श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६६, ६७, ६८. ६९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
भक्ति सूत्रे ६६ – –
“त्रिरूपभङ्गपूर्वमकम् नित्यदास्यनित्यकान्ताभजनात्मकं प्रेम कार्य प्रेमैव कार्यम् ||६६||”
अर्थ : त्रिपुटीचा भंग म्हणजे नाश अथवा लय करून सर्वकाळ भगवतांचा दास आहे अथवा त्याची कांता आहे असा भाव धारण करून त्याच्यावर प्रेम करावे, प्रेमच करावे.
विवेचन : साधन, साधक आणि साध्य अथवा भक्त, भक्ति आणि भगवंत अशी त्रिपुटी अथवा त्रिकुट मानले जातात. अध्यात्मात या तिन्हीची गरज असते. जेव्हा भगवतांची प्राप्ती होते तेव्हा ही त्रिपुटी संपुष्टात येत असते.
आपण नदीचे उदाहरण पाहू.
नदीचा उगम सागराला जाऊन मिळण्यासाठी होतो. यात नदी, नदीचे वाहणे आणि सागर मिळून त्रिकुट अथवा त्रिपुटी होते. यातील एक जरी नसेल तरी चालणार नाही. नदी सागराला जाऊन मिळाली की तिचे अस्तित्वच संपुष्टात येते, तिचे नदीपण शिल्कच उरत नाही…
भक्त भक्ति करतो, यथावकाश त्याला भगवंताची प्राप्ती होते, मग तो भक्त म्हणून सांगायला शिल्लकच उरत नाही. इथे आपल्याला प्रश्न पडेल की मग संत कसे काय आपल्याला उपदेश करतात. त्याला एकमेव उत्तर आहे. संत कमीपणा घेऊन आपल्यासाठी *”अवतरण”* करीत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती याची अनुभूती आपण प्रत्येक संताच्या बाबतीत घेऊ शकतो.
हे सर्व लिहिणे सोपे आहे, प्रत्यक्षात आणणे महाकठीण.
त्यासाठी संपूर्ण शरणागत भाव अथवा हनुमंतासारखी दास्य भक्ति अंगिकारता आली पाहिजे.
साधकाने भगवंताला म्हटले पाहिजे की तू ठेवशील तसा राहीन, पण तुझाच बनून राहीन… ! तुझे चरण मी काही झाले तरी सोडणार नाही. तुझ्या चरणावर डोके ठेवले आहे. आता तू तार अथवा मार. तू तारलेस किंवा मारलेस, तरी दोन्ही मध्ये माझेच कल्याण आहे. अशी दृढ श्रध्दा हवी. असे जमले की विषाचा प्याला पिताना भीती वाटतं नाही, छाटी उडाल्यावर मागचा पुढचा विचार न करता कल्याण गडाच्या तटावरून उडी मारू शकतो, कड्यावरून ढकलले, उकळत्या तेलात टाकले तरी भक्त प्रल्हादाला निश्चिंत रहात नाम घेता येते…
अशी अनेक उदा. आपल्याला सांगता येतील.
… बाळाची आई बाळावर अकारण प्रेम करते. ते बाळ दुध पिताना आईला लाथा मारते, तिच्या अंगावर शी करते, शू करते, रात्री अपरात्री जागरण करवते, तरी आई त्या बाळावर अपरंपार प्रेम करते…
… भक्त आपल्या भगवंतावर असाच प्रेम करतो, तेव्हा त्याला भगवंताची प्राप्ती होते.
संत तुकाराम महाराज या स्थितीचे खालील अभंगात वर्णन करतात.
“हाचि नेमआतां न फिरें माघारीं । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥
घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सावळें परब्रह्म ॥२॥
बळियाचा अंगसंग झाला आतां । नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥३॥”
– – – – –
भक्ति सूत्रे ६७ – –
“भक्ता एकान्तिनो मुख्याः ||६७||”
अर्थ : भगवंतांची एकनिष्ठपणे भक्ति करणारे भक्त हे मुख्य भक्त होत.
विवेचन: प्रपंचात अनेक गोष्टी मनुष्याला सांभाळाव्या लागतात, याउलट परमार्थ मार्गात मात्र एका भगवंताला आपलेसे करून घ्यायचे असते. गणिती भाषेत बोलायचे झाल्यास अनेक गणिते सोडवण्यापेक्षा एक गणित सोडवणे त्यामानाने सोपे, नाही का?
अनेक वर्षे प्रपंच करून मनुष्याला किती समाधान मिळतं हा प्रश्नच सध्याच्या काळात गैरलागू झाल्यासारखा आहे, असे म्हटले तर नवल वाटू नये… !
समर्थ म्हणतात, ” प्रपंच अवघाचि नासका”
यासाठी प्रापंचिक मनुष्याने, साधकाने दिवसातील काही वेळ एकांतात व्यतित करायला हवा. अनेक लोकांना एकांतापेक्षा एकटेपणाची जास्त भीती वाटतं असते. एकांत म्हणजे एकाचाही अंत. अंतर्यांमी वसलेल्या आत्मारामामध्ये स्वतःचा अंत करणे म्हणजे एकांत सेवन करणे. दुसऱ्या बाजूने विचार करता, आपली आणि भगवंताची इच्छा एक करणे, अर्थात त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळणे. तो जसा ठेवील तसे आनंदाने राहणे म्हणजे एकांत म्हणता येईल.
ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळून जाते तसे साधकाने भक्तीत विरघळून जावे. एक अर्थात जो आपला अभिमान आहे, अहंकार आहे, मीपणा आहे तो सर्व त्याच्याचरणी वाहून टाकावा, संपूर्ण शरणागत होऊन भगवंताशी समरस होऊन जावे… ! सर्व संतांनी हे करून दाखवले आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
“लवण मेळविता जळे| काय उरले निराळे ||१|| समरस झालो `तूज माजी हरपलो ||२|| अग्निकर्पूराच्या मेळी| काय उरली काजळी ||३|| तुका म्हणे होती| तुझी माझी एक ज्योती||४||”
(संदर्भ : अभंग क्रमांक २३७९, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)
या गुणातीत भक्तीमध्ये व्यवहाराचा, स्वार्थाचा लवलेश नसतो. अशा भक्ताला फक्त भगवंताचे प्रेम हवे असते, आणि त्यासाठीच तो भगवंतावर जिवापाड प्रेम करीत असतो… ! मग, एखादी मीरा म्हणून जाते आणि ते अजरामर होते,
“मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा ना कोय||”
असा भक्त सर्वांना आवडतो, अर्थात देवालाही प्रिय होतो.
– – – –
भक्ति सूत्रे ६८, ६९ – – –
“कण्ठावरोधरोमञ्चाश्रुभिः परस्परं लपमानाः पावयन्ति कुलानि पृथिवीं च ||६८||”
तीर्थीकुर्वन्ति तीर्थानि सुकर्मीकुर्वन्ति कर्माणि, सच्छास्त्रीकुर्वन्ति शास्त्राणि॥ ६९ |।
अर्थ : प्रेमातिरेकामुळे कंठ दाटून येऊन शरीरावर रोमांच उभे राहिलेले असतांना आणि डोळ्यांतून अश्रू वहात असताना सिद्ध भक्त बाष्प गद्गद स्वरांनी एकमेकांशी संभाषण करताना उभय कुळे आणि पृथ्वी पावन करतात. इतकेच नव्हे तर असे भक्त (संत) तीर्थांना पावन करतात तसेच, ते जे बोलतात, त्याला वेदांत वाक्य म्हणून मान्यता मिळते.
विवेचन : भक्ति वाढत चालली की साधकाचे अष्ट सात्विक भाव जागृत होत असतात. आता अष्ट सात्विक भाव आपण पाहू.
अष्ट सात्विक भाव म्हणजे भक्तीमध्ये किंवा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये स्वाभाविकपणे प्रकट होणारी आठ प्रकारची शरीरिक-मानसिक लक्षणं. हे भाव परम भक्तीच्या अवस्थेत देवाप्रती प्रेम व एकात्मतेमुळे आपोआप उमटतात. हे “सात्विक” (शुद्ध, निर्मळ) स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना सात्विक भाव असे म्हणतात.
अष्ट सात्विक भाव :
- स्तंभ (स्तब्धता)
शरीर स्थिर होणे, न बोलणे, हालचाल थांबणे.
- स्वेद (घाम येणे)
अनोख्या आनंदाने किंवा भावानं अंगाला घाम फुटणे.
- रोमांच (रोमहर्ष)
अंगावर रोमांच उभे राहणे, थरथर सुटणे.
- स्वरभंग (गेल्यावर आवाज अडखळणे)
बोलताना गहिवर येणे, आवाज तुटक होणे.
- कंपन (थरथर)
शरीर थरथरणे, हातपाय हलणे.
- वैवर्ण (रंग बदलणे)
चेहऱ्यावर लाली, पल्लव, पांडूपणा इ. रंग बदल.
- अश्रू (डोळ्यांतून पाणी येणे)
आनंद, प्रेम, भक्तिभावाने डोळ्यांतून अश्रू येणे.
- प्रलय (संमोहनासारखी अवस्था / शून्यभाव)
शरीर व मन पूर्णपणे विश्रांतीत जाणे, समाधिस्थ अवस्था.
साधनेच्या विशिष्ट टप्प्यावर साधकाला या आठही भावांची अनुभूती येत असते. परंतु यामध्ये न गुंतता साधकाने आपली साधना, उपासना सुरू ठेवायला हवी.
जेव्हा अधिकार प्राप्त झालेले दोन भक्त भेटतात किंवा दोन संत भेटतात, तेव्हा त्यांच्यात एकतर मौनात चर्चा होते किंवा ते फक्त आपल्या गुरुबद्दल किंवा आपल्या भक्तीबद्दल चर्चा करीत असतात. तेव्हा त्यांचे अष्ट सात्विक भाव जागृत होऊ शकतात, किंवा काही वेळा झालेले अनेक साधकांनी पाहिले असेल. जिवंत साधकांच्या डोळ्यात पाणी आले यात नवल कदाचित नसेल, पण श्रीमहाराज (गोंदवलेकर महाराज) जेव्हा नैमिष्यरण्यात जायला निघाले तेव्हा थोरल्या रामाच्या डोळ्यांत पाणी आले. श्रीमहाराज त्याच्याजवळ गेले की त्याला विचारले की अरे, मी नैमिष्यरण्यात जातोय, ते तुला आवडले नाही का ? तसे असेल तर मी जाणार नाही… !
या सर्व गोष्टी परम प्रेमातूनच घडून येऊ शकतात. सर्व संतांनी भगवंतावर निरातिशय प्रेम करून त्याच्या सगुण विग्रहातून चैतन्य प्रकट करविले. चैतन्य सर्वत्र भरून राहिले असेल तर ते कोठूनही प्रगट होऊ शकते, फक्त ते प्रगट करण्याइतकी साधना, तप:श्चर्या आणि संपूर्ण शरणागती अत्यंत आवश्यक ठरते.
गंगेचे अवतरण झाले तेव्हा गंगा म्हणाली की पृथ्वीवर पापी लोकं राहतात, ते माझ्या पाण्यात स्नान करतील तेव्हा त्यांची पापे नष्ट होतील, यात बिल्कुल संदेह नाही, पण मी मैली होईन तेव्हा मला कोण शुद्ध करेल. तेव्हा भगवंताने तिला वचन दिले की संतमंडळी जेव्हा तुझ्या स्नान करतील तेव्हा त्याच्या अंतरंगी असलेल्या माझ्या अंशाने तू पुन्हा पुण्यसलीला होशील. आजपर्यंत हे वचन भगवंताने पाळले आहे.
अशा एकनिष्ठ भक्तांमुळे, संतांमुळे कुळ, मूळ आणि धरित्री पावन होत असते, नद्यांना तीर्थत्व प्राप्त होत असते… ! आणि संत जे बोलतात ते शास्त्र म्हणून मान्यता पावते. आदरणीय ब्रम्हानंद महाराज म्हणायचे की मी पुस्तकातून जो वेदांत शिकलो तोच वेदांत श्रीमहाराज साध्या साध्या उदाहरणातून आणि स्व-आचरणातून जगाला सांगत आहेत. वेगळा वेदांत अभ्यासण्याची गरजच नाही. श्रींचे प्रत्येक वाक्य हे वेद वाक्य आहे, वेद वचन आहे.
जय जय रघुवीर समर्थ
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः भक्तीसूत्रे – ६६, ६७, ६८, ६९.
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





