श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ गेट टुगेदर — भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(या सर्व परिस्थितीत माझ्या मुलाचं शिक्षण सुरु होतं. यात भरीस भर म्हणून माझ्या नवऱ्यानी कंपनी बंद पडली. नवरा घरी, पण त्याला पहिल्यापासून घरचे काही करायची सवय नव्हती. आता सांगितले तर चिडचिड होत होती.) – इथून पुढे —
त्या काळात मी पहाटे चार वाजता उठत होते, आई चिरून कातून द्यायची.. मग मुलाचा डबा.. मग घरचे जेवणं.. पाणी दूध तापवणे.. सकाळची न्याहारी करणे.. चहा.
सारे करून आणि डबा घेऊन मी आठला बाहेर पडायचे.. मग गाडीची गर्दी.. दादरला जिने चढून पश्चिमरेल्वे ला धावत जायचे, तिथे परत रेल्वे.. पुन्हा बस पकडून कंपनी.. तिथली रोजची टेन्शन.
सायंकाळी पुन्हा उलट प्रवास.. मुंबईची मोठी गर्दी.
त्यात नवऱ्याची कंपनी बंद.. म्हणजे नोकरीं सोडू शकत नाही. सायंकाळी मुलाचा अभ्यास. आई बाबांना औषधे देणे. रात्रीचे जेवणं.. शाकाहारी मावसाहारी..
रात्री पाठ टेकायला बारा वाजत, परत पहाटे चार चा गजर.
मग पुढील काही वर्षात कोण ना कोण आजारी, जास्त आजारी..
सिरिअस.. हॉस्पिटल.. नर्सिंग सुरु झाले.
मग सासरे गेले. मग वडील गेले. आई गेली, सासूबाई गेल्या.
दरम्यान नवऱ्याला दुसऱ्या कंपनीत नोकरीं मिळाली. मुलगा बारावीनंतर मरीन इंजिनीरिंगला गेला.
आता मला थोडी शांतता मिळेल असे वाटतं असताना, अचानक या आजाराने गाठले. मग तपासण्या, सोनोग्राफी, एमआरआय, केमो.. न संपणारी साखळी. एकदा बरा होतोय आजार म्हणता म्हणता पुन्हा त्याने गाठलेच.
मी नोकरीं सोडली, रजा तरी किती घेणार? नवऱ्याची नोकरीं आहे.. मुलगा नोकरीला लागला. आता पैशाची ओढाताण्ड नाही पण माझे स्वास्थ्य?
आता दिवस दिवस मी घरात एकटी, बाई येऊन फरशी पुसून, भांडी घासून जायची.. मग मात्र मी एकटी. मग सगळ्या आठवणी पिंगा घालायच्या. आयुष्यात सुख मिळालेच नाही.. फक्त धावपळ.. मुंबई नावाच्या मगरिच्या तोंडात सापडले.. स्वतः च्या मुलाकडे लक्ष देता आले नाही.
आयुष्यात ऍडजस्ट करण्याचा स्वभाव, कुणाला न दुखावण्याचा स्वभाव.. त्याचा इतरांनी फायदा घेतला.. दोन्ही दिरानी, जाऊंनी आपल्या आईवडिलांना माझ्याच संसारात ठेवलं आपण मस्त वेगळा संसार, ट्रिप्स, नाटक सिनेमे केले. माझी बहीण पण नशीबवान, तिने लग्न केले आणि आईवडिलांना ती विसरली, आपल्या हौसमजा करत राहिली. दुर्दैवी मीच..
आता थोडी उसंत घयावी तर हा जीवघेणा घाणेरडा आजार.. आयुष्याच्या अंताकडे नेणारा..
यात आनंद मिळाला तो शालेय जीवनात.. त्या शाळेची.. त्या बाल मित्रांची हल्ली वारंवार आठवण होते.. अर्जुन, यशवंत, यमुना, चित्रा, मनोज. कुठे असतील हे सर्व? ती वर्षे खुप आनंदाची होती, किती मजा केली या सर्वाबरोबर.. शाळेत जाताना..
पुराच्या पाण्यात एकमेकांचे हात पकडून पलीकडे जाताना.. बोडू, करवंदे, जांभळे खाताना.. एकमेकांचे डबे उघडून खाताना.. ते प्रेम, तो जिव्हाळा परत मिळालाच नाही. या सर्वाना आयुष्याच्या या टप्प्यावर भेटावेसे वाटते.. आपले आयुष्य फार थोडे राहिले आहे.. या सर्वाना एकदा भेटावेसे वाटते.. एकदाच.. एकदाच.
असे विचार मनात येत असताना अर्जुन काल तुझा लेख पेपर मध्ये पाहिला, त्याखाली तुझा फोन होता, त्या फोन वर तुला फोन केला आणि आज तू आलास.
शालिनी उठून आत गेली आणि तिचा भूतकाळ ऐकून मला वाईट वाटले. चांगल्या स्वभावाचा लोक फायदा घेतात तो असा. सर्वांनीच तिचा फायदा घेतला. शालूने आत जाऊन चहा आणला. एक कप माझ्या हातात दिला, एक कप आपण घेतला.
मी -मग तुझी बहीण अरुणा, ती कधी चौकशी करत नाही?
शालू -मघापासून मी माझ्या घरच्या गोष्टी सांगत बसले अजून माहेरच्या गोष्टी तुला ऐकायच्या आहेत.
मी -माहेरच्या गोष्टी? तूझ्या माहेरी म्हणजे तुझी बहीण अरुणा..
शालू -होय, अरुणाने दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न जमवले म्हणून बाबांनी तिच्याशी संबंध तोडले हे मी तुला सांगितलं पण अरुणाला माझ्या सर्व गोष्टी कळत होत्या. बाबा गेले, मग आई गेली हे तिला कळले. गेली दोन वर्षे ती आईचे दागिने मागते आहे.
मी -काय? आईचे दागिने?
शालू -माझ्या या व्हाट्सअप वरील तिचे मेसेज वाच म्हणजे तुला खरे वाटेल.
शालूने अरुणा या नावाचा व्हाट्सअप उघडून माझ्या हातात मोबाईल दिला. मी नजर टाकली, अरुणाने खालच्या भाषेत दागिन्याची मागणी केली होती. मी वाचून तिच्या हातात मोबाईल दिला.
मी -मग? तू काय ठरवलेस?
शालू -अर्जुन, मला दागिन्याचा मोह नाही.. खरं तर आईने हे दागिने आमच्या गावच्या काकांच्या मुलाच्या लग्नात त्याच्या बायकोच्या अंगावर घालायला सांगितले होते. म्हणून मी जपून ठेवलेत.. पण आता मी ठरवलय, अरुणाला हे दागिने देऊन टाकायचे.. पण मी तिला बोलावून तिची आईवडिलांची जबाबदारी तिने पार पडलेली नाही, हे सुनावणार आहे आणि मगच हे तिला देईन.
अर्जुन, मी निराश झाले आहे. सर्व जवळच्या माणसानी मला निराश केले आहे. यावेळी मला आपल्या शाळेतील मित्र मैत्रिणीची आठवण येते आहे. माझे आयुष्य कमी आहे, कदाचित सहा महिने किंवा जास्तीत जास्त वर्ष.. अर्जुन, मला आपल्या वर्गातील मित्रांना भेटायचं आहे..
या करिता तुला शोधत होते.
सुदैवाने तुझा नंबर मिळाला, तू इतरांना शोधून काढ आणि आपण एकदा भेटू.. कदाचित ही शेवटची.
मी -हा, शालू पुढे बोलू नको.
आपण शक्य होतील तेव्हढे भेटू.. लवकरच. मी येतो, तुला कळवितो.
मी बाहेर पडलो.
मी शालूच्या घरातून बाहेर पडलो, आता मला वर्गातील इतर सावंगड्यांचा शोध घ्यायचा होता. मनोजचा फोन माझ्याकडे होता, मी त्याला फोन लावला आणि त्याचेकडे अजून कुणाचे नंबर आहेत का आणि जास्तीत जास्त मंडळींना जमवायचा प्रयत्न कर असे सांगितले.
यमुना आणि चित्रा गावात रहात होत्या, मी माझ्या पुतण्याला सांगून त्त्यांचे नंबर मिळविले, त्यानी आणखी चार नंबर दिले. म्हणता म्हणता आठ दिवसात वर्गातील पंधरा वर्गमित्राचे नंबर मिळाले आणि मी व्हाट्सअप ग्रुप तयार केला.
शालू पण व्हाट्सअपवर होतीच, पंधरा सोळा शाळा सोबती खुप दिवसांनी भेटत होते, मग काय चेष्ठा, मस्करी यांनी उत आणला. शालू यात हिरीरीने भाग घेत होती, हे मी पहात होतोच. शाळेत असताना तिच्या मैत्रिणी तिला “, डोंगळो ‘म्हणायच्या, डोंगळो म्हणजे मोठी काळी मुंगी, ती साखर दिसली की धावते, शालूला साखर आवडायची, तिच्या डब्यात रोज साखर असायची आणि ती आवडीने खायची.
यमुनेने तिला “काय डोंगळ्या? कसा आसास? असे विचारले आणि सर्व जणं तिला “डोंगळो ‘म्हणू लागल्या. शालूला ते आवडायचे.
मी जास्तीत जास्त वर्गमित्र मैत्रिणी एकत्र करण्याच्या प्रयत्नात होतो.
आता मला गेटटगेदर जमवायचे होते, दिवस थोडे होते, डॉक्टरनी शालूला जास्तीत जास्त एक वर्षाचे आयुष्य दिले होते.
आपल्या शाळेत पुन्हा मुलांनी जमावे असे मला वाटतं होते, मी शालूला तुला प्रवास जमेल का असे विचारले. तिची इच्छा होती, एकदा शाळा, आपला वर्ग डोळेभरून पहाण्याची.
मी आम्हांला शिकविलेल्या शिक्षकांचा शोध घेतला, त्यातील वझे बाई, सामंत बाई, प्रभू सर, वालावलकरबाई येऊ शकत होत्या.
मग 26 जानेवारी हा दिवस ठरविला. शाळेतील सर्व व्यवस्था यमुना, चित्रा, मनोज सांभाळणार होते.
मी 24 जानेवारीला चांगली इनोव्हा गाडीत शालू, तिचे यजमान, मी, माझी पत्नी निघालो. चार तासाने थांबत थांबत रात्री माझ्या गावच्या घरी पोहोचलो. घरी सर्व तयारी होतीच. जवळ जवळ चाळीस वर्षांनी शालू या गावात आणि माझ्या घरी येत होती. या परिसरात तिचे लहानपण गेले होते, ती खूश झाली.
तिला रात्री छान झोप लागली.
दुसऱ्या दिवशी शाळेत तीस वर्गमित्र मैत्रणी जमले होते. कितीतरी वर्षांनी एकमेकाला भेटत होती. सर्वांनी शालूची म्हणजे “, डोंगळो ‘ची खुप काळजी घेतली. माझे लक्ष शालूकडे होते, पण ती मजेत होती..
हसत होती.. खिदलत होती..
मस्करी करत होती.
मग एक एक शिक्षक वर्गात आले. वालावलकरबाईंनी कविता शिकवायला सुरवात केली.
“खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एव्हड्या ‘.
बाईच्या डोळ्यात पाणी होते, चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या, आम्ही सर्व सदगदित झालो. माझे शालूकडे लक्ष होते, ती पण डोळे पुसत होती.
मग वझे बाई आल्या. संस्कृत शिकवायला लागल्या
“हसतास्य भूषण दानम, सत्य कंठस्य भूषणम ‘….
सर्वाना आठवणी.. डोळे पाणावलेले.
कंठ दाटलेले..
दुपारी सर्वाना जेवणं, मग करमणूकीचे कार्यक्रम.. यमुनाने आणि चित्राने “मुंगळा.. मुंगळा ‘या गाण्याच्या चालीवर “डोंगळा.. डोंगळा म्हणत जोरात नाच केला आणि शालूला हस हस हसवले.
सायंकाळी निघताना मी जाहीर केले, आता पुढील भेट पुढील जानेवारीत, शालूच्या मुंबईतील घरी. तेंव्हा या भागातील मंडळींनी मुंबईत यायचे.
शालू कावरीबावरी होऊन माझ्याकडे पहात होती आणि हाताने “नाही.. नाही म्हणत होती, माझ्या लक्षात आले, पुढील जानेवारीत मी नसेन, असे तिला सांगायचे होते, पण मी हातानेच तिला गप्प केले.
दुसऱ्या दिवशी आम्ही शालूच्या चुलत भावाला भेटलो, आईच्या दागिन्यातील अर्धे दागिने तिने भावाला दिले, मग कणकवलीजवळ अरुणाला भेटलो आणि आईचे निम्मे दागिने तिला दिले.
पुढील वर्षी शालूच्या मुंबईतील घरी पुन्हा आम्ही भेटलो. पुढील वर्षी माझ्या घरी.
जास्तीत जास्त एक वर्षाचे आयुष्य असलेल्या शालूने दोन्ही कार्यक्रमाची मजा घेतली.
आम्ही पहिल्यांदा भेटलो त्याला चार वर्षे झाली, वर्गमित्र भेटल्याने शालूची जीवनाची आसक्ती वाढली, मध्ये छोटे ऑपरेशन झाले, ते तिने सहन केले आणि आता ती वाट पहात आहे, पुढील वर्षाच्या गेटटूगेदरची.
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈










