श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “जुईने करून दाखवले!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
३० मे, २०२६ रोजी खडकवासल्यातील एन. डी. ए. National Defence Academy (राष्ट्रीय संरक्षण अकादमी) मध्ये दीक्षांत समारंभ झाला यात खडकवासल्याच्या अगदी भिंतीपलीकडे राहणारी जुई राजेंद्र ढगे ही आपली मराठी कन्याही दमदार पावले टाकीत देशसेवेत दाखल होण्याच्या प्रवासात अग्रेसर झाली… ही अत्यंत अभिमानाची बाब आहे… यातून मुलींनी प्रेरणा घ्यावी यासाठी हा लेखन-प्रपंच!
२०१७… धनुर्विद्या प्रकारातील मोठी नेमबाजी स्पर्धा कोकणातल्या डेरवण येथे सुरू होती… ती अन्य स्पर्धकांची निशाणेबाजी पहात मैदानाच्या बाहेरून जात होती……. कुणा स्पर्धकाचा भरकटलेला एक टोकदार बाण सणसणत आला आणि तिच्या डाव्या हातामध्ये आरपार घुसला! ती तर धनुर्धारी! प्रत्यंचा ताणायची असेल, तिच्यावर अडकवलेला बाण लक्ष्याच्या दिशेने सोडायचा असेल तर उजवा हात महत्त्वाचा. पण ही प्रत्यंचा ज्या धनुष्यावर बांधलेली असते, ती प्रत्यंचा ताणायला, ते धनुष्य पेलायला डावा हात मजबूत असावा लागतोच. आणि बाण तर हाच डावा हात भेदून गेलाय. झालेल्या जखमेचं आणि तिच्यातून वाहणा-या रक्ताची तमा नव्हती….. पण यापुढे या हातात धनुष्य धरता येईल ना? या एकाच चिंतेचे ढग तिच्या बालमुखकमलावर दिसत होते. सुदैवाने योग्य वैद्यकीय उपचार आणि मनातली प्रखर जिद्द यांमुळे जखम बरी झाली… आणि तिने पुन्हा धनुष्य उचलले! पुढे अनेक पदकं पटकावली.
२०२३… पण यावेळी तिचे लक्ष्य अत्यंत वेगळे होते!
पण भातुकलीच्या खेळामधली भांडीकुंडी किंवा इतर स्त्रीसुलभ नाजूक खेळ खेळण्याच्या पोरवयात तिच्या हाती हे धनुष्यबाण आले कुठून? यासाठी आई थोडी वेगळ्या मातीतली असावी लागते. तिची आई तशीच होती. तिने एक खेळ म्हणून का होईना तिच्या हाती हे काहीसं पुरूषी अस्त्र सोपवलं आणि तिने नेम अचूक धरला! राजपुत्र अर्जुनाच्या हाती धनुष्यबाण हक्क म्हणून मिळालं होतं. तसं ते इतर राजपुत्रांच्या हातीही होतंच, पण अर्जुनाने धनुष्य, बाण, लक्ष्य आणि लक्ष या चारी गोष्टींवर प्रभुत्व मिळवले आणि आज इतिहासात सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हणून अर्जुन हे नाव चिरंजीव झालेलं दिसतं. अर्जुन आणि माशाच्या डोळ्याचा लक्ष्यभेद ही गोष्ट तर लाखो मुलींनी ऐकलेली. पण तिच्या डोळ्यांत ही कथा जणू रुतून बसली होती.
पुराणातील किंवा इतिहासातील ढाल-तलवार, भाले आणि धनुष्यबाणाच्या लढाया आता केवळ गोष्टींत राहिलेल्या आहेत. मात्र आताही लढाई आहेच, मात्र आयुधं आमुलाग्र बदलून गेलीत. ही बदललेली आयुधं सक्षमतेने चालवणारी नवी सैन्यपिढी ही देशाच्या सीमांची सततची मागणी असते, आणि पुढील काळातही राहीलच. याएवढीच महत्त्वाची गरज म्हणजे सैन्याचं नेतृत्व करू शकणारी अतिशय कार्यक्षम, उच्चदर्जा-प्रशिक्षित सैन्य अधिका-यांची फळी.
गरज पडली तेंव्हा स्त्रियांनी हाती शस्त्रास्त्र धरून रणभूमीवर तांडव मांडल्याची उदाहरणं आपल्या हिंदुस्थानात अगदी देवादिकांच्या काळापासूनची. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात महाराणी ताराराणी आणि इतर रणरागिणींनी हाती खडग घेऊन लढताना जगानं पाहिलं आहेच. स्वातंत्र्यपूर्व काळातील संघर्षात मूळच्या महाराष्ट्रकन्या राणी लक्ष्मीबाईसाहेब तर पाठीस बालक बांधलेलं असताना लढल्या. सुभाषबाबुंच्या आझाद हिंद फौजेत स्त्रियांच्या नाजूक समजल्या जाणा-या हातांमध्ये वजनी बंदुकाही इतिहासाने पाहिल्या आहेत.
इंग्रजांच्या भारतातील सैन्याने १८८८ मध्ये त्यांच्या सोयीसाठी स्त्रियांना फौजेत घेतलं होतं पण ते केवळ परिचारिका म्हणून. पण स्वातंत्र्योत्तर आणि आधुनिक काळातही युद्ध आणि स्त्रिया हा विचार काहीसा मागे पडला होता. वैद्यकीय आणि तत्सम सेवांमध्ये मात्र जगातल्या कुठल्याही सैन्याला स्त्रियांशिवाय सक्षम पर्याय नाही. हिंदुस्थानही याला अपवाद नाही. एका अर्थाने स्त्रियांच्या रक्तातील शौर्याचे निखारे राखेखाली राहून गेले होते. हिंदुस्थानाच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये स्त्रिया अगदीच कमी आहेत किंवा होत्या असं नव्हतं. Combat services and Supervisory Rols (as officers) अर्थात युद्धसेवा आणि पर्यवेक्षकीय सेवांमध्ये अधिकारी या वर्गात स्त्रिया आहेतच. वायुदलात २०१८ मध्ये १३. ०९%, नौसेनेत ६% तर पायदळात ३. ८०% अशा संख्येने स्त्रिया सेनेला मदत करीत होत्या आणि आता ही संख्या वाढलीही असावी. २०२० पर्यंतच्या माहितीनुसार यातील तीन स्त्रिया वैद्यकीय शाखांतून लेफ्टनंट जनरल किंवा समकक्ष अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या होत्या. परंतू प्रत्यक्ष हाती शस्त्र धरलेल्या ८३ दुर्गा मे, २०२१ मध्ये भारतीय पायदळात दाखल झाल्या, त्या सैन्य-पोलिस या शाखेत….. जवान म्हणून! स्त्रियाही ‘जवान’ होऊ शकतात, हे आपल्या व्यवस्थेने उशीराने का होईना लक्षात घेतले, हे महत्त्वाचे. देशरक्षणार्थ हौतात्म्य पत्करलेल्या अनेक शूर अधिका-यांच्या पत्नी सैन्यदलात अधिकारी झाल्याच्या बातम्या हल्ली आपण वाचतोच.
स्त्रिया सैन्याचं नेतृत्व करू शकतात हा विचार हिंदुस्थानाने स्विकारला आणि २०२१ मध्ये खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सैन्याधिकारी प्रशिक्षणासाठी स्त्रियांसाठी १९ जागांना अनुमती दिली. यासाठी पुरूष उमेदवारांना असते तशीच कडक सैनिकी परीक्षा निर्धारीत करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून सुमारे दोन लाखांहून अधिक मुली एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षा देतात……. ही संख्या सुखद आहे!
आपल्या या कथेची नायिका २०२१ पासून या दोन लाखांतून एक होण्याच्या स्वप्नांत रममाण होती. प्रखर जिद्द, विविध विषयांचा रोजचा सुमारे दहा-बारा तास अभ्यास, शारीरिक क्षमता कायम ठेवण्यासाठी लहानपणापासून पहाटे लवकर उठून व्यवस्थित व्यायाम करण्याची आई-वडिलांनी रुजवलेली सवय या सर्वांचा गोड परिणाम म्हणून ही महाराष्ट्र कन्या यावर्षी स्टाफ सिलेक्शन बोर्ड (एस. एस. बी.)ची मुलाखत आणि इतर सर्व चाचण्या पहिल्याच प्रयत्नात पार करून सुमारे चार-साडेचार लाख मुला-मुलींमध्ये देशात एकतिसावी आणि मुलींच्यात तिसरी आली!
घरापासून हाकेच्या अंतरावर असलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, तिथले रूबाबदार कडेट्स, आकाशात भरा-या मारणारी त्यांची विमाने, पासिंग आऊट परेडच्या सकाळी आकाशातून घोंगावून जाणारी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आता तिच्या दृष्टीपथात आली आहेत…….
दहावीच्या बोर्ड परीक्षेचं परीक्षा केंद्र म्हणून एन. डी. ए. खडकवासला च्या प्रवेशद्वारावर असलेल्या केंद्रीय विद्यालयात जाण्याचा योग येणं, तिथून आणि त्यानंतर झालेलं एन. डी. ए. चं दर्शन, तेथील कडेट्सचं खडतर प्रशिक्षण व शिक्षा, त्यांची रूबाबदार पण शिस्तबद्ध व्यक्तिमत्वं, तिथंच पदवीनंतर प्रशासकीय सेवांमध्ये जाण्याचा मनाचा आधीचा निर्णय रद्द करून सैन्यदलात झालेला निर्णय… बारावीत शिकत असतानाच प्रवेशपरीक्षेची माहिती मिळताच स्वयंप्रेरणेने अर्ज भरणं….. आई-वडिलांनी तयारीसाठी भोपाळ सारख्या दूरवरच्या प्रशिक्षण वर्गासाठी जाण्याची परवानगी देणं….. हा प्रवास खडतर आहे.
प्रबोधिनीतून उत्तीर्ण होणा-या कडेटसचा पासिंग आऊट परेड सोहळा अत्यंत देखणा आणि स्फुर्तीदायक असतो. आपले भावी सैन्याधिकारी अभिमानाने पावलं टाकीत टाकीत प्रतिकात्मक असलेली अंतिम पग नावाची पायरी ओलांडून देशाच्या संरक्षण सेवेत दाखल होतात.
आणखी तीनेक वर्षांनी आपली ही कथानायिका सुद्धा या पथावरचं आपलं ‘अंतिम पग’ टाकेल आणि मराठी मातीतून हिंदुस्थानाच्या सीमेवर एक संरक्षक उभा ठाकेल…….!
महाराष्ट्रातल्या एन. डी. ए. मध्ये आता महाराष्ट्राने पाऊल ठेवलं आहे! १५०व्या प्रशिक्षण तुकडीच्या यादीत आता एक मराठी नाव, जुई ढगे, हे हि-यासारखे झळकते आहे!
कुणी लाखात एक आहे, असं म्हणलं जातं तेंव्हा या त्याने किंवा तिने इतर नव्व्याण्णव हजार नऊशे नव्व्याण्णव लोकांना मागे टाकलेलं असतं. शारीरिक सौंदर्याच्या मापदंडाने लाखात एक असणारे तर अनेक असतात, पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर असं एकमेव आणि अद्वितीय होणं, ही खूप मोठी बाब ठरते! दोन लाखांतून पहिल्या एकोणीसात येणं म्हणजे एक लाख नव्व्याण्णव हजार नऊशे एक्क्याऐंशी जणींना मागे टाकून पुढे येणे……. आणि ते ही स्वत:च्या हिंमतीवर……. घराण्यात तशी पूर्वपिठिका अजिबात नसताना, आसपासच्या परिसरात तसं वातावरण नावालाही नसताना, या वयातली तरूणाई ‘जवान’ होण्याऐवजी बेगडी दुनियेत ‘बेभान’ धुंदीत, आंतरजालात कीटकांसारखी अडकून पडलेली असताना आणि भक्कम आर्थिक नसताना….. हे किती विशेष!
मध्यमवर्गीय नोकरदार असलेली आई प्रा. डॉ. मनिषा आणि एका प्रसिद्ध कारखान्यात सेवा करणारे वडील राजेंद्र ढगे व कुटुंबीय, पाठिंबा देणारी शाळा, शिक्षक, पालकांनी तिला खेळांत भवितव्य घडवता यावी यासाठी केलेली पदरमोड, खेळांतून निर्माण होणारी जिद्द, अपयशातून धडे घेत पुन्हा लक्ष्याचा वेध घेण्याची आंतरीक भावना, बारावीची बोर्ड परीक्षा डोक्यावर असतानाही केलेला अभ्यास, सुयोग्य प्रशिक्षण यांमुळे प्रा. डॉ. मनीषा यांची कन्या कुमारी जुई राजेंद्र ढगे ही आपली मुलगी आता सैन्याधिकारी होणार आहे……… महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो….. Cadet जुई! जयहिंद!
जुई राजेंद्र ढगे आता पुढील प्रशिक्षणासाठी जातील आणि अधिकारी होऊन देशाच्या सेवेत दाखल होतील….. जय महाराष्ट्र!
© श्री संभाजी बबन गायके
न-हे, पुणे
9881298260
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





