मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींचा कलश ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ आठवणींचा कलश  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आयुष्य जसं वाढतंय तसतसा हा आठवणींचा कलश भरत चाललाय ! मला तर  पाण्याच्या रांजणात खडे टाकणाऱ्या कावळ्याच्या गोष्टीची आठवण येते ! रोजचा प्रत्येक क्षण आपण जगतो आणि ते क्षणरत्न या कलशात जमा होते ! काही अनमोल क्षणांची रत्ने त्या कलशात साठून राहतात ! माझ्या मनाच्या अवकाशात त्यातील काही प्रसंग कायमचे चितारलेले राहिले आहेत. तसाच हाही एक प्रसंग मनात अनमोल म्हणून राहिला आहे ! जवळपास चाळीस वर्ष होऊन गेली त्या क्षणाला !

माहेर आणि तिथली माणसं- आई -वडील, भाऊ- बहिणी नेहमीच आपल्याला जवळचे असतात.  सुखदुःखात काळजी घेणारे, साथ सोबत करणारे ! लग्न होईपर्यंत आपण त्या कुटुंबाचे घटक असतो, पण लग्नानंतर स्त्रीचे विश्व बदलते. आई चे घर ‘ माहेर ‘ बनते. विसावा देणारे ! आज मला माझ्या पाठीराख्या भावाची आठवण येतेय ! 

पहिले बाळंतपण माहेरी, या प्रघाताप्रमाणे माझं पहिलं बाळंतपण आईकडे पार पडले. दोनच वर्षांनी पुन्हा अपत्याची चाहूल लागली आणि यावेळेस आपल्याच घरी बाळंतपण करुया असं ठरलं ! सासुबाई आणि आई आलटून पालटून मदतीला येणार होत्या. पण आपण ठरवतो तसं होतंच असे नाही. खरं तर आपल्या ठरवण्यापेक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार गोष्टी घडत असतात ! तसंच झालं ! मला नववा महिना लागला आणि अचानक ह्यांच्या बदलीची ऑर्डर आली ! आम्हाला एकदम प्रश्नच पडला ! आता ह्यांना हजर व्हावे लागणार, तसेच लवकरच क्वाॅर्टरही सोडावा लागणार ! डिलिव्हरी तर अगदी जवळ आलेली काय करायचं? असा  प्रश्न पडला. मोठा प्रवास करणे शक्यच नव्हते. बदलीचे  गाव लांब होते. तसेच तिथे क्वार्टरही लगेच मिळणार नव्हता. पण देवालाच काळजी ! दिवाळी जवळ आली होती. भाऊबीजेला भाऊ आला होता. त्याचदरम्यान या बदलीच्या गोष्टी झाल्या ! तेव्हा त्याने एका क्षणात प्रश्न सोडवला ! तू माझ्याकडे फलटणला ये बाळंतपणाला ! काहीच प्रश्न नाही. त्याची छोटी मुलगी आणि वहिनीची नोकरी यामुळे आई तिथेच होती. मोठ्या वहिनींचे बाळंतपणही नुकतेच तिथे झाले होते. दोन महिने झाले होते आणि ती आता माहेरी जाणार होती. त्यामुळे भाऊ म्हणाला, ‘अगं, तिथं बाळंतपणाचा सगळा सेटअप आहे, तेव्हा तू तिथंच ये !’ त्याच्या या सांगण्यामुळे आम्ही निर्धास्त झालो. मन भरून आलं ! याहून भावाची भाऊबीज ती कोणती !

तीन चार तासाचा प्रवास होता, पण रस्ता अगदीच खडबडीत ! ह्यांच्या एका डॉक्टर मित्राच्या सहकार्याने आम्ही भावाकडे पोहोचलो. त्यानंतर अक्षरशः आठवड्याच्या आतच माझी डिलिव्हरी झाली. इतक्या अवघडलेल्या अवस्थेत मी तिथे गेले होते ! पण आई, भाऊ, वहिनी सर्वांनी माझी बडदास्त ठेवली ! बाळंतपण पार पडले. तिथून आम्ही दोनच महिन्यात पुणे मार्गे शिरपूरला , बदलीच्या गावी जाणार होतो. आई पोचवायला येणार होती. माझा पहिला मुलगा जेमतेम दोन सव्वा दोन वर्षाचा आणि छोटं बाळ दोन महिन्याचं ! तेव्हा स्पेशल गाडी करणे हा प्रकार नव्हता. आमच्याबरोबर भाऊ फलटण ते पुणे आला. आम्ही रात्रीच्या गाडीने निघणार होतो. दोन लहान मुले आणि खूप सारे सामान घेऊन आम्ही दोघी कशा जाणार? असा भावाला प्रश्न पडला. त्याने लगेच निर्णय घेतला. दोन दिवसाची सुट्टी घेतली आणि केवळ आमच्यासाठी, बहीण आणि भाचरे यांच्या काळजीने तो शिरपूरला पोचवायला आला.

आम्हाला तिथे सुखरूप पोहोचवून लगेच त्याच रात्रीच्या गाडीने तो परत पुण्याला आला ! तिथून फलटण आणि लगेच ऑफिस जॉईन केले ! आता मुलीने चाळीशी ओलांडली! खूप वर्षे गेली, पण तिच्या वेळचे बाळंतपण आठवलं की ते सर्व क्षण आठवणींच्या कलशातून बाहेर उचंबळून येतात ! अशा मौक्तिक क्षणांच्या आधारावरच तर नाती टिकून राहतात ! आता निवांत आयुष्याचा हा खेळ अनुभवत असताना त्या आठवणींच्या क्षणांची रत्ने पहात राहते मी ! त्या क्षणांनी आपले आयुष्य किती समृद्ध केले आहे ते जाणवत राहतं ! हा कलश आपले जेवढे आयुष्य आहे तोपर्यंत अशा *क्षण- रत्नांनी *भरत राहणार आहे, आणि त्या रत्नक्षणांची आठवण मनाच्या तळात कायमच राहील हे मात्र नक्की!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विस्मरणात चाललेला ग्रामीण शब्दसंग्रह ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ विस्मरणात चाललेला ग्रामीण शब्दसंग्रह ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनात सहजपणे वापरल्या जाणाऱ्या, मराठी भाषेला समृध्द 

करणाऱ्या, पण  काळाच्या ओघात काहीशा विस्मृतीत गेलेल्या शब्दांचा, संकल्पनांचा मागोवा—-

                      

जसजसं शेतीवाडीचं  यांत्रिकीकरण होऊ लागलं , गावगाड्याला नागरीकरणाने भरकटून टाकलं,   गावाकडचं घर बदललं आणि ‘बंगलो स्किम’ आली, तसतसे मग –

 

ओटा,       पडवी,        न्हाणीघर,      माजघर,      शेजघर,      माळवद,         धुराडे-धारे,

वासं-आडं,       लग,       दिवळी,       खुंटी,     फडताळ,      परसदार,         पोतेरं, 

चावडी,     चौक,      पार,     पाणवठा,   उंबरठा,     कडी कोंडी,     खुराडं,    उकिरडा, 

——-हे शब्द विस्मरणात गेले.

 

बैलगाडी जाऊन ट्रॅक्टर-यांत्रिकी अवजारं आल्यानं —-

 

औत,   रूमणं,    चाडं,    लोढणा,     वेसण,     झूल,    तिफण,     जू,    वादी, 

कासरा (लांब दोर),        दावं (लहान दोरखंड),     चराट (बारीक दोरी) 

——-या शब्दांना आपण हरवून बसलो. 

 

विहिरीवरची मोट गेली, पंप आले. परिणामी—-

 

 मोट,    नाडा,    शिंदूर,    धाव,   दंड,   ओपा,     पलान 

——–हे शब्द दिसेनासे झाले. 

 

खुरपणी,    मोडणी,     मोगडणी,    उपणणी,    बडवणी,    खुडणी,    कोळपणी, 

दारं धरणं,     खेट घालणं,      माळवं

——- यांचा अर्थ अलीकडच्या पिढीला समजत नाही. 

 

रास,    सुगी,   गंजी,   कडबा,   पाचुंदा,   बोंडं,   सुरमाडं,   भुसकट,   शेणकूट,   गव्हाण

——- या शब्दांचंही तसंच! 

 

धान्य दळायचं— दगडी जातं,   खुट्टा,   मेख,

——–हेही शब्द काळाच्या पडद्याआड चाललेत.

            

साळुता आणि केरसुणी– याऐवजी झाडू आला. 

 चपलेला— पायताण, 

गोडेतेलाला— येशेल तेल, 

टोपडय़ाला—- गुंची म्हटलं जायचं, 

———हे आता सांगावं लागतं.

 

गावंदर,    पाणंद,    मसनवाट

——हे असे शब्द नागरीकरणामुळं मागं पडले. 

 

चांभाराची रापी,      सुताराचा वाकस,      कुंभाराचा आवा, 

लोहाराचा भाता,      ढोराची आरी,          बुरूडाची पाळ्ळी

——ही हत्यारांची नावं आता कुणाला आठवतात? 

 

पतीला दाल्ला (दादला),       पत्नीला कारभारीण,

सासर्‍याला मामंजी,          सासूला आत्याबाई, 

नणंदेला वन्स,        बहिणीच्या पतीला दाजी म्हणतात,

——- हे आता नव्या पिढीला सांगावं लागतं, नाही का?

                   

स्वयंपाकघराचं किचन झालं–आणि कोरडयास (कोरडया पदार्थासह खायची पातळ भाजी) 

कालवण (ज्यात कालवून खायचे असा पातळ पदार्थ), आणि –

माडगं,    डिचकी,    शिंकाळं,    उतरंड,    भांची,    डेरा,    दुरडी,    बुत्ती, 

चुलीचा जाळ,    भाकरीचा पापुद्रा,    ताटली,    उखळ,    मुसळ 

——–हे शब्द नागर संस्कृतीनं बाजूला सारले.

 

रविवार हा सुट्टीचा दिवस—- निवांत असण्याचा दिवस म्हणून तो ‘आईतवार ‘ म्हटला जायचा

तर गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार.

——-त्याचा अपभ्रंश होऊन बस्तरवार झाला.

 

पहाटेच्या वेळेला ‘झुंझुरकं’,    सकाळी लवकर म्हणजे ‘येरवाळी’ किंवा ‘रामपारी’    आणि सायंकाळला सांजवेळ , दिवेलागण,      ‘कडुसं (कवडसे) पडताना’ अशी शब्दयोजना होती.

 

अंगदट (बळकट),     दीडकं-औटकं (एकपासून शंभर पर्यंतच्या  संख्येची पावकी, निमकी,पाऊणकी दीडपट-पावणेदोन पट साडेतीनपट संख्या दाखवणारं कोष्टक), 

झोंटधरणी (भांडण),     पेव,     कोठी,     कणगी (धान्य साठवण्याचं साधन) 

———हे शब्दही आताशा हरवलेत.

                   

इस्कोट (बिघडवणं),       सटवाई (नशिब लिहिणारी देवता),      सांगावा (निरोप), 

गलका (गोंगाट),       हेकना (चकणा),     मढं (मृतदेह),      पल्ला (अंतर), 

शिमगा (होळी किंवा शंखनाद),      चिपाड (वाळलेला ऊस),    अक्काबाईचा फेरा (दारिद्रय़),

अक्करमाशा (अनौरस),       अवदसा (दुर्दशा),      इडा-पीडा (सर्व दु:ख),     कागाळी (तक्रार), 

चवड (रास, ढीग),     झिंज्या (केस),    वंगाळ (वाईट),    डोंबलं (डोकं),      हुमाण (कोडं), 

भडभुंज्या (चिरमुरे, लाह्या भाजणारा)

 

——–ही सगळी मराठी भाषेला ग्रामीण भागानं दिलेल्या शब्द- भेटीतली वानगीदाखल उदाहरणे . 

 

आपण देखील आपल्या शब्दसंग्रहात असलेले, आपल्या मनातील पिंपळ पानावर कोरुन ठेवलेले, मात्र सध्या कालबाह्य झालेले शब्द व संकल्पनाच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करु या.

संग्राहक : माधव  केळकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तू वंशाची पणती.. ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

 ?  विविधा ?

☆ तू वंशाची पणती..  ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

तू आलीस ,तू पाहिलेस

तू जिंकलेस सारे जग

आणि आमचे मन ही..

 

 तुझ्या चालण्यात,बोलण्यात

झळकत होता आत्मविश्वास,

आणि चेहऱ्यावर होते तेज

स्वतःला सिद्ध केल्याचे…

 

 तो किरीट डोईवर सजला होता नि डोळ्यातून वाहत होते

अश्रू….. आनंदाश्रू..

तुझ्या ही आणि आमच्या ही..

 

खरं तर ते अश्रू नव्हतेच

 

ती होती पोहोच संघर्षाची,

अपार अशा मेहनतीची,.

काळजात दबलेल्या कैक

हुंदक्याना नि सोसलेल्या                             

अपमानाच्या घावांना

वाट मोकळी करून दिलीस…

 

दुर्दम्य इच्छाशक्ती,जिद्दीच्या

बळावर आकाशाला गवसणी

घातलीस पाय मात्र जमिनीवर ठेवून …  ब्रम्हांड सुंदरी होताना

तू जगाला छान संदेश दिलास….

स्वतःवर विश्वास ठेवण्याचा व आतून बुलंद होण्याचा..

 किती सोप्या भाषेत तू आम्हाला जगण्याचे बळ दिलेस ,सोबत दिलीस नवी ऊर्जा ,आभाळ पेलण्याची…

 

 शेण गोळे झेलून सावित्रीने

अक्षर ओळख करून दिली.देशाचे सर्वोच पद पेलूनइंदिरा नी मनगटातील बळ

सिद्ध केले… सुनीता ,कल्पना चावलाने आकाशाला कवेत घेतले. कला, साहित्य,,नृत्य, नाट्य, संगीत  प्रत्येक क्षेत्रात…

पृथ्वी,,आकाश, पाताळ

साऱ्या ठिकाणी उमटत गेले

तुझ्या कर्तृत्वाचे ठसे…

 

  आज हर भारतीया ला

नाज वाटेल ते काम तू केलेस..

 

 खरेच काळ बदलतोय ग..

वंशाचा दिवा च हवा

म्हणणारा हा समाज.. आज वंशाची पणती ही

तितक्याच अभिमानाने

मिरवतोय..

तिच्या तेजाने झळाळून

निघतोय..

स्वतःची अपूर्ण स्वप्ने                                         

तिच्यात पूर्ण करताना

कृतार्थ होत जातोय…

 खरेच काळ बदलतोय..!

 

© सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वामी ललितराम दास….सुश्री मंजुषा जोगळेकर ☆ संग्राहक – सुश्री वीणा छापखाने

? इंद्रधनुष्य ? 

☆ स्वामी ललितराम दास….सुश्री मंजुषा जोगळेकर ☆ सुश्री वीणा छापखाने☆

हे आहेत स्वामी ललितराम दास महाराज. केदारनाथ धाम येथे गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ हे तप साधना करीत आहेत. हा यांचा या दोन तीन दिवसांतीलच फोटो आहे. जेव्हा केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले जातात, तेव्हा हे तिथे येणार्‍या यात्रेकरूंची सेवाही करतात. या वर्षी ८००० पेक्षा जास्त यात्रेकरूंना यांच्यातर्फे मोफत भोजन दिलं गेलं. ५००० भाविकांची रात्रीच्या मुक्कामाची सोय केली गेली. तसेच, ६० पेक्षा अधिक निराधार पशूंचीही यांनी सेवा केली. जेव्हा येथे यात्रा येतात तेव्हा यांच्या आश्रमाचं हे कार्य सुरू असतं. त्यामुळे येथे येणारा कोणीही उपाशी रहात नाही. आणि रात्री उघड्यावर राहण्याची कोणावरही वेळ येत नाही. आश्रमाची गोशाळाही आहे. आता केदारनाथ मंदिर बंद झालं आणि आता हे महाराज इथे बसून तपस्या करीत आहेत. काही दिवसांनी इथले फोटो येतील तेव्हा त्यांच्या मानेपर्यंत बर्फाचं साम्राज्य दिसेल आणि मग या पांढर्‍या विश्वात त्यांचे फक्त काळे केस दिसतील. अशा तपसाधना करणार्‍या सर्वांना माझा नमस्कार, या सर्वांच्या तपश्चर्येची स्पंदने या जीवसृष्टीसाठी वरदान आहेत.

— मंजुषा जोगळेकर

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने “दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा” या ध्यानमंत्राविषयी मिळालेली थोडी  माहिती —-

 दिगंबरा हा मंत्र प.पू.वासुदेवानंद सरस्वती यांना ब्रह्मानंद येथे शके १८२५ साली स्फुरलेला  १८अक्षरी मंत्र आहे. या मंत्राच्या रूपाने त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला. या मंत्रामध्ये एकाक्षरी गणेशमंत्र ,गणेशबीज समाविष्ट आहे. काही प्रमाणात अग्नीबीजाचाही वापर केला आहे. या महामंत्राचे स्पष्टीकरण एका आरतीमध्ये प.पू.वासुदेवानंद सरस्वतींनी केले आहे.

 त्याचा अर्थ पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वरांनी पुढीलप्रमाणे सांगितला आहे –

या मंत्रात “अहं ब्रह्मास्मि” मी ब्रह्म आहे, आणि ते तूच आहेस हे सांगितले आहे. यातील पहिल्या दिगंबराचा अर्थ आहे वस्त्र नसलेला– म्हणजेच उपाधि नसलेला. हे लक्षात आले म्हणजे आपल्या आतील शुद्ध अहं अर्थात आत्मा सर्वसाक्षी, निर्विकार, अनंत अनादि असून ब्रह्मच आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने साक्षी स्वरूपाचे अनुसंधान आहे. 

पुढच्या दिगंबराचा अर्थ आहे दिशांनी वेढलेला म्हणजे आकाशासारखा सर्वव्यापी— –त्रिकालाबाधित.विश्व निर्माण करण्याची शक्ती ब्रह्माजवळ आहे   पण शक्ती त्याच्या स्मरणात नाही. ‘हे ईश्वरस्वरूप आहे तेव्हा सर्वव्यापी अशाप्रकारचे जे ब्रह्मस्वरूप आहे ते मी आहे.’ हे चिंतन दुसऱ्या दिगंबरात आहे. परमात्म्याचे सगुण साकार रूप म्हणजे श्रीपादवल्लभ, ब्रह्मरूप धारण करून आपल्या भक्तांचे रक्षण करते.

श्रीपादवल्लभ हा या मंत्रातला  तिसरा शब्द. त्यात श्रीपाद आणि वल्लभ असे दोन शब्द आहेत. “श्रीः पादेयस्य”–ज्याच्या चरणाजवळ श्री आहे. लक्ष्मीयुक्त परमात्मा आणि शक्तीयुक्त परमात्म्याचे स्मरण श्रीपाद या शब्दाने होते. सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारा असल्याने तो वल्लभ आहे. श्रीपादवल्लभ या संबोधनात हेच सुचविले आहे. 

ईश्वर स्वरूप, ब्रह्म स्वरूप, दत्त स्वरूप आणि गुरूस्वरूप ही सर्व एकच आहेत. त्याचे अनुसंधान दिगंबरा या चौथ्या अक्षराने येथे केले आहे.’ कामक्रोधांनी त्रस्त झालेल्या मला मुक्त करून आपल्याकडे न्या ‘ अशी आर्त प्रार्थना या दिगंबरात दडलेली आहे.

अशा या महामंत्राचा जप करणे ही श्रेष्ठ उपासना आहे. या मंत्रामुळे साधकाची देहशुध्दी आणि चित्तशुध्दी होते. शरीर तेजस्वी होते. साधक दिव्यानुभव ग्रहण करण्यास समर्थ होतो. म्हणून दत्त संप्रदायाचा हा मुख्य मंत्र आहे. 

संग्राहक :- श्री सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अस्तित्व… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ अस्तित्व… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

गेले सात-आठ महिने आपली अस्तित्वाची लढाई चालू आहे.

एवढ्याशा सूक्ष्म विषाणूने सगळ्या मानवजातीला अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला. पश्चिमेकडील काही देशांत गेल्या डिसेंबरपासून ‘करोना’ रोगाने आपला प्रभाव दाखवला आणि लाखो लोक या रोगाला बळी पडले. आपल्या भारतापर्यंत ही लाट येण्यास दोन-तीन महिने गेले. साधारणपणे मार्च २०२० पासून आपण कोरोनाचा सामना करीत आहोत. सुरवातीला प्रधानमंत्री यांनी आपल्याला या गोष्टीची वेगवेगळ्या प्रकारे जाणीव दिली.

सुरवातीला घंटानाद, त्यानंतर दीपप्रज्वलन तर एकदा ठराविक काळ दिवे घालवणे यासारख्या गोष्टींनी भारतात एकात्मतेची भावना निर्माण केली. त्यानंतर लॉक डाऊन चा काळ आपण

घालवला.आता या कोरोनालाच आपण सरावल्यासारखे झालो आहोत.. आणि पुन्हा कामाला लागलो आहोत अर्थात मनातील चिंतेचा जंतू काही गेलेला नाही. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझरचा उपयोग करुन आपण रोगापासून दूर राहण्याचा आणि आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत.

 हा अस्तित्वाचा प्रश्न फार प्राचीन काळापासून सजीवांना भेडसावत आहे . लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली. मत्स्य, कूर्म, वराह ….. अशा अवस्थेतून स्थित्यंतर होत मानवी सृष्टी अस्तित्वात आली आणि त्यानंतर मानवाने मेंदूच्या जोरावर साऱ्या जीवसृष्टीला वेठिला धरले. निसर्गाचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. विज्ञानाच्या जोरावर मानवाने स्वतःची प्रगती केली. त्यामुळे आपण निसर्गावर अवलंबून नाही असा काहीसा ‘भ्रम’ माणसाला झाला. हिंदू संस्कृतीत पंचमहाभूतांना म्हणजेच निसर्गाला देव मानून महत्व दिले गेले. त्यामुळे माणसाचे अस्तित्व टिकवले किंवा निसर्गानुरूप आपण आपले जीवन समृद्ध केले. निसर्गाप्रती कृतज्ञता ठेवली पण हळूहळू काळ बदलत गेला आणि विज्ञान मोठे की निसर्ग असा प्रश्न निर्माण होऊ लागला. निसर्गातील प्रत्येक प्रश्नावर माणूस उपाय शोधू लागला. जसे बाहेर खूप ऊन असले तरी आपण एसीत बसून थंड हवा घेऊ शकतो किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना जलदगती वाहन म्हणून विमानाचा वापर करू शकतो.

घरातील प्रत्येक वापराची गोष्ट करताना ते अधिक सुलभ होण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करतो. यामुळे आपले ‘अस्तित्व’ आपण सुखकर झाले असे म्हणतो. काही वर्षांपूर्वी रोगराई, वादळे, भूकंप, अतिवृष्टी यासारख्या संकटांनी माणसाला हतबल केले होते. पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण बऱ्याच रोगांवर मात केली आणि भूकंप, वादळं यासारख्या संकटा संबंधी पूर्वसूचना मिळतील अशी यंत्रसामग्री निर्माण केली की ज्यामुळे मनुष्यहानी कमी होईल  याची काळजी घेता येते. माणूस आपले’ ‘अस्तित्व” टिकवण्यासाठी सतत कार्यरत राहिला.

पण नैसर्गिक नियमानुसार जसे सजीव निर्माण होतात तसा त्यांचा नाशही  होणे गरजेचे असते. यावरून मला परिक्षीत राजाची गोष्ट आठवते. त्याला नाग कुलापासून धोका होता म्हणून सर्पकुलातील प्राण्यांना प्रवेश करण्यास त्याने जागाच ठेवली नव्हती. स्वतःभोवती त्याने जणू पिंजराच उभारला होता. पण खाण्याच्या बोरातून त्याला गिळंकृत करणा-या तक्षकांने कधी प्रवेश केला हे कळलेच नाही आणि त्याचा मृत्यू ओढवला!

 यावरून असे दिसते की, कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपले अस्तित्व नष्ट करण्याची यंत्रणा या निसर्गात आहे आणि त्याच्याशी सामना करायची जिद्द माणसात आहे.

सध्याचा कोरोना हा जगातील लोकसंख्या नियंत्रणाचा एक परमेश्वराचा उपाय असेल किंवा माणसाच्या अति लोभी आणि अहंकारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हे’ ‘ कोरोनास्त्र’ आले असेल. कोरोनाच्या या काळात माणसाला स्वतःची हतबलता जाणवली आहे .तसेच या निमित्ताने काही चांगले बदल ही झाले आहेत.गरीब-श्रीमंत लहान-मोठा ,जाती भेद यासारख्या गोष्टी कोरोनाच्या सार्वत्रिक आजारामुळे थोड्या कमी होण्यास मदत झाली आहे.

एकमेकांविषयी चांगली सहभावना ही जागृत झाली आहे.

ही माणसाच्या अस्तित्वाची निकराची लढाई आहे. या रोगावरील औषधे लस थोड्याच काळात येईल आणि आपण या संकटातूनपार पडू.

२०२० सालच्या आठवणी काढताना लक्षात येतंय की’ संपेल हे सर्व’ या आशेवर एक वर्ष संपून गेलं! व्हॅक्सीनेशन सुरू झाले, तरी अजून कोरोना गेला नाहीये. अजूनही मनावर या सगळ्याचे टेन्शन तर आहेच, पण पहिली लाट ओसरली म्हणेपर्यंत दुसऱ्या लाटेचे आगमन!या सर्वातून बाहेर केव्हा पडणार कुणालाच माहीत नाही!फरक इतकाच की आपण या सर्व गोष्टींना सरसावलो आहोत. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्सिंग हे जगण्यासाठी अविभाज्य घटक झाले आहेत.मुक्त जगायचं विसरूनच गेलो आहोत.अजून काही दिवस, काही महिने असेच जातील!मग तिसरी लाट येईल असं ऐकतोय! या सर्वातून माणसाच्या अस्तित्वाची जाणीव अधिक तीव्र झाली आहे. ज्या ज्या वेळी कोणतीही गोष्ट अति होते तेव्हा परमेश्वर म्हणा किंवा निसर्ग आपले अस्तित्व दाखवून देतो आणि आठवते…..

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अशीही शाळा ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? मनमंजुषेतून ?

☆ अशीही शाळा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

जीवनाच्या वाटचालीत अनेक नाती जुळली. काही टिकली काही कालांतराने विरली. कळत नकळत अनेकांनी शिकवण दिली .संस्कार केले जे मनावर कायम कोरले गेले…पण आज लिहावसं वाटतंय् ते माझ्या सासुबाईंबद्दल—नवर्‍याची आई म्हणून माझ्या सासुबाई—हे माझं आणि त्यांचं धार्मिक नातं. पण त्या पलीकडे आमचं एक वेगळं नातं होतं—एक सांगते,मी त्यांना आई म्हणत असले, तरी सासू  ही आईच असते वगैरे आमच्या बाबतीत नव्हतं—आणि ही आमची सून नसून मुलगीच आहे बरं का—असंही त्या कधी म्हणाल्या नाहीत—

घराचा उंबरठा ओलांडला तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, “ये आत सुनबाई. आता हे तुझंही घर—”

डोईवरुन घेतलेला नऊवारी साडीचा ऐसपैस पदर, कपाळावरचं ठसठशीत कुंकु, अंगावर चमचमणारी पारंपारिक भारदस्त सौभाग्यलेणी, गौर वर्ण, मध्यम पण ताठ अंगकाठी, आणि नजरेतला एक करारीपणा—-

सुरुवातीला नातं जुळवायला खूप कठीण गेलं—सगळंच वेगळं होतं—

मी स्वतंत्र कुटुंबात वाढलेली. मुक्त. मोकळी. स्वत:ची मतं असणारी. शिक्षित, नोकरी करणारी—

इथे वेगळं होतं—मोठ्ठं कुटुंब–चार भिंतीतली निराळी संस्कृती–नात्यांचा गोतावळा–परंपरा–आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेलं आईंचं प्रभावी व्यक्तीमत्व ! दरारा—त्यांचं सपासप आणि फटकारुन बोलणं—

पण व्यवसायाच्या  निमित्ताने आम्ही गावापासून काही अंतरावरच्या शहरात रहात होतो—त्यामुळे त्या घराचा आणि संस्कृतीचा मी दूरचा भाग होते—

पण हे असं वाटणं, भय, तुटणं, वैवाहिक जीवनाची अनिश्चितता, हे सर्व सुरुवातीला होतं—-

पण इतक्या विसंगतीतही आमचं नातं एका वेगळ्या स्तरावर घडत गेलं, जुळत गेलं, हे विशेष होतं—दोघींनाही आपले किनारे सोडणं सुरवातीला कठीण होतं— पण हळुहळु मी त्यांच्यात वसलेल्या एका स्त्रीचं स्वरुप पाहू लागले..आणि मला ते आवडायला लागलं—

एकदा म्हणाल्या, ” अग्गो आठ मुलं झाली मला…रात्रीचा दिवस करुन वाढवलं…पण यांनी कधी हातही लावला नाही…रडलं म्हणून थोपटलंही नाही…कुटुंबाच्या रगाड्यात मुलांकडे बघायलाही वेळ नसायचा—-सीताकाकु म्हणायची हो–” माई उचल ग लेकराला. घे पदराखाली. मरो ते काम…”

पुढे म्हणाल्या, ” तुझं बरं आहे–दादा किती मदत करतो तुला—पण मी म्हणते कां करु नये त्याने तुला मदत—-संसार दोघांचाही असतो ना…”

घट्ट अटकळी असलेल्या त्यांच्या मनातल्या या उदारमतवादांनीही मी चकीत व्हायची…

कळत नकळत मीही त्यांच्याकडून खूप काही शिकत होते. वैवाहिक जीवनाच्या कविकल्पना जिथे संपतात, तिथून सुरु होतो संघर्ष. एक कांटेरी सत्याची वाट. हे काटे बोथट कसे करायचे हे मी आईंकडून  शिकले.

एक प्रकारे त्या माझ्या वैवाहिक जीवनाच्या गुरुच ठरल्या—त्यांच्याकडून मी खूप धडे घेतले—

एकदा त्या मला म्हणाल्या होत्या, ” तुझं बराय. तू मनातलं स्पष्टपणे बोलून मोकळी होतेस..आमचं आपलं ,ओठातलं ओठात आणि पोटातलं पोटातच राहिलं… पण असं बघ, नाती सुद्धा टिकवावी लागतात ग….”

एकत्र कुटुंबातले अनेक पडझडीचे किस्से त्या मला सांगत…त्यावेळीही त्यांच्यातली एक जबरदस्त निर्णयक्षम, धडाडीची स्त्री मला दिसायची…कधी विद्रोही ,कधी भेलकांडलेली ,कधी हताश, परावलंबी, स्वप्नं असणारी स्त्रीपण मी त्यांच्यात पाहिली—त्यांच्या या वेगवेगळ्या रुपांमुळे मीही एक स्त्री म्हणून घडत होते—

मी कशी असावे आणि मी कशी नसावे हे त्यांच्यामुळे मला समजत होतं—मला हेही जाणवत होतं की त्यांना माझ्यातल्या अनेक गोष्टी पटत नव्हत्या ,त्या त्यांनी स्वीकारल्या असंही नव्हे. पण विरोध नाही केला— मी कधी नवर्‍याच्या बाबतीत तक्रार केली तर त्यांचे मुलाविषयी ऐकताना डोळे गळायचे…पण म्हणायच्या—” बयो स्त्री होणं सोपं नसतं….”

आईंशी गप्पा मारताना वाटायचं आई म्हणजे एक स्त्री शिक्षण देणारी शाळाच आहे….

परातीत सरसर भाकरी थापणारे त्यांचे गोरे गोंडस हात तर मला आवडायचेच. पण त्याबद्दल त्या जे बोलायच्या ते खूपच महत्वाचं होतं—

“बघ गोळा घट्ट नको ,सैल नको, एका हातानं थापत दुसर्‍या हातानं अलगद आकार द्यायचा बरं का—थापताना परातीत पीठ नीट नाही ना पसरलं तर भाकरी वसरत नाही–आणि हे बघ, हलकेच मनगट वर करुन तिला उचलून तव्यावर ठेवायचं. तापलेल्या भाकरीला पाण्यानं सारवून थंड करावी लागते, म्हणजे मग ती टिचत नाही ..सुकत नाही…..”

त्या सहज बोलायच्या .बोलता बोलता चुलीतली लाकडं मागे पुढे करुन जाळ जुळवायच्या. पण भाकरीच्या निमित्ताने जीवनातलं संतुलन, संयम, चढउतार, या सर्व स्थानकांवरचा प्रवास घडायचा–

किती लिहू—-

त्यांच्यात वेळोवेळी  दिसलेलं ‘ जुनं ते सोनं ‘ मला खूप भावलं—

नव्वद वर्षाचं परिपूर्ण आयुष्य जगून त्यांनी जगाचा निरोप घेतला..

आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा गादीवर एक क्षीण देह होता. काहीच उरलं नव्हतं..

नवर्‍याने जवळ जाऊन फक्त ‘आई ’ म्हटलं—हळूहळू त्यांनी हात उचलले, आणि त्यांच्या गालावर फिरवून एक थरथरता मुका घेतला—-

तेव्हा वाटलं, सगळं संपलं. पण त्यांच्यातील आई नव्हती संपली—-ती कधीच संपणार नव्हती—-

आज त्या नाहीत–पण त्यांचं अस्तित्व आहे—

आज त्यांच्या आठवणी मी मुलींना सांगते—-

कळत नकळत त्यांनाही “ याला जीवन ऐसे नाव “ हे कळावे…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परत येण्याची वेळ ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ परत येण्याची वेळ ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

आपण आयुष्याचे 40/50 वर्षे पुर्ण केली असल्यास, “परत फिरण्याची” तयारी सुरू करा….आपल्याकडे असलेल्या, जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्याअगोदर ! 

‘ का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे ?’ —-

जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी, आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉलस्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते—

* परत येणे ….. कधीच सोपे नसते *

एक माणूस राजाकडे गेला. म्हणाला “ मी गरीब आहे, माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे. “   

राजा दयाळू होता. त्याने विचारले:” कोणत्या मदतीची आवश्यकता आहे?”

माणूस म्हणाला:” कसायला थोडी जमीन द्या.” 

राजा म्हणाला: “ उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये. तू चालू शकशील, धावू  शकशील तो संपूर्ण प्लॉट तुझा होईल. पण  लक्षात ठेव, जिथुन धावणे सुरू करशील तिथेच सूर्यास्तापर्यॅत तुला परत यावे लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही ! “ 

माणूस खूश झाला. तो सूर्योदय होताच पळायला लागला — पळत राहिला. सूर्य माथ्यावर चढला होता—पण माणूस धावायचं थांबला नाही—अजून थोडी मेहनत– मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती ! 

संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं, त्याला परत यावं लागेल, नाहीतर त्याला काही मिळणार नाही ! त्याने पाहिले की तो खूप दूर आला आहे— आता परत यायचे होते– सूर्य पश्चिमेकडे वळला होता– तो थकला होता. परत पोहोचायचे होते–पण वेळ वेगाने निघून जात होती —अजून थोडी मेहनत–न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला –पण आता श्वास घेणं कठीण झालं होतं. तो खाली पडला— आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला ! 

राजा हे सर्व पहात होता. तो त्याच्या सहकाऱ्यांसह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला:—-

* याला फक्त सात फुट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना  इतका पळत होता ! *

—–आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत:ला ठेवून विचार करा. आपण तीच चूक करीत नाही ना ? आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा असीम आहेत ! आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही. आणि जेव्हा आम्ही ती करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो—-मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही.

मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो..आजपर्यंत मी कुठे पोचलो? मला कुठे जायचे आहे आणि मला किती दिवसात पोहोचायचे आहे? जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेन?  हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा! 

सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत. अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसे परत फिरावे  हे माहित नाही—- 

थोडं थांबा, आजूबाजूला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचा राहून गेलाय. किमान आज या एका क्षणापुरतं तरी खूश व्हा. 

काळजी घ्या—आनंदी रहा—सुरक्षित रहा. 

 

संग्राहक : – सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ स र्व ज्ञा नी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? स र्व ज्ञा नी ! ??

“पंत हा तुमचा पेपर, निघतो, जरा घाईत आहे !”

“अरे मोऱ्या थांब जरा, तुला एक विचारायचं होतं!”

“बोला ना पंत !”

“अरे गाढवा, काल माझं एक काम होतं तुझ्याकडे म्हणून तुला मोबाईल लावला, तर ‘समाधान सल्ला केंद्राला फोन केल्याबद्दल धन्यवाद ! वैयक्तिक सल्ल्यासाठी एक दाबा, कौटुंबिक सल्ल्यासाठी दोन दाबा, प्रेम प्रकारणाच्या सल्ल्यासाठी…..”

“तीन दाबा ! बरोबर ना पंत ?”

“हो, बरोबर. आता ही सल्ला केंद्राची काय नवीन भानगड सुरु केल्येस तू मोऱ्या ?”

“अहो भानगड कसली पंत, घरी बसल्या बसल्या चार पैसे मिळवायचा आणि त्यातून झालीच तर थोडी समाजसेवा करायचा उद्योग चालू केलाय एवढच !”

“म्हणजे रे मोऱ्या ?”

“अहो पंत, हल्ली सगळेच लोकं काहींना काही समस्यांचे शिकार झालेले आहेत. त्यातून काही जणांना नैराश्य येवून, त्या पैकी काही जणांची मजल आत्महत्या करण्यापर्यंत गेल्याच तुम्ही पेपरात वाचल असेलच !”

“खरं आहे तुझं मोऱ्या, हल्ली एवढ्या तेवढ्या कारणावरून आत्महत्या कारण्याच प्रमाण वाढलंय खरं !”

“बरोबर, म्हणूनच अशा डिप्रेशनमधे गेलेल्या लोकांसाठी मी ‘समाधान सल्ला केंद्र’ सुरु केलं आहे !”

“हे बरीक चांगल काम करतोयस मोऱ्या, पण तुझ्याकडे सल्ला मागणारे ना तुझ्या ओळखीचे ना पाळखीचे, ते तुझ्याकडे मोबाईल वरून त्यांना पाहिजे तो सल्ला मागणार, मग याच्यातून तुला अर्थप्राप्ती कशी होते ते नाही कळलं मला !”

“पंत, तुम्ही नेट बँकिंग बद्दल ऐकलं असेलच !”

“हो ऐकून आहे खरा, पण त्यात फसवलं जाण्याची भीती असते असं म्हणतात, म्हणून मी माझ्या अकौंटला तो ऑपशनच ठेवला नाहीये बघ !”

“ते ठीक आहे पंत ! पण माझ्याकडे सल्ला मागणाऱ्यांना मी ठराविक रक्कम माझ्या अकाउंटला जमा करायला सांगतो आणि ती तशी जमा झाल्याचा मेसेज मला माझ्या बँकेतून आल्यावरच मी त्यांना पाहिजे तो सल्ला देतो !”

“अस्स, म्हणजे पहिले दाम मग तुमचं काम, हे सूत्र तू अवलंबल आहेस तर !”

“अगदी बरोबर पंत, म्हणजे पैसे बुडण्याची भीतीच नाही !”

“ते सगळं खरं रे मोऱ्या, पण प्रत्येकाच्या निरनिराळ्या समस्यांवर तुझ्याकडे समाधानकारक उत्तर कशी काय असतात बुवा ?”

“पंत माझ्याकडे कुठे उत्तर असतात !”

“अरे गाढवा, पण तूच तर प्रत्येकाला त्याच समाधान होईल असं उत्तर देतोस नां ?”

“हो पंत, पण त्यासाठी मी आमच्या पेरेन्ट कंपनीचा सल्ला घेतो !”

“आता ही तुझ्या पेरेन्ट कंपनीची काय भानगड आहे मोऱ्या ?असं कोड्यात बोलू नकोस, नीट सविस्तर मला समजेल असं काय ते सांग बघू !”

“त्याच काय आहे ना पंत, माझ्या सासूबाई स्वतःला ‘सर्वज्ञानी’ समजतात आणि त्यांनी सुद्धा त्यांचे ‘सर्वज्ञानी सल्ला केंद्र’ नावाचे मोबाईलवरून सल्ला देण्याचे केंद्र सुरु केले आहे.”

“बर मग ?”

“अहो त्या वरूनच माझ्या बायकोच्या डोक्यात, आपण पण असं सल्ला केंद्र मोबाईलवर चालू करावं असं आलं आणि सासूबाईंच्या त्या सर्वज्ञानी सल्ला केंद्रलाच मी आमची पेरेन्ट कंपनी म्हणतो !”

“अस्स !”

“मग मी काय करतो पंत माहीत आहे, मला आलेल्या सगळ्या समस्यांवरचा सल्ला मी मोबाईलवरून, माझ्या पेरेन्ट कंपनीला, म्हणजेच माझ्या सासूबाईंच्या ‘सर्वज्ञानी सल्ला केंद्राला’ विचारतो आणि त्यांनी दिलेला तोच सल्ला पुढे…..”

“ढकलून मोकळा होतो, बरोबर ?”

“बरोब्बर पंत !”

“पण काय रे मोऱ्या, तुझ्या सासूबाई तू त्यांचा एकुलता एक जावई  असलास म्हणून तुला काय नेहमीच फुकटचा सल्ला देतात का ?”

“नाही हो पंत ! अहो मी त्यांना प्रत्येक वेळेस, वेगळेच नांव सांगून, मला एखाद्याने किंवा एखादीने विचारलेला सल्ला त्यांना विचारून त्याचे उत्तर घेतो आणि तोच माझा सल्ला म्हणून पुढे पाठवतो आणि सासूबाईंच्या अकाउंटला पैसे जमा करतो ! तेवढीच त्यांना आर्थिक मदत पण होते !”

“अरे पण तुला यातून कसे काय अर्थार्जन होते ते नाही कळलं मला !”

“पंत, सध्याचा जमाना हा कमिशनचा जमाना आहे, हे तुम्ही पण मान्य कराल ! ‘माझं काय ?’ हाच प्रश्न कुठच्याही व्यवहारात हल्ली लोकांचा असतो ! मग मी तरी त्याला कसा अपवाद असणार ?”

“तू म्हणतोयसं ते खरं आहे मोऱ्या, हल्ली जमानाच आलाय तसा, पण मग तू काय करतोस ?”

“पंत, मी जेवढे पैसे सासूबाईंना देतो, त्यावर माझे दहा टक्के कमिशन आकारून सासूबाईंनी दिलेला सल्ला पुढे ढकलतो !”

“धन्य आहे तुझी मोऱ्या !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१७-१२-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्व प्न ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ स्व प्न ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“स्वप्नात रंगले मी

चित्रात दंगले मी

सत्यातल्या जगी या

झोपेत जागले मी”

हे आशाताई आणि बाबुजींच्या आवाजातील, ‘आम्ही जातो आमच्या गावा’ या चित्रपटातील युगल गीत माझ्या पिढीच्या लोकांना नक्कीच आठवत असेल ! हल्लीच्या पिढीला ‘युगल’ या शब्दा पेक्षा ‘गुगल’ शब्द जास्त जवळचा, त्यामुळे ‘युगल’ शब्दाचा अर्थ माहित असणे दूरची गोष्ट झाली ! पण जिथे नुकत्याच पार पडलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, “स्वातंत्र्य” हा शब्द “वि. दा. सावरकर मंचाच्या” फलकावर चुकीचा लिहून मराठीचे धिंडवडे निघतात, तिथे या आजच्या तरुण पिढीला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे म्हणा ! थोडे विषयांतर झाले पण त्याला इलाज नाही ! असो ! आता गाण्याच्या वरच्या चार ओळींकडे वळतो. त्यात त्या नयिकेचे (उमा) आपल्या नायकाला (श्रीकांत मोघे) भेटण्याचं स्वप्न सत्यात उतरल्याच, ती गाण्यातून सांगत असते ! शेवटी ती नायिका असल्यामुळे तिच्या मार्गात खलनायकाने कितीही अडथळे आणले तरी, हे गाणं सिनेमातंल असल्यामुळे नयिकेच स्वप्न सत्यात उतरलं असेल, तर त्यात नवल ते काय ?

स्वप्न ! मानवाच्या मनातल्या सुप्त इच्छांची पूर्ती करायची सोय त्या विधात्याने काय मस्त करून ठेवली आहे नां ? पण स्वप्न पडायला हव असेल तर त्यासाठी आधी झोपावं लागतं असं म्हणतात ! आता तुम्ही म्हणालं, हे काय नवीन सांगितलंत तुम्ही ? झोपल्याशिवाय स्वप्न कशी बघणार, पडणार ? तुमचं म्हणणं बरोबर आहे मंडळी ! पण काही काही जणांना जागेपणी सुद्धा स्वप्न पडतात असं ऐकून आहे, प्रत्यक्ष मला तसा काही अनुभव नाही !

लहान बाळांना स्वप्न पडत असतील का ? असावीत, हे झालं माझं वैयक्तिक मत ! कारण कसं असतं नां, आपण अनेकदा बघितलं असेल, की कधी कधी बाळ गाढ झोपेत असतांना मधेच दचकून परत झोपी जात किंवा जाग होऊन रडायला तरी लागतं ! मग त्याची आई त्याला आपल्या कुशीत घेवून थोपटून, थोपटून परत झोपवते आणि आपला एक हात हळूच त्याच्या अंगावर ठेवते ! तो आईच्या हाताचा आधार बाळाला सुखावतो ! मग त्याची बहुतेक खात्री पटत असावी की आता आपली आई आपल्या जवळ आहे आणि मग ते बाळ निर्धास्तपणे परत निद्रा देवीच्या अधीन होतं !

पूर्वी घरी कोणी पाहुणे आले की, घरातल्या लहान मुला, मुलींना त्यांचा एक प्रश्न हमखास असायचाच ! “काय रे, कोण होणार तू मोठेपणी ?” त्यावर, मुलगा असेल तर आपलं गळणार नाक शर्टाच्या बाहीला किंवा मुलगी असेल तर फ्रॉकला पुसत पुसत आपल्या बोबड्या बोलात तो किंवा ती “डॉक्टल” अस उत्तर देई ! पूर्वीचे आई बाबा, मुलगा किंवा मुलगी शाळेतून कॉलेजमधे जायला लागल्यावर, आपलं डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचं अर्धवट राहिलेल स्वप्न आपल्या मुलाने किंवा मुलीने पूर्ण करावं यासाठी त्यांच्या मागे लागायचे ! सांप्रतकाळी तर आठवी नववी पासूनच, पप्पा मम्मी आपल्या मुलांचा कल लक्षात न घेता, त्यांच्या स्वतःच्या स्वप्ना नुसार तो किंवा तिने मोठेपणी कोण व्हावे हे ठरवून मोकळे होतात आणि त्या प्रमाणे त्यांच ब्रेन वॉशिंग चालू करतात !

आपला मेंदू तरतरीत ठेवण्यासाठी आपल्याला स्वप्ने पडतात अस एक शास्त्रीय सिद्धांत सांगतो ! त्यामुळे मेंदूची दीर्घकालीन स्मृती जतन करण्याची ताकद वाढते आणि तो जास्त कार्यक्षम होतो ! पण अजून तरी आधुनिक सायन्सला स्वप्न का पडतात याचा शोध लावता आला नाहीये, हे ही तितकंच खरं ! त्यामुळे आपल्या भारतीयांची “मनी वसे ते स्वप्नी दिसे” ही पूर्वापार चालत आलेली थियरी मनाला सध्या तरी जास्त जवळची आणि खरी वाटून जाते !

सध्या सामान्य माणूस कुठल्या ना कुठल्या समस्येने ग्रासलेला आहे. अशावेळी आजच्या अग्रेसिव्ह मार्केटिंगच्या जमान्यात, काही बोगस अल्पायुषी कंपन्या, लोकांना कधीही प्रत्यक्षात न येणारी अनेक स्वप्न हसत खेळत विकून, स्वतःच उखळ पांढरं करून लोकांचे खिसे रिकामे करतांना आपण बघितलं असेल किंवा काही लोकांनी ते अनुभवलं पण असेल !

कोणाला कसली स्वप्न पडावीत हा ज्याचा त्याचा प्रश्न ! हल्ली, गल्ली गल्लीतल्या भाई लोकांना पण, उपरती होऊन आपापल्या कारकिर्दीच्या मध्यातच, सर्व काळे धंदे सोडून राजकारणाच्या पांढऱ्या धंद्यात पडण्याची स्वप्न पडतात ! त्यातील काही जणांची स्वप्न साकार होऊन, त्यांना मंत्रिपद मिळाल्याचे आपण पहात आहोतच !

त्याच प्रमाणे हल्लीचे भोंदू बुवा, महाराज आणि माताजी सुद्धा आपल्या भोळ्या भक्तांना “बालका, कालच आमच्या स्वप्नात प्रत्यक्ष भगवंतांनी येवून, तुझ्या समस्येवर अमुक तमुक उपाय सांगितला आहे” अशी थाप मारून स्वतःच्या स्वप्नांचा बाजार मांडताना आपण, आज पण दुर्दैवाने पहात आहोत !

जगात रोज कुठे ना कुठे, कसले ना कसले तरी पुरस्कार वितरण सोहळे होत असतात ! त्यातील ९० टक्के पुरस्कार विजेते, “हा पुरस्कार मिळवण हे माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं” अशी कडकडीत थाप मारतात, असं माझं स्वप्नातलं मत नसून सत्यातलं मत आहे ! कारण तिच्या किंवा त्याच्या लहानपणी हा पुरस्कार मुळात अस्तित्वात तरी होता का, याचा विचार हे लोकं हा डायलॉग मारायच्या आधी करतच नाहीत ! उगाचच “माझं लहानपणीच स्वप्न साकार झालं वगैरे वगैरे” हे नेहमीच टाळ्या मिळवणार वाक्य बोलून मोकळे होतात झालं !

सुरवातीलाच म्हटल्या प्रमाणे मानवाच्या सुप्त इच्छांची पूर्ती करायची सोय त्या विधात्याने स्वप्न रूपाने केली असली तरी, ती पुरी करतांना, शेवटी तोच करता करविता असल्यामुळे त्याने एक चांगली खबरदारी सुद्धा या स्वप्नांच्या बाबतीत घेतल्याचे आपण, माझ्यासारखा नीट विचार केलात तर आपल्याला पण जाणवेल ! आता तुम्ही म्हणालं कोणती खबरदारी ? सांगतो मंडळी ! आपल्या स्वप्नात (जागेपणी अथवा झोपल्यावर) जर एखादी व्यक्ती आली, तरी त्या व्यक्तीच्या स्वप्नात आपण नसतोच नसतो याची आपण मनाशी पक्की खात्री बाळगून असा ! आणि विधात्याच्या या अशा खबरदारीमुळेच सगळी मानव जात सुखेनैव झोपून आपापल्या स्वप्नात दंग आहे, हे विसरून कसं चालेल ? आणि तसं जर का नसतं तर जगात काय हलकल्लोळ झाला असता, हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल ! एक साधं उदाहरण द्यायच झालं तर विधात्याच्या या खबरदारीमुळे सध्याच्या कित्येक हिरोईन्स आणि हिरो सुखेनैव झोप घेतायात ! नाहीतर त्या सगळ्या स्वप्न सुंदरीच्या आणि आदर्श हिरोंच्या झोपेचं पार खोबरं होऊन, त्यांच्या स्वप्नांच काय झालं असत याचा विचार मला जागेपणी तर सोडाच, पण माझ्या एखाद्या स्वप्नात सुद्धा करता येणार नाही !

मनुष्य प्राण्याला जशी कधी ना कधी स्वप्न पडतात, तशी पशु पक्षांना देखील पडत असतील का, हा संशोधनाचा विषय ठरावा ! हल्लीच्या प्रगत विज्ञानाने तसा शोध लावला असेल, पण त्या बद्दल मी माझ्या जागेपणी काही वाचल्याचे अथवा स्वप्नात काही पहिल्याचे आता तरी आठवत नाही !

शेवटी, आपल्या सगळ्यांनाच जागेपणी अथवा झोपेत पडलेली सगळीच चांगली स्वप्ने पूर्णत्वास नेण्यास मदत कर, अशी त्या ईश्वरा चरणी प्रार्थना करतो !

ता. क. – मंडळी सध्या मी भायखळा येथील राणीच्या बागेत, कुठल्याही पिंजऱ्यात न राहता, रोज ज्यांच्यावर लाखो रुपये खर्च होतात त्या “पेंग्विन” पक्षांना, त्यांच्या मातृभूमीची स्वप्ने पडतात का, यावर मोफत संशोधन करत आहे !

© श्री प्रमोद वामन वर्तक

१२-१२-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares