श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ७०, ७१, ७२, ७३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ति सूत्रे ७० – –
तन्मया : ||७०||
अर्थ : भक्त भगवंतमय झालेले असतात.
विवेचन: विभक्त नाही तो भक्त अशी भक्ताची व्याख्या केली जाते. इथे तन्मय असा उल्लेख आहे. साधना पूर्णत्वास गेली की भक्त आणि भगवंत यांच्यात काही भेद रहात नाही. अशा साधकाचे वर्णन भगवंत गीतेत करतात.
*”नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय|*
*झाले ज्ञान-तपे चोख अनेक मज पावले||”*
(गीताई ०४. १०)
संताना ना कोणापासून भय असते, तर कोणासाठी त्यांच्या मनात क्रोध असतो. त्यांच्या मनात फक्त त्या भगवंताबद्दल निरतिशय प्रेम असते. जणू भगवंतच त्यांच्या ह्रदयात विराजमान असतो. आपल्याला हनुमानाची गोष्ट ठाऊक आहे. वेळ आल्यावर हनुमानाने आपली छाती विदीर्ण करून राम आपल्या हृदयात असल्याचे दाखवून दिले होते. अशी सर्व मंडळी ही सामान्य साधकांसाठी भक्तीचे आदर्श आहेत, प्रमाण आहेत.
प्रभू श्रीरामाला हनुमंताला बक्षिस देण्याकरता एकही गोष्ट योग्य वाटली नाही. शेवटी त्याने हनुमंताला आलिंगन दिले आणि त्याचे कौतुक पुढील शब्दांत केले आहे.
“रघुपति कीन्ही बहुत बड़ाई। तुम मम प्रिय भरतहि सम भाई।”
संत तुकाराम महाराज म्हणतात की साधना करता करता अशी वेळ आली की मला आता विठ्ठल माझा सोयरा वाटू लागला आहे. सोयरा अर्थात अगदी जवळचा.
ते एका अभंगात म्हणतात,
*”विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥२॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥३॥ सकळां इंद्रियां मन हे प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥४॥” तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥५॥”*
(अभंग क्रमांक 497, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)
जय जय रघुवीर समर्थ
—–
भक्ति सूत्रे क्र. ७१ –
*”मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवताः सनाथा चेयं भूर्भवति ||७१||”*
अर्थ : सिद्ध भक्ताच्या माता, पिता व पूर्वजांना आनंद होतो. देव देवता आनंदाने नृत्य करतात आणि पृथ्वीला रक्षणकर्ता मिळून ती सनाथ होते.
विवेचन : दैनंदिन व्यवहारात एखादा मनुष्य जर श्रीमंत झाला, मोठा उद्योगपती झाला तर त्याचे कूळ तर उद्धरतेच, तसेच त्याच्या कर्तृत्वामुळे अनेक लोकांना रोजगार मिळत असतो.
परमार्थातील अंतिम पायरी म्हणजे भक्त आणि भगवंताचे एकरूप होणे. असे पूर्णत्व प्राप्त करणारे तसे मोजकेच असतात, पण ते असतात यात काही शंका नाही. भारतमातेच्या अशी अनेक नररत्ने जन्मास आली की ज्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतील आणि ही परंपरा अखंड राहील यात शंका असण्याचे कारण नाही.
एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा एखाद्या जडजीवाला नरदेह प्राप्त होतो, तेव्हा भगवंताला सर्वात जास्त आनंद होतो कारण त्याला वाटते की आता मी याला नरदेह दिला आहे, तर आता हा साधना करून माझी (अर्थात भगवंताची) प्राप्ती करून घेईल, पण प्रत्यक्षात मात्र लाखो करोडो मध्ये एखादा जीव देवत्वापर्यंत पोचतो. मग ज्याप्रमाणे ऑलिंपिक पदक मिळविल्यावर ज्याप्रमाणे त्या देशातील सर्वांना आपल्या घरी दसऱ्याच्या दिवशी दिवाळी आल्यासारखे वाटतेज तसे साधकाच्या नातेवाईकांना, घरच्या लोकांना, पितरांना नव्हे तर देवदेवतांना ही तितकाच उत्कट आनंद होतो असे नारद मुनी आपल्याला सांगत आहेत.
अशा साधकाचे वर्णन संत तुकाराम महाराज आपल्या पुढील अभंगात करतात…
*”निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥ नाहीं चालों येत सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥२॥ त्यागा नांव तरी निर्वीषयवासना । कार्या कारणां पुरता विधि ॥३॥ तुका म्हणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंसी ॥४॥”*
साधकाच्या अंतरात देवत्व प्रगट झाले की तो सिद्ध होतो. देहाने मनुष्य दिसत असला तरी तो भगवंत झालेला असतो. बाहेरून त्या संताचा व्यवहार कदाचित अतिसामान्य असेल, पण अंतरात मात्र त्याचे अनुसंधान पक्के असते.
त्याच्या नजरेत सर्वजण समान असतात. ते अवतरण करतात, ते आपल्या सारख्या सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी. पूज्य ब्रम्हानंद महाराज म्हणायचे की दोन रुपयाचे तिकीट काढले की गोंदवले येथे सगुण ब्रह्म पाहायला मिळायचे. अशा संतांमुळे पृथ्वीवरील पाप नष्ट होते, पृथ्वी सनाथ होते.
जय जय रघुवीर समर्थ
—–
भक्ति सूत्रे क्र. ७२, ७३ – –
*”नास्ति तेषु जाति विद्यारूपकुलधनक्रियादि भेदः ॥७२॥”*
*”यतस्तदीय: ||७३||”*
अर्थ : श्रेष्ठ भक्तांमध्ये जातपात, विद्या (शिक्षण), रूप, कुळ, पैसा, करत असलेले काम इत्यादींवर आधारलेले भेद नसतात, कारण ते भगवतांचे एकनिष्ठ भक्त असतात.
विवेचन : ही दोन्ही एकमेकांस साधारण पुरक आहेत म्हणून त्यांचे विवेचन एकत्र करीत आहे.
भक्ति करणे म्हणजे भगवंतावर अकारण प्रेम करणे हे आपण पाहिले आहे. दैनंदिन व्यवहार करताना मनुष्याला कधी जाणता तर कधी अजाणता मनुष्याला विविध प्रकारचे भेद पाळावे लागतात, अन्यथा त्याला व्यवहार करता येत नाही. उदा. वाहन कोणतेही असले तरी त्या वाहनाला ठेवण्यासाठी वाहनतळच उचित ठरते. वाहन महागडे आहे म्हणून कोणी त्याला झोपण्याच्या खोलीत नेऊन ठेवत नाही, अर्थात ते उचितही नसते.
संत अर्थात पूर्णत्व पावलेला भक्त हा स्वतः देव झालेला असतो. संत कधीही कोणामध्ये भेद पाळत नाहीत, भेद मानीत नाहीत.
आपल्याला सर्वांना ज्ञात असलेले एक गीत आहे. — –
*”टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं*
*देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥*
*दरबारी आले रंक आणि राव*
*सारे एकरूप नाही भेदभाव*
*गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग||१||”*
या स्थितीला संत पोहचलेले असतात. कोणत्याही संताच्या स्थानी जावं, तिथे आपल्याला मुक्त प्रवेश मिळेल.
संतत्व प्राप्त केलेला मनुष्य व्यवहारातील भेद लक्षात घेऊन त्या त्या माणसांशी, त्या त्या प्राण्यांशी त्या त्या परीने वर्तन करतात.
श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात अशी अनेक उदा. आहेत. त्यातील एक दोन मी इथे सांगतो. एकदा चोरी करायला आलेल्या चोरांना श्रीमहाराजांनी पकडले. त्यांना पोलिसात न देता, पुन्हा चोरी करणार नाही या अटीवर त्यांना अनुग्रह देऊन कृपांकित केले. एका मनुष्य त्यांच्यावर विष प्रयोग करण्यासाठी आला होता. आपल्याला मारायला आलेल्या मनुष्याला सुद्धा श्रीमहाराजांनी अनुग्रह देण्याची तयारी केली होती. पण तो मनुष्य घाबरून पळून गेला. तेव्हा श्रीमहाराज म्हणून गेले, की त्याने चांगली संधी सोडली आणि स्वतःचे नुकसान करून घेतले. इतके दयासिंधुत्व संतच दाखवू शकतात. कारण स्वतः परमात्मा त्यांच्या अंतर्यामी कायम स्थित असतो.
प्रकृतीचे स्वतःचे असे विधिविधान आहे. त्यानुसार घटना घडत असतात. अमुक वेळेस पाऊस पडणार किंवा ऊन पडणार हे प्रकृतीच्या अधीन आहे. अनेक सामान्य माणसांना प्रश्न पडतो की संत अवतार घेतात, तर लोकांचे दुःख, दैन्य दूर का करीत नाहीत? या प्रश्नांची अनेक उत्तरे आजपर्यंत आपण पाहिली असतील, पण पुढील उत्तर मला अधिक उचित वाटते.
एकदा श्री रमण महर्षी यांना एकाने प्रश्न विचारला की तुम्ही आपल्या शक्तीचा इतरांच्यापी कल्याणासाठी उपयोग का करीत नाही? तर त्यावेळी रमण म्हणाले की आम्ही दोन कुठे आहोत, आम्ही एकच आहोत. अर्थात मीच परमात्मा आहे आणि मीच सर्व काही करीत आहे. त्यामुळे अनेक वेळा अनेक लोकांचा गोंधळ होऊ शकतो.
साधक जेव्हा सिद्ध होतो, तो गुरू स्वरूप होऊन जातो. तो जगदाकार होऊन जातो. एकदा श्रीमहाराजांना एका भक्ताने विचारले की आमच्या अनेक प्रश्नांचे तुम्ही इतक्या त्वरेने कसे उत्तर देऊ शकता? त्यावर श्रीमहाराज म्हणाले की मला तुमचा प्रश्न आधीच कळलेला असतो. जेव्हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो
तेव्हाच तो मला कळतो आणि जेव्हा तुम्ही येऊन मला प्रश्न विचारता, तोपर्यंत उत्तर शोधायला मला अवधी मिळतो. मग मी त्याचे उत्तर देऊ शकतो. अर्थात श्रीमहाराज आपल्या मनात उपस्थित असतात, नव्हे ते कायम आपल्या मनात असतात, असे म्हणता येईल. भगवंताची एक उपाधी मन अशीच आहे, नाही का?
*”जेथे नाम, तेथे माझा प्राण | ही सांभाळावी खुण ||”*
– – श्री गोंदवलेकर महाराज
भक्तीच्या पहिल्या पायरीवर भक्त देवाला म्हणत असतो की *तस्य एव अहम्*.
अर्थात त्याचे रूप, गुणवर्णन ऐकले आहे, पण प्रत्यक्षात तो कसा आहे हे माहित नाही. पण तो मला आवडतो.
भक्तीच्या दुसऱ्या पायरीवर भक्त देवाला म्हणतो की *तव एव अहम्*.
अर्थात भक्त भगवंताच्या सान्निध्यात असतो. भगवंत भक्ताच्या सोबतीला असतो. *”जेथे जातो तेथे तू माझा सांगाती”* अशी भक्ताची खात्री असते.
भक्तीच्या तिसऱ्या पायरीवर भक्त आणि देव एकच होत असतात. *”मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यानची* अशी स्थिती असते. देव आणि भक्त एकमेकाला म्हणतात, *त्वम् एव अहम्*. ही तदियतेची स्थिती म्हणता येईल.
यापुढील स्थितीमध्ये भक्त देवाला म्हणतो भक्तीचे सुख भोगण्यासाठी मला भक्तच राहू दे नि तू भगवंत रहा.
संत तुकाराम महाराज या स्थितीचे वर्णन पुढील प्रमाणे करतात.
*”नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव | मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥ दावी रूप मज गोपिका-रमणा | ठेवीन चरणावरी माथा ॥२॥ पाहोनि श्रीमुख देईन आळिंगन | जिवे लिंबलोण उतरीन ॥३॥ पुसता सांगेन हितगुज मात | बैसोनि एकांत सुख गोष्टी || ४|| तुका म्हणे यासी न लावी उशीर | माझे अभ्यंकर जाणोनीया ॥५॥”*
संदर्भ : अभंग क्रमांक २२७८, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था
जय जय रघुवीर समर्थ
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः भक्तीसूत्रे – ७०, ७१, ७२, ७३.
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

