डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ सार्थक… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(मुली म्हणून, मुलगा म्हणून कोणती कर्तव्ये केली बाकीच्यांनी?अर्थात आमची अपेक्षाच नाहीये रे. पण मग या जगात तू एकटा पडशील. नाही मांडलास संसार की नाही केलंस लग्न. कोण घेईल तुझी काळजी बाबा पुढे?काही नाही तर तू वाडा विकून टाक आणि बदली घे करून शहरात. तुझं तू ठरव. पण आता यात बदल होणार नाही. मी याच्या चार कॉपी काढून घेईन आणि आमच्या पश्चातच तू तुझ्या भावंडाना त्या दे. ”, नाना थकून बोलायचे थांबले. ) – इथून पुढे – –
माई जवळ आल्या. ” हे बघ माधवा. नाना बरोबर बोलत आहेत. आम्ही खरोखरच उताराला लागलेली माणसे. काही भरवसा नाही आमचा. हे मृत्युपत्र माझ्याही संमतीनेच केलंय.
माधव हसला. ” माई, नुकतीच पासष्टी झाली तुझी. काही म्हातारी नाही झालात दोघे. मी तर म्हणतो आता तुम्ही छोट्या छोट्या यात्रेला जात जा. लहान, आठ दिवसाच्या. कधी कुठेच जायला नाही मिळालं तुम्हाला. माझा मित्र काढतो अशा छान ट्रिप्स. ”
माधवने हट्ट करून नाना माईना अष्टविनायक सारख्या छोट्या ट्रीपला पाठवलं. केवढा आनंद झाला त्या दोघांना. बाहेरचे जगच न पाहिलेल्या त्यांना फार अप्रूप वाटलं त्या ट्रिपचं.
भेटेल त्याला सांगत बसले माई नाना. काय सुंदर हो ती ट्रिप. काय व्यवस्था, जेवण चहा नाश्ता सगळं हातात.
आमच्या माधवामुळे घडलं हो अष्टविनायक दर्शन. ”
– – आता नाना माई अशा आठ दहा दिवसांच्या सहलीला जाऊ लागले. कधीकधी शेजारचे काका काकू पण त्यांच्या बरोबर जात. खूप आवडे त्यांना सगळ्याना हा बदल.
यावेळी आता केदारनाथची मोठी ट्रिप होती. शेजारच्या काका काकूंना काही अडचणीमुळे जमणार नव्हतं.
“ त्या केदारनाथच्या मनात मला बोलवायचं नाहीये. ” काकू हळहळून म्हणाल्या
अगदी आनंदात सगळे वीस यात्रेकरू निघाले. ग्रुप लीडर म्हणाला, ”काही काळजी करू नका. आम्ही आहोत. कळवत राहू सगळा वृतांत. ”
दुर्दैवाने केदारनाथजवळ भयंकर पाऊस पडला, कडे कोसळले आणि ही बस दरीत कोसळली. एकही माणूस वाचला नाही. हे वृत्त टीव्ही वर दाखवले. हीच बस जी नाना माईना घेऊन जात होती. नाना माईंचे मृतदेह सुद्धा दुर्दैवाने सापडले नाहीत. सगळेच्या सगळे बसमधले लोक वाहून गेले आणि दगावले.
माधवच्या शोकाला पारावार राहिला नाही. त्याने ताबडतोब बहिणींना बोलावलं. भावाला परदेशी फोन करून येण्यास सांगितलं. सुरेश आला नाही पण बहिणी मेव्हणे आले. सगळे संस्कार झाल्यावर चार दिवसांनी गेले आणि म्हणाले आता बारावा तेराव्यालाच येऊ. सुरेश पण येतोय ना? “
माधव काहीच बोलला नाही. तेराव्या दिवशी पुन्हा सगळे जमले. सर्व पार पडलं आणि सुरेश म्हणाला,
“ माधव हे बोलायची ही वेळ नाही पण मला इतक्या लांबून पुन्हा पुन्हा यायला जमणार नाही.
आम्ही तिघांनी असं ठरवलं आहे की हा वाडा विकून टाकायचा. आणि शेत सुद्धा. पैसे वाटून घ्यायचे आणि मोकळं व्हायचं. तू दुसरीकडे फ्लॅट बघ आणि शिफ्ट हो. गिऱ्हाईक पण तयार आहे लगेचच व्यवहार करायला. ”
माधवने बहिणी आणि दोन्ही मेव्हण्याकडे बघितलं. बेरकीपणे ते बघत होते. हे सगळे आधी भेटले आहेत आणि सगळं ठरवूनच सुरेश बोलतोय हे माधवच्या लक्षात आलं.
तो म्हणाला, “ हरकत नाही. पण आपले जोशी वकील आत्ता येतीलच. बघूया ते काय म्हणतात. ”
“ ते कशाला हवेत?काय संबंध त्यांचा? “ सुरेश म्हणाला.
“ समजेल, ते आले की. ” माधव शांतपणे बोलला.
जोशी वकील आले.
”बसा बसा. ”
“ झालं ते वाईट झालं. नाना माझे फार जवळचे मित्र हो. शहाणा माणूस बरं. ” बोलता बोलता त्यांनी चार कॉप्या प्रत्येकाच्या हातात ठेवल्या.
“ हे माई नानांचे मृत्युपत्र. तुम्ही हे माझ्यासमोर वाचा. हे अर्थात रजिस्टर केलंय त्यामुळे संशयाला जागाच नाही. सुरेश, तू मोठ्याने वाच. ”
“काय?माई नानांनी मृत्युपत्र केलं होतं?आम्हाला कसं माहीत नाही?”
– – जोशी शांतपणे म्हणाले, ”तुम्हाला कळवायला तुम्ही इथे फिरकत तरी होतात का?किती वर्षात तू आला नाहीयेस भारतात?आणि काय ग कुमुद कुसुम, कितीवेळा आले माईंनाना तुमच्या घरी? कधी सांगणार ते तुम्हाला?” – जोशी शांतपणे म्हणाले. “ ते सोडा. आत्ता तर समजतंय ना?”
सुरेश मृत्युपत्र वाचत गेला. वाचता वाचता त्याचा चेहरा लालबुंद झाला. या माधवला सगळा वाडा आणि शेत पण? मला फक्त पन्नास हजार? वर लिहिलंय की डॉलर्समध्ये कमावणाऱ्या मुलाला याची काय गरज असणार?पण आईबापांची भेट असू दे… आणि निम्मे निम्मे दागिने कुमे तुला आणि कुस्मे तुला. वावा. काय ही वाटणी आहे. मी कोर्टात जाईन. ”
जोशी वकील हसले. ” जरूर जा कोर्टात. नानाला ही सगळी कल्पना होतीच म्हणून त्याने अगदी कायदेशीररीत्या हे कागदपत्र केले आहेत. जायचे तर जा कोर्टात. फक्त वेळ आणि पैसा वाया जाईल आणि हाती काहीही येणार नाही. आणि काय तुम्ही मुलं रे?आईवडिलांवर जराही प्रेम माया नसणारी मुलं काय उपयोगाची? मी बघत होतो ना.. एकट्या माधवने निरपेक्षपणे माई नानांना संभाळलं. त्यांच्यापासून दूर जावं लागेल म्हणून त्याने प्रमोशन्स नाकारली. भाग्यानेच मिळतो असा मुलगा… आणि काय ग मुलींनो, आज आईबाप गेल्यावर आलात हो?सगळं हक्काने घेतलेत की पुष्कळ. कुठे कमी पडले आईबाप ? केली की रीतसर बाळंतपणे सोने नाणे देऊन त्या त्या वेळी. आणि हा माधव कमी राबला नव्हता त्याही वेळी. पण समजून घ्यायचंच नाही ठरवल्यावर मी तरी काय बोलणार?.. हे बघा, माझं काम झालंय. माधव, तू निर्णय घे. हे सगळं तुला तुझ्या आईवडिलांनी प्रेमाने दिलंय. त्याचा विनियोग तू तुला हवा तसा कर. ”
– – जोशी वकील निघून गेले. न बोलता सगळी भावंडे उठून चालती झाली.
माधवला अतिशय वाईट वाटलं. आपले माई नाना किती हुशार होते आणि आपल्या मुलांना ते किती नीट ओळखून होते हे पुन्हा जाणवलं त्याला.
याही गोष्टीला चार वर्षे झाली. भावंडे पुन्हा फिरकली नाहीत. आता हे संबंध तुटल्यातच जमा होते.
माधवने वाडा शेती विकून टाकली. त्या भरभक्कम रकमेत त्याला पुण्यात सुंदर फ्लॅट विकत घेता आला त्याने आपली बदली पुण्यात करून घेतली.. शिवाय त्याने बँकेत बरीच रक्कम गुंतवली.
जोशी वकील त्याच्या सतत संपर्कात होते.
” जोशीकाका, येत जा पुण्याला. मला तुमच्याशिवाय कोणी नाही आता जवळचं. ”
.. काका हसले. ” थांब. येईलही कोणी जवळचं. तुला आपलं म्हणणारं. सरळच विचारतो. करतोस का लग्न?आहे एक छान तुला योग्य मुलगी… थांब हं.. निशा अगं ये आत.. ही निशा. माझी मानलेली मुलगी. तुझ्याइतकीच मला जवळची आणि प्रिय आहे. हिचेही आईवडील फार लवकर गेले. एकटी पोर आहे बरं जगात. आणि मोठी जिद्दीची आहे बरं. माझ्या मित्राचीच मुलगी आहे ही. पुण्यात नामवंत शाळेत शिक्षिका आहे. पण बघणारं कोणीच नसल्याने लग्न राहून गेलं पोरीचं. बघा.. भेटा एकमेकांना चार वेळा. हेही व्हायचं असलं तर होऊ दे माझ्या हातून. ”
माधव बघतच राहिला. निशा छान हसत होती त्याच्याकडे बघून.
“ हे बघ माधव.. आपण आता पन्नाशीला आलोय. मला तू आवडलास. तुला मी पसंत असले तर लग्न करायला माझी हरकत नाही. ”
.. ही छान स्मार्ट हसरी मुलगी माधवला एकदम आवडूनच गेली.
निशा म्हणाली, ” हवी तर माझी सगळी चौकशी तू माझ्या प्रिन्सिपल मॅडमकडे करू शकतोस. ”
माधव म्हणाला, “ जोशीकाकानी तुला आणलीय ना, मग बास. ते मला नानांच्या जागीच आहेत निशा.
हे माई नाना असताना व्हायचे योग नव्हते ग. किती आनंद झाला असता त्यांना. ”
” हो. ते दोघे असतांना खूप पूर्वी मला जोशीकाकांनी तुझ्याबद्दल विचारलं होतं रे. पण मीच नाही म्हणाले. माझं पुण्यातलं घर आणि नोकरी सोडून मला तुमच्या गावाला यायचं नव्हतं. मग जोशीकाकांनी तुम्हाला पुढे विचारलं नाही. तेव्हा आपले योग नव्हते असं म्हणूया. आता होतोय उशीर म्हणा, पण तुझी हरकत नसेल तर आपण करूया लग्न. ” निशा म्हणाली
माधव आणि निशा खूप वेळा भेटले. आपलं एकमेकांशी नक्की पटेल, आपले विचार आवडीनिवडी खूप जुळतात हेही लक्षात आलं माधवच्या. तिच्या सहवासात वेळ कसा मजेत जातो आणि तिलाही आपण आवडतो हे लक्षात येऊन सुखावला माधव.
…. चार महिन्यांनी निशा आणि माधवने रजिस्टर लग्न केलं. जोशीकाका आणि निशाच्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम साक्षीदार म्हणून उपस्थित होतेच.
“माधव, फार सुरेख कर्तृत्ववान बायको मिळालीय हो तुम्हाला. माझी सगळ्यात आवडती शिक्षिका आहे निशा. तुमचा संसार अगदी सुखाचा होऊ दे. ” डोळे पुसत मॅडम म्हणाल्या.
“ काका “ म्हणत गहिवरून माधवने जोशींकाकांना मिठीच मारली.
“ माझं सगळं भलं तुमच्याच हातून व्हावं असंच नियतीने ठरवलंय काका. आशीर्वाद द्या”. दोघे काकांच्या पायाशी वाकले.
“ लक्ष असू द्या काका. आणि हक्काने तुमच्या या मुलांकडे येत जा. ”
.. डोळे पुसून जोशींकाकांनी त्यांना जवळ घेतले आणि तोंडभर आशीर्वाद दिला… “ नांदा सौख्यभरे. ”
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈




