☆ तुका म्हणे – पुढीलाचे इच्छी पळ… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
पुढिलाचें इच्छी पळ /
नाहीं बळ ते अंगीं //१//
*
संत गेले तया ठाया /
देवराया पाववीं //२//
*
जेष्ठांची कां आम्हा जोडी /
परवडी न लभे //३//
*
तुका म्हणे करीं कोड /
पुरवी लाड आमुचा //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
तुकाराम महाराजांनी स्वतःच अंतर्मुख होऊन स्वतःला पूर्ण रुपाने जणून घेतले होते. आपल्याच आपल्यावर पडलेल्या मर्यादा ते ओळखून होते. म्हणून अगदी खुलेपणाने मनमोकळे व्यक्त होताना ते म्हणतात. मनात खूप काही प्रबळ इच्छा आहेत. पण त्या इच्छांचे मिळणारे फळ प्राप्त करून घेण्यासाठी लागणारे बळ मात्र अंगी नाही. महान संत जेथे पोहचले तेथे आपणही पोहचावे असे सारखे वाटत रहाते ते आपणाकडून मला मिळावे म्हणूनच मी आपणाकडे आलो आहे. त्यासाठी तुम्ही मला पावन व्हावे. या बाबतीत जेष्ठ आणि श्रेष्ठ असणा-या मंडळीची जोड मला मिळाली तर आयुष्यभर आमची होणारी परवड तरी टळेल. येवढ्यासाठी तरी देवा तुम्ही मला पावन व्हा आणि माझे लाड पुरवणारे व्हा.
मनात बाळगलेले ध्येय गाठण्यासाठी पाठीशी ईश्वरी कृपा असलीच लागते. येवढ्याच साठी महाराज देवाकडे ही आग्रहाची मागणी करत आहेत.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे… नुकतंच नवरात्र झालं होतं आणि कोजागरी पौर्णिमा जवळ आली होती. मी बँकेतर्फे एका ट्रेनिंगसाठी नाशिक ट्रेनिंग सेंटरला गेलेली होते. दसऱ्याला सुट्टी होती म्हणून त्या एका दिवसासाठी घाईघाईने घरी जाऊन परतले होते… पण यावर्षी नेहेमीसारखी कोजागरीची रात्र साजरी करता येणार नाही म्हणून जरा हुरहुरल्यासारखं वाटत होतं…
…. रात्री झोप येत नव्हती म्हणून रूमच्या खिडकीतून आकाशाकडे बघत बसले होते… हा माझा जुनाच छंद होता म्हणा… मुक्त विहरणाऱ्या ढगांमुळे आकाशात उमटणारे वेगवगळे आकार, त्यातून मधेच डोकावणाऱ्या चांदण्या, वडलांनी बघायला शिकवलेली नक्षत्रं… हे सगळं बघण्यात मन नेहेमीच खूप रमायचं… तर त्या वर्षी पाऊसही थोडा रेंगाळलेला होता… आकाशात पावसाचे ढग रेंगाळतांना दिसत होते… आणि मधूनच अचानक त्यातून चंद्र डोकावतांना दिसला…मध्येच झाकला जात होता…परत दिसत होता…कधी अर्धा…कधी पुरता… या चंद्राला पाहून आजवर कितीतरी कवींना वेगवेगळे अर्थ ध्वनित करणारी काव्यं सुचली आहेत, आणि ती सुचतच रहातील असा जणू ‘प्रेमाचा साक्षीदार’च करून टाकलाय त्याला कायमचा.
… ’पण या चंद्राला जर बोलता आलं असतं तर काय म्हणाला असता हा?’ …त्याच्याकडे बघता बघता अचानक मनात आलं होतं… मग हाच विचार कितीतरी वेळ डोक्यात घोळत राहिला होता आणि जराशाने काही ओळी आपसूक सुचल्या… ती ही कविता …
☆ चंद्र… ☆
काल सहज फिरता फिरता रस्त्यात एक गंमत झाली
एका वळणावर जरा आडोशाला, मला चंद्राची पालखी दिसली ॥
*
आत चंद्र होताच, पण बसला होता चेहरा पाडून
तो उदास निस्तेज चेहेरा पाहून, मी गेले चक्रावून ॥
*
नेहेमीचे ते सुंदर रुपडे, आठवले मग क्षणात
नकळतच माझ्याही, अन् गलबलले मग मनात ॥
*
घाबरतच गेले जवळ त्याच्या, खांद्यावर थोपटले
स्पर्शातल्या माझ्या विश्वासाने, बोलते त्याला केले ॥
*
खिन्न उद्विग्न मनात त्याच्या वादळ होते घोंघावत
कुठून आलो इथे, म्हणून मन होते पस्तावत ॥
*
म्हणे कशी सांगू तुला, व्यथा माझ्या मनीची
सारेच इथे स्वत:त गर्क, खंत नाही कशाची ॥
*
निवांत रम्य वेळ साधून, आलो सागराला भेटायला
मला पाहून चक्क तो, मागेच लागला हटायला ॥
*
मला पाहून मनात त्याच्या उर्मी उठतात ऐकलं होतं
प्रत्यक्षी पण खरं त्याचं, रूप काही वेगळंच होतं ॥
*
दु:खी कष्टी झालो आणि, नाद त्याचा सोडला
माझ्या साक्षीने प्रेम करणाऱ्या माणसांचा रस्ता धरला ॥
*
इथेही पण घोर निराशाच, आली माझ्या वाट्याला
विचारपूसही करायला, तो वेळच नाही कोणाला ॥
*
दुरूनच पाहून नाक मुरडून कुजबूज काहीतरी
खडबडीत माझा चेहरा त्याची.. किळस म्हणे वाटते भारी ॥