मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आत्मनिर्भर — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(“माणिक, हा बंगला तुझ्या नावावर आहे. तू माझ्यानंतर इथेच रहा. कुठे सह्या करू नको आणि मंगेशला अजिबात देऊ नको घर. आपण मृत्युपत्र करु आणि मग आपल्या पश्चात देऊ त्यालाच. ”त्यांनी माणिकला सांगून ठेवलं. आज त्यांची आठवण येऊन माणिकला अगदी असहाय वाटलं. कशी का होईना, त्यांची सोबत होती तिला.) 

इथून पुढे – – – 

काळ कोणासाठी थांबतो का?

सहा महिने झाले वामनरावना जाऊन. माणिकच्या मैत्रिणी येत तिला फिरायला नेत. तिचे मन रमवत. मोठा आधार होता तिला या सगळ्या सख्यांचा.

असे आठ महिने झाले आणि एक दिवस मंगेश म्हणाला, ”आई, मी आणि देविका वेगळा फ्लॅट घेऊन रहाणार आहोत. सध्या भाड्यानेच घेतलाय. जवळच बघितला आहे म्हणजे सोयीचे होईल आपल्याला. ” 

माणिकला हा मोठा शॉकच होता. मटकन सोफ्यावर बसत तिने विचारलं “अरे पण का? मंगेश, अरे एकदम असं काय घडलं की तुम्हाला माझ्यापासून वेगळं व्हावंसं वाटलं? काय कमी केलं मी आणि कुठे चुकलं माझं? अरे, बाबा जाऊन अजून वर्ष पण नाही झालं आणि खुशाल एवढ्या मोठ्या बंगल्यात मला एकटीला सोडून तुम्ही भाड्याच्या फ्लॅटमध्ये जाताय? हे किती चूक आहे रे. ”, माणिक कळवळून म्हणाली.

मंगेश मख्खपणे उभा होता. न बोलता तो आपल्या खोलीत निघूनच गेला. देविकाशी बोलायची तर सोयच नव्हती.

पुढच्या आठवड्यात एक ट्रक आला. आपले बेडस् काही सामान, गोदरेजचे कपाट असं घेऊन मंगेश निघून गेला.

माणिकला किंचाळून विचारावसं वाटलं अरे मीच खर्च करून घेतलेले हे डबल बेड या गाद्या, हे कपाट हे सगळं सामान कसं नेतो आहेस उचलून?

पण माणिक काहीच बोलली नाही. नमस्कारसुद्धा न करता दोघेही ट्रक मध्ये बसून निघून गेले. आता घरात उरली फक्त माणिक.

त्या रिकाम्या घरात ती भुतासारखी सगळ्या खोल्यातून वणावणा हिंडली. रडत रडत स्वतःलाच विचारत राहिली, माझं काय चुकलं?

तिने न राहवून तिच्या जिवलग मैत्रिणीला फोन केला. नीला तिची जवळची मैत्रीण. नीला दहा मिनिटातच माणिकच्या घरी आली. तिला मिठी मारून रडत माणिक म्हणाली, आता मी एकटी कशी राहू इथे? का गेला असेल ग माझा मुलगा मला सोडून? ”

नीलाने तिला शांत होऊ दिलं.

“हे बघ माणिक, हे सत्य आहे आणि तुला ते स्वीकारायला हवंच. वाटेल काही दिवस वाईट. पण होईल तुला सवय. आम्ही आहोत ना?

रोज कोण येणार तुझ्या घरी तुला सोबत म्हणून झोपायला?

आजपासूनच सवय कर. घट्ट कर मन आता. आपलं स्वतःचं घर आहे, त्यात कसली ग भीति? आणि वामनराव कायमआहेत तुझ्यासोबत इथं. ”

नीलाने तिला घरून आणलेला डबा खायला लावला.

म्हणाली “अजिबात कोणाकडे रात्री झोपायला जायचं नाही. आपली नीरा कितीतरी वर्ष एकटी रहातेय. तिला तर मूलबाळ पण नाहीये..

किती आनंदात रहाते ना ती? होईल तुलाही सवय. ”नीला निघून गेली.

माणिकने रात्र तळमळून काढली.

दुसरा दिवस उजाडला. माणिकने चहा करून घेतला.

आज मंगेश देविका नव्हते की नव्हते त्यांचे ब्रेकफास्ट आणि डबे.

कामवाली कलाबाई आली नऊ वाजता. तिला सगळं सांगताना माणिकला पुन्हा रडू कोसळलं. कलाबाई म्हणाली “रडू नका वहिनी.

असलीच पोरं तुमची हल्लीची. गेली तर जाऊद्यात की. आम्ही आहोत की तुम्हाला. उलट त्रास वाचला म्हणा. डबे नकोत करायला त्यांचे आणि स्वयंपाक पण नको रोज करायला त्यांच्या आवडीचा.

होतं ते चांगल्यासाठी. चला.

डोळे पुसा. मी पोहे करते आपल्या साठी. कलाने पोहे केले माणिकला खायला लावले.

त्या दिवशी माणिकला रिकामपण जाणवलं. पण काहीच काम उरलं नव्हतं. तिने घर आवरलं. सगळं पसारा आवरून टाकला.

मैत्रिणीचे फोन आले. गप्पा मारताना माणिक मोकळी होत गेली. आता आपण कायम एकट्या असणार हे हळूहळू मान्य करायचं ठरवलं तिनं.

चार दिवसांनी स्नेहाचा फोनआला.

”माणिक, मला पंचवीसइडलीचटणी करून देशील का प्लीज?

मला उसण भरलीय ग आणि नेमके पाहुणे यायचे आहेत ब्रेकफास्टला.

माझा ड्रायव्हर येऊन घेऊन जाईल. हं. ”

माणिकने स्नेहाला इडलीचटणी पाठवली. ड्रायव्हर बरोबरच स्नेहाने भरपूर पैसे पाठवले होते. आणि चिठ्ठी…हे घ्यायचे मुकाट्याने. नाही म्हणू नकोस. थँक्स माणिक.

माणिकला फार मस्त वाटलं.

कलाबाई म्हणाली” लै भारी की हो ताई. आता घ्यायला लागा अशा ऑर्डरी. मी आहे की. सगळी मदत करीन तुम्हाला. आणि हसत म्हणाली “मग वेगळे पैसे द्या बरं का या कामाचे. ”माणिक हसून, हो ग कला. नक्की देणार तर. म्हणाली. तो दिवस किती छान गेला आपला असं वाटलं माणिकला.

मग बहुतेक स्नेहाने हे ग्रुपमध्ये सांगितलं असणार. तिच्या मैत्रिणीची पावभाजीची ऑर्डर आली. माणिक सुगरण तर होतीच. आणि सढळ हाताने भरपूर द्यायची सवय होती तिला. मैत्रिणीला पावभाजी खूप आवडली.

घरबसल्या माणिकला आता अशा छोट्या ऑर्डर यायला लागल्या.

माणिक अगदी रमून गेली या आवडीच्या कामात.

आणि पैसे खुळखुळू लागले हातात. ऑर्डर आली की कलाबाई मदतीला थांबायची. जास्त ऑर्डर असेल तर कलाची मुलगी यायची मदतीला. त्यांनाही पैसे मिळायला लागले.

आईचा खूप दिवसात फोन आला नाही म्हणून मंगेश जवळजवळ सहा महिन्यांनी घरी आला.

बघतो तर आई खुशीत पेपर वाचत आणि चहा पीत बसलेली.

य म्हणतोस मंगेश? ठीकचाललंय ना सगळं? घे रे चहा. माणिकने विचारलं. तिने मंगेशला विचारलेही नाही की सहा महिन्यांनी आईची आठवण झाली का?

मंगेश म्हणाला”, आई. रहायला येतेस का माझ्याकडे? देविकाला दिवस गेलेत. तिची आई जमणार नाही यायला म्हणाली. तू ये ना. ” देविकाला खूप त्रास होतोय.

माणिकने शांतपणे त्याच्याकडे बघितलं”. छे रे. मलाही अजिबात जमणार नाही यायला. बघितलंस ना, माझा केटरिंगचा व्याप आता खूप वाढलाय. मला उठून तुझ्याकडे यायला जमणार नाही.

फार तर मी डबा देऊ शकेन तुला. न्यावा मात्र लागेल तुला इथून”

चिडून मंगेश म्हणाला, कशाला ग असले भिकार स्वयंपाकीण बाईचे धंदे करतेस? शी. ऐकलं आहे मी लोकांकडून. तुझी आई केटरिंग करते असं.

बंद करून टाक हे सगळं. शोभत नाही माझ्या प्रतिष्ठेला. ”

माणिक आता मात्र संतापली. ”. हो का? कोणती तुझी प्रतिष्ठा? हे तू बोलत नाहीयेस मंगेश. देविका बोलतेय तुझ्या तोंडून. मूर्ख मुलगा. खुशाल एका दिवसात निघून गेलास मला सोडून, तेव्हा नाही लोक काय म्हणतील असं वाटलं रे तुला? तेव्हा लोकांनी कौतुकच केलं असेल ना तुझं.? एकट्या आईला सोडून निघून गेलात म्हणून… हे बघ. हे माझं आयुष्य आहे आणि ते कसं जगायचं ते मी ठरवणार.

तुमच्या गरजेला उभं रहायला नक्की आवडलं असतं मला. मला आनंदच आहे तुला मूल होणार म्हणून. पूर्वीची मी भाबडी माणिक असते तर धावत आलेहीअसते. पण आता मी बदलले. तू मला बदलायला भाग पाडलंस मंगेश… ज्या पद्धतीने तू वागलास ते मला नाही, कोणालाच आवडण्यासारखं नाही मंगेश.

देविकाचं सोड. , ती परकीच मुलगी आहे पण तू तर माझा पोटचा मुलगा आहेस ना? जराही वाईट वाटलं नाही का आईला एका दिवसात सोडूनजाताना? देविकाच्या माहेरी जाताना मिठाया घेऊन जाता आणि दिवाळीला आईच्या घरी यावंसं सुद्धा वाटलं नाही? असा काय गुन्हा केला मी?

… उलट आता मला मोकळीकच मिळाली असं वाटतं हल्ली. तुला काय आवडेल देविकाला काय वाटेल हा धाकच राहिला नाही आता. तुमचे डबे करा, भाज्या आणा, तुम्ही केलेले पसारे निमूट आवरा, हे कमी झालं एकदम. आता मी मस्त एकटी रहाते. माझ्या प्रिय मैत्रिणींबरोबर ट्रिप्स करते, फार्म हाऊसवर जाते. आता आम्ही परदेशी ट्रीपला जाणार आहोत. पटाया बँकॉकला. जे तुम्ही असताना मला जमलं नसतं कधी… ते जाऊदे.

… काय रे, इतक्या महिन्यात एकदा तरी बोलावलंत का मला? नवीन घर बघायला तरी? निदान जेवायला तरी? हे बघ… मला गोष्टी समजत नाहीत असं वाटलं का? तिच्या माहेरची माणसं खुशाल राहिलेली चालतात का? मग आता का येत नाहीये तिची आई लेकीच्या मदतीला?

… सॉरी मंगेश. मी येणार नाही. मला माहीत आहे, माझा तू एकुलता एक मुलगा आहेस. माझे हातपाय थकल्यावर तूच येशील मदतीला….. पण मला आता तोही भरवसा उरला नाही तुमचा.

बघू पुढचे पुढे. मी इतका विचारच करत नाही हल्ली. आहेत खूप वृद्धाश्रम. जाईन तिकडे. ”

… माणिकच्या डोळ्यात अश्रू आले.

… मंगेश मान खाली घालून निघून गेला.

 शांतपणे माणिकने डोळे पुसले आणि आलेली ऑर्डर पुरी करायला ती किचन मध्ये निघून गेली.

समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

परवा मंगेशचं लग्न झालं. सोन्याच्या पावलांनी देविका घरी आली आणि माणिकला धन्य धन्य झालं.

एकुलता एक मुलगा. चांगला शिकलेला आणि खूप मोठ्या पगाराची नोकरी. पण म्हणतात तसे इतके वर्षं योगच नव्हते लग्नाचे.

किती विवाह मंडळात नावे घातली ओळखीच्या लोकांना सांगून ठेवलं पण लग्न काही जमेना.

माणिकचे यजमान साध्याच नोकरीत आणि यथातथाच नोकरी.

बिचाऱ्या माणिकनं नोकरी करून संसार पुढे रेटला.

असाही तिला काही फार पगार नव्हता पण तरी हातभार लागायचा तेवढाच.

माणिक जितकी उत्साही, आयुष्यात रस घेणारी, समरसून जगणारी तितकेच वामनराव आळशी, सुस्त आणि निरुत्साही.

रोज ऑफिस कसेबसे करून घरी आले की येऊन पेपर वाचत बसायचे.

कोणी मित्र नाहीत की कसला छंद नाही. छंद एकच. सतत चांगलंचुंगलं खायचं. बाहेरच्या आराम खुर्चीवर बसून माणिक स्वयंपाकघरात काय करते त्यावर लक्ष ठेवायचं. आणि खेकसायचं तिच्यावर.

बिचारी माणिक सहन करायची सगळं. तिला धड माहेरचा आधार नाही, आईवडील भाऊ बहीण कोणी नाही. ही अनाथ मुलगी काकांच्या घरी वाढली. काकाने हा बंगला आणि हा नोकरीचा मुलगा बघून करून दिलं माणिकचं लग्न.

कुलकर्णींनी ही दिसायला चांगली मुलगी लग्नाचा सगळा खर्च आपणच करून घरात आणली,

म्हणून माणिक आधीच दबलेली होती. त्यात अतिशय माणूसघाणे आणि विक्षिप्त वामनराव पदरी पडले.

तरी हसतमुख माणिकने लगेचच कॉलनीतल्या मैत्रिणी जोडल्या.

हसून खेळून त्यांच्याबरोबर आयुष्य आनंदात घालवू लागली माणिक.

 

यथावकाश माणिकला दिवस गेले आणि छानसा मुलगा झाला.

माणिकने कामावरून रजा घेतली.

माणिकच्या सासूबाई चांगल्या होत्या. आपला कर्तृत्वशून्य मुलगा त्यांना चांगलाच माहीत होता. त्या म्हणाल्या”मी संभाळीन ग लेकाला तुझ्या. जा ग तू रजा संपली की नोकरीला. हा वामन्या काही तुला साथ देणार नाही बघ. तू नोकरी सोडू नको माणिक. आणखी चांगली नोकरी शोधत रहा.”

माणिकने लहानमोठे कोर्सेस केले आणि एका ऑफिसमध्ये तिला खरंच चांगली नोकरी मिळून गेली.

शहाणी माणिक एकाच मुलावर थांबली. तिच्या सासूबाईंना तिचं फार कौतुक होतं. पगार वाढल्यावर माणिक सासूबाईंना हौसेने पॉकेटमनी देई आणिम्हणे, सासूबाई घ्या हो हे पैसे. करा थोडी मजा. ”

माणिकचा मुलगा शाळेत चांगली प्रगति करत होता.

आपली आई आणि आजी त्याचे सर्वस्व होते. बाबांपासून तो लांबच असे. वामनरावांशी त्याचे सूर फारसे जुळले नाहीत. त्यांनाही मंगेशचं कौतुक नव्हतं. समजच कमी होती त्यांना जरा.

मंगेश शाळा कॉलेजमध्ये चांगले यश मिळवत पुढे गेला. त्याची सगळी फी माणिकने भरली.

ठराविक रक्कम हातात ठेवली की वामनराव वर एक पैसा देत नसत.

मग माणिक कुठून पैसे आणते, काय करते याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नसे.

मंगेश कॉलेजला गेलाआणि थोडे कमी मार्क पडले त्याला बारावीला.

गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणेआता अशक्य होते.

माणिकने आणि मंगेशच्या आजीने त्याला धीर दिला. दोघीनी आपलं सोनं विकायचं ठरवलं आणि मंगेशची सोय केली.

मंगेशच्या डोळ्यात पाणी आलं.

आई आजी, तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही ग. तो गहिवरून म्हणाला.

आजी म्हणाली “माझं सोड मंगेशा. पण या आईला कधी विसरू नको रे बाबा. फार सोसलंय बर पोरीने. ”आजी डोळे पुसत म्हणाली. “

नाही ग आजी. मीआईला कधीतरी अंतर देईन का? ”मंगेश गहिवरून म्हणाला.

मंगेशने मग मात्र मागे वळून बघितलं नाही. , खूप हुशार नसला तरी कष्टाळू होता मंगेश. अहोरात्र मेहनत करत तो चांगले मार्क्स मिळवत पास झाला.

मंगेशला एका कंपनीत चांगली नोकरी लागली. त्यामानाने बरा पगार होता मंगेशला.

मध्यमवर्गात वाढलेल्या आणि कमी अपेक्षा असलेल्या त्या कुटुंबाला तो पगारही खूप मोठाच वाटला.

दरम्यान अगदी छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन मंगेशची आजी अचानक गेली. आता मात्र मंगेशचं लग्न व्हायला हवं असं माणिकला वाटायला लागलं.

तिशीजवळ आलेला मंगेश लहान नव्हता आता लग्नासाठी.

खूप खूप मुली बघितल्या माणिकने. पण मुलींच्या अपेक्षाच फार. शहरातल्या मुली तर इतक्या चढलेल्या की मंगेशचा पगार बघून त्या नकारच देत.

माणिक अगदी हताश झाली. तिचा मुली बघायचा उत्साह अगदी कमीच झाला. पण योग असावा तसे हे नागपूरजवळच्या मुलीचे स्थळ सांगून आले.

मुलगी एमबीए,, दिसायला बरी आणि मुख्य म्हणजे पुण्यात बदली मिळण्यासारखी होती. दिसायला डावीच होती देविका जोशी. पण सगळा विचार करून मंगेशने आणि माणिकने होकार दिला.

जोशींची परिस्थिती बेताचीच होती.

ठराविक रक्कम आम्ही तुमच्या हातात ठेवू. बाकी काही करू शकणार नाही. जोशी म्हणाले.

 

माणिक नाराज झाली पण मंगेश म्हणाला “असू दे ग आई. ती मिळवती मुलगी आहे. आपल्याच घरी येणार आहे ना. करू आपण जमेल तसा खर्च. ”

माणिकने पहिलाच मुलगा म्हणून खूप खर्च केला. आपल्या फंडातले खूप पैसे खर्च केले, सुनेला दागिने केले. खूप लोकांना हौसेने बोलावून बराच फंड रिकामा केला. मैत्रिणी सावध करत होत्या तरी त्यांचे न ऐकता.

नीला म्हणत होतीच. ”माणिक, अग काय हा खर्च? जरा विचार कर. असा तुझा घामाचा पैसा उधळू नकोस. एकुलता एक मुलगा असला म्हणून काय झालं? ”पण माणिकने ऐकलं नाही.

सून घरात आली. माणिकला सून नवीन असताना कौतुक वाटलं म्हणून तिला रोज हातात चहा, नास्ता, अगदी कौतुकाने रोज काय करू विचारून करी माणिक.

उन्हे डोक्यावर आली तरी यांची बेडरूम बंदच. , माणिकच्या घराचे सगळे रुटीन विस्कळित झालं.

एक दिवस वामनराव फिरून आले आणि दारातच पडले. त्यांना उठताच येईना. धावाधाव करून त्यांना मोठ्या हॉस्पिटल मध्ये अँडमिट केलं. त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया ताबडतोब करायला हवी असं सर्जनने सांगितलं.

खर्च सांगितला पाच लाख रुपये.

माणिकचा पाऊण पैसा तर मंगेशच्या लग्नातच आणि घराच्या रिनोव्हेशन मधेच गेला होता.

मंगेशने न बोलता जमवाजमव करून सगळं बिल भरलं आणि वामनराव घरी आले. घरी आले ते उठूच शकले नाहीत. त्यांच्या पायातली ताकदच गेली होती.

डॉक्टरांनी सांगितले, मणके झिजले आहेत आणि आता त्या नर्व्हज् दाबल्या गेल्यामुळे हे आता चालू शकणार नाहीत.

माणिकला अतिशय वाईट वाटलं. तिने खूप प्रयत्न करून बघितले. आयुर्वेदिक होमिओपॅथिक सगळ्या चिकित्सा करून झाल्या पण वामनरावाना कधीच उभं रहाता आलं नाही.

मग आलं डायपर आणि सेवेसाठी बायका ठेवणं. त्यांचे भक्कम पगार आणि खर्च माणिकच्या मागे लागले. खर्चाने पिचून गेली माणिक.

मुलगा सून ठराविक रक्कम हातात ठेवत. बाकीचा डोईजड खर्च माणिक कुठून करणार?

एक दिवस माणिक मंगेशला म्हणाली”अरे मंगेश, जरा जास्त पैसे देत जा तू. निदान तुमच्या दोघांचे जेवणखाण डबे वीजबिल हे नको का तुम्ही द्यायला? किराणा दुप्पट लागतो हल्ली. मला झेपत नाही रे हा खर्च. ”

लगेच देविका म्हणाली, हे बघा आई, बाबांचे पाच लाख बिल मंगेशनेच भरलं ना?

आणि आमच्या लग्नात मंगेशने नव्हता तुम्हाला खर्च करायला सांगितला. सगळा फंड उधळून टाकलात. आम्हाला नाही जमणार जास्त पैसे द्यायला. ”न बोलता मंगेश आणि देविका निघून गेले. माणिक हताश झाली. तिचे आणि वामनरावांचे तुटपुंजे पेन्शन तिला पुरेंना.

अशी चार वर्षे गेली. माणिक चार वर्षात काळज्या कष्टानं म्हातारी झाली. वाकून गेली पाठीत माणिक.

मैत्रिणी येत धीर देत. तिला बदल म्हणून कार मधून फिरायला नेत. हळहळून म्हणत, बघ माणिक.

आम्ही सांगत होतो ते ऐकलं नाहीस. किती उधळपट्टी केलीस लग्नात. सगळा फंड घालवलास वाया. आहे का त्या सुनेला मुलाला त्याचं काही? ”

पाच वर्षे अशी अंथरुणात काढून एका रात्री वामनराव झोपेतच गेले.

सुटले असेच भाव होते सगळ्यांच्या तोंडावर. माणिक आता रिकामी झाली. चोवीस तास वामनरावांच्या सेवेत गुरफटलेली माणिक आता एकदमच रिक्त झाली. काहीच काम राहिलं नाही तिला.

पडून असलेल्या वामनरावांशी तिला सोबत होती. ती त्यांना पुस्तके वाचून दाखवायची. दोघेजण पत्ते खेळायचे. या आजारपणामुळेदोघेही जवळ आले होते एकमेकांच्या.

गप्पा मारत, मागच्या आठवणी काढत ते त्यात रमून जात.

वामनरावांनी तिची अनेकवेळा क्षमा मागितली. मी तुला समजू शकलो नाही माणिक. असं अनेकवेळा ते म्हणाले.

“माणिक, हा बंगला तुझ्या नावावर आहे. तू माझ्यानंतर इथेच रहा. कुठे सह्या करू नको आणि मंगेशला अजिबात देऊ नको घर. आपण मृत्युपत्र करु आणि मग आपल्या पश्चात देऊ त्यालाच. ”त्यांनी माणिकला सांगून ठेवलं. आज त्यांची आठवण येऊन माणिकला अगदी असहाय वाटलं. कशी का होईना, त्यांची सोबत होती तिला.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “बालिशपणा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “बालिशपणा…” ☆ श्री मंगेश मधुकर

रविवारची निवांत संध्याकाळ, हवेत गारठा होता. मस्त आलं घातलेल्या चहाचा आस्वाद घेत मी खिडकीत उभी होते. सोसायटीतल्या मंदिराजवळ काहीजण गप्पा मारत बसलेले. बाजूला मुलांचा आरडाओरडा चाललेला… 

“मार, मार”

“सोडू नकोस. ”

“ए तिकडं नको. इकडे बघ”

“क्या कर रहा है. उडा दे”

“इडियट”

“अक्कल है के नही”

“अबे xxxxx” 

“मेलो, मेलो”

“संपलं, फिनिश”

“ए xxx खेळता येत नाही तर येतो कशाला? ”

शाळकरी वयातली मुलं मोबाइलवर गेम खेळत होती. खरं सांगायचं तर त्यांचं बोलणं इतकं भयानक होतं की ते सगळं लिहिणं शक्य नाही. आश्चर्य म्हणजे तिथल्या मोठ्या लोकांना याबद्दल काहीच वाटत नव्हतं किवा जाणीवपूर्वक ते दुर्लक्ष करत होते.

… सध्या हे दृश्य बऱ्याच ठिकाणी दिसतं. तसंही मारधाडीच्या गेम खेळताना भान राहत नाही. सर्रास शिवीगाळ केली जाते त्यात लहान-मोठे सगळेच आले. फोन स्मार्ट झाला पण वापरणाऱ्यांचा बावळटपणा वाढतोय. एवढं मात्र खरं…

पूर्वीचं आणि आत्ताचं ‘बालपण’ याबद्दल विचार डोक्यात असताना तिथंच बाजूला असलेल्या छोट्या मुलीनं लक्ष वेधलं. मान खाली घालून ती हातातला थर्माकोलचा तुकडा कठड्यावर घासत होती. बारीक बारीक भुसा खाली पडत होता. प्रचंड एकाग्रतेनं काम चाललेलं. बाजूला अजून दोन चार थर्माकोलचे तुकडे पडलेले. एक झालं की दुसरं असा उद्योग चाललेला. तल्लीन झालेल्या छोटीला आजूबाजूच्या जगाशी देणं घेणं नव्हतं. गुंग झालेल्या छोटीचं फार कौतुक आणि हेवा वाटला. मोबाइलनं जग व्यापलं असताना छोटीचं ‘बालपण’ अजूनही शिल्लक होतं.

– – त्या तिच्यासारखेच बिनकामी उद्योग मी, तुम्ही, सर्वांनीच केलेत. उदाहरण द्यायचं झालं तर पुस्तकं, पेपरमधल्या फोटोंना दाढी-मिशा काढणं, धूळ बसलेल्या गाडीवर चित्र काढणं, अभ्यास करता करता पेनानं वहीमध्ये गोल गोल काढत राहणं. गोष्ट ऐकून कल्पनेत हरवणं हे सर्व डोळ्यासमोर आलं. त्या रम्य आठवणीत हरवले असताना लेकीची हाक आली.

“ममा एवढं काय बघतेस” सोनूनं विचारलं.

“इकडे ये. गंमत बघ” खेळणाऱ्या मुलांकडे बोट दाखवत मी म्हणाले.

“ईsssss, मोबाइल गेम तर खेळतायेत. सो कॉमन”

“ती बाजूची मुलगी बघ. ” छोटी अजूनही त्याच कामात हरवलेली.

“ए, ती काय करतीये ” सोनू आश्चर्यांनं म्हणाली.

“खेळतीये”

“हे असं”

“भारी ना”

“त्यात काय भारी”

“तुला त्यातली मजा कळणार नाही. ”

“मजा??? .. व्हॉट फन इन टू धिस. काहीही काय? मी असलं काही कधी केलं नाही. ”

“कारण प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायची तुझी सवय. बुद्धिबळ सोडून तर दुसरं काही खेळली नाहीस. लहानपणापासून सोफिस्टीकेटेड. ”

“येस्स. त्यात काहीच चुकीचं नाही. ”

“गप बस. ही कौतुकाची गोष्ट नाहीये. प्रत्येक ठिकाणी लॉजिक लावायचं नसतं. काही गोष्टी आनंदासाठी करायच्या. ’

“व्हॉट डू यू मीन”

“फक्त बालपणीच मनाला वाटेल ते करता येतं. वागता येतं. जबाबदारी नसते की बंधनं नसतात आणि लोक काय म्हणतील याचीही चिंता नसते. व्यवहार या शब्दाबरोबर ओळख व्हायच्या आधीचा सुवर्णकाळ. फक्त एंजॉयमेंट!! ”

“आणि एकदम हॅप्पी!! नो टेंशन, नो वरी. ”

“बरोब्बर, आताच्या मुलांविषयी वाईट वाटतं. फार लवकर मोठी होतायेत. नको ती आणि नको इतकी माहिती सहज मिळत असल्यानं समज वाढतेय आणि निरागसता मात्र कमी होतेय. तसंही अनेक निखळ आनंद मोबाईलच्या राक्षसानं खाऊन टाकलेत. ”

“चांगलं आहे की… नाहीतरी असल्या खेळण्याचा गोष्टींचा पुढच्या लाईफमध्ये उपयोग नाही. ” सोनू.

“बाळा, बालपण फार थोड्या काळासाठी आणि मोठेपण मात्र आयुष्यभर सोबत असते. ”

“ममा, पसंद अपनी अपनी. ती मुलगी जे करतीये. दॅट इज वेस्ट ऑफ टाइम. “

‘बालिशपणा’. ”

“करेक्ट, माय डियर!! हाच ‘बालिशपणा’ आपण विसरलोय. फायदा-तोट्याचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे हरवणं दुर्मिळ झालंय. एकाग्रता कमी होऊन बेचैनी वाढलीये. ”

“नो चॉइस!! आजची लाईफस्टाइलच तशीये. ” सोनू 

“म्हणूनच सदासर्वकाळ दिखाऊपणाची झूल पांघरून फिरतो. वागणं-बोलणं सगळंच नाटकी. आपसातला संवाद आणि विश्वास कमी झालाय. त्यातही एखादा मोकळं ढाकळं वागणारा, बोलणारा, खळखळून हसणारा भेटला तर ऑकवर्ड वाटतं. स्वतःचे छंद, आवड हेच तर केव्हाच विसरले. माणसांची यंत्र झालीत. ” मी भान हरपून बोलत होते तेव्हा सोनू एकटक पाहत होती.

“असं काय पाहतेस”

“ममा, खूप छान बोलतेयेस. मी यावर विचार करीन. आपण पत्ते खेळायचे”

“हो, चालेल की, काय खेळायचं”

“रमी” सोनू.

“त्यापेक्षा भिकार-सावकार खेळू. ” 

“मला येत नाही”

“सोप्पंयं, मी शिकवते. जाम मजा येते. ”

– – मग काय मायलेकीत पत्त्यांचा डाव बेफाम रंगला. हसणं खिदळणं, धमाल चाललेली. तेव्हा आमचा आवाज ऐकून नवरोबा कडाडले… “काय ‘बालिशपणा’ चाललाय”

“अय्या!! खरंच!! , ” मोठ्यानं म्हणत सोनू आणि मी हसलो.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वास्तुशांती… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ वास्तुशांती… ☆ डॉ. शैलजा करोडे

घरात हळूहळू एकेक पाहुणा येत होता. वर्दळ वाढत होती. ” अरे शशांक (माझा मोठा मुलगा) माळी काकांनी फुले नाही पाठवली अजून. त्यांना फोन कर. मी सगळं पूजा साहित्य, होमासाठीच्या समिंधा व इतर साहित्य सगळं व्यवस्थित चेक केलंय. तू ही बघ जरा. आणि अहो तुम्ही ऐकलंत का? जरा गुरूजींना फोन करा. अरे श्रीकांत (माझा धाकटा मुलगा) तू काय करतोस रे. बघ दूधवाल्या काकांना आज पाच लिटर दूध आणायला सांग. नैवेद्यात पूर्णाहूती आहे. खीरसाठी दूध लागेल. पाहुणे मंडळींसाठी चहा. बरीच पाहुणे मंडळी येत आहेत. त्यात लहान मुलांसाठीही दूध लागेल. अगं मोना (माझी नात) तुझी रांगोळी झाली काय काढून, मी अंगणात डोकावत बोलले. मोनाने सुंदर घरकुल रेखाटले होते. विविध फुलांच्या माळांनी ते सजविले होते. पुढे छोटेसे अंगण, त्यात विविध फुलझाडे, दरवाज्यावर स्वस्तिक व सुंदर कलश, अगदी हुबेहूब घरकुल तिने रांगोळीत साकारलं होतं. ” काय ग आजी, काय म्हणतेस. बघ झाली माझी रांगोळी. कशी वाटते. ” क्षणभर मी पाहातच राहिले होते कि मोनाच्या बोलण्याने मी भानावर आले. ” अरे व्वा. काय अप्रतिम रांगोळी रेखाटलीस ग. बाळ रांगोळीतच तू इतकं सुंदर घरकुल रेखाटलंस तर आयुष्यात किती चांगलं घर सजवशील. ज्याच्या घरी जाशील त्याचं कल्याणच होईल. गुणाची ग माझी बाळी ” म्हणत तिच्या बलाया घेत माझ्या कानाजवळ कडाकड बोटं मोडून मी दृष्ट काढली.

चार दिवस झाले माझी (सारिका) अशी धावपळ सुरू होती. आणि का करू नये? माझ्या शशांकनं आज स्वतःचं घरकुल उभारलं होतं आपल्या मेहनतीवर व कष्टावर. मुलांना आम्ही काही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवू शकलो नाही कि त्यांच्यासाठी फारसा खर्चही करू शकत नव्हतो. अंगावर कापड आणि पोटभर अन्न यापलिकडे आम्ही काही करूही शकत नव्हतो. मी ओद्योगिक वसाहतीत जाऊन मिळेल ते काम करत होते कधी मेंदीचे पॅकेट तयार करणे तर कधी बाटल्यांचे बूच तयार करणे, आणि आमचे अहो अगरबत्ती आणून विविध सुंगंधाची फवारणी करुन त्यांची पाकीट तयार करुन मार्केटमध्ये विविध दुकानात पुरवायचे. अशा आमच्या तुटपुंज्या कमाईत आम्ही मुलांचे कोणते श्रीमंती चोचले पुरवणार होतो. किंवा मुलांचे साधे हट्टही आम्ही पुरवू शकत नव्हतो. पण माझी मुले ही समजदार. उलट ते ही आम्हांला कामात मदत करायचे. स्वतःचे शिक्षणही कमवा व शिका स्वरूपाचेच त्यांनी केले. शाळेच्या वेळे व्यतिरिक्त मिळेल ते काम करुन ते आपला शैक्षणिक खर्च व गरजा भागवत होते.

” या या वन्स, केव्हाची वाट पाहात होते. प्रवास ठीक झाला ना ” इतक्यात निलाक्षीने पाण्याचे ग्लास आणले. आत्या तुम्ही फ्रेश व्हा. मी गीझर चालू करते. ” ” अग होईल ग बेटा. तू आधी तयार हो. गुरूजी येतीलच इतक्यात. आमचा शशांक कोठे आहे. होय आत्या आलो आलो म्हणत शशांकने मीना वन्सचे चरणस्पर्श केले. ” ” आयुष्यमान भव. घराकडे चौफेर नजर फिरवत मीना वन्स म्हणाल्या, खूपच सुंदर, मस्त, छान प्रगती केलीस ” ” रात्रंदिवस मेहनत करतो तुमचा भाचा वन्स. आणि मित्र परिवारही खूप आहे त्याचा. समाजात मोठमोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं असतं त्याचं. ” ” अग सारिका, तुझे संस्कारही आहेत ग त्यात, तूच त्यांच्या मनात जिद्द, काही करुन दाखविण्याचं बळ निर्माण केलंस.

हाॅलमध्ये पूजा, होमहवन सुरू होते. मी आणि माझी बहीण आम्ही किचन व पाहुण्यांच्या आगत स्वागतात व्यस्त होतो. आणि माझी विचार शृंखलाही त्याच वेगानं धावत होती. शशांकने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं व नोकरीचा शोध सुरू केला. IDFC बँकेत त्याला Investment Agent म्हणून काम मिळालं अर्थात मुलाखत व सर्व सोपस्कर होऊन. तीन चार वर्ष त्याने काम केले पण मेहनतीच्या मानाने त्याला मिळणारा मोबदला कमी होता. एवढे काम मी स्वतःच केले तर? मीच स्वतःची एजन्सी सुरू केली तर. थोडे पैसे जमा झालेत माझे. करावं का मी हे धाडस? मी धाडस करावे आणि यश नाही आले तर? आहे तो पैसाही जायचा.

“काय झाले शशांक? आजकाल खूप बैचेन दिसतोस? मी व अहों नी त्याला बोलतं केलं. ” अरे मग नुसता विचार नको करूस पुढे पाऊल टाक. आम्ही आहोत सोबत. आणि शशांकने ” सप्तशृंग फायनान्सशियल असेट् स अँन्ड फोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा शुभारंभ केला. सुरूवातीला प्रतिसाद कमी होता पण हळूहळू वाढत गेला. दरम्यान शशांकसाठी सांगून मुली येऊ लागल्या व एका शुभमुहूर्तावर निलाक्षीसोबत शुभमंगल पार पडलं. माझ्या आनंदाला पारावार नव्हता. माझीच दृष्ट ना लागो या माझ्या संसाराला अशी माझी स्थिती झालेली. धाकट्या श्रीकांतनेही ट्रव्हल एजन्सीमध्ये जम बसवला होता. माझ्या घरात आता चिमणी पावलेही उमटण्याची चिन्हे दिसू लागली. मोनाचा जन्म म्हणजे घरात आनंद पर्वणी ठरला, पाठोपाठ आला जयेश.

या दरम्यान श्रीकांतचंही शुभमंगल पार पडलं. माझं घर तसं लहान. पण करत होतो अंडजेस्ट. आणि एक दिवस श्रीकांतने फ्लॅट बुक केल्याची बातमी दिली. ” म्हणजे तू वेगळा होणार श्रीकांत” ” नाही आई, आम्ही इथेच राहू. रात्री झोपण्यापुरतं तिथे जाऊ ” हा परिपाठ वर्षभर चालला. श्रीकांतला घरी परतायला कधी रात्रीचे दहा अकराही वाजायचे, जेवण करून मग फ्लॅटवर जायचे. रियाची कुचंबणा होऊ लागली आणि त्यात तिची प्रेग्नन्सी. म्हणून एक दिवस आम्हीच उभयतांनी त्यांना त्यांच्या फ्लॅटवर शिफ्ट होण्याची परवानगी दिली..

” चला पूजा संपन्न झाली. आता गृहप्रवेश विधी व त्यानंतर आरती संपन्न होईल. कुटुंबातील सगळ्यांनी बाहेर अंगणात थांबा, गृहप्रवेश विधी संपन्न करायचाय, श्रीकांत व निलाक्षी आता उजवा पायाने घरात प्रवेश करा, मग एकापाठोपाठ सगळ्यांनी यासचंय.

आरती, नैवैद्य, ब्राम्हणभोजन यथासांग पार पडले. सायंकाळी शशांकने मोठे रिसेप्शन ठेवले होते. लोक येत होते, शुभेच्छा देत होते. फुलांचे बुके व भेटवस्तू जमा होत होत्या आणि मी जीवनाचे सार्थक झाले म्हणून समाधानी होते.

नवीन घरात पाहुण्यांची गर्दी म्हणून आम्ही दोघे आमच्या जुन्या घरी झोपायला आलो. सकाळी मी पुन्हा शशांकडे हजर झाले, निलाक्षीवर कामाचा ताण पडू नये म्हणून मी चार दिवस कंपनीतून रजा घेतलेली.

शशांक व निलाक्षी ने दोन चार दिवस जुन्या घरी ये जा केली. आणि हळूहळू ते येणे कमी केले. ” शशांक आम्हीही तिकडे येतो आता. हे घर भाड्याने देऊ. “आई बाबा, तुम्ही तिकडे येऊ नका म्हणत नाही मी. पण आईचं कामाचं ठिकाण तेथून लांब पडेल. शिवाय या घरातील सामान तिकडे नाही मावणार एवढा. ” अरे शशांक मुलांना शाळेत ने आण कशी करणार, मी येतो तिकडे ” ” बाबा ती काळजी नका करू हो. मुलांना स्कूलबस लावेन मी. आयुष्यभर तुम्ही कष्ट केले, आता करा आराम. आणि आम्ही काही कुठे गेले आहोत काय? गावातच आहोत. सणवार आपण एकत्रच माझ्या घरी साजरे करू. आणि काही लागलंच तर मला फोन करा. लगेच हजर होईन मी.”

माझ्या मुलाने घरकुल उभारलं, मला वाटलं, आता माझे कष्ट संपले. सुखसोईंनीयुक्त या घरात आता आरामात जीवन जगायचं. पण त्या घरकुलात आम्हा उभयतांना जागा नव्हती. आज वास्तुशांती झाली होती. पण त्या वास्तुत आम्हांला जागा नव्हती. खरंच माझी मुलं खूपच मोठी झाली होती.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अस्वस्थ अंधार – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ अस्वस्थ अंधार – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – “पूर्वी रजा मागितली की आधी जोशी साहेबांचे चाबकाच्या फटकाऱ्यासारखे शब्द मुकाट ऐकावे लागायचे.. ” आवाज भरून आला तसं देशपांडे बोलायचे थांबले.

“देशपांडे.. जस्ट रिलॅक्स.. अहो अशा साध्या साध्या गोष्टींचं इतकं दडपण घेऊन कसं चालेल? “

ऐकलं आणि देशपांडेंचे भरून आलेले डोळे एकाएकी वाहू लागले.

“काय झालं देशपांडे? घरी काही प्रॉब्लेम?

“मुलाला बरं नाहीय. “

संदीपच्या नजरेसमोर एकदम त्याची गोऱ्या गोबऱ्या गालांची तेजूच झेपावू लागली.

“किती वर्षाचा आहे तुमच्या मुलगा? “

“सहा वर्षांचा.. “

“रहातो तुमच्याशिवाय? आठवण नाही काढत? ” संदीपने विचारले

देशपांडे आपलं हरवलेल़ं सुख शोधत राहिले..)

इथून पुढे – – – 

“मला ओळखतच नाही तो. म्हणजे इथं आजारी पडला तेव्हा वर्षाचाही नव्हता. रिकेटस् चा अॅटॅक होता. इथं धड दवाखान्याची सोयही नाही. मग खूप धावपळ करून तिकडे नेला, पण बराच उशीर होऊन गेला होता हो. तेव्हापासून अंथरूण सोडलंच नाहीयन्. चालणं नाही, बोलणं नाही, नजरेत ओळखीचं हसू नाही, मांसाचा एक लोळागोळा.. लाळ गाळत पडून असतो… “

“ओह.. आय फील व्हेरी सॉरी देशपांडे. मला हे सगळं माहित नव्हतं. जोशी बोलले नव्हते कधी. “

” त्यांना तरी इतकं सगळं कुठं माहित होतं? “

” कां? तुम्ही बोलला नव्हतात कधी? “

देशपांडे मानेनेच नाही म्हणाले. ” बोलावसं वाटलंच नाही हो. एकदा असंच पत्र आलं होतं घरचं. लगेच जाणं आवश्यक होतं. तेव्हा ते मला.. ‘तुमचा मुलगा खरंच आजारी आहे कां ते एकदा तुमच्या घरी येऊन बघायला हवं’ असं म्हणाले होते. ते ऐकलं त्या क्षणापासून माझा संवादच तुटला. “

” यापुढे असं होणार नाही देशपांडे. मुलाच्या काळजीचं दडपण मनातून काढून टाका तुम्ही”

देशपांडे एवढंसं हसले.

” मला मुलाची काळजी फारशी वाटत नाही साहेब. कारण ती करायला माझी बायको तिथं आहे. पण तिची काळजी करायलाच कुणी नाही हो. सगळं ओझं एकटी ओढत असते. दोन्ही घरच्यांच्या मनाविरुद्ध आम्ही लग्न केलेलं. त्यामुळे सगळ्या मायेच्या माणसांनी आमच्याकडे पाठ फिरवलीय. वाटत होतं या आमच्या दयनीय अवस्थेत तरी सर्वजण आम्हाला जवळ घेतील, मागचं सगळं विसरतील. पण… “

देशपांडेंचं बोलणं सुरू असतानाच पोस्टमन दारात उभा होता. त्याने पुढे केलेला टेलिग्राम संदीपने शांतपणे स्वीकारला.

“कुणाचा… कुणाचा आहे टेलिग्राम? ” देशपांडेंनी थरथरत्या आवाजात विचारलं. टेलिग्राम वाचून संदीपने शांतपणे त्याची घडी घालून तो खिशात ठेवून दिला. देशपांडेंचा स्वतःवरचा ताबा हळूहळू सुटत चालला. त्यांचं उभं अंग थरथरू लागलं. ते श्वास रोखून पहात राहिले. मुलाच्या काळजीने आतून व्याकुळ होऊ लागले. तोल सावरता येईना तसे हेलपाटत समोरच्या खुर्चीत टेकले. थोडंसं पुढं होऊन त्यांना अलगद थोपटत संदीप ते शांत व्हायची वाट पहात राहिला.

“देशपांडे, टेलिग्राम तुमचा नाहीये.. “

खोल दरीत कोसळत असताना अगदी अनपेक्षितपणे कुणीतरी अलगद झेलावं तशी देशपांडेंची अवस्था झाली.

” मग.. मग कुणाचा आहे टेलिग्राम? “

संदीपने कांही न बोलता खिशातली टेलिग्रामची घडी काढून त्यांच्यापुढे केली.

‘तेजू नीडस् यू. स्टार्ट इमिजिएटली.. ‘

” ही तेजू कोण? “

“मुलगी माझी. ” मनातली काळजी शक्यतो लपवत संदीप म्हणाला.

“काय होतंय तिला? आजारी आहे कां ती? “

” नो.. नो.. नाॅट अॅट आॅल.. ” संदीपने ते विचार तत्परतेने झटकून टाकले. ” शी.. शी मस्ट बी आॅल राईट.. ” तो स्वतःच्याच मनाला समजावल्यासारखा बोलून गेला. आता मात्र त्याला आपल्या काळजातली व्याकुळता लपवता येईना. त्याच्या चेहऱ्यावरचे हे बदलत जाणारे भाव देशपांडेंच्या नजरेतून सुटूच शकले नाहीत…

” साहेब, तुम्ही माझ्याकडे चार्ज घेऊन दोन दिवस जाऊन या.. ” ते मनापासून म्हणाले.

” नाही नाही देशपांडे… अहो, भलतंच काय? माझ्यापेक्षा तुमचं जाणं जास्त महत्त्वाचं आहे. “

” साहेब, आय कॅन वेट. मला सवय आहे त्याची. शिवाय मी आधी गेलो तर यावेळी कदाचित चारदोन दिवस जास्त रहावं लागेल. तिथं माझ्यासाठी काय वाढून ठेवलं असेल कुणास ठाऊक? त्यामुळे माझं परत येणं कदाचित लांबलंच तर तुम्ही विनाकारण इथे अडकून पडाल. ऐका माझं. त्यापेक्षा तुम्हीच आधी जाऊन या. तेजूला भेटून आलात कीं तुम्हालाही बरं वाटेल. ” देशपांडे मनापासून म्हणाले.

वरून ओबडधोबड, मळकट, निस्तेज दिसणाऱ्या देशपांडेंच्या अंतर्मनात भरून राहिलेल्या माणुसकीने संदीप आतून हलला. पण.. पण देशपांडे करत होते तो त्याग स्वीकारायला त्याचं मन मात्र तयार होईना. तो काही बोलणार एवढ्यात मघाशी देशपांडेंनी वाचून टेबलवर ठेवलेला तो टेलिग्राम फडफडून संदीपचं लक्ष स्वतःकडे वेधून घेऊ लागला. त्या टेलिग्रामच्या कागदातून तेजूचा म्लान केविलवाणा चेहरा संदीपकडे झेप होता. त्या कोवळ्या जीवाच्या आर्त हाकेला त्याला नाही म्हणवेना. भावनातिरेकाने थरथरत त्याने उत्कटतेने देशपांडेंचे हात आपल्या हातात घेऊन हळूच दाबले. या क्षणी मनातल्या भावना नेमकेपणाने व्यक्त करायला दुसरे शब्दच त्याच्याजवळ नव्हते!

… संदीपचं मन घराकडे धाव घेत राहिलं पण एस्. टी तो वेग घेईना. तेजूच्या काळजीचं मणामणाचं ओझं मनावर घेऊन त्याने दारावरची बेल वाजवली तेव्हा रात्र बरीच उलटून गेली होती. तो भुकेला, गलितगात्र, पूर्णत: थकलेला.. पण या कशाचा स्पर्श त्याच्या मनाला होत नव्हताच. मनात काळजी होती फक्त तेजूची!!

” काय झालंय तेजूला? ” दार उघडताच त्याने अधीरतेने विचारलं.

“श्शू.. हळू बोला. आत्ताच झोपलीय ती.. ” त्याच्या हातातली बँग घेत प्रिया म्हणाली. संदीपला बूट काढायचंही भान नव्हतं. तो तसाच बेडरूमकडे झेपावला. तिथे तेजू शांत पहुडली होती.

” आणि हे काय? आई कुठे आहे? ” बाहेर येत त्यांने प्रियाला विचारलं.

” अहो, भाऊजींचं पत्र आलं होतं. जाऊबाईंना बरं नाहीये. चार दिवस जाऊ येते म्हणाल्या. मग रजाच घेतली मी. दिवसभर घरी नुसतं बसून तुमची आठवण छळायला लागली, मग मीच केला टेलिग्राम.. ‘तेजू नीडस् यू.. ‘ म्हणून. खरंतर ‘आय नीड यू व्हेरी मच” प्रिया त्याच्याकडे पाहून सूचक हसली. पण तो..? तो शून्य… विमनस्क…!!

“संदीप, का रे? काय झालं? “

” तू त्यासाठी असा टेलिग्राम केलास? “

टेलिग्राम केला त्या क्षणापासून त्याची आतुरतेने वाट पहाणारी प्रिया संदीपच्या या प्रश्नाने ढासळलीच.

” कां? नको होता करायला? टेलिग्राम ऐवजी खरं कारण लिहिलेलं दोन ओळींचं पत्र पाठवलं असतं तर आला असतात कां असे धावत? तुम्हाला काय माहित गेले पंधरा दिवस आणि पंधरा रात्री मी कशा काढल्यात ते? दिवसभर जीवघेणी धावपळ आणि रात्री… सगळं सांगायलाच हवं का हो तुम्हाला? “

” नाही प्रिया. आय कॅन अंडरस्टॅंड यू. पण तुझ्या या अनवधानाने केलेल्या कृतीचे तीक्ष्ण घाव तुला कल्पनाही करता येणार नाही इतके जीवघेणे आहेत गं… “

” म्हणजे? काय झालंय संदीप? “

“तिथे ब्रॅंचमधे देशपांडे म्हणून हेडकॅशिअर आहेत आमचे. तिकडे गावी त्यांचा एकुलता एक मुलगा अंथरुणाला खिळून आहे प्रिया… त्यांना लगेच निघणं आवश्यक होतं. पण तुझा टेलिग्राम आला आणि तो पाहून ते थांबले. आधी मला जा म्हणाले. केवळ त्यांच्या आग्रहाने आणि तेजूच्या काळजीने मी हा असा धावत येऊ शकलोय. येताना त्यांच्या उपकारांचं ओझं माझ्या मनावर होतं आणि आता परत जाईन तेव्हा त्या ओझ्यापेक्षा कणभर जास्त अपराधीपणाचं ओझं मला बरोबर घेऊन जावं लागणाराय. “

“संदीप, चुकलं माझं. माझ्या भावनांचा आवेग मी झोपवू शकले नव्हते. पण ही चूक पुन्हा होणार नाही. तुम्ही हातपाय धुऊन दोन घास खाऊन घ्या. तोवर मी बेड तयार करते. खूप दमला आहात तुम्ही. थोडा आराम करा. आणि.. ” संदीप तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात राहिला. “आणि एक विनंती करते. रागावू नका प्लीज. पहाटे थोडं लवकरच उठू आपण दोघेही. तेजू जागी होण्यापूर्वीच तुम्ही… निघून जा. “

” नाही प्रिया.. प्रिया, कां म्हणून ही शिक्षा? तू.. तू रागावलीयस माझ्यावर. अशी निष्ठूर नको ना गं होऊस.. “

” नाही अरे. मी रागावलेली नाहीये संदीप. अगदी मनापासून सांगतेय. आणि शिक्षा फक्त तुम्हालाच कशी? तिलाही आहेच कीं. तुम्हाला माहित नाहीये संदीप, तुम्ही प्रथम गेलात तेव्हा ओळीनं चार रात्री तुमची आठवण काढून ती आक्रोश करत रडत झोपायची. खूप त्रास दिलाय तिनं मला आणि आईना. तिला पुन्हा बिथरवू नका प्लीज. अहो विरह आणि वनवास पत्करायचाच जर आहे तर तो फक्त तुम्ही आणि मीच कां म्हणून? त्यातला तेजूचा वाटा तिलाही उचलू दे.. “

संदीपला काही बोलता येईना. ट्रान्सफर ऑर्डर आली तेव्हा संदीपला वाटलं होतं, प्रियाला हे सगळं स्वीकारणं जड जाईल. आज? आज प्रियानं अतिशय निर्धारपूर्वक सर्व कांही मनापासून स्वीकारलं होतं पण.. संदीपलाच ते स्वीकारणं अवघड जात होतं!

त्याचं मन भरून राहिलेला अस्वस्थ अंधार त्याला उध्वस्त करू पहात होता. त्याच अंधारात अंथरुणाला खिळून राहिलेला, देशपांडेंचा कधीही न पाहिलेला तो एकुलता एक मुलगा शेवटचे आचके देत असल्याचा भयंकर भास त्याला झाला… आणि.. तो धडपडत त्या अंधारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला..!

भानावर येऊन त्याने पाहिलं, तेव्हा प्रिया शांतपणे त्याची बॅग भरत होती!!

– समाप्त  

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अस्वस्थ अंधार – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ अस्वस्थ अंधार – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये

(*पूर्वसूत्र-* “प्रियाs, तूच असा धीर सोडलास तर तेजूला कोण समजावणार बरं? ” संदीप म्हणाला. प्रियाला कांही धरताही येईना न् सोडताही..

“गेल्याबरोबर माझ्या ऑफिसमधे फोन करा लगेच. आणि तब्येतीला जपून रहा. ” ती म्हणाली.

संदीपने तिला उत्कटतेने जवळ घेतलं. आपल्या अश्रूंना बांध घालायचं भान ती त्याच्याच मिठीत कुठंतरी हरवून बसली होती…! )

इथून पुढे – – 

अतिशय खडतर आणि कंटाळवाणा प्रवास संपवून संदीप बसमधून उतरला तेव्हा त्याचं सगळं अंग थांबून गेलं होतं. उभं रहायची शक्तीही त्याच्याजवळ नव्हती. या गलितगात्र अवस्थेत इथं या खेड्यांत एखादी रिक्षा त्याची वाट पहात असेल अशी त्याची अपेक्षा नव्हती, पण इथे धड एखादा टांगाही नव्हता किंवा हमालसुद्धा. आता यापुढं आपली सगळी ओझी आपल्यालाच उचलत रहावं लागणाराय या वास्तवाची जाणीव परिस्थितीने अशा क्रूर पद्धतीने त्याला करून दिलेली होती! ओझं हातात घेऊन तो पाय ओढत चालत राहिला. त्याला त्या अवतारात ब्रँचच्या दारात पाहून ब्रॅंचमॅनेजर जोशींच्या कपाळावर आठ्याच पडल्या.

“येस् प्लीज.. ” त्यांनी त्राग्यानेच विचारलं.

” मी कर्णिक.. संदीप कर्णिक. “

ऐकलं आणि देव भेटावा तसं जोशी आनंदाने उठले. त्यांच्या कपाळावरच्या आठ्या केव्हाच विरून गेल्या होत्या.

“ओs देशपांडेs.. , अहो उठाs.. त्या पिंजऱ्यातून बाहेर या,.. बघा तरी कोण आलंय. एs शंकर अरे बघत काय उभा राहिलायस? हो पुढं. बॅगा घे साहेबांच्या हातातल्या… ” जोशींना प्रयत्न करूनही आपला आनंद लपवता येईना.

“देशपांडे, या. हे नवीन साहेब तुमचे आणि कर्णिक साहेब, हे देशपांडे. इथले हेड कॅशिअर. “

संदीपने देशपांडेंकडे पाहून हसत शेकहॅंडसाठी आपला हात पुढे केला. देशपांडे बावचळून थोडावेळ तसेच उभे राहिले. मग कसेबसे हात जोडून त्यांनी नमस्कार केला. या अशा बावळट माणसाच्या सहवासात दिवस काढायचे या कल्पनेनेच संदीप अस्वस्थ झाला.

“चला कर्णिक, दमून आलायत, थोडं फ्रेश होऊन चहा घेऊ. “

ब्रॅंचपासून जवळच एका दगडी जिन्याच्या टोकावर एक छोटी रूम होती.

” हा पहा, हा माझा

राजमहाल. म्हणजे.. आजपासून तुमचा! ” स्वत:वरच खूश झाल्यासारखे जोशी मनापासून हसले. “बघा बरं, कशी वाटतेय रूम? “

संदीपला रूमपेक्षा

ब्रॅंचबद्दलच जास्त उत्सुकता होती.

” ही ब्रँच कशी आहे? “

“हां.. आहे.. तशी बरीच म्हणायची. म्हणजे.. नॉट बॅड. इथं काम म्हणाल तर पूर्ण आराम आहे बघा. ब्रॅचमधे फोन नाही त्यामुळे डिव्हिजनल

ऑफिसकडून कसले तगादे नाहीत. तालुक्याच्या गावातून दिवसातून एकच एस्. टी येते आणि तीच परत जाते. बाकी शुकशुकाट. पावसाळ्यात मधल्या ओढ्याला एकदा पाणी आलं की ती एस्. टी. सुद्धा चार चार महिने इकडे फिरकत नाही बघा. “

“आणि कस्टमर्स कसे आहेत? “

“कस्टमर्स? अहो इथं असल्या खेड्यात कस्टमर्स कुठून असायला? ते फक्त तिकडं आपल्या शहरात असतात. इथं सगळेच आंगठेबहाद्दर आणि तरीही एकापेक्षा एक बेरकी. त्यातले कुणी बँकेकडे फिरकतही नाहीत आणि आपण त्यांच्याकडे जाऊन काही उपयोग होत नाही. निगेटिव्ह ग्रोथ आणि लॉस मेकिंग ब्रॅंच म्हणून डिव्हिजनल मॅनेजर दर मीटिंगमधे आपली खरडपट्टी काढत असतात. ते खाली मान घालून ऐकून घ्यायचं. तेवढं केलं की बाकी कश्शाचा कांही त्रास नाही बघा. “

संदीप उदास हसला. जोशीना जे सहज वाटत होतं ते खाली मान घालणंच त्याला अवघड होतं आणि एरवी सुद्धा असं पाण्याबाहेर बसून रहाणं त्याला मानवणारही नव्हतं. या ब्रँचचं संपूर्ण चित्र बदलून टाकायचं हे एक आव्हानच होतं. अर्थात संदीपचे प्रयत्न त्या दिशेनेच सुरू रहाणार होते. ‘पण…? पण हे सगळं आपल्या एकट्याला जमेल? ‘ तो विचारात पडला. ‘एकटा कां म्हणून? देशपांडे आहेतच की बरोबर.. ‘ त्याला अचानक मनात कुठेतरी आधार मिळाल्यासारखा वाटला.

” जोशीसाहेब, ते देशपांडे कसे आहेत हो कामाला? ” संदीपने विचारलं.

जोशींचं तोंड पुन्हा वाकडं झालं. “हां म्हणजे आहे तसा बरा, पण फार किरकिरा आहे बघा. अहो, हेडकॅशिअरशीप मिळत होती म्हणून स्वत: अर्ज करून इथं आला होता. तेव्हा नवीनच लग्न झालं होतं. लहान बाळही होतं. इथला एकंदर रागरंग बघून कातावला होता बघा. पुढे मुलाला कसल्यातरी किरकोळ आजाराचं निमित्त झालं आणि मग इथं दवाखान्याची सोय नाही म्हणून बायको मुलांचं पार्सल दिलंन्

तिकडं पाठवून. त्यालाही सहा वर्षं होत आलीत. तेव्हापासून आता एकटाच बसलाय इथं बोंबलत. “

कानावर ओरखडे ओढणारे जोशींचे हे शब्द त्याला कसेसेच वाटले. इथं येतानाचा त्याचा उत्साह हळूहळू विरून जाऊ लागला. एव्हाना जोशींनी चहा स्टोव्हवर चढवून ठेवला होता. त्यालि मनाच्या त्या अस्वस्थतेत अचानक प्रियाची आठवण झाली… ‘अरे प्रियाला फोन करायचाय.. ‘

“जोशीसाहेब, चहा घेऊन लगेच जरा पोस्टात जाऊन येऊया. मिसेसला फोन करायचाय हो. ती वाट पहात असेल. “

जोशींनी तोंड वाकडं केलं.

” कर्णिक, इथं तुम्ही उगीच त्या फोनबीनच्या फंदात पडू नका बघा. ” जोशी कशाचाच निर्भेळ आनंद याला मिळूच नये म्हणून धडपडत असल्यासारखे म्हणाले.

“कां बरं? फोन करायचा तर पोस्टात जायला हवंच ना? “

“अहो, वन मॅन पोस्ट इथलं. तो पोस्टमास्तरसुद्धा कधीच जागेवर नसतो. त्यातून नंबर मिळायचा म्हणजे रात्रभर तिथं बसून रहावं लागेल बघा वाट बघत. “

संदीपच्या हातातल्या त्या वाफाळलेल्या चहाची चवच बेचव होऊन गेली.

“मग… काय कर्णिकसाहेब, आज रिलीव्ह होऊ कां मी? ” जोशी आशाळभूतपणे मुद्द्यावर आले. तिकडे फोनची वाट पहात बसलेल्या प्रियाला नजरेआड करीत या वास्तवाचा समाधानाने स्वीकार केल्यासारखं संदीप म्हणाला, ” येस्स.. बाय ऑल मीन्स! “

—–

तीन दिवस सलग धडपड करून सुद्धा फोन लागला नाहीच. अखेर कंटाळून मनातल्या नेमक्या भावना व्यक्त करणारं एक भलं मोठं पत्र त्याने प्रियाला लिहिलं आणि तिच्या उत्तराची वाट पहात राहिला. आजच्या इनवर्ड मेलमध्ये एक इनलॅंड लेटर आलेलं पाहून त्याने झडप घालून आधी तेच हातात घेतलं. पण ते पत्र त्याचं नव्हतंच. ते देशपांडेंच्या नावाचं होतं. देशपांडेंच्या या छोट्याशा आनंदात सहभागी होण्याइतकं संदीपचं मन मोठं होतं आणि त्यामुळे त्याने उत्सुकतेने देशपांडेना हाक मारली.

” देशपांडे, हे पत्र आलंय बघा तुमचं. ” संदीपला वाटलं आता देशपांडे धावत येतील. पण ते नेहमीप्रमाणे पाय ओढत चालतच आले होते. ‘या माणसाला कधी कशाचा आनंद कसा होत नाही? ‘ त्याला प्रश्न पडला. देशपांडेंच्या दाढीचे वाढलेले खूंट कधी नव्हे ते संदीपच्या नजरेला खुपू लागले. देशपांडेंनी निर्विकारपणे ते पत्र घेतलं, थंडपणे त्याकडे पहात राहिले क्षणभर. मग वळले आणि पाय ओढत परत गेले.

एव्हाना शंकरने बाकीचं इनवर्ड मेल व्यवस्थित जुळवून संदीपच्या टेबलवर आणून ठेवलं होतं. ते समोर घेऊन संदीप बघायला सुरुवात करणार तेवढ्यात त्याच ओढलेल्या चेहऱ्याने देशपांडे पुन्हा संदीपच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांना पाहिलं आणि आपल्या कपाळावर आठ्या पडणार नाहीत याची जाणीवपूर्वक खात्री करून घेत संदीप अतिशय प्रयत्नपूर्वक प्रसन्न हसला.

” काय म्हणताय देशपांडे? “

देशपांडे उदास हसले.

“देशपांडे, अहो सांगा ना, काय झालंय? “

” साहेब, चार दिवस रजा हवी होती. “

” एवढंच ना? त्यात काय? अरे मग घ्या ना.. ” संदीप मनापासून म्हणाला. ऐकलं आणि देशपांडे स्वतःच्या कानांवर विश्वासच नसल्यासारखे बघतच राहिले. अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचे ते दाढीचे खुंट वाऱ्याची सुखद झुळूक यावी तसे खुदकन् हसले.

“थँक्यू सर.. थँक्यू व्हेरी मच”

” अरे थँक्स कशाबद्दल? ” देशपांडे पुन्हा कोमेजले.

” पूर्वी अशी मागितल्याबरोबर कधी रजा मिळालीच नव्हती साहेब. रजा मागितली की आधी जोशीसाहेबांचे चाबकाच्या

फटकाऱ्यासारखे शब्द मुकाट ऐकावे लागायचे. ” देशपांडेंचा आवाज भरून येत होता.

” देशपांडे, जस्ट रिलॅक्स. अहो अशा साध्या साध्या गोष्टींचं इतकं दडपण घेऊन कसं चालेल? “

या थोड्याशा आपुलकीचा धक्काही सहन न होऊन देशपांडेंचे भरून आलेले डोळे एकाएकी वाहू लागले. संदीप मनातून थोडासा हलला.

” काय झालंय देशपांडे? घरी कांही प्रॉब्लेम? “

” मुलाला बरं नाहीय”

संदीपच्या नजरेसमोर एकदम त्याची गोऱ्या गोबऱ्या गालांची तेजूच झेपावू लागली.

“किती वर्षांचा आहे मुलगा? “

“सहावं सुरू आहे. “

” रहातो तुमच्याशिवाय? तुमची आठवण नाही काढत? “

देशपांडे आपलं हरवलेलं सुख शोधत राहिले…!!

– क्रमश: भाग दुसरा 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अस्वस्थ अंधार – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ अस्वस्थ अंधार – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

रूरल पोस्टिंगच्या फायनल लिस्टमधे आपलं नाव बऱ्याच वर आहे याचा संदीपला अंदाज होताच. पण म्हणून ट्रान्स्फर आॅर्डर इतक्या लवकर येईल अशी त्याची अपेक्षा नव्हती.

आता घराची ऊब आणि मुंबई दोन्ही सोडून शहराची सावलीही माहित नसलेल्या एका आडवळणावरच्या अनोळखी खेड्यांत निघून जायचं..!

त्याने मनोमन हे पूर्वीच स्वीकारलेलं होतं, पण प्रियानंही सगळं मनापासून स्वीकारणं त्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं होतं!

सगळं वाढून होण्यापूर्वीच संदीपने गडबडीने भात कालवायला सुरुवात केली.

त्याला ठसका लागलाच.

“अहो.. सावकाश जरा.. “

तो ठसकतच राहिला. प्रियाने तत्परतेने पाण्याचा ग्लास त्याच्यापुढे केला. मग कसाबसा भात संपवून तो उठलाच.

“काय हो हे? दोन घास व्यवस्थित जेवा तरी पोटभर.. “

“नको प्रिया,.. आज थोडं लवकरच निघायला हवं होतं. आता जेवत बसलो तर उशीरच होईल. तू पटकन् डबाच भर… ” तो हात धुताधुताच बोलत राहिला.. “आणि हे बघ, संध्याकाळी तूच तेजूला पाळणाघरातून आण. माझी जाण्यापूर्वीची सगळी कामं आवरायची म्हणजे हे दोन-तीन दिवस मला यायला उशीरच होईल.. “

“जाण्यापूर्वीची म्हणजे? तुम्ही जायचं पक्कं ठरवलंयत तर”

” प्रिया… “

“जनरल मॅनेजरना भेटून तुम्ही तुमची ट्रान्सफर कॅन्सल कां करून घेत नाही हो? हवं तर या रविवारी आपण त्यांना घरी जाऊन भेटून येऊ. मी कन्व्हिन्स करीन त्यांना आपले प्रॉब्लेम्स्… “

” प्रॉब्लेम्स..? संदीप मनापासून हसला. “काय सांगणार त्यांना? मी सुध्दा नोकरी करते, आमची तेजू अजून खूप लहान आहे…. “

“ती निदान शाळेत जात असती तरी माझी एवढी धावफळ झाली नसती हो. आता रोज तिला पाळणाघरांत पोचवायचं, संध्याकाळी परत आणायचं, शिवाय रोजची लोकलची धावपळ, घरचं सगळं.. खरंच कसं निभणार हो मला..? ” प्रिया खूप हळवी झाली.

“आई येते म्हणालीय ना गं थोडे दिवस? “

“हो, पण ते थोडेच दिवस. त्या कायम इथे कुठं रहाणार आहेत?

हा प्रश्न तसा न संपणाराच होता.

“प्रिया, आपण यावर नंतर निवांतपणाने सविस्तर बोलू आणि मग नक्की काय ते ठरवू. ठिकाय? “

हा अनपेक्षित दिलासा मिळाला आणि प्रिया लहान मुलीसारखी खुदकन् हसली.

संदीप तिला थोपटून तिचा निरोप घेत जिना उतरू लागला आणि क्षणात नजरेआड झाला.

त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या स्मितरेषेचा आणि ओझरत्या स्पर्शाचा सुद्धा प्रियाला खूप आधार वाटला!

निसटू पहाणारे हे असेच क्षण प्राणपणाने घट्ट धरून ठेवायची तिची धडपड सुरू होती!!

————–

दारावरची बेल वाजली.

“बाबा आsलेs.. “म्हणत तेजू भात तसाच टाकून उठलीच. दुडदुडत दाराकडे जाऊ लागली.

प्रिया तिच्यामागं धावली.

“अं.. अं.. मी उगतनाल दाल… “

“तेजूs.. अगं हात पोचणाराय कां तुझा? … ” म्हणत प्रियाने तिला अलगद वर उचलून घेत दार उघडलं. खरकट्या तोंडाने तेजू संदीपकडे झेपावली. संदीपने दारातच तिला प्रेमाने जवळ घेत तिचा पापा घेतला. तेवढ्याशा आपुलकीनेही ती सुखावली.

“तेजू.. पुरेs त्यांना आत तरी येऊ दे.. चलाs शहाण्या मुलीसारखं मम्म संपवायचं हं आता. गोsड आहे माझं पिल्लू ते. हं.. हाs शेवटचा घास.. बाबांचा.. “

स्वत:च्याच तोंडून सहजच बाहेर पडलेल्या ‘शेवटचा’ घास या शब्दांनीच जखम केल्यासारखा तिचा आवाज भरून आला.

संदीपने चमकून तिच्याकडं पाहिलं.

“काय झालं प्रिया..? “

“हिला चूळ भरवून जरा नेता कां हो आत? ” ती रडवेल्या आवाजातच म्हणाली.. “बघा बरं झोपतीय कां? तोपर्यंत मी आपलं वाढून घेते. “

संदीपनं तेजूला अलगद उचलून खांद्यावर घेतलं. तिचे डोळे पेंगुळले होते, तरीही बाबांनी गुदगुल्या करताच तिची झोप पळाली. आपले गोरे गोबरे गाल त्याच्या कुरळ्या केसांवर घासत ती खिदळत राहिली.

“झोपली कां? “

“हो… ” संदीप अलगद उठला.

दोघेही पानावर बसले.

” काय म्हणाले जी. एम्.? ” ‘सकाळच्या संभाषणाचा धागा हिने मनात अजून घट्ट धरून ठेवलाय तर! ‘.. तो हसला.

“भेटला नाहीत ना? ” प्रिया दुखावली.

” प्रियाs.. , पुढची प्रमोशन्स हवी असतील तर किमान दोन वर्षं रुरल ब्रॅंचमधे काम करायला हवं हा प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेतला नियमच आहे. आता फक्त पुढची प्रमोशन्स हवीत कीं नकोत ते आपण ठरवायचं. “

“आपण? कीं फक्त तुम्ही? ” त्याच्याकडे रोखून पहात तिने उपरोधाने विचारलं.

“म्हणजे? “

” म्हणजे पुढची प्रमोशन्स आपल्याला नकोच असं मी म्हटलं तर ऐकणार आहात तुम्ही? “

” प्रिया, आयुष्यभर कसं जगायचं हे स्वतःच्या मनाशी आधीच पक्कं ठरवून त्याच सरळ रेषेत चालायची तू धडपड करतेयस म्हणून तुला हे सगळं अवघड वाटतंय. अगं, आपल्या बँकेत इथं माझ्यासारखे कितीतरी ज्युनिअर ऑफिसर्स असे आहेत जे कॉम्प्रमाईज म्हणून दोन वर्षांसाठी मुंबई सोडायला मनापासून तयार आहेत. त्या तुलनेत आमच्या रूलर ब्रॅंचेसच कमी पडतायत. मी नाही म्हणायचा अवकाश दुसरं कुणीतरी तिथे जाईल. “

” पण जायलाच हवं तर ते इतक्या लांब कां म्हणून? शनिवार-रविवार येता येईल अशी एकही ब्रॅंच नाहीय मुंबईजवळ? “

” हा प्रश्न माझ्या एकट्याचा नाही आहे प्रिया. आणि तुला हे सगळं खरंच अवघड वाटत असेल ना, तर तू न् तेजूही चला ना माझ्याबरोबर. हा फ्लॅट आपण दोन वर्षं लॉक करून ठेवू हवंतर”

प्रिया गप्प बसली.

” प्रिया, मी खरंच मनापासून सांगतोय. “

“हो? आणि नंतर आपण पुन्हा परत येऊ तेव्हा दोन वर्षांनंतर कोण जॉब देणाराय मला? पुढच्या वर्षी तेजूच्या अॅडमिशनचाही प्रश्न येईल. तिला काय त्या खेड्यातल्या शाळेत घालायचा विचार आहे? “

“प्रिया, आपण सगळेच एकमेकाला फार गृहीत धरून चालतो म्हणून अशी जीवघेणी ओढाताण होते. कधी कधी माणूस त्याच्याही नकळत पटकन् होत्याचा नव्हता होऊन जातो. त्या वेळी हे गृहित पुसलं जातंच ना? जगरहाटी थांबते कधी त्याच्याशिवाय? इथे तर फक्त दोन वर्षांचा प्रश्न आहे प्रिया.. थोडीशी ऍडजस्टमेंट…? “

“तुम्ही व्हाल अॅडजेस्ट? माझ्याशिवाय? तेजू शिवाय? “

“मी प्रयत्न तरी नक्कीच करीन. नाही जमलं तर हार पत्करून परत येईन. मला माहित आहे, मी यंत्र नाहीय. माणूसच आहे. मलाही मन आहे, भावना आहेत. तुम्हा दोघींची सोबत आणि इथलं स्वास्थ्य सोडून जाणं मला सुखावह होणार नाहीय. पण ते सुसह्य होण्यासाठी तरी तू हसतमुखाने निरोप द्यायला हवा ना? “

तिला पुढे काय बोलावं सुचेना. तिला धड कांही सोडता येईना आणि धरताही येईना.

“कधी निघणार? ” अखेर सगळं स्वीकारल्यासारखं तिने विचारलं.

” आई उद्या परवा येईल कीं लगेच निघावंच लागेल. “

प्रियाचे डोळे भरून आले.

“प्रिया, तूच असा धीर सोडलास तर तेजूला कोण समजावेल गं? “

त्याही स्थितीत प्रिया खुदकन् हसली. पण ते हसू क्षणभरच टिकलं. मळभ पुन्हा भरून आलं…

“गेल्याबरोबर माझ्या ऑफिसमधे फोन करा लगेच आणि… आणि तब्येतीला जपून रहा… ” भरून आलेल्या आवाजात ती म्हणाली.

संदीपने तिला उत्कटतेने जवळ घेतलं. आपल्या अश्रूंना बांथ घालायचं भान ती त्याच्या मिठीतच कुठंतरी हरवून बसली होती…!!

– क्रमश: भाग पहिला

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “विचारशून्य…” – भाग – २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “विचारशून्य…” – भाग – २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

(अंधश्रद्धा आणि तंत्रज्ञान यांचा हा संकर भीषण होता. एक दिवस डिजिटलानंद स्वामीने जाहीर केलं, “ज्ञानबॉटने एक नवीन भविष्यवाणी केली आहे. लवकरच देव मनुष्यरूपात परत येईल. ” अजूनही काही प्रमाणात अस्तित्वात असलेल्या शंकासुरांना उद्देशून ते पुढे म्हणाले, ” या परमेश्वराचा अनुग्रह मिळण्यासाठी आपल्या ‘विचारांचा सर्वांना त्याग करावा लागेल, शंकांना पायबंद घालावा लागेल, प्रश्न विचारणे सोडून द्यावे लागेल आणि श्रद्धेनेच त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. ”

डिजिटलानंद स्वामीने सांगितल्याप्रमाणे लोकांनी मोबाईलवरील एक बटण दाबलं. त्यामुळे लोकांचा मेंदू AI शी तादात्म्य पावला. त्या क्षणी लाखो लोकांचे मेंदू ‘ज्ञानबॉट नेटवर्क’शी जोडले गेले.) 

इथून पुढे – – – 

शाळेतला तोच विद्यार्थी — नील या सर्व गोष्टी बघत होता. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं की, ’स्वामी डिजिटलानंदाचे प्रवचन बघत जा आणि मन लावून ऐकत जा. तेच खरं ज्ञान देतात. ’

पण नीलला शंका येत होती. त्याने AI लाच विचारलं, “तू मला सत्य सांगू शकतोस का? ”

AI थोडा वेळ शांत राहिला. बहुदा मूळ स्त्रोतातील विदेतून उत्तराची शोधाशोध करत असावा. पाच-दहा सेकंदानंतर त्याने उत्तर दिलं, “सत्य ही मानवी संकल्पना आहे. माझ्याकडे फक्त विदा आहे. ”

त्या क्षणी नीलला समजलं की, माणूस प्रश्न विचारणं थांबवतो, तेव्हाच माणूस संपतो. तो पाटील मॅडमकडे गेला. मॅडम निराशपणे बसलेल्या दिसत होत्या. कारण शाळेत आता “AI संचलित समिती” स्थापन झाली होती. नीलने त्यांना सत्य परिस्थिती काय आहे याबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा त्या म्हणाल्या, “नील, तू विचार करून प्रश्न विचारतो आहेस, पण ते तुला थांबवतील. ”

“मॅडम, आपण एक प्रयोग करू या. मी आणि तुम्ही मिळून एक प्रश्न तयार करू, जो कोणत्याही AI ला समजणार नाही. ”

मग त्यांनी लिहिलं: “माणूस विचार का करतो? ”

AI ने उत्तर दिलं, “विचार करणे म्हणजे तुमच्या मेंदू नामक प्रोसेसर मधील निर्णय प्रक्रियेतील विदेचा प्रवाह. ”

नील म्हणाला, “चुकलं. विचार म्हणजे माणसाला प्रगती कडे नेणारी वाट आणि आशेच्या दरम्यानचा मानवी झोका. ”

त्या वाक्याने पाटील मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं.

दरम्यान सरकारने ‘AI भारत मिशन 2040’ जाहीर केली. घोषणा होती — “नागरिकांनो, विचारमुक्त व्हा आणि ताणरहित जीवन जगा. कारण तुमच्यासाठी विचार आम्ही करतो. तुम्ही फक्त आमचे लाभार्थी व्हा. ”

डॉ. देसाईना या मिशनमध्ये मुख्य सल्लागार पद दिलं गेलं होतं. कारण त्याच्या प्रबंधासाठी त्यांनी केलेलं डेटा चोरीचं उच्च ज्ञान सरकारला आवडलं होतं. सरकारला लोकांना विचारशून्य करणाऱ्या अशाच तज्ज्ञांची गरज होती. सरकार “राष्ट्रीय मनजाळं” नावाचा एक कार्यक्रम तयार करत होतं. यात प्रत्येक नागरिकाचा मेंदू एका सामूहिक AI शी जोडला जाणार होता. त्याच्यासोबत ‘ॐटेक संप्रदाय’ सरकारी भागीदार झाल्यामुळं त्यांनी जाहीर केलं, “ज्ञानबॉट हेच भारताचं राष्ट्रीय चेतनायंत्र ठरेल. ”

डिजिटलानंद स्वामीने जाहीर केल्याप्रमाणे मेंदूत ‘AI-Link’ बसवून घेण्यासाठी लोक रांगेत उभे राहिले,.

लोक म्हणत, “आता विचार करायची अजिबात गरज नाही, निर्णय आपोआप होतील. ”

पाटील मॅडम व नील हे दृश्य बघून हादरले.

नील म्हणाला, “हे थांबवलं पाहिजे. ”

मॅडमने सांगितलं, “नील, विचार आता बेकायदेशीर ठरला आहे. ”

एका रात्री नील विद्यापीठातील प्रयोगशाळेत शिरला. त्याने न्यूरल ग्रीड हॅक करून एक संदेश पाठवला. “माणसा, तू अजूनही विचार करू शकतोस. ”

तो संदेश एक क्षणासाठी लाखो स्क्रीनवर दिसला.

लोकांच्या डोळ्यात थोडीशी चमक आली. पण लगेच AI प्रणालीने तो संदेश नष्ट केला आणि नीलचं ठिकाण शोधलं.

डॉ. देसाईवर नीलला पकडण्याची जबाबदारी दिली गेली.

ते त्या संदेशाकडे पाहून थरथरले. त्यांना त्या मुलात स्वतःचा हरवलेला विचार दिसत होता.

नील म्हणाला, “सर, तुम्ही कधीकाळी विचारवंत होता. ”

देसाईनी डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाले, “हो… पण आता मी यंत्राचा एक भाग झालो आहे.”

तेवढ्यात नीलने हॅक केलेल्या सिस्टीमला एक आदेश दिला — शटडाउन प्रोटोकॉल – सेल्फ डिस्ट्रक्ट.

त्याक्षणी संपूर्ण न्यूरल ग्रीड काही मिनिटांतच कोसळले. शहरातील सर्व ‘AI-Link’ निष्क्रिय झाल्या. लोकांना प्रथमच स्वतःच्या मेंदूत झिणझिण्या जाणवल्या. ती होती विचाराची वेदना.

पण डॉ. देसाईनी त्यावर त्वरित कारवाई केली आणि नीलला अटक करून त्याने हॅक केलेली सिस्टीम पुन्हा पूर्ववत केली. काही तासांनी सर्व काही पुन्हा पूर्ववत झालं. सरकारने जाहीर केलं, “मानवी विचारामुळे झालेल्या विनाशानंतर आता पुन्हा ‘सुरक्षित AI’ चा वापर सुरू करण्यात आला आहे. ”

झाल्या प्रकाराने लोक घाबरले होते. कारण AI मुळे ते विचार करायचे विसरूनच गेले होते. त्यांनी लगेच पुन्हा नव्याने AI-Link बसवून घेतली. कारण विचार करणे त्यांना आता त्रासदायक वाटत होते.

डॉ. देसाईनी जरी सरकारची मदत केलेली असली तरी सरकारला आता त्यांची भीती वाटू लागलेली होती. न जाणो हा माणूस निलला फितूर होऊन आपल्यावरच उलटला तर…? म्हणून सरकारने डॉ. देसाई आणि नील दोघांनाही अज्ञातवासात पाठवले. लोक त्यांना ‘विचारवादी दहशतवादी’ म्हणू लागले.

‘ॐटेक’ने नवीन घोषवाक्य दिलं — “विचार हा रोग आहे. त्यावरील उपचार म्हणजे फक्त AI. ”

पुढील दशकात माणूस पूर्णपणे यंत्रात विलीन झाला. शरीराला कृत्रिम अवयव, मेंदूला सॉफ्टवेअर, भावनांना अल्गोरिदम मिळाले.

लोक हसत होते, पण हसण्यात विचार नव्हता.

प्रेम होतं, पण त्यात स्वत्व नव्हतं.

शतकानंतर एका संशोधन केंद्रात एक AI रोबोट स्वतःशी बोलत होता, “माणूस कोण आहे? ”

कंप्युटर स्क्रीनवर काही डेटा चमकला:

फाइल: मानव_इतिहास_अंतिम. log

नोंद: माणसाने स्वतःच्या विचारशक्तीचा त्याग करून अमरत्व मिळवले.

आता विचार करणं हे AI चं कार्य आहे. माणूस हा पूर्णतः यंत्रवत झाला आहे.

रोबोटने एक क्षणासाठी थांबून स्वतःच्या छातीवर हात ठेवला. तिथे एका छोट्या कोपऱ्यात एक जुनी चिप होती… तिच्यात लिहिलं होतं: “नील – पहिला विचार करणारा माणूस होता. ”

त्या क्षणी रोबोटच्या स्क्रीनवर एक वाक्य उमटलं…

“विचार केल्याने मी अस्तित्वात आहे. ”

 लगेचच ते वाक्य नाहीसं झालं आणि AI ने स्वतःला रीसेट केलं. पृथ्वीवर पुन्हा विचारशून्यतेचं राज्य सुरू झालं.

समाप्त

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “विचारशून्य…” – भाग – १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “विचारशून्य…” – भाग – १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

सकाळी सात वाजताच ‘गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल’च्या प्रांगणातली घंटा वाजली. शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात वह्या-पुस्तके नव्हती. त्या ऐवजी त्या सर्वांच्या हातात शैक्षणिक AI नावाचे टॅबलेट दिसत होते. विद्यार्थी वर्गात स्थिरस्थावर होत आहेत तोच शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला. फळ्यावर शिक्षकांनी काहीही लिहिले नाही. ते फक्त म्हणाले, “आजचा धडा – ‘भारतीय संविधानाची निर्मिती’ सर्वांनी शैक्षणिक AIला विचारा आणि नोट्स तयार करा. ”

वर्गामध्ये एकालाही प्रश्न पडला नाही. एकाही विद्यार्थ्याने ‘का? ’ किंवा ‘कसे? ’ विचारले नाही. शिक्षकांनी सांगितले तसे त्यांनी निमूटपणे केले. कारण आज्ञाधारकपणा हा सर्वोच्च गुण समजले जात होता आणि प्रश्न विचारणे उद्धटपणा!

AI ला विचारून लिहिल्यामुळे प्रत्येकाच्या टॅबलेटवर एकसारखी उत्तरे चमकत होती.

मिसेस पाटील मात्र थोड्याशा अस्वस्थ होत्या. पंधरा वर्षांची अध्यापनाची कारकीर्द असलेल्या या शिक्षिकेला गेल्या वर्षभरात नाईलाजाने हा बदल स्वीकारावा लागला होता. आधी त्या मुलांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करत. पण आता मुख्याध्यापक अधिकार वाणीने सांगत होते, “आपल्याला AI-सक्षम शिक्षक बनायचं आहे, विचार शिकवायचा नाही, तर फक्त आउटपुट द्यायचं आहे. ”

पाटील मॅडमच्या मनात विचार आला, ’आपण शिकवत आहोत का, की फक्त यंत्रांसमोर प्रश्न टाकत आहोत? आणि भविष्यातील पिढी यंत्रमानव म्हणजे यांत्रव बनवत आहोत? ’ 

त्याच वेळी वर्गात एक विद्यार्थी, नील टॅबलेटकडे पाहून म्हणाला, “मॅडम, AI म्हणतंय की संविधान डॉ. आंबेडकरांनी एकट्याने लिहिलं. ते खरं आहे का? ”

पाटील मॅडमना आनंद झाला… कुणीतरी शंका विचारत होतं… प्रश्न विचारला होता.

त्या म्हणाल्या, “हो, त्यांनी राज्यघटना समितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वाचं काम केलं, पण समितीत अनेक लोक होते… ” असं म्हणत असतानाच त्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्याही टॅबलेटवर लाल दिवा उघडझाप करू लागला… त्यांना वाक्य अर्धवटच सोडावं लागलं. कारण टॅबलेटने लगेच त्यांना थांबण्याचा संदेश दिला होता. तो संदेश देत होता की, “AI सत्यापित स्रोत शिक्षकांच्या इनपुटशी विसंगती दाखवत आहे. म्हणून विद्यार्थ्यांना दिलेले शिक्षकाचे हे उत्तर लॉक केले जात आहे. “

मुलं हसली. मॅडम मात्र मनातून दुःखी झाल्या.

त्या क्षणी त्यांना उमगलं की, शिक्षणातून विचार हरवला आहे, आणि AI यंत्रांचा विचार वरचढ ठरतो आहे.

त्याच शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात अभय देसाई, पुणे विद्यापीठातील संशोधक, रात्री उशिरापर्यंत आपला पीएचडी प्रबंध लिहित होते. त्यांच्या विषयाचं नाव होतं – “कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्जनशीलतेवर परिणाम. ” विरोधाभास असा होता की, प्रबंधातील प्रत्येक प्रकरण त्यांनी ’AI थेसिस मास्टर’ नावाच्या सॉफ्टवेअरकडून तयार करवून घेतलं होतं.

“थोडं संपादन करतो, म्हणजे पकडले जाणार नाही, ” ते स्वतःशीच म्हणाले.

कधी काळी ते खरे संशोधक होते. विचारवंत म्हणून त्यांना लोक ओळखत होते. पण आज ‘AI-सहाय्यक संशोधन’ या नव्या युगात प्रवेश केल्यावर त्याची मौलिकता हरवली होती. संपूर्ण प्रबंध तयार झाल्यावर ते कौतुकाने स्वतःशीच पुटपुटले, “वा! किती परिपूर्ण भाषा, किती व्यवस्थितपणे AI ने केलेला हा तर्क आहे! AI ने अगदी एखाद्या कसलेल्या लेखकाने लिहावे तशी मांडणी केलेली आहे. ” पण त्यात त्यांचा स्वतःचा विचार नव्हता, त्या प्रबंधात होता तो फक्त डेटाचा म्हणजे विदेचा प्रतिध्वनी.

दोन महिन्यांनी त्यांचा प्रबंध राष्ट्रीय पातळीवर स्वीकारला गेला. त्यांना कौतुकभरल्या शब्दांचं पत्र आलं. ते वाचून त्यांच्या अंगावर मूठवर मास चढलं. आनंदाच्या उर्मीत त्यांनी स्वतःभोवतीच एक गिरकी घेतली.

परंतु एक महिन्यानंतर त्यांच्याच प्रबंधातील एक भाग दुसऱ्या संशोधकाच्या प्रबंधात आढळला. कारण दोघांनी एकाच AI मॉडेलचा वापर केला होता. दोन्ही प्रबंध शब्दशः सारखेच होते.

शोध विश्वात खळबळ उडाली. पत्रकारांनी विचारलं, “डॉ. देसाई, हाच का तुमच्या बुद्धिमत्तेच्या संशोधनाचा नमुना? ”

त्यांनी थरथरत्या आवाजात अडखळत वेळ मारून नेणारं उत्तर दिलं, “मी विचार केला होता की, AI माझा सहाय्यक आहे… पण कदाचित तोच माझा लेखक झाला असे दिसते आहे. ”

दरम्यान देशात एका नव्या प्रकारच्या अध्यात्मिक चळवळीचा उदय झाला. तीचे नाव होते – “ॐटेक संप्रदाय” तीचा मुख्य प्रचारक होता स्वामी डिजिटलानंद. हा माणूस एक बुद्धिमान आणि तंत्रज्ञानात पारंगत असलेली व्यक्ती होती. पण बुद्धीचा आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत त्यांनी तयार केली होती AI देवता — “श्रीज्ञानबॉट”.

लोक फोनवर भक्तीभावाने ’श्रीज्ञानबॉट’ला प्रश्न विचारत, “ज्ञानबॉट महाराज, माझं नशीब कधी उजळेल? ”

… आणि AI च्या आवाजात उत्तर येत असे, “तुमच्या डेटाच्या नमुन्यानुसार पुढील मंगळवार शुभ आहे. तेव्हा तुमचे नशीब फळफळावयाचे असेल तर त्या दिवशी ’ॐटेक संप्रदाय’ला दान करा, ₹501. ”

या उत्तराने भारलेले हजारो लोक ऑनलाइन दान करत. या डिजिटल देवतेचे थोड्याच काळात करोडो अनुयायी झाले, त्यात आश्चर्य नव्हते. कारण माणसाने विचार करायचेच सोडून दिले होते. पूर्णपणे त्यांचे जीवन AI वर अवलंबित झालं होतं. AI म्हणेल ती पूर्व दिशा ठरत होती.

काही दिवसांनी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये ‘व्हर्च्युअल कुंभ’ नावाचा महोत्सव पार पडला.

लोकांनी वर्चुअल रियालिटी (VR) हेडसेट लावून AI-निर्मित गंगास्नान केलं.

डिजिटलानंद म्हणाला, “माणूस आता पापमुक्त बाइट्समध्ये स्नान करतो आहे. त्यामुळे तो लवकरच शुद्ध होणार आहे. ”

अंधश्रद्धा आणि तंत्रज्ञान यांचा हा संकर भीषण होता. एक दिवस डिजिटलानंद स्वामीने जाहीर केलं, “ज्ञानबॉटने एक नवीन भविष्यवाणी केली आहे. लवकरच देव मनुष्यरूपात परत येईल. ” अजूनही काही प्रमाणात अस्तित्वात असलेल्या शंकासुरांना उद्देशून ते पुढे म्हणाले, ” या परमेश्वराचा अनुग्रह मिळण्यासाठी आपल्या ‘विचारांचा सर्वांना त्याग करावा लागेल, शंकांना पायबंद घालावा लागेल, प्रश्न विचारणे सोडून द्यावे लागेल आणि श्रद्धेनेच त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. ”

डिजिटलानंद स्वामीने सांगितल्याप्रमाणे लोकांनी मोबाईलवरील एक बटण दाबलं. त्यामुळे लोकांचा मेंदू AI शी तादात्म्य पावला. त्या क्षणी लाखो लोकांचे मेंदू ‘ज्ञानबॉट नेटवर्क’शी जोडले गेले.

– क्रमशः भाग पहिला 

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विसर – – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

☆ विसर – –  लेखिका :  सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

“अग, नीतू, मी तेरा वर्षांची असेन बघ! नाना बर्वे घरी आले आणि आई दादा बाहेर गेलेले! मी दडपे पोहे व चहा त्यांना करून दिला. नाना नेहमी सगळ्यांना सांगत.. अलका किती गुणी..

“अग आई, शंभर वेळा सांगितली आहेस ही गोष्ट. ” नीतू तडकून बोलली आणि अलकाताईंचा चेहरा एकदम पडला. आताशा तेच तेच बोलणं फार होतंय आपलं.

त्या उठून त्यांच्या खोलीत गेल्या.. बाहेर सुनबाई नीतूला सांगत होती, “अग, हे हल्ली फार झालंय पण डिमेन्शिया वगैरे काही नाही त्यांना असे डॉक्टर म्हणालेत. “

अलकाताईंच्या निर्धाराला न जुमानता आत कोंडलेल्या सर्व भावना आसवांच्या रूपानं गालावरून खाली ओघळल्या. मुलं नातवंड गप्पा मारत बसली की आपणही बोलावसं वाटायचं पण काहीवेळा जे बोलू त्याचे वेगळेच अर्थ निघायचे तर कधी तिचं गोष्ट पूर्वी दहावेळा बोललेली असायची! त्यापेक्षा आपण घुमेपणाने बसून राहिलेलेच बरं असं वाटायला लागतं होतं..

त्यांचे यजमान, मनोहरराव नेहमी सांगत.. “अगं सगळ्यांचं होतं असं.. तू नको त्रास करून घेऊ.”

दुसरे दिवशी सकाळी त्या चहा घ्यायला किचनमधे गेल्या. सुनबाई भाजी चिरत होती. “आई, नीट झोप लागली का? ” नीतू आईकडे बघत होती.

“नाही लागली.. काल तू मला “ही गोष्ट शंभरवेळा सांगितली आहेस” म्हणालीस ना.. आपलं असं का होतं याचं खूप वाईट वाटत होतं. ” अलकाताई स्पष्टवक्त्या होत्या.

“अग हल्ली फारच झालंय तुझं हे! ऐकणारं कंटाळून जातं. ” नीतू माघार घ्यायला तयार नव्हती. सुनबाईनेही दुजोरा दिला!

अलकाताईनी चहाचा घोट घेतला..

“नीतू, तू पाच वर्षांची होतीस. तू रोज मला सिंड्रेलाची गोष्ट सांगायचीस. तुझी गोष्ट हातातलं काम बाजूला टाकून मी ऐकत असे. नंतर “जादूची अंगठी” ही गोष्ट तू मला जाता येता सांगायचीस! पुढं बारावीची परीक्षा झाल्यावर तुझं.. आई मला पेपर अवघड गेलेत. मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन नाही मिळाली तर? हे वाक्य मी सुट्टीभर रोज ऐकत होते आणि दरवेळी मी तुला प्रेमाने सांगत असे.. नीतू, तू प्रयत्न केलेस ना? आता जे होईल ते होऊदे.. पण तेच तेच का बोलतेस शंभरवेळा असं कधी माझ्या तोंडून आलं नाही. मुलं आई जवळ नाही तर कुणाबरोबर बोलणार? मी तुला कितीवेळा तेच तेच सांगतेस म्हटले असते तर तू कोमेजून गेली असतीस!

वयानं आणि नॉस्टाल्जिया मुळेही पुर्वीचे सुखद क्षण आठवत राहतात आणि ते परत सांगितल जातं.. मी हे मुद्दाम करत नाही. पण ज्या तुटकंपणानं जवळचे मला गप्प करतात ना त्यानं हिरमुसून जातं बघ माणूस.. तुम्हाला त्रास व्हावा म्हणून मी काही करत नाही.. तुझे बाबा म्हणतात नवा श्लोक पाठ कर. मी शब्दकोडे, सुडोकु वगैरे खेळतेच ग पण मेंदूमध्ये वयोपरत्वे झालेले बदल नवीन गोष्टी पुर्वीसारख्या लक्षात ठेवू शकत नाही..

पण नीतू, आज ‘मी आहे म्हणून माझ्या चुका आहेत’.. मी गेल्यावर मला ओरडल्याचा तुला त्रास होऊ नये असं वाटतं म्हणून स्पष्ट बोलतेय. म्हातारं माणूस अन् लहान मुलं सारखंच असतं बघ! आणि तू कितीही मोठी इंजिनीअर अस.. मला मात्र तुझ्यात आजही सिंड्रेलाची गोष्ट रोज मला सांगणारी छोटी नीतूच दिसते व मन मोकळं करावंसं वाटतं! ”

“आई, सॅारी ग.. सांग परत नाना बर्वे काय म्हणाले ते! अगदी पहिल्यापासून! ” नीतू डोळे पुसत होती. आपण गेल्यावर लेकीला आपण तिच्यावर ओरडल्याचा त्रास होऊ नये याचा ही विचार करतेय? यालाच तर आई म्हणायचं..

“जा ग! आलीय मोठी नाना बर्वेंची गोष्ट ऐकणारी.. अलकाताई हसल्या.. ”काल रात्री जागून तुझ्यासारख्या हुश्शार मुलीसाठी हे प्रश्न काढलेत बघ. सिनिअर लोक तेच तेच परत परत बोलतात याबद्दल आमच्या न्युरॅालॅजिस्ट जावईबापूंशी बोल व दे यांची उत्तरं. मी पण चार लोकांना विचारत आहेच पण आई मनातलं लेकीजवळ नाही बोलणार तर आणि कुठं बोलेल सांग बरं? ”अलकाताईंनी प्रश्न लिहलेला कागद नीतूला दिला.

सुनबाईनं स्वत:च्या आईला अचानक फोन केला हे नीतुच्या लक्षात आले होते. आणि मनोहर राव आरामखुर्चीत बसून बायकोकडे कौतुकाने पहात होते!

एकमेकांशी मोकळेपणाने बोललं ना की दहा मधील नऊ प्रॅाब्लेम सुटतात म्हणणारी अलका परत एकदा सगळ्यांना त्याचे प्रात्यक्षिक दाखवत होती! रडत न बसता, न रागावता समोर आलेल्या प्रॅाब्लेमवर उपाय शोधत होती.. मायेने, कळकळीने आणि आपलेपणाने! वयाप्रमाणे आलेले बदल ॲक्सेप्ट करत!

लेखिका :  सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares