निसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते.
एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल.
तो काळ आता मागे पडला आहे. मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी इतरही कितीतरी सांकेतिक, पारंपरिक निर्बंधांच्या बेड्यांतून स्वतःला मोकळे करून घेतले आहे, हे या लेखनातून ठळकपणे जाणवते.
त्यांची साहसकथा वाचताना त्या रोमांचक थराराचा अनुभव वाचकांनाही येतोच; पण निसर्ग विज्ञान, इतिहास, भूगोल यांविषयीचे संदर्भ आपले आकलन अधिक समृद्ध करतात. त्यामुळेच हा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता एक प्रेरक, मार्गदर्शक ठेवा ही ठरतो.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन” -लेखिका : सुश्री सुनीला सोवनी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन
लेखिका : सुनीला सोवनी
प्रकाशक : भारतीय विचार साधना
पृष्ठ: ३९८
मूल्य: ३५०₹
हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे संरक्षण करून हिंदू राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी कटिबद्ध होऊन अनेक कार्यकर्ते समाज जीवनाच्या अंगोपांगांमध्ये, बहुविध संस्था, संघटनांमध्ये कार्यरत आहेत. हिंदुत्वाचा हुंकार सर्वदूर जसजसा दुमदुमू लागला. तसतशी अनेक प्रसारमाध्यमे, तथाकथित पुरोगामी संघटना, संस्था, यांनी निरनिराळ्या मुद्द्यांवर हिंदुत्वाच्या विरोधात जोरदार आवई उठवायला सुरुवात केलेली आहे.
विशेषकरून अमेरिकेतील अनेक विद्यापीठातून हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे अत्यंत विकृत व अयोग्य असे चित्र रंगविलेली पुस्तके व प्रकाशने पाहावयास मिळतात. अशी इंग्रजी पुस्तके वाचूनच मते बनवणारा तथाकथित सुशिक्षित वर्ग हिंदू संस्कृतीतील महान परंपरा, श्रेष्ठतम दृष्टीकोन यापासून फार फार दूर राहतो आहे. विशेषतः स्त्रीविषयक हिंदुत्वाचा दृष्टीकोन हा अत्यंत प्रगल्भ व शारीरिक, मानसिक, बौद्धिक इ. चा समतोल विचार करून मांडला गेलेला आहे व ‘आचार परमो धर्मः’ या न्यायाने प्रत्यक्ष व्यवहारात पुरुषाने ‘स्त्री’ संबंधीचा केवळ समान भाव न ठेवता अत्यंत श्रेष्ठ भावच मनात बाळगला पाहिजे अशी शिकवण लहानपणापासूनच तो संस्कार मुलांच्या मनावर बिंबवण्याची व्यवस्था या देशात निर्माण करण्यात आलेली आहे. ‘मातृदेवो भव’ म्हणून प्रातर्वंदनाची सुरुवात करणारा हा धर्म आहे. राष्ट्राकडेदेखील ही आमची मातृभूमी असे रामायणकालापासून येथे शिकविण्याची पद्धत आहे.
नेहमीच्या रूढ संकल्पनांनुसार व विशिष्ट पद्धती म्हणजेच श्रेष्ठ व योग्य पद्धती असा विचार न करता मुक्त चिंतन, विश्लेषणात्मक चिंतन, भारतीय जीवनमूल्ये उद्ध्वस्त करणाऱ्या कारवायांना सडेतोड उत्तर म्हणून लेखन करण्याची गरज होती, अशा अध्ययनातून सौ. सुनीला सोवनी यांनी हे लिखाण केले आहे.
वारंवार खोटी गोष्ट सांगितल्यावर ती खरी वाटते हे ‘गोबेल्स’ प्रणीत तत्त्व अंगीकारून सध्या देशावर जे अमेरिकन संस्कृतीचे प्रचंड आक्रमण चालू आहे. त्यामुळे हिंदू संस्कृती वाईट, जे-जे भारतीय, ते ते मागसलेले, बुरसटलेले-खराब अशी नवशिक्षितांची धारणा होऊ पाहत आहे. स्वतःच्या धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल अशी तिरस्काराची, घृणेची भावना देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी-राष्ट्रोत्थानासाठी फार मोठा अडथळा ठरणार आहे. राष्ट्रोत्थान कार्यातील अडथळा दूर करून आत्मविश्वासाची, आत्मप्रत्ययाची भावना जागविण्याची गरज आहे. त्यासाठी गहन चिंतन, अध्ययन करण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. या गरजपूर्तीसाठीच ‘हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन’ हा शोधनिबंध प्रस्तुत करण्याची आवश्यकता आहे.
अर्थात येथे हे स्पष्ट करायला हवे, की हे चिंतन करीत असताना ते पूर्वग्रहविरहित व्हायचे असेल तर खालील सुभाषित मनात साठवायला हवे…
“पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्यवद्यम् । सन्तः परीक्ष्यान्यतरत् भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः ।।
जे जे पुराणात सांगितलेले आहे, ते सर्व योग्य आहे चांगले आहे. बरोबर आहे असे नव्हे, तसेच एखादे काव्य नवीन आहे म्हणून ते अवध-त्याज्य आहे आहे असेही मानता कामा नये. विधानांची नीट तपासणी करून काय योग्य, काय अयोग्य हे ठरवायला हवे आणि जे विचारी असतात, श्रेष्ठ असतात से विधानांची परीक्षा करूनच त्यांचा स्वीकार करतात, परंतु मूर्ख लोक इतरांचे जे म्हणणे त्यावरच आपले मत बनवतात. हे सुभाषित मनात ठेवून जे जे भारतीय, जे जे जुने, ते ते सर्व चांगले असा समज मनात ठेवून चिंतन करणे योग्य ठरणार नाही व सर्व नवे अयोग्य असेही म्हणून चालणार नाही.
त्याच वेळी ‘जुने जाऊ द्या मरणा लागूनी, ‘जाळूनी’ किंवा ‘फोडूनी’ टाका, ही मानसिक धारणादेखील निःपक्ष चिंतनासाठी उपयोगाची नाही. विशेषकरून प्रचारमाध्यमांच्या द्वारे पश्चिमी संस्कृतीचा प्रभाव अधिकाधिक वाढत असताना समाजात अनेक विकृती निर्माण होऊन समाजस्वास्थ्यच धोक्यात आलेले आहे. अशा वेळी स्वस्थ समाजरचनेसाठी जे योग्य ते स्वीकारार्ह व जे अयोग्य ते त्याज्य अशीच सुस्पष्ट भूमिका घेऊनच चिंतन व्हायला हवे. सुदैवाने ‘हिंदुत्व’ हे सुरुवातीच्या कालखंडापासून आजतागायत अशी सुस्पष्ट भूमिका घेणारे असल्यामुळे ‘हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन’ शक्य आहे आणि आवश्यक आहे. कारण आपण कधीच असे म्हटलेले नाही की जे जे पाश्चिमात्य ते ते वाईट. उलट ऋग्वेदातील ऋचा असे सांगते की ‘आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः’ विश्वातून सर्व बाजूंनी चांगले, शुभ म्हणजेच जे जे भद्र आहे ते ते विचार इ. आमच्याकडे येवोत. त्यामुळे बाह्य गोष्टींचा डोळसपणे स्वीकार करताना हिंदूंना काहीच अडचण वाटणार नाही. हिंदू विचारवंत व ख्रिश्चन संत यांच्या कोणत्याही विषयाकडे पाहण्याच्या मनोधारणा कशा आहेत हे केवळ दोन उदाहरणांवरून स्पष्ट होऊ शकते. आद्य शंकराचार्य म्हणतात ‘शीतो अत्रिन अप्रकाशो वा इति ब्रुवन, श्रुतिशतमपि न प्रामाण्यम् ब्रुवंति ।।’ अग्नी हा थंड अप्रकाशी असतो असे सर्व श्रुती, वेद जर शंभर वेळ सांगतील तर ते केवळ वेदात, श्रुतीत सांगतात म्हणून आम्ही खरे मानणार नाही. कारण प्रत्यक्ष प्रमाण जर अनुभूती देणारे आहे की अग्नी शीत नसून दाहक आहे, प्रकाशमान आहे तर आम्ही श्रुतींवर मुळीच विश्वास ठेवणार नाही. वेदप्रामाण्य मानणाऱ्या शंकराचार्याची ही वैचारिक बैठक हिंदू चिंतन आहे. उलट ख्रिश्चन संत मदर तेरेसा यांना विचारण्यात आले की बायबलमध्ये पृथ्वी सपाट आहे असे म्हटलेले आहे व पृथ्वी गोल आहे हे जगभर फिरणाऱ्या आपणा सर्वांना प्रत्यक्ष माहीत आहे तर तुम्ही काय म्हणाल? तर त्याचे उत्तर, ‘माझा बायबलवर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण श्रद्धा आहे, बायबल चूक असे मी कधीच म्हणणार नाही.’ हिंदू व ख्रिश्चन वैचारिक बैठक इतकी भिन्न आहे हे लक्षात ठेवावेच लागते.
या पार्श्वभूमीवर आज जे स्त्रीविषयक साहित्यांमधून विचार मंथन होत आहे त्यावर प्रकाश टाकण्याची गरजच काय? जे काही होते आहे ते मुक्त आहे, अनिर्बंध आहे, असेना का? असा विचार स्वाभाविक वाटेल. परंतु राष्ट्रपुनर्निर्माणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या समाज घटकांच्या वैचारिक बैठकीसाठी काही सुस्पष्ट विचारसूत्र असण्याची गरज स्त्री संघटनेमध्ये प्रत्यक्ष काम करीत असताना भासत होती.
स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या ज्या राजकीय, सामाजिक सुधारणांच्या चळवळी झाल्या, त्यामध्ये हिंदूंच्या पारंपरिक स्वत्वाबद्दलच्या श्रद्धेचा पाया होता. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात त्यातही अलीकडील वीस-पंचवीस वर्षात भारतातील सांस्कृतिक मूल्ये, धर्मसंकल्पना व राष्ट्रीय स्वत्व या सगळ्यालाच जोरदार धक्के बसत आहेत. स्त्रीविश्वाला अपरिहार्यपणे या धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना मी कोण आहे? माझ्या जीवनाचे प्रयोजन काय आहे? माझा जीवन उद्देश काय असावा? याची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात आजची स्त्री पडताना दिसत नाही.
जागतिकीकरणाच्या वातावरणात पश्चिमी विचार आचारांचा प्रभाव देशातील स्त्रीजीवनावर अधिकाधिक वाढत आहे. आमची श्रद्धास्थाने, जीवनमूल्ये, नष्टभ्रष्ट होत आहेत याची जाणीव होते. चकचकीत फॅशन शो किंवा तत्सम बाजारूपणाला प्रसिद्धिमाध्यमांकडून जी प्रसिद्धी दिली जाते, त्यावरून हिंदू जीवनमूल्यांवरील असे आघात हे राष्ट्रोत्थानास बाधक ठरतील. या जाणिवेतून हा शोधप्रबंध साकारण्यात आलेला आहे. परंतु तो तसा तयार करीत असताना हा प्रबंध आजकालच्या डॉक्टरेटसाठी केलेला, विशिष्ट चौकटीत बसणारा न करता वेळोवेळी भाषणांमध्ये, लेखनांमध्ये मांडलेल्या विचारांचे संकलन या स्वरूपात केलेला आहे.
अनेक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विचारांची मांडणी करण्यास एकत्रित, संकलित असे अनेक ‘स्त्रीविषयक’ संदर्भ या ग्रंथाद्वारे उपलब्ध होतील असा प्रकाशक (भारतीय विचार साधना) यांना विश्वास वाटतो.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “देव का नाही?” – लेखक : आर्मीन नवाबी – डॉ. शरद अभ्यंकर ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆
पुस्तक : देव का नाही?
लेखक : आर्मीन नवाबी
अनुवादक : डॉ. शरद अभ्यंकर
प्रकाशक : लोकायत प्रकाशन, सातारा
डार्विनच्या सिद्धांतानुसार माणूस उत्क्रांत होत असताना आदिमानवाच्या काळापर्यंत तरी त्याच्या मनात देवाची संकल्पना निर्माण झालेली नव्हती. त्यानंतर तो जेव्हा टोळ्याटोळ्या करून राहू लागला आणि निसर्गातील अगम्य घटनांचा अर्थ काढायचा प्रयत्न करू लागला, त्यावेळेस त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली आणि त्या भीतीपोटी त्याने आपला कोणीतरी एक रक्षणकर्ता आकाशात बसलेला असे समजून देवाची निर्मिती केली. पण खरंच देव आहे की नाही, याचे खात्रीशीर उत्तर मात्र आजपर्यंत माणसाला मिळालेले नाही. सर्वसाधारण माणूस भीतीच्या छायेखाली जगत असल्यामुळे त्याला सतत देवाची गरज लागते. पण देव नाकारणारे त्यांच्या भीतीला आणखीन गडद करत असतात. त्यांना आपल्या श्रद्धेची मुळे उखडल्यासारखी वाटतात. म्हणून ते नास्तिकांना दुर्जन समजायला लागतात आणि मूळ प्रश्नापासून पळ काढतात. या सगळ्या विचाराचा परामर्श घेणारे ’देव का नाही? ’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय झालेले आहे. त्यात आपली भूमिका स्पष्ट करताना लेखक म्हणतात…
संघटित धर्माने पुरस्कृत केलेल्या हत्या आणि हिंसा यांचा सामना करताना श्रद्धावान मंडळी लगेच दाखवून देतात, की नास्तिक मंडळीसुद्धा तितकीच हिंस आणि आक्रमक असतात. काही तर असे सुचवतात, की नजीकच्या इतिहासात घडलेली अनेक हत्याकांडे जोसेफ स्टालिन किंवा माओ झेडोंग या मंडळीनी घडवलेली ही नास्तिक नेत्यांचीच करणी होती. आता हे मान्य, की स्टालिन व माओ हे भ्रष्ट नेते होते आणि त्यांनी आपल्या देशात धर्माची निर्भत्सना केली. पण या लोकांची अमानुष कृये ही नास्तिकतेतून निर्माण झाली किंवा अशी कृत्ये हे नास्तिक विचाराचे चिन्ह आहे असे म्हणणे त्यातून निष्पन्न होत नाही तसेच नास्तिकवाद हाच हुकूमशाहीचा निर्माता असतो हे म्हणणेही निश्चित चूक आहे. ईश्वरवादी लोकांनी श्रद्धेपायी घडवून आणलेल्या हत्या आणि हिंसा यांनी इतिहास भरलेला आहे. असा थेट संबंध निरीश्वरवादी हुकूमशहांचे बाबतीत आढळत नाही. खरे तर, असे थेट संबंध अधार्मिक एकाधिकारशहांचे मध्ये दिसून येतात, कारण ते स्वतः धार्मिक हुकूमशहांचे सारखेच वागतात आणि आपल्या विचारसरणीचे आपण देवच आहोत अशा थाटात वावरतात.
इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मात असणारी हिंसा त्या धर्माच्या विचारसरणीतच अंतर्भूत असलेली दिसते. अनेक वेळा देवाच्या किंवा धर्माच्या नावाखाली पुकारलेले लढे आणि क्रौर्य हे धर्माव्यतिरिक्त, राजकारण, राज्य वाढवणे, अशा महत्त्वाकांक्षेपायी आचरणात आणले जातात, तरी यांचे समर्थन करण्यासाठी धर्माचे मायावरण त्याचेवर चढवले जाते, कारण केवळ अधिभौतिक हेतू असेल तर लोक आपले प्राण पणाला लावण्यास तयार होणार नाहीत. देवाचे नावाखाली लोक हौतात्म्य पत्करतात आणि बलिदान देतात, असे इतिहासात सर्वत्र आढळते आणि धर्मतत्त्वांचे खातर ‘धर्म-युद्धे’ पुकारली जातात.
नास्तिकवादासाठी असे काही घडलेले नाही, कारण नास्तिकवाद हा धर्म नाही. ‘देव देवता यावर विश्वास नसणे’ म्हणजे नास्तिकता. अधिकार गाजवणारी तत्त्वे त्यात नाहीत, कोणते नियमांचे पुस्तक नाही अथवा हटवादी तत्त्वे नाहीत. धर्म आणि नास्तिकवाद याची तुलना म्हणजे आंबा आणि केळी यांची तुलना होय. नास्तिकवादाची तुलनाच करायची झाली तर ‘देवावर विश्वास’ एवढेच मानणाऱ्या आस्तिकवादाशी करावी. काही आस्तिक हे मूलतत्त्ववाद मानतात; असे असले तरी केवळ ‘देवावर विश्वास’ यासाठी कोणी युद्ध वा लढे पुकारत नाहीत. अशासाठी लढे पुकारायला आणखी काही ठाम सिद्धांत आवश्यक असतात.
केवळ देव आहे वा देव नाही या कारणासाठी कोणी हत्याकांड घडवून आणत नाही. काही जादा हटवादी सिद्धांत त्याला जोडावे लागतात तरच अशी भयंकर कृत्ये साकारतात. आस्तिकवादी लोकांना इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म अशी तत्त्वे पुरवतात, त्यातून सोयिस्कर सबबी उभ्या केल्या जातात. धर्मविरहित हुकूमशाही राजवटी आणि धर्म यात हे सिद्धांत साम्य आढळते. कोठला तरी ठाम सिद्धांत असे मांडतो, की आम्ही अधिकारी सांगतो म्हणून तो सिद्धान्त खरा आहे आणि त्याला विरोध कराल तर परिणाम भयंकर होतील; नव्हे प्राणघातक होतील. त्यामुळे नास्तिकवाद हिंसेला चालना देतो वा समर्थन करतो हे म्हणणे सयुक्तिक होणार नाही. एवंच हुकूमशहांनी नास्तिकवादापायी हत्या केलेल्या नाहीत तसेच त्यांनी केलेल्या वाईट वा चांगल्या कृती या नास्तिकवादाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. दोन नास्तिक व्यक्तींची अन्य विषयातील मते एकसारखीच असतील असे नाही. पण ‘देवाचे अस्तित्व मान्य नाही’ एवढेच सर्व नास्तिकवादी लोकात समान सूत्र असते.
काही आस्तिक लोक श्रद्धेचे समर्थन थेट करण्याऐवजी असे मांडतात की, देवाची व्याख्या करता येत नाही किंवा मानवी मनाला देव समजावून घेणे अशक्य आहे. शेवटी असे दावे ‘म्हणून श्रद्धा मान्य करा’ या विधानावर येतात. जर एखादी गोष्ट वर्णन करता येत नसेल किंवा समजत नसेल तर तर्कसंगत प्रश्न असा की त्यावर विश्वास तरी का ठेवायचा? वर्णन न करता येणाऱ्या देवाची कल्पना मला खोडून काढता येणार नाही, पण तुम्हाला सिद्धही करता येणार नाहीं. एक उदाहरण घेऊ. मी समजा असा दावा केला की पुरातन वस्तूंचा शोध घेत असताना मला एक असे पात्र सापडले जे पूर्वी कोणी पाहिले नव्हते वा ज्ञात नव्हते. तुम्ही साहजिकच विचारणार, ‘ते कसे होते सांगा म्हणजे त्याचे वर्गीकरण करता येईल’, आणि मी उत्तर दिले की ते कसे दिसते ते मला अजिबात सांगता येणार नाही, तर ते कसे मान्य होणार? त्याचा आकार, रंग, जाडी, चमक, असे काही सांगितले तरच माझा दावा मान्य होणार ना? कदाचित काही लोक म्हणतील की वर्णन करता न येणे किंवा समजून घेता न येणे हा काही देव नाही असे समजण्याचा पुरेसा पुरावा होऊ शकत नाही. पण देव आहे असा खात्रीशीर पुरावा देता येत नाही, तोपर्यंत आम्ही तो नाही असे समजूनच आमचे व्यवहार चालू ठेवणार.
अशाप्रकारे देवाच्या संकल्पनेबाबत धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विश्लेषण करणारे हे पुस्तक वाचकांना विचार करण्यास उद्युक्त करते. म्हणून सर्वांनी हे पुस्तक वाचावे अशी मी शिफारस करत आहे.
☆
परिचय : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ किमया… लेखक : श्री माधव आचवल ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
पुस्तक : किमया
लेखक : श्री माधव आचवल
☆ सौंदर्यातलं अध्यात्म… ☆
खरंतर पुस्तक वाचण्याची कुठलीही एक वेळ किंवा जागा अशी नसते. पण काही पुस्तकं काही विशिष्ट वातावरणात वाचली तर ती जास्त जवळची वाटतात असा माझा अनुभव.
भरपूर पाऊस पडून गेल्यानंतर तजेलदार ऊन असावं… हिरव्यागार झाडीत एक निवांत क्षणी आराम खुर्ची टाकून, ऊन सावल्यांचा खेळ बघत ओल्या मातीचा सुगंध, पानांची ओली काया, त्यावरती पडणारे सूर्याचे किरण, मधूनच उडणारे पक्षी त्यांचा मधुर चिवचिवाट, डोलणारी फुले बघत असताना खुर्चीच्या समोर टीपॉय वर कॉफीचा मग आणि हातामध्ये ‘माधव आचवल’ यांचे ‘किमया’ पुस्तक असावं.
असं का? कारण ‘माधव आचवल’ यांचं हे ‘किमया’ पुस्तक बंद दारात, खिडकीआड बसून वाचण्याचं नाही. हे पुस्तक वाचण्यासाठी रंग, रूप, रेषा, आकार या सगळ्याचा अनुभव घेता येईल अशा मोठ्या अवकाशातच ते वाचलं जायला हवं. कारण पुस्तकातला आशय इतका मोठा, प्रगल्भ आहे की कुठल्याही चौकटीत राहून आपल्याला तो समजूनच घेता येणार नाही. त्यासाठी मनाच्या चौकटी मोकळ्या करायला हव्यात. निसर्गाने केलेली सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण बघायला हवी. झाडं, झुडपं, पान, फुलं, वस्तू, यंत्र, माणसं, सारं सारं काही बघण्यासाठी सगळ्यांमधलं रेषेचं मूलभूत लयदार एकत्व शोधायला हवं. अशा मुक्त वातावरणात हळूहळू का होईना आपल्याला ते दिसू लागतं आणि मग लेखकाच्या शब्दांचं बोट धरून आपण जसं जसं ते बघायला लागतो, अनुभवायला लागतो तेव्हा आपल्याही नकळत आपण एका वेगळ्या उंचीवरून जग न्याहाळायला लागतो. आणि नेहमीच्याच गोष्टी, नेहमीच्याच वस्तू, वास्तु, माणसं, यंत्र, निसर्ग आपल्याला वेगळ्या दृष्टीने दिसायला लागतात. तेव्हा आपोआप एक भावना मनात निर्माण होते ‘एकोहं बहुस्याम! ‘
जगण्यामध्ये एकरूपता, एकतानता साधायची असेल तर काय प्रकारची साधना करावी लागेल हे सांगणारं खरं म्हणजे हे पुस्तक. हे नुसतं आकृत्या, रेषा, रंग, प्रकाश, अंधार, लय, ताल, रूप इ. बद्दल बोलत नाही.
मला या पुस्तकांमधून जगण्यातलं त्यापेक्षा सौंदर्यातलं अध्यात्म दिसतं. प्रत्येक गोष्ट, स्थिती, कृती किती बारकाईने, तिच्या असण्याच्या-नसण्याच्या संदर्भासह मांडली गेलीये, ते बघून थक्क व्हायला होतं. आपल्या रोजच्या जीवनामध्ये इतक्या प्रकारचं सौंदर्य, इतक्या प्रकारची अभिव्यक्ती, समृद्धपण दडलेलं आहे हे उलगडून सांगणारं अतिशय अप्रतिम म्हणावं असं हे पुस्तक. मनाला ताजेपणा आश्वासकपणा देणारं ठरतं. आणि म्हणूनच कधी मन उदास असेल, निराश असेल, आयुष्यात काहीच घडत नाही असं वाटत असेल, तर सरळ सगळे व्यापताप क्षणभर बंद करून मोकळ्या जागी बसावं. आणि हे पुस्तक वाचायला घ्यावं माहित नाही. किमया या शब्दांत आहे, या दृष्टीत आहे की, आपल्याला समृद्ध करणाऱ्या निसर्गात, भवतालात, पण ती घडते हे नक्की.
माधव आचवल यांचे खूप खूप उपकार आहेत की त्यांनी हे पुस्तक लिहिलं. अन्यथा सौंदर्याकडे आध्यात्मिक दृष्टीने बघण्याची इतकी सुरेख पद्धत मला तरी गवसली नसती.
परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “कांचनबारी” – लेखक : श्री नितीन अरुण थोरात ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक – कांचनबारी
लेखक – नितीन अरुण थोरात
प्रकाशक : Writer Publications
मुखपृष्ठ – प्रमोद कल्लाप्पा मोर्ती
पृष्ठ: २४८
मूल्य: ३९०₹
इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारी युद्ध-कादंबरी – ‘कांचनबारी’.
नाशिकजवळच्या चांदवड तालुक्यात आहे कांचना किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली खिंड म्हणजे कांचनबारी अन् या खिंडीत झालेली लढाई म्हणजेच कांचनबारीची लढाई.
शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकला. राजे कोटभर रूपयांचा खजाना घेऊन राजगडाकडं निघाले. पण, दाऊदखान कुरेशी हा कडवा मुघली सरदार हजारोंच्या फौजेसह कांचनबारीत येऊन उभा राहिला आणि सुरू झाले इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारे घनघोर युदध.
– – ते युद्ध म्हणजेच कांचनबारीचे युद्ध.
१७ ऑक्टोबर रोजी या युद्धाला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत.
‘ शिवाजी महाराजांचे सर्वात भयाण मैदानी युद्ध ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कांचनबारीच्या लढाईचा तपशीलवार इतिहास सांगणारी ही “युद्ध-कादंबरी“ फक्त इतिहास अभ्यासक आणि इतिहासप्रेमींनीच नाही, तर शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि प्रेम बाळगणाऱ्या प्रत्येकानेच वाचायला हवी असे आवर्जून सांगावेसे वाटते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “त्याचं असं झालं ” – लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : त्याचं असं झालं…
लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर
मो। ९४२३२६७०२०
प्रकाशक. :चतुरंग प्रकाशन, सांगली.
मूल्य : रु. २७५/-
☆ ‘‘त्याचं असं झालं’… झालं ते चांगलंच झालं!… ☆
घरी दूरदर्शन संच नाही असे एकही घर आता नसेल. एखाद्या खुर्चीवर किंवा आराम खुर्चीत बसून हातामध्ये रिमोट कंट्रोल घेऊन टीव्ही सुरू करावा, एका मागे एक चॅनेल बदलत जावे आणि प्रत्येक चॅनेलवर आपल्या पसंतीचा कार्यक्रम पाहावा हे किती सुखकारक, आनंददायक आहे याचा अनुभव आपण सर्वजण घेत असतोच. असाच अनुभव एखाद्या पुस्तकातून मिळाला तर? होय, असाच आनंद एका पुस्तकाच्या वाचनातून मिळतो. ते पुस्तक म्हणजे ‘ त्याचं असं झालं ‘. या पुस्तकातील कोणतेही प्रकरण उघडावं आणि ते वाचायला सुरुवात करावी. कुठल्याही एका प्रकरणाचा दुसऱ्या प्रकरणाशी संबंध नाही. परंतु प्रत्येक प्रकरणातून, प्रत्येक लेखातून मिळणारा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा असाच म्हणावा लागेल. सांगली येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांनी लिहिलेले ‘त्याचं असं झालं ‘ हे पुस्तक नुकतच वाचून झाल. ते वाचून झाल्यानंतर आपण एखादा चलत् चित्रपट तर पहात नव्हतो ना किंवा दूरदर्शनवरील विविध चॅनेल्स एकामागून एक पुढे सरकवत नव्हतो ना असेच वाटले. हे आत्मचरित्र नाही. आत्मसंवादही नाही. हा आहे निव्वळ आत्मानुभव… मग असे काय आहे या पुस्तकात?
डॉक्टर श्रीनिवास नाटेकर हे सांगली येथील सुप्रसिद्ध रेडियॉलॉजिस्ट. आजपर्यंतच्या त्यांच्या जीवनात त्यांना ज्या ज्या व्यक्ती भेटल्या त्या त्या व्यक्तींच्या सहवासातील सुखदुःखांचे क्षण आणि त्याबरोबरच आपल्या व्यवसायातील काही अनुभव कथन करणारे हे पुस्तक म्हणजे लेखकाने प्रत्येक वाचकाशी साधलेला संवाद आहे असेच वाटते. लेखक आपल्यासमोर बसून चहा पीत पीत आपल्याला त्या आठवणी व्यवस्थितपणे सांगत आहे आणि आपणही त्याचा एक भाग बनून अत्यंत तन्मयतेने त्या ऐकत आहोत असे वातावरण निर्माण करण्याची ताकद या पुस्तकामध्ये आहे. डॉक्टरांच्या प्रदीर्घ व्यावसायिक वाटचालीमध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्या अंगी असलेल्या संगीत प्रेम, बॅडमिंटन आणि वक्तृत्व या अंगभूत कलागुणांमुळे त्यांना असामान्य व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभला, भेटी झाल्या. त्या कशा होत गेल्या, त्यातून कोणकोणते प्रसंग संस्मरणीय झाले, व्यवसायामध्ये आलेले अनुभव कसे चिरकाल स्मरणात राहतात, हे सर्व त्यांनी कथन केलेले आहे. आपण ज्यांना ‘सेलिब्रिटी ‘ म्हणतो अशा सुप्रसिद्ध व्यक्तींपैकी एखादी व्यक्ती जर आपल्या जीवनात आली तर आपल्याला अप्रूप वाटते. इथे तर डॉक्टरांच्या जीवनात एकाहून एक अशी भारदस्त व्यक्तिमत्वं भेटून गेली आहेत. त्यांच्याशी झालेल्या गप्पा, कोणत्या प्रसंगातून त्यांच्या ओळखी झाल्या, काहींच्या भेटी होता होता कशा चुकल्या, काही ठिकाणी कसे सुखद अनुभव आले, काही ठिकाणी कशी फजिती झाली तर काही ठिकाणी सुरुवातीला दडपण, भीती पण त्या प्रसंगाचा शेवट मात्र अतिशय गोड कसा झाला हे सर्व त्यांनी अत्यंत खुमासदार शब्दांमध्ये सांगितलेले आहे. आता आपल्याला वाटेल असं कोण बरं यांना भेटलं असेल? या ठिकाणी सर्वच्या सर्व नावे सांगितली नाही तरी काही नावे सांगितली व आपण ती वाचली की लक्षात येईल की हा माणूस किती भाग्यवान आहे. भारतरत्न लता मंगेशकर व भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, सुधीर फडके, परविन सुलताना, पंडित जसराज, माजी राज्यपाल वसंतदादा पाटील, ओ. पी. मेहरा व आय. एच. लतिफ, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, पु ल देशपांडे, वसंत बापट, ना. ग. गोरे, बेबी शकुंतला, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई व चौधरी चरण सिंग, एकनाथ सोलकर, मंगेश पाडगावकर, उषाकिरण, सदाशिव अमरापुरकर, स्नेहल भाटकर, दिलीप प्रभावळकर, सी रामचंद्र, ओ. पी नय्यर इ. इ… ही नावे किंवा यातील प्रत्येक नाव आपल्याला भुरळ पाडणारे असेच आहे. विविध क्षेत्रातील अशा व्यक्तिमत्त्वांचा काही ना काही कारणाने संपर्क होणे आणि त्यांच्या सहवासात काही तास, एखादा दिवस घालवणे हे किती भाग्याचे आहे याची कल्पना आपण करू शकतो. याशिवाय व्यवसायामध्ये आलेले अनुभव त्यांनी कथन केलेले आहेत. हे सर्व करत असताना या व्यक्तिमत्त्वांच्या अत्यंत सुंदर अशा व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या शब्दातून उभ्या केल्या आहेत. एवढेच नव्हे तर आजुबाजूचा परिसर, एखादी इमारत, एखाद्या हॉटेल मधील फर्निचर, निसर्ग या गोष्टींचेही त्यांनी अचूक वर्णन केलेले आहे. त्यामुळे या आठवणी म्हणजे फक्त आठवणींच ‘ गाठोडे ‘ नव्हे तर एक ललितरम्य लेखमाला झालेली आहे. एखाद्या व्यक्तीचे वर्णन करताना त्याचा पोशाख, त्याचे रंग, रूप याबरोबरच त्याची देहबोली याचेही त्यांनी अचूक टिप्पण केलेले आहे. उदाहरणार्थ संगीतकार मदन मोहन, जय किशन, चौधरी चरण सिंग यांचे वर्णन वाचून ते चेहरे त्या व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहतात. ‘ वालाची उसळ ‘ या लेखातून त्यांनी जो प्रसंग कथन केला आहे तो वाचल्यानंतर डॉक्टर हे फक्त वैद्यकीय सल्ला देणारे नसून शरीरामध्ये नसलेल्या अवयवापर्यंत म्हणजे पेशंटच्या मनापर्यंत जाऊन भिडणारे डॉक्टर आहेत हे दिसून येते. ‘स्कूटरची किक ‘ या लेखातूनही त्यांनी आपल्या व्यवसायातील अत्यंत थरारक असा अनुभव कथन केला आहे.
वैद्यकीय व्यवसायात माणसांशी सतत येणारा संबंध आणि ते संबंध डोळसपणे अनुभवण्याची वृत्ती, तसेच बॅडमिंटन सारख्या खेळातील प्राविण्य, चित्रपट गीते ऐकण्याचा छंद व त्यावरील प्रेम आणि या सर्वांच्या जोडीला आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्याच स्वभाव यामुळे डॉक्टरांनी जी माणसे मिळवली ती त्यांच्या स्मृती मध्ये कायमची कोरून ठेवली गेली आहेत. त्याचा त्यांनी जो आनंद उपभोगला तो आपल्यालाही या पुस्तकामुळे उपभोगायला मिळत आहे.
आयुष्याच्या अल्बममध्ये जतन करुन ठेवावेत असे फोटो खूप कमी असतात. पण इथे अल्बम भरुन जावा इतके फोटो डॉक्टरांजवळ आहेत. आज लेखक आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहेत तेथून मागे वळून पाहताना त्यांच्या तोंडून, त्यांच्या एका लेखाच्या शिर्षकाप्रमाणे ‘ कृतार्थ मी ‘ असेच उद्गार बाहेर पडत असतील. डॉक्टरानीच एका लेखात म्हटले आहे ” परमेश्वर किंवा आदिशक्ती असेल मला माहित नाही ; पण प्रत्येकाच्या नियतीत ज्या घटना घडतात, त्या त्यांनी योजिलेल्या असतात, असं समजलं जातं. ” ” विविध क्षेत्रातील इतकी मंडळी माझ्या जीवनात का डोकावली याचे माझ्याकडे समर्पक, पटेल असे उत्तर नाही. ही परमेश्वराची कृपा असावी, माझ्या नियतीतील महद्भाग्य असावे. किंवा माझ्या बाबतीतील निव्वळ योगायोग असावा अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. “
काहीही असो, जे झालं हे आम्हा वाचकांसाठी चांगलंच झालं.!
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “अस्वस्थ नायक” – लेखक : श्री. आनंद टकले ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक : अस्वस्थ नायक
लेखक : श्री. आनंद टकले
प्रकाशक : शब्दश्री प्रकाशन
पृष्ठे – १८७
मूल्य – ३०० रु.
‘अस्वस्थ नायक’ ही कादंबरी नुकतीच वाचनात आली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवन संघर्षावर ही कादंबरी आधारित असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच सांगितले आहे.
एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर कादंबरी लिहिणे, म्हंटले तर सोपे, म्हंटले तर अतिशय अवघड काम आहे. सोपे अशासाठी की त्या व्यक्तीचे व्यक्तिमव, त्याचे विविध पैलू माहीत असतात. त्या व्यक्तीच्या जीवनातले प्रसंग माहीत असतात. प्रसंग निर्मितीसाठी फारसा विचार करावा लागत नाही आणि अवघड अशासाठी, की कादंबरी आहे, म्हंटल्यावर काही प्रसंग कल्पनेनेही निर्माण करावे लागतात. ते निर्माण करताना त्यांच्या व्यकीमत्वाचे पैलू त्यातून नेमके प्रगट होतील, असे प्रसंग योजावे लागतात. प्रसग वर्णन करताना ते प्रभावी आणि उठावदार होतील याची काळजी घेताना, मूळ व्यक्तिमत्व, स्वभावविशेष नेमके स्पष्ट होतील, ही काळजी घ्यावी लागते. मूळ व्यक्तिमत्व वाचकाच्या परिचयाचे नसले, तरी लेखकाने वर्णन केलेल्या प्रसंगातून नायकाचे व्यक्तिमत्व डोळ्यापुढे उभे रहाते.
‘अस्वस्थ नायक’ या कादंबरीचे चार भाग आहेत. पहिल्या भागात कादंबरीचा नायक रायानंद पुंडला धुळकर याचं गाव धुळकरवाडी आणि त्याच्या आस-पासचा प्रदेश याचं वर्णन येतं. तिथलं वातावरण, पर्यावरण आणि जनजीवन यांची माहिती त्यात येते. गाव दुष्काळग्रस्त. कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरचं. निवेदन ग्रामीण बोलीत. ही ग्रामीण बोली पुन्हा त्या सीमा भागातली. आपल्याला परिचित ग्रामीण बोलीपेक्षा काही ठिकाणी वेगळेपण जाणवते. उदा. ‘लेका’च्या जागी ‘लग’ शब्द येतो. दावण तोडणे म्हणजे मेंढया पळवणे. गुड्डा म्हणजे डोंगर असे किती तरी वेगळे शब्द यात येतात. पुस्तकाच्या शेवटी काही अपरिचित शब्दांची यादीही दिली आहे. पण एकूण कादंबरी वाचताना निवेदनातला गोडवा मोहून टाकतो. नायक शिकलेला आहे, त्यामुळे त्याच्या बोलण्यात कधी कधी नागरी शब्द आणि प्रमाण भाषाही येते. राया हा धनगर समाजातला. त्यामुळे धनगर समाजातील चाली-रीती, बोलण्याची- वागण्याची पद्धती, समाजाची संस्कृती, त्यांची आदराची स्थाने या सगळ्याची माहिती प्रसंगा-प्रसंगाने होते.
रायाला डॉक्टर व्हायचं होतं. ते जमलं नाही निराशेने घेरलं. मग जाणवलं, देवाने वक्तृत्वाची देणगी दिली आहे. तिचा उपयोग करू या. हळू हळू, लोकांची संघटना तो बांधत गेला. अनेक निमित्ते शोधली. अहिल्याबाईंची जयंती. सर्वांना बरोबर घेऊन त्याने तो उत्सव मोठ्या थाटात पार पाडला. यातून तो राजकारणाच्या क्षेत्राकडे वळला. कादंबरीच्या दुसर्या भागात त्याच्या राजकीय क्षेत्रातील वावर, याबद्दल लिहिले आहे. त्याने बांधलेल्या संघटना, काढलेले मोर्चे, त्याचे परिणाम, आपल्या गावात व इतरत्र जागोजागी उभारलेल्या भा. स. प. च्या शाखा, शेवटी सर्वांच्या आग्रहाने लढवलेली आमदारकीची निवडणूक, त्यात सुरुवातीला झालेला पराभव. तथापि तिसर्या क्रमांकाच्या मतांमुळे मनाला आलेली उभारी हा भाग येतो. इथे नायक म्हणतो,
लढता लढता हरलो जरी, हरल्याची खंत नाही.
पुन्हा उठेन, पुन्हा लढेन, एवढ्यावर थांबायला
शांत बसायला मी काही संत नाही.
राजकारणातील कट-कारस्थाने हेवे-दावे, ही सारी माहिती, घटना-प्रसंगांचे वर्णन कादंबरीच्या दुसर्या भागात येते. इथे दुसर्या वेळी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत रायानंद प्रचंड मतांनी निवडून येतो. त्याच्या गावात, जत तालुक्यात प्रचंड जल्लोष होतो.
उत्तम वातावरण निर्मिती, प्रत्यक्षदर्शी प्रसंगवर्णन, संवाद आणि वर्णन याद्वारे केलेले विविधरंगी व्यक्तिचित्रण ही कादंबरीची विशिष्ट्ये सांगता येतील. वातावरण निर्मितीचा एक नमूना देते.
‘ऊन रखरखत होते. जमीन तापलेली. धग अंगात सुटलेली. वादळ-वारे भिरभिरत होते. वार्याने कहर माजवायला सुरुवात केली. आता टपोरे थेंब पडत होते. जीवाची तगमग थांबलेली. सारे अंग शांत शांत झालेले, पावसाच्या धारा धो धो बरसत होत्या. तापलेली भुई आधाशागत पाणी पोटात साठवत होती. ती आता सुस्त झालेली. तिचा अंगा-खांद्यावरून पाणी खेळत होते. ते पाणी खळाळत, धावत पुढे जात होते. ओढा-नाल्यातून पुढे जात होते. बंधार्यामुळे पाणी अडवले जात होते. पाणी जमिनीत मुरत होते. माणसांच्या चेहर्यावर समाधानाचं वारं सुटलेलं’
कादंबरीच्या पहिल्या दोन भागात अनेक घटना-प्रसंगांचे प्रत्यक्षदर्शी वर्णन आहे. गावात पावसाने ओढ दिली. पाऊस पडावा, म्हणून मरीआईचा काढेला गाडा, गुड्डावरची बिरोबाची यात्रा, भिवर्गित साजरी केलेली अहिल्याबाईंची जयंती, चाबूक मोर्चा, मंत्र्यांना जत तालुक्यात जाऊ न देता पोलीस स्टेशांच्या तिथेच त्यांची गाडी आडवणं, धर्माच्या हॉटेलमध्ये गुंडांनी घातलेला राडा, त्यांच्यापुढे आगतिक झालेला धर्मा, त्यानंतर एकदा भा. स. प. चे नेते धर्माच्या धाब्यावर जेवायला येतात, ते अंनंदक्षण आशा किती तरी लक्षवेधी प्रसंगांची वर्णने यात आहेत.
अनेक नाट्यमय घटना यात आहेत. व्यजावर व्याज लावून पैसे वसूल केलेला सावकार तुक्या तांबे रायाच्या रानात येऊन धमकी देऊ लागल्यावर शिरमाने त्याची मस्ती कशी जिरवली, संत्या गायकवाडाने धनू गोरडाची दावण कशी कापून नेली आणि धनुने हाय खाऊन कशी आत्महत्या केली याचे वर्णन आहे. तोच सत्या गायकवाड अहिल्याबाईंची जयंती भिवर्गित साजरी होत असताना, सगळं गाव तिथे असणार, म्हणून लखू तात्याची दावण तोडायची (मेंढया पळवायच्या) योजना आखतो. संत्याला हे कळताच तो रायाला कळवतो आणि राया आपली ५०-६० पोरे घेऊन (मित्र) घेऊन ओहोळात त्याच्या जीपवर दगडांचा वर्षाव करून सत्याची जीप थांबवतो आणि त्याची मस्ती कशी जिरवतो, लहू तात्याची दावण कशी परत मिळवतो, हे सारे वर्णन घटना डोळ्यापुढे उभे करते. असाच आणखी एक प्रसंग म्हणजे संभाजी वाटळेकर कर्नाटकात मेडीकलसाठी रायाला प्रवेश मिळवून देण्याच्या बोलीवर, रायाकडून अडीच लाख रुपये घेतात. ते कॉलेजमध्ये भरत मात्र नाहीत. त्यामुळे रायाला मेडीकलला अॅडमिशन राया आणि त्याचा भाऊ धर्मा आपले पैसे परत मागायला जातो. त्यानंतर तो आत्महत्या करतो. पण त्याला जबाबदार राया व धर्मा असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवतो. सी. एम. , डी. सी. एम. , एस. पी. आय. जी. यांना चिठ्ठ्या पाठवून देतो. न केलेल्या गुन्ह्याची रायाला शिक्षा भोगावी लागली. पुढच्या काळातही अनेक खर्या – खोट्या गुन्ह्यात त्याला अडकवले गेले. असे अनेक प्रसंग, घटना, त्यातील संवाद यामधून रायचे आई-वडील, भाऊ, मित्र, विरोधक यांची व्यक्तिचित्रे आपल्या डोळ्यापुढे उभी रहातात.
या कादंबरीचे प्रस्तावनाकर प्राचार्य रा. तु. भगत म्हणतात, ‘या कादंबरीची ‘उंची’आहे, ग्रामीण समाजाला नवविचारांची प्रेरणा देण्याच्या सामर्थ्यात आणि तिची ‘खोली’ आहे, यातील पानापानावर पाझरणार्या माणुसकीच्या प्रगटीकरणात. येथील लेखकाचे शब्द वाचकांच्या आत्म्याशी संवाद साधतात आणि त्यांच्या हृदयातील तारा छेडतात. ’
कादंबरीचा तिसरा आणि चौथा भाग अगदीच लहान आहेत. तिसर्या भागात अवघी ५ पाने आहेत, तर चौथ्या भागात फक्त दोनच. तिसर्या भागात आमदार म्हणून निवडून आल्यावर रायानंदने कोणती कामे केली, याचे वर्णन येते. यात करोना काळातील दुर्दशेचेही वर्णन आहे. चौथ्या भागात कालानुरूप आणि रायानंदच्या प्रयत्नाने धुळकरवाडीचा विकास कसा झाला हे संगितले आहे. पाणी शेतीच्या बांधावर आले. शेती सुजलाम सुफलाम झाली एम. आय. डी. सी. निर्माण झाल्याने धुळकरवाडीच्या हाताला काम मिळाले. धुळकरवाडीत आर्थिक सुबत्ता आली. धुळकरवाडीतील तरुणांनी विविध क्षेत्रात नाव कमावले. लेखक म्हणतो, ‘नियती, निसर्ग, यातना, वेदना, अडचणींचा सामना करत, संघर्ष करत नव्या तेजाने प्रकाशणारी धुळकरवाडी सोनेरी दवाबिंदूसारखी लखलखत होती. उनाच्या झळावर विव्हळणारी झाडे आता शितलतेचा गारवा वाडीला देत होती.
एवढं सगळं चांगलं घडूनही नायक अस्वस्थ का? त्याचे कारण शेवटच्या दोन ओळीत दिले आहे. ‘जागतिकीकरणाच्या विळख्यात धुळकरवाडी गुंतत चाललेली. आर्थिक सुबत्ता आल्याने धुळकरवाडीच्या उंबरठ्यावर भोगवाद आणि चंगळवाद आ वासून उभा होता. ’ हा भाग अधीक विस्ताराने आला असता, तर नायकाची अस्वस्थता अधीक प्रभावीपणे वाचकांना जाणवली असती.
मुखपृष्ठ चांगले आहे. नायकाचा खंबीरपणा आणि अस्वस्थता दोन्हीही गोष्टी चेहर्यावरून प्रतीत होतात.
ग्रामीण नेतृत्वात होत चाललेली वाढ आणि बदलत चाललेल्या ग्रामीण जीवनाचे ताणे-बाणे समजून घ्यायचे असतील, तर प्रत्येकाने ‘अस्वस्थ नायका’चा अस्वस्थपणा जाणून घ्यायला हवा.
वातावरण निर्मिती छान आहे. व्यक्तिचित्रण वेधक आहे. विविध प्रसंगांचं वर्णन वाचताना आपण ते प्रत्यक्ष पहातोय आणि संवाद वाचताना ते प्रत्यक्ष ऐकतोय असं वाटतं. ज्वलंत वास्तवाचे दुर्मिळ दर्शन यात घडते. ‘संघटित व्हा. संघर्ष करा, यश आपल्यापुढे नतमस्तक होईल, हाच संदेश कादंबरी देते.
परिचय : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “के कनेक्शन्स” – लेखक : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : के कनेक्शन्स
– – – के फॉर कुमार… के फॉर कल्याण…
लेखक: श्री प्रणव सखदेव
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे.
पृष्ठ: १९४
मूल्य: २७५₹
कधी तरी आठवतं का तुम्हाला… पूर्ण दिवस मैदानात खेळलेलं क्रिकेट, चौकात मिळणारा बर्फाचा गोळा, सायकलवरचा वारा, मित्रांबरोबर केलेली मस्ती, शाळेतील पहिली क्रश, आणि गच्चीवर पतंग उडवताना मिळणारा आनंद? प्रणव सखदेव यांचं ‘के कनेक्शन्स’ हे पुस्तक अशाच विसरलेल्या आठवणींच्या कनेक्शनला उजाळा देतं – कुमार नावाच्या एका मुलाच्या आणि त्याच्या भोवतालच्या जगाच्या नजरेतून. पण गंमत म्हणजे, कुमार कोणत्याही एका पात्राचं प्रतिनिधित्व करत नाही – तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आतला लपलेला बालक !
प्रणव सखदेव यांनी लिहिलेली ही mosaic प्रकारातील कथा म्हणजे बारा छोट्या छोट्या धाग्यांनी विणलेली आठवणींची गोधडी आहे. प्रत्येक गोष्ट वेगळी असली, तरी सगळ्यांचं मूळ एकाच भावना-विश्वात आहे – ते म्हणजे कुमारवय. भाषा अतिशय सहज, ओघवती आणि लयबद्ध आहे – पुस्तक एकदा उघडलं की पुढचं पान वाचल्याशिवाय राहवत नाही. लेखकाचं निरीक्षण अत्यंत प्रगल्भ आहे – त्या काळातला कल्याण परिसर, व्यक्तिरेखा आणि घटनांचं हुबेहूब वर्णन वाचकाला त्या काळात घेऊन जातं.
या पुस्तकातली पात्रं मनाला भिडणारी आहेत – नवनवीन पदार्थ खाऊ घालणारी कडबोई मावशी, गाणं म्हणणारी मेघा ताई, त्याच्या भविष्याची काळजी करणारे फणस आजोबा, माया करणारी भाजीवाली अक्का, क्रिकेटच्या ग्राउंडबाहेर थंडगार चम्मच विकणारे हुसैनभाई गोळावाला, त्याचे जिवलग मित्र दिन्या आणि मन्या, वाचनाची गोडी लावणाऱ्या साळुंकेबाई – ही सगळी पात्रं इतकी खरी वाटतात की ती आपल्याच आजूबाजूला वावरतायत असं वाटतं. विशेष म्हणजे, हे पुस्तक कुठेही कंटाळवाणं वाटत नाही – ते तुम्हाला नुसत्या आठवणी दाखवत नाही, तर भावनांच्या गाभाऱ्यात नेऊन पोहोचवतं.
हे पुस्तक प्रत्येकाच्या घरात असायलाच हवं – विशेषतः ९०-२००० च्या दशकात मोठं झालेल्या मंडळींसाठी, जे अजूनही चिठ्ठ्या, रिबन्स, डब्बा शेअर करणाऱ्या आयुष्याला मिस करतात. कॉलेज स्टुडंट्स, नवखे वाचक किंवा नॉस्टॅल्जिया प्रेमींसाठी ही एक सुंदर भेट आहे. शेवटी, ‘के कनेक्शन्स’ हे पुस्तक म्हणजे केवळ गोष्टींचा संग्रह नाही – तर आपल्या आठवणींची एक सुंदर ठेव आहे !
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “यशवंत होण्यासाठी चाणक्यनीती” – लेखक : डॉ. धनंजय मंडलिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : यशवंत होण्यासाठी चाणक्यनीती
(जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती आणि यशासाठी चाणक्यांची ७५ सूत्रे)
लेखक : डॉ. धनंजय मंडलिक
पृष्ठे : २४०
मूल्य: २५०₹
“यशवंत होण्यासाठी चाणक्यनीती” हे पुस्तक वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात यश मिळवण्यासाठी एक प्रभावी मार्गदर्शक आहे.
चाणक्यनीतीतील तत्त्वांचा योग्य वापर करून प्रत्येक व्यक्ती स्वतःचे ध्येय निश्चित करून त्याची पूर्तता साध्य करू शकते. चाणक्यांचे विचार अवलंबल्यास कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरते आणि यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवते.
या पुस्तकात यश मिळवण्यासाठी चाणक्यांच्या ठरावीक सूत्रांचे चार महत्त्वाचे प्रकरणांत विभाजन केलेले आहे:
१. यशस्वी होण्यासाठी २१ प्रभावी चाणक्यनीती
या प्रकरणात चाणक्यांनी सांगितलेली २१ महत्त्वपूर्ण तत्त्वे दिली आहेत. यात नैतिकता, योग्य वर्तन, वेळेचे नियोजन आणि समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक धोरणांचा सखोल ऊहापोह आहे.
२. यशस्वी होण्यासाठी चाणक्यांचे १५ गुण
या प्रकरणात आत्मविश्वास, संयम, धैर्य, दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता यांसारख्या १५ गुणांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. हे गुण व्यक्तीला कठीण प्रसंगी मार्ग शोधण्याची ताकद देतात.
३. ध्येय निश्चितीचे महत्त्व
ध्येय निश्चिती आणि नियोजनाविना यश मिळू शकत नाही. या प्रकरणात चाणक्यांनी ध्येय ठरवण्याचे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
४. चाणक्यांचे कानमंत्र
या भागात जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणादायी कानमंत्र दिले आहेत. गुप्तता राखणे, योग्य वेळी निर्णय घेणे आणि योग्य सहकारी निवडणे याविषयी मार्गदर्शन केलेले आहे.
–
ही चारही प्रकरणे चाणक्यनीतीचा सारांश असून यशस्वी जीवनासाठी आवश्यक दिशा दाखवतात. आचार्य चाणक्यांनी सुमारे २५०० वर्षांपूर्वी दिलेली सूत्रे आजही तितकीच उपयुक्त आहेत आणि प्रत्येक पिढीला मार्गदर्शन करतात.
…. ध्येय निश्चिती आणि यशप्राप्तीसाठी “यशवंत होण्यासाठी चाणक्यनीती” हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈