मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “एक चिरंतन चित्रपट ‘मुगल -ए- आझम’” – लेखिका : डॉक्टर मीना श्रीवास्तव – परिचय : मोहिनी हेडावू ☆ प्रस्तुती –  उज्ज्वला केळकर ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “एक चिरंतन चित्रपट ‘मुगल -ए- आझम’” – लेखिका : डॉक्टर मीना श्रीवास्तव – परिचय : मोहिनी हेडावू ☆ प्रस्तुती –  उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

पुस्तक : एक चिरंतन चित्रपट ‘मुगल -ए- आझम’

लेखिका:-डॉक्टर मीना श्रीवास्तव

पुस्तकाचे प्रकाशक- लोकव्रत प्रकाशन 

पुस्तकाची पाने – १५४

लोकव्रत प्रकाशन, पुणे यांनी मुगल-ए- आजम हे डॉक्टर मीना श्रीवास्तव यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे .आपण बरेचदा बघतो की एखाद्या कथेवर, नाटकावर, कादंबरीवर आधारित चित्रपट बनतो.पण इथे उलटे झालेले आहे की, एका चित्रपटांवर पुस्तक निघालेले आहे. चित्रपटाचे लेखिकेने अत्यंत चोखंदळ रसिका प्रमाणे परीक्षण केलेले आहे . यात नुसतं चित्रपट परीक्षण नाही तर ते कलाकारांनी सादर केलेल्या कलेचे परीक्षण तसेच या चित्रपटाचे परीक्षण करताना त्या योगाने आलेले चांगल्या चित्रपटाचे ही संदर्भ त्या देतात. त्यामुळे तसं पाहिलं तर चित्रपट रसिकांसाठी हे पुस्तक म्हणजे खजिना आहे. 

डॉ. मीना श्रीवास्तव 

तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार, कोल्हापूर हा पुरस्कार या पुस्तकांसाठी मीनाताईंना मिळालेला आहे, ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.

डॉक्टर मीना श्रीवास्तव यांचे हे पहिले मराठी पुस्तक आहे, त्यांनी स्वतः लिहिले असे. तसे पाहिले तर त्यांनी’ महर्षी वाल्मिकी’ तसेच ‘रामायण ‘या दोन विश्वास देशपांडे लिखित मराठी पुस्तकांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद केलेले आहे. हे वाचताना त्यांचे इंग्रजी आणि हिंदी भाषेवरचे प्रभुत्व तर वाखाणण्याजोगंआहेच. परंतु या पुस्तकातून त्यांची सुंदर मराठी ही दिसून येते. ही मराठी लिहीत असताना त्यांनी त्या चित्रपटाच्या अनुषंगाने येणारे हिंदी, उर्दू आणि फारसी भाषेतील शब्दांचा सढळ हाताने वापर केला आहे. कारण की ‘मुगल- ए- आझम हा चित्रपट मुगल दरबारातील राजपुत्र सलिम आणि नर्तिका अनारकली यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे .त्यामुळे त्या लिखाणांमध्ये बरेच उर्दू शब्द येतात आणि ते त्या ठिकाणी चपखल बसतात. कुठेही ते वाचताना रसभंग होत नाही .या उलट त्यांनी व्यक्त केलेल्या भावना किंवा विचार त्या शब्दांनी अजून ठळकपणे मांडल्या जातात. याची कथाही त्या सुरसपणे मांडतात. 

हे पुस्तक वाचत असताना त्यांना चित्रपट दिग्दर्शक आसिफ याविषयी असलेला आदर तसेच मधुबाला विषयी असलेले जिव्हाळा आणि प्रेम व्यक्त होते .या पुस्तकातील त्यांचे एक वाक्य कायम लक्षात राहण्यासारखे आहे. कारण की ‘मधुबाला सौंदर्याची पुतळी म्हणून सगळेजण मानतात परंतु तिच्या सौंदर्या बरोबरच तिचा सशक्त आणि समृद्ध करणारा अभिनय आहे’ हे पण लेखिकेनेचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मधुबालानं बरेचदा आजारी असतांना ऑक्सिजन सिलेंडर लावून चित्रपटात काम केलं, यावरून त्या चित्रपटाविषयी एकंदरच कामाविषयी तिचे असलेले समर्पण दिसून येतं. त्यामुळे हा चित्रपट असो आणि या चित्रपटाचे संपूर्ण पडद्यावरचे आणि पडद्यामागच्या टीमची मेहनत, त्यांनी केलेले परिश्रम म्हणजे हे पुस्तक.

दिग्दर्शक आसिफ याच्या कार्याला ,मेहनतीला, दिग्दर्शनाला,गुणग्राहकतेला तसेच चांगुलपणाचा ध्यास, जे जे करेल ते ते चांगलंच करणार या, उत्तमोतमाचा ध्यास घेणा-या त्याच्या वृत्तीला सलाम !संवाद लेखन असो, गायिका असो दिग्दर्शन असो ,फोटोग्राफी असो या सर्व बाबतीत उत्तमतेचा त्याने ध्यास घेतला होता आणि त्या संदर्भातली सगळे किस्से लेखिकेने खूप छानपणे उलगडून दाखवलेले आहे. खरोखरचे युद्ध वाटावे म्हणून सैनिकांची तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही के कृष्ण मेंनन यांच्या परवानगीने घेतलेली मदत, हा प्रकार ही काहीतरी वेगळाच आहे. तसेच ‘प्यार किया तो डरना क्या!’ च्या वेळेचा सेट चित्रपट संपल्यानंतर गुरुदत्तने तो सेट भाड्याने घेतला आणि असाही त्याचा उपयोग केला .दोन वर्ष त्या शिशमहलच्या सेटचं प्रदर्शन चालत राहिलं. तब्बल ७७ आठवडे तो चित्रपट मराठा रंगमंदिर, मुंबई मध्ये चालला .त्या काळात सर्वात जास्त कमाई केलेला तो चित्रपट होता .हा चित्रपट जसां आसिफचं वर्षानुवर्ष उराशी बाळगलेले स्वप्न होते. तसेच हा चित्रपट हे लेखिकेच्या भावाविश्वाचे स्वप्न होते आणि या चित्रपटाविषयी त्याचं दिग्दर्शन, कला, गाणी, गायक, प्रत्येक अंगाविषयी, त्या चित्रपटाविषयी वृत्तपत्रात, मासिकात आलेल्या वृत्तांताविषयी लेखिकेने भरभरून लिहिलेले आहे. आणि आसिफने जसा हा चित्रपट सुंदरपणे मांडला तसंच सुंदरपणे लेखिकेने या चित्रपटाचे समीक्षणही केलेले आहे, सर्व अंगाने `!

अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे. एकूणच मुगल -ए-आजम व त्या संदर्भातील गोष्टींचा लेखिकेने असा उलगडा केलेला आहे की जवळपास ५० वर्षाचा भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास डोळ्यासमोर येतो. अक्षय लेखन, चांगली गाणी, चांगले चित्रपट, चांगले दिग्दर्शक, चांगले कलाकार यांचा संदर्भही आपल्याला मिळतो. चित्रपटातील जागा, चित्रपटाची नजाकत काय आहे? त्याची सौंदर्यस्थळे कशी ओळखावीत, यांची समज हे पुस्तक देतं.त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला एक रसिक, चित्रपट समीक्षक बनवू शकते. लेखिकेच्या या रसिक वृत्तीला सलाम.

परिचय : मोहिनी हेडावू

सहाय्यक राज्यकर आयुक्त, राज्य वस्तू व सेवा कार्यालय, नागपूर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “काव्यफुले” – (कविता-संग्रह) कवयित्री : सावित्रीबाई फुले ☆ परिचय – श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “काव्यफुले” – (कविता-संग्रह) कवयित्री : सावित्रीबाई फुले ☆ परिचय –  श्री नागेश शेवाळकर ☆

पुस्तक : काव्यफुले  (कवितासंग्रह)

रचयित्री : सावित्रीबाई फुले 

प्रकाशक : घनश्याम पाटील 

चपराक प्रकाशन,  पुणे 

 [७०५७२९२०९२]

पृष्ठ संख्या: ६४

मूल्य : ₹ १५०/-

☆ काव्यफुले: समाजप्रबोधनाची सुमने! ☆

थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह सन १८५४ यावर्षी प्रथम प्रकाशित झाला. या काव्यफुलांचा टवटवीतपणा, मनमोहक सुगंध सुमारे पावणेदोनशे वर्षांनंतरही जशास तसा आहे हे जाणून तो सुगंध आजच्या वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे या जाणिवेतून श्री घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, पुणे यांनी ९ मे २०२६ रोजी तो मनमोहक स्वरुपात पुनर्मुद्रित केला आहे. विशेष म्हणजे या काव्यसंग्रहाचे कृष्णधवल मूळ मुखपृष्ठ आतल्या पानावर छापले असून नवीन रंगीत असे आकर्षक मुखपृष्ठ ज्योती घनश्याम यांनी चितारले आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक, संशोधक संजय सोनवणी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. या संग्रहात त्या काळातील समाजप्रबोधन हे कदाचित आजही तितकेच महत्त्वाचे नि गरजेचे आहे हे जाणून प्रकाशक पाटील यांनी हे पाऊल उचलले असल्याचे लक्षात येते.

काव्यसंग्रहातील प्रत्येक काव्य वसंततिलका, ओवी, अनुष्टुभ, अभंग, अष्ट मात्री, अक्षर छंद, दिंडी इत्यादी लेखन प्रकारात बद्ध केले आहे. तसेच त्यांचे काव्य सामाजिक जाणीव, करुणा यासोबतच आत्मभान जागविणारे, निसर्गाचे चित्रण करणारे, प्रार्थनामय, बोधात्मक, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे, अंधश्रद्धा दूर करणारे, स्त्री शिक्षण आणि स्वाभिमान जागृत करणारे आहे. यावरून सावित्रीबाईंचा सखोल अभ्यास, ज्ञानलालसा समजून येतेच परंतु काव्यरचनेच्या माध्यमातून समाज जागृतीची तळमळही समजून येते.

विशेष म्हणजे सावित्रीबाईंनी प्रास्तविका, अर्पणिका ह्याही काव्यात व्यक्त केल्या आहेत. प्रास्तविकेत त्या काव्यात्मक रचना सादर करतात. त्याचा थोडक्यात आशय म्हणजे, ‘माझ्याजवळ जी सुगंधित काव्यफुले आहेत, त्यांची माळ तयार करून ती अर्पण करीत आहे. या काव्यफुलांच्या वाचनामुळे वाचकांना एकप्रकारची मानसिक शांती मिळेल. काव्यफुले संग्रह वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मिशनरी छापखान्याने पूर्ण केल्यामुळे त्यांचे आभार!

कोणत्याही पुस्तकाची अर्पणिका (अर्पणपत्रिका)ही महत्त्वाची असते. रचयित्री सावित्रीबाई फुले यांनी 

वसंततिलका वृत्तामध्ये लिहिलेली अर्पणिका अर्थपूर्ण आहे…

मजवर सकळाची भाव भक्ति विशाला 

हृदय भरुनि येते वाटते हे कशाला 

उपकर कृति आहे भार होई मनाला 

सुजन हितकारांना अर्पित ही सुमाला

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याविषयी अनुष्टुभ छंदात कवयित्रीने आदरयुक्त भावना व्यक्त करताना त्यांचे सकाळी सकाळी स्मरण करावे असे सुचवले आहे…

छत्रपती शिवाजीचे। प्रातःस्मरण करावे 

शूद्रादि अतिशूद्रांचा। प्रभु वंदू मनोभावे 

नळराजा युधिष्ठिर। द्रौपदी ही जनार्दन 

पुण्यश्लोक पुराणात। इतिहासी शिवानन

महात्मा ज्योतीबा फुले हे सावित्रीबाईंचे केवळ पती नव्हते तर ते त्यांचे शिक्षक, मार्गदर्शकही होते. त्यांच्याबद्दलचा अपरंपार भाव सावित्रीबाई ‘जोतीबांना नमस्कार’ या रचनेतून व्यक्त करतात…

जोतीबांना नमस्कार। मनोभावे करतसे 

ज्ञानामृत आम्हां देई। अशा जीवन देतसे 

थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी 

ज्ञान ही ईर्षा देई। तो आम्हाला उद्धरी

‘राणी छत्रपती ताराबाई’ यांच्याबद्दल सावित्रीबाईंनी खूप छान रचना सादर करताना ताराबाईच्या शौर्याचा जिव्हाळ्याने उल्लेख केला आहे…

छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई 

कोल्हापूरची जगदंबा महिराष्ट्राची अंबाई 

शत्रुवर घाली छापा काळ तयाची ती होई 

जेरीस शत्रूला करून करी बेफाम चढाई

अगोदर लिहिल्याप्रमाणे या संग्रहात रचयित्री सावित्रीबाई यांनी अनेक विषय हाताळले आहेत. त्यापैकी नैसर्गिक काव्यात ‘पिवळा चाफा’ या पुष्पाचे गुणविशेष वर्णन करताना शेवटचे कडवे मात्र वाचकाला स्तब्ध करते. फुले लिहितात…

नेत्र नासिका

रसिक मनाला 

तृप्त करूनी 

मरून पडतो 

त्याचप्रमाणे ‘जाईचे फूल’ या काव्यातून जाईच्या फुलाचे सुरेख वर्णन ‘अक्षर बंद’ या काव्य प्रकारातून वाचायला मिळते. या रचनेचे नि काव्य प्रकाराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कडव्यात चार ओळी असून पहिल्या आणि तिसऱ्या ओळींमध्ये पाच अक्षरे असून दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत प्रत्येकी सहा अक्षरे आहेत. अक्षरांच्या संख्येचा तोल सांभाळताना रचना आशयघन, वाचनीय होईल अशी काळजी सावित्रीबाईंनी नक्कीच घेतली आहे. ह्या काव्याचा शेवट करतानाही त्या एक सामाजिक धगधगते वास्तव समोर आणतात…

रीत जगाची 

कार्य झाल्यावर 

फेकुन देई 

मजला हुंगुन 

 ‘फुलपाखरू व फुलाची कळी’ ह्या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही कविता चार कडव्यांची असून प्रत्येक कडव्यात सोळा ओळी आहेत. या माध्यमातून कवयित्री फुलपाखरू कळीवर एकप्रकारे कसे अत्याचार करतो त्यावर प्रकाश टाकताना फुलपाखरू कळीचे रूप कसे छिन्नविच्छिन्न करून नकोसे करतो हे सांगून फुलपाखराच्या माध्यमातून एक सामाजिक रीतही त्यांनी शब्दबद्ध केली आहे. सुंदर फुले अर्थात स्त्री आणि फुलपाखरू म्हणजे समाजातील दुष्ट प्रवृत्ती ही सांगड घालताना कवयित्री सावित्रीबाई यांची सुक्ष्मदृष्टी लक्षात आल्याशिवाय राहत नाही…

रीत जगाची 

उच्छृंखल ही 

पाहुनिया मी 

स्तिमित होई

‘दिंडी’ या काव्य प्रकारातून साकारलेली ‘द्रष्टा कवी’ या रचनेत कवींची, त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्याजवळ असलेल्या चौसष्ट कला आणि नवरस यांची स्तुती करताना कवयित्री लिहितात,

कधी कल्पी मी ‘विश्व’ मित्र आहे 

काव्य माझे हे प्रतिसृष्टी आहे 

दिव्य सृष्टीचे काव्य हे तयाचे 

जीणे राहते सुंदर शिव साचे

 सावित्रीबाई फुले ह्या शिक्षिका असल्यामुळे त्यांचे विद्यार्थीनींशी आणि बालकांशी जवळचे संबंध होते. शिक्षिका आणि मायेचे नाते या भूमिकेतून त्या बालकांना सुयोग्य सवयी लागाव्यात, सुसंस्कार व्हावेत म्हणून ‘श्रेष्ठ धन’ या रचनेत मोलाचा संदेश देतात…

प्रातःकाळी करी बाळा। 

शौचादि मुखमार्जन 

होऊनिया शुचिर्भूत। 

वंदू माता पिता जन

त्याच भूमिकेतून त्या ‘बाळास उपदेश’ या चारोळीतून अनमोल असे मार्गदर्शन करतात, वेळेवर काम करण्याचे महत्त्व अधोरेखित करतात…

करणे काम आजी ते। आताच कर खेचून 

जे दुपारी करायचे। ते आताच कर जाऊन

क्षणानंतरचे काम, या क्षणि कर ठोकुन 

झालं काम की नाही, न पुसे मृत्यू कारण!

आजतागायत चालत आलेली परंपरा म्हणजे नवस! या सामाजिक प्रथेवर सावित्रीबाई फुले जणू ‘आसूड’ ओढताना लिहितात…

नवस करिती। बकरू मारीन 

नवस फेडीन। बाळजन्मी ।।

धोंडे मुले देती। नवसा पावती 

लग्न का करती। नारी नर 

 ‘मातीची ओवी’ या सुंदर, आशयघन काव्यात मातीची महती अत्यंत जिव्हाळ्याने व्यक्त केली आहे. कवयित्री फुले लिहितात…

मातीचा महिमा। सांगावा किती हा 

मातीचे नाते अहा। शिवारात

सामाजिक दुर्गुणांवर सणसणीत चपराक लगावायला सावित्रीबाई मागेपुढे पाहत नाहीत. समाजात ज्या अनिष्ट चालीरीती, परंपरा किंवा दुर्गुण घर करून आहेत, त्यातही मानवप्राणी जसा चुकार, टुकार वागतो त्यावर ‘तयास मानव म्हणावे का? ‘ या रचनेत फुले पोटतिडकीने प्रकट होतात…

ज्ञान नाही विद्या नाही 

ते घेणेचि गोडी नाही 

बुद्धी असुनि चालत नाही 

तयास मानव म्हणावे का?

 

बाईल काम करीत राही 

ऐतोबा हा खात राही 

पशू पक्षात ऐसे नाही 

तयास मानव म्हणावे का?

‘सावित्री व जोतिबा संवाद’ या कवितेत पतीशी संवाद साधताना, महात्मा जोतिबा फुले यांनी आणि त्यांच्या मदतीने सावित्रीबाईंनी काय साध्य केले ते आदराने मांडतात…

सावित्री :

काळरात्र गेली। अज्ञान पळाले।

सर्वा जागे केले। सूर्याने या।

शूद्र या क्षितिजी । जोतिबा हा सूर्य 

तेजस्वी अपूर्व । उगवला|

अशारीतीने सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी लिहिलेला, यावर्षी पुनर्मुद्रित केलेला, आशयगर्भ, भावगर्भ, विचारयुक्त, प्रबोधनात्मक, चिंतनशील असा थोर समाजसेविका, शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह वाचण्यात आला…

 

परिचय : श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ एक प्रवास.. तिच्यासोबत…  लेखक : श्री दिनेश कुंभार ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ एक प्रवास.. तिच्यासोबत…  लेखक : श्री दिनेश कुंभार ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक : एक प्रवास.. तिच्यासोबत

लेखक – दिनेश कुंभार

नर्मदा परिक्रमा हा विषय तसा आता वाचकांना नवा नाही. जगन्नाथ कुंटे यांच्याप्रमाणेच आणखीनही बऱ्याच जणांनी आपल्या नर्मदा परिक्रमेचे सविस्तर अनुभव लिहिले आहेत आणि सर्व प्रकारच्या वाचकांच्या ते पसंतीसही आले आहेत.

अतिशय खडतर अशी समजली जाणारी, तुमच्या निश्चयाची परीक्षा पाहणारी, आणि तुमच्या जीवन विषयक दृष्टिकोनात अमुलाग्र बदल घडवून आणणारी अशी ही परिक्रमा आहे असं म्हणतात. या परिक्रमे दरम्यान येणारे अनुभव हे इतके विचक्षण आणि विलक्षण असतात की प्रत्येक परिक्रमावासीला याबद्दल व्यक्त व्हावं असं वाटतं. आणि अगदी याच भावनेतून दिनेश कुंभार यांनी आपल्या नर्मदा परिक्रमेचं अनुभव कथन करणारे एक छोटेखानी पुस्तक लिहिले आहे. केवळ 72 पानांच्या या पुस्तकामध्ये नर्मदा परिक्रमेचं वर्णन बसवणं हीच खरंतर एक मोठी कसोटी आहे. आणि त्यामध्ये ही आपलं लेखन अतिशय रंजकपणे, रसाळपणे मांडणं आणि त्यातून परिक्रमेच्या परिपूर्ततेचा अनुभव देणे हे खरंच एक उत्तम लेखक असल्याचे लक्षण आहे. दिनेश कुंभार यांनी लेखक म्हणून हे मोठं कौशल्य प्राप्त केलं आहे आणि ही गोष्ट हे पुस्तक वाचून कुणीही मान्य करेल.

त्यातही मला विशेष भावली ती म्हणजे या पुस्तकाला मिळालेली प्रस्तावना. आतापर्यंतच्या वाचलेल्या पुस्तकांमध्ये प्रस्तावना ही बरीचशी वैचारिक पातळीवरती आणि पुस्तकातल्या मजकुराबद्दल वैशिष्ट्य सांगणारी असते, परंतु या पुस्तकातली प्रस्तावना विषयाबद्दल लेखकाबद्दल बोलतेच पण त्याहीपेक्षा स्वतःच्या दृष्टिकोनातून या परिक्रमेचं केलेलं निरीक्षण मांडते. केवळ निरीक्षण असंच नव्हे तर त्या बाबतीत स्वतःची मतदेखील पडताळून मांडली गेली आहेत हे जाणवतं. अतिशय प्रगल्भ आणि समर्पक अशी प्रस्तावना आमच्या लेखिका मैत्रीण वर्षा पतके थोटे यांनी या पुस्तकाला दिली आहे. आणि खरोखरच ती अतिशय वाचनीय झाली आहे‌. तर पुस्तक प्रस्तावनेपासूनच आपल्या मनाची पकड घेतं आणि आपण दिनेश कुंभार यांच्यासोबत कारमध्ये बसून या परिक्रमेला सुरुवात करतो.

पायी परिक्रमा करण्याची इच्छा असूनही काही वैद्यकीय कारणामुळे त्यांना ती करता आली नाही. परंतु परिक्रमा करण्याची आस अत्यंत तीव्र असल्यामुळे पायी नाही तरी कार चालवत का होईना पण मी परिक्रमा करीनच हा त्यांचा दृढ निश्चय यातल्या अगदी पहिल्या पानापासून वाचक म्हणून आपल्याला जाणवत राहतो. आतापर्यंतच्या वाचलेल्या परिक्रमांमध्ये पायी परिक्रमांचे अनुभव जास्त होते पण या परिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे कारने जाणाऱ्या परिक्रमावासीयांना ज्या काही अडथळांना तोंड द्यावे लागत असेल किंवा जे काही फायदेही होत असतील ते मला या पुस्तकातून वाचायला मिळाले. शेवटी परिक्रमा तुम्ही कशी करता, कोणत्या माध्यमातून करता याला केवळ महत्त्व नसून तुम्ही काय भावनेतून ती करता आणि येणाऱ्या अनुभवांना काय दृष्टिकोनातून सामोरे जाता यावरच तिचं महत्त्व अवलंबून आहे आणि त्या दृष्टीने ही परिक्रमा एक सुंदर अनुभूती देणारी आहे हे निश्चितपणे म्हणता येईल.

परिक्रमेमध्ये अचानकच त्यांच्या प्रिय आजोबांचं होणार निधन आणि त्याच्या आधी काही क्षण त्यांचं आजोबांशी झालेलं फोनवरचे संभाषण, त्यानंतर त्यांच्या मनात परिक्रमा पूर्ण करतानाच येणारे दुःखाचे कड आणि जीवनाच्या अंताबद्दलची एक विष्षण जाणीव ही सतत पाझरत राहते. पुढील सर्व प्रवास एका गंभीर पण काहीशा अंतर्मुख विचारातून सुरू राहतो. आणि नर्मदा मय्येच्या प्रवाहात आपलं दुःख हलकं करत राहतो. या प्रवासात अनाहूतपणे भेटणारी माणसे त्यांच्याशी होणारा संवाद, त्यातल्या काही जणांबरोबर होणारा दीर्घ काळचा प्रवास, काही जणांशी होणारं दृढ नातं, तपश्चर्या करणारे तेजस्वी व्यक्तिमत्वाचे साधू तसेच अघोरी साधू, नर्मदा नदीत उतरल्यानंतर येणारी अनुभूती, जीवावर बेतणारे प्रसंग, अडचणीच्या प्रसंगी नर्मदा मायेचा केलेला धावा आणि त्या वेळेला त्या अडचणीतून मार्ग सापडणं अशा सगळ्याच गोष्टी अतिशय संक्षिप्तपण भावपूर्ण स्वरूपात वाचायला मिळतात.

दिनेश कुंभार यांची लेखन शैली अतिशय साधी सरळ आणि ओघवती आहे. प्रत्येक प्रसंग आपण समक्ष हजर राहून पाहत आहोत असा भास निर्माण होतो. त्यांच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य बघता कवितेचा किंवा प्रतिमा, रूपकांचा त्यांच्या लेखनावर खूप प्रभाव आहे असं जाणवतं. उदाहरणार्थ विसाव्यासाठी थांबले असताना नर्मदेच्या पाण्यातल्या त्यांना दिसलेल्या प्रतिबिंबाचं हे वर्णन पहा, “रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विटांच्या भट्ट्या अर्धवट पाण्यावर तोंड काढून पाहत होत्या. त्या विटांच्या आडून वर येणाऱ्या सूर्यबिंबाचं प्रतिबिंब पाण्यावर पडल्याने संपूर्ण वातावरण भगवे वस्त्र पांघरून उभं असल्याचा भास निर्माण झाला होता. ” याचप्रमाणे गुहेत गेल्यानंतर तिथला थंडाव्याबद्दल बोलताना ते अगदी सहजपणे म्हणतात, “गार वातावरणानं घट्ट आलिंगन दिलं. ” मंदिरातील दिवे लागण्याच्या प्रसंगांचं वर्णन करताना ते सहज लिहून जातात, “त्या प्रसन्न मंदिरातील दिवे लागताच निशा एखाद्या लावण्यवतीसारखी उजळली. संधिप्रकाशात दिव्यांचा उजेड म्हणजे निषेच्या अंगावरील लखलखणारे दागिने जणू भासत होते. ” अशा अतिशय सुंदर उपमा त्यांनी लिहिलेल्या आढळतात. जे वाचताना आपण रंगून जातो.

नर्मदा परिक्रमा ही बहुतेक जण अध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टिकोनातून करतात. त्यामुळे त्याबद्दल लिहिताना अनेकदा आत्मचिंतन जास्त प्रमाणात दिसून येतं. या पुस्तकातही आत्मचिंतन, वैचारिक मंथन आलेलं आहेच. परंतु त्याहीपेक्षा यात जाणवतो तो एका निरीक्षकाचा, केवळ कुतुहल म्हणून चाललेला अभ्यास. आणि या अभ्यासातून निरीक्षणातून येत जाणारी परिपक्वता. याची चुणूक आपल्याला या पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि शीर्षकापासूनच जाणवते. एकूणच भवतालाबद्दल सजग असणाऱ्या, नदीबद्दल ओढ असणाऱ्या, निसर्गाप्रती, माणसाप्रती कृतज्ञता भाव असणाऱ्या कुणालाही हे पुस्तक निश्चितच आनंद देईल.

प्रवासाची आवड असणाऱ्या सर्वांनीच आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.

एक उत्तम स्नेहभेट पाठवल्याबद्दल दिनेश कुंभार यांचे मनापासून आभार!

परिचय – तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आप्पाच्या गप्पा’ – लेखक: श्री. दिलीप जमखंडीकर ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आप्पाच्या गप्पा’ – लेखक: श्री. दिलीप जमखंडीकर ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक : आप्पाच्या गप्पा

लेखक: श्री. दिलीप जमखंडीकर

प्रकाशक: दिपाली जमखंडीकर

 

पुस्तकाची पहिली झलक (मुखपृष्ठ व अर्पणपत्रिका)

आकर्षक मुखपृष्ठ: पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत देखणे असून, त्यावरूनच पुस्तकाच्या नावाचा अर्थ सहज उलगडतो. गोष्टी सांगणारे ‘आप्पा’ आणि त्या गोष्टी ऐकणारे त्यांचे प्रेमळ, उत्सुक आणि हसतमुख नातवंडे या चित्रातून कौटुंबिक नाते अधोरेखित होते.

आदरयुक्त दर्शन व अर्पणपत्रिका: पान उलटताच महालक्ष्मी व प. पू. दादा महाराज यांचे दर्शन घडते. पुढील पानावर दिवंगत माता-पित्यांना आदरपूर्वक पुस्तक अर्पण केल्याची अर्पणपत्रिका दिसते.

प्रेरणास्रोत:

‘माझे प्रेरणास्रोत’ या भागात लेखकाने त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींचा अतिशय प्रेमळ शब्दांत उल्लेख केला आहे. तसेच पुस्तकात आवश्यक तिथे सुंदर कौटुंबिक छायाचित्रे जोडलेली आहेत.

पुस्तकातील प्रमुख विभाग

१. पूर्वपीठिका

यात वडिलांच्या हस्तलिखिताचा भक्कम आधार घेऊन लेखन केले आहे. ते इतके रंजक आणि जिवंत पद्धतीचे आहे की, वाचताना तो जुना काळ डोळ्यांसमोर उभा राहतो.

२. मनोगत

लेखकाने यात अतिशय प्रांजळ कबुली दिली आहे. साध्या आणि सरळ आयुष्याविषयी खूप आकर्षकपणे लिहीत असतानाच, जीवनाला दिशा देणारे अत्यंत थोर विचार यात मांडले आहेत.

३. मनातील मनापासून…

हे वाचताना प्रत्येक ओळ किती मनापासून लिहिली आहे, याची जाणीव पावलोपावली होते. प्रसंगांचे वर्णन इतके हुबेहूब आहे की आपण स्वतः त्या प्रसंगाचा एक भाग आहोत असे वाटू लागते.

बालपण, कोल्हापूरच्या आठवणी आणि रंजक प्रसंग

भोगावती नदीचा प्रसंग:

 निसर्गसौंदर्य पाहत असतानाच, अचानक सुंदर भोगावती नदीच्या पात्रात ८ वर्षांच्या दिलीपदादांच्या जीवावर बेतलेला प्रसंग अंगावर काटा आणतो. म्हशीच्या अंगावर घातलेली सायकल डोळ्यांसमोर दिसते.

निर्मळ विनोद: स्वतःच्या उंचीचे वर्णन वाचताना गंमत वाटते. स्वतःवरच विनोद करून एक निर्मळ मन कसे जतन करता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

शालेय जीवन व सकारत्मकता: 

सगळी शाळा आणि मजबूत मुलांचे काम पाहून ‘घोकंपट्टी वाचून बालपण आठवले’. ज्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या, त्यांच्याविषयी तक्रार करत बसण्यापेक्षा, त्या कमतरतांनी माणसाला कसे कणखर आणि धीट बनवले, हा सकारात्मक विचार मनाला भावतो.

भावनांची जपणूक: 

गाण्याची हौस कशी शमली हे वास्तव पण मनात कोणतीही खंत न बाळगता लिहिले आहे. ‘मोठ्यांच्या नजरेतील पातळ होणारी जरब हे त्यांचे प्रेम’ अशी सुंदर वाक्ये वापरून कटू अनुभवांची तीव्रता कमी केली आहे.

संस्कारांची शिदोरी: 

वडिलांनी ‘रेडिओ स्टार’ यांचे शास्त्रीय गायन गणपतीसमोर आयोजित करणे, ही आठवण कायमस्वरूपी जतन करण्यासारखी आहे. लहानपणी गोळा केलेल्या नोटा अशाच प्रसंगांतून नकळत मनावर चांगले संस्कार करून जातात.

कोल्हापूरचा काळ व शाळा प्रवेश: 

कोल्हापूरमधील विविध कार्यक्रम आणि तिथला तो सुवर्णकाळ लेखकाने सुंदर अनुभवला. शाळेतील पहिल्या प्रवेशाचे अनुभव अत्यंत रंजक आहेत. शाळेतील अनुभव आणि भाषणातील आज्ञा वाचून गंमत वाटते आणि त्या लहान वयात काय घडले असेल, याचा अंदाज येतो.

रेडिओचा स्कोअर: 

रेडिओवर ऐकून लिहिलेला स्कोअर वाचकाला थेट बालपणात घेऊन जातो. स्वतःमधील उणिवा इतक्या विनोदी पद्धतीने मांडल्या आहेत की त्यांचे रूपांतर सकारात्मकतेत होते आणि वाचताना चेहऱ्यावर हसू येते.

कौटुंबिक मूल्ये आणि बदलता काळ

व्यास बोळातील घर: या घराचे वर्णन अतिशय सुंदर आहे. सर्व प्रकारच्या गैरसोयी असूनही कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवर असलेले अथांग प्रेम आणि ते कौटुंबिक पाश भौतिक सुविधांच्या पलीकडचे कसे असतात, हे लेखकाने फार छान मांडले आहे.

पिढ्यांमधील अंतर: 

एकमेकांची पुस्तके अनेक वर्षे अनेक भावंडांनी वापरणे ही आजच्या पिढीला अज्ञात असलेली पद्धत आपल्या पिढीने कशी अंगीकारली होती, याचे सुरेख वर्णन आहे.

जुन्या आठवणी व करमणूक: 

‘फोनचा उत्सव’ आणि त्यासंबंधीच्या आठवणींमुळे जुने दिवस आठवतात. ‘पु. लं. च्या व्यक्तिरेखा ऑफिसमध्ये सापडल्या असत्या’ हे वाक्य मनाला खूप आवडते.

क्रिकेट, सिनेमा आणि रेडिओ: 

शालेय जीवनातील क्रिकेट व सिनेमाचे किस्से छान आहेत. त्या काळातील हिरोंची वर्णने मस्त जमली आहेत. आपल्या पिढीसाठी वरदान ठरलेल्या ‘रेडिओ’चे वर्णन आणि त्यासोबतच दूरदर्शनची झालेली प्रगती व कार्यक्रमांची झालेली अधोगती याचे वास्तववादी वर्णन केले आहे.

संगीत आणि कला: 

संगीत नाटके बघण्याचा आनंद, संगीताची आवड आणि परिस्थितीची सांगड यांचे वास्तव दर्शन घडते. ‘छोटा गंधर्व’ यांची भेट म्हणजे लेखकाच्या संगीत व स्वरसाधनेला मिळालेले गोड फळच आहे.

सामाजिक जाणिवा व चमत्कार: 

माणसाची सामाजिक गरज अनुभवातून मांडली आहे. सामुदायिक उत्सव का व कसे आवश्यक असतात, याचे महत्त्व समजते. घरातील छोटे समारंभ ते आजचे ‘इव्हेंट’ यातील फरक स्पष्ट केला आहे. ‘प्लेग ते कोविड’ मधील अनुभव आणि ‘आईची दृष्टी परत येणे’ यांसारखे चमत्कार दर्शवणारे अनुभव थक्क करतात. वाईटातून चांगले कसे शोधावे, याची एक नवी दृष्टी हे लेखन आपल्याला देते.

काश्मीरची सहल: 

आपल्या सहलीचे आणि काश्मीरवर लिहिलेल्या कवितेचे वर्णन निसर्गाची आणि अध्यात्माची सुंदर माहिती देऊन जाते.

 स्वलिखित कविता (पुस्तकाचा दुसरा भाग)

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात लेखकाच्या स्वतः रचलेल्या उत्कृष्ट कविता आहेत:

यात सुरुवातीला सर्व देवतांचे ध्यानरूपी आवाहन केले आहे.

त्यानंतर आई, वडील, पितर, गुरु, आरोग्य, कलाकार, मोबाईल, नातवंडे, कठीण काळ आणि रामनाम अशा सर्वसमावेशक विषयांवर अतिशय सुंदर कविता लिहिल्या आहेत.

हे सगळे विविध अनुभव लेखकाने आपल्या ‘उल्हास शब्दफुलांत’ अतिशय सुंदर रीतीने गुंफले आहेत. थोडक्यात सांगायचे तर, हे पुस्तक वाचताना लेखकाचा संपूर्ण ‘जीवनपट’ वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंतपणे उभा राहतो!

पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आठवणी अंगाराच्या” – लेखक : विश्वास विनायक सावरकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“आठवणी अंगाराच्या” – लेखक : विश्वास विनायक सावरकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : आठवणी अंगाराच्या

लेखक : विश्वास विनायक सावरकर

पृष्ठे : १९८

मूल्य : ३००₹ 

आठवणी अंगाराच्या’ या पुस्तकाची ही चतुर्थ आवृत्ती एप्रिल २०२३ मध्ये प्रसिद्ध झाली. या पुस्तकाचे लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चिरंजीव विश्वास सावरकर हे आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका व्यक्त केली, ती त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे – –

तात्यांच्या आठवणी असंख्य आहेत. कुटुंबातल्या माणसांपुढे आपण अनेक आठवणी केवळ व्यक्तीच्या आठवणी म्हणून सांगतो व ऐकतो; पण या आठवणी माझ्या वडिलांच्या असल्या तरी त्या एका राष्ट्रीय पुढाऱ्याच्या असल्याने त्यांच्या काही आठवणी मी अशा निवडल्या आहेत, की, ज्या वाचल्याने तात्यांच्या स्वभावाचं दर्शन व वागण्या-बोलण्यातून त्यांचं देशप्रेम व तत्त्वनिष्ठा व्यक्त व्हावी.

त्याचप्रमाणे लोकांना सध्याच्या परिस्थितीतही त्यांनी पूर्वी विशिष्ट प्रसंगी दिलेल्या संदेशांचा उपयोग व्हावा, हाच दृष्टिकोन समोर ठेवून मी आठवणी लिहिल्या असून त्यायोगे तात्यांच्या जीवनाच्या घरगुती आणि सार्वजनिक बाजूंवरही प्रकाश पडावा.

त्याचप्रमाणे त्यांच्या घरगुती आवडी-निवडी, त्यांचे कुटुंबीयाशी बोलणं-चालणं, त्यांचा दैनंदिन कार्यक्रम यांविषयीची लोकांमध्ये असलेली उत्सुकताही थोड्याफार प्रमाणात पुरी व्हावी. ह्यापुढे माझ्या मनातील त्यांच्याविषयीच्या आदराविषयी लिहिणं हे मी गौण मानलं. काही जणांनी माहिती काढण्याच्या ओघात काही स्पष्ट व सविस्तर प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्या प्रश्नांना, वस्तुस्थितीला धरून मीही सुस्पष्ट व सडेतोड उत्तरं दिली. ती या लेखनात आली आहेतच.

तात्यांच्या वैयक्तिक वागणुकीतून व्यक्त होणारं त्यांचं देशप्रेम, तत्त्वनिष्ठा, दूरदृष्टी व पुढे अनेक वर्षं उपयोगी पडणारं मार्गदर्शन यांचं आकलन व्हावं हा मूळ हेतू या आठवणी लिहिताना डोळ्यांसमोर असल्याने अशा आठवणीं संबंधातील कालगणनेतील वा इतर तपशिलातील अचूकपणात क्वचित फरक पडण्याचा संभव आहे. परंतु या आठवणींमधील गाभा मात्र माझ्या वर वर्णिलेल्या मूळ हेतूच्या दृष्टीने पक्का आहे.

वर उल्लेखिलेल्या माझ्या मूळ हेतूच्या दृष्टिकोनातून मी या ज्या निवडक आठवणी लिहिल्या आहेत त्या लोकांमधील असलेली जिज्ञासा थोड्याफार प्रमाणात पुरी करतील, असा मला विश्वास वाटतो.

– – लेखक विश्वास सावरकर 

एकूण सहा प्रकरणांतून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुटुंबातील अन्य सदस्यांवर लिहिलेल्या या आठवणी आहेत. तसेच तात्या सावरकर यांची नात विदुला विश्वास सावरकर हिने आपल्या चौदाव्या वर्षी तात्यांच्या मे १९६३ ते फेब्रुवारी १९६६ या कालावधीतल्या काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या आठवणी या पुस्तकात आहेत. तसेच काही छायाचित्रेही आहेत. याबरोबरच ‘आझाद हिंद सेने’ची प्रेरक शक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा जोडलेला परिशिष्ट वाचनीय आहे. १९८६ मध्ये जेव्हा या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली होती त्या वेळी अनेक वर्तमानपत्रांमध्ये या पुस्तकाबद्दल छापून आलेले अभिप्रायही दिलेले आहेत.

या पुस्तकाची प्रस्तावना शंकर रामचंद्र दाते यांनी लिहिली आहे. त्यातील शेवटच्या परिच्छेदातील काही ओळी ‘संघर्ष याचं नाव सावरकर’, त्याचं स्वरूप विश्वासराव सावरकर यांनी लिहिलेल्या अनेक आठवणींतून प्रसंगोप्रसंगी व्यक्त झालं आहे. त्यायोगे त्या-त्या वेळच्या प्रसंगाचं शब्दचित्र साक्षात उभं राहातं. त्यांनी आपल्या पित्याच्या या आठवणी लिहून पितृऋण, तसंच समाजऋणही काही अंशी फेडले आहे. त्यांच्या या आठवणी म्हणजे ‘की घेतलं व्रत न हे अम्ही अंधतेने’ या सावरकरांच्या उक्तीचा साक्षात्कार होय. ‘

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘दि हिडन लाईफ ऑफ ट्रीज..’ – मूळ जर्मन लेखक : पीटर वोलेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘दि हिडन लाईफ ऑफ ट्रीज..’ – मूळ जर्मन लेखक : पीटर वोलेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक : द हिडन लाईफ ऑफ ट्रीज  

(The Hidden Life of Trees)

मूळ जर्मन लेखक : पीटर वोलेबेन (Peter Wohlleben)

मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर

हे एक अत्यंत रंजक आणि डोळे उघडणारं पुस्तक आहे. आपण झाडांना फक्त लाकूड किंवा सावली देणाऱ्या निर्जीव वस्तू समजतो, पण हे पुस्तक झाडांच्या एका विलक्षण आणि गूढ जगाची सफर घडवून आणतं.

पुस्तकाचा मूळ गाभा आणि विषय

पीटर वोलेबेन यांनी आपल्या अनेक वर्षांच्या वनपाल (Forester) मधील अनुभवावरून हे पुस्तक लिहिले आहे. झाडं केवळ उभी नसतात, तर ती एकमेकांशी संवाद साधतात, एकमेकांना मदत करतात आणि त्यांच्यातही ‘भावना’ असतात, हे त्यांनी या पुस्तकात मांडले आहे.

प्रमुख आकर्षणे 

झाडांचे सामाजिक जाळे हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. जंगलातील झाडं जमिनीखालील बुरशीच्या  माध्यमातून एकमेकांशी जोडलेली असतात. या नेटवर्कद्वारे ती अन्न, पाणी आणि धोक्याचे संदेश एकमेकांना पाठवतात.

एकमेकांना मदत करणे

 जर एखादे झाड आजारी असेल किंवा त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर शेजारील झाडं त्याला मुळांद्वारे पोषण पुरवतात.

मातृवृक्षाची भूमिका करतात. जंगलातील सर्वात जुनी आणि मोठी झाडं ही ‘आई’ सारखी काम करतात. ती आपल्या लहान रोपट्यांचे संरक्षण करतात आणि त्यांना वाढण्यास मदत करतात. इतके दिवस माणसे, प्राणी हेच फक्त असे करतात असे वाटत होते.

धोक्याची सूचना देणे 

एखाद्या झाडावर कीटकांचा हल्ला झाला, तर ते झाड हवेत विशिष्ट गंध सोडते. हा गंध ओळखून आजूबाजूची झाडं स्वतःच्या पानांमध्ये विषारी द्रव्ये तयार करतात जेणेकरून कीटक त्यांना खाणार नाहीत.

पुस्तकाची बलस्थाने

सोपी आणि ओघवती भाषा!  लेखकाने अत्यंत गुंतागुंतीचे वैज्ञानिक विषय (उदा. वनस्पतीशास्त्र) अगदी साध्या आणि रंजक भाषेत मांडले आहेत. त्यामुळे सामान्य वाचकालाही ते सहज समजते.

संवेदना जागृत करणारे हे पुस्तक वाचल्यानंतर झाडांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. झाडं ही सजीव आणि सामाजिक प्राणी आहेत, याची जाणीव तीव्रतेने होते.

वैज्ञानिक पुरावे

 लेखकाने केवळ काल्पनिक गोष्टी सांगितलेल्या नाहीत, तर प्रत्येक दाव्याला विज्ञानाचा आणि संशोधनाचा आधार दिला आहे.

– – काही समीक्षकांच्या मते, लेखकाने झाडांचे खूप जास्त ‘मानवीकरण’ केले आहे. म्हणजे झाडांना माणसासारख्या भावना असतात (जसे की दुःख, आनंद, भीती) हे मांडताना वैज्ञानिक भाषेऐवजी लेखकाने काहीशी भावनिक भाषा वापरली आहे. पण ते आवश्यक वाटते. त्यामुळे झाडांच्या भावना अधिक प्रभावीपणे लक्षात येतात.

पुस्तकात काही मुद्दे परत परत आले असले तरी ते त्या ठिकाणी आवश्यक वाटतात.

‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ हे केवळ निसर्गप्रेमींसाठीच नाही, तर प्रत्येक व्यक्तीने एकदातरी वाचायला हवे असे पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्याला निसर्गाशी पुन्हा जोडते आणि पर्यावरणाचे रक्षण करणे किती गरजेचे आहे हे पटवून देते.

थोडक्यात सांगायचे तर, जर  निसर्गाची रहस्ये जाणून घ्यायला आवडत असतील आणि एका वेगळ्याच विश्वाचा अनुभव घ्यायचा असेल, तर हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. हे पुस्तक वाचल्यावर  जेव्हाही एखाद्या जंगलातून किंवा झाडांच्या जवळून जायची वेळ येईल, तेव्हा  त्यांच्यातील शांत संवाद नक्कीच जाणवेल.

हे पुस्तक वाचून जंगलात जाण्याची तीव्र इच्छा होते. आपण ज्या नैसर्गिक हालचाली समजतो, किंवा वाऱ्याने हलणे समजतो, त्यामागील अर्थ हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येतात. फारच छान पुस्तक आहे.

पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘स्वभाव – विभाव ’ – लेखक: डॉ. आनंद नाडकर्णी ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘स्वभाव – विभाव ’ – लेखक: डॉ. आनंद नाडकर्णी ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक :  स्वभाव – विभाव 

लेखक: डॉ. आनंद नाडकर्णी

प्रकाशन : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ‘स्वभाव-विभाव’ हे पुस्तक म्हणजे मानसशास्त्रासारखा गंभीर विषय सामान्य माणसाला समजेल अशा रसाळ भाषेत मांडलेला एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. माणसाचा स्वभाव कसा घडतो आणि त्यात बदल करणे शक्य आहे का, यावर हे पुस्तक प्रकाश टाकते.

पुस्तकाचा गाभा म्हणजे स्वभाव आणि विभाव

डॉ. नाडकर्णी यांनी या पुस्तकात मानवी व्यक्तिमत्त्वाचे दोन महत्त्वाचे पैलू उलगडले आहेत.

स्वभाव म्हणजे जी आपली मूळ वृत्ती आहे, जी आपल्याला अनुवंशिकतेने किंवा संस्कारांनी मिळते.

विभाव म्हणजे स्वभावाचे प्रकटीकरण किंवा आपण परिस्थितीला दिलेला प्रतिसाद.

शास्त्रीय मांडणी: लेखकाने यात ‘REBT’ (Rational Emotive Behavior Therapy) म्हणजेच ‘विवेकनिष्ठ विचार पद्धती’चा आधार घेतला आहे. क्लिष्ट मानसशास्त्रीय संज्ञा न वापरता अत्यंत सोप्या उदाहरणांतून त्यांनी मानवी मनाचा नकाशा मांडला आहे.

स्वयंमदतीसाठी मार्गदर्शक असणारे हे पुस्तक केवळ वाचनीय नाही, तर ते ‘कृती-प्रवण’ आहे. स्वतःच्या स्वभावातील दोष ओळखून ते कसे सुधारता येतील, याचे मार्गदर्शन यात मिळते.

नात्यांची समज उलगडून दाखवताना केवळ स्वतःचाच नाही, तर इतरांचा स्वभाव समजून घेतल्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमधील तणाव कसे कमी होतात, हे यात प्रभावीपणे सांगितले आहे.

पुस्तकात काही काल्पनिक पात्रांच्या संवादांतून प्रश्न-उत्तर स्वरूपात विषय मांडला आहे, ज्यामुळे वाचक त्या विषयाशी सहज जोडला जातो.

*पुस्तकाची बलस्थाने*

ओघवती भाषा: डॉ. नाडकर्णी स्वतः एक उत्तम लेखक आणि नाटककार असल्याने त्यांची मांडणी नाट्यात्मक आणि ओघवती आहे.

वास्तववादी दृष्टिकोन: स्वभाव पूर्णपणे बदलता येत नाही, पण तो ‘मॅनेज’ करता येतो, हा व्यावहारिक विचार लेखकाने दिला आहे.

दैनंदिन उदाहरणे: राग, भीती, मत्सर, न्यूनगंड यांसारख्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुस्तकातील उदाहरणे खूप उपयुक्त ठरतात.

निष्कर्ष

“आपण जसे आहोत, तसेच आपण का आहोत?”

या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या प्रत्येकाने ‘स्वभाव-विभाव’ वाचायला हवे. स्वतःला बदलण्याची इच्छा असलेल्या आणि मानसिक स्वास्थ्य जपणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक एका ‘दीपस्तंभा’सारखे काम करते.

जर स्वतःच्या वागण्यातील ‘पॅटर्न’ समजून घ्यायचा असेल आणि आयुष्यात अधिक समतोल हवा असेल, तर हे पुस्तक संग्रही असायलाच हवे.

पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ दोन पुस्तके – १) “ कथा धार्मिक प्रथांच्या “ २) “ जीवनप्रवास – लेखक : प्रा. देवबा पाटील ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ दोन पुस्तके – १) “ कथा धार्मिक प्रथांच्या “ २) “ जीवनप्रवास – लेखक : प्रा. देवबा पाटील ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

दोन पुस्तके : १. कथा धार्मिक प्रथांच्या २. जीवनप्रवास 

लेखक. : प्रा. देवबा शिवाजी पाटील. खामगाव.

 ९४२०७९५३०७

प्रकाशक. : १. नावीन्य प्रकाशन, पुणे

 २. कृष्णायन प्रकाशन, पुणे

पृष्ठसंख्या. : ७८, १२०

किंमत. : रु. १५०/. व रु. २००/- अनुक्रमे 

कथा धार्मिक प्रथांच्या आणि जीवनप्रवास….. एका विचार धारेचे दोन प्रवाह.

प्रा. देवबा शिवाजी पाटील हे नाव साहित्य क्षेत्रात एक वैचारिक साहित्यिक म्हणून सर्वश्रुत आहे. केवळ अध्यापनाचे कार्य न करता सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल अशी साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे. यामध्ये काव्यसंग्रह, धार्मिक रचना, देशभक्ती, निसर्ग, स्त्री विषयक काव्य, कथासंग्रह, बालकुमार व युवा साहित्य अशा विविधांगी साहित्याचा समावेश आहे. धर्म, परंपरा आणि विज्ञान यांची सांगड घालून कुमारांना समजेल असे लेखनही त्यांनी केले आहे. नुकतीच त्यांची दोन पुस्तके वाचनात आली. या पुस्तकांचा वाचकवर्ग भिन्न असला तरी लेखकाची मूळ विचारधारा पक्की असल्याने, एकाच नदीचे दोन प्रवाह वाहत असावेत तसे हे लेखन झालेले दिसते. पहिले पुस्तक आहे ‘ कथा धार्मिक प्रथांच्या ‘ व दुसरे पुस्तक आहे ‘ जीवनप्रवास ‘. या दोन्ही पुस्तकांना स्वतंत्रपणे समजून घेऊ.

१) कथा धार्मिक प्रथांच्या

हे पुस्तक बाल व किशोर वयोगटातील वाचकांसाठी आहे. त्यामुळे आपण वाचावे की नाही असा संभ्रम पडतो. पण काही पाने वाचल्यावर लक्षात येते की यातील खूपसे आपल्यालाही माहित नाही. म्हणजे विषय समजून घेण्याच्या बाबतीत आपण अजून ‘ बाल ‘ च आहोत. त्यामुळे फक्त बालकांनीच नव्हे तर पालकांनीही वाचावे असे हे संस्कारक्षम पुस्तक आहे.

या पुस्तकात रत्ना हे तेरा चौदा वर्षांच्या मुलीचे मध्यवर्ती पात्र आहे. ती हुशार व जिज्ञासू आहे. त्यामुळे तिला सारखे प्रश्न पडत असतात. या प्रश्नांची उत्तरे माहित असायला हवीत. ती माहिती न कंटाळता द्यायला हवी. हे काम करते रत्नाची आजी. रत्ना आणि तिची आजी यांच्यातील प्रश्नोत्तरातून घडणारा संवाद म्हणजे या ज्ञानदायी कथा !

कोणते प्रश्न पडतात बरे रत्नाला ? रोजच्या जीवनात ती जे पाहते, कुटुंब व समाजात जे जे दिसते त्या सर्वाविषयी तिला प्रश्न पडत असतात. धार्मिक आचरण करत असताना केवळ परंपरा म्हणून आचरण न करता त्यामागचे शास्त्र व विज्ञान समजून घेतले पाहिजे हे अत्यंत तळमळीने सांगण्यासाठी लेखकाने हा शंका निरसनाचा मार्ग निवडला आहे.

रत्नाला जे समजत नाही ते ती विचारते आणि तिला मिळणा-या उत्तरातून आपले ज्ञान वाढत जाते. उपासना म्हणजे काय ? स्तोत्रे, आरत्या का म्हणायच्या ? संकल्पयुक्त पूजा कशी असते ? देवाचा प्रसाद का घ्यायचा ? गोमूत्र, गोमाता, सडा, रांगोळी, स्वस्तिक, फुले, दुर्वा, सुपारी, बेल इत्यादी विषयीं तिला कुतूहल आहे. त्यामुळे ‘ हे सर्व कशासाठी ? हा प्रश्न‌ तिला पडतो. यासारख्या शंका दूर करतानाच लेखकाने शंख, शंखध्वनी, कापूर, समई, श्रीफळ, प्राणप्रतिष्ठा,

मंदिरातील कासव, नंदी, घंटा, आचमन, अशा धार्मिक क्रियांशी संबंधित अनेक वस्तू व प्रथा यांचे वैज्ञानिक संबंध समजावून दिले आहेत. यावरुन आपल्या लक्षात येईल की धार्मिक प्रथांच्या या संबंधी सर्वांच्याच मनात ज्या शंका असतात किंवा काही प्रमाणात अज्ञान असते ते नात व आजीच्या संवादातून दूर होते.

म्हणूनच हे पुस्तक फक्त बालकांचे नसून पालकांचेही आहे. कुटुंबातील सर्वांनी संवाद साधून समजून घ्यावे असे हे पुस्तक आहे.

२) प्रा. पाटील यांचे दुसरे पुस्तक आहे जीवनप्रवास‘.

जीवन प्रवास हा ललित लेख संग्रह हातात घेण्यापूर्वी प्राध्यापक देवबा पाटील यांचा आणि माझा काहीही परिचय नव्हता. त्यांनी विविध प्रकारचे विपुल लेखन केलेले असले तरी माझ्या वाचनात ते फारसे आलेले नव्हते. परंतु जेव्हा जीवनप्रवास हा लेखसंग्रह माझ्याकडे आला आणि तो मी वाचायला वाचायला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे प्राध्यापक पाटील हे जीवनाकडे अत्यंत गंभीरतेने आणि सूक्ष्मतेने पाहणारे लेखक आहेत. वाचन, मनन आणि चिंतन या तीनही पायऱ्या पार केल्या नंतर सरस्वतीच्या मंदिरात त्यांनी शब्दांची जी पूजा आरंभली आहे ती अत्यंत विलोभनीय आणि सर्व वाचकांच्या मनाला भुरळ घालणारी आहे. विचार प्रवर्तक, बोध प्रधान, स्फूर्तीदायक लेखांचा हा संग्रह म्हणजे लोकांना उपदेश करण्याची भूमिका नसून उलट आपल्याजवळ जे काही ज्ञान आहे, जे काही विचारांचे संचित आहे ते इतरांना वाटून द्यावे एवढा एकच उद्देश त्यांनी आपल्या सर्व लेखनामागे ठेवला आहे त्यामुळे ‘शहाणे करून सोडावे सकल जन ‘ हीच त्यांची भूमिका आहे.

या लेख संग्रहातील पहिला लेख ‘जीवन प्रवास ‘ या शीर्षकाचा आहे. या लेखाचे बारकाईने वाचन केल्यावर आपल्या लक्षात येईल की जीवन जरी एकच असले तरी त्याकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोन किती भिन्न भिन्न प्रकारचा असू शकतो. जीवनाला ते ओबडधोबड रस्ता म्हणतात तर त्याच जीवनाला त्यांनी धुळीने बरबटलेला रस्ता असेही म्हटले आहे. हा रस्ता चालल्यानेच संपतो. थांबण्याने नाही. रस्ता चुकला तरी आंतरिक विवेकशक्ती माणसाला योग्य मार्गावर आणून सोडते. आपल्या अंगावर धूळ उडणार नाही याची काळजी घेऊन रस्ता चालत राहायचे असते. जीवनाकडे ते अनेक दृष्टीने पाहतात. कधी जीवन त्यांना आगगाडी वाटते, तर कधी जीवन म्हणजे बुद्धिबळाचा पट आहे असे वाटते. माणूस आशेच्या रुळावरून धावत असतो, निराशेचा धूर सोडत असतो आणि सहानुभूतीच्या स्टेशनवर थांबत असतो. बुद्धिबळातील सोंगट्यांप्रमाणे प्रत्येक स्त्री-पुरुष आपापल्या आखून दिलेल्या मार्गाने प्रवास करत असतात त्यांना त्यांच्या मर्यादा ही महित असतात. जीवनात प्रतिकूल आणि अनुकूलतेच्या लाटा येतच असतात. त्यामुळे जीवन हे सागरा सरखे आहे असे लेखकाला वाटते. आयुष्यभर तडजोड करत करत जीवन जगावे लागते. त्यामुळे कधी ते तारेवरची कसरत आहे असे वाटते. परंतु त्याच वेळेला जीवन हा एक रंगत जाणारा खेळही आहे. कधी आक्रमक व्हायचे, कधी माघार घ्यायची याचे भान ठेवून खेळल्यास हा खेळ रंगत जातो. सकारात्मकता आणि आशावादी दृष्टिकोन, सामुदायिक जीवनातील जबाबदाऱ्यांची जाणीव, संकटांना सामोरे जाण्याची तयारी, जीवनाचा उद्देश ओळखून तो गाठण्याची तयारी या सर्वावर जीवनाचे यश अवलंबून असते. तीन खंडांच्या या जीवन पुस्तकातील प्रत्येक खंड महत्त्वाचा असतो. आपला स्वच्छ व सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनातील आनंद टिपत जाण्याची वृत्ती यावरच या तीनही खंडांचे यश अवलंबून असते. लेखकाचा जीवनाकडे पाहण्याचा हा व्यापक दृष्टिकोन उपदेशात्मक नसून मित्रत्वाच्या नात्याने केलेला सुसंवाद आहे असे म्हटले तर अगदी योग्य ठरेल.

आयुष्यातील कर्तव्य कर्म याविषयी ही लेखकाने विचार व्यक्त केले आहेत. कर्तव्य आणि हक्क सदैव सोबतच चालत असतात. प्रत्येकाला कर्तव्ये ही करावीच लागतात. जबाबदारी पेलावी लागते. परंतु कर्तव्य पालन करत असताना ईश्वराचे स्मरण ठेवून केले गेले तर हे देवाचेच काम आहे ही श्रद्धा मनात उत्पन्न होऊन कर्तव्य अगदी सहजपणे पार पाडले जाते. प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागणार आहे याची जाणीव ठेवून प्रत्येकाने कर्म केले तर आपल्या कर्माचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत हे प्रत्येकाने जाणून असावे.

 प्रयत्न व कष्ट हा प्रत्येकाच्या जीवनाचा मूलमंत्र असला पाहिजे असे ते म्हणतात. कठोर परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. यासाठी त्यांनी मुंगी, मधमाशी, छत्रपती शिवाजी महाराज अशी वेगवेगळी उदाहरणे देऊन आपला मुद्दा पटवून दिला आहे. परंतु आंधळेपणाने कष्ट न करता कामाचे व आपल्या उद्दिष्टाचे सुनियोजन करणे आवश्यक आहे. कामाच्या सूत्रबद्ध आराखडा असेल आणि आपल्या कामावर आपली श्रद्धा असेल तर यश नक्कीच मिळते. काम करण्याची वृत्ती असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. अनुभव आणि व्यवहार ज्ञान यांची सांगड घालून आणि मेंदूला सतत ताजेतवाने ठेवून आनंदाने कष्ट करत गेल्यास यश हे हमखास मिळतेच.

या ठिकाणी पहिल्या काही प्रकरणांविषयी सविस्तरपणे लिहिले आहे. उद्देश एवढाच की प्रा. पाटील यांचे लेखन किती वैचारिक आहे व वाचकांना ते कसे उपयुक्त ठरु शकते याची कल्पना यावी. यापुढील सर्व प्रकरणे ही जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश पाडणारी आहेत. माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू, त्यातील गुणदोष, मनोबल व चारित्र्य यांचे महत्त्व, सद्वर्तन व सद्विचार यांची आवश्यकता, मैत्री, पैसा, ताणतणाव, वाचन, मानसिक व शारीरिक आरोग्य व विश्रांती, धर्म, श्रद्धा, पूजा, प्रार्थना, समाजशीलता अशा सर्व बाजुंनी जीवनाविषयी विचार करून अत्यंत साध्या, सोप्या भाषेत ते व्यक्त करण्यात प्रा. पाटील यशस्वी झाले आहेत. या शिवाय एका प्रकरणात त्यांनी जीवनोपयोगी गोष्टींची चर्चाही केली आहे.

प्रत्येक लेख वाचताना लक्षात येते की त्या त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करुन मग लेख लिहिलेला आहे. उदाहरणार्थ, ‘ मनाचे सामर्थ्य ‘ हा लेख पाहू. हा लेख लिहीताना मन म्हणजे काय, मेंदूची कार्यपद्धती कशी असते, मन प्रसन्न का असले पाहिजे, मनाचा शरीराशी काय संबंध आहे, अंतर्मन व बहिर्मन म्हणजे काय, ते कसे कार्य करते, मन आणि विचार, इच्छाशक्ती यांचा काय संबंध आहे, मनाची चंचलता, मनाचा वेग तरीही ती एक शक्ती कशी आहे, अशा सर्व बाजुंनी मनाचा विचार करुन मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी काय करता येईल या विषयीही त्यांनी चर्चा केली आहे. अन्य लेखांच्या बाबतीतही असेच अभ्यासपूर्ण लेखन दिसून येते.

प्रा. पाटील यांच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखणीतून सुविचाराप्रमाणे अनेक चांगली वाक्ये बाहेर पडली आहेत. संकटे ही पुरुषार्थाची संधी असतात, कर्तव्य हा शास्त्राचा धर्म आहे तर प्रेम हा अंत:करणाचा धर्म आहे, सदाचाराविना जीवन म्हणजे होकायंत्राविना प्रवास करणारे जहाज, मैत्री म्हणजे सहवासाची सुरेल मैफिल असते, नशिबाचे कुलूप उद्योगाच्या किल्लीनेच उघडते यासारखी वाक्ये त्यांच्या चिंतनशीलतेचे दर्शन घडवतात.

‘जीवनप्रवास ‘ हा लेख संग्रह तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त ठरणारा आहे. किंबहुना जीवनाचा प्रवास करणा-या प्रत्येकाने क्षणभर थांबून, या संग्रहातील लेखांचे वाचन करुन पुन्हा प्रवास चालू ठेवला तर पुढचा प्रवास अधिक सुखकर होईल यात शंकाच नाही.

‘कथा धार्मिक प्रथांच्या ‘ आणि ‘ जीवनप्रवास ‘ ही दोन्ही पुस्तके वाचकांच्या ज्ञानात भर घालून सद्विचाराला प्रवृत्त करणारी आहेत.

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ऐवज एक स्मृतिबंध” –  लेखक : अमोल पालेकर ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

“ऐवज एक स्मृतिबंध” –  लेखक : अमोल पालेकर  ☆ परिचय – श्री जगदीश काबरे

०`पुस्तक : ऐवज एक स्मृतिबंध

लेखक : अमोल पालेकर 

प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन, पुणे

संपर्क : ८०८७२८८८७२

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांचे हे आत्मचरित्र वाचायला घेतले तेव्हा वाटले होते की, या चरित्रात त्यांच्या चित्रपटीय आणि नाटकीय आयुष्यात घडलेल्या घटनांची तसेच पडद्यामागच्या अनेक गोष्टींची चटकदार माहिती आपल्याला वाचायला मिळेल. पण पालेकरांच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपट आणि नाटकांनी जसे धक्के दिले तसेच या पुस्तकाने पालेकरांचा एक वेगळाच पैलू समोर आणला. जी सृष्टी माणसाला प्रसिद्धी वलयात गुंगवून टाकते त्या सृष्टीत राहून प्रसिद्धीचा झोत सातत्याने असूनही जमिनीवर राहून विचार करणारी अमोल पालेकरांसारखी माणसे थोडीच असतात, असे हे पुस्तक वाचून लक्षात आले. प्रत्येक गोष्टीचा खोलात जाऊन विचार करत प्रेक्षकानुनयापासून दूर राहत ते त्यांचे मनवांच्छित काम करत राहिले. म्हणूनच जगराहाटीपेक्षा वेगळ्या प्रकारचे चित्रपट आणि नाटक करण्याचे धाडस त्यांच्या अंगी आले. हे करत असताना वेळोवेळी त्यांनी स्वतःचेही परखड आत्मपरीक्षण कसे केले ते खालील परिच्छेदावरून स्पष्ट होते.

“मी कोण हा प्रश्न अॅरिस्टॉटल, फ्रॉईड, देकार्त (Aristotle, Freud, Descartes) ह्यांसारख्या विचारवंतांपासून ते पार विसाव्या शतकातल्या ‘4E दृष्टिकोना ‘पर्यंत तत्त्वज्ञ, मानसतज्ञ, साहित्यिक अशा अनेकांनी, तसंच विचार करू शकणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाने किसून काढला आहे. मीही त्यातलाच एक! आत्मभान ते 4Es (embodied, embedded, enactive & extended cognition) म्हणजेच जगताना नेणिवेमध्ये शोषला गेलेला भोवताल डचमळून वर येताना, स्वतःच्या जागृत अवस्थेत मिसळत ‘मी’ स्वतः बनतो. माझी ‘जाणीव-नेणिवेतली समज’ ते ‘माणसं परिसर निर्जीव गोष्टींशी संलग्न असलेलं माझं अस्तित्व’, अशा दोन प्रवाहांच्या निर्मितीला ऐंशी वर्षांचा मी साक्षीदार आहे. मार्क्स-लेनीन यांनी संबोधलेलं ‘वस्तुनिष्ठ वास्तव’ असो वा सार्थच्या अस्तित्ववादात संबोधलेल्या ‘मानवी आकस्मिकता’ असोत, त्या सगळ्यासकट ‘मी’ तयार झालो आहे. “

“या सगळ्या परिसरात ‘मी’ चाचपडत असतो. त्या चाचपडण्याची जाणीव होते, विशेषतः एखाद्या रात्री झोप लागली नाही की अंधारात स्वतःकडे बघत असताना! म्हणजे मी आडवा पलंगावर – नजर वर छताकडे; त्याच छतावर मला उलटा करून समांतर तरंगत ठेवला – नजर माझ्या शरीराकडे. माझ्याकडे बघत तरंगणाऱ्या माझ्या शरीराला जितका ‘मी’ समजलो असेन तितका कदाचित मला स्वतःलाही समजलेला नाही. उलटसुलट विचार, पानी-कम-चायच्या चालीवर कौतुक-कम-टीका, भीती, असुरक्षितता, आनंद, प्रेरणा, नैराश्य, गडद, फिका आणि त्याच्या अधलंमधलं सगळं… काय काय त्याने टिपलं असेल माझ्यातलं!”

“सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यातले बदल घडत असताना तो निरखत असेल. भोवताल बदलत राहतो तसा मीही बदलत राहतो. मला मात्र बदल होत असताना पकडता येत नाहीत. काही वर्षांनी मागे वळून पाहताना कधीकधी झालेले बदल लक्षात येतात. सतत सावध असणं वा राहावं लागणं हा शाप आहे माझ्या मते. त्या जागृत अवस्थेतून आलेली अस्वस्थता, भीती शरीरासोबत गारठून जाते. त्याच अस्वस्थतेतून रात्री डचमळ होत राहते. विशेषतः मागच्या दशकात गारठून राह्यलेली अस्वस्थता विरघळतच नाही… I feel I’m fossilized. आजूबाजूला इतकं सगळं बदललंय म्हणजे रस्ते-पूल उड्डाण मार्ग इमारती-बोगदे; तशीच माणसं मला माहीत असलेली, नसलेली, जवळची, लांबची, न दिसणारी… सगळीच बदललेली. जहरी, विष प्यायलेली माणसं नंगानाच घालत आहेत; ते विष दुसऱ्याकडे नुसतं बघूनही पसरत जातंय… एखाद्या साथीच्या विषाणूसारखं. माझ्यात ते शिरू शकत नाही कारण मी स्वतःला जपतो आहे, माझ्याभोवतीचा तो बर्फ अजूनतरी अभेद्यच राह्यला आहे. पण माझी आतली घुसमट इतकी विलक्षण आहे की माझ्यातल्या उत्सर्जित कार्बन डायऑक्साइडमुळे माझ्याच ठिकऱ्या होऊन मी बर्फाबाहेर येईन असं वाटण्याइतकी वेळ आली आहे. “

“एवढं कसं काय सगळं बदललं? का बदल जोखण्यात मी नाकामी राह्यलो? चाकूने भोसकून, खून करून पाण्यात लोटून दिलेल्या प्रेतातून लाल रक्त पृष्ठभागावर पसरत राहावं, तसा पाण्याचा लांबवर पसरलेला पृष्ठभाग केशरी दिसतोय. तो पसरत सगळी झाडं, डोंगर, दऱ्या, आभाळ एकरंगी करत समुद्राकडे झेपावतोय. पंचमहाभूतंच केशरी झाली तर माझ्या ठिकऱ्या होणंच इष्ट. मात्र त्या ठिकऱ्या काळ्या रंगाच्या असू देत. संपतानाही निषेधाची नोंद घेतली जावी – इतिहासाने नाही तरी तरंगत माझ्या पार्थिवाकडे बघत असलेल्या ‘तो’ने!” (पृष्ठ क्रमांक ८९-९०)

सोपं नसतंच असं स्वतःचं परखड निरीक्षण करून स्वतःला सोलण्यात! महात्मा गांधींनी जसे सत्याचे प्रयोग केले आणि स्वतःविषयीचं नागडं सत्य जगासमोर ठेवलं, त्याचप्रमाणे या पुस्तकात पालेकरांनी स्वतःविषयी पडखड परीक्षण करून त्यांच्या कमतरतांनाही तेवढ्याच निरपेक्षपणे जगजाहीर केलं आहे. हे पुस्तक नुसतेच स्मरणरंजन नसून एका सामान्य माणसाचा उत्तुंग व्यक्तिमत्वात रुपांतरीत होत जाणारा वैचारिक प्रवास आहे. वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात घडणाऱ्या घटनांना कुठलाही आडपडदा न ठेवता तेवढ्याच स्वच्छपणे मांडणे हे क्वचितच आत्मचरित्रांमध्ये दिसून दिसून येते. हे इंद्रधनुष्य अमोल पालेकर यांनी या पुस्तकात लीलया पेलले आहे. त्याबद्दल त्यांना standing ovation च द्यायला हवे. वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही, बोजड वाटणार नाही, शब्दबंबाळ होणार नाही आणि पाल्हाळीकही वाटणार नाही, एवढ्या कुशलतेने एखाद्या कसलेल्या लेखकाने लिहावे अशा पद्धतीने हे चरित्र उठावदार झालेले आहे. अमोल पालेकरांनी त्यांचे विचार एवढ्या अप्रतिमरीत्या शब्दबद्ध केलेले आहेत की प्रत्येक वाचकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्पाय स्टोरीज – लक्ष्मी पांडा” – लेखक : सॅवी कार्नेल अनुवाद : रमा हर्डीकर सखदेव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “स्पाय स्टोरीज – लक्ष्मी पांडा” – लेखक : सॅवी कार्नेल अनुवाद : रमा हर्डीकर सखदेव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : स्पाय स्टोरीज – लक्ष्मी पांडा 

 – – – नेताजींच्या सगळ्यात लहान हेराची कथा

लेखक : सॅवी कार्नेल

अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव

मूल्य: ३४०₹ 

लक्ष्मी पांडा यांची कथा ही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील (INA) सर्वात लहान वयाच्या गुप्तहेराची (spy) थरारक आणि सत्य कहाणी आहे.

दुसऱ्या महायुद्धात ब्रह्मदेश होरपळून निघत असताना चौदा वर्षांची लक्ष्मी तिच्या आई-वडिलांना गमावते. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीला भारताला स्वतंत्र करण्यासाठी, अथक प्रयत्नांनंतर ती आझाद हिंद फौजेच्या ‘झाशीची राणी’ पलटणीत भरती होते… वयाने सगळ्यात लहान सैनिक म्हणून…!

ही धाडसी मुलगी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल हेर होण्यापर्यंत मजल मारते. लहानखुऱ्या चणीची लक्ष्मी आपल्या हुशारीच्या जोरावर, अनेक अडथळे पार करत ब्रिटिशांच्या छावणीपर्यंत पोचते…महत्त्वाची माहिती गोळा करण्याच्या मोहिमेवर…!

या मोहिमेत ती कधी मोठ्या संकटांतून वाचते, तर कधी तिला अत्यंत भीतिदायक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. पण ती देशासाठी लढत राहते…

या प्रवासात तिला स्वतःच्या खंबीरपणाची, चिवटपणाची आणि धाडसाची नव्यानेच ओळख होते…

काळाच्या पडद्याआड गेलेल्या या वयाने सर्वात लहान हेराची, तिच्या धाडसाची, तिच्या त्यागाची, तिच्या संघर्षाची…

लक्ष्मी पांडा हिची प्रेरक कहाणी…

ही कथा एका अशा विस्मृतीत गेलेल्या नायिकेची आहे, जिने बालपणीच युद्धाची भीषणता अनुभवली आणि देशासाठी स्वतःला वाहून घेतले.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares