर मी बराच विचार करून एक उपाय शोधला आहे, पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल, म्हणून तुला थांब म्हटलं !”
“असं होय, बोला पंत काय मदत हवी आहे तुम्हाला माझ्याकडून ?”
“मोऱ्या त्या तुमच्या DJ च्या कर्कश्य आवाजावरूनच मला एक उपाय सुचलाय बघ !”
“कोणता?”
“सांगतो ना, अरे त्याची डोंबिवलीची जागा अगदी स्टेशन जवळ, म्हणजे दिवस रात्र ट्रेनचा खडखडाट बरोबर ?”
“बरोबर, मग ?”
“म्हणजे रोज रात्री झोपतांना वश्याला ट्रेनच्या खडखडाटाचे अंगाई गीत ऐकायची सवय आणि ते अंगाई गीत ठाण्यात त्याच्या कानावर पडत नाही, म्हणून वश्याला निद्रानाशाचा विकार जडला असावा असं माझं ठाम मत आहे !”
“मग पंत मी तुम्हाला यात काय मदत करू शकतो ते तर सांगा !”
“मोऱ्या तू मला फक्त एका CD वर, ट्रेनचा भरधाव जायचा आवाज, रेल्वे ट्रॅकच्या खडखडा सकट एखाद दुसऱ्या ट्रेनच्या हॉर्न बरोबर रेकॉर्ड करून दे, बास्स !”
“त्यानं काय होईल पंत ?”
“अरे तोच वश्याच्या निद्रा नाशावर उपाय, कळलं ?”
“नाही पंत !”
“अरे गाढवा, मी वश्याला सांगणार, ही CD घे आणि रात्री झोपतांना हे तुझं अंगाई गीत ऐकत ऐकत सुखाने झोप ! नाही तुला निद्रादेवी प्रसन्न झाली तर नांव बदलीन माझं !”