श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३९ आणि ४० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३९ – – 

जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे |

जयाचेनि योगे समाधान बाणे|

तयालागी हे सर्व चांचल्य दीजे |

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|३९|

अर्थ : ज्या परमेश्वराचे वर्णन वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात, ज्याच्या जवळ गेल्याने आपल्याला अक्षय समाधान लाभते, अशा परमेश्वराला आपल्या मनातील सर्व प्रकारची चंचलता अर्पण करावी. मनाने त्याचेच होऊन राहावे.

विवेचन : माणूस आयुष्यभर सुखाच्या पाठी धावत असतो परंतु एवढी धावपळ करूनही आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्याला ते गवसत नाही. आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी देखील समाधानाचा शोध घेतला अखेरीस त्यांना ते भगवंताच्या ठिकाणीच आहे असे आढळून आले. त्याचेच वर्णन आपले वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात. म्हणून समर्थ देखील आपल्याला सांगतात की जयाचेनि योगे समाधान बाणे. त्याचा योग म्हणजे संबंध आला की अंगी समाधान बाणते म्हणजे त्याची प्रचिती येते.

संत तुकाराम महाराज म्हणतात, “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ” हे आपल्याला कळते पण वळत नाही आणि आपला सुखाचा आणि समाधानाचा शोध सुरूच राहतो. प्रत्येक परिस्थितीत आपली सुखाची आणि समाधानाची व्याख्या बदलत जाते. मला नोकरी लागली म्हणजे मी सुखी होईल, माझ्या पगारात वाढ झाली म्हणजे मी सुखी होईल, माझ्याकडे आज चार चाकी आहे, उद्या त्यापेक्षा आणखी चांगल्या प्रकारचे वाहन आले म्हणजे मला समाधान लाभेल. आणखी जमीन, आणखी घरे, बंगले यासारख्या गोष्टी माणूस मिळवण्यासाठी माणूस धडपड करतो आणि त्यासाठी आयुष्यभर धाव धाव धावतो. परंतु त्याची हाव संपत नाही. कुठे थांबायचे हे त्याला कळत नाही.

एका शेतकऱ्याची गोष्ट फार सुंदर आहे. तो आपल्या शेताच्या बांधावर आरामात झोपला होता. त्याची एका मोक्याच्या ठिकाणी शेतजमीन होती. शहरातून आलेला एक कारखानदार ती जमीन विकत घेऊन तिथे कारखाना काढण्याच्या तयारीत होता. तो त्या शेतकऱ्याला म्हणाला, “तू मला ही जमीन दिलीस तर मी तुला भरपूर पैसे देईन. तू श्रीमंत होशील. ” शेतकऱ्यांनी विचारले, ” भरपूर पैसे मिळाल्यावर आणि श्रीमंत झाल्यावर काय होईल ?” जमीनदार म्हणाला, ” वेडा आहेस का ?अरे तू अत्यंत समाधानात राहशील. ” शेतकरी म्हणायला, ” मग त्यासाठी जमीन विकायची काय गरज आहे ? मी आत्ता देखील समाधानीच आहे. ” एका सामान्य शेतकऱ्याला जी गोष्ट कळली ती आपल्याला कळत नाही.

परमेश्वर प्राप्तीच्या आड जर काही येत असेल तर ते म्हणजे आपले मन ! आपले मन अतिशय चंचल आहे आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून तर एका गाण्यात म्हटले आहे, ” माझिया मना जरा जरा थांब ना, तुझे धावणे अन् मला वेदना !” म्हणून समर्थ म्हणतात की आपले हे चांचल्य म्हणजे चंचलता भगवंताला अर्पण करून आपली चित्त त्याच्याकडे केंद्रित करावे. त्याचे ध्यान लागावे.

गीतेत भगवंत म्हणतात ” सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ” सर्वधर्म म्हणजे आपली सुखदुःखे, कर्म, वासना आदी सगळे भगवंताला अर्पण करून त्याला शरण जावे. तो आनंदनिधान आहे. अक्षय सुख आणि समाधान त्याच्याच ठायी आहे.

स्वसंवाद :: 

१) मी ज्या सुखाच्या शोधात धावत आहे, ते खरोखरच मला समाधान देणारे आहे का? की ही केवळ अंतहीन धावपळ आहे?

२) माझ्या मनातील चंचलता, अपेक्षा आणि असंतोष मी कधी परमेश्वराला अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे का?

३) “समाधान” ही बाह्य गोष्टींमध्ये नसून अंतर्मनात आहे हे मला खरेच पटले आहे का? (क्रमशः)

– – – – 

श्लोक क्र. ४० – – 

मना पाविजे सर्वही सुख जेथे ।

अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ।

विवेके कुडी कल्पना पालटीजे ।

मना सज्जना राघवी वस्ती कीजे ।४०।

अर्थ :  समर्थ आपल्या मनाला सांगतात की हे मना, सर्व सुखे जिथे प्राप्त होतात अशा त्या परमेश्वराकडे अतीव अशा आदराने आपले लक्ष केंद्रित कर. योग्य अयोग्यतेचा विचार करून वाईट विचारांचा/कल्पनांचा त्याग कर आणि राघवाच्या ठिकाणी आपले मन असू दे.

विवेचन : आधीच्या श्लोकात आपण पाहिले की सुखाची आणि समाधानाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला यश तर कोणाला कीर्ती तर कोणाला आणखी काही… माणूस क्षणिक मोहाला बळी पडतो आणि त्या सुखाच्या मागे धावतो परंतु अंतिमतः सुखाऐवजी दुःखच पदरात पडते. क्षणकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण फार मोठी किंमत मोजून दुःख पदरात घेतो.

काम, क्रोध, लोभ, मोह यासारख्या विकारांनी मन दूषित होते. असे मन आणखी वाईट विचारांना जन्म देते. माणसाची दिवसेंदिवस अधोगती होत जाते. ज्याप्रमाणे गढूळ पाण्यात आपल्याला प्रतिबिंब दिसत नाही तसेच नाना प्रकारच्या विकारांनी दूषित झालेल्या मनात भगवंताचे प्रतिबिंब पडणे शक्य नसते. म्हणूनच अशा वाईट विचारांचा विवेकपूर्वक त्याग करणे आवश्यक असते. कुडी कल्पना म्हणजे वाईट विचार. ज्या गोष्टी किंवा जे विचार भगवंतापासन दूर नेतात, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुडी कल्पना असे म्हणता येईल. म्हणून तर “सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचि तो मानवी धन्य होतो” हे समर्थांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितले आहे.

एखाद्या विद्वत् सभेत जर विद्वानांना एखाद्या विषयावर त्यांचे मत विचारले तर प्रत्येकाची वेगवेगळी मते येतील. तात्पर्य त्यांच्यामध्ये एकाच विषयावर एकवाक्यता नसते. पण जर सर्व खऱ्या संतांचा (भोंदू बाबा नव्हे) मेळा भरला आणि त्यांना जर अंतिम सुख आणि समाधान कशात आहे हे विचारले तर त्या विषयावर त्यांचे एकमत होईल, एकवाक्यता असेल आणि एका सुरात “भगवंत” असेच उत्तर त्यांच्याकडून येईल.

संत हे ईश्वराचे प्रतिनिधी असतात नव्हे ईश्वर स्वरूपच असतात. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग ते आपल्याला दाखवतात. त्यांना लोकांच्या कल्याणाची तळमळ असते. जर अशा सर्व संतांचे अंतिम समाधान हे भगवंताच्या ठायी आहे असे एकमत असेल तर आपण ते का स्वीकारू नये ? 

क्षणिक सुखाच्या मागे लागण्यापेक्षा मग संत सांगतात तो मार्ग का स्वीकारू नये ? पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे.. असे संत चोखामेळा आपल्याला सांगतात. तर देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या… असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. संतांचे हे सांगणे आपण लक्षात घ्यायचे नाही का? थोडा विचार केला म्हणजेच विवेकाने वागायचं ठरवलं तर ही गोष्ट आपल्याला पटेल. म्हणून संतांचे सांगणे शिरोधार्य मानून आपण विवेकाने वाईट विचारांचा त्याग करावा आणि राघवाकडे आपले मन लावावे.

स्वसंवाद :: 

१) माझे मन गढूळ आहे की स्वच्छ – आज माझ्या मनात कोणते विचार जास्त असतात, चांगले की वाईट ?

२) विद्वान आणि संत यांच्यात फरक आहे – मी माझ्या जीवनात कोणाचे मार्गदर्शन घेतो, बुद्धीचे की श्रद्धेचे ?

३) “विवेके कुडी कल्पना पालटीजे” – आज मी कोणत्या एका वाईट विचाराचा किंवा सवयीचा विवेकाने त्याग करण्यास तयार आहे ?

४) संत चोखामेळा, ज्ञानेश्वर, तुकाराम सर्वांनी एकमताने भगवंत हेच अंतिम सुख सांगितले – हे माझ्या मनाने खरोखर स्वीकारले आहे का ?

– क्रमशः श्लोक ३९ आणि ४०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments