श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)
मनमंजुषेतून
☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ८ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆
वेळ…
वेळ (Time) या विषयी अनेकांचे अनेक समज आणि गैरसमज आहेत. हल्ली तर लोकं वेळ मिळत नाही असे न म्हणता वेळ भेटतं नाही असे म्हणताना पाहतो…! काही ठिकाणी ती बोलीभाषा असू शकेल, पण ते खरे बोलतात असे मला आता वाटायला लागले आहे… , कारण लोकांना अनेक गोष्टी करायला वेळ मिळत नाही, पण गर्दी मात्र सर्वत्र आहे…
वाहतुकीच्या माध्यमांमध्ये प्रचंड वैविध्य आणि प्रगती झालेली असताना, दोन शहरांमधील अंतर कमी झालेले नसले तरी या माध्यमांमुळे प्रवासाचा वेळ नक्कीच कमी झाला आहे…
तरीही लोकांना एकमेकांकडे जायला, भेटायला, बोलायला, आपुलकीने चौकशी करायला, शिळोप्याच्या गप्पा मारायला वेळ नाही…
आज इतकी भयानक परिस्थिती आहे की कित्येक दिवसांत लोकांनी आपल्या शेजाऱ्याचे तोंड पाहिलेले नाही… , कित्येक दिवसांत मनुष्य आपल्या प्रियजनांना भेटलेला नाही, कित्येक दिवसांत त्याने मित्रांसोबत टपरीवर किंवा एकमेकांच्या घरी जाऊन चहा प्यायलेला नाही, अशा अनेक न केलेल्या गोष्टी आपल्याला आता आठवतील… , हो न? हातात फोन आहे, म्हणून मनुष्याने दूरच्या माणसांची सोडून देऊ, शेजारच्या माणसाची चौकशी केली आहे असे म्हणणे आता धाडसाचे ठरू शकेल…
पटतंय ना?
पूर्वी आळीमध्ये, चाळींमध्ये गप्पांचे फड पडायचे, मग एकेकाच्या घरातील लाडू, चिवडाचे, पोह्याचे डबे रिकामे व्हायचे, इकडे डबे रिक्कामे होत असताना, तिकडे माणसांची मने मात्र भरून पावायची… , माणसांना माणसांचा उबदार सहवास लाभायचा… , यातून मनुष्याच्या मनात असलेल्या अनेक गोष्टींचा, तणांचा आणि तणावांचा कळतनकळत निचरा व्हायचा…!
– – कारण… तेव्हा वेळ मिळत होता असे नाही, तर लोकं एकमेकांसाठी वेळ काढत होती… , त्यांना माणुसकीतील आनंद अत्यावश्यक वाटतं होता…
… आज लोकं वस्तू, त्यांचा संग्रह आणि त्याची जाहिरात करण्यात आनंद मानत आहेत… , असो…!!
आज आपल्या लक्षात येत आहे की मनुष्य, त्याने स्वतःच निर्माण केलेल्या जीवघेण्या स्पर्धेच्या चक्रव्यूहात आणि वेळेच्या कचाट्यात अडकत चालला आहे… , तो इतका अडकला आहे की तो आता फक्त घडाळ्याच्या काट्याप्रमाणे नुसता पळत चालला आहे… , त्याने जगायचे कधीच सोडून दिले आहे…
अनेकांची वेळ साधता साधता मनुष्य त्याच्यासाठी, खऱ्या स्वार्थासाठी, वेळ काढणे विसरून गेला आहे…
.. बरेच दिवसांत त्याने सूर्योदय पाहिलेला नाही…
.. द्वितीयेच्या चंद्राची कोर पाहिलेली नाही…
.. लेकराला कुशीत घेऊन चांदोमामा दाखवलेला नाही…
.. पतीचा किंवा पत्नीचा हात हातात घेऊन मूक संवाद साधलेला नाही…
.. आईच्या कृश झालेल्या मांडीवर डोके ठेवलेलं नाही…
.. बाबा, तुम्ही खूप कष्ट केलेत आता तुम्हाला हवे ते करा असे म्हटलेले नाही…
कारण…
कारण.. वेळ नाही..
या वेताळाला वेळीच आवर घालून आपण आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढू…
चालेल ना?
– लेख क्र. ८
© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर



