सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ फ्यूजन… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
धाकट्या बहिणीच्या, प्रभाच्या मुलाचं लग्न दोन दिवसांपूर्वी पार पडलं. काल सत्यनारायणाची पूजा झाली आणि नवपरिणित जोडपं आज सकाळी मधुचंद्रासाठी नैनितालला रवाना झालं. विभाताई आणि त्यांचा मुलगा महेश ठाण्याहून या लग्नासाठीच बेळगावला आले होते. तीन वर्षांपूर्वी करोनामुळे विभाताईंचा नवरा गेला, त्यानंतर प्रथमच त्या अशा समारंभाला उपस्थित राहिल्या होत्या. प्रभाने मुळी तसा हट्टच धरला होता, तू जर लग्नाला आली नाहीस तर इथून पुढे आपली कट्टी! मला तरी माहेरचं कोण आहे दुसरं? आणि ती म्हटल्याप्रमाणे करेल याची विभाताईंना खात्रीच होती. विभानं आपलं दुःख विसरून चार माणसात मिसळावं हीच प्रभाची इच्छा होती.
‘आणि लग्न झाल्यावर लगेच घरी पळायची घाई करायची नाही. नंतरचे पसारे आवरायला मला मदत कोण करणार? ‘ असा प्रेमळ दमही भरला होता प्रभानी.
बाकीचे पाहुणे-रावणे पूजा झाल्यावर आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले होते.
प्रभाचे यजमान सुरेशराव नाश्ता करून, बाहेरची काही कामं पूर्ण करण्यासाठी काही वेळापूर्वीच घरातून बाहेर पडले होते. महेशलाही सोबत घेऊन गेले होते. त्यामुळे कामं करता करता दोघी बहिणींच्या गप्पा रंगल्या होत्या.
‘ताई, महेशही बत्तिशीचा झाला ना? त्याच्याही लग्नाचं बघायला हवं ना! त्याची सुपरमार्केटमधली नोकरी कशी काय चाललीय? ‘
‘नोकरी ठीक चाललीय ग! पण लग्नाचं कसं बघणार? त्याच्यासारख्या गतीमंद मुलाला स्वीकारायला कोण मुलगी तयार होईल! कसाबसा रखडत दहावी पास झालाय. वयानुसार त्याच्यातही शारिरीक बदल होताहेत आणि त्यामुळे काही वेळा खूप आक्रस्ताळेपणा करतो. मला एकटीला हे सगळं नाही ग सांभाळता येत. डाॅक्टर म्हणताहेत की त्याचं लग्न करायला हरकत नाही. कदाचित त्यानंतर त्याची चिडचिड कमी होईल. तसं दैनंदिन व्यवहार तो नीटपणे पार पाडतो. पण आकडेमोड, हिशेब काही जमत नाही. काही गोष्टी पुन्हा पुन्हा समजावून सांगायला लागतात. शिवाय याचा पगारही मोजका, माझं पेंशन व्यवस्थित आहे, म्हणून घर नीट चाललंय. लग्न करायचं तर मुलीकडचे या सगळ्या गोष्टींचा विचार करणारच की! काय त्याच्या नशिबात आहे कोण जाणे! ‘
‘ खरंय तुझं, पण अशी निराश होऊन, हातावर हात ठेवून बसलं तर कसं होईल? त्या दृष्टीने प्रयत्न तर सुरू केला पाहिजे ना! ‘
रंगरूप चांगलं दिलंय देवानं. आता स्वतःचं पोट भरण्याइतपत तर कमवतोय की महेश!
संथ असला तरी वागणं बरंच नाॅर्मल आहे त्याचं. एकदम दहा गोष्टी सांगितल्या तर गोंधळतो. पण सावकाश सांगितलं तर कळतं सगळं नीट!
‘ प्रभाताई, थोडं इडली-सांबार आणलंय, म्हणजे तुम्हाला स्वैपाक करायला नको आज! लग्नाच्या धावपळीनं दमला असाल ना! ‘ आले’, म्हणत प्रभा बाहेर गेली. कोण बरं हे, म्हणून विभाताईंनी डोकावून पाहिलं तर एक साधारण पन्नाशीची स्त्री, घराच्या मागच्या भिंतीपलीकडून प्रभाला दोन मोठे स्टीलचे डबे देताना दिसली. तिचा काळा रंग मात्र अगदी डोळ्यात भरत होता.
डबे स्वैपाकघरात ठेवून प्रभा परत आली, आणि विभाताईंना म्हणाली.. अग या सुधाआंटी, कन्नड ब्राह्मण आहेत. दोन वर्षांपूर्वी शेजारचं घर त्यांनी विकत घेतलं आणि मला छान शेजार मिळाला. मदतीला नेहमी तत्पर असतात. त्यांचा नवरा सरकारी खात्यात नोकरीला होता, नेहमी बदल्या व्हायच्या. आता रिटायर झाल्यावर मात्र त्यांनी इथे राहायचा निर्णय घेतला. बरीच वर्ष हे लोक कर्नाटक, आंध्र प्रदेशात होते. पण सुधाआंटी लहानपणी मुंबईत राहिलीय, त्यामुळे मराठी चांगलं बोलते. दोन मुली आणि एक मुलगा आहे त्यांना. एकीचं लग्न झालंय आणि मुलगा नुकताच इंजिनीअर होऊन बेंगलोरला नोकरीला लागलाय.
पण प्रत्येकाला काही ना काही दुःख दिलंय बघ देवानं! यांची मोठी मुलगी कुसुम, तिशीची आहे ती! जन्मताच तिचा उजवा पाय, डाव्या पायापेक्षा आखूड आहे
त्यामुळे पाय ओढत चालते आणि कमरेचा भागही बेढब आहे.
बारावी पास झालीय जेमतेम, पण शिक्षणात फारशी गती नाही, म्हणून पुढे शिकली नाही. शिवाय रंगही आईसारखा, एकदम काळा. रूपही सामान्यच. त्यामुळे लग्न जमलं नाही. खरंतर बोलणं वागणं खूप छान आहे. सुधाआंटीच्या बरोबरीनं घरातलं सगळं कामही करते. पण फारशी घराबाहेर पडत नाही. आपल्याकडे लग्नाला मोठ्या मुश्किलीने आली आणि लग्न लागताच घरी गेली. धाकटी उमा जरा रंगानं उजळ आणि ग्रॅज्युएट पण झाली. तिचं तिनंच जमवलं लग्न, मग यांनी करून दिलं. धारवाडला असते ती. पण कुसुमची चिंता आहेच दोघांना. असतं एकेकाचं नशीब! ‘
तेवढ्यात सुरेशराव आणि महेश बाहेरून आले आणि यांच्या गप्पा थांबल्या. मग जेवणं उरकली आणि दोघीजणी आतल्या खोलीत आणि ते दोघं दुसर्या खोलीत आडवे झाले. चहापाणी झाल्यावर पुन्हा दोघी घरातली आवरा-आवर करत राहिल्या. लग्नघर म्हटलं की पसारा केवढा असतो.
सुरेशरावांनी विभा आणि महेशचं दोन दिवसानंतरचं स्लीपरबसचं रिझर्वेशन करून आणलं होतं. विभाताईला बरोबर काय काय द्यायचं याची प्रभाची जमवाजमव चालली होती. दुसऱ्या दिवशी दोघी बाहेर पडून काही साड्या, कलाकंद आणि इतर सटरफटर खरेदी करून आल्या.
विभाताईंना त्यांच्या सोसायटीतल्या मैत्रिणींसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या.
उद्या संध्याकाळी सातला निघायचं होतं, साडेआठची बस होती ठाण्यासाठी. बसस्टँड घरापासून तसा तासभर अंतरावर होता. विभाताईंनी पण आपलं सामान गोळा करून बॅग भरली. महेश जेवणानंतर गोळी घेऊन आतल्या खोलीत आडवा झाला होता, त्याला जरा कणकण वाटत होती. रात्रीची जेवणानंतरची आवरा-आवर करून त्या दोघी बाहेरच्या खोलीत येऊन बसल्या.
सुरेशराव म्हणाले, महेशमध्ये खूप चांगला बदल झाला आहे. स्वतःहून चार गोष्टी बोलतो, विचारतो. पूर्वीसारखा बिचकत नाही. अंगानेही भरलाय. खूप बरं वाटलं त्याची प्रगती बघून.
‘हो ना! मी ताईला तेच म्हटलं. आता त्याच्या लग्नाचा विचार करायला हवा. ‘
विभाताई, मी एक सुचवू का? महेशसाठी कुसुमचं स्थळ कसं वाटतं? सहज मनात आलं ते बोललो हं. म्हणजे तुम्हाला पटलं तर बघा हं. ‘
‘अहो, काहीतरीच काय बोलता? महेश किती देखणा आहे! शिवाय ते ब्राह्मण आणि आपण मांस-मच्छी खाणारे, कसं जमणार हे? प्रभा पटकन म्हणाली.
‘ दिसण्याचं काय घेऊन बसलीस बाई, त्याच्यातही कमतरता आहेच की! पण
मुलीला आणि तिच्या घरच्यांना असं स्थळ चालेल का? , विभाचा सूर निराशेचा होता.
‘ तुम्हाला चालणार असेल तर मी बसप्पांशी बोलून तर बघतो, नाही पटलं तर राहिलं. पण पटलं तर दोघांचही भलं होईल असं मला आपलं वाटतं ‘, सुरेशराव म्हणाले.
तुम्ही बोलायला माझी काही हरकत नाही. पण मुलीला आणि तिच्या आई-वडिलांना सर्व परिस्थितीची स्पष्ट कल्पना द्यायची. उगाच खोटंनाटं सांगून, मला कोणाची फसवणूक करायची नाही.
हो हो, मी उद्या सकाळीच त्यांच्या कानावर घालतो हे. मग बघू काय म्हणतात ते! योग असेल तर जमून जाईल.
दुसर्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरेशराव बसप्पांकडे गेले. त्यांनी
कुसुमसाठी महेशचं स्थळ सुचवलं. बसप्पांनी लगेच काही प्रतिक्रिया दिली नाही. सुरेशरावांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे संबंध घरोब्याचे होते. त्यामुळे त्यांनी सुधाआंटींना बाहेर बोलावलं, ‘ हे सुरेशराव काय म्हणतात ते ऐका’. त्या काॅफीचे मग घेऊन बाहेर येतच होत्या. सुरेशरावांनी त्या दोघांना महेशची सर्व माहिती सविस्तर सांगितली. दोघेही विचारात पडले. कुसुमचं लग्न ठरत नव्हतं हे जरी खरं असलं, तरी असं जातीबाहेरच्या आणि ते पण गतिमंद मुलाशी तिची सोयरीक जुळवणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं. कुसुमला मराठी बोलता येत नव्हतं पण बोललेलं बरंचसं समजत होतं.
सुरेशराव म्हणाले, ‘ दोन्ही मुलं आपल्या जवळची म्हणून मी सुचवलं. तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्या. ‘ तसं बसप्पा त्यांना म्हणाले, ‘तुम्ही आमचे हितचिंतकच आहात. पण आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या. कुसुमशीही बोलायला हवं. शिवाय आमच्या गोतावळ्याचाही विचार घ्यायला हवा ना? ‘
‘ हो हो काही हरकत नाही. तुम्ही तुमचा वेळ घ्या. ‘ असं म्हणून सुरेशराव तिथून घरी आले.
प्रभाताईंकडच्या लग्नात सुधाआंटींनी महेशला बघितलं होतं. किती छान गोरापान आणि राजबिंडा दिसत होता तो. पण त्याचं गतिमंदत्व नजरेआड करता येत नव्हतं. आपल्या पोटचा गोळा कुरूप असला म्हणून काय झालं? शिवाय आपण कट्टर शाकाहारी आणि हे रोज मच्छी खाणारे. आपल्या घरात तर अंडसुद्धाआणलं जात नाही. त्यांनीआणि बसप्पांनी मग आपल्या बहिण-भावांशीही फोनवरून चर्चा केली. पण कोणी फारसं अनुकूल मत दिलं नाही. त्यांनी विश्वेशला, आपल्या मुलालाही फोन लावला. ‘ तुम्हाला मुलगा चांगला वाटत असेल आणि कुसुमदीदीला चालणार असेल तर हरकत नाही, असं म्हणाला तो.
– क्रमशः भाग पहिला
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈















