श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ महावस्त्राचे पदर – भाग ४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
(नात्यांचं महावस्त्र : ‘आजी’ (संस्कारांची शिदोरी))
☆
माझ्या कल्पनेतील आजी अशी आहे…
मायेचे आगर, प्रेमाचा सागर,
ज्ञानाची घागर असे आजी!
आजीची पोतडी गोष्टींनी समृद्ध,
आजीचा बटवा औषधांनी…
शुभ्र केसांचा मऊ अंबाडा, बोलणे तिचे प्राजक्ताचा सडा.
दातांची जरी कवळी, मनाने सदा राही देवाजवळी.
सुरकुत्यांचे जाळे अंगावरी पण
बोलण्यातून फुलती हास्य लकेरी.
आईबाबा नसता, आजीचा फिरे हात,
प्रेमाची ती साथ सुरक्षेची!
आजीच्या हाताला चव फार,
दुधात साखर असे आजी!
आजी म्हणजे फक्त नाव नसतं
वर्तमानाला भूत आणि भविष्याशी जोडणारं एक गाव असतं.
आजची आजी त्या मानाने अधिक आधुनिक आणि आपले आरोग्य उत्तम राखणारी आहे पण तिच्या मनातील नातवंडांबद्दलचे प्रेम आणि सगळ्यांबद्दलची माया कायमच असते!
‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आईची ‘मायेची पैठणी’ आणि बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’ आपण पाहिली. पण या वस्त्राला पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या संस्कृतीची, परंपरेची आणि बिनशर्त प्रेमाची जरतारी किनार देणारं एक अथांग नातं म्हणजेच ‘आजी’! आजी म्हणजे मूर्तिमंत माया आणि प्रेम! अनुभव आणि ज्ञान, प्रेम आणि शिस्त, अध्यात्म आणि व्यवहार या सगळ्या गुणांची अनोखी सांगड म्हणजे आजी.
खरं तर, आज्यासुद्धा दोन असतात—एक वडिलांची आई आणि दुसरी आईची आई (आजोळची आजी). या दोन्ही आज्यांची नावं जरी वेगवेगळी असली, तरी दोन्हीकडे मिळणारी मायेची ऊब मात्र एकच असते. एक आजी घरात राहून आपल्यावर रोज संस्कारांचे सिंचन करते, तर दुसरी आजोळची आजी सुट्ट्यांमध्ये लाड पुरवून बालपणात आनंदाचे रंग भरते. या दोन्ही आज्यांच्या छायेत वाढणारं मूल आयुष्याच्या बाजारात कधीच अपयशी ठरत नाही. खरं तर नातवंडांना दुधावरची साय म्हटलं जातं, पण अंगावर सुरकुत्या पडलेल्या आजीची माया या दुधावरच्या सायीसारखीच घट्ट आणि समृद्ध असते!
मला माझी आजी आठवते. तिच्याबद्दल या ठिकाणी थोडं सांगणं नक्कीच अनुचित होणार नाही. माझं बालपण एका अगदी छोट्याशा खेडेगावात गेलं. मी साधारण चौथीच्या वर्गात असेपर्यंत माझी आजी आमच्यासोबत होती; त्यामुळे मला ती अगदी स्पष्ट आठवते. आजी फारशी शिकलेली नव्हती, पण तिच्याजवळ पारंपरिक आणि अनुभवजन्य ज्ञानाचे अथांग भांडार होते. ती अतिशय प्रगत विचारांची होती, नवीन चांगल्या गोष्टींना तिचा कधीच विरोध नसायचा.
मी बाहेरून खेळून आलो की आजी मला आधी सक्तीने हातपाय धुवायला लावायची; त्याशिवाय पाणी पिण्यासाठी माठाकडे जाऊ देत नसायची. मला तर खेळून आल्यामुळे तीव्रतेने तहान लागलेली असायची, त्यामुळे त्यावेळी मला कधी कधी तिचा खूप राग यायचा. पण आज मोठं झाल्यावर, जगाचा अनुभव आल्यावर कळतं की तिचं ते सांगणं आरोग्याच्या दृष्टीने किती बरोबर होतं! कोरोनाच्या भीषण काळात तर आपण सर्वजण याच गोष्टीबाबत अगदी दक्ष राहायला लागलो होतो, जी शिस्त आजीने आपल्याला बालपणीच लावली होती.
लहनपणी आम्हाला ‘आजीचे घड्याळ’ या नावाची एक सुंदर कविता होती. माझी आजी अगदी तशीच होती! तिच्याजवळ घड्याळ नव्हतं, पण तिच्या सगळ्या गोष्टी अगदी वेळच्या वेळी व्हायच्या. सकाळी पहाटे लवकर उठून धार्मिक वाचन, जप या गोष्टी ती नित्यनेमाने करायची. संध्याकाळी मला देवाजवळ हक्काने बसवून ‘शुभंकरोती’ म्हणायला लावायची आणि देवादिकांच्या रंजक गोष्टी सांगायची. आजी म्हणजे संस्कारांची एक चालतीबोलती पाठशाळाच होती.
पूर्वीच्या काळी लग्न फार लवकर होत असत. माझी आई सांगते की, तिचं लग्न माझ्या मामांनी ती अवघ्या १४-१५ वर्षांची असतानाच करून दिलं होतं. तिचे आई-वडील ती लहान असतानाच वारले होते, त्यामुळे मामांनीच तिला मायेने वाढवलं. खरं तर तिचं ते वय शाळेत जाण्याचं आणि बागडण्याचं होतं; पण परिस्थितीमुळे तिला फार शिक्षण घेता आलं नाही. लग्न होऊन नवीन घरात आल्यावर तिला स्वयंपाक वगैरे गोष्टी फारशा येत नव्हत्या. पण माझी आजी, जी नात्याने तिची सासू होती, ती तिची खऱ्या अर्थाने ‘आई’ झाली! तिने माझ्या आईला अगदी पोटच्या मुलीसारखं मानून स्वयंपाकापासून प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी मायेने शिकवल्या. सासू-सुनेच्या नात्याला आई-मुलीचं रूप देणाऱ्या माझ्या अशा आजीचा मला खरोखरच सार्थ अभिमान वाटतो.
आई-बाबांचे जग हे सहसा शिस्तीचं, कर्तव्याचं आणि आजच्या काळात खरं तर खूप धावपळीचं असतं. अशा वेळी घरात आजी असणे म्हणजे दुधात साखर पडण्यासारखे आहे. आई-बाबा घरात नसले, तरी पाठीशी आजी असल्यामुळे त्यांना मुलांची अजिबात चिंता नसते. आई-बाबांच्या शिस्तीचा आणि ओरड्याचा उन्हाळा जेव्हा मुलांच्या वाटेला येतो, तेव्हा आजीच्या पदराची सावली हिमालयासारखी शीतल आणि उबदार ठरते. आईने रागवून हात उगारला की मुलं रडत जिथे जाऊन लपतात, ते जगातील सर्वात हक्काचं आणि सुरक्षित ठिकाण म्हणजे आजीची कुस!
आजीचे ते पिकलेले पांढरे शुभ्र केस हे केवळ वयाचे लक्षण नसते, तर त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या शेकडो उन्हाळ्या-पावसाळ्यांच्या समृद्ध अनुभवाचे ते संचित असते. म्हणूनच, जेव्हा घरावर किंवा प्रपंचावर एखादे संकट येते, तेव्हा आजीचा हा प्रदीर्घ अनुभव घरातील माणसांना संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य दिशा दाखवतो. आजीचा तो जुना लाकडी बटवा आजही अनेकांना आठवत असेल. त्यात केवळ खोबरेल तेल, सुंठ, वेखंड किंवा लवंग नसायची; तर बालपणातल्या प्रत्येक लहान-सहान आजारपणावर फुंकर घालणारा ‘मायेचा परिसस्पर्श’ असायचा. आजच्या ‘अलोपॅथी’च्या काळातही आजीच्या बटव्यातल्या काढ्याची जी चव आणि गुण होता, तो कोणत्याही महागड्या औषधात मिळू शकत नाही. आजकालच्या बऱ्याच नवीन लग्न झालेल्या आणि नुकत्याच माता बनलेल्या आधुनिक स्त्रियांना त्यांचं मूल रडू लागलं की त्या घाबरून जातात, अशा वेळी काय करावं हे त्यांना सुचत नाही. पण घरात जर सासूबाईंच्या रूपाने आजी हजर असेल, तर आजीकडे अशा प्रत्येक प्रसंगाचे हमखास आणि शांत करणारे उत्तर तयार असते.
आजी आणि नातवंडं यांच्यातलं सर्वात मोठं आणि सोनेरी माध्यम म्हणजे ‘गोष्टी’! आजीची ती जुनी पोतडी नेहमीच अद्भूत गोष्टींनी समृद्ध असायची. रात्रीच्या वेळी आजीच्या कुशीत शिरून चांदोबाच्या गोष्टी, परिकथा, इसापनीती किंवा रामायण-महाभारतातील पराक्रमाच्या कथा ऐकणे हा बालपणीचा सर्वात सुंदर महोत्सव असायचा. त्या गोष्टींमध्ये जो निखळ आनंद होता, तो आजच्या दूरचित्रवाणीवरील ‘कार्टून्स’मध्ये नक्कीच नाही. आजी केवळ गोष्टी सांगत नसायची, तर त्या गोष्टींच्या रंजक माध्यमातून ती मुलांच्या नकळत त्यांच्या कोऱ्या मनावर ‘नैतिकतेची’ आणि ‘संस्कारांची’ पेरणी करत असायची. तिने लावलेली ‘शुभंकरोती’ची आणि रामरक्षेची सवय मुलांच्या आयुष्याला अंतर्गत शुद्धता देऊन जाते आणि आयुष्यभर हे संस्काराचे देणे माणसाला सुखद जगण्यासाठी उपयोगी पडते.
पण कधी कधी मनात अशी शंका येते की, आपण भौतिक सोयी-सुविधा मिळवून खरंच प्रगती करत आहोत का? कारण आजी-आजोबांसारखे मायेचे वटवृक्ष आज घराघरातून नाहीसे होताना दिसत आहेत. आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, बदलत्या कौटुंबिक चौकटीमुळे हे चित्र तर खूपच बदलले आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन ‘विभक्त कुटुंबे’ आली आणि शहरीकरणाच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये आजची लहान मुले आजीच्या या अथांग मायेला मुकत चालली आहेत.
आई-बाबा दोघेही नोकरीवर गेल्यावर मुले पाळणाघरात किंवा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोके खुपसून बसलेली दिसतात. मोबाईलवरील ‘यूट्यूब’च्या स्क्रीनवर निर्जीव आवाजात गोष्टी ऐकणे आणि आजीच्या उबदार कुशीत तिच्या हृदयाची जिवंत धडधड ऐकत गोष्ट ऐकणे, यातील जमीन-अस्मानाचा फरक आजच्या डिजिटल पिढीला समजणार कसा?
आजच्या काळाची ही मोठी शोकांतिका आहे की, ज्या आजीच्या पंखांखाली संपूर्ण घर सुरक्षित राहायचे, ती आजी आज अनेक ठिकाणी वृद्धापकाळात एकाकी पडलेली दिसते. आयुष्याच्या या संध्याकाळी तिला पैशांपेक्षा आपल्या मुलांच्या आणि नातवंडांच्या दोन गोड शब्दांची, त्यांच्या वेळेची भूक असते. ज्याप्रमाणे वाळलेल्या पानांनी कधीकाळी आपल्याला रखरखत्या उन्हात मायेची सावली दिली होती, तसेच आजीच्या पिकलेल्या केसांचा आणि तिच्या सुकून गेलेल्या हातांचा आदरयुक्त सन्मान करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.
नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा आजी नावाचा पदर आपल्या संस्कृतीचे खरे वैभव आहे. ही आपली ठेवणीतली पैठणी आहे. ही मायेची सावली घरात जपणे आणि तिच्या अनुभवाचे गाठोडे पुढच्या पिढीकडे आदराने सुपूर्द करणे, हीच खऱ्या अर्थाने या महावस्त्राची वीण घट्ट करणे आहे. संस्कृती, संस्कार आणि प्रेम जपायचं असेल आणि ते पुढील पिढीकडे सुरक्षित सुपूर्द करायचं असेल, तर ‘आजी’ ही गोष्ट कुटुंबातून कधीही ‘माजी’ होता कामा नये! ही तुमची, आमची आणि या समाजाची संयुक्त जबाबदारी आहे.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




