दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ मौन…  ☆ दीपा नारायण पुजारी ☆

मौन म्हणजे चूप राहणं, निशब्द असणं. मौन पाळणं, म्हणजे न बोलणं.

मौन पाळणं जर साधलं तर आपल्या जिभेवर आपला संयम राहतो. मौनात एक विलक्षण सामर्थ्य आहे. न बोलता खूप काही साधता येतं.

मौन राहून एखादं काम करताना एकाग्रता वाढते. वाढलेली एकाग्रता कामातली उत्कटता वाढवते. काम अधिक चांगले होतं.

कधी कधी बोलून सांगून न जमणाऱ्या गोष्टी मौन साधून साधता येतात. मौन साधणारा अंतर्मुख होतो. त्यामुळे तो आत्मपरीक्षण करू शकतो. वरवर सोपी, साधारण वाटणारी क्रिया; आत्मिक उन्नतीचा साधा मार्ग आहे. जसे पैसे वापरले की संपतात. वापर केल्याने वीज संपते, पाणी संपते आणि त्यातील ऊर्जा संपत्ती नष्ट होते. त्याचप्रमाणे आपण बोलून आपली ऊर्जा, आपली शक्ती नष्ट करतो. विजेचा संचय केल्यास ऊर्जा साठून राहते. अगदी त्याचप्रमाणं, मनाचं मौन पाळल्यास आपल्या अंतरीक ऊर्जेचा ऱ्हास थांबतो. आपली शक्ती वाढते.

योग्य वेळी शांत राहणं महत्त्वाचे असतं. मौनामुळं भांडणं, वादविवाद टाळता येतात. शांतता टिकून राहते.

तसं पाहिलं तर, वाणी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. डोळे, नाक, कान, त्वचा आणि याबरोबरच जीभ हे देखील महत्त्वाचं ज्ञानेन्द्रिय आहे. जिभेचा उपयोग आपण बोलण्यासाठी आणि चव घेण्यासाठी करतो. दोन्हींचा अतिरेक घातकच ठरतो. मौनव्रत म्हणजे मानसिक तपच आहे. परंतु वाणीला विराम देणं इतकं सोपं नाही. सर्वांनाच ते जमत नाही. आपल्यामध्ये काहीजण असे असतात की, त्यांच्या तोंडात तीळही भिजत नाही. न बोलता राहणं अशक्यप्राय असतं बऱ्याच जणांच्यासाठी! त्यांची जीभ सतत चालू असते. विषय कोणताही असो, त्यातील काही माहिती नसली, तरी ते बोलत असतात. बोलण्यासाठी काही असो वा नसो पण त्यांच्या बडबडीत खंड पडत नाही.

समंजस लोक कमी बोलतात.त्यांना त्याचे काही फायदेही मिळतात. काही गोष्टी साध्य होतात.

मौन पाळणं म्हणजे तोंडानं न बोलणं एवढाच मर्यादित अर्थ नाही हं. खाणाखुणा करणं, लिहून दाखवणं, चेहऱ्यावर विविध भाव प्रगट करणं, मान हलवणं यातलं काहीही न करता राहणं म्हणजे खरं मौन. मौनकाळात व्यावहारिक गोष्टींचा विचार करायचा नसतो. कोणते; अगदी कोणतेच विचार मनात आणायचे नसतात. चित्ताची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न मात्र करत राहायचं असतं. म्हणून चिंतन करण्याची कला मौनव्रतामुळे शिकून घेता येते. त्यामुळे विकारांवर ताबा मिळवता येतो. काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर असे विकार मनात उत्पन्न होत असतात. मनातील विचारांनी या षड्रिपुंना खतपाणी घातलं जातं. विचारांमुळे शरीराची ऊर्जा खर्ची पडते. अस्वस्थता वाढते. केवळ वाणीनेच नाही तर, मनातल्या मनात बोलणेही बंद करता आलं पाहिजे. मग या षड्रिपुंना जिंकता येईल. म्हणून नेहमी नेहमी नाही तरी, प्रसंग परत्वे मौन पाळायला काय हरकत आहे? कारण मुद्देसूद प्रसन्नता देणारं, आनंद देणारं बोलणं ही एक संवाद कला आहे. शब्द चुकले की गोंधळ होतो.

शब्दामुळे दंगल, शब्दांमुळे मंगल|

शब्दाचे हे जंगल, जागृत रहावं||

जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता |

पाणी, वाणी, नाणी नासू नये ||

तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या या ओळी किती सार्थ आहेत! जिभेवर ताबा मिळवला पाहिजे हे खरंच आहे.

कधी कधी मौनातही संवाद असतो. म्हणून मौन हे एक असं साधन आहे, जे न बोलता ही सांगण्याचं काम करतं. अर्धा ओरडा करून जे सांगता येत नाही ते मौनात सांगता येतं. मौन म्हणजे स्वतःच्या गोंधळलेल्या भावनांचं संयोजनही असू शकतं. मौन ही एक सकारात्मक, विधानात्मक शैली आहे. शक्तिशाली शैली आहे. कारण, मौन पाळणाऱ्यांच्या आजूबाजूचे लोकही ही व्यक्ती का बोलत नाही, याचा विचार करता करता अंतर्मुख होतात आणि न बोलता प्रश्न सुटतात. म्हणूनच मौन म्हणजे विरोध नाही तर मौन एक परीक्षण आहे.

© दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
1
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted