मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 9 – ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 9 – वडील ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

वडील म्हणजे पिता, अर्थात घराला घरपण देणारा, सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा कर्ता पुरुष.

वरुन कडक आणि कठोर, पण तेव्हढाच आतून प्रेमळ. पुत्रवियोगाने अत्यंत विव्हल झालेला राजा दशरथ आणि वचन पाळणारा श्रीराम यांच्यातलं बापलेकाचं नातं सर्वज्ञात आहेच. जगण्याचं पाठबळ देणारे, आपल्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत आयुष्य खर्ची घालणारे असे हे आपले वडिल आपली ‘प्रेरणा’ असतात. मुलांच्या आयुष्याच्या शिदोरीची एलआयसी म्हणा किंवा कुठल्या स्कीम मध्ये म्हणा किंवा एखाद्या रिकरींग अकाऊंट मध्ये सोय लावणारे वडिल. मुलांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडावं म्हणून प्रयत्नशील असतात. मुलं जसजशी मोठी होतात तसातसा वडिल आणि मुलगा यांच्यात संवाद होणं तितकच महत्वाचं असतं. ही नात्यांची घट्ट वीण संवादानेच बांधली जाते असे मला वाटते. या विणेतूनच घडत जातं मुलांचं भवितव्य. नरेंद्र ते स्वामी विवेकानंद असेच घडत होते.

नरेंद्र आणि वडिल विश्वनाथबाबू यांच्यात संवाद घडण्याचे अनेक विषय उपलब्ध असत आणि त्याचा फायदा नरेंद्रला होत असे. आपले विचार तर्कशुद्ध असावेत, त्यासाठी आवश्यक असणारी तात्विक बैठक भक्कम असावी. अशी बैठक भक्कम होण्यासाठी विषयाचे ज्ञान मिळवावे, कोणत्याही विषयाचा विचार करताना त्याच्या मुळाशी जावे. स्वत: विचार करून निर्णय घेण्याची सवय लावावी, अशा गोष्टी नरेंद्र वडिलांकडून शिकला होता. आपल्या स्वाभिमानाचा मूळ पाया आत्मसन्मान आणि आत्मप्रतिष्ठा आहे, त्याला कधीही बाधा पोहोचता कामा नये, हे नरेंद्रला वडिलांनीच शिकवले होते.

जेंव्हा नरेंद्राने विचारले होते, बाबा तुम्ही आमच्यासाठी काय ठेवले? याच्या उत्तरादाखल त्याने आरशात पहिले होते तेंव्हा त्याला स्वत:चे, तेजस्वी मुद्रा, टपोरे डोळे, भव्य कपाळ, सतेज अंगकांती, भारदार देहयष्टि, भरत येत असलेली विशाल छाती, व्यायामामुळे कामावलेले पिळदार स्नायू, आपल्या प्रतिबिंबात दिसले होते. हा वडिलांकडून मिळालेला वारसाच होता ना ?  

शिवाय घरी प्रतिष्ठित व्यक्ति येत असत,त्यावेळी त्यांची अनेक विषयावरची चर्चा कानावर पडून नरेंद्रच्या  ज्ञानात भर पडत होती व प्रत्येक गोष्टीचा विचार करायची, वाचन करायची सवय पण लागली होती. विश्वनाथ बाबूंकडून नरेंद्र बुद्धिबळ, पाककला, शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते. विश्वनाथबाबू स्वत: चांगलं गात. बंगाली फारशी आणि पर्शियन भाषेतली कितीतरी गीतं त्यांनी नरेंद्रला शिकवली होती. संगीतात माणसाला निरामय असा आनंद देण्याची फार मोठी शक्ति आहे असे विश्वनाथ बाबूंना वाटे. नरेंद्रला शास्त्रोक्त संगीत यावे म्हणून त्यांनी त्यातील योग्य जाणकारांकडून धडे गिरविणे व रियाज करून घेणे यासाठी प्रयत्नपूर्ण नियोजन केले.  नरेंद्रमध्ये अशा प्रकारे त्यांनी शास्त्रीय संगीताची शास्त्रशुद्ध गोडी उत्पन्न केली.

पालकांकडून मुलांचे योग्य वेळी योग्य ते कौतुक व्हायला पाहिजे म्हणजे प्रोत्साहन मिळते. यानुसार शालेय शिक्षण संपता संपता 3 वर्षाचा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण करून नरेंद्रने चांगले यश मिळवले होते. ही बुद्धिमत्ता बघून विश्वनाथबाबूंना खूप कौतुक वाटले. तेंव्हा त्यांनी नरेंद्रला चांदीचे एक सुंदर घड्याळ बक्षीस म्हणून दिले.

अशा प्रकारे आजच्या लहान मुलांचे वडील म्हणून आजच्या पिढीने अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जबाबदारीने, विवेकाने वागले पाहिजे. मुलांबरोबर सुसंवाद ठेवला पाहिजे. आज वरवरच्या चंगळवादी आणि आभासी दुनियेत मुलांकडे नीट लक्ष देण्याची आणि अनेक गोष्टी शिकविण्याची गरज आहे. आई वडील झालेल्या पतीपत्नींना त्यांच्या मुलांचे चारित्र्य घडवायचे आहे .

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पुरणपोळी… अनामिक ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

?  विविधा ?

पुरणपोळी…अनामिक ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत !

पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे.

डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज आहे. रटाळ तरी थाटाचा असल्याने गरजेचा !

गूळ म्हणजे यमन!

यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व!

इथं तीव्र मध्यम श्रुतीमनोहरच लागायला हवा म्हणजेच गुळाचा हात नेमकाच पडायला हवा

(अन्यथा बट्ट्याबोळ!).

हां, आता ज्यांना जमत व गमतं

(‘प्रभू आजि गमला’ या अर्थाने) नाही ते दोन्ही मध्यम घेऊन त्याचा यमनकल्याण करतात म्हणजेच गुळात साखरही मिसळतात.

जायफळाची एखादी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचं ते अगदी देस रागाप्रमाणे. ‘गनिसा’ ही संगती देस ची ओळख (सिग्नेचर) तसंच, रटरट आवाजाबरोबर घमघमाट येणे ही पुरणाची सिग्नेचर मानावी. पुरण आणि देस हे ओघवते असावेत पण चंचल नकोत.

नंतर होरीप्रमाणे पुरणाचं वाटण करायचं. म्हणजेच लवकर आटपायचं …. ख्या ख्या

आता महत्वाचा ‘टप्पा’ ! पोळ्या करणे ! बिहागचा टप्पा साधायला कुण्या दिग्गज हाद्दूखान – हास्सूखान अशांचीच तालीम हवी. आणि सगळेच मालिनीताई होत नाहीत हे ही विनयशीलतेने मान्य करायला हवं. रागाला शरण जावं तशी निगर्वी शरणागती झाली तर हळूहळू जमेल. पण तपश्चर्या हवी.

आता अशा कमालीच्या रंगरस-संपन्न मैफलीत तराणा यावा तशी तुपाची धार!

तराणा मूळ आलाप-जोड यापासून वेगळा काढता येऊ नये अगदी तस्संच तुपानं पोळीशी अद्वैत करून असावं.

मग .. ‘जो भजे हरिको सदा’, ‘चिन्मया सकल ह्रदया”, “माई सावरे रंग राची” अशा विविध रूपांनी सर्वगुणसंपन्न भैरवीचं रसग्रहण करावं त्याप्रमाणे एकेक घास जिभेवर ठेऊन असीम आनंद घ्यावा. आणि मग “हेचि दान देगा देवा” अश्या थाटात ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणावं.

भैरवीचे सूर मनात दीर्घ काळ रेंगाळावेत तशी पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळावी. दिवस सार्थकी लागावा …… आयुष्य सार्थकी लागाव !!!

होळी पौर्णिमा आणि धुलीवंदनाच्या मनःपूर्वक  शुभेच्छा

।। ॐ नमःशिवाय ।।

संग्राहिका : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ किल्ल्या… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ किल्ल्या… ☆ सौ ज्योती विलास जोशी

एक वेळ आयुष्याची गुरुकिल्ली सापडेल…नव्हे! ती नाही सापडली तरी मिळालेलं आयुष्य सरत राहील पण एखादी महत्वाची किल्ली नाही सापडली तर तेच आयुष्य किल्ली सापडेपर्यंत थांबतं.अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा यक्षप्रश्न कधीतरी आयुष्यात एकदा सर्वांना पडतोच!

एका कुटुंबाचा विचार करता फ्लॅटची किल्ली, स्कूटरची किल्ली,कारची किल्ली, लॉकरची किल्ली, मोलकरणीला द्यायची डुप्लिकेट किल्ली, अशा अनेक किल्ल्या जपून ठेवाव्या लागतात. त्यातली एखादी जरी हरवली तर त्याची  संपूर्ण कुटुंबाला झळ लागते. आरोप दोषारोप यानं कुटुंबातलं वातावरण गढूळ होतं. छोटीशीच गोष्ट… परंतु लहान मोठ्याना तांडव करायला लावते. लपाछपीचा खेळ बराच वेळ चालतो आणि…… किल्ली सहजी सापडली तर मात्र ‘हुश्श्य’ असा उसासाचा सगळ्यांच्याच तोंडातून निघतो आणि नाट्याची इतिश्री होते.

समजा किल्ली नाहीच सापडली तर आपल्याकडे डुप्लिकेट किल्ल्या बनवणारी माणसं लगेच हाकेला ओ देतात. त्यांच्या किल्लीनं आपलं कुलूप खळकन उघडतं आणि थांबलेले क्षण लगेच पुढे सरकतात. कुठे हरवली असेल किल्ली? हा विचार करायला एका क्षणाचीही फुरसत आपल्याला नसते. योगायोगानं ती कधी नजरेला पडलीच तर. …. काय उपयोग आता? असं म्हणून लगेचंच  तिची किंमत शून्य होते..

क्षणभर मनांत विचार आला ….पूर्वीच्या काळी कधी किल्ल्या हरवत नसतील का? जानव्याला लावलेली, पोटाशी धरलेली, कमरेच्या केळात ठेवलेली, पदराच्या टोकाला बांधलेली, फडताळात बांधून ठेवलेली किल्ली जणू लाॅकर मध्येच असल्यासारखीच! कशी हरवेल बरं? लोकांची वृत्ती बदलली तसा कुलपाचा शोध लागला.जसे ते बेफिकीर झाले तसे किल्ल्या बनवणार्यांचा रोजगार वाढला.

या सर्वावर उपाय म्हणून लोकांनी स्वतःला एक शिस्त लावून घेतली की-होल्डर नावाची एक आकर्षक वस्तू घरात आली आणि सन्मानानं भिंतीवर विराजमान झाली. किल्ली कुटुंबातल्या कोणाचीही असो कितीही महत्त्वाची असो ती तिथेच असायची.क्षणभर ती तिथे दिसली नाही तरी हृदयाचे ठोके वाढायचे. ती किल्ली हरवू नये म्हणून आकर्षक की-चेन मध्ये तिला गुंफुन ठेवण्यात येऊ लागलं….

आताशा जसं जग हायटेक झालंय तशी कुलपाची संकल्पना बदलली. पर्यायानं किल्लीलाही पर्याय आले.चक्र आकडे वापरून तिजोऱ्या बंद होऊ लागल्या. दोन किल्ल्या असलेली कुलपं आली. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजेच विद्युत चुंबकीय किल्ल्या आल्या. पुढे किल्ल्यांच्या जागी बटनं आले. त्याही पुढे जाऊन आता पासवर्ड आला. प्रत्येकानं जपलेला पासवर्ड हाच त्याची किल्ली झाला. आता बाकी हद्द झाली.अंगठा, चेहरा यांच्या साह्यानेही कुलपे उघडू लागली.

अंगठा दाखवणे हा वाक्प्रयोगाचा अर्थच बदलला. नाहीं म्हणावयाचें झाल्यास, मूठ मिटून अंगठा किंवा नकार घंटा दाखवितात.दानाचं उदक देतांना सरळ तळहातावर पुढें बोटांवरून पाणी सोडतात पण पितरांस उदक देतांना वांकडा हात करून अंगठयावरून पाणी सोडतात त्यावरून, नाहीं म्हणणें, नकार देणें असा अर्थ होतो. अंगठा दाखवणे म्हणजे

फसविणें,ठकविणें,प्रथम आशा दाखवून शेवटीं धोका देंणें. पण आता अंगठा दाखवून काम फत्ते होऊ लागलं.’दिल सच्चा और चेहरा झुठा’ असही म्हणायची सोय राहिली नाही.नाही तर कुलूप रुसून बसायचं…….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

jvilasjoshi@yahoo.co.in

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फिरूनी नवी जन्मेन मी.. ☆ सुश्री योगिता कुलकर्णी ☆

?विविधा ?

☆ फिरूनी नवी जन्मेन मी.. ☆ सुश्री योगिता कुलकर्णी ☆

 

अप्रतिम लिहिलंय हे गाणं सुधीर मोघेंनी…

“एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी….”

आयुष्य म्हटलं कि कष्ट आले, त्रास आला,

मनस्ताप आला, भोग आले आणि जीव जाई पर्यंत काम आलं…मग ते घरचं असो नाहीतर दारचं….

बायकांना तर म्हातारपणा पर्यंत कष्ट करावे लागतात…

८० वर्षाच्या म्हातारीने पण भाजी तरी चिरुन द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते….

हि सत्य परिस्थिती आहे…..

आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे रहाणारच……

त्यामुळे हि जी चार भांडीकुंडी आपण आज निटनिटकी करतो…ती मरेपर्यंत करावी लागणार…

ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तरीतही करावा लागणार….

” मी म्हातारी झाल्यावर ,माझी मुलं खुप शिकल्यावर त्याच्या कडे खुप पैसे येतील मग माझे कष्ट कमी होतील” हि खोटी स्वप्न आहेत….

मुलं, नवरा कितीही श्रीमंत झाले तरी ..

“आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तु बनव..”

असं म्हटलं कि झालं…

पुन्हा सगळं चक्र चालु..

आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या

अभिमन्यी….,😃

पण..पण ..जर हे असंच रहाणार असेल..

जर परिस्थिती बदलु शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का ??

तर नाही…..

परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं…..

मी हे स्विकारलय…. खुप अंतरंगातुन आणि आनंदाने….

माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते….. खुप उर्जा आणि उर्मी नी भरलेली……

सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच उर्जेनी बोलु शकते आणि रात्री दहा वाजता ही…

आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असु देत….दुसरा दिवस हा नवाच असतो….

काहीच नाही लागत हो…

हे सगळं करायला…..

रोज नवा जन्म मिळाल्या सारखं उठा…

छान आपल्या छोट्याश्या टेरेस वर डोकावुन थंड हवा घ्या..आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा….

आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या..

इतकं भारी वाटतं ना….

अहाहा…..

सकाळी उठलकी ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा…

अभंग एकत एकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला….ग्लास भरुन पाणी पिलं आणि मस्त…आल्याचा चहा पित…. खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना

कि भारी वाटतंं…..

रोज मस्त तयार व्हा….

आलटुन पालटुन स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत रहा….

कधी हे कानातले ..कधी ते…..

कधी ड्रेस…कधी साडी….

कधी केस मोकळे…कधी बांधलेले….

कधी हि टिकली तर कधी ती….

सगळं ट्राय करत रहा….नवं नवं नवं नवं…

रोज नवं…..

रोज आपण स्वतःला नविन दिसलो पाहिजे….

स्वतःला बदललं कि…. आजुबाजुला आपोआपच सकारात्मक उर्जा पसरत जाईल……..तुमच्याही नकळत……

आणि तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याश्या वाटु लागाल……

मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे….

माझ्या बद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं कि माझे कान आपोआप बंद होतात….😃काय माहित काय झालंय त्या कानांना….😃

आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते….

मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते…..

जे जसं आहे….ते तसं स्विकारते आणि पुढे चालत रहाते…

कुणी आलाच समोर कि..” आलास का बाबा..बरं झालं ..म्हणायचं…खिशात घालायचं कि पुढे चालायचं….

अजगरा सारखी…सगळी परिस्थिती गिळंकृत करायची….😃

माहीत आहे मला…

सोपं नाहीये….

पण मी तर स्विकारले आहे…

आणि एकदम खुश आहे….

आणि म्हणुनच रोज म्हणते….

” एकाच या जन्मी जणु…

फिरुनी नवी जन्मेन मी…

हरवेन मी हरपेन मी..

तरीही मला लाभेन मी…..”

#योगिता_कुलकर्णी…  यांच्या फेसबुक पेज वरुन साभार…🙏 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हेरेसा… ☆ प्रस्तुती – सुश्री रेवती वैभव मोडक ☆

थेरेसा सर्बर माल्कल!

? इंद्रधनुष्य ?

☆ हेरेसा… ☆ प्रस्तुती – सुश्री रेवती वैभव मोडक ☆

रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या बाईंमुळे जागतिक महिला दिन साजरा होतो.. वाचा त्यांचं कार्य काय आहे..

थेरेसा सर्बर माल्कल!

हे नाव तुम्ही पूर्वी कधी ऐकलं आहे का? नाही? आज आपण जो जागतिक महिला दिन साजरा करत आहोत त्याचा आणि या नावाचा घनिष्ठ संबंध आहे. कसा तो आम्ही सांगतो…

मंडळी, एखादा दिवस साजरा करण्यामागे नेमके काय कारण आहे, त्याचा इतिहास काय आहे, हा पायंडा कुणी पाडला हे जाणून घेणे महत्वाचे असते. जर ही माहिती तुम्हाला असेल तर तो दिवस साजरा करण्याचा आनंद द्विगुणित होतो. आता आजच्या जागतिक महिला दिनाचेच उदाहरण घ्या ना..  सर्वांना माहीत आहे की आज महिला दिन आहे, पण याची सुरुवात थेरेसा सर्बर माल्कल या महिलेने केली हे कुणालाच माहीत नाही. दुर्दैवाने थेरेसा आज विस्मृतीत गेल्या आहेत. चला तर मग आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपण त्यांची ओळख करून घेऊया…

थेरेसा यांचा जन्म १ मे १८७४ ला रशियातल्या बार नावाच्या शहरात एका ज्यू परिवारात झाला. जन्मापासूनच ज्यू विरोधी वातावरणात वाढलेल्या थेरेसा यांना आणि त्यांच्या परिवाराला रशियाच्या त्झार राजवटीत प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळं अनेक कुटुंबे तिथून स्थलांतर करून अमेरिकेत गेली. त्यात थेरेसा यांचेही कुटुंब होते.  १८९१ साली अमेरिकेत  दाखल झाल्यावर थेरेसा यांनी इतर ज्यू लोकांप्रमाणे चरितार्थासाठी मिळेल ते काम  केले. प्रथम एका बेकरीमध्ये, नंतर एका कपड्यांच्या कारखान्यात त्यांना काम मिळाले. त्यांचा मूळ स्वभाव चळवळ्या आणि बंडखोर असल्याने त्यांचे लक्ष कामगार स्त्रियांच्या प्रश्नांकडे वेधले गेले. थेरेसा फक्त प्रश्न बघून गप्प बसणाऱ्या महिला नव्हत्या… त्या प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करू लागल्या आणि त्यातूनच कामगार स्त्रियांच्या संघटनेची निर्मिती त्यांनी केली.  या स्त्री संघटनेतून स्थलांतरित कामगार स्त्रियांचा आवाज उठवण्याचे काम त्या करू लागल्या.

लवकरच त्यांच्या असे लक्षात आले की, फक्त संघटना चालवून भागणार नाही. महिलांना पुरुषांच्या समान हक्क हवे असतील तर राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले. आता त्यांनी कामगार स्त्रियांच्या प्रश्नांसोबतच एकंदरीत स्त्री-पुरुष समानतेवरही लक्ष केंद्रित केले. सोशालिस्ट पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात शिरकाव करून घेतला. त्यावेळी सोशालिस्ट पार्टी ही  एकमेव अशी पार्टी होती ज्यात महिलांना प्रवेश मिळत असे. आम्ही स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही असा त्यांचं ब्रीदवाक्य होतं. यामुळेच थेरेसा सोशालिस्ट पार्टीकडे आकर्षित झाल्या होत्या. परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांना सत्य समजले की पार्टीचा नारा फक्त दिखाऊ स्वरूपाचा होता. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत महिलांना नगण्य स्थान मिळत असे. थेरेसा यांनी यामुळे निराश न होता असे ठरवले की, पार्टी न सोडता आपली समांतर विचारधारा चालवून आपले ध्येय साध्य करायला हवे. त्यांनी सोशालिस्ट महिलांची एक वेगळी चळवळ सुरू केली आणि महिलांसाठी राजकारणात एक वेगळे स्वतंत्र व्यासपीठ असायला हवे असे जोरदार मत मांडले.

शेवटी सोशालिस्ट पार्टीने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी वेगळे डिपार्टमेंट बनवण्यात आले. त्याच्या अध्यक्षपदी थेरेसा विराजमान झाल्या. मंडळी, त्या काळी ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती! एक तर महिला, त्यात अमेरिकेबाहेरील स्थलांतरित कामगार… ही एका नव्या पर्वाची सुरुवात होती!

या पदावर बसून थेरेसा यांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यातलाच एक हक्क म्हणजे  महिलांना मतदानाचा अधिकार! तोपर्यंत अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो मिळायलाच हवा हा मुद्दा थेरेसा यांनी सर्वांसमोर मांडला आणि बरेच प्रयत्न करून त्यासाठी समर्थन मिळवले. या सोबतच महिलांचे अनेक प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. महिलांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली.

थेरेसा यांनी जगाचे लक्ष महिलांच्या समस्यांकडे वेधले जावे म्हणून एक कल्पना मांडली. वर्षातला एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा व्हावा हीच ती कल्पना…  सोशालिस्ट पार्टीने त्यांना या बाबतीत साथ दिली आणि अमेरिकेत पहिला ‘राष्ट्रीय महिला दिन’ १९०९ साली २८ फेब्रुवारी रोजी साजरा झाला. ही कल्पना नंतर युरोपियन देशांमध्ये सुद्धा पसरली आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाली. आज सर्वानुमते जगभरात एकाच दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होतोय या मागे मूळ कारण थेरेसा सर्बर माल्कल या आहेत.

थेरेसा माल्कल यांचे १७ नोव्हेंबर १९४९ मध्ये निधन झाले. एक स्थलांतर होऊन अमेरिकेत आलेली मुलगी ते अमेरिकेच्या राजकारणातील बलशाली महिला असा त्यांचा थक्क करणारा प्रवास होता. त्यांचे निधन झाल्यावर हळू हळू लोक त्यांना विसरले. आज आपण महिला दिन साजरा करतो पण थेरेसा यांचा उल्लेख कुठेही होत नाही हे दुर्दैवी सत्य आहे.

साभार फेसबुक 

संग्रहिका – प्रस्तुती – सुश्री रेवती वैभव मोडक

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शेअरिंग… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ शेअरिंग… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

इतरांसह एकत्रितपणे काहीतरी  वस्तू वापरणं किंवा त्याचा आनंद घेणं म्हणजेच आजकालच्या भाषेत शेअरिंग. शेअरिंग ही एक प्रोसेस आहे. शेअर करणं म्हणजेच थोडक्यात एखाद्याला सरळ सरळ गिफ्ट देणं. हे शेअरिंग जागा, वेळ, पुस्तक, खेळ, खाऊ अशा कोणत्याही गोष्टींचं असू शकतं. तसं पाहिलं तर हा आजकलचा की- वर्ड झाला आहे. फाईल शेअरिंग, स्क्रीन शेअरिंग, मेसेजेस, फोटोज्, माहिती, व्हिडिओज् इ. इ. . . आजच्या न्यू ऑप्टिक युगात किंबहुना इंटरनेट कल्चर मध्ये हा एक अनेक कामं सुसंगत पणे पार पाडण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. आंतरजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटलेले आपण शेअरिंग शिवाय काम करूच शकत नाही. लॉकडाऊन च्या काळात; वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना तर  आंतरजालाच्या गुहेत संचार करण्यासाठी शेअरिंग खूपच महत्त्वाचं असतं. एवढंच नव्हे तर इंटरनेटचा वापर फारसा न करणारेही या आंतरजालात गुरफटलेले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर. . बघा हं. . .  काशी विश्वेश्वराचं जिर्णोद्धारामुळे बदललेलं भक्तीरस जागृत करणारं  रुप आपल्याला घरात बसून बघता येतं. . . . त्याचं नेत्रसुख मिळवता येतं, भाविकांना काशी दर्शनाचा लाभ मिळतो. हे शक्य होतं ते काशी विश्वेश्वराचा व्हिडिओ सोशल मेडियावर शेअर केल्यामुळेच ना!

इंटरनेट वर माहिती शेअर करणं हे आता फारच सामान्य झालं आहे. पण मुळात शेअरिंग करणं, एकमेकांना देणं, या आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग असलेल्या संकल्पनेला विसरत चाललो आहोत. आपल्या मागच्या पिढ्या शेअरिंग च्या बळावर वाढल्या, मोठ्या झाल्या. घरात बहिण भावंडांच्या बरोबर वह्या- पुस्तकं, रंगपेट्या, पोस्टर कलर्स, कंपास बॉक्स इतकंच काय कपडे देखील शेअर करुन वाढल्या या पिढ्या! आठवीत शिकणाऱ्या भावाचा भूमितीचा तास झाला की तो कंपास बॉक्स सहावीतल्या बहिणीकडं सुपूर्द केला जाई. केवढी सोय! केवढी बचत!! मोठ्या बहिणीचे कपडे घालण्यात लहान बहिणीला अपमान वाटत नसे.

मधल्या सुट्टीत डबा खाताना डब्यातील भाजी एकमेकांना दिली जाई. खिशातून आणलेल्या शेंगदाणे, फुटाणे, गोळ्या बिस्कीटं यांची देवाणघेवाण  नेहमीच होई. चिमणीच्या दातांनी रावळगाव आणि लिमलेटच्या गोळ्यांचा गोडवा वाढवला जाई.

आजच्या युझ ऍन्ड थ्रो च्या जमान्यात  मुलांना शेअरिंग शिकवावं लागतं. तेही जाणीवपूर्वक. न्युक्लिअर फॅमिलीच्या प्रॉब्लेम्सना तोंड देत वाढणारी ही पिढी, कोरोना व्हायरसनं त्रस्त झाली आहे. रंग रुप बदलतं, जगभर संचार करणाऱ्या या व्हायरसचं सोवळं पाळायलाच पाहिजे. ऑनलाईन शाळेमुळं एकत्र एका वर्गात, एका बाकावर बसून शिकणं जिथं नाही तिथं आपल्या दप्तरातल्या वस्तूंचं, डब्यातल्या खाऊचं शेअरिंग  केवळ अशक्य. चूकुन ही चूक झालीच तर . .बापरे. . शांतम् पापम्!!. किंबहुना मुलांना सुरक्षिततेसाठी शेअरिंग नको हेच नाईलाजानं शिकवावं लागतं. अर्थात सगळं माझंच आहे, एकट्याचंच आहे ही वृत्ती बळावली तर नवल नाही. एक तीळ सात जणांनी राहू दे, पण दोघांनी वाटून खाणं देखील दुरापास्त होऊन बसलंय. शेअरिंगमुळं केअरिंग वाढतं. असं जरी असलं तरी सध्या शेअरिंगचं फारसं केअरिंग न करणंच योग्य ठरेल.

कोरोना लवकरच गोठून जाऊ दे,  ‘केअरिंग’ करणारं माणसातलं खरंखुरं ‘शेअरिंग’ शेअर करता येऊ दे. . . तोपर्यंत टेक केअर.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! फेरा एकवीसचा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

💃 फेरा एकवीसचा ! 😅

“पंत हे तुम्ही काय चालवलंय ? “

“मोऱ्या अरे आज तुला झालंय तरी काय, नेहमी सारखा नमस्कार वगैरे करशील का नाही ?”

“नाही आणि करणार पण नाही,  कारण मी रागावलोय तुमच्यावर, म्हणून आज नमस्कार वगैरे विसरा !”

“ही तुला काही बोलली का मोऱ्या ?”

“काकू कशाला बोलतील मला?  मी तुमच्यावर रागावलो आहे म्हटलं ना !”

“अरे हो, पण मी पडलो साधा पेन्शनर, कुणाच्या अध्यात ना मध्यात, मग माझ्यावर रागावण्या सारखं मी केलय तरी काय, ते तरी सांग!”

“काय म्हणजे, परवा आपल्या वरच्या मजल्यावरच्या नितीनच्या मुलाचं बारस होत, तर…. “

“हो मस्त दणक्यात केलंन हो, आम्ही दोघे गेलो…. “

“ते बोलला मला नितीन, पण बाळासाठी अहेराच पाकीट… “

“न्यायला अजिबात विसरलो नव्हतो मोऱ्या, खरं सांगतो !”

“हो ते खरंय, पण पाकिटात पैसे… “

“सुद्धा आठवणीने एकवीस रुपये टाकले होते, पाहिजे तर विचार नितीनला !”

“बोलला मला नितीन त्याबद्दल.. “

“मग झालं तर !”

“तसच आठ दिवसापूर्वी केळकरांच्या मुलाची मुंज होती, तेव्हा पण….. “

“आम्ही दोघे जोडीने आवर्जून गेलो होतो बटूला आशीर्वाद द्यायला !त्याच्या लग्नाला आम्ही असू, नसू ! त्याला पण चांगला एकवीस रुपयांचा अहेर… “

“केळकर काका म्हणाले मला.”

“मग झालं तर, उगाच इतर काही लोकांसारखी रिकामी पाकीट द्यायची सवय नाही मला, कळलं ना मोऱ्या ?”

“ते ठाऊक आहे मला पंत, काही झालं तरी तुम्ही रिकामं पाकीट देणार नही ते. पण आता मला सांगा, गेल्या महिन्यात कर्णिकांच्या मंदाच लग्न होत, तर तिला सुद्धा….. “

“एकवीस रुपयाचाच आहेर केला होता आठवण ठेवून ! अरे लहान असतांना आमच्या राणी बरोबर खेळायला यायची आमच्या घरी. “

“पंत, मंदा लहानपणी तुमच्याकडे खेळायला यायची वगैरे वगैरे, ते सगळे ठीक आहे, पण तुम्ही बारस, मुंज आणि लग्न यात काही फरक करणार आहात की नाही ?”

“अरे मोऱ्या हे तिन्ही वेगवेगळे विधी आणि समारंभ आहेत, पूर्वी पासून चालत आलेले, त्यात मी फरक करण्या एव्हढा, कोणी थोर समाज सेवक थोडाच आहे ? हां, आता लहानपणी कुणाची मुंज राहिली असेल तर ती लग्नात लावता येते, पण बारस बाळ जन्मल्यावर बाराव्या दिवशी केल तर त्याला मुहूर्त बघायला लागत नाही असं म्हणतात, म्हणून लोक…. “

“पंत, मी त्याबद्दल बोलतच नाहीये !”

“मग कशा बद्दल बोलतोयस बाबा तू ?”

“अहो मी तुमच्या आहेराच्या रकमे बद्दल बोलतोय !”

“त्या बद्दल काय मोऱ्या ?”

“सांगतो ना पंत, तुमच्या दृष्टीने बारस, मुंज आणि लग्न यात  काही फरक आहे का नाही ? मग प्रत्येक वेळेस एकवीस रुपयाचाच आहेर, याच काय लॉजिक आहे तुमच, ते मला समजेल का ?”

“ते होय, त्यात कसलं आलंय लॉजिक ? त्याच काय आहे ना, अरे हल्ली, आपले आशीर्वाद हाच खरा आहेर, कृपया पुष्प गुच्छ आणू नयेत, अशा छापाच्या तळटीप प्रत्येक निमंत्रण पत्रिकेत असतात, तरी सुद्धा मी आठवणीने….. “

“सगळ्यांना एकवीस रुपयाच्याच आहेराची पाकीट का देता, हेच मला जणून घ्यायच आहे पंत आज !”

“मोऱ्या असं बघ, एकवीस या आकड्याच महत्व माझ्या दृष्टीनं फार म्हणजे फारच वाढलेलं आहे सध्या ! म्हणून मी सगळ्यांना एकवीस रुपयाचाच आहेर करतो हल्ली !”

“ते कसं काय बुवा पंत ?”

“सांगतो ना तुला. आपण या समारंभातून मिळणाऱ्या भोजनावर यथेच्छ ताव मारतो की नाही?”

“तसच काही नाही पंत, पण अशा समारंभात मी नेहमी पेक्षा थोडं जास्त जेवतो इतकंच !”

” बरोबर, तर त्याची अल्पशी परत फेड म्हणून…. “

“काय बोलताय काय पंत तुम्ही ? एकवीस रुपयाच्या पाकिटात कसली आल्ये परतफेड ? हल्ली अशा समारंभात माणशी जेवणाचे दर तुम्हाला…..”

“चांगलेच माहिती आहेत मोऱ्या ! हल्ली सातशे आठशेच्या खाली ताट नसतं ठाऊक आहे मला, पण म्हणून मी अल्पशी…. “

“पंत अहो तुमच्या अल्पला थोडा तरी अल्पार्थ आहे का सांगा बघू ?”

“आहे, नक्कीच आहे मोऱ्या !”

“हो का, मग म्या पामराला जरा तो समजावता का पंत ? “

“सांगतो ना मोऱ्या. आता असं बघ, सध्या शिवथाळी कितीला मिळते सांग बर मला ?”

“दहा रुपयाला !”

“बरोबर, म्हणजे सकाळी एक शिवथाळी आणि संध्याकाळी एक शिवथाळी या एकवीस रुपयात येवू शकते की नाही ?”

“हो पंत, म्हणजे एका माणसाचा एका दिवसाचा दोन वेळचा जेवणाचा प्रश्न सुटेल वीस रुपयात ! पण तुमच्या एकवीसच्या पाकिटातला एक रुपया शिल्लक राहतोच ना पंत ? त्याचे हल्लीच्या महागाईत खायचे पान सोडा, आपट्याचे एक पान पण येणार नाही पंत !”

“अरे पण माझ्या एकवीस रुपयाच्या आहेरातला तो उरलेला रुपया, पानासाठी वापरायचा नाहीच मुळी!”

“मग, त्या राहिलेल्या एक रुपयाचं करायच काय पंत ? पिगी बँकेत टाकायचा का ?”

“अरे नाही रे बाबा, पण जर का   शिवथाळी खाऊन तब्येत बिघडली, तर राहिलेल्या एका रुपयात सरकारच्या नवीन योजने प्रमाणे ‘आपल्या दारात आरोग्यचाचणी एक रुपयांत’ नाही का करता येणार ? म्हणजे लागला ना एकवीस रुपयाचा हिशोब !”

“धन्य आहे तुमची पंत !”

“आहे ना धन्य माझी मोऱ्या, मग कधी करतोयस लग्न बोल? म्हणजे

तुझ्यासाठी पण एक, एकवीसाचे अहेराचे पाकीट तयार करायला मी मोकळा !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१७-०३-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगल द्या,चांगल मिळेल…अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगल द्या,चांगल मिळेल…अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

एकदा श्रीकृष्ण व अर्जुन एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णाला बोलतो… मला कर्णापेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे. त्यासाठी तू माझी मदत कर. 

श्रीकृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की तुला ते शक्य नाही. पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो. तो श्रीकृष्णाच्या मागे सतत एकच धोशा लावतो की मला कर्णापेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे.

श्रीकृष्ण म्हणतो ठिक आहे.. मी तुला एक संधी देतो. पण माझी पण एक अट आहे… मी तुला जी संधी देईन, तीच संधी कर्णाला सुद्धा देईन आणि ह्या परीक्षेत तु कर्णापेक्षा मोठा दानशूर असल्याचे सिद्ध करून दाखवायचे. अर्जुन श्रीकृष्णाची ही अट मान्य करतो.

श्रीकृष्ण आपल्या शक्तीने जंगलातल्या दोन टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये करतो आणि अर्जुनाला म्हणतो.. आता हे सगळे सोने लोकांमध्ये वाटून टाक.. अट एकच एकूण एक सोने तु दान केले पाहिजेस.

लगेच अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की… मी प्रत्येक गावकऱ्यांना सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले. पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जुन खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.

आता अर्जुन अगदी दमून गेला होता. पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. शेवटी त्याने श्रीकृष्णाला सांगितले की बास….!

आता यापुढे मी काम करू शकत नाही.

मग श्रीकृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की…. या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तु लोकांना दान करून टाकायच्या…..

लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलावले आणि सांगितले की… या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. ज्याला जेवढे शक्य आहे त्याने तेवढे सोने निःसंकोच घेवून जावे. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले.

अर्जुन चकित होऊन पहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही… या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.

श्रीकृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला… अनावधानाने का होईना तु सोन्याकडे आकर्षित झालास…..! तु गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास. जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तु दान करत होतास…..! 

कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

आपले कुणी कौतुक करतंय… गुणगान गातंय… हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.

व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.

देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे… शुभेच्छा द्याव्यात… धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे… म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते. कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे… कार्य करावे…                                                  *म्हणून निसर्गाचा एक नियम आहे जे तुम्ही देणार ते तुम्हाला नक्की परत भेटणार. कोणत्या रूपात परमेश्वर देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे चांगलं द्या पदरी चांगलंच मिळेल.

‘आपलं काय चुकलं’ हे शोधायला हवं…. पण आपण मात्र ‘कुणाचं चुकलं’ हेच शोधत राहतो. …

लेखक –  अज्ञात

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्विकार क्षणांचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ स्विकार क्षणांचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आपलं आयुष्य घडवत तरी असतो नाहीतर बिघडवत तरी ! वाचताना थोडं अतिशयोक्तीचं वाटेल पण हेच सत्य आहे.

रोजच्या धावपळीत आपण प्रत्येक क्षणी असणारी आपली मनोवस्था, आपली विचार करण्याची पद्धत आणि आपले स्वयंकेंद्री विचार यानुसारच येणाऱ्या प्रत्येक क्षणाला सामोरे जात असतो व त्यामुळे प्रत्येक क्षण समतोल मनाने येईल तसा स्वीकारायचं भान सहसा आपल्याला रहात नाही. त्यामुळे त्या त्या वेळी आपल्या उमटणार्‍या प्रतिक्रिया नेहमीच अस्वस्थता, नाराजी, रुखरुख निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतात. कुणाच्याही आयुष्यात कधीही घडू शकेल अशा एका अगदी साध्या प्रसंगाचं एक प्रातिनिधिक उदाहरण घेऊ.

एका सकाळी थोडं लवकरच मी स्कूटरवरून रेल्वे-स्टेशनवर पाहुण्यांना रिसीव्ह करायला निघालोय.रस्त्यावरची नेहमीची वर्दळ अद्याप सुरु व्हायचीय. माझी स्कुटर बर्‍यापैकी वेगात आहे. गाडीची वेळ चुकू नये, आपण वेळेत पोचायला हवं हा एकच विचार मनात.आणि अगदी अचानक एका वळणावरून आत जाताना  समोरून सायकलवरून येणारा  आठ-नऊ वर्षाचा एक मुलगा माझ्या स्कूटरला धडकतो. पडतो. मी स्कूटर कशीबशी कंट्रोल करीत थांबतो.

त्या क्षणी येणाऱ्या माझ्या प्रतिक्रिया अर्थातच तो क्षण मी कसा स्वीकारलाय यावरच अवलंबून असणाराय हे ओघानं आलंच.

मी चिडून त्या मुलाकडे पहातो. तो दफ्तरातून बाहेर पडलेली आपली नोटबुक्स् गडबडीने गोळा करतो. दप्तरात ठेवतो.चोरट्या नजरेने माझ्याकडे पहातो.आपल्याला स्टेशनवर पोचायला उशीर होणार या विचाराने मला त्याचा प्रचंड राग येतो.माझं कपाळ आठ्यांनी भरुन जातं. आपण वेळेत पोचलो नाही तर पाहुण्यांना काय वाटेल हा विचार मन अस्वस्थ करीत असतो. तोवर कपड्यांवरची धूळ झटकून, आडवी झालेली सायकल कशीबशी उभी करुन तो मुलगा सायकल ढकलत चालत निघून जातो. त्या अस्वस्थ मनस्थितीत मी स्कूटर सुरू करतो. तरीही मनातला त्या मुलाबद्दलचा संताप काट्यासारखा सलतच असतो.  स्टेशनबाहेर घाईघाईने स्कूटर पार्क करून मी धावत आत जातो. ट्रेन आलेली नसते. घाईघाईने मी इंडिकेटरकडे धाव घेतो. पहातो तर ट्रेन थोडी लेट असल्याने ती यायला अद्याप दहा मिनिटे अवकाश असतो. मी थोडा निश्चिंत होतो.मनातला राग मग हळूहळू नाहीसा होतो.

मन थोडं स्थिर होताच जाणवतं की त्या प्रसंगात अचानक कांहीही घडू शकलं असतं हे खरं,पण जे घडलं त्यात तरी चूक त्या निष्पाप मुलाची होती की माझीच ? त्याच्या सायकलचा वेग तसा फार नव्हताच.पण स्कुटर वेगात असूनही लवकर स्टेशन गाठायच्या नादात मी वळणावर हाॅर्न न वाजवता स्कुटर तशीच रेटलेली असते.

अचानक समोर येऊन ठेपलेला तो क्षण आला तसा मी स्विकारलाच नव्हता.त्यामुळेच त्याक्षणी मी नेमकं काय करायला हवं ते मला सुचलंच नव्हतं. म्हणूनच स्टेशनवर वेळेत पोचण्याची निकड हा माझ्या जीवनमरणाचा प्रश्नच बनला होता जसा कांही.त्यामुळेच ‘त्या मुलाच्या जागी आपला मुलगा असता तर?’ हा प्रश्न मनात उभारलाच नव्हता.आपण त्याला ‘तुला लागलं कां रे?’ एवढंतरी विचारायला हवं होतं खरंतर.पण तेही त्यावेळी सुचलंच नव्हतं.

तो क्षण आठवला न् त्या लहान मुलाची चोरट्या नजरेने माझ्याकडे पहाणारी नजर मला त्रास देत राहिली.

अनपेक्षितपणे समोर येऊन ठेपलेला ‘तो क्षण’ आहे तसा न स्विकारल्याने माझ्या मनात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला, माझ्या चुकलेल्या प्राधान्यक्रमांना, माझ्या चुकीच्या प्रतिक्रियांना मीच जबाबदार होतो.

तो क्षण समोर आला तसा स्विकारला असता तर परिस्थितीतलं गांभीर्य मला तत्काळ जाणवलं असतं.मी पटकन् स्कुटर स्टॅंडला लावून त्या मुलाकडे धाव घेतली असती. त्याला उठवून त्याला कांही दुखापत झालीय का हे पाहिलं असतं.त्याची सायकल उचलून उभी केली असती.त्या क्षणी कुणीही जे करणं अपेक्षित असतं तेच मी केलं असतं.

हा एक साधा प्रसंग.पण यापेक्षा कितीतरी विविध प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात सतत येतच असतात. यश, अपयश, संधी,संकटं कांहीही सोबत घेऊन येत असणारे क्षण असतात ते.ते येतील तसे स्विकारले तरच स्थिर मनाने त्या क्षणी आपण योग्य असे निर्णय घेऊ शकतो. अपयशाने खचून न जाता त्यामागची कारणं शोधून आपण त्यांचं निराकरण करु शकतो. यशाने बेभान न झाल्याने आपले पाय जमीनीवरच ठेवून आपल्याला त्या यशाचा आनंद घेणे शक्य होत असतं.संकट असेल तर त्यावेळी नेमकं काय करायला हवं याचा शांतपणे विचार करता येतो.संधी असेल तर ती हातून निसटण्यापूर्वी त्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार आपण करु शकतो.

आपल्या आयुष्यातल्या निसटून गेलेल्या अशा असंख्य क्षणांचं आज स्थिरचित्ताने विश्लेषण केलं तर क्षण कसा स्विकारावा याचं प्रतिनिधीत्व करणारे क्षण अपवादात्मकच आढळतील हे खरं,पण ते यापुढील आयुष्यासाठीतरी नक्कीच दिशादर्शक ठरतील !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्यवती ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ सत्यवती ☆ सौ कुंदा कुलकर्णी

वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : सत्यवती

सत्यवती ही महाभारताची मूळ स्त्री. ती राजा शंतनूची पत्नी, धृतराष्ट्र, पांडू विदुर आणि शुकदेव यांची आजी व कौरव-पांडवांची पणजी होती. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती भगवान वेदव्यास यांची आई होती. तिची जन्मकथा सुद्धा विलक्षण आहे.

पूर्वी सुधन्वा नावाचा एक राजा होता. तो शिकारीसाठी वनात गेला. इकडे त्याची पत्नी रजस्वला झाली. तिने गरुडा कडून ही वार्ता पतीला कळवली. त्याने आपले वीर्य एका द्रोणात भरून तिच्या साठी त्या पक्षाकडून पाठवले. वाटेत एका पक्षाने त्याच्यावर हल्ला केला. द्रोणा तले वीर्य यमुनेत पडले. तिथे ब्रम्हा च्या शापामुळे मछली च्या रूपाने अद्रिका नावाची एक मछली होती. पाण्याबरोबर तिने ते वीर्य गिळले. ती गर्भवती झाली. दाशराज नावाच्या निषादाने तिला पकडले व तिचे पोट चिरले. त्यातून एक कन्या बाहेर आली. दाशराजाने ती सुधन्वा कडे नेली. पण तिच्या अंगाला फार घाण वास येत होता म्हणून राजाने स्वीकार केला नाही. दाशराजानेच तिचा सांभाळ केला. त्याने नाव ठेवले सत्यवती. तिच्या अंगाला माशांचा वास येत असल्यामुळे तिला मत्स्यगंधा हे नाव पडले. ती मोठी झाल्यावर होडी चालवण्यास शिकली.

एकदा परशुरामपुत्र पराशर ऋषी यमुनेकाठी आले. मत्स्यगंधाला पाहून ते तिच्या प्रेमात पडले. पण हुशार सत्यवती ने त्यांना नकार दिला. ती म्हणाली तुम्ही ब्रह्मज्ञानी आणि मी निषाद कन्या आपले कसे जमणार? पण पराशर ऋषी ऐकेनात तेव्हा तिने त्यांना तीन अडचणी सांगितल्या.

1) माझ्या अंगाला घाण वास येतो. पराशर ऋषीनी तो नाहीसा करून तिथे सुगंध निर्माण केला. आणि ती योजन गंधा म्हणून प्रसिद्ध पावली.

2) माझा कौमार्यभंग झाल्यावर माझे लग्न कसे होणार?

ऋषीनी  तिला वर दिला मुलाच्या जन्मानंतर तू अक्षत योनी होशील. कुमारिका होऊन तुझे दुसरे लग्न होईल.

3) आपले मीलन दोन्ही किनाऱ्यावरचे लोक बघतील.

ऋषीने दोघाभोवती संपूर्ण होडीवर दाट धुके निर्माण केले.

ते दोघे एका द्वीपा वर गेले. तिथे त्यांचा पुत्र व्यास जन्माला आला.

तो जन्मताच उभा राहिला व बोलू लागला “माते मी तपश्चर्या करण्यासाठी दूर निघून जाणार आहे पण तुला वचन देतो की तू जेव्हा संकटात सापडशील तेव्हा माझे स्मरण कर मी तुझ्यासाठी धावत येईन.”

पराशर ऋषींच्या वरदानामुळे सत्यवती हे सारे विसरून गेली व कुमारिका म्हणून जगू लागली.

एकदा शंतनू राजा तिथे आला. त्याला ती आवडली व त्याने दाश राज कडे लग्नासाठी मागणी घातली. तो म्हणाला तिचीच मुले राज्यावर बसतील व ती राजमाता होईल असे वचन द्या. शंतनू ला देवव्रत नावाचा मुलगा होता. त्यालाच तो राज्यावर बसवणार होता. पण सत्यवतीच्या प्रेमामुळे तो खंगायला लागला. देवव्रताने दाश राजाच्या अटी मान्य करून ब्रह्मचर्य पा पाळण्याचा निर्णय घेतला.

सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे दोन मुलगे झाले. शंतनु च्या मृत्यूनंतर चित्रांगद गादीवर बसला पण एकदा गंधर्वाबरोबर युद्ध सुरू असताना तो मरण पावला. विचित्रवीर्य गादीवर बसला. सत्य वतीने त्याचे लग्न काशीराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी लावून दिले. पण त्याला क्षयरोग झाला आणि त्याचाही मृत्यू झाला. सत्यवती ला खूप दुःख झाले पण वंश पुढे चालू ठेवण्यासाठी तिने देव व्रताला लग्न कर असे म्हटले. पण तो म्हणाला माते तुझाच मुलगा राज्यावर बसेल असे मी कबूल केले आहे. तू तुझ्या मुलाला हाक मार. आणि एकाएकी सत्यवतीला पूर्वायुष्य आठवले. तिने व्याकुळ होऊन साद घातली आणि व्यासमुनी धावत आले. वंशवृद्धी साठी व आईची आज्ञा म्हणून त्यांनी नियोग पद्धतीने अंबिके शी संग केला. पण त्यांच्या तेजाने अंबिका खूप घाबरली व तिने डोळे मिटून घेतले. त्यामुळे तिला अंध पुत्र मिळाला. त्याचे नाव धृतराष्ट्र. अंध मुलाला राज्यावर बसण्याचा अधिकार नाही असे सांगून सत्य वतीने अंबालिकाशी संग करण्यास सांगितला. पण व्यासांना पाहताच ती पांढरीफटक पडली. अशक्त पांडू जन्माला आला. सत्यवतीने पुन्हा अंबालिका ला गळ घातली. पण तिने आपल्या ऐवजी आपल्या दासीला पाठवले. विदुर जन्माला आला.

सत्यवती हताश झाली. तिने धृतराष्ट्राचे लग्न गांधारी शी लावून दिले. पांडू चे लग्न कुंती आणि माद्री यांच्याशी लावून दिले. शंभर कौरव आणि पाच पांडव यांची ती आजी झाली.

पांडूच्या मृत्यू नंतर ही फारच निराश झाली. व्यास त्रिकालज्ञानी होते. त्यांनी तिला वानप्रस्थाश्रम स्वीकारून अरण्यात जाण्यास सांगितले. ती अरण्यात गेली. तिने अन्नत्याग केला. त्यातच तिचा मृत्यू झाला. असे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व सत्यवती उर्फ योजनगंधा.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares