मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 7 – कृतज्ञता ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 7 – कृतज्ञता ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

“कोणावरही उपाशी राहायची वेळ येऊ नये”, अशी राजकीय वाक्यं सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सतत ऐकायला मिळत आहेत. एरव्ही रस्त्यारस्त्यात कुणी अडवून काही मागायला लागलं तर चीड येते आणि भीक मागण्यापेक्षा काहीतरी काम करावं असं आपण सुचवित असतो. त्याउलट, मंदिराबाहेर दान देणारे  श्रद्धावान भाविक खूप असतात, तर हे दान स्वीकारणार्‍या व्यक्तीही मंदिराबाहेर खूप दिसतात. पण आजची उपाशी राहण्याची परिस्थिति वेगळी आहे. लॉक डाउन काळात आपआपल्या गावी परत जाणारे मजूर, कामगार व काही लोक यांच्यावर अशी वेळ आली आहे. हे बघून आपल्याला दु:ख होते. असच कलकत्त्यात एक माणूस उपासमारीने मेला अशी बातमी पेपर मध्ये छापून आली, ती वाचून स्वामी विवेकानंद, “देशाचा सर्वनाश ओढवणार, देश रसातळाला जाणार” असे दु:खाने म्हणू लागले. या दुखाचे कारण त्यांचे मित्र हरिपाद मित्र यांनी विचारलं. त्यावर स्वामी म्हणले, “ इतर देशात कितीतरी अनाथ आश्रम, गरीबांना कामं पुरवणार्‍या संस्था, धर्मादाय, सार्वजनिक फंड असूनही शेकडो लोक दरवर्षी उपासमारीने मेल्याचं आपण वर्तमानपत्रात वाचतो. पण भुकेलेल्याला मूठभर अन्न देण्याची  प्रथा आपल्या देशात असल्यामुळे कधी कोणी मेल्याचे ऐकिवात नव्हते. आज प्रथमच वाचले की, दुष्काळाचे दिवस नसतानाही उपासमारीने एक मनुष्य अन्नान्न दशा होऊन कलकत्त्यासारख्या शहरात मृत्यूमुखी पडला”.

आपण नेहमीच अनुभवतो की आज काही पैसे दान दिले तर फुकट मिळतात म्हणून त्या पैश्यातून व्यसनाधीन होऊन खितपत पडणारे लोक आहेत. तशी सवय लागते त्यांना. पण स्वामी विवेकानंद म्हणतात, दारात भिकारी आला तर, आपल्या ऐपतीनुसार त्याला काहींना काही देणेच योग्य आहे. त्याचा सदुपयोग होईल की नाही याची नसती चिंता कशाला करायची? कारण तुम्ही त्याला दान दिले नाही तर तो  पैशांसाठी तुमच्याकडे चोरी करेल, त्यापेक्षा दोन पैसे भीक मिळाली तर स्वस्थ तरी बसेल घरात. त्यामुळे निदान चोर्‍या होणार नाहीत.

त्यांच्या मते, आपले कर्तव्य म्हणजे लोकांना सहाय्य करणे. त्यांच्याशी कृतज्ञतेचे वर्तन ठेवणे. कारण तो गरीब असल्यामुळेच मागतोय. लक्षात ठेवा दानाने धन्य होत असतो तो देणारा, घेणारा नव्हे. जगावर आपल्या दयाशक्तीचा प्रयोग करण्यास वाव मिळाल्यामुळेच तुम्ही स्वताला समर्थ बनवू शकता या बद्दल तुमच्या मनात कृतज्ञता असली पाहिजे.  

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ केतकी जानी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

?इंद्रधनुष्य?

केतकी जानी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

आज एका अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्त्वाला पाहण्या भेटण्या, ऐकण्याचा योग मैत्र या आमच्या ग्रुप मुळे आला! मूळ अहमदाबादच्या पुण्यात नोकरी करणाऱ्या दोन मुलांच्या आईचे केस अचानक जाऊ लागतात. ऍलोपेशिया असे निदान होते. steroids मुळे 85 kg वजन झाले. पूर्ण केस गेल्याने विद्रुपता आली. लोकांच्या नजरा, प्रश्नोत्तरे, केविलवाणी मुले, सतत विग किंवा स्कार्फ वापरणे याने जेरीला आली. लोकांना कॅन्सरची शंका येई! तुमची आई वारणार सोसायटीतील मुले हिच्या मुलांना म्हणत! नैराश्यात जाऊन स्टूल, दुपट्टा असा सरंजाम पंख्याखाली मांडला आणि समोरच्या खोलीत झोपलेल्या मुलांकडे पाहून विचार बदलला आणि ती पण आमूलाग्र बदलली!

दुसऱ्या दिवशी विग फेकून दिला, स्कार्फ टाकून दिला!  लोकांच्या नजरा चुकवण्यासाठी, प्रश्न टाळण्यासाठी वेळेआधी ऑफिसला पोचून वेळेनंतर बाहेर पडणारी ताठ मानेने, आनंदी चेहऱ्याने वेळेत ऑफिसला पोचू लागली, बाहेर पडू लागली.

मी जशी आहे तशीया भावनेने स्वतःवर प्रेम करू लागली! पूर्ण लाईफ स्टाईल बदलली.  आहार, व्यायाम, योगा, सकारात्मकता यांची कास धरली! नवी क्षेत्रे, यशाच्या वाटा खुणावू लागल्या.

मॉडेलिंग ला निवड झाली आणि मागे वळून पाहिले नाही बालभारती मधील नोकरी आणि शनि रवि मॉडेलिंग!

Mrs Universe 2018

Mrs Confidence

अशी खूप खूप बक्षिसे मिळवली!

सकारात्मक आणि आनंदी वृत्तीने आपले न्यून मागे टाकून पाय रोवून आयुष्यात उभी राहिली! केसांविना डोक्यावर अपार वेदना सोसून पूर्ण गोंदवून घेतले.

तिचा जन्म झाल्यावर आजी म्हणाली पत्थर जन्मला!

मुलगा मोठा झाल्यावर म्हणाला , आजीला कळले नाही तो  हिरा होता!

उपेक्षित आणि खडतर गेलेल्या बालपणाने पुढचे आघात ती झेलू शकली!

तिच्यासारख्या स्त्रियांसाठी आधार गट स्थापन करायचा तिचा मानस आहे.

‘अग्निजा’ तिच्या आयुष्यावर आधारित पुस्तक गुजराती भाषेत प्रसिद्ध झाले आहे. ते अनेकांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

संग्राहिका : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी पूजा अपूर्ण आहे…. अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?विविधा ?

☆ माझी पूजा अपूर्ण आहे…. अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो! पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो! पण त्या पांढर्‍या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो! पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ दिवा लावतो!

पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो! पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ कापूर जाळतो! पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो! पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो! पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो! पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो!

पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

 श्री गुरुदेव दत्त .

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवळातील घंटा… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

? देवळातील घंटा… ? सौ राधिका भांडारकर ☆

फुलोरा कलेचे माहेर घर

१२/०१/२०२१

? देवळातली घंटा ? 

गंमत आठवते.

लहानपणी आम्ही कोपीनेश्वरच्या देवळात देवदर्शनाला जात असू.ठाण्यातलं हे प्रसिदध मंदीर. भव्य, रम्य परिसर..समोर सुरेख तलाव..

देवळातला ऐसपैस चौक..देखणा नंदी आणि गाभार्‍यातली ती ऊंच शंकाराची पिंड..

देवळात शिरताशिरताच,प्रथम घंटा वाजवायची.

तेव्हां माझा हात घंटे पर्यंत पुरायचा नाही. मग आजीच्या कडेवर बसुन छान दणदण घंटा वाजवायची…मग नंदीचेआणि पिंडीचे दर्शन..

देवळातून परततानाही मला घंटा वाजवावीशी वाटे. पण आजी सांगायची ,”परतताना घंटा  नसते वाजवायची…”

तेव्हां मनात हे प्रश्न कधी आलेच नाहीत. देव दर्शनाआधीच घंटा का वाजवायची.परतताना का वाजवायची नाही…

पण नंतर माझ्या थोड्याशा खेळकर, मिस्कील स्वभावानुसार मी काही संदर्भ लावले.

म्हणजे शाळेत असताना वर्गात शिरताना, नोकरी विषयक मुलाखतीच्या वेळी ,नंतर बाॅसच्या केबीन मधे जाताना ,”मे आय कम ईन सर..!!”अशी परवानगी घेउनच जायचे असते.

किंवा कुणाच्या खोलीत शिरताना दार ठोठावायचे.. दारावरची बेल वाजवायची.. हे सारे शिष्टाचार पाळताना देवळातल्या घंटेचा अर्थच उलगडला…दर्शनापूर्वी देवाचीही परवानगी घ्यावी लागते..किंवा घंटा वाजवून भक्ताने देवाला सांगायचे असते!”देवा मी तुझ्या दर्शनासाठी आलोय बरं का…

“घंटेच्या माध्यामातून देवाशी केलेला हा संवादच असतो.

अशा पद्धतीने देवाची अपाॅईंटमेंट घ्यावी लागते, किंवा असे तर नाही ना, घंटा बडवून, देवाला आपल्यासाठी जागे करायचे, म्हणायचे, “परमेश्वरा ,आता तरी डोळे उघड. तुझी कृपा दृष्टी आम्हावर सदैव राहू दे,…!!!

मात्र गंमतीचा भाग सोडला तर… घंटानाद म्हणजे ब्रह्मनाद असतो. त्या नादातून जी कंपनं निर्माण होतात त्यामुळे वातावरण मंगलमय, शुद्ध होते.

सर्व नकारात्मकता नष्ट होते.आपल्या मनात विचारांचा कल्लोळ असतो.मन अशांत असते.

घंटानादामुळे चित्त शांत, एकाग्र होते. आणि देवरुपाशी  एक प्रकारचे तादात्म्य अनुभवास येते.

थोडक्यात, जेथे वाजते घंटा तेथे सरतो तंटा.

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गौरव मराठी भाषेचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ गौरव मराठी भाषेचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त्ताने…. सकाळपासून मोबाईल वर भाषा दिनानिमित्त चे विशेष वाचताना सहज लक्षात आलं ! महाराष्ट्राची प्रमाणित मराठी भाषा म्हणून जी आपण वापरतो ती पुस्तकातील भाषा ! पण बोली भाषा दर पाच मैलागणिक बदलते असे पूर्वी पासून ऐकून आहे! त्याप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा देश, कोकण, खानदेश,वर्हाड या प्रत्येक भागातील मराठी आपले वेगळेपण दाखवते!

मी महाराष्ट्रातील या सर्व भागात थोडा थोडा काळ राहिले आहे.आणि अनुभवली आहे वेगवेगळी मराठी भाषा.मिरज- सांगली तील भाषेवर कर्नाटक जवळ असल्याने कानडी भाषेची छाप दिसून येते.प्रत्येक वाक्यात शेवटी ‘की’ चा उपयोग!’काय की,कसं की..इ.’खानदेशाजवळ गुजरात राज्य असल्याने तेथील मराठीत गुजराथी, अहिराणी भाषेचे शब्द आपोआपच येतात!

तर नागपूर च्या मराठी भाषेत हिंदी शब्दांचा वापर जास्त दिसून येतो.’करून राहिले, बोलून राहिले,होय बाप्पा’ असे शब्द प्रयोग वर्हाडी भाषेतच दिसतात!

भाषेचा प्रवास हा असाच चालतो.व्यवहारात,बोली भाषेत अशी भिन्नता दिसत असली तरी पुस्तकी भाषा ही साधारणपणे एकच असते. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून संस्कृतमधील भगवद्गीता त्याकाळात प्राकृत मराठीतून लिहिली पण आपण आता ज्ञानेश्वरी वाचायला घेतली तर ती भाषा आपल्याला पुष्कळ वेळा कळत नाही. त्यातील कित्येक शब्दांचे अर्थ लागत नाहीत! त्यातील भाषेचे सौंदर्य कळायला पुन्हा शब्दार्थ बघावे लागतात!

काळानुरूपही भाषा बदलत असते.लहान बालकाला बोलायला शिकताना अनुकरण हेच माध्यम असल्याने आई जे शब्द उच्चारेल तेच ते बाळ बोलते. म्हणून मातृभाषेचे महत्त्व फार आहे!आपण कितीही शिकलो, वेगवेगळ्या देशात गेलो तरी कोणतीही तीव्र भावना व्यक्त करताना आपण मातृभाषेतून च बोलतो.आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की तिची अभिव्यक्ती करताना शब्द संपदा कधी अपुरी पडत नाही! ओष्ठव्य, दंतव्य, तालव्य, कंठस्थ..

अशा सर्व प्रकारच्या अक्षरांनी ती संपन्न आहे! मराठी भाषा आपल्या शरीर मनाशी एकरूप झालेली असते.म्हणून ती मातेसमान आहे. त्या मराठी भाषेला आपण जतन केले पाहिजे,   

मराठी दिनासाठी ची शुभेच्छा!

एक  मराठीप्रेमी…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्हॅलेन्टाइन… डॉ सुनिता दोशी ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ व्हॅलेन्टाइन… डॉ सुनिता दोशी ☆ डॉ. ज्योती गोडबोले  ☆ 

कॉलेजमधील निरोप समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने चांगला रंगला …अचानक वक्त्याने प्रश्न विचारला,” मुलांनो तुमच्या जीवनात ‘व्हॅलेंटाईन’ या शब्दाला किती महत्त्व आहे? तुमचं ‘व्हॅलेंटाइन’ कोण आहे …. असा कधी विचार केलाय का?”… मुलांमध्ये खसखस पिकली .अरे हा काय प्रश्न झाला ?….आणि असेल कोणी व्हॅलेंटाईन …..तरी यांना सांगायचं की काय ?

……आणि तेही या व्यासपीठावर ?

एका वात्रट मुलाने मोठ्याने विचारले,” सर ,तुमचा व्हॅलेंटाइन कोण ?”

आता मात्र चांगलाच हशा पिकला… पाहुणे हसले…

“अगदी खरं सांगायच तर कोणीतरी मलाही विचारावं म्हणूनच मी हा प्रश्न विचारला होता …!”

पुन्हा जोरदार हशा….!

“आता सांगतो ,माझं जीवन हेच माझं ‘व्हॅलेंटाईन’ ज्यावर मी मनापासून प्रेम करतो….. नव्हेतर मी त्याच्या प्रेमातच पडलो आहे ….!जी आपली ‘व्हॅलेंटाईन’ , तिला जर आपण गुणदोषांसहित स्वीकारले तरच जीवन सुंदर होतं …अन्यथा ‘अर्ध्यावरती डाव मोडला ‘हे ठरलेलंच ….!तसेच जीवनातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी , घटना ,व्यक्ती ह्यांच्यासहित मी माझ्या जीवनाला स्वीकारलं आहे… मी जणू माझ्याच जीवनाच्या गळ्यात गळा घालुन गातो , नाचतो आणि रडतो देखील….!”

‘वाह क्या बात है….!

प्रत्येकाने मनापासून दाद दिली. व्हॅलेंटाईन म्हटले, की डोळ्यापुढे येते ती एखादी व्यक्ती …..जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो… विषेशतः प्रियकर… प्रेयसी किंवा पती-पत्नी… आयुष्याचा जोडीदार… वगैरे…! फारच विशाल मन असेल तर एखादी आदर्श व्यक्ती….

पण हे उत्तर मात्र अनपेक्षित होतं… विचार करायला लावणारं आणि तितकंच सुंदर होतं….!

खरंच आपण आपल्या जीवनावर प्रेम करतो का ?किंवा असं म्हणूया की आपण आपल्या जीवनाच्या प्रेमात पडतो का?…. प्रेमात पडणं तर दूरच…! पण मला यापेक्षा कितीतरी जास्त मिळायला हवं होतं ,ते मी डिझर्व करतो….! पण नशिबापुढे काय ?..असं म्हणत जीवनाचं जणू एकओझं ओढत  असतो आपण….! ‘आयुष्य ओघळुनी मी रिक्त हस्त आहे …!’अशीच अनेकांची स्थिती….!

आपल्या जीवनाच्या प्रेमात पडणारे जीवनाला सुख दुःखा सहीत स्वीकारणारे किती जण असतील बरं….?

विचार करता करता  मला एक व्यक्ती आठवली ,ती म्हणजे लहानपणी आमच्या घरी झाडलोट करणारी आवडाबाई! ही आवडाबाई एक रस्ता झाडणारी बदली कामगार होती रोज पहाटे हजेरीला जायचं.कोणी रजा घेतली तर, तिला काम मिळायचं …!नाही तर पुन्हा घरी येऊन इतरांची धुणी-भांडी झाडलोट अशी काम करायची..! महिन्यात सहा -सात बदल्या मिळायच्या ..! पण त्यासाठी दररोज हजेरीला मात्र जावं लागायचं …तेही सहा किलोमीटर चालत..! नवरा दारुड्या ,त्यामुळे “पैसे दे” म्हणून बायकोला मारहाण वगैरे नित्याचंच झालेलं…!पण अशा परिस्थितीतही आवडाबाई खूपच आनंदी असायची. तिचं आणि माझ्या आईचं चांगलं जमायचं !आवडाबाईला तिच्या नोकरीचा फार अभिमान…! अभिमान म्हणण्यापेक्षा भारी कौतुक..!

तिची नोकरी आणि त्याचं वर्णन ऐकणारा एकमेव श्रोता म्हणजे माझी आई! ती सगळं वर्णन करून सांगायची ,”साहेबानी ‘आवडाबाई ‘म्हटलं, की आपण म्हणायचं ‘हाजिर साहेब’म्हणायचं अशी आमची हजेरी असते..!” सरकारकडून मिळणारं साबण,  झाडू ,पाटी वगैरे सगळं तपशिलासह आईला ऐकवायची ती….! पगाराच्या दिवशी नवरा मारहाण करायचा, पैसे मागायचा… पण तो दिवस संपला की दुसर्‍या दिवशी मारहाणीच्या खुणा अंगावर एखाद्या दागिन्याप्रमाणे मिरवत गाणं गुणगुणत कामावर हजर….!

एकदा असंच नवऱ्याने मारलं… बिचारी रडत रडत कामावर आली… मंगळसूत्र काढून टाकलं , पांढरं कपाळ…खूप शिव्या दिल्या नवऱ्याला….!खूप रडली..!

दुसऱ्या दिवशी आमच्या घरी हळदीकुंकू होतं …ही पठ्ठी सगळं विसरून हजर..! छान ठेवणीतलं लुगडं.. कपाळभर कुंकू…डोरलं…. असा थाट !उखाणाही घेतला तिने…’आजघरात माजघर माजघरात पलंग पलंगावर सुरी…सुरी गेली सरकुन…रंगरावच्या हाताखाली पाचशे कारकून…’

‘अरे बाप रे इतके…?’ आम्ही मुलं  फिदीफिदी हसायला लागलो…! आई डोळ्यानेच दटावलं. “कसाही असला तरी  कुंकवाचा धनी आहे माझ्या…!”ती गोड अशी लाजली….

असाच एक प्रसंग… आईबरोबर बाजारात जायचं होतं, बरंच सामान आणायचंअसल्याने आवडाबाई बरोबर होतीच .रिक्षातुन आमची वरात निघाली… नेमकी रिक्षा ज्या भागातून जात होती ,तो आवडाबाईचा झाडायचा प्रभाग होता ..!आवडाबाईला कोण आनंद…”अगं बया.. हा तर माझाच ‘वेरिया’ हे बघा वहिनी या झाडापासून माझी हद्द सुरू होते ..पार त्या शाळेपर्यंत माझीच हद्द …हा भाग पण  माझाच….!

एखाद्या राजाने  आपल्या राज्याच्या सीमा दाखवाव्या त्या थाटात आवडाबाई तिचा ‘वेरिया’अर्थात ‘एरिया’ दाखवत होती.आई पण कौतुकाने “अगोबाई ,हो का ?”म्हणत तिच्या आनंदात सहभागी झाली होती .मला भारी गंमत वाटत होती. घरी आल्यावर मी आईला चिडवत होते.., “काय म्हणते तुझी मैत्रीण? चांगलीच मैत्री आहे का तुझी आवडाबाईशी…”                       

तशी आई म्हणाली,” अगं त्या आवडाबाईकडून शिकण्यासारखी एक गोष्ट लक्षात ठेव… जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि  जीवनावर प्रेम करण्याची वृत्ती…! जीवनाच्या सारीपाटावर पडलेलं दान माझ्या मनासारखं नाही म्हणून जीवनाला नावं ठेवणारे बरेच असतात… पण जे दान पडलं तेच माझं आहे…असं म्हणून त्या चांगल्या वाईट दानासह   जीवनाला आनंदाने कवटाळणारे आवडाबाई सारखे थोडेच असतात…!

व्हॅलेंटाईन म्हणजे काय हे आवडाबाईला माहीत नव्हतं आणि आईलाही…!  पण जीवनाला व्हॅलेंटाईन कसं बनवायचं हे त्यांना माहीत होतं…! आपलं जीवन हेच आपलं व्हॅलेंटाईन हे  मला नव्याने प्रत्ययाला येत होतं…!

 

डॉ सुनिता दोशी✍️

संग्राहक — ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माधवी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ माधवी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : माधवी

महाभारत वाचताना अनेक अनुकंपनीय दुर्दैवी स्त्रिया भेटल्या. पण माधवीच्या जीवनाचा संघर्ष, त्याग, आणि परवड पाहून हृदय हेलावून गेलं.

ययाती आणि देवयानी यांची अत्यंत सुस्वरूप आणि सद्गुणी कन्या माधवी. ही कथा महर्षी नारदांनी दुर्योधनाला सांगितलेली आहे.

विश्वामित्र ऋषींचा पट्टशिष्य गालव. त्याचे शिक्षण पूर्ण होताच गुरुदक्षिणा देण्याचा त्याने हट्ट धरला. विश्वामित्रांना गालव किती गरीब आहे हे माहीत होते म्हणून ते म्हणाले मला काही नको पण गालव आपला हट्ट सोडायला तयार नव्हता म्हणून विश्वामित्रांनी चिडून त्याला सांगितले की तुला द्यायचेच असेल तर मला श्यामकर्णी आणि शशिकिरणा सारखे आठशे घोडे दे. गालवाने आपला मित्र गरुड यांच्याकडे मदत मागितली. गरुड त्याला ययाती राजाकडे घेऊन गेला.

ययातिकडे तसे घोडे नव्हते पण आपल्या दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवणे त्याला योग्य वाटले नाही  म्हणून त्याने त्यावर तोडगा काढला की माझी अप्सरे सारखी सुंदर अशी उपवर कन्या आहे तिला हुंडा म्हणून कुणीही आठशे घोडे देऊ शकतो तू तिला घेऊन जा.

गालव अयोध्येचा राजा इश्वाकुकुलिन राजाकडे तिला घेऊन गेला. तो राजा  म्हणाला ही कन्या खुप सुंदर व सुलक्षणी आहे ती महापराक्रमी पुत्राला जन्म देईल. तिला माझ्याकडे एक वर्षे ठेव एक मुलगा झाला की दोनशे घोडे आणि ही मुलगी मी तुला परत देतो. असहाय माधवीने मान्य केले. तिला वसु मानस नावाचा पुत्र झाला 200 घोडे घेऊन ती परत ययातिकडे आली. त्यानंतर तिला काशीचा राजा दिवोदास यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यानेही एक वर्ष तिला ठेवून घेतले प्रतार्दन नावाचा मुलगा त्याला तिच्यापासून झाला. आणि दोनशे घोडे देऊन त्याने  तिला परत पाठवले. नंतर तिला भोजराजा उशिनरकडे पाठवण्यात आले. त्याच्यापासून तिला सिवी नावाचा पुत्र झाला आणि त्याने ही दोनशे घोडे देऊन तिला परत पाठवले. सहाशे घोडे घेऊन माधवी सह गालव गरुडाकडे पुढील दोनशे घोड्यांसाठी आला. गरुडाने सांगितले आता तुला उरलेले 200 घोडे मिळणारच नाहीत कारण पूर्वी फक्त वरुणाकडे  एक हजार घोडे  होते.  वरूणाला गाधी राजाच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा  होती. गांधी राजाने ऋचिक ऋषींना सांगितले तुम्ही मला ते 1000 घोडे मिळवून दिलेत तर मी माझ्या मुलीचे लग्न वरुणाशी लावून देईन. वरुणाच्या यज्ञाचे ऋचिक ऋषीनी पौरोहित्य केले. वरुणाने खूश होऊन 1000 घोडे त्यांना दान केले. गाधी  राजाने  वरील3 राजांना दोन दोनशे प्रमाणे सहाशे घोडे दान दिले आणि उरलेले 400 घोडे नदीत वाहून गेले. विश्वामित्र हे गाधीचे पुत्र आहेत. आत्तापर्यंत प्रत्येकाने तिची किंमत 200 घोडे केली तर तू विश्वामित्रांना तिला अर्पण कर म्हणजे त्यांना दोनशे  घोडे मिळाल्या सारखे आहेत. विश्वामित्रांनी ते मान्य केले व त्यांना माधवी पासून अष्टक नावाचा पुत्र झाला. त्यांनी ते सहाशे घोडे कुरणात चरायला सोडून दिले व माधवीला परत पाठवले. पुत्र जन्मानंतर परत कुमारिका होण्याचे वरदान माधवीला असल्यामुळे ती अजूनही कुमारिका म्हणूनच पित्याकडे परत आली.ययातिने गंगा यमुना संगमा वर तिचे स्वयंवर मांडले. पण स्वाभिमानी माधवीला वैराग्य आले. आपल्या देहाची झाली इतकी विटंबना पूर्ण झाली असे समजून ती वनवासात निघून गेली.अनेक वर्ष  वनात हिंडत होती.

माधवी चे चारी पुत्र मोठे झाले .वसु मानस अतिशय सच्छील व धर्माचा रक्षण कर्ता होता. सिवी अत्यंत दानशूर होता. प्रतार्दन महापराक्रमी झाला. आणि अष्टक अनेक यज्ञ करून पुण्यवान झाला.

इकडे ययाती स्वर्गवासी झाला पण त्याच्या अहंकारी स्वभावामुळे इंद्रादी देवांनी त्याला पृथ्वीतलावर ढकलून दिले .ययातिने त्यांना इच्छा सांगितली जिथे सच्छील माणसे जमली असतील तिथेच मला पडू द्या. त्याच वेळी नैमिषारण्यात माधवीचे चारी पुत्र यज्ञ करत होते .ययाती त्या पवित्र ठिकाणी पडला. नेमकी माधवी पण त्या ठिकाणी हजर होती. तिने आपल्या पित्यास ओळखले.  मुलांनी पण आईला ओळखले पण ययातीला त्यांनी ओळखले नाही. माधवीने आपली सर्व मानखंडना विसरून चारी पुत्रांना सांगितले की तुमचे व माझे पुण्य आपण माझ्या पित्याला अर्पण करून त्याला सन्मानाने स्वर्गात परत पाठवू या. त्या पुण्याईच्या जोरावर ययाती परत स्वर्गात गेला पण माधवी मात्र पुन्हा निर्विकारपणे तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेली. अशी ही पितृभक्त माधवी. डोकं सुन्न करणारी तिची कथा.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रंग संवेदना… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ रंग संवेदना… ☆ सौ ज्योती विलास जोशी

एक रंगसंवेदना असते.आवडत्या रंगाला त्याच्या मनःपटलावर एक स्थान असतं. रंगीबेरंगी दुनियेतला तोच एक रंग त्या व्यक्तीला भावतो आणि आनंदही देतो.

‘रंग रंग के फुल खिले है भाए कोई रंग ना’ ह्या प्रेमिकेच्या ओळीतून तोच अर्थ प्रतीत होतो.’प्रेमरंगा’चा शोध घेत तिचे डोळे भिरभिरत असतात. नेमक्या परावर्तित होणाऱ्या किरणांच्या (प्रेमिकाच्या) शोधात ते असतात.आणि तसे एकदा झालं की मग,’ मुझे रंग दे, मुझे रंग दे’ असं म्हणत हर्षोल्हासात ती रंगून जाते.

लहानपणी इंद्रधनुष्यातले रंग ‘जातानाहीपानीपी’ असा ठेका धरून पाठ केलेले…..तेव्हाच मनांत आलं की या इंद्रधनुष्यात गोरा रंग कुठे आहे?धाडसानं तसं बाईंना विचारलं देखील होतं. विज्ञानाची शिडी धरून बाईंनी ‘सात रंग मिळून जो होतो तो गोरा म्हणजे पांढरा रंग.’  असही सांगितल्याचं आठवतंय. माझ्या बाल मनानं सोयिस्कर अर्थ असा लावला होता की सगळे रंग नसले की ‘अंधार’ म्हणजे काळा रंग…. मग या अंधाराला पारंब्या फुट्याव्यात तसा काळा रंग मला दिसू लागला आणि आठवली ती संत नामदेवांची गवळण… ‘रात्र काळी घागर काळी जमुना जळे ही काळी ओ माय’. … ‘देव माझा विठू सावळा’ या गाण्यातील सावळ्या रंगाचं सौख्यही विठूला पाहिल्यावर डोळ्यात भरलं. डोळे आणि मन सावळ्या रंगाचा शोध घेत घेत श्यामलसुंदर अजिंठा-वेरूळची लेण्या पर्यंत पोहोचलं. या स्त्रियांचं सौंदर्य सावळ्या रंगा व्यतिरिक्त आणखी कोणत्याही रंगानं खुललं नसतं हे मनोमन पटलं.

लोकसाहित्यात चंद्रकलेचा उल्लेख पैठणी पेक्षाही जास्त आढळतो. त्यातही तांबड्या चन्द्रकळेपेक्षाही काळी चंद्रकळा जास्ती रूढ…. त्या काळ्या चंद्रकळेतील नारी काळे मणी आणि काजळ यांनी खुलून दिसते. त्यात तिने काळी गरसोळ घातलेली असेल तर मग त्या श्यामलेचे वर्णन ते काय करावे?

विठ्ठलाला माउली म्हणत ज्ञानोबांनी’ रंगा येई वो’ अशी हाक मारली आहे. रंगांच्या यादीत काळ्यासावळ्या रंगाला अव्वल स्थान मिळालं ते त्यांच्या या हाकेनं…

‘निळा सावळा नाथ’ असे आपल्या पतीचे वर्णन करताना निळ्या रंगाच्या आडून सावळेपण दाखवताना नारीच्या भावनेतील शीतलता, घनता आणि गारवा जाणवतो. कृष्ण आणि विष्णू यांच्या सावळ्या रंगात निळसर रंगाची झाक आहे. निळ्या सावळ्या रंगांसोबतच पांढऱ्या रंगाच अप्रूपही तितकंच आहे. लेखक कवी साहित्यिक यांनी आपल्या साहित्यातून या रंगीबेरंगी दुनियेतील सर्व रंगांची उधळण केली आहे.

पद्मजा फेणाणी यांचं ‘शुभ्र ज्वाला’ या अल्बम मधील ‘पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला’ हे गीत पांढऱ्या रंगाचं सौंदर्य खुलवतं. ‘पुस्तकातली खूण कराया दिले पण एकदा पीस पांढरे’ या त्यांच्याच गाण्यात त्यांच्या आवाजातून शुभ्र पांढऱ्या पिसार्याचं सौंदर्य झाकोळतं.

लावणीतील रंग बरसातही अनुभवण्यासारखी आहे. होळीच्या सणातली रंगांची उधळण करताना ‘खेळताना रंग बाई होळीचा म्हणत… तर ‘कळीदार कपूरी पान केशरी चुना रंगला कात’ म्हणत सुलोचना बाईंनी खाऊ घातलेलं पान लावणीचा ठसका देतं.’पिवळ्या पानाचा देठ की हो हिरवा’म्हणत हिरव्याकंच शालूतील लावणीसम्राज्ञी मन जिंकते. ‘श्रावणाचं ऊन मला झेपेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना. हिरव्या मोराची थुईथुई थांबेना’ अशी लडिवाळ तक्रार करत लावणीसम्राज्ञी रंगात येते तेव्हा मन लावणीत रंगून जातं.

इंद्रधनुष्यातले रंग, काळा पांढरा रंग यांच्यासोबतच लिंबू, पारवा, श्रीखंडी, चिंतामणी  गुलबक्षी पोपटी, आकाशी, डाळिंबी, तपकिरी, शेवाळी, मोतिया, राखाडी, केतकी,  आमसुली याआ णखीन अशा अनेक रंगानी माझं आयुष्य रंगीबेरंगी करून टाकलं. लहानपणी एका रंगानं मात्र मला कोडयात टाकलं होतं. ‘गणराज रंगी नाचतो’ हा रंग कोणता? तो कलेचा रंग होता हे मोठे झाल्यावर लक्षात आलं.’अवघा रंग एक झाला’ असं म्हणत सोयराबाईंनी मानव जातीतील सारे भेद मिटवले. हा रंग देखील समजायला मोठं व्हावं लागलं….

अशा अनेकविध गाण्यांच्या लोलकातून गीतकारांच्या प्रतिभेचे किरण जाऊन माझ्या मनःपटलावर रंगीबेरंगी इंद्रधनुष्य उमटलं. या इंद्रधनुष्यात अगणित रंग होते. त्या रंगात मनानं  रंगून जायचं ठरवलं.रंग उडलेल्या मनाच्या पापुद्र्यांवर आता आगळे वेगळे रंग चढू लागले. आयुष्याचं चित्र रंगीबेरंगी रंगांनी रंगवून टाकायचं त्यानं ठरवलं…..

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

jvilasjoshi@yahoo.co.in

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सामान्यातील असामान्यत्व ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

 

?विविधा ?

☆ सामान्यातील असामान्यत्व ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

काल मी कृष्णा काकांकडं गेले होते. काका काकू बाहेर जाण्याची तयारी करत होते. त्यांची लगबग बघून मी न राहवून चौकशी केलीच. काका काकू चिनूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथाश्रमात मुलांना लाडू वाटायला चालले होते.

नोकरी च्या निमित्तानं परदेशी राहणाऱ्या नातवाचा वाढदिवस साजरा करण्याची ही कल्पनाच किती अभिनव आहे, नाही का ? आमच्या काका काकूंनी मुलगा जवळ नसताना सुद्धा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. कितीतरी जणांच्या चेहऱ्यावर तो परावर्तित झालेला बघितला!

पुण्यातील एक सद्गृहस्थ आपल्या मुलाच्या निधनाचं दु:ख विसरून अनेक अनाथ मुलांना आपलं घर देतात, त्यांना आश्रय देतात. अशी माणसं मला सामान्य असूनही असामान्य वाटतात. या देवदूतांना प्रसिध्दी नको असते. हारतुरे नको असतात. पेपर मध्ये फोटो किंवा बातमी नको असते. त्यांना फक्त आनंद वाटायचा असतो. समाधान पेरायचं असते. स्वतः बरोबर आजूबाजूला सुख पसरवायचं असतं. प्रसिध्दी, पैसा, अहंकार मोठेपणा त्यांच्या आजूबाजूला फिरकतही नाहीत. या सगळ्या पलिकडं ते पोचलेले असतात. म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे दिसतात.

असामान्य होण्यासाठी मोठं कार्यच करायला पाहिजे असं नसतं हं. मोठेपण अंगी बाणवायला यातना ही सोसाव्या लागतात. ती असामान्य व्यक्तिमत्वं लाभलेली माणसं तुमच्या आमच्यासारखी असूनही वेगळी असतात.ते सगळ्यांना शक्य नसतं. परंतु छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कुणालातरी मदत करु शकतो. कुणाला तरी हसवू शकतो, उदास मनाला आनंद देऊ शकतो. बघा हं. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. आपल्या बहुतेकांच्या घरी खूपसा खाऊ असतो, नको असलेले जास्तीचे कपडे असतात. हेल्थ कॉन्शस असलेले आपण इतका खाऊ संपवू शकत नाही. काकूंच्या प्रमाणं मुद्दाम करुन नाही जमणार कदाचित, पण असा जास्तीचा खाऊ ; ताजा, चांगला असतानाच गरजूंना का वाटू नये बरं? जसं खाण्याच्या पदार्थांचं, तसंच कपड्यांचं! आजकाल कपाटात मावत नाहीत एवढे कपडे असतात नं बहुतेकांच्या जवळ! ते जुने होण्यापूर्वी, फाटण्यापूर्वी दिले गरजूंना तर? अगदी सुधा मूर्तीं इतका साधेपणा नाही जमला तरी , त्यांचं थोडंसं अनुकरण करायला काय हरकत आहे? बघा बरं, अशा वागण्यानं कसं समाधान मिळतं ते. आनंद, समाधान, या भावना संसर्गजन्य आहेत. त्या परावर्तीत होतात. आणि त्या परावर्तनाचा एक सूक्ष्मसा किरण आपल्याला होता आलं पाहिजे.

आनंदाचे डोही आनंद तरंग. अंतर्मनात जेंव्हा असा आनंद भरलेला असतो, मनाचा डोह आनंद गान गात असतो तेंव्हा अगदी सहजपणं आनंद तरंग उठत असतात. त्यांचा भवताल ही आनंदानं डोलत राहतो.

निर्व्याज समाधान मिळवण्यासाठी पैसे खर्च लागत नाहीत. असं सिद्ध करणारे अनेक सामान्य लोक या जगात आहेत. एक भांडी घासणाऱ्या बाई आपल्या झोपडीवजा घरात दहा बारा अनाथ मुलांच संगोपन करतात. त्यांच्या शिक्षणासाठी धडपडतात. त्यांना एकवेळेला पोटभर खाऊपिऊ घालतात.मग ती साधी चटणी भाकरी का असेना. एवढा उदात्तपणा राजेशाही बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंतांच्या कडंही नसतो.अशी अनेक उदाहरणे आहेत जी सहजपणे समाजकार्य करतात. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळूही न देता अविरतपणे घेतला वसा सुरू ठेवतात. या सर्वांना माझे दंडवत. साने गुरूजींच्या या धर्माचे आचरण करण्याचा निदान एक लहानसा का होईना प्रयत्न अवश्य करुया. . . . . .

जगी जे दीन पद दलीत

जगी जे हीन अतीपतीत

तया जाऊन ऊठवावे

जगाला प्रेम अर्पावे

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ संगीताचा विकास – भाग-१  ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? सूर संगत ?

☆ संगीताचा विकास – भाग-१  ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

संगीत म्हणजे नेमके काय?

त्याचे उत्तर असे की निबद्ध गायन किंवा वादन. तालात बांधलेली स्वररचना.राग,स्वर

आणि शब्द कोणत्या एका तालात बद्ध करून त्या तालाच्या खंडाप्रमाणे सम,इतर टाळ्या,काल किंवा खाली या आवर्तनात स्वररचना किंवा गीत रचना चपखलपणे बसविणे म्हणजे संगीत.

पाण्याची खळखळ,वार्‍याची फडफड,समुद्राची गाज,पक्षांचा कलरव,कोकिळेचे कूजन,भ्रमराचे गुंजन हे जर शांतपणे ऐकले तर असे लक्षात येते की या सर्वांमध्ये एकप्रकारचा नाद,ताल,लय आहे,निबद्धता आहे.

भारतीय संगीताची परंपरा फार मोठी आणि प्राचीन आहे.नादयुक्त हुंकार ते सप्तस्वर असा संगीतातील स्वरांचाः विकासक्रम आहे.त्यामागे दीर्घ कालखंडाची परंपरा आहे जी  चार कालखंडातून दिसून येते.

१) वैदिक काल~इसवी सन पूर्व ५ ते ६ हजार पासून १हजार पर्यंत.

पंचमहाभूतांना देवता मानून त्यांची स्तुती व प्रार्थना करणार्‍या  ऋचांचे गायन ऋषीमुनी करीत असत.ऋग्वेद,यजूर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांपैकी सामवेदाशी वेदकालीन संगीत संबंधीत आहे. सा म्हणजे ऋचा आणि अम् म्हणजे ऋचांचे स्वरबद्ध गेय स्वरूप.सामवेदात गायनाची एक निश्चित पद्धति तयार केली गेली आणि तीन स्वरांचे गायन सप्तसुरांपर्यंत विकसित झाले. यज्ञयागादि प्रसंगी जे गायन होत असे तेच तत्कालीन संगीत होते,ज्याला गंधर्वगान असे म्हटले जात होते.

२) प्राचीन काल~ ईसवी सन पूर्व १००० ते ई.स.८०० पर्यंत. ह्याला जातिगायनाचा कालखंड असेही समजतात.धृवा गायनही प्रचलीत होते.पुढे त्याचेच परिवर्तीत स्वरूप धृवपद किंवा धृपद गीत गायन अशी ओळख झाली.हा प्रकार भरतपूर्व काळापासून प्रचारात होता.जातिगायनाचे बदललेले स्वरूप हेच रागगायन होय.भरतमुनींच्या नाट्यशास्त्रांत ह्या जातिगायनाचा किंवा राग गायनाचा उल्लेख सांपडतो.

पुढील भागात आपण मध्ययुगीन कालखंडातील संगीत बघू.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares