भारतीय चॉकलेट, गोळ्यांसाठीचा एक मोठा पण तुलनेने थोडा विस्मृतीत गेलेला ब्रॅण्ड म्हणजे रावळगाव. एका पिढीचा शाळेत जायचा कंटाळा सुसह्य़ करण्याचं काम या ब्रॅण्ड्सच्या पानपसंद, मँगो मुड, कॉफी ब्रेक या आणि अशा अनेक चॉकलेट व गोळ्यांनी केलं. त्या ब्रॅण्ड्सची ही कहाणी.
सोलापूर जिल्ह्य़ात जन्माला आलेल्या हिराचंद वालचंद यांना अभ्यासाची फारशी गोडी नव्हती. व्यावसायिक होण्याचं स्वप्न मात्र त्यांना खुणावत राहायचं. वडिलांचा पारंपरिक अडतीचा व्यवसाय सोडून ते आपलं व्यावसायिक नशीब आजमावायला थेट बांधकाम व्यवसायात शिरले. फाटक नावाच्या बांधकाम व्यावसायिकाशी भागीदारीत फाटक-वालचंद बांधकाम व्यवसाय त्यांनी सुरू केला. बार्शी लाइट रेल्वेसह अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कामात त्यांना ब्रिटिशांचा दुजाभाव खटकत होता. मर्जीतील ब्रिटिश कंपन्यांना संधी देत भारतीयांना डावलण्याच्या ब्रिटिशनीतीला ठोस उत्तर देण्याची वालचंद यांची इच्छा होती. त्यांनी शेतकी जीवन लहानपणापासून पाहिलं होतं. आणि शेतकी व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर हा शेतीप्रधान भारत देश ब्रिटिशांना पुरून उरेल अशी त्यांची भावना होती. याच भूमिकेतून त्यांनी नाशिक जवळील रावळगाव येथे तब्बल दीड हजार एकर उजाड नापीक जमीन स्वस्तात घेतली. अनेक कृषीतज्ज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, अभियंते यांना हाताशी धरून त्या नापीक जमिनीचं रूपांतर काहीच वर्षांतच उपजाऊ कसदार जमिनीत झालं. तिथे उसाची लागवड करण्यात आली. १९३३ मध्ये भारतातील पहिला साखर कारखाना रावळगाव येथे उभा राहिला. थोडासा दुर्लक्षित असा तो भाग त्यामुळे रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसह विकसित झाला. याच कारखान्याच्या जोरावर १९४० मध्ये रावळगाव चॉकलेट, गोळ्यांचं उत्पादन सुरू झालं. अगदी तसंच शेतकी प्रारूप त्यांनी पुण्याजवळील कळंब इथे राबवलं. ज्या परिसराला सध्या आपण वालचंदनगर म्हणून ओळखतो.
गोळ्या, चॉकलेट यांचं विलक्षण अप्रूप असण्याच्या काळात रावळगाव टॉफीजना लोकप्रियता मिळाली. बदलत्या काळानुसार आपली संस्कृतीही बदलत गेली. वाढदिवस, त्यानिमित्ताने शाळेत गोळ्या वाटणं, घरी जंगी मेजवानी साजरी होणं हे सारं रुजत असताना घाऊक प्रमाणावर चॉकलेट किंवा गोळ्यांची पाकिटं खरेदी करणंही अनिवार्य झालं. ८०/९० च्या दशकातील पिढीला आई-बाबांनी अशाच निमित्ताने घरी आणलेली रावळगाव चॉकलेटची थैली नक्की आठवत असेल. हिरव्या, लाल चकचकीत आवरणातली ती चॉकलेट्स म्हणजे वाढदिवस धमाल साजरा होणार याची ग्वाही असायची. त्या चॉकलेट्सवर विशिष्ट नाव नसायचं तर रावळगाव अशी छान लफ्फेदार अक्षरं असायची. या घाऊक खरेदीबरोबर शाळेजवळच्या दुकानातील हाका मारून बोलावणाऱ्या बरण्यांमध्ये रावळगावचं पानपसंद, मँगो मूड खुणावायचं. महागडी चॉकलेट भेट देऊन मैत्री करण्याचा तो काळ नव्हता. पण खिशातील पानपसंद, मँगो मूडने शाळेतील कितीतरी मैत्रीबंध पक्के केले. खिसा अशक्त असेल तर फक्त स्वत:पुरतं गोळी घेणंही लपून राहायचं नाही. लालभडक झालेली जीभ दगा द्यायची. ‘‘एकटीनेच पानपसंद खाल्लंस ना? आता मी देते का बघ’’ अशा धमक्या मिळायच्या.
रावळगाव हे ब्रॅण्डनेम मनावर ठसण्यात त्यांच्या जाहिरातीचा वाटाही मोठा होता. मँगो मूडच्या जाहिरातीतला तो गवतातला तरुण आणि नंतर पिकल्या मिशीचा आंबा आठवून बघा. पानपसंदच्या जाहिराती हिंदी असल्या तरी मराठी कलाकारांच्या दर्शनाने त्या अधिक जवळच्या वाटत. ‘शादी और तुमसे? कभी नहीं’ असं रागात म्हणणाऱ्या अर्चना जोगळेकर किंवा हातात लाटणं घेऊन ‘देखो मुझे गुस्सा मत दिलाओ, अपनी बिवीपे हुकूम चलाते हो?’ असं खडसावणाऱ्या भारती आचरेकर पडद्यावर दिसत. मग पानपसंद समोर येई. सोबत आवाज ‘पान का स्वाद गजब की मिठास’ आणि तीच वाक्यं लाडेलाडे बोलली जात. या जाहिरातीसुद्धा रावळगाव गोळ्यांइतक्या गोड होत्या.
नंतर अनेक परदेशी कंपन्यांच्या मार्केटिंगचा झंझावात आला आणि आपली ही देशी बनावटीची चॉकलेट्स गोळ्या कुठेतरी मागे पडली. आजही रावळगाव चॉकलेट वितरित होतात पण सध्याची पिढी त्या स्वादापासून अनभिज्ञ आहे. मध्यंतरी एका सर्वेक्षणात कोणती भारतीय चॉकलेट्स परत बाजारात यावीशी वाटतात? या प्रश्नाला अनेकांनी इतर गोळ्यांसह पानपसंद, मँगो मूड हे दिलेलं उत्तर बोलकं आहे.
रावळगाव गोळ्यांची टॅगलाइन आहे, स्वीट स्माइल ऑन मिलीअन्स ऑफ फेसेस. ही टॅगलाइन अनेक अर्थाने खरी होती. गोळ्या, चॉकलेट यांच्या गोडव्यासोबत तुलनेने स्वस्त अशी ही चॉकलेट सर्व थरांतील मंडळींना परवडत.
आज ७८ वर्ष जुना असा हा ब्रॅण्ड काहीसा झाकोळलाय, पण तरीही स्मृतींच्या पडद्यावर त्याच्या आठवणी लख्ख आहेत. लहान वयातील अप्रूप असणारे वाढदिवस, मैत्रीच्या आणाभाका, भांडणांची मिटवामिटवी यांचा हा गोड साक्षीदार म्हणूनच आजही केवळ नावाच्या उच्चाराने चेहऱ्यावर हसू फुलवतो.
– अनामिक (सोर्स व्हाॅटसअप)
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आत्महत्या करावी वाटते…संजय आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
“आत्महत्या करावी वाटते”, म्हणून एकजण डॉक्टरांकडं गेला. डॉक्टर माझे मित्र. त्यांनी समुपदेशनासाठी त्याला माझ्याकडं पाठवलं.
“आत्महत्या करायचीच आहे”, यावर गडी ठाम होता. त्याला त्याची कारणं होती. ती कारणं अगदी तकलादू नव्हती. जगावंसं वाटू नये, अशी कारणं होती ती. विष्ण्ण, खिन्न करणारी आणि उपाय आवाक्यातही नसणारी अशी कारणं होतीच ती.
मुळात तो तसा बुद्धिमान. विचारी. कलासक्त. पन्नाशीच्या उंबरठ्यावर. पण, अशा वळणावर उभा होता की आता जगाचा निरोप घेणं अधिक सोईचं. आगामी काळ फारच कठीण. इतके सारे गुंते होते आयुष्यात की त्या प्रत्येकावर काम करत बसण्यापेक्षा अलगद जगाचा निरोप घेणं चांगलं. त्याचं लॉजिक काही अगदीच चुकीचं नव्हतं.
आमच्या गप्पा सुरू झाल्या.
यथेच्छ गप्पा ठोकल्या.
दोनेक तास गप्पा झाल्यावर त्याला म्हटलं, “यार. मजा आली. उद्या भेटू.”
त्यावर तो म्हणाला, “अहो, पण मला आत्महत्या करायची होती. म्हणून मी आलो होतो तुमच्याकडे. समुपदेशनासाठी. तुम्ही त्यावर काही बोललाच नाहीत.”
मी म्हटलं, “अरे हो. विसरलोच. बोलू पुढच्या वेळी. घाई कुठं आहे. एक फक्त करा. आपण बोलल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घ्यायचा नाही.”
त्यानंही तसं आश्वासन दिलं.
*
या गोष्टीला काही महिने उलटले.
आज तो मित्र पुन्हा भेटला.
“यार, काय मूर्खासारखा विचार करत होतो मी? आत्महत्या वगैरे…”
तोच हसायला लागला.
मग मनसोक्त गप्पा झाल्या.
*
दरम्यानच्या काळात नेमकं काय घडलं?
माझ्याकडं येऊन तो म्हणाला होता, “मी आत्महत्या करणार म्हणजे करणार.”
मी म्हणालो होतो, “जगावं की मरावं हा ज्याचा-त्याचा निर्णय. माझी विनंती एकच. मला नव्वद दिवस दे. आपण बोलत राहू. त्यानंतर तुला हवं ते कर. तू जगत राहिलास तरी जगात क्रांती होणार नाही आणि मेलास तरी कोणाला काही फरक पडणार नाही. पण एवढी पन्नास वर्षं म्हणजे १८००० दिवस जगलास ना! आणखी नव्वद दिवस मरू नकोस. बाकी आपण बोलू.”
आम्ही नव्वद दिवसांचा कार्यक्रम आखला.
त्याला सांगितलं, “तुझ्या हातात ९० दिवस आहेत. म्हणजे दोन हजार तास. त्यातले हजारेक तर झोपेत आणि बाकी असेच गेले. उरले हजार तास. नाही तरी, मरायचेच आहे. हे हजार तास वापरू ना मस्त.”
सुरूवात आम्ही केली तीच मुळी माथेरानात.
कारण, त्याच्या माथेरानातल्या आठवणी मोठ्या रम्य होत्या!
रम्य माथेरानात आम्ही दोन दिवस राहिलो.
त्याला आवडणारी वाइन. मासे. असं भरपेट खाल्ल्यावर तो झोपी गेला.
दुस-या दिवशी सकाळी सकाळी त्याला घेऊन बाहेर पडलो. हिवाळा होता तेव्हा. धुक्याच्या दुलईत पहुडलेलं माथेरान आणि शांत तळ्याकाठी निःशब्द बसलेलो आम्ही.
‘तुझी लायकी काय, माझी लायकी काय आणि आपल्या सभोवताली जे विसावले आहे, त्याचे मोल काय! किती मिळतंय आपल्याला… आपली लायकी नसतानाही! जोवर तू जिवंत आहेस, तोवर ही सुखं तुझ्या पायाशी लोळण घेत आहेत. तेव्हा, यार धमाल करत राहा.”
एवढंच त्याला सांगितलं आणि आनंदानुभव घेऊन आम्ही परत फिरलो.
दुस-या दिवशी त्याच्या सोसायटीचं गेट टुगेदर होतं. सांस्कृतिक कार्यक्रमात त्याला गायचं होतं. पण, दडपण होतं. ‘जमेल का? नाही चांगले गायलो, तर लोक काय म्हणतील?’
“काही का म्हणेनात? आपल्याला कुठं जगायचंय? गेलं उडत जग. गायचं आणि निघायचं. जगायचं त्यांना आहे. आपल्याला निघायचं आहे. आपल्याला काय फरक पडतो? ते हसतील वा खिदळतील. आपल्याला कुठे आहेत त्यांच्या जगण्याचे नियम? आपल्याला तर मरायचंय.”
तो बिन्धास्त मनापासून गायला.
ग्रेट नाही, पण लोकांना चक्क आवडलं. त्यालाही भारी वाटलं.
पुढच्या दिवशी त्याला घेऊन गेलो, ते अशा घरात.
जिथं कोरोनामुळं घराची पार वाताहात झालेली.
बाप मेला. आई मेली. तीन कच्चीबच्ची उरली.
आणि, एक म्हातारी.
त्यांना जेवण घेऊन गेलो.
ती पोरं याला बिलगली.
यानं मग त्यांना गोष्टी सांगितल्या. शाळेतल्या कविता म्हणाला. एका सामाजिक संस्थेनं या मुलांची जबाबदारी घेतलेली. हा म्हणाला, “माझी सगळी इस्टेट यांच्या नावानं करतो.”
म्हटलं, “इस्टेट सोड. तू त्यांना वेळ दे. प्रेम दे. ही तीन आयुष्यं उभी राहातील.”
दुस-या दिवशी त्याला फोन केला.
तर, काही शेड्यूल ठरण्याच्या आधीच हा त्या गोतावळ्यात जाऊन रमलेला.
आता मला तो शेड्यूल सांगू लागला.
“अरे, हिला पुस्तकं आणायचीत. त्याला कॅडबरी आवडते. मधली जी आहे ना, ती अप्रतिम चित्रं काढते. तिला रंगपेटी आणायचीय. म्हातारीचे पाय दुखताहेत. मी गुगलवर सर्च केलं. ते अमुक तेल चांगलं आहे. तुला काय वाटतं?”
दिवस असेच गेले.
त्याला मी सांगितलं-
“नव्वद दिवस होऊन गेले. आता, हवं तर तू मरू शकतोस.”
तो म्हणाला,
“मूर्ख आहेस का तू? त्या पोरांना आणि म्हातारीला घेऊन मला माथेरानला जायचंय.”
मी म्हटलं, “साला तू काही मरत नाहीस!”
तर म्हणतो कसा –
“मरायला आयुष्य पडलंय. थोडं जगू तर दे. “
– संजय आवटे
संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वीस एप्रिल हा डॉक्टर सरोजिनी बाबर, लेखिका, लोकसाहित्यिका, कवयित्री, बालगीतकार यांचा स्मृतिदिन ! त्यानिमित्ताने:
खेळाचा चक्कर भवरा…
नदीच्या तासात वाळूच्या जोषात
कहार उन्हात कामाला उपस्थित
आळवावा सारंग धरा
हासर्या नजरेनं खुशीच्या बोलीनं
फुलवाव्या येरझारा
गर्जू दे नभाला
नाचू दे वीजेला
सोडीत अमृतधारा
करा रे हाकारा
पिटा रे डांगोरा
खेळाचा चक्कर भवरा…
☆ रसग्रहण ☆
जुन १९७३ साली मान्यवर कवयित्री सरोजिनी बाबर यांनी लिहिलेली ही सुंदर, आशयघन, मानव आणि निसर्ग यांच्या नात्यावरची ही कविता.
ही कविता वाचताना सहज लक्षात येतं की, या कवितेत एक आळवणी आहे. पाऊस म्हणजे जीवन. या पर्जन्य धारांची सारं चराचर आतुरतेनं वाट पहात असतं.
जसं बळीराजाचं जीवन त्यावर अवलंबून असतं तसंच, जीवलोकांत अनेकांचं असतं. त्यातलाच एक सारंगधर.
एक नावाडी. खलाशी. किंवा नदीच्या पात्रांत, समुद्राच्या ऊदरात मच्छीमारी करणारा कोळी.
मग या पावसाची ही भक्तीभावाने ,हसर्या नजरेनं, खुशीच्या स्वरात केलेली एक आर्त अशी विनवणी या कवितेत जाणवते. पावसाच्या आगमनासाठी केलेली प्रयत्नपूर्वक, कष्टमय तयारीही आहे. मग पाऊस येणार आहे, आकाश गडगडणार आहे, वीजा चमकणार आहेत, आणि मग अमृतमय पर्जन्यधारा कोसळणार आहेत.. हा आनंदीआनंद होत असताना, एका नादमय हर्षकल्लोळात एक चक्कर भवरा म्हणजे मन गिरक्या घेणार आहे.
कवयित्रीने अतिशय आनंदमयी शब्दांतून सारंगाशी हा स्फूर्तीदायी संवाद साधला आहे.
सारंग या शब्दाचा संगीतातील एका रागाशीही संबंध आहे.
हा एक मधुर सुरावटीचा राग असून, त्याच्या आळवणीने, ऊष्म प्रहरात शीतलतेचाही अनुभव येतो.कवयित्री सरोजिनी ताईंनी आळवावा सारंगधरा याअर्थानेही म्हटले असावे.
आणखी एक अर्थ असाही जाणवतो. की सारंग म्हणजे शीव. शीवाची आळवणी म्हणजेही पर्जन्यदेवतेचीच आराधना.
मात्र या संपूर्ण काव्यरचनेला एक नाद आहे. लय आहे. गती आहे. वेग आहे. आणि शब्दाशब्दांत चैतन्य ठासून भरलेलं आहे. या काव्यशब्दांबरोबर संवेदनशील मन या आनंदरसात किंवा या हर्षलाटेत डुंबून जाते.. एक शीतल, ओलाव्याचा अनुभव येतो.
सारंगधरा, येरझारा, अमृतधारा, हाकारा, डांगोरा भवरा या यमकीय शब्दांमधला वेग नाद आणि लय इतकी सुंदर आहे की ही कविता पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते गावीशी वाटते.
मूळातच डाॅ.सरोजिनी बाबर हे एक लोकव्यक्तीमत्व होतं.
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी आयुष्यभर केला. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समीतीच्या त्या अध्यक्ष होत्या. दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य
त्यांनी संकलीत केल. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या, लोकवाङमयाचा खूप मोठा संग्रह त्यांनी केला. त्यात कोळ्यांची गीते, कथा, कहाण्या, म्हणी, ऊखाणे, सण ऊत्सव, रितीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे.
अर्थातच, त्यांच्या लेखनावर, काव्य रचनेवर लोकसंस्कृतीचा, लोकजीवनाचा आणि निसर्गाचा प्रभाव जाणवतो.
ऊपरोक्त, नदीच्या तासात वाळूच्या जोषात.. ही कविताही लोकसाहित्याच्याच अनूषंगाने जाणारी आहे.
त्यातले, कहार, हाकारा, डांगोरा, चक्कर भवरा हे बोलीभाषेतले शब्द वेगळ्याच माधुर्याने लिंपलेले आहेत.
या कवितेतला सारंगधर हा कष्टकरी वर्गातला, निसर्गाशी बांधलेला प्रतिनिधी आहे. आणि सरोजिनीताई काव्यातून त्याच्या जीवनाशी सहजपणे समरस होतात. हेच या काव्याचे वैशिष्ट्य.
अडगुळं मडगुळं
सोन्याचं कडबुळं
खेळायला आलं ग
लाडाचं डबुलं
जावळात भुरभुरलं
नजरेत खुदखुदलं
सोन्याच्या ढीगाव
बाळ गं बैसलं..
हे त्यांचं बडबडगीत घराघरातली माता आपल्या तान्हुल्या साठी गाते.
त्यांच्या झोळणा, चाफेकळी या काव्य संग्रहातील कविता वेगळ्या का वाटतात? कारण ते शब्दालंकारच जीवनाला भिडणार्या संस्कृतीतले आहेत. त्यात अपार आपलेपणा आहे. त्यातल्या भावना नैसर्गिक आहेत. त्या चटकन् भिडतात.
‘माझ्या खुणा माझ्या मला’ .. हे आत्मचरित्रही त्यांनी लिहीलं.
दूरचित्रवाणीवर, रानजाई या कार्यक्रमातून, कवीश्रेष्ठ शांताबाई शेळके यांच्याशी केलेल्या गप्पा प्रचंड गाजल्या.
जाता जाता, सहज एक लोकभाषेतला, या कार्यक्रमातला गंमतीदार किस्सा आठवला तो सांगते.
कुणीतरी घरातल्या कारभारणीला विचारतात,
“का वं मालक हायत का घरला? “
कारभारीण उत्तरते, ” काय की हो..खुंटीवरचं मुंडासं दिसं नाय मला…”
याचा अर्थ मी ऊलगडवून सांगायला नको. त्यातली गंमत तुम्हीच अनुभवावी..
तर असं हे विलक्षण सरोजिनी बाबर नावाचं विलक्षण लोकव्यक्तीमत्व!त्यांनी पाचशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली. बळीराजा, जा माझ्या माहेरा, कुलदैवत, कारागिरी,एक होता राजा या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्या.
एक गोष्ट खेदपूर्वक आणि जाणीवपूर्वक नमूद करावीशी वाटते की पुस्तकांसाठी खास प्रसिद्ध असलेल्या पुण्यातल्या आप्पा बळवंत चौक इथल्या एकाही दुकानात ,डाॅ. सरोजिनी बाबर यांचं साहित्य उपलब्ध नाही. त्यांचं पुनर् मुद्रण व्हावं ही अपेक्षा ठेवून या थोर व्यक्तीमत्वाला आजच्या स्मृतीदिनी मी सादर वंदन करते…
दिसतं तसं प्रत्येकवेळी असतंच असं नाही याचं ‘किरण’ हा शब्द नेमकं उदाहरण म्हणता येईल.
पहाटप्रहरी मागे रेंगाळणाऱ्या अंधारकणांना हळूवार स्पर्शाने दूर सारत चैतन्याचं शिंपण करीत क्षितिजरेषेवरुन अलगद डोकावून तांबूस पायवाटांवरुन सर्वदूर पसरणारे कोवळे सूर्यकिरण आणि दिवसभराच्या अथक श्रमानंतर विसावू पहाणाऱ्या शरीरमनाला आपल्या शितल स्पर्शाने प्रसन्नचित्त करणारे सुखद चंद्रकिरण ही परस्परभिन्न अशी किरणांची दोन रुपे ! एक चैतन्यदायी ऊर्जास्त्रोत तर दुसरे हळूवार स्पर्शाने शांतवणारे ! तथापी वरवर दिसणाभासणारी ही सर्वप्रिय किरणे एवढीच किरण या शब्दाची परिपूर्ण ओळख म्हणता येणार नाही.
अतिनील किरणे,तसेच शास्त्रज्ञानी अथक प्रयत्नांती शोधलेले ‘क्ष’ किरण अशी किरणांची विस्मित करणारी परस्परवेगळी वैशिष्ट्यपूर्ण रुपे हा सविस्तर विवेचनाचाच विषय आहे.तरीही त्यांचा ओझरता परिचयसुध्दा उद्बोधक ठरेल.
सर्वसाधारण प्रकाशकिरण आपल्या शरीरातून आत प्रवेश करु शकत नाहीत.पण प्रकाशकिरणांच्या परावर्तनावर संशोधन करीत असताना एका जर्मन वैज्ञानिकाला अशा किरणांचा अचानक शोध लागला जी शरीराच्या अंतर्गत भागातसुध्दा प्रवेश करु शकतात. हे त्याच्या लक्षात आले तेव्हा त्या किरणांचे नेमके नाव माहित नसल्याने त्या किरणांना त्याने ‘क्ष’ हे नाव दिले.X Ray हे या X Radiation चेच लघुरुप.पुढे त्यावरील अनेक प्रयोगांदरम्यान या X Radiation ची शरीराच्या आत प्रवेश करुन आतील शरीराच्या नेमक्या भागाची छायाचित्रे घेऊ शकण्याची आश्चर्यकारक क्षमता लक्षात येताच वैद्यकीय निदान आणि उपचारांसाठीच्या उपयोगितेसाठी संशोधनाची द्वारे खुली होऊ शकली .त्याचे फलितआज आपण अनुभवतो आहोतच.या क्ष किरणांची अतिशय मर्यादित मात्रा शरीरांतर्गत छायांकनासाठी पुरेशी असते.मात्र याच किरणांची जास्त प्रमाणातली विध्वंसक मात्रा (गरजेनुसार कमी-जास्त) कॅन्सर वरील रेडिएशन ट्रीटमेंटमधे देण्यात येते.त्यामुळेच त्याचे होणारे साईड-इफेक्ट्सही लक्षणीय असतात.
अतिनील किरणे ही सुर्यप्रकाशात आढळणारी किरणे.यांचं सुर्यप्रकाशातील प्रमाण अत्यल्प असलं तरी हानीकारकता मात्र प्रचंड असते. वायुपटलावरील ओझोनच्या थरामुळे अतिनील किरणांना थोपवून धरले जाते.वाढत्या प्रदुषणामुळे ओझोनचा थर विरळ होत गेल्याने सजीवांच्या जीवाला निर्माण होऊ पहाणारा अतिनील किरणांचा धोका हा पर्यावरणाच्या दृष्टीने आजचा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे.
हे अतिनील किरण हानीकारक जसे तसेच उपयोगीही.याच किरणांचा वापर पाणी शुध्दीकरण आणि हवा शुध्दीकरण उपकरणांमध्ये केला जातो.
साधारणत: सूर्याची प्रकाशकिरणे आपल्या शरीरावयवात प्रवेश करु शकत नाहीत या नियमाला एकमेव अपवाद म्हणजे आपले डोळे.आपल्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी पापण्या आणि भुवयांची निसर्ग योजना असली तरी डोळ्यांची ही सुरक्षाकवचे अतिनील किरणांना थोपवू शकत नाहीत.त्यामुळेच डोळ्यांच्या आरोग्याची विशेषतः उन्हाळ्यात जास्त काळजी घेणे हितकारक असते.
किरणांचा ‘उत्सव’ ही एरवी कवीकल्पनाच वाटली असती.पण वास्तुशिल्पकलेतील कल्पकतेने साकारलेला चमत्कार ठरलेला हा ‘किरणोत्सव’ याची देही याची डोळा पहाण्याचे भाग्य मिळते ते करवीर निवासिनी ‘श्री महालक्ष्मी मंदिरा’त !
आपलं शरीरस्वास्थ्य बव्हंशी आपल्या मन:स्वास्थ्यावर अवलंबून असते.सतत दडपणाखाली अस्वस्थ असणाऱ्या मनोवस्थेचा परिणाम शरीरावरही होत असतोच. अस्वस्थ मनातील हा नैराश्याचा अंधार एखाद्या आशेच्या किरणाच्या ओझरत्या स्पर्शानेही नाहीसा होऊ शकतो खरा पण त्या किरणांच्या आपल्या मनातील मुक्त प्रवेशासाठी आपण आपल्या मनाची कवाडे मात्र खुली ठेवायला हवीत !
किरणांची ही विविध रंगरुपे आश्चर्य वाटावीत अशीच.ती पाहून वाटणारं आश्चर्यच मनात उमटणाऱ्या ‘ किती किती रूपे तुझी ‘ या आश्चर्योद्गारांत प्रतिबिंबित होत रहाते !
मृणालला जाग आली आणि किती वाजले बघायला मोबाईल घेण्यासाठी हात सवयीनं बाजूला करायला गेली. अरेच्चा! हाताला हे काय अडकतंय? तिनं खडबडून डोळे उघडले आणि हाताला लावलेल्या सलाईनकडे तिचं लक्ष गेलं. आपण हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट आहोत याची तिला जाणीव झाली.
काल सकाळी जरा कणकण वाटत होती, पण करोना काळात अत्यावश्यक सेवेत असल्याने तिला रजा घेणं कठीणच होतं. ती महानगरपालिकेची कर्मचारी होती आणि सध्या कामाचा ताण भरपूर होता. काही कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबीय करोना बाधित झाल्याने कामावर येऊ शकत नव्हते. म्हणून काम भरपूर आणि स्टाफ कमी अशी अवस्था होती. त्यामुळेच ती ८.४० ची सी. एस. टी. लोकल पकडून शिस्तीत आॅफिसला गेली. फ्रेश होऊन कँटिनवाल्याकडून एक कडक काॅफी घेतल्यावर जरा बरं वाटलं आणि ती कामाला लागली. पण साडेबाराच्या सुमारास तिला अस्वस्थ वाटायला लागलं. चक्कर येतेय, श्वास अडकतोय अशी विचित्र अवस्था झाली. मैत्रिणीनं गरम पाणी दिलं, अॅसिडिटी असेल तर म्हणून, पण फरक पडेना. मग मात्र गाडी बोलावून त्यांनी तिला हाॅस्पिटलमध्ये आणलं. करोनाची लक्षणं म्हणून तिची रक्त तपासणी आणि छातीचा एक्सरे काढला गेला. आणि विलगीकरण कक्षात दाखल करून उपचार सुरू झाले होते. त्यानंतरचं तिला काही आठवत नव्हतं आणि आत्ता सकाळी जाग आली होती.
बापरे! आपल्या घरी काय हाहाकार माजला असेल? सवितानी मुकुंदला फोन करून आपल्या घरी कळवलं असेलच. तिच्या घरी मुकुंद – तिचा रिटायर्ड नवरा, विशाल-विराज हे दोन्ही मुलगे – नोकरी करणारे, सासूबाई वय ८० – बी. पी., डायबेटिस पेशंट, जेमतेम स्वतःचं करणाऱ्या आणि ७६ वर्षांची आई संधिवाताने अंथरूणाला खिळलेली. कसं होणार या सगळ्यांचं या विचाराने तिचं डोकं परत गरगरायला लागलं.
मृणाल एकुलती एक मुलगी. ग्रॅज्युएट झाल्यावर महानगरपालिकेत नोकरीला लागली. आणि पुढच्याच वर्षी कर्णिकांच्या घरात सून म्हणून प्रवेशली. मुकुंद केमिकल इंजिनियर,त्याचे वडील दोन वर्षांपूर्वीच निधन पावलेले. मोठ्या बहिणीचं लग्न होऊन ती अंधेरीला राहात होती. त्यामुळे घरी फक्त आई आणि तो, अशी दोनच माणसं! मुलुंडला थ्री बीएचके फ्लॅट होता त्यांचा. घरात पोळ्यांना आणि वरकामाला बाई होती. सासूबाई तेव्हा तब्येतीने ठणठणीत होत्या, पण सुनेनं आपल्याला सगळं हातात दिलं पाहिजे, या वृत्तीच्या. मृणाल तशी सोशिक स्वभावाची, शिवाय आईला दुखवायचं नाही, हा नवऱ्याचा बाणा! त्यामुळे तिची कायम फरपट होत राहिली. पुढे दोन वर्षांच्या अंतराने विशाल, विराजचं आगमन झालं. दोन्ही बाळंतपणं तिच्या आईनेच केली. घरी आल्यावर लांबून कौतुक करण्याइतपतच सासूबाईंना नातवंडांचं प्रेम!
मुलांना सांभाळायला मात्र पाळणाघरात ठेवायचं नाही हो, हा त्यांचा आदेश! त्यामुळे त्यांना सांभाळायला घरातच बाई ठेवली होती. मुकुंदला त्याचवेळी प्रमोशन मिळालं आणि तो बेंगलोरला गेला. मग काय महिन्यातून दोन-तीन दिवसच घरी यायचा. तसाही घरात तो तिला काही मदत करत नव्हताच. मुलांचं संगोपन ही आईचीच जबाबदारी, हा साई-सुट्ट्यो ! सासूबाई हाॅल मध्ये सोफ्यावर बसून टी. व्ही. मालिका बघणार, जेवणार खाणार आणि निवांत झोप काढणार, सून घरात असेल तोवर तिला आपल्या तालावर नाचायला लावणार आणि कुरबुरी करत राहणार, हाच त्यांचा दिनक्रम होता. मृणाल तारेवरची कसरत करत गाडा रेटत राहिली. विशाल – विराज, दोन्ही मुलं हुशार निघाली. एक सी. ए. आणि दुसरा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर झाला.
पाच वर्षांपूर्वी मृणालचे बाबा गेले. पण आग्रह करूनही आई तिच्याकडे राहायला तयार झाली नाही. ती एकटीच कळव्याला राहात होती. पण दोन वर्षांपूर्वी आईला संधिवाताने गाठलं आणि ती बिछान्याला खिळली. मग मात्र मृणाल तिला आपल्या घरीच घेऊन आली.तिच्यासाठी दिवसा आणि रात्री अशा दोन केअरटेकर ठेवल्या होत्या. सासूबाई आणि आई अश्या दोघी वयस्कर, आजारी! मुलं आपल्या नोकरीत आणि स्वतःत रममाण होणारी, मुकुंद मागच्या वर्षी रिटायर झाला, त्यालाही बी. पी., शुगर आणि एक हार्ट अॅटॅक येऊन गेलेला. त्यामुळे सगळी धडपड, धावपळ मृणालनंच करायची. जीव मेटा…
लेखिका – प्रणिता खंडकर
संग्राहिका :सुश्री प्रतिमा जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विचार–पुष्प – भाग 13 – संगीत -२ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
नरेंद्र शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सर्वात आधी वेणी माधव अधिकारी यांच्याकडे जाऊ लागला आणि दुसरे गुरु होते उस्ताद अहमद खां. दोघांकडेही काही दिवस शिक्षण घेतले. हिन्दी, उर्दू आणि पर्शियन भाषेतली अनेक भक्तीगीतं शिकला. या बरोबरच शास्त्र पठण, सुरू होते, चीजांचा संग्रह व सरगम तयार करणे हे शिक्षण सुद्धा एकीकडे चालू होते.
गायना बरोबर नरेंद्र वादन पण शिकत होता. यातले वादन गुरु त्याचे सख्खे चुलत भाऊ अमृतलाल उर्फ हाबू दत्त होते. त्यांचे कलकत्त्यात संगीत विद्यालय होते. या विद्यालयात जागतिक किर्तीचे उस्ताद अल्लाउद्दीन खांसाहेब यांनीही सुरूवातीला सतार व सरोद वादनाचे शिक्षण अमृतलाल यांचे कडून घेतले होते असा उल्लेख आहे. यांच्याकडे नरेंद्राने सतार, पखावज आणि तबला वादनाचे धडे घेतले. गायन आणि तबला वादनात त्याने चांगले कसब कमावले होते. अगाध संपदा मिळवली होती. कुटुंबात आणि परिचयात, मित्रांमध्ये एव्हाना चांगली माहिती झाली होती की, नरेंद्र खूप छान गातो.
१८८१ मध्ये जेंव्हा नरेंद्र आणि श्री रामकृष्ण परमहंस यांची पहिली भेट झाल्याची घटना अशी, नरेंद्रच्या शेजारच्या गल्लीत, शिमला स्ट्रीटवर सुरेन्द्र बाबू राहत होते. त्यांनी एक दिवस अचानक तातडीने नरेंद्रला घरी बोलावलं. त्यांच्या कडे परमहंस आले होते. त्यांना ठाकुर म्हणत असत. ठाकूरांना गायन अत्यंत प्रिय होते. त्यांना एक दोन गीतं तरी नरेंद्र ने ऐकवावीत, यासाठी नरेंद्रला बोलावले होते. तेंव्हा नरेंद्रने मल्हार रागातलं एकतालातलं , अयोध्यानाथ पाकडाशी यांची रचना ‘मन चलो नीज निकेतने…’ आणि मुलतानी रागातलं, एकतालातलं, बेचरम चट्टोपाध्याय यांची रचना, ‘जाबे की हे दिन आमार बिफले चालीये…’ ही दोन गीतं त्याने ऐकवली. पुढे प्रत्येक भेटीत श्री रामकृष्ण नरेंद्रला गायचा आग्रह करत असत. तो गाणी, भजन, कीर्तन त्यांना ऐकवीत असे.
तानपुरा सुरांत लावल्याशिवाय नरेंद्र कधीही गाणं सुरू करत नसे. मनाचे समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तारा जुळवित असे. कधी कधी त्यात खूप वेळही जात असे. बाकीचे अस्वस्थ होऊन जात. एकदा तर अशा वेळी परमहंस इतके ऊतावीळ झाले की, ते दर दोन मिनिटांनी नरेंद्रला गायन सुरू करण्याचा आग्रह करु लागले.तानपुरा लागेपर्यंत नरेंद्र कोणाचेच ऐकत नसे. अगदी गुरूंचे सुद्धा. एकदा तानपुरा लगेच न मनासारखं तेंव्हा नातरेन्द्र हताश होऊन, ढीम्म बसून होता. गायन ऐकण्यास व्याकुळ झालेले परमहंस शेवटी, शिष्यांना म्हणाले. “उठा आता, आजचा दिवस तंबोरा जुळणीचा आहे. गाणं उद्या होईल”. असे इतके ते नरेंद्रला ऐकण्यासाठी आतुर झालेले असत.
नरेंद्रचा आणखी एक गुण ,म्हणजे काव्य रचना करणे. बंगाली, संस्कृत आणि इंग्रजीत त्यांनी भावपूर्ण कविता रचल्या आहेत. ‘विरवाणी’ या पुस्तिकेत त्या संग्रहीत आहेत. त्याचे अनेक भाषांमधून भाषांतर पण झाले आहे. याशिवाय त्यांनी सहा बंगाली गीतं पण रचली. त्याला चाली लावल्या आहेत. ध्रुपद गातांना ते स्वताच पखावज वाजवित. कवी आणि संगीतकार असून सुद्धा पुढच्या कार्यबाहुल्यात वेळे अभावी संगीताकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले दिसते.
तरी पण गायन वादनातले आणि संगीत शास्त्रातले ते कसे मर्मज्ञ अधिकारी होते हे त्यांच्या ‘संगीत कल्पतरू’ या शास्त्रीय ग्रंथावरून दिसते. १८८७ मध्ये चंडीचरण बसक यांनी हे पुस्तक बंगालीत प्रकाशीत केलं आहे. हे जवळ जवळ संपूर्ण नरेंन्द्रने लिहिले आहे काही भाग चंडीचरण यांनी लिहून पूर्ण केला आहे. नव्वद पानांचे नरेंद्रचे प्रास्ताविक त्याला आहे. ही तेवीसाव्या वर्षी लिहिलेली, सर्वांनी चकित व्हावी अशी प्रस्तावना आहे. स्वता आर्थिक दृष्ट्या अडचणीत असताना गरीब प्रकाशकाला काहीतरी आर्थिक सहाय्य व्हावे या हेतूने हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले जाते.
या पुस्तकात , भारतीय परंपरेतील मौखिक संगीत आणि वाद्य संगीत यांच्या मागील असलेला शास्त्रीय दृष्टीकोन व त्याची विविध अंगे यात स्पष्ट केली आहेत. संगीतातील सिद्धांताचे विवेचन आणि गायनाच्या मैफिलीतील सौंदर्याचा अविष्कार याचे दर्शन यात होते. तसेच विविध भारतीय भाषातील, प्राचीन, आधुनिक आणि पाश्चात्य संगीत, वाद्य, कवी यांची माहिती आहे. एक हजार भक्तिपर आणि स्फूर्ति गीतांचा संग्रह यात आहे.
संगीताचार्य रामकृष्णबुवा वझे यांनी स्वामी विवेकानंदांकडून काही दिवस गायकीचे धडे घेतले होते. परिव्राजक म्हणून नेपाळ इथे गेले असताना स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण बुवा वझे यांची भेट झाली.त्यांना पंधरा दिवसांचा स्वामीजींचा सहवास लाभला होता. वझे बुवा तेंव्हा नेपाळच्या दरबारात राजदरबारी होते. तिथे त्यांच्याकडून काही चीजा बुवा शिकले होते.
एकदा स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या अमेरिकन युवतीला लिहीलेल्या पत्रात,ते म्हणतात, “संगीत ही एक सर्वश्रेष्ठ कला आहे आणि ज्यांना समजू शकते त्यांच्या दृष्टीने ईश्वराची पूजा करण्याचा तो सर्वोत्कृष्ट प्रकार आहे”.
नरेंन्द्रचे संगीतावरचे प्रेम आणि त्यावर असलेलं प्रभुत्व पाहून, ‘जर श्रीरामकृष्णांची भेट झाली नसती तर नरेंद्र एक उत्कृष्ठ गायक म्हणून कीर्तीमंत झाला असता’ असे सर्वांचेमत होते.
🍃 मी करवली उमेची..! 🍃 सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)☆
`गुढीपाडव्याची म्हणजे नववर्षाच्या प्रथम दिनाची तयारी करत असतांनाच नेहमीच माझ्या मनात वाजंत्री वाजू लागतात. कशाची म्हणाल तर, माझ्या बहिणीच्यालग्नाची.. . उमेची.. . श्रीपार्वतीदेवीच्या लग्नाची.. ! कारण पण मी करवली आहे तिची.
साताऱ्या जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर हे माझं माहेरचं मूळ गांव. शिव पार्वती हे माझ्या माहेरचे कुलदैवत. उंच डोंगरावर, भक्कम, दगडांच, हेमाडपंथी, सुरेख गोपुरे,उंच शिखर, कळस,असं शिल्पाकृतींनी नटलेलं महादेवाचं मंदिर हे वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना आहे. गाभा-यात शिवपार्वतीच्या दोन शाळुंका (पिंडी)आहेत. सभामंडपातील खांब व मूर्ती सुरेख आहेत. डोंगरउतारावरअमृतेश्वर,मंदिरआहे. ,आजूबाजूला उतारावरच गाव वसलं आहे.
माझं माहेरचं आडनाव जिराईतखाने. पार्वती कडून मानकरी. तेथील बडवे पुजारी हे शंकराकडून मानकरी जंगम म्हणजे शैव.. हेही देवस्थानच्या मानकऱ्यांपैकी एक. चैत्र शुद्ध पंचमीला शिवपार्वती ला लग्नाच्या हळदी लागतात याच रात्री वाड्यावर ताशा वाजंत्री शिंग फुंकत देवस्थानचे सेवेकरी भालदार चोपदार गावातील प्रतिष्ठित हळदीच मानाच बोलावं पण करण्यासाठी आमच्या वाड्यावर येत. मग पुरुष मंडळी सर्वांसह देवळाकडे निघत. हे सर्व अनुभवताना आनंद भक्तिनं मनं भरून येतात. लहानपणी मी आमच्या दादांना (वडिलांना) सोवळं नेसून असं मानानं जाताना, त्यांच्या चेहऱ्यावर भक्ती मिश्रित तेज पाहिलं आहे. हळद लावण्याचा पहिला मान आमचा नंतर मानाप्रमाणे सर्वजण व भक्तगण हळद लावतात. सगळीकडे `हर हर महादेव ʼचा गजर होत असतो. ही वेळ रात्री बाराची. भक्तगण नुसते पळत ही वेळ गाठतात यानंतर रोज धार्मिक विधी असतात. मुख्य मंदिर ते अमृतेश्वर मंदिर यांच्या कळसाला हात मागाचा कापडी शेला दोन टोकांनी दोन बाजूंनी बांधतात. त्याला ध्वज असे म्हणतात. ध्वज विणणारा एक मानकरी आहे रात्रीच्या वेळी ध्वज खाली न टेकवता भक्तीभावाने कुशलतेने करतात. चैत्र शुद्ध अष्टमीला रात्री बारा वाजता शिवपार्वती चे लग्न लागतं. मुलीचे बाजू असूनही आमच्या घराण्याला मान आहे. सारीपाटात हरल्यावर शंकर रुसून या डोंगरावर आले तेव्हा भिल्लिणीच्या रुपात आलेल्या पार्वतीवर, शंकरांनी मोहित होऊन त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली पार्वतीने बरेच आढेवेढे घेतले अशी आख्ययिका आहे. यामुळे कदाचित तिची बाजू मानाची असावी. आम्हाला तो मान मिळाला नाहीतर वधू पक्षाला एवढा कुठला हो मान?
नवमीला भंडारा असतो त्यावेळी पंक्तीत उदक सोडण्याचा मान असतो. दशमीला कवडी घराण्याचा पुरुष घोड्यावरुन तळ्यापासून सर्व दगडी ,पायर्यांना कमानी ना पार करून देवदर्शनाला जातो त्यालाही भालदार चोपदारांचा मानअसतो. एकादशीला सासवडहूनʼ तेल्या भुत्याʼ आडनावाच्या भक्तांची,कावड येते. प्रचंड मोठी जडशीळ कावड आणि त्याला मोठी भगवी निशाण आणि पाण्यानं भरलेलं तांब्यांचे मोठे रांजण भक्तीभावाने चिंब होऊन वाटेत कुठेही न टेकवता अखंड चालत हे भक्त मुंगी घाटातून वर मंदिरात येतात खडकाळ डोंगराचा उंच, खडा कडाच,भक्तीची परीक्षा घेतो असं वाटतं. वाटेत, सावलीला झाड नाही. भर उन्हाचा चटका, अशा स्थितीत खांद्यावर कावड घेऊन येणं केवळ अवघडच. तोंडानं अखंडʼ हर हर महादेव `ही गर्जना ,धावाही अन् असह्य झालं कि,चक्क` महाद्या`अशा आपुलकिच्या-हक्काच्या आरोळ्याही. !भक्तांची सगळी जत्रा दिवसभर उन्हातान्हात त्या डोंगर माथ्यावर जमलेली असते सायंकाळी महादेवावर कावडीतल्या,पाण्याचा अभिषेक होतो.
लाखांच्या संख्येनं भक्त दर्शनासाठी धावतात शिवपार्वतीच्या लग्नाच्या वेळी पिंडीवर चांदीचे सुरेख मुखवटे चढवून मुंडावळ्या बांधतात. बाहेरच्या पटांगणात बाजूला होम हवन होतं. पालखी फिरवतात सगळीकडे आनंदाचा ,भक्तीचा जल्लोष आणि `हर हर महादेव ʼची देवाला हाक. ! हा आनंद सोहळा मी लग्नानंतर एकदाच अनुभवला. त्याला आता साठ वर्ष पूर्ण झाली. इतर जत्रा आणि प्रमाणे इथंही दुकान ,सिनेमा इत्यादींची रेलचेल असते. पण आम्हाला पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या विवाह सोहळ्याचं अप्रूप! माझे आजोबा व नंतर आमचे वडील दादा त्यावेळी आवर्जून जात असत. पण सेवानिवृत्तीनंतर व वयोमानाने त्यांना नंतर जमत नसे आता तेथील नातेवाईक यात सहभागी होतात. कधी भाऊही जातात. शिंगणापूर प्रमाणेच माहेर घरी,घाणा भरणे,हळद दळणे,फराळाचे लाडू,इ. पदार्थ, रुखवताचे, डाळं,-शेंगादाणे-चुरमु-याचे लाडू,देवाला हळद लावणे,लग्न असा सोहळा होत असे. भाऊही करतात. म्हणूनच म्हटलं.. “मी करवली आहे, उमेची.. !