श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ यक्ष गान... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. कालिदास दिन! त्यानिमित्त मेघदूताचे स्मरण.)
☆
मनोमंडलामधे मेघ हे पहा स्मृतींचे तुझ्या दाटले
विरह वेदना साहू कशी मी असे कसे ग भोग आपले
*
मृगलोचन ते नजर बोलकी सांग कशी मी विसरु
कस्तुरगंधीत सुवर्णक्षण ते सांग कितीदा स्मरु
*
सांगू तुजला कशी इथे ग वाळून जाई काया
आता इथे ग क्षणाक्षणाला तुझी आठवे माया
*
जाणशील का ह्रदयामधल्या कोमल या भावना
विरह गीत हे गात येथ मी, येईल का तव श्रवणा
*
भाग्यच माझे, म्हणून होते स्वप्नी तव दर्शन
धडपडते मन तशात द्याया, तुजला आलिंगन
*
उत्सुक तुजला भेटाया पण, यावे सांग कसे
विरहव्यथेचे होईल दर्शन, जगात आणि हसे
*
क्षणाक्षणांची युगे जाहली सरतील कधी हे दिन
तडफडते मन येथ जसे की जळावाचुनी मीन
*
सुखद:खाचा खेळ असे हा कळते सारे जरी
विरह वेदना मनात सलते उरते ती अंतरी
*
स्नेहबंध हे तव प्रेमाचे सुखविती माझ्या चित्ता
दुरावाच का आणिल अपुल्या प्रीतिला गाढता
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






