मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते — स्वामी विवेकानंद” – लेखिका : अंजली गोखले ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

“हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते — स्वामी विवेकानंद” – लेखिका : अंजली गोखले ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते–स्वामी विवेकानंद 

– – संन्यासी योद्ध्याची जीवनगाथा

लेखिका : सौ. अंजली गोखले.

 संपर्क: ८४८२९३९०११

प्रकाशक : विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग पुणे.

संपर्क: ०२०-२४४३२३४२

पृष्ठे. : ३५६

मूल्य. : रु. ४००/-

स्वामी विवेकानंद म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करुन शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणारे, श्री रामकृष्ण परमहंसांचे शिष्य, ज्यांनी हिंदू धर्म व हिंदुस्थानची ध्वजा जगात फडकवली… बस्स ! बहुतांश लोकांना स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल एवढेच माहिती आहे. खरे ना ? पण प्रत्यक्षात स्वामीजींचे व्यक्तीमत्व असे होते की ज्याला अष्टपैलू हा शब्दही तोकडा पडेल. कसे होते स्वामीजी नेमके ? त्यांच्या कार्याचा आवाका केवढा होता ? धर्माविषयी त्यांची मते किती स्पष्ट आणि ठाम होती ? अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रांना त्यांची भुरळ पडावी असे त्यांच्यात काय होते ? वेद आणि विज्ञान यावरील त्यांचे प्रभुत्व, धर्म आणि देशातील दरिद्रीनारायण यांच्याविषयी त्यांची असलेली मते, विचार आणि प्रत्यक्ष आचार यांचा त्यांनी साधलेला मेळ, युवक आणि शिक्षणपद्धती, उपासना आणि धर्माचरण, आत्मोन्नती आणि समाजोन्नती, त्या काळातील भारतीय महिलांची असलेली अवस्था,… अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मिरज येथील सौ. अंजली गोखले लिखित..

अंजली गोखले 

हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते… स्वामी विवेकानंद ‘ हे चरित्र एकदा तरी वाचावे.

एका असामान्य व्यक्तीमत्वाचे जीवन आणि कार्य अत्यंत साध्या, सोप्या भाषेत त्यांनी समजावून दिले आहे. स्वामीजींच्या बालपणापासून ते समाधीस्थ होण्याच्या दिवसापर्यंतचा विशाल कालपट त्यांनी अठ्ठावीस प्रकरणांमधून वाचकांसमोर मांडला आहे. स्वामीजींचे बालपण, तारुण्याच्या उंबरठ्यावरील कॉलेज जीवनातील प्रवेश, त्यानंतर श्री रामकृष्ण परमहंस यांची होणारी भेट, या भेटीनंतर पुन्हा पुन्हा भेट घेण्याची लागलेली ओढ लेखिकेने अत्यंत सुलभपणे रंगवून सांगितले आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या विषयी एक स्वतंत्र प्रकरण लिहिल्यामुळे वाचकाला त्यांच्याविषयी दुर्मिळ अशी माहिती मिळते. पुढील काळात स्वामीजींच्या कुटुंबावर आलेली संकटे, व्यवहारातील चटके आणि त्यातून गुरुकृपेने बाहेर पडण्याचा उपलब्ध झालेला मार्ग याचे वर्णन येते.

आपल्या गुरूंच्या सहवासात स्वामीजींचे व्यक्तिमत्व कसे विकसित होत गेले आणि त्यांच्या आयुष्याची दिशा कशी ठरली हे या सर्व लेखनातून स्पष्ट होते. आपल्या पुढील कार्याचा एक भाग म्हणून स्वामीजींनी केलेली संपूर्ण देशाची पदयात्रा, त्यांचा पहिला परदेश प्रवास, त्यानंतर शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत त्यांनी केलेले भाषण, या ध्येयापर्यंत पोहचताना आलेल्या अनंत अडचणी, गुरुकृपेने त्यातून बाहेर पडण्याचा मिळालेला मार्ग, त्यांचे अमेरिकेतील कार्य या सर्व घटना लेखिकेने अत्यंत सविस्तरपणे आपल्यासमोर मांडल्या आहेत. स्वामीजींचे पुन्हा एकदा अमेरिकेला जाणे, त्यांचे इंग्लंडमधील दोन दौरे, तसेच अन्य युरोपीय देशांमधील दौरे, त्यांची व्याख्याने, वेदांत प्रसार, वेदांत आणि विज्ञान यांची सांगड घालण्यासाठी चाललेला आटोकाट प्रयत्न, पश्चिमात्य राष्ट्रांची श्रीमंती आणि भारतातील दारिद्र्य पाहून त्यांच्या मनात चाललेला वैचारिक कोलाहल, रामकृष्ण मिशनची स्थापना, मार्गारेट नोबेल म्हणजेच भगिनी निवेदिता यांच्यासारख्या शिष्योत्तमेचा झालेला लाभ, मातृभूमीला परतल्यानंतर झालेले स्वागत, सभा, व्याख्याने, जगभरातील अनेक नामवंत विचारवंत, वैज्ञानिक, तत्त्वज्ञ, धनाढ्य यांच्याशी सर्व विषयावर झालेली चर्चा या सर्व बाबी अत्यंत सूक्ष्मपणे लेखिकेने नमूद केलेल्या आहेत.

समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भारावून टाकणारे स्वामीजींचे व्यक्तिमत्व, त्यांचा मनोनिग्रह, त्यांची ध्येयपूर्तीची आस, या सर्वावर विविध व्याधीमुळे काय परिस्थिती निर्माण झाली होती व त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून स्वामी आपल्या अंतिम ध्येयाकडे कशी वाटचाल करत होते याची कल्पना हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला येते. अनेक प्रकारच्या टीकांना सामोरे जाऊनही, वैयक्तिक बदनामी सहन करूनही, मनाचा तोल न ढळू देता एक संन्यस्त जीवन प्रवासी कशा प्रकारे मार्गक्रमण करत असतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामीजी !

त्यांच्या अलौकिक, असामान्य, अतुलनीय आणि अविश्वसनीय अशा कार्याचा आढावा घेताना लेखिकेने अनेक लहान-मोठे प्रसंग, भावनिक प्रसंग, स्वामीजींना भेटलेली लहान मोठी माणसे, त्यांच्याशी झालेले संवाद, मतभेद या सर्वांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे स्वामीजींचे कार्य अगदी सहजासहजी पार पडले असे कोणाला वाटत असेल तर ते किती चुकीचे आहे हे समजून येते. स्वामीजींचे विचार समजावून देताना लेखिकेने स्वामीजींच्या तोंडची अनेक वाक्ये उद्धृत केली आहेत. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोगाचे स्वामीजींनी केलेले पृथक्करण अत्यंत सोप्या शब्दांत लेखिकेने सांगितले आहे. त्यामुळे स्वामीजींचे विचार नेमके काय होते हे आपल्याला समजून येते.

शेवटच्या एका प्रकरणात त्यांनी स्वामीजींच्या काही ह्रद्य आठवणी कथन केल्या आहेत. त्यातून विविध लोकांची त्यांच्याविषयी असलेली मते वाचायला मिळतात. स्वामीजी चार वेळेला महाराष्ट्रात येऊन गेले होते. लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, नाटककार भा. वि. उर्फ मामा वरेरकर यांची व स्वामीजींची झालेली भेट, त्यांच्यातील विचारांची देवाणघेवाण, स्वामीजींनी केलेले मार्गदर्शन हे सर्व मराठी मनाला रंजक आणि स्फूर्तीदायक वाटणारे आहे.

परमपूज्य श्री रामकृष्ण परमहंस, माता सारदा देवी, भगिनी निवेदिता आणि श्री. गुडवीन यांचे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात काय स्थान होते हे या पुस्तकाच्या वाचनानंतर लक्षात येते. गुडविन हे नसते तर स्वामींचे विचार आपल्यापर्यंत पोहोचेल असते का ? त्यामुळे ते कोण होते हे जाणून घ्यायलाच हवे. प्रा. रोमा रोलॉनी स्वामीजींचे वर्णन ” विश्वात्म्याच्या वाद्यवृंदाने सादर केलेले उत्कृष्ट संगीत ” या शब्दात का करतात हे समजून घेतले पाहिजे.

स्वामीजींच्या पश्चात कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाबरोबरच विवेकानंद केंद्र या संस्थेचीही निर्मिती करण्यात आली. या विवेकानंद केंद्राचा परिचय व केंद्राचे महाराष्ट्रातील प्रकल्प याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचकांना त्याचा उपयोग होऊ शकेल.

विवेकानंदांचे व्यक्तीमत्व ‘इंद्रधनुष्यी ‘ होते असे लेखिकेने म्हटले आहे. या इंद्रधनुष्याचे सर्व रंग खुलवून दाखवणे हे खूपच अवघड काम आहे. परंतु लेखिकेच्या लेखणीने हे आव्हान पेलले आहे. अवघ्या साडेएकोणचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स्वामीजींच्या आयुष्यातील एक एक दिवस किती मोलाचा होता, आव्हाने आणि प्रतिकुलता यामुळे स्वामीजींना काय काय सहन करावे लागले, परंतु आपले गुरु श्री रामकृष्ण परमहंस व काली माता यांच्यावरील अगाध श्रद्धेमुळे झालेली ध्येयपूर्ती… हे सर्व वाचताना, स्वामीजी म्हणजे एक दैवी चमत्कारच होते याची खात्री पटते. या चमत्काराला शब्दबद्ध करुन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण काम सौ. अंजली गोखले यांनी केले आहे. आतापर्यंत त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. स्वामीजींचे हे जीवन चरित्र म्हणजे त्यातील मानाचा तुरा आहे. असेच बहुमूल्य लेखन भविष्यातही त्यांच्याकडून व्हावे ही सदिच्छा.!

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ज्ञानाई” – लेखिका : मंजुश्री गोखले ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ज्ञानाई” – लेखिका : मंजुश्री गोखले ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : ज्ञानाई

लेखिका : मंजुश्री गोखले

पृष्ठ: ५५१ मोठा आकार 

मूल्य: ९९९₹ 

मराठी संतसाहित्यातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. हा ग्रंथ संतकवी संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेवर ओवीबद्ध भाष्य म्हणून लिहिला. परंतु आजच्या वाचकांसाठी मूळ ओवींचा अर्थ समजणे अनेकदा कठीण जाते. हीच अडचण लक्षात घेऊन ज्ञानेश्वरीतील विचार सोप्या, आधुनिक आणि समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न “ज्ञानाई” या पुस्तकातून करण्यात आला आहे.

या पुस्तकात लेखिका मंजुश्री गोखले यांनी ज्ञानेश्वरीतील गूढ तत्त्वज्ञान साध्या आणि प्रवाही भाषेत उलगडले आहे. प्रत्येक अध्यायातील प्रमुख विचार, अध्यात्मिक संदेश आणि जीवनाला दिशा देणारे तत्त्व स्पष्टपणे मांडले आहेत. त्यामुळे वाचकाला मूळ ग्रंथाचा सार सहज समजतो.

पुस्तकाची भाषा अत्यंत सोप्या मराठीत, ओघवती आणि भावपूर्ण आहे. धर्म, अध्यात्म आणि जीवनमूल्ये यांची सांगड घालताना लेखिका वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतात. विशेष म्हणजे, हा ग्रंथ केवळ धार्मिक न राहता व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनदृष्टी घडवणारा ठरतो.

पुस्तकाची वैशिष्ट्ये :

– – ज्ञानेश्वरीचा सोपा आणि समजण्याजोगा अनुवाद

– – अध्यात्मिक विचारांचे आधुनिक संदर्भात स्पष्टीकरण

— – विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य वाचकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त

– – मराठी संतसाहित्य समजून घेण्यासाठी उत्तम मार्गदर्शक

संत ज्ञानेश्वर महाराज हे नाव घेतल्यावर मन प्रेमादराने भरून जाते. कोवळ्या वयात समाजाकडून होत असलेले आघात सोसत असतानाही त्याच समाजाच्या उत्थानासाठी झटणारे, आध्यात्मिक क्षेत्रातील आपली असामान्य उंची बाजूला सारत अठरापगड जातीतील संतांना आपलेसे करीत वारकरी संप्रदायाला वेगळे वळण देणारे, आध्यात्मिक क्षेत्रातील समानतेचा पुरस्कार करणारे आणि ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इत्यादी अक्षर साहित्याची निर्मिती करून मराठी भाषेला आणि भाषकांना उपकृत करणारे संत ज्ञानेश्वर महाराज सर्वांची माउली न होते, तरच नवल! त्यांनी भगवद्गीतेचा प्राकृत मराठी भाषेत केलेला रसाळ अनुवाद म्हणजे भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी! काळाच्या ओघात तत्कालीन मराठी भाषा आजच्या काळात दुर्बोध वाटू लागली आहे. हे जाणवून ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा आजच्या मराठी भाषेत सोप्या पद्धतीने केलेला ओवीबद्ध अनुवाद म्हणजे ‘ज्ञानाई’ हा ग्रंथ!

लेखिका मंजुश्री गोखले यांनी ज्ञानेश्वरीतील गूढ विचार सरळ आणि सुबोध भाषेत उलगडले आहेत.

संत साहित्याची खरी गोडी अनुभवायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.

“ज्ञानाई” हे पुस्तक म्हणजे ज्ञानेश्वरीच्या विशाल तत्त्वज्ञानाचे सोपे, सुगम आणि जीवनस्पर्शी रूप आहे. ज्यांना संत साहित्याची आवड आहे किंवा ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरते.

– – आजच आपल्या संग्रहात जोडा.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन” – लेखक : थॉमस एम. स्टर्नर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन” – लेखक : थॉमस एम. स्टर्नर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन 

लेखक : थॉमस एम. स्टर्नर

मूल्य: २५०₹ 

मन भटकतंय? लक्ष लागत नाही? काम अर्धवट राहतात?

– – यश मिळत नाही कारण मेहनत कमी आहे… असं नाही!

खरं कारण आहे — सरावाची चुकीची मानसिकता.

द प्रॅक्टिसिंग माइंड हे पुस्तक यश, एकाग्रता आणि कौशल्य विकास यामागील सर्वात महत्त्वाचा घटक — सातत्यपूर्ण सराव (Practice) — यावर आधारित आहे. लेखक सांगतो की आपण बहुतेक वेळा अंतिम परिणामावर लक्ष केंद्रित करतो, त्यामुळे ताण, अधीरता आणि अपयशाची भीती वाढते. पण जर आपण प्रक्रियेवर प्रेम करायला शिकलो, तर यश आपोआप मिळते.

हे पुस्तक “परिणामाऐवजी प्रक्रियेचा आनंद घ्या” हा साधा पण प्रभावी जीवनमंत्र शिकवते.

मुख्य संकल्पना

Present Moment Awareness — वर्तमान क्षणात काम करण्याची सवय.

Process over Result — परिणामापेक्षा सराव महत्त्वाचा.

Patience Development — संयम ही शिकता येणारी कौशल्य आहे.

Mental Discipline — मनाला प्रशिक्षित करता येते.

Small Consistent Steps — छोट्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मोठं यश.

पुस्तकाची वैशिष्ट्ये  

– – भाषा अतिशय सोपी व समजण्यासारखी.

– – दैनंदिन जीवनातील उदाहरणांमुळे संकल्पना लगेच समजतात.

– – विद्यार्थ्यांपासून कलाकार, खेळाडू, व्यावसायिक — सर्वांसाठी उपयुक्त.

– – आत्मविकासाकडे शांत आणि व्यावहारिक दृष्टिकोन.

हे पुस्तक “Hard Work” पेक्षा “Right Mindset” कसं महत्त्वाचं आहे हे शिकवतं. यश हे एका मोठ्या उडीने नाही तर दररोजच्या छोट्या सरावातून तयार होतं — ही जाणीव हे पुस्तक प्रभावीपणे करून देते.

– – स्वतःला घडवायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आणि राजू झाला बिझिनेसमन” – लेखक : श्री सुरेश हावरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आणि राजू झाला बिझिनेसमन” – लेखक : श्री सुरेश हावरे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : आणि राजू झाला बिझिनेसमन

– – नोकरीपेक्षा व्यवसाय करा!

लेखक : सुरेश हावरे

पृष्ठ: १९६

मूल्य: १९९₹ 

“उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा ” या बेस्टसेलरच्या लेखकाचे नवे पुस्तक!

– – – प्रत्येकाला जीवनात उपयोगी पडतील असे यशस्वी उद्योजकाचे अनुभवाचे बोल

हळूहळू मराठी तरुण उद्योग करायला लागलाय आणि त्याचप्रमाणे अनेक तरुण त्यासाठी उत्सुक असलेले दिसतायेत… अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंन मराठी माणूस उद्योग करण्यापेक्षा जास्त करून नोकरीच्या शोधात असायचा. मात्र आता मानसिकता बदलते आहे. सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांनी यासाठी केलेले प्रयत्न आता फळाला येत असलेले दिसत आहेत… जणू ते आता मराठी तरुणांसाठी मेंटॉरच झाले आहेत.

या पुस्तकात असलेली राजूची गोष्ट त्यांनी मेंटॉरच्या भूमिकेतूनच सांगितल आहे. डॉ. हावरे राजूला मुंबईतील फॅशन स्ट्रीट, झवेरी बाजार, धारावी, खाऊ गल्ली, पुस्तक गल्ली, फुलमार्केट अशा मोठ्या उलाढाली असलेल्या ‘मार्केट्स’ची ओळखअसलेल्या ‘मार्केट्स’ची ओळख करून देतात.

उद्योगाची सुरुवात कशी करावी याचे काही मूलमंत्र देतात…

उद्योग का करावा?

कर्ज घेण्यातील बारकावे

उद्योगाची भाषा

नेटवर्किंग

बदललेल्या विक्री व्यवस्थापनाचे मंत्र

निर्णय प्रक्रिया

व्यवसायातील चढउतार…

आणि उद्योगाच्या अशा विविध पैलूंची माहिती राजूला उपयोगी पडते आणि मग राजू होतो यशस्वी ‘बिझनेसमन’!

उद्योग सुरु करण्यासाठी, तो यशस्वी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी गोष्टीरुप मार्गदर्शन करणारं परिपूर्ण पुस्तक

… आणि राजू झाला बिझनेसमन!

या पुस्तकात 

उद्योगच करावा! पण का?

उद्योगच करावा! पण कसा?

उद्योगच करावा! पण कशासाठी?

– – या सर्व प्रश्नाची सविस्तर उत्तरे दिली आहेत.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अंकुरित आभाळ (काव्यसंग्रह)’ – कवयित्री : सुरेखा चिखलकर,  परिचय : डॉ. राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – डाॅ. सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अंकुरित आभाळ (काव्यसंग्रह)’ – कवयित्री : सुरेखा चिखलकर,  परिचय : डॉ. राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – डाॅ. सोनिया कस्तुरे ☆ 

पुस्तक : अंकुरित आभाळ (काव्य संग्रह) 

कवयित्री : सुरेखा चिखलकर 

प्रकाशक : भक्ती प्रकाशन, मिरज 

पृष्ठसंख्या : ९६ 

सुरेखाचा सुरेखसा कवितासंग्रह ” अंकुरित आभार “हाती लागला आणि पायाची उणीव असणारी  “ति “ची आभाळ भरारी बघून पेन उचलल्याशिवाय राहावलच नाही.

मुखपृष्ठ पाहता क्षणी तिथं बसलेली शुभ्रधवल वस्त्र धारी सुंदरी म्हणजेच शुभ्रधवल मन असणारी सुरेखा असे मला वाटले .तिची नजर आभाळाकडे… त्यातून डोकावणाऱ्या किरणाकडे आहे ..आणि त्या प्रकाश किरणात ती न्हाऊ पाहते.. म्हणजेच साहित्यप्रभेने ती उजळतेय! भक्ती प्रकाशनाने समर्पक चित्र दिले त्याबद्दल कौतुकास पात्र आहेत 

सुरेखा चिखलकर

मनीषाची  विस्तृत प्रस्तावना कवित्रीचा विशाल पट  उलघडणारी आहे. आणि सुरेखाचे मनोगत म्हणजे दोन्ही हातावर सुरू झालेला शंभर टक्के दिव्यांग प्रवासातून शंभर टक्के सबल व्यक्तिमत्त्वाला अधोरेखित करणारे वाटले. दिव्यांग असतानाही  शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण, स्वतःच्या पायावर उभे असलेली(ब्युटी पार्लर) आणि साहित्य व सामाजिक कामातील योगदान  ही सोपी गोष्ट नाही .असंख्य वेदनाताई शस्त्रक्रियांना पचवून दिव्यांगावर मात करून ज्या आत्मविश्वासाने  ती आज समाजात उभी आहे, जे स्थान तिने निर्माण केले आहे त्यासाठी वज्राराचे मन असावे लागते. ते नक्कीच तिच्याकडे आहे .टाकीचे घाव इतके सोसूनही कवितेतील कोमलता ही तिच्याकडे इतकी विपुल असावी याचं आश्चर्य वाटतं !आणि कविता ही कशा तर निराशेचा सूर नसणाऱ्या! कसे जमते सखे हे तुला इतके पॉझिटिव्ह राहणे? सोनाली नावांगुळ, सचिनदा कर्नाळ यांचे  मला कौतुक होते …पण आता त्यामध्ये तू ही सामील आहेस. आणि माझी गावकरी म्हणून तर अधिक उमाळा आणि अभिमान !!

असो तुझा कवितासंग्रह म्हणजे तुझ्या प्रतिमेला फुटलेले अंकुर आहेत ..त्यात असणाऱ्या साठभर कविता म्हणजे तुझ्या प्रतिभेचा, स्त्री जाणिवेचा ,संवेदनशीलतेचा, तुझ्या आतील आवाजाचा, तुझ्या उमेदीचा  तुझ्यातील प्रेम भावनेचा, आत्मभानाचा अविष्कार आहेत .

पण याच जमिनीत एक 

स्वप्नांचा एक अंकुर रुजला 

पंख नसतानाही आभाळाकडे

 झेप घेण्याचा ध्यास लागला 

 

 दोन्ही होत जमिनीवर

 उड्या मारण्याची हौस भारी 

पण यात जिद्दीतून फुलली 

 माझ्या अस्तित्वाची गाथा 

या एकाच कवितेवर बोलते .. कारण मला तिने खूप अंतर्मुख केले.पंख नसताना आभाळात उडण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे 

“मंजिल उनको मिलती है जिनके सपनो मे जान होती है| सिर्फ पंखो से कुछ नही, हौसले से उडान होती है|”

 – – हे तू अक्षरशः खरे करून दाखवले आहेस .तेही पंख नसताना !यातून तुझे प्रखर आशावादी चित्र तर समोर येते. “उड्या मारण्याची हाऊस भारी” हे म्हटलं तर एखाद्या अल्लड पोरकट मुलीने म्हणण्याचे उदगार! म्हणले तर गमतीने! पण तुझ्या बाबतीत उड्या माराव्या वाटणारे नक्कीच नाही. पण ज्या सहजपणे  तू ते रेखाटले आहेस त्यातील कारुण्याला तू जिद्दीची जोड देऊन अस्तित्वाची गाथा लिहिली आहेस हे मात्र खरे! 

मी सगळ्या कवितांचा उहापोह नाही करू शकत . वाचकानी स्वतःच त्याचा आस्वाद घ्यावा. या संग्रहामध्ये बायाच्या, निसर्गाच्या, प्रबोधनाच्या ,आयुष्याच्या विविध रंगाच्या, आणि हो..  प्रेमाच्या ही कविता आहेत .विविधरंगी ,विविधढंगी कविता वाचताना सुरेखाचे अंतर्मन उलगडत जाते आणि आपले रिकामे आभाळही अंकुरित , पुलकित झाल्याशिवाय राहत नाही .

आणि आनंद हरी सरांचा ब्लर म्हणजे या संग्रहाला मिळालेली पोचपावती आहे.

तेव्हा सुरेखा तुझ्या जिद्दी  सामाजिक व साहित्य प्रवासासाठी अंकुरणाऱ्या आभाळभर शुभेच्छा देऊन इथेच विराम घेते ..तर कधी खरेदी करतात हा कवितासंग्रह साहित्यरसिकानों?

परिचय : डॉ. राजश्री पाटील

प्रस्तुती : डॉ. सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “शिवभूमीची शौर्यकथा” – लेखक : श्री गोविंद अनंत मोडक ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “शिवभूमीची शौर्यकथा” – लेखक : श्री गोविंद अनंत मोडक ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक: शिवभूमीची शौर्यकथा

– – – महाराष्ट्राचा गोष्टीरूप इतिहास 

लेखक: श्री गोविंद अनंत मोडक

पृष्ठ: २४१

मूल्य: ३५०₹ 

श्री. गोविंद अनंत मोडक, यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी संपादित केलेल्या ह्या दुर्मिळ पुस्तकात महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती फारच सुंदर लिहिली असून, ती वाचताना कंटाळा येत नाही, सर्व माहिती लिहिताना पाल्हाळ न लावता लिहिली असल्यामुळे तीनवेळा जरी हे पुस्तक कोणत्याही तरुणाने किंवा तरुणीने मन लावून वाचले तरी हा महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास त्याच्या मनात पक्का ठसेल.

सदरहू पुस्तकाची अनुक्रमणिका जरी सहज चाळली तरी ‘छत्रपती श्री शिवाजीराजे’ ह्यांच्या जन्मापूर्वीच्याही काळाचा आढावा घेऊन, शिवशाही कशी गाजली, कशी अस्त पावली, पेशवाई कशी सुरु झाली आणि पुढे एकंदरच मराठ्यांचे राज्य ‘कसे बुडाले’ इत्थंभुत माहिती सर्वच तरुण मुलामुलींना आणि प्रौढांनाही वाचायला मिळेल.

ह्या पुस्तकाची प्रस्तावना वाचून असे लक्षात येते की, इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि संशोधक ह्यांना सदरहू पुस्तक कसे समजावून द्यावे ह्याबाबतच्या पाच-सहा विशेष सूचनाही लेखकाने लिहिल्या आहेत.

 महाराष्ट्राचा गोष्टीरूप इतिहास” हे पुस्तक मराठी इतिहासाचा थरारक, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण प्रवास आहे.

शिवरायांच्या तलवारीपासून पानिपतच्या रणांगणापर्यंत असे वीर जे धन दौलतीसाठी नाही लढले, ते स्वतःसाठी नाही लढले, ते राष्ट्रासाठी, आपल्या मातीसाठी, स्वराज्यासाठी, आपल्या शिवरायांसाठी लढले. रक्त, श्रद्धा आणि धगधगत्या ज्योतीने महाराष्ट्र घडवणाऱ्या वीरांचे जगणे तसेच विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला पुन्हा जिवंत करणाऱ्या ऐतिहासिक गोष्टींचा हा संग्रह आहे. हा संग्रह महाराष्ट्राच्या वैभवशाली भूतकाळाची अनोखी सहल वाचकांना घडवतो.

यात शूर चांदबिबी व हुशार मलिक अंबर, भोसले घराण्याचा उदय, शहाजी राजांची कर्तबगारी शिवबांचे बालपण, स्वराज्य स्थापनेची पूर्वतयारी, स्वराज्य स्थापना, शहाजी राजांची कैद, अफजलखानाचा वध, बाजीप्रभूंचा पराक्रम, शाहिस्तेखानाची स्वारी, बादशहाशी समेट, कपटाने धरले पण युक्तिने सुटले, स्वराज्य व्यवस्था, गड आला पण, सिंह गेला, दोन मोठ्या लढाया, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, मराठी राज्यावरील आरिष्ट, स्थलांतर, जगण्यासाठी पराकाष्ठा, मराठी राज्यांत दुही, बाळाजी विश्वनाथांस पेशवाई कशी मिळाली, मराठी राज्याच्या वाढीची तयारी, निजामाचा मोड, शिंदे होळकरांचा उदय, गजेंद्रमोक्ष, कोल्हापूरकर संभाजी सभेट, आपसांत लढाई, बाजीरावांची धडाडी, ‘‘माझे मस्तक तरी किल्ल्यात पडू दे! ’’, आता हिंदु- झाले पाहिजे, माळव्याची सनद, आधी एकी मग मुलुखगिरी, शाहूंचा मृत्यु, इत्यादी अश्या एकूण ५९ गोष्टी या संग्रहात समाविष्ट केलेल्या असून सनावली आणि कठिण शब्दांचा कोश हि दिलेला आहे.

इतिहास गोष्टीच्या स्वरूपात – सोपा, रंजक व शैक्षणिक दृष्टिकोनातून मांडलेला विद्यार्थी, शिक्षक, वाचक आणि इतिहासप्रेमींसाठी आदर्श ग्रंथ – – 

मराठी साम्राज्याचा अभिमान जागवणारा प्रेरणादायी इतिहास“शिवभूमीची शौर्यकथा”

हे पुस्तक, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीतल्या सर्वांनीच वाचण्याइतके सोप्या आणि भाषेची लांबण टाळून लिहिलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट असून त्यात सनावली, प्रसिद्ध व्यक्तींचा कार्यकाळ इ. माहिती असून, बऱ्याच ऐतिहासिक शब्दांचे अर्थही त्यात दिलेले आहेत.

गडकोट किल्ल्यांवर भटकंती करणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्तीच्या संग्रही असावे, असे हे पुस्तक आहे. सर्वच तरुणांना हे पुस्तक आवडेल अशी आम्ही आशा करतो.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “जिनॉमिक्स” – लेखक : डॉ. संजय गुप्ते व डॉ. अविनाश भोंडवे  – परिचय : डॉ. सुहास नेने  ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जिनॉमिक्स” – लेखक : डॉ. संजय गुप्ते व डॉ. अविनाश भोंडवे  – परिचय : डॉ. सुहास नेने  ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  जिनॉमिक्स – मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा

 – – – अद्भुत विज्ञान शाखेची सर्वांगीण ओळख

लेखक : डॉ. संजय गुप्ते, डॉ. अविनाश भोंडवे,

पाने : २८१

मूल्य: ४७५₹ 

जिनॉमिक्स मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा’ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नामवंत स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते आणि आजवर आरोग्यविषयक पंचवीस पुस्तकांचे लेखक, फैमिली डॉक्टर, तसेच आरोग्य विश्लेषक म्हणून सुविख्यात डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहिलेले पुस्तक ‘ रोहन प्रकाशन’तर्फे नुकतेच प्रकाशित झाले.

जिनॉमिक्स किंवा जनुकशास्त्र या जीवशास्त्राच्या उपशाखेत, एखाद्या जीवाच्या सर्व जनुकांचा (जीन्सचा) आणि त्यातील डीएनएच्या संपूर्ण रचनेचा, कार्याचा, विकासाचा आणि रोगांशी असलेल्या संबंधाचा अभ्यास केला जातो. जिनेटिक्स किंवा अनुवंश शास्त्र, हे एखाद्या विशिष्ट जनुकाचा वैयक्तिकरीत्या अभ्यास करते. जेम्स वॉट्सन आणि फ्रान्सिस क्रीक यांनी लावलेल्या डीएनएच्या दुहेरी हेलिक्सचा शोध हा या क्रांतीचा पाया होता. जिनॉम मॅपिंग, क्रिस्पआर सिस्टीम, क्रिस्पआर-एसकेपी प्रक्रिया हे या पायावर बांधलेले वरचे मजले आहेत. कृत्रिम मानवी जिनॉम तयार करण्याचे तंत्र, म्हणजे सिंथेटिक जिनॉम प्रोजेक्ट, हा त्याचा कळस आहे. कुणी सांगावे, आयव्हीएफमुळे, कस्टमाईज्ड, डिझायनर बाळसुद्धा अगदी मनाला हवे तसे, प्रयोगशाळेत तयार करता येऊ शकेल आणि तेदेखील मातेच्या आयुष्यातल्या कोणत्याही वयात. या सर्व प्रगतीचा आढावा सोप्या भाषेत या पुस्तकात घेतला आहे.

जनुकीयशास्त्राची सारी मदार जिनॉमवर असते. जिनॉम या सहा अब्ज (तीन अब्ज जोड्या) अक्षरांनी सजलेला, अगणित पानांचा ग्रंथ आहे. ४६ गुणसूत्रे ही त्यातील प्रकरणे आहेत. जीन्स किंवा जनुके ही त्यामधील वाक्ये आहेत आणि बेसेस, न्यूक्लिओटाईड किंवा कोडॉन हे त्यामधील शब्द आहेत. जिनेटिक्सची मूळाक्षरे गिरवताना या पुस्तकात जीनेटिक्स आणि जिनॉमिक्स यांची प्राथमिक ओळख, डीएनएचे कार्य, अनुवंशिकता, उत्परिवर्तन, आनुवंशिक आजार, जनुकीय चाचण्या, त्यांची आवश्यकता, डाएट अशा विविध विषयांवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. जिनॉमिक्सचा केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर शेती, शिक्षण, आहार, क्रीडा आणि गुन्हे अन्वेषणशास्त्र या क्षेत्रात कशा रीतीने कायापालट होतो आहे, याबद्दल या पुस्तकात सविस्तर भाष्य केलेले आहे.

सर्व जगाला भेडसावणाऱ्या कर्करोगाबाबत, कर्करोगाचे जीवशास्त्र उलगडून सांगत आणि या विषयाशी संबंधित मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे.

जनुकीय चाचण्या जनुकीय विकारांसाठी आवश्यक आहेत, असे सांगितल्यानंतर त्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपलब्ध चाचण्या, त्यातही पारंपरिक व खास प्रगत तंत्रज्ञानातील अशी विभागणी करून प्रत्येकातील फायदे तोटे विशद केले आहेत.

जनुकशास्त्राच्या इतिहासात दीपस्तंभासारख्या असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांची नावे घेऊन त्यांना मानवंदना द्यायला लेखक विसरलेले नाहीत. सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोलीने, स्तनाच्या कर्करोगाबाबत, जनजागृती आणि लोकहिताच्या दृष्टीने केलेल्या कृतीचे कौतुकही ते करतात. ‘जन्माला येणाऱ्या बाळाचे लिंग, पुरुषाच्या गुणसूत्रावरच ठरत असते’, हे स्पष्ट करताना मुलीला जन्म देणाऱ्या मातांना त्रास देणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीला फटकारायला लेखक मागेपुढे बघत नाहीत.

कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीलाही जिनॉमिक्सच्या विश्वात भरारी घ्यावीशी वाटावी, अशा पद्धतीने पुस्तकाची मांडणी केल्यामुळे पुस्तकाचा आवाका वाढतो. सर्वांना समजेल, रुचेल अशा रोजच्या व्यवहारातील उदाहरणांनी, उदा. मांजा फिरकीभोवती गुंडाळलेला असणे, स्वतंत्र कार्यालय, विभागीय कार्यालय, सैनिकांचे हुद्याप्रमाणे रांगेत उभे राहणे, लाकडी पट्टीत ठोकलेले खिळे, समजावून सांगितले असल्यामुळे ते मनात ठसते.

मूळ इंग्रजी शब्दांचे ओढूनताणून मराठीत भाषांतर करण्याचा सोस टाळल्यामुळे मजकुरातील क्लिष्टता कमी झाली आहे. ठिकठिकाणी दिलेल्या आकृत्यांमुळे आणि तालिकांमुळे स्पष्टीकरणास पुष्टी मिळते. अवघड शब्दांची शब्दसूची दिल्यामुळे त्याबद्दल विशेष माहिती मिळविणे सोपे जाते.

मुखपृष्ठावरील रंगसंगती, उचित शब्दरचना आणि नागमोडी शिडीसारख्या डीएनएच्या चित्राने पुस्तकाबद्दलची उत्सुकता शिगोशिग वाढली आहे आणि जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा नक्की उलगडावा, असे वाटल्यावाचून राहत नाही.

समजण्यास अवघड असा हा विषय सरळ, सोप्या, सहज समजेल अशा भाषेत मांडून, या अ‌द्भुत विज्ञान शाखेचा अनोखा खजिना लोकांसाठी उपलब्ध करून दिला, याबद्दल डॉ. संजय गुप्ते व डॉ. अविनाश भोंडवे ही लेखकद्वयी अभिनंदनास पात्र आहे. यामुळे सर्वसामान्यांमधील जनुकीय शास्त्राबद्दलची भीती, अज्ञान आणि गैरसमजुतीची दरी मिटवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल याची खात्री वाटते.

पुस्तक परिचय: डॉ. सुहास नेने

 प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “पार्थसूत्र” — लेखक : श्री वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पार्थसूत्र” — लेखक : श्री वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

 

पुस्तक : पार्थसूत्र

लेखक – वैभव केळकर 

सहलेखिका – डॉ. मेघना दलाल 

प्रकाशक- मधुर राजीव बर्वे.. दिलीप राज प्रकाशन.

मूल्य – रुपये ३००

“पार्थ सूत्र” अर्जुनाच्या जीवन यात्रेवरील एक प्रेरणादायी गाथा आहे महाभारत या महाकाव्याचा आधार घेत हे पुस्तक प्राचीन तत्त्वज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन यांची सांगड घालत लेखक द्वय वाचकांना अर्जुनाचे आयुष्य उलगडून दाखवतात.

साधारणपणे 200 पानांचे हे पुस्तक महाभारतातील माहित असलेल्या गोष्टी पार्थ म्हणजे अर्जुनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगते.

 एकूण 23 कथनातून हे महाभारत आपल्यापुढे उभे केले आहे. ‘,

शून्य प्रहरी’ या सुरुवातीच्या लेखातच अर्जुन आपला नातू परीक्षित याला सांगतो की, “थांबण्याची वेळ ज्याची त्यालाच ओळखता आली पाहिजे.. “सर्व पांडव द्रौपदीसह वानप्रस्थाला निघाले आहेत आणि अर्जुनाचे मन भूतकाळाच्या विहिरीत डोकावले आहे, जिथे उमटते चित्र ते पांडवांचे! ज्यांची विटी विहिरीत पडली आहे आणि ती काढून देण्यासाठी त्यांना एका तेजःपुंज ऋषीची मदत मिळत आहे.. ते प्रत्यक्ष द्रोणाचार्य त्यांचे गुरु झाले! भीष्माचार्य हे पितामह! पांडवांना असे गुरु आणि पितामह मिळाले हे त्यांचे भाग्यच! त्यांनी कौरव- पांडवांना ज्या गोष्टी सांगितल्या, त्यातून अर्जुनाचे भावविश्व समृद्ध होत होते. त्यांच्यामध्ये शिस्त आणि प्रेम यांचा संगम तेव्हा राहिला होता..

 अर्जुन एक विशिष्ट उद्देश घेऊन जगला. जे करायचं ते स्थिर बुद्धीने करत होता. जिथे शंका येईल तिथे श्रीकृष्णाची त्याला साथ होती. अर्जुन मूल्यांनी प्रेरित असा होता. या पुस्तकात अर्जुनाच्या वैयक्तिक संघर्षांचे आणि कठीण प्रसंगातील त्याच्या विचार प्रक्रियेचे उत्कृष्ट चित्रण केलेले आहे.

अर्जुनाचा काळ आणि सद्य परिस्थिती याची सांगड घालत लेखकांनी या पुस्तकातील लेखन केलेले आहे. अर्जुनाने केलेली प्रत्येक गोष्ट काल सुसंगत अशी होती की, त्यातून आत्ताही प्रत्येकाला काही शिकण्यासारखे आहे..

एकूण 23 लेखातून महाभारतात असणारे अर्जुनाचे स्थान, त्याचे विचार आणि त्या त्यावेळी अर्जुन कसा वागला, यासंबंधी लेखक द्वयीने विचारपूर्वक लेखन केले आहे. बालपण, द्रौपदी स्वयंवर, एकांत वास, वनवास, विराट युद्ध, कर्ण वध असे सर्व लेख आपल्याला अर्जुनाचे महाभारताशी असलेले नाते त्याच्या तोंडून व्यक्त करून दाखवतात.. अगदी वानप्रस्थाश्रमा पर्यंतचा अर्जुनाचा जीवन प्रवास यात आपल्याला उलगडून दाखवलेला आहे.

 द्रोणाचार्य, भीष्म यांच्या बद्दल अर्जुनाला असलेला आदरही येथे व्यक्त झाला आहे. द्रौपदी आणि इतर सर्व भाऊ यांच्या बद्दलचे प्रेम, कर्तव्य ही अर्जुनाने आयुष्यात सांभाळले होते. हे एक वेगळ्या प्रकारचे असे पुस्तक मला वाटले..

 महाभारतातील गोष्टी आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत तसेच मोठेपणी ही महाभारत अधिक सखोल त्याने वाचले आहे पण अर्जुनाच्या दृष्टिकोनातून महाभारत आणि त्याचा आधुनिक काळाशी असलेला संबंध हे अशा पद्धतीने लिहिलेले पुस्तक मात्र मी प्रथमच वाचले.

 प्रत्येक लेखात अर्जुन असा वागला होता आणि आताच्या काळात येणाऱ्या संघर्षात अर्जुन कसा वागला असता यासाठी होणारे वैचारिक मार्गदर्शन या पुस्तकात वाचायला मिळते. आपण प्रत्येक जण अर्जुनच असतो, की ज्याला वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते.

अधून मधून प्रसंगाला अनुसरून काव्य लेखन ही या पुस्तकात केलेले आहे. दर्शन वृत्ती, जिज्ञासा वृत्ती, स्वामित्व वृत्ती, संघ वृत्ती, रचना वृत्ती, युद्ध प्रवृत्ती, पलायन वृत्ती अशा विविध गोष्टी जशा पितामहांनी सांगितल्या त्यातून पार्थला मिळालेले शिक्षण हे आजच्या काळातही उपयुक्त आहे. इंद्रप्रस्थ नगरी उभारली तेव्हा राज्य कसे असावे? प्रजेसाठी काय काय करावे? तसेच सर्वांना शांत सुखी व समृद्ध जीवन देण्यासाठी राज्यकर्त्यांनी कसे वागावे? अशा बऱ्याच गोष्टींचा अर्जुनाने कसा विचार केला असेल याचे मनोज्ञ दर्शन या लेखक द्वयीने केले आहे.

एकंदरच पुस्तक वाचनीय वाटले आणि महाभारतातील मुख्य नायक पार्थ म्हणजेच अर्जुन याच्या विचाराचा मागोवा घेऊन त्यातून आपल्याला आत्ताच्या काळातही उपयुक्त असे काही ज्ञान मिळते हे विशेष!

“पार्थसूत्र” या पुस्तकामध्ये मला जे आवडले ते मी येथे लिहिले आहे. एकंदरच महाभारताविषयी आपल्याला आपुलकी वाटते आणि मानवी आयुष्य आणि त्यात घडणाऱ्या घटना ह्या पुरातन काळापासून तशाच आहेत. म्हणूनच म्हंटले जाते की महाभारतात जे आहे ते सर्वत्र आहे! आणि ते कालातीत आहे..

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “संभ्रमाचे सांगाती” – लेखक : डॉ. नंदू मुलमुले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“संभ्रमाचे सांगाती” – लेखक : डॉ. नंदू मुलमुले ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : संभ्रमाचे सांगाती  

लेखक : डॉ. नंदू मुलमुले

मूल्य : २५०₹ 

2017 सालच्या दैनिक लोकसत्ता ‘चतुरंग’ पुरवणीतील वर्षभराच्या लेखांचे हे संकलन आहे. मनोगतात डॉ. नंदू मूलमुले लिहितात, प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात. पण ह्या लेखमालेमुळे ‘मी एकटाच या जगात नाही’ हे वाचकांना सांगण्याचे आश्वासक काम ह्या लेखातून झाले. शिवाय मला हे नवीन ज्ञान प्राप्त झाले की वाचकांची भाषा, कथन शैली, अनुभव मांडण्याची आपलीशी केली त्यांना त्यात आपलेपण वाटू लागतो. त्यात कित्येकांना आपल्या समस्येची छाया दिसते. आपल्या समस्या कुणा तज्ञ व्यक्तीला नेमक्या समजल्या आहेत असं वाटू लागतं. सगळ्या समस्यांना झटपट उत्तर नसते. काहींना तर उत्तरेच नसतात तर काही वेगळ्या नजरेने पाहिल्यावर त्या समस्याच नाहीत हे कळते.

ताण हे परिस्थितीमुळे नाही तर आमच्या मनस्थितीमुळे निर्माण होतो, हे आपल्या लक्षात येते. परस्पर नातेसंबंधही मानसिक आरोग्याशी निगडीत महत्वाची बाब आहे. आयुष्यात आनंद हवा असेल तर अन्न, वस्त्र, निवारा या सोबतचे तुमचे आप्त, स्वकिय, मित्र यांच्याशी पूरक, संवादी नाते हवे हे जागतिक स्तरावर मान्य केलेले तत्व आहे. त्यासाठी संवाद हवा, त्यात एकवेळ वाद चालेल, थोडा विसंवाद ही चालेल पण असंवाद घातक. त्याच्या अभावी पालक मुलांपासून, पती पत्नी एकमेकांपासून आणि माणूस माणसापासून तुटून जातात. आता एका संवादाने कुणाचं आयुष्य बदलत नाही हे जरी खरे असले तरी त्याबद्दलची दिशा मिळू शकते हेही खरे आहे.

पुस्तकात एकूण 24 कथा आहेत. प्रत्येक कथा साधारण तीन चार पानांची आहे. त्यामुळे एक एक कथा वाचायला फारशा वेळ लागत नाही. शिवाय कथाच असल्याने कोणतीही वाचायला सुरुवात करता येते. प्रत्येक कथेत एखादी समस्या आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला मागायला जेव्हा पेशंट त्यांच्याकडे आला तेव्हाची त्याची मनस्थिती, त्याच्या मनातील विचार ह्याचे निरिक्षण अतिशय बारकाईने, तटस्थपणे डॉक्टरांनी केले आहे. शिवाय कुठेही त्याच्याबद्दल चेष्टेचा सूर त्यांच्या लिखाणात जराही जाणवत नाही. प्रत्येकाला सहृदयतेने समजून घेतात हे फार महत्वाचे.

एक कथा म्हणजे ‘एका रुग्णाची गोष्ट’. कथेतील नायक सामान्य केळी विकणारा माणूस. आपल्या पत्नीच्या औषधासाठी त्यांच्याकडे आला आहे; पण पत्नीला बरोबर न आणता. कारण तिला काम आहे, मुलं घरी आहेत, म्हातारी आईला सोडून येता येत नाही वगैरे अनंत कारणे देणारा. पण बायको थोडीशी शिकलेली असल्याने ती नवर्‍याबरोबर अगदी त्रोटक चिठ्ठी पाठवून काय होते ते कळवत असते. पण त्यातून डॉक्टरांना तिच्या आजाराचा नक्की अर्थबोध होतो. नवर्‍याची गुटक्यासारखी व्यसने, चार मुलांचा संसार वगैरे सर्व कारणे न सांगता त्यांना कळत जातात आणि ते प्रत्येक वेळी तिला औषध देतानाच तिच्या नवर्‍याला गुटका खाणे कसे धोकादायक आहे, मुलांची संख्या वाढू न देण्यासाठी ऑपरेशनचा सल्ला, त्यासाठी लागणारी सर्व मदत करतात आणि पेशंट कधीच न पाहाता ही हळूहळू तिच्यामध्ये कसा बदल होतो हे फार छान सहजपणे वर्णन केले आहे. कारण तिची मूळ समस्या वेगळीच होती.

पत्रकार लेखक अंबरीश मिश्र यांची प्रतिक्रिया  

माणसाच्या मनाचा थांग लागत नाही. तत्त्वज्ञ, कलावंत, शास्त्रज्ञ, संत-महात्मे माणसाच्या मनाचा गुंता सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात आणि भय, गंड, विकार, एकटेपण, दुभंगलेपण हा ‘धन्याचा माल’ पाठीवर घेऊन आपण सगळे आयुष्याच्या ओसाडीत भटकत असतो. बहुसंख्य तरून जातात; काही मागे घुटमळत राहतात, तडतडत राहतात. ‘दुख की लंबी रात’ असं जिणं जगत असतात.

डॉ. नंदू मुलमुले हे निष्णात मनोव्यथातज्ज्ञ आहेत; परंतु व्यावसायिक फायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी या प्रश्नाचा सुजाणपणे, समग्रपणे विचार केलाय. ‘संभ्रमाचे सांगाती’ हे पुस्तक म्हणजे त्यांनी आपखुषीनं स्वीकारलेल्या व्रताची सांगता आहे. मनोव्यथाग्रस्तांच्या केसेसचं निर्जंतुक संकलन, असं या पुस्तकाचं स्वरूप नाहीए. डॉ. मुलमुले जिव्हाळ मनानं देवाच्या लेकरांच्या गोष्टी सांगताहेत. वाचकांना त्या निश्चितच आवडतील. या पुस्तकामुळे आपल्या समाजाची भावनिक साक्षरता वाढीस लागेल, असा विश्वास वाटतो.

लॉकडाउन च्या काळात २०२१ साली या संग्रहातील कथांवर आधारित, प्रसिद्ध रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “मन सूद्ध तुझं” ही मालिका ‘एबीपी माझा’ वाहिनीवर तेरा भागांत प्रसारित झाली होती. प्रसिद्ध नायक स्वप्निल जोशी या मालिकेत मनोविकारतज्ज्ञाच्या भूमिकेत होते.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “फिनिक्स” – लेखिका – सौ. गौरी गाडेकर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

“फिनिक्स” – लेखिका – सौ. गौरी गाडेकर ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

पुस्तक : फिनिक्स

लेखिका – गौरी गाडेकर

प्रकाशक – नीता बुक एजन्सी

पृष्ठे –२२२ 

मूल्य – ४०० रु.

सौ. गौरी गाडेकर

गौरी गाडेकर या एक प्रथितयश कथालेखिका आहेत. त्यांचा कथालेख संख्यात्मकदृष्ट्या जसा चढता वाढता आहे, तसाच तो गुणात्मकदृष्टयाही चढता वाढता आहे. मोजकंच परंतु दर्जेदार कथालेखन त्यांनी केलं आहे.

त्यांच्या कथा प्रामुख्याने घटनाप्रधान आहेत आणि बहुसंख्य कथा मध्यवर्गीय जीवनावर आधारलेल्या आहेत, पण

त्या साचेबंद नाहीत. एक वेगळं अनुभविश्व, वेगळा आशय आणि व्यक्तिरेखांचं वेगळेपण त्यांच्या कथांमधून आपल्याला दिसतं. त्यांच्या नातं या अगदी पहिल्या संग्रहापासून त्यांच्या कथांचं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. त्यांच्या कथा आधी मासिकात प्रकाशित झाल्या आणि नंतर पुस्तक रूपाने वाचकांच्या भेटीला आल्या. नातं,

आऊटसायडर, सहज व इतर; तिसरं पुस्तक, हनिमून आजी आजोबांचा आणि यानंतर प्रसिद्ध झालेलं पुस्तक म्हणजे फिनिक्स. या शिवाय वादळातील दीपस्तंभ, मृत्यूवर मात, लिंकन ऑन लीडरशिपही ही त्यांची अनुवादित पुस्तके आहेत.

इथे मी विचार करणार आहे, तो ‘फिनिक्स’ या कथासंग्रहाचा. ‘फिनिक्स’ हे मिथक आहे. आपल्याच राखेतून ‘फिनिक्स’ पक्षी पुन्हा भरारी घेतो, असा लोकसमज आहे. इथे हे रूपकही आहे. जीवनातील निराशा, वैफल्य, औदासिन्य यांची राख बाजूला सारून पुन्हा उभारी घेणं, जीवनेच्छा बलवती होणं, आशा, उमेद वर्धिष्णू होणं, हेही ‘फिनिक्स’ पक्षाने राखेतून भरारी घेण्यासारखं आहे, नाही का? संग्रहातील काही कथांमध्ये असे दिसते.

संग्रहातील पहिलीच कथा ‘फिनिक्स’. त्यावरूनच संग्रहाचे नाव दिले गेले आहे,

‘फिनिक्स’. लेखिकेने, बर्‍याच दिवसांपूर्वी ‘फिनिक्स’ नावाची कविता लिहिली होती. नामसाम्यामुळे ती कविता, लेखिकेने सुरूवातीला दिली आहे. अतिशय सुरेख पण दुर्बोध अशी ही कविता आहे. विविध रगांच्या विविध स्वभावाच्या, विविध वर्तनाच्या व्यक्तिमत्वांनी त्यांचं कथाविश्व गजबजलेलं आहे.

यातील पहिलीच कथा ‘फिनिक्स ‘ अभय तिचा नायक. शाळेत यशस्वी नावाचा मुलगा त्याच्या वर्गात येतो आणि नाटकात अभयची राजा होण्याची संधी हुकते. टिपटॉप रहाणारा यशस्वी. अभ्यासात पुढे. परीक्षेत जास्त मार्क.

तो कधी मुद्दाम अभयला त्रास देत नाही. पण त्याच्या अस्तित्वाचं दडपण अभयवर येते. त्याचा आत्मविश्वास हरवतो. त्याच्यात न्यूनगंड निर्माण होतो. त्यात पुढे दोन वेळा त्याचं लग्नं मोडतं. इंद्राणीशी साखरपुडा होतो. ती तो मोडून चार दिवसात यशस्वीशी लग्न करते. मग अभय लग्नच करत नाही. बँकेत नोकरीला लागतो. बँकेत

कॉम्प्युटर येणार, कळल्यावर आपल्याला जमणार नाही, म्हणून व्ही. आर. एस. घेतो. त्याच्या चुलत बहिणीच्या सांगण्यावरून एका निवांत गावच्या एका रिझॉर्टमध्ये तो येतो. तिथलं शांत, निवांत वातावरण त्याला आवडतं. एकदा फिरून येताना तो तिथल्या एका वृद्धाश्रमाजवळ येतो. तिथे त्याला यशस्वी आणि त्याचा मुलगा भांडत

सलेले दिसतात. त्याची बायको नुकतीच पाच-सात दिवसांपूर्वी गेलेली असते. मुलगा त्याचं रहातं घर विकून टाकतो. त्याला वृद्धाश्रमात राहायचं नाहीये, पण मुलगा सक्ती करतोय. अभयच्या लक्षात येतं, ‘बायको गेली. मुलगा, सून, नात असूनही तो एकटा आहे. ना राहायला हक्काचे घर, ना स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. अभयला वाटतं, यशस्वी हरला, आपण जिंकलो. ही जाणीव त्याला आंतरिक उभारी देते. परतताना त्याला कॉम्प्युटर इंस्टिट्यूट लागते आणि त्याला वाटतं, आत जाऊन बघूयात तरी. ज्या कॉम्प्युटरच्या धास्तीने त्याने बँकेतील नोकरी सोडलेली असते, ती गोष्ट त्याला करून बघविशी वाटते. इथे त्याच्या मनाने उभारी घेतलेली असते, गेलेला आत्मविश्वास परत येतो, म्हणून कथेचं नाव ‘फिनिक्स’.

‘हक्काचे घर’ ही कथासुद्धा कथानायकाने प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या भरारीने ‘फिनिक्स’च्या कल्पनेशी जवळीक जोडते. प्रमोद त्याचा दादा आणि वाहिनी चाळीतल्या एका खोलीत रहात असतात. फ्लॅटमध्ये राहायचे वाहिनीचे स्वप्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ते काही शक्य नाही. तेव्हा वाहिनी ठरवते, जो फ्लॅट देईल,

त्याच्या मुलीशीच दिराचे लग्न करायचे. अर्थात प्रमोदला हे मान्य नाही. गावची मुलगी सांगून येते, तेव्हा, तो पळून जाऊन तिच्याशी लग्न करतो. तिथे सासरच्या घरी दोन खोल्या भाड्याने घेऊन रहातो. सासर्‍याच्या दुकानात काम करतो. गावच्या लोकांचा गरजेच्या वेगवेगळ्या वस्तू दुकानात ठेवतो. दुकानाची भरभराट त्याच्यामुळे होते. पुढे तो स्वत:चे स्वतंत्र दुकान काढतो. संधी मिळताच एक जुना बंगला विकत घेतो. त्याला थोडी डागडुजी, रंगारंगोटी करतो. बंगला नवा होतो. वास्तुशांतीला दादा- वहिनींना आणतो. सहा खोल्यांचा बंगला पाहून दोघेही खुश होतात. थाटात वास्तुशांत होते. दादा आजारी असतो. रात्री तो जातो. बंगल्यात राहण्याचे नाही, पण स्वत:च्या हक्काच्या घरात मरण्याचे त्याचे स्वप्न पुरे होते. प्रमोद म्हणतो, ‘डोक्यावर छप्पर मिळालं, पण नियतीने डोक्यावरचं छत्रच काढून घेतलं. ’

विविध प्रकारच्या आणि नमुन्याच्या व्यक्ती या संग्रहात आपल्याला भेटतात. सासूच्या (कुसुमच्या) कथा आपल्या नावावर देणारी सून (प्रिया) इथे आहे. (गुपीत) तुझा खोटेपणा मी जगासमोर आणीन, असं कुसुम म्हणताच ती उपहासाने म्हणते, ‘कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर? मी सांगीन माझंच हस्तलिखित यांनी चोरलं. ’ मी आता कथा लिहिणारच नाही, असं कुसुम म्हणते, तेव्हा प्रिया उद्दामपणे म्हणते, जोपर्यंत तुम्ही माझ्या उपयोगाच्या असाल, तोपर्यंतच इथे मुलाजवळ, नातींजवळ राहू शकाल, नाही तर तुमची गावी रवानगी होईल. शेवटी कुसुमला नावापेक्षा, मुला-नातींचा सहवास महत्वाचा वाटतो आणि ती म्हणते, ‘हे गुपीत गुपीत ठेवण्यातच सगळ्यांचं हित आहे.’

कुणाच्या खांद्यावर’ मधील नायिका ज्योती आपल्या प्रियकराच्या मुलांचं सांभाळ करायचं ओझं आपल्या खांद्यावर घेते. त्यांची आई होऊन त्यांना वाढवते. मोठं करते. प्रकाश आणि ज्योती लग्न करणार असतात, पण त्याची अम्मी आत्महत्या करण्याची धमकी देऊन प्रकाशचं लग्न, गावातल्या चित्राशी करतात. पुढे त्यांना दोन मुले होतात. एका अपघातात प्रकाश आणि चित्रा दगावतात. मग प्रकाशची आई ज्योतीला बोलावते. तिच्यावर अन्याय झाला म्हणून तिची क्षमा मागते आणि प्रकाशच्या मुलांना सांभाळ म्हणून सांगते. अन्यथा आपल्याला या वयात ही जबाबदारी पेलणार नाही. मुलांना अनाथाश्रमात ठेवावं लागेल, असं म्हणते. आपल्या प्रकाशची मुले अनाथाश्रमात

वाढणार, हा विचार ज्योतीला सहन होत नाही आणि ती मुलांची आई होते. दीपिकाचे लग्न होते. नीरव प्रणालीशी लग्न ठरवतो. मग ती प्रणालीला सगळी हकिकत सांगते. प्रणालीही सासूसारखी जगावेगळीच. ती नीरवला सुचवते, ‘त्यांच्यावर असलेली तुमची जबाबदारी आता संपलीय, आता तरी त्यांना स्वत:चं आयुष्य जगू दे. आपण त्यांच्यासाठी योग्य जोडिदार शोधू या. ’

‘सेवाव्रती’ ही आल्हाद आणि प्रसाद या भावांची गोष्ट. प्रसाद आदिवासींसाठी कार्य करतोय. त्याला ‘सेवाव्रती’ पुरस्कार मिळालाय, पण खरा ‘सेवाव्रती’ आल्हाद्च कसा आहे, हे लेखिकेने कथेत रंगवलय. कथेच्या शेवटी आल्हादच्या सोडून गेलेल्या बायकोचा अपर्णाचा फोन येतो, ती म्हणते, ‘ प्रसादला पुरस्कार मिळाला… आनंद झाला. पण मला वाटतं, सेवाव्रती… खरे सेवाव्रती तुम्ही आहात. खूप चांगले आहात तुम्ही… सामान्य माणसांना पेलवणार नाही, एवढे चांगले… म्हणूनच मलाही… ’

लोळा-गोळा झालेल्या मुलाला त्याचे कपडे काढून, उन्हात-पावसात त्याला सार्वजनिक ठिकाणी झोपवून स्वत: निवांत सावलीत बसणारा, त्याच्या जिवावर पैसे गोळा करणारा स्वार्थी बाप इथे आहे. (गोळा). कडक शिस्तीची, कर्तव्य कठोर, तत्ववेत्ती प्राध्यापिका इथे आहे. एका क्षणी तिला जाणीव होते, ‘आपण ज्याला विजय समजत

होतो, ती प्रत्यक्षात शिक्षा होती एकांतवासाची. नातलगांपासून दूर, भाव-भावनांच्या, प्रेमस्नेहाच्या खिडक्या नसलेल्या एका अंधार कोठडीत कैद होतो आपण’ ही जाणीव तिला होते. आपल्या नातवाचंही भविष्य असं घडू नये, या विचाराने ती बदलते.

‘स्त्रीणाम् भाग्यम्’ मध्ये आरतीच्या दोन मैत्रिणींच्या कथा आहेत. दोघींचा जीवन प्रवास परस्पर विरुद्ध दिशेने होतो. दोघी तिच्या चौथीच्या वर्गातल्या मैत्रिणी.. तज्ज्ञा देखणी, हुशार,, टिपटॉप रहाणारी, श्रीमंत. तर सुभद्रा गरीब. बावळट, आजागळ. तज्ज्ञाला बारावीत मार्क कमी मिळतात. ती डॉक्टर होण्याचे वडलांचे स्वप्न भंग होते.

मग ती तिला सहानुभूती दाखवणार्‍या मुलाशी लग्न करते. तेव्हा गरिबी तिच्या गळ्यात माळ घालते. आरतीला ती अनेक वर्षांनी भेटते, तेव्हा ती अगदीच बावळट, आजागळ अशी दिसते. याउलट वर्गात बावळट, आजागळ दिसणारी सुभद्रा, संधी मिळताच फिनिक्सप्रमाणे भरारी घेते. आपलं व्यक्तिमत्व सुधारते. शिकते. पुढे चटपटीत

एअर होस्टेस होते. दोघींचा दोन दिशांना होणारा प्रवास लेखिकेने छान रंगवलाय.

पत्नी अपघातात गेल्यानांतर, तिच्या डायर्‍या वाचल्यावर आपण तिच्या मनाचा, इच्छांचा विचार केला नाही, तिला सतत गृहीत धरले, यामुळे पश्चत्तापदग्ध झालेला पती ‘तू बोललीच नाहीस’मधे भेटतो, तर ‘एकुलती’ मध्ये सतत स्वत:च्या मनाप्रमाणे वागणारी केतकी किरकोळ कारणावरून कार्तिकला घटस्फोट द्यायचं ठरवते, अन

वडलांच्या आजारपणात कार्तिकने केलेली धावपळ, त्यांची सेवा-सुश्रुषा यामुळे तिचं मतपरिवर्तन होतं.

– – अशा अनेक विविध रंगांच्या, स्वभावाच्या, विविध वर्तन करणार्‍या व्यक्ती यातील कथांमधून भेटतात.

कथासंग्रहातील कथांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की यातील संवाद चटपटीत आहेत. हे संवाद आणि घटना-प्रसंगांचं यथार्थ वर्णन, यामुळे त्या त्या व्यक्ती आणि ते ते प्रसंग साक्षात डोळ्यापुढे उभे रहातात.

पुस्तक अतिशय वाचनीय आहे. सर्वांनी वाचून यातील कथांचा आनंद घ्यावा.

परिचय : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares