सौ शोभा जोशी
इंद्रधनुष्य
☆ “राणी मा गाईदन्ल्यू…” ☆ सौ शोभा जोशी ☆
आपल्या निःस्वार्थ कर्माने दुसर्याच्या मनात सदैव घर करून जगणे हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे. अशी कमाई करणारे आपल्या देशात असंख्य लोक आहेत. अगदी जनजातीत सुध्दा. त्यापैकीच एक आहेत राणी मा गाईदन्ल्यू.
भारताच्या उत्तर पूर्वेकडचा भाग पूर्वांचल या नावाने प्रसिध्द आहे. या भागात असणार्या सात राज्यांना ‘ सेव्हन सिस्टर्स ‘असही म्हटलं जातं.
बर्फाचे डोंगर, दर्या, नद्या, धबधबे, झाडी, दरीत पसरलेले धुके, धुके घेत असलेले विविध आकार अशा नैसर्गिक सौंदर्यानी ही राज्ये नटलेली आहेत.
या सात राज्यांपैकी मणीपूर राज्यात, उहूसैन व मकरू या नद्यांमध्ये काला नागा पर्वतांची रांग आहे. या रांगांमध्ये नागा नावाची जनजाती राहाते. तेथील लंकोवा गावामध्ये २६ जानेवारी १९१५ ला गाईदन्ल्यू यांचा जन्म झाला. त्यांच्या वडीलांचे नाव लोथोनाग व आईचे नाव करोतलीन्ल्यू होते. सात बहिणी आणि एक भाऊ असा त्यांचा मोठा परिवार होता. गाईदन्ल्यूचा अर्थ चांगला मार्ग दाखवणारी. ‘ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ अशी आपल्याकडे म्हण आहे. गाईदन्ल्यू लहानपणापासूनच स्वतंत्र विचारांच्या, दृढ इच्छाशक्ती असलेल्या, प्रतिभासंपन्न, आणि चिंतनशील होत्या. गल्लीतील मुलांमध्ये त्या जास्त हुशार, समजदार आणि तीक्ष्ण बुध्दीच्या होत्या. लहानपणापासूनच इंग्रजांचे अत्याचार त्या पाहात होत्या. आपल्या संस्कृतीवर, धर्मावर होणारं ख्रिस्तींचं आक्रमण त्या पाहात होत्या. म्हणून आपल्या संस्कृतीचं, धर्माचं इंग्रजांपासून रक्षण करणं, रूढी, परंपरा टिकवून ठेवणं, अंधश्रध्दा दूर करणं तसंच इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावणं हे ध्येय त्यांनी उराशी बाळगलं होतं.
त्यांचा चुलत भाऊ हैपोउ जादोनांग हा त्यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठा होता. त्यानं ‘ हेरका ‘ हे धार्मिक आंदोलन सुरू केलं होतं. त्या धार्मिक आंदोलनाचा प्रभाव गाईदन्ल्यूंवर पडला. हे धार्मिक आंदोलन हळू हळू स्वतंत्रता आंदोलनाकडे झुकलं. इंग्रजांनी हे धार्मिक आंदोलन मोडून काढण्यासाठी १९३१ मध्ये जादोनांगला कैद केलं. त्याच्यावर खटला चालवून २० आॅगस्ट १९३१ ला त्याला फाशी दिले.
त्याच्या मृत्यूनंतर आंदोलनाची सूत्रं वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गाईदन्ल्यू यांच्याकडे आली आणि लहान वयातच त्यांनी इंग्रजांविरूध्द लढा द्यायला सुरूवात केली. त्या खूप आक्रमक झाल्या. ‘ हम आजाद लोग है। गोरे हमपर राज नही कर सकते।’ अशी त्यांनी घोषणा दिली.
त्यांनी जेमी आणि रोंगमै नागा या जनजातींना एकत्र केले. या जनजाती पुढे जेलियांगरांग हराका नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. स्थानिक लोकांना आंदोलनात ओढण्यासाठी त्यांनी, इंग्रजांना टॅक्स देऊ नका असं लोकांना सांगितले. इंग्रजांच्या जाचाला लोकही कंटाळले होते. त्यांनी त्यांचा सल्ला मानून टॅक्स देणं बंद केलं. इंग्रज भडकले. त्यांनी लोकांवर कारवाई सुरू केली. गाईदन्ल्यू आपल्या साथीदारांसह भूमीगत राहून इंग्रजांवर हल्ले करत राहिल्या. आणि त्यांना भीतीच्या छायेत ठेवले. त्यांच्या या गनिमी काव्याच्या लढाईने इंग्रज जेरीस आले. त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला होता. काय करावे इंग्रजांना समजेना. त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या पण त्या हाती लागल्या नाहीत. इंग्रजांनी त्यांना पकडून देणार्याला २००/- रू. चं आणि नंतर ५००/- रू. बक्षीस जाहीर केलं, त्यांची माहिती देणार्याचा कर १० वर्षं माफ केला जाईल अशीही लालूच दाखवली. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यावेळी गाईदन्ल्यूंचं वय अवघं १६ वर्षांचं होतं. त्यांच्या या लढ्याचा प्रभाव, आसाम, मणिपूर, नागालॅंड या राज्यांवरही होता.
१६ फेब्रुवारी १९३२ रोजी आसाम रायफल्सच्या सैनिकांबरोबर त्यांची लढाई झाली. पण त्यावेळीही इंग्रजांना त्यांना पकडता आले नाही. या लढाईला ‘ हैग्रम की लढाई ‘ असं म्हणतात.
नंतर त्या पोलोमी गावी गेल्या. आपल्या साथीदारांसह त्यांनी तिथं आऊट पोस्ट बनवायला सुरूवात केली. त्याची कुणकुण इंग्रजांना लागली. त्यांनी मोठं सैन्य पाठवून त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला अनपेक्षित असल्यानं आणि त्या दुसर्या कामात गुंतलेल्या असल्यानं बेसावध होत्या. लढाईच्या तयारीत नव्हत्या. त्यामुळं त्या पकडल्या गेल्या. त्यांना कोहिमाला पाठवलं गेलं. त्यांना तुरूंगवासाची शिक्षा झाली. त्यांनी १४ वर्षं तुरूंगवास भोगला. या १४ वर्षांत त्यांना अनेकदा निरनिराळ्या तुरूंगात हलवण्यात आलं.
१९३७ मध्ये पं. नेहरूंना त्यांचा पराक्रम कळला. त्यांनी शिलाॅंगच्या तुरूंगात त्यांची भेट घेतली. ‘आपण तर नागांच्या राणी आहात ‘ असं म्हणून त्यांनी त्यांचा गौरव केला. नेहरूंनी, गाईदन्ल्यूंची तुरूंगातून सुटका करावी अशी मागणी इंग्रजांकडे केली. परंतु इंग्रजांनी ती धुडकावून लावली. कारण त्यांना सोडलं तर त्या पुन्हा उठाव करतील अशी भीती इंग्रजांना होती.
स्वातंत्र्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली. सूर्याला जरी तात्पुरतं ग्रहण लागलं तरी तो कायमचा निस्तेज थोडाच होतो! त्या पुन्हा झळाळून उठल्या. त्यांनी समाजकार्याला वाहून घेतलं. शेवटपर्यंत त्या राष्ट्रहिताकरता संघर्ष करत राहिल्या. आपल्या स्वातंत्र्याच्या रजत जयंतीला त्यांना ताम्रपट देऊन गौरविण्यात आलं. हा सन्मान मिळवणार्या त्या एकमेव महिला होत्या. १९८२ ला पद्मभूषण देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं.
१८८५ साली झालेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या भिलाई येथील पहिल्या महिला संमेलनास त्यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी महिलांना आवाहन केलं की, आपण देशाचे, धर्माचे, भारतीय संस्कृतीचे, आमच्या अस्तित्वाचे रक्षण करावे. मी कधीही धर्म बदलणार नाही, विदेशी होणार नाही. कारण मी हिंदू आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. असं प्रत्येक महिलेनी ठरवलं पाहिजे. अशा या निस्सीम देशभक्त, प्रखर हिंदूधर्माभिमानी, पराक्रमी, निष्ठावान, संस्कृतीरक्षक, समाज हिताचे रक्षण करणार्या गाईदन्ल्यूंना १७ फेब्रुवारी १९९३ रोजी देवाज्ञा झाली.
त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारत सरकारने एक टपाल तिकिट काढले. वनवासी कल्याण आश्रमाने सुध्दा, त्यांचे देशासाठीचे योगदान लक्षात घेऊन त्यांचे चरित्र संपूर्ण देशभर प्रसारित केले. २०१४ ते २०१५ हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे २६ जानेवारी हा दिवस ‘ नारी शक्ती दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. या वीरांगनेच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
माहिती संग्रहिका व लेखिका : सौ शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






