श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

म्हणूनच आहे वर्दीवर ‘विश्वास’! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

एस. आर. पी. एफ. जवान राहुल शिंदे

२६, ११, २००८ हे आकडे भारतीयांच्या मनावर जणू तापलेल्या सळईने डागण्या देऊन कोरलेले आहेत. यातील २००८ ही खूण काळाच्या ओघात काहीशी बुजून गेलेली असली तरी २६/११ चा दाह मात्र शमलेला नाही. आणि एका अर्थाने ते चांगलेही आहे. भूतकाळ आणि भूतकाळातील चुकांबद्द्ल जे अनभिज्ञ असतात त्यांच्या हातून त्याच चुका होणे, हे अटळच असते, असे एका तत्ववेत्त्याने म्हटलेले आहे, त्याला काही विशिष्ट असा अर्थ आहे. २६ ते २९ नोव्हेंबर हे चार दिवस तर आपण विसरताच कामा नये. म्हणूनच ह्या चारही दिवशी माझ्या मगदुराप्रमाणे या काळात घडलेल्या काही घटना लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.

१९७१ च्या भारत-पाक युद्धात राजस्थान सीमेवरील लोंगोवाला चौकी मेजर कुलदीपसिंह चांदपुरी यांनी केवळ १२० सैनिकांच्या जीवावर रात्रभर झुंजवत ठेऊन पाकिस्तानला वाळवंटातील धूळ चारली ही कथाही अनेकांना माहीत असेल. तशीच काहीशी ही घटना.

२६ नोव्हेंबरच्या रात्री ९. ४० वाजता पाकिस्तानी गावठी कुत्री ताजमध्ये घुसली आणि त्यांनी दिसेल त्यांचे लचके तोडले. जास्तीत जास्त माणसांना, त्यातल्या त्यात परदेशी नागरिकांना ओलिस ठेवायचे, भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आणायचा आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात आपल्या अनेक मागण्या मान्य करायला भारत सरकारला भाग पाडायचे, असा फार मोठा कट शत्रूने आखला होता. प्रत्येक अतिरेक्याकडे एके-47 रायफल्स आणि तिच्या ६०० गोळ्या, २०-२५ हातबॉम्ब्स आणि आर. डी. एक्स. चे एक पुडके एवढी युद्धसामुग्री होती. आणि ताजमधील सर्व नि:शस्त्र माणसांना संपवायला ती पुरेशी होती. बऱ्याच लोकांना ठार मारल्यानंतर (यांनी ताज मधील श्वानांनाही (स्नीफर डॉग्ज) गोळ्या घातल्या! ) त्यांनी मग लोकांना धमकावून, त्यांचे हात बांधून एका जागी गोळा करायला सुरूवात केली.

दक्षिण मुंबई-झोन 1 चे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस या पदावर कार्यरत असलेल्या श्री. विश्वास नांगरेपाटील साहेबांना दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. श्री. के. व्यंकटेश्वरम साहेबांचा संदेश आला.. कॅफे लिओपोल्ड मध्ये गोळीबार झाला आहे.. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.

नांगरेसाहेब तातडीने घटनास्थळाकडे जायला निघाले. मेट्रो चित्रपटगृहाजवळ पोहोचतात न पोहोचतात तोच त्यांचे मोबाईल, रेडिओ, वॉकी-टॉकी खणखणायला सुरूवात झाली. पोलिस कमिशनर हसन गफूर, आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस ए. एन. रॉय यांनी नांगरेपाटलांना त्वरीत हॉटल ताज मध्ये जाण्याचे आदेश दिले.

या प्रवासात असतानाच पाटील साहेबांना विविध स्त्रोतांकडून फोनवर मिळत असलेली माहिती गोंधळात टाकणारी आणि काही बाबतीत तर अफवांवर आधारीत होती. ताजवर सुमारे १०० लोकांनी हल्ला चढवला आहे अशी अफवेवर बेतलेली बातमीही त्यांना दिली गेली.

लिओपोल्डच्या आधी ताजकडे जाणारा मार्ग आहे, बरोबर ११व्या मिनिटाला नांगरेसाहेब ताजमध्ये होते. बहुदा हा टोळीयुद्धाचा प्रकार असावा असे सर्वांनाच वाटत होते. पण ताज मध्ये शिरताच मारल्या गेलेल्या लोकांचे मृतदेह, एके-४७ रायफलच्या गोळ्यांच्या पुंगळ्या, त्यातून बाहेर पडलेले शार्पनेल्स, काचांचे तुकडे इत्यादी पाहून हा नक्कीच अतिरेकी हल्ला आहे, हे त्यांच्या लक्षात आले.

सुमारे १००० खोल्यांचे अवाढव्य ताज हॉटेल, त्यातील अनेक मजले, आणि त्यांच्याकडे जाणाऱ्या शेकडो पायऱ्या.. अतिरेकी नेमके कुठे लपले आहेत, हे समजणे कठीण होते. पण सुदैवाने नांगरे साहेबांनी दीड महिन्यापूर्वीच ताजचे सेफ्टी ऑडीट स्वत: केले होते, त्यामुळे त्यांना ताजची आतली रचना माहित होती.

त्यांच्या कमरेला एक पिस्टल, अंगरक्षक अजित खेतले यांचेकडे एक पिस्टल, ताज चे सिक्युरीटी चीफ सुनील कुडीयादी (नि:शस्त्र), राज्य राखीव पोलिस दलाचा एक हत्यारी जवान, काही पोलिस अधिकारी, रस्ता दाखवण्यासाठी ताज हॉटेलचे दोन कर्मचारी, अशा फक्त बारा जणांची ही तुकडी तयार झाली. बुलेटप्रुफ जॅकेट्स नाहीत, जादाची काडतुसे नाहीत, फक्त सहा गोळ्या झाडू शकणारी तीन-चार पिस्टलस, जुन्या पद्धतीची साधी. ३०३ बंदूक एवढीच शस्त्रे विरूद्ध आधुनिक शस्त्रे, अतिरेकी कारवायांचे दोन वर्षांचे प्रशिक्षण मिळालेले, ब्रेनवॉश करण्यात आलेले, मरण्याच्या तयारीने आलेले, धर्मवेडे मनोरूग्ण तरूण दहशतवादी, त्यात त्यांना पाकिस्तानातून सॅटेलाईट फोनवरून मिळणारी अचूक माहिती, अशी विषम परिस्थिती होती. पण मुंबई पोलिसांच्या वीरांनी पाऊल पुढे टाकले होते… आता माघार नाही!

नांगरे साहेब एस. आर. पी. एफ. जवान राहुल शिंदेला म्हणाले, ”देशाचे रक्षण करण्याची अशी संधी आयुष्यात केंव्हा तरीच आणि नशीबवानालाच प्राप्त होते.. आता माघारी फिरता येणार नाही!

त्यावर २२ वर्षे वयाचं ते कोवळं पोरगं म्हणाले, ”अंगावर ही वर्दी त्यासाठीच तर चढवलीय! ” आणि त्याने पाऊल पुढे टाकले. तेवढ्यात नांगरेसाहेबांचे बॅचमेट आणि नक्षलवाद्यांशी लढण्याचा अनुभव असलेले डी. सी. पी. राजवर्धन सिन्हा हे ताजवर पोहोचले. त्यांनाही ताजवरील हल्ल्याची खबर मिळाली होती. हे सर्व मिळून अतिरेक्यांच्या मागावर निघाले.

अतिरेक्यांना लिफ्टचा उपयोग करता येऊ नये म्हणून सर्व लिफ्ट्स बंद करण्यात आल्या. आपले बहादूर त्यांना शोधत होते. पण अतिरेकी दुसऱ्या विंग मध्ये होते तर नांगरे साहेबांची टीम पहिल्या विंगमध्ये होती. अशा परिस्थितीत प्रसंगावधान राखून नांगरे साहेबांनी चतुराईने सीसीटीव्ही रूममध्ये जाऊन अतिरेक्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा निर्णय घेतला. आणि ते चौघे त्यांना दिसले.

वरच्या मजल्यावर असलेले अतिरेकी नजरेच्या टप्प्यात येताच त्यांच्यावर पिस्टलमधून गोळ्या झाडण्यात आल्या. अतिरेक्यांना इतक्या लवकर प्रतिहल्ला होईल याची कल्पना नव्हती. त्यांना वाटले की पोलिसांची मोठी तुकडी आपल्यामागे लागली आहे. ते गोळीबार करीत आणखी वरच्या मजल्यावर गेले आणि त्यांनी ग्रेनेड्स फेकले. आपल्या लोकांनी फक्त एक-एक फैर झाडली. कारण गोळ्या पुरवून पुरवून वापरायाच्या होत्या. नांगरेसाहेबांच्या एका गोळीने एका अतिरेक्याच्या पायांचा वेध घेतला पण ते सर्व अतिरेकी इमारतीच्या दुसऱ्या भागात पळून गेले.

तळहातावर शीर घेऊन हे वीर तयार होते. यांच्याकडे खूप कमी संख्या आहे, शस्त्रे नाहीत हे अतिरेक्यांना समजू देणे धोक्याचे होते, जवळ असलेली प्रत्येक गोळी जपून झाडावी लागत होती, बाहेरून जादा पोलिसांची मदत पोहोचण्यास उशीर होता.

अतिरेक्यांना भारतात घुसवणाऱ्या दहशतवादी संघटनांनी दूरवर पाकिस्तानात बसून इथे ताजमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना सॅटेलाईट फोन वरून सुचना देण्याची चोख व्यवस्था केली होती. त्यांनी या अतिरेक्यांना सीसीटीव्ही कॅमरे फोडा, सीसीटीव्ही रूमवर हल्ला करा असा आदेश दिला.

तोपर्यत सावध झालेल्या भारतीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानातून होणारे सॅटेलाईट फोन संभाषण अचूक टिपायला सुरूवात केली होती. त्यांनी अतिरेकी सीसीटीव्ही रूमकडे येताहेत असा संदेश डीसीपी राजवर्धन यांच्यापर्यंत अगदी वेळेत पोहोचवला. त्यामुळे पुन्हा सीसीटीव्ही रूमचा आश्रय घेतलेल्या पोलिसांना त्या रूममधून बाहेर निघावेच लागले.

तेवढ्यात अतिरेक्यांनी सीसीटीव्ही रूमवर गोळीबार सुरू करत एक स्फोट घडवला. त्यामुळे त्या रूमचे सिलिंग खाली कोसळले, नांगरेसाहेबांचे अंगरक्षक अजित खेतले गोळ्या लागून जखमी झाले. सर्व टीमला आता जिन्यावरून खाली जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण हे सर्व आता अतिरेक्यांच्या गोळीबाराच्या टप्प्यात आलेले होते..

राहूल शिंदे आपल्या रायफलमधून अतिरेक्यांवर गोळ्या झाडत असताना त्यांना अतिरेक्यांच्या एके-४७च्या अनेक गोळ्या लागल्या… वीर खाली कोसळला… तशाही स्थितीत त्यांनी जळत असलेल्या सीसीटीव्ही रूम मध्ये सरपटत जाऊन तेथून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण एके-४७च्या जहाल गोळ्यांनी या वीराचे रक्त जाळून टाकले होते… नंतर जेंव्हा राहुल शिंदे यांचा निष्प्राण देह दृष्टीस पडला तेंव्हा त्यांचे डोळे अतिरेकी ज्या मजल्यावरून गोळीबार करीत होते, त्या दिशेला रोखून पहात होते, संगीन त्या दिशेला रोखलेली होती… ट्रिगरवर बोट होते… रायफलमध्ये गोळी नव्हती तसे कुडीत प्राणही नव्हते!

श्री. विश्वास नांगरे पाटील साहेब, श्री. हर्षवर्धन सिन्हा साहेब आणि त्यांच्या सोबतच्या शूरवीरांनी नौदलाचे कमांडो पोहोचेपर्यंत प्राणपणाने खिंड रोखून धरत शत्रूला थोपवून ठेवले होते, अन्यथा किती भयावह परिस्थिती ओढवली असती, देव जाणे!

ही एक अविश्वसनीय, अलौकीक आणि अगदी विपरीत परिस्थिती असताना केली गेलेली शौर्यपूर्ण कामगिरी होती! … म्हणूनच वर्दीवर ‘विश्वास’ आहे. आणि हा विश्वास बहादूर पोलिस टिकवून ठेवतील अशी खात्री आहे! धन्यवाद मुंबई पोलिस! राहुल शिंदे यांच्या बलिदानाला शतश: वंदन!

माढा तालुक्यातील सुलतानपूर हे राहुल शिंदे यांचे जन्मगाव. या गावाचे नाव आता राहुलनगर असे करण्यात आले आहे.

 

© श्री संभाजी बबन गायके 

न-हे, पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted