☆ “निरोगी रहा ” – लेखक / लेखिका : वैद्य परीक्षित शेवडे / वैद्य स्वराली शेंड्ये ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : निरोगी रहा
लेखक: वैद्य परीक्षित शेवडे
वैद्य स्वराली शेंडये
पृष्ठ: १२८
मूल्य: २२०₹
Prevention is better than cure म्हणजेच “आपण रोगाच्या प्रतिबंधाबाबत उपचारांपेक्षा अधिक सजग असायला हवं” हे आजच्या घडीला जगन्मान्य तत्त्व आहे. हा प्रतिबंध करण्याचा मार्ग म्हणजेच आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या. या दोन्हींचं पालन आजच्या काळात कसं शक्य आहे, त्यातील तपशील, खाचखळगे यांसहच काही सोप्या पथ्याच्या रेसिपी, मानसिक आरोग्याची काळजी अशी पुरेपूर उपयुक्त माहिती असलेलं पुस्तक म्हणजे “निरोगी रहा”
दैनंदिन जीवनात निरोगी आणि संतुलित राहण्यासाठी आयुर्वेदाच्या तत्त्वांवर आधारित मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक. आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने उपाय सांगण्यात आले आहेत.
या पुस्तकात आहार, दिनचर्या, मानसिक स्वास्थ्य, रोगप्रतिबंधक सवयी आणि नैसर्गिक आरोग्य व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान आणि आजच्या जीवनशैलीचा समतोल साधणारे हे पुस्तक प्रत्येक कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल.
पुस्तकातील वैशिष्ट्ये
— निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदिक मार्गदर्शन
— दैनंदिन आरोग्य टिप्स आणि सवयी
— मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याविषयी माहिती सोपे, व्यावहारिक आणि प्रभावी उपाय
.. सर्व वयोगटांसाठी उपयुक्त मार्गदर्शक.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘भगवद्गीता’ हा महाभारतातील एक भाग आहे. संस्कृतमधील सातशे श्लोकांचे ज्ञानेश्वरांनी सुमारे नऊ हजार ओव्यांत रूपांतर केले. प्रश्न असा पडला, आपण याचं संक्षिप्त रूप कसं करायचं? भगवद्गीतेत काय आहे, सोप्या भाषेत समजून घ्यावं, असं ठरवून मी ‘गीता’ वाचत राहिले. समजलं ते लिहायचं ठरवलं आणि लिहायला घेतलं. लिहीत राहिलं तर वाटत होतं अजून अपूर्ण आहे. तहानच भागेना. या निमित्तानं समजून घेतलेलं लिहीत गेले. मुलांसाठी ती एक युद्धकथा आहे आणि मुलांना युद्धकथा आवडतात, पण ही युद्धकथा इतर युद्धांपेक्षा वेगळी आहे. कारण या युद्धकलेत रणांगणावर सगळे असतात, पण युद्धच सुरू होत नाही. आपल्याला वाटेल की, मग कौरवांनी युद्धाला सुरुवात करायची ना! अठराव्या अध्यायापर्यंत कृष्ण, अर्जुनाला, त्याच्या गोंधळलेल्या, निराश झालेल्या मनाला, मारू की मारू नको, या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी तयार करतो. अशी अवस्था मुलांची होते, पण कृष्ण ज्या पद्धतीने अर्जुनाला युद्धासाठी तयार करतो, ती पद्धत खूप महत्त्वाची वाटते. कृष्ण आज्ञा करत नाही, सक्ती करत नाही, तर कृती मागील कारणमीमांसा करताना दिसतो. अर्थात हे सारं तत्त्वज्ञान मुलांसाठी सोपं करताना अवघड होतं.
हजारो वर्षांपूर्वी लिहिलेलं महाभारत आजही तेवढंच आपल्या जीवनाला व्यापून आहे. आजच्या काळात अनेक ठिकाणी मुलं ‘गीते’तील काही अध्याय पाठ करताना दिसतात आणि अनेक मोठ्या माणसांची संपूर्ण ‘गीता’ पाठ असते, पण आजच्या विज्ञान युगात मुलांना अर्थ समजणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. असं वाटलं, की प्रत्येक अध्यायाचा अर्थ, त्यांतील तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मुलांना सांगितलं, तर मुलांना भगवद्गीतेत रुची वाटू शकेल. काळ बदलला तरी आपली अवस्था आणि अर्जुनाची अवस्था एका पातळीवर सारखीच आहे. फक्त गरज आहे ती अवघड असलेली कृष्णाची भूमिका घेण्याची. म्हणून जेवढ्या सोप्या भाषेत सांगता येईल, तेवढ्या सोप्या भाषेत सांगायचा हा प्रयत्न आहे. संस्कृत भाषेबद्दल आदर असूनही, कुठेही शक्यतो संस्कृत शब्द वापरला नाही. अध्यायाचा मुलांना समजेल अशा भाषेत तो अध्याय आणि अध्यायाच्या शेवटी चौकटीत तत्त्वज्ञानाची जमेल तेवढ्या सोप्या भाषेत, वैचारिक मांडणी केली आहे.
– लेखिका रेणू दांडेकर
– – – बाहेरच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नुसती पोटार्थी विद्या संपादन न करता खऱ्या अर्थाने ज्ञान संपादन करण्याची गरज आहे. त्यासाठी प्राचीन ज्ञान-वारशाशी नाळ जोडली पाहिजे. हा वारसा म्हणजे प्राचीन काळात लिहिले गेलेले ग्रंथ. वेद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांसारखे ग्रंथ म्हणजे जीवन कसे जगले पाहिजे, याचे ज्ञान देणारे भांडारच! आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले, तरी हताश न होता आपले कर्म म्हणजेच काम निष्ठेने करणे, मूल्यांना, तत्त्वांना धरून जगणे, निसर्गाचा, आपल्या आजूबाजूच्या सजीवांचा विचार करणे किती आवश्यक आहे, याचे ज्ञान या ग्रंथांतून मिळते. माध्यमिक ते महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्कारक्षम वयात या ज्ञानवारशाचा अभ्यास करावा, त्यातून त्यांच्यावर भावनिक आणि तात्त्विक संस्कार व्हावेत, या उद्देशाने या पुस्तक संचाची निर्मिती रेणू दांडेकर यांनी केली आहे. तत्त्वज्ञानाचा हा वारसा आपण जपावा आणि पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित करावा, यासाठी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्याचा या पुस्तकाचा प्रयत्न आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘अष्टदीप ’ – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : अष्टदीप
लेखक – श्री. विश्वास देशपांडे,
एकूण पृष्ठ 300
प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे
सदर पुस्तकात आठ प्रेरणादायी ‘भारतरत्नांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री प्रथमेश नाझरकर यांनी केले आहे ते अत्यंत समर्पक व आकर्षक आहे ते बघितल्यावर लहानपणीचे थोरांची ओळख व लहान पुस्तकांची चरित्रमाला आठवते. पण या पुस्तकात अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल माहिती समजते. लेखकाची भाषाशैली सोपी, सरळ, सुटसुटीत व ओघवती आणि आबालवृद्ध सर्वांना आकलनास अत्यंत सोपी आहे. ती वाचकांना आपलेसे करणारी आहे. वाचक त्यात रंगून जातात.
पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत आठ भारतरत्नांची नावे त्यांच्या व्याक्तिमत्वातील वैशिष्ठयांसह दिसतात.
त्या नंतर आपण लेखकाचे मनोगत वाचू शकतो. खरे तर बरेचदा मनोगत, प्रस्तावना वाचले जात नाही. परंतु मनोगताची सुरुवात “आपला भारत देश म्हणजे नररत्नांची खाण आहे. हे वाक्य पुढचे मनोगत वाचण्याची उत्सुकता वाढवते. हे मनोगत काही संस्कार देते व लेखकाच्या वाचन, लेखन याचा प्रेरणास्त्रोत सांगते.
श्री विश्वास विष्णु देशपांडे
अष्ट म्हणजे आठ. या आठ महान व्यक्तिंनी दिव्याप्रमाणे उजळून, वाती प्रमाणे जळून निस्वार्थीपणे भारताला उजळून प्रकाशमान करून टाकले. लेखकाच्या भाषेत सांगायचे तर, ‘या सर्वांना आपल्या आयुष्यात अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली नैतिक मूल्ये ढळू दिली नाहीत. किंवा ते निराश झाले नाहीत. हे वर्णन करताना पुढील समर्पक काव्यपंक्ती योजल्या आहेत. “आली जरी कष्टदशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर। त्यामुळे हे मनोगत वास्तव व रंजक झाले आहे.
हे पुस्तक म्हणजे फक्त जन्म, मृत्यू व त्रोटक कार्य सांगणारे साधारण चरित्र किंवा निबंध नाही. तर आठ भारतरत्नांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यात आपले विचार जोडून व्याक्तिंकडून वाचकांनी काय घ्यावे, त्यांचे आदर्श कसे रूजवावेत हे सगळे सहज सांगावे अशा ओघवत्या शैलीत सुचवले आहे. लेखकाची शब्द क्षमता, लेखणी सामर्थ बघून ते ‘सिद्धहस्त’ लेखक अहेत हे जाणवते. या आठ भारत रत्नांना जी अर्थपूर्ण विशेषणे वापरली आहेत त्यातून हे लक्षात येते.
मनोगता नंतर ‘प्रेरणादायी व संस्कारक्षम पुस्तक’ हे पुस्तका विषयी विशेष माहीती देणारे श्री. लक्ष्मीकांत देशमुख लेखक व माजी संमेलनाध्यक्ष यांचे विचार वाचायला मिळतात. हा लेख अतिशय वाचनिय व पुस्तकाचे यथार्थ महत्व विशद करणारा आहे. या नंतर आपल्या समोर अतिशय महत्वाची माहिती सांगणारा लेख येतो. तो म्हणजे ‘भारतरत्न पुरस्काराविषयी थोडेसे’ हे सगळे लेख मुख्य पुस्तक वाचण्याची प्रेरणा देतात. व उत्सुकता वाढवतात. यात प्रत्येक व्यक्तिचे नाव त्यांच्या मुख्य वैशिष्ठयासह वाचायला मिळते. प्रथम आपल्या भेटीला येतात – निश्चयाचा महामेरु महर्षी धोंडो केशव कर्वे.
लेखाचे नाव वाचताच लक्षात येते, अतिशय प्रतिकुल परिस्थितीत
अचल निश्चय असणारे व ठाम ध्येय ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व. त्यांनी विधवांचे पुनरुत्थान करून व स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना जगात वेगळेच स्थान मिळवून दिले आहे. या काळात समाजाचा झंझावातरूपी विरोध सहन करून हे कार्य करणे, या साठी ठाम निश्चयाचा अचल महामेरूच पाहीजे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत सुरु झालेली छोटी संस्था आज मोठ्या वटवृक्षात रुपांतरीत होऊन अनेक महिलांना सक्षम बनवून त्यांना समाजात ठामपणे उभे करत आहे. त्यांचे हे कार्य लेखकाने इतके प्रभावीपणे मांडले आहे, की त्या काळातील परिस्थतीची वास्तवता लक्षात येते आणि आपण नतमस्तक होतो.
या नंतर बालपणीच देशाचा विचार करणारे, हित जपणारे द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरैया यांचे चरित्र समोर येते. यांना लहानपणी मामाकडे राहून शिक्षण पूर्ण करावे लागले. पण हुशारीच्या आड कोणत्याही गोष्टी येत नाहीत. याच बालवयात धबधबा बघताना त्यांची प्रतिक्रिया इतर मुलांप्रमाणे नव्हती. तर या द्रष्ट्या बालकाच्या मनात असा विचार होता, “केवढा हा पाण्याचा व शक्तीचा अपव्यय, याचा काही उपयोग नाही का करता येणार? मोठा झाल्यावर मी नक्कीच काहीतरी करणार, ” आणि हाच विचार त्यांनी मोठेपणी अंमलात आणला. व आपल्या कार्य कर्तृत्वाने पाणी, बंधारे, कालवे यावर प्रयोग व संशोधन केले. जे आजही आपल्याला उपयोगी पडत आहेत. आणि त्यांना काही पर्याय नाहीत. त्यांची शिस्त, वक्तशीरपणा विविध कार्य, त्यांच्या काही इमारती, वृंदावन गार्डन या विषयी अत्यंत आदरपूर्वक लिहीले आहे.
पुढे आपण भेटतो, ते भारत एकसंध करण्याच्या कामी अत्यंत मोलाची कामगिरी करणारे- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना. यांच्या कार्याचा व लोहपुरुष या विशेषणाचा अत्यंत सखोल अभ्यास करून कार्यपट समोर ठेवला आहे.
५६५ संस्थाने किती प्रयत्न पूर्वक आपल्या बुध्दिमत्तेने एका छताखाली आणली व त्या साठी काय काय करावे लागले, याचे अगदी बारकाईने वर्णन वाचायला मिळते. म्हणूनच ते भारताचे ‘लोहपुरूष’ या नावाने ओळखले जातात. भारताची एकता व अखंडता या साठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. हे सगळे वाचताना या लोहपुरुषाचे प्रयत्न, विचार यांचे समग्र दर्शन घडते. व हे व्यक्तिमत्व नसते तर काय घडले असते या विचाराने आपला थरकाप उडतो. हे सगळे वाचताना आपण किचकट इतिहास वाचत आहोत असे कुठेही वाटत नाही. यातच लेखकाच्या लेखणीचे व अवघड विषय सोपा करून सांगण्याचे कसब लक्षात येते.
द्रष्टा उद्योगपती जे आर डी टाटा
यांचे वर्णन करताना लेखक. ओबड धोबड दगडातून मूर्ती घडवणारा शिल्पकार, हिऱ्याला पैलू पाडणारा जवाहिर असे शब्द वापरतात. भारतात साखरे प्रमाणे विरघळून जाणे इथपासून टाटांचे खरे देशप्रेम व कार्य याची माहिती मिळते. यांचे चरित्र म्हणजे रत्नांची खाणच! असे वर्णन लेखक करतात. द्रष्टा उद्योगपती आपल्याला सोदाहरण वाचायला मिळतो. त्याच बरोबर सच्चा देशभक्त, गुणी माणसांची कदर, पारख असणारा, अनेक उद्योगांची टाटा समूहात भर घालणारा, माणसांचे गुण हेरुन त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारा माणूस हळवा व कुटुंबवत्सल होता हे या लेखातून समजते. यानंतर आपण भेटतो जशा व्यक्तिला, ज्यांची घोषणा लहानपणी पासून सगळीकडे देतो ती म्हणजे ‘जय जवान जय किसान, ते म्हणजे निर्मळ चारित्र्याचे धनी (साधी रहाणी, उच्च विचार सरणी असलेला नेता) लाल बहादूर शास्त्री. यांचे जीवन समजणे व समजून घेणे आणि अंमलात आणणे सगळ्याच गोष्टी अवघड आहेत. परंतू लेखकाने अत्यंत सोप्या नेमक्या व नेटक्या शब्दात सांगीतले आहे. १९४२ ची चळवळ त्यांचा तुरुंगवास, घरची साधी रहाणी, चीनचा विश्वासघात, भारत नेपाळ संबंधात फूट, हजरतबल प्रकरण, रेल्वे अपघात असे अनेक कसोटीचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले. पण या सर्वांना समर्थपणे तोंड कसे दिले. व त्यातून त्यांच्या निश्चयी स्वभावाची व उच्च कर्तृत्वाची ओळख अतिशय आदर व कौतुकाने करून दिली आहे.
अजातशत्रू नेता अटलबिहारी वाजपेयी अगदी उचित ‘विशेषण योजून या भारतरत्नाची ओळख करुन दिली आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्याच कवितेच्या ओळींमधून सांगीतल्या आहेत. ‘यमुना तट, टीले रेतीले, माँ के मुँह में रामायण के दोहे – चौपाई रस घोले।’
त्यांचे ग्वाल्हेरचे शिक्षण या पासून ते त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेत त्यांच्या घरी जाऊन दिलेल्या सर्वोच्च पुरस्कारा पर्यंत लेखक आपल्याला प्रवास घडवतात. हे सगळे लेखकाच्या अनोख्या शैलीत पुस्तकात वाचणे अधिक योग्य ठरेल.
या नंतर आपल्या समोर येते गान कोकीळा, भारताची शान आनंदघन लता मंगेशकर
सर्वच भारतीयांना जिचा अभिमान आहे. जिच्या सुरांनी सर्वावर मोहीनी घातली आहे. जगभरात हा सूर निनादतो. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी ऐकू येतो आणि जवळीक साधतो असा सूरी जणू या हारातील ‘तन्मणी! या स्वरलतेचे बालपणी पासूनचे टिपलेले सुंदर बारकावे व त्यातून घडलेले संस्कार खूपच वाचनिय आहेत. लता नामक महावटवृक्षाचा एकंदर जीवन प्रवास मांडणे म्हणजे ‘शिवधनुष्य पेलणे आहे. पण लेखकाने ते आपल्या लेखणीने समर्थपणे पेलले आहे. त्यांची सांगीतीक कारकिर्द अतिशय सुंदर व मनोवेधक पध्दतीने उलगडून दाखवली आहे.
सर्व बारकावे वाचताना लेखक दर्दी व संगीतप्रेमी आहे, हे लक्षात येते. सदर पुस्तकातील जास्त पाने ‘लतागान’ गुणगुणत आहेत असे जाणवते. तिच्या गाण्याचे रसग्रहण करताना ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ… ‘ या अभंगाचा आधार घेऊन लता नामक स्वरकमलाकडे रसिक श्रोते भ्रमराप्रमाणे कसे आकर्षित होतात ते सांगितले आहे. या स्वरसाम्राज्ञीला शेवटी भा. रा. तांबे यांच्या शब्दात भावपूर्ण श्रध्दांजली वाहतात. या पुस्तकात शेवटी आपण भेटतो ते उज्वल भारताचे
स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांना.
त्यांचे कष्टमय बालपण, निःस्वार्थीपणे केलेली देशसेवा, त्यांचे विद्यार्थी प्रेम, त्यांची रुद्रवीणा वाजवण्याची आवड. त्यांनी लिहीलेली प्रेरणादायी पुस्तके हे सर्व बारकावे वाचायला मिळतात. त्यांची अपार विज्ञाननिष्ठा सर्वपरिचित आहे. शिवाय ते दररोज कुराण व भगवतगीता यांचे पारायण करतात. त्यांच्या आगळ्या वेगळ्या कार्यशैली मुळे ते राष्ट्रपती कसे बनले हे सर्व लेखकाच्या दृष्टीतून व सिद्धहस्त लेखणीले
लिहीलेले वाचणे अधिक योग्य आहे.
सदर ‘अष्टदीप’ पुस्तक आपल्या मनात हे आठदीप उजळून आपल्याला प्रकाशमान करून टाकतात.
या पुस्तकाला नुकताच ‘तितिक्षा इंटरनॅशनलचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मी हे पुस्तक का वाचले?
एकदा रेडिओवर संगीत व माहिती यावर आधारित कार्यक्रम ‘आनंदघन लता मंगेशकर’ ऐकला. त्यातील निवेदक अतिशय शांत, धीरगंभीर आवाजात दिदींची माहिती सांगत होते. व त्यांनी हजारो गाण्यातून निवडलेली प्रसंगा नुरूप गाणी लावत होते. चौकशीअंती समजले की या कार्यक्रमाचे लेखन, सादरीकरण करणारे लेखक श्री विश्वास देशपांडे आहेत आणि हे लेखन त्यांच्या ‘अष्टदीप पुस्तकातील आहे. त्यानंतर हे पुस्तक उत्सुकतेने वाचले, तर अतिशय सुंदर चरित्रे समोर आली. याच लेखकांची दहा पुस्तके प्रकाशित झाली अहित. व त्यातील ललित लेखाचे व रामायण महत्व आणि व्याक्तिविशेष याचे सादरीकरण रेडीओवर होत असते. त्यांची सगळीच पुस्तके अत्यंत सकारात्मक, अभ्यासपूर्ण, निरीक्षणात्मक असतात. भाषा अत्यंत सोपी, सहज असते. त्यामुळे ती आपल्याला आपलीच वाटतात.
अशीच अजून पुस्तके यावीत आणि आपण सर्वांनीती आवर्जुन वाचावित. या सदिच्छेसह धन्यवाद!
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
लोकव्रत प्रकाशन, पुणे यांनी मुगल-ए- आजम हे डॉक्टर मीना श्रीवास्तव यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे .आपण बरेचदा बघतो की एखाद्या कथेवर, नाटकावर, कादंबरीवर आधारित चित्रपट बनतो.पण इथे उलटे झालेले आहे की, एका चित्रपटांवर पुस्तक निघालेले आहे. चित्रपटाचे लेखिकेने अत्यंत चोखंदळ रसिका प्रमाणे परीक्षण केलेले आहे . यात नुसतं चित्रपट परीक्षण नाही तर ते कलाकारांनी सादर केलेल्या कलेचे परीक्षण तसेच या चित्रपटाचे परीक्षण करताना त्या योगाने आलेले चांगल्या चित्रपटाचे ही संदर्भ त्या देतात. त्यामुळे तसं पाहिलं तर चित्रपट रसिकांसाठी हे पुस्तक म्हणजे खजिना आहे.
डॉ. मीना श्रीवास्तव
तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार, कोल्हापूर हा पुरस्कार या पुस्तकांसाठी मीनाताईंना मिळालेला आहे, ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.
डॉक्टर मीना श्रीवास्तव यांचे हे पहिले मराठी पुस्तक आहे, त्यांनी स्वतः लिहिले असे. तसे पाहिले तर त्यांनी’ महर्षी वाल्मिकी’ तसेच ‘रामायण ‘या दोन विश्वास देशपांडे लिखित मराठी पुस्तकांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद केलेले आहे. हे वाचताना त्यांचे इंग्रजी आणि हिंदी भाषेवरचे प्रभुत्व तर वाखाणण्याजोगंआहेच. परंतु या पुस्तकातून त्यांची सुंदर मराठी ही दिसून येते. ही मराठी लिहीत असताना त्यांनी त्या चित्रपटाच्या अनुषंगाने येणारे हिंदी, उर्दू आणि फारसी भाषेतील शब्दांचा सढळ हाताने वापर केला आहे. कारण की ‘मुगल- ए- आझम हा चित्रपट मुगल दरबारातील राजपुत्र सलिम आणि नर्तिका अनारकली यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे .त्यामुळे त्या लिखाणांमध्ये बरेच उर्दू शब्द येतात आणि ते त्या ठिकाणी चपखल बसतात. कुठेही ते वाचताना रसभंग होत नाही .या उलट त्यांनी व्यक्त केलेल्या भावना किंवा विचार त्या शब्दांनी अजून ठळकपणे मांडल्या जातात. याची कथाही त्या सुरसपणे मांडतात.
हे पुस्तक वाचत असताना त्यांना चित्रपट दिग्दर्शक आसिफ याविषयी असलेला आदर तसेच मधुबाला विषयी असलेले जिव्हाळा आणि प्रेम व्यक्त होते .या पुस्तकातील त्यांचे एक वाक्य कायम लक्षात राहण्यासारखे आहे. कारण की ‘मधुबाला सौंदर्याची पुतळी म्हणून सगळेजण मानतात परंतु तिच्या सौंदर्या बरोबरच तिचा सशक्त आणि समृद्ध करणारा अभिनय आहे’ हे पण लेखिकेनेचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मधुबालानं बरेचदा आजारी असतांना ऑक्सिजन सिलेंडर लावून चित्रपटात काम केलं, यावरून त्या चित्रपटाविषयी एकंदरच कामाविषयी तिचे असलेले समर्पण दिसून येतं. त्यामुळे हा चित्रपट असो आणि या चित्रपटाचे संपूर्ण पडद्यावरचे आणि पडद्यामागच्या टीमची मेहनत, त्यांनी केलेले परिश्रम म्हणजे हे पुस्तक.
दिग्दर्शक आसिफ याच्या कार्याला ,मेहनतीला, दिग्दर्शनाला,गुणग्राहकतेला तसेच चांगुलपणाचा ध्यास, जे जे करेल ते ते चांगलंच करणार या, उत्तमोतमाचा ध्यास घेणा-या त्याच्या वृत्तीला सलाम !संवाद लेखन असो, गायिका असो दिग्दर्शन असो ,फोटोग्राफी असो या सर्व बाबतीत उत्तमतेचा त्याने ध्यास घेतला होता आणि त्या संदर्भातली सगळे किस्से लेखिकेने खूप छानपणे उलगडून दाखवलेले आहे. खरोखरचे युद्ध वाटावे म्हणून सैनिकांची तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही के कृष्ण मेंनन यांच्या परवानगीने घेतलेली मदत, हा प्रकार ही काहीतरी वेगळाच आहे. तसेच ‘प्यार किया तो डरना क्या!’ च्या वेळेचा सेट चित्रपट संपल्यानंतर गुरुदत्तने तो सेट भाड्याने घेतला आणि असाही त्याचा उपयोग केला .दोन वर्ष त्या शिशमहलच्या सेटचं प्रदर्शन चालत राहिलं. तब्बल ७७ आठवडे तो चित्रपट मराठा रंगमंदिर, मुंबई मध्ये चालला .त्या काळात सर्वात जास्त कमाई केलेला तो चित्रपट होता .हा चित्रपट जसां आसिफचं वर्षानुवर्ष उराशी बाळगलेले स्वप्न होते. तसेच हा चित्रपट हे लेखिकेच्या भावाविश्वाचे स्वप्न होते आणि या चित्रपटाविषयी त्याचं दिग्दर्शन, कला, गाणी, गायक, प्रत्येक अंगाविषयी, त्या चित्रपटाविषयी वृत्तपत्रात, मासिकात आलेल्या वृत्तांताविषयी लेखिकेने भरभरून लिहिलेले आहे. आणि आसिफने जसा हा चित्रपट सुंदरपणे मांडला तसंच सुंदरपणे लेखिकेने या चित्रपटाचे समीक्षणही केलेले आहे, सर्व अंगाने `!
अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे. एकूणच मुगल -ए-आजम व त्या संदर्भातील गोष्टींचा लेखिकेने असा उलगडा केलेला आहे की जवळपास ५० वर्षाचा भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास डोळ्यासमोर येतो. अक्षय लेखन, चांगली गाणी, चांगले चित्रपट, चांगले दिग्दर्शक, चांगले कलाकार यांचा संदर्भही आपल्याला मिळतो. चित्रपटातील जागा, चित्रपटाची नजाकत काय आहे? त्याची सौंदर्यस्थळे कशी ओळखावीत, यांची समज हे पुस्तक देतं.त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला एक रसिक, चित्रपट समीक्षक बनवू शकते. लेखिकेच्या या रसिक वृत्तीला सलाम.
परिचय : मोहिनी हेडावू
सहाय्यक राज्यकर आयुक्त, राज्य वस्तू व सेवा कार्यालय, नागपूर
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
☆ “काव्यफुले” – (कविता-संग्रह) कवयित्री : सावित्रीबाई फुले ☆ परिचय – श्री नागेश शेवाळकर ☆
पुस्तक : काव्यफुले (कवितासंग्रह)
रचयित्री : सावित्रीबाई फुले
प्रकाशक : घनश्याम पाटील
चपराक प्रकाशन, पुणे
[७०५७२९२०९२]
पृष्ठ संख्या: ६४
मूल्य : ₹ १५०/-
☆ काव्यफुले: समाजप्रबोधनाची सुमने! ☆
थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह सन १८५४ यावर्षी प्रथम प्रकाशित झाला. या काव्यफुलांचा टवटवीतपणा, मनमोहक सुगंध सुमारे पावणेदोनशे वर्षांनंतरही जशास तसा आहे हे जाणून तो सुगंध आजच्या वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे या जाणिवेतून श्री घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, पुणे यांनी ९ मे २०२६ रोजी तो मनमोहक स्वरुपात पुनर्मुद्रित केला आहे. विशेष म्हणजे या काव्यसंग्रहाचे कृष्णधवल मूळ मुखपृष्ठ आतल्या पानावर छापले असून नवीन रंगीत असे आकर्षक मुखपृष्ठ ज्योती घनश्याम यांनी चितारले आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक, संशोधक संजय सोनवणी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. या संग्रहात त्या काळातील समाजप्रबोधन हे कदाचित आजही तितकेच महत्त्वाचे नि गरजेचे आहे हे जाणून प्रकाशक पाटील यांनी हे पाऊल उचलले असल्याचे लक्षात येते.
काव्यसंग्रहातील प्रत्येक काव्य वसंततिलका, ओवी, अनुष्टुभ, अभंग, अष्ट मात्री, अक्षर छंद, दिंडी इत्यादी लेखन प्रकारात बद्ध केले आहे. तसेच त्यांचे काव्य सामाजिक जाणीव, करुणा यासोबतच आत्मभान जागविणारे, निसर्गाचे चित्रण करणारे, प्रार्थनामय, बोधात्मक, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे, अंधश्रद्धा दूर करणारे, स्त्री शिक्षण आणि स्वाभिमान जागृत करणारे आहे. यावरून सावित्रीबाईंचा सखोल अभ्यास, ज्ञानलालसा समजून येतेच परंतु काव्यरचनेच्या माध्यमातून समाज जागृतीची तळमळही समजून येते.
विशेष म्हणजे सावित्रीबाईंनी प्रास्तविका, अर्पणिका ह्याही काव्यात व्यक्त केल्या आहेत. प्रास्तविकेत त्या काव्यात्मक रचना सादर करतात. त्याचा थोडक्यात आशय म्हणजे, ‘माझ्याजवळ जी सुगंधित काव्यफुले आहेत, त्यांची माळ तयार करून ती अर्पण करीत आहे. या काव्यफुलांच्या वाचनामुळे वाचकांना एकप्रकारची मानसिक शांती मिळेल. काव्यफुले संग्रह वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मिशनरी छापखान्याने पूर्ण केल्यामुळे त्यांचे आभार!
कोणत्याही पुस्तकाची अर्पणिका (अर्पणपत्रिका)ही महत्त्वाची असते. रचयित्री सावित्रीबाई फुले यांनी
महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याविषयी अनुष्टुभ छंदात कवयित्रीने आदरयुक्त भावना व्यक्त करताना त्यांचे सकाळी सकाळी स्मरण करावे असे सुचवले आहे…
छत्रपती शिवाजीचे। प्रातःस्मरण करावे
शूद्रादि अतिशूद्रांचा। प्रभु वंदू मनोभावे
नळराजा युधिष्ठिर। द्रौपदी ही जनार्दन
पुण्यश्लोक पुराणात। इतिहासी शिवानन
महात्मा ज्योतीबा फुले हे सावित्रीबाईंचे केवळ पती नव्हते तर ते त्यांचे शिक्षक, मार्गदर्शकही होते. त्यांच्याबद्दलचा अपरंपार भाव सावित्रीबाई ‘जोतीबांना नमस्कार’ या रचनेतून व्यक्त करतात…
जोतीबांना नमस्कार। मनोभावे करतसे
ज्ञानामृत आम्हां देई। अशा जीवन देतसे
थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी
ज्ञान ही ईर्षा देई। तो आम्हाला उद्धरी
‘राणी छत्रपती ताराबाई’ यांच्याबद्दल सावित्रीबाईंनी खूप छान रचना सादर करताना ताराबाईच्या शौर्याचा जिव्हाळ्याने उल्लेख केला आहे…
छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई
कोल्हापूरची जगदंबा महिराष्ट्राची अंबाई
शत्रुवर घाली छापा काळ तयाची ती होई
जेरीस शत्रूला करून करी बेफाम चढाई
अगोदर लिहिल्याप्रमाणे या संग्रहात रचयित्री सावित्रीबाई यांनी अनेक विषय हाताळले आहेत. त्यापैकी नैसर्गिक काव्यात ‘पिवळा चाफा’ या पुष्पाचे गुणविशेष वर्णन करताना शेवटचे कडवे मात्र वाचकाला स्तब्ध करते. फुले लिहितात…
नेत्र नासिका
रसिक मनाला
तृप्त करूनी
मरून पडतो
त्याचप्रमाणे ‘जाईचे फूल’ या काव्यातून जाईच्या फुलाचे सुरेख वर्णन ‘अक्षर बंद’ या काव्य प्रकारातून वाचायला मिळते. या रचनेचे नि काव्य प्रकाराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कडव्यात चार ओळी असून पहिल्या आणि तिसऱ्या ओळींमध्ये पाच अक्षरे असून दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत प्रत्येकी सहा अक्षरे आहेत. अक्षरांच्या संख्येचा तोल सांभाळताना रचना आशयघन, वाचनीय होईल अशी काळजी सावित्रीबाईंनी नक्कीच घेतली आहे. ह्या काव्याचा शेवट करतानाही त्या एक सामाजिक धगधगते वास्तव समोर आणतात…
रीत जगाची
कार्य झाल्यावर
फेकुन देई
मजला हुंगुन
‘फुलपाखरू व फुलाची कळी’ ह्या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही कविता चार कडव्यांची असून प्रत्येक कडव्यात सोळा ओळी आहेत. या माध्यमातून कवयित्री फुलपाखरू कळीवर एकप्रकारे कसे अत्याचार करतो त्यावर प्रकाश टाकताना फुलपाखरू कळीचे रूप कसे छिन्नविच्छिन्न करून नकोसे करतो हे सांगून फुलपाखराच्या माध्यमातून एक सामाजिक रीतही त्यांनी शब्दबद्ध केली आहे. सुंदर फुले अर्थात स्त्री आणि फुलपाखरू म्हणजे समाजातील दुष्ट प्रवृत्ती ही सांगड घालताना कवयित्री सावित्रीबाई यांची सुक्ष्मदृष्टी लक्षात आल्याशिवाय राहत नाही…
रीत जगाची
उच्छृंखल ही
पाहुनिया मी
स्तिमित होई
‘दिंडी’ या काव्य प्रकारातून साकारलेली ‘द्रष्टा कवी’ या रचनेत कवींची, त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्याजवळ असलेल्या चौसष्ट कला आणि नवरस यांची स्तुती करताना कवयित्री लिहितात,
कधी कल्पी मी ‘विश्व’ मित्र आहे
काव्य माझे हे प्रतिसृष्टी आहे
दिव्य सृष्टीचे काव्य हे तयाचे
जीणे राहते सुंदर शिव साचे
सावित्रीबाई फुले ह्या शिक्षिका असल्यामुळे त्यांचे विद्यार्थीनींशी आणि बालकांशी जवळचे संबंध होते. शिक्षिका आणि मायेचे नाते या भूमिकेतून त्या बालकांना सुयोग्य सवयी लागाव्यात, सुसंस्कार व्हावेत म्हणून ‘श्रेष्ठ धन’ या रचनेत मोलाचा संदेश देतात…
प्रातःकाळी करी बाळा।
शौचादि मुखमार्जन
होऊनिया शुचिर्भूत।
वंदू माता पिता जन
त्याच भूमिकेतून त्या ‘बाळास उपदेश’ या चारोळीतून अनमोल असे मार्गदर्शन करतात, वेळेवर काम करण्याचे महत्त्व अधोरेखित करतात…
करणे काम आजी ते। आताच कर खेचून
जे दुपारी करायचे। ते आताच कर जाऊन
क्षणानंतरचे काम, या क्षणि कर ठोकुन
झालं काम की नाही, न पुसे मृत्यू कारण!
आजतागायत चालत आलेली परंपरा म्हणजे नवस! या सामाजिक प्रथेवर सावित्रीबाई फुले जणू ‘आसूड’ ओढताना लिहितात…
नवस करिती। बकरू मारीन
नवस फेडीन। बाळजन्मी ।।
धोंडे मुले देती। नवसा पावती
लग्न का करती। नारी नर
‘मातीची ओवी’ या सुंदर, आशयघन काव्यात मातीची महती अत्यंत जिव्हाळ्याने व्यक्त केली आहे. कवयित्री फुले लिहितात…
मातीचा महिमा। सांगावा किती हा
मातीचे नाते अहा। शिवारात
सामाजिक दुर्गुणांवर सणसणीत चपराक लगावायला सावित्रीबाई मागेपुढे पाहत नाहीत. समाजात ज्या अनिष्ट चालीरीती, परंपरा किंवा दुर्गुण घर करून आहेत, त्यातही मानवप्राणी जसा चुकार, टुकार वागतो त्यावर ‘तयास मानव म्हणावे का? ‘ या रचनेत फुले पोटतिडकीने प्रकट होतात…
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेचि गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?
बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का?
‘सावित्री व जोतिबा संवाद’ या कवितेत पतीशी संवाद साधताना, महात्मा जोतिबा फुले यांनी आणि त्यांच्या मदतीने सावित्रीबाईंनी काय साध्य केले ते आदराने मांडतात…
सावित्री :
काळरात्र गेली। अज्ञान पळाले।
सर्वा जागे केले। सूर्याने या।
शूद्र या क्षितिजी । जोतिबा हा सूर्य
तेजस्वी अपूर्व । उगवला|
अशारीतीने सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी लिहिलेला, यावर्षी पुनर्मुद्रित केलेला, आशयगर्भ, भावगर्भ, विचारयुक्त, प्रबोधनात्मक, चिंतनशील असा थोर समाजसेविका, शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह वाचण्यात आला…
परिचय : श्री नागेश शेवाळकर
पुणे
मोबा. ९४२३१३९०७१
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ एक प्रवास.. तिच्यासोबत… लेखक : श्री दिनेश कुंभार ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
पुस्तक : एक प्रवास.. तिच्यासोबत
लेखक – दिनेश कुंभार
नर्मदा परिक्रमा हा विषय तसा आता वाचकांना नवा नाही. जगन्नाथ कुंटे यांच्याप्रमाणेच आणखीनही बऱ्याच जणांनी आपल्या नर्मदा परिक्रमेचे सविस्तर अनुभव लिहिले आहेत आणि सर्व प्रकारच्या वाचकांच्या ते पसंतीसही आले आहेत.
अतिशय खडतर अशी समजली जाणारी, तुमच्या निश्चयाची परीक्षा पाहणारी, आणि तुमच्या जीवन विषयक दृष्टिकोनात अमुलाग्र बदल घडवून आणणारी अशी ही परिक्रमा आहे असं म्हणतात. या परिक्रमे दरम्यान येणारे अनुभव हे इतके विचक्षण आणि विलक्षण असतात की प्रत्येक परिक्रमावासीला याबद्दल व्यक्त व्हावं असं वाटतं. आणि अगदी याच भावनेतून दिनेश कुंभार यांनी आपल्या नर्मदा परिक्रमेचं अनुभव कथन करणारे एक छोटेखानी पुस्तक लिहिले आहे. केवळ 72 पानांच्या या पुस्तकामध्ये नर्मदा परिक्रमेचं वर्णन बसवणं हीच खरंतर एक मोठी कसोटी आहे. आणि त्यामध्ये ही आपलं लेखन अतिशय रंजकपणे, रसाळपणे मांडणं आणि त्यातून परिक्रमेच्या परिपूर्ततेचा अनुभव देणे हे खरंच एक उत्तम लेखक असल्याचे लक्षण आहे. दिनेश कुंभार यांनी लेखक म्हणून हे मोठं कौशल्य प्राप्त केलं आहे आणि ही गोष्ट हे पुस्तक वाचून कुणीही मान्य करेल.
त्यातही मला विशेष भावली ती म्हणजे या पुस्तकाला मिळालेली प्रस्तावना. आतापर्यंतच्या वाचलेल्या पुस्तकांमध्ये प्रस्तावना ही बरीचशी वैचारिक पातळीवरती आणि पुस्तकातल्या मजकुराबद्दल वैशिष्ट्य सांगणारी असते, परंतु या पुस्तकातली प्रस्तावना विषयाबद्दल लेखकाबद्दल बोलतेच पण त्याहीपेक्षा स्वतःच्या दृष्टिकोनातून या परिक्रमेचं केलेलं निरीक्षण मांडते. केवळ निरीक्षण असंच नव्हे तर त्या बाबतीत स्वतःची मतदेखील पडताळून मांडली गेली आहेत हे जाणवतं. अतिशय प्रगल्भ आणि समर्पक अशी प्रस्तावना आमच्या लेखिका मैत्रीण वर्षा पतके थोटे यांनी या पुस्तकाला दिली आहे. आणि खरोखरच ती अतिशय वाचनीय झाली आहे. तर पुस्तक प्रस्तावनेपासूनच आपल्या मनाची पकड घेतं आणि आपण दिनेश कुंभार यांच्यासोबत कारमध्ये बसून या परिक्रमेला सुरुवात करतो.
पायी परिक्रमा करण्याची इच्छा असूनही काही वैद्यकीय कारणामुळे त्यांना ती करता आली नाही. परंतु परिक्रमा करण्याची आस अत्यंत तीव्र असल्यामुळे पायी नाही तरी कार चालवत का होईना पण मी परिक्रमा करीनच हा त्यांचा दृढ निश्चय यातल्या अगदी पहिल्या पानापासून वाचक म्हणून आपल्याला जाणवत राहतो. आतापर्यंतच्या वाचलेल्या परिक्रमांमध्ये पायी परिक्रमांचे अनुभव जास्त होते पण या परिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे कारने जाणाऱ्या परिक्रमावासीयांना ज्या काही अडथळांना तोंड द्यावे लागत असेल किंवा जे काही फायदेही होत असतील ते मला या पुस्तकातून वाचायला मिळाले. शेवटी परिक्रमा तुम्ही कशी करता, कोणत्या माध्यमातून करता याला केवळ महत्त्व नसून तुम्ही काय भावनेतून ती करता आणि येणाऱ्या अनुभवांना काय दृष्टिकोनातून सामोरे जाता यावरच तिचं महत्त्व अवलंबून आहे आणि त्या दृष्टीने ही परिक्रमा एक सुंदर अनुभूती देणारी आहे हे निश्चितपणे म्हणता येईल.
परिक्रमेमध्ये अचानकच त्यांच्या प्रिय आजोबांचं होणार निधन आणि त्याच्या आधी काही क्षण त्यांचं आजोबांशी झालेलं फोनवरचे संभाषण, त्यानंतर त्यांच्या मनात परिक्रमा पूर्ण करतानाच येणारे दुःखाचे कड आणि जीवनाच्या अंताबद्दलची एक विष्षण जाणीव ही सतत पाझरत राहते. पुढील सर्व प्रवास एका गंभीर पण काहीशा अंतर्मुख विचारातून सुरू राहतो. आणि नर्मदा मय्येच्या प्रवाहात आपलं दुःख हलकं करत राहतो. या प्रवासात अनाहूतपणे भेटणारी माणसे त्यांच्याशी होणारा संवाद, त्यातल्या काही जणांबरोबर होणारा दीर्घ काळचा प्रवास, काही जणांशी होणारं दृढ नातं, तपश्चर्या करणारे तेजस्वी व्यक्तिमत्वाचे साधू तसेच अघोरी साधू, नर्मदा नदीत उतरल्यानंतर येणारी अनुभूती, जीवावर बेतणारे प्रसंग, अडचणीच्या प्रसंगी नर्मदा मायेचा केलेला धावा आणि त्या वेळेला त्या अडचणीतून मार्ग सापडणं अशा सगळ्याच गोष्टी अतिशय संक्षिप्तपण भावपूर्ण स्वरूपात वाचायला मिळतात.
दिनेश कुंभार यांची लेखन शैली अतिशय साधी सरळ आणि ओघवती आहे. प्रत्येक प्रसंग आपण समक्ष हजर राहून पाहत आहोत असा भास निर्माण होतो. त्यांच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य बघता कवितेचा किंवा प्रतिमा, रूपकांचा त्यांच्या लेखनावर खूप प्रभाव आहे असं जाणवतं. उदाहरणार्थ विसाव्यासाठी थांबले असताना नर्मदेच्या पाण्यातल्या त्यांना दिसलेल्या प्रतिबिंबाचं हे वर्णन पहा, “रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विटांच्या भट्ट्या अर्धवट पाण्यावर तोंड काढून पाहत होत्या. त्या विटांच्या आडून वर येणाऱ्या सूर्यबिंबाचं प्रतिबिंब पाण्यावर पडल्याने संपूर्ण वातावरण भगवे वस्त्र पांघरून उभं असल्याचा भास निर्माण झाला होता. ” याचप्रमाणे गुहेत गेल्यानंतर तिथला थंडाव्याबद्दल बोलताना ते अगदी सहजपणे म्हणतात, “गार वातावरणानं घट्ट आलिंगन दिलं. ” मंदिरातील दिवे लागण्याच्या प्रसंगांचं वर्णन करताना ते सहज लिहून जातात, “त्या प्रसन्न मंदिरातील दिवे लागताच निशा एखाद्या लावण्यवतीसारखी उजळली. संधिप्रकाशात दिव्यांचा उजेड म्हणजे निषेच्या अंगावरील लखलखणारे दागिने जणू भासत होते. ” अशा अतिशय सुंदर उपमा त्यांनी लिहिलेल्या आढळतात. जे वाचताना आपण रंगून जातो.
नर्मदा परिक्रमा ही बहुतेक जण अध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टिकोनातून करतात. त्यामुळे त्याबद्दल लिहिताना अनेकदा आत्मचिंतन जास्त प्रमाणात दिसून येतं. या पुस्तकातही आत्मचिंतन, वैचारिक मंथन आलेलं आहेच. परंतु त्याहीपेक्षा यात जाणवतो तो एका निरीक्षकाचा, केवळ कुतुहल म्हणून चाललेला अभ्यास. आणि या अभ्यासातून निरीक्षणातून येत जाणारी परिपक्वता. याची चुणूक आपल्याला या पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि शीर्षकापासूनच जाणवते. एकूणच भवतालाबद्दल सजग असणाऱ्या, नदीबद्दल ओढ असणाऱ्या, निसर्गाप्रती, माणसाप्रती कृतज्ञता भाव असणाऱ्या कुणालाही हे पुस्तक निश्चितच आनंद देईल.
प्रवासाची आवड असणाऱ्या सर्वांनीच आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.
एक उत्तम स्नेहभेट पाठवल्याबद्दल दिनेश कुंभार यांचे मनापासून आभार!
परिचय – तृप्ती कुलकर्णी
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आकर्षक मुखपृष्ठ: पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत देखणे असून, त्यावरूनच पुस्तकाच्या नावाचा अर्थ सहज उलगडतो. गोष्टी सांगणारे ‘आप्पा’ आणि त्या गोष्टी ऐकणारे त्यांचे प्रेमळ, उत्सुक आणि हसतमुख नातवंडे या चित्रातून कौटुंबिक नाते अधोरेखित होते.
आदरयुक्त दर्शन व अर्पणपत्रिका: पान उलटताच महालक्ष्मी व प. पू. दादा महाराज यांचे दर्शन घडते. पुढील पानावर दिवंगत माता-पित्यांना आदरपूर्वक पुस्तक अर्पण केल्याची अर्पणपत्रिका दिसते.
प्रेरणास्रोत:
‘माझे प्रेरणास्रोत’ या भागात लेखकाने त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींचा अतिशय प्रेमळ शब्दांत उल्लेख केला आहे. तसेच पुस्तकात आवश्यक तिथे सुंदर कौटुंबिक छायाचित्रे जोडलेली आहेत.
पुस्तकातील प्रमुख विभाग
१. पूर्वपीठिका
यात वडिलांच्या हस्तलिखिताचा भक्कम आधार घेऊन लेखन केले आहे. ते इतके रंजक आणि जिवंत पद्धतीचे आहे की, वाचताना तो जुना काळ डोळ्यांसमोर उभा राहतो.
२. मनोगत
लेखकाने यात अतिशय प्रांजळ कबुली दिली आहे. साध्या आणि सरळ आयुष्याविषयी खूप आकर्षकपणे लिहीत असतानाच, जीवनाला दिशा देणारे अत्यंत थोर विचार यात मांडले आहेत.
३. मनातील मनापासून…
हे वाचताना प्रत्येक ओळ किती मनापासून लिहिली आहे, याची जाणीव पावलोपावली होते. प्रसंगांचे वर्णन इतके हुबेहूब आहे की आपण स्वतः त्या प्रसंगाचा एक भाग आहोत असे वाटू लागते.
बालपण, कोल्हापूरच्या आठवणी आणि रंजक प्रसंग
भोगावती नदीचा प्रसंग:
निसर्गसौंदर्य पाहत असतानाच, अचानक सुंदर भोगावती नदीच्या पात्रात ८ वर्षांच्या दिलीपदादांच्या जीवावर बेतलेला प्रसंग अंगावर काटा आणतो. म्हशीच्या अंगावर घातलेली सायकल डोळ्यांसमोर दिसते.
निर्मळ विनोद: स्वतःच्या उंचीचे वर्णन वाचताना गंमत वाटते. स्वतःवरच विनोद करून एक निर्मळ मन कसे जतन करता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
शालेय जीवन व सकारत्मकता:
सगळी शाळा आणि मजबूत मुलांचे काम पाहून ‘घोकंपट्टी वाचून बालपण आठवले’. ज्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या, त्यांच्याविषयी तक्रार करत बसण्यापेक्षा, त्या कमतरतांनी माणसाला कसे कणखर आणि धीट बनवले, हा सकारात्मक विचार मनाला भावतो.
भावनांची जपणूक:
गाण्याची हौस कशी शमली हे वास्तव पण मनात कोणतीही खंत न बाळगता लिहिले आहे. ‘मोठ्यांच्या नजरेतील पातळ होणारी जरब हे त्यांचे प्रेम’ अशी सुंदर वाक्ये वापरून कटू अनुभवांची तीव्रता कमी केली आहे.
संस्कारांची शिदोरी:
वडिलांनी ‘रेडिओ स्टार’ यांचे शास्त्रीय गायन गणपतीसमोर आयोजित करणे, ही आठवण कायमस्वरूपी जतन करण्यासारखी आहे. लहानपणी गोळा केलेल्या नोटा अशाच प्रसंगांतून नकळत मनावर चांगले संस्कार करून जातात.
कोल्हापूरचा काळ व शाळा प्रवेश:
कोल्हापूरमधील विविध कार्यक्रम आणि तिथला तो सुवर्णकाळ लेखकाने सुंदर अनुभवला. शाळेतील पहिल्या प्रवेशाचे अनुभव अत्यंत रंजक आहेत. शाळेतील अनुभव आणि भाषणातील आज्ञा वाचून गंमत वाटते आणि त्या लहान वयात काय घडले असेल, याचा अंदाज येतो.
रेडिओचा स्कोअर:
रेडिओवर ऐकून लिहिलेला स्कोअर वाचकाला थेट बालपणात घेऊन जातो. स्वतःमधील उणिवा इतक्या विनोदी पद्धतीने मांडल्या आहेत की त्यांचे रूपांतर सकारात्मकतेत होते आणि वाचताना चेहऱ्यावर हसू येते.
कौटुंबिक मूल्ये आणि बदलता काळ
व्यास बोळातील घर: या घराचे वर्णन अतिशय सुंदर आहे. सर्व प्रकारच्या गैरसोयी असूनही कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवर असलेले अथांग प्रेम आणि ते कौटुंबिक पाश भौतिक सुविधांच्या पलीकडचे कसे असतात, हे लेखकाने फार छान मांडले आहे.
पिढ्यांमधील अंतर:
एकमेकांची पुस्तके अनेक वर्षे अनेक भावंडांनी वापरणे ही आजच्या पिढीला अज्ञात असलेली पद्धत आपल्या पिढीने कशी अंगीकारली होती, याचे सुरेख वर्णन आहे.
जुन्या आठवणी व करमणूक:
‘फोनचा उत्सव’ आणि त्यासंबंधीच्या आठवणींमुळे जुने दिवस आठवतात. ‘पु. लं. च्या व्यक्तिरेखा ऑफिसमध्ये सापडल्या असत्या’ हे वाक्य मनाला खूप आवडते.
क्रिकेट, सिनेमा आणि रेडिओ:
शालेय जीवनातील क्रिकेट व सिनेमाचे किस्से छान आहेत. त्या काळातील हिरोंची वर्णने मस्त जमली आहेत. आपल्या पिढीसाठी वरदान ठरलेल्या ‘रेडिओ’चे वर्णन आणि त्यासोबतच दूरदर्शनची झालेली प्रगती व कार्यक्रमांची झालेली अधोगती याचे वास्तववादी वर्णन केले आहे.
संगीत आणि कला:
संगीत नाटके बघण्याचा आनंद, संगीताची आवड आणि परिस्थितीची सांगड यांचे वास्तव दर्शन घडते. ‘छोटा गंधर्व’ यांची भेट म्हणजे लेखकाच्या संगीत व स्वरसाधनेला मिळालेले गोड फळच आहे.
सामाजिक जाणिवा व चमत्कार:
माणसाची सामाजिक गरज अनुभवातून मांडली आहे. सामुदायिक उत्सव का व कसे आवश्यक असतात, याचे महत्त्व समजते. घरातील छोटे समारंभ ते आजचे ‘इव्हेंट’ यातील फरक स्पष्ट केला आहे. ‘प्लेग ते कोविड’ मधील अनुभव आणि ‘आईची दृष्टी परत येणे’ यांसारखे चमत्कार दर्शवणारे अनुभव थक्क करतात. वाईटातून चांगले कसे शोधावे, याची एक नवी दृष्टी हे लेखन आपल्याला देते.
काश्मीरची सहल:
आपल्या सहलीचे आणि काश्मीरवर लिहिलेल्या कवितेचे वर्णन निसर्गाची आणि अध्यात्माची सुंदर माहिती देऊन जाते.
स्वलिखित कविता (पुस्तकाचा दुसरा भाग)
पुस्तकाच्या दुसऱ्या भागात लेखकाच्या स्वतः रचलेल्या उत्कृष्ट कविता आहेत:
यात सुरुवातीला सर्व देवतांचे ध्यानरूपी आवाहन केले आहे.
त्यानंतर आई, वडील, पितर, गुरु, आरोग्य, कलाकार, मोबाईल, नातवंडे, कठीण काळ आणि रामनाम अशा सर्वसमावेशक विषयांवर अतिशय सुंदर कविता लिहिल्या आहेत.
हे सगळे विविध अनुभव लेखकाने आपल्या ‘उल्हास शब्दफुलांत’ अतिशय सुंदर रीतीने गुंफले आहेत. थोडक्यात सांगायचे तर, हे पुस्तक वाचताना लेखकाचा संपूर्ण ‘जीवनपट’ वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंतपणे उभा राहतो!
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आठवणी अंगाराच्या” – लेखक : विश्वास विनायक सावरकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : आठवणी अंगाराच्या
लेखक : विश्वास विनायक सावरकर
पृष्ठे : १९८
मूल्य : ३००₹
आठवणी अंगाराच्या’ या पुस्तकाची ही चतुर्थ आवृत्ती एप्रिल २०२३ मध्ये प्रसिद्ध झाली. या पुस्तकाचे लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चिरंजीव विश्वास सावरकर हे आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका व्यक्त केली, ती त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे – –
तात्यांच्या आठवणी असंख्य आहेत. कुटुंबातल्या माणसांपुढे आपण अनेक आठवणी केवळ व्यक्तीच्या आठवणी म्हणून सांगतो व ऐकतो; पण या आठवणी माझ्या वडिलांच्या असल्या तरी त्या एका राष्ट्रीय पुढाऱ्याच्या असल्याने त्यांच्या काही आठवणी मी अशा निवडल्या आहेत, की, ज्या वाचल्याने तात्यांच्या स्वभावाचं दर्शन व वागण्या-बोलण्यातून त्यांचं देशप्रेम व तत्त्वनिष्ठा व्यक्त व्हावी.
त्याचप्रमाणे लोकांना सध्याच्या परिस्थितीतही त्यांनी पूर्वी विशिष्ट प्रसंगी दिलेल्या संदेशांचा उपयोग व्हावा, हाच दृष्टिकोन समोर ठेवून मी आठवणी लिहिल्या असून त्यायोगे तात्यांच्या जीवनाच्या घरगुती आणि सार्वजनिक बाजूंवरही प्रकाश पडावा.
त्याचप्रमाणे त्यांच्या घरगुती आवडी-निवडी, त्यांचे कुटुंबीयाशी बोलणं-चालणं, त्यांचा दैनंदिन कार्यक्रम यांविषयीची लोकांमध्ये असलेली उत्सुकताही थोड्याफार प्रमाणात पुरी व्हावी. ह्यापुढे माझ्या मनातील त्यांच्याविषयीच्या आदराविषयी लिहिणं हे मी गौण मानलं. काही जणांनी माहिती काढण्याच्या ओघात काही स्पष्ट व सविस्तर प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्या प्रश्नांना, वस्तुस्थितीला धरून मीही सुस्पष्ट व सडेतोड उत्तरं दिली. ती या लेखनात आली आहेतच.
तात्यांच्या वैयक्तिक वागणुकीतून व्यक्त होणारं त्यांचं देशप्रेम, तत्त्वनिष्ठा, दूरदृष्टी व पुढे अनेक वर्षं उपयोगी पडणारं मार्गदर्शन यांचं आकलन व्हावं हा मूळ हेतू या आठवणी लिहिताना डोळ्यांसमोर असल्याने अशा आठवणीं संबंधातील कालगणनेतील वा इतर तपशिलातील अचूकपणात क्वचित फरक पडण्याचा संभव आहे. परंतु या आठवणींमधील गाभा मात्र माझ्या वर वर्णिलेल्या मूळ हेतूच्या दृष्टीने पक्का आहे.
वर उल्लेखिलेल्या माझ्या मूळ हेतूच्या दृष्टिकोनातून मी या ज्या निवडक आठवणी लिहिल्या आहेत त्या लोकांमधील असलेली जिज्ञासा थोड्याफार प्रमाणात पुरी करतील, असा मला विश्वास वाटतो.
– – लेखक विश्वास सावरकर
एकूण सहा प्रकरणांतून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुटुंबातील अन्य सदस्यांवर लिहिलेल्या या आठवणी आहेत. तसेच तात्या सावरकर यांची नात विदुला विश्वास सावरकर हिने आपल्या चौदाव्या वर्षी तात्यांच्या मे १९६३ ते फेब्रुवारी १९६६ या कालावधीतल्या काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या आठवणी या पुस्तकात आहेत. तसेच काही छायाचित्रेही आहेत. याबरोबरच ‘आझाद हिंद सेने’ची प्रेरक शक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा जोडलेला परिशिष्ट वाचनीय आहे. १९८६ मध्ये जेव्हा या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली होती त्या वेळी अनेक वर्तमानपत्रांमध्ये या पुस्तकाबद्दल छापून आलेले अभिप्रायही दिलेले आहेत.
या पुस्तकाची प्रस्तावना शंकर रामचंद्र दाते यांनी लिहिली आहे. त्यातील शेवटच्या परिच्छेदातील काही ओळी ‘संघर्ष याचं नाव सावरकर’, त्याचं स्वरूप विश्वासराव सावरकर यांनी लिहिलेल्या अनेक आठवणींतून प्रसंगोप्रसंगी व्यक्त झालं आहे. त्यायोगे त्या-त्या वेळच्या प्रसंगाचं शब्दचित्र साक्षात उभं राहातं. त्यांनी आपल्या पित्याच्या या आठवणी लिहून पितृऋण, तसंच समाजऋणही काही अंशी फेडले आहे. त्यांच्या या आठवणी म्हणजे ‘की घेतलं व्रत न हे अम्ही अंधतेने’ या सावरकरांच्या उक्तीचा साक्षात्कार होय. ‘
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘दि हिडन लाईफ ऑफ ट्रीज..’ – मूळ जर्मन लेखक : पीटर वोलेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : द हिडन लाईफ ऑफ ट्रीज
(The Hidden Life of Trees)
मूळ जर्मन लेखक : पीटर वोलेबेन (Peter Wohlleben)
मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर
हे एक अत्यंत रंजक आणि डोळे उघडणारं पुस्तक आहे. आपण झाडांना फक्त लाकूड किंवा सावली देणाऱ्या निर्जीव वस्तू समजतो, पण हे पुस्तक झाडांच्या एका विलक्षण आणि गूढ जगाची सफर घडवून आणतं.
पुस्तकाचा मूळ गाभा आणि विषय
पीटर वोलेबेन यांनी आपल्या अनेक वर्षांच्या वनपाल (Forester) मधील अनुभवावरून हे पुस्तक लिहिले आहे. झाडं केवळ उभी नसतात, तर ती एकमेकांशी संवाद साधतात, एकमेकांना मदत करतात आणि त्यांच्यातही ‘भावना’ असतात, हे त्यांनी या पुस्तकात मांडले आहे.
प्रमुख आकर्षणे
झाडांचे सामाजिक जाळे हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. जंगलातील झाडं जमिनीखालील बुरशीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेली असतात. या नेटवर्कद्वारे ती अन्न, पाणी आणि धोक्याचे संदेश एकमेकांना पाठवतात.
एकमेकांना मदत करणे
जर एखादे झाड आजारी असेल किंवा त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर शेजारील झाडं त्याला मुळांद्वारे पोषण पुरवतात.
मातृवृक्षाची भूमिका करतात. जंगलातील सर्वात जुनी आणि मोठी झाडं ही ‘आई’ सारखी काम करतात. ती आपल्या लहान रोपट्यांचे संरक्षण करतात आणि त्यांना वाढण्यास मदत करतात. इतके दिवस माणसे, प्राणी हेच फक्त असे करतात असे वाटत होते.
धोक्याची सूचना देणे
एखाद्या झाडावर कीटकांचा हल्ला झाला, तर ते झाड हवेत विशिष्ट गंध सोडते. हा गंध ओळखून आजूबाजूची झाडं स्वतःच्या पानांमध्ये विषारी द्रव्ये तयार करतात जेणेकरून कीटक त्यांना खाणार नाहीत.
पुस्तकाची बलस्थाने
सोपी आणि ओघवती भाषा! लेखकाने अत्यंत गुंतागुंतीचे वैज्ञानिक विषय (उदा. वनस्पतीशास्त्र) अगदी साध्या आणि रंजक भाषेत मांडले आहेत. त्यामुळे सामान्य वाचकालाही ते सहज समजते.
संवेदना जागृत करणारे हे पुस्तक वाचल्यानंतर झाडांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. झाडं ही सजीव आणि सामाजिक प्राणी आहेत, याची जाणीव तीव्रतेने होते.
वैज्ञानिक पुरावे
लेखकाने केवळ काल्पनिक गोष्टी सांगितलेल्या नाहीत, तर प्रत्येक दाव्याला विज्ञानाचा आणि संशोधनाचा आधार दिला आहे.
– – काही समीक्षकांच्या मते, लेखकाने झाडांचे खूप जास्त ‘मानवीकरण’ केले आहे. म्हणजे झाडांना माणसासारख्या भावना असतात (जसे की दुःख, आनंद, भीती) हे मांडताना वैज्ञानिक भाषेऐवजी लेखकाने काहीशी भावनिक भाषा वापरली आहे. पण ते आवश्यक वाटते. त्यामुळे झाडांच्या भावना अधिक प्रभावीपणे लक्षात येतात.
पुस्तकात काही मुद्दे परत परत आले असले तरी ते त्या ठिकाणी आवश्यक वाटतात.
‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ हे केवळ निसर्गप्रेमींसाठीच नाही, तर प्रत्येक व्यक्तीने एकदातरी वाचायला हवे असे पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्याला निसर्गाशी पुन्हा जोडते आणि पर्यावरणाचे रक्षण करणे किती गरजेचे आहे हे पटवून देते.
थोडक्यात सांगायचे तर, जर निसर्गाची रहस्ये जाणून घ्यायला आवडत असतील आणि एका वेगळ्याच विश्वाचा अनुभव घ्यायचा असेल, तर हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. हे पुस्तक वाचल्यावर जेव्हाही एखाद्या जंगलातून किंवा झाडांच्या जवळून जायची वेळ येईल, तेव्हा त्यांच्यातील शांत संवाद नक्कीच जाणवेल.
हे पुस्तक वाचून जंगलात जाण्याची तीव्र इच्छा होते. आपण ज्या नैसर्गिक हालचाली समजतो, किंवा वाऱ्याने हलणे समजतो, त्यामागील अर्थ हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येतात. फारच छान पुस्तक आहे.
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘स्वभाव – विभाव ’ – लेखक: डॉ. आनंद नाडकर्णी ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : स्वभाव – विभाव
लेखक: डॉ. आनंद नाडकर्णी
प्रकाशन : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ‘स्वभाव-विभाव’ हे पुस्तक म्हणजे मानसशास्त्रासारखा गंभीर विषय सामान्य माणसाला समजेल अशा रसाळ भाषेत मांडलेला एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. माणसाचा स्वभाव कसा घडतो आणि त्यात बदल करणे शक्य आहे का, यावर हे पुस्तक प्रकाश टाकते.
पुस्तकाचा गाभा म्हणजे स्वभाव आणि विभाव
डॉ. नाडकर्णी यांनी या पुस्तकात मानवी व्यक्तिमत्त्वाचे दोन महत्त्वाचे पैलू उलगडले आहेत.
स्वभाव म्हणजे जी आपली मूळ वृत्ती आहे, जी आपल्याला अनुवंशिकतेने किंवा संस्कारांनी मिळते.
विभाव म्हणजे स्वभावाचे प्रकटीकरण किंवा आपण परिस्थितीला दिलेला प्रतिसाद.
शास्त्रीय मांडणी: लेखकाने यात ‘REBT’ (Rational Emotive Behavior Therapy) म्हणजेच ‘विवेकनिष्ठ विचार पद्धती’चा आधार घेतला आहे. क्लिष्ट मानसशास्त्रीय संज्ञा न वापरता अत्यंत सोप्या उदाहरणांतून त्यांनी मानवी मनाचा नकाशा मांडला आहे.
स्वयंमदतीसाठी मार्गदर्शक असणारे हे पुस्तक केवळ वाचनीय नाही, तर ते ‘कृती-प्रवण’ आहे. स्वतःच्या स्वभावातील दोष ओळखून ते कसे सुधारता येतील, याचे मार्गदर्शन यात मिळते.
नात्यांची समज उलगडून दाखवताना केवळ स्वतःचाच नाही, तर इतरांचा स्वभाव समजून घेतल्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमधील तणाव कसे कमी होतात, हे यात प्रभावीपणे सांगितले आहे.
पुस्तकात काही काल्पनिक पात्रांच्या संवादांतून प्रश्न-उत्तर स्वरूपात विषय मांडला आहे, ज्यामुळे वाचक त्या विषयाशी सहज जोडला जातो.
*पुस्तकाची बलस्थाने*
ओघवती भाषा: डॉ. नाडकर्णी स्वतः एक उत्तम लेखक आणि नाटककार असल्याने त्यांची मांडणी नाट्यात्मक आणि ओघवती आहे.
वास्तववादी दृष्टिकोन: स्वभाव पूर्णपणे बदलता येत नाही, पण तो ‘मॅनेज’ करता येतो, हा व्यावहारिक विचार लेखकाने दिला आहे.
दैनंदिन उदाहरणे: राग, भीती, मत्सर, न्यूनगंड यांसारख्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुस्तकातील उदाहरणे खूप उपयुक्त ठरतात.
निष्कर्ष
“आपण जसे आहोत, तसेच आपण का आहोत?”
या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या प्रत्येकाने ‘स्वभाव-विभाव’ वाचायला हवे. स्वतःला बदलण्याची इच्छा असलेल्या आणि मानसिक स्वास्थ्य जपणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक एका ‘दीपस्तंभा’सारखे काम करते.
जर स्वतःच्या वागण्यातील ‘पॅटर्न’ समजून घ्यायचा असेल आणि आयुष्यात अधिक समतोल हवा असेल, तर हे पुस्तक संग्रही असायलाच हवे.
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈