मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माझं काय चुकलं ??? — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ माझं काय चुकलं ???  — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

शाळेपासूनच्या त्या दोघी घट्ट जिवलग मैत्रिणी. एका बाकावर बसणाऱ्या अभ्यास एकत्र करणाऱ्या आणि वर्गात मोठमोठ्यांदा हसल्याने बाईंची शिक्षा सुद्धा एकत्रच खाणाऱ्या. सगळ्या शाळेत यांची जोडी अगदी प्रसिद्ध होती. शाळेच्या गॅदरिंगमध्ये सख्या पार्वत्या, हरतालका असे फिशपॉंड्सही याना मिळालेले! मोना आणि सीमा यांची जोडी होतीच तशी. जवळच रहायच्या दोघीही आणि अजिबात करमत नसे एकमेकांशिवाय दोघीना. खरं तर मोना जास्त हुशार होती. तिचं गणित म्हणजे अतिशय उत्तम आणि सीमाच्या भाषा उत्कृष्ट ! निबंधाचे बक्षीस सीमाला दर वर्षी ठरलेलेच ! मोनाची आर्थिक परिस्थिती चांगली होती. सीमाला आई नव्हती आणि भाऊ फारसा न शिकता कुठे तरी नोकरी करायचा. पण सीमा फार समजूतदार होती. आहे त्यात आनंदी रहायचा स्वभाव होता सीमाचा.

मुली मोठ्या झाल्या आणि मोना कॉलेजला सायन्सला गेली. सीमा आर्टस्ला. दोघींच्या वाटा वेगळ्या झाल्या पण मैत्रीत कधी अंतर नाही पडलं. कायम भेटत राहिल्या दोघीही. सीमा बी ए झाली आणि तिनं बी एड केलं. तिला एका चांगल्या शाळेत नोकरीही मिळाली. मोना एका कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून लागली. मोनाला तिच्याच कॉलेज मधल्या एका सहकाऱ्याने मागणी घातली आणि मोनालाही तो आवडला होताच. आईवडिलांचीही या जावयाला पसंती होती आणि मोनाचं लग्न थाटामाटात झालं देखील. मोना आपल्या संसारात रमून गेली.

सीमाच्या लग्नाचं बघायला मात्र कोणीच नव्हतं आणि तिच्या मावश्या मामांना सीमा कधी फारशी चिकटून नव्हतीच. वय वाढत गेलं आणि सीमा शाळेतही प्रिंसिपल होणार होती काहीच वर्षात. मोनाला या काळात दोन मुलं झाली आणि अजूनही सीमाची आणि तिची मैत्री घट्ट होतीच.

मोनाच्या घरी वेगळीच कथा होती. घरचे लोक, भाऊ, आईवडील सगळ्यांच्या मनाविरुद्ध जाऊन मोनाच्या मोठ्या दिरानं एका पंजाबी मुलीशी लग्न केलं मुंबईला बदली करून घेतली. संतोषला नोकरी चांगली होती. चार वर्षे चांगली गेली आणि नंतर मात्र सतत भांडणं होऊ लागली त्यांची ! एक दिवस ती मुलगी न सांगता सगळे दागिने पैसे घेऊन निघूनच गेली. सगळं घर धुवून नेलं तिनं. ऑफिस मधून येऊन बघतो तर अक्षरशः घर रिकामे. तिने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि संतोषचा एक वर्षात घटस्फोट झाला. घरचे सगळे हताश झाले. हे होणार हे माहीतच होते सगळ्याना, पण त्यावेळी संतोष कोणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. आता मात्र आईवडिलांना त्याची काळजी वाटायला लागली. तरुण मुलगा एकटा असा कसे आयुष्य काढणार असं वाईटही वाटू लागलं त्यांना.

मोनाला हे सगळं दिसत होतं. ती सीमाच्या घरी गेली आणि म्हणाली ‘चल. बाहेर कुठेतरी मस्त खाऊया काहीतरी. आज मी डबा विसरले न्यायला ! तू नको आता घरी करत बसू बरं का. चल बघू. ‘ मोनाने सीमाला बाहेरच काढले. एका छानशा हॉटेल मध्ये गेल्या दोघी. ‘सीमा, तुझ्या लग्नाचं बघायला तर कोणाला सवडच नाही. तिशी उलटून गेली आपली. करणारेस का लग्न कोणी मिळाला तर?’ सीमा म्हणाली, ‘ मिळायला नको का? करीन मला त्याने पसंत केले तर. मला नाहीये का ग हौस संसाराची? पण कोण बघणार मला स्थळ?’

मोना म्हणाली, “ हे बघ सीमा. नीट ऐकून घे. माझे भावजी अतिशय चांगले आहेत. करतेस का त्यांच्याशी लग्न? “ मोनाने तिला सगळी हकीगत सांगितली.

त्यांचे पहिले लग्न, मग घटस्फोट, सगळं नीट सांगितलं आणि म्हणाली, “ बघ निर्णय तुझ्या हातात आहे. माझी जबरदस्ती तर मुळीच नाही. पस्तिशी उलटलेल्या बाईला आता प्रथमवर मिळणंही अवघडच. पाहिजे तर भावजीना भेट, बोला दोघे आणि मगच निर्णय घ्या. हे काही नवथर तरुण मुलांचं लग्न नाही तर तडजोडही आहेच सीमा. सावकाश सांग घाई नाही. ”

सीमा संतोष बाहेर चार वेळा भेटले. , सीमा म्हणाली “ मोना माझी आणि संतोषचीही हरकत नाही लग्नाला. मला नोकरी सोडावी लागेल पण मी दोन वर्षे पुरी करीन म्हणजे मला ऐच्छिक निवृत्ती घेता येईल आणि पेन्शन मिळेल. संतोष मुंबईहून अप डाऊन करील. चालेल ना? मी मग तुझ्या घरीच राहीन. कधीकधी मी जाईन मुंबईला. हे चालेल का?आधीच तुझ्या घरात खूप माणसं आहेतच. ” 

मोना म्हणाली “काही हरकत नाही सीमा!भावजी आणि तुझंही घर उभं रहाणार असेल तर ही तडजोड तू जरूर कर. नोकरीचे सगळे फायदे घे आणि मग जा मुंबईला. दोन वर्षे कशीही जातील ग. ‘

मोना अतिशय सरळपणे म्हणाली. घरी जाऊन सासू सासऱ्यांना हे सांगितले आणि सीमा संतोष पण तयार आहेत लग्नाला हेही सांगितले. सगळ्याना खूप आनंद झाला. ओळखीचीच मुलगी घरी येणार याचा आनंद आणि विश्वास सुद्धा होता सगळ्याना.

अगदी साधं लग्न करून सीमा मोनाच्याच घरात आली. तिचीही नोकरी चालू ठेवणार होतीच ती. मोनाची तर सकाळी केवढी धावपळ असायची. पोळ्याच्या बाई उशिरा येत त्या आधी मोना आपल्या पुरत्या चार पोळ्या करून घेई आणि बाकी सगळं बाई आल्या की उरकत. सासूबाई खूप मदत करायच्या मोनाला. बाईंकडून सगळं करून घ्यायचं, मुलांचे डबे भरून द्यायचे. सगळं नीट सुरळीत चालायचं. सीमा संतोष आठ दिवस बाहेर फिरून आले. चार दिवसांनी संतोष मुंबईला जाणार होता आणि सीमा पण शाळेत जाणार होती.

मोना घाईघाईने आवरून डबे भरून निघून गेली. सासूबाई उठून बघतात तर सीमा अजून उठली नव्हतीच. त्या मुकाट्याने स्वयंपाकघरात गेल्या आणि बाकीचे काम चालू केले त्यांनी.

आठ वाजता सीमा उठून स्वयंपाकघरात आली. सासूबाई म्हणाल्या, “ चहा घेतेस ना? घे आणि उद्यापासून लवकर उठ. तिकडे काय करत होतीस तू डब्याचे? “.. “ मी माझ्या पुरत्या दोन पोळ्या भाजी करून नेत होते. शाळा 11 वाजता असते माझी. लवकर उठून काय करायचं असतं मला? “

“ हे बघ. इथे तू सासरी आली आहेस ना. मोना काहीच बोलणार नाही पण मी सांगते. मला मदत करत जा आणि अशी एकटीपुरती भाजी पोळी नाही करून चालणार. बाई येतीलच पण त्यांनाही मदत लागते ती करायला हवी. उद्या येताना मोनाला विचारून किती लागते काय लागते ते सामानही आण. सीमा, घर हे सगळ्यांचं असतं. नशीब थोर म्हणून अशी चांगली मैत्रीण आणि चांगलं घर मिळालं तुला. ” सासूबाई तिथून निघून गेल्या.

सलामीलाच ही चकमक झाली तर आता पुढं कसं व्हायचं असा विचार पडला सासूबाईंना. होईल ते बघावे असा विचार करून त्या गप्पच बसल्या. तयार असलेली भाजीपोळी घेऊन सीमा निघून गेली. ना तिने मागचे आवरले ना जाताना सांगून गेली कोणाला ! 

मोना संध्याकाळी घरी आली. सासूबाईंनी हे सगळं सांगितलं आणि म्हणाल्या, ” कठीण आहे हो मोना.. अग, काय तुझी मैत्रीण !अशीच का वागायची ही माहेरी? “ मोना म्हणाली, “ जाऊ द्या हो आई. बघूया काय काय होते ते. आपलं जाऊ दे. , भावजींचा संसार झाला म्हणजे पावलं. ” संध्याकाळी सीमा घरी आली. संतोष मुंबईला गेलेला होता. आता सीमाला दोन वर्षे मोनाकडे राहून काढायची होती. मोना संध्याकाळी तिच्या खोलीत गेली. “ घे ग मस्त गरम चहा. चल, बाल्कनीत बसून घेऊया “

सीमा म्हणाली, “ मोना, मला कामाची सवय आहे पण माणसांची नाही. मला समजत नाही कसं वागायचं ते. आमच्या घरी तू बघतेस ना बाबा, मी आणि भाऊ. कोणी कोणाच्या अध्यात मध्यात नसते. मला इतक्या माणसात वावरायची सवय नाही ग. तू शिकव मला मी शिकेन. ” मोना बरं म्हणाली. मनात म्हणाली, माणूस संगतीला आणि पंक्तीला आल्याशिवाय समजत नाही हेच खरं.

दुसऱ्या दिवशी मोनाला सुट्टी होती. तिने सीमाला हाक मारली. अजून उठली नव्हतीच ती. “ सीमा, आज आपल्या बाई येणार नाहीयेत. चल दोघी मिळून करून टाकूया स्वयंपाक “. मोना म्हणाली.

सीमा म्हणाली, “ काय करायचं ते सांग मला. मला सगळं उत्तम येतं करता. आज बघ मी करते ते आवडतं का. तू बस ना बाहेर. फक्त मला अंदाज सांग हं मोना. मला समजणार नाही म्हणून. ” मोनाने सगळं सांगितलं आणि ती स्वयंपाकघराच्या बाहेर आली.

सासूबाई हळूच म्हणाल्या, ” बाई ग. करणार का ही नीट सगळं? पिठलं भात करायची वेळ येते आपल्यावर? “ हसून मोना म्हणाली “ बघूया. मलाही माहीत नाही हो तिला काय येतं ते “.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शून्याच्या आत… – भाग 3 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

शून्याच्या आत… – भाग 3 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

(काही चुकीचं तर होत नाहीये ना, मांजर पण का बरं अशी मला सोडून जाते! असो, पण कोणीतरी घरात आहे हा विचारच तिला काहीतरी करण्यासाठी उत्साह देत असे.) – इथून पुढे —

एक दिवस सकाळचा नाश्ता ताटलीत होता, पण खायची इच्छाच नव्हती तिला. केरात टाकण्यापेक्षा बाहेर टाकले तर कोणी प्राणी तरी खाऊन जाईल, म्हणून तिने ते ब्रेडचे तुकडे बाहेर टाकले. वळून दोन पावलंच टाकली असतील, नसतील तोवर कसला तरी आवाज आला, म्हणून वळून बघते तर एक चपळ खार त्या ब्रेडच्या तुकड्यांकडे धावत पळत येताना दिसली. कुमुडीचा चेहरा प्रसन्न हसण्याने भरून गेला. हा असा आनंद होता, की तिच्या आतपर्यंत त्या खारीचा आवाज गुंजत होता. ती खार आपल्या छोट्याशा तोंडात मावतील तितके तुकडे भरून घेऊन पळून गेली. परत आली आणि परत तोंडात काही तुकडे घेऊन पळाली. ती परत येईपर्यंत एक रॅकूनचं पिल्लू घाबरत, घाबरत तिथे आलं. मोठे रॅकून माणसांना घाबरवतात, स्वतः घाबरत नाहीत. दुसऱ्यांना घाबरवायची कला अजून हे पिल्लू शिकलं नव्हतं. कुमुडीने घरात येऊन फ्रीजमधून भात काढला आणि एका प्लॅस्टिकच्या वाटीत घेऊन त्याच्या समोर ठेवला. कठड्यावर बसून त्याने तो खाल्लं आणि निघून गेला.

दुसऱ्या दिवशी बरोबर त्याच वेळी ते दोघेही हजर झाले. कुमुडीला वाटलं, की दिवसातून एक वेळच त्यांना खायला देणं काही बरोबर नाही. आता जेंव्हा जेंव्हा ती काही खात असेल, तेंव्हा तेंव्हा ती त्यांच्या जागेवर ते खाणं ठेऊन यायची. ते खाणं ठेवल्याबरोबर ते दोघेही कुठून तरी लगेचच प्रगट होत असत, जसं काही तिनं दार उघडून बाहेर येण्याचीच वाट बघत असत. हे असं दिवसातून तीन वेळा न चुकता होत असे. आता तिच्याकडून खाणं मिळण्याची आशा लाऊन बसणारे तीन प्राणी होते, जे प्रेमाने तिच्याकडे बघत असत. असे यायचे, की जणू आमंत्रित पाहुणेच होते, आणि खाऊन झालं की उड्या मारत निघून जात असत. ती त्यांना खायला द्यायच्या वेळी मांजरीला आपल्या बरोबर घेऊन यायची आणि त्यांच्याशी खेळायचा प्रयत्न करायची. त्यांच्याशी बोलायची, त्यांच्या खाण्याकडे एवढं लक्ष द्यायची, की जणू त्यांची दुसरी आईच बनून जायची! हे दोन दिवस तिला अगदी शांत झोप लागली. तिसऱ्या दिवशी तिला आपल्या खिडकीतून डोकावून बघणारं कुत्र्याचं एक गोड पिल्लू दिसलं. बहुधा आपल्या घरातून भटकत वाट चुकून तिच्या घराच्या मागच्या बाजूनं आत आलं होतं.

तिनं त्याच्याकडे काही वेळ दुर्लक्ष केलं. पण तो काही तिथून हलला नाही, भुकेला होता ना!

“ तू जा बघू, मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत, तुझ्या घरचे लोक तुला न्यायला आले, की तू निघून जाशील!”

पण तो एखाद्या अडेलतट्टू सारखा तिथेच बसून राहिला, हललाच नाही.

“वचन दे, की तू जाणार नाहीस, सही करून देणार असशील तर ये. ”

खरोखरच कुमुडीनं दरवाजा उघडून त्याच्या समोर एक कोरा कागद ठेवला. तो घाईने आत आला आणि त्यानं त्या कागदावर आपला पाय ठेवला. ती खुश झाली, जणू कोणीतरी तिची आपुलकी स्वीकारली होती! हे पिल्लू तिचं घर सोडून जाऊ इच्छित नव्हतं. बहुतेक तो जे घर सोडून आला होता, ते असंच दिसत असावं. मांजरीला काही त्याचं येणं आवडलं नव्हतं. ती पाळत पाळत येऊन सारखी कुमुडीला चिकटत होती. पण कुमुडी तिला समजावत राहिली—“ तू त्याच्या बरोबर खेळायचंस, मग तो तुझा मित्र होईल. ” तिने चेंडू फेकला, की ते पिल्लू धावत जाऊन तो घेऊन यायचं. हळू हळू मांजरी पण त्या खेळात सामील झाली.

आता कुमुडी होती आणि हे चार प्राणी होते. खार दिवसातून तीन वेळा बरोबर ठराविक वेळेला हजर होत असे. पाहिली वेळ तीच होती, जेंव्हा पहिल्यांदा कुमुडीने ब्रेडचे तुकडे टाकले होते आणि भटकत भटकत येऊन तिने ते खाल्ले होते. कशी ती वेळ त्या एवढ्याशा मेंदूत पक्की बसलेली होती, कोणजाणे! रॅकून तर एरवी कचऱ्यात पडलेलं खाणंच खायचा, पण तोही बरोबर त्याच वेळी कुमुडीकडे यायचा, जेंव्हा तिने पहिल्यांदाच वाटीत भात आणून दिला होता. त्यांना ना घड्याळाच्या काट्याची जाणीव होती, ना वेळेची पण खायला देणाऱ्याची ओळख, पारख त्यांना बरोबर होती! माणसापेक्षा प्राणी जास्त निष्ठावान असतात, हे ऐकलेलं होतं, पण आता या चार प्राण्यांच्या आपलेपणाने ते सिद्ध झालेलं होतं.

ते आपापल्या वेळी यायचे, तिच्याकडे बघायचे, आपलं खाणं घ्यायचे आणि काहीतरी आवाज काढत निघून जायचे, जसे काही तिला आशीर्वाद देत असत. निदान, कृतघ्न तर नक्कीच नव्हते ते. तिच्या मनात विचार यायचा, जेंव्हा तिचा मृत्यू होईल, तेंव्हा किमान या चार जणांचे अश्रू तरी नक्कीच तिला खांदा देतील! मांजरी, खार, रॅकून आणि कुत्र्याचं पिल्लू या सर्वांचं मिळून तिचं एक कुटुंब तयार झालेलं होतं. दोघे घरात रहात असत आणि दोघे पाहुण्यांसारखे येत आणि निघून जात.

आता न्यूझीलंडला जाणं बंद झालेलं होतं. पेन्शनच्या पैशांवर निर्वाह तर होतंच होता, शिवाय बचतही भरपूर होत होती. तिच्या मनात आता या कुटुंबाची चिंता होती, की माझ्यानंतर यांचं काय होईल? तिला मृत्युपत्र तयार करायचं होतं, की ती गेल्यानंतर तिने मिळवलेला पैसा, तिचं एवढं मोठं घर, गाडी सगळं काही यांच्या पालन पोषणासाठी वापरलं जावं. आपल्या भावा-बहिणींना जसं तिने घर दिलेलं होतं, तसंच यांच्यासाठीही एक घर द्यायचं होतं तिला. निदान या चार जणांना तरी तिची अनुपस्थिती जाणवली, तरी तिचं जीवन सफल झाल्याचं समाधान तिला लाभणार होतं. या सगळ्यांच्या डोळ्यात एकमेकांबद्दलचं प्रेमच प्रेम होतं. कुमुडीच्या डोळ्यात त्या मुक्या प्राण्यांसाठी आणि त्या मुक्या प्राण्यांच्या डोळ्यात कुमुडीसाठी!

प्रथम जेंव्हा पशु-पक्षी विहाराची सुरुवात झाली, तेंव्हा त्यामागची ही कथा ऐकून खूप देणग्या मिळायला लागल्या. आज “कुमुडी” या नावाने असे अनेक पशु-पक्षी विहार स्थापले गेले आहेत, ज्यांमध्ये असंख्य मुक्या प्राण्यांना आसरा मिळालेला आहे. या आपल्यांशी बोलणारी कुमुडी आता मुकी झालेली आहे. फोटोंमधेच आता तिचं अस्तित्व कैद झालेलं आहे. पण आजही ती त्या मुक्या प्राण्यांशी त्यांच्याच भाषेत बोलते. तिचं स्वतःचं शून्याचं वर्तुळ आता खूप मोठं झालेलं आहे. ते सांगत आहे, की शून्याचं वर्तुळ नेहमीच शून्य नसतं, आतून पसरत गेलं तर त्यात एक नवं जग वस्तीला येतं.

कथा संपताच माझ्या आत कसली तरी चुळबुळ जाणवू लागली मला. माझे हात आपोआप समोरच्या देणगीच्या खोक्याकडे वळले. माझ्या मित्राचाही ऑडिओ ऐकून झाला होता आणि त्याचे हातही त्याच्या पैशांच्या पाकिटाकडे गेले होते!

— समाप्त —

मूळ कथा : शून्य के भीतर – डॉ. हंसा दीप. कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शून्याच्या आत… – भाग 2 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

शून्याच्या आत… – भाग 2 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

(आता मात्र तेच भाऊ बहिण आपापल्या मुला-बाळात, आपल्या परिवारात गुंतून गेले आहेत.) – इथून पुढे —

या सगळ्यात ती स्वतः कधी पंचावन्न वर्षांची झाली, ते तिचं तिलाही कळलं नाही. पंचावन्न वर्षांची ती पासष्ट वर्षांची दिसू लागली आहे. तरुण होती तेंव्हा चांगली-चांगली स्थळं येत असत तिच्यासाठी. मुलगे डेटसाठी बोलवत असत. पण त्या दिवसात जबाबदाऱ्यांची मोठीच्या मोठी यादी असायची तिच्याकडे. तिच्या जगात आई-वडील, बहिण-भाऊ यांच्या शिवाय आणखी कोणासाठी जागाच नव्हती. आता आई-वडील राहिले नाहीत, भाऊ-बहिण आपापल्या आयुष्यात मग्न झाले. खरं तर आतासुद्धा ती त्यांच्या छोट्या छोट्या समस्या आपणच सोडवल्या पाहिजेत असं मानून त्यासाठी एवढा लांबचा प्रवास करून त्यांच्याकडे जात असते. त्यांना पाहिजे असो, की नसो त्यांना शारीरिक मानसिक आणि आर्थिकही मदत करत असते. या बहिणींकडून नेहमी मिळणाऱ्या मदतीमुळे हे भाऊ-बहिण प्रत्येक छोट्या गोष्टीतही तिचा सल्ला मागत असत आणि त्यांची प्रत्येक समस्या ही स्वतःच सोडवत असे. ‘नेकी और पूछ पूछ!’ भावा-बहिणीला फायदा कसा घ्यावा हे कळत होतं, ते तो घेत राहिले. हे सगळं करता करता कित्येक वर्षं उलटून गेली.

जगरहाटी पुढच्या दिशेने पळत राहिली आणि या पळापळीत ती अगदी एकटी पडली. स्वतःबद्दल विचार करायला वेळच नव्हता तिच्याकडे! आता तब्येतही बिघडायला लागली. ती आपल्या शहरातच, टोरंटोमधेच काम करत राहिली. हॉस्पिटलमधल्या अनेक विभागांशी ती जोडलेली होती. नोकरी चालू असताना अनेक लोकांशी संबंध यायचा तिचा, पण घरात तेवढीच एकटी असायची ती. फक्त ती आणि घराच्या भिंती! आता ती वयाच्या अशा वळणावर होती, की जिथे तिच्या मदतीसाठी कोणीतरी असण्याची गरज होती. पण कोण करणार तिला मदत? इतकी वर्षे तिने ज्यांना मदत केली, ते सगळे फार लांब राहत होते. ते असेही कधी तिच्याकडे आलेले नव्हते. तीच मदतीचा हात पुढे करून त्यांच्याकडे धावत जात असे. त्यांचा आता कधी फोनही येत नसे. तीच फोन करत असे, अशा आशेने, की तिचा एकटेपणा समजून घेऊन, केंव्हातरी तरी ते म्हणतील की—“ताई इथेच ये आता. ”

“आता ये ना इकडेच, ताई, तुझी खूप आठवण येते. ”

“आता तुला एवढ्या दूर राहून नोकरी करण्याची गरजच नाही. ”

पण असं कधीच झालं नाही. आणि कोणालाही तिने आपल्या मनात काय चाललंय याचा पत्ता लागू दिला नाही. हेही ती कधी बोलली नाही, की तिला आता कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. मनातल्या मनात कुढत राहायची. त्यांच्याशी बोलण्यासाठी काही ना काही निमित्तं शोधात रहायची. पण, “कसे आहात?”, “काय चाललंय?” अशा संभाषणाच्या पलीकडे काही बोलणंच होत नसे. फोन ठेवल्यानंतर तासन्तास ती फोनकडेच एकटक बघत रहायची. जणू, फोननेच कसला तरी कट रचला होता, की तिला जे ऐकायचं आहे, ते तिला ऐकू येऊ नये, यासाठी.

दिवस जात राहिले, तब्येत आणखीच बिघडत गेली. मग तिने मोठी सुट्टी घेतली, पण कोणाला सांगितलं नाही, की ती एवढी आजारी आहे म्हणून. गुडघे, खांदे सतत दुखू लागले. मोठी सुट्टी संपली तरी तब्येत बरी होण्याची लक्षणं काही दिसेनात. आता तिला सिक लिव्ह घेऊन घरी रहाणं हे बेजबाबदारपणाचं वाटायला लागलं. आपण कामावर जात नसल्याने इतर लोकांना किती त्रास होत असेल हे तिला माहित होतं. जोवर ती सुट्टीवर होती, तोपर्यंत तिच्या जागेवर ते दुसऱ्या कोणाला घेऊ पण शकले नसते. बराच विचार करून शेवटी तिने कंपल्सरी रिटायरमेंट घेण्याचं निश्चित केलं, तेच या परिस्थितीत आपलं कर्तव्य आहे, असं तिला जाणवत होतं. त्यामुळे तिला चांगली पेन्शनही मिळाली असती, आणि त्याचबरोबर एक चांगलं पॅकेजही मिळणार होतं, जे तिच्या पुढच्या आयुष्यासाठी पुरेसं झालं असतं. या निर्णयाची अंमलबजावणी होण्यात कुठलीही अडचण आली नाही. सगळं काही सहजपणे झालं. तिचे आतले दरवाजे तर आधीच बंद झालेले होते, आता घराच्या बाहेरच्या जगातील सर्व लोकांचे दरवाजेही तिच्यासाठी बंद होत गेले. एकटेपणामुळे ती खुद्द स्वतःसाठीच अनोळखी होत गेली. ती कोण आहे आणि कुठे आहे, याचाही तिला पत्ता नसायचा. सर्वत्र मौनाचंच राज्य असायचं. बोलणार तरी कोण, आणि कोणाशी? टी. व्ही. कोकलत असायचा, पण ते ऐकायलाही तिला नकोच असायचं. मौनात रहाणं आता टाळता येणारच नव्हतं.

काही दिवसातच तिला आपलं जग शून्यवत झाल्यासारखं वाटू लागलं. फक्त ती आहे, आणि तिच्या आत एक रिकामं वर्तुळ आहे ज्यात शून्यं च शून्यं भरलेली आहेत. एकमेकांवर रेललेली, एकमेकांशी खेळणारी शून्यं!

काही वर्षांपूर्वी एका सहकाऱ्याने तिला सुचवलं होतं, की तिने एखादं मूल दत्तक घ्यावं. तेंव्हा ती आपल्या बहिण भावांचे संसार थाटून देण्यात इतकी बुडालेली होती, की असला काही विचार करण्याची फुरसतच नव्हती तिला. आता जेंव्हा तशी गरज भासते आहे, तेंव्हा लहान मूल सांभाळून मोठं करण्याचं वय राहिलेलं नाही. बराच विचार करून अखेर तिने एक मांजर पाळायचं ठरवलं. ती पांढऱ्या रंगावर काळे-भुरे चट्टे-पट्टे असलेली मांजर आता तिच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनून गेली. आता ती त्या मांजरीच्याच विचारात बुडून गेलेली असायची. सकाळ-संध्याकाळ एकच विचार— “ती ठीक आहे ना”. हा मुका प्राणी तिच्या एकटेपणातला मित्र तर झाला होता, पण तिला मदतीची पण आवश्यकता होती. ती मांजर कशी काय तिला मदत करणार?

“मांजरीनं आज नीट खाल्लं नाही. ”

“ती रात्री नीट झोपली नाही. ”

“तिला आज डॉक्टरकडे घेऊन जायला पहिजे. ”

या सगळ्या काळज्या करण्यात तिचे दिवस जाऊ लागले. रात्री कधी कधी ती मांजरीच्या चाहुलीने जागी होत असे, मग तिला काहीतरी खायला देऊन, उगाचच थर्मामीटर लाऊन तिला ताप तर नाही ना, हे बघत असे. रात्री नीट झोप न झाल्यामुळे बऱ्याच वेळा दिवसा तिचा डोळा लागत असे आणि त्याच वेळी फोनची घंटी खणखणत असे. भाऊ किंवा बहिणीचा फोन असेल, या विचाराने गडबडीने फोन घेत असे, तर तो मेडिकल चेकअप साठी तरी असायचा, किंवा कुठल्या तरी वस्तूच्या जाहिरातीसाठी केलेला कॉल असायचा.

बहिण भावाची आपल्या बद्दलची बेफिकीर वागणूक तिला चांगली माहित होती. कधी कधी तिला वाटायचं, की आपण तेंव्हाच आपला विचार केला असता तर! हे असे विचार मनात आले, तरी असंही वाटायचं, की ते तर खुश आहेत, त्यांना कुठले त्रास नाहीत यातच आपणही खुश राहायला हवं. आपणच केलेल्या कर्माला आता कसं बदलता येईल असाही विचार यायचा तिच्या मनात. आता तिचे सर्व विचार त्या मांजरीभोवतीच केंद्रित झालेले होते. या एकटेपणात ती मांजरीशी बोलत असे. आपलं ऐकवायची, तिचं पण ऐकायची! दोघींची जेवणाची, झोपायची वेळ एकच होती. पण मांजर तर मांजरच होती. मधेच उठून कुठेतरी निघून जायची, ही लगेच अस्वस्थ होत असे. काही चुकीचं तर होत नाहीये ना, मांजर पण का बरं अशी मला सोडून जाते! असो, पण कोणीतरी घरात आहे हा विचारच तिला काहीतरी करण्यासाठी उत्साह देत असे.

– क्रमशः भाग दुसरा  

मूळ कथा : शून्य के भीतर – डॉ. हंसा दीप. कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शून्याच्या आत… – भाग 1 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

शून्याच्या आत… – भाग 1 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

शहराजवळ एक पशु-पक्षी विहार होता, ज्याची स्तुती अनेकांकडून ऐकली होती. भारतातून एक मित्र आले होते, तेंव्हा विचार केला, की त्यांना आधी तिथेच घेऊन जावं दाखवायला. सकाळी नाश्ता करून आम्ही तिथे पोचलो, तर गेटवरच एक मोठी पाटी दिसली. तिथे लिहिलं होतं, की “पशु पक्ष्यांना काहीही खायला घालू नये. प्रवेशासाठी काही तिकीट नाही. आपण देणगी देण्यास उत्सुक असाल, तर देऊ शकता, पण या विहाराची कथा जरूर ऐका किंवा वाचा”

आम्ही आत जाऊन पुढे चालू लागलो. मधे बनवलेल्या लांब-लांब गोलाकार रस्त्यांवरून जाताना कित्येक प्राण्यांची एक वेगळीच दुनिया दिसत होती. उजवीकडे तारांच्या कुंपणापलीकडे वेगवेगळ्या जातींचे प्राणी समूह आपापल्या सीमांमध्ये विहरताना दिसत होते. आणि डाव्या बाजूला कित्येक वृक्षांवर अगणित पक्षी बसलेले दिसत होते. त्यांच्यासाठीच खास बनवलेल्या त्या जंगलात ते त्यांचं नैसर्गिक जीवन जगत होते. या पक्ष्यांचा कलकलाट, शिवाय आणखीही वेगवेगळे आवाज मिळून एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं होतं

पक्ष्यांची, प्राण्यांची मस्ती बघून असं वाटत होतं, की इथे त्यांची चांगली काळजी घेतली जात असणार. प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांसाठी वेगवेगळी घरे केलेली होती. मांजरांसाठी वेगळी, कुत्र्यांसाठी वेगळी आणि रॅकून या प्राण्यांसाठी वेगळी घरे होती. या अतिशय सुंदर अशा नैसर्गिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीच्या इतक्या साऱ्या प्राण्यांना एकाच वेळी बघणं हा एक वेगळाच अनुभव होता.

चालून फिरून दमल्यावर मग एका ठिकाणी बसून आम्ही बरोबर आणलेले खाण्याचे पदार्थ खाऊन घेतले. इथे प्राणी बघत फिरणं हा फार आनंददायक अनुभव होता, पण फिरून फिरून आता आम्ही थकलो होतो. हे तर आधीच ठरवलं होतं, की या प्राणी संग्रहालयाची कथा वाचून मगच तिथून परत फिरायचं. काही लोक तिथे तो ऑडिओ ऐकत होते, तर काहीजण वाचत एकमेकांशी त्यावर बोलत होते. माझ्या मित्राने ऑडिओ ऐकायला सुरुवात केली आणि मी वाचू लागले.

तिला सर्वजण कुमुडी म्हणत असत. कुमुडी हे नाव ऐकायला विचित्रच वाटतं, पण आपल्याकडे चांगल्या नावांची तोडमोड करून, टोपणनावं कशी तयार होतात, याचं हे एक चांगलं उदाहरण होतं. ही कुमुडी श्रीलंकेत जन्मली होती. लहान असतानाच आई-वडिलांबरोबर न्यूझीलंडला जाऊन राहिली होती. आणि नोकरी लागल्यामुळे कॅनडामधल्या टोरांटो शहरात येऊन स्थिरावली होती.

कुठे उगवलेलं बी, कुठे जाऊन रुजलं आणि कुठे जाऊन त्याचा वृक्ष फोफावला, त्याचा विस्तार झाला पहा!

वेगवेगळ्या देशांच्या विविधतेला साजेशी रूपं तिच्या नावाने धारण केली. कौमुदी चं कोमुडी, आणि कोमुडीचं शेवटी कुमुडी! तिची मूळं श्रीलंकेशी जोडलेली होती त्यामुळे हे कळणं सोपं होतं, की तिच्या घरात तामिळ भाषा बोलली जात असणार. हे नाव संस्कृत, तामिळ किंवा हिंदी मधून आलेलं असणार, हे भाषा विज्ञान सांगेल. पण तिचं कुटुंब मूलतः तामिळभाषीच होतं. किती एक भाषा आणि संस्कृतींच्या मिलाफाने तयार झालेल्या या सुंदरशा नावाने अनेक देशांच्या सीमा पार करत हे नावाचं नवंच रूप धारण केलेलं होतं. हिंदी-तामिळ भाषिक लोकांची इंग्लिश बोलण्याची ढब थोडी वेगळी असते, त्याला हे लोक हसत असतात, त्यांची चेष्टा करतात. पण अशा सुंदर नावांचा कचरा करण्यात या लोकांचा कोणी हात धरु शकत नाही. तर, कौमुदीचं आता कुमुडी झालेलं होतं.

असो, तर या बदललेल्या नावाचं तिला स्वतःला काही फार वाईट वाटत नव्हतं. कारण, शाळेपासून तर करिअरच्या या उच्च शिक्षणापर्यंत तिला अशाच वेगवेगळ्या नावांनी बोलावलं जात होतं. आणि तसंही नावात एवढं काय ठेवलेलं होतं! ती तर नेहमीच तिच्या कामासाठीच ओळखली जात असे. तिचं व्यक्तिमत्व तिच्या कौमुदी नावाला साजेसं होतं. अत्यंत शालीन, सौम्य, साधा, सरळ स्वभाव तर होताच तिचा, शिवाय, ती एक समर्पित, निष्ठावान डॉक्टर होती. जे काही करायची, ते पूर्ण मनापासून करायची. आपल्या स्वतःच्या खास अशा पद्धतीने, दहा मिनिटांच्या कामासाठी अर्धा तास सुद्धा घालवत असे. मग पुढचं काम, मग त्याच्या पुढचं, अशा प्रकारे तिची अनेक कामं तिची वाट बघत असायची. एका पाठोपाठ एक उरत गेलेल्या कामांची यादी वाढतच जायची.

यात कोणी तिची चूक आहे, असे मानत नसे. कारण जेंव्हा ते काम संपायचं तेंव्हा ते परिपूर्ण झालेलं असायचं. तिचे सगळे पेशंट तिच्यावर खुश असायचे. ती नेहमीच आपलं सर्वोत्तम द्यायची आणि त्या बदल्यात तिला जी तृप्ती मिळायची, ती अनमोल असायची. वेळाच्या या मारामारीत तिला रात्री उशिरापर्यंत जागून कामं निपटावी लागत असत. शरीर थकून जात असे, आणि मेंदूची विचार करण्याची क्षमता नष्ट होण्याची वेळ येत असे, तेंव्हा कुठे ती जाऊन झोपत असे. यामुळे तिची तब्येत, शरीरातला प्रत्येक अवयव बंड करून उठत असे, पण तिची कामं काही संपायची नाहीत. तिच्या विभागात “आज कुमुडी आली नाही” “परत आली नाही” “अजबच आहे, इतकी कशी आजारी पडते?” “आजारी आहे, सांगितलं होतं की” असे संवाद नेहमी ऐकू येत असत.

हॉस्पिटलमधल्या एका समर्पित डॉक्टरसाठी हे असे प्रश्न विचारणाऱ्यांनाही त्यांचं उत्तर माहितीच असायचं. सगळे तिचे प्रशंसकच होते. तिची काम करण्याची मंद गती तिच्या सहकाऱ्यांना त्रासदायक वाटायची, तरीही त्या सगळ्यांना ती आवडत असे. तिचं समर्पण स्वतःच बोलत असे. एकदम निस्वार्थी आणि दृढ होतं ते समर्पण! सगळे तिच्यावर प्रेम करत असत. त्यांनी एक हात जर तिला मदतीचा दिला, तर ती दोन्ही हातांनी त्यांच्या मदतीस धावून जात असे. टेक्निक फार जलद गतीने बदलत होतं. तिला कित्येक वेळा आपल्या तरुण अशा दुय्यम सहकाऱ्यांना बरंच काही विचारावं लागत असे, पण नवं शिकताना तिला कधी संकोच वाटत नसे.

तिच्या सहकाऱ्यांना एकाच गोष्टीचं वाईट वाटत असे, की ती अगदी एकटी होती, तरी ती कधीच काही बोलत नसे. आपल्या पंचविसाव्या वर्षापासून पन्नासाव्या वर्षापर्यंत आपल्या खांद्यांवर सगळ्या कुटुंबाचा भार घेऊन वाटचाल करत राहिली होती ती. घरातली सगळ्यात मोठी मुलगी असल्यामुळे घराची सगळी जबाबदारी तिने स्वतःवर घेतलेली होती. वयस्क आई-वडिलांबरोबरच वाढत्या वयाच्या भावा बहिणींची पण काळजी घ्यायला लागत होती. टोरंटोहून न्यूझीलंडला कित्येकदा महिन्यातून दोन वेळा जावं लागत असे. खरं तर तिला न्यूझीलंड मधेही नोकरी मिळू शकली असती, पण तिला कॅनडा आणि तिथली कार्यपद्धती खूप आवडू लागली होती. या जमिनीत तिची मूळं जणू घट्ट रुजली होती, इतकी, की या देशाचा तिने आपली कर्मभूमी म्हणून जन्मभरासाठी स्वीकार केलेला होता. हा देश तिच्यासाठी जणू सोयी-सुविधांचा वर्षाव घेऊन आला होता. म्हणून तिला तो देश सोडायचा नव्हता. कुटुंबाबद्दलची तिची काळजी बघून सगळे थक्क होत असत. एक पाय टोरंटोमधे तर एक ऑकलंडमधे असायचा तिचा. एक वरिष्ठ डॉक्टर असल्याने चांगला पैसा कमवत असे ती, परंतु, तिला कायमच पैशांची तंगी जाणवत असे. कारण, तिच्या पगाराचा मोठा हिस्सा कॅनडा ते न्यूझीलंड या प्रवासातच खर्च होत असे. तिच्या खांद्यांवरचं हे शारीरिक व आर्थिक ओझं काही वेळा तिला पेलतही नसे. आपल्या क्षमतांकडे दुर्लक्ष करून ती एका पाठोपाठ एक जबाबदाऱ्या पार पाडत गेली आणि प्रत्येक पावलाबरोबर आपलं शरीर या भाराने दमत चाललं आहे, हे जाणवूनही त्याकडे दुर्लक्ष करत राहिली. आई-वडिलांच्या मृत्यू नंतरही दोन्ही बहिण भावांना स्थिर-स्थावर करून देण्यात पुढची पाच वर्षं गेली तिची. आता मात्र तेच भाऊ बहिण आपापल्या मुला-बाळात, आपल्या परिवारात गुन्तून गेले आहेत.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ कथा : शून्य के भीतर – डॉ. हंसा दीप. कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन कथा — (१) रिल / (२) क्रोसिन ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

 

🔆 जीवनरंग 🔆

☆ दोन कथा — (१) रिल / (२) क्रोसिन ☆ श्री मंगेश मधुकर ☆

(१) रिल”

रुटीनमध्ये गुरफटलेल्या शहरी लोकांना पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की निसर्गाच्या भेटीची ओढ लागते. जूनपासून पावसाळी सहली सुरू होतात. अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी गर्दी झालेली. त्यात जोरदार पावसाच्या हजेरीनं सगळ्यांचा उत्साह वाढलेला. नेहमी ट्राफिक जाम, प्रदूषण, माणसांची, गाड्यांच्या गर्दीची सवय असलेल्यांना हिरवाईनं सजलेल्या डोंगरावरून पडणारे धबधबे, दरीत खोल खोल कोसळणारं पाणी, झाडांवरून टपकणारे थेंब, आसमंतात पसरलेला सुगंध, मोकळी स्वच्छ हवा अशा मनमोहित वातावरणानं काय करू अन काय नको अशी अवस्था झाली. नेहमीच्या सेलिब्रेशनच्या सवयीनं मोठ्या आवाजात स्पीकर लावून नाचगाणं सुरू झालं सोबत आरडा-ओरडा, हसणं-खिदळणं, सेल्फी, फोटो सेशन होतंच. रिलसाठी कुणी चिखलात लोळत होतं, कुणी नाचत होतं तर कुणी पावसात समाधी लावून बसलेलं. अतिउत्साही दरीच्या टोकावर उभं राहून सेल्फी काढत होते, फोन उंच धरून शूट करत होते. वाट्टेल ते प्रकार सुरू होते. सगळ्यानांच अत्यानंदाचा कैफ चढलेला असताना दूर उभे असलेले अरुण, मनोरमा मात्र गर्दीच्या धांगडधिंग्याकडे निर्विकारपणे पाहत होते.

“पब्लिक कसलं एंजॉय करतयं ना”अरुण म्हणाला पण मनोरमानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

“तुझ्याशी बोलतोय. बघ ना कसली धमाल चाललीय. रिल्ससाठी कसल्या भन्नाट आयडिया काढतायेत. भारी!!”

“हंsssम”

“चल”

“कुठं”

“आपणही रिल करू”

“नको”

“असं कसं”

“चल ना”अरुण चिडला.

“आता मला काहीच करायचं नाहीये”

“कालपर्यंत तर रील्ससाठी पागल होतीस. दिवसभर सेल्फी आणि रिल्स तर काढत होतीस. आता का नाही म्हणतीयेस” 

“काल वेगळा होता आणि आज???तो विषय नको. प्लीज”मनोरमा हात जोडत काकुळतीनं म्हणाली.

“बघ कसा धो धो पाऊस पडतोय. जोडीला वीजांचा कडकडाट, रील्ससाठी एकदम परफेक्ट वातावरण आहे. ”अरुण मनोरमाला हाताला धरून ओढू लागला.

“कशाला त्रास देताय. सोडा. ”हात झटकत मनोरमा किंचाळली. अरुण गप्प झाला. अस्वस्थपणे येरझारा मारायला लागला. मनोरमा रडायला लागली.

“असं काय करतेस. आज दोघांचे सोबत रील्स करू. तू म्हणशील तसं मी करेल. ”अरुणनं पुन्हा आग्रह सुरू झाला.

“नको”

“दरीच्या कडेला टायटॅनिक पोजमध्ये शूट करू. बॅकग्राऊंडला ‘टीप टीप बरसा पाणी’ गाणं. एकदम कडक!!!सुपरहिट रिल”

“माझ्याकडून चूक झाली. ”मनोरमानं हात जोडले.

“नुसती चूक नाही तर घोडचूक” अरुणच्या डोळ्यात विखार होता.

“काय करू”

“आता विचारून काय उपयोग?जे करायचं ते कालच करून बसलीस. ” 

“मुद्दाम नाही केलं”.

“तरी सारखं बजावत होतो की काळजी घे. नको तो आगाऊपणा करू नकोस. पण…. तुझ्या बेजबाबदारपणामुळे सगळं घडलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तुझ्याबरोबर माझीही फरफट झाली. हे म्हणजे एकावर एक फ्री सारखं. आपलं घर उद्ध्वस्त झालं. ”

“असं का बोलता. सहन होत नाहीये. ”

“खरं तेच बोलतोय ना. हा त्रास आता कायमच राहील. आताही तू स्वतःचाच विचार करतेयेस. माझं काय?? तुझ्या हौसेपोटी माझं आयुष्य ???. ”

“आता मरेपर्यंत हेच ऐकवणार का?” एकदम मनोरमानं गप्प झाली.

“विसरली असशील तर आठवण करून देतो. काल याच ठिकाणी दरीच्या टोकाजवळ हटके रिलच्या नादात तोल जाऊन तू दरीत पडली. तुला वाचवताना मीही घसरलो आणि दोघंही……. ”

“खूप पश्चाताप होतोय. ” 

“आता तेवढंच करायचंयं. अट्टल दारुड्याला जसं दारूशिवाय सुचत नाही तसंच तुझी अवस्था. घरीदारी सेल्फी नाहीतर रील्स. शेवटी त्यानचं घात केला. आता आपल्या मुलांचं कसं होणार?त्यांना कोणाचाच आधार नाही. ”अरुण ढसाढसा रडायला लागला. दुर्दैवानं त्याचा आकांत मनोरमा सोडून इतर कोणापर्यंतच पोचत नव्हता.

बऱ्याच प्रयत्नानंतर दरीत पडलेल्या दोन्ही बॉडीज सापडल्या. स्ट्रेचरवर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या ममी-पपाला पाहून एकमेकांचा हात घट्ट पकडलेल्या समर आणि सिद्धीनं हंबरडा फोडला. तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलांची अवस्था पाहून मनोरमाचा बांध फुटला. असहाय्य अरुण स्वतःच्या तोंडात मारायला लागला. दोन्ही मुलांना कुशीत घेण्याचा प्रयत्न अरुण -मनोरमानं केला. एकदा, दोनदा पुन्हा पुन्हा पण स्पर्श मुलांपर्यंत पोचतच नव्हता. नियतीच्या अजब खेळात अरुण, मनोरमा हतबल होते.

“रील्सच्या नादात नवरा-बायकोचा दरीत पडून मृत्यू. ”चॅनलवर ब्रेकिंग न्यूज झळकत होती. दरीत पडतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. दु:खाचा बाजार मांडण्याची विकृती आता जगण्याचाच भाग झालीये. कोणत्या क्षणी कसं वागायचं याच भान सुटत चाललंय कारण माणसं मनानं दगड होतायेत. जिथून अरुण, मनोरमा पडले ती जागा ‘हॉट स्पॉट’ झाली. तिथले फोटो, सेल्फी सोशल मिडियावर RIP च्या मेसेज सोबत फिरत होते. समर, सिद्धीचा आक्रोशाचा रिल कोरडी सहानुभूती दाखवत जो तो फॉरवर्ड करत होता.

(२) क्रोसिन ”

सकाळची वेळ, क्लिनिकमध्ये पेशंटही नव्हते. तितक्यात मित्र आला. निवांत गप्पा चालल्या होत्या. इतक्यात रिसेप्शनिस्ट धावत आली.

“सर, अर्जंट आहे”

“बोल”

“ते आलेत”

“कोण”

“क्रोसिन” रिसेप्शनिस्ट बोलल्यावर मित्रानं एकदम माझ्याकडं पाहीलं.

“अरे बाप रे, नंतर यायला सांग”

“सांगितलं पण ऐकत नाहीत. भेटायचंच असं म्हणतात. ”

“जरा वेळ बसू देत. मी सांगितल्यावर आत पाठव. ”

“काही अर्जंट असेल मी जातो. तू पेशंट चेक कर”मित्र म्हणाला.

“तू बस रे!!हा पेशंट म्हणजे नमुनायं. नुसता डोक्याला ताप म्हणूनच आम्ही त्यांना क्रोसिन म्हणतो. ”

“दुखण्याला कंटाळलेले असतील. ”

“दुखणं नाही अतिहुशारी”

“म्हणजे”

“स्वतःचं बघ” रिसेप्शनिस्टला पेशंटला पाठवायला सांगितल्यावर पन्नाशीचे काका आत आले.

“नमस्कार डॉक्टर!!कसे आहात. तब्येत वैगरे ठिक ना” डॉक्टरांचीच विचारपूस करणारा पेशंट बघून मित्राला आश्चर्य वाटलं.

“मी मस्त, तुम्ही कसे आहात!!”

“थोडा डिस्टर्बय. रोज नवीन नवीन त्रास…. ”

“अरे बाप रे, नक्की काय होतंय”

“तीन दिवस वाट पाहिली. स्टडीपण केला आणि शेवटी तुमच्याकडे आलो. ”

“शेवटी म्हणजे?समजलं नाही”

“गैरसमज नको. तुम्हांला तर माझा स्वभाव माहितेय”

“चांगलाच”माझं खऊटपणे बोललेलं काकांच्या डोक्यावरून गेलं.

“थॅंकयू, मी लहानपणापासूनच अभ्यासू आहे. ” 

“हो, हे तुम्ही नेहमी सांगता. ”

“खरं तर मला डॉक्टरच व्हायचं होतं पण मार्क कमी पडले आणि सरकारी नोकरी मिळाली म्हणून मग.. ”

“अरेरे!!समाज एका हुशार डॉक्टरला मुकला”

“तुम्ही चेष्टा करत नाही ना”

“छे, काहीतरीच काय!!तुमच्या त्रासाविषयी सांगा ना. ”

“अरे हो, तीन दिवसांपूर्वी माझा हात दुखत होता नंतर पोटदुखी सुरू झाली. एकदोनदा छातीत कळ आली आणि कालपासून डोकं दुखंतय. ”

“आपण चेक करू” 

“एकच मिनिट” काका म्हणाले म्हणून मी पुन्हा खुर्चीत बसलो.

“प्लीज पटकन सांगा. अजून पेशंट आहेत. ”

“ऐका ना. त्रास सुरू झाल्या झाल्या लगेच इंटरनेटवर सर्च केलं. तेव्हा हा त्रास म्हणजे अनेक गंभीर आजरांची प्राथमिक अवस्था आहे असं कळलं म्हणून जरा टेंशन आलं. दुसऱ्या दिवशी पोटदुखी सुरू झाल्यावर पुन्हा सर्च केलं तर तिथं अजून वेगळी माहिती सापडली आणि आता आजाराविषयी कंफ्यूजन झालंयं. ”

“चेक करतो. या”

“फक्त अर्धा मिनिट. इंटरनेटवरच्या माहितीवरून घरच्याघरी ट्रीटमेंट सुरू केली आणि केमिस्टकडून आणलेल्या दोन गोळ्या घेतल्या पण फरक पडला नाही. नाईलाजानं तुमच्याकडं आलो. ”

“ओके, सगळं सांगून झालं. आता चेक करू” जराशा चढया आवाजात मी बोललो पण काकांवर काहीही परिणाम नाही. त्यांची बडबड चालूच. ब्लड प्रेशर तपासताना देखील संभाव्य आजार आणि त्यावरची औषधं याविषयी सांगत होते. तपासणी झाल्यावर खुर्चीत बसताना काका म्हणाले “माझा अंदाज बरोबर ना. ”

“काही प्रमाणात”

“म्हणजे”

“काळजी करण्यासारखं काही नाहीये. ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम दिसतोय. दोन दिवस पोटाला आराम द्या. सगळं ठिक होईल. ” 

“वाटलचं असं काही असेल तरीही काही टेस्ट करून घेतो. इंटरनेटवर तसं सांगितलयं. प्रिकोशन इज बेटर दन क्युअर”

“जशी तुमची इच्छा!!, ”म्हणत काकांना दोन टेस्ट लिहून दिल्या.

“अजून एक”

“बोला”

“काही पथ्य”

“महिनाभर इंटरनेट वापरू नका. ”इतका वेळ शांत बसलेला मित्र बोलून गेला. त्याच्याकडं विचित्र नजरेनं पाहत काका बाहेर गेले आणि मी हुsssश केलं.

“आता कळलं क्रोसिन नाव का ठेवलं. ”

“हो रे, फुल पकाऊ आणि पार डोकं आऊट झालं. असे दोनचारजण भेटले तर रोजची क्रोसिन नक्की!!”

“पूर्वी डॉक्टरांनी सांगितलेलं निमूटपणे ऐकणारे पेशंट होते. आता इंटरनेटवरची माहिती वाचून शहानिशा न करता असे स्वतःलाच चतकोर डॉक्टर समजणारे फार वाढलेत. ”

“चतकोर डॉक्टर!!हे भारीये”

“खरंतर फार काही कळत नाही परंतु अशांचा कॉन्फिडन्स जबरदस्त असतो. काहीही झालं तरी आपलं घोडं दामटत असतात. सोशल मिडियावर आलेल्या खऱ्या-खोट्या माहितीवर विश्वास ठेवून प्रॉब्लेम काय असेल आणि काय ट्रीटमेंट द्यावी असं डॉक्टरांनाच सुचवतात. ”

“अशांना हँडल कसं करतोस”

“शक्यतो वाद घालत नाही. आत्ताच बघ. बाहेरचं खाणं झालं म्हणून पोट बिघडलं पण त्यांना टेस्ट करायच्यात म्हणून मग लिहून दिलं. विनाकारण खर्च पण अनुभवानं शहाणपण आलयं की चतकोर ज्ञानापुढं डोकं चालवायचं नाही. ते जाऊ दे, चहा घेणार!!”

“एकदम कडक मागव. खरंच डोकं दुखायला लागलं. ”मित्र.

चहासाठी रिसेपशनीस्टला फोन केला तर ती म्हणाली “सर, एक पेशंट आलेत. ” 

“आता कोण?”

“अजून एक क्रोसिन” मी कपाळावर हात मारला.

—- 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “रात्र थोडी सोंगं फार ( विनोदी कथा)” – भाग-२ ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ “रात्र थोडी सोंगं फार ( विनोदी कथा)” – भाग-२ ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

(आम्ही रात्री अडीच तीनला निघालेलो सकाळी सातच्या आसपास खाली पोहोचलो. घोड्यावरून आलेली मंडळी मात्र पहाटेच खाली आली होती.) – इथून पुढे – 

आम्ही रूमवर आलो मी गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ केली मग जरा थोडंसं बरं वाटू लागलं कारण अंग आणि पाय सगळंच ठणकत होतं. माझी दोन्ही मुलं आणि मिस्टर झोपलेले होते. मी खाली जाऊन नाश्ता केला आणि सर्वांसाठी घेऊन वर येऊ लागले तेव्हा घोड्यावरून आलेल्या पैकी एक जण माझ्यासमोर आला आणि मला म्हणाला,

“वहिनी, तुम्ही चक्क एवढ्या लांबून चालत येऊन, अंघोळ करून, खाली जाऊन नाश्ता घेऊन आलात?‍”

मी म्हणाले,

“हो आता थोडंसं बरं वाटतंय आंघोळ केल्यावर. “

तो म्हणाला,

“आमच्या बायकांना चालताच येत नाही. हॉटेलच्या पायऱ्या सुद्धा त्या बसत बसत चढल्या. तोंडाने सारख्या आई आई गं! करत होत्या. घोडे धडधडतच खाली आले. हाडाचे पार खुळखुळे झाले बघा आमच्या. “

माझंही अंग खूप दुखत होतं पण मी हसू आवरू शकले नाही. बराच वेळ आराम केल्यानंतर वैष्णो मातेचा निरोप घेऊन सर्वजण परत जम्मूला जायला निघालो. जम्मूच्या एका गार्डन मध्ये आम्ही गेलो कारण ट्रेनला थोडा वेळ होता. त्या गार्डनमध्ये फोटो काढताना एकाने सेल्फी स्टिक आणली होती. त्यांचा मुलगा त्याच्या आईचा नवीन फोन घेऊन सेल्फी स्टिकने फोटो काढत होता. तो आई-वडिलांच्या हातात देखील सेल्फी स्टिक द्यायला तयार नव्हता आणि काय झाले काय माहिती पण अचानक फोन खाली पडला आणि त्यावर चीर गेली. तिथेच तिने मुलाला फटके द्यायला सुरू केले.

“माझा नवीन फोन फोडलास गाढवा. “

कसेबसे सर्वांनी समजावले आणि परत ट्रेनमध्ये बसणार तितक्यात आमच्या सोबत आलेल्या एका जोडप्याचा वैष्णोदेवीला स्टुडिओमध्ये खास काश्मिरी ड्रेसिंग मध्ये काढलेला सहकुटुंब फोटो जिथे राहिलो त्या हॉटेलवरच विसरला असल्याचे कळले आणि त्याच्या बदल्यात त्यांनी इंदिरा गांधींचा एक फोटो विकत घेतलेला होता तो मात्र लक्षात ठेवून आणल्याचेही कळले. हे ऐकल्यावर सगळीकडे हशा पिकला तो वेगळाच.

पण फोटो आणण्यासाठी परत जाणे शक्य नव्हते कारण खूप लांब आम्ही आलो होतो आणि आमच्या ट्रेनची वेळ देखील झाली होती. शेवटी काय वैष्णोदेवीच्या त्या पवित्र भूमीत आमच्यापैकी एकाचा सहकुटुंब फोटो आठवण म्हणून ठेवून आम्ही सर्वजण अमृतसरला जाण्यासाठी निघालो.

अमृतसरला आम्ही ठरवलेल्या हॉटेलवर पोहोचलो. सर्वजण छान फ्रेश झाले. पंजाबी लोकांचे पराठे खूप छान असतात म्हणून मुद्दाम आलू पराठ्याचा नाश्ता सांगितला होता पण त्या पराठ्यामध्ये आलू कुठे सापडतच नव्हता. नेहमीप्रमाणे माझ्या मुलांनी सांगून टाकले,

“यापेक्षा आमच्या आईचे पराठे खूप छान असतात. “

सर्वांनी सवय नसतानाही वेगवेगळ्या पद्धतीच्या नाश्त्याचा आनंद घेतला आणि नाश्ता करून सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर ही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेलो.

जिथे जाईल तिथे तिथे वेगवेगळ्या चवीचा स्वाद घेण्यामुळे बहुतेक सर्वांनाच दोननंबरचा त्रास सुरू झाला होता. आम्हाला अनुभव असल्यामुळे आम्ही सांगत होतो की नवीन पदार्थ जरा कमीच खावेत आणि चालायचं भरपूर आहे त्यामुळे भूक थोडी ठेवून खा पण कोणीही ऐकले नाही. संध्याकाळी सर्वजण पोटदुखीच्या परिणामांना सामोरे जात होते.

दोन दिवस अमृतसरमधे राहून तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही दिल्लीला जाण्यासाठी ठरलेल्या ट्रॅव्हलनी निघालो. दिल्लीला पोहोचल्यावर पहिले अक्षरधाम मंदिर पाहायचे ठरले. त्या दिवशी चतुर्थी होती त्यामुळे आम्हाला उपवास होता. अक्षरधाम टेम्पल पाहून आल्यावर इतर सर्वांनी मनसोक्त चाटपापडी, समोसे, छोले भटूरे इ. पदार्थांचा आनंद लुटला. यांच्या एका मित्राने तर हे सर्व मनसोक्त खाऊन परत आमच्यासाठी मागवलेले वेफर्स सुद्धा अर्धे खाऊन टाकले. अचानक ही गोष्ट त्याच्या लक्षात आली आणि दिलगिरीच्या स्वरात म्हणू लागला,

“अरे, तुम्हाला उपास आहे नाही का? 

असे म्हणून त्यांने खाणे बंद केले. त्याचाही परिणाम व्हायचा तोच झाला पोट बिघडल्यामुळे सर्वजण परेशान झाले. आम्ही दिवसभर उपाशी होतो त्यामुळे एका राजस्थानी रेस्टॉरंट मध्ये छान संध्याकाळी जेवण केले. ते जेवण खाण्याची इच्छा असून देखील, पोटदुखीमुळे खाता येत नाही म्हणून बहुतेक सर्वांची हळहळ झाली.

दिल्लीमध्ये दुसऱ्या दिवशी संसद भवन, राष्ट्रपती भवन ओझरते पहात पहात आम्ही लोटस टेंपल पाहिले. शांत रम्य परिसर. सर्वांनी थोडा वेळ मेडिटेशन पण केले. लालकिल्ल्यावर गेलो. लालकिल्ला अगदी कानाकोपरा पहिला आणि त्यानंतर दिल्ली गेटवर गेलो. दिल्ली गेटवर फोटो काढण्यासाठी म्हणून एका माणसाला आम्ही ठरवले. आमच्यापैकी दोघांना वाटले त्याच्यापेक्षा चांगला माणूस ठरवूया म्हणून त्यांनी दुसऱ्या माणसाला ठरवले. मानवी स्वभाव दुसरं काय! वेगवेगळ्या पोजमध्ये आम्ही फोटो काढले पंधरा ते वीस मिनिटात त्या माणसाने आमचे फोटो आणून दिले. आमच्यासोबत ज्या ज्या जोडप्यांनी फोटो काढले होते त्या सर्वांचे मिळाले आणि दोघांनी अति हुशारी दाखवून दुसऱ्या माणसाला फोटो काढायला सांगितले होते तो माणूस आमची निघायची वेळ झाली तरी येत नव्हता म्हणून हे दोघेजण त्याला शोधायला म्हणून आख्खा दिल्ली गेटचा परिसर फिरले पण तो माणूस काही सापडला नाही आणि शेवटी सगळ्यांच्या शिव्या खाऊन गुपचूप गाडीत येऊन बसले. गाडी हलल्यावर ज्यांचे फोटो मिळाले नाहीत ते कुटुंब दिल्ली गेट कडे असे काही बघत होते की आमचे फोटो तुझ्याजवळ राहिले म्हणजे केवढा मोठा अपराध झाला आहे. हे चित्र पाहून सगळे पोट धरून हसू लागले. एकूण काय आनंदाचे खूप मोठे गाठोड घेऊन आम्ही संध्याकाळी दिल्लीच्या विमानतळावर पोहोचलो. आम्ही जरी विमानाचा प्रवास केला होता तरी आमच्या सोबत आलेले बहुतेक सर्वजण पहिल्यांदाच विमानात बसणार होते त्यामुळे कुतुहल खूप जास्त होते.

विमानतळावर पोहोचताच आमच्या सर्वांमधील सगळ्यात छोटा जो मुलगा होता त्याला दोन नंबरला आली होती. त्याची आई घाबरून गेली. आम्ही त्या दोघांना घेऊन पहिले वॉशरूम गाठले. आम्ही वॉशरूम मध्ये आहेत हे कुणालाच माहिती नव्हते त्यामुळे ज्या मुलाला घेऊन गेलो होतो त्याचे वडील वेड्यासारखे बायको मुलाला शोधू लागले. आम्हाला पाहिल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. बॅग चेकिंग पासून सर्वजण आम्हाला पुढे करत होते कारण आम्हाला विमानाचा आधीचा अनुभव होता. मधेच एकाने सर्वांना उभे करून त्याच्या सेल्फी स्टिकने एक सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला तो सेल्फी काही केल्या निघत नव्हता म्हणून दुसरा मोठ्याने म्हणाला,

“सेल्फीस्टिकचे पैसे दिले नाहीत वाटतं? म्हणूनच फोटो काढायला नको म्हणत आहे ती.”

असे म्हणताच सर्वजण मोठ्याने हसू लागले व विमानतळावरील सर्व लोक आमच्याकडेच पाहू लागले. शेवटी सर्व चेक होऊन आम्ही धावत पळत विमानात जाऊन पोहोचलो.

विमानात पोचल्यापासून ते विमानातून उत्तरेपर्यंत छोट्या मुलाला विमानातले टॉयलेट एवढे आवडले की तो सारख्या त्याच्या वाऱ्या करत होता.

आमच्यातीलच एक लेडीज विमानातल्या बाथरूम मध्ये गेली आणि काही केल्या तिला बाथरूमचा दरवाजा उघडेना. शेवटी विमानातील एका तरुणीने तिला बाहेर काढले तेंव्हा तेवढ्या थंडगार एसी मध्ये पण घामेघूम झालेल्या तिला पाहून सर्वजण हसू लागले. बघता बघता हैदराबाद आले हैदराबादहून आम्ही ठरवलेल्या गाड्या आम्हाला घरपोच घेऊन आल्या आणि अशा अजब गजब प्रवासाची सांगता झाली. प्रवास जरी संपला असला तरी खूप सार्‍या गोड आठवणी आणि हास्यरसाच्या भरपूर खाउनी भरलेले डबे मात्र कायम आमच्या शिदोरी मध्ये भरलेले राहिले आहेत. आज कितीही दिवसांनी ते डबे उघडले तरी तितक्याच उत्साहाने हास्याचे कारंजे असे काही उडतात की त्यात आम्ही चिंब चिंब होऊन जातो, आणि “असली मजा तो सबके साथ आता है।” याची पुन्हा एकदा प्रचिती येते.

पुर्वनियोजन करून देखील प्रत्येक व्यक्तींच्या वेगवेगळ्या स्वभावामुळे प्रवासात जी त्रेधातिरपीट उडाली त्यालाच तर म्हणतात रात्र थोडी आणि सोंगं फार.

— समाप्त — 

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “रात्र थोडी सोंगं फार ( विनोदी कथा)” – भाग-१ ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ “रात्र थोडी सोंगं फार ( विनोदी कथा)” – भाग-१ ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

सात जणांच्या जोड्या आणिक

मुले-बाळेही होती सोबत

कश्यास सांगू अठ्ठावीस जण

अन् हास्याची रंगत संगत

सात दिवसांचा आमचा प्रवास. नांदेडहून रेल्वने डायरेक्ट जम्मुला निघालो. दोन दिवस ट्रेनमध्ये जाणार म्हणून सर्वांनी डबे वगैरे सोबत घेतलेले होते. त्यातील दोन कुटुंबांना जरा लांबच्या डब्यात जागा मिळाली. म्हणजे नऊ जण दुसऱ्या डब्यामध्ये आणि आम्ही राहिलेले १९ जण जवळच्या डब्यांमध्ये होतो. रेल्वे दहा वाजता सुरू झाली. अडीच तीनच्या दरम्यान जेवणं वगैरे सुखरूप पार पडली. चारची वेळ झाली असेल, लांबच्या डब्यात असलेल्या नऊ जणांपैकी एकाच्या बायकोला उलट्या सुरू झाल्या. त्या उलट्यांमुळे ती इतकी घाबरली की लगेच परत जाउया असे म्हणू लागली. तिचा नवरा तिच्याकडे असा काही पाहत होता की कुठून चूक केली आणि हिला ट्रीपला घेऊन आलो? नशीब, तोपर्यंत फोन सुरू होते. निरोप एकमेकांना मिळाले आणि गाडी एका स्टेशनवर थांबल्यावर, आमच्या डब्यातील दोघे -तिघेजण त्यांच्यापर्यंत पोहोचले. कसेतरी समजावून सांगून परत येताना त्यातील एक जण खाली उतरून येऊ लागला कारण एसी ट्रेनच्या डब्यांमधले दरवाजे उघडायला त्रास होत होता. जाताना एवढे डबे ओलांडून जायचे म्हणजे सर्वांच्या हाताची वाट लागली त्यामुळे परत येताना तो खालून येत होता. अचानक रेल्वे सुरू झाली आणि तो खाली राहिला असे वाटून त्याच्या बायकोने एकच गोंधळ सुरू केला.

“अहो आमचे हे राहिले ना खाली. ” 

 म्हणून ती ओरडू लागली. या सगळ्या गोंधळात कसातरी तो मागच्या एका डब्यामध्ये चढला आणि तिच्यापर्यंत पोहोचला. मग मात्र सगळ्यांनी त्याला रागावून सांगितले,

“हे एसी ट्रेनचे दरवाजे एकदा बंद झाले की परत उघडत नाहीत. तू परत खाली उतरू नकोस. “

हळूहळू सगळेजण कोणी पत्ते खेळत, कोणी गाण्याच्या भेंड्या खेळत होते. मुलंही काहीतरी खेळ खेळत छान मजेत प्रवास चालला होता. पुढच्या एका स्टेशनवर गाडी थांबली आणि सर्वांना चहा घ्यायचा होता म्हणून दोघे जण खाली उतरले. आमच्यातीलच एकीस कॉफी हवी होती. कॉफी काही तिथे मिळाली नाही. पुढच्या एका स्टेशनवर कॉफीचा गाडा दिसल्यावर तिने नवऱ्याला पाठवले. तो कॉफी घेऊन येईपर्यंत परत गाडी हलली. हे पाहून त्याची बायको घाबरून मोठमोठ्याने हाका देऊ लागली,

“अहो, मधे या, मधे या नाहीतर गाडी हलली तर तुम्ही खालीच रहाल बरं का!”

तिचा नवरा कसाबसा आतमधे आला आणि गाडी सुरू झाली. तिच्या हातात कॉफी देत म्हणाला,

“तुझ्यासाठीच गेलो होतो ना. मग कशाला ओरडत होतीस?” 

त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून गंमत वाटून सर्वजण हसू लागले.

रात्री झोपताना एकाचा मुलगा जरा जास्तच गुटगुटीत होता. त्याला वरच्या बर्थ वर झोपण्यासाठी त्याचे आई वडील वर जा असे सांगत होते. माझा मुलगा पटकन चढून झोपलेला पाहून तोही चढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या अति गुटगुटीतपणामुळे तो वर जात नव्हता. खालून त्याचे आई वडील दोघेही त्याला ढकलत होते आणि तो वर चढताना रडत होता. पूर्ण शक्तीनिशी आई वडील त्याला वर ढकलताना मनातून ‘जोर लगाके हैशा।’ असेच जणू काही म्हणत असावेत. हे चित्र पाहून डब्यामधे सगळीकडे हशा पिकला. अशा प्रकारे कसेतरी त्याला वरच्या बर्थवर झोपवून सगळीकडे शांतता झाली. सर्वजण झोपले आणि थोड्यावेळाने हुडहुडी भरल्यासारखा आवाज येऊ लागला. कुठून आवाज येतोय म्हणून सगळेच घाबरले. ज्याला महत्प्रयासाने त्याच्या आई-वडिलांनी वरच्या बर्थ वर झोपायला पाठवले होते तोच मुलगा हुडहुडी भरल्यासारखा आवाज करत होता व आई-वडिलांनी विचारल्यावर म्हणाला,

“मला खूप थंडी वाजत आहे. “

पुन्हा त्याला खाली उतरवायची कसरत करण्यामध्ये अर्धा पाऊण तास त्यांचा गेला.

दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही मस्त गप्पा मारत होतो. पत्ते वगैरे खेळत होतो आणि त्यात दोघांच्या बायका नाहीत हे पाहून आम्ही मनात विचार करू लागलो, “या नेमक्या काय करत असतील?” त्यांच्या डब्यामध्ये पाहायला गेलो तर घरी त्या रोज दुपारच्या वेळेला पांघरून घेऊन झोपतात कशा खालून वरून पांघरून घेऊन झोपलेल्या होत्या. त्यांच्यापैकी एकीचा नवरा डोक्याला हात लावून वैतागाने म्हणाला देखील,

“झोपण्याशिवाय येतंय काय दुसरं!”

आणि सर्वजण हसू लागले. असाच हसत खेळत प्रवास करत रात्री जम्मूला पोहोचलो. जम्मूहून कटऱ्यापर्यंत गाड्या ठरवून तिथे आधीच बुक झालेल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन आराम केला आणि सकाळी सर्वजण तयार होऊन वैष्णोदेवीकडे जाण्यासाठी निघालो.

२८ जणांच्या वेगवेगळ्या विचारांचा कल घेऊन (म्हणजे कोणी घोड्याने जाऊ म्हणत होते, कोणी इलेक्ट्रिक कारने आणि कोणी चालत. ) शेवटी वैष्णोदेवीला चालत जायचे असे ठरले. आम्ही, आमची मुलं लहान असताना एकदा वैष्णोदेवीला चालत गेलो होतो त्यामुळे आम्हाला अनुभव होता. बाकीचे सर्वजण मात्र पहिल्यांदाच वैष्णोदेवीला जात होते. १४ किलोमीटर चालत सर्वजण निघालो.

कुठे थांबत, चालत, जय माता दी! च्या गजरामध्ये संध्याकाळपर्यंत आम्ही वैष्णोदेवीच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. पाय खूप दुखत होते. आमचे हे काळजीने माझा हात हातात घेऊन चालत होते. हे चित्र पाहून बाकीच्यांच्या बायकांनी त्यांच्या नवऱ्याची फिरकी घ्यायला सुरू केली,

“बघा वहिनीला कसे प्रेमाने, काळजीपूर्वक भैय्या घेऊन जात आहेत. नाहीतर तुम्ही हातात काठ्या देऊन आम्हाला चालवत आहात. “

तेवढे थकलेले असूनही सर्वजण हसू लागले. काळंकुट्ट आभाळ भरून आलं होतं आणि क्षणात विजा कडकडून महाभयंकर पाऊस कोसळू लागला. आम्ही एवढे उंच आलो होतो की जणू काही असं वाटत होतं की आभाळच आमच्या हाताला लागलयं.

सर्वांनी वैष्णोदेवीचे मनोभावे दर्शन घेतले. प्रसाद घेऊन बाहेर निघालो. रात्रीचा एक वाजला होता. हॉटेल जवळ जवळ बंद झाले होते पण भूक तर खूप लागली होती म्हणून एका हॉटेलमध्ये सर्वजण गेलो. तिथे फक्त कढी भात होता. आम्ही तो मागवला. एकीच्या मुलाला हाईड अँड सिक हे बिस्कीट खायचे होते. त्याची आई गडबडीने हाईड अँड सिक, हाईड अँड सिक असे म्हणत होती पण तिच्या नवऱ्याला काहीतरी वेगळेच ऐकू येत होते आणि तो चिडून म्हणाला,

“हाड हाड काय करतीयेस. “

शेवटी त्यांना शब्दाचा खुलासा झाला तेव्हा त्याने कपाळावर हात मारत मुलाला बिस्कीट आणून दिले. आम्ही सर्वजण जेऊन उठलो तर एकाच्या बायकोने मला विचारले,

“भातात कसले तरी गोळे गोळे होते ते आम्ही सगळे बाहेर काढून ठेवले. “

मी ती भजी होती असे सांगितल्यावर परत हळहळलेल्या चेहऱ्याने ती त्या भज्यांकडे बघत म्हणाली,

“अरे देवा, खाल्ली असती तर बरं झालं असतं!”

तिच्या चेहऱ्याकडे पाहून सर्वजणी मोठमोठ्याने हसू लागल्या. आता खरा प्रश्न होता तो परत खाली उतरून जाण्याचा. येताना जेवढे उत्साहात सर्वजण होते तेवढेच आता मात्र सर्वांचे पाय खूप दुखत होते. आमच्यापैकी १८ जण खाली उतरायला घोडे मिळतात का? म्हणून भैरवगडाच्या मार्गावर पाहायला, घोडे मिळतात तिकडे वर चढून गेले. आणि आम्ही तीन कुटुंब म्हणजे १२ जण खाली उतरायचा मार्ग धरला आणि पायी चालतच निघालो.

चढताना जितका त्रास झाला त्यापेक्षा उतरताना जरा कमीच होत होता. पण जे घोड्याकडे गेले होते त्यांचा एक तर पहिलाच अनुभव होता जाताना पाय खूप दुखत होते. वर चढून येताना घोड्याच्या पाठीवर ओझं असतं त्यामुळे ते सावकाश चढतात. रात्रीच्या दोन वाजता रस्ता रिकामा, अंधार आणि उतार त्यामुळे घोडे धडधडत खाली येतात याची कल्पना कोणालाच नव्हती. कसेबसे त्यांनी घोडे ठरवले. त्यातल्या एकाला जास्ती वजन आणि उंचीमुळे कोणीच घोड्यावर बसू देईना. तो बिचारा घाबरून गेला, आता खाली कसे जायचे म्हणून. शेवटी एक उंचा पुरा घोडा त्यालाही मिळाला आणि कसेबसे सर्वजण खाली जायला निघाले. आम्ही रात्री अडीच तीनला निघालेलो सकाळी सातच्या आसपास खाली पोहोचलो. घोड्यावरून आलेली मंडळी मात्र पहाटेच खाली आली होती.

— क्रमशः भाग पहिला

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ थ्रिल… भाग-२ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ थ्रिल… भाग-२ ☆ श्री दीपक तांबोळी

(एक गोष्ट लक्षात ठेव तिथंही तुला दारु, सिगरेट पिता येणार नाही. गुटखा खाता येणार नाही. मुलींसमोर तुझी इमेज खराब करु नकोस”

“तुमची शपथ दादा. मी हातही लावणार नाही”) – इथून पुढे — 

पुढच्या महिन्यात सुऱ्या अष्टविनायक यात्रेला गेला. त्याअगोदर मी या सायकल सफरीची बातमी आणि सहभागी तरुणांचे फोटो वर्तमानपत्रात दिले होते. आपलं नांव आणि फोटो पेपरमध्ये पाहून सुऱ्याला आनंदाचं उधाण आलं. आपल्या सगळ्या टपोरी मित्रांना ते तो दाखवत सुटला.

अष्टविनायक सफर करुन परत आल्यावर सुऱ्या मला भेटायला आला. जाम खुष होता. किती सांगू किती नाही असं त्याला झालं होतं. सुसंस्कृत मुलामुलींमध्ये राहिल्यामुळे त्याच्या वागणूकीत प्रचंड फरक पडला होता. बोलण्यात, वागण्यात सभ्यपणा आला होता.

” दादा आता यापुढे काय करायचं?”उत्साहाने त्याने विचारलं.

” यापेक्षाही चांगलं थ्रिल तुला पाहिजे असेल तर तुला हिमालयात ट्रेकिंगला जावं लागेल”

” ट्रेकिंग?काय असतं हे?”

मी त्याला सविस्तर सांगितलं. राँक क्लायंबिंग आणि रँपलिंगचीही माहिती दिली. तो रोमांचित झाला

“पण याकरीता खुप पैसा लागतो. त्याच्यासाठी तुला काम करुन तो जमवावा लागेल”

“सांगा दादा. मी काहीही काम करायला तयार आहे”

” माझे एक वकील मित्र आहेत. त्यांना आँफिसकामासाठी एका मुलाची गरज आहे. तू जाशील?पाच हजार देतील ते”

” जाईन दादा. असाही टपोरीगिरी करण्यापेक्षा पैसे कमवले तर घरचेही खुष रहातील”

” हो पण तिथे गेल्यावर असं तोंडात गुटखा ठेवून काम नाही करता येणार. नाहितर ते वकीलसाहेब पहिल्याच दिवशी तुला हाकलून देतील”

” नाही दादा. ड्युटी संपल्यावरच मी गुटखा खाईन “

सुऱ्या देशमुख वकीलांकडे जायला लागला. देशमुख वकील खुप हुशार, इमानदार पण कडक स्वभावाचे होते. सुऱ्याचं आयुष्यच तिथे बदलणार होतं.

५-६ महिने काम करुन पैसे जमवल्यावर मी सुऱ्याला ट्रेकिंगला हिमालयात पाठवलं. तिथलं साहस, निसर्गसौंदर्य पाहून तो वेगळी द्रुष्टी घेऊनच परत आला. आयुष्यातलं खरं थ्रिल पाहून तो दारु, सिगारेटमधलं थ्रिलं विसरला. आमची भेट झाल्यावर तो मला म्हणाला.

” प्रशांतदादा आयुष्यात काहीतरी असंच वेगळं करत रहावं असं वाटतंय पण काही सुचत नाहीये”

“सुऱ्या अरे तू रोज देशमुख वकीलांकडे जातो. निरपराधी लोकांना गुन्ह्यातून सोडवणं, न्याय मिळवून देणं आणि अपराधी लोकांना सजा देणं हे काम ते नेहमीच करत असतात. त्यात तुला थ्रिल वाटत नाही का?”

त्याचा चेहरा उजळला

” हो वाटतं ना!पण माझा त्याच्याशी काय संबंध?”

“सुऱ्या अरे तू वकील झालास तर हे थ्रिल तुला अनुभवता येईल”

त्याचा चेहरा गोंधळलेला आणि केविलवाणा दिसू लागला.

“दादा मी आणि वकील… ?”

“हो सुऱ्या. तू मनावर घेतलं तर तेही होईल. पण त्याअगोदर तुला बारावी पास व्हावं लागेल”

“बघतो दादा. विचार करतो”

गोंधळलेल्या अवस्थेतच तो गेला. बारावीच्या परीक्षा जवळच होत्या. मी त्याला फाँर्म भरायला लावला. त्याने परीक्षा मात्र मनापासून दिली. निकाल लागला. आश्चर्य म्हणजे सुऱ्या चांगल्या मार्कांनी पास झाला. तोही काँप्या न करता. सुऱ्याच काय त्याच्या कुटुंबातले सर्वच जण आनंदले. सुऱ्याला मी लाँ काँलेजला प्रवेश घेऊन दिला. सुऱ्या देशमुख वकीलांकडे काम करता करता काँलेजातही जाऊ लागला.

या घटनेला पाच वर्ष होऊन गेली. मी माझ्या विश्वात रमलो. दरम्यान माझंही लग्न झालं. दीड वर्षात मुलगीही झाली. सुऱ्याची आणि माझी भेट आता क्वचितच होत होती. अर्थात देशमुख वकीलांकडून मला सुऱ्या चांगलं काम करत असल्याचं कळत होतंच. अधूनमधून मधूकाकाही येऊन सुऱ्याची ख्यालीखुषाली कळवत होते. पोरगा चांगल्या लाईनला लागला म्हणायचे. त्याचं गुटखा खाणं आणि दारु पिणं बंद झाल्याचं ते आनंदाने सांगायचे. एका बापाला मुलाकडून अजून काय हवं असतं?

एक दिवस संध्याकाळी मोबाईल वाजला. सुऱ्या बोलत होता.

“प्रशांतदादा घरी आहात का?येऊ का भेटायला?”

“का रे काही प्राँब्लेम?”

“दादा गुड न्युज आहे. मी वकील झालो. मला सनद मिळाली. “

“वा वा सुऱ्या काँग्रँट्स्!ये लवकर मी वाट पहातोय”

तो वकील झाल्याचा मलाच खुप आनंद झाला. माझ्या नजरेसमोर तो गुटखा खाणारा, मुलींची छेड काढणारा आणि लगेच वकीलाचा काळा कोट घातलेला सुऱ्या तरळला आणि माझे डोळे आनंदाने भरुन आले.

 संध्याकाळी मधूकाकांसोबत तो आला. आल्याआल्या माझे पाय त्याने धरले. मी त्याला उचलून जवळ घेतलं तर ढसाढसा रडायला लागला.

“दादा तुमच्यामुळे हे सगळं होऊ शकलं. तुम्ही दिशा दाखवली नसती तर आजही मी तसाच टपोरी राहीलो असतो. “

“अरे मी काहीच केलं नाही सुऱ्या! मी फक्त तुला आयुष्यातलं खरं थ्रिल काय असतं ते दाखवून दिलं. तू मनाने चांगला होताच फक्त संगतीने बिघडला होतास. तू मेहनत घेतली, कष्ट करुन शिकलास. बघ त्याचे किती चांगले परिणाम झाले. “

“खरंय दादा”

त्याने डोळे पुसत पुसत मला पेढा दिला.

“आता सुऱ्या मला तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे. तुझ्यासारखे अनेक तरुण, त्यात तुझे काही मित्रही असतील, व्यसनांना थ्रिल समजुन वाया जाताहेत. त्यांना योग्य मार्गावर आणायचं काम तुला करायचं आहे. सुऱ्याने माझ्याकडे विश्वासाने पाहिलं आणि म्हणाला

“नक्की दादा. आजपासूनच त्याची सुरुवात करतो”

तो गेला आणि अशा बिघडलेल्या मुलांना सुधारण्यातही एक वेगळंच थ्रिल असतं याची जाणीव मला झाली.

– समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ थ्रिल… भाग-१ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ थ्रिल… भाग-१ ☆ श्री दीपक तांबोळी

काँलेजमधून घरी येतांना कोपऱ्यावरच्या पानटपरीवरुन मी वळलो तेव्हा सुऱ्या मला तिथे उभा असलेला दिसला. फकाफका सिगारेट पित होता. मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे गेलो. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं

“काय सुऱ्या कसं काय चाललंय?”

मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं तसा सुरेश उर्फ सुऱ्या एकदम गडबडला. हातातली सिगारेट त्याने पाठीमागे लपवली. मला त्याच्याकडे बघून एकदम गंमत वाटली. टाईट जिन्सची फाटलेली पँट, इन केलेला लालभडक शर्ट, डोळ्यावर काळा सडकछाप गाँगल. टपोरी व्याख्येला एकदम साजेसा होता त्याचा अवतार.

“नको लपवू सिगारेट. मी पाहिलंय तुला पितांना” 

त्याने हातातली सिगारेट दूर फेकून दिली आणि माझ्याकडे ओशाळवाणं हसून म्हणाला.

“साँरी प्रशांतदादा. प्लिज घरी सांगू नका ना”

” नाही सांगणार” 

मी असं म्हंटल्यावर तो कसंनुसं हसला. पण मग त्याने खिशातून विमल गुटख्याची पुडी काढली आणि फाडून तोंडात पुर्ण रिकामी केली.

“अरे काय हे सुऱ्या?सिगरेट झाली, आता गुटखा?कशाला करतो हे सगळं? मधूकाकांना कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना!”

” थ्रिल!थ्रिल असतं त्यात दादा. तुम्हांला नाही कळणार त्यातलं!”

“हे असलं थ्रिल काय कामाचं?शरीराची नासाडी करणारं. तुला असली थ्रिल अनुभवायचंय?”

” असली थ्रिल??ते काय असतं?दारु पिणं तर नाही ना?ते असेल तर आपल्याला माहितेय!सगळ्या प्रकारची दारु प्यायलोय दादा आपण. गांजा, अफू सगळं झालंय आपलं “

तो ज्या अभिमानाने सांगत होता ते पाहून मला धक्काच बसला. मधूकाका खरंच म्हणत होते पोरगं वाया गेलंय.

“नाही त्यापेक्षा वेगळं आहे. तू शनिवारी संध्याकाळी मला घरी येऊन भेट मी सांगेन तुला”

” बरं दादा तुम्ही म्हणता तर येतो”

मी निघालो पण घरी येईपर्यंत सुऱ्याचेच विचार डोक्यात होते. सुऱ्याचे वडिल ज्यांना आम्ही मधूकाका म्हणायचो, माझ्या वडिलांच्या आँफिसमध्ये शिपाई होते. वडिलांची आणि त्यांची चांगली घसट. सुऱ्या त्यांचा धाकटा आणि लाडाचा मुलगा. इनमीन अठरा वर्षाचा. अति लाड आणि वाईट संगतीमुळे तो बिघडला. काँप्या करुन  दहावीत कसाबसा पास झाला पण बारावीत त्याची गाडी अडकली. आँक्टोबरमध्येही नापास झाल्याने त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडालं. दिवसभर पानाच्या टपऱ्यावर सिगारेट पित, गुटखे खात, येणाऱ्या जाणाऱ्या पोरींची छेड काढण्यात त्याचा दिवस पार पडायचा. त्याला समजावण्याचे सगळे प्रयत्न त्याने हाणून पाडले होते. कुणी व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत त्याला समजावलं की तो एका कानाने शांततेने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. या व्यसनांना पैसा हवा म्हणून तो स्वतःच्या घरातही चोऱ्या करायचा असं ऐकण्यात आलं होतं.

दोनतीन दिवस सुऱ्याला काय थ्रिल असलेलं काम सांगावं या विचारात असतांनाच एकदिवस मधूकाका घरी आले. सुऱ्याने एका पोरीवरुन कुठंतरी माऱ्यामाऱ्या केल्या होत्या. पोलिसांनी त्याला पकडून नेलं होतं. “तुमच्या पोलिसखात्यात खुप ओळखी आहेत साहेब. प्लिज सुऱ्याला सोडवा ना ” अशी ते वडिलांना विनवणी करत होते. सुऱ्याच्या या नेहमीच्याच भानगडी होत्या म्हणून वडिल नाही म्हणत होते. मग मीही वडिलांना आग्रह धरला. सुऱ्याची चांगल्या वर्तणूकीची ग्वाही दिली. शेवटी वडिलांनी सुऱ्याला सोडवून आणलं.

शनिवारी सुऱ्या मला भेटायला आला.

“काय दादा कसलं थ्रिल सांगणार होते तुम्ही मला?”

” तुझ्याकडे सायकल आहे ना?तिच्यात हवा भर, आँईलिंग कर. उद्या आपल्याला अजिंठ्याला जायचंय सायकलने”

तो एकदम चमकला

” काय?सायकलने?आणि अजिंठ्याला?काय चेष्टा करता दादा?आजकाल कुणी सायकल चालवतं का?आणि तेही इतक्या दूर?त्यापेक्षा बाईकने जाऊ ना”

” काय सुऱ्या कसा रे तू इतका लेचापेचा?बाईकने जाण्यात कसलं आलं थ्रिल?तसं तर कुणीही जाऊ शकतं. आणि तुझ्यापेक्षा आमच्या काँलेजच्या मुली चांगल्या! पाच मुली आणि पाच मुलंही येणार आहेत आपल्या सोबत” 

ही मात्रा बरोबर लागू पडली. मुली आपल्यापेक्षा वरचढ आहेत हे सुऱ्याला कदापिही सहन होणार नव्हतं.

“बरं येतो मी. पण मला जमेल का दादा?”

तो जरा अनिच्छेनेच म्हणाला.

“मुलींना जमू शकतं तर तुला का नाही जमणार?”

तो तोंड वाकडं करुनच गेला.

रविवारी पहाटेच आम्ही निघालो. सुऱ्याच्या पँटचे खिसे सिगारेट्स आणि गुटख्याच्या पुड्यांनी भरलेले खिसे माझ्या लक्षात आले. मी त्या मुलामुलींना सुऱ्याबद्दलची सर्व कल्पना देऊन ठेवली होती. प्रत्यक्षात मी सुऱ्याची ओळख सामाजिक कार्यकर्ता अशी करुन दिली. सुऱ्या खुष झाला. खरं तर माझ्यासोबतची मुलं सायकलिंग एक्सपर्ट होती. त्यांच्या सायकलीही वजनाने हलक्या आणि चांगल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या वेगाने चालवणं सुऱ्याला जड जाऊ लागलं. तो मागे पडू लागला की मी त्याला हळूच म्हणायचो “बघ तू सिगरेट पितोस ना त्याचे परिणाम आहेत हे “त्याला ते पटायचं. त्याचबरोबर ” मुलींसमोर गुटखा खाऊ नको त्या तुझा तिरस्कार करतील. पुन्हा कधी ट्रिपला तुझ्यासोबत येणार नाहीत “असं सांगून मी त्याला गुटख्यापासून लांब ठेवत होतो.

रात्री आम्ही परतलो तेव्हा सुऱ्या जाम थकून गेला होता. आधी ठरवून दिल्याप्रमाणे सगळ्या मुलामुलींनी “साधी सायकल असूनही तू खुप चांगली सायकल चालवली. काय स्टँमिना आहे यार  तुझा!” असं म्हंटल्यावर सुऱ्या चांगलाच खुष झाला. सगळे गेल्यावर मला म्हणाला

“मजा आली दादा. काहीतरी वेगळंच थ्रिल होतं यात. पुन्हा काही असं असेल तर जरुर सांगा”

” अरे हीच मुलं पुढच्या महिन्यात अष्टविनायक यात्रेला जाताहेत सायकलने. जायचं का तुला?”

” दादा जायची तर खुप इच्छा आहे पण खुप खर्च येईल ना!”

” काही नाही फक्त ४-५ हजार रुपये. तू जमव काही. उरलेले मी देईन तुला”

“धन्यवाद दादा”

” ते सोड. एक गोष्ट लक्षात ठेव तिथंही तुला दारु, सिगरेट पिता येणार नाही. गुटखा खाता येणार नाही. मुलींसमोर तुझी इमेज खराब करु नकोस”

“तुमची शपथ दादा. मी हातही लावणार नाही”

 – क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘प्रश्न ???’ – ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘प्रश्न ???’ – ☆ श्री आनंदहरी 

ती अंथरुणावर खिळून होती त्याला चार-पाच महिन्याचा कालावधी लोटला होता. निमित्त झाले होते ते पाय घसरून पडण्याचे.. साठी ओलांडल्यावर सावधपणे वावरावे लागते हे तिलाही ठाऊक होतं. ती तशी वावरतही होती. तरीही पाय घसरून पडली आणि सक्तीची कंटाळवाणी विश्रांती घ्यावी लागली..

असे खिळून, बसून राहणे तिच्या स्वभावातच नव्हतं…पण आताशा तिला उठावं, काही करावं अशी इच्छाच राहिली नव्हती. तशी ती एकटीच राहत होती. मुलं मुलांच्या जागी, मुलगी तिच्या घरी होती. ती घरात एकटी होती पण तरीही कामाच्या रामरगाड्यात दिवस निघून जायचा. सायंकाळच्या वेळी प्रपंचातून निवृत्त झालेल्या गल्लीतील दोन -तीन सासवा पाय मोकळं करायला म्हणून आपापल्या घरातून बाहेर पडायच्या त्या तिच्या दारातल्या कट्ट्यावर येऊन विसावायच्या.. ती ही दारात कट्ट्यावर येऊन त्यांच्या सोबत विसावायची.. पाय मोकळे होताना मनंही मोकळी होऊन जायची. ती एक श्रोता म्हणूनच त्यात असायची. तिला कधी मोकळं व्हावंसं वाटलेच नाही. भरभरून बोलावे, मन मोकळे करावे हा तिचा स्वभावच नव्हता. काय बोलायचे आणि का बोलायचे ? वर्तमानकाळात काही बोलण्यासारखं नव्हतं आणि भूतकाळ ? भूतकाळातले बोलून काही उपयोग नव्हता.

उपयोग नव्हता म्हणजे खरंच काही उपयोग नव्हता. एकतर कितीही बोलले, सांगितले, कुणी ऐकले तरी भूतकाळ काही परतून येत नाही.. त्यामुळे बदलता येत नाही. आणि दुसरे म्हणजे ‘परदुःख शीतल’ न्यायाने तिची वेदना, तिची सल कुणाला उमजतच नाही.. तिला पडलेला प्रश्न हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे असे पूर्वीही कुणाला, अगदी तिच्या आई-वडिलांनाही वाटलं नव्हतं.. मग इतरांना वाटण्याचा प्रश्नच उरत नव्हता.

“ काय वाईट आहे गं.. राहायला घर आहे, नोकरी आहे, पोटापुरती शेती आहे.. तू अशी सावळी तरीही गोरागोमटा, शिकलेला, राजबिंडा नवरा तुला मिळालाय.. बाईच्या जातीला आणखी काय हवं असते गं.. ? “

तिची आई तिचे लग्न ठरवताना आणि नंतरही कितीतरी दिवस हेच म्हणत होती.. नंतर त्यात एक दोन वाक्याची भर पडत गेली होती. तिच्या वडिलांनी तर केव्हापासून कान झाकून घेतले होते. त्यांनी ते उघडलेच नाहीत. तिला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यायचे सोडाच पण साधे ऐकून घ्यायची तसदी कुणी घेतली नव्हती.. लग्नाचे ठरवण्याआधीपासून तिच्या बाबांनी जमदग्नीचा अवतार धारण केला होता.. त्यांच्यासमोर बोलण्याची कुणाची प्राज्ञा नव्हती.. कुणाचे धाडस होत नव्हतं.. त्यांच्याजवळ नसले तरी एकदा ती आईजवळ म्हणाली होती..

“ पण आई, मला खूप शिकायचंय…” 

“ शिकायचंय.. शिकायचंय काय चाललंय गं तुझे.. शिकून तरी काय करणार आहेस ? आणि तुझं भलं बुरं आम्हांला कळत नाही ? आम्ही काय वैरी आहोत का तुझे ? … आणि हे बघ यांच्यासमोर एक शब्दही काढू नकोस यातला.. शिक्षणाचे नाव ही काढू नकोस.. आम्ही चार दिवस जगावं वाटत असलं तर गप्प बस.. ”

“ पण आई.. “

“ तुला गप्प बस म्हणून सांगितले ना एकदा.. “

चिडून आई म्हणाली.. ती गप्प झाली. ओठ घट्ट मिटून घेतले. पण मन ? मन तर स्वतःशी बोलतच होते.. या मनाचे ओठ कसे घट्ट मिटून घ्यायचे.. ? मनात विचारांचे वादळ थैमान घालत होते.. एखादे मरणासन्न जनावर दिसल्यावर त्याच्या मरणाची आणि त्याच्यावर झडप घालण्याची वाट बघत गिधाडे जशी आकाशात घिरट्या घालत राहतात तसा तिच्या मनात एकच प्रश्न घिरट्या घालत होता.. तिच्यावर झडप घालून चोच मारत होता.. तेंव्हापासून.. आयुष्यभर.

काळ पुढं सरकत राहिला.. मुलगा झाला..

आई म्हणाली,

“ भाग्यवान आहेस, घराण्याला कुलदीपक मिळाला.. जन्माचं सार्थक झालं. बाईच्या जातीला आणखी काय हवं असते गं ? “

आईच्या मुखातून बोलल्यासारखे शेजारी-पाजारी, नातेवाईक ही तसंच काहीतरी म्हणाले.

पुढे मुलगी झाली. आई म्हणाली,

“ घरात लक्ष्मी आली.. बाईच्या जातीला आणखी काय हवं असतं गं.. ? “

जगाच्या दृष्टीनं सारं सुरळीत चालू असलं तरी ते तसं असतंच असं नाही. ‘दुरून डोंगर साजरे’ असं म्हणतात तसाच प्रकार असतो तो. तिची सारी स्वप्नं काचेसारखी तडकून, विखरून गेलेली, त्यांचा चुराडा झालेला.. जीवन म्हणजे स्वप्नांच्या चुराड्यावरची बोचरी शय्या. ती बोच दुसऱ्या कुणाला जाणवत नव्हती, दिसत नव्हती पण म्हणून तिला, तिच्या मनाला रक्तबंबाळ करत नव्हती असं नव्हतं.

नवऱ्याला बऱ्यापैकी नोकरी होती. पण त्याच्या मनमानी, लहरी स्वभावामुळे तीही टिकली नव्हती. अतिशय स्वयंकेंद्रीत वृत्ती, बेजबाबदारपणामुळे त्याच्यावर कोणत्याच गोष्टीसाठी विसंबून राहण्यात, अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही हे तिला लग्नानंतर काही दिवसातच उमगलं होतं.

“ मला पुढं शिकावं वाटतंय.. मी शिकू का ? “ 

तिनं भीतभीतच नवऱ्याला विचारलं.

“ कशाला ? गप्प घरात बसायचं.. माझ्यासमोर नखरे करायचे नाहीत.. स्वतःचं डोकं चालवायचं नाही.. एकदाच सांगतोय.. पुन्हा सांगणार नाही…समजलं का ? “

ती गप्प झाली. ‘पुढं शिकू का ? ‘ विचारलं त्यात नखरा काय होता ? ‘ हा मनात आलेला प्रश्न मनातच राहिला. असे कितीतरी प्रश्न मनातच राहिले होते. काही मनातून ओठांपर्यंत यायचे पण ओठांच्या दारातून बाहेर यायचे नाहीत.. दाराशी थबकायचे, दाराआडून बाहेर पहायचे.. पण बाहेर पडावे असे वातावरणच बाहेर नसायचे मग ते परत मनात जाऊन खळबळ माजवत बसायचे.. तिच्याबरोबर त्यांचीही चिडचिड व्हायची पण ती ही आतल्या आत..

“ असे पूर्वी नव्हतं नाही.. ” 

एखादा प्रश्न तिला म्हणायचा.

‘ हूँ ! ‘ ती स्वतःशीच बोलल्यासारखी हुंकारायची. मग त्याच त्या एका अनुत्तरीय प्रश्नाचा सर्प तिच्या मनाला वेटाळून बसायचा. तिचं मन मात्र भूतकाळात गेलेलं असायचं.

“बाबा, मलाही ताईसारखी सायकल पाहिजे. “

ताई माध्यमिक शाळेत जायला लागल्यावर बाबांनी तिच्यासाठी सायकल आणली तेंव्हा ती बाबांना म्हणाली होती..

ताईची शाळा दूर आहे की नाही.. म्हणून तिला आणलीय सायकल.. तुझी शाळा तर घराजवळच आहे. तू त्या शाळेत जायला लागलीस की तुलाही आणूया नवी सायकल..”

बाबांनी मायेने तिची समजूत घातली. तिला ते पटलंही होतं. ताईची माध्यमिक शाळा गावाच्या दुसऱ्या टोकाला, तेही गावापासून काहीशी दूर माळावर होती. तिची शाळा तर अगदी घराजवळ होती..

सातवीची परीक्षा झाली.. आता आठवीला ती ही ताईबरोबर सायकलवरून जाणार होती. ती खुशीत होती.. ‘ आता सुट्टी संपून शाळा सुरू झाली की बाबांना सायकल आणायची आठवण करून द्यायची.. ’ असं तिने मनोमन ठरवूनही टाकले होते… परीक्षा संपून दोनच दिवस झाले होते. हातात कागद, पेन घेऊन सुट्टीत काय काय करायचं… याचा ती विचार करत, कागदावर यादी करत बसली होती. बाबा आले की ती यादी ती बाबांना दाखवणार होती. बाबा आले तेच तिच्यासाठी नवी सायकल घेऊन.. बाबांनी सुट्टी लागताच आठवणीने आपल्यासाठी नवी कोरी सायकल आणली.. त्यांना आठवण ही करून द्यावी लागली नाही.. याचा तिला खूप आनंद झाला होता. तिने पळत बाहेर जाऊन आधी बाबांना मिठीच मारली होती. बाबांनी तिच्या केसांवरून मायेने हात फिरवत विचारले,

“आवडली का सायकल.. ?“

“ हो.. ! “ 

“ पण पिलू आधी बघ तरी सायकल…” 

बाबा हसत म्हणाले तसं ती सायकलकडे धावली.

“ दोन दिवसांनी ताईची परीक्षा झाली की दोघीही सकाळी लवकर उठून सायकलिंगला जायचं, बरं का ? “

अगदी बारकाईने सायकल पाहता पाहता तिने ‘ हो ‘ म्हणलं होतं.

ती आणि ताई दोघीही सोबतच सायकलवरून शाळेत जात-येत होत्या. ताईचं बारावीचं वर्ष आणि तिचं दहावीचं वर्ष असल्यामुळे शाळेत जादा तास असायचे.. त्यामुळे ती आणि ताई बरोबरच शाळेत जायच्या, कधी कधी शाळा सुटल्यावर ताईचा जादा तास असायचा, त्यावेळी ती ताईसाठी थांबायची. ताईची बारावी झाली.. तिचा दहावीचा निकाल लागला.. तिची अकरावीची शाळा सुरू झाली होती. ती एकटीचं सायकलवरून जाऊ लागली होती.

एकेदिवशी ती घरी आली तर घरातील वातावरण एकदम गंभीर झाले होते. ताई सकाळीच मैत्रिणीकडे जाते म्हणून आईला सांगून बाहेर पडली होती पण अजूनही परतली नव्हती.. आईने मैत्रिणीकडे चौकशी केली तर ताई मैत्रिणीकडे गेलीच नव्हती.

आईने बाबांना बोलावून घेतलं होतं.. ताईचा शोध चालू होता. ताईच्या सगळ्या वर्गमैत्रिणीकडे, इतर मैत्रिणीकडे शोधून झालं होतं. ताई कुठेच नव्हती.. बाबा अस्वस्थ होते, काळजीत होते.. आई रडवेली झाली होती.. तरीही उशिरा का होईना ताई येईल असे वाटत होते..

“ तुला काही बोलली होती का ताई ? “

“ नाही. ”

“ आठवून बघ.. ”

“ काही बोलली असती तर सांगितलं असतं मी.. ” 

ताई कुठेतरी गेलीय, हरवलीय या विचाराने ती आधीच रडवेली झाली होती. ‘ कुठे असेल? कशी असेल? कुणी अपहरण तर केलं नसेल ना ताईचं ? ‘ इतरांसारखेच तिलाही हे प्रश्न पडत होते..

“ रात्रीत नाही आली, नाही सापडली तर सकाळी पोलिसात तक्रार देऊया.. ” 

संध्याकाळी आलेला तिचा मामा म्हणाला होता. सकाळी समजलं, ताई पळून गेलीय. कुणाच्या तरी गाडीवरून जाताना एकाने तिला पाहिले होते.. हे समजताच आधी काळजीत असणाऱ्या बाबांनी एकदम जमदग्नीचा अवतार धारण केला होता.. ते आईवर ओरडले होते. तिच्यावर ओरडले होते.. दोन-चार मुस्काडीत मारून तिला विचारले होते,

“ तू सारखी बरोबर असायचीस.. तुला ठाऊक असणार.. सांग कुणाबरोबर पळून गेलीय ती ? “ 

तिला तर काहीच ठाऊक नव्हतं. आईलाही अंदाज आला नव्हता. ताई पळून गेली होती.. जाताना कपाटातले पैसे, घरातले दागिने घेऊन गेली होती.

बाबा जास्तच चिडचिडे झाले होते. त्यांनी तिची शाळा बंद केली होती. शाळेत जाण्यासाठी ती रडली होती, आर्जवं केली होती. आई सांगत होती, मामाने समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता पण बाबा कुणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. त्यांनी तिची शाळा बंद केलीच, पण घरातून बाहेर पाऊलही ठेवायचे नाही म्हणूनही बजावले.. दोघींच्या सायकलीही विकून टाकल्या.

“ एक तोंड काळं करून गेलीय.. दुसरी जायला नको.. तिचं लग्न करून टाकणार आहे लवकर.. ” 

बाबांनी कुणाचं काहीही ऐकून न घेता आईला निर्णय सांगून टाकला होता.

ती रडत होती, आई-बाबांना विनवत होती… ‘ मला शिकू द्या.. मी ताईसारखी वागणार नाही ’ असं म्हणत होती. आई आधी बाबांना सांगायचा प्रयत्न करत होती पण नंतर बाबांच्या निर्णयाला मूक संमती दिल्यासारखी गप्प झाली. काळाच्या औषधानेही जमदग्नी शांत झाला नव्हता. ‘एकीने घराण्याची अब्रू घालवलीच आहे, उरली सुरली नको जायला ‘ म्हणून पहिल्यांदा जे स्थळ मिळाले तिथे तिचे लग्न अक्षरशः उरकून टाकून ते मोकळे झाले होते. तिची इच्छा, आवड-निवड, तिची स्वप्ने या साऱ्याचा बळी देऊन घराण्याची ‘उरली-सुरली ‘ अब्रू वाचवली होती..

“ आम्ही काय वैरी आहोत का तुझे ? तुझं भलं-बुरं आम्ही पाहणार नाही काय ? काय वाईट आहे गं स्थळात.. एवढं चांगलं स्थळ आहे.. आणखी काय हवं असतं गं बाईच्या जातीला ? “ आईचे निर्वाणीचे शब्द होते..

ती बळी द्यायला घेऊन निघालेल्या शेळीसारखी स्वतःच्या मनाला आणि स्वतःला फरफटत घेऊन पुढे पुढे जात राहिली होती.

मनातला प्रश्न तिने रडत-भेकत, कधी रागात आईला विचारला होता, एकदा नव्हे तर दोन-तीनदा बाबांना विचारला होता.. तिला उत्तर मिळाले नव्हतं.. अनेकदा स्वतःला विचारला पण तिलाही उत्तर मिळाले नव्हतं.. प्रश्न अनुत्तरीतच राहिला..

… आजही आयुष्याच्या या टप्प्यावर, अंथरुणावर खिळून असतानाही तिच्या मनात तोच अनुत्तरीत प्रश्न तिला घेरून राहिला होता.

‘ प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर असेलही कदाचित.. पण माझे काय ? माझा काय गुन्हा होता ? माझी काहीच चूक नसताना, माझी स्वप्नं, आवडी- निवडी या साऱ्यांचा, माझा बळी दिला गेला.. का ? मी कोणताच गुन्हा केला नसतानाही मला ही शिक्षा का ?’ 

… प्रश्नाचा सर्प आयुष्यभर तिला वेटाळून बसला होता.. ज्याचे उत्तर कुणीच दिलं नव्हतं.. आणि तिलाही सापडले नव्हते. त्याच निरुत्तर प्रश्नाचा सर्प तिच्या मनात तेंव्हाही फुत्कारत राहिला होता.. तसाच फुत्कारत बसला होता.. आयुष्यभर !

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares