मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? स र प्रा ई ज ! ?

सकाळचा नेत्र सुखद मॉर्निंग वॉक…… याच्या पुढचं, हे चौथे चं म त ग असल्यामुळे तुम्हांला एव्हाना पाठ झालेलं असणारच, अशा माझ्या खात्रीलायक (?) समजूतीतूनच आजच हे चं म त ग सादर करतोय !

तर नेहमीप्रमाणे सोफ्यावर पेपर वाचत, बोक्या सारखा (कोब्रा असल्यामुळे डोळ्याचा रंग त्याच्या डोळ्याशी मिळता जुळता असणारच!) तो जशी दुधाची वाट बघत बसतो तसा, एक डोळा किचनकडे ठेवून, बायकोच्या हातच्या पहिल्या गरमा गरम चहाची वाट बघत बसलो होतो ! पण दहा मिनिट झाली तरी जमीन हादरली नाही !  मग मीच पेपर पुन्हा पुन्हा उघडझाप करून त्याचा आवाज किचन मधे ऐकू जाईल इतपत करून बघितला !  तरी पण टाचणी पडून त्याचा सुद्धा आवाज ऐकू येईल इतकी किचन मधे शांतता ! आता हा pin drop silence आपल्या भाषेत कोणी आणला, हा संशोधनाचा विषय होऊ शकेल, कारण माझ्या मते अशी एखादी टाचणी खरंच जमिनीवर टाकून, त्याचा कोणी आवाज ऐकला असेल, यावर शेंबड पोर पण विश्वास ठेवणार नाही ! असो ! साहेब जाताना ज्या अनेक गोष्टी सोडून गेला त्यातलीच त्याची ही एखादी पिन मागे राहिली असावी, असा आपला माझा अंदाज ! यावर पिना मारण्यात पटाईत लोकंच जास्त पिना, सॉरी (हा आणखी एक साहेबाने आपल्याला बहाल केलेला तोंडाचा दागिना !) प्रकाश टाकू शकतील, या विषयी माझ्या मनांत कसलीही शंका नाही ! तुम्हांलाच काही शंका असेल तर स्वतःच एखादी पिन टोचून, सॉरी, जमिनीवर पाडून तिचा आवाज येतोय का ते बघा आणि मला कळवा म्हणजे झालं !

आता चहासाठी बायकोला स्वतःहून बोलावण्याशिवाय माझ्या समोर काहीच पर्याय नव्हता, कारण सकाळचा पहिला चहा पोटात गेल्याशिवाय पुढची ‘सगळीच आन्हीक शब्दशः अडकणार होती’ ! शेवटी, मी जशी रडणाऱ्या लहान मुलाची ज्या आवाजात समजूत काढतात, तो आवाज माझ्या गळ्यातून काढायचा प्रयत्न केला आणि “अगं ऐकलस का, मला जरा च…….” माझा हा उच्चारायच्या आत बायको कधी नाही तो ट्रे मधे चहा बरोबर, माझ्या आवडत्या गूड डेच्या बाजूला उपम्याची डिश अशा सरंजाम्यात माझ्या समोर हसत हसत हजर झाली ! काय सांगू तुम्हांला मंडळी, माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना ! आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, with Rayban गॉगल अशी माझी अवस्था झाली ! “अहो, सॉरी हं !” बघा मगाशीच मी म्हटलं नां, साहेबाने दिलेला तोंडाचा दागिना, लगेच हिच्या मुखातून माझ्यासाठी कधी नव्हे तो पहिल्यांदा बाहेर पडला ! मी पण वरकरणी “अगं सॉरी कशाला म्हणायला हवं, रोज तू मला न मागता लगेच चहा आणून देतेस आणि आज एक दिवस उशीर…..” “देते हो, पण म्हटलं आज तुम्हाला थोडं ट्रे मधून surprise पण द्यावं, म्हणून उशीर झाला !”

आता मला सांगा, मी आज मला मिळालेल्या पहिल्या टीच्या, ट्रे ट्रीटमेंटच्या सरप्राईज मधून अजून सावरलो नव्हतो, तर बायको म्हणत होती तुम्हाला आज सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे म्हणून ! अरे बापरे, आता हे तिचं आणखी नवीन सरप्राईज माझ्या खिशातल्या पाकिटाला किती जड जाणार आहे, असा मनांत विचार करत “कसलं गं सरप्राईज ?” असं म्हणत चहाचा कप हातात घेऊन एक घोट घेतला आणि तोंडातून नकळत खरोखरचा “व्वा !” आला. त्याला कारण आजच्या चहाची चव खरंच अमृततुल्य होती ! माझा “व्वा” ऐकून बायकोने माझ्या मागे येवून माझ्या गळ्यात लाडाने हात टाकले ! “अगं मुलं मोठी झाली आपली आता आणि तू असं…” “आई येणार आहे पंधरा दिवस रहायला !” तिचे ते शब्द मी पीत असलेल्या गरम चहा सारखे माझ्या कानात गरमा गरम शिरले आणि मी “काय s s s s ?” असं तितक्याच गरम आवाजात उच्चारता झालो ! “म्हणजे ?” “अगं तसं नाही, मला ‘कधी’ म्हणायचं होतं, पण चुकून ‘काय’ असं आलं तोंडातून !” “मग ठीक आहे !” असं म्हणत ती माझ्या समोर येवून बसली. माझा शब्दखेळ बहुतेक तिच्या पचनी पडला असावा असं समजून मी परत एकदा “कधी येणार आहे आई ?” असं जमेल तितक्या मऊ मुलायम स्वरात तिला विचारलं. “या पंधरा तारखेला आणि तीस तारखे पर्यंत परत जाणार आहे !” बायको मला आनंदाने सांगती झाली. “अगं पण तेंव्हा तर आपण दोघ महाबळेश्वरला जाणार आहोत !” मी पुडी सोडून दिली. “काय s s s ? हे कधी ठरलं, तुम्ही मला काहीच सांगितलं नाहीत महाबळेश्वरच्या या आपल्या प्लॅन विषयी !” “तूच नेहमी सरप्राईज द्यायच असं थोडंच आहे, कधीतरी या पामराला तो चान्स मिळू दे की !” मी हसत हसत गुगली टाकली.

त्यावर लटक्या रागाने खूष होऊन बायको मला विचारते कशी “हे मधेच काय तुम्ही महाबळेश्वरचे काढलंत आणि ते सुद्धा मला मेलीला जराही थांगपत्ता न लागू देता ! अगदी कमालच झाली बाई तुमच्या या अनोख्या सरप्राईजची !” “अगं कमाल वगैरे काही नाही ! बँकेने नवीन हॉलिडे होम बांधलं आहे महाबळेश्वरला आणि पेन्शनर लोकांना पण त्याचा स्वस्तात लाभ घेता येतो असं परवाच मला लेल्या म्हणाला.” “असं होय, नाहीतर सिझनमधे तिथल्या हॉटेलात रहाणं म्हणजे कठीणच होतं आपल्याला.” “अगं म्हणून तर चांगल पंधरा दिवसाचं बुकिंग केलय आपल्या दोघांच !” “नाही, पण बुकिंग confirm आहे नां आपल्या दोघांच ?” “म्हणजे काय, तू काळजीच करू नकोस, बिनधास्त लगेच तयारीला लाग !” असं म्हणून उरलेला चहा मी संपवला आणि ओला नारळ आणि कोथिंबीरीने सजलेली उपम्याची डिश हातात घेतली ! ते बघून, “मी आलेच हं आईला फोन करून !” असं अत्यानंदाने घोषित करून बायको बेड रूम मधे पळाली पण ! ते बघून मी सुटकेचा निश्वास टाकला. आता तुम्ही मला विचाराल सुटकेचा निश्वास का टाकला तुम्ही ? तर काय सांगू तुम्हांला मंडळी, आमच्या सासूबाई म्हणजे मोठं खटलं आहे ते ! अतिशय कर्मठ, या कलियुगात पण सोवळ ओवळ पाळणाऱ्या, इतकं की सकाळी अंघोळ झाल्याशिवाय कुणीही चहाच काय, पाणी पण प्यायचं नाही असा त्यांचा दंडक ! या वरून तुम्हांला कल्पना येईल की मी सुटकेचा निश्वास का टाकला ते !

मी बायको आत गेल्याचे बघून उपम्याचा पहिला घास घेणार इतक्यात, बायको हातात मोबाईल घेऊन बाहेर आली आणि मला म्हणाली “अहो आईचा नंबर बदलला आहे का ? लागत नाहीये !” “अगं मला कसं माहित असणार तुझ्या आईचा नंबर बदलला असेल तर ? ती तुलाच आधी सांगेल नां ?” त्यावर थोडं वैतागून मला म्हणते कशी “अहो माझ्या आईचा नंबर मला तोंड पाठ आहे, तो अजिबात बदललेला नाही, कळलं ? मी तुमच्या आईचा मोबाईल नंबर बदलला आहे का असं विचारत्ये ?” मी पण तेवढ्याचं शांतपणे तिला म्हटलं “नाही गं, माझ्या आईचा पण जुनाच नंबर आहे, कळलं ! अगं पण माझ्या आईचा मोबाईल नंबर कशाला हवाय तुला ?” यावर ती तितक्याच थंडपणे मला म्हणाली “अहो असं काय करता, तुमची आई येणार होती नां आपल्याकडे पंधरा दिवस रहायला ? पण आता आपण तेंव्हा तर महाबळेश्वरला असणार, मग तिला तसं सांगायला नको का, आत्ता येऊ नका, नंतर कधीतरी या म्हणून ?” तीच ते बोलणं ऐकून, माझ्या पहिल्या वहिल्या उपम्याच्या घासाचा चमचा, माझ्या ओठाजवळ येता येता, हवेतल्या हवेत राहिला आणि बायकोच्या या कुटील सरप्राईज मुळे त्याच अवस्थेत मी फक्त बेशुद्ध व्हायचा बाकी राहिलो !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बिचारी आजी – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

 ☆ विविधा ☆ बिचारी आजी – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

नातवंडांच्या शाळेत ग्रँड पेरेंट्स डे होता. त्यामुळे आजी- आजोबा मोठ्या उत्साहानं मुलाकडं जायला निघाले होते. सगळ्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ ,नातवंडांसाठी कपडे, खेळणी, पुस्तके, इतर सटरफटर वस्तू… आजोबांच्या सूचना डावलून आजीबाई सामान वाढवतच चालल्या होत्या. गाडी सुरु झाली तशी आजोबांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मुलाच्या घरी पोहोचता क्षणीच ,”आजी- आजोबा” म्हणत चार बाल हातांनी त्यांच्या कमरेला विळखा घातला.’सुख- सुख म्हणजे वेगळं काय असतं!’ विचारानं दोघेही गहिवरली. नवे- नवे कपडे, खेळणी यात गुरफटलेल्या नातवंडांना इकडे तिकडे बघायला फुरसतच नव्हती .

दुसऱ्या दिवशी नातवंडांच्या कार्यक्रम बघून त्यांना खूप धन्यता वाटली. डान्स ,गाणी, फनी गेम्स स्पर्धा त्यांनी सगळं खूप एन्जॉय केलं.

” छान ,अगदी दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम होता नाही? किती स्मार्ट असतात हल्लीची मुलं, नाही तर आपल्या वयाच्या लोकांचं बालपण….” आजी म्हणाल्या. आजीच्या म्हणण्याला आजोबांनी ही दुजोरा दिला.

पुढच्या दिवशी मुलांचे आई बाबा गेले ऑफिसला. मुलांना गॅदरिंग संपल्याची सुट्टी होती आणि आजी आजोबा घरी असल्याने लालन-पालनमधे… (पाळणा घराचे नाव)… जायचा पण प्रश्न नव्हता. आजोबा पेपरात डोकं घालून बसले आणि आजींचा आवडता टाइमपास सुरू झाला…. टीव्ही सिरीयल बघण्याचा…, ‘नवऱ्याची बायको’ चालू होतं! शनायाशी गुरुचं लग्न लागत होतंआणि राधिकाचं रडणं सुरू होतं. थोरला नातू जवळ येऊन बसला होता. “आजी ती गर्ल का रडतेय ?ती त्या अंकलची वाईफ आहे का? मग तो दुसऱ्या गर्लशी लग्न का करतोय ?..म्हणजे तो गुरु अंकल बॅड बॉय आहे का?”प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

” हो रे बाबा, “आजी टीव्ही वर टिकवलेली नजर न काढता उत्तरली… ‘ठाय्-ठाय’ टी.व्हीवर खोट्या खोट्या गोळ्या झाडत तो पळून गेला.

मुलगा सुनेला कामापुढे टीव्ही बघायला वेळच नसायचा. आणि नातवंडांना लालन पालन मधे फक्त बेबी टीव्ही, किंवा छोटा भीम या सारख्या मालिकाच दाखवायचे ,ते पण थोडाच वेळ !  

रात्री आजीने कोणती तरी राजा राणी ची मालिका लावली होती. थोरला- धाकटा दोघंही बघायला बसले…  आणि त्यांचे प्रश्न सुरु झाले ,”आजी हाअंकल कोण आहे ?”  ..”राजा चंद्रसेन.”..” ती क्वीन आहे का..?”..”हो .”आणि ती दुसरी गर्ल?..ओह! ती पण क्वीन ?..”एक किंगच्या दोन-दोन क्विन ?”नातवंडांचे प्रश्न !

“अरे पौराणिक ,ऐतिहासिक अशा पूर्वीच्या काळात एका राजाच्या दहा दहा पण क्विन्स असायच्या. “आजोबांनी नको तेव्हा नाही ती माहिती पुरवली. “ओ माय गॉड!” दोघं एक सुरात ओरडली, “आजी म्हणजे तो चंद्रसेन किंग,तो पण बॅड बॉय आहे का त्या गुरुसारखा?”

बिचाऱ्या आजीला उत्तर सुचले नाही. तेवढ्यात थोरला म्हणाला , “आजी हे नको बघायला. त्यापेक्षा क्रिकेट लावूया.” चॅनल बदलून क्रिकेट, न्यूज वगैरे बघण्यात नातवंडं आणि त्यांचे आई-बाबा गुंग झाले.

क्रमशः….

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समृद्ध मराठीतील समृद्ध पडणे ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

? वाचताना वेचलेले ?

☆ समृद्ध मराठीतील समृद्ध पडणे ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

झाडावरून पडलो 

मागे पडलो

प्रेमात पडलो

परीक्षेत कमी पडलो

इलेक्शन मध्ये पडलो

रणांगणात पडलो

धंद्यात पडलो

धंद्यात पडलो – ( नुकसान झाले )

दारू पिऊन पडलो

मी जरा पडलोय

दुसऱ्याच्या कमी पडलो

यात मी का पडलो बाबा ?

संभ्रमात पडलो

याला टक्कल पडलं बघ

कारभारात पडलो

काळाठिक्कर पडलो

कुठून चौकशीत पडलो कळत नाही

डोक्यावर पडला आहेस का ?

चेहरा पडला

टिपूर चांदणं पडलंय

अध्यात्मात पडलो

पदरात दान पडलं

चंद्राला खळे पडलंय

देवाच्या पायी पडलो

मला विसर पडला

माझे शेअर्स पडले

बायकोची गाठ पडली 

 

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स : 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆  15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग ३ ☆ 

मित्र म्हणायचे, “ काय बे आब्या , उतरली का रे मस्ती तुजी ? साल्या, लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, तू  मोटा तीसमारखान निघालास होय ? स्वतःला शाना समजतो का रे ?  एवढी मोठी नोकरी सोडलीस ? मर साल्या आता, नोकरी सोडून जो शहाणपणा केला आहेस—भोग त्याची फळं… त्याच लायकीचा आहेस xxxx तू … ! ”

——ही  xxxx शिवी मनात रुतुन बसलीय, काट्यासारखी … !——-ही शिवी मी मनात जपुन ठेवलीय—–फ्रेम करुन– आणि या फ्रेमवर मी खूप प्रेम करतो ! 

——मी पूर्ण डिप्रेस झालो होतो, डिप्रेस करणारे माझेच होते…!

——बुडण्याचं दुःखं नसतं—-मरण्याचंही नसतं, पोहता येत नाही– याचंही दुःखं मुळीच नसतं—पाण्यात ढकलणारा जेव्हा आपलाच असतो ते खरं दुःखं !

मी या दुःखात बुडुन गेलो !  

तरीही निर्लज्जासारखं मला हाकलून देणाऱ्या भिक्षेक-यांमध्ये  मी रोज रोज जायचो. 

नाही नाही ते त्यांचं ऐकून घ्यायचो, त्यांच्या पोटभर शिव्या खायचो, रात्री झोप लागायची नाही, कारण शिव्याशाप खावुनही शेवटी पोट रिकामंच असायचं…. ! 

——हे असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 31 महिने चाललं—–! 

एकेदिवशी, अंगावर अक्षरशः किडे पडलेले, फुटपाथवर 24 वर्षे पडलेले एक आजोबा दिसले.  त्यांच्या पाच फुटांवर सुद्धा कुणीही जात नसे. त्यांचं सर्व ड्रेसिंग करून, त्यांना स्वच्छ करून 

“आपलं घर” च्या विजय फळणीकर सरांकडे एका वृद्धाश्रमात ठेवलं. 

–या बाबांना  पूर्ण माणसात आणलं….!  ते गेले,  तेव्हा त्यांचा मुलगा म्हणुन त्यांचे अंत्यसंस्कारही केले——!

भीक मागणाऱ्या समूहाने हे सर्व पाहिलं… ! 

यानंतरही या भिक्षेकर्ऱ्यांनी  मी भिक्षेक-यांसाठी केलेल्या अनंत गोष्टी दुरुन दुरुन पाहिल्या—- !

—आणि हळूहळू माझ्याबद्दलचं त्यांचं मत बदलत गेलं…!—- 

“ यार … हे सालं आपल्यातलंच हाय… ह्यो आपल्यासाटीच कायतरी करतोय … ! “

—–इतकी साधी गोष्ट त्यांना कळायला 31 महिने गेले होते—आणि हे त्यांना कळेपर्यंत मी पण ख-या अर्थानं भिकारी झालो होतो—-! 

—-हळूहळू मला त्यांनी आपल्या मध्ये ऊठ-बस करण्याची मनापासून परवानगी दिली. 

आॕगस्ट 2015 ते मार्च 2018 अशी अडीच वर्षे मी फक्त त्यांच्यात मिक्स होण्यासाठी झुंजत होतो—! 

हा काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता… खडतर होता… ! त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मला अडीच वर्षे झुंज द्यावी लागली. 

या काळात त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर सतत बसत असे, उठत असे,  जेवत असे, खात असे—! 

भिक्षेक-यांनी माझी अशी अडीच  वर्षे कठोर परीक्षा पाहून मला त्यांच्यातला एक होण्याची संधी दिली—- !

—–भिकारी होणंही इतकं सोपं नसतं तर ! त्यासाठी पण परिक्षा असतात—-MPSC आणि UPSC पेक्षा अवघड !  यासाठीही कठोर परिश्रम असतात तर !!! 

—–आणि मग साधारण एप्रिल 2018 पासून माझं “ डॉक्टर फाॕर बेगर्स “ म्हणून खऱ्या अर्थाने काम सुरू झालं. 

डॉक्टर होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी किंवा एखादा ऑफिसर होण्यासाठी आधी तीन ते चार – पाच वर्षे कठोर अभ्यास करावा लागतो, आणि त्यानंतरच पदवी हातात मिळते. 

मी सुद्धा अडीच तीन वर्षे कठोर परिश्रम घेऊन भिकाऱ्यांचा डॉक्टर ही पदवी मिळवली होती, उत्तम मार्कांनी मी पास झालो होतो !— होय—-मी भिका-यांचा डाॕक्टर झालो होतो… ! 

——–ही पदवी एकदा हातात पडल्यानंतर मात्र, मी मागं वळून पाहिलंच नाही.

आम्ही आईबाप होवुन गेलो अशा पोरींचे—-

बिन बाळंतपणाची मनिषा… आई झाली त्यांची ! 

लगीन झालेली बाई सर्व गोष्टीं आपल्या नव-याला, नाहीतर आपल्या बापाला सांगते..

——–सांगायला अभिमान वाटतो की, आज या भिक्षेकरी कुटुंबाचा मी कुटुंबप्रमुख आहे. 

मला विचारल्याशिवाय आज  कोणतीही गोष्ट यांच्यात होत नाही—- यांच्यामध्ये सोयरीक जुळताना सुद्धा आज माझा शब्द शेवटचा धरला जातो. यांच्या पोरांची नावं मला विचारुन ठेवली जातात—! पोरी कुठलीही गोष्ट पहिल्यांदा आपल्या आईला सांगतात—पण आज भिक्षेकरी पोरी मला नि मनिषाला त्यांच्या आई अगोदर आम्हाला सारं सांगतात —–

पोरी मलाच बाप समजाया लागल्या—-आईशप्पथ –मी पन्न्नास वर्षाच्या विवाहित पोरीचा पण बाप झालो—-! बापापेक्षा पोरगी वयानं मोठी… पण म्हटलं ना ? वय हा फक्त एक आकडा ! नातं महत्वाचं… आणि नात्याला वय नसतं !

भिक्षेक-यांच्या  शंभराहून अधिक  पोरांची नावं आज “अभिजीत” आहेत—पन्नासहून अधिक पोरींची नाव आज “मनिषा” आहेत… !

——कोणताही  पुरस्कार फिका वाटतो मला यापुढं !

क्रमशः…..

© डॉ. अभिजित सोनवणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विदारक तरीही ?? ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? विविधा ?

☆ विदारक तरीही ?? ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

परंपरा या नावाखाली आपण बऱ्याचदा सारासार विवेकबुद्धी हरवतो आणि भले -बुरे याचा विचार न करताच परंपरेशी बुद्धी गहाण ठेऊन एकनिष्ठ रहातो, मनाला न पटले तरी मनाचा दगड करतो, ज्या समाजात फुले, आगरकर, कर्वे यांच्यासारखे समाजसुधारक आयुष्याची होळी करून गेले असले तरी !

परवा एका नातेवाईकांच्या घरी माती सावरणेच्या प्रसंगाला गेल्यावर मन पेटून उठवणारा पण हतबलता लक्षात येऊन मन विषण्ण झाले तो प्रसंग असा..नवरा कावीळ ने गेला लग्न होऊन अवघे दोन वर्षे झालेले, लग्न जोडीदार याचा अर्थ कळायच्या आतच मुलीवर हा प्रसंग, त्यातच मुलगी शामळू, भित्री, नुकतेच कॉलेजचे शिक्षण संपवून हात पिवळे झाले, हळदीचा रंग अजून फिकट व्हायचा होता तोपर्यन्त तिच्यावर आलेला हा प्रसंग ती कोलमडली या अनपेक्षित धक्क्याने, मानसिक अवस्था बिकट झाली, ती नुसतं रडतच होती … विधिलिखित  कुणी बदलू शकत नाही, हेच खरे !तिसरा दिवस …नातेवाईक गोळा झाले, नैवेद्य भरला अन …अन तो प्रसंग आला कुणाही स्त्रीच्या आयुष्यात येऊ नये असा …तिचं अहेव लेण उतरून नैवेद्यावर ठेवण्याची घाई ..कुणी जायचे मंगळ सूत्र तोडायला ? कुजबुज वाढली ..”आवरा …”पुरुषमंडळी बाहेरून ओरडत होती …इतक्यात एक विधवा वृद्धा धीर धरून पुढे आली …खरेच किती विदारक हे …पहिले मंगळसूत्र ….ती मुलगी तोंड लपवून हुंदके दाबत होती तिचा श्वास घुसमटला …ते चित्र मला पाहवेना ..मी उठले न जमलेल्या सर्व जमावाला उद्देशून म्हणले, ” खरेच याची गरज आहे का ?? आपण सगळे सुशिक्षित आहात मग का अश्या पद्धतीने मंगळसूत्र तोडत आहात ? मुलीची मानसिक अवस्था तर पहा ! “

क्षणभर एकदम स्तब्धता पसरली माझं बोलणं अनपेक्षित होतं …कुजबुज सुरु झाली …”ही कोण ?काय करते ?” बऱ्याच स्त्रियांना विचित्र वाटले त्या विचित्र नजरेने पाहू लागल्या, पण मला फिकीर नव्हती .”ठीक तुमची मर्जी … ” एक पुरुष बोलला पण मंगळसूत्र तोडलेच, जोडवी उतरली, बांगडी फोडली अन नैवेद्य असा सजून गेला .गर्दीतली एक बाई उठली अन माझ्या गळ्यात पडून रडत म्हणाली, “बाई माझे …मनातलं गं बोललीस …लाखातलं एक …”अन ती धाड धाड रडू लागली जणू त्यांच्या ठसठसत्या वेदना मी आज मुक्त वाहू दिल्या होत्या !

पण माझं विचारी मन अस्वस्थ झालेय, राहून राहून प्रश्न पडतो, की आपण आज शिकलो, प्रगत झालो, पण अश्या परंपरेच्या मानसिक गुलामीतून का मुक्त होऊ शकत नाही ? का अजूनही स्त्रीला जबरदस्तीने अहेव लेण उतरून ठेवायला लावले जाते ? का नवऱ्याच्या आत्म्यालाही या सगळ्यांची आवश्यकता असते ?? बऱ्याचदा ग्रामीण  भागात असे चित्र दिसते, शेतकरी कामकरी महिलांची पायांची बोटे कष्टाच्या कामाने रापतात जोडवी करकचून फिट्ट झालेली असते, आणि ती सहजा सहजी निघत नाहीत, अशात ज्या महिलेवर असा प्रसंग ओढवलेला असतो तिला हा प्रसंग नको, ते लेण उतरवायला नको असे वाटत असते, ती अंग चोरते, तोंड लपवते आणि जोडवी हिसकावून काढताना जखमा होतात किती विचित्र ! कोणतीही स्त्री परंपरेच्या विरुद्ध सहजासहजी जात नाही मग तिला जेव्हा ते उतरावे वाटेल तेव्हा ते उतरून द्यायची मुभा का नसावी ? समाजातील हे चित्र आता तरुणानीच बदलायला हवे , (कारण स्त्रिया दुःखामुळे पतीवरील प्रेमामुळे असा निर्णय नाही घेऊ शकत )

चंद्रकोर कपाळी मिरवून शिवबाचे पाईक आहोत हे दाखवण्यापेक्षा विचारांचे जरूर पाईक व्हावे, आठवा, शिवरायांनी आपल्या मातेला सती जाऊ दिले नव्हते ! प्रत्येकाने आपल्या नातेवाईक महिलांवर असे प्रसंग आले तर अश्या निरर्थक प्रथेला विरोध करायला हवा, पहिला दगड कुणीतरी उचलल्याशिवाय समाजाला आत्मबल आणि आत्मभान येणार नाही होय ना ??

आठवावे, मंगळसूत्र घालतानाचा विधी किती पवित्र, शुभ मुहूर्त पाहून केला जातो ! मग ते काढताना इतका विदारकपणा अन अमानुष पणा अन भयानकता का ?? कोल्हापूर जिल्ह्यातील एका थोर विचारवंताने आपल्या पत्नीला सांगून ठेवले होते की ‘त्यांच्या माघारी पत्नीच्या आचरणात कोणताच बदल न व्हावा अन अहेव लेणी, कुंकू  तसेच ठेवावे ‘

माणूस किती शिकला याला महत्त्व नाही तर त्याचे आचरणात किती शिक्षितपणा आहे हेच महत्वाचे नाही का ??

 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुलना ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ तुलना ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर ☆ 

तुलना(Comparison) 

श्वेताने एका तासात १० किमी अंतर कापले. आकाशने तेच अंतर दीड तासात पूर्ण केले. 

दोघांपैकी तंदुरुस्त कोण? किंवा कोणाचा फिटनेस चांगला? 

अर्थात सर्वांचे उत्तर श्वेता असेल. 

श्वेताने हे अंतर तयार केलेल्या ट्रॅकवर पूर्ण केले तर आकाशाने दगड-मातीच्या वाटेने चालत असे म्हटले तर ???

मग सर्वांचे उत्तर आकाश असेल. 

पण जेव्हा आम्हाला कळले की श्वेता ५० वर्षांची आहे तर आकाश २५ वर्षांचा आहे ?? 

मग सर्वांचे उत्तर पुन्हा श्वेता असेल. 

पण आम्हाला हे देखील कळले की आकाशचे वजन तब्बल १४० किलो आहे तर श्वेताचे वजन ६५ किलो आहे. 

पुन्हा सर्वांचे उत्तर आकाश असेल 

जसे आपण आकाश आणि श्वेताबद्दल अधिकाधीक माहिती मिळवतो, तसे तसे कोण चांगले आहे याबद्दल आपली मते भिन्न होतात आणि निर्णय बदलतात.

जीवनाचे वास्तवही असेच आहे. आपण प्रत्येकाबद्दल खूप वरवर आणि घाईने आपले मतं तयार करतो, ज्यामुळे आपण स्वतःला आणि इतरांना न्याय देऊ शकत नाही. 

प्रत्येकाला वेगवेगळ्या संधी मिळतात. 

प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे. 

प्रत्येकाची साधन-संपत्ती भिन्न आहे. 

प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. 

प्रत्येकाचे उपाय वेगवेगळे आहेत. 

प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे.

म्हणूनच आपल्या आरोग्याची, संपत्तीची, परिस्थितीची अथवा जीवनाची श्रेष्ठता कोणाशी तुलना करण्यात नाही तर स्वतःची परीक्षा घेण्यामध्ये आहे. तुम्ही सर्वोत्तम आहात,  एकमेकाशी वादविवाद व तुलना करणं टाळा तुम्ही जसे आहात तसेच रहा आणि तुमच्या परिस्थितीनुसार सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करत रहा. निरोगी रहा, समाधानी रहा, हसत रहा, भगवंताच्या भक्तीत राहा, प्रामाणिक प्रयत्न करत रहा.

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स : 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆  15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग २ ☆ 

दरवेळी मी सर्वांना दर महिन्याचा लेखा-जोखा सादर करत असतो.

15 ऑगस्ट 2015 ला मी इंटरनॅशनल संस्थेमधला जॉब सोडला होता, अंगावरची झूल काढली होती. मी स्वतः मुक्त झालो होतो यादिवशी ! 

आज बरोबर या गोष्टीला सहा वर्षे पूर्ण झाली, म्हणून साधारण सहा वर्षाचा लेखाजोखा आज अगदी थोडक्यात सादर करत आहे——

वाटेत भेटलेल्या भीक मागणा-या आजोबांना आदरांजली व्हायची,  म्हणून भीक मागणा-या  समूहासाठी मी काम करायचं ठरवलं. 

ते तर गेले… पण त्यांच्यासारखे अजून खूप आहेत—त्यांतल्या एखाद्याला हात देवू, या विचारांतुन—-! 

या समुहासाठी काहीतरी काम करायचं म्हणून मग मी रस्त्यावर फिरायला सुरुवात केली.  

सुरुवातीला मला सुद्धा कशाचीही माहिती नव्हती. मी भीक मागणाऱ्यांमध्ये  मिसळायचा प्रयत्न करु लागलो. 

सुरूवातीला लाज वाटायची…!  डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून मी त्यांच्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करायचो.  

मुखवटा लावला होता… ! 

पण मला भीक मागणा-या  लोकांनी त्यांच्यात सुरुवातीला येवू दिलं नाही.  त्यांना वाटायचं, हा पोलिसांचा खबऱ्या असेल आणि आपल्याला पकडून देईल पोलिसांत, भीक मागतो म्हणुन … ! (कारण भीक मागणं हा गुन्हा आहे कायद्यानं )

किंवा कदाचित आपल्या बरोबर धोका करून, आपली जमा झालेली भीक घेऊन कुठेतरी पळून जाईल हा भामटा …!– डाॕक्टर आहे हा xxx—गोड बोलुन आपल्या किडन्या काढून विकेल, रक्त विकेल, अजून काही काही पार्ट काढुन हा बाजारात विकेल— यांत आपण मरुन जाऊ—-या डॉक्टरचा भरवसा काय ? 

किंवा आपल्या पोरीबाळींना कुठेतरी फसवेल,  फसवुन “धंद्याला” लावेल.  (मी अगोदर शरीर विक्रय करणा-या मुलींचं पुनर्वसन करणा-या एका संस्थेत बुधवार पेठेत काम करायचो— शरीर विक्रय करणा-या  या ताईंमध्ये माझी उठबस होती. काही लोकांना वाटायचं, हा माझा “धंदा” आहे, आणि मी मधला दलाल ! भीक मागणाऱ्या समुहामध्ये हाच गैरसमज पसरला होता)—-

या सर्व गैरसमजापोटी, या लोकांनी मला त्यांच्यात येण्यास पूर्णपणे बंदी घातली, धमक्या दिल्या, शिव्याही दिल्या. खूप वेळा अंगावर धावुन सुद्धा आले, काही लोक तर चप्पल दाखवायचे किंवा अंगावर थुंकायचे…! मी त्यांच्यात येवुच नये, यासाठी ते हरत-हेनं मला विरोध करायचे ! 

मी पूर्णपणे निराश झालो होतो. या लोकांसाठी मी माझी खुर्ची आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. माझ्या चार ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडलं होतं…

मी पूर्णपणे निराश झालो ! 

धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली. कुत्रं तरी बरं, त्याला कुणीतरी हाड् म्हणत  का होईना, तुकडा तरी टाकतं… मला ते ही मिळेना ! 

एकीकडे काहीही कमवत नव्हतो आणि ज्यांच्यासाठी काम करायचं म्हणून नोकरी सोडली, ते लोक मला भाव देत नव्हते– नव्हे ते मलाच हाकलून लावायचे, जसा काही मीच भिकारी होतो… ! 

या काळात भिक्षेक-यांपेक्षा  वाईट अवस्था झाली माझी ! मी खरोखरचा बेरोजगार, बेनाम  झालो होतो… 

14 आॕगस्ट पुर्वी लोक अपाॕइंटमेंट घेऊन आदरानं भेटायला यायचे —– 

15 आॕगस्ट नंतर भिक्षेकरी पण मला हाकलून द्यायचे… माझ्यावर थुंकायचे ! 

किती विरोधाभास !

लाखोंचा पगार थांबल्यामुळे, माझं घर डबघाईला आलं—- कालचा साहेब, आज भिकारी झाला !

एका रात्रीत रावाचा रंक होतो… आणि रंकाचा रावही होवू शकतो… ही म्हण मला माहीत होती… ! 

मी रावाचा रंक झालो होतो.  त्या काळात, एका भिका-याचं उत्पन्न माझ्यापेक्षा जास्त होतं … !

—अशा परिस्थितीत, डॉक्टर मनीषा धावून आली. अर्धांगिनी असण्याचं कर्तव्य तिनं निभावलं !

 तिने आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला… 

—आई-वडील डॉक्टर पी. डी. सोनवणे आणि सौ भारती सोनवणे यांनी मानसिक आधार दिला. 

—माझा भाऊ अमित सोनवणे आणि बहीण दिप्ती सोनवणे यांनी चोहोबाजुंनी आधार दिला…!

—-पण तरीही मी पुर्ण ढासळलो होतो… ! आर्थिक आणि मानसिक !  

त्यातही मी रस्त्यांवर फिरायचो — भिक्षेक-यांत…. 

आणि मला ओळखणारे लोक मात्र माझी खिल्ली उडवायचे—- 

“ काय हो, महाराष्ट्र प्रमुख, आज रस्त्यावर कसे काय तुम्ही…?”  खी.खी.. खी… हसत  लोक टोमणा मारायचे… !

“ एसी हाफीसात बसणारे तुमी… आज गटाराजवळ बसले, वास घेत गटाराचा … आरारारा…. वाईट वाटतं बुवा तुमचं… खी..खी… खी…! “ 

“काय वो सर… आज भिका-यांत बसले तुम्ही…? काय पाळी आली राव तुमच्यावर…  खी..खी… खी…!”  

“ कशाचा सर रे तो …? खी..खी… खी…”

——ही   खी… खी… खी… मी आयुष्यात कधीही विसरु शकत नाही !!!

मात्र या खी… खी… खी…ने माझे इरादे अजू न मजबूत केले ! 

क्रमशः….. 

© डॉ. अभिजित सोनवणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आडस —  माझी रत्नागिरी.. – श्री प्रशांत शेलटकर ☆ संग्राहक – श्री विद्याधर फाटक

⭐ विविधा ⭐

⭐ आडस —  माझी रत्नागिरी.. – श्री प्रशांत शेलटकर ⭐ संग्राहक – श्री विद्याधर फाटक  ⭐

??

आज  एका मित्राबरोबर फोनवर बोलताना सहज बोलून गेलो..’ काय आडस’ आहे रे ! त्याने मला विचारलं.. काय म्हणालास.? मी म्हटलं..काही नाही..काही नाही.

फोन झाला..आणि डोक्यात या अफलातून शब्दांची डिक्शनरी चालू झाली. हे काही खास शब्दप्रयोग रत्नागिरीचे. आडस्’ म्हणजे झकास,उत्तम. ‘वड्स’ म्हणजे एकदम मस्त.  ‘गडगा’ म्हणजे कंपाऊंड वॉल. एखाद्याला ‘रेटवला’ म्हणजे पराभूत केला. मिसळ ‘रेटवली’ म्हणजे यथेच्छ खाल्ली. पाऊस ‘रेमटवून’ पडला म्हणजे धो धो पडला. ‘आयझो’ म्हणजे ‘ओ माय गॉड’. ट्रॅफिकमध्ये ‘फुगलो’ म्हणजे अडकलो. ‘किचाट’ म्हणजे गडबड, गोंधळ, गोंगाट. एखादा ‘सरबरीत’ असणे म्हणजे डोकं कमी असणे. एखादा ‘सोरट’ असतो म्हणजे डॅम्बीस असतो.

असं म्हणतात दर दहा मैलांवर भाषा बदलत असते. आपली मराठी भाषा तर इतकी उत्तुंग आणि अचाट आहे की तिला व्याकरणाच्या चौकटीत बसवणं अशक्यप्राय गोष्ट आहे. आपल्या भाषेचा लहेजा औरच आहे. कोंकणातच चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कुडाळ इथे भाषेचा बाज वेगळा असतो. मालवणी भाषा हा अजून वेगळा प्रकार. एक प्रकारचा हेल कोंकणात भाषेला असतो. एखाद्याला काही सांगितलं आणि तो आश्चर्यचकित झाला की नुसतं ‘हल्’ असं डोळे मोठे करून बोलेल, किंवा प्रेमाने ‘मेलास तू’ असं म्हणेल. तुला ना चांगला चोप दिला पाहिजे असं नं म्हणता ‘ तुला फोकटवला पाहिजे’ असं म्हणतात!

हे व असे अनंत शब्दप्रयोग नियमित वापरले जातात. यांची कुठल्याही डिक्शनरीमध्ये नोंद नसावी. भाषा ही संवादाचे माध्यम जरी असली, तरी भावना उत्कटपणे या हृदयातून त्या हृदयात पोहोचणं महत्वाचं असतं आणि लेखी भाषेपेक्षा बोलीभाषा हे काम प्रभावीपणे करत असते. आणि असे शब्द हे काम ‘आडस्’  करत असतात, नाही का?

??#आडसमाझीरत्नागिरी❤️

साभार फेसबुक वाल – मुळ लेखक श्री प्रशांत शेलटकर, रत्नागिरी

संग्राहक – श्री विद्याधर फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आभार… ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

?  मनमंजुषेतून ?

☆ आभार…☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

काही शब्दच असे असतात की ते ऐकणार्‍याच्या मनावर जादु करतात. कुणी छोटसं काम केलं आणि पटकन् त्या व्यक्तीला “धन्यवाद” म्हणून कृतज्ञता व्यक्त केली की त्या आदान प्रदानात गोडवा राहतो.

या लाॅकडाउनच्या काळात माझ्यासारख्या वय झालेल्या महिलेला अनेकांनी मदत केली.कुणी किराणा आणून दिला ,कुणी फळे भाज्या ,किरकोळ औषधे,रोख  पैसे  …वजने उचलली ..एक ना अनेकप्रकारे सहायता केली. मी त्यांची नुसतीच आभारी नाही तर ऋणी आहे…

आतापर्यंतच्या आयुष्यात माझ्यावर फार संकटे आली अथवा अशा काही समस्या  ऊभ्या राहिल्या असे सुदैवाने झाले नाही ..एक सुरक्षित अन् नाॅर्मलच आयुष्य जगले!!

पण हा लेख लिहीत असताना माझ्या मनात आले, संकट म्हणजे नक्की काय? त्याची व्याख्या काय?—–

तुम्हाला प्रचंड तहान लागली आहे आणि तुमच्या जवळ प्यायला पाणी नाही, त्यावेळी कुणीतरी तुम्हाला त्याच्या जवळची पाण्याने भरलेली बाटली देउन तुमची तहान भागवतो तो क्षण सर्वोच्च कृतज्ञतेचाच असतो!

तुम्हाला त्वरेने कुठेतरी जायचे आहे आणि त्याच वेळी टॅक्सी रिक्षा बस वाल्यांचा संप आहे ,पण कुणी ओळखीचे अथवा अनोळखी तुम्हाला स्वत:च्या गाडीतून सोडतात तेव्हा त्या  उपकाराची परतफेड फक्त “धन्यवाद!!” या सर्वसमावेशक शब्दानेच होऊ शकते!!

संकट मोठं नसलं तरी मदतीची गरज कशी कशा स्वरुपात हे परिस्थिती ठरवते..

माझे प्रिय पपा गेले तेव्हां आम्ही जळगावला राहत होतो! मला खूप उशीरा कळवलं!  वेळेत ठाण्याला कसं पोहचायचं? मला पपांचं अंत्यदर्शन तरी मिळेल का? प्रचंड दु:खाने मी बुद्धीहीन झाले होते! दोघांनाही —मी आणि माझे पती —जाणं आवश्यक होतं! शिवाय माझ्या मिस्टरांना मला अशा अत्यंत भावनिक प्रसंगी एकटीलाच जाऊ द्यायचं नव्हतं..मग लहान मुलींना कुठे ठेवणार?

त्यावेळी आमचे जीवलग मित्र डाॅ. गुप्ता आणि अलका यांनी सर्वतोपरी मदत केली .अतिमहत्वाच्या कोट्यामधुन रेल्वेची तिकीटं आणून दिली. मुलींची जबाबदारी घेतली .माझी बॅगही भरण्यात मदत केली .स्टेशनवर सोडायला आले.त्यावेळी ए टी एम वगैरे नव्हतच!  पैशाचं एक पुडकंही त्यांनी माझ्या बॅगेत टाकलं! माझे पती त्यांना म्हणालेही “पैसे आहेत अरे…!””असु दे! लागतील..”

 प्रश्न पैशांचा नव्हता!!  त्यामागची भावना महत्वाची..

—-मैत्री, प्रेम, प्रसंगाचं गांभीर्य समजुन  दाखवलेलं औचित्य याचं मोल होऊच शकत नाही.. त्यासाठी धन्यवाद हे शब्दही  तोकडे आहेत!! 

अगदी अलीकडे दोन वर्षापूर्वी माझी गुडघेरोपणाची शस्त्रक्रिया झाली !आम्ही दोघच ! मुलं परदेशात .माणूसबळ नाहीच. शिवाय कुणाला कशाला त्रास द्यायचा? निभावुन नेऊ आपले आपणच!!– पण प्रत्यक्ष आॅपरेशनच्या दिवशी माझ्या नणंदेचा मुलगा सुन हजर..पुढची सगळी सुत्रं त्या दोघांनी हातात घेतली..माझी जाऊही सोबतीला आली. ही सगळी माझ्या प्रेमाची माणसं ऊत्स्फुर्तपणे आली ..माझ्या सेवेखातर.. सगळं सुरळीत पार पडलं. आज जेव्हां मी बिना वेदनेचं पाऊल ऊचलते तेव्हां या सर्वांच्या प्रेमाचंच बळ एकवटलेलं असतं!!—यांचे आभार कसे मानु? किती अपुरे आहेत शब्द!!

खरं सांगु? मला माझ्या आयुष्यांत असे हाक मारल्यावर धावणारे मित्र मैत्रीणी, प्रियजन, नातेवाईक लाभले,  म्हणून मी परमेश्वराचेच आभार मानते!!

ईश्वरचरणी मी माझी कृतज्ञता ,भावपूर्णतेने व्यक्त करते….!!!

धन्यवाद!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स : 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆  15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग १ ☆ 

15 ऑगस्ट !!!  ही नुसती तारीख नव्हे, आपणा सर्व भारतीयांच्या मनावर सुवर्णाक्षराने कोरलेला हा अभिमानाचा दिवस ! याच तारखेला एकेवर्षी भारत स्वतंत्र झाला होता… आणि एकेवर्षी मी सुद्धा ! भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता आणि मी माझ्याच ! 

सुरुवातीला एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये मी महाराष्ट्र प्रमुख होतो. महिन्याचं उत्पन्न … 4-5 लाख ! 

पण यांतही समाधानी नव्हतो ! —-भरपूर पैसे कमावणे, वर …वर… वर जाणे …आणखी वरचे पद मिळवणे—–घर गाडी बंगला घेणे—-आज महाराष्ट्र प्रमुख आहे, उद्या भारताचा प्रमुख होणे—– जमलंच तर परवा जगातील काही देशांचासुद्धा प्रमुख होणे—-जग जिंकायला निघालेला सिकंदर होतो मी !–फरक इतकाच, तो सिकंदर घोड्यावर होता, आणि दिडशहाणा मी…  गाढवावर !—– 

हे गाढवही  मीच होतो आणि गाढवावर बसलेला दीडशहाणाही  मीच !

एके दिवशी, आयुष्याच्या वाटेत भेटलेल्या भीक मागणाऱ्या एका आजोबांनी दीडशहाण्या सिकंदराची नशा उतरवली—-!—-माणूस म्हणून जगण्याचं  सूत्र सांगितलं—-! 

ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॕचरोपॕथी आणि इतर कुठल्याही पॕथीपेक्षा Sympathy आणि Empathy (अनुभुती आणि सह अनुभुती या पॕथी वापरणं,  हे माणूस असल्याचं लक्षण असतं—- हे  त्यांनी माझ्यावर ठसवलं—-! 

वेद शिकण्यापेक्षा एखाद्याची वेदना समजून घेणं, हे वैद्य असल्याचं खरं लक्षण—हे  त्यांनीच मनावर  बिंबवलं ! 

डोंगरावर चढणार्‍या माणसाचे पाय ओढून त्याला पाडण्यापेक्षा,  जमिनीवर पडलेल्या एखाद्या निराधाराचे हात ओढुन त्याला उभं करणं यातच खरा पुरुषार्थ असतो—-पुरुषार्थाची ही व्याख्या त्यांनी मला नव्यानं सांगितली—!

ते खरंतर भिक्षेकरी नव्हते, ते उच्चशिक्षित होते. या गोड व्यक्तीमधून मधुर रस चावून चावून ओरबाडून घेऊन, उसाच्या चोयटीसारखं त्यांच्या भाऊबंदांनी त्यांना रस्त्यात फेकलं होतं !

बाबांनी सांगितलेल्या त्या बाबी त्यावेळी कानात उतरल्या होत्या… पण मनात नाही… ! 

मी धावत होतो शर्यतीत—!शर्यतीची नशा होती —!! 

पैसे… पद… प्रतिष्ठा … मी एकेक गड जिंकत चाललो होतो… पण मन भरत नव्हतं !

हे सगळं कमावून झाल्यावर, एके दिवशी भेटायला गेलो त्यांना… आणि समजलं, की मला मुलगा समजणारे “ते” बाबा बेवारस म्हणून रस्त्यावर “मेले”——! 

हो–मेले —स्वर्गवासी होणं, कैलासवासी होणं,  आणि देवाघरी जाणं ही प्रतिष्ठितांची मक्तेदारी …! 

——“मेला” हा शब्द प्रतिष्ठा नसणाऱ्यांसाठीच  ठेवणीत ठेवलाय !

ते मरुन गेले… आणि जातांना भिका-यांच्या डाॕक्टरला जन्माला घालुन गेले—–! 

मी त्यांचा मुलगा म्हणून जिवंत असूनही ते बेवारस म्हणून गेले—-!

मी अंतर्मुख झालो !——

ज्यांनी त्यांना रस काढून हाकलुन दिलं होत, त्या लोकांत आणि माझ्यात फरक काय ?

पूर्वी ऐकलेले  त्यांचे विचार आता कानातून मनात उतरायला लागले—- Heart पासून हृदयात यायला लागले… ! 

त्यांच्या विचारांचं मनन चिंतन व्हायला लागलं, माझ्याही नकळत—- ! — 

आणि या दीड शहाण्या सिकंदराची नशा पूर्ण उतरली !

जग जिंकण्यापेक्षा, जगातला “माणूस” जिंकावा,  किंवा माणुसकीचं “जग” जिंकावं…! 

—उतरलेल्या नशेनं हेच शिकवलं ! 

आणि, हा दीड शहाणा सिकंदर त्या गाढवावरून उतरला, आणि 14 ऑगस्टला त्याने या इंटरनॅशनल संस्थेचा राजीनामा दिला. 

आणि—- 15 ऑगस्ट 2015 ला “ भिकाऱ्यांचा डॉक्टर “ म्हणून तो रस्त्यावर आला… !

स्वतःच स्वतःवर लादलेल्या गुलामगिरीतुन तो मुक्त झाला… !

मीच स्वतः स्वीकारलेल्या ‘पद-पैसा-प्रतिष्ठा ‘ या शर्यतीतून मी स्वतंत्र झालो तो दिवस होता 

 15 आॕगस्ट 2015 —— म्हणुन  हा माझ्या दृष्टीने माझाही स्वातंत्र्य दिन… !

—–या अगोदर असलेले सर्व दिवस माझ्यासाठी पैसा असूनही “दीन” होते—- 15 आॕगस्ट 2015 नंतर ते पैसा नसुनही “दिन” झाले !

जवळचे लोक म्हणतात… हरलास तू आभ्या !—- 

नाही! अजिबात नाही —–

शर्यतीत किती धावायचं ? कसं धावायचं ? यापेक्षा कुठं थांबायचं … ? हे कळणं जास्त महत्वाचं !

योग्य ठिकाणी हरावंच लागतं… !

कुठं आणि कधी हरायचं हे ज्याला कळतं तो कायम जिंकतो !—-

कारण शर्यतीत धावणाराला हे कधीच कळत नाही… की शर्यत लावणारा स्वतः कधीच पळत नाही.  

एखाद्याला आपल्या पुढं जाताना बघूनही आपल्याला आनंद झाला तर समजावं—-आपण आत्ता खरे “मोठे” झालो—-बाकी वय बीय सारं झुठ !!! 

वय फक्त केस पांढरे करण्यापुरतं येतं—–जेव्हा ते मन शुभ्र करेल—तेव्हा त्याची किंमत—-! 

नाहीतर नुसताच तो गणितातला एक फालतू आकडा !!

क्रमशः….. 

© डॉ. अभिजित सोनवणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares