श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २२ व २३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

|| श्री नारद उवाच || 

भक्ती स्तोत्र २२ – २३ 

*

तत्रापि न माहात्म्यज्ञानविस्मृत्यपवादः ॥ २२ ॥

तद्विहीनं जाराणामिव ॥ २३ ॥

*
अर्थ : श्रीकृष्णावर प्रेम करताना त्याच्या महानतेची पूर्ण जाणीव गोपींना होती, त्यामुळे त्यांचा प्रेमात कधीही देहभावना आली नाही, त्यांचे प्रेम कायम उच्च दर्जाचे राहिले….!!

विवरण – भक्तिप्रेमाला महात्म्यज्ञानाची जोड असावी, नसता त्यात दोष निर्माण होण्याचा संभव असतो. त्यातून भेदबुद्धी, व्यभिचार, फलकामना, स्वसुखाभिलाष इत्यादी दोष  निर्माण होऊ शकतात. गोपिकांना बालकृष्ण साक्षात भगवंत आहे याचे यथार्थ ज्ञान नसते तर त्या प्रेमाभक्ती या संज्ञेस प्राप्त झाल्या नसत्या. तसेच मागील सूत्रात गोपिकांचे जे वर्णन केले आहे ते सर्व व्यर्थ झाले असते. 

गोपिकांच्या महात्म्यज्ञानाचे श्रीएकनाथमहाराज, श्रीकृष्ण-उद्धव संवाद प्रसंगी गोपींचे वर्णन करीत आहेत –

“विसरल्या विषयसुख । विसरल्या द्वंद्वदुःख । विसरल्या तहानभूक । माझेनि एक निदिध्यासें ॥८४॥ जेणें देहें पतिपुत्रांतें । आप्त मानिलें होतें चित्तें ।तें चित्त रातलें मातें । त्या देहातें विसरोनी ॥८५|| विसरल्या इहलोक परलोक । विसरल्या कार्यकारण निःशेख । विसरल्या नामरूप देख । माझें ध्यानसुख भोगितां ॥८६॥ निरसोनि तत्त्वांचे विकार । समाधि पावे मुनीश्वर । तो विसरे जेवीं संसार । तेवीं मदाकार गोपिका ॥८७॥ मी भ्रतारू नव्हें शास्त्रविधी । रूपें मदनमोहन त्रिशुद्धी । मज रतल्या ज्या अविधी । जारबुद्धीं व्यभिचारें ॥९२॥ चौं प्रकारींच्या कामिनी । हस्तिनी इत्यादि पद्मिनी । चौघींसी चौं मुक्तिस्थानीं । काममोहनीं मी रमवीं ॥९३॥ इतर पुरुषांचे संगतीं । क्षणभंगुर सुख भोगिती । अविनाश निजसुखप्राप्ती । कामासक्ती माझेनि ॥९४॥”

 (एकनाथी भागवत, अ. १२.)

श्री तुकाराम महाराज ही म्हणतात –

“चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥ देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥ आलें अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥करावया भक्तजनाचें पालण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥ गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर हे लोक घरोघरीं ॥५॥ घरोघरीं झाला लक्ष्मीचा वास । दैन्यदाळिद्रास त्रास आला ॥६॥ आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारीलोकां ॥७॥ लोकां गोकुळींच्या झालें ब्रम्हज्ञान । केलियावांचून जपतपें ॥८॥ जपतपें काय करावीं साधनें । जंवें नारायणें कृपा केली ॥९॥ केलीं नारायणें आपुलीं अंकित । तोचि त्यांचें हित सर्व जाणे ॥१०॥ सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाहींनाहीं ॥११॥ नाहीं भक्ता दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनियां ॥१२॥ याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका म्हणे आस त्यजूनियां ॥ लोका गोकुळीच्या झालें ब्रह्मज्ञान ||१३ || केलिया वांचून जपतपें ॥ जपतपे काय करावी साधनें । जंव नारायणें कृपा केली||१४|| सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाही नाही ||१५||”

(अभंग क्रमांक ३८११, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

श्रीकृष्ण उद्धवास सांगतात –

“अंधारीं गूळ खातां । कडू न लगे तो सर्वथा । तेवीं नेणोनि माझी सच्चिदानंदता । मातें सेवितां मी जाहल्या ॥२०५॥ परिस मानोनि पाषाण । फोडूं जातां लोहाचा घण । लागतांचि होय सुवर्ण । तैशा जाण गोपिकां ॥६॥ विष म्हणोनि अमृत घेतां । मरण जा‌ऊनि ये अमरता । तेवीं जारबुद्धीं मातें भजतां । माझी सायुज्यता पावल्या ॥७॥ म्यां गोपिकांसी कामू केला । कीं त्यांचा सर्व कामू हरिला । विचारितां अर्थ एथिला । मोक्ष फावला मत्कामें ॥८॥ ज्यांसी झाली माझी संगती । त्या एक दोन सांगों किती । शत सहस्त्र अमिती । निजपदाप्रती पावल्या ॥९॥ वैरागराच्या मणीप्रती । खडे लागले हिरे होती । तैशी गोपिका माझ्या संगतीं । नेणों किती उद्धरल्या ॥२१०॥ मी परब्रह्ममूर्ति चोखडी । माझिया व्यभिचारपरवडी । धुतल्या अविद्यापापकोडी । मुक्ती रोकडी पावल्या ॥११॥ मी अथवा माझे संत । संगती हो‌ईल ज्यांसी प्राप्त । ते मज पावले निश्चित । संदेह येथ न धरावा ॥१२॥ माझे स्वरूपावरी लोक । विकल्पें ठेविती नाना दोख ।नसंत माझे निर्दोख । तत्संगें सुख निर्दुष्ट ॥१३॥ उद्धवा त्वांही येचि अर्थीं । बहुत न करावी व्युत्पत्ती ।धरोनियां सत्संगती । संसारगुंती उगवावी ॥२१४॥”

(संदर्भ : एकनाथी भागवत अध्याय १२)

भगवत्प्रेमस्वरूप तर हृदयाला निर्मल पवित्र करणार आहे. ‘जाराणा’ हे अनेकवचन अनेक घातक गोष्टी येथे एकत्रित आल्याप्रमाणे होईल हे सांगत आहे. सूत्रातील ‘इव’ हे पदही दृष्टान्त जसाच्या तसा अक्षरशः घेऊ नये हे सुचवीत आहे. जार किंवा जारिणी हे केवल ऐंद्रिय सुखाची अपेक्षा करत असतात. ते सुख मिळत राहील तोपावेतोच त्यांचा समागम असतो, ते न मिळाल्यास परस्परांचा त्याग होतो, श्रीकृष्ण व गोपिकांचे अन्योन्य प्रेम अखंड, अबाधित व अव्यभिचारी होते, जार-प्रेम व वास्तव प्रेमातील भेद पुढील सूत्रामध्ये दाखविला आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 

नारद महाराज की जय!!!

 – भक्ती सूत्रे क्र. २२-२३. 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted